भावंडे
Primary tabs
डॊ. अंजली, आमची फॆमिली फिजिशिअन, अंजली माझी अल्पावधीतचच माझी चांगली मैत्रीण बनली. पुण्यात असताना दरमहिना मी तिच्याकडे खास अर्धातास वेळ काढुन गप्पा मारायला जायचे. बरे असो वा नसो पण दर महिना माझी तिच्या दवाखाण्याची फेरी मात्र मैत्री खातर तरी होत असे. एके दिवशी अशाच गप्पा रंगल्या, ती दुस-यांदा गर्भवती असल्याची गुड न्युज तीने दिली, पण तिने त्यामागचे कारण सांगितल्यावर मला हलकासा मानसिक धक्का बसला.
ती सांगत होती तिचा मुलगा आर्चिस साधारण ८ वर्षाचा आहे, त्याने त्याला लहान बहिण हवी असा हट्ट धरला होता, ६/७ महिने तो सतत तिच्या आणि तिच्या नव-यापाशी मी एकटा घरात कंटाळतो, माझ्या मित्रांना सगळ्यांना बहिण नाही तर भाऊ आहे मग मलाच का नाही, मला ही माझ्या बहिण/भावा बरोबर खेळायचे आहे, मला ही दादा बनायचे आहे, हे बोलु लागला होता. सुरूवातीला अंजलीला वाटले नविनच खुळ डोक्यात शिरले आहे, १/२ महिन्यात आपोआप ह्या गोष्टीचा त्याला विसर पडेल, पण त्याच्या हट्ट दिवसें दिवस वाढतच चालला, सतत घरात मी कसा बोर होत आहे, हे ते सांगु लागला, आणी जर घरात आता माझ्या बरोबर माझे भाऊ/बहिण असते तर मी कशा प्रकारे येणा-या भाऊ /बहिणीशी खेळेन, बाळाला कसे सांभाळेन ह्याच्यावरच तो जास्त बोलु लागला. मग अंजली आणि तीच्या नव-याने आर्चिसला बरेच समजवण्याचा प्रयत्न केला की तुला सख्ये नसली तरी मामे, आत्ये,चुलत भाऊ/बहिण आहेतच.
तरी तो ऐकण्याच्या पलिकडे गेला होता, आता तर त्याने मला छोटी बहिण (स्पेसिफिक बहिणच) हवी आहे, नाही तर मी जेवणार नाही असे ही हट्ट करू लागला. तेव्हा अंजलीने त्याला प्रामिस केले की, त्याच्यासाठी घरात भावंड येईल, पण बहिण किंवा भाऊ यापैकी जे भावंड घरात येईल त्यावर मात्र परत हट्ट करायचा नाही की मला बहिण हवी होती आणि भाऊच कसा आला. पण आपल्या ही घरात लहान भावंड येणार हे ऐकल्या पासुन आर्चिसची स्वारी एकदम खुश दिसु लागली. अगदी प्रत्येक गोष्टीत मी त्याच्याशी कसा खेळेण, अभ्यास करेन, कधी रागवेन ह्याचे आराखडे ठरवु लागला.
मी तिला टाटा-बाय करून घरी परतले, आणि माझ्या डोक्यातुन आर्चिसचा विचार जाई ना.
