नोकरी सोडायचीये ? ...राजीनामा देण्यापूर्वी हे वाचा !
Primary tabs
अनेक पोस्ट्स बघत असतो. त्यात मला इतक्या वर्षांचा अमुक नामांकित कंपनीतील अनुभव आहे, इतकं शिक्षण झालंय गेल्या अमुक वर्षांपासून जॉब चेंज साठी प्रयत्न करतोय पण जॉब मिळत नाही असे सर्व साधारण मुद्दे त्यात असतात.
दुसऱ्या प्रकारच्या पोस्ट्स मध्ये कांहींनी या ना त्या कारणाने , जसे पगार कमी, नोकरीतील त्रास, जास्त काम आणि त्यामानाने पगार कमी, आरोग्य विषयक तक्रारी किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे आधीच जॉब सोडला आहे आणि आता नवा मिळत नाहीये अशा केसेस दिसतात.
तिसरा प्रकार, म्हणजे जे नवीनच पदवीधर झालेत आणि पहिलाच जॉब शोधत आहेत आणि त्यांना मनासारखा जॉब मिळत नाहीये अशा प्रकारची तरुण पिढी.
मुळात नोकरी किंवा अधिक सन्मानकारक भाषेत जॉब मिळणे किंवा न मिळणे हे कोणत्याही एकाच घटकावर अवलंबून नसते. एखादा जॉब (यापुढे मी जॉब हाच शब्द वापरणार आहे) मिळण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक असतात.
१. एखाद्या ठिकाणी (मग हे किराणा मालाचे दुकान असो वा एखादी MNC) मुळात काही काम असायला हवे. मग ते काम करण्यासाठी काही मनुष्यबळाची आवश्यकता असायला हवी. कोणत्याही जॉब ओपनिंग ची ही अत्यंत मूलभूत गरज आहे. कोणतीही कंपनी (यात सगळे आले, यापुढे फक्त कंपनी हाच शब्द वापरीन) कोणालाही बिन कामाचा फुकट पगार देणार नाही हे कटू सत्य आहे.
२. मग त्या कामासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी त्या कंपनी कडे पैसे हवेत. म्हणजे बजेट. कोणतीही कंपनी कोणालाही बिन कामाचा फुकट पगार देणार नाही हे जसे कटू सत्य आहे तितकेच कोणीही कोणत्याही कंपनीसाठी फुकट काम करणार नाही हे ही तितकेच कटू सत्य आहे.
३. एकदा हे विशिष्ट काम, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ निश्चित झाले की मग येते त्या जॉब साठी आवश्यक असलेले स्किलसेट किंवा कौशल्य. आता या स्किल सेट मध्ये अनेक पैलू येतात.
१. किमान आणि कमाल वयाची अट.
२. शारीरिक आणि मानसिक आरोग्य.
३. शिक्षण आणि ते काम करण्याचे कौशल्य
४. जर त्या कामासाठी काही किमान अनुभव आवश्यक असेल तर तो. (हि जर अट असेल तर इथे सगळे फ्रेशर्स अपात्र होतात.) काही वेळा एखादी ओपनिंग फक्त फ्रेशर्स साठीच असू शकते. याला कारणे अनेक असू शकतात, जसे कमी बजेट, कंपनीला नवीन उत्साही तरुण मनुष्यबळाची आवश्यकता असणे वगैरे.
५. जॉब चे लोकेशन
६. फिरतीची जॉब असेल तर उमेदवार त्यासाठी उपयुक्त आहे का?
७. येणाऱ्या भाषा आणि त्या भाषांवरील उमेदवाराचे प्रभुत्व.
(वरील यादी सर्वसमावेशक आणि कोणत्याही विशिष्ठ क्रमाने नाही)
४. एकदा का वरील तिन्ही बाबी निश्चित झाल्या की या वरील तीन बाबींचा परिणाम म्हणून जॉब ओपनिंग निर्माण होते. ती ओपनिंग पूर्ण करण्यासाठी उमेदवारांचे अर्ज मागवले जातात. हे अर्ज मागवण्याचे आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्या पैकी काही खाली देतोय.
