डॉ. ब्रायन वाईस ह्यांचं पुस्तक!
Primary tabs
कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि येल मेडिकल स्कूलचे पदवीधर आणि मियामीतील मानसशास्त्राच्या संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. ब्रायन वाईस अतिशय तणावात असलेल्या व अस्थिर अशा कॅथरीन ह्या तरुणीवर मानसोपचार करतात. तिला होणार्या त्रासाचं मूळ तिच्या जीवनातल्याच काही अनुभवांमध्ये असावं असं मानून ते तिला बोलतं करतात. तिने अधिक बोलतं व्हावं आणि हलकं व्हावं म्हणून ते तिला ट्रान्समध्ये नेतात आणि तिच्या आठवणी सांगायला सांगतात. कॅथरीन तिचे अनुभव- आठवणी सांगत जाते. थेरपीचे काही सेशन्स होऊनही तिची अस्थिरता थांबत नाही. म्हणून डॉ. वाईस तिला आणखी लहानपणीचे अनुभव विचारतात. एका वेळी ती सांगते की, मी तीन वर्षाचे होते तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्यावर अत्याचार केला. त्यामुळे मी अजूनही त्यांना घाबरते. त्यावेळी तिच्या निरागस मनामध्ये भावना असते की, बाबा माझ्याशी असं वागले म्हणजे मीच काही तरी चुकले असणार! आणि हळु हळु हे पुस्तक वाचताना आपल्याला एकामागोमाग एक धक्के बसण्याची फक्त सुरूवात होते.
डॉ. वाईसचा अनुभव असतो की, आपल्या आयुष्यातल्या अशा असंख्य भल्या- बुर्या अनुभवांचं इंप्रिंट आपल्या मनावर असतं आणि केवळ ते अवचेतन (अनकॉन्शस) मनामध्ये असल्यामुळे आपल्याला जाणवत नाही. अनेक गंभीर तक्रारी असलेल्या मनोरुग्णांवर उपचार करणारे डॉ. वाईस कॅथरीनच्या बाबतीत काही करू शकत नाहीत. तिच्या सगळ्या आठवणी समोर येऊन आणि अनेक आठवडे थेरपी होऊनही तिची अस्थिरता काही संपत नाही. तिच्या वागण्यामध्ये अनियमित ताण असतो. अनेक गोष्टींची भिती तिला वाटत असते. तर कधी विमानाला प्रचंड घाबरणारी असूनही ती इजिप्तला जाते. आणि विलक्षण बाब म्हणजे पहिल्यांदाच इजिप्तला जात असूनही तिथे फिरताना तिथल्या गाईडच्या सांगण्यातल्या चुका ती दाखवून देते! कॅथरीन डॉ. वाईससाठी एक प्रश्नचिन्ह बनते. अखेर ते तिच्यावर हिप्नोसिस थेरपी वापरायचा निर्णय घेतात.