मला माझे लहानपण आठवु लागले, माझ्या भावंडामुळे मला एकटेपणा कधीच जाणवला नाही, माझ्या लहानपणी प्रत्येकाच्या घरी २/३ मुले असायचीच. त्यामुळे कधी कोणाला एकटेपणा जाणवला असे ऐकिव ही नाही. लहानपणी बहिण-भावंडांच्या मा-यामा-या, एकच वस्तु दोघांना हवी असायची, मग मोठे कोण त्याला सर्वदा त्याग करायला लागायचा, आणी लहान असेल त्याची चैन असायची, पण कधी कधी तु अजुन लहान आहेस, असे सांगुन दादा/ताई भाव खाऊन जायचा/ जायची. कोणताही पदार्थ कितीही आवडत असला तरी आपल्या बहिण / भावांना दिल्याशिवाय आपल्या घशातुन घास उतरत नसे, आई-बाबा आपल्यामुळे आपल्या बहिण / भावाला ओरडले तरी आपल्याला ते आवडत नसे, कधी कधी आई-बाबाचा मार बहिण / भावाला पडत असल्यास आपले ही एका बाजुला मुक रडणे चालु असे. एकाला लागले तर त्याची कळ दुस-याला येणारच इतका ओलावा नात्यात असायचा. मोठ्या भावंडाच्या चांगल्या- वाईट सगळ्यांच गोष्टीची जशीच्या तशी कॊपी करणे चालु असायचे. :)
हे झाले लहानपणाचे, पण जसे वयात येऊ लागतो तसे ही आपले जवळचे मित्र-मैत्रीण म्हणुन आपली भावंडे सदैव आपल्या बरोबर असतात. भाऊ मोठा आणी बहिण धाकटी असेल तर भावाला आपल्यावर जास्त जबाबदारी आहे याची जाणिव होते. तर कधी बहिणी- बहिणीच्या अनंत गप्पा चालुच असतात, बहिणीची कळ काढण्यात भावाला मज्जा येत असते, बहिण कधी चिडली, कधी रडवेली झाली की मस्त पैकी कॆडबरी नाहीतर आईस्क्रीम घेऊन भाऊ रुसवा काढुन टाकतो, आणि परत तुझी कळ काढणार नाही, मला काय माहित तु एवढी रडवी असशील असे आणि बोलुन घेतो. :)
पण जेव्हा लग्न हो ऊन बहीण सासरी जाताना तर बहिणी आणि भावाच्या दोघांच्या ही डॊळ्यातील पाणी थांबतच नाही. कधी बहिण माहेर पणाला आली की तीच्यासाठी काय करू आणि काय नको असे भावाला होते, घरात फक्त बहिण म्हणेल तेच होणार असते, बहिण ही भावाच्या पसंती्चे पदार्थ करून, आवडती भेट देऊन आपले प्रेम त्यातुन व्यक्त करत असते. बहिणी- बहिणी असल्यातरी एकमेकींच्या साठी जोरदार खरेदी होते, एकमेकांची मने जपली जातात, रात्र रात्र भर मस्त पैकी गप्पांची मैफिल रंगल्यावर लहाणपणीच्या खोड्या, भांडणे, फजिती, अशा अनेक गोष्टी एकमेकांच्या उकरून काढल्या जातात.
अशी ही भावंडाच्या प्रेमाची शिदोरी लहाणपणा पासुन बरोबर घेऊन आपण फिरत असतो, हे जेव्हा कोणाला भावंडासाठी हट्ट करताना पाहतो तेव्हा आपल्याजवळची प्रेमाने भरलेली शिदोरी अजुन मोठी वाटु लागते. :)
माझी मैत्रीण अंजलीला दुसरा ही मुलगा झाला, तो ७ महिन्याचा आहे, तिचा मोठा मुलगा आर्चिस आता खुपच खुश आहे,त्याच्याशी खेळण्यात दंग आहे.
तर मिपाकरहो, असाच एक किस्सा मी माझ्या लहाणपणीचा सांगणार आहे,
मी लहान असताना रविवारी मोगली ही सिरिअल लागायची त्यावेळी मला ती सिरिअल खुप आवडायची. आमची परिक्षा चालु होती, आणी माझ्या पपांनी मला हे वाचुन ठेव मी नंतर येईन आणि तुझा अभ्यास घेईन असे सांगुन गेले होते, मी पुस्तक जवळ घेऊन, टीव्ही लावुन मोगली पहात बसले होते, भाऊ दोन /तीन वेळा तरी सांगुन गेला होता की अभ्यास कर, पपा येतील, पण मी काही ऐकत नव्हते, आई ही सांगुन दमली, आणि इतक्यात पपा आले, आणि त्यांनी काही न बोलता टीव्ही बंद केला, तसा मला खुप राग आला मी ते पुस्तक दुर फेकुन दिले आणि मी अभ्यास करणार नाही असे सांगितले, ते पुस्तक फेकल्यामुळे माझ्या पपांना खुप राग आला त्यांनी मला ५ आकडे मोजे पर्यत पुस्तक उचल असे सांगितले, तरी मी जागची हलायला तयार नव्हते, भाऊ जवळच उभा होता, तो पपांना सांगु लागला मी पुस्तक उचलतो तुम्ही तिला रागवु नका, पण त्याला पपांनी तु पुस्तक उचलायचे नाही तिनेच ते उचलले पाहिजे असे सांगितले, तरी मी गाल फुगवुन तशीच उभी होते, मग पपांनी हातात पट्टी घेतली तरी मी पुस्तक उचलायला तयार नव्हते, आणि पपा जसे जवळ आले तसा भाऊ माझ्या माझ्या पुढे येऊन उभा राहिला आणि तीला मारू नका असे पपांना सांगुन रडु लागला, आणि तो रडु लागला म्हणुन मी ही रडु लागले, ते पाहुन माझे पपा हसु लागले.:)
खरंच भावंडांच महत्व खूप आहे माझा भाऊच मला आमच्या कुटुंबात जास्त आवडतो जरी आम्ही कितीही भांडलो तरी.
