काथ्याकूट

हातसडीचा अस्सल (इंद्रायणी) तांदूळ

Primary tabs

आजकाल ऑरगॅनिक म्हणून भरपूर किंमत वसूल करून शेवटी फसवणूक करण्याची वृत्ती वाढली आहे
सामान्य माणूस फसवलाच जात आहे .
म्हणून हा विषय घेऊन चर्चा अपेक्षित
हातसडीचा अस्सल (इंद्रायणी) तांदूळ -
१) किमान ओळख (पारख) कशी करावी ?
२) साधारणतः योग्य किंमत काय असावी ?
३) आरोग्यदायी फायद्यासाठी तांदूळ किती जुना असावा ?
४) किफायतशीर नि घरपोच मिळू शकेल असा काही संपर्क कोणाकडे आहे का ? (खात्रीशीर आणि चोख व्यवहार अपेक्षित.)

हातसडीचा अस्सल (इंद्रायणी) तांदूळ -
१) किमान ओळख (पारख) कशी करावी ? >>> सुगंध . उच्च प्रतीच्या इंद्रायणी तांदुळाला अप्रतीम सुगंध असतो कि जो अगदी सहजपणे ओळखता येतो
२) साधारणतः योग्य किंमत काय असावी ? >>> मिलवरुन आम्ही पॉलिश ईंद्रायणी ४० रु किमतीने आणतो, तोच आमच्या घराशेजारी ५५ रु ने मिळतो, हातसडी ५० आणि ६५ अनुक्रमे.
३) आरोग्यदायी फायद्यासाठी तांदूळ किती जुना असावा ? >>> कल्पना नाही. एक वर्ष जुना इंद्रायणी पचायला सहज असे म्हणातात पण मलातरी काहीही फरक जाणवला नाही. पण आरोग्यासाठी म्हणत असाल तर तांदुळ खाऊच नये, नाचणी ज्वारी बाजरी बेस्ट .
४) किफायतशीर नि घरपोच मिळू शकेल असा काही संपर्क कोणाकडे आहे का ? (खात्रीशीर आणि चोख व्यवहार अपेक्षित.) नाही. पण सर्प्राईझिंगली कोल्हापुर साईडचा काळभैरव ह्या ब्रँडचा इंद्रायणी हा अल्मोस्ट मावळातील अन भोर मधील इंद्रायणीच्या तोडीस तोड आहे, तो अ‍ॅमेझॉन वर किंव्वा शेजारील दुकानात मिळतो का ते पहा.

बाकी अधिक माहीतीकरिता आमच्या ह्या जुन्या चर्चा / धाग्याला भेट द्या .
https://www.misalpav.com/node/32116
-
अजुन एक भात प्रेमी
मार्कस ऑरेलियस

आलो आलो

प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद .
आपल्या धाग्यावरुन बर्याच नविन गोष्टि कळाल्या.
काल जालावरुन / फे.बु. वरुन सकाळ अ‍ॅग्रोवनच्या संदीप नवलेंमुळे तिकोणा (ता. मावळ, जि. पुणे) गावातील शांताबाई चिंधू वरवे या बचत गट चालविणाऱ्या शेतकरी महिलेचा नंबर मिळाला त्यांच्यासोबत फोनवर बोलणे झाले.
त्यांचा कामाचा आवाका भरपूर मोठा आहे आणि जवळपास २०० महालांना सोबत घेऊन त्या पारंपारिकरित्या हातसडीचा तांदूळ तयार करतात व डायरेक्ट विक्रीतून नफा कमावतात असे समजले.
तसेच तासगाव कराड येथील उपक्रमशील शेतकरी आणि यशस्वी उद्योजक भातशेती अ‍ॅग्रो या कंपनीच्या श्री पाटील साहेब यांच्याशी सुद्धा कायप्पावर बोलणे झाले ते सुद्धा आता कराड नंतर पुण्यात त्यांच्या भातशेती अ‍ॅग्रो या ब्रॅण्डसोबत अस्सल इंद्रायणी आणि लोकवान गहू तसेच अन्य धान्यउत्पादन विक्री करत आहे.
त्यांनी अहमदनगर येथे हातसडीचा इंद्रायणी ६०/- किलो या भावाने पोचविण्याचे कबुल केले आहे. (ट्रान्सपोर्ट चार्ज वे.)
आता तो पोहोच झाल्यावर पहिला भात खाल्ला कि तुम्हास रिपोर्टातोच.
तोपर्यंत तांदूळ पुराणास अल्पविराम.
आपलाच स्नेही
भातप्रेमी भातखाऊ

