काथ्याकूट

अराजकीय घडामोडी - ऑगस्ट २०२३

Primary tabs

मिपावर राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यास काही काळ बंदी घातली आहे मात्र राजकीय चर्चांमधील हाणामार्‍यांमधे इतर विषय / बातम्यांविषयीच्या चर्चांचा देखील मृत्यु झाला आहे. इतर महत्वाच्या बातम्यांचा उहापोह करण्यासाठी अराजकीय घडामोडी नावाचा चर्चाप्रस्ताव सादर करीत आहे. मिपा धोरणात बसत असेल तर चर्चा चालू द्यावी ही विनंती.
प्रतिसाद देणार्‍यांनी चर्चेला राजकीय वळण देऊ नये ही विनंती !
------
१. कळवा रुग्णालयात १२ तासांत १६ रुग्णांचा मृत्यू
कळवा रुग्णालय हे काही ना काही कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. ठाण्याचे सिव्हिल रुग्णालय बंद झालेले असल्यामुळे कळवा रुग्णालयावरील ताण वाढला असावा अशीही एक शक्यता आहे.

२. मेट्रोमध्ये सर्वाधिक बिहारी लोक काम करतात
मेट्रो स्टेशनवर सर्वाधिक बिहारी लोक काम करताना दिसत आहेत, अशी तक्रार एका महिलेने केली.
बाई बहुतेक हस्तीदंती मनोर्‍यात राहत असाव्यात. मराठी मुलांनी अशी कष्टाची कामे केली तर गळ्यात बैलासारखे तोडे घालून कोण मिरविणार ?

३. छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? Msc. Bed शिक्षिकेनं चक्क लाईफलाईन घेतली
काय वाटते ? शिक्षिकेला उत्तर माहित असावे पण कॅमेर्‍यासमोर धांदल उडाली असावी ? की इतिहासाचे वाचन विसरले गेले असावे ? इतिहासातील सनावळ्या पाठ करणे माझ्यासाठी डोकेदुखी होती मात्र काही ठळक मुद्दे अजूनही लक्षात आहेत. पोटपाण्यासाठी गरजेची असणार्‍या विद्येमुळे इतर विषयांमधील रुची मागे पडत असावी काय ?

४. रशियाचं 'लूना २५' घालणार 'चांद्रयान ३'ला खोडा? एकाच दिवशी दोघेही पोहोचणार चंद्रावर!
१४ जुलै रोजी इस्रोने 'चांद्रयान-३'चं यशस्वी प्रक्षेपण केलं होतं. सध्या हे चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे. सर्व काही सुरळीत पार पडल्यास २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याची इस्रोची योजना आहे. दरम्यान, रशिया देखील आपलं लूना-२५ हे यान चंद्रावर पाठवत असून; ते चांद्रयानाच्या आधी चंद्रावर उतरू शकतं.रशियाची अंतराळ संस्था रोस्कोस्मोस आपलं लूना-२५ हे यान चंद्रावर पाठणार आहे. ११ ऑगस्टला या यानाचं प्रक्षेपण असणार आहे. त्यानंतर पाच दिवसांत ते चंद्राच्या जवळ पोहोचेल. यानंतर पुढचा सुमारे एक आठवडा ते चंद्राच्या कक्षेत फिरेल. त्यानंतर ते चंद्राच्या दक्षिण भागात लँड करेल. यामुळे चांद्रयान-३ आणि लूना-२५ या दोन्ही यानांची लँडिंगची तारीख जवळपास सारखीच असू शकते.

अवकाशात अशी याने सोडण्यासाठीचे नियोजन करण्यासाठी कोणती मध्यवर्ती नियामक संस्था आहे काय ? जी सगळ्या देशांच्या उपक्रमावर नजर ठेऊन असते ? किंवा तिची परवानगी आवश्यक असते ?

