काथ्याकूट

आपली मातृभाषा मराठी जिवंत राहण्यासाठी आपण काय काय करू शकतो?

Primary tabs

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून महराष्ट्रात पहिलीपासून ३ भाषा सक्तीने अभ्यासक्रमात टाकलेल्या आहेत. दुर्दैवाने त्यात हिंदीचा पूर्णपणे अनावश्यक समावेश केला आहे.

आपली राष्ट्रीय राजकाराणात जाण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याच्या मदतीसाठी, हिंदीभाषिक राज्यात व मतदारात स्वीकारार्हता वाढविण्यासाठी, पक्षश्रेष्ठींच्या मर्जीत राहण्यासाठी स्वभाषेचा, मुली-मुलांचा, महाराष्ट्राच्या हिताचा बळी दिला जात आते. हिंदी कोवळ्या वयात मुली-मुलांवर लादण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी व तितकाच संतापजनक आहे. वयाच्या सहाव्या वर्षी एकदम ३ भाषा शिकाव्या लागणे हा त्या कोवळ्या जिवांवर क्रूर अत्याचार आहे.

मुळात महाराष्ट्रात हिंदी शिकण्यासाठी कोणतेही वेगळे परीश्रम करण्याची कोणतीही गरज नाही. मराठी व हिंदीची लिपी व व्याकरण समान असून बहुतांशी शब्द समान आहेत. हिंदी वर्गात बसून अजिबात न शिकताही मराठी माणसांना हिंदी व्यवस्थित समजू शकते, बोलता येते व लिहिताही येते. मग अभ्यासक्रमात हिंदी हा वेगळा विषय म्हणून अगदी पहैलीपासून सक्तीचा करून मुली-मुलांच्या डोक्यावरील भार वाढविणे व त्यांचा वेळ अक्षरशः वाया घालविणे यापेक्षा काहीही वेगळे साध्य होणार नाही.

नोकरी मिळविणे, परदेशात जाणे, पदवी व पदव्युत्तर शिक्षण इ. साठी हिंदी संपूर्ण निरूपयोगी आहे. फडणवीसांनी आअली कायद्याची पदवी इंग्लिशमध्ये मिळविली की हिंदीमध्ये स्वत:च्या मुलीला हिंदी माध्यमाच्या विद्यालयात शिकविले की हिंदी माध्यमाच्या? नोकरी, उच्च शिक्षण, परदेशी जाणे यासाठी इंग्लिशला पर्याय नाही व त्यासाठी हिंदीचा शून्य उपयोग आहे.

तामिळनाडूने तिसरी भाषा अभ्यासक्रमात लादण्यासाठी स्वच्छ शब्द्दत नकार दिला आहे. तामिळ व इंग्लिश या दोनच भाषा आम्ही अभ्यासक्रमात ठेवणार, हिंदी अर्यायी भाषा म्हणून सुद्धा अभ्यासक्रमात ठेवणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे, हिंदीभाषिक राज्यात हिंदी व इंग्लिश या दोनच भाषा अभ्यासक्रमात आहेत. मग महाराष्ट्रात हिंदीचा एवढा कंड का आहे? आधी नेहरू, नंतर इंदिरा गांधींनी त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रावर लादले, आजवर कोणत्याही पक्षाच्या एकाही सरकारने क्षीण विरोध सुद्धा केला नाही. केंद्र सरकारचे सर्व निर्णय निमूटपणे सर्वांनी स्वीकारले. फडणवीसांनी पुढची पायरी गाठली.

हिंदी म्हणे राष्ट्रभाषा आहे व ती सर्वांना यायलाच हवी असे मराठी नेते राज्य स्थापनेपासून बरळत आहेत. राज्यभाषा प्रचार समिती हे खूळ फक्त महाराष्ट्रातच आहे. भारतीय राज्यघटनेनुसार भारतात कोणतीही भाषा ही राष्ट्रभाषा नाही. प्रत्येक राज्याची भाषा ही राज्यभाषा आहे. मग हिंदी राष्ट्रभाषा आहे हे वारंवार असत्य का सांगितले जाते

व्यावहारिक लाभासाठी पहिलीपासून सर्वांना इंग्लिश व्यवस्थित यावे असे धोरण हवे. त्याबरोबरीने इंग्लिश लिपीशी साधर्म्य असणार्‍या दॉईच, फ्रेंच, स्पॅनिश, डच अश्या भाषांचा पर्याय हवा किंवा संगणक, कला, दाद्य,, गायन, नृत्य असे पर्यायी विषय हवे ज्यामुळे रोजगार मिळण्याची जास्त शक्यता आहे. अगदीच खाज असेल तर हिंदी हा ऐच्छिक विषय म्हणून असावा.

हिंदीमुळे यापुढे महाराष्ट्रात मराठी कोणासाही येण्याची आवश्यकता उरलेली नाही. अश्या परिस्थितीत मराठी जगविण्यासाठी व मराठीचे व्यावहारिक महत्त्व कायम राहून वाढविण्यासाठी आपण खालील कृती करू शकतो.

१) cm@maharashtra.gov.in या पत्त्यावर मी खालील ईमेल लिहिले आहे.

भारतात घटनेनुसार कोणतीही भाषा राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही फालतू भाषा कधीही राष्ट्रभाषा नव्हती, नाही व नसेल. आपले अनेक मंत्री हिंदी राष्ट्रभाषा आहे असे धडधडीत असत्य सांगत आहेत.

पहिलीपासून महराष्ट्रात हिंदी सक्ती करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्या. तिसरी भाषा म्हणून इतर सर्व भाषांचे पर्याय द्या व ही तिसरी भाषा पाचवीनंतर अभ्यासक्रमात आणा.

कोणत्याही परिस्थितीत हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. आम्हाला हिंदुराष्ट्र हवे आहे, हिंदीराष्ट्र अजिबात नको.

मी व माझे कुटुंब भाजपचे कट्टर समर्थक असलो तरी हिंदी सक्तीचा निर्णय मागे न घेतल्यास भविष्यातील कोणत्याही निवडणुकीत भाजपला मत देणार नाही.

२) महाराष्ट्रात समोरासमोर किंवा दूरभाष माध्यमाद्वारे मी कधीही हिंदीत बोलणार नाही, मराठीतच बोलण्यावर आग्रही राहीन. अगदीच पर्याय नसेल तर इंग्लिश. हिंदी येत नाही हे ठामपणे सांगत राहीन.असे सांगितल्यावर बहुतेक वेळा समोरील व्यक्ती मराठीत बोलण्याचा प्रयत्न करते असा माझा अनुभव आहे.

३) माझ्या फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअ‍ॅप, टाटा स्काय, गुगल इ. ची भाषा मराठी ठेवली आहे. गुगलवर शोधलेली पाने मला मराठीत भाषांतरीत होऊन दिसतात. यातून मराठी भाषेचे महत्त्व वाढते.

