काथ्याकूट

शिक्षित मध्यमवर्ग मोक्षाच्या वाटेवर

Primary tabs

दोन महीने पूर्वीची गोष्ट राजीव चौक जवळ असलेल्या हनुमान मंदिरात मारूतीचे दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडलो, अचानक पटाईssत, अशी जोराची हाक ऐकू आली. मागे वळून बघितले, एक सत्तरीचा वयस्कर माणूस माझ्याच कडे येत होता. तो जवळ आला आणि मला आश्चर्याचा धक्का बसला तो प्रदीप* (टोपण नाव) होता. मला पाहताच तो म्हणाला, पटाईत, तुझ्या चेहर्‍यात काहीच बदल झालेला नाही. अजूनही तसाच दिसतो. तुला पाहताच ओळखले. प्रदीपची माझी पहिली ओळख कृषि भवन मध्ये कार्यरत असताना झाली होती. 1995 मध्ये त्याची बदली झाली. त्यानंतर काही आमची भेट झाली नाही. तब्बल 29 वर्षांनंतर आज आम्ही भेटलो होतो. त्याला जवळच्या कॉफी हाऊस मध्ये घेऊन गेलो. आम्ही कॉफी हाऊस मध्ये दोन तास बसून एका दुसर्‍याच्या राम कहाण्या ऐकल्या.

त्याच्या मुलाने आयटीतील डिग्री घेतली आणि त्याला पुण्यात नौकरी लागली. प्रदीप ने ही निवृत झाल्यानंतर पुण्यात घर विकत घेतले. त्याच वर्षी मुलाचे लग्न ही केले. त्यानंतर मुलाने नौकरी बदलली आणि तो अमेरिकेत गेला. मुलाने अमेरिकेत घर विकत घेतले होते. त्याचा भारतात परतण्याचा विचार नाही. प्रदीप ने विचारले, पटाईत, तुझ्या मुलाचे लग्न झाले का? मी उत्तर दिले, गेल्या वर्षी झाले. तो म्हणाला तीसी उलटल्यावर झाले असेल. मी म्हणालो, काय करणार, मुली होकार देत नव्हत्या. विषय बदलण्यासाठी मी त्याला गमतीने विचारले, तू दोन-चार नातवांचा आजा झाला असेल? त्याच्या चेहरा गंभीर झाला, तो म्हणाला नाही रे. मी विचारले "मुलाने लग्न केले नाही का"? तो म्हणाला, केले आहे. गेल्या दहावर्षांपासून अमेरिकेत आहे. पण त्या दोघांची मूल पैदा करण्याची इच्छा नाही. आता तर त्याची चाळीसी ही उलटली आहे. बहुतेक माझा वंश इथेच संपणार. याचा दोष आपलाच. आपल्या पिढीतील अधिकांश नौकरीपेशा मध्यमवर्गीय लोकांनी एकच मूल पैदा केले. त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागणार. त्याने त्याचाच नातेवाईकांचे अनेक उदाहरणे दिली. नव्या पिढीतील अधिकान्श मुलांचे लग्न 30- 35 उलटल्यावर होत आहे. एकाच्या वर अपत्य नाही. काहींना मूल पैदा करण्याची इच्छा ही नाही. तो पुढे म्हणाला असेच सुरू राहिले तर आपल्या पैकी अधिकान्श शिक्षित मध्यमवर्गीयांचे वंश पुढील 100 वर्षांत संपुष्टात येतील. मी वातावरण हलके करण्यासाठी म्हणालो, याला मोक्ष म्हणतात. प्रदीप ने पुण्यात एक वृद्धाश्रम पाहून ठेवले होते. त्याच संदर्भात तो म्हणाला, आमचे दुर्दैव, आमचा शेवट वृद्धाश्रमात होणार. बहुतेक अग्नि देण्यासाठी कुणी नातेवाईक ही जवळ नसणार. जाता-जाता प्रदीप मला म्हणाला, तुझ्या मुलाला म्हणा, दोन किंवा तीन पोर पैदा कर. मी ही हसत- हसत उत्तर दिले ते माझ्या हातात नाही. आमची कितीही इच्छा असली तरी ही मुलगा आणि सून दोन्ही नौकरी करणारे असल्याने, पुढची पिढीत एकच्या वर वृद्धी होण्याची संभावना कमीच.

