पाऊस: २
Primary tabs
ग्रीष्म भाजून काढत होता, काळ्याभोर मातीवर पडलेल्या भेगा जशा काही तृषार्त झाल्या होत्या, पिवळेजर्द वाळलेले गवत नव्या हिरवाईची आतुरतेने वाट पाहात होते, काळाकभिन्न राकट सह्याद्री अंगावर जलधारा झेलण्यासाठी जणू व्याकुळ झाला होता, अल्लड, अवखळ नद्या नव्या प्रवाहांना सामावून घेण्यासाठी आतुर झाल्या होत्या.
मात्र त्याचे आगमन तसे उशिराच झाले. हळूहळू काळे मेघ नैऋत्येकडून त्याचा सांगावा घेऊन येऊ लागले.
अवकाशात काळेकभिन्न मेघ दाटू लागले, भरलेल्या जलाने त्यांना जणू जडत्वच आले होते.
तृषाकुलैश्चातकपक्षिणाम् कुलैः प्रयाचितास् तोयभरावलम्बिनः।
प्रयान्ति मन्दम् बहुधारवर्षिणो बलाहकाः श्रोत्रमनोहरस्वनाः ।।
मेघ इकडून तिकडे भ्रमण करु लागले, पाण्याने भरलेल्या ह्या प्रचंड जलधींना पाहून तहानलेले चातक चोची वासून आ करु लागले, सुरुवातीला वेगाने पळणारे मेघ मात्र जलाने संपृक्त झाल्याने आता मंदावले होते. नवधारांचा वर्षाव सुरु झालेल्या आनंदित झालेले बलाहक अतिशय मनोहर दिसू लागले.
प्रभिन्नवैदूर्यनिभैस् तृणाङ्कुरैः समाचिताप्रोत्थितकन्दलीदलैः।
विभाति शुक्लेतररत्नभूषिता वाराङ्गनेव क्षितिर् इन्द्रगोपकैः॥
ह्या भिजलेल्या पृथ्वीलाच पाहा, तिच्या तृणांवर असलेल्या दवातून नवे अंकुर फुटायला लागले आहेत, त्याने ही धरणी भरुन गेली आहे, कर्दळीला धुमारे फुटले आहेत, रक्तवर्णी इंद्रगोप बाहेर पडले आहेत, जणू रंगरुपी रत्नांनी रंगलेली ही भूमी दागदागिन्यांनी नटलेल्या एखाद्या सुंदरीसम दिसत आहे.
आमेखलं संचरता घनानां छायामधः सानुगता निषेव्य ।
उद्वेजिता वृष्टिभिराश्रयन्ते शृंगाणि यस्यात्पवन्ति सिद्धा ।।
ह्याच्या कटीभागावर संचार करणार्या मेघांची खालच्या टेकड्यांवर राहणार्या सिद्धांना सावली मिळत आहे, तिचे ते आनंदाने सेवन करतात मात्र त्यांचीच भयंकर वृष्टी सुरु झाल्याने की ते उद्वैगाने स्वच्छ उन्हात न्याहलेल्या त्यांच्या शिखरांचा आश्रय घेत आहेत.
अभीक्ष्णमुच्चैर्ध्वनता पयोमुचाघनान्धकारीकृतशर्वरीष्व् अपि।
तडित्प्रभादर्शितमार्गभूमयः प्रयान्ति रागाद् अभिसारिकाः स्तिर्यः ॥
सतत गरजत, वर्षत असलेल्या ह्या मेघांनी घनघोर अंधार निर्माण केला आहे मात्र त्याही परिस्थितित आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी व्याकुळ झालेल्या अभिसारिकेला चमचमती विद्युल्लता जणू वाट दाखवत आहे.
विपाण्डुरं कीटरजस्तृणान्वितम्भु जङ्गवद् वक्रगतिप्रसर्पितम्।
ससाध्वसैर् भेककुलैर् निरीक्षितम्प्र याति निम्नाभिमुखम् नवोदकम्॥
हे जे नवीन जल आहे ते वेगाने खाली खाली जाऊ लागले आहे, ह्याचा रंग धुळकटलेला, किड्यांनी भरलेला आहे आणि जणू हे भुजंगासारखी वक्राकार चाल चालत आहे.