४) एटीएम वापरताना मी मराठीचा पर्या निवडतो. आपण जेव्हा जेव्हा मराठी हा पर्याय एटीएमवर, आंतरजालावर, संभाषणात वापरला जातो तेव्हा तेव्हा त्याची नोंद होते व मराठी अनेक जण वापरताहेत असे दिसले तर मराठीचा पर्याय जिवंत राहतो. यातून मदतकेंद्रात मराठी माणसांना काम मिळण्याची शक्यता वाढते. माझ्या ओळखीचा एक जण काही वर्षांपासून गुगलला मराठीत भाषांतर केलेली वाक्ये, शब्द इ. पुरवितो. मराठी अजिबात वापरात नसती तर गुगलला मराठी पर्याय द्यायची गरज वाटली नसती.

५) मराठी माणसांशी बोलताना सुद्धा शक्य तेथे मराठीच पापरा. नाईन एट टु टु फोर असा क्रमांक सांगण्याऐवजी नऊ आठ दोन दोन चार असा सांगता येतो. ग्रॉक, चॅटजीपीटी वगैरे कॄबु साधने वापरतानाही मराठीत प्रश्न विचारल्यास मराठीत उत्तर येते.

सर्व पक्षांचे सर्व राज्यकर्ते अत्यंत नालायक आहेत. ते सत्तेसाठी आईबाप्प सुद्धा विकतील तेथे मातृभाषेला किंमत काय. मराठी वाचविण्यासाठी फक्त मराठी माणसेच प्रयत्न करू शकतात.

आम्हाला हिंदुराष्ट्र हवे आहे, हिंदीराष्ट्र अजिबात नको.

अहो गुरुजी, तुम्ही ज्या लोकांच्या बाजूला उभे राहता आहात ते लोक -
आम्हाला हिंदी राष्ट्र नको अन् हिंदू राष्ट्र तर मुळीच नको असे म्हणणारे आहेत.

तस्मात् खरा प्रश्न हा आहे -

तुम्हाला हिंदुराष्ट्र मिळत असेल अन् समजा त्यातील प्रधान भाषा मराठी व्यतिरिक्त अन्य कोणतीही असेल तर तुम्ही ते हिंदू राष्ट्र नाकारणार आहात का ?

अमराठी हिंदुराष्ट्र आणि मराठी "गंगा जमना तहजीब वालं सेक्युलर राष्ट्र" ह्यात चॉईस करा असे तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय निवडाल ???

श्रीगुरुजी

मराठी भाषा नसलेले हिंदुराष्ट्र मला नको आणि मराठी भाषा असलेले अहिंदुराष्ट्र सुद्धा मला नको.

हिंदुराष्ट्रासाठी मराठीचा बळी देणे मी मान्य करणार नाही.

अनपेक्षित उत्तर.
आता अवांतर :
म्हणजे समजा महाराणा प्रताप ह्यांनी राजस्थानी हिंदू स्वराज स्थापन केले असते तर तुम्ही ते नाकारले असते ?
आणि हरिहर बुक्कारयाचे कन्नड हिंदुराष्ट्र ?
आणि चोळांचे हिंदुराष्ट्र तुम्ही नाकारणार का ?

समजा उद्या योगी जी पंतप्रधान झाले अन् त्यांच्या निमित्ताने आम्हाला आमचे पुण्येश्वर, नारायणेश्वर मंदिर परत मिळणार असेल तर केवळ योगी हिंदी बोलतात, मराठी बोलत नाहीत म्हणून आम्ही ही मंदिरे नाकारायचे का ???

असो. ज्याच्यात्याच्या निष्ठा जाचेत्याचें प्राधान्यक्रम !

श्रीगुरुजी

यासाठी मराठीचा बळी देणे अजिबात मान्य नाही. हिंदुराष्ट्र करा, हिंदू स्वराज्य करा किंवा अजून काही करा, मराठी जिवंत राहणार असेल तरच मान्य आहे. मुळात हे करण्यासाठी मराठीचा बळी देण्याची कोणतीही आवश्यकता अजिबात नाही. मराठी माणूस हिंदी न समजता सुद्धा आयुष्याभर हिंदू राहू शकतो.

अथांग आकाश

मुळात हे करण्यासाठी मराठीचा बळी देण्याची कोणतीही आवश्यकता अजिबात नाही.

तिसरी भाषा हिंदी ठेवल्याने मराठीचा बळी कसा जातो? काहीही येडछाप बोलु नका ते कंत्राट दुसर्‍याला मिळाले आहे!

वामन देशमुख

प्रगो, हा विषय सध्या टाळावा, अवांतर करू नये अशी विनंती.

श्रीगुरुजी

कोणतीही आवश्यकता नसताना हिंदी सक्तीच्या वादग्रस्त निर्णयावरील लेखात व इतरत्र हिंदुराष्ट्र, ब्राह्मणद्वेष इ. मुद्दे घुसडले.

मुळात हिंदुराष्ट्र हा येथे मुद्दाच नाही. विनाकारण हिंदीची पहिलीपासून सक्ती करणे, त्यातून भविष्यात महाराष्ट्र हे हिंदीराष्ट्र करणे हे वादग्रस्त निर्णय हा मुद्दा आहे.

D'accord.

I accept that your suggestion and stop here.

मेरे जो विचार है वो मैने लेख दिये , और वो आप तक पोहच भी गये.

इत्यलम्

कळळं रांडेच्या. बसतू गप. पर म्या अदुगरच सांगून ठेवलेलं लक्षात ठिव.

सोत्रि

आपली मातृभाषा मराठी जिवंत राहण्यासाठी आपण काय काय करू शकतो?

मराठी भाषा जिवंत राहणार नाही हे कसं ठरलं/ठरवलं?

- (मराठी) सोकाजी

Bhakti

एखाद्या भाषेत बोलणाऱ्यांची संख्या कमी होत जाते तशी ती हळूहळू मृत होण्याकडे वाटचाल करते.

श्रीगुरुजी

अगदी बरोबर. महाराष्ट्रात हिंदीला मराठीच्या बरोबरीने स्थान देणे म्हणजे महाराष्ट्रात मराठीची आवश्यकता नष्ट करणे व पर्यायाने मराठी मारून टाकणे.

सोत्रि

हे बादरायण संबंध जोडण्यासारखं आणि अतिशयोक्त आहे.

