जे न देखे रवी...

मातृत्वाचा शृंगाररस

Primary tabs

मातृत्वाचा शृंगाररस

चंदन चांदणं गोंदण ल्याली
नवथर कांती तनू सुकुमार
अर्ध मोकळ्या केसावरती
माळून गजरा चंद्राकार

कुठे निघाली चंचल रमणी
थबकत लचकत हरिणी समान
सरकत शेला सावरलेला
धरत रोखुनी नयन कमान

ठुमकत मुरडत गवळण राधा
जणू विहरत यमुनाकाठ
गोप बघुनी झाकू पाहते
पदराखाली भरला माठ

हिंदोळणाऱ्या पदरासंगे
डुचमळते बेचैन उभार
हृदय-चक्षूंना वेधून घेते
तन्मीलनाची नमनमिनार

अर्ध्या उघड्या पाठीवरती
भुरुभुरू केसांचे नर्तन
नाभी भवती करुनी रिंगण
पिंगा खेळतो द्वाड पवन

गुलाब जाई मोहित होई
रूप गोजिरे पद्मसमान
लपून आडून चोरून बघती
फुलामागुनी पिकले पान

कुणी म्हणाले शेंग चवळीची
कुणी म्हणाले पेवंदी आम
कुणी म्हणाले कामुक मैना
खुदुखुदू हसुनी रमताराम

कुण्या मुलखाची राजपरी ही
कुजबुज करती वल्लीशिवार
जशी घडविली, तशी मढवली
ही रंगीली नटवी नार

तव वदली ती प्रसन्नवदना
हो मी आहे नटवी नार
खळखळ वाहत असतो माझ्या
नसानसातुनी रस शृंगार

विरक्तीला लुब्ध कराया
करीत पीयुषाची पखरण
सजणेधजणे, लटक, मटकणे
प्रीत लालित्याची उधळण

जरी दिसतो तुम्हां दुरुनी
माझ्याठायी हा एकच रस
परी मी आहे सर्व रसांचा
जणू घुसळला अमृतरस

कधी असते मी झाशी, अहिल्या
मीच कालिकेचा अवतार
मी राधिका, मीच मीरेच्या
अद्वैत भक्तीचा एकतार

मीच कैकेयी, मी कौशल्या
मी वनवासी जनकाची लेक
मीच देवकी, मीच यशोदा
माझे स्वरूप, रूप अनेक

मीच भीमाई, मी जीजाऊ
मी क्रांतीची ज्योतमशाल
पंकामध्येही पंकजाची
पालनकर्ती मी मृणाल

आदी माया आदी शक्ती
सचेतनाची मी सृजक
जैवजिवांची उत्पत्ती अन
प्रणयरसाची मी पूजक

स्त्रित्वाची मी अभय स्वामींनी
सजीव सृष्टी माझं बाळ
ब्रह्मांडाला व्यापून उरली
माझ्या मातृत्वाची नाळ

- गंगाधर मुटे 'अभय'
==============
अठरा/दहा/चोवीस

कविता अजिबात आवडली नाही.
मातृत्व आणि शृंगार ह्या दोन भिन्न भावना आहेत त्यांची सरमिसळ अजिबात आवडली नाही.
पहिल्या कडव्यात तुम्ही उघडी पाठ , उभार, पदराखाली भरला माठ वगैरे वगैरे म्हणत आहात अन् नंतरच्या कडव्यात अहिल्या, झाशी, मीरा , कैकयी वगैरे ह्यांना आणत आहात. बाकीच्यांची तर नावे घ्यायचे माझे धाडस ही होत नाही.
कुठल्या गोष्टी कुठे जोडत आहात.
तुम्हाला दहशत कशी वाटत नाही "त्या" लोकांची ?

असो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने तुम्ही तुमच्या रिस्क वर काय वाटेल ते लिहायला स्वतंत्र आहात.
फक्त मिसळपाव थाळीत गुलाबजाम दिला म्हणून तो तर्री त घालून खाऊ नये.

बाकी आपण सुज्ञ असा.
इत्यलम

सुबोध खरे

फक्त मिसळपाव थाळीत गुलाबजाम दिला म्हणून तो तर्री त घालून खाऊ नये.

शृंगार रस आणि वात्सल्य रस यांची सरमिसळ( कि रसमिसळ) करण्याचा हेतू समजला नाही.

कोणतीही व्यक्ती मग ती आई असो कि बहीण किंवा बाप हे सर्व भावभावना आणि रस पूर्ण असतेच. त्यात वात्सल्य शृंगारच कशाला क्रोध मोह इ भावना सुद्धा असतातच

परंतु त्यांचे मिश्रण अप्रस्तुत किंवा अयोग्य ( inappropriate) वाटते.

बाडीस

जसे आपल्या आईवडिलांची वासना हि आपल्या जन्मास कारणीभूत आणि अत्यावश्यक असली तरी त्याचे सार्वजनिक अनावरण/ वाचन हे अप्रस्तुत असते.

बाकी चालू द्या

गंगाधर मुटे

सर्व रसांचे मिश्रण एकत्रित केले जाऊ नये, हे खरे आहे. पण ते मांडले जाऊच नये हे तितकेसे खरे वाटत नाही. त्यात बीभत्स, बटबटीत रूप येऊ नये इतकेच.

मांडलेच जाऊ नये, या मताशी मी सहमत नाही मात्र मला ते जसे मांडायला हवे तसे मांडता आले नसेल तर तो माझा व्यक्तिगत दोष आहे. कवितेचा दोष असू शकत नाही.

चौकस२१२

जरी बटबटीत नसले तरि दोन वेगळेच रस कशाला एकत्र केलेत ते अजिबात कळले नाही
त्या बाबतीत हुकलंय आणि नुसतच हुकली असे नहि तर काही भगःची जोडणी अप्रस्तुत वाटली
पण अर्थात एवढेही लिहिण्याची माझ्य सारख्याकडे प्रतिभा नसल्यमुळे आमच्या पेक्षा तुम्ही जास्त चांगले कवी

गंगाधर मुटे

कविता कशी असावी आणि कविता कशी नसावी याबद्दल तुमच्या मनात एक अदृश्य साचा ठरलेला आहे. त्यामुळे कुणीही कविता लिहिले तरी तुमच्या मनातील साच्यानुसारच असावी असे तुम्हाला प्रामाणिकपणे वाटते.
असे वाटणे खरंच योग्य आहे का, याचा आपण विचार करावा. तुमच्या समोर तुम्हाला पडलेल्या अनेक प्रश्नांची उकल आपोआप होईल.

गंगाधर मुटे

तुम्हाला आवडली नाही याबद्दल कुणाचे हरकत असू शकत नाही.

कोणतीही कलाकृती ज्याला जेवढी कळते तेवढ्या आधारावर तो आपले मत बनवत असतो आणि त्याच आधारावर आवडणे आणि नावडणे ठरत असते.

श्वेता२४

मातृत्व आणि शृंगार या दोन परस्परविरुद्ध असणाऱ्या गोष्टींची सांगड तुम्ही कवितेमध्ये कशी काय घातली असेल याच्या उत्सुकतेपोटी मी ही कविता वाचली. कवितेतील तीन कडवी - कधी असते मी झाशी,मीच कैकेयी, मीच भिमाई ही तीन कडवी बाजूला करून संपूर्ण कविता वाचली तर छान वाटली. माफ करा. काव्य समजून घेण्याची माझी समज फार नाही. परंतु ही तीनही कडवी रसभंग करतात असे वाटले. ती सोडून बाकीची सर्व कविता मला आवडली.

गंगाधर मुटे

प्रतिसाद बद्दल आभार.

तुम्ही स्वतःच्या कवीते बद्दल बोलू नये आणि कविता उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करू नये, असे माझे मत आहे.

कविता लिहून झाली आणि एकदा प्रकाशित केली की नंतर काय बोलायचे ते कविताच बोलली पाहिजे.

मात्र, आपण जे लिहिले ते कितपत शब्दात उतरले आणि रसिकापर्यंत पोहोचले याचा पडताळा घेण्यासाठी प्रतिसादांचा फार उपयोग होतो.

