बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?
Primary tabs
"बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?"
प्रेरणा: मारवा ह्यांच्या 'दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम' ह्या धाग्यावरच्या धर्मराजमुटके ह्यांच्या 'प्रतिसादातील' लिंक वरील "बकरी ईदच्या दिवशी जैन व्यक्तीनं मुस्लीम वेश परिधान करून १२४ बकऱ्या केल्या खरेदी; पण कशासाठी?" हि बातमी वाचत असताना मनात अनुक्रमे 'कौतुक', 'मौज' आणि व्यावहारिक 'चिंता' अशा निरनिराळ्या भावना निर्माण होत गेल्या आणि काही तरुणांच्या समूहाने, एका चांगल्या हेतूने केलेल्या ह्या उदात्त कार्याविषयी जे व्यावहारिक प्रश्न पडले त्यांचा उहापोह करण्यासाठी हा लेखनप्रपंच!
कौतुक :
सर्वप्रथम बकरी ईदनिमित्त होणाऱ्या कत्तलीपासून तब्बल १२४ बोकडांचा जीव वाचवणाऱ्या 'गुरू संजीव, चिराग जैन आणि त्यांच्या चमूचे' हार्दिक अभिनंदन!
मौज :
सदर बातमीतील,
"धरमपूर परिसरातील नया जैन मंदिरात बकरी ईदच्या दिवशी उत्साह दिसून आला. कसाईच्या तावडीतून वाचलेल्या बकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी चांदणी चौकातील जैनांनी येथे गर्दी केली होती. हा दिवस बकरी दर्शनाचा दिवस होता. बकऱ्यांचं दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी मंदिरात होत होती. काहींनी त्यांच्या चाऱ्यासाठी पैसेही दान केले."
वरील वाक्ये वाचून मौज / गंमत वाटली!
पवित्र गोमातेचे दर्शन घेणे, धार्मिक विधी / मंगल कार्याच्या प्रसंगी तिला 'गोग्रास' अर्पण करणे, गाईचे दूध, दही, तूप, शेण आणि गोमुत्र अशा पाच गोष्टींचा समावेश असलेले 'पंचगव्य' प्राशन करणे अशा रूढी / परंपरा हिंदू धर्मात प्राचीन काळापासून चालत आल्या आहेत. जैन धर्माविषयी मनात आदर आहे आणि जैन धर्मियांचा अवमान् करण्याचा किंचितही हेतु नसला तरी, वरिल प्रमाणे पवित्र 'बकरी दर्शन', गोग्रासाप्रमाणे 'बग्रास', बकरीचे दूध, दही, लेंड्या आणि मूत्र अशा (बकरीच्या दुधापासून तूप तयार करता येत नसल्याने) पाचच्या ऐवजी चार गोष्टींचा समावेश करून तयार केलेले 'चौगव्य' प्राशन करण्याच्या नव्या रूढी / परंपरा जैन धर्मात सुरु होतील कि काय असा एक फाजील विचार मनात येऊन हसूही आले.
व्यावहारिक 'चिंता' :
बातमीतील पुढची माहिती वाचत असताना सुरुवातीला मनात 'भावनिक' पातळीवर निर्माण झालेल्या कौतुक आणि मौज/गंमत अशा भावना ओसरल्या आणि मेंदूत 'व्यावहारिक' विचारमंथन सुरु झाले.
शेळीपालनात एका प्रौढ बोकडासाठी १५ ते २० चौ. फूट जागा बंदिस्त निवाऱ्यासाठी आणि त्याच्या १० पट मोकळी जागा उपलब्ध असणे हि आदर्श परिस्थिती मनाली जाते. त्यावर आधारित १२४ बोकडांसाठी गणित केल्यास किमान अर्धा एकर क्षेत्रफळ आवश्यक असल्याने, लोकवर्गणीतून जमा झालेल्या पंधरा लाखांपैकी जवळपास साडे बारा लाख रुपये खर्चून मंडईतून खरेदी करून आणलेल्या बोकडांना 'मंदिरातील धर्मशाळेचे अंगण आणि विवाहसोहळ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या हॉल मध्ये ठेवण्यात आल्याचे वाचून चमकलो होतो, पण बातमीच्या शेवटी त्यांची रवानगी 'जैन-संचलित गो-आश्रयस्थान आणि बकरशाळांमध्ये' करण्यात येणार असल्याचे वाचल्यावर हायसे वाटले.
“आम्ही रस्त्यावरच्या विक्रेत्यांकडून कपडे विकत घेत आहोत असे वाटले. बकऱ्या एकत्र कुस्करल्या गेल्या. या सजीव, श्वास घेणाऱ्या प्राण्यांबद्दल कोणतीही संवेदनशीलता नव्हती” असे दिल्लीच्या मंडईचे विदारक वर्णन विवेक जैन ह्यांनी बातमीत केले आहे. माझ्या काही मोजक्याच पण अतिशय जवळच्या अशा मुस्लिम मित्रांबरोबर 'हा काय प्रकार असतो' ह्या उत्सुकतेपोटी' बकरी ईदच्या आदल्या दिवशी 'कुर्बानीचे बोकड' खरेदी करण्यासाठी मुंबईतील 'देवनार' आणि कल्याण-भिवंडी रोडवरील 'कोन गाव' अशा दोन 'बकरा मंडी'ना दिलेल्या भेटीत अशी मन विदीर्ण करणारी दृश्ये प्रत्यक्ष पाहिली असल्याने त्यांनी केलेले वर्णन अगदी चपखल असल्याचे जाणवले आणि त्यावरून एक गंभीर शंका मनात आली आणि "बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी? हा प्रश्न पडला!
'ईद मार्केट' साठी व्यापाऱ्यांनी विक्रीकरीता आणलेले विविध जातींचे, वयाचे आणि हमखास चांगला चांगला भाव मिळवून देतील असे 'खास शारीरिक वैशिष्ठ्यांचे' 'कुर्बानीचे' बोकड हे केवळ त्या त्या तालुका, जिल्हा किंवा राज्यातील शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून आणलेले नसून, वेगवेगळ्या राज्यांतील लहानमोठे 'शेळीपालक शेतकरी' आणि व्यावसायिक 'गोट फार्म्स' मधूनही खरेदी केलेले असतात. खरेदी केल्यापासून फारतर आठ-दहा दिवसांत हे बोकड 'हलाल' केले जाणार असल्याने प्राणघातक ठरू शकणाऱ्या काही आजार आणि संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी त्यांचे नियमित 'लसीकरण' झालेले आहे किंवा नाही ह्याकडे विशेष लक्ष दिले जात नाही.
बकरा मंडीत तात्पुरत्या उभारलेल्या ताडपत्रीच्या शेड्समध्ये बांबू आणि शेडनेटचे पार्टीशन्स टाकून शेकड्यांनी तयार केलेल्या चार-पाचशे चौ. फुट आकाराच्या एकेका गाळ्यात, वेगवेगळ्या ठिकाणांहून ट्रकमध्ये अक्षरशः कोंबून कोंबून आणलेले हे बोकड दाटीवाटीने ठेवलेले असतात. वर म्हंटल्याप्रमाणे हे बोकड आठ-दहा दिवसांत 'हलाल' केले गेले असते तर गोष्ट वेगळी होती, पण इथे परिस्थिती वेगळी आहे.
चिराग जैन आणि त्यांच्या टीमने खरेदी केलेले १२४ बोकड हे 'जातिवंत' आणि ज्यांच्या किमती २५ हजारांपासून ते काही लाख रुपयांपर्यंत असतात असे खास 'ईद मार्केट' साठी तयार केलेले बोकड नसून साधारण एक वर्ष वयाचे, तीस-बत्तीस किलो वजनाचे आणि दोन दातांचे 'रेग्युलर मीट मार्केट' साठी विक्री होणारे 'गावरान' बोकड असल्याचे त्यांच्या 'सरासरी १० हजार रुपये प्रति बोकड' ह्या किमतीवरून सहज लक्षात येतंय.
ह्या वाचवलेल्या बोकडांचे नियमित लसीकरण झालेले असेल का? ते झालेले नसल्यास भिन्न वातावरणात आणि परिस्थितीत वाढलेल्या असंख्य 'परक्या' बोकडांच्या सहवासात आल्याने त्यांच्यापैकी काहींना किंवा सर्वांना पी.पी.आर. सारख्या प्राणघातक संसर्गजन्य रोगाची लागण/बाधा झाली असेल का? संसर्गजन्य रोग एकवेळ बाजूला ठेऊ, पण बकरा मंडीत बोकड खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी त्यांना पसंत पडल्याने बाजूला काढलेल्या अनेक बोकडांमधून एक किंवा त्यापेक्षा जास्तीची निवड करताना त्यांच्या वयाची खात्री पटवण्यासाठी बोकडाचे तोंड धरून दोन बोटे तोंडात खुपसून, जबडा फाकवुन त्याचे दात दाखवले जातात. हि क्रिया वारंवार केली जात असल्याने त्या व्यापाऱ्याच्या किंवा त्याच्या कर्मचाऱ्याच्या बोटांना लागलेली एका बोकडाची लाळ दुसऱ्याच्या जिभेला, दुसऱ्याची तिसऱ्याच्या जिभेला लागणे असे चक्र सुरु राहते आणि त्यातला एक जरी बोकड आजारी/बाधित असेल तर त्याच्या लाळेवाटे अन्य बोकड बाधित होण्याची शक्यताही वाढत जाते.
दुर्दैवाने वरीलपैकी काही होऊन त्यांच्यातला एक, अनेक किंवा सर्व बोकड बाधित झाले असल्यास त्यांच्यावर औषधोपचार करणे आले नाहीतर "कत्तलीपासून वाचवले, पण आजाराने मेले" अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे काही होऊ नये हि सदिच्छा, पण हे पाऊल उचलताना ह्या गोष्टींचा विचार त्यांनी केला होता/असेल का? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे आणि त्याचे उत्तर मिळवण्यासाठी पुढच्या अपडेट्स साठी बातमीचा पाठपुरावा करणे आले!
बातमीत म्हंटल्याप्रमाणे ह्या बोकडांची रवानगी गो-आश्रयस्थान आणि बकरशाळांमध्ये करण्यात येणार आहे. त्यांची क्षमता, क्षेत्रफळ, उत्पन्नाचे स्रोत आणि तिथे ह्या बोकडांच्या चारा-पाण्याची काय सोय आहे हे देखील पाहावे लागेल. सर्वसाधारणपणे एका प्रौढ शेळी/बोकडाच्या आहारासाठी आजघडीला प्रतिदिन सरासरी ३० ते ३५ रुपये खर्च येतो. त्याच्या जोडीला त्यांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेले मिनरल मिक्श्चर, लिव्हर टॉनिक अशा गोष्टी, जंतांसाठीचे 'डिवर्मिंग', 'नियमित लसीकरण' आणि अन्य पशुवैद्यकीय खर्च, निवाऱ्यासाठी शेड, वीज, पाणी, औषधे आणि देखभालीसाठी लागणारे मनुष्यबळ ह्यावर होणारा खर्च वेगळा.