- (मराठी ) सोकाजी

महाराष्ट्रात हिंदीला मराठीच्या बरोबरीने स्थान देणे म्हणजे महाराष्ट्रात मराठीची आवश्यकता नष्ट करणे व पर्यायाने मराठी मारून टाकणे.
+१

सोत्रि

ह्या न्यायाने संस्कृत भाषा मृतभाषा म्हणायला हवी. पण तसं नाहीयेय. The Australian National University, the University of Oxford, and the University of Iowa ह्या विद्यापीठांमध्ये संस्कृत भाषा शिकवली जाते, आजही.

- (मराठी) सोकाजी

Bhakti

कोण म्हणतं संस्कृत बोलली जात नाही? सकाळच्या सूर्यनमस्कारापासून, भगवद्गीता ,गायत्री मंत्रापर्यंत (अजून तर खूप संस्कृत रचना रोज वापरल्या जातात )अनेक वेळा ती जपली जाते.संस्कृत तर मराठी,हिंदी,गुजराती इ. इंडो आर्यन भाषांची एक महत्त्वाची शाखा आहे आहे.ती जागतिकच असणार ना.
संतांची कृपा म्हणून प्राकृत मराठी ते आजच्या मराठी पर्यंत ही बोलली जाते.

अगदी. अगदी.
फार काय तर हिंदी चित्रपटात लग्नाचे फेरे घेताना, खलनायकाचा वध (की खून) करताना देखील मागे संस्कृत श्लोक बोलले जातात.

अवांतर : खालील दुव्यांवर टिचकी मारुन माझ्या आवडत्या संस्कृत गाण्यांचा आस्वाद घ्या.
मम देशो भारतं। मम भाषा संस्कृतम् ।
धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना (संस्कृत)
वादा कर ले साजना (संस्कृत)
तेरी मिट्टी मे मिल जावा (संस्कृत)

Bhakti

+१ जाहिरात
लेकी बरोबर माझीही एक बालकविता पाठ झाली.(शुनक शुनक)
https://youtube.com/shorts/GN9a2UX7GEg?si=Z4ighF38nrYA2H5Y
ऑनलाईन माध्यमामुळे तिला भाषा शिकणं जरा जड गेलं.बाकीचे विद्यार्थी पहिल्यापासून संस्कृत शिकत असल्यामुळे खुप पारंगत होते.
ऐकते सर्व गाणी!

अथांग आकाश

नोकरी मिळविणे, परदेशात जाणे, पदवी व पदव्युत्तर शिक्षण इ. साठी हिंदी संपूर्ण निरूपयोगी आहे.

तुमचे संकुचीत विचार नीट समजले! रेमीटन्सवर जगणारे मागास हिंदुराष्ट्र तुम्हाला हवे आहे तर! छान!! पदवी व पदव्युत्तर शिक्षण मराठीत शिकुनही मिळते हे तुम्हाला माहिती नाही का? ज्यांना तेवढे पुरते ते घेतात.

सर्व पक्षांचे सर्व राज्यकर्ते अत्यंत नालायक आहेत. ते सत्तेसाठी आईबाप्प सुद्धा विकतील तेथे मातृभाषेला किंमत काय.

ऑ! नका देउ मत पण मग हे कशाला?

मी व माझे कुटुंब भाजपचे कट्टर समर्थक असलो तरी हिंदी सक्तीचा निर्णय मागे न घेतल्यास भविष्यातील कोणत्याही निवडणुकीत भाजपला मत देणार नाही.

मिपा आता नाना नानी पार्क झाले आहे हेच खरे!!!

वामन देशमुख

मी मी शक्य तेवढी मोबाईल ॲप्स मराठी मध्ये वापरतो. मराठीतील शक्य तेवढे लिखाण आवाजाद्वारे टाईप करून लिहितो. इतरही इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरताना शक्य तेवढा मराठीचा उपयोग करतो.‌ महाराष्ट्रात असताना ठरवून मराठीतच बोलतो. महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक या राज्यांमध्ये हिंदीचा बापर शक्यतो करत नाही.

मराठी इंग्लिश तेलुगू हिंदी उर्दू या भाषा मला पुरेशा चांगल्या रीतीने येतात. अगदी बेसिक कन्नड देखील येते.‌ तरीही गैर लागू भाषेचा वापर शक्यतो करत नाही.‌

महाराष्ट्रामध्ये मराठी व इंग्लिश या व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेची सक्ती करणे हे अजिबात मान्य होणारे नाही.‌ महाराष्ट्र शासनाने मराठी व इंग्लिश याव्यतिरिक्त इतर कोणतीही भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय घेतला असेल तर तो तात्काळ रद्द करायला हवा.

- (तेलुगु व कन्नड मावश्या असलेला मराठी भाचा) द्येस्मुक् राव्

पहिली पासून हिंदीचा अतिशय चुकीचा नर्णय. केवळ आणि केवळ आपल्या वरिष्ठतांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. विरोधी पक्षांनी ह्याचा विरोध केला पाहिजे.

Bhakti

खुप चुकीचा निर्णय आहे.हिंदीने आधीच महाराष्ट्रात पाय पसरवले आहेत.आता मराठीच्या बरोबरीने ती शिकवण्याची सक्ती विश्वास घातकी आहे.हिंदी ऐवजी इतर पर्याय द्या,ते निवडण्याची मूभा द्या.

अथांग आकाश

आता मराठीच्या बरोबरीने ती शिकवण्याची सक्ती विश्वास घातकी आहे.

कशी काय विश्वास घातकी आहे? हे कृपया स्पष्ट करावे!

हिंदी ऐवजी इतर पर्याय द्या,ते निवडण्याची मूभा द्या.

कोणते पर्याय चालतील? कन्नड, तेलगु, तामिळ, मल्याळम, उडिया, गुरुमुखी, असामी, मणिपूरी, बंगाली, उर्दू का अजून कुठली?

अथांग आकाश

आता मराठीच्या बरोबरीने ती शिकवण्याची सक्ती विश्वास घातकी आहे.

कशी काय विश्वास घातकी आहे? हे कृपया स्पष्ट करावे!

हिंदी ऐवजी इतर पर्याय द्या,ते निवडण्याची मूभा द्या.

कोणते पर्याय चालतील? कन्नड, तेलगु, तामिळ, मल्याळम, उडिया, गुरुमुखी, असामी, मणिपूरी, बंगाली, उर्दू का अजून कुठली?

Bhakti

मला संस्कृत पर्याय चालेल.पुण्यातल्या काही शाळांमध्ये पहिलीपासून संस्कृतही शिकवतात.आमच्याकडे तो पर्याय नाही.त्यामुळे बाहेरून मुलीसाठी एका संस्कृत विद्यापीठाचा कोर्स लावला होता.सर्व भाषांची महत्त्वाची शाखा जाणून घेतली तर भाषेचे फायदे वेगळे शिकवावे लागणार नाही.

