Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

परदेस मत जैय्यो...! (बट व्हाय नॉट?)

प
पिलीयन रायडर
Wed, 02/15/2017 - 17:16
🗣 340 प्रतिसाद
बर्‍याच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा हिरव्या लोकांचे हिरवे प्रश्न (अ‍ॅज इन डॉलर्सवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये. माझं स्वतःचं अमेरिकेत जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, महत्वाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण करियर ओरियंटेड वगैरे नाही. आयटी मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही अमेरिकेत पोहचलो. पासपोर्टवर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही. पण २ महिन्यासाठी आलो ते गेले २ वर्ष झाले इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत. सुरूवातीला आलो तेव्हा परत जायचेच आहे ह्याच मनस्थितीत होतो. त्यामूळे हॉटेलात राहिल्यासारखं बॅगांमम्ध्येच निम्मं सामान ठेवुन संसार चालु केला. आजही परत जाण्याचीच तीव्र इच्छा आहे. पण आताशा मनात गोंधळ उडायला सुरुवात झाली आहे. खास करुन जेव्हा पासून मुलगा इथल्या शाळेत जायला लागला. पहिले २ महिने काही विषेश घडतय असं वाटत नव्हतं. पण हळूहळू त्याच्या वागण्या बोलण्यातला बदल, शाळेत शिकवण्याच्या पद्धतीतला फरक इ गोष्टी ठळक व्हायला लागल्या. मला व्यक्तिशः इथली पद्धत जास्त आवडली. इथे लिखाणावर किवा पुस्तकातून शिकण्यावर भर दिला जात नाही. खरं तर मूळाक्षरं किंवा अंक ह्यापेक्षाही वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे इ. वर भर आहे. जे काही शिकवले जाते ते खेळांमधुन किंवा प्रोजेक्ट्स मधुन. पुस्तकं नाहीचे, वही नाही, घरचा अभ्यास नाही. शाळेत वर्गात १५ मुलं आणि २ शिक्षिका. वर्गाचे आर्ट-सायन्स-सॅण्ड-वॉटर-टॉय-बुक-कॉम्प्युटर असे भाग केलेले आहेत. आणि मुलं गट करुन त्यात काही तरी शिकत असतात. पहिल्या दिवशी मुलाला सोडलं तेव्हा दोन गट करुन मुलं भिंगातुन दगडं बघत बसली होती. आणि शिक्षिका त्यांना प्रश्न विचारत होत्या की हात लावुन सांगा, रंग काय आहे सांगा इ. आधी मला वाटलं की हा निव्वळ टाईमपास असणारे. ह्यातून काही आपलं पोरगं फार शिकणार नाहीये. उगाच ४ तास खेळायला सोडल्यासारखं आहे. पण झालंय उलट. गेल्या ४-५ महिन्यात उलट तो फारच वेगवेगळ्या गोष्टी शिकलाय. ह्यात एबीसीडी वगैरे अजिबात नसून आपल्या आजुबाजुच्या वस्तुंचा, पदार्थांचा, घटनांचा आणि माणसांचा समावेश आहे. शाळेभोवती पडलेले दगड पासून ते डोनाल्ड ट्रंप पर्यंत बरंच काही. इथे माझ्यामधली आई गडबडली आहे. पुण्यात असताना माझा शाळेचा अनुभव काही विषेश नव्हता. रोज २-३ पानांचा लिखाणाचा अभ्यास असायचा, ज्याचं नाव काढलं की घरात भयानक रडापड सुरु व्हायची. इथे मात्र कोणताही अभ्यास न करता मुलगा जास्त शिकतोय असं का कोण जाणे वाटत रहातंय. एक जण तर म्हणते की पुढे जाऊन प्रेमात पडावं इतका चांगला अभ्यासक्रम असतो. मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं घर असावं असं काही वाटत नाही. मला उलट भारतात रहावं वाटतं. पण आता मुलाला पाहताना वाटतं की माझ्या संकुचित आकांक्षांपायी मी त्याचे अनुभव तर हिरावुन घेत नाहीये ना? माझे वडील मराठवाडा सोडुन पुण्यात आले म्हणुन