काथ्याकूट

शालेय विषय निवडीबद्दल मार्गदर्शन

Primary tabs

नमस्कार मंडळी,
वरील विषयाच्या अनुषंगाने मिपावर आणि इतरही संस्थळावर अनेक चर्चा झालेल्या आहेत, वाचल्या आहेत पण पाऊस पडायला लागल्यावर घर बांधायची तयारी करायची ह्या जन्मजात सवयीमुळे ऐनवेळीचा काथ्याकुट करत आहे तेव्हा अगोदरच माफी मागतो. बर्‍याच चर्चा SSC/ CBSE बोर्डाच्या अनुषंगाने आहेत. ICSE च्या अनुषंगाने देखील चर्चा व्हावी म्हणून देखील हा प्रपंच !

सर्वप्रथम मुलाविषयी :
मुलगा आता ९ वी मधे जाईल. शाळेत ICSE बोर्ड आहे आणि त्यांनी विषय निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. पण जेवढे निवड स्वातंत्र्य तेवढा अधिक गोंधळ अशी परिस्थिती आहे.
मुलगा बर्‍यापैकी हुशार / एकपाठी आहे. शाळेचा आग्रह आणि मुळातच वडिलांकडून मिळालेले कंटाळ्याचे संस्कार यामुळे अजुन बाहेरची शिकवणी लावलेली नाही तरीही 85% ते 90% पर्यंत गुण मिळवत आहे. (सायन्स, गणित सगळ्याच विषयात).

मुलाला पुढे जाऊन झुलॉजीस्ट बनायचे आहे असे तो म्हणतो. म्हणजे नक्की काय करायचे ते त्याला आणि मला देखील कळत नाही आणि ते करेलच याची शाश्वती वाटत नाही. अर्थात या वयात त्याच्याकडून लगेच तशी अपेक्षा नाही. ते असो.
मुळ विषय असा की त्याला गणितात बर्यापैकी गती आहे पण त्याला तो विषय आवडत नाहीये आणि घ्यायचा नाहिये.बर्‍याच जणांशी चर्चा केल्यानंतर गणित सोडू नये असे जवळजवळ 99% मंडळींचे मत पडले. यात गणितात ओ की ठो कळत नसलेले / त्याचे सध्याचे शिक्षक / इतर शिकलेली मंडळी या सगळ्यांचा समावेश असलेली मंडळी आहेत.

विषयांची विभागणी ४ भागांत आहे.
भाग 1 : अनिवार्य विषय : ( यातील सगळे विषय घ्यायचे आहेत.)
English Language
English Literature
Hindi
History Civics
Geography
-----

भाग २ : ऐच्छिक विषय : ( यातील कोणतेही दोन किंवा तीन विषय घ्यायचे आहेत.)
Science (Physics, Chemistry, Biology)
Environmental Science
Mathematics
Commercial Studeies
Economics

भाग ३ : ऐच्छिक विषय : ( यातील कोणतेही दोन विषय घ्यायचे आहेत )
Computer application (Java coding)
Commercial application
Economics Application
Environmental Application
Home Science
Physical Education
नोंद : यातील पहिल्या आणि शेवटच्या विषय घेऊ नये इतपत निर्णयावर घरातील सर्व सदस्यांचे एकमत झालेले आहे).

भाग 4 : श्रेणीबद्ध (ग्रेडेड) विषय : ( दोन्ही विषय घ्यायचे आहे पण पुढील वाटचालीच्या दृष्टिने यात मिळविलेल्या गुणांमुळे काही परीणाम होणार नाही. केवळ उत्तीर्ण होणे आवश्यक आहे)
Marathi
SUPW - Socially Usefull Productive Work

गुणविभागणी खालील प्रमाणे
Group 1
Theory Paper - 80 Marks
Internals - 20 Marks

Group 2

Theory Paper - 80 Marks
Internals - 20 Marks

Group 3
Theory Paper - 100 Marks
Internals - 100 Marks

वर जवळपास सगळीच माहिती दिली आहे तरीही काही निसटले असण्याची शक्यता आहे. मुळ मुद्दा असा की गणित विषय न घेतल्यास पुढील आयुष्यात किती नुकसान होईल ? पुढील आर्थिक स्थितीवर कितपत परींणाम होऊ शकतो.
गणित निवडले आणि त्यात अपयश आले तर किती नुकसान होऊ शकेल याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे तेवढा भाग चर्चेला घेतलेला नाही पण तेव्हाचा आणि आताचा अभ्यासक्रम, करीअर ची क्षेत्र विस्तारीत / बदल झाल्यामुळे अचूकतेच्या जवळपास जाणारा अंदाज नाही.

