काथ्याकूट

समरकंदचं संमेलन आणि शांघाय संघटना

Primary tabs

SCO
उझबेकिस्तानमधल्या समरकंदमध्ये शांघाय सहकार्य संघटनेची (Shanghai Cooperation Organisation) 22 वी शिखर परिषद 15-16 सप्टेंबर 2022 ला पार पडली. या परिषदेला 14 देशांचे प्रमुख नेते उपस्थित होते. सध्या SCO मध्ये निरीक्षक असलेल्या इराणने समरकंद परिषदेत पूर्ण सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे.

समरकंद शिखर परिषद-2022
SCO सदस्य देशांमध्ये पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय समरकंद-2022 मध्ये घेण्यात आला आहे. त्यासाठी वाराणसी शहराची 2022-23 साठीची SCO ची पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

समरकंद-2022 च्या अखेरीस एक संयुक्त जाहीरनामा प्रसारित करण्यात आला आहे. त्यामध्ये पारदर्शक आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठेची निर्मिती आणि व्यापारामधील सध्याच्या अडचणी दूर करण्यावर भर देण्यात आला आहे. जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे :

  • सर्व देशांच्या ऊर्जा सुरक्षेच्या हक्काची खात्री आणि आदर ठेवण्याची गरज आहे. तसंच सर्व देशांच्या नागरिकांना ऊर्जा उद्योगातील सेवांचा उपयोग करून घेण्याच्या हक्काचाही आदर करण्याची गरज आहे. ऊर्जा सुरक्षा ही आर्थिक विकास, सामाजिक स्थैर्य, राष्ट्रीय सुरक्षा आणि जगाच्या कल्याणासाठीचा पाया आहे.
  • जागतिक ऊर्जा संसाधन नियमन व्यवस्था स्थापन करण्याचं आवाहन SCO नेत्यांनी केलं आहे.
  • प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर अन्न सुरक्षा निश्चित करण्यासाठी SCO सर्व देशांबरोबर काम करण्यासाठी तयार आहे.
  • दहशतवादी, फुटिरतावादी आणि अतिरेकी संघटनांची एक यादी तयार करण्याचा SCO चा विचार आहे. त्यासाठी सदस्य देशांचे कायदे आणि एकमत यांच्या आधारे अशी यादी तयार करण्यासाठी समान तत्व आणि दृष्टिकोन निश्चित केले जातील. अशा संघटनांना SCO सदस्य देशांच्या प्रदेशांमध्ये प्रतिबंधित केले जाईल.
  • जागतिक व्यापार संघटनेमध्ये (World Trade Organization (WTO) आवश्यक सुधारणा करून तिला अधिक प्रभावी बनवण्याची गरज SCO ने व्यक्त केली आहे.
  • अफगाणिस्तानमध्ये एक सर्वसमावेशक सरकार असणे गरजेचे आहे. तसंच स्वतंत्र, अलिप्त, संयुक्त, लोकशाहीवादी आणि शांततापूर्ण; दहशतवाद, युद्ध आणि अमली पदार्थांपासून मुक्त अफगाणिस्तानची निर्मिती करण्याची गरज आहे.
  • रासायनिक अस्त्रांसंबंधीच्या Convention on the Prohibition of the Development, Production, Stockpiling and Use of Chemical Weapons च्या तरतुदींची पूर्तता करण्याचे आवाहन SCO नं केलं आहे.
  • इराणच्या अणुकार्यक्रमासंबंधी करण्यात आलेल्या संयुक्त सर्वसमावेशक कृती योजनेची (Joint Comprehensive Plan of Action (JCPOA) अंमलबजावणी करण्याची आवश्यकता SCO च्या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आली आहे.
  • एकतर्फी जागतिक क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा उभारणं हा एक नकारात्मक प्रयत्न असल्याचं समरकंद आहे.
  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या लष्करीकरणाला SCO ने विरोध केला आहे.
  • शांघाय सहकार्य संघटनेची (SCO) स्थापना
    मध्य आशियातील पाश्चात्यांच्या हालचाली आणि त्याचा आपल्या राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रहितांवर होत असलेला विपरीत परिणाम लक्षात घेऊन रशिया, चीन यांनी कझाकस्तान, किरगिझस्तान आणि ताजिकिस्तान या मध्य आशियाई देशांना बरोबर घेऊन परस्परांमधील सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यातून आपापल्या हितसंबंधांचे संरक्षण कसे करता येईल यावर विचारविनिमय करण्यासाठी चीनमधल्या शांघायमध्ये 26 एप्रिल 1996 ला या देशांची एक परिषद भरवली गेली. त्या परिषदेत परस्पर सहकार्य आणि हितसंबंधांच्या संरक्षणासाठी एक संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. त्या परिषदेच्या आयोजनस्थळावरूनच या संघटनेचं नामकरण शांघाय-5 असं करण्यात आलं होतं.