कविते बाहेर बोलायचे असेल तर माझे मत असे आहे की, कोणतेही मातृत्व सर्व गुण संपन्न आणि सर्व रसांनी परिपूर्ण असते. जरी एखाद्या मातृत्वातला एखादाच गुण अधोरेखित होत असला किंवा ठळकपणे जाणवत असला तरी उरलेले गुण (अदृश्य स्वरूपात वगैरे) मातृत्वामध्ये असतेच, असे माझे मत आहे.

मातृत्व हे सर्वठाई सारखेच असते. कैकयीची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते तर कौशलेची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते. व्यक्तिरेखा बदलल्या पण मातृत्व स्थायी आहे, असे माझे मत आहे.

गंगाधर मुटे

कवीने स्वतःच्या कवीते बद्दल बोलू नये आणि कविता उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करू नये, असे माझे मत आहे.

वरील प्रतिसादातील हे वाक्य असे वाचावे.

गंगाधर मुटे

आपण म्हणतात असे ते तीन कडवे काढून टाकले तरी कवितेला धक्का पोहोचत नाही. मूळ गाभा कायम राहतो. ते तीन कडवे फक्त उदाहरणादाखल नमुने म्हणून आलेले आहेत. या कडव्यांमुळे विषय थोडा समजून घेणे सोपे जाईल, असे वाटते.

विवेकपटाईत

दोन वेगवेगळ्या कविता वाचल्या. पहिल्या कवितेची ही ओळ आवडली.
लपून आडून चोरून बघती
फुलामागुनी पिकले पान

या वयात ही सुंदर फूल दिसले की नजर तिथे जातेच. मनाने आपण कधीच म्हातारे होत नाही. पान गळतीच्या काळात ही वसंताचे स्वप्न पाहतोच.

जरी दिसतो तुम्हां दुरुनी
माझ्याठायी हा एकच रस
परी मी आहे सर्व रसांचा
जणू घुसळला अमृतरस

नायिकेने स्वताच स्पष्ट केले आहे की वरकरणी नटवी नार दिसत असले तरी माझ्यात इतर गुण अवगुण आहेत.
मातृत्व-पितृत्व शृगांराची परिणीती याचा अर्थ त्याव्यतिरिक्त इतर कुठलेही भावना नाहीत असे समजणे बरोबर नाही.

कवीता आवडली.

गवि

प्रयोग करत राहावेत.

वेलकम बॅक मुटे काका सर.

विंजिनेर

असेच म्हणतो. ये कुछ जम्या नही पण हरकत नाही - काहीसं coke studio सारखं झालेय - त्यांची सगळीच कॉंपोझिशन्स जमतात असं नाही पण प्रयोग करायचं धाडस मला आवडतं

जुनं नाव बोर्डावर पाहून छान वाटलं हे अजून एक.

पहीली आठ कडवी ही पुरुषसत्ताक समाजाचा एखाद्या स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे आणि बाकीची कडवी ही कवितेतील नायिकेने त्यांच्या दृष्टीकोनाला दिलेले उत्तर आहे. ह्या दोन्ही बाबींना कवीचे मतच आहे असे समजल्यामुळे काही प्रतिसादकर्त्यांची गफलत झाली आहे.

ह्यावरुन विवेकानंदांच्या आयुष्यातील एक प्रसंग आठवला. विदेश दौर्यावर जाण्यापूर्वी जयपूरच्या महाराजांनी त्यांच्यासाठी एक समारंभ ठेवला होती ज्यात जयपूरच्या एका गायिका/गणिकेला बोलावले होते. विवेकानंदांना त्या समारंभात गेल्यावर ह्या गोष्टी कळल्या आणि त्यांना एका संन्यासाने एका गणिकेच्या अश्या मैफिलित असणे उचीत न वाटल्याने ते उठुन जायला लागले तेव्हा त्या गाणार्या गणिकेने संत मीराबाईची एक विरहणी गायला चालु केली आणि विवेकानंदाला त्वरीत अर्थबोध झाला. त्यांनी त्या गायिकेची केवळ माफिच मागितली नाही तर तिला 'तुझ्याकडुन मला अजुन एक शिकवण मिळाली आई' असेही संबोधले.

गंगाधर मुटे

सखोल आणि तर्कशुद्ध दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपला आभारी आहे.

प्रत्येक मातेमध्ये सर्वच्या सर्व रस असतातच. अशी एकही माता असू शकत नाही जिच्यामध्ये सर्व रस सामावलेले नाहीत.

दुर्गादेवीला फार कमी लोक दुर्गादेवी म्हणतात. बहुतांश लोक दुर्गा माता म्हणतात. दुर्गा हे वीर रसाचे सर्वोत्तम उदाहरण असले तरी ती माता आहेच.

विवेकानंदाला त्वरीत अर्थबोध झाला. त्यांनी त्या गायिकेची केवळ माफिच मागितली नाही तर तिला 'तुझ्याकडुन मला अजुन एक शिकवण मिळाली आई' असेही संबोधले.

>>> हे असल्या अतार्किक अनाकलनीय अपेक्षा ठेवल्यामुळे आजकाल कोणाला विवेकानंद व्हावेसे वाटतं नाही.

गुलाबजाम तर्रीत घालून खायची हौस का असते लोकांना हे अनाकलनीय आहे.

कालच एका सुप्रसिद्ध मंदिरात जाऊन आलो, आत देवीची मूर्ती आहे , तिला लोकं साष्टांग नमस्कार च करणार आहेत .
पण
बाहेरील शिल्पकलेत पत्रलेखिका आहे जी तिचे पुष्ट नितंब आणि कमनीय कटी दाखवत पत्र लिहीत आहे, किंवा दर्पण सुंदरी आहे जी तिचे उन्नत मोहाचे घट सावरत आरशात बघत केसांचा शृंगार करत आहे,
त्यांच्याकडेही लोकांनी मातृभावाने पाहावे अन् "विवेकानंद" व्हावे ही अपेक्षाच अविवेकी आहे.

असो.

सुबोध खरे

गुलाबजाम तर्रीत घालून खायची हौस का असते लोकांना हे अनाकलनीय आहे.

बाडीस

गुलाबजाम तर्रीत घालून खायची हौस का असते लोकांना हे अनाकलनीय आहे

.
अगदी गुलाबजामुन व तर्री नाही तरी तश्याच प्रकारच्या काही पाककृती ऐकण्यात आल्या आहेत. मैसुर पाक ही अशीच एक फसलेली पाककृती होती. म्हणजे करायला गेलो एक आणि झाले दुसरेच असा प्रकार होता. तोच प्रकार पनीर बाबतही सांगितला जातो. म्हणजे नासलेल्या दूधावर केल्या गेलेल्या प्रयोगातुन रसगुल्ल्याचा जन्म झाला. मध्यंतरी आईसक्रिम पकोडा नावाची डिश पण लोकप्रिय होती.म्हणजे पकोडा तळायचा व बाहेर काढुन त्यात आईसक्रिम घालुन पुन्हा तळायचा असा काहीसा प्रकार होता. सोलापुरात चहाकॉफिच्या दुकानात मारामारी नावाचे पेय मिळायचे.चहा आणि कॉफि मिक्स करुन बनवले जायचे. टंकण्याचा एकुण उद्देश हाच कि पाककृती असो वा लेखनकृती ..प्रयोग करत राहिले पाहिजे काहीतरी नवीन हाती गवसु शकते.

वामन देशमुख

वाट्टेल त्या गोष्टींची वाट्टेल तशी सरमिसळ करणे व वाट्टेल त्या प्रकारे ती सादर करणे असे प्रकार सदर धागाकर्त्यास नवीन नाहीत.

---

बाकी, २०२४ मिपा प्रौढ दिवाळी अंकातील साहित्यरत्ने आधीच प्रकाशित होतील असे वाटले नव्हते.

