जनातलं, मनातलं

हाती ज्यांच्या शून्य होते

Primary tabs

जैनांची कथा वाचली, मंदी वरील लेख/चर्चा वाचतोय त्यातून अचानक खालील पुस्तकाची आठवण झाली. म्हणून हा पुस्तक परीचयाचा उपद्व्याप. मध्यंतरी भारतात असताना एक आधी माहीत नसलेले पुस्तक हातात पडले. त्या पुस्तकाची नावाप्रमाणेच असलेली कल्पना मला आवडली आणि संग्राह्य वाटल्याने घेयचे ठरवले. तसे त्याची प्रथमावृत्ती २००५ च्या शेवटात झालेली पण ही द्वितियावृत्ती २००८ मधली मला विकत घेताना मिळाली... पुस्तकाचे नाव आहे: हाती ज्यांच्या शून्य होते. संपादक - अरूण शेवते, ऋतुरंग प्रकाशन. किंमत २०० रुपये. तर काय आहे ह्या पुस्तकात ते आपल्याला समजले असेलच : भारतात आणि भारताबाहेर अशा अनेक महान/असामान्य व्यक्ती झाल्या आहेत ज्यांच्या महान हातात होण्याआधी फक्त शुन्य होते. बर्‍याचदा तशी गोष्ट आपण एडीसनची ऐकतो की तो म्हणायचा की मी प्रयोगात १००० चुका केल्या नाहीत तर मला १००० पद्धती कळल्या ज्यांचा उपयोग होणार नाही. पण त्याचे अजून एक लक्षात ठेवण्यासारखे वाक्य आहे: "Many of life's failures are people who did not realize how close they were to success when they gave up." हाती ज्यांच्या शून्य होते हे पुस्तक हे अशाच महाभागांची गोष्ट सांगते ज्यांनी एडीसनने सांगितल्याप्रमाणे "गिव्ह अप" केले नाही तर जिद्दीने पुढे जायचे ठरवले, तसे ते गेले आणि स्वतःचे नाव जनमानसात कायमचे कोरले. ह्यात विविध लेखकांचे अथवा त्याच व्यक्तींच्या आत्मचरीत्रातील लेख आहेत. तसेच स्टिव्ह जॉब्स सारख्याच्या प्रेरणादायी भाषणाचा अनुवाद आहे. (ते भाषण इंग्रजीतून मुळापासून वाचण्यासारखे आहे). येथे खाली मी फक्त त्याच्या मलपृष्ठावर असलेल्या ओळी देतो ज्या तशाच्या तशा पण, त्यातील आता माहीत असलेल्या व्यक्तींच्या नावामुळे, वाचल्या तरी प्रेरणा देणार्‍या वाटतील.
  • स्टिव्ह जॉब्ज (मॅकँटोश, आयपॉड, आय फोन आणि त्याहूनही महत्वाचे सुबक दिसणारे फाँट्स!) - कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवले.
  • अब्राहम लिंकन - पोस्टमास्टर होते.
  • शेक्सपिअर - खाटिकखान्यात नोकरी केली.
  • अब्दुल कलाम - विद्यार्थी दशेत रेल्वे स्टेशनवर वर्तमानपत्रे विकली.
  • लता मंगेशकर - कोल्हापुरला स्टुडीओत नोकरी केली.
  • एम.एफ. हुसेन - फुटपाथवर सिनेमाची पोस्टर्स रंगवली. (आता १०० कोटींना पुस्तके विकण्याचा विक्रम!)
  • धीरूभाई अंबानी - पेट्रोलपंपावर क्लार्क