    1997 मध्ये मॉस्कोतील शिखर परिषदेत या देशांदरम्यान झालेल्या रितसर कराराद्वारे ही संघटना प्रत्यक्षात आली. पुढे 15 जून 2001 ला उझबेकिस्तानला या संघटनेचं सभासदत्व देऊन शांघाय-5 चं नामांतर शांघाय सहकार्य संघटना असं झालं. त्याचवेळी या संघटनेच्या स्थापनेची अधिकृत घोषणा करण्यात आली होती.
    शांघाय सहकार्य संघटनेच्या स्थापनेनंतर दोनच महिन्यांनी 11 सप्टेंबर 2001 ला अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर दहशतवादविरोधी लढ्याचं निमित्त सांगून अमेरिकेनं मध्य आशियात आपले लष्करीतळ उभारले. परिणामी या क्षेत्रात ज्या घडामोडी घडत गेल्या त्यातून शांघाय सहकार्य संघटनेच्या स्थापनेचे उद्देश किती वास्तववादी होते हे स्पष्ट झालं.

    आंतरराष्ट्रीय पातळीवर पाश्चात्य देशांच्या वर्चस्ववादाच्या विरोधात एक समतोल साधणारी संघटना अशी ओळख गेल्या काही वर्षांमध्ये SCO ने निर्माण केली आहे. मात्र संघटनेच्या सर्वच सदस्यांनी ही लष्करी संघटना नसल्याचं आणि भविष्यात तशी शक्यता नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

    SCO चा वाढता प्रभाव
    स्थापनेनंतर अल्पावधीतच SCO चा प्रभाव वाढत गेला. अफगाणिस्तानातील अल-कायदा आणि तालिबानविरोधी नाटो संघटनेचा लढा सुरू असतानाच अमेरिकेकडून मध्य आशियातील देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप सुरू झाला होता. मात्र पाश्चात्यांच्या या हालचालींना ही संघटना यशस्वीपणे तोंड देऊ शकली आहे. त्यामुळे या संघटनेकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर समतोल साधणारी संघटना म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. रशिया आणि चीन हे संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेचे (United Nations Security Council) स्थायी सदस्य या संघटनेतील सर्वात प्रबळ सदस्य आहेत. या संघटनेच्या सदस्य देशांमध्ये नियमितपणे दहशतवादविरोधी संयुक्त युद्धसराव पार पडत आहेत. त्यामुळे दहशतवादाच्या विरोधातील संघटनेच्या लढ्याला बळ मिळत आहे.

    लिंक
    https://avateebhavatee.blogspot.com/2022/09/blog-post_23.html

श्रीगुरुजी

ही संघटना भारताशी सहकार्य करणारी आहे की भारतविरोधी आहे? भारत या संघटनेचा सदस्य आहे का? असल्यास या संघटनेत भारताचे स्थान कितपत महत्त्वाचे आहे?

