पाकिस्तान- १०
Primary tabs

चार वर्षा आधी (2020), इम्रान खानच्या एका विधानाने ट्विटरवर वादळ उठले होते. तो म्हणाला होता, “जेव्हा भारतीय क्रिकेट संघ खेळायला आला होता, तेव्हा नाणेफेक करताना मला त्यांच्या कर्णधाराची कीव यायची. त्याला पराभवाची भीती वाटायची.”
साहजिकच तो खूप ट्रोल झाला पण ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आपण बहुतेक वेळा पाकिस्तानला जिंकताना पाहिले. 2004 पूर्वी भारत पाकिस्तानमध्ये एक सिरीजच काय एक कसोटी सामनाही जिंकू शकला नव्हता. गावस्कर आणि अझरुद्दीनचा संघही अपयशी ठरला. भारतानेही त्यांना सहजासहजी जिंकू दिले नाही. वीसपैकी पंधरा टेस्ट ड्रॉ झाल्या. दोन्ही बाजूंनी खेळ बरोबरीचा राहिला. ते आपापसात बदला घेत असत. 2004 मध्ये पराभूत झाल्यानंतर पुढच्या वर्षी पाकिस्तान संघ भारतात आला तेव्हा त्यांनी कसोटीत बरोबरी साधली पुढच्या वर्षी भारत पाकिस्तानकडून पराभूत होऊन परतला. त्यानंतर संघ पुन्हा कधीच गेला नाही. इथे क्रिकेट या करता आणतोय की 1965 चे युद्ध कोणी जिंकले याचे उत्तर देणे कठीण आहे. हा सामना भारत जिंकला की हरला की अनिर्णित राहिला? हे युद्ध दोन्ही देशांमध्ये साजरे केले जाते. पाकिस्तान दरवर्षी 6 सप्टेंबर रोजी संरक्षण दिन साजरा करतो तर भारत हाजी पीर खिंडीचा विजय साजरा करतो. 1965 च्या युद्धात कच्छला पहिली टेस्ट मानली तर तिथे पाकिस्तानने चांगली ताकद दाखवली. पण, काश्मीरमध्ये ऑपरेशन जिब्राल्टर अयशस्वी झाले. भारताला घुसखोरीची माहिती मिळताच तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. शेख अब्दुल्ला यांना तीन वर्षे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. भारतीय लष्कर घुसखोरांचा शोध घेत होते आणि त्यांना अटक करत होते किंवा त्यांना ठार मारत होते. एवढेच नाही तर भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त सेक्टरमध्ये प्रवेश केला आणि 28 ऑगस्ट रोजी हाजी पीर खिंडीवर ध्वज फडकवला. अशाप्रकारे पाकिस्तानची भूमी भारतानेच प्रथम काबीज केली.
त्याबदल्यात पाकिस्तानने ऑपरेशन ग्रँडस्लॅमची तयारी केली होती. काश्मीरमधील अखनूर पूल तोडून भारताला काश्मीरपासून पूर्णपणे तोडण्याची त्यांची योजना होती. चिनाब नदीवरील हा पूल जुना होता आणि तो तोडण्यास सोपा होता. हा पूल तुटताच काश्मीर भारतापासून वेगळे होणार असल्याची चुकीची माहिती अयुब खान यांना देण्यात आली होती. हा पूल महत्त्वाचा होता, पण हा एकमेव मार्ग नव्हता ज्यातून लष्कर काश्मीरमध्ये पोहोचू शकत होते.

पण, अखनूरची लढाई हरण्याची भारताची स्थिती होती. भारतीय सैन्याच्या तेथे चार लहान बटालियन होत्या, ज्या पाकिस्तानच्या रणगाडा आणि शस्त्रास्त्रांशी लढू शकत नव्हत्या. अखनूरमध्ये पाकिस्तानी लष्कराची तुकडी भारतीय तुकडीपेक्षा सहापट मोठी होती. त्यांचा हल्ला पहिल्या सप्टेंबरलाच झाला होता आणि भारताकडे वेळ कमी होता. मग काही अज्ञात कारणास्तव पाकिस्तानने कमान बदलली आणि युद्ध दोन दिवस टळले. आता जनरल याह्या खान स्वतः कमांड घेणार होते. ते येई पर्यंत भारतीय सैन्याने आपले सैन्यबळ वाढवले. तरीही हा पूल वाचवणे अवघड झाले होते. ते त्यांना थोडा वेळच थांबवू शकत होते. नियंत्रण रेषा ओलांडण्याचे प्रकार यापूर्वीही काश्मीरमध्ये होत असत. दोन्ही बाजूंनी. पण, अशी परिस्थिती क्वचितच उद्भवली की युद्ध घोषित करावे लागेल. आता भारताकडे संपूर्ण युद्धाशिवाय पर्याय नव्हता. त्यानंतर भारतीय लष्कराने एक आघाडी उघडली ज्याने पाकिस्तान हादरला. 5 सप्टेंबरच्या रात्री, सैन्य लाहोरच्या दिशेने जाऊ लागले आणि सकाळी ते लाहोरच्या बाहेर उभे राहिले.
आता काश्मीर महत्त्वाचे की लाहोर हे पाकिस्तानला ठरवायचे होते.
(क्रमश:)
मूळ लेखक - प्रविण झा.
पुस्तक - दास्तान- ए- पाकिस्तान.
प्रकाशक- ई संपदा प्रकाशन.
https://esamaadprakashan.com/books/dastan-e-pakistan/
वाचतोय. पुभाप्र.
-दिलीप बिरुटे
१९६५ साली मी १३ वर्षांचा होतो. थोडेफार कळू लागले होते. रेडिओ आणि छापील दैनिके याद्वारा बातम्या जनतेपर्यंत पोहोचत असत. युद्धवार्तातला थरार प्रत्यक्ष अनुभवला आहे. मुंबईतल्या ब्लॅक आऊटमुळे थरार प्रभावी झाला होता. लोक उत्स्फूर्तपणे ब्लॅक आऊटच्या नियमांचे पालन करीत. काही वेळा बॉम्बहल्ल्यांचे भोंगे वाजले होते. बॉम्बहल्ला सुरू होतांना भोंग्यांचा स्वर उंचसखल होई तर संपल्यावर स्वर उतरता असे. कांही वेळां रात्री भोंगा वाजल्यावर विमानविरोधी तोफांमधून निघालेले ट्रेसर बुलेट्स् चे लाल प्रकाशमान गोळे आकाशातून वेगाने जातांना पाहिले आहेत.
नंतरच्या काळात खेळात वाताहत झाल्यावर बातमीत खेमकरण झाले असा शब्दप्रयोग केला जाई.
मालिका छान चालली आहे. धन्यवाद.
धन्यवाद.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
उत्तम .. पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत ..
जाताजाता ... याच वर्षी लडाख मधल्या तुर्तुक गावात दोन दिवस मुक्काम केला होता ... १९६५ च्या युध्दात हे गाव पाकिस्तानात होते
१९७१ च्या युध्दात भारताने हे गाव काबीज केले. या गावाचे सामरिक महत्व इतके होते कि आर्मी ने हे गाव परत देण्यास चक्क नकार दिला आणि राज्यकर्त्यांना हे मान्य करावे लागले ..
आजही गावात युद्धाच्या खुणा दिसतात ... पाकिस्तानचे जुने बंकर (पडीक) तसेच आहेत .. आत्ताची बॉर्डर येथून वीस किलोमीटरवर आहे