हे विचारांत घेता ह्या १२४ बोकडांना पोसण्यासाठी, एका बोकडावर प्रतिमाह १००० रुपये असा किमान खर्च गृहीत धरला तर तो जवळपास सव्वा लाख रुपयांच्या घरात भरतो, गणिताच्या सोयीसाठी आपण तो आणखीन कमी करून १ लाख रुपये धरून चालू. ह्या हिशोबाने त्यांच्या एक वर्षाचा खर्च १२ लाख रुपये मात्र.
शेळी/बोकडाचा आयुष्यकाल सरासरी १२ ते १५ वर्षांचा असतो, तोही आपण सोयीसाठी कमी करून १० वर्षे गृहीत धरून गणित केल्यास दहा वर्षांत त्यांच्यावर होणारा खर्च १ कोटी २० लाख रुपयांच्या घरात जातो (ह्यात भविष्यात वरील गोष्टींच्या किमतीत होणारी वाढ धरलेली नाही) हा खर्च भागवण्यासाठी त्या गो-आश्रयस्थान आणि बकरशाळांचे स्वतःचे काही उत्पन्नाचे स्रोत असल्यास आनंदच आहे, आणि लोकांकडून देणग्या गोळा करून हा खर्च भागविण्यात येणार असल्यास आनंदी-आनंदच आहे!
कोणातरी गुरूच्या सांगण्यावरून आणि आंतरिक उर्मीने लोकवर्गणीतून सुमारे साडेबारा लाख रुपयांना खरेदी केलेले हे उपयोगशून्य बोकड आणि त्यांना पोसण्यासाठी भविष्यात प्रतिवर्षी खर्च होणाऱ्या जवळपास सव्वा कोटी रुपये अशा एकंदरीत सुमारे दीड कोटी रुपयांच्या ह्या अनावश्यक खर्चाचे समर्थन कशाच्या आधारावर करायचे हा मला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. बरे ह्यावर्षी झालाय हा प्रकार इथपर्यंतच मर्यादित राहिला तर एकवेळ ठीक आहे, पण ह्या चिराग जैन आणि मंडळींकडून दरवर्षी, आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अन्य काही मंडळींनी असे प्रकार सुरु केले तर देशभरात प्रतिवर्षी किती नवीन 'बकरशाळा' उघडतील आणि त्यांवर किती अब्ज रुपये खर्ची पडतील ह्या विचाराने मेंदूला मुंग्या आल्या.
असो, भूतदया आणि मानवतावादी दृष्टिकोनातून ह्या बातमीतील घटनेकडे पाहिल्यास हा उपक्रम नक्कीच स्तुत्य वाटतो, पण व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यातला फोलपणा प्रकर्षाने जाणवतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
एखाद्या विषयाच्या मुळाशी कस जावं ते टर्मिनेटर यांच्या कडून शिकावं. लेख आवडला आपल्याला.
१००% सहमत.
या लेखामुळे या विषयाची/प्रश्नाची व्याप्ती आणि खोली लक्षात आली.
+१. असेच म्हणतो! लेख आणि प्रतिसादातली डिट्टेलवार माहिती वाचुन तुम्ही बकरी पालन व्यववसायात आहात का हा प्रश्न विचारावासा वाटला!!
आपल्या प्रश्नाचे उत्तर 'आज' तरी 'नाही' असे आहे, पण उद्या कदाचित ते 'हो' असे असण्याची दाट शक्यता आहे 😀
'दुग्धोत्पादन' आणि 'मांसोत्पादन' ह्या कारणांसाठी करण्यात येणाऱ्या व्यावसायिक शेळीपालनात मला रस नसला तरी ह्या क्षेत्रांकडुन प्रचंड मागणी असलेल्या 'शुद्ध वंशाच्या जातिवंत शेळ्या आणि बोकडांची' 'जेनेटिक्स' वर लक्ष केंद्रित करून पैदास करण्याच्या व्यवसायात उतरावे हा विचार आठेक वर्षांपूर्वी माझ्या डोक्यात घोळू लागला होता. "कुठल्याही नवीन व्यवसायात पदार्पण करताना त्यातले नफ्या-तोट्याचे गणित, खाचा-खोचा, समस्या इत्यादी गोष्टींची इत्यंभूत माहिती आपल्याकडे असलीच पाहिजे" ह्या ज्यांचे बोट धरून स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता त्या गुजराती गुरूंनी अनेक वर्षांपूर्वी दिलेल्या गुरुमंत्राला जागून मग त्या अनुषंगाने माहिती मिळवायला सुरुवात केली होती. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 'मिपावर कुठल्याही विषयाची माहिती हमखास मिळते' अशा समजुतीतून सुमारे पावणे आठ वर्षांपूर्वी माझा मिपावरील क्रमांक तीनचा असलेला "शेळीपालन (गोट फार्मिंग)" हा दोन ओळींचा धागाही काढला होता. त्यावर किती उपयुक्त माहिती मिळाली हा भाग वेगळा पण ती मिळवण्याचा प्रयत्न केला होता 😀
आणि तेव्हापासून ह्या विषयाचा जितका अभ्यास करत गेलो तितका त्याचा आवाका लक्षात येत गेला आणि आधीपासून अभ्यासाधीन असलेल्या 'तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक शेती' ह्या विषयाच्या जोडीला 'पशुसंवर्धन (Animal Husbandry)' आणि 'पशुधन व्यवस्थापन (Livestock Management)' हे माझ्या 'विशेष अभ्यासाचे' विषय कधी बनून गेले हे माझे मलाही समजले नाही.
त्याच्या अधिक तपशिलात जात नाही पण तो अभ्यास केवळ शेळ्यांपुरता मर्यादित न राहता, शेळी, मेंढी, गाय, म्हैस, कोंबडी, बदक पालन आणि मत्स्य शेती असा विस्तारात गेला. अर्थात त्यापैकी सर्वात जास्त अभ्यास हा शेळ्यांवर झाला असल्याने गेल्या आठ वर्षात ऑनलाईन/ऑफलाईन प्रशिक्षण, वाचन, वेगवेगळ्या फार्म्सना दिलेल्या भेटी अशा अनेक मार्गांनी मिळवलेल्या माहिती आणि अनुभवावर 'शेळ्यांच्या जाती', 'शेळ्यांचा स्वभाव', 'शेळ्यांची प्रसूती', 'पिलांचे संगोपन, 'शेळ्यांचा आहार', 'शेळीपालनातील समस्या' अशा एक ना अनेक विषयांवर किमान तासभर तरी व्याख्यान झोडता येईल, गेलाबाजार ह्या विषयांवर युट्युबवर येणाऱ्या असंख्य 'बाजारू' व्हिडीओजमध्ये आणखीन भरही घालता येईल 😀 तसेच 'शेळ्यांचा आहार' ह्या विषयावर तर इतका अभ्यास आणि संशोधन करून झाले आहे कि त्यावर प्रबंध लिहिल्यास PhD मिळण्यास काहीच अडचण येणार नाही!
असो ह्यातला गमतीचा भाग बाजूला ठेऊ पण एका मर्यादित विचाराने ह्या क्षेत्राकडे पहात असताना त्यातल्या इतक्या सकारात्मक संधी-शक्यता दिसू लागल्या कि 'तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक शेती' + 'पशुसंवर्धन' + 'पशुधन व्यवस्थापन' ह्यांच्या संगमातून उभा राहू शकेल अशा एका 'हायटेक' उद्योगाचा पूर्ण आराखडा तयार झाला आहे. फक्त हा व्यवसाय पार्टटाइम/जोडधंदा म्हणून करण्यासारखा नसून पूर्णवेळ करण्याचा आहे ह्या एकमेव कारणासाठी तो अद्याप प्रत्यक्षात आणता आला नाही, पण लवकरच सध्याच्या व्यवसायाची सूत्रे योग्य हातांत सोपवून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून स्वतःला पूर्णवेळ ह्या प्रस्तावित उद्योगात झोकून देण्याचा विचार आता मनाशी जवळजवळ पक्का झाला आहे.
माझे एक सहकारी प्रोफेसर, अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व , प्राचार्यही होते.मग कुठेतरी पीएचडीचे फिसकटलं .तेव्हा त्यांनी शेती जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरू केलाय.खुप छान छान प्रगती करत आहेत.वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स मध बनवतात, प्रशिक्षण देतात आणखिन बरेच काही.
तळापासून काम करण्यासाठी खुप छान क्षेत्र आहे हे!
शुभेच्छा!
धन्यवाद!
- (शुभेच्छांची नितांत गरज असलेला} टर्मीनेटर.
केवळ दुधासाठी शेळीपालन शक्य आहे का ?
एक कुतूहल म्हणून विचारतोय
हो... खास दुग्धोत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या जमुनापारी, बीटल, मेहसाणा, सुरती अशा जातींच्या शेळ्यांची निवड त्यासाठी केली जाते.
आपल्या महाराष्ट्रात बकरीच्या दुधाचा वापर पुर्वीपासुनच खुप मर्यादीत प्रमाणावर होत आला आहे त्यामुळे केवळ दुधासाठी शेळीपालन करणे हे व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नसल्याने फारसे कोणी त्यात पडत नव्हते. परंतु कोविड काळात अनेक वस्तू/गोष्टींच्या सेवनातून त्यांचे 'आरोग्यासाठी होणारे फायदे' ह्याविषयी समाजमाध्यमांतून झालेल्या तथाकथित 'जनजागृती' मधून अन्य गोष्टींप्रमाणेच शेळीच्या दुधाची उपयुक्तताही लोकांना समजली आणि तेव्हा आणि त्यानंतरच्या काळात शेळीच्या दुधाला मागणी वाढल्याने आणि प्रतिलिटर १५०+ रुपये भावाने ते विकले जात असल्याने बरेच शेळीपालक खास दुग्धोत्पादनासाठी म्हणूनही शेळीपालन करू लागले होते पण त्या व्यवसायात 'विपणन' (Marketing) फार महत्वाचे असल्याने अनेकजण त्यात अयशस्वी ठरले.
बऱ्याच रुग्णालयांमध्ये रुग्णांना शेळीचे दूध दिले जाते, अशी रुग्णालये आणि वैयक्तिक वापरासाठी त्या दुधाचा वापर करणारी आरोग्याविषयी जागरूक मंडळी असे नियमित ग्राहक ज्यांना जोडता आले ते मात्र यशस्वी ठरले आहेत. विक्री न झालेल्या अतिरिक्त दुधापासून 'चीज' निर्मितीचा जोडधंदा करूनही काहींनी आपले उत्पन्न वाढवले आहे.
उत्तरेकडच्या राज्यांमध्ये मात्र शेळीच्या दुधाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड अशा राज्यांमध्ये पूर्वीपासूनच खास दुग्धोत्पादनासाठी म्हणूनही घरगुती आणि व्यावसायिक स्तरावर शेळीपालन होत आले आहे. कोविड काळात तिथेही शेळीच्या दुधाला असलेली मागणी एवढी प्रचंड वाढली होती कि प्रति लिटरसाठी ७००-८०० रुपये मोजूनही ग्राहकांना दूध मिळत नव्हते. शेळीचे दूध प्यायला न मिळाल्यास आपण जणू मरणारच आहोत अशा भयभीत मानसिकतेतून त्यावेळी अनेक ठिकाणी गोट फार्म्समध्ये घुसखोरी करून जमावाने शेकडो शेळ्या पळवून नेल्याच्या घटनाही घडल्या होत्या. (छानपैकी कोमट पाणी वगैरे पिऊन घरात गप्प बसायचे सोडून बिचाऱ्या शेळीपालकांचे मोठे नुकसान करणाऱ्या त्या समाजकंटकांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे 😀)
विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद
मी कुठेतरी वाचले होते की ice cream बनवण्यासाठी शेळीचे दूध वापरले जाते म्हणून मनात विचार आला होता
छान प्रतिसाद! आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी देखील शेळीचेच दूध प्यायचे, त्यामुळेच आपल्या तल्लख बुद्धिमत्तेने इंग्रजाना लोळवू शकले! :)
मनोरंजक प्रतिसाद....