पराग१२२६३

भारत आणि पाकिस्तान SCO चे 2017 पासून पूर्ण सदस्य आहेत. ही संघटना भारताच्या दृष्टीने महत्वाची आहे. दहशतवाद, अमली पदार्थांच्या व्यापाराला प्रतिबंध, अतिरेकी संघटनांविरोधात संयुक्त कारवाई, या क्षेत्रातील शांतता आणि स्थैर्य अशा कारणांसाठी हे सगळे देश एकत्र आलेले आहेत. सदस्य देशांमध्ये पाकिस्तान वगळता सर्व देश दहशतवाद, मूलतत्ववाद, अतिरेकी विचारसरणीच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे ही संघटना या मुद्द्यांवर भारताशीही सहकार्य करेल.

श्रीगुरुजी

भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले करणाऱ्या व पाकिस्तानने आश्रय दिलेल्या कोणत्याही दहशतवाद्यावर बंदी घालण्यास चीनने सातत्याने विरोध केला आहे. चीन व पाकिस्तान हे देश ज्या संघटनेत आहेत ती संघटना दहशतवाद विरोधात कशी असेल?

लिओ

समरकंदमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या संमेलनानंतर

चीनचा राष्ट्रपती बिजींग येथे खरच नजरकैदेत आहे का ?

चीनमध्ये लष्करी उठाव होईल का ?

पराग१२२६३

ही बातमी फक्त भारतातल्या उथळ माध्यमातच झळकली आहे. Sputnik वर याला fake news म्हटलं आहे, तर CNN, DW वर त्याचा कुठंही उल्लेख नाही.

वामन देशमुख

या परिषदेला 14 देशांचे प्रमुख नेते उपस्थित होते.

कोणते १४ देश?

अर्थात https://en.wikipedia.org/wiki/Shanghai_Cooperation_Organisation#Member_states इथे वेगवेगळ्या देशांच्या याद्या आहेत. पण या लेखात त्यांची स्पष्ट यादी आली असती तर बरे झाले असते.

---

वर, श्रीगुरुजी आणि लिओ यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मलाही हवी आहेत.

पराग१२२६३

समरकंद नावातील शब्द संस्कृत भाषेतील वाटत असले तरी ते स्थानिक उझबेक भाषेतील शब्द आहेत. समर म्हणजे दगड आणि कंद म्हणजे किल्ला.

साहना

वेळे अभावी जास्त लिहू शकत नाही पण समरकंद हे नाव सुमेरू पर्वत ह्या अर्थी वापरत आल्याची पूर्ण शक्यता आहे. सुमेरू पर्वत हा शब्द सोगदिया भाषेंत १००% होता आणि त्याचा उल्लेख "ज्या पर्वताच्या भोवताली विश्व आहे" अश्या अर्थी होता. त्या प्रदेशांत समर हा लोकप्रिय शब्द होता. हिब्रू भाषेंत सामरिआ हे एक पर्वतावर निर्माण केलेले जुने शहर होते ज्याचा उल्लेख बायबल मध्ये आहे. समर शब्द हा इराणी, अरेबिक, अरेमिक, संस्कृत इत्यादी भाषेंत एकतर पर्वत म्हणून वापरत आहे किंवा लोकांची जवळ येण्याची जागा म्हणून ठाऊक आहे.

कंद हा शब्द सुद्धा तसाच आहे. ह्याचा संबंध संस्कृत मधील कूट (किल्ला) किंवा कंड (उभट तुकडा) ह्याच्याशी असू शकतो. कूट इराणी भाषेंत किल - किलात असा होतो ज्याचा अर्थ किल्ला असा होतो. किंबहुना मराठी किल्ला हा फारसी भाषेवरून आला आहे.

पण इंग्रजी भाषेतील कॅस्टल ह्याचा अर्थ किल्ला असा होत असला तरी तो शेवटी खंड ह्याच्याशी निगडित आहे. खंड शब्दाचा आजोबा `केस` (कापणे) असा आहे. झाड कापल्यावर एक उभट बुंधा राहतो. तो सुद्धा खंड आणि इंग्रजीतील तो कॅस्टल आणि इराणी भाषेतील तो किलात. इंग्रजीतील कॅण्डल मधील कॅन्ड आणि संस्कृत मधील कंड हे शब्द एकमेकांचे सक्खे भाऊ आहेत.