त्याची कहाणी ऐकून मला रात्रभर झोप आली नाही. पण त्याचे म्हणणे खरेच होते. माझ्या आजोबांच्या वंशात आम्हा दोन तृतीयांश भाऊ आणि बहीणींचे एकच अपत्य आहे. दोनच्या वर कुणाचेही नाही. पुढची पिढी म्हणाल, तर एकच्या वर कुणाचे ही नाही. हीच परिस्थिति अधिकान्श मध्यमवर्गीय नातेवाईकांच्या घरची आहे. पुढच्या पिढीचा जन्मदर पाहता, पुढील 100 वर्षानी अधिकान्श शिक्षित मध्यमवर्गीयांच्या वंशजांना मोक्षाची प्राप्ती झालेली असेल.

खरे आहे. काही वर्षानंतर देशात सिनिअर सिटिझनच जास्त दिसतील.जी परिस्थिती आज चीन /जपान वर ओढवली आहे ती भारतात ही यायला जास्त वेळ लागणार नाही.

लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी हे अत्यावश्यक पण आहे.

दोन पावले मागे येऊन परत पुढे जायचे.

ह्या विषयाला अनेक कंगोरे आहेत...

१. लोकसंख्या वाढ,
२. स्वतःला सिद्ध करण्यासाठी होत असलेले स्थलांतर
३. मुलींच्या आणि मुलांच्या , लग्नासंदर्भात वाढलेल्या अपेक्षा.
४. स्थिर होण्यासाठी लागणारा वेळ.

एकुण समाजाचा रागरंग पाहता, वृद्धाश्रम हा एकमेव पर्याय ठरत आहे किंवा नातेवाईक आणि मित्र मंडळी यांनी मिळून तयार केली कॉलनी किंवा हाउसिंग सोसायटी.

टर्मीनेटर

"ह्या विषयाला अनेक कंगोरे आहेत...

१. लोकसंख्या वाढ,
२. स्वतःला सिद्ध करण्यासाठी होत असलेले स्थलांतर
३. मुलींच्या आणि मुलांच्या , लग्नासंदर्भात वाढलेल्या अपेक्षा.
४. स्थिर होण्यासाठी लागणारा वेळ."

परफेक्टो...
धागा 'शिक्षित मध्यमवर्गा' विषयी असल्याने ह्यातल्या पहिल्या म्हणजे 'लोकसंख्या वाढ' ह्या मुद्द्याशी मी तरी फारसा सहमत नाही, कारण लोकसंख्या वाढीत (खरोखर 'शिक्षित' असल्यास) मध्यमवर्गाचा वाटा किती? हा संशोधनाचा विषय आहे!

तुम्ही मांडलेल्या बाकीच्या मुद्द्यांशी पूर्ण सहमत आहे. मला त्यांच्या फार तपशिलात जायची ईच्छा नाही त्यामुळे एवढेच सुचवतो की त्या मुद्द्यांवर भावनिकदृष्ट्या विचार न करता व्यावहारिकदृष्ट्या विचार केल्यास त्या प्रत्येक मुद्द्यालाही 'अनेक कंगोरे आहेत' हे देखील सहज लक्षात येईल.
आधीच्या पिढीने केलेल्या चुका टाळण्याचे प्रयत्न जर आजची पिढी करत असेल आणि त्याला पटाईतकाका 'वातावरण हलके करण्यासाठी' का होईना पण 'मोक्ष' म्हणत असतील तर ते योग्यच आहे असे माझे वैयक्तिक मत!