१. जॉब्स पोर्टल्स
२. लिंक्डइन किंवा तत्सम सोशल मीडियावर पोस्ट टाकून उमेदवारांचे अर्ज मागवणे.
३. ओळखी-ओळखीतून अर्ज मागवणे
४. पेपर ला जाहिरात देऊन
५. इंटर्नल ट्रान्सफर (वरील यादी सर्वसमावेशक नाही)
५. वरील प्रकारे अर्ज आलॆ की त्यांचातून त्या त्या जॉब्स साठी वर मुद्दा क्रमांक ३ मध्ये दिलेल्या पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची लिस्ट बनवणे. भारतात उपलब्ध ओपनिंग आणि त्यासाठी येणारे अर्ज यांचे गुणोत्तर विषम आहे. म्हणजे एका ओपनिंग साठी हजारो अर्ज येतात. मग कंपनीला वेगवेगळे फिल्टरस लावून त्यातले काही मोजके अर्जच निवडावे लागतात. हे फिल्टर्स अनेक प्रकारचे असतात.
१. ऍप्टीट्यूड टेस्ट
२. शैक्षणिक फिल्टर ( जसे काही कंपन्या डिप्लोमा होल्डर्स,इयर डाऊन आणि ATKT मिळवून पास झालेले उमेदवार, सर्व सत्रात प्रथम श्रेणीत पास न झालेले उमदेवार यांचे अर्ज विचारातच घेत नाहीत). उलट काही ठिकाणी गरजेपेक्षा जास्त शिक्षण किंवा अनुभव असेल त्यांचे अर्ज बाद केले जातात.
३. शारीरिक आणि मानसिक तपासण्या
४. मुलाखतींच्या अनेक फेऱ्या. (टेक्निकल आणि व्यवस्थापकीय)
५. संबंधित कामाचे प्रात्यक्षिक परीक्षा(वरील यादी सर्वसमावेशक नाही)
६. वरील फिल्टर्स लावून काही मोजक्या उमेदवारांची यादी बनवली जाते. आणि मग या उमेदवारांचा प्राध्यान्य क्रम ठरवला जातो. यात मुख्यतः खालील बाबी प्रमुख भूमिका बजावतात.
१. वरील प्रक्रियेत सर्वोत्तम कामगिरी केलेला उमेदवार.
२. वशिल्याचा (सभ्य भाषेत रेफेरेंस वाला)उमेदवार
३. कमीत कमी पगार मागणारा उमेदवार
४. लवकरात लवकर जॉईन होऊ शकणारा उमेदवार
५. लोकेशन ची अडचण नसलेला उमेदवार
(वरील यादी सर्वसमावेशक आणि कोणत्याही विशिष्ठ क्रमाने नाही)
वरील सगळ्या प्रक्रिया पार पडल्यानंतर योग्य उमेदवार (एक किंवा अधिक ओपनिंग नुसार) निवडून त्यांना जॉब ऑफर केली जाते.
हे सगळे सांगायचे कारण म्हणजे एखादी संधी आणि ती एखाद्याला मिळणे किंवा न मिळणे यात किती गुंतागुंत आणि वेगवेगळे घटक आहेत हे सगळ्यांना समजावे.
उमेदवारांच्या अडचणी: (माझा अनुभव कॉर्पोरेट मधील आहे म्हणून त्या संबंधितच अडचणी मी सांगू शकतो)
१. एखाद्या पोसिशन ला अप्लाय केलं तरी कॉल येत नाही.
२. महिनोन महिने ती ओपनिंग दिसत राहाते पण आपल्या अर्जाचे काय झाले हे समजत नाही.
३. दर आठवड्याला तीच ती ओपनिंग वेगवेगळ्या पोर्टल वर नव्याने येते.
४. कधी कधी HR चा कॉल येतो, HR बेसिक डिटेल्स घेतो आणि "विल गेट बॅक टू यु" म्हणून गायब होतो.