शितल ताई लेख छान आहे. तुमच्या लहानपणीचा प्रसंगही आवडला
भावंड असतातच अशी..
लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
छान गं..
आठवणी जाग्या झाल्या.
चकली
http://chakali.blogspot.com
@)छान खरच भाव पाहिजे
असण्याचे फायदे सांगताच येत नाहीत. धन्स शितल.. आपण ज्या काही गोष्टी 'गृहित' धरतो त्यातच आपल्या भावंडाचे 'असणं' ही एक आहे... म्हणजे सुख-दु:खात बाकी कोण असेल्/नसेल पण आपलं भावंड नक्की साथ देईल असं !!
शितल ताई... मस्त लेख.. खुप आवडला. सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आम्हा तिघात मी सगळ्यात लहान... त्याचे फायदेच जास्तं झाले. लहान असताना दादापेक्षा ताईच जवळची वाटायची. शेंडेफळ असल्याने मी मला बरोबर न्या म्हणून मागे लागायचो आणि दादा कुठेच नेत नसे... तु तुझ्या मित्रांबरोबर खेळ असं म्हणून सटकायचा. त्याउलट ताई मला नेहमी बरोबर न्यायची... (तिचा खुप जीव आहे माझ्यावर). खुप काळजी घ्यायची. सहाजीकच मला ति अधिक जवळची वाटू लागली. पण जसजसे मोठे होऊ लागलो तसे त्या दोघांचही माझ्यावर किती प्रेम आहे ते छोट्या छोट्या गोष्टीतून कळायला लागलं. आज तिघं तिन ठिकाणी आहोत, पण एकमेकांना बोलल्याशिवाय रहावत नाही... खरंच, मेरे भावंडोको मेरी भी उमर लग जाये!!
सुंदर लेखासठी शितल तै चं अभिनंदन!
अनामिक
वाचताना डोळ्यात पाणी आले.
आमच्याकडेही रोज भावंडासाठी हट्ट असतो माझ्या मुलाचा.
दुसर्यांच्या घरी बाळ येणार असे समजले की आमच्या घरी बरीच
वादावादी असते (मुलाची व माझी).
माझ्या मुलाची अशी समजूत आहे की बाबांना मुलगा होतो व आईला मुलगी.
त्याला भाऊ हवा असल्याने संध्याकाळी बाबा घरी आल्यावर विचारणे असतेच.
रेवती
माझ्या मुलाची अशी समजूत आहे की बाबांना मुलगा होतो व आईला मुलगी.
त्याला भाऊ हवा असल्याने संध्याकाळी बाबा घरी आल्यावर विचारणे असतेच.
मग तुम्ही त्याला भाऊच आणा, कसे?
:))))))))))
निळ्या रंगात रंगून झालेय,
आता म्हटलं गुलाबी रंग आणून बघावा.
निदान मुलीमुळे नाजूकपणाचा स्पर्श होईल घराला,
नाहीतर सदासर्वदा रांगडेपणाच असतो.
(अर्थात ही गंमत करतेय मी.)
रेवती
मुली नं १च.....
पण मुली नाजूकच असतात हे काय खरं नाय ब्वॉ. आमच्या धाकटीला भेटा एकदा. गैरसमज दूर होतील. विप्रंना डोस दिलाय तिने.... :(
बिपिन कार्यकर्ते
काय म्हणताय?