प्रतिसादांच्या प्रतिक्षेत :

धन्यवाद !

कंजूस

गणित घ्यायचे नसल्यास सायन्स ही सोडा. भाषांवर लक्ष ठेवा. इकॉनॉमिक्स घ्या.

कंजूस

फिजिक्सला लागतं इतकं नसतं. संख्याशास्त्रासाठी सरासरी काढणे हा मोठा भाग. अर्थशास्त्रात टक्केवारी. फिजिक्सला. डेरिवेशन, इंटिग्रेशन आणखी कायकाय.

श्रेणीबद्ध (ग्रेडेड) विषय: १० साठी मराठी ग्रेडेड विषय नाही. त्याचे गुण बेस्ट ऑफ ५ मध्ये पकडले जातात. पण स्वानुभवावरुन सांगु शकतो की ICSE १० वी मराठी हाय मुलांना हाय लेव्हलचे पडते.
जर तुमच्या मुलाला गणीतात गती आणी उत्तम मार्क मिळत असतील तर गणीत न सोडणे. भाग ३ ऐच्छीक मधे Computer application (Java coding) मधे हाय लेवेल जावा कोडींग असते पण बाकी विषय त्यामाने सोपे असतात.
अधीक माहीतीकरता व्यनी करा.

कंजूस : आपण नेहमीप्रमाणे टू द पॉईंट
स्वच्छंदी_मनोज : धन्यवाद, गणितात उत्तम गती कशाला म्हणायचे मला नक्की नाही सांगता यायचे. ८ वी वार्षिक परीक्षेत (७० पैकी ६० गुण उत्तम म्हणावेत काय ? )
मात्र गती असणे / नसणे यापेक्षा त्याला त्याची नावड उत्पन्न झाली आहे की भीती वाटते ते नाही सांगता येत. गणित नाही घेतले आणि सायन्स घेतले तर त्यात देखील गणिते असतात असे त्याला काही पालकांनी समजावून सांगीतले पण सायन्स (फिजिक्स) मधील गणिते निखळ गणितापेक्षा तुलनेने सोपी असतात (म्हणजे त्यात फार विविधता नसते) असा मुलाचा बचाव आहे.

स्वानुभव.

एक मुलगी गणितातली किडा.गणीत शास्त्र घेऊन इंजिनिअरिंग केले. इमेज प्रोसेसींग विषय घेऊन एम टेक केले.

दुसरी तेव्हढीच हुषार पण गणीत घेणार नाही ,हट्ट धरून बसली. बी डी एस ला सीट मिळाली पण ती पण सोडली व मायक्रो बायॉलॉजी, बायो मेडीकल जेनेटिक्स व बायोटेक्नॉलॉजी व सरते शेवटी एम बी ए करून आता सेटल झालीये.

सांगण्याचा उद्देश आजकाल शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल झालाय. आईवडिलांच्या पेक्षा मुलांना जास्त माहीत आहे.

मुलाचे मत समजून घ्या. झुलाॅजी केल्यास पुढे काय स्कोप व काय अडचण हे पण त्याला समजून घेऊ द्या. कदाचित विचार बदलू शकतो. टाॅम डिक हॅरी बरोबर चर्चा करण्या पेक्षा एखाद्या तज्ञांची मदत घ्या. झुलाॅजी मध्ये नेमके काय अपेक्षित आहे ते विचारून घ्या.