आझाद हिंद सेना लढत असताना, परमपूज्य गांधी त्यांच्या मागे ठाम पणे उभे राहिले नाहीत आणि भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बाबतीत पण हीच बोटचेपी भूमिका घेतली.
पूर्वी एकदा एका जैन मंदिरात गेलो होतो. तिथे रोजची पूजा आणि भंडारा (किंवा जो काही विधी आणि जेवण वगैरे) यासाठी बोली लागते, आणि जो सर्वात जास्त पैसे देईल त्याच्याकडून त्या दिवसाचे कार्य करवले जाते. आपली ऐपत आणि वैभव दाखण्यासाठी, आणि दुसर्यापेक्षा वरचढ होण्यासाठी तिथे चुरशीने लोक मोठमोठ्या रकमांची बोली लावून जिंकतात.
आता हे १२४ 'पवित्र' बकरे एकेक करून बोली लावून विकले जातील आणि धनाढ्यांच्या प्रासादांमधे त्यांचे उर्वरित आयुष्य सुखनैव जाईल. त्या त्या शेठजीची प्रतिष्ठा यातून आणखी वृध्दिंगत होत जाईल.
(पुढे त्या बोकडांचे काय होते, यावर नजर ठेवा टर्मिनेटर भौ)
पूर्वी कलकत्त्यात आणखी एक प्रकार ऐकला होता. अहिंसा पाळायची म्हणून डास वगैरे मारायचे नाहीत, मच्छरदाणी लावून झोपायचे हे ठीक, पण त्या डासांना भुकेले ठेवण्याचे पाप लागू नये म्हणून उघड्यावर खाटा टाकून गरजू गरिबांना त्यावर पैसे देऊन (मच्छरदाणी न लावता) झोपवायचे. इथपर्यंतही ठीक. पण यात कसली मौज ? यातून आपले वैभव कसे दिसणार ? मग आपल्या मालकीच्या विशाल जमिनींवर शेकडो खाटा टाकायच्या आणि हजारो डासांना जेऊखाऊ घालण्याचे पुण्य मिळवून कीर्तीमान व्हायचे. जो जितक्या जास्त खाटा टाकेल त्याची प्रतिष्ठा तेवढी जास्त. मजा आहे.
जय हो.
(माझे दोन तीन चित्रकार जैन मित्र आहेत. त्यांना फोनवर विचारेन या प्रकाराबद्दल त्यांचे मत.)
रात्रीचे चांदणे । रामचंद्र । चित्रगुप्त
उत्साहवर्धक प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
छे हो, "श्रीमंता घरचे श्वान, त्यास सर्व देती मान" असे सुख बिचाऱ्या बोकडांच्या नशिबी कुठे!
शेळी/बोकड हे कुत्रा, मांजरीप्रमाणे घरात/प्रसादात पाळण्याचे प्राणी (पेट'स) नसून फार्म ऍनिमल्स प्रकारात येतात. तरी एखाद्या शेठजीने ते धाडस केलेच तर त्याच्या घरातल्या वस्तू आणि बाग-बगीच्याचा सत्यानाश झालाच म्हणून समजायचे 😀 तसेच हुशार आणि अतिशय चौकस जमात असली तरी कुत्रा-मांजरींप्रमाणे त्यांना 'स्वछता'विषयक सवयींचे प्रशिक्षण देता येत नसल्याने कुठे घाण करून ठेवतील ह्याचा नेम नाही. अजून एक म्हणजे, हे १२४ बोकड खच्ची केलेले आहेत कि नाही ह्याचीहि काही माहिती नाहि.
ते बोकड खच्ची केलेले असतील तरी एकवेळ त्यांच्यासाठी आपल्या प्रसादाच्या आवारात प्रशस्त आणि बंदिस्त अशा निवाऱ्याची स्वतंत्र सोय करून तुम्ही म्हणता त्या प्रतिष्ठेच्या कारणासाठी एखादा शेठजी त्यांना पाळू शकतो, परंतु त्याने पाळलेला/पाळलेले बोकड जर खच्ची केलेले नसतील तर मात्र अवघड काम आहे. माजावर आलेल्या मादीला आकर्षित करण्यासाठी आपली लघवी स्वतःच्या तोंड, दाढी, आणि शरीराच्या शक्यतेवढ्या भागाला लावून घेणे हि वयात (आणि रंगात) आलेल्या बोकडाची नैसर्गिक प्रवृत्ती असते. असा प्रकार शेळ्या आणि बोकडांसाठी कितीही आवश्यक आणि उपयुक्त असला तरी त्यामुळे बोकडाच्या शरीराला आणि आजूबाजूच्या परिसरात येणारी दुर्गंधी हि माणसांसाठी असह्य असते. अगदी व्यावसायिक गोट फार्म मधले कर्मचारीही चारा-पाणी द्यायला किंवा अन्य देखभालीच्या कामांसाठी केवळ नाईलाज म्हणून अशा बोकडांजवळ अक्षरशः नाक मुठीत घेऊन जातात, तिथे शेठजी आणि त्याच्या कुटुंबीयांची काय कथा? त्यांना तर आपल्याच घरात राहणे नकोसे होईल! त्यात पै-पाहुणे घरी आल्यास त्याची प्रतिष्ठा वृद्धिंगत होण्याऐवजी ती धुळीला मिळण्याचीच शक्यता जास्त आहे 😀 (खच्ची केलेल्या बोकडांचे 'नरतत्व' लोप पावल्याने त्यांच्या लघवीत अशी विशिष्ट दुर्गंधी निर्मिती करणाऱ्या हॉर्मोन्सचा अभाव असल्याने तिला तेवढा घाणेरडा वास येत नाही.)
बाकी कलकत्त्याचा डास, मच्छरदाणी, खाटा वगैरेंचा किस्सा भारीच आहे. ऐकावे ते नवलंच!
बोकडाची घाण वगैरेंचा अनुभव आल्यावर ते त्याची एक सोन्या-चांदीची मूर्ती वा सोनेरी फ्रेम केलेले चित्र -शिवाय त्यात अमुक तमुक मुनी त्या बोकडाला आशिर्वाद देत आहेत असेही - बनवून घेऊन ते त्यांच्या प्रासादात ठेवतील (आणि त्या बोकडाचे पुढे काय झाले ते कुणाला कळणारही नाही)
-- ब्रिटिश आमदानीच्या काळात भारतातल्या सर्वात धनिक, 'सर' उपाधी लाभलेल्या एका प्रसिद्ध जैन धर्मीय सेठजीचा नातू माझा मित्र होता (वयाने माझ्यापेक्षा बराच मोठा- आता दिवंगत) तो आणि त्याचा मोठा भाऊ यांनी जन्मभर केवळ ऐय्याशी केली. त्याच्या प्रासादात आणि त्याच्यावरोबर फिरायला मी बरेचदा जायचो. त्याच्याकडे जगभरातून आणलेल्या इतक्या विलक्षण गोष्टी असायच्या की मला नेहमी खूप आश्चर्य वाटायचे. तो स्वतः चांगला फोटोग्राफर आणि चित्रकलाप्रेमी, विशेषतः हुसेनच्या चित्रांचा चाहता असल्याने त्याच्याकडे हुसेनची मोठमोठी चित्रे भरपूर होती. त्याकाळी त्याच्याकडे हसलब्लाड वगैरे लाखो रुपये किंमतीचे कॅमेरे होते, आणि घरी सुसज्ज लॅब होती त्यात तो स्वतः मोठमोठे प्रिंट बनवायचा.
-- ही अतिश्रीमंत मंडळी आपण कल्पनाही करू शकत नाही अश्या गोष्टी प्रत्यक्षात करत असतात, हे मला त्याच्या संपर्कात राहून कळले होते. मी त्याला आत्मचरित्र लिहीण्याचा सल्ला दिला होता, त्याप्रंमाणे त्याने ते लिहून प्रसिद्धही केल्याचे समजले होते, पण माझा संपर्क तुटल्याने ते वाचायला अजूनही मिळालेले नाही. त्याला जाऊनही आता पुष्कळ वर्षे झाली. आता इंदौरला गेल्यावर प्रयत्न करेन (त्याच्या कुटुंबियांशी माझा तेंव्हाही काही संबंध आलेला नसल्याने ते कठिणच आहे म्हणा) असो.
हो, असे होउही शकेल, काही भरवसा नाही 😀
नक्की करा हा प्रयत्न आणि ते मिळाल्यास त्यातील किस्से इथे येउद्यात! अशा रंगेल माणसाच्या जिवनातील गमती-जमती आणि किस्से वाचायला मजा येइल 👍
गेल्या शंभरेक वर्षांपासून ते इंदुरातील अत्यंत प्रतिष्ठित घराणे असल्याने त्याने त्याच्या अय्याशीबद्दल आत्मचरित्रात लिहीले असण्याची शक्यता मला फार कमी वाटते. त्याच्या घरची मंडळी मला ओळखत नसल्याने मला तिथे प्रवेश मिळणाचे सुद्धा वांधे आहेत. मी त्याच्याकडे जायचो त्याला पन्नासेक वर्षे झालेली आहेत.
इथे मला अरेबियन नाईट्स् चे प्रथमच इंग्रजीत भाषांतर करणारा रिचर्ड बर्टन आठवतो. त्याच्या मृत्युनंतर त्याच्या बायकोने त्याच्या खोलीतले त्याचे सगळे लिखाण (ते अश्लील असावे म्हणून) जाळून टाकले होते म्हणे. माझ्या मित्राने खरोखर त्याच्या जीवनातील तसल्या घटना लिहेल्या असतील, तर कुटुंबियांनी ते नष्ट केले असेल असे वाटते.
अरेरे... म्हणजे ते रंजक किस्से वाचायला मिळण्याची शक्यता पूर्णपणे मावळली म्हणायचे तर 😔
सामान्य माणसांना इतर माणसांनी केलेल्या अय्याशीबद्दल एक आंतरिक कुतूहल असतं.
आणि इतर बायकांबरोबर केलेली लफडी याबद्दल एक सुप्त आकर्षण असतं.
यातलं काहीच मध्यमवर्गीय माणसाला जमण्यासारखं किंवा परवडण्यासारखं नसतं.
म्हणूनच अशा कादंबऱ्या आणि धारावाहिक फार मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होतात.
आणि अशा माणसांबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध होत असतात आणि लोक फार चवीने त्या चघळतात
सिनेनट, क्रिकेटर आणि राजकारणी या सार्वजनिक जिवंत वावरणाऱ्या लोकांची लफडी सुद्धा माणसं फार चवीने चघळताना दिसतात
गमतीची गोष्ट म्हणजे लफडी करण्यासाठी फार पैसा असावा लागतो असेही नाही.