आजच्या परिस्थितीत एखाद्या श्रीमंत कुटुंबाने दोन-चार अपत्ये जन्माला घालणे हे तेवढ्याच संख्येने भावी उच्च मध्यमवर्गीय-मध्यमवर्गीय निर्माण करण्यासारखे ठरू शकेल तसेच एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाने दोन-चार अपत्ये जन्माला घालणे हे तेवढ्याच संख्येने भावी गरीब निर्माण करण्यासारखे ठरू शकेल. जन्माला घातलेले सगळेच नग कर्तबगार/कर्तृत्ववान निघण्याची शक्यता कमीच असते, अगदी अंबानी कुटुंबातही ह्याचे जितेजागते उदाहरण दिसून येते त्यामुळे विषयाचे सार्वत्रीकरण करणे हा उद्देश नाही... पण असो...

.५ टक्के सहमत.

पृथ्वी गोल आहे. आज जे खाली आहेत ते उद्या वर येतील. आज जे वर आहेत ते उद्या खाली जातील. निसर्ग चक्र हे असेच चालत राहाणार. फक्त नावे ,रंग रूप बदलतील. पुर्वी राक्षस होते आता गुंड ,भाई,दादा एव्हढाच फरक.

तेव्हां काळजी नसावी.

ह्या विषयावरचे माझे वैयक्तिक मत....

गेल्या ७०-८० वर्षांपासून, दोन किंवा तीन अपत्येच पुरेत, ही कौटुंबिक गरज निर्माण झाली. ह्याला महत्त्वाचे कारण म्हणजे, वाढती महागाई आणि अन्न टंचाई आणि इंधन टंचाई आणि त्यात वडीलधारी मंडळींचे औषधोपचार आणि इतर जबाबदाऱ्या.

ह्याचा सकारात्मक परिणाम असा झाला की, अपत्यांना आर्थिक नियोजन करून त्यांच्या बौद्धिककुवते नुसार शिक्षण देता आले. पूर्वी घरटी एक तरी अपत्य, (जेंव्हा किमान ५-६ अपत्ये असायची. माझ्या आजोबांना १२ अपत्ये होती आणि माझ्या बायकोच्या आजोबांना ८ अपत्ये.) आर्थिक दृष्टीने परवडत नाही म्हणुन , बौद्धिक क्षमता असूनही, डॉक्टर किंवा इंजिनिअर, होत नसत. माझे वडील, माझे काका माझे आजोबा आणि माझे मामा, हे बौद्धिक क्षमता असूनही, आर्थिक दृष्टीने परवडत नसल्याने, डॉक्टर किंवा इंजिनिअर झाले नाहीत.

आपण तर भोगले पण आपल्या मुलांच्या आयुष्यात शिक्षणाच्या बाबतीत, आर्थिक दगड धोंडे नकोत, ह्या दृष्टीने, २-३ अपत्ये ही त्या पिढीने स्वतः होऊन स्वीकारलेली कौटुंबिक जबाबदारी.

ह्याचा फायदा असा झाला की, डोंबिवली सारख्या त्या काळातील विकसित खेडे गावातून देखील दर वर्षी किमान दोन ते तीन जण परदेशी शिक्षण घ्यायला लागले आणि तिथेच स्थासिक व्हायला लागले ते परत न येण्यासाठीच...

गेल्या ४० वर्षांत तर डोंबिवली सारखे खेडेगाव, ग्राम पंचायत ते महानगर पालिका, असा पल्ला गाठू लागले आणि प्रत्येक शाळेतून, दर वर्षी, किमान ३-४ जण परदेशी शिक्षण घ्यायला आणि तिथेच स्थाईक व्हायला लागले.

गेल्या वीस वर्षांत तर कौटुंबिक आर्थिक परिस्थिति अजून सुधारली.

घरात ३-४ पगार यायला लागले (वडिल धारी मंडळींचे पेंशन आणि अपत्यांची नौकरी) आणि मग अपत्यांची बौद्धिक कुवत, अमेरिका किंवा इंग्लंड इथे शिक्षण घेता येण्यापुरती नसेल तर मग निदान जर्मनी किंवा ऑस्ट्रेलिया किंवा मग गेला बाजार रशिया ही कवाडे पण ओपन झाली. EU ह्या संधीचा फायदा ह्या वर्गाने उत्तम करून घेतला आणि करत पण आहेत. माझ्या मोठ्या मुलाला जर्मनीत शिकायला पाठवणे मला शक्य होत होते ते ह्याच आर्थिक कारणाने , वडीलांची आर्थिक मदत आणि माझे आखाती देशांत कमावलेले पैसे. दुर्दैवाने ते शक्य झाले नाही. पण माझ्या काही मित्रांना ही गोष्ट खरी केली.