आम्हाला आमच्या मावस-चुलत भावंडांपेक्षा काही गोष्टी जास्त मिळाल्या. आज मी मुलाला भारतातुन अमेरिकेत आणुन अजुन जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतेय. इथे मिळणारे अनुभव जास्त व्यापक असतील. समजणार्‍या गोष्टी अनेकविविध असतील. पुण्यातल्या शाळेत त्याच्या आजुबाजुला साधारण त्याच्याच सारखी मुलं होती. "माझ्या ग्रुपमध्ये मोहमद-मसाया-चार्ली आणि मी आहोत" हे वाक्य मला पुण्यात ऐकु येणं जरा अवघडच आहे. पण दुसर्‍या बाजुने असंही वाटतं की तो स्वतःच्या देशापासून , संस्कॄतीपासुन दूर आहे. हळूहळू त्याची ही ओढ मारली जाईल. आजी-आजोबा-काका-मावशी ही नाती जशी आमच्या आयुष्यात होती, त्याच्या असतील का? तिकडे त्याला कितीतरी भावंडं मिळतील.. इकडे फक्त मित्रच.. शिवाय भारतातही आता अमेरिकेच्या तोडीस तोड उपलब्धता आहे. वस्तु तर आपल्याकडे सगळ्या मिळतातच, पण सुविधाही हळूहळू येत आहेत. अमेरिकेतल्या सोयी आणि भारतातली संस्कॄती (मोठे कुटूंब, जवळपास भरपुर माणसे, त्यांचे येणे जाणे) असे दुहेरी फायदे पुण्यात राहुनही मिळु शकतात. मग अनुभवविश्व जरा सीमीत राहील, पण भावनिकदृष्ट्या तुम्ही जास्त सुरक्षित वातावरणात असाल. हा प्रश्न बराचसा वैयक्तिक आहे ह्याची मला कल्पना आहे. पण काही जणांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या वयाला असणार्‍या लिमिटेड व्हिजिबीलीटेने निर्णय घेतो. पण त्याहीपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे मुद्दे आयुष्यात असतात. किंवा काही काही गोष्टींचा आपण बाऊ करतो, ते तेवढं काही वर्षांनी महत्वाचं रहात नाही. त्यामूळे असे निर्णय घेताना जितके वेगवेगळे विचार ऐकु, दृष्टीकोन समजुन घेऊ, तितकं चांगलं. जशी इथे कर्जाबाबतीत बदललेल्या दॄष्टीकोनाची चर्चा झाली, तसंच आपला देश सोडणे, आपली संस्कॄती-पद्धती दुसर्‍या देशात रुजवणे किंवा नव्या पद्धती सामावुन घेणे ह्या बद्दलही मत बदलत चाललेले दिसते. आपल्या देशात राहुन काम करणे ही देशभक्तीची व्याख्यासुद्धा आता जरा शिथिल झालेली दिसते. परदेशात असणार्‍यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परदेशाची संधी नाकारुन भारताला निवडणार्‍यांनी.. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना ह्या महत्वाच्या निर्णयात बराच फायदा होऊ शकतो. किंवा किमान निर्णय घेताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा ह्याला तरी दिशा मिळु शकते.
वर्गीकरण
परदेश अनुभव

प्रतिक्रिया द्या
118041 वाचन

💬 प्रतिसाद (340)
स
सुबोध खरे Tue, 02/21/2017 - 14:43 नवीन
माझ्या पुतणीला आय आय एम कलकत्ता, इन्दोर, कोझिकोडे येथून बोलावणे आले. कारण तेथे १० १२ च्या गुणांना तितके जास्त महत्व दिले जात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पद्माक्षी गुरुवार, 02/23/2017 - 18:40 नवीन
जर IIM A आणि IIM B चा हा क्रायटेरिया असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी विचार असेल. पण फक्त या भारतीय संस्था आहेत म्हणून सरकटीकरण करणे नक्कीच पटले नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ट
ट्रेड मार्क Wed, 02/22/2017 - 20:19 नवीन
