Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात?

र
राजेश घासकडवी
Sat, 09/12/2015 - 22:21
🗣 205 प्रतिसाद
एका बाजूला आपल्याला धर्माचा वरचष्मा सामाजिक जीवनात वाढताना जाणवतो. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात धर्माचं स्थान कमी होताना दिसतं. त्यातलं समाजात दिसणारं चित्र आपल्याला देवळांच्या रांगा, गणेशोत्सवातली गर्दी, बातम्या यांमधून दिसत असतं. वैयक्तिक बाबतीत मिपाकरांमध्ये काय चित्र आहे हे जाणून घेण्यासाठी हा कौल घेण्याचा प्रयत्न. या कौलातून निघणारे निष्कर्ष हे अर्थातच मर्यादित सॅंपलमुळे सर्व समाजाला लागू होणार नाही, पण तरीही एका छोट्या समाजगटाचं का होईना, पण प्राथमिक चित्र निर्माण होईल अशी आशा आहे. धार्मिकता, आस्तिकता, श्रद्धा या गोष्टी मोजायला सोप्या नाहीत. सर्वांना लागू पडेल असा मानदंड तयार करणं फार कठीण आहे. घराघरातलं चित्र वेगळं असतं. त्यामुळे मी प्रत्येकाला आपल्या घरच्या अनुभवाबद्दल विचारतो आहे. आईवडिलांच्या तुलनेने तुम्ही कितपत कमी वा अधिक धार्मिक आहात असा प्रश्न विचारणं हा प्रत्येकाला बऱ्यापैकी खात्रीलायकरीत्या उत्तर देता येण्याजोगा प्रश्न वाटतो. त्यात आईचा स्वभाव एक टोक आणि वडिलांचं दुसरं टोक अशीही शक्यता असेल. अशा वेळी शक्य तितकी सरासरी काढून उत्तर द्यावं ही विनंती. धार्मिकता मोजण्यासाठी काय काय निकष वापरावेत हे प्रत्येकाने ठरवायचं आहे. तरीही काही गोष्टी मी विचार करण्यासाठी नमूद करतो आहे. - दररोज पूजा करणं - मंदिरात नियमितपणे जाणं - देवाला नवस बोलणं - तीर्थयात्रा करण्यासाठी जाणं - विवाह, मुंज, वास्तुशांत, सत्यनारायण विधियुक्त करणं - पाप पुण्याच्या बाबतीत जागरुक असणं - शिवाशीव, विटाळ पाळणं - मुलांना 'देवबाप्पा पाप देईल' अशी भीती घालणं. - घरात शुभं करोति, रामरक्षा, वगैरे सारख्या प्रार्थना नियमितपणे म्हणणं. - घरात देवघरासाठी प्रशस्त जागा असणं या व अशासारख्या अनेक निकषांवरून तुमचे आईवडील तुमच्यापेक्षा अधिक धार्मिक होते की कमी धार्मिक होते? हे उत्तर देण्यासाठी मी तीन विभाग करणार आहे, आणि त्यापैकी तुमचे पालक कुठे बसतात व तुम्ही कुठे बसता हे सांगा. १. बरेच धार्मिक. (देवावर बऱ्यापैकी दृढ विश्वास; पूजा करणं, मंदिरात जाणं बऱ्यापैकी नियमित, मुलांवर धार्मिक संस्कार करण्याचा प्रयत्न इ.) २. मध्यम धार्मिक (विश्वास असला तरी पूजा करणं आणि मंदिरात जाणं तसं अनियमित, मुलांवर धार्मिक संस्कार व्हावे याचा काहीसा प्रयत्न - पण खूप नाही इ.) ३. कमी धार्मिक (देवावर विश्वास थोडा किंवा जवळपास नाही, पूजा किंवा मंदिरात जाणं जवळपास नाही, विधी नावापुरतेच/प्रथा म्हणून, धार्मिकऐवजी सेक्युलर संस्कार इ.) उत्तर देताना 'आईवडील २ मी ३' या स्वरूपात प्रतिसादाच्या सुरूवातीला द्यावं ही विनंती. म्हणजे मला संकलन करायला सोपं जाईल. शिवाय तुम्हाला तुमच्या मुलांविषयी किंवा त्यांच्या धार्मिक वातावरणाविषयी काही टिप्पणी करायची असेल; किंवा तुमच्यात आणि तुमच्या पालकांत नक्की काय फरक आहे याविषयी लिहायचं असेल तर प्रतिसादांत जरूर लिहा.
वर्गीकरण
धर्म
श्रद्धा
आस्तिक
कौल

प्रतिक्रिया द्या
50718 वाचन

💬 प्रतिसाद (205)
म
मांत्रिक Mon, 09/14/2015 - 19:33 नवीन
मस्त रे बॅट्याभौ! उगाच वड्याचं तेल वांग्यावर काढायचं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
र
राजेश घासकडवी Sun, 09/13/2015 - 17:45 नवीन
१) आणि असं जर असेल तर ते अर्थातच चुकीचं पण आहे. त्याची मतं त्यानं बनवली पाहिजेत.
हेच तुम्ही आस्तिक वातावरणात मुलं वाढवणाऱ्या; मुलांना 'देव असतो' असं शब्दांनी आणि कृतींनी सांगणाऱ्या पालकांना सांगता का?
खर्‍या जगात देवाचं तथाकथित आस्तित्व बर्‍याच गुन्ह्यांना आळा घालत असावं असं मला वाटतं
याला काही आधार नाही. अमेरिकेत गेल्या पंचवीस वर्षांत नास्तिकता वाढली आहे, धार्मिकता कमी झालेली आहे. त्याचबरोबर गुन्ह्यांचं प्रमाणही प्रचंड प्रमाणावर घटलेलं आहे. भारतातच होणाऱ्या धार्मिक दंगली पाहिल्या तर धार्मिक लोकं गुन्हे करायला कचरतात यावर विश्वास बसत नाही.
सर्व शक्यता थकल्या की माणूस देवावर हवाला सोडून बसतो. कारण तसं करणं हे एक प्रकारच्या मानसिक सेफ्टी व्हॉल्व्ह चं काम करतं. नास्तिक माणसांना हा आधार नाही.
लहानपणापासूनच कुबड्या न वापरण्याची सवय ठेवली त्याचे पाय बळकट होतील असा विचार त्यामागे आहे. आपल्याला कोणी वाचवायला येणार नाही, आपणच आपल्यावर येणाऱ्या संकटांतून मार्ग काढायचा ही जाणीव निर्माण होणं मला महत्त्वाचं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Sun, 09/13/2015 - 19:28 नवीन
हेच तुम्ही आस्तिक वातावरणात मुलं वाढवणाऱ्या; मुलांना 'देव असतो' असं शब्दांनी आणि कृतींनी सांगणाऱ्या पालकांना सांगता का?
नाही. कारण देव ही एक खरी की खोटी माहिती नाही पण चांगली संकल्पना आहे. आपल्यातल्या चांगुलपणाचं देव हे एक प्रतिक आहे. पण ही संकल्पना अमूर्त असल्यामुळे, किंवा एकूणच जीवनातल्या अनुभवामुळे बरेच आस्तिक लोक नंतर नास्तिक होतातही. तुमचा स्वतःशी संवाद "देव आहेच" या संकल्पने नंतर "तो खराच आहे का" अशा प्रकारे सुरू होतो. कारण त्याला कुणीच पाहिलेलं नाही. पण "देव नाहीच" या संकल्पने मध्ये मनावर पडदा टाकला जातो आणि स्वतःशी संवाद होतच नाही. जिथे कठोर मतं असतात तिथे संवाद होत नाही. मध्यपूर्वेमध्ये उगम पावलेल्या एका धर्माबद्दल ("बाकीचे काफीरच") आपण ते पाहतोच, नाही का?