५. कधी सगळे राउंड क्लियर होतात आणि HR ऑफर रिलीज करते (करतो) म्हणून सांगतात आणि नंतर काहीच होत नाही.
६. भारतात नोटीस पिरियड ६० ते ९० दिवसांचा असतो. अनेक कंपन्या इतके थांबायला तयार नसतात. अशा कंपन्या आधीच नोटीस पिरियड सुरु असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देतात. मग दोन कंपन्यांच्या HR मध्ये शर्यत सुरु होते. हा काळ मात्र उमेदवारासाठी सुगीचा काळ असतो. मग उमेदवार "जिकडे भेळ तिकडे खेळ" या तत्वाला जागून फायदेशीर ऑफर स्वीकारतो. याला ऑफर शॉपिंग असं संबोधले जाते.
७. HR उमेदवाराचे अप्लिकेशन रिजेक्ट झालय असेही स्पष्ट सांगत नाहीत. HR उत्तर देत नाही, कॉल ब्लॉक करतो तेव्हाच उमेदवाराने समजून घ्यायचे असते की आपली उमेदवारी अपात्र ठरली आहे.
HR लोकांच्या अडचणी:
१. सगळ्यात मोठी अडचण म्हणजे एका पोसिशन साठी हजारो अर्ज येतात आणि त्यातून छाननी करून पात्र उमेदवारांना शॉर्ट लिस्ट करणे. या छाननीत चुकून एखादा पात्र उमेदवार रिजेक्ट होणार नाही याची ही काळजी HR ला घ्यायला लागते.
२. असे शॉर्ट लिस्टेड अर्ज संबंधित पॅनल कडे पाठवून त्यातून अजून शॉर्ट लिस्टेड अर्ज कोणते याची वाट पाहत HR ला बसावे लागते. इकडे कॅन्डीडेट फोन वर फ़ोन करून , ई-मेल वर HR ला पिडत असतो. पण पॅनल कडून जोवर काही येत नाही तोवर HR उमेदवाराला काहीच सांगू शकत नाही.
३. पॅनल कडून शॉर्ट लिस्ट आली की मग interview अरेंज करणे, उमेदवार interview ला येईल हे पाहणे, ही कामे करावी लागतात. interview अरेंज करताना पॅनल ची आणि उमेदवाराची उपलब्धता पाहून interview वेळ ठरवणे ही एक डोकेदुखी असते.
४. एखादा उमेदवार पूर्ण शॉर्टलिस्ट झाला की मग व्यवस्थापनाचे अप्रूव्हल , ऑफर रिलीज करून घेणे या गोष्टी असतात. ह्यात व्यवस्थापन स्वतःचा वेळ घेते. आणि कँडिडेट HR ला दोष देतो.
५. ऑफर रिलीज केल्यावर सुद्धा तो उमेदवार जॉईन करेलच अशी खात्री नसते. ऑफर शॉपिंग करून अगदी जॉइनिंगच्या दिवशी कल्टी मारणारे उमेदवार HR साठी मोठा ताप असतात. अशा ऐनवेळी झालेल्या नो शो कॅन्डीडेट मुळे HR ला अनेकदा बोल ऐकावे लागतात. अशा ऐन वेळी कल्टी मारणाऱ्या उमेद्वारांमुळे प्रोजेक्ट पण प्रभावित होतो. परिणामी HR , प्रोजेक्ट मॅनेजर यांचा KPI नकारात्मक रित्या प्रभावित होतो.
६. असे नो शो झाले तर HR ना प्लॅन B तयार ठेवावा लागतो. अशा प्लॅन बी तील उमेदवारांना धड तुम्ही रिजेक्ट झालाय असं सांगता येत नाही आणि धड ऑफर पण रिलीज करता येत नाही.
७. अनेकदा उमेदवार जॉईन करतो आणि आणि जॉब, किंवा कंपनी किंवा वातावरण पटले नाही म्हणून किंवा अधिक पगाराची ऑफर आली म्हणून महिन्यात राजीनामा देतो. मग परत सगळी प्रोसेस सुरु करावी लागते.