आता, ह्याचे कौटुंबिक नकारात्मक परिणाम असा झाला की एक अपत्य काही घरात दोन्ही अपत्ये परदेशी. आई आणि वडील यांना परदेशी वातावरण न आवडल्याने, ते भारतात आणि अपत्ये भारतात यायला तयार नाहीत.

दुसरे अपत्य मुलगी असेल तर सासरी आणि मुलगा असेल तर दुसऱ्या राज्यात तरी किंवा डोंबिवली सोडून पुणे किंवा नाशिक किंवा अगदीच गेला बाजार नागपूर, संभाजी नगर, येथे...

त्यामुळे आज डोंबिवली येथे परिस्थिती अशी आहे की घरोघरी फक्त वृद्ध राजा आणि राणी. राज्य आहे, पैसा आहे पण घरची मंडळी नाहीत. बरं शेजारी पण हीच स्थिती. फक्त ३० वर्षां पूर्वी आमच्या विंग मध्ये २३ जण होते आज फक्त ८ जण.

माझे आई आणि वडील, वृद्ध राजा आणि राणी आणि शेजारी पण हीच स्थिती. सुदैवाने, मी घरी येऊन जाऊन असतो पण भाऊ पुण्याला असल्याने तो काही कौटुंबिक गरज असेल तरच येतो.

इतर घरी पण हीच स्थिती.

ह्याचा एक कळत नकळत, सामाजिक परिणाम असा झाला की वृद्धाश्रम ही ह्या वर्गाची गरज झाली आहे आणि ती योग्य पण आहे.

असो,

वरील लिखाण हे माझ्या डोंबिवलीतील, अनुभवावर आणि माझ्या कौटुंबिक परिस्थिती नुसार लिहिले आहे. मी जे लिहिले तेच सत्य, हा माझा अट्टाहास नाही.

विवेकपटाईत

कालच माझ्या एका पुणेकर नातेवाईकाने हा लेख वाचून सांगितले पुण्यातील १५०च्या वर वृद्धाश्रम आहेत.

वृद्धाश्रम ही काळाची गरज झाली आहे आणि मला तरी त्यात वावगे असे काही दिसत नाही.

पैसा आणि स्वतःची जागा असुनही, मुले परदेशी किंवा दूरच्या गावी असल्याने, बरेचसे वृद्ध अशा ठिकाणी स्वतः हून आपले बस्तान हलवतात.

मला वाटते की एखादा लेख , वृद्धाश्रम ह्या विषयावर लिहिला पाहिजे.

कंजूस

वृद्धाश्रम फक्त पेन्शनरांनाच परवडतात. सगळ्यांच्या कहाण्या एकच. कुणाला भेटायला गेलं की सर्वजण येऊन बसतात गप्पा मारायला. येणारा नातेवाईक सर्वांचाच नातेवाईक पाहणार असतो. दोन तीनदा अनुभव घेतला आहे. संचालिका आम्हाला खुणा करून सांगत होती की काय उत्तरं द्यायची ते. तसंच बोललो आणि सर्व वृद्धांना आनंद झाला.

सहमत आहे...

आर्थिक दृष्टीने संचालक आणि सदस्य ह्या दोघांनाही परवडले पाहिजे...

वृद्धाने अंथरूण पकडले की , दोघांचाही आर्थिक डोलारा कोसळायला सुरुवात होते..

चित्रगुप्त

तुका म्हणे उगी रहावे
जे जे होईल ते ते पहावे
चित्ती असू द्यावे समाधान

-- आणखी आपण शिनेर मंडळी काय करू शकतो ?