गंगाधर मुटे

तुमच्या वरील अर्ध्या प्रतिसादाबद्दल मला काहीच बनायचे नाही हे तुमचे मत आहे. आणि तुम्हाला वाटेल तसे मत बाळगायचा तुमचा अधिकार अबाधित आहे.
-----
पण खालील अर्धा प्रतिसाद मान्य होण्यासारखा नाही.
मी परत एकदा कविता वाचली आणि मला जे जाणवले त्यावरून मी हमखास सांगू शकतो की ही कविता कुठल्याही अंगाने Adult नाही.
1. कवितेत एकही थिल्लर, चिल्लर अथवा उत्तान शब्द आलेला नाही. त्यामुळे बाळबोधांना/नाबालिगांना कवितेतील शृंगार उलगडण्याची शक्यताच नाही.
2. कवितेतील अनेक रहस्य सहजासहजी सर्वांनाच कळेल अशी शब्द योजना नाही. कवितेतील अनेक उपमा, प्रतिमा आणि दृष्टांत सरसकट सर्वच भाषा प्रभुंना किंवा भाषातज्ज्ञांना किंवा समीक्षकांना किंवा गुणग्राहकांना कळण्याची शक्यता नाही. जिथे 80 वर्षाच्या म्हातार्‍याला कविता पूर्णपणे करण्याची शक्यता नाही तिथे कुठलेही स्थितीत 18 वर्षाखालील मुलाला कळेल अशी शक्यता असू शकत नाही.

कवितेत माझ्या नजरेने बघितले तर खालील ओळ भयानक व अत्यंत खतरनाक आहे ज्या ओळी बद्दल माझ्यावर प्रचंड टीका होईल असा अंदाज व भीती होती पण अजूनही टीका झाली नाही याचा अर्थ ती ओळ उलगडली नसावी असा घेण्यास जागा आहे.

हृदय-चक्षूंना वेधून घेते
तन्मीलनाची नमनमिनार

आपणास कधीकाळी जर अर्थ लागला तर मला विपु मधून अवश्य कळवा.

बहिर्‍या ऐकवणे, आंधळ्या दाखवणे
जमते कविते हे काम
बहाद्दर असल्या काव्यास
माझा केवळ प्रणाम!

कविता आवडली.

सं - दी - प

कंजूस

वैचारिक कविता आहे.

आमच्या मराठीच्या बाई (शिक्षिका) म्हणाल्या ते आठवलं.
"तुम्हाला गुण हवे असतील तर आपली मतं पाजळू नका. कवितेच्या प्रश्नांवर उत्तरामध्ये कवी असं म्हणतो, तसं म्हणतो, आणि कवितेतल्याच ओळी परत लिहून काढा."

नठ्यारा

गंगाधर मुटे,

खूप दिवसांनी आलात. असेच वरचेवर येत रहा.

उत्तरार्धात वात्सल्य रस आहे की वीररस आहे असा प्रश्न पडलात. शृंगार व वात्सल्य एकत्र जात नाहीत असं म्हणतात. पण वीर आणि शृंगार मात्र एकत्र चांगलेच खुलतात. झाशी, अहिल्या, कालिका वगैरे नावं येतात तेव्हा वीररसाची अपेक्षा असते. पुढे ती वात्सल्यरसात बदलते. हे रूपांतरण अलवार व्हायला हवं होतं. हे मझं वैयक्तिक मत आहे. विचारचक्रास चालना देणारी कविता आहे. म्हणून आवडली. सर्वस्वी पटली नाही तरीही आवडली.

आपला नम्र,
-नाठाळ नठ्या

गंगाधर मुटे

खूप खूप धन्यवाद.
कवितेचा विषय आणि आवाका फार मोठा आहे. तो शब्दबद्ध करण्यात आपली लेखणी अपुरी पडू शकते. कदाचित भविष्यात हाच विषय कुणीतरी अधिक सक्षमतेने हाताळू शकेल.

स्वधर्म

नायिकेला (विशेषत: सुंदर स्त्रीला) आपल्याकडे कसे पाहिले जाते, याची बहुतेक वेळा नीट जाणीव असते. या कवितेत नायिकेने पहाणार्यांना तिची दुसरी बाजू सांगण्याचा प्रयत्न केला आहे, असे वाटते. कदाचित ही कविता कुण्या मोठ्या कवीच्या नावे असती, तर लोक त्यांच्या वेगळ्या दृष्टीचे कौतुक करत असते.

जावा फुल स्टॅक

हे कविता कुप छान आहे

चाट गिपीटि अनि गुगुल भाशान्तर चान्गल वापरले आहेत

आवडल आहे

गंगाधर मुटे

प्रतिसाद नाही नाही कुठून आले? ते नाही काढून प्रतिसाद वाचावा.

चौकस२१२

हि कविता नक्की कशाबद्दल आहे ?
शृंगार? स्त्री देहाची "काम" या अर्थातून वर्णन कि धाडसी महिला - माता ?

ही रंगीली नटवी नार आणि मग एकदम .... मी झाशी, भीमाई, मी जीजाऊ..

दोन विषयांची मिसळ काही पटली नाही आणि कळली पण नाही

गंगाधर मुटे

कवितेत दोन विषय किंवा दोन रस यांची मिसळ झाली आहे असे मला तरी वाटत नाही.

कवितेचा केंद्रबिंदू "मातृत्व" आहे आणि मातृत्वाची विभागणी होऊ शकत नाही. मातृत्व हे फक्त मानवी स्त्री पुरते मर्यादित नसते. मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात काहीही फरक नसतो जवळजवळ ते एकसमानच असते.

माणूस, पशु,पक्षी, वनस्पती सहित सर्व सजीव यांच्या प्रजनन, पोषण आणि संरक्षण ह्या सर्व प्रेरणा बहुतांश प्रमाणात एकसमान आहेत.

चौकस२१२

"हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते बेचैन उभार" आनि "कधी असते मी झाशी, अहिल्या"
हे एकाच मालळे तील मणी ? नाही बुवा पटत ....
असो कवी चा अधिकार आहे स्वतःचं मनाला पटेल ते लिहिण्याचाच तेवहा चालू द्या ..

गंगाधर मुटे

हिंदोळणाऱ्या पदरासंगे डुचमळते बेचैन उभार" ही दृष्टी रमतारामांची आहे.
तर
"कधी असते मी झाशी, अहिल्या... हे नायिकेने दिलेले उत्तर आहे.

रमतारामांची दृष्टी वेगळी आणि कवितेच्या नायिकेची दृष्टी वेगळी. दोन दृष्टीमध्ये काहीही तुलना होत नसताना तुम्ही तुलना करण्याचा प्रयत्न करत आहात, त्यामुळे तुमच्यासमोर नको ते प्रश्न उभे राहत आहेत.

चौकस२१२

नको ते प्रश्न उभे राहत आहेत.
कसले नको ते प्रश्न , अनेकांनी ह्याच पद्धतीचा प्रतिसाद निंदवले आहेत
एकीकडे स्त्रीचे शृंगारिक / कामुक वर्णन आणि एकीकडे वीर रस ओतप्रोत भरलेली स्त्रियांचा उल्लेख एकाच कवितेत का केवळ स्त्रिया आहेत म्हणून !

हे म्हणजे उद्या जर एखाद्याने "मराठी संत, त्यांचे आध्यत्मिक कार्य आणि त्यांचे शरि सैष्ठव " हे एकाच निबंधात ( किंवा कवितेत ) घुसडले तर कसे वाटेल तसे आहे

असो राग आलेला दिसतोय , तुम्ही जेवढे लिहू शकता त्याच्या जवळपास हि आम्ही नाही लिहू शकणार पण एक वाचक/ रसिक म्हणून प्रामाणिक प्रतिक्रिया नोंदवली

गंगाधर मुटे

मराठी संत, त्यांचे आध्यत्मिक कार्य आणि त्यांचे शरि सैष्ठव... एकाच निबंधात घुसडले तर.... तुम्हाला छान वाटले तर छान म्हणावे, वाईट वाटले तर वाईट होणारे, प्रशंसा करण्यायोग्य असेल तर प्रशंसा करावी, निंदा करण्यायोग्य असेल तर निंदा करावी, निषेध करावा, खडबडीत खरबडीत उत्तर द्यावे.... वाचक म्हणून हे सर्व अधिकार वाचकाला आहेतच.
पण
पण काय लिहावे आणि काय लिहू नये याचा निर्णय लिहिणाऱ्यांनी घ्यायचा असतो.... वाचणाऱ्यांनी नाही.

