जनातलं, मनातलं

संपादकीय अग्रलेखः मिसळ की भेसळ

Primary tabs

सर्व पात्रे काल्पनिक. (असे आपले म्हणायचे.)

संपादकत्व स्वीकारुन आम्हाला बरेच (म्हणजे २) दिवस झाले आहेत. पण एकही लेख आमच्या अनुमतीची वाट पाहत शेपूट हलवत बसलेला नाही हे ध्यानात आल्यावर आम्ही ताडकन भानावर आलो. आणि ह्या पदात वाटते तितकी मजा नाही हे जाणून घेऊन संकेतस्थळाचे सदस्य लोकशाही मार्गाने आमच्या पृष्ठभागावर लत्ताप्रहार करण्यापूर्वी आम्हाला संपादकपद मिळाल्याची निळसर सुगंधी आठवण लिहून ठेवायचे ठरवले.

या आठवणीचे ब्याकग्राऊंड तुम्हाला माहीतच असेल. किंवा नसले तर हा परिच्छेद वाचल्यावर माहीत होईल. मराठी संकेतस्थळांवरील आमच्या वावराला बरेच दिवस होऊन गेले होते. पण मराठी संकेतस्थळांवर आवश्यक तो मान आम्हाला मिळत नाही या कल्पनेने आम्ही प्रचंड बेचैन होतो. जग उलथापालथ करुन सोडण्याची क्षमता असणार्‍या आमच्या साहित्याला केवळ २ प्रतिसाद. आणि संजोप राव, विसोबा खेचर असल्या मूळच्या पुण्याबाहेरच्या मंडळींच्या लेखाला ८० प्रतिसाद येत असत. या काळात आमची पोटदुखीही थोडी बळावली होती. (परवाच्या गणेशचतुर्थीपासून ती बरी आहे.) पण या सर्वामागे संकेतस्थळांच्या संचालकांचे काही कुटील कारस्थान आहे हे सिद्ध करण्यास काही विदाचीही गरज नव्हती. अगदी सूर्यप्रकाशाएवढे ते सत्य होते. त्यामुळे प्रशासकत्व नाही तरी निदान उपसंपादकपदाची तरी जबाबदारी मिळावी या हेतूने सध्या ह्या खुर्च्या उबवणार्‍या लोकांवर मिळेल तिथून टीका करणे हे Dilbert Principle आम्ही भक्तिभावाने आचरत होतो. पण कुठे डाळ शिजेल तर शपथ. उगाच नंतर कोणी आमच्यावर काही फाजील आरोप करायला नको म्हणून आमची साईड 'सेफ' ठेवण्यासाठी आम्ही स्त्री सदस्यांना व्य.नि. तर नाहीच पण शिवाय त्याचे लेखन आवडूनही प्रतिसाद देण्याचे टाळत होतो.

पण एखादे बाबा जसे भक्तांच्या मनातल्या इच्छा ओळखतात आणि भक्ताने त्या व्यक्त करण्यापूर्वीच त्या पूर्ण करून टाकतात तसे प.पू. तात्यामहाराजांनी आम्हाला संपादक मंडळात स्थान दिले. (आम्ही त्यांना मादक द्रव्य तर सोडा -येथे सोडा म्हणजे सोडून द्या- अद्यापि चहादेखील पाजलेला नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. )

असो. मराठी भाषेला संपादकांची थोर परंपरा आहे. जांभेकर, भोपटकर, अत्रे, खाडिलकर, परुळेकर यांच्यासोबत आमचे नाव घेतले जाणार आणि आमचे गुरू सुमार केतकर यांच्या ग्लासात सोडा ओतण्याची संधी आपल्याला मिळणार ( आता येथे 'सोडा' चा अर्थ बदलला. जो तुम्हाला माहितीच आहे.) आणि चिंचवड स्टेशनच्या इतिहासात परवाचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार हे आम्हाला पुरते कळून चुकले आहे पण त्यासाठी एक झणझणीत अग्रलेख पाडणे आवश्यक आहे ही जाणीवही झाली आहे.