सुरवातीलाच एखाद्या विशिष्ट विषयावर लक्ष केंद्रित केल्यास पुढे इतर रस्ते पण खुले असतील या कडे पण लक्ष असू द्यात. वेळ पडल्यास त्याचा उपयोग करता येईल. स्पर्धा परीक्षेतील यशावर बरेच काही अवलंबून असते. ते सुद्धा लक्षात घेणे जरूरी आहे

बरेच काही सांगता येईल. मुळ मंत्र, काहीही करा पण आपल्या विषयचे शिखर गाठा. एवढेच म्हणेन.

मुलाला पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा. माझा स्वताचा प्रवास व्य नि करेन.

सहमत आहे...

ह्या समाजात, सर्व प्रकारच्या कौशल्याची माणसे लागतात.

एक वैयक्तीक निरिक्षण सांगतो.

इंग्रजी व्यतिरिक्त , निदान एक तरी परदेशी भाषा नक्कीच शिकवा. माझी बायको जर्मन भाषा शिकवते आणि मुलगा फ्रेंच भाषा शिकवतो. दोघेही पोटा पाण्या पुरते कमावतात आणि ते देखील कुणाचीही गुलामगिरी न करता आणि लोकलचा प्रवास न करता..

डिस्क्लेमर.....

वरील निरिक्षण, हे माझ्या घरातील असल्यानं, इतरांचे निरीक्षण वेगळे असू शकते... त्यामुळे, माझ्या पुरता तरी हा प्रतिसाद संपला....कुणी वाद घालायचा प्रयत्न केला तरी, मला त्याच्या बरोबर वाद घालायची इच्छा नाही...

सुबोध खरे

you should have employable skill.

आपल्याला नोकरी किंवा व्यवसाय करता येऊ शकेल असे कौशल्य मिळवा.

उगाच "प्राचीन पद्य वाङ्मयाचा इतिहास" यात पी एच डी केले तर फार तर प्राध्यापक म्हणून नोकरी मिळू शकेल.

पण आपल्याला शिकवायची साफ नावड असेल तर अशा कौशल्याचा व्यवहारात काय उपयोग?

व्यवसाय मार्गदर्शन केंद्रात मुलाची आवड कल आणि बुद्धिमत्ता याचा अभ्यास करून घ्या.

या तीन गोष्टी वेगळ्या आहेत.

शहरात सर्व मुलांना बालपणी सैनिक वैमानिक व्हायची आवड असते आणि पूर्वी खेड्यातील मुलांना एस टी चा ड्रायव्हर व्हायची आवड असे.

पण जसे वय वाढत जाते तशा या आवडी बदलत जातात.

बुद्धिमत्ता -- कित्येक अत्यंत हुशार मुलांना जीवशास्त्रबद्दल अत्यंत तिरस्कार असतो जी पुढे जाऊन उत्तम अभियंते बनतात.

या मुलांना डॉक्टर होण्याची बुद्धिमत्ता असते पण कल अजिबात नसतो.

तेंव्हा आपल्या मुलाचा कल काय आहे हे व्यवसाय मार्गदर्शन केंद्रात जाऊन प्रथम तपासून पहा.

मुलाला त्याची आवड आणि कल काय आहे आणि त्याचा व्यवहारात उपयोग कितपत आहे याबद्दल समुपदेशन करा.

तांदुळाच्या दाण्यावर तुमचे नाव लिहीणार्या किंवा रस्त्यावर १५ x १५ फुटाचे चित्र काढून पैसे गोळा करणाऱ्या माणसाचे कौशल्य उत्तम दर्जाचे असले तरी त्याचा व्यवहारात काहीही उपयोग होत नाही.

तेंव्हा मुलाला हौस/ छंद आणि व्यवहार यात फरक काय हे समजावून सांगा.

अनेक छंद आणि आवडी या भरल्या पोटावर करायच्या गोष्टी आहेत.

आपल्या मुलाला वडिलोपार्जित भरपूर संपत्ती मिळणार असेल तर गोष्ट वेगळी.

उरला विषयांची निवड

अनिवार्य विषयांबद्दल बोलायची गरज नाहीच

ऐच्छिक विषयाबद्दल

अभियांत्रिकीची आवड असेल तर गणित घ्यायलाच लागेल. प्रत्यक्ष अभियांत्रिकीत त्याचा कितपत उपयोग होतो हा एक फार वेगळा मुद्दा आहे परंतु पात्रतेसाठी तो विषय म्हणून आवश्यक आहे

त्याला शास्त्र आणि गणित याची नावड असेल तर ते वगळून विषय घ्या.

