वार्तालाप : "वर्णानां ब्राम्हणो गुरु:"
Primary tabs
ब्रम्हज्ञानाचा विचारू.
त्याचा ब्राम्हणासीच अधिकारू.
वर्णानां ब्राम्हणो गुरु:(14/7/30)
समर्थ म्हणतात ज्या व्यक्तीने वेद, उपनिषद, दर्शन शास्त्र इत्यादीं वैदिक ज्ञानाचे अध्ययन केले आहे. ज्याला ब्रम्ह विद्येचे ज्ञान झाले आहे. तोच ब्राम्हण आहे आणि त्यालाच चारी वर्णाच्या लोकांनी त्याला गुरु मानले पाहिजे. दुसर्या शब्दांत ब्रम्हज्ञानी व्यक्तीलाच सांसारीक आणि आध्यात्मिक उपदेश देण्याचा अधिकार आहे. भग्वद्गीतेत योगेश्वर म्हणतात गुण आणि कर्मानुसार चार वर्णांची मी निर्मिती केली आहे. मनुस्मृती अनुसार शिक्षणांतर अर्जित ज्ञानाच्या आधारावर जाती ठरते.
महाभारतात युधिष्ठिर-सर्प संवाद आहे. नागाने युधिष्ठिराला विचारले, "ब्राह्मण कोण आहे?" युधिष्ठिर म्हणाले की ज्या व्यक्ति मध्ये सत्य, दान, क्षमा, अस्तेय,आणि दया इत्यादि सात्विक गुणांचा वास असतो. जो विद्वान तपस्वी असतो, तो ब्राम्हण". नाग म्हणाला की "शूद्रामध्येही हे गुण असू शकतात." युधिष्ठिर म्हणाले की “जर एखाद्या शूद्रा मध्ये वरील वैशिष्ट्ये असतील तो शूद्र, ब्राह्मण आणि ज्याच्यात हे गुण नाहीत तो ब्राम्हण ही शूद्र असतो.
आपल्या सनातन धर्मात अनेक मत आणि मतांतरे आहेत. अनेक देवी देवता आहेत. त्यांची पूजा उपासना आणि उत्सव करणारे सर्वच वर्णांचे पुजारी आहेत. अनेक मठ आणि महंत आहेत. भक्त त्यांना गुरु मानतात आणि ते भक्तांना उपदेश करतात. पण ते सर्वच ब्रम्हज्ञानी नसतात. अनेक फक्त महंत फक्त त्यांच्या गुरूंच्या चमत्कारांच्या गाथा सांगून भक्तांना भुलवितात. चमत्कारांच्या गाथा ऐकून भक्त ही सदा सर्वदा चिलमच्या नशेत राहणार्या ज्ञानहीन व्यक्तीला गुरुचा दर्जा देऊन त्यांच्या भक्तीत लीन होतात. अश्या चमत्कारी बाबांना गुरु मानणार्या भक्तांचा इहलोक आणि परलोक दोन्ही बिघडणारच. समर्थ म्हणतात "गुरुत्व नेले कुपात्री". गुरुच ब्रम्हज्ञानी नसतील तर ते आपल्या भक्तांना सांसारिक आणि आध्यात्मिक मार्गावर चालण्याचा उपदेश करूच शकणार नाही. समर्थ म्हणतात अज्ञानी आणि नीच आचार-विचार असलेल्या महंतांची महंती वाढली की देश आणि धर्म दोघांचाही नाश होतो. देशात गरीबी अराजकता, हिंसेचे साम्राज्य पसरते. याचे प्रत्यक्ष उदाहरण पाकिस्तान इत्यादि देश आहेत. समर्थांच्या काळातही हीच परिस्थिति होती. असल्या मूर्ख गुरूंमुळे राज्यावर म्लेंछ आले, असे समर्थांचे मत होते.