चौथा कोनाडा

तुमच्या शंकांचे समाधान खालील ठिकाणी होऊ शकेल.

१. माहिती साठी फोन किंवा what's app करा 9823417542 प्रविण .

२.
सागर कोपर्डेकर
फोन नंबर : +91 8378999193

३. राकेश कुरलप

बुक करण्यासाठी कॉल करा - 8779020316/9850144660

४. सौ दीपा कुलकर्णी. 8308068297.

५..# इंद्रायणी तांदळासाठी
For order and Delivery Details contact - Nikhil Shevkari 9881838152

बास का?

४. सौ दीपा कुलकर्णी. 8308068297. >>
यांच्याकडुन गेले दोन वर्ष इंद्रायणी घेते आहे. अप्रतिम वासाचा सिंगल पॉलिश तांदुळ मिळतो.
पुण्यात मला त्या घरपोच आणुन देतात.

आलो आलो

स्मिता ताई अनेक अनेक धन्यवाद !
आपल्या अनुभवामुळे खात्रीलायक असा संपर्क होऊ शकेल ...त्यामुळे मनापासून धन्यवाद !

आलो आलो

चौ.को. अनेक अनेक धन्यवाद !
भरभरून पावलो .

आपलाच स्नेही
भातप्रेमी भातखाऊ

साहना

इंद्रायणी आणि आंबेमोहर तांदूळ एकच का ? आणि हातसडीचा म्हणजे काय ?

सुखी

दोन्ही तांदूळ उत्तम प्रतीचे मिळाले तर आजूबाजूच्या ४ घरात तुमच्याकडे भात शिजतो आहे याची नांदी लागते.
दोन्ही तांदूळ चवीला मस्त असतात. इंद्रायणी गरम गरम खाल्ला तर त्याची चव मस्त लागते... गार झाल्यावर एवढा गुणधर्म टिकून राहत नाही.
आंबेमोहोर गार झाल्यावर पण चांगला लागतो. याची शिते इंद्रायणी पेक्षा बारीक चणीची असतात.

अजून एक आजरा घनसाळ म्हणून तांदूळ येतो, तो मिळतच नाही एवढी त्याची मागणी आहे. चव, सुगंध, आकार तिन्ही लाजवाब...

गवि

घनसाळ आणि जिरेसाळ दोन्ही.

घमघमाट या दृष्टीने क्रम साधारण असा:

आंबेमोहोर
जिरेसाळ
इंद्रायणी
घनसाळ

कमी जास्त प्रमाणात सर्वांतील मला व्यक्तिगत अत्यंत आवडणारा गुण म्हणजे चिकट गोळा भात होणे. सुटी शिते असलेला मोकळा पुलाव टाईप हॉटेल सदृश भात हा अनेकांना आदर्श वाटतो. पण शेवटी पसंत अपनी अपनी..

कोल्हापूर पुणे पट्ट्यात अनेक ठिकाणी हॉटेलांत यापैकी मुख्यत: इंद्रायणीचा भात गिजगा भात म्हणून सर्व्ह करतात.

चौथा कोनाडा

हातसडीचा तांदूळ म्हणजे काय ?