८. कधी कधी उमेदवार जॉईन करतो पण त्याच्या BGV त अडचण येते आणि त्याला टर्मिनेट करावं लागत.
काही उपाय :
१. ऑफर शॉपिंग कायद्याने बंद करावे. हे जर व्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लन्घन वाटत असेल तर असं ऑफर शॉपिंग करणाऱ्या उमेदवाराला कायमचे ब्लॅक लिस्ट करावे.
२. भारतातील सगळ्या कंपन्यांचा नोटीस टाइम ३० दिवस (दोन्ही कडून) करावा. (याने काही प्रमाणात ऑफर शॉपिंग कमी होईल असे मला वाटते)
३. कंपनीने त्यांच्या जॉब पोर्टल वर कॅन्डिडेचर स्टेटस जे काही असेल ते उपडेट करावे. (जसे अंडर कॉन्सिडरेशन, अंडर कॉन्सिडरेशन बट इन प्लॅन बी , रिजेक्टड विथ रिजन वगैरे).
४. रेंजेक्टड उमेदवारांना HR ने स्पष्ट सांगून टाकावं की तुम्ही रिजेक्ट झालात म्हणून. एकदाच विषय संपतो.
५. आधीच नोटीस सर्व्ह करणार्यांना ऑफर करायची नाही हे कंपन्यांनी ठरवावे.
६. जॉब प्रोफाइल नीट अगदी काळजी पूर्वक बनवून घ्यावे. अनेकदा JD मध्ये एक लिहिलेलं असतं आणि जॉईन झाल्यावर भलतेच काम असते. मग तो उमेदवार टिकत नाही आणि मग बॅक टू स्केयर झिरो पासून सुरुवात करावी लागते. (मी गेल्या २ वर्षात या अनुभवातून गेलोय).
सध्याची नोकरी सोडताय ?
भारतात जॉब पोसिशन आणि उमेदवार यांचे गुणोत्तर विषम आहे हे मी नव्याने सांगायला नको. आहे. तो जॉब सोडताना शंभर वेळा विचार करावा हाच सल्ला मी सगळ्यांना देऊ इच्छितो. मी स्वतः जॉब लेस असण्याचा अनुभव घेतलाय.
आहे तो जॉब सोडण्याची अनेक कारणे असतात:
१. पगार कमी आणि जास्त काम:
समीक्षा: आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, कंपनी ही नफा कमवायला बसली आहे. आपल्याला जसं कमी कामात अधिक पगार हवा असतो तसच कंपनीला कमी पगारात अधिक काम देणारा नोकर हवा असतो. आपला नोकर जर १०० रु पगार घेत असेल तर त्याने त्याच्या कंपनीला २०० रु चे आउटपुट दिले तरच तो नोकर कंपनीला फायदेशीर ठरतो. त्यामुळे आपण आपल्या कंपनीसाठी एक मौल्यवान असेट कसे बनू शकतो याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आपल्या नेहमीच्या कामाव्यतिरिक आपण कंपनीला काय value ऍड देऊ शकतो यासाठी कायम प्रयत्न करत राहावे.
या उलट आपल्या कडे काम करत असलेल्या नोकराला जर त्याच्या त्याच कामाचे अधिक पैसे दुसरे कोणी देत असेल तर तो नोकर तिकडे जाणार हे कटू सत्य आहे. त्यामुळे आपल्या नोकराचे पगाराव्यतिरिक्त वर्क लाईफ बॅलन्स कसे उत्तम राहील, त्याला मेडिकल किंवा अशा काही सुविधा देऊन खुश ठेवता येईल हे कंपन्यांनी पहिले तर बरे होईल.