सामान्य दिसणारी आणि आर्थिक स्थिती असणारी माणसं सुद्धा अशी लफडी करताना आढळतात. कॉलेजात टिनपाट दिसणारा एखादा मुलगा सुद्धा दोन चार पोरींबरोबर फिरताना दिसला कि सर्वाना त्याची फार असूया वाटत राहते.
अर्थात पैसा असला कि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांतून सुटका जास्त सहज होऊ शकते
नियमाला अपवाद असतात! त्याप्रमाणे, काहीजण आपण तो 'बेंचमार्क' गाठलाय कि त्याच्याही पुढचा सेट केलाय ह्याचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते जाणून घेण्यास उत्सुक असतात. उदाहरणार्थ - नको... ते गुलदस्त्यातच राहुद्यात 😂
डॉक्टर, तुम्ही सुद्धा?
;-)
डॉक्टर, तुम्ही सुद्धा?
मी ?
टर्मी, तुम्ही सुद्धा?
असा अर्थ आहे "डॉक्टर, तुम्ही सुद्धा?" हा मी केवळ एक लोकप्रिय वाक्प्रचार वापरला.
हघ्याहेवेसांन
"डॉक्टर, तुम्ही सुद्धा? / टर्मी, तुम्ही सुद्धा?"
हे राम!
वामनराव, एवढ्या मोठ्या मिपासमूहात अन्य कोणाचेही नाव घेता येणे शक्य असताना (वेगळ्या संदर्भाने का असेना पण) तुम्ही चक्क डॉक्टर आणि माझ्या चारित्र्यावर संशय व्यक्त करताय???
देवा, हे असलं काही वाचण्याआधी तू माझा चष्मा का नाही फोडलास 😀
डॉक्टरांशी प्रत्यक्ष परिचय नसला तरी एकंदरीत त्यांचे ज्ञान, अनुभव, पेशा, लेखन इत्यादी गोष्टी आणि त्यांची काही मते बिलकुल पटत नसली तरी त्यावरून व्यक्त होणाऱ्या किरकोळ मतभेदांपेक्षा बहुतांश गोष्टींवर त्यांच्याशी सहमत असण्याचेच प्रमाण बरेच जास्त असल्याचे आजपर्यंतच्या मिपावरील वावरातुन लक्षात आले असल्याने ते एक सज्जन गृहस्थ आहेत ह्याविषयी माझ्या मनात तरी तिळमात्र शंका नाही!
आणि मी? अहो, साधेपणाच्या बाबतीत प. पु. साने गुरूजी, महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे हे माझे आदर्श आहेत. केवळ समाजमनातल्या त्यांच्या उच्च स्थानाला स्पर्धा निर्माण होउ नये म्हणुन मी त्यांच्यापेक्षा किंचीत कमी साधेपणी रहातो. पण माझ्या ह्या त्यागाकडे तुमचे साफ दुर्लक्ष झालेले दिसतंय!
सरळ पणाचे म्हणाल तर नाकासमोर चालणारा मी एक सरळमार्गी मनुष्य आहे! पण ज्या वाटांवर चालतो त्या वाटाच वाकड्या असतात त्यात माझा काय दोष? टेल… टेल…
आणि पापभीरूपणाबद्दल मी काय बोलणार? मनुष्यजन्म मिळाल्यावर करायलाच पाहीजेत अशा सर्व गोष्टी करण्याच्या नादात (उपभोगवादी वृत्तीमुळे) चुकुनही करू नयेत अशा गोष्टीही करून झालेल्या एका सज्जन, सत्शील माणसावर तुम्ही अप्रत्यक्षपणे चक्क 'अय्याश' असल्याचा संशय व्यक्त करताय?
कुठे फेडाल हे महापाप 😂 😂 😂
असो, आता फाजीलपणा थांबवतो आणि मुद्द्यावर येतो.
काय आहे कि हिंदी चित्रपटांतील संवादांनी काही शब्द इतके बदनाम करून टाकले आहेत कि ते ऐकले कि हमखास त्यांचे नकारात्मक / वाईट अर्थच ऐकणाऱ्याच्या मनात येतील अशाप्रकारे ते लोकांच्या मनावर वाईट अर्थाने ठसवले गेले आहे. त्याची दोन उत्तम उदाहरणे म्हणजे खास मुंबैय्या हिंदीतले 'टपोरी' आणि मूळचा अरबी भाषेतील शब्द 'ऐय्याशी'.
ह्यातल्या 'ऐय्याशी' ह्या अरबी शब्दाचा/मुलाच्या नावाचा इंग्रजीतला अर्थ “One who lives well' असा आहे तर हिंदीत त्याचे अनेक बरे-वाईट अर्थ आहेत. जसे कि,
'व्यभिचार' । 'ज़िना' । 'कामुकता' । 'लंपटता' । 'अश्लीलता' । 'विषयासक्ति' । 'अच्छा खाना-पिना-पहनना और आराम से रहना'. इत्यादी.
त्यातले बहुतांश 'वाईट' अर्थाचे आहेत तर दोन-तीन चांगल्या/बऱ्या अर्थाचेही आहेत. माझ्या लेख किंवा प्रतिसादांमध्ये मी स्वतःच्या ऐय्याशी विषयी उल्लेख करतो तेव्हा तिथे ह्या शब्दाचा इंग्रजीतला“One who lives well' किंवा 'अच्छा खाना-पिना-पहनना और आराम से रहना' हा हिंदीतला अर्थ मला अभिप्रेत असतो त्यामुळे अशा चांगल्या अर्थाने मी एक 'ऐय्याशी पसंद' व्यक्ती असल्याने स्वतःला 'ऐय्याश' म्हणवून घेण्यात मला तरी कुठलाही कमीपणा वगैरे वाटत नाही. पण समोरचा त्या शब्दाला 'वाईट' अर्थाने घेत असेल तर त्यात माझा काही दोष नाही 😀
त्यामुळे तुमच्या "टर्मी, तुम्ही सुद्धा?" ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्यापुरते तरी 'हो' असे आहे, पण वरील अर्थाने बरंका... 😉
आणि ह्याच अर्थाने "डॉक्टर, तुम्ही सुद्धा?" चे उत्तरही 'हो' असे असायला खरे साहेबांचीही हरकत नसावी असा आपला माझा अंदाज!
@टर्मीनेटर
हायला
ते गम्मत करताहेत.
टेन्शन घेऊ नका.
मी कुठे टेन्शन घेतोय, मी पण गंमतच करतोय 😀
और वैसेभी, "टेन्शन लेने का नै, देनेका" येइच तो अपना फंडा है 😂
इकडे अर्थशास्त्र चालत नाही.
या वाक्याचा या धाग्या/प्रतिसादाच्या संदर्भात अर्थ समजला नाही. जरा इस्कटून सांगावा ही विनंती.
- गुप्तार्थोत्सुक
बकरे खरेदी करून सोडवणे वाचवणे याबद्दल लेख आहे.
एक म्हणजे ते खरंच वाचतील का आणि ते वाचवण्याचा खर्च दिला आहे. अमुक एक संख्येने(दरवर्षी ) बकरे वाचवले तरी पुढे काय हा प्रश्न आहेच. वाचवण्याचा खर्च ते जैन लोक वाटून घेणार आहेत आणि मानसिक, धार्मिक समाधान मिळवणार. यामागे फायद्या तोट्याच्या अर्थशास्त्राची चिंता करणे त्यांच्या दृष्टीने गौण आहे.
म्हणजे मुस्लिम समाज 'मानसिक, धार्मिक' समाधान मिळवण्यासाठी बोकडांची कत्तल करतो म्हणून त्याला 'काउंटर' करण्यासाठी जैन समाज ते बोकड त्यांच्यासाठी अत्यंत निरुपयोगी असले आणि भविष्यात त्यातून किती आर्थिक/सामाजिक समस्या निर्माण होतील ह्याची पर्वा न करता ते खरेदी करून त्यांना वाचवल्याचे 'मानसिक, धार्मिक' समाधान मिळवणार. वाह, छानच! म्हणजे "तुला नाही... मला नाही... फुकटचा भार मात्र धरणीला" अशा विवेकशून्य मनोवृत्तीचेच दर्शन घडते कि ह्यातून!
असो, त्यांनी दरवर्षी लाखोंच्या संख्येने असे बोकड खरेदी करावेत, त्यांच्या संगोपनासाठी हजारोंच्या संख्येने बकरशाळा बांधाव्यात, त्यांच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी कोट्यवधी हेक्टर जमीन चारा पिकांच्या लागवडीखाली आणावी, माणसांसाठी अन्न-धान्याचा तुटवडा निर्माण झाला तर ते करू कि परदेशातून आयात त्यात काय मोठंसं? पण आम्हाला 'मानसिक, धार्मिक' समाधान मिळणे महत्वाचे 😀
"Nothing in all the world is more dangerous than sincere ignorance and conscientious stupidity."
- Martin Luther King Jr
असो, भूतदया आणि मानवतावादी दृष्टिकोनातून ह्या बातमीतील घटनेकडे पाहिल्यास हा उपक्रम नक्कीच स्तुत्य वाटतो, पण व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिल्यास त्यातला फोलपणा प्रकर्षाने जाणवतो.
सहमत आहे , कोणत्याही गोष्टीचा अतिरेकाचे हे अजून एक उदाहरण .. मग ते मोकाट कुत्र्यांचे संरक्षण असो किंवा भावनेचं भरात केल्ली बकरशाला असो
असो पण पेटा चे अभिनंदन कि त्यांनी मुस्लिम धर्मातील एखाद्या प्रथेबद्दल काहीतरी बोलण्याची हिम्मत दाखवली ( हिंदूंच्यात हि नवसाला फेडण्यासाठी बोकड, कोंबडी अर्पण करण्याची प्रथा आहेच, त्यातून काहीतरी मधय मार्ग काढायची तयारी पाहिजे , ती हिंदूंनी आणि मुसलमानांनी हि दाखवावी
"व्हेगन" आणि "व्हेगन आतंकवादी" यातील फरक हा हि असाच
आतापर्यंत चे विचार मंथन पटले. कुठल्याच गोष्टीचा अतिरेक वाईटच. मग हिंसाचार किवां अहिसांचार.
प्रतिकात्मक, नारळ बळी या मधला सुवर्ण मध्य वाटतो. बळी दिल्यावर नारळाच्या वड्या प्रसाद म्हणून वाटाव्यात.
आमचे एक उत्तर भारतीय उपाध्याय, यांनी नारळ बळी कसा यावर भाष्य केले होते. नारळास म्हणे दोन डोळे व एक तोंड असते. असो नक्की काय ते आठवत नाही पण कुणास संदर्भ माहित असेल तर टंकाळावे.
बाकी लेख आणी लेखकाशी सहमत.
@चित्रगुप्त- इकडे अर्थशास्त्र चालत नाही.
याचे उत्तर तुमच्याच प्रतिसादात दडले आहे.
आपली ऐपत आणि वैभव दाखण्यासाठी, आणि दुसर्यापेक्षा वरचढ होण्यासाठी तिथे चुरशीने लोक मोठमोठ्या रकमांची बोली लावून जिंकतात.
