जनातलं, मनातलं
अर्थ कुणी सांगेल काय?...
Primary tabs
समयीच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते
केसातच फुललेली जाई पायाशी पडते
भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागेपुढे
मागेमागे राहीलेले माझे माहेर बापुडे
साचणार्या आसवांना पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची
थोडी फुले माळून ये, डोळा पाणी लावून ये
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गं ये
हासशील हास मला, मला हासू ही सोसेना
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का जुना
हे गाणे ऐकताना हुरहुर लावते. खूपवेळा ऐकूनही समाधान होत नाही म्हणून वारंवार ऐकावेसे वाटते. मात्र त्यातील शब्दांचा अर्थ काही लागत नाही. गाण्याचे रसग्रहण कुणी करेल काय? किवा अर्थ कुणी सांगेल काय?...
सुंदर गाणे दिसतेय ..
गाणे ऐकण्यासाठी जालावरचा दुवा मिळेल काय ??
अभिरत
http://www.youtube.com/watch?v=JYKwuwVB-08
आशाताईंच्या आवाजातलं गाणं इथेही सापडलं.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
आरती प्रभूंची कविता खरच दुर्बोध आहे...कळली तर ग्रेसनाच कळेल. तेच तसे म्हणत होते एका कार्यक्रमात!
दुसरी शक्यता एखादा मराठीचा प्राध्यापक शोधा. कळली तर खरच इथे लिहा....
या ब्लॉगवर छान लिहलय..वाचनिय आहे..
http://bolaacheekadhee.blogspot.com/2006/12/blog-post.html
चकली
http://chakali.blogspot.com
त्या ब्लॉगवर खरंच खूप सुरेख अर्थ लिहिलाय.
पहिल्या दोन ओळीत जे म्हटलंय ते एकच आहे...जसे की
समईच्या शुभ्र कळ्या.....म्हणजे वाती ....उमलवून लवतात म्हणजे आधी पेटतात आणि मग हळूहळू विझतात.
तसेच केसात माळलेली/फुललेली जाई नंतर कोमेजून गळुन पडते.
अर्थात हा झाला सरळ अर्थ पण ह्यातला गर्भितार्थही समजू शकेल असाच आहे.....आधी जीवन फुलते आणि मग मरणाच्या रुपात कोमेजते.
अशाच तर्हेने प्रत्येक दोन ओळींचा एकमेकींशी काही तरी संबंध दाखवलाय असे वाटते. आता ह्या अंगाने विचार केला तर कविता उलगडत जाईल. त्यात एक सरळ शब्दश: अर्थ असेल आणि दुसरा गर्भितार्थ.
आता करा प्रयत्न.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
हं , असाही विचार असू शकेल. खरच, कविता हा त्या त्या काविचाच मुलुख ; उगा आपण त्यात शिरायचा यत्न करायचा इतकंच !
अर्थनिर्णयनाबद्दल मी अन्यत्र जे लिहिले ते इथे कॉपी/पेस्ट करतो आहे. (इथे चालेल असे वाटते. अन्यत्र - अगदी योग्य संदर्भात असूनही - भृकुटीभंग होतात ; तो धोका इथे तरी नाही ! :-) )
जेव्हा एखाद्या गुंतागुंतीच्या गोष्टीतून निरनिराळे अर्थ निघू शकत असतील किंवा एकूण ती गोष्ट समजायला क्लिष्ट असेल तर त्याच्या अनेक अर्थांबद्दल चर्चा घडताना दिसते. ब्रह्मसूत्रे हे एक उदाहरण. एकेका सूत्रामध्ये छोट्याश्या विधानांमध्ये मोठा आशय भरलेला आहे असे मानले जाते. त्याबद्दल अर्थातच बरीच भवति-न-भवति घडत असते. थोडा विचार करता , "परमार्थ" हा शब्द सुद्धा , मानवी आयुष्याच्या अनेकानेक अर्थांपैकी सर्वात महत्त्वाचा - कारण ईश्वरासंदर्भातला - या गोष्टीचे सूचन करतो.
थोडक्यात "इंटरप्रिटेशन" या इंग्रजी शब्दाला प्रतिशब्द म्हणजे अर्थनिर्णयन.
आता प्रस्तुत कवितेबद्दल : या कवितेचा मला जाणवलेला अर्थ : एका नवपरिणितेच्या मनातले तरंग. पहा तुमच्यापैकी कुणाला हा(ही) अर्थ लागतो का !
बोलाचीच कढीवर खरच अगदी सुन्दर अर्थ दिलाय. अगदी समर्पक वाटतो. असंच नवपरिणितेच्या भावना व्यक्त करणारं आरती प्रभु यांचंच आणखी एक गीत म्हणजे "नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत!"
धन्यवाद चकली!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
असेच म्हणतो.
एकदा भावसरगम कार्यक्रम ऐकायला गेलो असताना बाळासाहेबानी या गाण्याचे विश्लेशण केले होते.
ही कविता एक गर्भवतीचे बाइचे मनोगत आहे असे त्यानी सान्गितलेले आठवते.
भिवयांच्या फडफडी (पापण्या फडफडतात ना ?)
दिठी च्या हि मागे पुढे .....
(अगम्य)