तुम्ही तुमची मते जगावर लादण्याचा प्रयत्न समर्थनिय नाही.

असे लिहिले तर काय होईल, तसे लिहिले तर काय होईल? असे उगीच प्रश्न स्वतःला पडू देऊ नका. कारण "काहीही होणार नाही" हे त्याचे उत्तर आहे.

जे अस्सल असते, उपयुक्त असते तेच उत्क्रांतीच्या प्रवाहात टिकते. बाकी सारा काडीकचरा क्षणिक असतो, विशिष्ट कालावधीनंतर तो वाहून जातो आणि कालांतराने तो कसला सुद्धा रूपांतरीत होऊन नष्ट होतो.

चौकस२१२

"तुमची मते जगावर लादण्याचा नाही हो ....." नाही हो एक काहीतरी खटकलेली गोष्ट किंवा विस्कळीत गोष्ट जी इतराना जाणवली ती फक्त दाखवली
" कला निर्माण करण्याऱ्या बंधने असू नयेत" या तत्व खाली काय वाटेल ते चालेल" असा तुमचा रोख दिसतोय ... त्यामुळे बोलणे खुंटले

उद्याच "समर्थांचे श्लोक आणि त्यांच्या दंड बैठका" यावर जिलब्या पाडतो
कारण "काय लिहावे आणि काय लिहू नये याचा निर्णय लिहिणाऱ्यांनी घ्यायचा असतो."

गंगाधर मुटे

@चौकस212

सर्व सजीव सृष्टी मधील माता आणि तिचे मातृत्व हा कवितेचा केंद्रबिंदू आहे. मानवी स्त्री कवितेत केवळ त्या मातृत्वाचे प्रतिनिधित्व करते. मानवी स्त्री कवितेची नायिका असणे, कवितेची गरज म्हणून निमित्तमात्र आहे.

मातृत्व हे फक्त मानवी स्त्री पुरते मर्यादित नसते. मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो, जवळजवळ ते एकसमानच असते.

माणूस, पशु, पक्षी, वनस्पती सहित सर्व सजीव यांच्या प्रजनन, पोषण आणि संरक्षण ह्या सर्व प्रेरणा बहुतांश प्रमाणात एकसमान आहेत.

माझे मत असे आहे की, कोणतेही मातृत्व सर्व गुण संपन्न आणि सर्व रसांनी परिपूर्ण असते. जरी एखाद्या मातृत्वातला एखादाच गुण/रस अधोरेखित होत असला किंवा ठळकपणे जाणवत असला तरी उरलेले गुण (अदृश्य स्वरूपात वगैरे) मातृत्वामध्ये असतेच, असे माझे मत आहे.

सर्व रसांनी परिपूर्ण नाही असे मातृत्व असू शकत नाही. जसे मानवी स्त्रीमध्ये स्त्रीत्व जन्मताच येते तसेच मातृत्वही उपजत असते. शृंगार ही मातृत्वाची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे कोणतेच मातृत्व शृंगारहीन असू शकत नाही.

मातृत्व हे सर्वठाई सारखेच असते. उदाहरणार्थ... कैकयीची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते तर कौशल्येची वर्तणूक तिचे मातृत्व प्रदर्शित करते. व्यक्तिरेखा बदलल्या पण मातृत्व स्थायी आहे, असे माझे मत आहे.

कविता तुकड्या तुकड्यात दिसत असली तरी मुळात ती कविता मातृत्वाभोवती फिरत असल्यामुळे कविता एकजिनसी आहे. मातृत्व आणि मातृत्वाच्या प्रेरणा केंद्रबिंदू म्हणून कविता वाचली तर कविता उलगडायला फार अवघड जाऊ नये.

सुबोध खरे

मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो,

आपण कविता करावी

जीवशास्त्रात जाऊ नये अशी नम्र विनंती आहे.

कोकिळा आपले अंडे कवळ किंवा दुसऱ्या पक्षाच्या घरट्यात घालते आणि ते अंडे उबवणे आणि पिल्लाचे संगोपन करणे हे तो दुसरा पक्षी आणि त्याची मादी करते.

माशाची मादी अंडी घालून पाण्यात सोडून देते. पिले अंड्यातून बाहेर आली कि स्वतःचे अन्न स्वतः मिळवून वाढू लागतात. खेकड्याची मादी पोटातून पिल्ले बाहेर सोडून देते त्यानंतर पिल्ले स्वावलंबीच असतात.

काही माशात आणि बेडकांच्या जातीत नर पिल्लाना ती मोठी होईस्तोवर आपल्या पाठीवर बाळगतात.

तेंव्हा पशु पक्षी आणि मानव यातील मातृत्व हे मुळीच सारखे नाही.

उत्क्रांतीच्या उतरंडीत प्राणी जितक्या उच्च दर्जाचा आहे तितके मातृत्व जास्त जास्त कठीण होत जाते. कुत्र्या मांजराची पिल्ले काही दिवसातच वासाने स्वतःचे अन्न'स्वतः मिळवू शकतात तर मानवी बालपण कित्येक वर्षे लांब आहे त्यामुळे तितकी वर्षे मातेला बालकाची सर्वतोपरी काळजी घ्यावीच लागते.

मानवी मातृत्व हे अतिशय उच्च कोटीचे असू शकते. हिरकणी सारखी उदाहरणे आपण वाचली असतीलच.

बाकी चालू द्या

गंगाधर मुटे

तुम्ही तुमची मते कविवर लादू नयेत, अशी आपणास माझी नम्र विनंती आहे.
कविता वाचून कवीला जीवशास्त्राची असलेल्या जाणीवेची खोली जशी तुम्हाला कळलेली आहे तशीच तुमचे प्रतिसाद वाचून जीवशास्त्राची तुम्हाला किती जाणीव आहे हे मलाही कळलेले आहेत.

कुणी कितीही स्वतःला एखाद्या विषयातला तज्ञ समजत असला तरी तो तज्ञ असतोच, असे काहीही नाही.

गंगाधर मुटे

तुमच्या प्रतिसादात पशु पक्षी आणि मानवी मातृत्व यांतील भेद सांगताना आपण जे निकष वापरले तेच निकष वापरून भारतासारख्या अत्यंत विषम संस्कृती, विषम आर्थिक स्थिती, विषम सामाजिक स्थिती, विषम सोयीसुविधा, विषम परिस्थितीत जगणारे सरकसकट सर्व मानवी मातृत्व एकसमान आणि अतिशय उच्च कोटीचे कसे असते, हे सिद्ध करून दाखवा.

गंगाधर मुटे

तुमच्या प्रतिसादात पशु पक्षी आणि मानवी मातृत्व यांतील भेद सांगताना आपण जे निकष वापरले तेच निकष वापरून सरकसकट सर्व मानवी मातृत्व एकसमान आणि अतिशय उच्च कोटीचे कसे असते, हे सिद्ध करून दाखवा.

सुबोध खरे

हायला

काहींच्या काही विधान तुम्ही करायचे आणि मी काहीतरी सिद्ध करून दाखवायचे हे तुम्हीच मला आव्हान द्यायचे.

इतका भंपकपणा पाहिला नव्हता

चौकस२१२

मुळात ती कविता मातृत्वाभोवती फिरत असल्यामुळे

खालील ओळीत जर "मातृत्व" असेल तर माझी उंची १० फूट आणि मी पाण्यावर चालू शकतो !

गोप बघुनी झाकू पाहते
पदराखाली भरला माठ!
डुचमळते बेचैन उभार

पहिली अनेक कडवी हि चांगल्यापैकी जमलेले स्त्रीदेहाचे / वृत्तीचे शृगांरिक वर्णन आहे उगा मातृत्व वैगरे कसली कल्हई लावताय
धन्य ते कवीश्वर

गंगाधर मुटे

तुमच्या प्रतिसादावरून निदान असे जाणवते की जे तुम्हाला दिसतील तेवढेच खरे असते, बाकी सर्व खोटे असते.. असा तुमचा एकंदरीत समज आहे.