रंगीला रतन

मराठी मुलांनी अशी कष्टाची कामे केली तर गळ्यात बैलासारखे तोडे घालून कोण मिरविणार ?
+१३०८२३

बोका

सध्या बाकू येथे बुद्धिबळ विश्व कप स्पर्धा सुरु आहे. (विश्वविजेता स्पर्धा वेगळी , ती या आधी झाली - डिंग लिरेन विश्वविजेता आहे).
विश्व कप स्पर्धा नॉक आउट पद्धतीने १२८ खेळाडुंमध्ये होत आहे. उप-उपांत्य फेरीचे आठापैकी सात खेळाडू निश्चित झाले आहेत.
त्यात तीन भारतीय आहेत, आणि उद्या विदित गुजराती जिंकला तर चार होतील !
१७ वर्षांचा गुकेश पुढचा सामना मॅग्नस कार्लसनशी खेळेल.
१८ वर्षांचा प्रग्नानन्द पुढचा सामना २० वर्ष्याच्या अर्जुनशी खेळेल. प्रग्नानन्दने मागील फेरीत जागतिक क्र. २ हिकारू चा पराभव केला.

शेवटच्या ४ महिला खेळाडूंमध्ये हरिका द्रोणवल्ली आहे.
पुढच्या दहा वर्षात भारतीय विश्वविजेता / विश्वविजेते पाहायला मिळू शकतात.

भारतात क्रिकेट नंतर कदाचित बुद्धिबळाचाच क्रमांक लागत असेल.
एकेकाळी मुंबईत कॅरम चे अफाट वेड होते आता इतिहासजमा व्हायला लागला आहे की काय असे वाटते.

रंगीला रतन

पुढच्या दहा वर्षात भारतीय विश्वविजेता / विश्वविजेते पाहायला मिळू शकतात.
+१३०८२३. बुद्धिबळ खेळ आवडतो.

बोका

प्रग्नानन्द अंतिम फेरीत दाखल !
उपांत्य फेरीत जागतिक क्र. ३ कारुआनाचा पराभव केला.
आता अंतिम सामना मॅग्नस कार्लसनशी !!

भारताचा १८ वर्षीय प्रज्ञानंद सध्या बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेत ३२ वर्षाच्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनच्या तोडीस तोड खेळ केला. प्रज्ञानंदने पाच वेळा जग्गजेत्या कार्लसनला यापूर्वी पराभूत केले होते. त्यामुळे गुरुवारी प्रज्ञानंदला कार्लसनला पुन्हा एकदा पराभूत करून नवा इतिहास रचण्याची संधी होती. पण दोन दिवस गाजवणाऱ्या प्रज्ञानंदचा हा प्रयत्न थोडक्यात हुकला.

वयाचा फरक पडत असावा बहुतेक. आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलाशी खेळताना अनुभव कामी येत असावा.
हल्ली संगणक विरुद्ध बुद्धीबळपटू असे सामने होत नाहियेत काय ?

बोका

हल्ली संगणक विरुद्ध बुद्धीबळपटू असे सामने होत नाहियेत काय ?

बुद्धीबळात संगणक मानवाच्या पुढे निघून गेलाय. कार्लसनचे रेटींग २८३० च्या आसपास आहे. जगातले उत्तम चेस इंजिन स्टॉकफिश चे रेटींग ३५०० च्या आसपास आहे.
याच स्टॉकफिशचा सामना अल्फाझीरो या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत संगणक प्रोग्रामशी २०१७ मध्ये झाला.
१०० डाव ---- अल्फाझीरो २८ विजय , ७२ बरोबरी, स्टॉकफिश ० विजय
पुढचा सामना २०१९ मध्ये झाला.
१००० डाव ---अल्फाझीरो १५५ विजय , ८३९ बरोबरी, स्टॉकफिश ६ विजय !

वरील डावांपैकी काही डाव केवळ अफलातून आहेत.युट्युब वर विश्लेषण व्हीडीओ आहेत. जरूर पहा.

कंजूस

कार्लसनचा खेळ वेगळा आहे. पूर्वी तो हारत असे. मग त्याने संगणक कसा विचार करतो ( इतर खेळाडू त्यातच पारंगत आहेत.) तसं न करता वेगळ्याच खेळी करायच्या युक्त्या शोधल्या त्यामुळे तो इतरांना हरवू शकतो.
बुद्धिबळाकडे खेळ म्हणून न पाहता प्रत्यक्ष रणांगणावरची लढाई मृहणून पाहिलं तर इतिहासात मोठ्या संख्येने सैन्य असलेल्या राजांना छोटे सैन्याने कसं हरवलं ही उदाहरणे आहेत.
याच क्लृप्त्या कार्लसन वापरतो. संगणक हे एक खेळणं आहे.