त्याला कला किंवा पत्रकरिता याची आवड असेल तर भाषा घ्या आणि

कॉमर्स चि आवड असेल तर अर्थशास्त्र आणि त्याच्याशी संबंधित विषय घ्या.

आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला आणि मुलाला शुभेच्छा

हे आणि असे प्रश्न प्रत्येक पालकाला पडत असतात आणि काउन्सेलिंग करणारे पण खुप असतात. मी माझ्या मुलांचे कौन्सेलिंग करुन घेतले त्या एका एक्स्पर्ट माणसाची माहीती देत आहे(पुण्यात). अधिक माहीती ईथे मिळेल

https://neuflextalent.com/

https://www.youtube.com/watch?v=UGq9TisFF8M

यांचे बरेच ईतरही व्हिडिओ ईथे मिळतील
https://www.youtube.com/watch?v=Y5YZckB0xHk

अजुन एक--ज्ञानप्रबोधिनीची टेस्टही बरीच फेमस आहे. चौकशी करुन बघा. शेवटी काय? मुलाचे भले झाले पाहीजे. आपले डोके चालवण्यापेक्षा पैसे टाकुन तज्ञाचे मत घेतलेले बरे.

कंजूस

गणिताशिवाय फिजिक्स कामाचे नाही.

झुऑलजी आणि इनवायरनमेंट जोडीचे विषय आहेत. यांचे महत्त्व पुढे वाढणार आहे. मेडिकल सायन्सेसला लागेल.

आवड नाही पण हुशारीमुळे चांगले गुण मिळतात. पण पुढे विषय किचकट होत जातो. कंटाळा येतो.

इकनॉमिक्स एक चांगला विषय आहे. सर्व क्षेत्रांत तो लागतो.

जर्नालिझम आता नसतो पण पुढे यातला एखादा छोटा कोर्स करावा. धीटपणा,लोकांशी बोलणे हे कामाचे आहे.

BMC उर्फ डीग्री इन मास काम्युनिकेशन हेसुद्धा पुढे वाढणार आहे. तर यांना गणित लागत नाही. सामान्य ज्ञान आणि संपर्क कामाचे.

लेख योग्य वेळी आला. आता पुढील दोन वर्षे वर्तमानपत्रांत दर आठवड्याला carreer चे पान येते ते जमा करून ठेवा.

सुखीमाणूस

मुलाच्या पुढील शिक्षणासाठी प्रथम खालील गोष्टींची माहिती करून घ्या.
इयत्ता नववी मध्ये घेतलेले विषय 12 वी पर्यंत अभ्यासक्रमात असणार आहेत का? की दर वर्षी एक किंवा दोन विषय कमी करता येणार आहेत?
१२ वी नंतर प्राणीशास्त्र विषयातले शिक्षण कुठून घ्यायचा विचार केला आहे? तिथे प्रवेश घेण्यासाठी गणित आवश्यक आहे का? हल्ली बऱ्याच वेळा उच्च शिक्षण संस्थांच्या प्रवेशपरीक्षा असतात. तिथे गणिताचा अभ्यासक्रम असू शकतो.
किमान दहावीपर्यंत तरी गणिताचा अभ्यासक्रम शिक्षणात ठेवावा. तोपर्यंत म्हणजे अजून दोन वर्षांनी त्याला देखील अंदाज येईल की त्याला पुढे काय करायचे आहे?
भाग ३ ऐच्छिक विषयात economics,environmental आणि commercial application निवडीसाठी उपलब्ध आहे. म्हणजे भाग २ मधील हे विषय न घेता भाग ३ मधून त्यांच्या निवडीचा फायदा घेता येईल.

कंजूस

स्पर्धा परीक्षांचे गणित म्हणजे अपुर्णांक, टक्केवारी, सरळ आणि चक्रवाढ व्याज काढणे इत्यादी असते.

वामन देशमुख

एक करीअर म्हणून फॉरेन्सिक सायन्सचा कुणी धांडोळा घेतला आहे का?