हातसडीचा तांदूळ म्हणजे हाताने सडलेला किंवा पॉलिश न केलेला तांदूळ.
अशा तांदळामध्ये रिफाईंड न केल्यामुळे त्यावरील थर अथवा आवरण तसेच असते.
तांदळावर ब्रान, जर्म आणि इंडोस्पर्म असे तीन थर असतात.
तांदूळ पॉलिश करताना हे आवरण अथवा थर निघून जातात.
तो तांदूळ पॉलिश केल्यावर ते घटक निघून जाऊन फक्त कार्बोदकेच मोठ्या प्रमाणात शिल्लक राहतात.
म्हणून पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत हातसडीचा तांदूळ आरोग्या साठी चांगला.
यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते, त्यामुळे आपणास डॉक्टर सांगतात, की मुधुमेह असणाऱ्या लोकांनी भात खाऊ नये किंवा कमी खा. पण हातसडीचा भात खाण्यास काहीच हरकत नाही.

टर्मीनेटर

चर्चेतून चांगली माहिती मिळत आहे!
आमच्या मूळ गावी साताऱ्याला आंबेमोहोर तांदूळ खातात तर पुण्यातले आमचे नातेवाईक इंद्रायणी तांदूळ खातात. रोजच्या वापरात आम्ही पडलो सुरती कोलम किंवा वाडा कोलम आणि पुलाव/नारळी भात/बिर्याणी साठी बासमतीवाले, त्यामुळे इंद्रायणी तांदुळाबद्दल विशेष काहीच माहिती नाही पण चर्चा वाचतोय...

आलो आलो

तुमी सातारच व्हयं ....आमास्नी वाटलं तुमी कोकणातले ....
बाकी सुरती कोलम पण छान टेस्ट.
पुलाव किंवा बिर्याणी साठी मात्र लांब फुलणारे फॉर्च्युन चे तांदूळ भारी असतात असा अनुभव आहे.
अवांतर - यावरून एक आठवण दिल्ली ला एकदा एका क्लायंट ने 'दम पुख्त' मध्ये बिर्याणी खिलवली होती वाह ! काय तो स्वाद आणि काय ते अँबियन्स ....सेम स्वाद मला हैदराबाद ला 'बावर्ची' मध्ये चाखायला मिळाली आणि योगायोगाने सोबतीला तोच दिल्लीवाला क्लायंट होता . (स्वाद सेम पण किमतीत मात्र जमीन अस्मानाच अंतर )

(बावर्ची च्या चिकन जंबो चा पर्मनंट गिर्हाईक )

टर्मीनेटर

व्हय जी... आम्ही खुद्द सातारचं (शनिवार पेठ) 😀

पुलाव किंवा बिर्याणी साठी मात्र लांब फुलणारे फॉर्च्युन चे तांदूळ भारी असतात असा अनुभव आहे.

+१०००
लांब फुलणारे फॉर्च्युन चे तांदूळ भारीच असतात! पण लॉकडाऊन काळात 'फॉर्च्युन' चा तुटवडा होता म्हणून 'दावत' ट्राय केला, आणि तो पण आवडल्याने आता त्यावर स्विच झालोय.

सेम स्वाद मला हैदराबाद ला 'बावर्ची' मध्ये चाखायला मिळाली

मला पण 'पॅराडाईज' पेक्षा 'बावर्ची' ची बिर्याणी चांगली वाटते 👍
हैदराबादला समशाबाद एअरपोर्ट जवळच्या 'निम ट्री' हॉटेलमध्ये आमचा चार दिवस मुक्काम होता. तिथुन अगदी जवळ 'बावर्ची' ची एक शाखा आहे. तेव्हा रोज एकवेळच्या जेवणात तिथली बिर्याणी हादड्ली होती 😀

वामन देशमुख

माझं (आणि माझ्या हैद्राबादी मित्रांचं मत) -

पॅराडाईज बिर्याणी - आधी कधी खाल्ली नसेल तर, केवळ सुप्रसिद्ध आहे म्हणून एकदा खाऊन पाहावी, That's it!

आरटीसी क्रॉसरोड बावर्ची बिर्याणी - अप्रतिम, नक्की खावी.