अथांग आकाश

मला संस्कृत पर्याय चालेल.पुण्यातल्या काही शाळांमध्ये पहिलीपासून संस्कृतही शिकवतात.आमच्याकडे तो पर्याय नाही

ऑ! संस्कृत ही रोजगाराभिमुख भाषा आहे? असेलही काही शे लोकांसाठी! १४० कोटींच्यावर लोकसंख्या असलेल्या देशासाठी हा पर्याय योग्य आहे का? तुम्ही आधीच्या प्रश्नाचीही उत्तरे दिली नाहीत!! ती कृपया द्यावीत म्हणजे काही गैरसमज दुर होतील!!!

Bhakti

माझ्या ओळखीतल्या किमान पाच तरी मुली संस्कृत भाषा (phd न करता )निमित्ताने स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.एक तर परदेशात शिकवते.
विश्वास घातकी म्हणजे हेच की हिंदी मावशीला समोरच्या रोजगार करणाऱ्याला मदत म्हणून समजून घेतलं तर मावशी घरचं बळकावतेय घरात रोजगार करायचा तर हिंदी यायलाच हवं हे गरज नसताना होत आहे.

अथांग आकाश

माझ्या ओळखीतल्या किमान पाच तरी मुली संस्कृत भाषा (phd न करता )निमित्ताने स्वतःच्या पायावर उभ्या आहेत.एक तर परदेशात शिकवते.

हे आजचे झाले! विस वर्षांनंतर संस्कृत सारखी निरुपयोगी भाषा किती लोकांना रोजगार मिळवुन देईल?

विश्वास घातकी म्हणजे हेच की हिंदी मावशीला समोरच्या रोजगार करणाऱ्याला मदत म्हणून समजून घेतलं तर मावशी घरचं बळकावतेय घरात रोजगार करायचा तर हिंदी यायलाच हवं हे गरज नसताना होत आहे.

हे साप साप म्हणुन भुई धोपटण्यासारखे झाले!
२०४७ हे लक्ष्य ठेउन आखलेल्या दिर्घकालीन धोरणांतर्गत हा निर्णय घेतला असेल तर आज पहिलित असलेल्या मुलांना पंधरा वीस वर्षांनी त्याचा फायदा होणार नाही असे खात्रीलायकपणे आज कोणी सांगु शकेल का? दरवर्षी शिक्ष्णावर अब्जावधी रुपये खर्च करणार्‍या केंद्र आणि राज्य सरकारला शैक्षणिक धोरण ठरवण्याचा अधिकार असु नये?
सरकारचा निर्णय आवडला नाही म्हणुन त्यावर टिका, साधक-बाधक चर्चा करणे ठिक आहे! पण येथे काही लोक फक्त आपल्या व्यक्तीगत आकस, द्वेषातुन काहिच्या काही अकलेचे तारे तोडत आहेत ते संतापजनक आहे!!

चित्रगुप्त

कोणते पर्याय चालतील? कन्नड, तेलगु, तामिळ, मल्याळम, उडिया, गुरुमुखी, असामी, मणिपूरी, बंगाली, उर्दू का अजून कुठली?

भोजपुरी हो.
भोजपुरी आली तर त्यातली गाणी आणि सिनेमे लहान मुलांना सुद्धा बघता येतील आणि समजतील.
तेवढंच राहिलेलं आहे आता महाराष्ट्रातल्या मुलांसाठी करायला. हे राम.

.

चौथा कोनाडा

चित्रगुप्तजी .. छान मनोरंजक प्रतिसाद !

भोजपुरी गाण्यांसाठी वेगळा धागा काढावा ही लोकाग्रहास्तव मागणी !

चित्रगुप्त

भोजपुरी गाण्यांबद्दल आमचा एक धागा आहे वाटते जुना. हुडकून आणतो वर.

श्रीगुरुजी

हहपुवा.

नेपाळी, भुटिया, सिंधी हे सुद्धा पर्याय शिल्लक आहेत.

श्रीगुरुजी

महाराष्ट्रात तिसरी भाषा सक्तीची नको. सक्ती फक्त मराठी व इंग्लिशसाठी हवी.

तिसरी भाषा याऐवजी संगणक, गायन, नृत्य, वादन, क्रीडा, परकीय भाषा, इतर भारतीय भाषा हे पर्याय हवे. ज्यांना हिंदी हवी ते शिकतील तिसरा विषय म्हणून. ज्यांना हिंदी नको ते इतर कोणतातरी आवडीचा विषय शिकतील.

अथांग आकाश

तिसरी भाषा याऐवजी संगणक, गायन, नृत्य, वादन, क्रीडा, परकीय भाषा, इतर भारतीय भाषा हे पर्याय हवे.

नक्की का? मग परकीय भाषा, इतर भारतीय भाषा हे पर्याय हवे. लॉक किया जाये?
गुरुजी जो कुठला फालतू माल फुकून असे प्रतिसाद देत असाल तो फुकणे पाहिले बंद करा! जेसी पिंकमन होत आहात तुम्ही :-)

वामन देशमुख

हिंदी ऐवजी इतर पर्याय द्या,ते निवडण्याची मूभा द्या.

तिसर्‍या पर्यायाची गरजच नाही.

महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात मराठी व इंग्लिश या दोन भाषा पुरेशा आहेत. तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याची आवश्यकता नाही.

काही मुर्खाना वाटतेय की हिंदी म्हणजे हिंदुत्व! बाकी लेख छान आहे, मराठी माणसालाच मरतजी वाचववू लागणार आहे, अन्यथा मराठी १० वर्षातच संपेल. कोवळ्या जीवांवर हिंदी लादून काय साधणार आहेत?

अथांग आकाश

मराठी माणसालाच मरतजी वाचववू लागणार आहे,

चोक्कस! साची वात छे!!

श्रीगुरुजी

मराठी भाषेचे सौंदर्य, नवरस, वृत्ते, योग्य शब्द इ. वर एक लेखमाला लिहिण्याचा विचार आहे. लवकरच सुरू करतो.

अथांग आकाश

लिह! पिसं काढायला आम्ही मऱ्हाठी द्वेषी बसलोच आहोत तुंम्हा फडणवीस द्वेषी सारखे :-)
फ्री नको पण बुर्जी कुठे चांगली मिळते ते बघावे लागेल!!

