गुप्त खेळी? आता काय घडू शकेल?
Primary tabs
देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रात अचानक उद्भवलेला तो अभूतपूर्व गोंधळ निव्वळ कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे झाला, हे साधे आणि सोपे स्पष्टीकरण पटणारे नाही. पडद्यामागे काहीतरी मोठे, अदृश्य आणि धोरणात्मक सुरू होते का?
भारत जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक बदल करत असताना, देशातील सर्वात मोठ्या इंडिगो विमान कंपनीत एवढी मोठी अराजकता नेमकी त्याच वेळी का माजली? हा निव्वळ योगायोग मानावा, की यामागे काही गुप्त हेतू लपलेले आहेत, हा प्रश्न संशयाला जन्म देतो.
ज्या दिवशी देशाचे पंतप्रधान जागतिक शक्ती रशियाचे राष्ट्रप्रमुख पुतिन यांच्या स्वागतासाठी तयार असतात. त्यांच्यासोबत महत्त्वाचे आंतर-सरकारी करार करण्यासाठी दिल्लीत तयारी होते...
नेमक्या त्याच दिवशी, सकाळी १० वाजल्यापासून माध्यमांचे संपूर्ण लक्ष त्या ऐतिहासिक भेटीवरून आणि भारताच्या वाढलेल्या जागतिक प्रभावावरून हटवून, विमानतळांवरील गोंधळावर केंद्रित झाले. हा नक्की योगायोग आहे? देशात जागतिक स्तरावरील घटना घडत असतांना, देशाची प्रतिमा खालवलेली दाखवण्याची ही एक सोची समझी खेळी तर नव्हती?
या कंपनीला १८-२० महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची जाणीव होती, तरीही त्यांनी 'फ्लाइट्स'ची तिकीट विक्री चालू का ठेवली? प्रवाशांना वेळेवर माहिती न देता त्यांना विमानतळांवर एकत्र जमवून, माध्यमांना मोठी ब्रेकिंग न्यूज पुरवण्याची ही योजनाबद्ध तयारी तर नव्हती?
हा गोंधळ जाणीवपूर्वक इतका वाढू दिला गेला का? जेणेकरून राष्ट्रीय पातळीवर तीव्र संताप आणि सार्वजनिक गदारोळ निर्माण होईल.
या गोंधळामागील एक प्रमुख लपलेला उद्देश ने लागू केलेले नवे, कठोर नियम मागे घेण्यासाठी सरकारवर दबाव आणणे हा असू शकतो. नवीन नियमांमुळे कंपनीला मोठ्या संख्येने भरती करावी लागणार होती. या नियमांचा सर्वाधिक फटका इंडिगोला बसणार होता, कारण त्यांच्या अनेक विमानांचे उड्डाण मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळेत होते. हा गोंधळ जाणीवपूर्वक निर्माण करून, कंपनीने डीजीसीएवर हे नियम मवाळ करण्यासाठी किंवा पूर्णपणे मागे घेण्यासाठी 'आर्म-ट्विस्टिंग' (दाबतंत्राचा) वापर केला. दुसरीकडे, लहान एअरलाईन्स या गोंधळामुळे बाजारात टिकू शकत नाहीत आणि अशा परिस्थितीत इंडिगोची मक्तेदारी अधिक मजबूत होते. थोड्या वैमानिकांच्या कमतरतेमुळे शेकडो उड्डाणे रद्द होतात, हे लॉजिक सामान्य माणसाला पटणारे नाही. याचा अर्थ हा 'अपघात' कमी आणि 'सिस्टीम जाणीवपूर्वक निकामी' करण्याची रणनीती अधिक वाटते.