अबिड्स ग्रँड हॉटेल बिर्याणी - आमची पहिली पसंती - नक्कीच खावी. अहाहा, तो बासमतीचा रेशमी स्पर्श, बिर्याणी मसाल्याचा सुवास, जिभेवर विरघळणारी मुलायम चिकन / मटण पिसेस, तोंडी लावायला मिरची का सालन... आणि यथेच्छ खाल्ल्यावर मग बिर्याणीतील बाजूला काढून ठेवलेल्या पांढऱ्या भातावर रायता कालवून शेवटचे घास! निव्वळ अप्रतिम!

---

जुम्मेरात के दिन क्या बिरयानी की याद करे तुम बड़े भाई! अब्ब, कुच बी करके हफ्ते के दिन शाम कू जाना पड़ता अबिड्स कू। आरेंइ? आजाव।

बिरयानी खाने के बादमें, मयूर पान हाउस में मीनाक्षी पान खाना नक्को भूलो। समझें ,बड़े भाई?

वेळ नसेल तेव्हा लोकप्रिय ठिकाणे बेस्ट बेट असतात.

हैदराबादमधल्या वास्तव्यात मात्र मी आयुष्यभराची बिर्याणी खाऊन घेतली.

लोकप्रिय ठिकाणांमधली सर्वात मस्त बिर्याणी मी मेरिडियन, पंजागुट्टा मध्ये खाल्ली. स्पेशल मटण आणि स्पेशल चिकन दोन्ही, प्रत्येकवेळेस उत्तम. त्या खालोखाल कॅफे बहार.

तथापि, जुन्या हैदराबादमध्ये खान, मक्सूद, लतिफ, वाकिफ अशा खास आडनावांचे मित्र असणे किती भाग्याचे आहे हे त्यांच्या आया आज्ज्यांनी रांधलेल्या बिर्याण्या झोडल्याशिवाय समजायचे नाही पंत!

आलो आलो

अण्णा
लय बेश्ट !

>>>>त्यांच्या आया आज्ज्यांनी रांधलेल्या बिर्याण्या झोडल्याशिवाय समजायचे नाही पंत!
१००% सहमत !

बाकी मित्रांचे आणि त्यांच्या घरचे जेवण म्हणाल तर राजेहो आयुष्यातील सुरुवातीची ६ वर्षे हॉस्टेल आणि रूम वर काढलीयेत त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास (अधिक उणे) सगळ्या जिल्ह्यात मित्र असल्याने त्या त्या ठिकाणी त्यांच्या घरच्या जेवणाची समृद्ध चव अजूनही जिभेवर आठवते.

आलो आलो

मयूर पान हाउस में मीनाक्षी पान खाना नक्को भूलो। समझें ,बड़े भाई?

वाह मियां क्या यादें निकाले तुम, मयूर पान हॉउस की ....
चौकशी करता समजले कि जवळपास ८० हुन अधिक प्रकारची रेंज आहे यांची यातील मी ट्राय केले ते
१) मीनाक्षी पान
२) नवरतन
३) मीठा लड्डू
४) चन्दन
आणि मागच्या धावत्या हैद्राबाद भेटीत मेंगो रोल घेतले ....वा वा वा ! सुप्पर एकदम फाकडू टेस्ट !

टर्मीनेटर

जुम्मेरात के दिन क्या बिरयानी की याद करे तुम बड़े भाई! अब्ब, कुच बी करके हफ्ते के दिन शाम कू जाना पड़ता अबिड्स कू। आरेंइ? आजाव।

बातां तिन-चार साल पैलेकी रैती तो बिलकुल आतें मियाँ...
परसों तक (बोलेंतो हैदराबादी मैं तिन-चार साल पैले 😀) अपने दो खासंखास यारां बंजारा हिलपे रैते मियाँ.. तबी बौत आना-जाना लगा रैता अपना हैदराबादा!