  • गदिमा - नापास झाल्यावर उदबत्या विकण्याचा प्रयत्न केला.
  • सुधीर फडके - चहाभाजीचा व्यापार केला
  • गुलजार- मोटर गॅरेजमधे नोकरी केली
  • ग्रेटा गार्बो - दुकानात सेल्स गर्ल
  • निळू फुले - कॉलेजात अकरा वर्षे माळी
  • सुशीलकुमार शिंदे - कोर्टात शिपाई
  • कर्मवीर भाऊराव पाटील - नांगर आणि कंदीलाचे विक्रेते
  • जीनी वॉकर - बस कंडक्टर
  • मेहमूद - ड्रायव्हर
असे अनेक आहेत ज्यांच्यावर लेख या पुस्तकात नाहीत... आता यातील एक गोष्ट शेवटी जाता जाता थोडक्यात सांगतो. ती आहे आत्ताच ऑस्कर मिळालेल्या गुलजारची: फाळणीनंतर भारतात आला. आईवडीलांना वाटले मुलगा सी ए होईल. पण कसचे काय... दिल्लीहून मुंबईस आला. सेल्समनची नोकरी घेतली. त्यात दोनशे रुपये पगार मिळायचा. त्यातीलही ६० रुपये कापले जायचे...पण त्या नोकरीत वाचायला मिळायचे नाही म्हणून ती सोडून १५० रुपयांची नोकरी विचारे मोटर गॅरेज मधे स्विकारली. वाचायला वेळ मिळालाच पण तेथे स्वतःच्या गाड्या दुरूस्त करायला येणारे बासू भट्टाचार्य, देबुसेन आदी ओळखीचे झाले. त्याच वेळेस बिमलदा बंदीनी चित्रपट काढत होते. शैलेंद्र आणि बिमलदांमधे तेंव्हा मतभेद झाले होते. म्हणून बासू भट्टाचार्यांनी या रिपेअरमनला बिमलदा आणि सचीनदेवना भेटायला आणले. त्यात कल्याणी (नुतन) तीचे विकास (अशोक कुमार) वरील मूक प्रेम दाखवताना रात्री गाणे म्हणते असे दाखवायचे होते. पण बिमलदांची अट अशी की मुलगी एकटी रात्री अंगणात जाऊन अथवा वडीलांसमोर कवीता म्हणणार नाही. सचीनदेवांचे म्हणणे मग गाणे घरात गुदमरून जाईल त्यामुळे मी संगीत देणार नाही. ती कविता ही ती तिच्या वडीलांकडून ऐकत असलेल्या वैष्णवी कवितेसारखी होती... (हे सर्व बिमलदा, सचीनदांचे विचार) ... हे सर्व गुलजारना समजावून सांगितले. मग काही शब्द बसवले ते चंद्राशी ती बोलते असे होते. पण तितकेसे रुचले नाहीत. मग आरडींनी त्याला डोबळ चाल लावून दिली.त्याला सचीनदांनी "पॉलीश" केले.मग या कविच्या मनात आले की ही कल्याणी म्हणते आहे की, "मी काळीसावळी असते तर रात्रीत प्रियकराजवळ निघून गेले असते..." आणि मग त्यांना खालील ओळी सुचल्या: मोरा गोरा रंग लई ले मोहे शाम रंग दई दे.... ह्या गाण्यामुळे त्या कल्याणीला अथवा तीचे काम करणार्‍या नुतनला कुठला रंग मिळाला ते माहीत नाही पण हिंदी चित्रपटसृष्टीस "मेलडी" म्हणता येतील अशी अनेक गाणी मिळतच राहीली आणि अजूनही तशी मिळत राहोत हीच इच्छा!
नाटक्या