२.नोकरीतील / मॅनेजरचा त्रास:
समीक्षा: याकारणामुळे नोकरी सोडत असाल तर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या मॅनेजर शी एकदा बोलून त्याच्या अपेक्षा काय आहेत आणि तुम्ही कुठे कमी पडत आहात यावर काम करावे असे मला वाटते. यात काही सकारात्मक निघाले तर कदाचित दोन एक महिन्यात तुम्हाला तुम्ही नोकरी आवडू लागेल. मॅनेजर हा सुद्धा कंपनीचा नोकर आहे हे लक्षात घेतले तर त्याच्या जबाबदाऱ्या पण कळतील आणि वाद सुसंवादात बदलू शकेल.
आणि समजा संवादातूनही काही निघाले नाही तर दुसरीकडे जॉब शोधूनच मग पहिला सोडावा.
माझा अनुभव: मी माझ्या सुरुवातीच्या काळात असाच तिरीमिरीत जॉब सोडला आणि ८ महिने बेकार होतो. तेव्हा मित्र, नातेवाईक समाज यांच्यात बेकाराची किंमत शून्य असते हे मला कळले. या बेकारीच्या काळातील टोमणे, त्या कुत्सित नजरा यापेक्षा तो पगार घेऊन नोकरीतील त्रास परवडला या मताला मी आलो.
लक्षात ठेवा: जो कमावतो त्यालाच समाज किंमत देतो. बेकाराच्या पदरी पडते ती केवळ अवहेलनाच .... अगदी आपल्या जवळच्या माणसाकडून सुद्धा !
३. आरोग्य विषयक तक्रारी (जसे न झेपणारी नाईट शिफ्ट किंवा बदलती शिफ्ट, बाळंतपण):
समीक्षा: आपल्याला आहे ती नोकरी जर आरोग्यविषयक तक्रारींमुळे जमत नसेल तर थेट नोकरी सोडण्याआधी तुमच्या मॅनेजरला विश्वासात घेऊन त्याच्याशी बोला. कदाचित काही उपाय निघेल. अगदीच काही नाही उपाय निघाला तर तुमच्या तब्येतीस मानवेल असे कोणते जॉब्स आहेत आणि ते मिळवायला काय कौशल्ये तुम्हास मिळवावी लागतील याचा अभ्यास करा. त्यावर काम करा. कदाचित तुम्हास पगारात तडजोड करावी लागेल, पण सर सलामत तो नोकरी पचास हे सत्य स्वीकारा. आपले आरोग्य विकून पगार खरेदी करण्यात काही अर्थ नाही.
४. कौटुंबिक जबाबदाऱ्या ( घरातील आजारी व्यक्ती, मुलाची मुलीची दहावी):
समीक्षा: तुमच्या मॅनेजरला विश्वासात घेऊन त्याच्याशी बोला. कदाचित काही उपाय निघेल. जसे काही महिने घरुन काम, अर्धवेळ ऑफिस आणि अर्धवेळ घरून काम असं काही. अंतिम उपाय नोकरी सोडणे हा आहेच. पण मग त्याबरोबर येणाऱ्या रिस्कस पण स्वीकाराव्या लागतील.
५. बिसनेस सुरू करायचंय म्हणून नोकरी सोडणे:
समीक्षा: मी स्वतः बिजनेस कधीही केलेला नाही त्यामुळे यावर मी काही जास्त लिहीत नाही. पण यासाठी नोकरी सोडताना आपण सुरु करणार असलेल्या व्यवसायाचा नीट अभ्यास करून, कॉन्टेंगेंसी बनवून मग नोकरी सोडून व्यवसायात पडावे.
६. फ्रेशर्स साठी: प्रत्येकाला कॅम्पस मध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळणार नाही ही वस्तुस्तिथी आहे. प्रत्येकाला सगळं उत्तम, कमी कष्टात आणि लगेच हवंय सध्या. आपण कुठे आहोत हे जेवढ्या लवकर आपण ओळखू तितके लवकर प्रगतीच्या मार्गाला लागू. कॅम्पस मध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली नाही तर आयुष्य व्यर्थ वगैरे समजातून बाहेर पडून उमेदवारी करून अनुभव घ्यावा. कौशल्ये वाढवून वेळोवेळी आपल्या कामगिरीचा आढावा घ्यावा. एकदा जॉब लागला की त्यातून पुढे पुढे मार्ग मिळत जातो.