बेंगळुरू (आताचे नाव) च्या एका कंपनीसाठी तेलंगणा मध्ये चंदनाच्या झाडांची लागवड केलेले प्लॉट्स विकणे हे त्यांचे काम होते. काही वर्षांनी (म्हणजे २० ते २५ वर्षांनी) आज केलेल्या ५ लाखांच्या गुंतवणुकीवर चाळीस-पन्नास लाख रुपये मिळतील अशा आश्वासनावर लोकं ते (ज्यावर कुठल्याही प्रकारचे बांधकाम कधीच न करता येण्यासारखे) प्लॉट्स विकत घेत होते. प्रत्येक प्लॉट विक्रीतून ह्यांना लाखापेक्षा जास्त इंन्सेन्टिव्ह मिळायचा (पगार वेगळा). ज्या महिन्यात चार-पाच प्लॉट विकले गेले कि विमानाच्या जाण्या-येण्याच्या प्रवासाच्या तिकिटांसहित हैदराबादचे आमंत्रण असायचे. जाम मजा केली होती त्यावेळी तीन वर्षे हैदराबाद मध्ये, वर्षातून चार तरी फेऱ्या व्हायच्या 😀

दिवस भटकंतीत/खादाडीत जायचा तर रात्री उशिरापर्यंत आम्ही इनर रिंग रोड वरच्या 'हैदराबाद ब्लू' मध्ये पडीक असायचो... त्याच रोड वरचे 'काराचीवाला' ह्यांच्या फ्लॅट पासून अगदी जवळ त्यामुळे बेकरी आयटम्सचीही चंगळ होतीच. तिथून जवळंच (एक की दोन सिग्नल्स पार केल्यावर) 'ऍशले'ज (की स्टॅनले'ज) नावाचे एक मलबारी रेस्टोरंट होते, तिथे चिकन परोठा अप्रतिम मिळायचा.

असो... हैदराबादच्या आठवणी खूप आहेत पण आलो आलोंच्या 'इंद्रायणी तांदुळावरच्या' धाग्याचे हैदराबाद (इतरवेळी धाग्याचे काश्मीर होते 😀) व्हायला नको म्हणून आवरते घेतो.

टर्मीनेटर

नॉस्टॅल्जिक हो गये क्या मियां

हाउ (yes)... 😀
धागाविषयाशी हे फारच अवांतर होईल पण राज्य सरकार पुरस्कृत एका महा भू-घोटाळ्याचा नमुना त्यावेळी जवळुन पहाता आला होता. अर्थात त्यात कुठल्याही सर्वसामान्य नागरिकाचे थेट आर्थिक नुकसान होणार नसल्याने तो पुढे-मागे उघडकीस येण्याची शक्यता जवळपास नाहीच!

नव्याने स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झालेल्या राज्याची सत्ता मिळाल्यावर पुढील निवडणुका जिंकण्यासाठी आणि पक्ष विस्तारासाठी नोटबंदीनंतर पैसा उभा करण्या बरोबरच भविष्यात विशिष्ट भूभागावरील आरक्षण उठवण्याची सोय म्हणून (दिखाव्यासाठी घात्लेल्या अटिंवर) कवडीमोल किमतीने खाजगी कंपनीला दिलेली जमीन, मग त्यावर वाढीसाठी प्रचंड वेळ लागणाऱ्या चंदनाच्या रोपांची लागवड करून तिची प्लॉट्स रूपाने केलेली विक्री, त्या प्लॉट्सच्या खरेदीसाठी आपल्याच पक्षातील धनाढ्य बगलबच्यांना आणि हितसंबंधीयांना ग्राहक म्हणून उभे करणे, त्यातली काही रक्कम ब्लॅक मध्ये तर काही व्हाईट मध्ये स्वीकारणे वगैरे वगैरे गोष्टी त्यावेळी कल्पने पलीकडील नसल्या तरी आचंबित करणाऱ्या नक्कीच वाटल्या होत्या!

होता हैं... चलता हैं... दुनिया हैं 😀
नेते आणि त्यांचे पक्ष कसेही असले तरी त्यांच्या प्रत्येक भल्या-बुऱ्या कृती/निर्णयाचे स्वागत आणि समर्थन करणारे त्या त्या पक्षाचे झेंडे हाती घेतलेले आणि सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते आहेत तो पर्यंत असल्या गोष्टी होतंच रहाणार...