मोठ्या पदावर जे दिसतात ते बहुतांशी भारतातल्या IIM, IIT सारख्या संस्थेतून शिकलेले आणि/ किंवा अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेले असतात. इकडे शिकलं तर शैक्षणिक कर्ज, बाकी कर्ज यांचे मासिक हप्ते भरणे आणि हे जाऊन महिन्याचा खर्च भागवण्याइतका पगार मिळवणे आवश्यक आहे. १. अमेरीकेच्या नागरिकांना प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात नोकर्‍या उपलब्ध आहेत ? नोकऱ्या अगदी दुकानात काम करण्यापासून ते मोठ्या कंपनीतल्या उच्च पदापर्यंत सगळ्या आहेत. बॅंक्स, इन्शुरन्स, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, हॉस्पिटल्स, मार्केटिंग अँड सेल्स इतकेच काय आयटी मधेही बिझनेस साईडला जॉब्स आहेत. तसेच शिक्षक, पोलीस, सैन्य व इतर सामाजिक क्षेत्रात पण बऱ्याच संधी आहेत. २. जर स्वस्तात मनुष्यबळ हवे असेल तरी अमेरीकेत शिकलेल्यापेक्षा इतर देशातील मनुष्यबळाला प्राधान्य दिले जाईल काय? शेवटी कंपन्या त्यांचा फायदा बघतात त्यामुळे असं प्राधान्य दिलं जात आहेच म्हणूनच भारतीय व इतर देशीय इथे आहेत. भारतासारख्या देशातून आलेला ५-६ वर्ष अनुभव असलेला इंजिनिअर वर्षाला जितका पगार मिळवतो तितक्या पगारात अमेरिकन इंजिनिअर तयार होत नाही. कारण त्याचा शिक्षणावरच भरमसाठ खर्च झालेला असतो. सध्याच्या नियमाप्रमाणे (जो १९९८ साली बनवला) कमीत कमी $ ६०,००० आहे. ३. जर ट्रम्प ने स्थानिकांनाच रोजगार द्यायचे धोरण अवलंबले आणी पुढील राष्ट्राध्यक्षाने तेच धोरण कायम ठेवले तर आपण इथे ज्या स्पर्धेला घाबरतो तीच स्पर्धा उद्या तेथे निर्माण होईल काय? हे व्हायला बराच वेळ लागेल. मी अमेरिकेत जिथे जिथे काम केलंय तिथे जवळपास ५०-६०% तरी भारतीय व इतर आशियाई देशाचे लोक दिसले. जरी ट्रम्पने वा कोणीही हे सर्व जॉब अमेरिकनांना द्यायचे ठरवले तरी तेवढे अमेरिकन लोक तर उपलब्ध पाहिजेत. आता ब्लू कॉलर जॉब्स जे मेक्सिकन लोकांनी जास्त घेतलेत तिथे पण अमेरिकन पटकन शिरकाव करू शकतात पण कमी पगाराचा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
म
मनिमौ Tue, 02/21/2017 - 07:36 नवीन
प्रतिसाद खुप म्हणजे खुपच पटला.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/21/2017 - 10:33 नवीन
एकदा पाण्यात उतरल्यानंतर शरीराचा काही भाग तरी ओला होणारच. पाण्यात उतरल्यानंतर शरीराचा एक कणही ओला होऊन न देणे अशक्य आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही देशात वास्तव्यासाठी गेल्यानंतर तिथल्या संस्कृतीचा थोडा तरी परीणाम होणारच. परदेशात वास्तव्य करून स्वतःची किंवा स्वतःच्या देशाची मूळ संस्कृती पूर्णपणे जपून ठेवून परदेशी संस्कृतीचा वारा सुद्धा लागू न देणे पूर्णपणे अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 02/21/2017 - 15:32 नवीन
चर्चा कुठुन कुठे गेली आहे. मिपाच्या स्वभावाला अगदी साजेसं आहे हे. तेव्हा आश्चर्य सुद्धा वाटलं नाही. =)) काही काही लोक आवर्जुन माझ्या सगळ्या धाग्यांवर येतातच आणि धागा चालेल तोवर चर्चा वाचत असतात, त्यांचे नेहमीप्रमाणेच मनापासून आभार! लोकांनी फार सुंदर प्रतिसाद दिलेत. लोकांचे वेगवेगळे विचार वाचले की आपले विचार कोणत्यातरी पठडीत बांधलेले असतात, त्याच्या साखळ्या तुटल्या सारखं वाटतं. मला हा धागा काढताना हा एक यक्षप्रश्न आहे असं वाटतं होतं. धाग्याच्या १५०+ प्रतिसादानंतर असं वाटतंय की मी कुठेही