आपण उदृत केलेल्या ओळी कवितेच्या विषयाच्या अनुषंगाने मातृत्वाशी निगडित आहेत असे मला वाटते, तुम्हाला नाही वाटत त्याला मी काय करू?

ही कविता आहे. साता समुद्रा पलीकडे पोहोचू शकते. कवी काय त्या कवितेसोबत फिरून प्रत्येकाला अर्थ समजावून सांगू शकतो का? ज्याला जेवढा अर्थ लागला तेवढा त्याने घ्यावा. विषय संपला.

तुम्हाला शंभर टक्के समजेल अशा कविता कवींनी लिहाव्या.... असल्या तत्त्वज्ञानाला काही अर्थ आहे का?

गंगाधर मुटे

टीकेचे दोन प्रकार असतात.
स्वीकार करण्यायोग्य, सन्मान करण्यायोग्य
अस्वीकार करणे योग्य, लाथाडने योग्य

सरसकट टिकेचा स्वीकार केला तर लोक एका दिवसात नराला वानर बनवून टाकतील. :D

गंगाधर मुटे

खरंतर तुम्ही अजून पर्यंत कवितेवर टीकाच केलेली नाही. तुम्ही केवळ कवीला शहाणपणा शिकवत सुटलेले आहात आणि त्यालाच कवितेवरची टीका समजत आहात.

कवीला शहाणपणा न शिकवता कवितेवर वाटेल तशी टीका करा. तो तुमचा अधिकार आहे.

कवीला शहाणपणा शिकवणे हाही तुम्हाला अधिकार आहेच... पण तो शहाणपणा स्वीकारायचा की नाकारायचा याचा अधिकार कवीला आहे याचे भान ठेवा.

सुबोध खरे

मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो,

हे विधान जरा सिद्ध करून दाखवाल का?

बाकी "तुमची कविता आणि त्यातील सार, त्याचे काव्यात्मक मूल्य. कवीचे अधिकार आणि सार्वजनिक स्थळावर कविता टाकल्यास वाचकाचे अधिकार" हे मुद्दे वेगळे आहेत. त्यावर कुणी टीका केली तर तुम्ही वसकन अंगावर येता हे काही पटलं नाही.

बाकी नाना पाटेकरांच्या सिनेमात म्हटल्याप्रमाणे --लिपस्टिक लावून खिडकीत बसला तर खालून जाणाऱ्या माणसाने "शुक शुक" केले तर चिडचीड करू नये.

तेंव्हा आपण फक्त जीवशास्त्राबद्दल बोलू या. ''
म्हणजे

"मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्व यात फारसा काही फरक नसतो" हे विधान सिद्ध करून दाखवा

गंगाधर मुटे

१ ) मानवी स्त्री मधील मातृत्व आणि पशु, पक्षी यांच्यातील मातृत्वात प्रचंड फरक असतो . ... हे तुम्हीच सिद्ध करून दाखवा.
२ ) आपण वरील एका प्रतिसादात मातृत्व याबद्दल जे निकष मांडले आहेत . ... त्याला मातृत्व म्हणतात, हे सिद्ध करून दाखवा .
३ ) केवळ अपत्य जन्माला घालणे म्हणजे मातृत्व असते हे सिद्ध करून दाखवा.
४) <<<< माणसाने "शुक शुक" केले तर चिडचीड करू नये. >>> असा इतरांना सल्ला देण्याइतपत तुमची काय पात्रता आहे, हे सिद्ध करून दाखवा.
५) तुम्ही दिलेला सल्ला इतरांनी ऐकावा... इतके ते अपात्र कसे आहेत हे सिद्ध करून दाखवा.
किंवा
६) इतरांना प्रश्न विचारून त्यांनाच सिद्ध करायला सांगणे . .. यासाठीच तुमचा जन्म झाला आहे . ... हे तरी सिद्ध करून दाखवा.
======
मी तुमचा गुलाम नसल्याची माझी खात्री असल्याने मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यास अथवा सिद्ध करून दाखवण्यास बांधील नाही.
सबब . .. आपण दुसरा वेठबिगार शोधून त्याचेशी असे वर्तन करावे . .... हि आग्रहाची विनंती.

सुबोध खरे

इतकी चिडचिड करू नका.

विधान सिद्ध करता येत नसेल तर सरळ क्षमस्व म्हणून पुढे जावे.

उगाच शब्दांचा डोंगर उभा करून दुसर्यालाच त्याचे विधान सिद्ध करून दाखवा हा अट्टाहास आणि दुराग्रह कशासाठी.

माझे विधान मी सहज सिद्ध करून दाखवू शकतो परंतु तुमच्या धाग्याचं काश्मीर करायची इच्छा नाही.

एक साधे उदाहरण देऊन मी थांबतो

राणी मुंगी किंवा राणी माशी केवळ हजारो लाखो अंडी घालते आणि पुढे त्यांचे काहीच करत नाही. तिचा आणि वात्सल्याचा काहीही संबंध नाही

त्यांचे सर्व पालनपोषण कामकरी मुंग्या किंवा माश्याच करतात.

मानवी मादी असे काही करत नाही.

उत्क्रांती मध्ये जसे जसे वर जाता तसा आईचा संगोपनात सहभाग वाढत जातो.

हे मूलभूत विधान तुम्हाला मान्यच नसेल तर पुढे चर्चा होणारच नाही

बाकी तुमचे आत्मकुंथन आणि "मीच कसा हुशार" चालू द्या

गंगाधर मुटे

पुन्हा सल्ला दिलेल्याच आहे. सल्ला देण्याशिवाय ही दुसरी तुम्हाला काही येते का?
दुसऱ्याला सिद्ध करायला सांगणार आणि तुम्ही सिद्ध करून दाखवा म्हटलं की दुनियाभराच्या पळवाटा शोधणार.
तुमच्यात काही कौशल्य आणि पात्रता असेल तर मी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या. नाहीतर क्षमस्व असे म्हणून वाट पकडा.
गाठ माझ्याशी आहे. यापूर्वी बरेचदा मी तुमच्याकडे दुर्लक्ष केले. यावेळेस तसे होणार नाही. फैलावर घेतले जाईल याद राखा.

स्वतःची थोडीशी तारतम्य जागे करा आणि हा कवितेचा बाफ आहे, इथे कवी बद्दल नव्हे तर कवितेची चर्चा करायची असते इतके उमजून घ्या.

कवितेची थोडी जरी जाण असेल आणि थोडी जरी कविता कळत असेल तर तुमच्या आयपतीप्रमाणे कवितेचे पूर्ण अर्थ लिहून दाखवा. वाचायला आवडेल.

दरवेळेस कवितेचा धागा फालतूची बडबड करून भरकटवायची तुमची शैली यावेळेस खपवून घेतली जाणार नाही. याद राखा.

पुन्हा दुसरे असे की, तुम्ही मला सल्ला सांगावा अशी कोणतीही पात्रता तुमच्यात नाही. त्यामुळे जास्तीचे शहानपण पाजळणे बंद करा. यानंतर मरेस्तोवर मला शहाणपणा शिकवायला यायचे नाही. आणि सल्ला तर अजिबात द्यायचा नाही.

सुबोध खरे

राणी मुंगी किंवा राणी माशी केवळ हजारो लाखो अंडी घालते आणि पुढे त्यांचे काहीच करत नाही. तिचा आणि वात्सल्याचा काहीही संबंध नाही

त्यांचे सर्व पालनपोषण कामकरी मुंग्या किंवा माश्याच करतात.

मानवी मादी असे काही करत नाही.

हे वाचलं च नाही का?

इतकी चिडचिड नुसतं एक चूक दाखवली तर

आणि काय आपली भाषा सुद्धा?

दुनियाभराच्या पळवाटा

तुमच्यात काही कौशल्य आणि पात्रता असेल

गाठ माझ्याशी आहे.