वरती झालेल्या अति अवांतरासाठी क्षमस्व 🙏

आमटी भात मिळाल्यास बहात्तर हुर सुद्धा नको.

नसरापुर आमचे आजोळ उष्टावणा पासून अंबेमोहर त्यामुळेच फक्त अंबेमोहराचे फॅन.

उत्तर भारतात कालीमुंछ,शक्करचिनी हे दोन प्रकार आवडतात.

जम्मू च्या आर एस पुरा मधील बासमती व राजमा एक नंबर.

सेवानिवृत्तीनंतर इंद्रायणी चाखला पण घरात कुणालाच आवडला नाही.

बिर्याणी,पुलाव,फ्राईड आणी जिरा राईस करता बासमती.

बाकी अंबेमोहर.

आलो आलो

कालीमूछ तो मध्य प्रदेश कि धरती कि देन है . (अस काही ऐकीव माहिती आहे) .... शक्करचीनी कधी ट्राय करायचा मौका नाही मिळाला.
जम्मू च्या आर एस पुरा मधील बासमती व राजमा एक नंबर.
-----> १००% सहमत - बासमती तर हिमालयाचा आशीर्वाद आहे.

भात अतिप्रिय.
एक गोष्ट मात्र आता आताशा कळते - शेतीचे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झाले नाही आणि शेती पिढी दर पिढी (विशेषतः भातशेती) विखंडित होत जाते याचा एक फायदा असा की भातजातींचे सपाटीकरण होत नाही.
म्हणून प्रत्येक शेतातला भात वेगळा असेच म्हणावे. अस्सल असे काही नाही हे उमजोन असावे. अगदी भुदरगड आजर्‍यातले रिमोटेस्ट गावीसुद्धा अस्सल घनसाळ मिळत नाही. कारण? अस्सल घनसाळ असे काही मुळातच काही नाही. आपापल्या परीने लोक काही वाण अस्सल म्हणून लावताती, एकमेकांना विकताती, क्वचित काही लोक विद्यापीठांतूनि मिळवताती. अशा प्रकारे भेसळ होऊन मिश्र जातींचे बियाणे कायम तयार होत असते. त्यामुळे अस्सल असे काहीही नसते. घनसाळीचा जिओ टॅग आहे तीतली प्रमाणकेसुद्धा संदिग्ध आहेती. त्यामुळे विषेश कोणाच्या नादाला लागू नये. आणि स्वतःचा खिसा हलका करू नये. फायद्यासाठी लोक रामायणापर्यंत पेडिग्री नेताती. कुश-लव घनसाळ खात होते का जापोनिका सुशीसाळ हे व्हॉट्सअपवर पाहून मार्केटिंगला बळी पडू नये. आरोग्यदायी खाण्याचे आणखी हजार मार्ग आहेती.

त्यामुळे 'अस्सल' वाण शोधत बसणेची व्यर्थ धावपळ करो नये.
त्या त्या भागात एखादे वाण उत्तम वाढते, ते त्या त्या भागातून खरेदी करावे.

मजला पर्याय नाही म्हणून मला ब्रँडेड कंपन्यांचे तांदूळ विकत घ्यावे लागते.
तथापि, पुणे वा कोल्हापूर येथे वसतेसमयी मी हमखास नॉनब्रँडेड तांदूळ घेत असे. कोल्हापूरात आणि अलिकडे पुणे येथेही तांदूळ महोत्सव भरताती. सरकारप्रायोजित मोठ्या उत्सवांवरी नजर ठेऊन असावे. उत्सवाचे शेवटी शेवटी महोत्सव बंद होताना वर्षभराचा तांदूळ खरेदी करावा. पुणे येथे हरेक बोळांत आजकाल 'बालाजी ट्रेडर्स' आहेत. त्यातल्या त्यात मोठे बालाजी ट्रेडर्स दुकान बघून तेथे अनेक नमुन्यांचे तांदूळ घ्यावे.