धर्म आणी गुरूमाऊली तुमच्यासाठी काय पण.....
टर्मिनेटर यांनी विचार करण्यासारखे मुद्दे मांडले आहेत तसेच या पेटा कृतीने हुरळून जाऊन अति कट्टर हिंद्त्ववाद्यांना मज्जा येईल हा प्रतिसाद पण आवडलला ... तरी पण पेटा चे अभिनंदन कि त्यांनी हिम्मत दाखवली , सतत हिंदू प्रथनवर टीका करणारे असा सर्व धर्म समभाव दाखवत आहेत हे चांगलेच आहे .. असो पुढे
त्यातून हे सुचलेलले ( मी मासाहारी आहे हे घोषित करून करून लिहीत आहे )
मला वाटते कट्टर मांसाहारी लोकांनां हे पटेल कि सुरीने भाजी चिरणे आणि जिवंत प्राणी चिरणे यात प्राणी चिरणे हि जास्त "धक्का देणारी घटना दिसते कानांना डोळ्याला आणि नाकाला "
( आता कोणी हा मुद्दा काढू नये कि भाज्यांना काय जीव नसतो का !)
१) माणसाने उदरनिर्वाह साठी पशुहत्या थांबवनणे हे होणे शक्य नाही , जवळ जवळ सर्व धर्मातील व्यक्ती मांसाहारी आहेत .. त्यामुळे मांसाहारी कि शाकाहारी हा अनंत काळापर्यंत चालणार वाद राहील , या कृत्त्यांमुळे तो ऐराणी वर येतो आणि जातो ...
ऍनिमल कृअल्टी याचे वेगवेगेळे प्रका र आहते, उदाहरनिर्वाह साठी पशु मारणे हि जर ऍनिमल कृअल्टी असेल तर मग शाकाहारी बनने एवढा एकाच पर्याय शिल्लक राहतो ...
२) पशुहत्या तर थांबवता येत नाही मग करावयाचे काय ? ती करताना त्याला कमीत कमी त्रास व्हावा हे एक उद्दिष्ट ठेवून मास विक्रेत्यांनी काही पाऊले उचलली आहेत जगभर , काही देशात ती जास्त चांगली पद्धतीने राबवली गेली आहेत तर का ही ठिकाणी कमी
उदाहरण : इंडोनेशिया ला बीफ आणि अरब देशांना बिफ आणि मेंढया मोठ्या प्रमाणात ऑस्ट्रेलयातून निर्यात केल्या जातात , त्यात २ प्रकार असतात , १) जिवंत प्राणी बोटी द्वारे कीवा २) कापून त्याचे मास ,
यात २) प्रकारचे महाग पडते पण कत्तलीचं दृष्टीने बघितले तर तंत्रन्यान वापरून आणि जमले तर झटका पद्धतीने ( जमले तर असे म्हणले कारण कि या देशांना फक्त हल्ला लागते त्यामुळे झटका शक्य नाही ) येथील कडक नियमनप्रमाणे कत्तल केली जाते त्यामुळे "कत्तली चे " स्वरूप भयाण नसते ... त्यामुळे काही बोला बाला होत नाही , बोलबाला होतो झालं कुठे तर , हे प्राणी जेव्हा बोटीने निर्यात केले जातात, त्या वेळी , त्या प्रवासात होणारे त्यांचे हाल आणि त्या देशात गेल्यावर तेथील कत्तल खाण्याची गैरवयवस्था ... इत्यादी
असो
३) पशु निर्माण: अंडी कुठली पाहिजेत , पिंजऱ्यातली कोंबडीची कि झोपडी ( बार्न ) मधील कि अगदी मोकळी असलेली कोंबडी तिची? तसेच गाय मेंढी च्या बाबतीत , पॆसे द्याल तशी मिळणार
४) सनासुदीला अशी उलाढाल वाढते मग ती बकरी असो कि दिवाळी ला मिठाई असो .. साखर खाण्याचे प्रमाण वाढतेच ना मिठाईने ,,,आणि त्यातून साखरेचे नुकसान होत नसले तरी माणसाचे होतेच कि !
घाऊक प्रमाणत बकरी मारण्याचे कार्य आणि घाऊक प्रमाणात बुंदी पाडण्याचे कार्य यात फरक आहे
तेव्हा तात्पर्य काय कि कोणत्याही गोष्टींचाच अति पण नको ,
कंकाका । चौकस२१२ । कर्नलतपस्वी
प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
चौकस भाऊ तुम्ही उपस्थित केलेले मुद्देही रास्त आहेत आणि त्यातल्या बहुतेक समस्यांचे मूळ हे 'भावनाप्रधानता' आहे असे माझे वैयक्तिक मत!
केवळ भावनांवर जगरहाटी चालत नाही, ती सुरळीत चालण्यासाठी मानवाच्या कित्येक कृती प्रसंगी कितीही निर्दय, निष्ठुर वाटत असल्या तरी त्या 'व्यावहारिक' बाजू विचारात घेऊन केलेल्या असतात. हे वास्तव आणि त्यामागची अपरिहार्यता स्वीकारण्याची अनेकांची मानसिकता नसणे हे त्या समस्यांमागचे क्रमांक एकचे कारण असावे असे मला वाटते!
माणसाने उदरनिर्वाहा साठी पशुहत्या थांबवणे शक्य नाही, जवळ जवळ सर्व धर्मांत मांसाहारी व्यक्ती आहेत त्यामुळे मांसाहारी कि शाकाहारी हा वादही अनंत काळापर्यंत चालणार हे देखील मान्य. कोणी काय खावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यात ढवळाढवळ करण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्यामुळे आस्तिक-नास्तिक वादाप्रमाणेच हा वादही निरर्थक आहे हे दोन्ही बाजूंनी समजून घेतले पाहिजे!
'अॅनीमल कृएल्टी' हा मुद्दा ऐरणीवर येऊन जोर धरू लागल्यावर पशुहत्या तर थांबवता येत नाही, पण ती करताना जनावराला कमीत कमी त्रास होईल ह्यासाठी त्यावर अविरत शास्त्रीय संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जगभरातील कत्तलखाने करत आहेत हि निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. त्यासाठी थोडे अवांतर वाटले तरी त्या संशोधनात भारतीय संशोधक श्री. सी.व्ही. रामन ह्यांनी शोध लावलेल्या 'Raman spectroscopy' ह्या तंत्राचा वापर झालेला असल्याने कुक्कुटपालनातील (फार तांत्रिक तपशिलात न जाता) एक उदाहरण द्यायचा मोह टाळता येत नाहीये.
व्यावसायिक शेळीपालन जसे 'दुग्धोत्पादन', 'मांस उत्पादन' आणि 'जेनेटिक्स' वर लक्ष देऊन शुद्ध वंशाच्या जातिवंत शेळ्या/बोकडांची पैदास करणे असे तीन स्वतंत्र प्रकारे केले जाते, त्याचप्रमाणे व्यावसायिक कुक्कुटपालनही 'अंडी उत्पादन' आणि 'मांस उत्पादन' अशा दोन स्वतंत्र प्रकारे केले जाते.
हॅचरीमध्ये उबवण्यासाठी ठेवलेल्या अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या नर आणि मादी कोंबड्यांचे प्रमाण जवळपास समसमान असते. त्यामुळे व्यावसायिक 'अंडी उत्पादन' ह्या उद्देशाने कुक्कुटपालन करणाऱ्यांना एक फार मोठी समस्या भेडसावत होती. त्यांच्यासाठी मादी कोंबडी उपयुक्त तर नर कोंबडे उपयोगशून्य असल्याने आणि त्यांच्या दाणा-पाण्यावर अतिरिक्त खर्च करून त्यांना मांस उत्पादनाकरता तयार करण्यासाठी वेळ आणि जागेची उपलब्धता नसल्याने जन्माला आल्या आल्या त्यांना मुंडी पिरगाळून किंवा ऑक्सिजन विरहित गॅस चेंबरमध्ये ठेऊन अत्यंत क्रूर आणि अनैतिक पद्धतीने ठार मारण्यात येत असे.
ह्यातली 'अॅनीमल कृएल्टी' टाळण्यासाठी अंड्यातुन बाहेर पडणाऱ्या पिल्लाचे लिंगनिदान करण्यासाठी सुरुवातीला अंड्याच्या आकारावर आधारित एक साधी सोपी अशी 'शेप इंडेक्स - (SI)' हि पद्धत शोधण्यात आली. आडव्या धरलेल्या/ठेवलेल्या अंड्याचा आकार थोडासा उभट आणि लंबगोल असेल तर त्यातुन कोंबडी जन्माला येण्याची शक्यता अधिक आणि तो जर एका बाजूने निमुळता गोलाकार तर त्यातून कोंबडा जन्माला येण्याची शक्यता अधिक.
वरील आकृतीत डाव्या अंड्यात कोंबडी तर उजव्या अंड्यात कोंबडा असण्याची शक्यता जास्त.
हि पद्धत बिनखर्चिक असली तरी त्यातून होणाऱ्या लिंगनिदानाही अचूकता ७५% इतकी मर्यादित होती. तिची अचूकता आणखीन वाढवण्यासाठी दोन टर्किश संशोधकांनी शेप इंडेक्सच्या जोडीला Raman spectroscopy वर आधारित असलेल्या इमेज प्रोसेसिंग यंत्राचा वापर करून ती जवळपास ८१ टक्क्यांपर्यंत वाढवली. आता ह्या दोन्ही पद्धतींना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची (AI) जोड देऊन १००% अचूकता गाठण्यासाठी संशॊधन सुरु आहे. त्यातून अनावश्यक जीव जन्माला न येता अशी अंडी हॅचरीत घालण्या ऐवजी बाजारात विक्रीसाठी पाठवून अंडी उत्पादक कुक्कुटपालकांचे होणारे संभाव्य नुकसान आणि जिवहत्या दोन्ही टाळणे शक्य होईल.
जाता जाता : आजघडीला मानवजातीच्या अन्नाची गरज म्हणून व्यावसायिक स्तरावर अंडी किंवा मांस उत्पादनासाठी केले जाणारे मग ते कुक्कुटपालन असो कि शेळीपालन त्याकडे एक 'अन्ननिर्मिती उद्योग' ह्या दृष्टिकोनातून पाहिले जावे. सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे भावनाप्रधान लोकांना हे स्वीकारणे थोडे अवघड जाईल आणि त्यांचे एकवेळ समजून घेता येईल, पण आपण विज्ञाननिष्ठ, पुरोगामी वगैरे असल्याच्या मोठमोठया गप्पा मारणाऱ्या (पण प्रत्यक्षात सर्वात जास्त प्रतिगामी मानसिकता असणाऱ्या) लोकांनाही ते जड जाते हे आपल्या समाजाचे दुर्दैव म्हणायचे, अजून काय 😀
+१
वेगळ्या बाजूची ओळख करुन देणारा उत्तम लेख.
बाकी भारतातल्या मोठ्या कत्तलखान्यांपैकी काही कत्तलखाने किंवा मोठे मांस निर्यातदार हे जैनांचे आहेत असे ऐकिवात आहे.