याला काही आधार नाही. अमेरिकेत गेल्या पंचवीस वर्षांत नास्तिकता वाढली आहे, धार्मिकता कमी झालेली आहे. त्याचबरोबर गुन्ह्यांचं प्रमाणही प्रचंड प्रमाणावर घटलेलं आहे. भारतातच होणाऱ्या धार्मिक दंगली पाहिल्या तर धार्मिक लोकं गुन्हे करायला कचरतात यावर विश्वास बसत नाही.
गुन्ह्याचं स्वरूप भयंकर प्रमाणात बदललेलं आहे असं मला वाटतं. दुर्योधन तेव्हाही होता. पण निर्भयाची केस पाहिली तर दुर्योधन म्हणजे अगदी मवाळ वाटायला लागतो. बाकी धार्मिक दंगली या फक्त आस्तिकच करतात असा काय पुरावा आहे? नास्तिक हे देवावर श्रद्धा न ठेवणारे पण धर्माचा अभिमान असणारे असू शकतात.
लहानपणापासूनच कुबड्या न वापरण्याची सवय ठेवली त्याचे पाय बळकट होतील असा विचार त्यामागे आहे. आपल्याला कोणी वाचवायला येणार नाही, आपणच आपल्यावर येणाऱ्या संकटांतून मार्ग काढायचा ही जाणीव निर्माण होणं मला महत्त्वाचं वाटतं.
ठीक आहे. ज्याचा त्याचा विचार. पण समाजातले बहुतांशी 'जन' मनाने दुर्बळ असतात. त्यांच्याकडे हा वैचारिक प्रगल्भ पणा असेलच असं नाही. समाजातला प्रत्येक घटक तेवढा प्रगल्भ होईपर्यंत देवाचा प्लासिबो वाईट नाही असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
स
सतिश गावडे Sun, 09/13/2015 - 19:15 नवीन
१) आणि असं जर असेल तर ते अर्थातच चुकीचं पण आहे. त्याची मतं त्यानं बनवली पाहिजेत. कारण देव नसतोच हे काही वैश्विक सत्य नव्हे (जसं देव असतो हे ही नव्हे. त्या दोन्हीपैकी सत्य अजून पुढे यायचं आहे).
देव मानायचा की नाही हे वैयक्तिक मत होऊ शकेल.
२) शिवाय कट्टर नास्तिक माणसाला कशाचंही मॉरल दडपण असेल असं मला वाटत नाही. म्हणजे एक सामान्य माणूस जसा देवाला का होईना घाबरून काही गोष्टी करणार नाही, तसं त्याच्यावर एखाद्या गोष्टीचा धाक नसेल. आता तुम्ही याच्या विरोधात कितीही मुद्दे मांडलेत तरी ते आदर्शवादी असतील आणि खर्‍या जगात देवाचं तथाकथित आस्तित्व बर्‍याच गुन्ह्यांना आळा घालत असावं असं मला वाटतं.
इथे तुम्ही जनरलायझेशन करत आहात. कट्टर नास्तिक माणसाला कशाचंही मॉरल दडपण असेल असं जर तुम्हाला वाटत नसेल तर तो तुमचा विचार चुकीचा आहे. चांगलं आणि वाईट वागणं हा मानवी स्वभाव आहे. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही स्वभावाची माणसं आस्तिक आणि नास्तिक अशा दोन्ही प्रकारात आढळतील.
३) त्याचबरोबर त्याला कुठल्याही मानसिक आधार नसेल. देव हा आपली गरज आहे. ते आपलं अल्टीमेट सेफ्टी नेट आहे. सर्व शक्यता थकल्या की माणूस देवावर हवाला सोडून बसतो. कारण तसं करणं हे एक प्रकारच्या मानसिक सेफ्टी व्हॉल्व्ह चं काम करतं. नास्तिक माणसांना हा आधार नाही.
नास्तिक माणसाला असल्या आधाराची गरजच नसते. असली अज्ञात शक्ती त्याच्या दृष्टीने अस्तित्वातच नसल्याने कुठल्याही अतिंद्रिय शक्तींवर तो मदतीसाठी अवलंबून राहत नाही. किंबहुना जे काही करायचे आहे ते आपल्यालाच करायचे ही खुणगाठ मनाशी पक्की असल्याने तो मानवी आवाक्यात जे जे शक्य असेल ते ते करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
र
राजेश घासकडवी Sun, 09/13/2015 - 19:45 नवीन
मला जे म्हणायचं आहे ते चांगल्या पद्धतीने समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
काळा पहाड Sun, 09/13/2015 - 19:54 नवीन
देव मानायचा की नाही हे वैयक्तिक मत होऊ शकेल.
वैयक्तिक मत हे अनुभवातून येतं. इतक्या लहान वयात वैयक्तिक मत असेल असं मला वाटत नाही. या वयात आपली मतं आपण आई वडिलांवरूनच ठरवतो. आईवडिलांचा कल बघून आपलं मत ठरवायला मुलं शिकतात. म्हणून टीनएजर्स होईपर्यंत पालकांचे आणि त्यांचे खटके उडत नाहीत. एकदा बाहेरचं वारं लागलं की मगच महायुद्ध सुरू होतं. तेव्हा एक मुद्दा म्हणून मी माझं वेगळं मत मांडलं. बाकी मोठ्या माणसांच्या बाबतीत हे ठीकच आहे. पण लहान मुलांना थोडं देव, भुतं, पर्‍या वगैरे जगात राहू द्यावं असं माझं मत आहे. उगीच त्यांना जगातल्या भीषण गोष्टींची जाणीव करून द्यायची काय घाई आहे?
इथे तुम्ही जनरलायझेशन करत आहात. कट्टर नास्तिक माणसाला कशाचंही मॉरल दडपण असेल असं जर तुम्हाला वाटत नसेल तर तो तुमचा विचार चुकीचा आहे. चांगलं आणि वाईट वागणं हा मानवी स्वभाव आहे. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही स्वभावाची माणसं आस्तिक आणि नास्तिक अशा दोन्ही प्रकारात आढळतील.
दारू पिवू नये असं माझ्या पालकांचं मत आहे. त्यांचं मॉरल दडपण माझ्यावर असल्यामुळे मी दारू पीत नाही. नाहीतर मी प्यालोच असतो. हे फक्त उदाहरण म्हणून. दारू चांगली की वाईट हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे, की देव हा फॅक्टर माणसाच्या स्वच्छंदीपणावर नियंत्रण ठेवणारा फॅक्टर आहे. कशाची तरी भिती आहे म्हणून माणूस स्वतःवर बर्‍याचदा नियंत्रण ठेवतो. मानवी स्वभाव वगैरे आहेच. पण जिथे to be or not to be असा बॉर्डरलाईन वरचा प्रश्न असतो तिथे देव हा घटक चांगलं वागण्याच्या बाबतीत निर्णायक ठरत असावा असं मानायला बरीच जागा आहे.