मजला सिल्की कोलम प्रचंड आवडतो. खालोखाल स्थानिक जिरग्या साळी, काळसर साळी, विशेषप्रकारच्या साळी - कोथमिरसाळ, तांबसाळ इत्यादी विशेष प्रिय. केरळी उकडाचावल सुद्धा मिक्स करून खायला उत्तम. तथापि रोज रोज गिळवत नाही. मजला हातसडीचा कोणताही तांदूळ रोज रोज गिळवला नाही. म्हणून मी नंतर तो नाद सोडूनि दिला. भातच खायला कमी करायचा आहे तयांनी मात्र हातसडीचा तांदूळ रोज अवश्य खात जावे. असो, तुमची इच्छा महत्त्वाची. काही जास्तीची पोषकद्रव्ये मिळाली आणि पोट साफ होत असेल तर का खावो नये हातसडीचा तांदूळ? जरूर खावे. पण त्यायोगे आकाशपाताळ एक करणेची गरज नाही.. बरेचदा धडपड करून मिळविलेला हातसडीचा तांदूळ आणि रेशनचा तांदूळ यांपैकी रेशनचा तांदूळ रूचिपूर्ण आणि जास्त पोषक असतो की. आणि तांदूळ हाताने सडविला काय मशीनने सडविला काय, तांदळाच्या वरचे आवरण न निघालेशी मतलब असावा. हाताने सडविलेल्या तांदळात असे काही अन्नपूर्णा काही जास्तिची जादूई प्रथिने टाकीत नाही.. हाताने सडविणेचा एकमेव फायदा म्हणजे स्नायू बळकट होताती. म्हणून जास्तीची पैका द्यावयाचाच असेल तर तांदूळ सडविणारे मनुष्यांचे दंड पाहूनिच मोलभाव करावा. त्यामुळे गिमिकी मार्केटिंगला बळी पडो नये.

तांदूळ शंभर वर्षे जुना काय अथवा या मोसमाचा काय, त्यातून आरोग्यदायक अधिक कोणता हा प्रश्न गैरलागू आहे. फरक पडलाच तर पोतामध्ये पडेल. जुना तांदूळ चिकट नसतो. बाकी काही नॅनोग्राम पोषक तत्त्वे इकडतिकडची होतील इतकाच काय तो फरक. त्यामुळे ऐसिया गोष्टींचाही लोड घेवो नये.

तरीही खाजेपायी हिमालयातूनही वाइल्डराईस तांदूळ मिळवणेस माझी हरकत नाही.

- भातप्रेमी अण्णा

आलो आलो

सविनय सादर प्रणाम !
एकूणच आपला या विषयातील सखोल अभ्यास बघता आपण ज्या सूचना दिल्यात त्यातील काहीच कामाचे निघाले नाही. ( किमान माझ्या तरी )

तरीही खाजेपायी हिमालयातूनही वाइल्डराईस तांदूळ मिळवणेस माझी हरकत नाही.

फक्त शेवट मात्र जबरा केलात ! (नसता केलात तर अधिक छान वाटलं असत)
उत्तम राहणे
उत्तम खाणे
उत्तम वागणे
याबरहुकूम आमचे जीवन आहे आपण याला 'खाज' समजत असाल तर तुमची विचारसरणी तुम्हाला लखलाभ.

बाकी या कधी नगरला आलात तर ....मस्त बिर्याणी / पुलाव चा बेत करतो (पण ते तुमचं हिमालयाचं वाईल्ड राईस नसेल हो कारण आम्ही बासमती /आंबेमोहोर/इंद्रायणी वाले ----हातसडीचे शोधतोय अजून )

आपल्यासारखाच अति भातप्रेमी

अहो, खाज हा शब्द खूप पॉझिटिव्ह आहे. आयुष्यातल्या अनेक गोष्टी माणूस खाजेपायीच करतो त्यातूनच आयुष्याला जो काही अर्थ प्राप्त व्हावयाचा तो होतो. खाज नसता झणकन गतप्रभ होतील नभी तारांगणे. काही लोक खाजेला छंद म्हणतात.