हो, त्याबद्दल फारशी माहिती नाही पण 'अल-कबीर' की अशाच काहीशा नावाचा मोठा बीफ निर्यात उद्योग आणि कत्तलखाने जैन-सबरवाल बंधूंच्या मालकीचा असल्याचे माझ्याही वाचनात आले होते. अर्थात भारतात गोवंश हत्याबंदी असली तरी रेड्यांच्या कत्तलीवर बंदी नाही, आणि आपल्याकडे गोमांस आणि रेड्याचे मांस हे दोन्ही 'बीफ' म्हणूनच ओळखले जाते. (त्या बाबतीत नेपाळ बरा, तिथे रेड्याच्या मांसाला 'बफ' म्हणतात. बफेलो मीट=बफ) पण त्यामुळे अनेक लोकांचा गोंधळ उडतो आणि मग गोवंश हत्याबंदी आणि गोमांस विक्रीला बंदी असताना भारतातून 'बीफ' कसे काय निर्यात होते असा प्रश्नही अनेकांना पडतो. पण बैल असो कि रेडा त्याची कत्तल आणि मांस निर्यात करणे हे अहिंसेचे अतिरेकी ढोल पिटणाऱ्या जैन समाजातील व्यावसायिकांना अशोभनीयच.
आणि ह्याच नव्हे तर कित्येक अनैतिक/अवैध धंद्यात ह्या समाजातील लोक आघाडीवर आहेत, मग ती तस्करी असो, हवाला रॅकेट असो, मटका, क्रिकेटचे बेटिंग घेणे किंवा पत्ते खेळण्यासाठीचे जुगारी क्लब चालवणे असो. इतकेच काय जवळपास दीड दशकापूर्वी वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी माध्यमांवर प्रचंड चर्चेत असलेल्या 'पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण' ह्या अठरा वर्षांपूर्वीच्या आणि अजूनही न्यायप्रविष्ट असलेल्या हाय-प्रोफाइल मर्डर केस मधला एक प्रमुख पण माफीचा साक्षीदार बनलेला आरोपी 'पारसमल जैन' हा तर डोंबिवलीला माझ्या घरापासून एक गल्ली सोडून पुढच्या गल्लीत राहायचा. रस्त्यात जाता-येता कित्येकदा भेटणारा हा मनुष्य छंदीफंदी असला तरी थेट इतक्या मोठ्या व्यक्तीच्या खुनाची सुपारी घेतल्याच्या आरोपात तुरुंगात जाऊन पडेल (तो अजूनही तुरुंगातच आहे) असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते.
असो, उडदामाजी काळे गोरे असले तरी "धंदेबाजी और फांदेबाजी मैं उनका धरम बीच मैं नही आता" आणि 'सब गंदा हैं पर धंदा हैं ये...' असेच म्हणायचे, अजून काय 😀
लेख आवडला
लेख आवडला. मी भूतदयाळू आहे. पण मटणाची टेस्टच इतकी जबरजस्त लागते की सुटतच नाही.
म्हणजे जिवंत बोकडाचं भूत झाल्याशिवाय तुमचा दयाळूपणा व्यक्त होत नाही!
:)
चला किमान एकातरी मुद्द्यावर आपली सहमती होत आहे हे पाहुन आनंद वाटला :)
मटन , मग ते ईद चे हलाल केलेले असो की देवीला बळी दिलेल्या बोकडाचे असो, की यज्ञात बळी दिलेले असो की जत्रेतील असो की हाटेलातील असो, काहीही निशिध्द नाही. =))
ह्या निमिताने आमच्या जुन्या लेखाची रिक्षा फिरवतो ;)
(इच्छामटण)
https://www.misalpav.com/node/32722 :)
आमचा एक शालेय वर्गमित्र एका धंद्यात आहे.
कत्तल केलेल्या प्राण्यांचे रक्त विकणे. पूर्वी यात कुणी पडत नव्हते. ( कृ फार विचारू नका याबद्दल)
मारलेल्या जनावराचे रक्त गोळा करुन मग ते एका पसरट भांड्यात वाळवतात. मग त्याच्या वड्या पाडून त्या खातात. त्याला
बहुतेक रक्ती म्हणतात.
मुक्त विहारि । पॅट्रीक जेड
प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
ओके... नाही करत त्यावर विचार 😀
पण तुमच्या शालेय वर्गमित्राकडून हे रक्त खरेदी करणारे ग्राहक त्याचा काय उपयोग करत असतील ह्याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. वरती पॅट्रीक जेड ह्यांनी सांगितलेला एक उपयोग ऐकून आहे, पण त्यासाठी असे घाऊक प्रमाणात कोणी रक्त विकत असेल आणि विकत घेत असेल असे वाटत नाही, त्यामुळे त्याचा कुठल्या वस्तुच्या औद्योगिक उत्पादनात किंवा रासायनिक प्रक्रियेसाठी वापर होत असल्यास तो सांगून मज उपकृत करावे!
औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या मोठ्या कत्तलखान्यांतून घाऊक प्रमाणात रक्त विकत घेतात.
ज्या ज्या औषधांमध्ये लोह हा घटक आवश्यक असतो त्यांच्या निर्मितीसाठी हे रक्त वापरले जाते.
कंजूस काकांनी माहिती देण्यात कंजूसी केली पण आमच्या गुगल काकांनी ती सढळहस्ते दिली हो 😀
रिसर्चगेट वर त्यासंबंधी मिळालेली माहिती...
Uses of animal blood in various industries:
Food Feed - Emulsifier, stabilizer, clarifier, colour additive, nutritional component.
Lysine supplement, vitamin stabilizer, milk substitute, nutritional component.
Fertilizer - Seed coating, soil pH stabilizer, mineral component.
Laboratory - Tissue culture media, tannin analysis, active carbon, haemin, blood agar, peptones, glycerophosphates, albumins, globulins, sphingomyelins, catalase.
Medicine - Agglutinin test, immunoglobulins, fractionation techniques, blood clotting factors, sutures, fibrinogen, fibrinolysin, fibrin products, serotonin, plasminogen, plasma extenders.
Industry - Adhesive. resin extender, finishes for leather and textiles, insecticide spray adjuvants, egg albumin substitute, foam fire extinguisher, porous concrete, ceramic and plastic manufacturer, plastic and cosmetic base formulations.
वरीलपैकी कुठल्या ना कुठल्या गोष्टी/वस्तूंचा आपण नकळतपणे वा अप्रत्यक्षपणे वापर करत असतो. मग पेटा वाले, वेगन, अहिंसा आणि शाकाहाराचे अतिरेकी समर्थन करणाऱ्या मंडळींना अशा गोष्टी/वस्तूंचा वापर करणे निषिद्ध आहे का? असा एक बाळबोध प्रश्न पडला आहे!
बोकड बळीवर इतकी साधक बाधक वैज्ञानिक/सैद्धांतिक बेसची चर्चा होऊ शकते हे मला पटलच नसतं:);)
भारीच की टर्मिनेटर!
बाकी तुम्ही आपलेच लोक आहात म्हणून सांगते :) ईददरम्यान आम्ही सं.नगरला होतो ,तिथे शिरताच तिथे रोडवरच कत्तलखाने पाहून माझ्या लेकीने रडारड सुरू केली,लगेच घरी चल मला हे शहर आवडले नाही घोषा लावला.तिने हे पहिल्यांदाच पाहिलं.
संभाजी नगरात रस्त्यावर कत्तलखाने आहेत? 'लाहौल विला कुव्वत' 😂
पहिल्यांदा अशी दृश्ये पाहताना भल्या भल्या लोकांची हवा गुल होते, तुमची लेक तर लहानच आहे त्यामुळे तिची मन:स्थिती बिघडणे आणि ते शहर न आवडणे अगदी स्वाभाविक आहे!
“आपण” नव्यानेच जवळ गेलो त्या इस्राईलमध्ये देखिल हलालच मांस चालते म्हणून जरा मुस्लिमांबद्दल कमी ओरड झालीय. नाही तर काही खरं नव्हतं. बाकी झटका बरा की हलाल हे एकच प्राणी सांगू शकतो तो म्हणजे दोन्ही प्रकारे कत्तल झालेला बोकड आणि तत्सम. पण त्याला बोलता येत नाही ही पण एक अडचणच आहे.
दोन्ही प्रकारे कत्तल झालेला बोकड आणि तत्सम
मुळात मेलेला बोकड कसे काय सांगणार हा प्रश्न अधिकच मूलभूत आहे.
त्याला बोलता येते का नाही हा प्रश्न दुय्यम आहे.
कारण बोकडाची भाषा जाणणारे असू शकतील
पण मेल्यावर बोकड बोलू शकत नाही हे सत्य
LOL
compartmentalization आणि rationalization याचा लगेच प्रत्यय आला. आपले आदर्श नेते, पुज्यनीय असलेली विचारसरणी याचा पुरस्कार करण्यासाठी कितीही हीणकस वागायचं म्हटलं तरी आपण मागे हटत नाही.
@सर टोबी
कोणत्याही धाग्यावर किंवा विषयावर मोदी द्वेषाची गरळ ओकल्याशिवाय आपल्याला अन्न पचन होत नाही का?
समझा आपण (म्हणजे वाचक) ह्याना मरणासाठी दोन पर्याय दिले. हलाल आणी झटका. तर कुठला पर्याय निवडाल?
माझ्यासारख्या मांसाहार वर्ज्य नसला तरी त्याची विशेष आवड नसलेल्या माणसाला 'हलाल' आणि 'झटका' अशा कुठल्याही पद्धतीने कत्तल झालेल्या कोंबडी. बोकड किंवा अन्य कुठल्या प्राण्याचा मांसाच्या चवीत काय फरक असतो किंवा तसा काही फरक असतो कि नसतो वगैरे बद्दल अजिबात ज्ञान नाही. पण ह्या दोन्ही पैकी कुठल्या पद्धतीने कत्तल केली असता त्याला कमी वेदना होतात ह्याविषयीचा एक रिसर्च पेपर मागे वाचनात आला होता त्याचा सारांश काहीसा असा होता...
'हलाल' आणि 'झटका' अशा दोन्ही पद्धतीने विविध प्राण्यांची कत्तल केली जात असताना त्यांच्या शरीराला जोडलेल्या ECG आणि कुठलया कुठलया वैद्यकीय उपकरणांवर झालेल्या अनेक नोंदींचा अभ्यास केल्यावर हलाल पेक्षा झटका पद्धत हि कमी वेदनादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता.
हलाल पद्धतीत सूरी फिरल्या फिरल्या सुरु झालेला रक्तस्त्राव, प्रतिक्षिप्तक्रियेने मेंदूकडून रक्तस्त्राव थांबवण्यासाठीच्या दिल्या गेलेल्या संकेतांमुळे रक्त गोठणे/साकळण्याची प्रक्रिया सुरु होऊन प्राण्याची शुद्ध हरपण्यास लागणारा कालावधी काहीसा वाढून त्याचे प्राण जाण्यासही थोडा विलंब होत असल्याने त्याला अधिक काळ वेदना सहन कराव्या लागतात. लहान प्राण्यांपेक्षा मोठ्या प्राण्यांमध्ये हा कालावधी आणखीन वाढतो.