मुळात मराठी माणसाला हिंदी शिकण्याची गरज नाही. त्याला आजूबाजूच्या वातावरणातून जुजबी हिंदीचे धडे मिळत असतात. जसा इतर राज्यांत हिंदीचा पर्याय दिलेला आहे तसा हिंदी भाषिक पट्यात मराठी / गुजराती / कन्नडा / तमिळ /तेलुगू यापैकी कोणतीही एक भाषा तरी पहिलीपासूनच सक्तीचे करावी कारण तिकडची जनता याच
भाषा बोलणार्‍या राज्यांत कामासाठी जात असते. त्यांना रोजगार मिळायला मदत होईल. फारच वाटले तर याला राष्ट्रभक्तीचा मुलामा चढवावा म्हणजे बघा उत्तरेतून येऊन कशी दक्षिणवासियांची मने जिंकली वगैरे. या सगळ्या भाषा शिकल्या तर उत्तरेच्या राजकीय पक्षांना देखील दक्षिण मधे प्रवेश करायला मदत होईल. मार्ग थोडा अवघड आहे पण पहिलीपासूनच ब्रेनवॉश केला तर जमून जाईल.

मराठी भाषिकाला फक्त ट्रेन मधे भांडताना मराठी भाषा आठवते पण भांडण जसजसे पुढे जाते तसतसे तो हिंदीवरच घसरतो.

मुळात राजकारण्यांपेक्षा मराठी भाषिक म्हणून आपण स्वतः नालायक आहोत हे मान्य केले तर आपल्या चुका सुधारता येतील.
मराठी भाषिकांची भांडकुदळ म्हणून प्रतिमा बनविली गेली आहे / बनली आहे (त्याला जबाबदार कोण हा नंतरचा प्रश्न ), ती सुधारण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागतील.
कामानिमित्त बरेचदा चेन्नै, कोईम्बतूर येथे जाणे येणे व्हायचे तेथे हिंदी बोलता येते का विचारल्यावर "सॉरी सर, ओन्ली तमिळ ऑर इंग्लीश" असे विनयपुर्वक उत्तर कैकवेळा मिळाले आहे.
मराठी कामगार मिळणे, त्याने वेळेत काम करणे, आवश्यकता पडल्यास वेळेपेक्षा जास्त काम करणे हा आमच्यासारख्या छोट्या व्यावसायिकांसाठी मोठाच मुद्दा बनलेला आहे हे मान्य करण्याशिवाय पर्याय नाही. मी १५ वर्षे मराठी बाणा राबवून हट्टाने मराठी कामगार ठेवले मात्र त्यातून प्रचंड त्रास सहन करावा लागला. (काही अपवाद होते त्याचे कौतुक आहेच).त्यामुळे नाईलाजाने हिंदी भाषिक कामगारांना शरण जावे लागले आहे. शेवटी पोटासमोर मराठी बाणा किती टिकवायचा याचा पण विचार करावा लागला.
मात्र मराठी माणूस शक्यतो चोरीचपाटी करत नाही, बोलायला स्पष्टवक्ता असतो मात्र शक्यतो खोटी आश्वासने देत नाही असे देखील अनुभव आले आहेत हे देखील नमूद करावेसे वाट्ते.

हिंदी भाषिकांना मराठी समजते पण बोलता येत नाही असे मला बरेच हिंदी भाषिक म्हणतात. ते किती खरे, किती खोटे मला माहित नाही मात्र त्याने हिंदीत बोलावे, आपण मराठीत बोलावे, अडलेल्या शब्दावर हिंदी बोलावे असा सध्याचा दिनक्रम आहे.

बरेच अवांतर झाले पण मुळात हिंदी भाषिक नको हा या धाग्याचा मुद्दा नाही तेव्हा केवळ शिक्षणात हिंदीची सक्ती नको एवढीच मागणी पुढे रेटून थांबतो. मुख्यमंत्री कार्यालयाला ईपत्र पाठवतो आहे.

चौथा कोनाडा

मुळात राजकारण्यांपेक्षा मराठी भाषिक म्हणून आपण स्वतः नालायक आहोत हे मान्य केले तर आपल्या चुका सुधारता येतील.

+१०१

माझ्या ओळखीचे अनेक उत्तर भारतीय आहेत, छान मराठी बोलतात, त्याना विचारले तेव्हा कळले की मराठी लोकच हिंदीत सुरुवात करतात आणी त्याना नाईलाजाने हिंदीतच बोलावे लागते, दक्षिणेतले लोक त्यांच्या भाषेत हिंदी भाषिक बोलला तर आनंदतात व दक्षिण भारतीय भाषेत बोलू लागतात, ह्याउलट मराठी लोक समोरचा मराठी बोलत असेल तरीही हिंदीतच बोलत सुटतात, हिंदीत बोलणे हा मानसिक रोग झालाय मराठी माणसाचा.

अथांग आकाश

हिंदीत बोलणे हा मानसिक रोग झालाय मराठी माणसाचा.

तुमचा रोग असेल! सरसकट सगळ्या मराठी माणसांना दोष देउ नका! छोटे पिंक्मॅन!

आपली बाजू कितीही बरोबर असली तरी आपण आडमुठेपणा केला की समोरुन धडाकेबाज विरोध होणार, वाद होणार, हम्रीतुमरी होणार आणि शेवटी मराठी भाषेचे नुकसान होणार. खुप चांगली नाही बोलता आली तरी चालेल पण व्यवहारापुरती आली पाहिजे असे वाटणारे अन्य भाषिक लोक अनेक आहेत. मी राहतो त्या सोसायटीच्या वाचनालयात अशा लोकांचे जुजबी मराठीचे वर्ग घेण्याचा विचार केला आहे. क्रिकेट खेळायला जातो तिथेसुद्धा बरेच जण आहेत. बघू जमते का.

हिंदी शिकवण्यापेक्षा लहान मुलांना महिन्यातून दोन हिंदी चित्रपट बघायला लावणे अनिवार्य करावे. करोनानंतर तुमचे ते मल्टिप्लेक्सवाले कोलमडले आहेत असे वाचले आहे. एवढा मोठा धंदा मिळाल्यावर ते खूष. पॉप्कॉर्न्/सामोसेवाले पण खूष, घरापासुन थियेटर्/मल्टिप्लेक्स पर्यंत पोचवणारे रि़क्षावाले पण खूष..बॉलिवूडवाले पण खूष.
अर्थव्यवस्था चाललीच मग वरच्या दिशेने.

अथांग आकाश

ह्याचा खर्च मात्र राज्यसरकारने केंद्राकडुन वसुल करावा

बरोब्बर! हिंदी शिकवण्यासाठी लाखभर अमराठी शिक्षकांचा पगार तुमच्या ह्यांनी आपल्या खिशातुन का म्हणुन करावा बरे? तो राज्यसरकारने केंद्राकडुन वसुल करावा :-)

युयुत्सु

हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडु हिला बैसवू वैभवाच्या शिरी
जगन्मान्यता हिस अर्पू प्रतापे अभिजातता थापू कशी ही तरी

चौथा कोनाडा

हे आवडलं आपल्याला !

शाब्बास !

अश्या खटपटींमुळेच मराठी भाषा टिकेल !