स्वतःची थोडीशी तारतम्य जागे करा

कवितेचा धागा फालतूची बडबड करून भरकटवायची तुमची शैली यावेळेस खपवून घेतली जाणार नाही. याद राखा.

तुम्ही मला सल्ला सांगावा अशी कोणतीही पात्रता तुमच्यात नाही. त्यामुळे जास्तीचे शहानपण पाजळणे बंद करा. यानंतर मरेस्तोवर मला शहाणपणा शिकवायला यायचे नाही. आणि सल्ला तर अजिबात द्यायचा नाही.

मुटे बुवा इतकी अर्वाच्च भाषा मला सुद्धा सहज वापरता येते.

पण मी सभ्य भाषेत सांगतो आहे तुम्हाला जे करायचं ते करून दाखवाच

"याद राखा." "उगाच माझ्याशी गाठ आहे" सारखी फडतूस गावगुंडांची वाक्ये बोलून आपले हसे करू नका.

चौकस२१२

सहमत ( कवित्ते वरील टीकेला थोडे जरी समजून घेतले असते या महाशयांनी तरी सकारात्मक बोलणी झाली असती ) त्या ऐवजी "माणूस आणि पशु यातील मातृर्त्व " या बद्दल एक शिक्षित विदयाला हे अक्कल समजावत आहेत !
धन्य

आपली कविता ज्याना आवडली त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

ज्यांना नाही पटली त्यांनी न पटणारे मुद्दे उपस्थित केले.

आपल्याला ज्या प्रतिक्रीया अनुकूल वाटल्या त्याला स्विकारले व चान चान म्हणले.

ज्या प्रतिक्रिया प्रतिकूल होत्या त्यांनाच पचवणे कठिण जात आहे.

लिपस्टिक लावून खिडकीत बसलात तर रस्त्यावरून जाणारा शुक शुक करणार हे नागडे सत्य आहे. आपण आपली कविता चव्हाट्यावर आणलीत मिळणाऱ्या प्रतिसादानां सहर्ष सामोरे जावे. अन्यथा.....

आपण डाॅ सुबोध खरे यांच्यावर व्यक्तिगत हल्ला केला. तोच प्रश्न आपली लायकी काय हे विचारण्यास उद्युक्त करतो. बरेच सदस्य डाॅ सुबोध खरे यांना अनेक वर्षांपासून ओळखतात.आपण त्यांच्या पात्रतेवर शंका उपस्थित करून आपलीच आपलीच पात्रता चव्हाट्यावर आणली आहे.

इतरांना सल्ला देण्याइतपत तुमची काय पात्रता आहे, हे सिद्ध करून दाखवा.

मिपावर सर्व सदस्य सन्मानीय, म्हणून कुणालाही कुणाची पात्रता काय हे विचारण्याचा अधिकार नाही.

आपला तोल जातोय,सांभाळा स्वताला. नाहीतर डोक्यावर घेणारे केव्हां कुठे कचऱ्यात फेकून देतील कळणार नाही.

छान !
कवितेत एकूण १६ परिच्छेद (की कडवी) आहेत. त्यापैकी पहिले १० परिच्छेद शृंगार रसाला वाहिले आहेत, ११ व्या परिच्छेदात पहिल्या १० चे सार सांगीतले आहे. १२ व्या कडव्यात वीररस, आणि पुढील ४ परिच्छेदात मातृरस जाणवतो.
म्हणजे जर १६ घड्यांत पाणिपुरीचे पाणी आहे. तिखट पाणीपुरी (शृंगार) जास्त लोकांना आवडते त्यामुळे त्याचे प्रमाण जास्त घेतले आहे. ज्यांना वयोमानानुसार तिखट झेपत नाही त्यांच्यासाठी गोड पाणी ठेवले आहे. जर दोन्ही चवी एकत्र घ्यायच्या असतील तर ११ व्या परिच्छेदात दोन प्रकारच्या रसांची घुसळण करुन अमृतरस बनविला आहे. तस्मात वेगवेगळे रस एकत्र केले आहेत असे जाणवत नाही. ११ पर्यंत आणि १२-१६ अशी दुसरी वेगळी कविता आहे. त्यामधे एक अदृश्य रेखा आहे ती फक्त कवीमनालाच जाणवते.
एकंदरीत मजकूर पाहता "मातृत्वाचा शृंगाररस" ऐवजी "शृंगाराचा मातृत्वारस" हे शीर्षक जास्त शोभून दिसले असते असे वाटते.

असो, मुटे साहेब बरेच दिवसांनी परत आलात याबद्दल अभिनंदन ! लिहिते रहा. राजकीय धागे बंद झाल्यापासून मिपावर होणारी विचारांची घुसळण थांबली होती ती या कवितेच्या निमित्ताने पुन्हा पाहायला मिळाली हेही नसे थोडके !

(अवांतर : दहावीच्या मराठीच्या परीक्षेत कवीतेचे रसग्रहण करा हा प्रश्न सोडविल्याचा आनंद मिळाला.)

गंगाधर मुटे

विस्तृत अभिप्राय बद्दल मनपूर्वक आभार.

नक्कीच भेटत राहू. धन्यवाद!

चौकस२१२

११ पर्यंत आणि १२-१६ अशी दुसरी वेगळी कविता आहे.
हो हेच तर म्हणणे आहे काहीसे ( तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने मांडलेत ), आणि त्यांची भेसळ विचित्र वाटते एवढेच म्हण्णे आहे पण कवी महाशय मखलाशी करीत राहतात ....असू दे

चौकस२१२

मातृत्व अर्थात म्हणजे स्त्री आणि स्त्रीचे शारिक सौंदर्य या दोन ची विचित्र भेसळ कशाला हा साधा मुद्दा आहे

डॉ खरे यांचं प्रतिक्रयेत "जसे आपल्या आईवडिलांची वासना हि आपल्या जन्मास कारणीभूत आणि अत्यावश्यक असली तरी त्याचे सार्वजनिक अनावरण/ वाचन हे अप्रस्तुत असते. "
असा उल्लेख आहे तसेच म्हणेन कि " आईवडिलांचं संभोगातुन आपण निर्माण झालो पण म्हणून एकाच रचनेत "संभोगाचे सौंदर्य आणि आमचे आई वडील " लिहिणे विचित्र वाटते

"कुणी म्हणाले शेंग चवळीची
कुणी म्हणाले पेवंदी आम"

"ही रंगीली नटवी नार"

आणि "अहिल्या ( बाई होळकर)

एकत्र ?

पहिले १० परिच्छेद शृंगार रसाला वाहिले आहेत, आणि ती मस्तच आहेत

गंगाधर मुटे

<<<मातृत्व अर्थात म्हणजे स्त्री>>>>
काहीच्या काही वाक्य आहे हे.
-----
कुणी म्हणाले शेंग चवळीची
कुणी म्हणाले पेवंदी आम"
"ही रंगीली नटवी नार"
ही रमतारामांची दृष्टी आहे.

अहिल्या ( बाई होळकर)
हे मातृत्वाने दिलेले उत्तर आहे. ही कविताच रमता राम आणि मातृत्व यांचा संवाद असल्याने दोन्ही एकाच कवितेत एकत्र येणारच.

गंगाधर मुटे

डॉक्टर खरे यांचे विधान तुमच्यासाठी प्रमाण असेल तर तुम्ही त्यानुसार वर्तन करावे माझी कुठेही मनाई नाही.
पण माझ्यासाठी जर प्रमाण नसेल किंवा मला अजिबात पटणारे नसेल तर मी का ऐकावे?

तुम्ही आणि डॉक्टर खरे दोघे मिळून का बरं सृष्टीचे नियमन करू पाहता? तुमच्या इशाऱ्यावर अख्खीच्या अख्खी दुनिया चालणार नाही इतके भान ज्या दिवशी तुम्हाला येईल तो दिवस सोन्याचा समजावा.

सुबोध खरे

तुम्ही आणि डॉक्टर खरे दोघे मिळून का बरं सृष्टीचे नियमन करू पाहता? तुमच्या इशाऱ्यावर अख्खीच्या अख्खी दुनिया चालणार नाही इतके भान ज्या दिवशी तुम्हाला येईल तो दिवस सोन्याचा समजावा.