त्याउलट झटका पद्धतीत मेंदू आणि शरीराच्या बाकी अवयवांचा संपर्क तात्काळ तुटल्याने वर उल्लेख केलेल्या गोष्टींसाठी लागणारा कालावधी कमी होत असल्याने प्राण गमावताना त्या प्राण्याला वेदनाही कमी होतात अशी काहीशी त्यामागची कारणे/निरीक्षणे त्यात दिली होती. आता सर्व गोष्टी नीटशा आठवत नसल्याने तपशिलात कमतरता तर आहेच पण काही चूकभूलही झाली असल्यास त्यासाठी क्षमस्व!
कुमार१ यांनी या दोन्ही प्रकारची तुलना करून वेदना कमी होण्यासाठी कोणतीही पद्धत आदर्श वा अतिशय क्रूर असा काही फरक करता येणार नाही असं काहीसं वाचल्याचं आठवतंय. बाकी नविन आणि आदर्श मित्राला आवडतंय म्हटल्यावर विरोध कमी होतोय हा युक्तिवाद मान्य असल्याबद्दल बरे वाटले.
“एक बार इज़राइल जाके देखना है ऐसा क्या है उस मिट्टी में की एक भी देशद्रोही पैदा नहीं होता” हे पण एक कारण असावे.
कुमार सरांच्या ज्ञानाबद्दल अजिबात शंका नाही, त्यांनी असे लिहिले असल्यास त्यात नक्कीच तथ्य असेल. मी जे वाचले होते आणि त्यातले जेवढे आठवले तेवढे प्रतिसादात लिहिले, तसेच तपशिलात कमतरता असल्याचे आणि चूकभूल होण्याची शक्यता असल्याचेही मान्य केलेले आहे. आणि हलाल असो कि झटका त्यात मला काडीचाही रस नसल्याने त्याविषयी अधिक माहिती मिळवण्याचा कधी प्रयत्न केला नाही, आणि पुढेही करण्याची शक्यताही नाही!
बाकी आपलया प्रतिसादातील पुढची वाक्ये पार डोक्यावरून गेली. त्याविषयी थोडे इस्कटून सांगितलेत तर समजायला सोपे जाईल म्हणतो!
इस्राईलचा उल्लेख मी नविन मित्र म्हणून करतोय. ज्यु लोक देखील हलालचे नियम कडकपणे पाळतात आणि म्हणून बकरीदसाठी होणाऱ्या कुरबनीची चर्चा थोडया सौम्य पद्धतीने होतीय.
इस्राईल भारतातील विद्यमान राजवटीच्या समर्थकांचा आदर्श आहे. त्यासाठी फेसबुक मधून आलेली ओळ मी शेवटी उधृत केली आहे.
बाकी मेंदू रक्त साकळण्याचा संदेश देतो हे अविश्वसनीय आहे. हवेशी संपर्क झाला की रक्त साकळते. काही तरी जीवघेणं घडलंय आणि तिथून पळ असा संदेश मेंदू देईल की रक्त साकळण्याचा संदेश देईल?
ज्यु लोक देखील हलालचे नियम कडकपणे पाळतात कोशर
अच्छा म्हणजे नको असलेली राजवट कितीही आटापिटा करूनही तिसऱ्यांदा आल्याच्या दुःखातून, राजकारणाशी दुरान्वयेही संबंध नसलेल्या धागाचर्चेत राजकीय संदर्भ आडून आडून घुसवून, तसेच हलाल आणि झटका ह्याबद्दलच्या माझ्या अज्ञानाचा आणि त्या प्रतिसादातील कमतरता, चूकभूल ह्यांचा वारंवार उल्लेख करूनही पुन्हा त्याच विषयीच्या कुशंका उपस्थित करून चर्चा भरकटवण्याचा कुटील हेतू अखेर उघडकीस आला म्हणायचा 😀
असो, उगाच खुसपटे काढत बसण्यापेक्षा तुमच्याकडे हलाल आणि झटका बद्दल काही शास्त्रीय/विश्वसनीय माहिती असल्यास ती जरूर द्यावी, मला त्यात काडीचाही रस नसला तरी ज्यांना असेल त्यांच्या तरी उपयोगी पडू शकेल.
धन्यवाद!
टर्मिनेटर भाऊ तुम्ही अगदी चागळे पकडले या जेड ला....इस्राएल जुना नवा मित्र याचा इथे काहीच संबंध नाही ...
" जेड" ला मोदीद्वेषाचे "येड" लागलाय असे आम्ही तूर्तास जाहीर करतो ....अ. बा . या व्यत्क्तिमत्वाची सावली दिसते जेड साहेबाच्यात
जिथे तिथे मोदी
असो
एकदा एका फार्म हौस वर ( पाश्चिमात्य देशात) एक शेतकरी बेकायदा मास विकायांचा आणि त्यावेळी त्या देशात बोकड/ शेळी चे मास सहजसहजी मिळत नसे ( मेंढी मेंढा भरपूर) म्हणून भारतीय लोक त्या फार्म हाऊस ला जायचे ,, तेवहा त्यातील काहीना हलाल पाहिलेज असल्याचने आणि बहुतेक चिनी हॉटेल वाले जे बीफ घ्य्याला यायःचे त्यांना काही फरक पडायचा नाही ,, तर "हलाल " पाहिजे असलेल्यां तो बोकड गळा चिरून ठवून द्यायचा आणि बैल मात्र बंदुकीने मेंदूत झटक्यात गोळी ने मारायाचा
दोन्ही प्रकारात जनावराला एकूण वातावरण बघून कत्तलीचा अंदाज आलेला..भेसूर अस्यायचे पण त्यातल्या त्यात गोळीने मारणे कमी क्रूर वाटायचे
पण एकूणच तो शेतकरी हे बेकायदा करीत असलयामुळे सगळेच वातावरण जास्त भयानक वाटायचे
धंदेबाजी और फांदेबाजी मैं उनका धरम बीच मैं नही आता" आणि 'सब गंदा हैं पर धंदा हैं ये
इतर वेळेस पापभिरू असणारा माणूस टोकाची फसवाफसवी कशी करू शकतो याचे मानसशास्त्रीय दृष्ट्याविश्लेषण COMPARTMENTALISATION आणि RATIONALISATION (समर्थन) या दोन बाबींनी करता येते.
COMPARTMENTALISATION म्हणजेच माणूस मनाचे कप्पे तयार करतो. आणि या कप्प्यातील बाबी त्या कप्प्यात जाणार नाहीत याची काळजी घेतो.
यामुळे तो मनाचा आंतरिक संघर्ष टाळू शकतो आणि येणारी मानसिक अशांती थोडी फार तरी कमी करतो. यात धंदा आणि त्यासाठी करावी लागणारी फसवा फसवी हि मनाच्या एका कप्प्यात टाकून तो कुलूपबंद करतो म्हणजे बाकी व्यवहारात त्या विचारांमुळे येणार संघर्ष टाळता येतो.
बीफ निर्यात करणारा माणूस प्रत्यक्ष व्यवहारात मुंगी सुद्धा मारणार नाही शुद्ध शाकाहारी असून कांदा लसूण सुद्धा खाणार नाही रोज मंदिरात अनवाणी जाऊन पूजा करताना दिसतो. पण धंद्याच्या कप्प्यात गेलात तर आपला धंदा वाढवण्यासाठी प्रतिस्पर्ध्याच्या खून सुद्धा करू शकतो.
आणि यातूनच "सब गंदा हैं पर धंदा हैं ये" असे समर्थन करताना दिसते.
याशिवाय RATIONALISATION म्हणजेच तर्कसंगती लावणे किंवा समर्थन करणे हा त्याचाच उपप्रकार आहे.
यात बहुसंख्य भ्रष्ट सरकारी अधिकारी येतात. येणार पैसा तर हवा असतो पण तर्कसंगती लावून त्याच्या पापाची किंवा गुन्ह्याची तीव्रता कमी करून स्वतःचे मानसिक समाधान करण्याचा प्रयत्न असतो. उदा. सरकारी खात्यात असे करावेच लागते, मी नाही केलं तर दुसरा कोणी तरी करणारच आहे, इतर लोक करतात त्यापेक्षा मी कितीतरी कमी करतो. इ इ
तुम्ही कितीही गुन्हे केलेत तरी तुम्ही कलमा पद्धत असाल तर तुम्ही कोणत्याही काफ़िरांपेक्षा श्रेष्ठ आहात हे याच एक उच्च उदाहरण आहे. यामुळे मुस्लिम समाजात क्रूरपणा आणि गुन्हेगारीचे समर्थन मोठ्या प्रमाणात झालेले आढळते. ( हा मुद्दा अतिशय वादाचा आहे हे गृहीत धरूनच मी इथे लिहीत आहे)
अर्थात COMPARTMENTALISATION आणि RATIONALISATION हे आपल्याला सामान्य माणसे सुद्धा सहज करताना आढळतात.
सगळेच लोक करतात म्हणून मी खोटे मेडिकल सर्टिफिकेट देतो पासून इतर लोक हेल्मेट घालत नाहीत किंवा इतर लोक सुद्धा सिग्नल पाळत नाहीत किंवा सगळंच करतात म्हणून मी परीक्षेत कॉपी करतो हि RATIONALISATION ची सर्वत्र आढळणारी उदाहरणे आहेत.
माणूस आंतरिक (मानसिक) संघर्ष टाळण्यासाथ इया दोन गोष्टींचा उपयोग करतो. कारण सर्व धर्मांमध्ये खोटे बोलू नये दुसऱ्याला त्रास देऊ नये स्वार्थी पणा करू नये अशा शिकवणी दिल्या जातात. असे मानसिक संघर्ष प्राण्यांमध्ये नसतात.प्राणी हे प्रच्छन्नपणे स्वार्थी असतात. सिंह सुद्धा दुसर्यां प्राण्यानी केलेली शिकार (सिंहिणीने केलेली सुद्धा) कोणताही दुजाभाव न ठेवता बळकावताना दिसतो. बळी तो कान पिळी हाच जंगलचा कायदा आहे. दुसऱ्याच्या घरात बिळात जबरदस्तीने शिरणे दुसऱ्याची शिकार बळकावणे दुसऱ्या नराच्या मादीवर आपला हक्क सांगणे दुसऱ्या नराची पिल्ले मारून टाकणे अशा गोष्टी सर्रास कोणताही मानसिक संघर्ष न होता प्राणी करताना आढळतात
मुळात माणुस पण स्वार्थी आहे परंतु प्रामाणिकपणा सहिष्णुता निस्वार्थीपणा या गोष्टी सद्गुण आहेत हे शिकवले गेल्याने मानसिक संघर्ष उभा राहतो. मग यावर उपाय काय म्हणून मानवाने COMPARTMENTALISATION आणि RATIONALISATION असे काही मानसशास्त्रीय उपाय शोधून काढलेले आहेत.
क्रमश:
सुंदर विवेचन!
पहिला कुठल्याशा हिंदी डब्ड तेलगू चित्रपटातला एक संवाद आणि दुसरा 'कंपनी' ह्या हिंदी चित्रपटातील एका गाण्याचा मुखडा इथे काहीशा वेगळ्या संदर्भाने वापरला होता. पण हरकत नाही, आपण केलेले त्यांचे मानसशास्त्रीय विश्लेषण छान आहे, आवडले 👍
पुढचा/पुढचे भागही लवकर येउद्यात! धन्यवाद.