नास्तिक माणसाला असल्या आधाराची गरजच नसते. असली अज्ञात शक्ती त्याच्या दृष्टीने अस्तित्वातच नसल्याने कुठल्याही अतिंद्रिय शक्तींवर तो मदतीसाठी अवलंबून राहत नाही. किंबहुना जे काही करायचे आहे ते आपल्यालाच करायचे ही खुणगाठ मनाशी पक्की असल्याने तो मानवी आवाक्यात जे जे शक्य असेल ते ते करतो.
हे बोलायला ठीक आहे. मानवी मन हे मशीन नव्हे. "मानवी आवाक्यात जे जे शक्य असेल" हा इथे मुद्दा आहे. तो आवाका संपला की माणूस कोसळतो. अशा वेळी मनावरचं अतिप्रचंड दडपण आस्तिक कदाचित त्या सेफ्टी व्हॉल्व्ह मुळे सहन करील. नास्तिक लोकांना ती संधी नाही. जे काही करायचे आहे ते करून झाल्यावर काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
मारवा Sun, 09/13/2015 - 19:55 नवीन
२) शिवाय कट्टर नास्तिक माणसाला कशाचंही मॉरल दडपण असेल असं मला वाटत नाही. म्हणजे एक सामान्य माणूस जसा देवाला का होईना घाबरून काही गोष्टी करणार नाही, तसं त्याच्यावर एखाद्या गोष्टीचा धाक नसेल. आता तुम्ही याच्या विरोधात कितीही मुद्दे मांडलेत तरी ते आदर्शवादी असतील आणि खर्‍या जगात देवाचं तथाकथित आस्तित्व बर्‍याच गुन्ह्यांना आळा घालत असावं असं मला वाटतं. याचा सर्वात प्राथमिक प्रतिवाद एक माणुस धार्मिक आहे म्हणुनच फक्त तो रेप हत्या करत नाही अस म्हणणं म्हणजे त्याला मुलभुत संवेदनशीलता च नाहीये असा होतो. उद्या धर्माने आज्ञा दिल्यावर तो हे सर्व बिनदिक्कत करेल. यात मानवी संवेदनशीलतेच मुलभुत अस्तित्व नाकारण झाल. संवेदनशीलता जीने एक माणुस दुसरया माणसाच्या सफरींग वा वेदनेशी रीलेट करतो ती. एखाद्या बेटावर एखाद्या मुलाला पुर्ण गॉडलेस वातावरणात वाढवलं तर तो ईश्वराविषयी प्रश्न विचारणार नाही पण तो अस्तित्व विषयक प्रश्न नक्कीच उपस्थित करेल. मी कोण आहे ? माझ्या सभोवतालाचा माझ्या अस्तित्वाशी काय संबंध आहे ? माझ्या जगण्याच प्रयोजन काय आहे ? इ. तो मुलगा कुठल्याही देवाने धर्माने आज्ञा जरी दिली नाही तरी त्याच्या मित्राला सहकारयाला पुर्ण मानवी कारणांनी प्रेरणांनी नैतिक प्रतिसाद देइल. एक प्रयोग सर्व्हे घेऊन पीटर सींगर आणि मार्क हॉसर यांनी केलाय तो वाचण्यासारखा आहे. तीन वेगवेगळ्या मोराल सिच्युएशन्स त्यांनी धार्मिक व नास्तिक लोकांना दिल्या व त्याची उत्तरे देण्यास सांगितले त्यात आस्तिक व नास्तिक असल्यामुळे उत्तरात फरक पडलेला नाही असे आढळुन आले. डिटेल इथे वाचता येईल. १-http://www.utilitarianism.net/singer/by/200601--.htm फ्रान्स डे वाल यांचे नैतिकतेच्या उत्क्रांती वरील संशोधन Primates and Philosophers: How Morality Evolved हे एक अप्रतिम पुस्तक धार्मिकतेच्या हि अगोदर अस्तित्वात असलेली मानवी अंगभुत नैतिकता कशी उत्क्रांत होत गेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
स
साधा मुलगा Sun, 09/13/2015 - 15:59 नवीन
पालक २ मी ३
  • Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी Sun, 09/13/2015 - 17:17 नवीन
स्त्रियांच्या बाबतीत सासरचे घर हा ही एक फॅक्टर असावा. कारण कित्येकदा तुम्ही ज्या घरातून आलात आणि ज्या घरात पोचलात यामधे धार्मिक-अधार्मिक वातावरणात जमिन-अस्मानाचा फरक असु शकतो. माझ्याच बाबतीत पहा ना; आई १ : रोजची पुजा-अर्चा, रामरक्षा ईत्यादी स्तोत्रे नियमीत. वैभवलक्ष्मीचे व्रत बरीच वर्शे करत होती...(कधी फळलं नाही ते सोडा..!!), आम्हां तिन्ही मुलींनांही गणपतीस्तोत्र, शुभंकरोती, मारुतीस्तोत्र, मोरया मोरया मी बाळ तान्हे ई.ई. स्तोत्रे रोज संध्याकाळी नियमीत म्हणायची सक्ती करायची. आमची लग्ने जुळावीत म्हणून कसली कसली व्रते उदा. रुक्मिणी व्रत (?) असे काही काही आम्ही करावीत अशी तिची मनापासून ईच्छा असे. वस्तू हरवली की कार्तविर्यर्जुनाचा मंत्र अजुनही म्हणत राहते. ती पण भरपुर वाचन करते पण जरा योगिनी जोगळेकर टाईप. तरिही विटाळ - शिवाशीव ईत्यादी पाळत नव्हती. दादा २ : संशयीत धार्मिक. देवावर फारसा विश्वास नाही. पण कधी स्पष्ट बोलले नाहीत. पुजा करणे मात्र टाळायचे. मुलीचे लग्न जुळावे म्हणून आईने त्यांना शनीच्या देवळात तेलाचा दिवा लावायला पाठवले. असे ११ शनिवार करायचे होते. त्या देवळात जाईपर्यंत त्यांच्या जिवातजीव नव्हता की कोणीतरी मला हे असलं विचित्र करतांना पाहील. ते अर्ध्या रस्त्यातूनच परत फिरले. अर्धा शनिवारही हे व्रत न सांभाळल्याने आमची लग्ने उशिरा झाली... (डोळा मारत) . वाचन भरपुर. शक्यतो ईंग्लिश. मी ३ : खरं म्हणजे ४ आणि ५ : पण हे पर्याय नसल्याने तिसरा निवडला. माझ्या अश्या असण्याचे श्रेय पुर्णपणे घरातूनच आलेल्या वाचनाच्या आवडीला आहे. आधी अर्थातच धार्मिक होते. स्तोत्रे म्हणायचे. एकदा पाचवी सहावीत असतांना तर कुठेतरी बाहेर जायचे होते तेंव्हा अचानक भरपुर पाऊस पडू लागला. तो थांबावा म्हणून मी देवासमोर मांडी घालून बसले आणि 'शरण तुला..." मंत्राचा अखंड जप सुरू केला. पाऊस आण्खीन वाढला आणि पुढचे ४ दिवस थांबलाच नाही.... विचार हळु-हळू वळत गेलेत. पुजा करण्याचा कंटाळा होताच. तरिही परी़क्षेला जातांना देवाला नमस्कार व्हायचाच. हे ही प्रयत्नपुर्वक थांबवले. आणि त्यामुळे निकालावर काही फरक पडत नाही हे पण यथावकाश लक्षात आले. एकदा परिक्षेच्या आधी एका अंगात आलेल्या बाईच्या पाया पडायला आईने पाठवले होते. मी नमस्कार केल्यावर त्या म्हणाल्या "पहीला नंबर येणार आहे हां...