काथ्याकूट

‘मराठी बाणा’ आणि ‘मराठीपणा’

Primary tabs

अनेक दिवसांपासून मला असलेला प्रश्न इथे मांडायचे धाडस करतो आहे. 'मराठी बाणा', 'मराठमोळा/ळी', ‘मराठीपणा’ (हो, हा शब्द अनेकदा ऐकतो), मराठी संस्कृती हे शब्द अनेकदा कानावर पडतात. प्रत्येकवेळी वेगवेगळा अर्थ / अर्थछटा असल्याचे लक्षात येते, अर्थ संदर्भाप्रमाणे बदलतो हे ही. पण मुळात 'मराठी बाणा' म्हणजे काय, त्याचा अर्थ मराठी आणि अ-मराठी व्यक्ती काय घेतात असा प्रश्न मला आहे.

थोडे संशोधन म्हणून आधी 'बाणा' या शब्दाचा शब्दकोशीय अर्थ बघितला. "ठराविक वर्तनक्रम" अशी एका शब्दात बोळवण केलीन त्यांनी. धिस इज नॉट फेयर, चालबे ना, चालणार नाही, खपवून घेतले जाणार नाही :-)

आणखी काही दुसरे शब्दकोश बघितले मग, त्यातले अर्थ :-

- स्वतःचे वागणे, मत यांविषयी अभिमान बाळगण्याची वृत्ती.

- अभिमान; शेखी; आढ्यता; डौल (एखाद्या विशेष गुणाचा, अधिकाराचा इ॰).

- लाकडी मूठ व जाड धारेचे पान असलेला पट्टा; एक हत्यार.

- जन्म-स्वभाव; मनःस्थिती

- वस्त्राच्या विणीतील आडवा धागा

एवढे सगळे अर्थ असूनही 'मराठी बाणा' किंवा 'मराठीपण' त्यात सामावत नाही असे वाटले. काय बघून आपण / इतरजण आपले 'मराठीपण' ओळखत असतील ? मराठी भाषा तर आहेच. आपले खानपान? कपडेपट? सण समारंभ, लग्न सोहळे? गणेशोत्सव? मंगळागौर, दहीहंडी? कोळी नृत्य, भावगीते? लावणी अन तमाशा ? पंढरीची वारी? शिवरायांचा गौरवशाली इतिहास, गडकिल्ले? ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग?

मराठीजन महाराष्ट्रात आहेत तसे देशभर-जगभर विखुरले आहेत. इतर मराठी आणि अमराठी बांधवांशी त्यांचा भरपूर संपर्क आहे / असावा. तर मंडळी, तुमच्या मते 'मराठी बाणा' म्हणजे काय ? ‘मराठीपणा’ची खास अशी लक्षणे कोणती ? अन्य मराठी -अमराठी लोकं 'मराठी' म्हणून आपल्यात काय बघतात / नोटीस करतात असे तुम्हाला वाटते?

तुमचे निरीक्षण, विचार आणि अनुभव जाणून घ्यायला उत्सुक !

श्रीगुरुजी

मराठी पणाची व्यवच्छेदक लक्षणे खालीलप्रमाणे -

१) नाटके आवडीने पाहणे.
२) पुरणपोळी आवडीने खाणे.
३) भाजलेले दाणे आवडीने खाणे.
४) आंब्याच्या फोडींपेक्षा आमरस आवडणे.
५) राजकारणावर आवडीने चर्चा करणे.
६) स्वभाषेचा अभिमान नसणे.
७) वर्तमान किंवा भविष्यकाळापेक्षा भूतकाळात जास्त रममाण होणे.
८) एकमेकांना मदत करण्याऐवजी एकमेकांचे पाय ओढून अमराठींनाच मदत करणे.

अजून बरीच आहेत. पण ही मुख्य लक्षणे आहेत.

दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२३ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधवडा साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाचे आदेश आहेत, आपल्या मिपावर हा पंधरवडा साजरा करण्याचं काही प्लॅन आहे का ?

कोण बघतं हे सगळं ? मिपाचे मालक, चालक, संपादक लक्ष घालतील काय ?

-दिलीप बिरुटे

Bhakti

दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२३ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाचे आदेश आहेत