या कंपनीच्या धोरणांवर परदेशी व्यक्ती आणि काही खास संस्थांचा प्रभाव आहे का, हा देखील एक गंभीर प्रश्न आहे. इंडिगोच्या सीईओपदी एका व्यक्तीची नियुक्ती झाली आहे. तसेच, डीजीसीए ने इंडिगोला एका तुर्की एअरलाइनकडून विमाने आणि क्रू भाड्याने घेण्यास मंजुरी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणात तुर्की आणि भारताचे संबंध नेहमीच तणावाचे राहिले आहेत. अशा परिस्थितीत, राष्ट्रीय सुरक्षेला महत्त्वाच्या असलेल्या विमान कंपनीला तुर्की एअरलाइनकडून मदत घेणे किती सुरक्षित आहे? केवळ 'एक्सपर्ट' म्हणून कोट्यवधी रुपयांचे पगार देऊन परदेशी व्यक्तींना कंपनीत महत्त्वाच्या पदांवर का नियुक्त केले जाते? जुन्या निती आयोगाचे लोक आता या कंपनीत बसलेले आहेत असे बोललले जाते? हे लोक आपल्या स्वार्थासाठी 'ईस्ट इंडिया कंपनी'च्या धर्तीवर धोरणे राबवून देशाचे (अ)हित तर साधत नाहीत ना, अशी शंका घेणे चुकीचे ठरेल का?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, डीजीसीए आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील 'बाबू'शाही या सगळ्याकडे डोळेझाक करत होती का? कंपनी नियमांचे उल्लंघन करत आहे, हे डीजीसीए ला माहीत नव्हते?
शेवटी पंतप्रधानांनी हस्तक्षेप केल्यावरच ‘शो कॉज नोटीस’ दिली गेली, म्हणजे नियामक संस्था स्वतःहून कृती का करत नव्हती? डीजीसीए सारख्या महत्त्वाच्या पदांवर विमान वाहतूक क्षेत्राचे विशेष ज्ञान असलेले तज्ज्ञ अधिकारी असावेत, की केवळ 'आयएएस' अधिकारी आहेत म्हणून त्यांची नियुक्ती करावी? जर क्षेत्राचे डोमेन ज्ञानच नसेल, तर खासगी कंपन्यांच्या कारभारावर नियंत्रण कोण ठेवणार?
हा संपूर्ण गोंधळ म्हणजे केवळ अपघाताची साखळी नाही. हा रचलेला एक मोठा कट आहे का, ज्यामध्ये देशाचे धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि राष्ट्रीय सुरक्षा यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत नाहीत का? या साऱ्या पडद्यामागच्या खेळाडूंचा आणि त्यांचा गुप्त उद्देश समोर येईल का?
ट्रंप भेटीच्या वेळी दिल्लीत दंगे घडवले गेले होते.
पुतीन भेटीच्या वेळी - इंडिगो ने गोंधळ करवून कंपनीच्या स्वार्थासाठी संपूर्ण देशाचे लक्ष विचलित केले गेले आणि नियमांना वाकवले गेले. पण हा केवळ एक प्रयोग असेल तर? पुढच्या मोठ्या खेळीची ती केवळ एक रंगीत तालीम असेल का?
एक पॅटर्न तर सहज दिसतो आहे.
असे असेल तर पुढील टारगेट काय असेल असे तुम्हाला वाटते?
पुढील कोणत्या नेत्याच्या भेटीच्या वेळी आता काय घडू शकेल?
रोचक लेख आहे.
दिसते तितके हे इंडीगोचे प्रकरण सरळ वाटत नाही.
या गोंधळाची कारणेही न पटणारी वाटत आहेत.
https://youtu.be/NHMi5iCqDEM?si=AYBCFdMY_2YQMR42
बोलभिडू चानेलने चांगले विडिओ दिले आहेत. इंडिगो नफ्यात कशी आली. ६५% व्यवसाय करते ही आता पोटदुखी झाली. अदानीने भारतीय विमानतळ व्यवहार, दुरुस्ती इत्यादी पूर्णपणे कब्जात घेतले आहे. आकासा एअरलाइनला पकडून त्यांना घुसायचे आहे त्यासाठी इंडिगोला बाजू करण्यासाठी काहीतरी कारणच शोधत आहेत.
काय हो कंकाका... तुम्ही सुध्हा?
बौद्धीक दिवाळखोरी जाहिर केलेल्यांची काही कमी आहे का इथे मिपावर? जी तुम्ही भरुन काडताय?
असे मत काही विडिओवालेच मांडताहेत.
मी हल्ली त्या गटात चाललो आहे हे मान्य. बाकी काहीही घडले की त्यामागे अडानी अंबानी यांच्या घशात धंदा घालण्याचे प्रयत्न चालू आहेत हा आरोप देशातले दोन पक्ष सतत करत आहेत याकडे दुर्लक्ष कसे करायचे? काय घडू शकेल हा प्रश्न आहे धाग्याचा आणि ते मांडले. सामान्य माणसाकडे पाच वर्षांतून एकदा बोट काळे करायचे एवढाच पर्याय असतो. एरवी वायफळ बडबड करत राहायची.