RATIONALISATION यातील एक अजून प्रकार जाणवलेला म्हणजे , "आम्ही गुरुवारी आणि शनिवारी ( उदाहरण ) अजिबात मासाला हात लावत नाही" ( पण बाकी दिवशी चोपून खातो ..) " नौरात्र कडक असते हो आमच्य्यात" पण सण संपला कधी एकदा बोकड आणायला जातोय असे होते ह्यांना
त्यामुले मी बऱयापैकी खादाड आणि मांसाहारी असलो तरी जे खरंच १००% शाकाहारी आहेत आणि त्याचा गवगवा करीत नाहीत त्यांना माझे कडून २ गुण जास्त असतात .. असो
उत्तम विवेचन केले आहे. 'क्रमशः' मुळे आणखी पुढले वाचायची इच्छा बळावली आहे. अनेक आभार.
टर्मीनेटर,
इथे युरोपात मेंढ्याचं रक्त पुडिंगमध्ये वापरतात. विशेषत: नाताळाच्या पुडिंगात. भारतात बोकडाचं रक्त वापरण्याजोगं असावं असा अंदाज आहे.
-नाठाळ नठ्या
युरोपात पुडिंगमध्ये मेंढ्याचं रक्त वापरतात? 😕
युक्स... आता पुन्हा तिकडे जाणे झाल्यास पुडिंग कधीही खाणार नाही!
माहितीसाठी आभारी आहे 🙏
प्याजे,
शब्द बरोबर आहे. त्यास रक्ती वा रत्ती म्हणतात. रक्त वाळवून भुगा करतात. मग त्यात बरंच बेसन आणि मसाले मिसळतात आणि वड्या थापतात. नंतर त्या बहुधा तळून वा भाजून काढतात. मला तो पदार्थ विशेष आवडला नाही.
-नाठाळ नठ्या
अतिगरीब अशा मुस्लिम आणि दलित समाजातील लेखकांच्या लेखनात तत्सम पदार्थांचे उल्लेख आढळतात.
अतिगरीब अशा मुस्लिम आणि दलित समाजातील
गरिबीमुळे मटण विकत घेणे परवडत नाही
पण चवीसाठी गरीब माणसं खाटिकाकडून साकळलेलं रक्त आणि हाडं अतिशय स्वस्तात विकत घेऊन जातात आणि त्यात बेसन ज्वारीचे बाजरीचे (गिरणीत इतस्ततः पडलेले पीठ अधिक स्वस्तात विकत घेऊन) पीठ मिसळून विविध पदार्थ तयार करून खातात.
याशिवाय खाटिकाकडून हाडं, खूर इ सामान्यतः टाकाऊ समजलेले पदार्थ स्वस्तात विकत घेऊन ते उकळून त्यात आलं लसूण मिरची घालून रस्सा बनवतात आणि तो भाकरी/ भाताबरोबर खातात.
गरिबी हा एक शाप आहे आणि शिक्षण हा त्यावरील एकमेव उ:शाप आहे
गरिबी हा एक शाप आहे आणि शिक्षण हा त्यावरील एकमेव उ:शाप आहे +१ :(
वाचुन अंगावर काटा आला!
या पेक्षा हि पुढचे म्हणजे
फिलिपिन्स मध्ये पण के एफ सी सारखया कोंबडीचे पदार्थ विक्रय दुकानातील उष्टे आणून त्याला उकळून परत पिठात कालवून तळुन विकले जाते अति गरीब वस्तीत .. त्याला "पग पग चिकन " असं म्हणतात
विडोओ ची लिंक देत नाही बघवणार नाही
आणी त्यावर झालेली सांगोपांग चर्चा वाचल्यावर मलातर असे वाटू लागले आहे की मी फक्त बकऱ्या सारखे गवत खावे जे कदाचित शुद्ध शाकाहारी असेल.
कच्चे गवत थेट खाल्लेत तर ते "शुद्ध शाकाहारी" असण्याची शक्यता जवळपास शून्य राहील कारण त्यावर असलेले पण मानवी डोळ्यांना न दिसणारे अगणित सूक्ष्मजीव, जंतांची आणि अन्य कृमी-कीटकांची अंडी वगैरे वगैरे. त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ते गवत नुसते धुवून काम भागणार नाही, त्यासाठी ते चांगले उकडून किंवा गेला बाजार ७० अंश से. तापमानावर सुमारे तासभर गरम करून मग खावे लागेल. अर्थात ह्या प्रक्रियेने ते गवत जीवजंतू आणि अंड्यांपासून मुक्त होईल, पण त्यात झालेल्या हिंसेतून कोट्यवधी सूक्ष्मजीवांच्या हत्येचे जे पाप लागेल त्याच्या परिमार्जनाचीही तयारी ठेवावी लागेल 😀
आसेच इतक्या पापांचे घडे भरले आहेत की यमलोकात न नेता परस्पर इहलोकातच पापक्षालन (की आणखी पाप करण्यास) करण्यास पुनर्जन्म मिळणार आहे.
खरे तर आजकाल अशा बातम्या येत आहेत की काय खावे याचाच प्रश्न पडलायं.
आईस्क्रीम सोडले. झोमॅटो,स्वीगी बंद केले.
घरच्या घरीच अंबेमोहर तांदळाचा भात,घरचे तुप आणी मेतकूट खातो.
आता बकऱ्यां बद्दल, नोकरीत असताना जिवंत, मृत दोन्हीशी संबध आला पण कधी खाल्ले नाहीत.
बिचारे बकरे....
त्यांच्यावर चार शब्द आपण लिहीलेत, नक्कीच त्यांचे आशीर्वाद तुम्हांस भेटतील.....
अवांतर :
टर्मीनेटर,
माझ्या मते व्यभिचार', 'कामुकता', 'लंपटता', 'अश्लीलता', 'विषयासक्ति' वगैरे म्हणजेच अरबस्थानातलं living well आहे. अरबी स्वर्गाची एकेक वर्णनं ऐकली असतील तुम्ही.
-नाठाळ नठ्या
हा हा हा... Good Joke!
आपण कोट केलेल्या वाक्यांच्या पुढचा हा परिच्छेद वाचायचा राहिला का 😉
तुम्ही वेगळे ते सांगायचं राहून गेलं! मी तुम्हांस नेहमी व्हाईट नजरेनेच बघतो! ;-)
-ना.न.
हे वाचून आनंद झाला 😀 असाच लोभ कायम असावा 😂
थांबून थांबून लिहिता पण आपण भारी लिहिता !
लेखन शुभेच्छा !
व्व्वा, छान.
व्यावहारीक आणि तर्क्कशुध्द विच्छेदन आवडले. भक्ती, श्रध्दा वगैरे पट्ट्यांवर ते टिकत नाही हे ही आहेच.
पण जैनांच्या काही प्रथा शब्दशः इतक्या सुप्परस्ठार (श्रेयः अल्लूर्जुन) असतात की बस्स. वाहन न वापरता रस्त्यावरुन चालत जाणे, अगदी वयोबृध्द साध्वी पण व्हील्चेअरवरुन लांब लांब अंतरे पार करणे मग त्यांना सोबत आणि एस्कॉर्ट म्हणून अगदी गर्भश्रीमंतांनी टप्प्याटप्प्याने साथ देणे, त्यासाठी रस्ता आडवणे. कृत्रिम प्रकाश नाही, त्यांच्या त्या दीक्षा, त्यासाठीची कारणे, त्यांच्या जीवनपध्दती, केशलुंचन, संथारणा आणि त्यांचे भक्त वगैरे एकेक नवलच आहेत.
ह्यातलेच एक नवल म्हणायचे अन काय.
बिपीन सुरेश सांगळे । सुरिया
प्रतिसादांसाठी आपले मनःपूर्वक आभार 🙏
अगदी अगदी...
किशोर किंवा तरुणवयीन मुला-मुलींनी दीक्षा/संन्यास घेणे हे त्या समाजात तसे नवीन नाही, पण आता अशा दीक्षा सोहळ्याचाही भव्य दिव्य 'इव्हेंट' केला जाऊ लागलाय! सात-आठ महिन्यांपूर्वी एका गर्भश्रीमंत घरातील वीस-बावीस वर्षीय तरुणीने 'संन्यास' घेण्याचा निर्णय घेतल्यावर खास 'प्री-दीक्षा' फोटोशूट करून शहरभर तिच्या विविध भावमुद्रांचे दर्शन घडवणाऱ्या फोटोंसकट काव्यपंक्ती आणि दीक्षा सोहळ्याची तारीख, ठिकाण वगैरे माहिती देणारे मोठमोठे फ्लेक्स चौका-चौकांत झळकले होते. सोहळ्याच्या दोन-चार दिवस आधी एका संध्याकाळी तिची उघड्या जीपमधून भव्य मिरवणूकही काढण्यात आली होती. त्यावेळी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे भर रहदारीच्या वेळी 'रस्ता आडवणे' सारखी इतरेजनांसाठी 'निरुपद्रवी' गोष्टही झाली.
गमतीचा भाग म्हणजे फ्लेक्सवरच्या तिच्या साजशृंगारातल्या सुंदर सुंदर छब्या पाहून तिच्या संन्यासाविषयी कौतुक वाटण्यापेक्षा 'एवढ्या देखण्या मुलीला हि काय अवदसा सुचली' ह्या अर्थाचीच चर्चा शहरवासियांमध्ये जास्त रंगली होती, तर तरुण-अविवाहित मंडळी 'वेगळ्याच' कारणासाठी 'हळहळत' होती 😀
असे प्रकार पूर्वीही कानावर आलेले आहेत.
यात " कुछ तो गडबड है..." असे वाटते. म्हणजे कसले तरी 'फाऊंडेशन' स्थापित करणे यात बहुतेकदा काहीतरी आर्थिक गणित/सोय/झमेला असतो, तसे यातही असावे, असे आमच्या बालबुद्धीस वाटते.
-- कुणी आतली खबर देणारा मिळाला तर विचारले पाहिजे. एकदोन आहेत मनमोकळे मित्र, त्यांना विचारून बघतो. (अर्थात आपल्याला काय करायच्या आहेत नसत्या उचापती ? हेही खरेच)
गडबड रेहनेकी संभावना तो हैं...
पण,
ह्याचा काही उपयोग होइल असे वाटत नाही. काहीवेळा आम्ही मित्रमंडळी गमतीत बोलत असलो तरी मुस्लिमांपेक्षा अधिक धार्मिक कट्टरता त्या लोकांमध्ये पाहिली आहे!
+१००० 😀
तुम्ही आणि चित्रगुप्त काका एकाच पंगतीतले.
आपल्याला काय करायचे आहे?
काडीचा रस नाही.
वगैरे सर्वात शेवटी एक वैधानिक सिग्नेचर टाकून सर्व चालू..
;-)
अवांतर :
यावरनं आपल्या अमरावतीतल्या खाबियादीदी आणि तलवारनानांची गोष्ट आठवली ( इंग्रजी दुवा ) : https://www.hindustantimes.com/india/jain-sadhvi-in-police-custody/stor…
-ना.न.
दुनिया की निगाहों में भला क्या है बुरा क्या
ये बोझ अगर दिल से उतर जाए तो अच्छा।