हा निष्कर्ष आपण कशावरून काढला हे समजत नाही.

पण आपल्या कवितेला फक्त छान छान म्हणवून घ्यायचं असेल तर सार्वजनिक न्यासावर ती टाकू नये.

एखाद्या कविसंमेलनातच वाचन करावे म्हणजे श्रोत्यांचे म्हणणे ऐकायची गरजच राहणार नाही.

लिपस्टीक लावून खिडकीत बसलात तर रस्त्यावरून जाणारे "शुक शुक" करणारच एवढे लक्षात ठेवा.

चौकस२१२

कसले नियम ठरवतोय ,, सरळ साधी टिपण्णी केली कि जरी दोन्ही रसांचे वर्ण ( कि तीन काय ते तुमचच्या डोक्यात असावे ) स्वतंत्ररित्या चांगले असले तरी त्याची विचित्र मिसळ झाली आहे ,, खरेंनी त्यांच्या पद्धतीने हा मुद्दा मांडला मी माझ्या ...
कुणी म्हणाले कामुक मैना आणि भिमाई जिजाई ,,,, काय संबंध
पुरुषाला स्त्री कामुक वाटते आणि या दोन्ही स्त्रिया होत्या हा बादरायण संबंध लावताय तुम्ही ..आणि विचारला तर विचार स्वातंतरी वैगरे तुंबड्या लावताय

गंगाधर मुटे

जो कवी वाचक घडवतो, वाचकांना घडवतो, वाचकांची विचार करण्याची दिशा बदलून टाकतो, वाचकांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकतो... तो जातिवंत कवी असतो.

जो कवी वाचकांना काय रुचेल, काय आवडेल, काय समजेल, काय पटेल याचा विचार करून लिहितो तो बाजारू कवी असतो.

चौकस२१२

या सर्व स्त्रिया अप्रतिम लावण्यवती असतील ( असे धरुयात, आपण कुठं बघितलंय ) त्या स्त्रिया असल्यामुळे त्यांच्यापढे साहजिकच पुरुषाला लोभावणारे शारीरिक शरीरसौष्ठव असेल ( पहिली काही कडवी) तरीही त्या स्त्रिया त्यांच्या भक्ती/ वीर / मातृत्व या रसांमुले जास्त परिचित आहेत असे धरायला हरकत नसावी .. मग असे असताना काव्यात
"हिंदोळणाऱ्या पदरासंगे
डुचमळते बेचैन उभार
हृदय-चक्षूंना वेधून घेते" किंवा "कुणी म्हणाले कामुक मैना"
यासाठी हीच उदाहरणे का सापडली हा साधा प्रश्न आहे
१) शृंगारिक काय अगदी कामुक ( पण दर्जेदार ) कविता जरूर करा हो ,, मग ती मस्तानी वर असो किंवा कुना काल्पनिक अप्सरेवर असो
२) भक्ती/ वीर / मातृत्व यावर कविता जरूर करा हो ,,,

"कलेसाठी कला"
किंवा "कवी मनाला काय वाटेल ते तो लिहू शकतो घायचे तर घ्या नाहीतर फूटा "
असा पवित्रा असेल तर काही बोलण्यात अर्थ नाही
पण रसिक का टीका करतोय ह्याकडे जर कोणी निर्माता लक्षच देणार नसेल तर अशी कलाकृती एक तर कचऱ्यात जाईल किंवा विसरली जाईल , किंवा तद्दन भम्पकपणा म्हणून ( मूलतः चांगली असूनही) त्यावर राग काढलं जाईल

कानडाऊ योगेशू यांनी केलेल्या रसग्रहणाशी सहमत आहे.

कविता दोन दृष्टीकोनातून बघावी लागेल. एक वयस्क नर जो नायिकेचा कुणीही नाही, तीच्या कडे रंगीली नटवी नार, फक्त भोग्या या नजरेने बघत आहे.

त्याच्या नजरेला उत्तर देताना नारी स्वीकार करते ,होय मी नटवी नार आहे,कुण्या ऋषींची तपस्या भंग करण्याची शक्ती माझ्या मधे आहे.परंतू माझी इतरही अनेक रूपे आहेत. मी फक्त मोहिनी नसून मी विवीध रूपा आहे.

तव वदली ती प्रसन्नवदना
हो मी आहे नटवी नार
खळखळ वाहत असतो माझ्या
नसानसातुनी रस शृंगार

विरक्तीला लुब्ध कराया
करीत पीयुषाची पखरण
सजणेधजणे, लटक, मटकणे
प्रीत लालित्याची उधळण

जरी दिसतो तुम्हां दुरुनी
माझ्याठायी हा एकच रस
परी मी आहे सर्व रसांचा
जणू घुसळला अमृतरस

या कडव्यानंतर, स्त्रीची विवीध रूपे उद्धृत केली आहेत. कवितेचा शेवट स्त्री ही जननी,जगत्जनीनी आहे हे सांगीतले आहे

ही कवीता तुकड्यात नसून एकसंध वाटते. कदाचित कवितेचे शिर्षक व कवितेतील भाव या मधे तफावत असल्याने कवी रसिकांपर्यंत पोहचत नसावा.

सर्व रस आपापल्या जागी आहेत कुठेही सरमिसळ वाटत नाही.

शृंगार, वासनेची परिणीती मातृत्व-पितृत्व मधे होते. ती सार्वजनिक करू नये एक समाज संकेत आहे. पण तो कवीला लागू पडतो का,कवी आणी कवितेला मर्यादित करतो का? कवीने याचे पालन करावे किवां नाही,रसिकांनी ते स्विकारावे किंवा नाही हा सर्वस्वी वैयक्तिक मुद्दा आहे.

मातृत्व एक पवित्र भावना. आई बद्दल कुणीच वाईट, अश्लील, शृंगारिक शब्द वापरत नाही.परंतू, महाकवी ग्रेस यांनी आपल्या एका कवितेत आईचे वर्णन करताना काय शब्द वापरलेत ते वाचून मती गुंग होते. अर्थात त्यांनी कुठल्या दृष्टीकोनातून ही कवीता लिहीली हा भाग थोडावेळ बाजूला ठेवूया.

ग्रेस समजला नाहीच मुळी कधी.. तो भावला.. प्रकर्षाने जाणवला..!!

आई माझी कृष्णकळीतील
विष विसरला कंस
देवकीच्याही पुढे निघाला
शुभ्र पांढरा हंस...

आई माझी रांगोळीतील
टिंब हरवली टिकली
कशास पाडू दार, कराया
भिंत घराची मधली...

माझी आई मत्त वासना
संभोगाची भूल
क्रूर पशूच्या डोळ्यांमधल्या
करुणेचेही फूल.....

माझी आई भिरभिर संध्या
सूर्य दिलासा
नश्वर शब्दांच्याही ओठी
काव्यकुळातील भाषा....

आई माझी अरण्यसरिता
चंद्र झुलविते पाणी
रामासाठी त्यावर लिहिते
शिळा अहिल्या गाणी...

आई माझी गाव निरंतर
पारावरती भरवी
संध्याकाळी भगवी होते
तिच्या तनूतील ओवी....

आई माझी काजळभरला रे!
मायेचा नखरा
वेणीमधली नागीण खुडते
जसा हिऱ्यांचा गजरा...

आई माझी कंचुकीतल्या
तरल स्तनांचे दूध
गोरजवेळी वाटत फिरतो
जोगी कुठला वेध ?

संध्येसाठी माझी आई
जपून उजळे वात
अश्वत्थाम्यापरी हिंडतो
जिथे भयंकर घात...

त्याहीनंतर आई निघते
कळशी घेऊन दूर
तेव्हा कळतो खुळ्या नदीला
या मादीचा सूर.....

आई माझी झुळझुळतांना
किणकिणतीही तारा
तिच्याच पदराखाली होतो..
शालीन, शिंदाळ वारा...