तेव्हा निळसर सुगंधी आठवणीऐवजी सादर आहे लोकसत्तेतून साभार परत आलेला आमचा अग्रलेख

"मिसळ आणि भेसळ"

“महाराष्ट्रातील बरेच लोक नाष्ट्याला मिसळ खातात. पुण्याला मिसळ मटकीची बनवतात तर मुंबईला वाटाण्याची. मिसळीचे तसे बरेच प्रकार आहेत त्यापैकी "कोल्हापुरी मिसळ" हा जहाल प्रकार खवय्यांमध्ये लोकप्रिय आहे. या मिसळीची खासियत म्हणजे याची तर्री फारच तिखट असते. त्या तर्रीला कट असा शब्द आहे. सेतुसमुद्रमचे निमित्त करून भाजपा आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी भारतात जो थयथयाट चालवला आहे. त्यालाही कट हेच नाव देणे सयुक्तिक ठरेल. रामाचे नाव घेऊन त्यांनी चालवलेली रावणलीला अपेक्षितच आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडून तेथे थयथय नाचणार्‍यांमध्ये हेच लोक पुढे होते. आता १२३ कराराचा वार फुकट गेल्याने रामसेतूचा मुद्दा उपस्थित करून कॉंग्रेस सरकारला अडचणीत आणायचा त्यांचा डाव आहे. अडचणीत आलेली मांजर जशी गळा धरते तसा भारतीय लोकशाहीचा गळा घोटण्याच्या ह्या वृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

मिसळीवर फरसाण टाकणे आवश्यक असते. नाही तर त्याला सॅंपल पाव म्हटले असते. पुण्यातील मिसळ कुरकुरीत तर मुंबईची मिसळ तिथल्या दमट हवामानामुळे मऊ पडलेली असते. फरसाण हा मूळचा गुजराती पदार्थ. मिसळीमध्ये केवळ शेव असून चालत नाही सोबत भावनगरी, गाठी, पापडी या सर्वांची साथ आवश्यक असते. मात्र ह्या फरसाणाची निर्मिती करणार्‍या गुजराती बंधूंमध्ये ह्या सर्वसमावेशकतेची जाणीव नष्ट होत आहे. विहिंप आणि नरेंद्र मोदींनी हिंदुत्त्वाची प्रयोगशाळा बनवलेल्या ह्या राज्यामध्ये नराधमांचा नंगानाच सुरु आहे. आणि त्यांना फूस आहे ती परदेशीय गुजराती धनिक बांडगुळांची.

मिसळीचा फरसाण बनवण्यासाठी फक्त बेसनपीठ, मीठ आणि मिरची असून चालत नाही. त्याला एकजीव करून नंतर तळण्यासाठी तेलही आवश्यक असते. इंदिरा गांधींनी अन्नटंचाईच्या काळात पामतेल आयातीचा निर्णय घेतला तेव्हा त्यावर टीका करणार्‍यांमध्ये जनसंघाच्या सोबत लालभाईही होते. सर्व देश सांभाळण्याची जबाबदारी साक्षात मार्क्सनेच आपल्या खांद्यावर दिली आहे असे या पक्षातील काही दुढ्ढाचार्यांना वाटते. पण लालभाईंना भारतापेक्षा चीनची काळजी जास्त आहे. आताही १२३ चे निमित्त करून सोनियांना अडचणीत आणण्याच्या भाजप आणि त्यांच्या पित्त्यांना मदत करण्याचे काम ही मंडळी करतच आहेत.

मिसळीसोबत पाव असणे गरजेचे असते. एका हाताने पाव तोडून तो सॅंपलमध्ये बुडवावा आणि चमच्याने फरसाण खावे असे काही मंडळी करतात. वास्तविक पाव हा परदेशी पदार्थ. "पाव खाल्ल्याने धर्म बाटतो" अशी आपल्या पूर्वसूरींची धार्मिक श्रद्धा. विध्वंसाचे राजकारण करण्यासाठी धर्मासारखे साधन नाही. “धर्म ही अफूची गोळी आहे" असे मार्क्सने म्हटले आहे. पण भारतातील लालभाईंना मार्क्सशी काही देणेघेणे नसल्याने धर्मआंधळ्या जनसंघाच्या हातात हात घालून त्यांची वाटचाल सुरूच आहे. मागील निवडणुकीत सोनियांच्या परदेशी असण्याच्या मुद्द्यासमवेतच त्यांच्या धर्माचाही मुद्दा काही मंडळींनी उपस्थित केला होता. पण मतदारांनी त्यांना सणसणीत मुस्काटीत हाणून देखील ही मंडळी सुधारली नाहीत. शेवटी सोनियांनी पंतप्रधानपद नाकारुन एकाच फटक्यात दहा जणांना गार केले. या फटक्यामुळे बधीर झालेली काही मंडळी अद्यापही भानावर आलेली नाहीत. उमा भारती अजूनही केशवपन करण्यासाठी रोज वस्तर्‍याला धार करतात.