आपली मातृभाषा मराठी जिवंत राहण्यासाठी आपण काय काय करू शकतो? म्हणण्या आगोदर मी काय काय करू शकतो हा विचार प्रत्येक मराठी माणसाने करावा.

शक्य असेल तेव्हढे प्रयत्न करावेत. कुठलाही एकटा मराठी राजकिय निर्णयावर प्रभाव टाकू शकत नाही.अंधभक्त किंवा भक्त आपआपल्या नेतृत्वाखालीच झेंडे फडकवणार व नेतृत्व कधी कुठला झेंडा उचलेल हे त्याला ही माहित नसते तेव्हां मातृभाषेचे पांग फेडण्यासाठी नेतृत्वाच्या चुकीच्या, मराठी विरोधी निर्णयावर रोकठोक उत्तर द्या. मराठी, मातृभाषेसाठी तरी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र या. राजकारणी या मुद्द्यावर कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रभावित करू शकतात.

चाळिसवर्षात हिन्दीभाषीक प्रदेशात, लोकांबरोबर असताना जे काही मराठी बांधव भेटले त्या मधील बरेच जणांकडून निराशाच पदरात पडली.

पानिपतावर विखुरलेल्या व संपुर्ण भारत वर्षात स्थायीक झालेल्या मराठी पिढ्यांनी मराठीबाणा टिकवून ठेवला आहे. जागोजागी महाराष्ट्र मंडळे कार्यान्वित आहेत. गणपती,कोजागिरी, हळदीकुंकू समारंभ ,मराठी वाचनालय असे अनेक उपक्रम राबवत आहेत. मराठी माणसासाठी एक मायेची जागा परप्रांतात टिकवून ठेवली आहे. दिल्ली,जयपुर,अजमेर,उदयपुर, श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंत व गोहाटी पासून सौराष्ट्र पर्यंत महाराष्ट्र मंडळे येणाऱ्या मराठी माणसासाठी जागा राखून ठेवली आहे. मी स्वता बरेच ठिकाणी मंडळात उतरलो आहे,राहिलो आहे व तीकडे जाणाऱ्यांना पण आग्रह केला.

परदेशातील मराठी माणूस सुद्धा संगठीत आहे. ढोल पथक, मल्लखांब सारखे संघ आहेत. गणपती दिवाळी होळी सारख्या प्रसंगी
एकत्र येतात.

महाराष्ट्रातील मराठी माणसाने याचा विचार करावा.

हिन्दी पहिली पासून शिकवा,नका शिकवू याने फारसा फरक पडणार नाही जर मराठी माणसाने मराठीपण जपले तर. घरापासून सुरवात करा.पुढच्या पिढीत रूजवा.

मराठीला मरण नाही ती अजरामर आहे पण आपणच ती टिकवावे लागेल.

चित्रगुप्त

स्वतःच्या आणि बायकोच्या नावाचे दोन अर्ज आत्ताच पाठवले. सर्व मिपाकरांनी तातडीने हे कार्य करावे.
अर्जात फक्त नाव, जिल्हा आणि मोबाईल नंबर एवढेच द्यायचे आहे. एका मिनिटाचे काम आहे फक्त.

श्रीगुरुजी

तीनपैकी दोन भाषा भारतीय असल्या पाहिजे म्हणे. आता महाराष्ट्रात मराठी आणि इंग्लिश या दोन भारतीय भाषा अभ्यासक्रमात आहेत. तिसरी भाषा सुद्धा भारतीय भाषाच का सक्तीने शिकायची? मग दॉईच, फ्रेंच, जपानी वगैरे परकीय भाषा शिकायच्याच नाही का? आणि तिसरीसुद्धा भाषा भारतीयच असायला हवी तर हिंदीच का? संस्कृत, बंगाली, गुजराती इ. भाषांना बंदी का?

अगम्य

तिसरी भाषाच नको.
तिसरी भाषा ठेवली म्हणजे हिंदीच शिकवली जाणार. इतर पर्याय फक्त नावापुरते आहेत. ते कुणी शिकवणार नाही, कुणी घेणार नाही. बहुतेक सगळे गपगुमान हिंदी घेऊन मोकळे होतील.
नेगोशिएशन्स च्या शास्त्रात ह्याला anchoring म्हणतात. फडणवीसांनी सक्तीची हिंदी हा सुरवातीचा anchor फार वर ठेवला. तिथून हिंदी सक्ती वगळणे हे concede करून त्यांना हवी तशी तिसरी भाषा सक्तीची करून घेतली.

श्रीगुरुजी

पूर्ण सहमत. मराठी व इंग्लिश या दोनच भारतीय भाषा पुरेश्या आहेत. तिसरी भाषा, ती सुद्धा अत्यंत निरूपयोगी हिंदी शिकणे, हा मूर्खपणा आहे. चीनमध्ये मुलीमुले पहिलीपासून कृबु शिकणार आणि मराठी मुलीमुले पहिलीपासून प्रेमचंद, महादेवी वर्मा इ. कालबाह्य झालेल्यांचे लेखन शिकण्यात आयुष्यातील मोलाचा वेळ वाया घालविणार.

+१

हिंदी शिकून कुठलाही व्यावहारिक फायदा नाही, उत्तर भारतातून येणारे मजूर, बँक कर्मचारी, फेरीवाले, टेल्वे अधिकारी, सुतारकाम करणारे वगैरे ह्यांची सॉइ व्हावी म्हणून मराठी सहा वर्षांच्या कोवळ्या मुलांनी रडत मार खात “वह पेड है” हे शिकावे? ही कल्पनाच डोक्यात तिडिक आणतेय! हे असेच हिंदी लादता राहिले तर देश फुटायला वेळ लागणार नाही.

सुबोध खरे

मुळात प्राथमिक शाळेत तिसऱ्या कशाला दुसऱ्या भाषेची सुद्धा आवश्यकताच नाही. त्यासाठी मातृभाषेत प्राथमिक शिक्षण दिल्यास शिक्षणाचा पाया मजबूत होतो हे सिद्ध झालेले आहे.

बाळाच्या हृदयाचे ठोके एकशे पासष्ट आहेत असे सांगितले कि एकशे पासष्ट म्हणजे किती हे भोसले किंवा शिंदे आडनावाच्या मुली विचारतात तेंव्हा मुळात ञाण्च्।ई मातृभाषा कोणती याचीच चिंता वाटावी हि स्थिती आहे.

अशुद्ध मराठी बोलण्याची लाज वाटते म्हणून अनेक तरुण तरुणी हिंदी बोलतात पण त्यांना अशुद्ध हिंदी बोलण्याची तशी लाज वाटत नाही. एक वाक्य सुद्धा शुद्ध हिंदीत इंग्रजीचा शब्द न आणता बोलता येत नाही

आणि एकंदर इंग्रजी बोलतात तेसुद्धा धन्यवादच असतं.