श्रीगुरुजी

म्हणजे नक्की कोणी व काय करायचे? सरकारी पातळीवर तर सर्व मंत्री, आमदार, खासदार मोडक्यातोडक्या हिंदीत बोलण्यात धन्यता मानतात. नुकताच सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका वेडिंग रीसॉर्ट मध्ये गेलो होतो. तेथील ९५ टक्के कामगार हिंदीभाषिक आहेत व कोणी काहीही विचारले तरी अत्यंत उर्मटपणे हिंदीमे बोलो असे ऐकवत होते व जमलेले सर्व मराठी भाषिक त्यांच्याशी हिंदीतच बोलत होते. रस्त्यावर उभे असलेले अनेक हातगाडीधारक हिंदीभाषिक आहेत. बॅंक, विमानतळ, रेल्वे स्थानक अश्या ठिकाणी फक्त इंग्लिश व हिंदीत फलक व सूचना असतात. मोठ्या उपहारगृहात मराठी भाषिक कर्मचाऱ्यांशी थेट हिंदीत बोलायला सुरूवात करतात. त्यामुळे कर्मचारी मराठी भाषिक असला तरी हिंदीतच बोलतो. माहिती तंत्रज्ञान किंवा गुंतवणूक कंपन्यात इच्छुकांची मुलाखत घेणारा अमराठी असेल तर समोरचा उमेदवार आपल्या राज्यातील असल्यास त्याच्या सर्व त्रुटींकडे दुर्लक्ष करून तो त्याची निवड करतो, पण मुलाखत घेणारा मराठी असल्यास अत्यंत किरकोळ कारणावरून रामशास्त्री प्रभुणेंचा आव आणून तो मराठी मुलांना नाकारतो.

मग पंधरवडा काय, अगदी वर्ष साजरे केले तरी या मराठी माणसांच्या मानसिकतेत बदल होईल का?

टर्मीनेटर

मराठी बाणा म्हणजे सध्या तरी स्वतः काही नवनिर्मिती करायची नाही पण दुसऱ्या कोणीतरी खूप मेहनतीने एस्टॅब्लिश केलेल्या ब्रॅण्ड्सचे मराठीकरण करायचे असे झाले आहे!
युट्युबचे 'तुनळी' व्हॉटसऍपचे 'कायप्पा' फेसबुकचे 'चेहरा पुस्तिका' किंवा 'थोबाड पुस्तिका' तसेच अमेरिकेचे 'आम्रविका' वगैरे वगैरे.... अरे काय मिळतं प्रस्थापित ब्रॅण्ड्सचे किंवा एखाद्या देशाचे/गावाचे असले फडतूस मराठीकरण करून तेच मला समजत नाही बुवा 😀
असो ज्याची त्याची आवड, पण मला तरी अजिबात पटत नाहीत ह्या गोष्टी. मराठी भाषा वाढावी, समृद्ध व्हावी ह्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी कमीच पडतील अशी एकंदरीत परिस्थिती मराठी भाषिकांनीच निर्माण केली असल्याचे दिसतंय. कालाय तस्मै नम:||
चांगल्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल आपले आभार 🙏

"तुमच्या मते 'मराठी बाणा' म्हणजे काय ? ‘"
दुसर्या प्रांतात गेल्यावर तेथील भाषा/संस्क्रुती शिकण्याचा अजिबात प्रयत्न न करणे. मात्र महाराश्ट्रात राहणार्या अमराठी लोकांना मराठी बोलण्याचा आग्रह धरणे.
अगदी बाजुचीच दोन राज्ये घ्या. गुजरात्/कर्नाटकात अनेक मराठी जन आहेत पण अस्खलित गुजराती/कन्नड बोलणार्या लोकांची संख्या खूप् कमी. ह्या उलट महाराष्ट्रात राहुन अस्खलित मराठी बोलणार्या गुजराती/कन्नड भाषिकांची संख्या लक्षणिय आहे.

Bhakti

मराठी बाणा आणि मराठीपणा म्हणजे अभिमानाने मराठी बोलणे,लिहिणे,ऐकणे.
महाराष्ट्रात किती सरमिसळ आहे, तरीही आपण आपली भाषांच बोलणे,समोरच्याला ती समजून घेण्यासाठी क्रमप्राप्त करणं.
आपल्या सणांचं वेगळंपण जपून पुढच्या पिढीला तेही देणं.
आपल्या मराठी साहित्याच्या प्रेमात आणि ऋणात असणं.
हे सगळं जपण्याची आंतरिक धडपड असणं.

१. गडकिल्ले/ईतिहासाच्या नावाने गळे काढणे पण स्वतः काही प्रयत्न न करणे. जय भवानी जय शिवराय म्हटले की झाले. त्यातही जय शिवराय म्हणायचे, की जय जिजाउ,की जय संभाजी अशा निरर्थक विषयांवर वाद घालणे. तसेच रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव शिवरायांचे गुरु होते की नव्हते, छत्रपती संभाजीराजे धर्मवीर होते की नव्हते असे विषय मधे मधे उकरुन काढणे.
२. गणपतीच्या मिरवणुकीत भयानक आवाजात डी जे लावणे आणि नाचणे.आसपासच्या दुकानदारांकडुन/रहीवाश्यांकडुन शिवजयंती, गणपती,दहीहंडीच्या वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसुल करणे
३. आसपासच्या गुजराती/मारवाडी दुकानदारांकडुनच माल घेणे आणि उडप्यालाच ईडली/डोसे चांगले कसे जमतात असे म्हणुन त्यांच्या हॉटेलात खाणे
४. पैशाची गरज नसल्याप्रमाणे स्टँड्वर रिक्षा लावुन तंबाखु मळत बसणे आणि कस्टमर आल्यास एकमेकांकडे ईशारा करत रांगेतील शेवटच्या रिक्षात उपकार केल्यासारखे बसवणे. तसेच वर्षातुन २-३ वेळा सत्यनारायणाची पूजा घालणे आणि तमाम रिक्षांच्या गळ्यात वजनदार हार घालुन त्यांना वाकायला लावणे.
५. प्रश्न पैशांचा नाही, तत्वाचा आहे असा वाद घालुन राहीलेले २ रुपये परत मिळवणे असे म्हणणार होतो, पण यु पी आय ने ते दिवस गेले आता.