समरकंद ह्याचा अर्थ विकीने दगडांचा किल्ला असा दिला असला तरी प्रत्यक्षांत दगड आणि किल्ला हे सोगदियां भाषेंतील शब्द संस्कृती शी संबंधित असण्याची १००% शक्यता आहे.

अलेक्सझांडर ने समरकंद ची राजकुमारी रॉक्सना शी लग्न केले. रॉक्सना हे नाव इंग्रजीत roxanne म्हणून लोकप्रिय आहे तर इस्लामिक प्रदेशांत रुखसाना म्हणून प्रसिद्ध आहे. व्हायचा अर्थ उजेड (पर्शियन रोशन), चमकणारा इत्यादी अर्थ होतात. रोकस ह्या शब्दाचा अर्थ रिग्वेदांत दिपवणारा उजेड आसा आहे.

सोगदिया भाषा आणि भारत ह्यांचा जवळचा संबंध होता. त्याचे प्रमुख दैवत नाना होते जी दुर्गा देवी प्रमाणे एक देवी आहे आणि जिचे असं सिंह आहे.

साहना

समरकंद आता बहुतांशी इस्लामिक असले तरी एके काळी चिनी सम्राटाच्या अधिपत्याखाली होते. बौद्ध धर्म चीन मध्ये ह्याच शहरातून फोफावला. अरब सैन्याने ह्यावर हल्ला करून चीन वर हल्ला करण्याचे ठरवले होते. ह्याची कुणकुण स्थानिक चिनी अधिकारल्याला लागताच त्याने तात्काळ चिनी सम्राटाला सैन्य पाठवण्यास सांगितले पण साम्राटाला म्हणे ते शक्य नव्हते त्यामुळे त्याने अधिकाऱ्याला सांगितले कि सैन्य येणार नाही पण एखाद्या बौद्ध संन्यास्याची मदत घे. अमोघवज्र हा ब्रह्मन् कुळांत जन्म घेतलेला बौद्ध भिक्षु शहरांत होता. त्याने काय केले ठाऊक नाही पण त्याला घाबरून अरब पळून गेले. अमोघवज्राने नंतर म्लेंछा पासून शहराचे शुद्धीकरण केले. चिनी सम्राटाने त्याला चीन मध्ये बोलावून घेतले आणि अमोघवज्राने चिनी सम्राटाचा पुन्हा राज्याभिषेक करून त्याला "चक्रवर्ती" हि पदवी दिली.

धन्यवाद साहना आणि पराग.
समर ह्या शब्दाचा अर्थ युध्द असा होतो. रणकंदन असा शब्द नेहेमी वापरतो. मला समरकंद हा त्याच प्रकारचा शब्द वाटला म्हणजे त्या जागेला एखाद्या मोठ्या युध्दाची पार्श्वभूमी असावी असे वाटले.
बाकी अनेक भाषेतले शब्द एकमेकांशी कसे साधर्म्य दाखवतात ते वाचुन शब्दांची व्युत्पत्ती हा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल असे वाटते.

ह्या सगळ्या संघटना म्हणजे जागतिक पातळीवरील व्हाटसप समुह आहेत. आपला कसा शाळेचा एक समूह, महाविद्यालयाचा एक समूह, सोसायटीचा एक समुह असतो तसेच ह्या समुहांचे आहे. यात काही सभासद सगळ्या समुहांमधे समान असतात. यातून फार काही निष्पन्न होण्याची अपेक्षा करु नये. मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांना अभ्यास दौर्‍याच्या नावाखाली जगभरात फिरायला पाठवतात. ते तिकडे जाऊन किती अभ्यास करतात तितकेच काम या संघटनांमधे होते.

nutanm

s.c.o. देश म्हणजे काय? ही संकल्पना आधी विस्तृत सांगावि, नाहीतर सर्व लेख डोक्यावरून जातोय.