सगळ्या प्रतिसादकर्त्यांचे आभार !
विचार करुन सध्या
Science (Physics, Chemistry, Biology)
Environmental Science
Mathematics

हे विषय घ्यायचे ठरविले आहे. ऑगस्ट पर्यंत विषय बदलायला वेळ असतो. तोपर्यंत काही वेगळा विचार झाल्यास तसे ठरविता येईल.

या विषयांमुळे पुष्कळ वाटा खुल्या होतात. पुढील वाटचालीस शुभेच्छा.

माझे कळालेले जीवनसार म्हणजे माणसाला आयुष्यात एकदाच मेहनत करावी लागते. ती कधी करायची तरुणपणी का म्हातारपणी. आमच्या कुटुंबातील सर्व होतकरू मुलांना मी नेहमी सांगतो.

एव्हढा संदेश पटला तर तुमच्या मुलाला सांगा.

एक तर, त्रिशूल मधला विजय तरी बनायचे किंवा अवतार मधला अवतार किशन...

चौथा कोनाडा

रोचक धागा आणि माहितीपूर्ण प्रतिसाद !

यावरून एका जवळच्या पोराचा विषय सांगतो.
९ वी - १० वी पासून अभ्यास हल्क्यात घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे ११ -१२ वी मुख्य महत्वाचे कॉलेज मिळाले नाही.
१२ वी सायन्स घेऊन ठाकठीक गुण मिळवले. १२ वी नंतर करेन तर फक्त इंजिनियरिंग तेही फक्त मॅके, सिव्हिलच करणार,
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आवडत नाही, सॉफ्टवेअर आवडत नाही, प्रोग्रामिंग करायला अजिबात आवडत नाही अशा सगळ्या अटी. मग प्रोडक्शन इंजीनियरिंग केले. नशिबाने एका बऱ्या कंपनीत निवड झाली आणि आता चार-पाच वर्षानंतर सॉफ्टवेअर कन्सल्टन्सी कंपनीत सायबर सिक्युरिटी आणि रिस्क मॅनेजमेंट विभागात आहे.
त्याच्या भवितव्याविषयी सगळा अंधार, अंधार आणि काळजी वाटायची
कसं काय कल ओळखायचे आणि कसं काय करिअर प्लॅनिंग करायचे हा सगळा प्रश्नच आहे !

सुबोध खरे

https://www.misalpav.com/node/27959

दहा वर्षांपूर्वी मी लिहिलेल्या लेखाचा दुवा दिला आहे.

मागे वळून पहाताना आज मला अतिशय समाधान होते आहे.

दहा वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

मुलाला मुंबईतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिलला (त्याच्या आवडीप्रमाणे) प्रवेश मिळाला.

त्याला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आवडत नाही, सॉफ्टवेअर आवडत नाही, प्रोग्रामिंग करायला अजिबात आवडत नाही असेच होते.

पण चार वर्षे अभियांत्रिकी केल्यावर त्याने GRE परीक्षा दिली. त्यात अतिशयउत्तम गुण मिळाले (३२६) या गुणांवर त्याला अमेरिकेत सर्वोत्तम अशा दहा महाविद्यालयात प्रवेश मिळू शकला असता असा अंदाज आहे.

पण तो म्हणाला मला नोकरी करायची आहे. त्याला स्वतःच्या गुणवत्तेवर एक कंपनीत ठीक ठाक पगाराची नोकरी मिळाली. त्यात त्याने मुंबईतील ५० पैकी ४४ सर्वात उंच इमारतींवर काम केले. दोन वर्षांनी म्हणाला मला अमेरिकेत जायचे नाही. मी CAT देणार आहे. CAT बरोबर NMAT आणि SIBM च्या परीक्षा दिल्या.

त्यात CAT मध्ये ९६ % मिळाले. पण NMAT आणि SIBM दोन्ही उत्तम गुण मिळाल्यामुळे दोन्हीकडे प्रवेश मिळत होता. NMAT मधून मुंबई च्या NMIMS मध्ये प्रवेश घेतला.