माझी आई सडलेल्या त्या
मोहफुलांची मदिरा
अपरंपाराच्या पुरुषाच्या ती
सोन्याच्या मोहरा

~ग्रेस

(संग्रह " सांजभयाच्या साजणी")

सरतेशेवटी,कवी आणी रसिक यांचे स्वातंत्र्य अबाधित असून कलाकार जेव्हां आपली कलाकृती रसिकांपर्यंत पोहचण्यास सक्षम ठरतो त्या कलाकृतींना रसिक डोक्यावर घेतो.

चौकस२१२

खालील दोन ओली वाचल्या आणि एक विचार मनात आला
आईचा स्त्री म्हणून समजेने वापर केला असावा आणि तिचे ते दुर्दैव बघून काविला अशी रचना सुचली असावी ?

जर गरिबीचा बापू कादंबरीतील बाप्या ने आपली आई वर कविता लिहली तर कदाचित अशी असेल का??? आई माझी झुळझुळतांना

तिच्याच पदराखाली होतो..
शालीन, शिंदाळ वारा...

माझी आई सडलेल्या त्या
मोहफुलांची मदिरा
अपरंपाराच्या पुरुषाच्या ती
सोन्याच्या मोहरा

चौकस२१२

"कदाचित कवितेचे शिर्षक व कवितेतील भाव या मधे तफावत असल्याने कवी रसिकांपर्यंत पोहचत नसावा."
काहींना नाही पोचलला पण त्याची थोडी का होईन जबादारी ती कविता निर्माण करणाऱ्यवर नाही का असत?

आगम्य लिहणे हे प्रत्येकाचा हकक जरी असला तरी बहुतेकांना साधारण पने कळेल असे लिहिण्यात तर कवी / लेखकांची खरी कसोटी असते
वैयक्तिक मुद्दा हे कारण पुढे केलं जाते, मग असे असेल तर कवी ने आपले हे प्रसिद्ध करूनच नये स्वतः सुखायच असेल तर छापता कशाला!

गंगाधर मुटे

बहुतेकांना साधारण पने कळेल असे लिहिण्यात तर कवी / लेखकांची खरी कसोटी असते

मी आजपर्यंत 700 ते 800 कविता लिहिल्यात. त्यापैकी बहुतांश सरसकट सर्वांना समजेल अशा कविता आहेत. त्यापैकी शेकडो कविता मिसळ पाव वर उपलब्ध आहेत. आपण त्या साध्या शिध्या सुलभ कविता का नाही वाचत? हीच कविता साध्या सोप्या भाषेत असावी असा आग्रह कशाबद्दल?

चौकस२१२

हीच कविता साध्या सोप्या भाषेत असावी असा आग्रह कशाबद्दल?
म्हणजे हि साधी सुधी नाही असा दावा आहे का?
पण म्हणजे आमची टीका कळली नाही तुम्हाला ... पिंगा खेळतो द्वाड पवन ते अहिल्याबाई ! काय बोलायचे
राहा तुमच्या ८००+ कवितांचा पाऊस पाडत.

संपादित

गंगाधर मुटे

हो. ही कविता नक्कीच साधीसुधी नाही. अनेक क्लिष्ट शब्द या कवितेत आहेत. ज्या वाक्यांचा सहजासहजी उलगडा होणार नाही असे वाक्य या कवितेत आहेत.

चौकस२१२

अहंकार

गंगाधर मुटे

<<< राहा तुमच्या ८००+ कवितांचा पाऊस पाडत >>>

या देशात दीडशे कोटी जनता आहे. ती तुम्हालाही विचारत नाही आणि मलाही विचारत नाही. तुमच्याही इशाऱ्यावर नाचत नाही आणि माझ्याही इशाऱ्यावर नाचत नाही. ते त्यांच्या मर्जीने जगतात.

त्यामुळे आपले वरील वाक्य अत्यंत अनावश्यक स्वरूपाचे ठरते.

आईचा स्त्री म्हणून समजेने वापर केला असावा आणि तिचे ते दुर्दैव बघून काविला अशी रचना सुचली असावी ?

कवी ग्रेस यानी लिहीलेली कवीता फक्त उदाहरण .त्यांनी ती कुठल्या परिप्रेक्षातून लिहीली हा भाग वेगळा असे मी आगोदरच म्हणले आहे.

मुटे यांची कवीता स्त्रीपुरूष मधला संवाद म्हणून बघीतली तर मातृत्व एक त्यातला छोटासाच भाग आहे.

कवी आणी रसिक हे स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे धनी त्यामुळे दोघांच्या मर्यादा वेगळ्या.

आता हलवायाने जिल्बी पाडावी व खाणार्‍याने ती खावी. कुणाला किती गोड लागेल हा ज्याचा त्याचा प्रश्न. हलवाई बनवताना आपल्याच पद्धतीने बनवणार. हलकेच घ्या.

मी पण तुमच्याच कुळीतला वाचक,फक्त आपले मत मांडतो.

गंगाधर मुटे

यस सर,
ही कविता रमताराम आणि मातृत्व यांच्यातील संवाद आहे.

चौकस२१२

हलवाई बनवताना आपल्याच पद्धतीने बनवणार.
बरोअबर पण त्याची चव घेणाऱ्याने " अरे हि जिलबीच आहे का किंवा या जिलबीत हे काय घातलाय " असे विचारायचे म्हणजे महापाप कि काय

गंगाधर मुटे

तुम्ही काढलेला निष्कर्ष हाच जगमान्य असून तोच सर्वांनी शिरसावंद्य मानला पाहिजे का?

अर्थ काढण्याचा जसा तुम्हाला अधिकार आहे तसा आपापल्या परीने निष्कर्ष काढण्याचा, अर्थ लावण्याचा प्रत्येकाला अधिकार नाही का?

कविता आवडली. भावनांतर तर विशेष आवडले. खर तर वरकरणी परस्पर विरोधी वाटणार्या भावना हा भावनाकल्लोळ संचातील घटक असतात.कार्येषु मंत्री करुणेषु दासी शयनेषु रंभा भोजनेषु माता हा स्त्रीचा आविष्कार तरी काय दाखवतो? फ्रॉईडच्या इड इगो सुपर इगो च्या त्रयीत एखादी आवडती स्त्री सहज संचार करते तेव्हा मला तर चक्क तिचे पाय धरावेसे वाटतात. अर्थात ही माझी फँटसी आहे.

सुबोध खरे

कार्येषु मंत्री करुणेषु दासी शयनेषु रंभा भोजनेषु माता

या चारही गोष्टी एकत्र असू नयेत हे तारतम्य आहे.

नाही तर शयनेषु माता आणि भोज्येषु रंभा झालं तर गोची होईल.

वाघीण आपल्या पिल्लांची वात्सल्यपूर्ण माता असतेच पण शिकारीच्या वेळेस तिने वात्सल्य दाखवले तर स्वतःला आणि पिल्लाना उपाशी मरावे लागेल

गंगाधर मुटे

काही आयड्याकडून नेहमीप्रमाणे कवितेशी संबंध नसलेले अनावश्यक व फालतू प्रतिसाद टाकून कवितेचा धागा भरकटवण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे.

माझ्या सवयीप्रमाणे मी जशास तसे उत्तर देणार आणि मग धागा भरकटवण्यात माझाही हातभार लागणार.

त्यावर पर्याय म्हणून आठ दिवस मी मिसळपाव वरून विश्रांती घेत आहे. कवितेची संबंध नसलेले असंबंद्ध प्रतिसाद माझे तरी पडायचे थांबतील.

धन्यवाद! भेटूयात आठ दिवसानंतर!!

चौकस२१२

हा आरोप अमान्य आहे , तुम्ही आमच्या टीकेशी सहमत नसाल पण केवळ मुद्दे समजावून ना घेत तुम्ही उत्तर आणि वयक्तिक टीकेवर वसकन उतरलात

दोन उत्तम कविता आहेत हे पाहिचलेच सांगतले, तेवढे लिहिण्याची प्रतिभा पण आम्चि नाही पण तुम्ही पुढे माणूस आणि पशु यांचे मातृत्व ... एकच असे फालतू प्रतिसाद तारे तोडू लागतात ... विश्रन्ती ह्या नाही तर रोज टंकआ हू केंअर्स