१)आपला राजा कधी एकदाचा कॅन्सल करून वजीर चौफेर उधळून पटावर दाणादाण उडवायची ही मनोवृत्ती घेऊन खेळायला आलेल्या खेळाडूंना कार्लसन निरुत्तर करतो. त्यांचा डाव पार फसतो.
२) होतं काय की प्रतिस्पर्धी आपला एक हत्ती कॅसल मध्ये अडकवतो. पण कार्लसन वजीराला वजीर घालवतो. घोडे आणि उंटही पटाबाहेर घालवतो. मग अशा वेळी काय करायचं असा मोठा प्रश्न ऐनवेळी सोडवता येत नाही. पण कार्लसन राजा ,दोन प्यादी,एक हत्ती घेऊन पटाच्या मध्यावर येतो. ही चाल फारच भारी असते. संगणकही काही कामाचा राहात नाही.

कंजूस

धाग्यासाठी धन्यवाद.
चांगले मुद्दे घेतले आहेत.
१) कळवा रुग्णालय बातमी. दोन गोष्टी संभवतात. एक - रुग्णांना प्रथम खाजगीत उपचार करून मग शेवटच्या क्षणी "मोठ्या हॉस्पीटलला न्या" सल्ला देतात. हे माहिती आहे. दोन - घातपात,औषध भेसळ असावी. अशी घटना केईम परळला झाली आहे. एका वार्डाचे पाचसहा पेशंट दगावले आणि डॉक्टरलाच शंका आली की औषधात गडबड/भेसळ आहे. तसंच निघालं.

२)अवकाशात अशी याने सोडण्यासाठीचे नियोजन करण्यासाठी कोणती मध्यवर्ती नियामक संस्था आहे काय? होय.
ती दोन याने आपटणार नाहीत. रशियाचे यान एक वर्ष काम करणार आहे,भारताचे पंधरा दिवस.

वामन देशमुख

रशियाची चंद्र मोहीम लुना-२५ अपयशी ठरली.
त्या यानाची उड्डाण नियंत्रण यंत्रणा, ऐनवेळी संदेशवहन बंद पडल्यामुळे यानाचा वेग नियंत्रित करू शकली नाही आणि ते यान चंद्रावर कोसळले.‌

पण मानवाची ब्रम्हांड पदाकांत करण्याची महत्त्वकांक्षा पराभूत होणार नाही.

---

भारताच्या चांद्रयानाच्या पुढच्या टप्प्यासाठी शुभेच्छा.

भारताचे चंद्रयान काय करते याची उत्सुकता .

रशियाची चंद्र मोहीम लुना-२५ अपयशी ठरली.
असं नाही म्हणता येणार. प्रत्येक गोष्टीतून माणूस काही ना काही शिकतच असतो. हे अपयश कदाचित तात्पुरते असेल.

नागपंचमी विशेष : अडीच दशकांत तब्बल २० हजार सापांना जीवदान, वन्यजीवरक्षकाची कर्करोगावर मात करून सर्पसेवा. ही बातमी
अकोला : सापांविषयीचा गैरसमज, अंधविश्वास दूर होऊन त्यांच्या रक्षणासह समाजात जनजागृती करण्याचे अनमोल कार्य अकोल्यातील ज्येष्ठ सर्पमित्र बाळ काळणे गत अडीच दशकांपासून करीत आहेत.

या काळात त्यांनी तब्बल २० हजारांवर सापांना जीवदान दिले. मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांच्यावर जीवघेण्या कर्करोगाने झडप घातली होती. कर्करोगाशी कडवी झुंज देतानाही त्यांनी सर्पसेवा अविरत ठेवली. कर्करोगावर मात केल्यावर आता ते निसर्गसृष्टीच्या संरक्षणासह समाजप्रबोधनाचे कार्यदेखील करतात. बाळ काळणेंनी कृतीतून समाजात आदर्श निर्माण केला आहे.