कौटुंबिक दृष्टीने,

१. नवीन पिढीला विचारल्या शिवाय सल्ले देऊ नयेत. त्यातही एक उप मुद्दा असा आहे की, आपला सल्ला जर सुनेच्या विरोधात जात असेल तर, मुलाला कोपऱ्यात घेऊन सल्ला द्यायचा. (जावई मवाळ झाले आहेत.)

२. नातवंडांबरोबर जास्तीत जास्त वेळ काढायचा. नातवंडांचे , टीन एज ते मॅरेज लाईफ, हा कालावधी मुकाट काढायचा. पणतू किंवा पणती आली की परत एकदा नव्याने कौटुंबिक सकारात्मक बांध तयार होतात आणि ते चिरकाल राहतात.

चार पिढ्या एकत्र रहात असलेले घर, चिरेबंदी असते... इति बाबा महाराज डोंबोलीकर ...

सामजिक दृष्टिने,

आपल्या आवडी नुसार , स्वभावानुसार मित्र गोळा करणे.

आमच्या डोंबिवली येथे, ज्येष्ठ नागरिक संघ पण आहेत, फुकट वर्तमान पत्रे वाचनालय आहे, ब्रीज, कॅरम इत्यादी खेळणारे संघ आहेत.

आला दिवस स्वतःच्या आनंदासाठी जगायचा. साधे आणि सोपे...

वाचनिय लेख. अपत्यांबाबत मात्र असहमत. १९४७ साली लोकसंख्या २९/३० कोटी होती. त्याआधीच र.धों. कर्वे संततीनियमांवर समाजप्रबोधन करत होते. तेव्हा त्यांचे म्हणणे देशाने मनावर घेतले असते तर बर्याच समस्यांचे निदान झाले असते. म्हणजे आता लोकसंख्या ६० कोटी असती(१९७१ ची लोकसंख्या) तरीही बराच फरक पडला असता. नैसर्गिक संपत्ती, सगळी कडे दिसणार्या मोठ्या रांगा, ट्रॅफिक जाम्, प्रवेश परीक्षा.. जीवन बरेच सुसह्य झाले असते.

ही राष्ट्रीय जबाबदारी,ह्या देशातील प्रत्येक नागरिकाची आहे आणि ही धर्म आणि जात विरहीत असली पाहिजे.

शिवाय, बेकायदेशीर रित्या भारतात आलेले घुसखोर , हा पण ह्या लोकसंख्या वाढीला कारणीभूत आहेच की.

नुकतीच, जागतिक केंद्र, डोंबिवली येथील बातमी देतो...

https://pudhari.news/maharashtra/thane/six-bangladeshi-nationals-arrest…

डोंबिवली सारख्या ठिकाणी घुसखोर मिळत असतील तर देशात किती?

विवेकपटाईत

लेखात मी कुठेही लिहिले नाही की कोणी किती पोरं पैदा करावे. अनेक खऱ्या माणसांच्या घरची परिस्थिती आहे. मी एवढेच लिहिले आहे की भविष्यात आपल्यापैकी अनेकांचे वंश समाप्त होणार आहे.

सहमत आहे.

माझ्या माहितीत किमान १० कुटुंबे अशी आहेत की जिथे फक्त एकच अपत्य आहे.....

रामचंद्र

एकूणच बहुप्रसव उत्तर भारतीय तसेच अल्पसंख्याक जनता महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात बहुसंख्य होणार असं वाटतंय.

हा हा हा.
तसे पाहिले तर महाराष्ट्रही लोकसंख्येत मागे नाही. अगदी १९७१ पासुन पाहिलेत तर सर्वात जास्त लोकसंख्या- उत्तर प्रदेश आणि खालोखाल महाराष्ट्रच राहिलेला आहे.
https://en.wikipedia.org/wiki/1971_census_of_India
https://en.wikipedia.org/wiki/1981_census_of_India