आपल्या प्रभूसराना?
पण ते हात टेकणार्यांपैकी नव्हेत.
मजा वाटली वाचून.
रेवती
अहो त्यांच्यासारखा 'स्पोर्ट' आणि 'सदैव सकारात्मक' विरळाच. :)
बिपिन कार्यकर्ते
असेच म्हणतो.
नतमस्तक विप्र.
भावा-बहिणीचे असे खासच नाते असते असे मी कितीतरी नातेवाइकांकडून ऐकले आहे. (मला बहीण नाही.)
तुमची हृद्य आठवण आवडली.
शितल, छान आठवण, छान लिहिलेली. माझी धाकटी पोट्टी अशीच आलेली आहे आमच्याकडे. :) कालच एका मित्राबरोबर हाच विषय निघाला होता. स्वतःच्याच घरात एकाला दोन असलेले खरंच चांगलं आणि मुलांसाठी खूप हेल्दी असतं.
फक्त एकच सुधारणा सांगतो. कधी कधी नकळत्या वयात, वाढत्या वयात भावंडात (विशेषतः भावाबहिणीत) खूप भांडणं होतात, प्रसंगी मारामार्या होतात, पण हे सगळं नंतर पाऽऽर विरघळतं. हा माझा स्वानुभव आहे. लहानपणी लग्नांतून वगैरे जेव्हा नवरी मुलगी सासरी जायला निघते तेव्हा होणारी रडारड बघून आम्ही खूप हसायचो. ताईचं लग्न ठरलं तेव्हा मला पूर्ण खात्री होती की मी काही रडणार नाही. पण निघताना जेव्हा तिने माझा हात हातात घेतला तेव्हा सगळ्यात जास्त मला रडू आले. पार पचका झाला माझा. :(
बिपिन कार्यकर्ते
असा पचका सगळ्याच भावांचा होत असेल नाही?
एक किस्सा आठवला. माझ्या मामेबहिणीचं लग्न झालं तेव्हा मामेभाऊ जरा जास्तच रडत होता. तेव्हा ते भाऊजी म्हणाले 'अरे रडतोस कशाला, आपण एकाच गावात तर आहोत. कधीही भेटू शकतो.' मामेभाऊ रडता-रडताच म्हणाला 'म्हणूनच तर रडतोय!'
अनामिक
=)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
पण निघताना जेव्हा तिने माझा हात हातात घेतला तेव्हा सगळ्यात जास्त मला रडू आले.
माझा सुद्धा माझ्या तायांच्या लग्नांत झालेला पोपट आठवला. :(
भावंडं, विषेशतः बहिनी हा प्रकारच फारच स्पेशल आहे. आईचं वात्सल्य, बापाचा आधार, भावाची सोबत अन बहिनींची माया... जीवनाला आकार देणारी रसायनं.
आपला,
(श्रीमंत) भास्कर
डोळ्यात पाणी आले. मी आणि माझी धाकटी बहीण दोघेच, भरपूर आठवणी आहेत, आता वरचेवर भेटी होत नाहीत अंतरामुळे पण फोनवर बोलणे व्हायलाच हवे.
आमच्या मुलाचा दिवसा-दोनदिवसाआड धोशा असतो 'मला ब्रदर किंवा सिस्टर का नाहीये म्हणून?' त्याच्या इतर सर्व आत्ते, मामे, मावस भावंडांची त्याला आठवण करुन द्यावी लागते पण त्याचे समाधान होत नाही. समजूत काढता नाकी नऊ येतात!
एकाला दोघे असलेले कधीही चांगलेच असते पण दरवेळी ते शक्य होतेच असे नाही त्यामुळे ती कमी मग मित्र आणि इतर भावंडांशी संपर्क ठेवून पूर्ण करुन द्यावी लागते. आपल्याला जिवाभावाचे भावंड आहे ही भावना मात्र वेगळीच असते हे नक्की!
चतुरंग
अहो, बघताय काय... सामील व्हा!!
;)
आपला,
(पहिल्या लेकीच्या हट्टासमोर नमते घेऊन दुसर्यांदा बाप बनलेला आनंदी) भास्कर
लेख खुप छान लिहिला.....लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या....
छान लिहलं आहेस शितल.