कोणत्या गटात जावे, कोणती विचारसरणी अनुसरावी हा तुमचा वैयक्तिक विषय असल्याने त्यात पडण्याचा मला अधिकार नाही!
परंतु माझ्यापेक्षा पंचविसेक पावसाळे जास्ती पाहिलेले, चौफेर दांडगे वाचन असलेले, अनेक विषयांची जाण असलेले एक जुने-जाणते असे मिपाकर ज्यांच्याकडुन मला आजपर्यंत कळत-नकळत, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष्पणे काही गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत, आणि कधी एखाद्या माहिती/ संदर्भाची गरज भासली तर ज्याच्याकडे विचारणा करता येइल अशी 'हक्काची व्यकी' अशी जी तुमची प्रतिमा मझ्यासरख्या कित्येक मिपकरांच्या मनात निर्माण झाली आहे तिला कुठेतरी धक्का लागल्यासारखे वाटले आणि त्या उद्विग्ननेतुन दिलेला तो प्रतिसाद आहे, त्यात तुम्हाला दुखवण्याचा कुठलाही हेतु नाही!
देशामध्ये किमान चार मोठ्या विमान कंपन्या असल्या पाहिजे तरच असे प्रकार घडवायला लोक बसवणार नाहीत.
सध्या फक्त एकाच कंपनीच्या हातात सगळे 65% काही एकवटले आहे हे योग्य नाहीच.
त्यामुळे आकाशा आणि इतर सर्व कंपन्यांना आकाश मोकळे करून देणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे असे मला वाटते.
यात इतर काही घोटाळे होत नाहीत यावर माझा विश्वास नाही.
कोणताही प्रॉफिटेबल रूट इतक्या सहजपणे कोणत्याही कंपनीला उपलब्ध करून दिला जात असेल का?
ट्रंप भेटीच्या वेळी दिल्लीत दंगे घडवले गेले होते.पुतीन भेटीच्या वेळी - इंडिगो ने गोंधळ करवून कंपनीच्या स्वार्थासाठी संपूर्ण देशाचे लक्ष विचलित केले गेले
बरोबर आहे, "डीएनए एकच आहे" म्हणणाऱ्या कमजोर लोकांच्या कार्यकाळात असेच होणार, नाही का?
"तसेच, डीजीसीए ने इंडिगोला एका तुर्की एअरलाइनकडून विमाने आणि क्रू भाड्याने घेण्यास मंजुरी दिली आहे."
ऑपेरेशन सिंदूरच्यावेळी इस्रायल सोडून कोणताही देश आपल्या बाजूने उभा राहिला नाही, अपवाद कदाचित रशियाचा असू शकेल, परंतु पाकिस्तानच्या बाजूने तुर्किया व अझरबैजान छाती पुढे काढून उभे राहिले. कोणी काहीही बोलो, पाकिस्तानबरोबर हे दोन्ही देश आपले शत्रूच गणले गेले पाहिजेत, अशा परिस्थितीत तुर्कियाच्या कोणत्याही एअरलाईनकडून विमाने आणि क्रू भाड्याने घेण्यास परवानगी देणे हे देशद्रोही कृत्य आहे असे मी मानतो.
गुप्त खेळी वगैरे काही नसावं. विमान कंपनीचा दुर्लक्षपणा असेल. माघे एकदा BS ४ वरून BS6 वर जाताना असाच गोंधळ वाहन कंपन्याणी केला होता.
एखाद्या उद्योगात एका कंपणीची मक्तेदारी निर्माण झाली की सरकार ला पण झुकावं लागणार.
त्यावेळी कोणता नेता भारतात भेट देत होता?
मी सहा तारखेला दुपारी चारच्या फ्लाईट इंडिगो ने नागपूरहून दिल्लीला आलो.दोन वेळा फ्लाईट कॅन्सल होणार सांगितले. नंतर ऑन झाली. पावणे पाचला उडाली. तोपर्यंत अधिकांश प्रवाशांनी तिकीट कॅन्सल केले होते. माझ्या बाजूच्या दोन्ही जागा रिकाम्या होत्या. तीन सीटवर पसरून चक्क झोपून आलो. एका ज्योतिषाने( ऑफिस मधला हौशी) खूप पूर्वी मला म्हटले होते. ज्या कारणाने दुसऱ्या लोकांचे वाईट होत असते. त्यावेळी तुमचा फायदा होतो. प्रत्यक्ष अनुभव आला.