तैवानचे लाई चिंग ते यांच्या अमेरिका भेटीनंतर चीन ने तैवानच्या खाडीत युद्ध सराव केला.

https://www.livemint.com/politics/china-launches-drills-near-taiwan-aft…

चीनी अर्थव्यवस्थेवर आर्थिक मंदीचे काळे ढग.एव्हरग्रँड या बलाढ्य चीनी बांधकाम कंपनीने दिवाळ खोरी जाहीर केली. चीन ने आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अधिकचे ५ ट्रिलियन डॉलर्स ओतले.
https://www.financialexpress.com/world-news/turbulence-in-chinas-econom…

दोन्ही बातम्या एकत्र वाचल्या तर --जनतेचे लक्ष महत्वाच्या मुद्द्यांवरुन भलतीकडे वळवुन आपली पोळी भाजुन घ्यायची हे राजकारण सार्वत्रिक आहे हे लक्षात येते.

वामन देशमुख

इस्रोच्या शास्त्रज्ञांना धन्यवाद आणि भारतवासी यांचे अभिनंदन.
या मोहिमेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

अहिरावण

सर्व शास्त्रज्ञांचे मनःपुर्वक अभिनंदन !
आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा !

चांद्रयान मोहिमेत भाग घेतलेल्या चमूचे चंद्रबळ आज अपार होते :) मोहिमेच्या सफलतेबद्दल चमूचे हार्दिक अभिनंदन !
आजची काही मजेदार व्हॉटसअप स्टेटस :
१) चंद्रयान चाँद पर है लेकीन सारा भारत सातवे आसमान पर है |
२) किसी देश के ध्वज पर चाँद है तो कोई देश ही आज चाँद पर है |

चौकस२१२

यावर आता पाकिस्तान चे आधीचे विज्ञान मंत्री फवाद चौधरी आणि भारतातील कलाकार प्रकाश राज ( आता माझी सटकली वाले) यांचे काय म्हणने आहे हे बघण्यात जास्त उत्सुकता आहे

आजच्या लोकसत्तातील अग्रलेख वाचला.
शिक्षण, क्रीडा, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांकडे पाहाणे सोडून आपण उत्तरदेशीयांवर मात करण्यास महत्त्व देत राहिलो. ते जमले नाहीच; पण हाती होते तेही गेले. एकंदरीत दक्षिण भारतीयांच्या तुलनेत महाराष्ट्र पिछाडत आहेत असा सुर आहे.

गवि

JEE, NEET वगैरे स्पर्धा परीक्षांसाठी प्रसिद्ध असलेल्या कोटा (राजस्थान) या शहरात गेल्या दोन दिवसांत दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी दिसत आहे. अधिक वाचू गेले असता चालू वर्षात बावीस विद्यार्थ्यांनी तिथे आत्महत्या केल्याचे कळले. हे धक्कादायक आहेच पण अनेक विद्यार्थी तीन तीन वर्षे ही एंट्रन्स एक्झामची तयारी करत आहेत असेही दिसते.

क्लासेसच्या अनेक मॉक एक्झाम होत असतात. त्या कठीण गेल्याने फायनल परीक्षेत आपले काय? या तणावाखाली असे होत असेल का? तूर्त कोटा शहर व्यवस्थापनाने या सराव परीक्षा थांबवण्याचे आदेश क्लासेसना दिले आहेत. पोरांना असल्या क्लासेसना घालताना पालकांना घोरच आहे. एकीकडे मोटिवेशन म्हणून करेंगे या मरेंगे टाइप बिंबवले जाते. अनेक ठिकाणी there is no plan B असेही सुचवले जाते. एकच तारा समोर आणिक.. असे काहीसे करून मुले लढत असतात. नेमके काय प्रकारे यश मिळवणे आदर्श हे कळत नाही खरे.

Bhakti

:(
आणि तिकडे एका शिक्षिकेने एका मुलाला दुसऱ्या मुलांकडून अभ्यास केला नाही म्हणून मार दिला.हाताची सगळी बोटे ओढून एक समान करायचा अट्टाहास सुरू आहे.