शेवटची मोगलीची आठवण तर मस्तच !!
-
आंद्या बगीरा
मी नोस्तल्गिक झाले
चुचु
:) :)
आत्या ,
छान लिहलं आहेस
शीतल खरच मस्त लिहिले आहे
मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...
भावंडे खासच असतात.
आम्ही दोघे भाऊ भाऊ च आहोत. त्यामुले मारामारी हा आमचा सर्वात आवडता खेळ. अजूनही घरी गेलो की एकदा तरी एकमेकांच्या उरावर बसतोच. सख्खी बहिण नसल्याने चुलत / मामे बहिणींवर जास्तच प्रेम आहे. बहिणी वीक पॉइंट आहे असं म्हटलं तरी चलेल. नी त्या सुद्धा हे जाणून मला यथेच्छ इमोशनल ब्लॅकमेल करत असतात. आणि मी पण आनंदाने बळी पडतो :)
एकाला एक भावंड हवंच ह्या मताचा मी आहे. लहानपणी कधीच मित्राची उणीव भावामुळे भासली नाही. त्यात माझे सगळे काका आमच्या लहानपणी जवळ जवळच रहात असल्याने अजुनच धमाल.
झक्कास विषय काढलात. भावंडांच्या सगळ्या आठवणी चटकन डोळ्यासमोर आल्या.
चिरंजीव एकदा शाळेतुन आले. वय वर्ष ५.सिनीयर के.जी. चेहेरा जरा तांबडा झाला होता. काय झाले रे तर काही सांगेना.
नंतर थोड्या वेळाने आईला विचारता झाला. " तु हॉस्पिटल मधुन दुसरे बाळ आणणार आहेस का"? महेश ची(मीत्राची) आई आणणार आहे. तु आणु नकोस. मला नको.
हम दो हमारा एक चा निर्णय पक्का झाला.
आता हल्ली हल्ली एक मानस कन्या मिळाली.
आधी दुसरे बाळ नको असं त्यानंच ठरवलं.
आम्हीही म्हटले मनात, चला हे एक बरं झालं.
आता मात्र अवघड परीस्थिती आहे.
रोज एकाच प्रश्नावरून त्याच्याशी चर्चा करावी लागते.
रेवती
हा प्रश्न चर्चेने सुटणार नाही !!! :)
बिपिन कार्यकर्ते
सगळेच प्रश्न चर्चेने सुटत नाही; कृतीची जोड आवश्यक :)
आधी दुसरे बाळ नको असं त्यानंच ठरवलं.
या वाक्यामधील तो हा माझा मुलगा आहे. माझ्या मुलानेच ठरवले की आपल्याकडे दुसरे बाळ नको.
आणि सध्या माझ्या मुलाचा विचार बदलला आहे. बाळही दोन मिनिटात हजर व्हायला हवे आहे.
रेवती
लई भारी.
लेख मस्त.
शेवटचा भावा-बहिणीचा प्रसंग सुद्धा एकदम छान.
-- लिखाळ.
माझ्या अनुदिनीला येथे भेट द्या.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
शीतल, आठवण छान.
मला बहिणच आहे, पण एकत्र कुटुंब असल्याने सख्खा भाऊ नसणे जाणवले नाही. बहिणींचे नातेही खास असतेच.
सर्व वाचकांचे आभार आणि प्रतिसादा बद्दल धन्यवाद ! :)
तुम्हा सर्वाच्या स्वतःच्या लहाणपणीच्या भावंडा बरोबरच्या आठवणी जागा झाल्या हे वाचुन खुप छान वाटले. :)
माझ्याहि लहानपणिच्या आठवणि जाग्या झाल्यात.
सुंदर लेख..!
शितल जियो..!
आपला,
(एकटा) तात्या.
शितल, लेख फार आवडला. आम्ही तिघे भाऊ. मावस भावंडात ६ भाऊ आणि ३ बहिणी. नाते सख्ख्या भावंडांसारखे.खूप भांडायचो,खोड्या काढायचो.
तू पार नॉस्टालजिक करून टाकलेस बघ!
वा! फर्मास लेख!