शर्मा, यादव, वर्मा,अग्रवाल,सिन्हा,गुप्ता..
देशपांडे,कुलकर्णी,पाटील्,चव्हाण्,शिंदे.. आडनावे फक्त वानगीदाखल दिली आहेत! . उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये आहेत प्रमुख्याने हे सांगायचे आहे. खालोखाल राजस्थान्,मध्य प्रदेश..ज्यांना 'भैय्यांना दोष द्यायचा आहे त्यांना देउ द्या. ज्यांना विशिष्ट धर्माच्या लोकांना दोष द्यायचा आहे त्यांनाही देउ द्या.
ह्या २/३ राज्यांनी जाती/धर्म बाजुला ठेउन लोकसंख्या नियोजन वेगात केले असते तर बराच फरक पडला असता.
ह्या लोकसंख्या वाढीमुळेच राजकीय पक्ष ह्या दोन्ही राज्यांतील नागरिकांचा व्यवस्थित उपयोग करुन घेतात. गेल्या ३०/३५ वर्षातील जातीय्/धार्मिक ध्रुविकरण ह्या दोन-तीन राज्यांभोवती फिरताना दिसते ते ह्यामुळेच.

देशात हिंदूच्या लोकसंख्येत घट, मुसलमानांची लोकसंख्या 43 टक्के वाढली

https://marathi.ndtv.com/india/population-of-hindus-decreased-in-india-…

-------

भारतात हिंदूंच्या संख्येत 8% घट, जाणून घ्या 65 वर्षात मुस्लिमांची लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली?

https://zeenews.india.com/marathi/india/india-last-65-years-hindu-popul…

------

भारताची जनगणना १९५१

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A…

------

भारताची जनगणना २०११

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A…

-------

आता तुम्हीच ठरवा की लोकसंख्या वाढ कशी होत आहे?

-------

प्रत्येक वेळी 'त्यांची' भीती दाखवुन काय होणार आहे?
The fertility rate – the average number of children a woman gives birth to – among Muslims fell from 4.41 to 2.36 between 1992 and 2021, while it dropped from 3.3 to 1.94 for Hindus
For the last 100 years, the Hindu right has been fearmongering about the Muslim population, and this paper contributes to that history without being critical.”
https://www.aljazeera.com/news/2024/5/18/has-indias-muslim-population-r….

बांगलादेशी आणि रोहींग्या घुसखोर यांचे प्रमाण वाढत आहे.

असो,

विवेकपटाईत

आपण पुत्र / पुत्री पैदा करणार नाही तर दुसरे करतील. शेवटी प्रकृती नियंत्रक आहे.

विवेकपटाईत

अल जजिरा आणि बीबीसी आपल्या देशाच्या बाबतीत खर्‍या बातम्या किंवा खरे आकडे देतात का?

कंजूस

माझा मित्र गमतीने म्हणतो....

इन्व्हर्टर, इमरजन्सी लाईट आले आणि लोकसंख्या वाढीला आळा बसला.
जुने शेजारी म्हणतात लाईट गेले तर पंख्याचीच आठवण येते.

१.५ शहाणा

हा खूप विचार करायला लावणारा व गहन विषय आहे, प्रत्येकाने याव्हा खोलवर विचार करणे गरजेचे आहें.

चौथा कोनाडा

आगामी काळातील संपूर्ण जगाला भेडसावणारी समस्या होत आहे ही.

दक्षिण कोरियात गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
गुंतागुंतीच्या शहरी जीवनमाना मुळे तिथली तरुण पिढी "नो डेटिंग, नो सेक्स, नो मॅरेज, नो चिल्ड्रेन" चा वेगाने स्वीकार करत आहे.. या विषयी मोठा उहापोह सुरू आहे.

दक्षिण कोरियातील जन्मदर चिंताजनक पातळीवर घसरत आहे, आणि त्यामुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. कमी होत असलेल्या जन्मदराचा परिणाम म्हणजे सैन्यात भरती होणाऱ्या युवकांची संख्या घटत आहे, ज्यामुळे लष्कराची ताकद कमी होत चालली आहे.

पुर्ण लेख इथे वाचा :
https://www.orfonline.org/marathi/expert-speak/south-korea-s-declining-…