तात्यासाहेब अभ्यंकरांनी मिसळपाव हे संकेतस्थळ सुरू करून राष्ट्रीय एकात्मतेला मोठा हातभार लावला आहे. केवळ मराठी असण्याचा अभिमान आम्हाला कधीही नव्हता. ते काम बाळासाहेबांचे. शिवाय त्यांना माणूस मराठी असून चालत नाही. तो हिंदूही असला पाहिजे. त्यामुळे अविनाश भोसल्यांचे समर्थन करणार्‍या बाळासाहेबांनी दाऊद इब्राहिम मराठी असूनही त्याचे समर्थन का केले नाही हे आम्हाला माहीत आहे.

माणसाने जन्माने मराठी असणे पुरेसे नाही तर कर्माने मराठी असणे आवश्यक आहे. आणि मिसळपाव या सर्वासाठी उपयुक्त आहे.
मिसळपावाला आमच्या शुभेच्छा.

वास्तविक हा अग्रलेख साभार परत येण्याचे कारणच नव्हते. पण हा अग्रलेख लिहिताना केतकरांच्याच ष्टाईलने आम्ही सोडा व सोड्याला थोडे सौम्य करण्यासाठी त्यात मिसळतो ते सोनेरी रंगीत द्र्व्य यांचे प्रमाण उलटपालट केले होते. ते भोवले असावे.

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

संपादकीय अग्रलेखाने मिसळपावाचे चीज झाले, ह्याची खात्री पटली.
सुमार केतकरांची शैली आपल्याला अचूक साधली आहे. लोकसत्तावाल्यांना फरक कसा कळला, कोण जाणे.
अजूनही त्यांच्या आयडीने लोकसत्तेला पुन्हा हा अग्रलेख पाठवा, प्रकाशित होईल :-)

- सर्किट

प्रियाली

अजूनही त्यांच्या आयडीने लोकसत्तेला पुन्हा हा अग्रलेख पाठवा, प्रकाशित होईल :-)

हे बाकी सही!

लेख आवडला. "शैली"ला बरोब्बर उचलले. ;-)

बेसनलाडू

आपल्या संपादकीय कारकिर्दीची अशी जोमदार सुरुवात निश्चितच स्तुत्य आणि सुखावह वाटते आहे. बाकी येथे 'लोकमानस', 'बहुतांची अंतरे' ष्टाइल काहीतरी असेल, तर त्याची जबाबदारी आमच्यासारख्यांवर राहिली(च)! ;) :)

तुम्हाला शैली मस्त साधली आहे आणि तुमचे शुद्धलेखनही चांगले आहे;) यापेक्षा जास्त भाव तुम्हाला मी देणे माझ्या करियरसाठी घातक आहे. ;)
उगाच नंतर कोणी आमच्यावर काही फाजील आरोप करायला नको म्हणून आमची साईड 'सेफ' ठेवण्यासाठी आम्ही स्त्री सदस्यांना व्य.नि. तर नाहीच पण शिवाय त्याचे लेखन आवडूनही प्रतिसाद देण्याचे टाळत होतो.
सुरेखा पुणेकरांनी तुमच्या खरडवहीत आरोप केला आहे.:) तो वाचला. सुरेखाताईंना तुम्ही कसे ओळखता? आमचीही करून द्या ना ओळख.