पण अभ्यास भरपुर करावा लागेल" . अर्थात हे काही रॉकेट सायंन्स नाहिये. हा प्रसंग बहुतेक माझ्या मनात नास्तिकतेची पहिली ठिणगी पाडून गेला. तसेच त्या बाईंच्या अशिर्वादाने निपुत्रीकांना मुले व्हायची अशी त्यांची ख्याती होती. पण त्यांना स्वता:ला मुल-बाळ नाहीये, यातला विरोधाभासही पहील्या नास्तिक दर्शनाचे कारण ठरला असावा. आता फारच शेफारलेय मी!! सासु-सासरे -१ (उणे एक) : हि पण एक श्रेणी हवी होती ईथे. सासु-सासरे अतिप्रचंड धार्मिक. मुळ नागपुरचे आणि त्यातून देषस्थ असे डेडली काँबो असल्याने घरात पुर्ण वर्षाचे सगळे सण-वार! कुळाचार, करंज्या, पात्या बारा भानगडी !! नागपंचमीचा सण माहित होता. पण त्यादिवशी झाडून सगळ्यांच्या नावाचे, अगदी चुलत घराच्या नावाचेही दिवे बनवायचे, हा अतिप्रसंगच होता. एक एक वेळेला त्या दिवशी घरात २२ गोड पदार्थ बनायचे ! प्रत्येक कुळाचाराला पुरणपोळीचा अत्याचार असायचाच. वर्षातून १२-१५ वेळा तरी पुरणपोळ्या बनत असाव्यात. आधी गणपती १० दिवस असायचे. ते दिड दिवसावर आणले. पण त्या दिड दिवसात १० दिवसांची झाडून सगळी कर्मकांडं ! श्रावण आणि चातुर्मास म्हणजे तर उत नुसता. सणावारांना शिवा-शीव, विटाळ आवर्जून पाळला जायचा. ईथे माझी मतं जाहीर करणं म्हणजे पराकोटीचा संघर्ष होता. तसच वयातल अंतर पाहता ते लोक बदलणही अशक्य होतं. पण तरिही धीमेपणाने का होईना माझ्यापुरता बदल मी घडवलाय. विरोध होतोच पण तरिही माझे छोटे छोटे लढे मी लढतेच आणि चक्क जिंकतेही. कसलेही उपास, व्रते ई. मी करत नाहीच. ईतक्यातच मला सवाष्ण म्हणून जेवणाचे आमांत्रण आले होते. त्या जेवणाच्या आधी अर्धा दिवस उपास ठेवायचा होता. मी सवाष्ण म्हणून जाणे साफ नाकारले. (सवा ष्ण ही संकल्पना मला व्यक्तिश: पटत नाही) छोटा प्रसंग वाटला तरी सवाष्ण जाण्याचे नाकारणे म्हणजे काय असते हे स्त्रीच्या जागी असल्याशिवाय नाही कळू शकणार. चक्क त्यांच्या मुलाच्या आयुष्याशीच खेळ की !! सर्व्हे साठी: पालक - मी = २ - ३
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Mon, 09/14/2015 - 19:17 नवीन
मुलीचे लग्न जुळावे म्हणून आईने त्यांना शनीच्या देवळात तेलाचा दिवा लावायला पाठवले. असे ११ शनिवार करायचे होते. त्या देवळात जाईपर्यंत त्यांच्या जिवातजीव नव्हता की कोणीतरी मला हे असलं विचित्र करतांना पाहील. ते अर्ध्या रस्त्यातूनच परत फिरले. अर्धा शनिवारही हे व्रत न सांभाळल्याने आमची लग्ने उशिरा झाली... लग्न जुळावे म्हणून शनीमहाराजांची प्रार्थना? अहो तो वैराग्याची देवता आहे. मंद, शनीचर म्हणून प्रसिद्ध आहे. लग्न उशिरा झाले यात काही आश्चर्य नाही मग! किमान देवीची तरी उपासना करायची. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
स
स्वप्नांची राणी Wed, 09/16/2015 - 21:23 नवीन
अहो मांत्रिकबुवा, जसं तुम्ही अजुनही शनी ला महाराज, वैरागी, मंद, शनीचर ई.ई. समजताय ना, तशी त्याच्या कृपेने लग्न जूळतात ही माझ्या आईची त्यावेळी कल्पना होती. पण मला माहितेय की शनी हा एक ग्रह, गॅसचा गोळा आहे. त्याच्या आत अर्थातच लोह, निकेल ई.ई. बरच काही आहे....आणि मंदचर बिंदचर म्हणू नका हां त्याला, पृथ्विपेक्षा बराच फास्ट आहे तो.... (प्लीज...कुठे नेऊन ठेवल्यात स्मायली माझ्या!!! लोकं शब्द-न-शब्द खरा मानत सुटलेत....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक गुरुवार, 09/17/2015 - 07:06 नवीन
चुकीच्या हेतूने चुकीच्या उपासना केल्या तर त्याचा फायदा न होता त्रासच होतो असा तंत्रशास्त्रातील संकेत आहे. हां, तुम्ही काहीच मानत नसाल तर गोष्ट वेगळी! माझा पूर्ण विश्वास (ईश्वरी अस्तित्वावर) असल्याने माझे मत मी मांडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
ग
गुलाम Wed, 09/16/2015 - 15:27 नवीन
प्रतिसाद आवडला!!!
विरोध होतोच पण तरिही माझे छोटे छोटे लढे मी लढतेच आणि चक्क जिंकतेही. कसलेही उपास, व्रते ई. मी करत नाहीच.
तुमच्या पुढच्या लढ्यांसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
स
सह्यमित्र Sun, 09/13/2015 - 18:39 नवीन
आस्तिकता किंवा नास्तिकता ह्याचा आणि नौतिकतेचा फारसा संबंध नाही. पण नास्तिक असणे ह्यापेक्षा त्याचा जाज्वल्य अभिमान मिरविणे हे जास्त होत आहे. येथील काही प्रतिसाद देखील हेच दाखवित आहेत.