राहिले तरी आयुष्यात फार काही बिघडणार नाही. पोराचीच मला फार चिंता लागुन राहिली होती. पण आपण आपल्या मुलांचे ट्र्स्टी आहोत वाली फेज यायला मला पुष्कळच वेळ लागणारे तेव्हा तो मुद्दा जरा बाजुला ठेवु. बाकी सगळे मुद्दे उन्नीस बीसच आहेत. सरते शेवटी हे एखाद्याच अत्यंत महत्वाच्या गोष्टीवर येऊन थांबेल आणि त्यावर निर्णय होईल असं मला वाटतं. आपला काटा भारताकडेच झुकलेला आहे. पण देखेंगे! जाता जाता.. मी कुठेही भारतातल्या प्रॉब्लेम्स कडे बोट दाखवलं असेल तर हे ठणकावुन सांगते की तसं करण्याचा मला इतर कोणत्याही भारतीया एवढाच हक्क आहे. उगाच मी अमेरिकेत आहे म्हणुन माझ्या भारताकडे बोट दाखवण्याला कुणी आक्षेप घेणार असेल तर त्याला फाट्यावरच मारण्यात येईल. तेव्हा तसला प्रयत्न करुन वेळ वाया घालवु नका.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 02/21/2017 - 17:00 नवीन
माझं वैयक्तीक मत असं आहे की माणसाचा निर्णय अगोदरच ठरलेला असतो (तुमच्याबद्द्ल नाही बोलत आहे, इन जनरल). फक्त त्या निर्णयाच्या समर्थनार्थ चर्चा घडली की मग मनाला बरे वाटते. शिवाय अशा चर्चा वाचून मत बदलणारे विरळाच. शेवटी तुम्ही अमेरीकेत राहा किंवा भारतात. आप भला तो जग भला हेच खरे ! त्यामुळे चिंता न करता कोठेही रहा. आजुबाजुला चार चांगली माणसे जोडा जी कधीही तुमच्या कामी येतील. पैसा ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे पण माणसे ऐनवेळी उपयोगी पडतातच. तेव्हा पुढील आयुष्यास शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Tue, 02/21/2017 - 17:07 नवीन
हे मात्र खरं बोल्लात की आप भला तो जग भला! :) धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
संजय क्षीरसागर Tue, 02/21/2017 - 20:03 नवीन
परदेस आणि भारत हे दोन संपूर्णपणे विभक्त विकल्प आहेत, काही तरी एकच निवडावं लागेल आणि निर्णय घेतांना सर्वप्रथम दोन्हीतली कंपॅरीजन सोडावी लागेल तरच निर्णयाचं सुख लाभेल. जे तिकडे गेले त्यांची भारताशी नाळ तुटते त्यामुळे तुलनात्मक निर्णय होऊ शकत नाही. वन हॅज टू जस्ट फरगेट इंडीया. हेच दि अदर वे आहे, माझे जे मित्र परत आलेत ते कधीही अमेरिकेची आणि भारताची तुलना कोणत्याही लेवलवर करत नाहीत. दे हॅव अ‍ॅक्सेप्टेड इंडीया अ‍ॅज इट इज. तुम्ही निर्णय आज घ्या की दहा वर्षानी, नो कंपॅरिजन हा एकमेव क्रायटेरीया कामी येईल. अनिर्णयाचं कारणंच कंपॅरिजन आहे !जेव्हा कंपॅरिजन थांबते तेव्हाच निर्णय होतो. तुम्हाला निर्णय घ्यायचा असला तर फक्त दोनच गोष्टी डोळ्यासमोर ठेवा : भारत / अमेरिका. इकडे काय मिळेल आणि तिकडे काय आहे असा विचार अनेक काऊंटरवेलींग उपविचारांना जन्म देतो. योग्य निर्णय हा नेहेमी लग्न करण्याच्या निर्णयासारखा असतो. जस्ट डिसाइड वन थींग अँड फर्गेट अबाऊट एवरी अदर थींग, दॅटस ऑल ! एकदा निर्णय झाला की पुन्हा फेरविचार नाही आणि मागे वळून बघणं नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ब
बॅटमॅन Wed, 02/22/2017 - 19:13 नवीन
पाऊस पडला माझ्यामुळं. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 02/23/2017 - 08:14 नवीन
