सरसंघचालकांचे आवाहन - अवैज्ञानिक रूढी आणि परंपरांचा त्याग
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी 13 सप्टेंबर 2015 ला जयपुर येथील एका परिसंवादामध्ये अतिशय महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की 'हिंदुनी शास्त्रीय पाया नसलेल्या संकल्पना सोडून दिल्या पाहिजेत'. 'हिंदूंनी इतिहासातही जुनाट, अशास्त्रीय आचरणांचा त्याग केला असून जगाकडून नव्या गोष्टी शिकल्या आणि स्वीकारल्या आहेत' असे ही ते म्हणाले.
सरसंघचालक हे संघ परिवाराचे प्रमुख असल्यामुळे या विधानाला अनुसरून आणि हे भाषण हा आदेश मानून जर संपूर्ण संघ परिवाराने आणि पर्यायाने भाजप सरकारने काम केले तर या राष्ट्रासाठी ती एक अतिशय महत्वाची सामाजिक सुधारणा असेल.
हिंदूंनी अवैज्ञानिक रूढी आणि परंपरा पाळणे बंद केले पाहिजे हे विधान सरसंघचालकांनी करणे हीच एक महत्वाची सकारात्मक घटना आहे. त्यांचे हे विचार, केवळ भाषणाच्या ओघात केलेले मनोरथ (Wishful Thinking) नसून प्रामाणिकपणे आणि विचारपूर्वक केलेले विधान आहे असेच मानले पाहिजे. एवढ्या महत्वाच्या आणि संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य बदलून टाकण्याचे सामर्थ्य असणाऱ्या, या विचाराच्या बाजूने, आधीचे सर्व भेदाभेद बाजूला ठेऊन, सर्वांनी आपली शक्ती एकवटली पाहिजे. सदर परिसंवादामध्ये, अश्या कोणत्या अवैज्ञानिक गोष्टींचा त्याग करायचा याचे सखोल मार्गदर्शन संघ (RSS) प्रमुखांनी केले नसले तरी या संबंधी काय करता येईल याचे टिपण नक्कीच तयार करता येईल.
धर्म हीच एक अशास्त्रीय संकल्पना आहे असे काही लोकांचे मत आहे. असे असले तरी देव आणि धर्म हा माणसाच्या बालपणापासूनच्या संस्कारांचा भाग असून त्यासंबंधीचे बदल लगेचच स्वीकारले जात नाहीत, कारण स्वतःच्या अस्तित्वाला आणि श्रद्धेला (Belief System) धोका आहे असे वाटून व्यक्ती प्रतिकारात्मक प्रतिक्रिया देते आणि नवीन विचार स्वीकारत नाही असा शास्त्रीय अनुभव आहे. त्यामुळे धर्म आणि देव या संकल्पनांच्या गाभ्याला कोणताही धक्का न लावता इतर अशास्त्रीय रूढी नक्कीच तत्काळ बंद करता येऊ शकतील.
१. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा (ज्याचा सुस्पष्ट असा जादूटोणा विरोधी कायदा आज उपलब्ध आहे) ह्या नक्कीच अशास्त्रीय आहेत. - भूत, चमत्कार, अलौकिक शक्ती, गुप्त धन, अतींद्रिय शक्ती, कारणी, जादूटोणा, जारणमारण, चेटूक, मंत्राने विष उतरवणे, बोटाने शस्त्रक्रीया इत्यादी.
२. पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या सर्व चालीरीती, रूढी, परंपरा -
जलप्रदूषण - नदी अथवा तलावात, समुद्रात निर्माल्य, अस्थि आणि राख विसर्जन, गणेश मूर्ती, दुर्गा मूर्तींचे विसर्जन,
ध्वनी प्रदूषण - करणाऱ्या मिरवणुका, गुलाल, फटाके,
हवेचे प्रदूषण - होळीसाठी वृक्ष तोड आणि जाळणे, चितेवर मृतदेहाचे दहन, यज्ञ-याग, अन्नाची नासाडी.
३. जात - शास्त्रीय कसोटीवर सर्वांच्याच गुणसूत्रात सरमिसळ आहे हे सिद्ध झालेले आहे, त्यामुळे जात ही सर्वात मोठी अशास्त्रीय परंपरा आहे.
४. शब्द प्रामाण्याचा त्याग - पर्यायाने बुद्धिप्रामाण्याचा स्वीकार.
५. नवस सायास, बळी देणे, दक्षिणा, चमत्कारांचे समर्थन करणाऱ्या पोथ्या आणि पुराणे इत्यादी.
(सर्वानुमते सदर यादी सुधारता अथवा वाढवता येईल)
संघ परिवाराच्या दृष्टीने पाहता भारतात राजकीय सत्ता मिळाली आहे त्यामुळे आता सर्व शक्तीने आणि सर्वांनी मिळून या सामाजिक सुधारणांसाठी झटले पाहिजे. संघ परिवार या विचारावर प्रत्यक्ष कृतीला जेव्हा सुरुवात करेल तेव्हा करेल पण सध्या किमान असे काम करणाऱ्या सामाजिक संघटना आणि व्यक्तींच्या कामामध्ये अडथळा आणण्याचे काम बृहद संघ परिवारातर्फे केले जाऊ नये असे स्पष्ट आदेश सारासंघाचालाकानी दिल्यास मोठेच राष्ट्र उत्थानाचे काम होईल. संघाची ताकद मोठी आहे, संघाने मनात आणले तर काळाच्या ओघात रूढी - परंपरांच्या शुद्धीकरणाचे काम नक्कीच होईल आणि त्या कामामध्ये सर्व पुरोगामी, बुद्धिप्रामाण्यवादी चळवळीतले कार्यकर्तेही जोमाने सहभागी होतील हे नक्की.
तात्पर्यः डीनायल मोड उपयोगाचा नाही.