  • Log in or register to post comments
स
स्वप्नांची राणी Sun, 09/13/2015 - 18:46 नवीन
नास्तिकतेपेक्षा लॉजिकल थिंकिंग करू शकते याचा अधिक जाज्वल्य अभिमान वाटतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सह्यमित्र
प
प्यारे१ Sun, 09/13/2015 - 18:58 नवीन
हम्म्म. लॉजिकल थिंकिंग. कधीतरी केलं गेल्यानं 'जाज्ज्वल्य' अभिमान वाटणं स्वाभाविक असावं. ;) हलकं घ्या ओ काकी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
स
सह्यमित्र Sun, 09/13/2015 - 18:59 नवीन
म्हणजे आस्तिक लोक लॅाजिकल थिंकीग करु शकत नाहीत असे आहे तर. हाच तो जाज्वल्य अभिमान !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
न
नीलमोहर Mon, 09/14/2015 - 06:56 नवीन
' आस्तिकता किंवा नास्तिकता ह्याचा आणि नौतिकतेचा फारसा संबंध नाही. पण नास्तिक असणे ह्यापेक्षा त्याचा जाज्वल्य अभिमान मिरविणे हे जास्त होत आहे' - १००% सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सह्यमित्र
म
मारवा Sun, 09/13/2015 - 19:03 नवीन
नैतिकता हि सर्वस्वी वेगळी बाब आहे तिचा आणि आस्तिक व नास्तिक असण्याचा काहीही दुरान्वयानेही संबंध नाही
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 09/13/2015 - 19:11 नवीन
नैतिकतेचा आणि आमचा फार संबंध नसला तरी 'खरा' आस्तिक आपोआप नैतिक असतो एवढं नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
स्वप्नांची राणी Sun, 09/13/2015 - 19:39 नवीन
"नैतिकतेचा आणि आमचा फार संबंध नसला तरी..." चला ...आस्तिकही लॉजिकल थिंकिंग करू शकतात हे पटलं रे पुतण्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sun, 09/13/2015 - 19:41 नवीन
खिक्क्क. अपेक्षित प्रतिसाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
र
राजेश घासकडवी Sun, 09/13/2015 - 20:39 नवीन
या कौलावर आस्तिक विरुद्ध नास्तिक असं चर्चेला का वळण लागलं कोण जाणे. मिपासारख्या संस्थळावर वावरणारे सुशिक्षित/उच्चशिक्षित, कॉंप्युटर/इंटरनेट सॅव्ही, बऱ्याच प्रमाणात शहरी आहेत. हा सध्याच्या काळात छोटा गट असला तरी ते झपाट्याने वाढणारं डेमोग्राफिक आहे. या गटात धर्माकडे, देवाकडे बघण्याचा दृष्टिकोन; खर्च होणारा वेळ यांची आधल्या पिढीशी तुलनात्मक मोजमापं केली तर पन्नास वर्षांनी एकंदरीत समाज कुठच्या दिशेला जाऊ शकेल याचा अंदाज बांधता येईल. यासाठी हा साधा कौल होता. त्याचबरोबर आपले काही अनुभव लोकांनी सांगावेत अशी इच्छा होती. तर मी विनंती करतो की चर्चा नास्तिक विरुद्ध आस्तिक अशी घरंगळत नेऊ नये. या लेखात आस्तिकता की नास्तिकता चांगली असा मुद्दा नसून गेल्या पिढीच्या तुलनेत आजची पिढी कुठे आहे एवढंच आपापसात तपासून बघायचं आहे.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 09/13/2015 - 20:47 नवीन
हे 'सपाटीकरण' वर दिलं असतंत तर घोळ नसला झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Sun, 09/13/2015 - 21:16 नवीन
मूळ लेखात लिहिलंय हो थोडं. पण लोकांनीच माझे हेतू वाईट असणार असे गैरसमज करून घेतले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्यारे१ Sun, 09/13/2015 - 21:40 नवीन
असते काही लोकांना खोड चुकीचे गैरसमज करून घ्यायची. काय क्रायचं ब्रं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
स
स्वप्नांची राणी Mon, 09/14/2015 - 05:15 नवीन
तसहि, आस्तिक-नास्तिक हल्ली outdated झालय. 'कालच्या पेक्षा तुम्हाला आज जास्ती पुरोगामी वाटतंय का...' असा पुढचा कौल लावूया. आई-वडिलांनाही मधे आणायची गरज नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Mon, 09/14/2015 - 05:30 नवीन
ही भन्नाटच कल्पना आहे. खरं तर आजकाल पुरोगाम्यांना रोज आपण फारच पुढे पुढे जात असल्यासारखं वाटत असणार. आसपासचं सगळं मागे सरकत असेल तर आपणच पुढे जात असल्याचं फीलिंग येतं तसं....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
क
कपिलमुनी Sun, 09/13/2015 - 21:55 नवीन
मिपा रंजल्या गांजल्यांना निराश करत नाही. जुने जुने भक्त अजुनही दर्शनाला येतात
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 09/14/2015 - 03:35 नवीन
आई १ बाबा २ मी २.५
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 09/14/2015 - 05:42 नवीन
आधी धार्मिक, निधर्मी, धर्मवेडे, आस्तिक, नास्तिक, अज्ञेयवादी, सश्रद्ध, अश्रद्ध, अंधश्रद्ध इत्यादीच्या व्याख्या सांगा. पुन्हा त्या व्याख्या सगळेजण स्वीकारतील का? किंवा त्यानी का स्वीकाराव्यात? फ़क्त इंटरनेट वापरणाऱ्या लोकांपर्यंत तुम्ही पोचाल. त्यापालिकडे लालबागच्या राजासमोर लायनी लावणारे आणि हजला किंवा वैलांकिनीला जाणारे फार मोठे पब्लिक आहे. त्यांचा अभ्यास कसा करणार आहात? आणि करणार नसाल तर हा सर्वे प्रातिनिधिक आहे असे म्हणता येईल का?
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 09/14/2015 - 06:00 नवीन
मी कसल्याच व्याख्या करत नाहीये. प्रत्येकाला विचारतो आहे की तुमच्या व्याख्येप्रमाणे तुमची धार्मिकता-सश्रद्धता तुमच्या आईवडिलांपेक्षा अधिक आहे की कमी आहे. ज्या समाजाला विचारतो आहे तो छोटा गट आहे हे वर म्हटलेलंच आहे - पण तरी ते वाढतं डेमोग्राफिक आहे. सध्या त्याचं भारतातलं प्रमाण पंधरावीस टक्के असलं तरीही जसजशी सुशिक्षितता आणि संपन्नता वाढेल तसतसं ते पन्नास ते सत्तर टक्के होईल. या समाजात धार्मिक आईवडिलांची मुलं त्यांच्यापेक्षा अधिक धार्मिक बनतात का? की नास्तिकतेकडे त्यांचा कल झुकतो? हे शोधून काढलं की पंचवीस-तीस वर्षांनी धार्मिकता कमी होईल की जास्त याविषयी काही विधानं करता येतील. आणि या सर्वेच्या मर्यादा मान्यच आहेत. पण कुठेतरी सुरूवात करायला हवीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 09/14/2015 - 07:19 नवीन
व्याख्या नसतील तर तुम्हाला काय अभिप्रेत आहे ते मला कसं कळणार? आणि मुळात गृहीतक बरोबर असल्याशिवाय निष्कर्ष कसा बरोबर येईल? इंटरनेट वापरणारे मराठी लोक कितीसे आहेत? त्यावरून संपूर्ण मराठी लोकच नव्हे तर भारतीय लोकांबद्दल तुम्ही अंदाज लावू पहात असाल तर ते फारच अपुरे निरीक्षण ठरेल. प्रत्यक्षात बघता, सिद्धिविनायक आणि लालबागच्या राजासमोरच्या रांगा वाढतच आहेत. पंढरीच्या वार्‍या चालू आहेत, त्यात साईबाबांसाठी पदयात्राही सुरू झाल्या आहेत. नवे देव, व्रते, पूजा सुरू झाल्या आहेत. हे फक्त महाराष्ट्रातले झाले. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, केरळ, तमिळनाडु यांच्याबद्दल न बोललेले बरे. महाराष्ट्रात तरी पौरोहित्यावर उदरनिर्वाह करणारा आता गरीब बिचारा ब्राह्मण राहिलेला नही. तो अतिशय उत्तम प्रकारे ऑर्गनाईझ झालेला व्यवसाय आहे, हे सगळे तुम्हाला हामेरिकेत बरीच वर्षे राहिल्यामुळे माहीत नसावे. तसे पाहिले तर धार्मिकता एकूण वाढलेली दिसते. त्यासाठी फार खोलात जायची गरज नाही. मात्र निव्वळ धार्मिकता वाढली की कमी झाली या गोष्टीमुळे माझ्या दृष्टीने समाजजीवनावर फार फरक पडणार नाही. मात्र इसिस, जमाते इस्लामी, वगैरे कट्टरपंथीयांची संख्या वाढताना दिसत आहे ही माझ्या दृष्टीने जास्त चिंता करण्यासारखी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Mon, 09/14/2015 - 15:04 नवीन
व्याख्या नसतील तर तुम्हाला काय अभिप्रेत आहे ते मला कसं कळणार?