साहना

प्रत्येक रेसिपींत शेंगदाणे घालणे.

अनिंद्य

मान्यवरांचे प्रतिसाद मजेशीर आहेत.

इथे विचारला तसा "मराठी बाणा म्हणजे काय ? मराठीपणाची खास अशी लक्षणे कोणती ?" हा प्रश्न मी अन्यत्रही अनेकांना विचारला. बहुतेकांचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत :-

सकारात्मक मुद्दे :-

- खानपानाच्या खास सवयी
- मराठी भाषेवर प्रेम / अभिमान
- साधेपणा, समाजात बडेजाव फारसा नसणे
- व्यवहाराला सरळ असणे / फसवणूक न करणे
- काळापुढे विचार करणारा समाज / माणसे
- समाजसेवा करण्यास तत्पर असणे
- महापुरुषांचा अभिमान असणे
- मराठी साहित्य आणि नाटकांवर प्रेम (याबद्दल मी साशंक आहे, मराठी नाटकांना फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे असे काही दिसून नाही आले. भरपूर वाचन म्हणजे वपु-पुलं यांची चारदोन पुस्तके आणि छावा-श्रीमान योगी-स्वामी-ययाती असाच बहुतेकांचा समज दिसतो)

नकारात्मक :-
- स्वभाषेचा अभिमान नसणे
- अन्य मराठीभाषिकांना मदत न करण्याची वृत्ती
- इतिहासात जास्त रमणे
- राजकारणाची अतिव आवड
- दुसऱ्यांची संस्कृती आत्मसात करण्याबद्दल, इतरांमध्ये मिसळण्याबद्दल उदासीनता
- पैसे कमावण्यासाठी कराव्या लागणाऱ्या श्रमाबद्दल उदासीनता / अप्रीती
- थोडा भांडकुदळपणा / वाद घालण्याची वृत्ती
- अति हिशेबीपणा

अर्थात हे मुद्दे प्रत्येकाने आपापल्या अनुभवावरून ठरवले असतील. इथे लिहिणाऱ्यांचे आभार.

Trump

पुणे : देशामध्ये सर्वाधिक लोकांची बोली असलेल्या हिंदीला महाराष्ट्र सरकारकडून राष्ट्रभाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्यात आली असून त्यासंदर्भात काढण्यात आलेल्या शासकीय अध्यादेशामध्ये हिंदी राष्ट्रभाषा असल्याचे ठळकपणे नमूद करण्यात आले आहे.

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्यात आली आहे. ‘हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे हिंदी साहित्याच्या उन्नतीसाठी आणि उत्तेजनासाठी राज्यामध्ये हिंदी साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आलेली आहे’, असे अकादमीच्या पुनर्रचनेसंदर्भात काढण्यात आलेल्या शासकीय अध्यादेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री या अकादमीचे अध्यक्ष आहेत.

https://www.loksatta.com/pune/the-hindi-language-as-the-national-langua…

श्रीगुरुजी

महाराष्ट्रातील एकही राष्ट्रीय, प्रादेशिक पक्ष मराठीवादी नाही. काही दिवसांनी महाराष्ट्राची राजभाषा हिंदी आहे, विधिमंडळाचे सर्व कामकाज हिंदीत होणार असे निर्णय येतील.

शेवटी मराठी भाषा टिकविणे हे राज्यकर्त्यांच्या हातात नसून मराठी भाषिकांच्या हातात आहे. त्यांनी ठरविले तर मराठी टिकेल, अन्यथा महाराष्ट्र अधिकृत हिंदीभाषिक राज्य होईल.

Trump

शेवटी मराठी भाषा टिकविणे हे राज्यकर्त्यांच्या हातात नसून मराठी भाषिकांच्या हातात आहे. त्यांनी ठरविले तर मराठी टिकेल, अन्यथा महाराष्ट्र अधिकृत हिंदीभाषिक राज्य होईल.

किती मराठी भाषिकांना आपल्या भाषेविषयी प्रेम आहे ?? समाजमाध्यमावरील तरुण मुलांच्या प्रतिकिया वाचल्या तर मन व्यथित होते.

चित्रगुप्त

मराठी बाणा म्हणजे- 'मोडेन पण वाकणार नाही' - यामुळे मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीची बरीच मोडतोड झालेली आहे -- असे 'ह्यांचे' म्हणणे.
-- ताईसाहेब मोडवाकीकर.

.