लक्षात ठेवा: कॅम्पस मध्ये जॉब न मिळालेले पण पुढे आपापली कौशल्ये वाढवून आपापल्या क्ष्रेत्रात यश मिळवलेले लोक जास्त आहेत.
नोकरी असताना :
१. सगळ्यांनी किमान तीन महिन्यांचा कॉन्टेगेंसी फंड बनवून ठेवावा. त्यासाठी लाइफस्टाइल मध्ये तडजोड स्वीकारावी.
२. आपापले स्किलसेट वाढवत राहावे.
३. जोवर आपले काम आणि आपला पगार आपल्याला आवडतोय, आणि जोवर आपले काम कंपनीला आवडतंय आणि आपल्याला असणारा पगार कंपनीला परवडतोय तोवर विनाकारण जॉब बदलायची काही गरज नसते या मताला मी आलोय.
कौस्तुभ पोंक्षे
(८००७६०५०८२)
खूप छान लेख! दैनंदिन जीवनात येणाऱ्या, येऊ शकणाऱ्या आर्थिक सामाजिक समस्यांवर मार्गदर्शन करणारे तुमचे लेखन खरोखर खूप चांगले असते. असेच लिहीत रहा पोंक्षे साहेब!
नौकरीच्या शोधात आणि नौकरी देणार्यांनी हा लेख अवश्य वाचला पाहिजे.
चांगला विषय! अभिनंदन!
सतत शिकत राहण्याला पर्याय नाही.
जोवर आपले काम आणि आपला पगार आपल्याला आवडतोय, आणि जोवर आपले काम कंपनीला आवडतंय आणि आपल्याला असणारा पगार कंपनीला परवडतोय तोवर विनाकारण जॉब बदलायची काही गरज नसते या मताला मी आलोय.सहमत !
उत्तम लेख. असेच लिहीत राहा.
इतका उत्तम लेख आहे तरी प्रतिक्रिया कमी का? इतर फालतू लेखांपेक्षा मध्यमवर्गीय माणसाला ज्या समस्या भेडसावतात वा भेडसावू शकतात त्यांचे चांगले मार्गदर्शन पोंक्षेसर करतात!
वशिल्याचा (सभ्य भाषेत रेफेरेंस वाला)उमेदवार
वशिल्याचा उमेदवार म्ह० रेफरन्सवाला उमेदवार हे सरसकटीकरण मला चुकीचे वाटते. माझा अनुभव असा आहे की रेफरन्सवाल्या उमेदवाराला जेव्हा मुलाखतीच्या मांडवा खालून नेले जाते आणि तेव्हा तो नाकारला जातो. पण वरीष्ठांच्या हितसंबंधांमुळे त्याला घेतले जाते. असा उमेदवार वशिल्याचा उमेदवार मानता येऊ शकेल.
नोकरी एक लढाई व नोकरदार एक सैनिक....असे मला वाटते.
बाॅस त्रास देतो,पगार कमी,काम जास्त, माझ्या लायकी प्रमाणे काम नाही,बाकीचे नोकर मजा मारतात ,मालाच जास्त काम करावे लागते, माझ्यावर जबाबदारी आहे, घर कर्ज,वाहन कर्ज, कुणीच माझे ऐकत नाहीत,आईवडील, नवरा,बायको नोकरी सोड म्हणून पाठिमागे लागलेत, ..... एक ना अनेक......
मग नोकरी सोडायची का?
होय,तर नवीन नोकरी कधी मिळेल,मिळाली तर बाॅस चांगला असेल का,पगार किती,योग्यतेनुसार काम मिळेल का,सहकारी कसे असतील......अनेक प्रश्न?
नाही सोडायची व वरील प्रश्नांवर उत्तरही सापडत नाही. मग काय करायचे?