इंग्रजी माध्यमात शिकलेल्या असंख्य मराठी तरुण तरुणी याना इंग्रजी सोडल्यास कोणत्याही भाषेत शुद्ध संभाषण करता येत नाही हि शोकांतिका आहे. शुद्ध मराठी असणारी अनेक जोडपी आपल्या मुलांशी रोजचे संभाषण इंग्रजीतच करताना दिसतात. त्यामुळे अशा अनेकांची मुले दोन वाक्ये सुद्धा मराठीत बोलत नाहीत.

हिंदी सक्ती बदल बोलण्याच्या अगोदर आपण किती मराठी बोलतो याबद्दल चिंता करण्याची वेळ आली आहे.

श्रीगुरुजी

बरोबर आहे. मराठी व इंग्लिश व्यवस्थित बोलण्यासाठी प्रयत्न हवे. विनाकारण निरूपयोगी तिसरी भाषा लादून तीनही भाषा अशुद्ध स्वरूपात बोलण्याची अजिबात आवश्यकता नाही.

खटपट्या

बाडीस,

यात अजुन एक भर घालावीशी वाटते ती ही की, हिन्दी बटीक मराठी आणि इन्ग्रजी मिश्रीत मराठी ही नसावी.

हीन्दी बटीक मराठीचे उदाहरण - मी त्याला मनवण्याचा खूप प्रयन्त केला..

इन्ग्रजी मिश्रीत मराठी - सकाळी उठून त्याला मी एक मिस कॉल मारला, पण त्याने पिक अप नाही केला, त्याचा काही रिप्लाय येत नाही हे बघून मी उबर बूक केली आणि स्ट्रेट ऑफीस ला गेलो, दिवसभरात त्याच्या सोबत काहीच कम्युनिकेट न झाल्यामुळे मी गिव अप केले.

स्वारी - र्‍हस्व दीर्घ साठी मुऑफी असावी. (ही अजुन एक धेड्जुजरी)

अमर विश्वास

हिंदी तिसरी भाषा आहे का नाही .. ह्यापेक्षा मराठी पहिली भाषा आहे हे जास्त महत्वाचे ..
आणि मराठीतील साहित्य तुम्ही वाचा.. जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचेल याचा प्रयत्न करा ..
जसे कि .. आम्ही कविता वाचनाचे कार्यक्रम करतो .. आता youtube च्या माध्यमातून त्याचे रेकॉर्डिंग जास्तजास्त लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न आहे ..
कोणालाही भेट म्हणून आवर्जून मराठी पुस्तके देतो.. असे बरेच काही करत येईल..
त्याने मराठीचे वैभव लोकांच्या मनात रुजेल आणि मराठी साहित्याला लोकाश्रय मिळेल

उगाच हिंदी च्या नावाने गळा काढण्यात काहीही अर्थ नाही ..

तामिळ लोकांनी हिंदीला जसा स्पष्ट विरोध केला तसाच करावा लागेल. बॉलिवूडच्या गाण्यावर नाचणार्,उर्दु शायरांना 'वाह जनाब' करणार आणि मराठी पण .. हे होत नाही हे आताची पिढी काय मराठी बोलते त्यावरुन स्पष्ट झाले आहे.

अगम्य

मराठी लोकांना हिंदी येते त्यामुळे ते अमराठी लोकांशी हिंदीत बोलतात. त्यामुळे अमराठी लोकांना मराठी शिकायची, मराठीत बोलायची गरज पडत नाही. त्यामुळे सगळ्यांना येणारी कॉमन भाषा, सार्वजनिक ठिकाणी संवादाची डिफॉल्ट भाषा हे स्थान हिंदी घेत आहे. जर मराठी लोकांना हिंदी येतच नसेल (किंवाआम्ही हिंदीत संवाद साधणार नाही असे त्यांनी ठरवले) तर अमराठी लोकांना मराठी शिकावी लागून मराठीचा वापर व मराठी बोलणाऱ्या लोकांची संख्या वाढेल.
ज्याप्रमाणे मराठी न शिकून, मराठीत न बोलून अमराठी लोकांनी हिंदीचा वापर वाढवला, तसाच हिंदी न शिकून, न बोलून, मराठी लोक मराठीचा वापर वाढवू शकतील. अर्थात मराठी माणूस मराठीच्या बाबतीत अजिबात आग्रही नसतो. तो हिंदीत बोलून मोकळा होतो. पण हिंदी भाषक मात्र मराठी न बोलण्यावर जास्त ठाम असतात. त्यामुळे हे प्रत्यक्षात होणे कठिण आहे.

"त्यासाठी मातृभाषेत प्राथमिक शिक्षण दिल्यास शिक्षणाचा पाया मजबूत होतो हे सिद्ध झालेले आहे." खरे
पण भारतात चित्र उलटे का दिसते? आय ए एस /आय एफ एस्/सी ई ओ/सी टी ओ ..बहुतांशी इंग्रजी माध्यमांमध्ये शि़कलेले का दिसतात्?अपवाद सांगू नका.
भारतात शिकताय तर दोन भाषा पहिलीपासुन हव्यात. नाहीतर मंत्रालयापासुन बुलढाण्यापर्यंत सगळे उच्च अधिकारी उत्तरेतून आता येतात तसेच येतील. आणि आपले तरूण मग खळ्ळ खट्याक करत नाहीतर तिकीट तपासनिसाच्या नोकरीसाठी अर्ज करत बसणार.

सुबोध खरे

मातृभाषेतून शिक्षण दिले म्हणजे इंग्रजीचा द्वेष केला असा उफराटा अर्थ कशासाठी काढताय?

भारतात बहुतेक ठिकाणी बोलीभाषेतील शाळा काय अवस्थेत आहेत याचा विचार करा. तेथे मुळात मातृभाषेत शिकवण्यासाठी चांगले शिक्षक मिळत नाही मग इंग्रजीत उच्च विज्ञान कसं शिकवणार?

यामुळेच या शाळांत हुशार विद्यार्थी प्रवेश घेत नाहीत आणि त्यातून जे गरीब विद्यार्थी या भाषांत शिक्षण घेतात त्यांना कोचिंग क्लास परवडत नाही.

यामुळे आय ए एस /आय एफ एस्/सी ई ओ/सी टी ओ असा याठिकाणी जेथे इंग्रजीचे ज्ञान जास्त आवश्यक आहे तेथे हि मुले मागे पडतात.

परंतु इसरो अणुऊर्जा अशा अनेक ठिकाणी आय आय टी किंवा तत्सम संस्थांत न शिकलेली मुले उत्तम कामगिरी करताना दिसतात.