उत्तम राहणे, उत्तम खाणे, उत्तम वागणे हे तर तुमचे जन्मसिद्ध हक्क आहेत. तथापि, कोट्यवधी लोक साधा भात खात असता मुद्दामहून हातसडीचा तांदूळ मिळवून खाणे हे खाजेअंतर्गतच येणारी गोष्ट आहे.

मला इतकंच म्हणायचं होतं, तांदूळ हातसडीचा आहे की मशीनसडीचा, तो पॉलिश्ड नसणे हे 'हेल्दी' आहे. तो माणसाने हाताने सडला काय किंवा एलियन्सने मशीनने सडला काय त्याने काही फरक पडत नाही.

तुम्हाला हातसडीचा तांदूळ लवकर मिळो हीच सदिच्छा!

नगरला तुमच्याकडे जरूर येईन पुक्खा झोडायला. आमंत्रण दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ( बिर्याणी फेवरिट. ) होप, तुम्ही हातसडीच्या बासमतीची बिर्याणी खाऊ घालणार नाही!

कपिलमुनी

सध्या हातसडीचे तांदूळ मिळणे अवघड आहे.
सिंगल पॉलिश तांदूळ हातसडीचा म्हणून विकण्याची फॅशन आहे.

मावळात ४० रू . ने उत्तम इंद्रायणी मिळतो.

जास्त पाणी घालून रटरटून शिजवल्याने भात चिकट गोळा होतो .
पाण्याचे योग्य प्रमाण सापडल्यास इंद्रायणी सारखा सुंदर भात नाही.

बादवे तांदळाची चर्चा आणि
>> रेठरा बासमती चे नाव आले नाही याचे आश्चर्य वाटले.

आलो आलो

बादवे तांदळाची चर्चा आणि
>> रेठरा बासमती चे नाव आले नाही याचे आश्चर्य वाटले.

रेठऱ्यात राहिलाय का कोणी बासमतीच पीक घेणारं आता ?
साधारण ४-५ वर्षांपूर्वी तिकडील एक फौजी बंदा रेंट ने राहायला होता आमच्या सोसायटीमध्ये त्याच्या बायकोने आणून दिले होते एकदा रेठरा बासमती (विकत) ...छान चव होती पण परत काही मिळाला नाही तो वाण.
कृष्णेचं पाणी मानवत म्हणे बासमतीला .... थोडं विस्ताराने सांगितले तर ज्ञानात भर पडेल.

कंजूस

बरेच प्रकार आहेत.
---------
कुणी लखनौ(उपवर), कोळ्हीकोड,कुन्नुर (केरळ)येथे जाऊन बिर्याणी खाल्ली आहे काय?

मोती बिर्याणी हा पदार्थ खुप मस्त.

बाकी शाकाहारी असल्याने अन्य प्रकारच्या बिर्याणी खाता आल्या नाही.

मोती बिर्याणी मधे आंड्याचे पाढंरे बल्क (egg white)घेऊन एका कापडाच्या नळीवजा थैलीत भरतात. थोड्या थोड्या अंतरावर दोऱ्याने गाठ मारतात व त्याला उकडताता. त्यामुळे पाढंरे मोत्या सारखे गोळे बनतात. बिर्याणी त्या मोत्यांनी गार्निश करतात. म्हणून मोती बिर्याणी.

आलो आलो

हो ह्या पदार्थाची रेसिपी एपिक चॅनेल वर (आदित्य बालच्या कार्यक्रमात) बऱ्याचदा पाहिलीये.
विशेष फक्त कष्टाचे ... जाम पिळवणूक हो त्या आचाऱ्यांची .

चौकस२१२

बासमती च्या विविध प्रकारांबद्दल कोणास काही माहिती आहे का ?
जुना बासमती ( पिवळसर रंगाचा ) लो जी आय असतो ,,,
आरोग्याचं दृष्टिने प्रामुख्याने बसमतीच खाल्ला तर कसे काय ?