जे न देखे रवी...

घाटरस्ता, निसर्ग आणि मी

Primary tabs

नुकत्याच होऊन गेलेल्या
वर्षावाला, निथळून टाकणारी
हिरव्याकंच कांतीची गर्द वनराई.
सकाळचे कोवळे ऊन पिऊन
तजेलदार झालेली नवी पालवी.
स्वच्छ धुऊन निघालेले,
लाल मातीच्या चिखलावर,
रेखीव छान वळणदार रांगोळीची
जणू निळीशार रेघच असलेले रस्ते.
त्यावरून वळणे घेत घेत मी
निवांतपणे,
आजूबाजूचा निसर्ग न्याहाळीत,
मजेत आवडीचे गाणे गुणगुणत,
घाटमाथ्यावर चढून जातो
आणि,
पुढे तसाच खाली उतरून जातो.
दिवसभर राबायला,
सिमेंटमध्ये वाळू, खडी मिसळायला.

परत येताना पुन्हा तेच सारं.

- संदीप चांदणे (मंगळवार, १३/०९/२०२२)

आवडली कविता,

जाता येता दिसणारी ही विलोभनिय दृष्ये, मधला सिमेंट मधे वाळू मिसळण्याचा काळ सुसह्य करतात.

पैजारबुवा,

Bhakti

मस्त!
चित्रदर्शी|मर्मदायी|

सुरुवातीची कविता छान आहे, पण..

दिवसभर राबायला,
सिमेंटमध्ये वाळू, खडी मिसळायला.

परत येताना पुन्हा तेच सारं.

याला पर्याय नाही..

सतिश गावडे

कधी काळी दुचाकीवरून शनिवार रविवार ताम्हिणी घाट उतरुन जात असे ते आठवले :)

चौथा कोनाडा

व्वा, सुंदर शब्दचित्र.
आवडली कविता !

पण शेवटच्या तीन ओळीत खडा लागून भानावर आलो.
आपल्या सर्वांचे तेच आहे, वास्तवात परतावे लागतेच.
तेच आयुष्य आहे !

चित्रगुप्त

कविता वाचताना फार फार वर्षांपूर्वी पावसाळ्यात करत असलेल्या भटकंतीच्या आठवणी मनात दाटून आल्या. तेंव्हा शहराबाहेरचा परिसर फार रमणीय होता, आणि त्यात फिरताना अद्भुततेचा प्रत्यय यायचा.

चित्रगुप्त

या कवितेत 'एका दिवसातले येणेजाणे' याऐवजी संपूर्ण आयुष्याचे सांकेतिक चित्रण आहे, असा विचार केला, तर 'परत येताना पुन्हा तेच सारं' जर होऊ शकलं, तर किती छान होईल, असं वाटून गेलं. अर्थात काही उद्यमी (आणि भाग्यवान) लोक अगदी उतारवयातही नवनवे उपक्रम हाती घेत असतात, तसा प्रयत्न करायला हवा.