(असे इतर लेख माझ्या ब्लॉगवर उपलब्ध- http://niranjan-vichar.blogspot.com/2024/04/blog-post.html )
१९७९ मध्ये ह्या घडलेली ही सत्य घटना आहे! हिप्नोसिस थेरपीमध्ये ट्रान्समध्ये गेल्यावर ते तिला नेहमीप्रमाणे प्रश्न विचारतात. एका वेळी ती अचानक वर्णन सुरू करते की, ती शेतावरच्या तिच्या घरी आहे. तिथे अनेक जनावरं आहेत. तो अगदी डोंगराळ भाग आहे. तिच्या कुटुंबियांनी असे असे कपडे घातलेले आहेत. डॉक्टरांना प्रश्न पडतो की, ती तर अमेरिकेत शहरात वाढलेली मुलगी. हे वर्णन कसं काय सांगेल? मग ते तिला प्रश्न विचारून बोलतं करतात. तेव्हा ती सविस्तर वर्णन करते. तो काळही अगदी वेगळा असतो. तेव्हाची वेशभुषा- राहणीमान सगळं वेगळं असतं. मग ते तिला वर्ष कोणतं आहे हे विचारतात. तेव्हा ती सांगते साधारण १६४६! आणि गावाचं नाव व कुटुंबियांची नावं युरोपियन असतात. प्रस्थापित मानसशास्त्र आणि विज्ञानामध्ये शिकलेले डॉक्टर अवाक् होतात. पण मग त्यांना मानसशास्त्रातली पास्ट लाईफ रिग्रेशन ही संकल्पना आठवते ज्यावर त्यांचा काडीमात्र विश्वास नसतो. पण पुढच्या अनेक सत्रांमध्ये त्यांना कळत जातं की, कॅथरीन जे अनुभव सांगतेय ते तिचे वेगवेगळ्या जन्मातले अनुभवच आहेत! तीन वर्षाची असतानाच्या आठवणी जशा मनामध्ये खोलवर जतन केल्या गेल्या आहेत, तशाच पूर्वजन्मातल्या स्मृतीही आहेत. कारण हे वर्णन व आठवणी सांगताना तिचा सूर स्वाभाविक असतो. शिवाय इतक्या खोलवर ट्रान्समध्ये नेल्यावर कोणी खोटं कसं बोलेल आणि बोललं तरी ते कळेल ना.
कॅथरीनच्या बोलण्यातून डॉक्टरांना कळतं की, अनेक जन्मांमध्ये तिला भेटलेले काही जण ह्या जन्मातही तिच्यासोबत आहेत. अगदी ते स्वत:ही एका जन्मात तिचे शिक्षक होते व त्यांच्याबद्दल तिला खूप आदर होता. आणि त्याबरोबर काही खूप नकारात्मक अनुभवही तिला आलेले आहेत ज्याचे खूप गहिरे इंप्रिंट्स तिच्या मनावर आहेत. एका जन्मात ती बुडाल्यामुळे तिला पाण्याची फार भिती वाटते. काही लोकांचे खूप नकारात्मक अनुभव आल्यामुळे ती लोकांसोबत वावरताना भिते. आणि एका जन्मात ती इजिप्तमध्येही राहिलेली असल्यामुळे तिच्या मनात त्याही स्मृती आहेत. अशी सगळी संगती त्यांना लागत जाते. आणि इतक्या वेगवेगळ्या जन्मातल्या आठवणी जशा ती व्यक्त करत जाते, तसे तिचे लक्षणं कमी होत जातात. तिची अस्थिरता कमी होत जाते.
हे सर्व सांगताना ती डॉक्टरांना इतरही काही माहिती सांगते. एका जन्मात तिचा मृत्यु झाल्यावर तिला उन्नत चेतना- मास्टर्स मार्गदर्शन करतात असं ती सांगते. किंबहुना अनेक जन्म- मृत्युच्या चक्रामध्ये असे अनेक मास्टर्स तिला मार्गदर्शन करतात, ह्या जन्मात तू काय शिकलीस व तुला पुढे काय शिकायचं आहे हे सांगतात. इतकंच नाही तर खोलवर ट्रान्समध्ये ती बोलत असताना तिच्या माध्यमातून काही मास्टर्स म्हणजे उच्च चेतना डॉ. वाईसशी बोलतात. त्यांचा बोलण्याचा सूर, अधिकारवाणी, हळुवारपणा ह्यांचं वर्णन त्या पुस्तकातच वाचायला पाहिजे. ह्या मास्टर्सचं सांगणं असतं की, ज्याप्रमाणे एका जन्मात माणूस शिकत पुढे जातो, त्याचे साथीदार मिळतात, त्याच प्रमाणे अनेक जन्मांमध्येही माणूस पुढे शिकत जातो व त्याला अनेक जन्मांमध्ये सोबत असलेले सोबतीही मिळतात- Groups of souls travel together! आणि मग ते मास्टर्स डॉक्टरांना त्यांच्या जीवनातल्याही काही प्रसंगांबद्दल सांगतात. जसं डॉक्टरांचा पहिला मुलगा जन्मानंतर अगदी लगेचच दुर्मिळ आजाराने गेला. त्यांच्या नंतरच्या अपत्याचं नाव त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावरून ठेवलं होतं.