तुमची स्वतःची व्याख्या वापरलीत तर एकाच निकषावर तुम्ही व तुमचे आईवडील जोखले जातील. यातून अॅब्सोल्यूटली पूर्वीची पिढी कशी होती, यापेक्षा पूर्वीच्या पिढीपेक्षा आजची पिढी या दिशेला झुकली आहे, त्या दिशेला की जैसे थे आहे याबद्दल निश्चित विधानं करता येतात.
इंटरनेट वापरणारे मराठी लोक कितीसे आहेत? त्यावरून संपूर्ण मराठी लोकच नव्हे तर भारतीय लोकांबद्दल तुम्ही अंदाज लावू पहात असाल तर ते फारच अपुरे निरीक्षण ठरेल.
हा सर्वे सर्व लोकांसाठी नाहीच. 'भारतात धार्मिकता वाढते आहे का' यापेक्षा 'भारतातल्या सुशिक्षित, बुद्धिजीवी, कॉंप्युटर सॅव्ही, उच्चमध्यमवर्गीयांत काय परिस्थिती आहे' हे जोखण्याचाच प्रयत्न आहे. आणि तसंही हे निष्कर्ष काही मी एखाद्या समाजशास्त्रीय जर्नलमध्ये पब्लिश करू शकण्याइतके रिगरस नाहीतच. पण आपल्या संस्थळावरचे इतर कसे वाढले, त्यांच्यात काय बदल झाला याचं चित्र आपल्यापुढेच उभं राहील अशी आशा आहे.
तसे पाहिले तर धार्मिकता एकूण वाढलेली दिसते. त्यासाठी फार खोलात जायची गरज नाही.
तीच तर गंमत आहे. धर्माचं स्तोम आत्ता वाढलं असं म्हणतो आपण, पण मी ज्या चाळीत राहायचो तिथे उत्सवांना मोठ्ठा कर्णा लावून ढाणढाण गाणी उशीरापर्यंत लावली जायचीच. आणि हे प्रत्येक बिल्डिंगमध्ये, वाडीमध्ये - उत्सवांना, लग्नाला व्हायचं. त्याकाळी गर्दी कमी होती म्हणून आवाजही किंचित कमी असेल. पण आजकाल दहा वाजता आवाज बंद करण्याचे नियम त्याकाळी नसायचेच किंवा पाळले जायचे नाहीत. सामाजिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य यात फरक असतो हे मान्यच. फक्त एका विशिष्ट गटाचं धार्मिकतेच्या अवडंबराबद्दलचं प्रेम कमी होत चाललं आहे. आणि हा गट झपाट्याने वाढतो आहे. हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मांत्रिक Mon, 09/14/2015 - 19:26 नवीन
तुमची स्वतःची व्याख्या वापरलीत तर एकाच निकषावर तुम्ही व तुमचे आईवडील जोखले जातील ऑ! इतकं पर्सनल व्हायचं कारण काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
म
मांत्रिक Mon, 09/14/2015 - 19:36 नवीन
मुद्द्याला धरुन बोला की राजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 09/14/2015 - 06:08 नवीन
माझ्या सारख्याची धार्मिकता कोणावरच अवलंबून नसते, ट्या मुळे आमचा (बसचा ;) ) पास!
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Mon, 09/14/2015 - 06:50 नवीन
घरातल्यानाही आणि मलाही कधी रोज पूजा करावी आणि अभिषेक / सत्यनारायण वगेर घालावेत कधी वाटलं नाही . मुंज सुद्धा आज्जीने हट्ट केला म्हणून केली आहे . घरात सण म्हणून जे होतात ते फक्त ४ लोक घरी येतात आणि त्या निमित्ताने सुट्टी काढून दंगा मस्ती घालता येते म्हणून "साजरे " होतात इथे . कधीच कुठल्याच धार्मिक गोष्टीचा बाऊ केलेला आठवत नाही . आणि माझ्या पुढल्या पिढी वर हि केला जाइल असं वाटत नाही. त्यामुळे सगळ्याच मुद्द्यांना पास
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 09/14/2015 - 06:50 नवीन
प्रश्नः
  • मी जाहीर रीत्या फोरमवर्,ऑफीसात , मित्रमंडळीत अगदी पुरोगामी ( छ्या देव बिव काही नसतो नसती थेरं आहेत ही सनातन्याची अशी नेमस्त पिंक टा॑कत असेन आणि प्रत्यक्षात नित्य नेमाने सकाळी संध्याकाळी देवाला नमस्कार करणार्यांचा विनाकारण उपहास्/तिरस्कार्/हेटाळणी करीत असेल तर मी नक्की कोण ? पुरोगामी,अनिस का देव नाहीच आहे आणि हे स्गळे अज्ञ आहेत "याच पोथीला" चिकटून्/कवटाळून बसलेला नव प्रतीगामी?
  • श्रीमंत जशी ही सापेक्ष आणि व्य्क्तीनुरूप बदलणारी व्याख्या आहे म्हणजे २ वेळेची भ्रांत असलेल्याला कायम नोकरीवाला श्रीमंर वाटतो. कायम नोकरीतला देशी बाबू परदेशीला श्रीमंत समजतो. परदेशी वाला चार ठिकाणी पान तीन वर आलो की आणि विचारवंताचे नामावळीत्/प्रभावळीत नाव आलेल्यांना श्रीमंत सम्जतो. तसेच काहीसे श्रद्धेचे/आस्तीकतेचे नाही का?