दोन्ही परिस्थितीत स्वतःच निर्णय घ्यायचा आहे. मानसिक खबिंरपणा व निर्णय क्षमता कसोटीला लागते.
एकल पालकत्व असलेल्या नोकरदारांची जास्तच कुतरओढ होते. त्यांनी निर्णय घेताना कुठल्या गोष्टींची खबरदारी घ्यावी?
अशा परिस्थितीत, आई-वडील, नवरा,बायको यांनी दबाव टाकयचा का?, कितपत टाकावा?त्यांचा रोल या बाबतीत किती मर्यादित असावा? आईवडील यांचा रोल व एकल पालक यांचे नाते कसे असावे? नवरा व बायको हे नाते वेगळे असल्याने रोल वेगळा,इथे निर्णय सकारात्मक परिणामाकडे घेऊन जाईल का?
तू सोड, मी पैसे देतो म्हणणारे पालक किती दिवस पुरणार? नोकरी नसल्याने फ्रस्ट्रेशन व तणाव जास्तच वाढणार.नाही का?
शेवटी प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत. इतरेजन कुपंणावरचे बघे असतात. पैसा हा सर्व सुखदुखाचे मुळ आहे. माझा स्वताचा अनुभव व मत असे आहे की परिस्थितीला भिक न घालता खंबीरपणे तोंड द्यावे. "हे ही दिवस जातील ", यावर विश्वास ठेवावा. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये.
एक सेवानिवृत्त, आजच्या पिढीची फरपट बघणारा असल्याने वरील प्रतिसाद डोक्यात आला.
विषय व विषयवस्तू दोन्ही बरेच काही शिकवून जातात.
नोकरी एक लढाई व नोकरदार एक सैनिक....असे मला वाटते.अक्षरशः सहमत !
उत्तम लेख ...
एक महत्वाचा मुद्दा (निदान माझ्यासाठी तरी )
स्वतःचे योग्य मूल्यांकन करा .... (unbiased self assesment)
नवीन जॉबसाठी interview घेताना, exit interview घेताना किंवा अगदी वार्षिक appriasal घेताना अनेक महाभाग भेटतात .. आमच्या कामाला रेकग्निशन नाहीए, पगार कमी आहे वगैरे वगैरे ..
मी त्यांना एकच प्रश्न विचारतो ... बाबारे ... तुझ्यावर फारच अन्याय होतोय ... मला एकाच सांग .. तुझा USP काय ? तुझा बरोबरच्या चार लोकांपेक्षा तुझ्यात काय स्पेशल आहे ? बहुतेक लोकांना याचे उत्तर देता येत नाही ..
खूप लोकांना असं वाटत असत आपल्या टॅलेन्ट चे चीज होत नाही , आपल्याला संधी मिळत नाही (खर तर दुसऱ्याला आपल्या आधी संधी मिळते) ... स्वतःचे समाधान करून घ्यायला हे ठीक आहे ..
हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन
दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है
स्वतःचे योग्य मूल्यांकन करा .... (unbiased self assesment)
यात मूलभूत प्रश्न असा असतो कि इतर लोक किती उत्तम आहेत कि नाही आणि बाजारात सध्या आपल्या ज्ञानाची काय किंमत असू शकते आणि आपल्या स्पर्धेत किती लोक उपलब्ध आहेत याची माहिती साधारणपणे बहुतेकांना नसते. आणि याचा बेंचमार्क/ निकष कसा लावायचा
यामुळे स्वतःबद्दल फाजील आत्म विश्वास असू शकतो
तसा स्वतःबद्दल न्यूनगंड पण असू शकतो.
हम्म
Diagnosis: Chronic institutionlization
Rx - Shawshank redemption
पिठाच्या गिरणीलाही पर्याय आहे. ओफिसकामाला एआइने खाल्ले आहे. बैलांनाही रोजगार नाही, ट्रॅक्टर आले. ओनलाइन रोबोट शिक्षक आले आहेत. कलाकारांनाही कार्टुनांनी बाजूला सारले.
सगळीकडून कामं कमीच होत आहेत.