दोन वर्षानंतर त्याने फिनान्स किंवा मार्केटिंग मध्ये जास्त पगार मिळत असूनहि सिव्हिल अभियांत्रिकीमध्येच काम करायचे म्हणून थोड्या कमी पगाराची नोकरी पत्करली.
त्याने सांगितले चार वर्षे अभियांत्रिकीची आणि अडीच वर्षे नोकरीची हा साडे सहा वर्षाचा अनुभव फुकट घालवून केवळ दीड पट पैसे मिळतात म्हणून मला फिनान्स किंवा मार्केटिंग मध्ये जायचे नाही. उद्या त्या गोष्टी मला आवडल्या नाहीत तर आयुष्यभर मला नावडत्या नोकऱ्या करत राहायला लागेल.
आम्ही त्याला सांगितले कि तुला किती पगार मिळतो त्याचा आमच्या प्रतिष्ठेवर काहीही परिणाम होणार नाही. तुला ज्यात आवड आहे तीच गोष्ट आयुष्यभर कर.

हा थोडा कमी पगार सुद्धा सज्जड पगार आहे अशी स्थिती आहे.

तात्पर्य-- मुलाला काय करायचे आहे ते त्याला ठरवू द्या. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात एक वळण येते जेथून त्याच्या प्रगतीचा मार्ग वेगाने चालू होतो.आपले मूल आय आय टी मध्ये गेले नाही म्हणून आपले आयुष्य फुकट जात नाही.

घटा घटाचे रूप आगळे...

माझ्या चुलत भावाचा मित्र, केमिकल इंजिनियर आहे आणि सध्या तो एका कंपनीत फायनान्स मॅनेजर आहे. ह्या कंपनीचा आणि केमिकल्सचा काहीही संबंध नाही.

मनस्विता

मी हा प्रतिसाद लिहीपर्यंत कदाचित तुमचा निर्णय घेऊन झाला असेल. पण तरीही इतर कोणासाठी उपयुक्त ठरला तर ठरावा म्हणून लिहून ठेवत आहे.

बऱ्याचदा आपण असं पाहतो की मुलं हुशार असतात पण गणित आवडत नसतं. ह्यात मुख्य कारण असं वाटतं की गणितात तुम्हाला लक्ष देऊन, विचार करणे आणि वेगवेगळे बिंदू जोडून उत्तर मिळवायचे असते. Many times it needs a conscious effort. हे करायचा मुलांना कंटाळा असतो.

बऱ्याचदा स्मरणशक्ती चांगली असते त्या जोरावर इतर विषयांमध्ये चांगले मार्क पडतात. त्यामुळे तोवर चालून जात असते.

बऱ्याचदा असं युक्तिवाद केला जातो की आपण जे गणित शिकतो ते कुठे वापरतो? कित्येकदा आपल्या दैनंदिन आयुष्यात नक्कीच वापर करत नाही. (ह्यात अंकगणित गृहीत धरलेले नाही. कारण गणित म्हणजे फक्त अंकगणित आणि आकडेमोड नसते.) पण गणिती पद्धत ही एक विचारधारा असं आपण मानू शकतो. आपल्याकडे दिलेल्या गोष्टी काय आहेत, आपली काय गृहीतकं असू शकतात आणि आपल्याला नेमकं काय शोधायचं आहे ही विचारसरणी गणितात लागते. आणि असाच विचार बऱ्याचदा आपल्याला दैनंदिन आयुष्यात करावा लागतो.

आता आपण दहावीनंतर गणित विषय न शिकता जीवशास्त्र शिकायचे म्हटले तरी किमान अकरावी-बारावी आणि कित्येकदा त्यानंतरही Physics आणि chemistry हे विषय शिकावे लागतात. आणि त्यामध्ये अनेक संकल्पना गणितावर आधारित असतात. त्यामुळे एका टप्प्यापर्यंत गणिताला नाकारून चालत नाही. NEET ची तयारी करणाऱ्या कित्येक विद्यार्थ्यांना गणिताची भीती असल्याने Physics आणि chemistry शिकताना त्रास होऊ शकतो.

त्यामुळे गणित विषय सोडण्याच्या पर्यायाचा विचार करताना वरील काही मुद्दे अवश्य विचारात घ्यावे.