दोनशे प्रतिसादात १७५६ विचार मांडले गेलेत आणि जेवढे विचार तेवढं कन्फ्युजन. म्हणून तर म्हटलंय `योग्य निर्णय हा नेहेमी लग्न करण्याच्या निर्णयासारखा असतो ! ' करु का नको, माझ्या स्वातंत्र्याचं काय, हीच्याशी केलं तर असं होईल, तिच्याशी केलं तर हे लफडं आहे, संगोपनाचं लचांडं कोण गळ्यात घेणार, डिवोर्स घ्यायचा तर पहिल्यापासनं काय खबरदारी घ्यावी, ....असले विचार, त्यातनं चुकूनमाकून कधी विचार पक्का झाला तर वय उलटून गेलेलं असतं, मग तर प्रकरण आणखीच अवघड होऊन बसतं आणि सगळ्याचा बाजा वाजलेला असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बाजीप्रभू Wed, 02/22/2017 - 15:22 नवीन
थांबा इतक्यात संपवू नका विषय.. अजून मी बाकी आहे. मात्र उद्या लिहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Wed, 02/22/2017 - 16:07 नवीन
=)) लिहा लिहा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/22/2017 - 17:53 नवीन
काळजी करू नका ! इतक्या लवकर या विषयावरचे घमासान थांबेल अशी लक्षणे नाहीत... बरेच मिपामावळे तुम्ही परतेपर्यंत खिंड लढवत ठेवतील याची खात्री बाळगा ! (हघ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू
स
समर्पक Tue, 02/21/2017 - 23:50 नवीन
चर्चा विषयावर बरीच मते येताना दिसत आहेत पण त्यातले नेमके हे उचलतोय उदाहरणासाठी... पुन्हा एकदा, ‘भारतीयत्व’ या विषयावर वैयक्तिक मते, पटावीत असा आग्रह नाही, पण विचारासाठी इथे मांडतो. "आता मुख्य विषय - संस्कृती - आपण आपल्या आई-वडिलाच्या वेळची संस्कृती पाळतो ? माझ्या आजोळी औदुंबराचं, वडाचं झाड होतं. तेव्हा आजोळी वेगळे उत्सव व्हायचे. माझ्या लहानपणी, आई-वडिलांकडे वेगळे उत्सव व्हायचे. त्यांनी आपल्या सोयीनुसार आमच्यावर संस्कार केले." उंबर नसेल कदाचित, पण आपल्या परसात किंवा जवळच्या पार्क मध्ये एखाद्या पॉपलर-मॅपल च्या वृक्षाशी असे नाते जोडायचा प्रयत्न केला आहे का? अगदी उंबरच हवा असा हट्ट धरून तो संस्कार हरविण्याचे कारण शोधावे की, चिलटांपासून घारींपर्यंत सर्वांना आश्रय देणारे जीवनसाखळीतील अनन्यसाधारण महत्व, वड-पिंपळ-उंबराला देवत्वाच्या जवळ ठेऊन जपण्याचा, निसर्गाशी नाते जोडण्याचा 'संस्कार' इथे देश-काळ परत्वे बदल करून जपण्याचा प्रयत्न करावा... (वरील प्रतिसादकर्त्यास हा प्रश्न नसून केवळ एक उदाहरण आहे) असा विचार बऱ्याच सणांचे बाबतीत व्हावा, एक उलट उदाहरण - ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका इ ठिकाणी भर उन्हाळ्यात तिळगुळ खाऊनच मकरसंक्रांत पौषात साजरी करणे हे अंधानुकरण आहे, त्याने ‘संस्कृती जपली’ असा विचार करणे कितपत योग्य आहे? निसर्गाशी नाते जोडत सामाजिक व अध्यात्मिक मिती लक्षात घेऊन सणांचे प्रयोजन आहे. कुटुंबाच्या परिघात आपले वर्तन प्रत्येक उत्सवामागचे कारण लक्षात घेत बदलत गेले तर पुढील पिढी 'सणाचे पटणारे स्पष्टीकरण नाही' म्हणून 'पाळायची इच्छा/आवड/गरज नाही' अशी नवीन पिढीची मानसिकता बदलेल. आणि ‘हा बदल आवश्यक आहे’, हि जागृती समाजात येण्यासाठी समाजाभिमुख असणे हे अनिवासी भारतीयांसाठी अत्यंत आवश्यक आहे. या विषयात एक क्रांती आवश्यक आहे आणि ती इथल्या पैलतीरावरूनच सुरु होणार आहे. कारण भारतात राहणारे ज्ञानी असले तरी कृतिहीन आहेत, आणि त्यांना दोष नाही, 'तुम्हाला गरज असेल तर परत या' असे म्हणून ते मोकळे होणार आहेत (थोडे सरसकटीकरण असले तरी विचार लक्षात घ्या). "समृद्धीसाठी