ह्या पुस्तकाबद्दल रविवार ७ मे २००६ रोजी सकाळ मध्ये परिक्षण आले होते ते जसेच्या तसे देत आहे. गोपाळ जोशी यांनी ते लिहीले होते.

जगण्याची उमेद वाढविणारे...

आपले भवितव्य आपल्याच हातात असते, असे नेहमी सांगितले जाते. जगातल्या यच्चयावत कर्तृत्ववान माणसांचे जीवनचरित्र नुसते नजरेखालून घातले, तरी ही बाब स्पष्ट होईल. पंधराव्या शतकात रंगभूमीवर अफाट प्रयोग करणारा नाटककार विल्यम शेक्सपिअर असो किंवा आपल्या विनोदाने सर्व जगाला वेडा करणारा चार्ली चॅप्लीन असो, कंदील आणि नांगर विकता विकता रयत शिक्षणसंस्था उभी करणारे द्रष्टे कर्मवीर असोत किंवा मॅट्रिकला नापास झाल्यावर उदबत्या विकून चरितार्थ चालविणारे अण्णा माडगूळकर असोत, अशी कर्तृत्ववान माणसेच आपल्या जगण्याला खरे बळ देत असतात. जगण्याची उमेद वाढवतात आणि आपले आयुष्य समृद्ध करतानाच आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवतात. अरुण शेवते यांनी संपादित केलेले "हाती ज्यांच्या शून्य होते,' हे पुस्तक अशाच कर्तृत्ववान माणसांची कहाणी सांगते.

कर्तृत्ववान माणसांचे वैभव सर्वांनाच दिसत असते. या वैभवाने क्वचित काळ दिपूनही जायला होते; परंतु या वैभवाच्या मागेही कधी काळी एक अंधार होता, याचा सर्वांनाच विसर पडतो. या अंधाराला छेद देत ही माणसे हे वैभव खेचून आणतात. त्यांचा हा संघर्षच शेवते यांच्या पुस्तकाचा गाभा आहे. अब्राहम लिंकन, शेक्सपिअर, चार्ली चॅप्लीन, ग्रेटा गार्बो, स्टीव्ह जॉब्स या परदेशी व्यक्तींबरोबरच लक्ष्मणराव किर्लोस्कर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, ग.दि.मा., गुलजार, सुधीर फडके, निळू फुले, सुशीलकुमार शिंदे, यशवंतराव गडाख या देशी मातीतल्या माणसांचा संघर्षही वाचायला मिळतो. तो जसा रंजक आहे, तसाच प्रेरणादायीही.

या व्यक्तींनी लिहिलेल्या आत्मचरित्रांतील वेचे किंवा त्यांच्याविषयीचे लेख या पुस्तकात संकलित केले आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक कर्तृत्ववान माणसांची किमान तोंडओळख का होईना पण होते. यातले विष्णुपंत छत्रे, ग्रेटा गार्बो असे काही लेख तर संदर्भांच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरणारे आहेत. मुख्य म्हणजे "आपणही आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकतो,' असा आशावाद हे पुस्तक जागवते.

- नाटक्या

सुनील

उत्तम परिचय.

असाच आशय असलेले एक पुस्तक ४-५ वर्षांपूर्वी वाचनात आले होते. नाव बहुधा - नापास मुलांची कथा (चुभुद्याघ्या).

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज

थोडक्यात पुस्तक परिचय आवडला.

पुर्वीची लोकसंख्या [जुन्या मंदी, दुष्काळ, आपत्ती काळची] व ह्यावेळची लोकसंख्या यामुळे यशस्वी संघर्षाबरोबर अपयशी गाथा किती ऐकायला मिळणार हे येणारा काळच सांगेल. निदान यावेळी तरी लोकसंख्येचे महत्व पटेल व जन्मदर खाली येतो का हे पुढच्या जनगणनेत कळेल. यावेळी चांगला पाउस व अन्नधान्याचे उत्पादन होवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.

प्राजु

मी यादी बनवत आहे. आई येणार आहे मे मध्ये तेव्हा तिला आणायला सांगणार आहे.
हे पुस्तक या यादीत समाविष्ट केलं आहे आता.
धन्यवाद विकासदा.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अरे वा प्राजू ताई, क्या बात है! म्हणतात ना आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन... माझा विचार चालला होता विकासरावांकडून पुस्तक घेण्याचा. पण आता तुमच्यकडेच येत आहे तर त्यांना मेला-मेलीचा त्रास कशाला! ;)

एका विकांतासाठी या पुस्तकाची बुकींग पक्की बरं का आपल्यासाठी :)

आपला,
(शुन्य) भास्कर

आता या यादीत डी एस कुलकर्णी यांचे नाव येईल. टेलीफोनला सुगंधी पट्ट्या लावण्याचे काम
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मनीषा

एका चांगल्या पुस्तकाचा परिचय करुन दिला आहे .
हा उपक्रम खरच चांगला आहे ... कारण पुस्तके आणायला गेले असता बर्‍याचवेळा प्रसिद्ध लेखक किंवा प्रकाशनांचीच पुस्तके पाहिली जातात .. आणि अशी चांगली पुस्तके नकळत दुर्लक्षित राहतात..