बारावीच्या गुणांवर अभियांत्रिकी वैद्यकीय किंवा अशा अभ्यासक्रमांत प्रवेश द्यावा हि शिफारस यामुळेच केली जाते

परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या विद्ववत्तेप्रमाणे नीट आणि तत्सम परीक्षा अत्यावश्यक केल्यामुळे आता स्तहनिक भाषांतील विद्यार्थी अजूनच मागे पडताना दिसतात

अमर विश्वास

इथले अनेक प्रतिसाद हे हिंदीला विरोध = मराठीवरील प्रेम या प्रकारातील आहेत ..

मुळात मातृभाषा मराठी जिवंत राहण्यासाठी ती मराठी माणसांनी बोलली पाहिजे / वाचली पाहजे / लिहली पाहिजे

माझं निरीक्षण असे आहे .. सध्या जे १२ ते १८ वयोगटात आहेत (नवी पिढी ) त्यातलीस ५०% लोकांना पुल थोडेसेच माहित असतात ..
ऑम्लेट समोर आल्यावर ... सर्व धर्म सारखे .. ऑम्लेट ... या वाक्याचा संदर्भ त्यांना लागत नाही ... आपली पिढी या वाक्यावर का हसते हे त्यांना कळत नाही..

पुलं ची ही कथा तर वपुं च काय .. दुनियादारी चित्रपट पाहिलेला असू शकतो पण सुशी फारसे माहित नसतात
बाकी जीए वगैरे खूप दूरच्या गोष्टी ...

ते पाठीवर हात ठेवून नुसते लढा म्हणा .. हे WhatsApp वर फिरल्यामुळे कुसुमाग्रज माहित असतात पण नटसम्राट लिहिणारे वि वा शिरवाडकर आणि कुसुमाग्रज एकच हा अनेकांसाठी मोठा शोध असतो ...

बाकी कौशल इनामदारने लाभले आम्हास भाग्य बोलवतो मराठी या कवितेला ग्लॅमर मिळवून दिल्याने सुरेश भटांचे बरे दिवस आहेत... अर्थात त्यांच्या ५ कविता सांगा पाहू असं विचारलं तर मोठं प्रश्नचिन्ह दिसेल अनेकांच्या चेहऱ्यावर

उन्हाळ्यात बहावा फुलल्यावर इंदिरा बाईंचे
नकळत येती ओठावरती तुला पाहता शब्द वाहवा,
सोनवर्खिले झुंबर लेउन दिमाखात हा उभा बहावा

हे आठवणारे किती जण आहेत ..

अजून खूप लिहिता येईल ... मराठी चे वैभव जास्तीतजास्त मराठी लोकांपर्यंत पोचले तरच मराठे टिकेल / वाढेल असे वाटते.. त्या दृष्टीने वर लिहिले तसे प्रयन्त प्रत्येक मराठी प्रेमींनी करावे

बहावा एक सुंदर वृक्ष आहे व त्याचा फोटो सुद्धा मस्त आहे. कवयित्री प्रा.दीपाली ठाकूर अर्थात मिपाच्याच मी-दीपाली यानी खुप सुदंर याचे वर्णन केले आहे.किती सुंदर कवीता ...

नकळत येती ओठावरती
तुला पाहता शब्द वाहवा,
सोनवर्खिले झुंबर लेउन
दिमाखात हा उभा बहावा ।
-
लोलक इवले धम्मक पिवळे
दवबिंदूतुन बघ लुकलुकती,
हिरवी पर्णे जणू कोंदणे
साज पाचुचा तया चढवती ॥
-
कधी दिसे नववधू बावरी
हळद माखली तनु सावरते
झुळुकीसंगे दल थरथरता
डूल कानिचे जणू हालते ।
-
युवतीच्या कमनीय कटीवर
झोके घेई रम्य मेखला,
की धरणीवर नक्षत्रांचा
गंधर्वांनी झुला बांधला ॥
-
पीतांबर नेसुनी युगंधर
जणू झळकला या भूलोकी,
पुन्हा एकदा पार्थासाठी
गीताई तो सांगे श्लोकी ।
-
ज्या ज्या वेळी अवघड होई
ग्रीष्माचा तुज दाह सहाया,
त्या त्या वेळी अवतरेन मी
बहावा रुपे तुज सुखवाया ॥

- प्रा.दीपाली ठाकूर

अमर विश्वास

धन्यवाद कर्नल साहेब ..

मी ही कविता इंदिरा संत यांची समजत होतो .. त्यांच्या रंगबावरी या काव्यसंग्रहात असावी बहुदा ..
तुमची प्रतिक्रिया वाचल्यावर सहज गुगल सर्च केलं .. तर इंदिरा बाई आणि मिताली ताई दोघींचीही नावं आली कवयित्री म्हणून

आता प्रत्यक्ष काव्यसंग्रहच पाहणे आले ...

१. मराठी कार्यक्रम बघणे. विशेषतः मराठी बाल नाटके...

२. मुलांना सेमी इंग्रजी शाळेत प्रवेश मिळवून देणे...

३. मुलांना, मराठी पुस्तके आणि मासिके वाचायची सवय लावणे.
____

संस्कार टिकवायचे असतील ते पुढच्या पिढीकडे देणे, हाच उत्तम उपाय...

उदा. डॉन व्हिटो कॉर्लीऑन याने, मायकेलला फॅमिली संस्कार शिकवले...
---

हल्ली मासिके,वर्तमानपत्रे वाचणे हेही जवळपास बंद झाल्यात जमा आहे. हे चालवणार्यांची आर्थिक अवस्थाही नक्कीच बिकट असणार.मराठी मीडिया/चॅनेल्स चालवणार्यांवरही जबाबदारी आहे.पंतप्रधान ऐवजी प्रधानमंत्री, प्रेक्षक ऐवजी दर्शक्,कांटोकी टक्कर, अर्थमंत्री ऐवजी वित्तमंत्री.. हे चॅनेल्सवर सर्रास वापरले जातात.

आधी त्या जीओ/एयरटेलवाल्यांना कोणीतरी सांगायला हवे- व्यक्ती तो नाही तर ती व्यक्ती.
"आपण ज्या व्यक्तीला कॉल करत आहात तो व्यक्ती दुसर्या कॉलवर संभाषण करत आहे" हे गेले १५ वर्षे ऐकतोय आपण.

चामुंडराय

अगदी, अगदी माई.

पूर्वी मी आवर्जून चूक दाखवून द्यायचो परंतु आजकाल सर्रास आणि सर्वत्र "तो" व्यक्ती वाचायला किंवा ऐकायला मिळते त्यामुळे हॅ हॅ हॅ ... केला असेल "व्यक्ती" ने लिंग बदल असे म्हणून सोडून देतो.

अवांतर : आज व्यक्तीने चक्क "माई+नाना" ह्या आयडी बरोबर सहमती दर्शवण्याची वेळ आणली.