आपले सौभाग्य आज किमान आपला नेता तरी ब्रम्हज्ञानी आहे, त्यामुळे करोंना काळात ही आपल्या देशात कुणी उपाशी झोपले नाही किंवा ब्रिटेन अमेरिका सारख्या मोठ्या अर्थ व्यवस्थेला ही तडा गेला नाही. पण दुसरी कडे मेकाले शिक्षण पद्धतीत असलेल्या दोषांमुळे देशात ज्ञान, पुरुषार्थ आणि कर्तृत्व विहीन फक्त पुस्तकी ज्ञान असलेली एक मोठी युवा पिढी तैयार झाली आहे. शिक्षण व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी देशाला ब्रम्हज्ञानी गुरूंची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करण्याची गरज आहे.
तुम्ही आहात का?
तुम्ही मानता का?
,
कुठे, कशी, केंव्हा, कुणास ही डीग्री कुणाकडून मिळते? आपल्या म्ह्णण्यानुसार नेता म्हणजे कोण? ही डीग्री कशी तपासता येते? किंबहुना तुम्ही ती मानता तर का मानता?
ह्याचे काही मीटर आहे का? की आज १७३२२ लोक उपाशी झोपले असे रिडिंग वगैरे? करोना काळातच हे अॅक्टिव्हेट होते का? करोना संपल्यावर हे मीटर बंद केले गेले का? आजही एकही भारतवासी उपाशी झोपत नाही अशी परिस्थिती आहे का?
कृपया संदर्भासहीत स्पष्टीकरण करावे. कोणते दोष, त्याचा परिणाम कसा झाला? मेकॉलेपूर्व शिक्षणपध्दतीत जर हे दोष नसतील तर ती कोणती होती, ती पुन्हा प्रचलित करावी का? आपण स्वयं ह्या पध्दतीत शिक्षण घेऊन आपला संसार सुफल केला आहे तर आपण ह्या दोषांवर कशी मात केली? मेकॉलेचे अवगुण आपणास न लागण्यासाठी आपण कोणती समांतर पध्दती अवलंबली?
सध्याच्या शिक्षणपध्दतीला तुम्ही म्हणता तसे ब्रह्मज्ञानी गुरु सुधारुन नवीन प्रचलित करु शकतील का? शक्य असल्यास साधारण कीती ब्रह्मज्ञानींची आज आवश्यकता आहे? ते तयार करणार्या संस्थांची आज काय परिस्थीती आहे? म्हणजे आगामी कालखंडात त्यांचा तुटवडा पडल्यास नवीन काही व्यवस्था करावी लागेल की कसे?
.
एक शेवटी.
तुमच्या माहीतीत भारतात असे कीती ब्रह्मज्ञानी सध्या जीवीत आहेत? कॄपया किमान १० ब्रह्मज्ञानींचा नावासहीत उल्लेख द्यावा.
.
धन्यवाद.
वंदे मातरम
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
ही मेकॉले वाली शिक्षण पद्धती बंद करून वह्या पुस्तके विरहित घोकं पट्टी वाली गुरुकुल पद्धत सुरू करावी ..त्याशिवाय सनातन धर्माचे भले होणार नाही..
आणि तिथले सर्टिफिकेट कोणी मागणार नाही.. त्यामुळे यांच्या नेत्याची गोची होणार नाही..
( शिक्षणापाशी सुरू करून नेत्यापाशी येऊन टेकले ) कसं काय बरं जमत यांना ?
गुरुकुल पद्धतीत घोकम पट्टी नव्हती. मेकाले पद्धती आहे. गुरुकुल पद्धतीत 5-13 वर्षापर्यंत सामान्य गणित आणि स्थानीय भाषेचे ,इत्यादि ज्ञान. यापेक्षा ज्ञानाची गरज सामान्य माणसाला नसते. (ईस्ट इंडिया कंपनी चे 1830 ते 1850 काळातील सर्व्हे पहा). त्यानंतर त्याकाळच्या गरजेनुसार स्किल शिक्षण होते. जवळपास 18 विषयांचे स्किल शिक्षण दिले जात होते. फक्त 30 टक्के शिक्षक ब्राम्हण कायस्थ इत्यादि उच्च जातीचे होते. वेद इत्यादि शिकण्यासाठी घोकम पद्धती होती. कारण त्याशिवाय वेदिक ज्ञान सुरक्षित ठेवणे शक्य नव्हते.
ब्रम्हज्ञानी व्यक्तीलाच सांसारीक आणि आध्यात्मिक उपदेश देण्याचा अधिकार आहे
म्हणे ब्रम्ह जाणतो तो ब्राम्हण. किती आहेत असे लोक देशांत ? आणि ह्याला ब्रम्हज्ञान प्राप्त झाले तो ब्रह्मन् म्हणून समाजांत फिरेलच का ? मुलगी देताना आडनाव पाहतो कि गुण आणि कर्म ?
वर्णव्यवस्था हा भारतीय हिंदू धर्माचा पाया आहे ह्यांत शंकाच नाही पण उगाच एकादी दुसरी ओवी नाहीतर श्लोक घेऊन शब्दाच्या अर्थावर किस पडून फायदा नाही.
वर्ण आणि जातीव्यवस्था एकमेकांस पूरक आहेत आणि हिंदू धर्मातील इतर सर्व गोष्टी प्रमाणे भरपूर प्रमाणांत ambiguous आहेत. कारण ह्या प्रत्येकाला context महत्वाचा आहे. त्यामुळे इस्लामिक किंवा ख्रिस्ती मापदंड लावून फायदा नाही. एखादी व्यक्ती ब्राम्हण आहे कि नाही हे आम्ही सांगू शकत नाही कारण आम्हाला कुणालाच ब्रम्हज्ञान नाही. पण त्या व्यक्तीची जात पाहू शकतो. योग्य ते आडनाव असल्यास आणि आईवडिलांचा स्वभाव ठाऊक असल्यास एखादी ब्राम्हण व्यक्ती सुसंस्कृत आहे असा अंदाज आम्ही लावू शकतो. (तो खरा ठरेलच असे नाही.).
मूळ शूद्र असलेले मावळे इस्लाम विरोधांत पेटून उठले आणि क्षत्रिय झाले. त्यातील एकाला आम्ही आज क्षत्रियकुलवंतस म्हणतो. स्वतःला क्षत्रिय म्हणून मिरविणारे राजपूत सत्ता लालसेने अंध झाले, आपल्या बेटी मुघलांच्या जनानखान्यात ढकलून मुघलांची चाकरी करते झाले. ब्रिटिश काळांत हीच मंडळी "राजबहाद्दूर" असल्या ब्रिटिश पदव्या घेऊन मिरवत होते. वैश्य असलेले संत तुकाराम, संत परंपरेचे "कळस" झाले. आजकाल कुणीही शिवाजी महाराज खरोखर क्षत्रिय होते का हा प्रश्न विचारत नाहीत, स्वयमेव मृगेंद्रता न्यायाने त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर कधीच दिले आहे. अनेक हभप ब्राह्मण तुकाराम महाराजांच्या कथा आणि अभंग म्हणून अर्थार्जन करतात. तिथेच तुकाराम ह्यांच्या जातीचा प्रश्न मिटतो.
बहुतांशी लोक इतिहासावर काहीही छाप सोडणार नाहीत त्यामुळे ते ब्राम्हण आहेत कि शूद्र ह्याला महत्व नाही. ते गुण कर्म विभाग वगैरे म्हणूनच निरर्थक गोष्टी आहेत. त्यांनी कर्तृत्व गाजवलेच तर काळाच्या ओघांत गन कर्म विभागाने इतिहास त्यांना आठवणीत ठेवेल.
दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे 'scale effect' ची. अमुक एकाच व्यक्तीची जात महत्वाची नसली तरी एकूण त्या जातीचा समाज काय प्रवृत्ती दाखवितो हे महत्वाचे आहे. आणि गुण कर्म विभाग हे व्यक्तीपेक्षा ग्रुप ला जास्त लागू आहेत. माझी एक कोकणस्थ ब्राह्मण मैत्रीण होती, तिच्या घरी मी कधी जेवायला गेले तर पुन्हा घरी येऊन जेवायचे कारण ह्यांच्या घरी नेहमीच भातुकलीच्या खेळांत वाढावे तश्या प्रकारे वाढायचे. एका चपातीचे तीन तुकडे आणि एका वेळी एकाच तुकडा तो सुद्धा मागून घ्यावा लागायचा. कटिंग चहाचा असतो तसला पाण्याचा स्टील चा "वाडगा". मजेची गोष्ट म्हणजे नंतर शहरांत गेल्यावर त्या जातीचे ते "व्यवच्छेदक" लक्षण आहे हे मला समजले.
विविध जाती विविध प्रकारच्या गोष्टींना महत्व देतात, त्यांची काम करण्याची पद्धत आणि संस्कार वेगळे असतात. त्याशिवाय आपल्या जातीतील लोकांवर जास्त विश्वास ठेवण्याची सुद्धा काही जातीची एक सवय असते. आणि ह्याच विविध संस्काराने त्यांची प्रगती वेगवेगळ्या दिशेने होत राहते. जातीयवादी भीम मानव इत्यादी मग प्रत्येकाच्या प्रगतीला नवे ठेवतात पण प्रत्यक्षांत एखादी जात नक्की का पुढे जात आहे हे पाहून त्यांचे अनुकरण केले तर त्यांना स्वतःला जास्त फायदा होऊ शकतो हे हि मंडळी लक्षांत घेत नाही. उलट हल्ली हाथ धुणे, उष्टे न खाणे, चप्पल घराच्या बाहेर ठेवणे ह्याला जातीयवाद म्हटले जात आहे.
अमेरिकेत वंशभेद आहे त्यावर भरपूर रिसर्च होतो. प्रोफेसर बंडल वगैरे मंडळी मग तोच उचलून भारतांत आणतात. अमेरिकेत हल्ली कृष्णवर्णीय लोक वेळेवर कामाला येणे, कपडे व्यवस्थित घालणे, शिव्या न देता बोलणे इत्यादी गोष्टी "श्वेत वर्चस्व" आहे असे म्हणत आहेत कारण विविध रिसर्च दाखवतो कि गोरे लोक काळ्या लोकांपेक्षा जास्त प्रगत आहेत कारण ते वेळेवर कामाला येतात. काळे लोक ह्यांचे अनुकरण करायचे सोडून त्यालाच जातीयवादी ठरवितात.
वैचारिक कवायत : इंटरनेट वर नो शोधता खालील व्यक्तीपैकी तरुणपणी सर्वाधिक जमीन आणि पैसे कुणाकडे होते हे सांगा. उत्तर मी नंतर देईन. आणि ह्यातील सर्वाधिक गरीब व्यक्ती कोण होती ते सांगा.
* बाळ गंगाधर टिळक
* ज्योतिबा फुले
* भीमराव आंबेडकर
* विनायक दामोदर सावरकर
तरुणपणी चे सोडा
स्वातंत्र्य संग्रामात किंवा समाज उध्दार चळवळीत भाग घेतल्यावर त्याचे काय झाले?
किंवा मृत्यू समयी त्यांची काय संपत्ती होती हे पण महत्वाचे आहे
जन्म कुठे घयावा हे आपलया हातात नसते , तो सार्थकी कसा लावावा हे आपल्या हातात बऱ्यापैकी असते
व्यक्तीपैकी तरुणपणी सर्वाधिक जमीन आणि पैसे कुणाकडे होते
ज्योतिबा फुले
बल्लवाने मस्त बासूंदी बनवावी, आपण त्याचे कौतुक करावयास जावे आणे त्यानी शेवटच्या क्षणी त्या बासूंंदी पात्रात बचकभर मीठ टाकावे असा प्रत्यय लेखाचा शेवटचा परिच्छेद वाचल्यावर झाले.
मी भाजपा आणि मोदी प्रेमी असलो तरी तो शेवटचा परिच्छेद काही झेपला नाही बुवा !
आपणच केलेल्या सुंदर पदार्थाची चव बिघडवणे कसे जमते बुवा तुम्हाला ??
त्यांच्या उपस्थित एक वेगळ्या ऊर्जेचा प्रवाह सर्वांनाच जाणवतो. बाकी बिना अपेक्षा निस्वार्थ भावनेने ते दिवस रात्र न थकता काम करत राहतात. एकदा मध्यम श्रेणीचे अधिकारी पीएस (अर्थात अस्मादिक इत्यादि) ते अवर सचिव सोबत चर्चे (पूर्वी कोणताही प्रधान मंत्री स्टाफ सोबत चर्चा करायचा नाही) एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले होते लोक काय म्हणतात याकडे लक्ष देण्या एवजी जास्तीसजास्त कार्यात ऊर्जा खर्च करणे जास्त योग्य. त्यांच्या याच धोरणा मुळे देशाला औषधी मिळाली, प्राण हानी कमी झाली आणि अर्थव्यवस्था ही गडबडली नाही. त्यांना ब्रम्हज्ञानी म्हणजे अधिक योग्य.