मला एक भाऊ आहे.. त्यामुळे एकमेकांचय भन्नाट खोड्या काढणे, मारामार्या, वस्तु ढापणे/लपवणे हे आवडते प्रकार.. विडीयो गेम्स, कंप्युटरवर कोणी बसायचे, कोणाच्या हातात रिमोट ही दैनंदिन भांडणे. :)
आता दोघेहि मोठे झाल्याने खोड्या कमी झाल्या आहेत पण अजूनहि एकमेकांना नावांने हाक क्वचितच मारली जाते. हाका मारायला प्राणीसृष्टी मदतीला धाऊन येते. ;)
बाकी एकास एक तरी भावंड हवे ह्यास अनुमोदन!
(दादा)ऋषिकेश
लेख छान आहे. मला एक मोठी बहिण जी सध्या अमेरिकेत असते. आम्ही पण खूप भान्डायचो आणि एकत्र यायचो (पुन्हा भाण्डायला) तिच्या लग्नात तर मी खूप रडलो होतो आणि नन्तरचे २-३ दिवस सारखे या खोलीतून त्या खोलीत, मधेच कधीतरी गच्चीत...मधे तिच्याकडे जाण्याचा योग आला. १५-२० दिवस धमाल केली आणि मग इकडे परत येण्याचा दिवस उजाडला. आता पुन्हा एक वर्श तरी भेट नाही या विचारनेच कसे तरी होत होते. विमानात बसल्यावर तर तिची सारखी आठवण येत होती. मग शेवटी तिथले पान्घरूण डोक्यावरून ओढून घेतले आणि पुन्हा एकदा मनसोक्त रडून घेतले (हळू आवाजात!!).
"शितल तायडे भावनीक झालो ना"
............सुन्या कोकणी
शितल ,खरच खुप छान लिहील आहेस, मला ही माझ्या भावाची आठवण आली.आणि माझ्या लग्नाच्या वेळचा प्रसंग आठवला.
:( खुप आठवण आली भावाची.
>>खुप छान लिहील आहेस
हेच म्हणतो !
सुंदर !
कालच वाचला होता... प्रतिसाद देणे विसरलो होतो ;) ह्यामुळेच माझी तायडी मला बावळट म्हणते... काही ही विसरु शकतो मी !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
शितल.. खूप छान लिहिले आहेस.
मी व माझा भाऊ आम्ही आजी कडे रहायचो... भाऊ बॅन्केत लागला होता व मी शिकत होते... एखाद्या दिवशी मन उदास असतान्ना त्याचा जो मायेने डोक्यावरुन मायेचा हात फिरायचा तो हात आता कधीच नाही फिरणार......मन उदास झाले आहे...... तुमच्या लेखाने परत काहि प्रसन्गाना उजाळा मिळाला.......
मला एकच मुलगी आहे आणि तिला स्वतःला भाऊ-बहीण नाही हे तिला खूपच सुखदायक वाटते. आता ती वयानेही मोठी आहे पण तिचे लहानपणापसूनचे ते मत अजूनही कायम आहे. कारण...सगळ्याच गोष्टींवर तिचा अनिर्बंध अधिकार आहे. तिला कोणाचीही स्पर्धा नाही. इतर भावा-बहिणींची भांडणे-वाद पाहून तर ती नेहमीच आपल्याला भावंडं नाही ह्याबद्दल खूश असते. आता बोला!
शीतल लेख मस्त आहे. तुम्हा भावा-बहिणीचे प्रेम पाहून अंमळ हळवा झालो.
मोठी बहिण असणे हे एक वेगळेच सुख. माझी बहिण माझ्या पेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे.
शाळेतुन तक्रार आली आणि ''पालकांना' घेऊन ये' अशी तंबी मिळाली की मी ताईला (आधीच दम भरुन) घेउन जायचो. शिक्षकांसमोर मला खोटं खोटं रागवायचं आणि घरी प्रकार कळू द्यायचा नाही. हे कर्तव्य ती बंधूप्रेमापोटी करायची . मला तो माझा हक्कच वाटायचा.
एकुलती एक बहिण. सासरी निघाली, धो धो रडलो.
आजही तिच्याशी तात्विक वादविवाद होतो. पण मी जास्त ताणून धरत नाही. ती मोठी आहे. माघार घेतो.
हे सुख माझ्या मुलाला नाही देऊ शकलो. (आता वेळ निघून गेली) असो.