आजानुकर्ण

सुरेखाताईंनी या प्रतिसादात त्यांची बैठकीची लावणी मिसळपावावर ठेवता येईल का अशी विचारणा केली होती त्यामुळे संपादकीय अधिकारात त्यांची तारीख मिळते का यासाठी आम्ही चौकशी केली. गैरसमज नसावा. ;)

अवांतरः येथे दुवा देता येत नसल्याने दुवा देण्यासाठी आम्ही केशवसुमारांच्या खरडवहीचा वापर केला तर तिथेही हाच प्रतिसाद गेला. क्षमस्व.

सुरेखा पुणेकर

ह्यो आजानुकरनं खोटं बोलतूया. त्या परतिसादाअदूगर बगा काय लिव्हलया.

आजानुकर्ण
मंगळ, 09/18/2007 - 10:45

अरे वा. गणपतीत कुठं कार्यक्रम नाही का यंदा?
» काढून टाका | प्रतिक्रिया संपादन

तुमा सर्वांचा लाडकी,

आनि आजानुकरना नाव बदल की रं. लय तर्रास होत बग.. आजानूकरनं.. आ जानू करनं.
आसं कटिन नाव कस घ्यायचं..

सुरेखा पुनेकर
........
नका जाऊ पावनं जरा थांबा

आजानुकर्ण

सुरेखाताई

-->अरे वा. गणपतीत कुठं कार्यक्रम नाही का यंदा?

या प्रश्नाचे तुम्ही उत्तर दिलेच नाही. आम्ही संपादक मंडळाचे सदस्य आहोत. व मिसळपावावर तुमची बैठकीची लावणी करण्याची तुमची इच्छा जाणून तुम्हाला कधी वेळ आहे हे विचारण्यासाठी हा प्रश्न केला.

आणि आमचे नाव आमच्या मातापित्यांनी असे ठेवले त्याला आम्ही काय करणार :(

सुरेखा पुणेकर

या प्रश्नाचे तुम्ही उत्तर दिलेच नाही. आम्ही संपादक मंडळाचे सदस्य आहोत. व मिसळपावावर तुमची बैठकीची लावणी करण्याची तुमची इच्छा जाणून तुम्हाला कधी वेळ आहे हे विचारण्यासाठी हा प्रश्न केला.

.कसा ह्यो आजानूकरनं. .. . आसं शुद्द आवतान..... नाना फडनिसच हायस..... बामनहरी.. बामनहरी ..बावनखनी... आमच्या पुन्याची बावनखनी.

प्रमोद देव

लावणी बैठकीचीच ठेवा. कारण बाई(?) नाचायला लागली तर हाटेल हादरेल,टेबलं थरथरतील आणि ग्लासातलं(जे काही असेल ते) सांडेल.
त्यापेक्षा त्या लावणीत कोणता राग आहे आणि शब्दाशब्दांत कसे सूर (गंधार,मध्यम वगैरे)लपलेत ह्यावर निरूपण ठेवा.ते आवडेल आपल्याला.जमल्यास त्याच विडिओ चढवा इथेच.(दूरदर्शन!)

विसोबा खेचर

जांभेकर, भोपटकर, अत्रे, खाडिलकर, परुळेकर यांच्यासोबत आमचे नाव घेतले जाणार आणि आमचे गुरू सुमार केतकर

आम्हाला फक्त केशवसुमार माहीत होते! सुमार केतकर हे नांव आम्ही प्रथमच ऐकतो आहोत! :)

विध्वंसाचे राजकारण करण्यासाठी धर्मासारखे साधन नाही.

अपार्ट फ्रॉम मस्करी, वरील संपूर्ण लेखातील वरील वाक्याला आम्ही सर्वाधिक दाद देतो..

वास्तविक हा अग्रलेख साभार परत येण्याचे कारणच नव्हते. पण हा अग्रलेख लिहिताना केतकरांच्याच ष्टाईलने आम्ही सोडा व सोड्याला थोडे सौम्य करण्यासाठी त्यात मिसळतो ते सोनेरी रंगीत द्र्व्य यांचे प्रमाण उलटपालट केले होते. ते भोवले असावे.

हम्म! पुढील वेळेस प्रमाण योग्य आहे ना, एवढे मात्र पाहा..