का फक्त देवाला नमस्कार करणारे, आणि ताप आला म्हणून+ जत्रेला देवाला प्राणी कापणारे सारखेच श्रद्धाळू/आस्तीक्/पुरोगामी?(अगदी एकाच तागडीत टाकण्यासाठी) ही जुनी कढी किती जरी नक्षीदार भांड्यातून (निर्लेप आणि आंतरराश्ट्रीय दर्जेदार) भांड्यातून आणली तरी मूळ आंबूस्पणा कायम राहील आणि त्याची कितीही आटवून+तापवून

रबडी-बासुंदीत

रूपांतर होणार नाही हे उच्च्भ्रू विचारवंतांना माहीत नाही काय? अगदी "ढ"गोळा प्रत्येक श्रद्धाळूला आंधळेपणाने विरोध कराय्लाच पाहीजे असा तिरपागडा बुद्धीभेद नसलेला,काहीसा गांवढळ, मीच तो दुसरा कोण? नाखुस
  • Log in or register to post comments
अ
असंका Mon, 09/14/2015 - 08:12 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/14/2015 - 07:12 नवीन
आस्तिक आणि नास्तिकपेक्षा कर्मकांडाला फाटा देणार्‍यांची, कर्मकांडामागील तर्कशास्त्र शोधणार्‍यांची संख्या वाढते आहे. कर्मकांडाला स्वच्छ नकार देणारे अजूनही कमीच आहेत तर कर्मकांड पटत नाहीत पण 'न जाणो उगीच पाप लागण्याची भानगड नको, एव्हढे केल्याने काय मोठे नुकसान होणार आहे' असा विचार करून पटत नसूनही कर्मकांड करणारे बरेच आहेत. शिवाय कर्मकांडाच्या प्रभावातच भक्तीचे मोजमाप करण्याची हल्ली प्रथा आहे त्यामुळे 'दाखवायला' भक्ती करणारे दांभिकही असंख्य आहेत. एकीकडे, पूर्वीच्या पिढीची डोळे झाकून (वडीलधार्‍यांचे ऐकून) देव-देव करणार्‍यांची लोकसंख्या घटते आहे आणि 'लिमिटेड' भक्तीभाव बाळगणारे वाढत आहेत तर दूसरीकडे नव्या जमान्यातील आर्थिक विवंचना, स्पर्धा आणि ऐहीक गरजा पुरविण्याची अक्षमता ह्या सर्वाचा परिपाक म्हणून वैफल्यग्रस्तांची एक पिढी सिद्धीविनायकापुढे रांग लावताना दिसते. कमी अधिक प्रमाणात दोन्ही प्रकार वाढीस लागल्याचे दिसते. राजकारणी, इव्हेंट मॅनेजर्स स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी (..आणि तीही अशी तशी नाही तर सढळ हाताने घरच्या तुपाची धार सोडलेली पुरणपोळी) वैफल्यग्रस्तांच्या कमकुवत मनावर प्रभावपाडून त्यांना पुन्हा कर्मकांडाकडे ओढत आहेत. शिर्डीच्य फकीराला सोन्याने मढवत आहेत तर लालबागच्या बुद्धीदात्यासमोर भक्तांवर अत्याचार करीत निर्बुद्धतेचं प्रदर्शन मांडत आहेत. अधिक 'खर्चीक' भक्तीला मानाचे पान मिळते आहे आणि दोनहात आणि मस्तक ही भक्तीची संकल्पना मोडीत काढली जात आहे. बहुतांश लोकं प्रवाहपतित आहेत. हाती पैसा आल्यामुळे देवालयांमधून 'पैसा' दान करून स्वतःची पापं, चुका 'धुवायचा' सोयीचा मार्ग अवलंबित आहेत. काय बरोबर, काय चुकीचे, कशाला पुण्य म्हणावे कशाला पाप समजावे ह्यावर विचार करायला आजच्या धावपळीच्या युगात ना कोणाला वेळ मिळतो आहे ना कोणाला गरज भासते आहे. ह्या सर्व गदारोळात कोण किती खराखुरा धार्मिक, आस्तिक आणि सश्रद्ध आहे हे शोधणे दुरापास्त आहे. माणसाच मन हा एक महासागर आहे. त्याच्या तळाशी काय आहे हे त्या त्या व्यक्तीलाही माहित नसतं तिथे आपल्याला आपल्या आई-वडीलांच्या मनाचा थांगपत्ता कसा लागावा? माझ्या आईने सर्व सणवार, रोजची पुजाअर्चा, कुळधर्म-कुळाचार, उपासतापास केले. म्हातारपणी (का कोण जाणे पण..) ते सर्व व्यर्थ होते अशी तीची भावना होत गेली आणि सर्व उपास तिने सोडून दिले. म्हणजे तिचा प्रवास सश्रद्ध कडून अश्रद्ध अवस्थेकडे होत गेला का? कळायला मार्ग नाही कारण तशी विस्तृत चर्चा तिच्याशी कधी झाली नाही. मग ती धार्मिक, आस्तिक की सश्रद्ध ह्याचे मुल्यमापन मी (किंवा कोणीही) कसे करावे? मुल्यमापन करायचा प्रयत्न केला तर तो फक्त वरवरच्या दृश्य परिणामाचा असेल. मूळ व्यक्ती तिच्या अंतर्मनात कशी आहे हे त्या व्यक्तीलाही कधी सांगता येणार नाही किंवा ते तिला सोयीचे नसेल. जे असेल ते तिची (त्या व्यक्तीची) एक व्यक्तिगत आणि अपूर्ण 'जाणीव' असेल. त्यामुळे, घासकडवी साहेब, मला वाटतं असा कौल कधीच अचूक असू शकणार नाही.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Tue, 09/15/2015 - 03:30 नवीन
तुमचा एकंदरीत प्रतिसाद मनापासून आवडला. हे धार्मिकतेचं लचांड वाटतं तितकं सोपं नाही हे मान्यच आहे. यात व्यक्ती कालानुरुप बदलते हे तर तुम्ही उदाहरणासकट सांगितलेलं आहेच.
त्यामुळे, घासकडवी साहेब, मला वाटतं असा कौल कधीच अचूक असू शकणार नाही.
अचूकतेचा दावा इथे नाहीच. अचूकता ही फारच ओव्हररेटेड संकल्पना आहे. आपण उद्या जीवंत असू की नाही हेही अचूकपणे सांगता येत नाही, तिथे बाकीच्या अचूकतेला काय अर्थ राहातो? पण म्हणून आपण आसपासचं जग काय आहे, आत्ता काय चित्र दिसतं आहे, याचा अंदाज बांधायचे थांबत नाही. हे अंदाजही बऱ्याच वेळा चुकतात. पण तरीही आपण त्या चुकांतूनही शिकतो. या कौलाचा हेतू अचूक अंदाज बांधण्यापेक्षा प्राथमिक चित्र मांडणं हा आहे. आपल्या आईवडलांच्या मानाने आपण अधिक धार्मिक आहोत की नाहीत हे सर्वसाधारण माणसाला सांगता येतं. कारण त्यात त्याच्या व्याख्या, त्याचे निकष असतात. असं जर शेकडो लोकांनी केलं तर काहीनाकाही उत्तरं दिसून येऊ शकतात. आता तुम्ही रेस्टॉरंट व्यवसायात आहात म्हणून समांतर उदाहरण देतो. धार्मिकतेप्रमाणेच 'चांगली चव' हीही व्याख्या करायला कठीण आहे. पण जर तुम्ही काल शेफ बदललात आणि तुमच्या जाणकार खवैय्यांना विचारलंत, की बाबा परवा तुम्ही खाल्लंत आणि आज खाताहात, त्यातल्या चवीच्या फरकाबद्दल तुमचं काय मत आहे? प्रत्येकाची चवीची जाण, पारख वेगळी असली तरी शंभरपैकी पंच्याऐशी लोकांनी तुम्हाला सांगितलं की 'हो, आजची चव मला जास्त आवडली' तर याचा अर्थ नवीन शेफ काहीतरी जास्त चांगलं करतो आहे - तुमच्या कस्टमरांसाठी. हे उत्तर अचूक आहे का? नाही. कदाचित तुमचे कस्टमर नसलेले इतर हजार लोक म्हणतील की परवाची चव जास्त चांगली होती. पण आपल्याला हे सर्वे घ्यावे लागतात, आणि त्यातून मर्यादित का होईना अर्थ काढावे लागतात. आणि असे मर्यादित अर्थ पुरेशा वेळेला एकमेकांना समान निघाले की ते सत्य म्हणून स्वीकारावं लागतं. आजची पिढी कालच्या पिढीपेक्षा कमी धार्मिक आहे का? हा असाच अनेक अंगं असलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर विशिष्ट गटासाठी वेगळं तर दुसऱ्या गटासाठी वेगळं असू शकेल. पण म्हणून हा प्रश्न गटागटाला विचारूच नये असं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Tue, 09/15/2015 - 08:23 नवीन