सतोयनम्राम्बुदचुम्बितपलः समाचिताः प्रस्रवणैः समन्ततः।
प्रवृत्तनृत्यैः शिखिभिः समाकुलाः समुत्सुकत्वम् जनयन्ति भूधराः॥
ह्या महान पर्वताच्या चित्तामध्ये विलक्षण उत्कंठा निर्माण झाली आहे, त्याच्या कातळांवर हे जलमेघ विसावले आहेत. चहूवार वाहत असलेल्या ह्या जलौघांचा नाद ऐकून नृत्यमग्न झालेल्या मयुरांनी ही धरणी भरुन गेलेली आहे.
सम्प्रवृत्तमहावर्षं लम्बमानमहाम्बुदम्।
भात्यगाधमपर्यन्तं ससागरमिवाम्बरम्।।
धारानिर्मलनाराचं विद्युत्कवचवर्मिणम्।
शक्रचापायुधधरं युद्धसज्जमिवाम्बरम्।।
घनघोर पावसाला आरंभ झाला आहे, हे मेघांनी झुकलेले आकाश जणू एखाद्या महासागरासारखेच अनंत दिसत आहे. जलधारांरुपी नाराच धारण करुन, विद्युलत्तेरुपी कवच धारण करुन इंद्रधनुष्यरुपी आयुध धारण केलेले हे आकाश जणू युद्धासाठी सज्ज राहिले आहे.
शैलानां च वनानां च द्रुमाणां च वरानन । प्रतिच्छन्नानि भासन्ते शिखराणि घनैर्घनै:।।
गजानीकैरिवाकीर्णं सलिलोद्गारिभिर्घनै:। वर्णसारूप्यतां याति गगनं सागरस्य च।।
बघा ही शैलशिखरे, ही वनराजी ह्या काळ्या ढगांनी आच्छादित होऊन कशी शोभा पावत आहे, आपल्या सोंडांवाटे पाणी सोडणार्या ह्या गजसमूहांसारखे हे आकाश आपल्या रंगररूपाने समुद्रासमान होऊन गेले आहे.
चेतनं पुष्करं कोशै: क्षुधाध्मातै: समन्तत:।
न घृणीनां न रम्याणां विवेकं यान्ति कृष्टय:।।
घर्मदोषपरित्यक्तं मेघतोयविभूषितम्।
पश्य वृन्दावनं कृष्ण वनं चैत्ररथं यथा।।
मेघ आप्ले जल रिते करु लागले आहेत, सगळीकडे चैतन्य फुलले आहे, कुठलेही दोष नसलेले हे मेघांनी विभूषित झालेले वृंदावन कुबेराच्या चैत्ररथ नगरीसारखे मनोरम्य दिसत आहे.
नवजलकणसङ्गाच् चीतताम् आददानः कुसुमभरनतानाम् लासकः पादपानाम्।
जनितरुचिरगन्धः केतकीनाम् रजोभिः परिहरति नभस्वान् प्रोषितानाम् मनांसि॥
जलबिंदंनी भरलेल्या ह्या नवजलाच्या साहाय्याने वृ़क्ष स्वतःला पाण्यांनी भरुन घेत आहेत, तृषार्त जनांना ह्या केतकीच्या वनांतून वाहणारा वारा सुगंधाने भारून टाकत आहे.
वर्ष प्रवेगा: विपुलाः पतन्ति प्रवान्ति वाता: समुदीर्णवेगा:।
प्रनष्टकूला: प्रवहन्ति शीघ्रं नद्यो जलं विप्रतिपन्नमार्गाः।।
घनघोर वर्षेने हा वेगवान प्रवाह निघाला आहे, मरुत वाहू लागला आहे, किनारे नष्ट करत जाणारा हा प्रवाह नद्यांचे जल भरुन टाकू लागला आहे.
महान्ति कूटानि महीधराणां धाराविधौतान्यधिकं विभान्ति।
महाप्रमाणैर्विपुलैः प्रपातैर्मुक्ताकलापैरिव लम्बमानैः।।
हा पर्वताची शिखरे त्याच्या अंगाखांद्यावरुन वाहू लागलेल्या प्रपातांमुळे जणू मोत्यांच्या रत्नहारासारखी विभूषित दिसत आहेत. सगळीकडे चैतन्य खळाळले आहे, ही सृष्टी हिरवाकंच शेलू पांघरुन तजेलदार झाली आहे, अवघे अवघे जन सुखावले गेले आहेत.
वाह वल्ली. माहोल बना दिया..!!
वाह !
नितांत सुंदर फोटोग्राफ्स !
एकदम गारगार वाटलं फोटो पाहुन !
-
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
+१०००
जबरी फोटोज... कुठले म्हणायचे? (ठिकाण?)

बाकी "संस्कृत अक्षर भैस बराबर" अशी आमची अवस्था असल्याने संस्कृत श्लोक आणि त्यांचा अर्थही देता त्यामुळे आमच्यासारख्यांच्या ज्ञानात थोडी भर पडते त्यासाठी धन्यवाद 🙏
धन्यवाद. पहिले दोन फोटो निघोजची रांजणकुंडे आणि इतर नाणेमावळातले आहेत. संस्कृत श्लोकांचा मात्र भावानुवाद नसून अत्यंत स्वैर अनुवाद केलाय.
समर्पक काव्यपंक्ती आणि जोडून रंगचित्रे !!!
शिरसावंद्य.
पाऊस आणि पावसाळा दोन्हीही आवडत नसले तरी फोटो बघायला आवडतं. छान फोटोज !
"संस्कृत अक्षर भैस बराबर"
+१
जब मिर्झा के सहर मे जब बदली आती है....
ये हुस्न-ए-नौ-बहार ये सावन की बदलियाँ
पीना है फ़र्ज़ और न पीना हराम आज
चलो प्रचेतस, एक कप चाय हो जाय.
संस्कृत पंक्ती आणि साजेसे फोटो.
पहिले दोन फोटो नक्कीच नुकत्याच केलेल्या निघोज भटकंतीचे!
अगदी बरोबर.
अगदी अगदी.
कुठले फोटो आहेत हे??
प्रसन्न वाटलं वाचून आणि पाहून.
जांभिवली-कोंडेश्वर परिसर, नाणेमावळ.
सुंदर,
आधी लेख + फोटो वाचले/पाहिले. नंतर फक्त लेख वाचला आणि त्यानंतर फक्त फोटो पाहिले.
संस्कृत श्लोक कुठले आहेत?
संस्कृत श्लोक कालिदासाच्या ऋतूसंहार, कुमारसंभव तसेच हरिवंश आणि वाल्मिकीरामायणातून घेतले आहेत.
त्यातही एक गंमत बघा, यातून कालिदासावर वाल्मिकीरामायणाचा प्रभाव असावा हे अतिशय स्पष्टपणे दिसून येते.
वाल्मिकीरामायणातील हा श्लोक पाहा
बालेंद्रगोपांतरचित्रितेन विभाति भूमिर्नवशाद्वलेन ।
गात्रानुपृक्तेन शुकप्रभेण नारीव लाक्षोक्षितकंबलेन ॥
तर ह्यालाच समानार्थी श्लोक कालिदासाने ऋतुसंहारात रचला आहे. जो मी ह्या धाग्यात दिला आहे.
प्रभिन्नवैदूर्यनिभैस् तृणाङ्कुरैः समाचिताप्रोत्थितकन्दलीदलैः।
विभाति शुक्लेतररत्नभूषिता वाराङ्गनेव क्षितिर् इन्द्रगोपकैः॥
वाह!
हे सुंदर संस्कृत श्लोक,स्वैर अनुवाद,चिंब पावसाळी फोटो पाहून मनात असंख्य मराठी पावसाळी गाणी बरसली.
नभ उतरू आलं चिंब थरथर वल
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात..
....
चिंब भिजलेले रूप सजलेले
बरसून आले रंग प्रितीचे...
...
अधीर मन झाले
मधूर घन आले...
...
मन चिंब पावसाळी झाडांत रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले...
-भक्ती
पहीले धाग्याबद्द्ल
जबरदस्त फोटो आणि साजेशा संस्कृत ओळी. संस्कृत समजायला धागा दोनदा वाचायला लागला :)
अवांतर-- अजुन काही पावसाळी गाणी
मराठी
चिंब पावसानं झालं रान आबादानी(सर्जा)-दादरा ठेका
श्रावणात घननीळा बरसला(भावगीत)--ठेका समजत नाही, अनेक ठेक्यांचे मिश्रण)
रिमझिम झरती श्रावण धारा(भावगीत)--केरवा ठेका
भन्नाट रानवारा, मस्तीत शीळ घाली---केरवा ठेका
गारवा अल्बम(विविध ताल)
ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीत(प्रेमाची गोष्ट)---केरवा ठेका
ती गेली तेव्हा रिमझिम(निवडुंग)
काही हिंदी
रिमझिम गिरे सावन(फिमेल व्हर्जन)
रिमझिम रिमझिम(१९४२ लव्ह स्टोरी)
नैना बरसे(वो कौन थी)
आज रपट जाये तो(नमक हलाल)----स्मिता पाटील "अशीही दिसू शकते?"
तुम जो मिल गये हो(हसते जख्म)
आता बास करतो, मनात पाउस सुरु झालाय
आणखी
तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोहोचायचा पाऊसही
पडेना पापणी पाहून ओलेती तुला
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही
तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही
मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
कश्या युक्त्या मला शिकवायचा पाऊसही
कशी भर पावसातही आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही
आता शब्दांवरीया फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही..
-संदीप खरे
अजुन दोन माझी आवडती गाणी!
१) अभी ज़िंदा हूँ तो जी लेने दो
बरसात के मौसम मे
तन्हाई के आलम मे
मै घर से निकल आया
बोतल भी उठा लाया
अभी ज़िंदा हूँ तो जी लेने दो
जी लेने दो...
भरी बरसात मे पी लेने दो
२) आखिर तुम्हे आना हैं ज़रा देर लगेगी
ऐ मेरी हमराज़ मुझको थाम ले
ज़िन्दगी से भाग कर आया हूँ
बारिश हो रही है
यह बारिश न होती
तोह भी न आती
आखिर तुम्हे आना हैं
ज़रा देर लगेगी...
महादु:खाचा कवी ग्रेस यांचा अविष्कार, त्यांची आई गेली तेव्हां त्यानें आपल्या संवेदना व्यक्त केल्यातं.
हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत. अप्रतिम.
गुरू ठाकूरचे शब्द आणि सुंदर चाल..
भिजून गेला वारा हा ,रूजुन आल्या गारा
बेभान झाली हवा ,पिऊन पाऊस ओला
स्पर्शात वारे निळे पिसारे,
आभाळ वाहून गेले ,
तुझ्यात मी अन माझात तु कसे,
कसे दोघात जग हे न्हाले
स्पर्शात वारे निळे पिसारे,
आभाळ वाहून गेले ,
तुझ्यात मी अन माझात तु कसे,
कसे दोघात जग हे न्हाले!
सतत ऐकावं असं!
शेखरचा कातिल आवाज लागलाय या गाण्यात,पण एकांतात पावसात ऐकायचं हे गाणं... शेवटी हिरवाईच फुटते :)एकदम गोड!
साजणी...
नभात नभ दाटून आले
कावरे मन हे झाले तू येना साजणी
साजणी छळतो मज हा मृद्गंध
तुझ्या स्पर्शासम धुंद तू येना साजणी
सळसळतो वारा गारगार हा शहारा
लाही लाही धरतीला चिंब चिंब दे किनारा
तुझ्या चाहुलीनं ओठी येती गाणी,
साजणी..
रिमझिम रिमझिम या नादानं बाई शिवार झालं बेभान
सई भिजूया रानात मनात पानात बरसूदे सोन्याचं पानी
हुरहूर लागी जीवा नको धाडू ग सांगावा
येना आता बरसत येना
साजणी....
हुरहूर लागी जीवा नको धाडू ग सांगावा
येना आता बरसत येना
गुणगुणते हि माती लवलवते हि पाती
सर बरसे सयींची रुजवाया नवी नाती
तुझ्या चाहुलीनं ओठी येती गाणी, साजणी ...
फोटो अतिशय सुंदर आले आहेत. लंबर एक. फोटो खुप्पच आवडले. इतक्या सुंदर छायाचित्रांवर संस्कृत दवणीय सुभाषितांनी माझ्या आनंदावर वीरजन पडले. आय माय सॉरी.
पुलेशु मित्रा.
लिहिते राहा.
- दिलीप बिरुटे
इतक्या सुंदर छायाचित्रांवर संस्कृत दवणीय सुभाषितांनी माझ्या आनंदावर वीरजन पडले.
का हो आनंदावर विरजण पडण्यासारखे काय आहे? संस्कृत श्लोकांचा मराठी अर्थ हि दिला आहे कि
मराठी च्या प्राध्यपकाला संस्कृत चे एवढे वावडे? कि वावडे " संस्कृत अजून थोडी तरी जिवंत आहे " याचे आहे?
कौतिक नका करू हवे तर पण लेखकाने एवढ्या मेहनीतीने लेख लिहिला त्यावर का विरजण घालताय ?
वीरजन पडले
किती जण पडले?
आणि
वीरच होते कशावरून?
अ रे रे मराठीच्या प्राध्यापकांकडून अशुद्ध लेखन
शेवटी किती झालं तरी माणव हा अपुर्न च
डॉक्टरसाहेब भावना पोहचल्या. .
आपले प्रतिसाद कायम उत्साह वाढवणारे असतात.
आभार..!
-दिलीप बिरुटे
प्रचेतस यांचा धागा गाण्याच्या भेंड्या केल्याबद्दल माफी मागते.
धागा पावसा सारख्या रोमॅंटीक विषयावर असला कि हे चालायचंच, कोणाला काय आठवेल ह्याचा नेम नाही 😀
=))
कधी न एकलेली गाणी ह्या धाग्याच्या निमित्ताने माहिती झाली :)
सर्व मिपाकरांना गटारी मोहोत्सवाच्या शुभेच्छा!
अँबी व्हॅलीच्या निसर्गरम्य परिसरात, थांबत्या-पडत्या पावसात हा मोहोत्सव साजरा करणे म्हणजे पर्वणीच असते 😀
गटारीच्या शुभेच्छा
डोळे निवले. निसर्गाचा आस्वाद घेत आषाढ अमावास्या साजरी करायला खूपच मजा आली असेल. :) हा रस्ता बहुधा तैलबैलाच्या आसपास असावा असा अंदाज.
येस्स... खुपच मजा आली!
तुमचा अंदाज बऱ्यापैकी बरोबर आहे!
तैलबैलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अँबी व्हॅलीच्याही थोडेसे अलीकडे (पेठ शहापुर) फाट्याजवळ डावीकडे वळुन थोडे पुढे गेल्यावर हा परिसर आहे. अगदी निर्मनुष्य ठिकाण असल्याने मस्त प्रायव्हसी मिळते 😀
पेठ शहापूर तर अगदी माहितीतला रस्ता, कोरीगडला कित्येकदा गेलोय तिथून, तुम्ही अजून पुढे आंबवण्यातून खाली उतरलात तर सालतर खिंडीतून भांबर्डे गावी पोचाल. हाच रस्ता पुढे पिंपरी मार्गे ताम्हिणीला निवेच्या जवळ मिळतो. हा रस्ता म्हणजे एकदम सुख आहे, कधीही न पाहिलेला अनाघ्रात निसर्ग येथे आहे, आजही मोजक्या भटक्यांशिवाय येथे कुणी येत नाही, मात्र रस्ता अतिशय खराब आहे, शिवाय येथे मोबाईलला रेंज नसते त्यामुळे पुरेशी काळजी घेऊनच येथे यावे.
बरोबर आहे! तुम्ही ह्या रस्त्यावरुन पुण्याकडुन येता तेव्हा तुम्हाला हे ठिकाण पेठ शहापूरच्या आधी लागेल, आम्ही टायगर पॉइंट वरुन पुढे आलो कि पेठ शहापूर जवळ डावीकडे वळावे लागते. गेली तीन वर्षे सलग हा 'मोहोत्सव' साजरा करायला ह्या ठिकाणी येण्याचा आता आमचा पायंडाच पडलाय, पण पत्ता काही नीट सांगता येत नाही अजुन! नक्की कुठे वळायचे ते तिथे पोचल्यावरच लक्षात येते 😀
पूर्वी प्रतिसादाला वाट दाखवण्यासाठी "पौड फाट्याच्या टपाल पेटीत टाका" असं वारंवार वाचायला मिळत असे.
त्याचा अर्थ
१) प्रतिसादास कात्रजचा घाट दाखवणे/
२) प्रतिसाद चुकीच्या लेखात आला/
३)त्या पेटीबद्दल मिपावर काही गंमतीदार आख्यायिका आहे?
अवांतर समजून घेणे.
क लिवलंय... क लिवलंय!
छायचित्रे पाहून आणि लेख वाचून गारगार झालो होतो तितक्यात प्रतिसादातली गाणी वाचून पावसाळी झिंग चढली.
सं - दी - प
काय ती भटकंती, काय ती प्रकाशचित्रे, काय ती प्रतिभा, काय ते काव्य...
सगळं कसं एकदम ओके मदी हाय...
मन्ना डे....
घन घन माला नभी दाटल्या
https://youtu.be/WXrOR7bCyzE
राहुल देशपांडे
पाऊस वाजतो दारी हलकेच निथळती सुर
https://youtu.be/FolBaTxf2pE
संस्कृत काव्यपंक्ती आणि फोटो ओवलेला गोफ ... पावसाच्या टपोऱ्या पाणमोत्यांसारखा सुंदर !
प्रतिसादही तितकेच सुंदर.

जांभिवली परिसरातले काही फोटो आहेत असे म्हटले आहे. यातील जांभिवली हे रसायनी जवळचेच आहे का? माणिकगड कुठे दिसत नाही म्हणजे निश्चितच हे वेगळे ठिकाण आहे. जांभिवली धरणाचे ठिकाण कंजूष भाऊंनी (काका म्हणत नाही) एका प्रतिसादात सुचवले होते. गेल्या वर्षी येथे जाऊन आलो होतो. गर्दी जवळ जवळ नसतेच. ठिकाण खूपच आवडले असल्याने या रविवारी दुपारी परत येथे गेलो होतो. या वेळी पाऊस कमी झाल्याने अजून धरण अजून भरलेले नाही. धरण भरल्यावर सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे छोटासा धबधबा तयार होतो तोही नाहीच. मन थोडेसे खट्टू झाले. थोड्या दूरवर धरणाच्या पाण्यात काही जण उतरलेले दिसले. आम्हीही पोहचलो. पाण्याची खोली कुठे कुठे कमी आहे त्यांच्याकडून समजले. मग काय पाण्यात दोन तास मस्त डुंबलो. खूप छान वाटले.
काही फोटो .
मागे दिसणारा माणिकगड
थोडे अवांतर:
एक घटना घडली त्यामुळे हि भटकंती कायमची लक्षात राहील.
आम्ही ज्या परिसरात होतो तेथे एक तरुण (बहुतेक स्थानिक आदिवासी) मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालीत होता. आमचा ग्रुप मोठा होता त्यामुळे भीती वगैरे काही वाटली नाही पण उगाच वाद होऊ नये म्हणून तो आमच्यापर्यंत पोहचायच्या आत आम्ही तेथून निघालो व आमच्या गाड्यांपर्यंत येऊन पोहचलो. कपडे वगैरे बदलण्यात थोडा वेळ गेला आणि हा तरुण तेथे पोहचला. आणखीही दोन गाड्या व २-४ बाईक तेथे होत्या त्या लोकांशीही त्याची थोडी बोलाचाली झाली व नंतर तो थोडा दूर झाला. सर्व गाड्या निघून गेल्या व उरला फक्त आमचा ग्रुप,आमच्या दोन गाड्या आणि हा तरुण .आता अंधार पडायला सुरुवात झाली होती. थोडा लांबवर गेलेला हा तरुण परत आमच्या जवळ आला आणि परत बरळू लागला. मधूनच प्रत्येकापुढे जाऊन हात जोडून माफ करा असेही म्हणू लागला. इतक्यात धरणाच्या उतारावरून चार-पाच जण पळत येताना दिसले. एक बाइकस्वारही उगवला. आम्हाला बरे वाटले. ते जवळ येताच या तरुणाने त्यांना सांगितले कि आम्ही लोकांनी त्याला लाथा घातल्या. आणि क्षणात चित्र बदलले. आलेले लोक बहुतेक त्याच्याच वस्तीवरले असावेत व त्यालाच शोधत आलेले असावेत . एक-दोघे सोडले तर बशुद्धीत नव्हतेच. लाकडी दांडके, दगड हातात घेऊन कोणी मारले विचारू लागले.गाडीचे दरवाजे उघडत बायकांनाही धमकाऊ लागले. एक जण फोनवरून कोणालातरी परतीचा रस्ता बंद करायला सांगू लागला. गावापासून धरणापर्यंतचा रस्ता अगदी अरुंद व दाट झाडी असलेला होता. समोरून एखादी गाडी आली किंवा रस्त्यावर अडथळा केला तर गाड्या जाणे शक्य नाही. त्यांचा फोन लागल्यासारखा वाटत होते पण आमच्या कुणाच्याच फोनला नेटवर्क नव्हते. मदद मिळण्याची शक्यताच नव्हती, त्यांची बाईकही त्यांनी रस्त्यावर आमच्या गाड्यांच्या मागे लावली होती. गाड्या काढणे शक्य नव्हते. खरंच कोणी मारले म्हणून संतापले होते का त्यांचा काही डाव होता समजायला मार्ग नव्हता. नाही म्हटले तरी किरकोळ दागिने, थोडीफार रोकड वगैरे आपल्याकडे असतेच. त्यातच दुसरी भीती म्हणजे वस्तीवरच्या बायका आल्या आणि त्यांनी पुरुषांवर काही आळ घेतला तर कठीणच होणार होते. तेव्हड्यात तो तरुण बोलला की त्याला लाल गाडीवाल्याने मारले. आमच्याकडे तर लाल गाडी नव्हतीच. त्यांच्यातल्या शुद्धीत असणाऱ्या दोन जणांना मात्र पटले कि आपलाच माणूस बरळतो आहे. त्यांनी बाईक बाजूला काढली व आम्हाला सांगिले कि तुम्ही निघा आम्ही संभाळतो बाकीच्यांना. गाडी मागे घेतांना चिखलात चाक रुतल्याने जागच्या जागी फिरून जास्तच रुतायला लागले. सगळ्यांनी खाली उतरून/ गाडीचे वजन कमी करून गाडीला धक्का द्यायला हवा होता पण आमच्यात तेव्हडी हिम्मत शिल्लक नव्हती. तेव्हड्यात दिलासा देणारी गोष्ट घडली ती म्हणजे थोड्या वेळापूर्वी आम्हाला धमकावणाऱ्या दोघांनीच जोर लावत गाडीला मागे ढकलले व आम्ही सुखरूप तेथून बाहेर पडलो. आमच्यातल्या कोणी खरंच संयम सोडून त्याच्यावर हात उगारला असता तर काय झाले असते हा विचार येऊन अजूनही अंगावर शहारा येतो.
शिकवण :
* बाहेरून येऊन स्थानिकांना त्रास होईल असे कृत्य करू नये. (आमच्या बाबतीत काहीतरी गैरसमज झालेला असावा)
* महिला, मुले सोबत असताना निर्जन स्थळी उशिरापर्यंत भटकू नये. गटारीला तर नाहीच नाही.
* अशा ठिकाणी कोणी स्थानिक ओळखीचा असेल तर पूर्वसूचना देऊन ठेवावी.
इकडील जांभिवली हे नाणेमावळाचे शेवटचे टोक आहे. पुण्याहून लोणावळ्याकडे जाताना कामशेतवरुन उजवीकडे वळून रेल्वे फाटक आणि इंद्रायणीवरचा पूल ओलांडून साधारण १७ किमी अंतरावर (कामशेतपासून) जांभिवली आहे. वाटेत उकसाण धरण दिसते. जांभिवलीपासून ३ किमी अंतरावर डोंगराच्या बेचक्यात हे निसर्गरम्य कोंडेश्वर मंदिर आणि कोंडेश्वर धबधबा आहे. जवळपास ऑक्टोबर अखेरपर्यंत हे पाणी वाहते असते. आधी ही ३ किमीची फक्त पायवाट होती, आता पक्का रस्ता आहे. कोंडेश्वर तसे प्राचीन देवस्थान, आता मात्र जीर्णोद्धार झालाय. ढाकच्या बहिरीचा ट्रेक करायला इथूनच यावे लागते. बाकी तिकडचे जांभिवलीही छान दिसतेय. तुम्हाला आलेला अनुभव एकदम भयंकरच म्हणायचा. थोडक्यात वाचलात.
वाह प्रचेतस भन्नाट झालाय लेख आणि फोटो तर एकदम कातिल
त्याला पाऊस आवडत नाही,
तिला पाऊस आवडतो.
.
.
.
पुन्हा पावसाला सांगायचे,
कुणाला किती थेंब वाटायचे...
बरेच दिवस पावसाने उघडीप दिल्याने या धाग्याने पावसाच्या पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला :)
सुंदर! मन प्रसन्न झाले लेख वाचून.