असो! सदर लेखाबद्दल, सहजसोपे चिमटे काढत अतिशय चांगल्या रितीने राजकीय सद्यस्थितीचे विवेचन केले आहे असे म्हणून आम्ही या लेखास आमची मनमोकळी दाद रुजू करतो...

तात्या.

नंदन

छान लिहिलं आहेस, योगेश. शैली उत्तम वठली आहे. पुन्हा पाठवणार असशील तर आणीबाणीचे समर्थन करायला विसरु नकोस :). अग्रलेख स्वीकारला जाण्याचे चान्सेस वाढतील. शिवाय जमलंच तर प्रशासकीय अनुमती आणि आणीबाणी, तसेच किचन कॅबिनेट आणि संपादक मंडळ यांच्यातील साम्य या विषयावर एखादा परिच्छेद टाकता आला, तर उत्तमच. [ह. घ्या.]

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

सहज

चांगलीच प्रेरणा घेऊन लिहीले आहेस. मला आवड्लेले शब्द म्हणजे "असल्या मूळच्या पुण्याबाहेरच्या " सॉलीड!!

ह्या निमित्ताने पेपर मधे आपला लेख ,पत्र छापून यावे असे वाटणार्‍या सर्व इच्छूकांना एक सोपी ट्रीक सांगतो - लेखाच्या खाली " आपला विकास देशपांडे" लिहा.... :-)

विकास

>>>ह्या निमित्ताने पेपर मधे आपला लेख ,पत्र छापून यावे असे वाटणार्‍या सर्व इच्छूकांना एक सोपी ट्रीक सांगतो - लेखाच्या खाली " आपला विकास देशपांडे" लिहा.... :-)

आवडले! अहो पण आम्ही फकस्त म.टा. मधेच लिहीले आहे. तुम्हाला काय वाटते "सुमार जी" आमचे विचार छापतील की काय? ;) आमचे विचार छापून त्यांना थोडेच राज्यसभेचे सभासद मिळेल ...?

सन्जोप राव

आजानुकर्णाने आमच्याकडून कधी गंडा बांधून घेतला की नाही ते आठवत नाही, पण खाजगीत तो आमचा उल्लेख 'सन्जोप सर' असा करतो असे ऐकून आहे. त्या न्यायाने आमच्या या शिष्योत्तमाने हा जबरदस्त लेख लिहून आम्हाला गुरुदक्षिणा पोचवली आहे असे गेल्या महिन्यांत झालेल्या गुरुपौर्णिमा आणि शिक्षक दिनाला स्मरुन म्हणावेसे वाटते. जबरदस्त लेखन!
(दिला रे बाबा तुला चांगला प्रतिसाद, आता रविवारी मी लिहितो)
सन्जोप राव

विसोबा खेचर

(दिला रे बाबा तुला चांगला प्रतिसाद, आता रविवारी मी लिहितो)

हम्म्म! याला म्हणतात 'बेरजेचं राजकारण'!!

चालू द्या...:)

आपला,
(नवा पक्ष काढणारा) राष्ट्रवादी तात्या पवार!

कर्णा---
"मिसळ आणि भेसळ" हा अग्रलेख आवडला.सुमार केतकरांचा ष्टाईल आवडली.
आणि किती शुद्ध लिहितोस यामुळे आमच्या अशुद्धलेखन संप्रदायाच्या वारक-यांवर परिणाम होण्याची शक्यता वाटते :)
अग्रलेख लोकसत्ताकडे पुन्हा पाठवावा आणि हे संकेतस्थळ 'तात्या अभ्यंकराने' काढलेले नाही अशी तळटीप दे. लेख
नाही छापून आला तर नावाचा 'प्रा.डॉ.... नाही . :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर

'सुमार केतकरां'च्या लोकसत्तेचे माहित नाही.. पण 'कुमार अभ्यंकरां'च्या लोकशाही सत्तेत मात्र हा अग्रलेख आला़की छापून!

वास्तविक हा अग्रलेख साभार परत येण्याचे कारणच नव्हते. पण हा अग्रलेख लिहिताना केतकरांच्याच ष्टाईलने आम्ही सोडा व सोड्याला थोडे सौम्य करण्यासाठी त्यात मिसळतो ते सोनेरी रंगीत द्र्व्य यांचे प्रमाण उलटपालट केले होते. ते भोवले असावे.