धार्मिकतेप्रमाणेच 'चांगली चव' हीही व्याख्या करायला कठीण आहे. मला वाटतं धार्मिकता आणि चव दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक मनाशी निगडीत (धार्मिकता) तर दुसरी शरिराशी, जिभेशी (चव) निगडीत आहे. धार्मिकतेच्या भावनेतून देवाला घातलेल्या साकड्याचा आणि साफल्याचा अनुभव हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. एखाद्याला ताबडतोब प्रत्यय येतो दूसर्‍यला आयुष्यात कधीच प्रत्यय येत नाही. पण एकाला गोड लागणारा 'गुलाबजाम' प्रत्येकाला गोडच लागतो. आणि एकाला तिखटजाळ लागणारी मिसळ सर्वांनाच तिखटजाळ लागते. भलेही तो तिखटपणा प्रत्येकाला आपापल्या कुवतीनुसार भावतो. धार्मिकतेत प्रत्येकाच्या विश्वासानुसार सत्य आणि बकवास ही दोन टोकं दिसतात तर चवीत फक्त इंटेंसिटी बदलेल. गुलाबजाम तिखट आहे असे म्हणणारा कोणी भेटणार नाही किंवा मिसळ कोणी स्वीट डिश आहे म्हणणार नाही. असो. राहता राहिला प्रश्न धार्मिकता वाढते आहे की कमी होते आहे. त्याचे उत्तर मी माझ्या आधीच्या प्रतिसादात दिले आहे. कर्मकांडं म्हणजेच धार्मिकता असेल तर, त्यातील फोलपणा जाणवून, त्यापासून दूर जाणारे जितके आहेत तितकेच आजूबाजूच्या परिस्थितीने वैफल्यग्रस्त भाविक(?) एक सोयिस्कर आधार म्हणून देवाची भक्ती, धार्मिकता ह्याकडे वळताना दिसतात. दोन्ही (+) (-) परिणाम विचारात घेतले तर परिस्थिती जैसे थे च असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
व
विजुभाऊ Mon, 09/14/2015 - 08:56 नवीन
आस्तिकता याच्याइतकी भोंगळ आणि सरड्याप्रमाणे रंग बदलणारी , फसवी आणि दांभीक संज्ञा अजूनतरी पहान्यात नाही. "अंधश्रद्धा नको पण श्रद्धा असायला काय हराकत आहे" हे इतके निसरडे वाक्य आहे की भलभलत्यांची त्यावर विकेट जाते. काळापहाड यांना उत्तर द्यायचेच झाले तर तथाकथित आस्तिकांचा " आम्ही देवाला मानतो म्हणजे तुम्हीसुद्धा मानलेच पाहिजे" हा जिहादी माजोरडेपणा ज्या दिवशी संपेल त्यादिवशी जगातली सगळी अधर्मयुद्धे संपतील. धर्म हे सर्व अधर्मांचे मूळ आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/14/2015 - 08:58 नवीन
>>>> " आम्ही देवाला मानतो म्हणजे तुम्हीसुद्धा मानलेच पाहिजे" हा जिहादी माजोरडेपणा ज्या दिवशी संपेल त्यादिवशी जगातली सगळी अधर्मयुद्धे संपतील. काहीही हं श्री. (विजूभाऊ).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्यारे१ Mon, 09/14/2015 - 09:02 नवीन
आस्तिक चा खरा अर्थ 'वेदप्रामाण्य मानणारा' असा आहे. बाकी अग्गदी बरोबर आहे. पैशाच्या किंमतीवर, तलवारीच्या धाकावर, भाकरीच्या लाचेवर पोसले गेलेले तथाकथित धर्म झूठे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
द
द-बाहुबली Mon, 09/14/2015 - 09:07 नवीन
" आम्ही देवाला मानतो म्हणजे तुम्हीसुद्धा मानलेच पाहिजे" हा जिहादी माजोरडेपणा ज्या दिवशी संपेल त्यादिवशी जगातली सगळी अधर्मयुद्धे संपतील.
आम्ही देवाला मानतो पण तुम्ही मानत नाही म्हणून आमच्या देवाला मानण्याची थट्टा उडवु नका हे कळकळीचे सांगणे ज्या दिवशी माजोरड्या नास्तिकांना पटेल त्या दिवशी जगातील सर्व आस्तीक-नास्तीक सुखाने नांदतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
प्रभाकर पेठकर Mon, 09/14/2015 - 09:26 नवीन
आस्तिकांच्या वागण्याला 'माजोरडेपणा' म्हणणे हे जितके चुकीचे आहे तितकेच नास्तिकांच्या वागण्याला अशी नांवे ठेवणेही अत्यंत चुकीचे आहे. भाषाशुद्धता, वर्तनशुद्धता, सामंजस्य, सहिष्णुता हे इश्वरचरणी भक्ती व्यक्त करण्याचेच विविध मार्ग आहेत. आस्तिकांनी आपले आस्तिकत्व वर्तनातून जोपासावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
द
द-बाहुबली Mon, 09/14/2015 - 09:35 नवीन
माजोरडेपणा आस्तिकता नास्तिकता बघत नाही म्हणून अस्तिकांबाबत तो जेव्हडा खुपतो तेव्हडाच नास्तिकांबाबतही खुपला पाहिजे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
विजुभाऊ Mon, 09/14/2015 - 10:54 नवीन
पेठकरकाका " माजोरडेपणा " हा शब्द मलाही खटकतो. आस्तिकतेला किंवा त्यांच्या आग्रहाला माजोरडेपणा हा शब्द अयोग्य आहे. मात्र माझा आक्षेप होता तो श्री/श्रीमती काळापहाड महोदया यांच्या http://misalpav.com/comment/741834#comment-741834 या विधाना संदर्भात. अर्थात देववादी / शाकाहारी लोक ज्या प्रमाणात इतराना शाकाहारी होण्याचा उपदेश देत असतात त्या प्रमाणात मांसाहारी इतरानांसाठी मांसाहाराचा आग्रह धरताना कधीच पाहिले नाही. ज्याप्रमाणे इतराना अमुक एक ठिकाणी गेल्याने सर्व कामे पूर्ण होणार आहेत असा आग्रह धरताना लोक पहातो तद्वत बुद्धीप्रामाण्यवादी उगाच स्वतः होऊन मूर्ती तोडत बसणार नाही. किंबहुना तो त्या मूर्तीतील सौंदर्य शोधेल. घरात ठरावीक देवाचीच पूजा व्हावी असा दुराग्रह धरणारे लोक इतर देवतंचा प्रसादही घेत नाहीत.एका धर्मात बाळ कृष्णाची पूजा केली जाते तेथे कृष्ण हा मोठा झाल्यावरचे कार्यच अमान्य करन्यात येते हा किती विरोधाभास म्हणायचा. तेच लोक गणपतीच्या आरतीला अमान्य ठरवतात, सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद नाकारताना पाहिले आहेत. अशा लोकाना अडमुठे म्हणायचे नाही तर दुसरे काय म्हणायचे. स्वतःचे म्हणणे तेच बरोबर दुसर्‍यानी सुद्धा तेच अंगीकारावे असे म्हणणारात आणि औरंगजेबात फरक तो काय. त्याने तलवारीच्या बळावर केले हे लोक इतराना भावनीक ब्लॅकमेल करत करतात इतकाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा