जनातलं, मनातलं

बेंगलोर आख्यान ..... भाग १

Primary tabs

आज बेंगलोरला येउन बरोबर ६ महिने पूर्ण झाले, खरचं केती लवकर निघून जातो ना काळ ? बिलकूल वाटले नाही की आपण येवढ्या सहजपणे ६ महिने पूर्ण करू म्हणून . वाटते आहे की आत्ताच कुठे आपण पुणे सोडून या दूरदेशी आलो आहोत. आजून त्या पुण्याच्या रम्य आठवणी मनात तशाच ओल्या आहेत. पण आता हळूहळू येथे स्थिरावर आहे. तसे आजच्या प्राकृत भाषेत सांगायचे म्हणल्यास मी आता 'अलमोस्ट सेटल ' झालो आहे. पण आता वाटत आहे की थोडे सिंहावलोकन करून पहावे गेल्या ६ महिन्याचे [ काय आहे , असे दमदार शब्द वापरल्याशिवाय लेख वजनदार होत नाही ]। काही डोंबलाच सांगण्यासारखं घडलं नाही तरी "दिसामागे काहितरी (च) लिहावे " या आमच्या बाण्याला स्मरून हा लेख मी पुढे चलू ठेवतो .......... तसे माझे 'बेंगलोरला' येणे अगदीच काही अनपेक्षीत असे काही नव्हते , कारण त्याच्या आधीच साधारणता २ महिने माझ्या मनात "पक्षांतराचा " विचार चालू होताच. तेव्हा मी काम करत असलेल्या पक्षात माझा 'दम घुट रहा था' . मला काही आंतरराष्टीय पातळीवर काम करण्याची संधी दिसेना आणि काही मोठे पद मिळण्याचे चान्सेस कमी होते [ आपले प्रमोशन हो ] कारण आमचा पक्ष [ म्हणजे कंपनी ] पडला फक्त राज्याच्या राजकारणातच समाधान मानणारा. मग त्यासाठी आम्ही ईतर मोठ्या व प्रस्थापित पार्ट्यांशी बोलणी चालू केली. पण हे सगळे आमच्या पक्षाच्या कार्यकारणीला अंधारात ठेउनच चालू होते. आमच्या पक्षांतर हेतूची कुणकुण आमच्या 'हाय कमांड' ला लागलीच आम्हाला 'मातोश्री' वर बोलावणे आले [ म्हणजे जनरल मॅनेजर च्या केबिनमध्ये ], त्यांनी अगदी प्रेमाने आमची चौकशी केली व आमच्यासाठी भविष्यात रचलेल्या योजनांची एक मस्त गोष्ट सांगितली. राजकारणात पैशापेक्षा, सत्तेपेक्षा जनमानसातील प्रतिमेला कसे महत्व आहे हे सांगण्याचा त्यांनी परोपरीने प्रयत्न केला. आम्ही पण त्यांच्या हो मध्ये हो मिळवली। पक्षाच्या कार्यकारणीच्या एका बैठकीत आमच्या 'साहेबांनी' आमची खूप स्तूती केली. पक्षाच्या बांधणीत , घडणीत व अडचणीच्या काळात आम्ही कशा महत्वाच्या भूमिका बजावल्या याचा त्यांनी पाढा वाचला. आम्हाला "कडवा, कडवट यंत्रसैनीक " असे बहूमानही बहाल करण्यात आले. पक्षात आमची व्यवस्थीत घेतली काळजी जाईल अशी ग्वाही आम्हाला देण्यात आली. पण परिस्थीती सुधारण्याची चिन्हे काही दिसत नव्हती. आमची पक्षा कुचंबणा, अपमान [ म्हणजे खराच नाही , पण लिहावे लागतं ] चालूच होती. थोडक्यात सगळ्या चर्चा , बैठका ह्या 'बोलाचीच कढी व बोलाचाच भात ' आहेत हे मला उमजले ..... तेवढ्यात आम्हाला एका जागतीक पातळीवर काम करणाऱ्या एका मोठ्या पक्षाची ऑफर आली। हा पक्ष "जगातील सगळ्यात मोठी ऑटोमोबाईल कंपनी " म्हणून ओळखली जाते. त्यांनी आम्हाला आंतरराष्ट्रीय राजकारणात संधी तसेच पक्षात महत्वाचे पद यासारख्या अनेक गोष्टी कबूल केल्या. अशा ह्या मान्यवर व जनतेमध्ये एक 'इमेज' असलेल्या जागतीक पक्षाच्या माध्यमा द्वारे जनतेची 'सेवा' करून चांगला 'मेवा' मिळवण्याचा संकल्प आम्ही सोडला . लवकरच आम्ही एका शूभमुहूर्तावर आमच्या सध्याच्या पक्षाच्या "सर्व पदांचा व सदस्यत्वाचा" राजीनामा देउन पक्षाला "जय महाराष्ट्र" ठोकला. त्यामुळे आम्हाला "उडाले ते कावळे, राहिले ते मावळे","गद्दाराला क्षमा नाही" अशे अनेक (????) बहूमान प्रदान करण्यात आले. पण आम्हाला जागतीक राजकारणाची स्वप्ने पडत असल्याने आम्ही त्याला भीक घातली नाही व बेंगलोरच्या दिशेने पहिले पाउल टाकले....थोडे दिवस मस्तपैकी घरी आराम करून , मिळालेले "ऑफर लेटर" सगळीकडे मिरवून , तिथल्या स्थानिक दोस्तात नव्या कंपनीविषयी 'ढिगाने पुड्या "सोडून व शेवटी "आईवडीलांचे आशिर्वाद व श्री विठ्ठलाचे " दर्शन घेउन आमची स्वारी बेंगलोरच्या दिशेने कुच करण्यासाठी पुण्याच्या दिशेन रवाना झाली. पुण्यात आमच्या लिवलग मित्रांबरोबर २ दिवसाचे "जिवाचे पुणे" करून झाल्यावर सर्व मित्रांनी आमचे 'पार्सल' बेंगलोरला जाणाऱ्या गाडीत बसवून रवाना करून दिले ..... असा शेवटी "रोजच्या भाकरी" साठी आम्ही आयुष्यात कधीही न पाहिलेल्या "दूरदेशीच्या बेंगलोरच्या " दिशेने आमचा प्रवास सुरू झाला .....
 
छोटा डॉन ......आम्हाल इथे भेट द्या [ http://hariprasadcoep.blogspot.com/ ]

धमाल मुलगा

ह॑sss! चा॑गल॑ चाललय. लेखातूनच आपल॑ र॑गीबेर॑गी व्यक्तिमत्व जाणवत॑य. बाकी पक्षा॑तर्गत पक्षपातापायी आपली झालेली अवहेलना वाचून वाईट वाटल॑.पन भौ तू टे॑शन नको घ्यू ! लयच झाल॑ तर आपन आपला वायला पक्ष काढू. मग तू ताज्या दमाचा सळसळत्या रक्ताचा नवा मसिहा....(अन् मी "पडद्यामागचा सुत्रधार" :))असो, नेहमीप्रमाणे हे देखील उ..त्त्..म.चालू द्या !!!

फार सुन्दर, छोटा डॉन ......
'राजकीय पक्षाच रुपक' ही सन्कल्पना फार आवडली. विशेष म्हणजे मी ही  बेंगलोरला दीड वर्षे राहुन काही महीन्यापुरवीच मुम्बईला परतलो, त्यामुळे बेंगलोरचे 'गुण गौरव' (???) चान्गलेच अनुभवले आहेत. (शेवट शेवटला तर तिथे राहण्याचा अगदी वीट आला होता)
ले़खाच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पहात आहे.
आपला,
ओम फट स्वाहा.... तात्या विन्चू

कंपनी आणि नोकरी ह्यांना पक्ष आणि पक्षांतराची उपमा वापरून जे रूपक लिहीण्यास प्रारंभ केला आहे ते अतिशय मस्त आहे.
'केल्याने देशाटन, पंडीत मैत्री, सभेत संचार....' वगैरे वगैरे केल्याने ज्ञानात भर पडून व्यक्तिमत्त्व विकास साध्य होतो. त्याच बरोबर अतिरिक्त अर्थार्जन होणारे असेल तर, दुधात साखर.
(शेवट शेवटला तर तिथे राहण्याचा अगदी वीट आला होता)नाऊमेद होऊ नये. ध्येयावर एक नजर असो द्यावी.
राजकारणात पैशापेक्षा, सत्तेपेक्षा जनमानसातील प्रतिमेला कसे महत्व आहे हे सांगण्याचा त्यांनी परोपरीने प्रयत्न केला. आमच्या आयुष्यातही असा प्रसंग आला असताना 'जनमानसतील प्रतिमा रोजची भाजी-भाकरी फुकटात मिळवून देत नाही तिथे 'पैसा'लागतो. असे ठणकावून, मनजोगती पगारवाढ मिळणार नसेल तर खड्यात गेले असले वांझोटे प्रमोशन' अशी तिखट प्रतिक्रिया दिली होती. (पगारवाढ मिळाली)
असो. लिखाण सुंदर आहे. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत आहे.

आर्य

राजकीय पक्षाची ऊपमा फार आवडली, आणि आपणही (बेंगळूरु) दक्षिण मोहीमेवर आहात हे ऐकून  आनंदही झाला. 
मिपा बेंगळूरु शाखेच्या प्रतिक्षेत..........
( कन्नडराज्यातील मराठी) आर्य

प्राजु

पहिला भाग खुमासदार झाला आहे. पुढिल भागाच्या प्रतीक्षेत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर

म्हण्तो!
छोटे डॉनराव, बहोत अच्छे! अजूनही लिवा, आमी वाचतो आहोत...
तात्या.

सहज

आवडले. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

चटकदार लेखन आवडले,पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
असेच म्हणते,स्वाती

सुवर्णमयी

लेखन आवडले. बोटक्लबातून सुटलेली बोट बंगलोरात गाडीत बसली असे दिसते ! आता अधिकच जोरात गाडी धावू लागेल अशी आशा.पुढील लेखनास शुभेच्छा. मला कॉलेजबाहेर पडून १० वर्षे झाली आहेत. बिनतारी संदेशाचा जो फास स्वखुशीने गळ्यात अडकवून घेतला होता  त्यामुळे धड बोटक्लबातही निवांतपणे बसता यायचे नाही. बाकी अजूनही बोटक्लबाच्या चहाला आणि वडा पावाला तीच चव आहे असे या भारत भेटीत जाणवले. नदी पार आटली की कदाचित थोडा बदल जाणवेलः)

छोटा डॉन

आख्खं "बोटक्लबवालं कॉलेज" इथे मिपा, वर भेटायची शक्यता निर्माण झाली आहे. काय करणार राव, त्या कॉलेजचे पाणीच तसे आहे. जिथे जाल  तिथे झेंडा फडकवाल असा आत्मविश्वास त्यामुळेच निर्माण झाला ..."बाकी अजूनही बोटक्लबाच्या चहाला आणि वडा पावाला तीच चव आहे असे या भारत भेटीत जाणवले"अहो ती चव तशीच आहे आणि अनंत काळ तशीच राहणार कारण याचे कारण म्हणजे त्याच "बोटक्लबवाल्या कॉलेजचा" जिव्हाळा, त्याविषयी वाटणारी ओढ ...."आता अधिकच जोरात गाडी धावू लागेल अशी आशा."धन्यवाद ....असो. आज कुणा घरच्याशी बोलल्यासारखे वाटले........छोटा डॉन [ आम्हाला इथे भेट द्या http://chhota-don.blogspot.com/ ] याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

अविनाश ओगले

छान आहे. पुण्याच्या अंतर्नाद मासिकाचे संपादक भानू काळे यांचे बदलता भारत हे पुस्तक वाचलेत काय? त्यातला बंगळूरबद्दलचा मजकूर वाचनीय.