आधी अशा संकल्पनांबद्दल पूर्ण अविश्वास असलेले डॉक्टर आता मात्र हे सत्य नाकारू शकत नाहीत. त्यांना प्रत्यक्ष प्रमाण- स्वत:चं उदाहरण मिळालेलं असतं. त्यांचं वैद्यकीय व मानसशास्त्राचं ज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतीने ते ह्याचा छडा घेतात. आणि मग ह्या दिशेने इतर काही मानसशास्त्रज्ञांनी केलेलं कामही अर्थपूर्ण वाटतं. असं हे अतिशय थरारक अनुभव देणारं पुस्तक. वयाच्या चौथ्या वर्षी स्टेफी ग्राफ रॅकेट हातात कशी घेते, बीथोव्हेन अगदी कमी वयात कसे जादुई सूर निर्माण करतो किंवा अनेक वैज्ञानिक शोध हे स्वप्नावस्थेमध्ये किंवा खोलवरच्या तल्लीन ट्रान्समध्ये कसे लागले आहेत, अशा गोष्टींमधला अर्थही हे वाचताना कळतो! त्याबरोबर जीवन हे एक विद्यापीठ आहे आणि जीवन हे प्रचंड अर्थपूर्ण आणि सखोल आहे ही जाणीव आपल्याला होते. पुस्तकाचं नाव- Many lives, many masters. लेखक- Dr. Brian Weiss. त्यांचे अनेक पोडकास्टस आणि मुलाखतीही युट्युबवर उपलब्ध आहेत.
(वाचल्याबद्दल धन्यवाद! निरंजन वेलणकर 09422108376 फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, ट्रेकिंग, मुलांचे ज्ञान- रंजन सेशन्स आयोजन)
जाणकारांचे मत जाणण्याची उत्सुकता !
मी जानकार नाही, म्हणून मला मत नाही. पण
पुढील जन्मात ह्या जन्मातल्या चुका सुधारून काय करायचे आहे त्याची मोठ्ठी यादी करून ठेवली आहे.
तुम्ही हे कष्ट घ्यायची जरुरी नाही. चित्रगुप्त (मिपा सदस्य नव्हे) यांचे तेच काम आहे. तुम्ही गोलमाल कराल तो नाही करणार.
चित्रगुप्ताच्या वहीवरून तर देव मला गाढवाच्या जन्माला पाठवेल. काहीतरी करायला पाहिजे.
सध्याच्या जन्माबद्दल गैरसमज असावा तुमचा. :)
चलो इस बार छोड देता हू. अगले जनममे देख लुंगा.
आहो पण इथले सर्व इथेच सोडून जावे लागते म्हणतात.
मला विंदा आठवले.
माझी न घाई कांहिही, जाणून आहे अंतरी,
लागेल जन्मावें पुन्हा नेण्या तुला मझ्या घरी.
तू झुंजुमुंजू हासशी, जाईजुईचे लाजशी;
मी वेंधळा मग सांडतॉ थोडा चहा बाहीवरी.
तू बोलतां साधेसुधें सुचवुन जाशी केवढे,
मी बोलतो वाचाळसा अन् पंडीती काहीतरी.
होशी फुलासह फूल तू अन् चांदण्यासह चांदणे,
ते पाहणे, इतकेंच मी बघ मानलें माझ्या करी.
म्हणतेस तू, “मज आवडे रांगडा सीधेपणा!”
विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दांवरीं.
लिहिती बटा भालावरी ऊर्दु लिपींतिल अक्षरें;
हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी.
व्वा. काय कविता शोधून काढली आहे.
अगदी. एक नंबर
आपल्या मनाच्या अगदी खोलवर 'इथल्या' च्या पलिकडले, मनुष्य-जातीच्याच काय पण त्याआधीच्या काळातले पण खूप काही दडून राहिलेले असते, आणि झोपेत आपण त्यात वावरत असतो, असे म्हणतात. कधी कधी स्वप्नावस्थेतून जागे होता होता, त्याची किंचित चुणूक आपल्याला मिळत असते. माझ्या आत्ताच लिहीलेल्या इथल्या प्रतिसादात तसेच अनुभव दिले आहेत.
अतिशय रोचक माहिती आहे.
माझे वय सध्या ७२ वर्षे आहे. सुमारे दोन-तीन वर्षांपासून (सत्तरीत शिरल्यापासून) मला जी स्वप्ने पडतात, त्या सर्वात एक समान धागा असतो, तो म्हणजे मी खूप उंचावर कुठेतरी अडकलेलो, लटकलेलो, लोंबकळत आहे, उदाहरणार्थ एकाद्या खूप उंच किल्ल्याच्या तुटक्या भिंतीवर, एकाद्या भव्य घुमटाच्या आतल्या बाजूच्या खोबणीत वगैरे. खालून बरेच (अगदी अनोळखी) लोक माझाकडे बघत पुढे निघून जात असतात पण कोणीही कसलीही मदत करण्याचा प्रयत्न करत नाही. मी भयंकर घाबरलेला असतो, आणि त्यातच मला जाग येऊन पुढले एक दोन तास झोप येत नाही. स्वप्नात दिसणारे सगळे लोक अगदी अनोळखी असतात, आणि सगळ्या जागा पण कधी न बघितलेल्या, अंधार्या, भयानक असतात.
--- आणखी एक समान धागा म्हणजे बरेचदा मी माझ्या चित्रकलेच्या खोलीत एकटाच झोपलेला असतो तेंव्हाच ही स्वप्ने पडतात.
--- गेल्या अनेक वर्षात मी एकही 'हॉरर' चित्रपट बघितलेला नाही, अलिकडे मला तसले काही बघण्याची हिंमत होत नाही. झोपण्यापूर्वी मी बघितलेच तर 'हास्यजत्रा' सारखे विनोदी कार्यक्रमच बघतो.
आताशा मला वाटू लागले आहे की यांचा संबंध काही अगम्य, तर्कापलिकडील गोष्टींशी असावा.
फ्रॉईड किंवा इतरांनी स्वप्नांबद्दल जे काही संशोधन केलेले आहे, त्यात असले काही आहे का ? आणि ते संशोधन कसे करतात ? याबद्दल कुणाला माहीत असल्यास लिहावे.
अशी एक म्हण प्रचलित आहे.
स्वप्न आणी मनातील विचार याची सांगड घालता येते.
बाकी पुनर्जन्म वगैरे वर काही विश्वास नाही.
कबीरदास म्हणतात जे काही आहे ते इथेच स्वर्ग आणी नरक इथेच.
वहाँ न दोजख, बहिस्त मुकामा।
यहाँही राम, यहॉँही रहमाना।।
>>बाकी पुनर्जन्म वगैरे वर काही विश्वास नाही.
विश्वास असणे वेगळे आणि सत्य असणे वेगळे. विश्वास आहे म्हणजे ते सत्य असते असे नसते. बहुतांश मानव समाज आणि त्यांचे धर्म एकेकाळी पृथ्वी सपाट आहे आणि विश्वाच्या केंद्रस्थानी आहे असा विश्वास ठेवून होते. आजही त्यातील काही अनुयायी हेच लहानपणापासून शिकतात आणि त्यावर विश्वास ठेवतात.
विश्वास आहे म्हणजे ते सत्य असते असे नसते
ज्यांना मानायचे त्यांनी मानावे. आमचे काहीच म्हणणे नाही.पुनर्जन्माचे गाजर किंवा डंडा मनात ठेवून जगणे म्हणजे ,
One in hand two on fence.
आजच्या करता जगतो मग विचार करत नाही की,
यमदूत येतील का देवदूत नेतील
तेलात तळतील का अप्सरा भेटतील.....