हाती ज्यांच्या शून्य होते...पुस्तक उकलून दाखवल्याबद्दल आभार.
मिळालं तर चाळुन घेईन हेही पुस्तक.

एका चांगल्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल आभार. मागे एकदा 'नापास मुलांची गोष्ट' वाचलं होतं (पण त्यापुढे काही आठवत नाही.)

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

विकास

'नापास मुलांची गोष्ट' पुस्तकपण अरूण शेवत्यांनीच संपादीत केलेले आहे. पण मी ते वाचलेले नाही.

रेवती

पुस्तकाचा परिचय आवडला.
आता पुढच्या भारतभेटीत ही खरेदी नक्की!

रेवती

मुक्तसुनीत

लेख , पुस्तक परिचय आवडला. "रॅग्स टू रिचेस" हे अनेकानेक कथा-कादंबर्‍यातून दिसणारे सूत्र आहे. शून्यातून यशाकडे झालेली कुणाचीही वाटचाल ही प्रेरणादायी वाटावी अशीच आहे.

प्रदीप

आवडला. अरूण शेवत्यांची काही पुस्तके माझ्या संग्रही आहेतच. हे आता पुढल्या भारतभेटीमध्ये घेतले पाहिजे, ह्याची नोंद करून ठेवत आहे.

विकास

सर्व प्रतिक्रीयांना धन्यवाद!

आपल्याला जे काही नवीन माहीती होईल/आवडेल याची माझ्यासकट येथील सदस्यांनी एकमेकांना देण्याचा प्रयत्न सर्वांनीच करावा असे वाटते.

जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी द्यावे ॥ शहाणे करोनी सोडावे । सकळजन ॥

चतुरंग

प्रेरणादायी साहित्य वाचायलाच हवे.
(जाताजाता - अरुण शेवते हे आमच्या अहमदनगरचे. एक संवेदनशील कवी आणि लेखक म्हणून सुपरिचित आहेत.)

चतुरंग

एक संवेदनशील कवी आणि लेखक म्हणून सुपरिचित आहेत.
माफ करा, पण मला वाटते की सर्व कवी आणि लेखक संवेदनशीलच असतात. ते तसे नसतील तर कवी किंवा लेखक होऊच शकत नाहीत.

प्रनन्जय

विकास भाउ आपन या पुस्तकाबद्द्ल सन्गितले ते मी गेव्ले ४ दिवसापसुन मित्राकदुन घेउन वाचत आहे... त्याबद्द्ल धन्यवाद..
पन मला अशा आनेक युगपुरुशान्ची आत्मचरित्रे हवी आहेत क्रुपय त्या पुस्तकान्ची नावे द्या.. आपला- प्राणान्जय.
vap

प्रनन्जय

विकास भाउ आपन या पुस्तकाबद्द्ल सन्गितले ते मी गेव्ले ४ दिवसापसुन मित्राकदुन घेउन वाचत आहे... त्याबद्द्ल धन्यवाद..
पन मला अशा आनेक युगपुरुशान्ची आत्मचरित्रे हवी आहेत क्रुपय त्या पुस्तकान्ची नावे द्या.. आपला- प्राणान्जय.
vap

सुबक ठेंगणी

असंच म्हणते...
विकत घेऊन पुन्हा पुन्हा वाचावं असं पुस्तक वाटतंय!
परिचयाबद्दल धन्यवाद...

यशोधरा

पुस्तक परिचय आवडला. आता घरी गेले की नक्की घेईन हे पुस्तक.

उत्खनक

आवडलेले परि़क्षण!
पुस्तक वाचावे लागणार! :)