Halon's razor:
“Never attribute to malice that which is adequately explained by stupidity.”
एयरलाइन्स आणि त्यांचे रोस्टरिंग अगदी जवळून पाहिलेलं आणि पूर्वी केलेलंही असल्याने हे नक्की सांगू शकतो की या नियमांत बदल होण्याच्या काळात थोड्याशाही निष्काळजीपणामुळे महाप्रचंड उलथापालथ होऊ शकते. स्नो बॉलिंग इफेक्ट. मी तर एक पाऊल पुढे जाऊन म्हणेन की एखादी विमान उड्डाण कंपनी कायमची बंद पडेल, परत उठू शकणार नाही, इतकी वाताहात या अशा वेळी आगोदरच काळजी न घेतल्यास होऊ शकते. खूप कॉम्प्लेक्स आहे हे सर्व. केवळ अमुक व्यक्तीचे इतके तास उड्डाण झाले की त्याला इतके तास सुट्टी.. असं सरळ प्लॅनिंग नसतं. सत्राशेसाठ फॅक्टर्स असतात.
दोन दिवसांपूर्वी वाचलं की आता वैमानिक कामावर यायला तयार आहेत परंतू सरकारी नवीन नियमानुसार त्यांना घरी बसावे लागत आहे.
म्हणजे इंडिगोला आणखी वैमानिक, स्वागतिका भरती करावे लागतील. नफा कमी होईल पण नियमित उड्डाणे होऊ शकतील. त्याला वेळ लागेल.
ज्या दिवशी देशाचे पंतप्रधान जागतिक शक्ती रशियाचे राष्ट्रप्रमुख पुतिन यांच्या स्वागतासाठी तयार असतात. त्यांच्यासोबत महत्त्वाचे आंतर-सरकारी करार करण्यासाठी दिल्लीत तयारी होते...नेमक्या त्याच दिवशी, सकाळी १० वाजल्यापासून माध्यमांचे संपूर्ण लक्ष त्या ऐतिहासिक भेटीवरून आणि भारताच्या वाढलेल्या जागतिक प्रभावावरून हटवून, विमानतळांवरील गोंधळावर केंद्रित झाले.बारा वर्षांपासून सत्तेत असलेले प्रचंऽड बहुमतातील मोदींचे सरकार याठिकाणी हतबल ठरले!
छे छे. वंदे मातरम आले ना मदतीला. लोक आता त्यावरच चर्चा करतील.
बाकी, इंडिगोचा गोंधळ व प्रवाशांच्या हालांसाठी नेहरूच जबाबदार असू शकतील का, हे बघायला पाहिजे.
टीपः हलकेच घ्या.
हा एक व्यापक कटाचा भाग आहे =)
ज्यांना पुतीन भेटीत खरच स्वारस्य आहे ते लोकं इतर कुठल्याही घटनांमुळे आपलं लक्ष्य पुतीन वरुन हटवणार नाहित. मिडीयाचं लक्ष्य विचलीत करणे वगैरे मुद्दे गैरलागु आहेत.
गुंतवणुकदारांच्या दृष्टीकोनातुन भारताची चांगली/वाईट प्रतीमा निर्माण करण्याशी याचा संबंध असेल असं वाटत नाहि. मोठे गुंतवणुकदार डोळ्यांनी काय दिसतं यापेक्षा आकडे काय सांगतात यावर लक्ष्य देतात.
इंडीगोने दीड वर्षांत हवे ते बदल केले नाहित, व सरकारी यंत्रणांची मॉनीटरींग जवाबदारी असेलच तर ती त्यांनी नीट निभावली नाहि हे एक कारण असेल.
किरणराजु आहेत ना हवाईउड्डयन मंत्री ? हे एक मुख्य मंत्रालय, आणि काहि संलग्न मंत्रालयं, असं एकत्रीत सिस्टीम फेल्युअर आहे हे. इंडीगोला व्यावसायीक नुकसान काय व्हायचे ते होईलच.