ते भोवल्यामुळेच आम्हा वाचकांचे फावले

प्रकाश घाटपांडे

विसुनाना

विध्वंसाचे राजकारण करण्यासाठी धर्मासारखे साधन नाही.

अडचणीत आलेली मांजर जशी गळा धरते तसा भारतीय लोकशाहीचा गळा घोटण्याच्या ह्या वृत्तीचा आम्ही निषेध करत आहोत हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

माणसाने जन्माने मराठी असणे पुरेसे नाही तर कर्माने मराठी असणे आवश्यक आहे.

ही वाक्ये (केक्युलेच्या बेन्झिन रिंगसारखी ) आमच्या दिवास्वप्नातल्या (मिसळीच्या) कटात आम्हाला तरंगताना दिसली होती. पण आम्ही ती इथल्या मिसळीत टाकण्याआधीच मेहरबान अजानुकर्ण साहेबांनी जशीच्या तशी पकडून त्यांच्या फरसाणावर ओतली आहेत.
ती वाक्ये आमचीच असल्याने ती अत्युत्कृष्ट आहेतच. शिवाय त्यांच्याखालची अजानुकर्णाची मिसळही चवीला बरी आहे.

:):):)

:) - हा पंचवीस वर्षांचा झाला म्हणे!

टीकाकार-१

"माणसाने जन्माने मराठी असणे पुरेसे नाही तर कर्माने मराठी असणे आवश्यक आहे. "

का?..

आजानुकर्ण

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार.

(आभारी) आजानुकर्ण

प्रमोद देव

योगेशचा हा अग्रलेख वाचून खूपच आनंद झाला. महाजालावरील ’अग्रलेखांचा बादशाह ’ असे आजपासून त्याचे नवीन नामकरण मी करत आहे.तेव्हा समस्तांनी ’ साधू! साधू(अरूण नाही हो) म्हणावे ही अपेक्षा!

सहज

घूटर घू! घूटर घू! घूटर घू!

गुंडोपंत

कर्णा! मस्त रे...

त्या सुमार केतकराला पाठवला पहिजे... ;)

गुंडो.

ॐकार

लेख मस्तच आहे. काही वेळ लोकसत्ताच वाचत आहे असे वाटले! केतकरांची उचलबांगडी होणार असे दिसते ;)
मार्मिक लिखाण आवडले. दिवाळी अंकाकरता पाठवून पहा. :)

लिखाळ

सुंदर लेख. मजा आली. (केतकरांचे लेखन फारसे वाचले नसल्याने बाकी टिप्पणी करु शकत नाही :)
--लिखाळ.

तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

आम्ही केतकरांची कुंडली मांडली. त्यांची भाषणे ऐकली. एकदा पत्रकारभवनात मार्क्सवादावर त्यांचे भाषण ऐकले आणि तात्काळ भाकीत आमच्या पत्रकार मित्रांना ऐकवले.' ते लवकरच राज्यसभेवर स्वकृत सदस्य म्हणून जातील' न गेल्यास त्यांची कुंडली चुकली असे समजावे.( आमचे भाकित बरोबरच असते, लवकर म्हणजे कधी ते आम्ही कधीच सांगत नाही आणि आम्हालाही कुणि विचारत नाही)
ज्योतिषाचारी
प्रकाश घाटपांडे

@ते लवकरच राज्यसभेवर स्वकृत सदस्य म्हणून जातील' न गेल्यास त्यांची कुंडली चुकली असे समजावे.

ते नाही गेले पण त्यांचा बगलबच्चा आणि मटा नव्हे सोटा चा (सोन्याआई टाईम्स चा) आजी संपादक रडत राऊत मात्र नक्की राज्यसभेवर जाणार बुवा...
>
>
सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

नीलकांत

अजानुकर्णा,

आमच्या आवडत्या सुमार केतकरांची जशीच्या तशी इस्टाईल घेतलीस बघ. हा ते आणिबाणीचं आणि संजय गांधीच राहीलं बघ. ;)

लेख खुप आवडला.

नीलकांत

सखाराम_गटणे™

धर्म ही खरच अफुची गोळी आहे. ह्याबाबत सहम्त

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.