द्या टाळी. आमचा आवडता (खल)नायक दुर्योधन देखील हेच म्हणतो
जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति:
जानाम्यधर्मं न च मे निवृत्ति:
केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि ।
‘मैं उचित क्या है, जानता हूँ, पर उसमें मेरी प्रवृत्ति नहीं होती और अनुचित क्या है, यह भी जानता हूँ, पर उससे मेरी निवृत्ति नहीं होती। एसा लगता है जैसे मेरे हृदय में स्थित कोई देव है, जो मेरे से जैसा करवाता है, वैसा ही मैं करता हूँ।
सर, सविस्तर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
काही ठिकाणी वाचलं आहे की, आपण खूप उंचावरून उडत आहोत, पुढे जात आहोत आणि एकदम खाली येतो अशी स्वप्नं सगळ्यांनाच पडतात. झोपेमध्ये जे सूक्ष्म शरीर ट्रॅव्हल करतं (ॲस्ट्रल प्रवास), त्यामुळे ते जाणवतात असं सांगितलं जातं. मलाही लहानपणी अशी स्वप्नं नेहमी पडायची.
बाकी तुम्ही म्हणताय तसं दृश्य हे एखाद्या गतकाळातल्या मनावर इंप्रिंट झालेल्या अनुभवाचं व्हिजन असू शकेल किंवा भविष्यातल्या एखाद्या अनुभवाचंही व्हिजन असू शकेल. जे जे प्रसंग अतिशय ताकतीचे असतात, अतिशय वेगळे असतात, ते भविष्यात असले तरी आपल्या चेतनेला जाणवतात. मला अनेकदा मी जिथे सायकलिंग करणार आहे (काही वर्षांनी) त्या ठिकाणची स्वप्नं पडतात. कारण तो अनुभवच इतका स्पेशल असतो की, काळाच्या पलीकडे आपल्या चेतनेला- सूक्ष्म संवेदनेला डिटेक्ट होतो. असो. शेवटी इतकंच म्हणेन की, ध्यान करत राहायचं. एक एक उलगडत जातं.
आणले,वाचन चालू आहे, मस्त आहे.
ओह! इथे बरीच चर्चा झालेली दिसतेय! सर्वांना धन्यवाद!
@ अहिरावण जी, मला वाटतं दुसर्याच्या मतानुसार आपलं मत बनवण्याच्या ऐवजी स्वतः अनुभव घेऊन- स्वतः स्वाद घेऊन का मत बनवू नये?
@ नगरी जी, अरे वा! वाचून झाल्यावर तुमची प्रतिक्रिया शेअर कराल. धन्यवाद.
>>>@ अहिरावण जी, मला वाटतं दुसर्याच्या मतानुसार आपलं मत बनवण्याच्या ऐवजी स्वतः अनुभव घेऊन- स्वतः स्वाद घेऊन का मत बनवू नये?
अहो आम्ही तर कट्टर हिंदू.
लहानपणापासुन आम्ही हे शिकलो आहोत आणि आम्हास मान्य आहे की पुनर्जन्म असतो. ८४ ल्क्ष योनींमधून आत्मा फिरतो. भले बुरे कर्म करतो त्यानुसार फळे या जन्मी वा पुढील जन्मी भोगतो. या जन्मात मागील संचित घेऊन येतो. वगैरे इत्यादी.
चला तुम्हाला क्लू देतो. मागल्या जन्मात भडगाव बुद्रुक च्या हनुमान मंदीरात संध्याकाळी तुम्ही आणि तुमचे मित्र बसलेले असतांना एक वाटसरु आला होता. त्याच्याशी बोलतांना तुम्हाला खुप आनंद झाला आणि त्याला टाळी दिली. आठवलं? बरोब्बर सव्वातीनशे वर्षे झाली त्याला. तुम्ही टाळी दिली ते ऋण घेऊन मी अनेक जन्म फिरून या जन्मात आलो. आता या लेखाला प्रतिसाद मी जो दिला आहे तो टाळीचे ऋण फेडले. आता आपला हिशेब पुरा.
एक एक हिशेब पुरा करत चाललो आहे.. या जन्मी मोक्ष मिळावा यासाठी ही धडपड आहे. बाकी काही नाही. :)