असेल ! असेल !! कदाचित मी वेगळ्या ग्रहावर राहत असल्यामुळे मला आपला आशय समजला नसेल.
उचललेली तळी काही सोडायला तयार नाही. हे घ्या पूर्वीच्या पंतप्रधानांच्या काही सल्लागारांची नावं: विक्रम साराभाई (अंतराळ संशोधन), विजय भटकर (संगणक तज्ञ्), भालचंद्र देशमुख (राजीव गांधींचे सल्लागार), सॅम पित्रोडा (दूर संदेश वहन), सी. सुब्रह्मण्यम (हरीत क्रांतीचे जनक), वर्गिस कुरियन (दूध उत्पादन), चिंतामणराव देशमुख (अर्थ), धनंजयराव गाडगीळ आणि वैकुंठ मेहता (सहकार), श्रीधरन (कोकण रेल्वे). विशेष म्हणजे हे सर्व सल्लागार स्वयंभूपणे त्यांच्या योगदानासाठी प्रसिद्ध पावले आहेत आणि आजही जनतेच्या आदराला पात्र आहेत. आज उठता बसता चांद्र मोहीम, वंदे भारत रेल्वे यांचे संशोधक मोदींना धन्यवाद देतात.
जनरल माणेकशॉ यांना पाकिस्तान युध्दासाठी कोणती वेळ योग्य आहे हे विचारण्यासाठी इंदिरा गांधींनी पाचारण केले होते. तेव्हा ऑक्टोबर मध्ये काश्मीरमधील पिकाची कापणी झाली असेल. त्या नंतर आपण हल्ला करू असे माणेकशॉ यांनी सुचविले. आता हा किस्सा कदाचित लांगुलचालन या सदरात मोडू शकतो पण विचार विनिमय होत असत या अर्थाने या घटनेकडे बघायला हरकत नाही.
> पण दुसरी कडे मेकाले शिक्षण पद्धतीत असलेल्या दोषांमुळे देशात ज्ञान, पुरुषार्थ आणि कर्तृत्व विहीन फक्त पुस्तकी ज्ञान असलेली एक मोठी युवा पिढी तैयार झाली आहे. शिक्षण व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी देशाला ब्रम्हज्ञानी गुरूंची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करण्याची गरज आहे.
तथाकथित ब्रम्हज्ञानी महापुरुष राजकुलश्रेष्ठ नेत्यांनी काही तरी बदल शिक्षण पद्धतीत करूनच दाखवावा. त्यानी नेमलेले नालायक पुणेरी झंडूबाम छाप शिक्षण मंत्र्यांनी आम्ही ४ वर्षांत काहीच बदल केले नाहीत असे अत्यंत अभिमानाने सांगितले होते. ब्रम्हज्ञानी परम आदरणीय महापुरुषांनी ह्या झंडूबाम ला नारळ दिला पण त्याच्या जागी आणखीन नालायक माणूस आणून बसवला.
https://www.indiatoday.in/india/story/prakash-javadekar-new-education-p…
समर्थ म्हणतात अज्ञानी आणि नीच आचार-विचार असलेल्या महंतांची महंती वाढली की देश आणि धर्म दोघांचाही नाश होतो. देशात गरीबी अराजकता, हिंसेचे साम्राज्य पसरते. याचे प्रत्यक्ष उदाहरण पाकिस्तान इत्यादि देश आहेत. समर्थांच्या काळातही हीच परिस्थिति होती. असल्या मूर्ख गुरूंमुळे राज्यावर म्लेंछ आले, असे समर्थांचे मत होते.
बरोबर !
तरीही लोक सावरकरांच्या विवेकी राष्ट्रवादावर टिका करतात !