स्थलांतर" हा मानवी स्वभाव आहे व गरजही, इतिहासही हेच सांगतो, परंतु ‘मूळ’ टिकवून ठेवण्याची इच्छा असेल तर प्रयत्न अनिवार्य आहेत. कसे ते आपण ठरवायचे... संस्कृती व दैववादाच्या संबंधाविषयी म्हणाल तर, व्रत-उत्सव-परंपरा इ. प्रतीके केवळ एक माध्यम आहेत. पण आज दुसरे प्रभावी माध्यम नसल्याने असलेल्याचा त्याग करणे योग्य होणार नाही. पण काही नवीन उत्सव जोपर्यंत 'तयार' केले जात नाही, किंवा असलेले सण अधिक डोळसपणे स्वीकारण्याची मनस्थिती तयार होत नाही, किंवा सण-उत्सवाशिवायही सामाजिक उत्साह व बांधिलकी व्यक्त होण्याची सवय लागत नाही तोपर्यंत पारंपरिक सण साजरे करायला काहीच हरकत नाही. सामाजिक बांधिलकीसाठी, ज्या नात्यांची कमी भरून काढायचीये त्यांची खोली वाढविण्यासाठी केवळ सहभाग नव्हे तर माझी हात जोडायलाहि अजिबात ना नाही... तो नमस्कार खूप कोरडा आहे याची जाणीव असली तरीही... परंतु अंध-आस्तिकतेला सतत पाण्यात पाहण्याची, मुर्खात काढण्याची, हट्टी-नास्तिकता मात्र दूर ठेवली पाहिजे. माझ्यासाठी मी अस्तिकतेचा वेगळा अर्थ बनवून घेतला आहे, पूर्वजांनी श्रद्धा-परंपरा बनवल्या कारण त्या काळी कदाचित तो सोपा मार्ग होता. आम्ही त्यात संशोधन (देश-काळ परत्वे बदल) करण्यात कमी पडलो आणि केवळ अंधानुकरण बळावले. निसर्गाशी व समाजाशी परस्पर आदरयुक्त वर्तन हे ज्या कशामुळे साधू शकते ते सर्व उत्सव त्या विचाराचे अधिष्ठान ठेऊन साजरे करण्यास काही हरकत नसावी, त्यात कोणी दैववाद पहिला तरी त्याला सकारात्मक कारणाशिवाय विरोध नको. शेवटी, संस्कृती केवळ उत्सवातूनच प्रकट होते का? तर नाही, पण परदेशात ते सामाजिक संपर्काचे एक भक्कम कारण असते त्यामुळे माझा त्यावर जास्त भर आहे. त्याशिवाय तुम्ही असे नातेसंबंध निर्माण करून जोपासू शकत असाल तर फारच उत्तम! शेवटी आदर, प्रेम, विश्वास व मर्यादा यांचे पिढीनुसार थोडे बदलणारे परंतु भारतीय म्हणून आपल्याला परिचित असणारे प्रकटीकरण हेच खरे तर बऱ्याच जणांना अपेक्षित असणारे 'संस्कार' या शब्दाचे स्पष्टीकरण असावे असे माझे मत. ते टिकले कि मग बाकीचं सगळं त्यात आपोआप येते. म्हंटले तर सोपे, म्हंटले तर महाकठीण... माझे प्रतिसाद मुख्य प्रश्नास, 'इथे राहावे कि तिथे' यास फारसे मदतशीर नाहीत. क्षमस्व. परंतु 'इथले' व 'तिथले' असण्याने फरक न पडणाऱ्या काही सामायिक समस्या आहेत त्यावर आहेत. तसेच नव्याने आकार घेत असलेल्या 'आधुनिक आणि वैश्विक भारतीयत्वाच्या' जडणघडणीत आपले प्रत्येकाचे योगदान व दायित्व कसे महत्वाचे आहे हे अधोरेखित करण्यासाठी आहेत. विचार पटावेत असा आग्रह नाही, पण हो, भारतात रहा अथवा बाहेर, 'भारतीय' रहा हा आग्रह नक्की!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 02/22/2017 - 16:06 नवीन
अत्यंत आवडलेला अजुन एक प्रतिसाद! वर वर सणवार करण्यापेक्षा मला त्यामागचा भाव जपायला जास्त आवडेल. प्रामाणिकपणे सांगायचं तर माझा मुलगा देवळात गेला नाही किंवा पुजेला बसला नाही तरी मला काहीच फरक पडत नाही. कारण मी स्वतः हेच प्रश्न विचारत मोठी झाले आणि ह्यातल्या कोणत्याही प्रथांशी फारसं ममत्व मला नाही. मला स्वतःला फक्त त्यातलं माणसांनी एकत्र येणं आवडतं. म्हणुनच की काय पण इथे मी केव्हा गणपती पाहिला तेव्हा ढोल ताशांच्या आवाजाने मी सेकंदात पुण्याशी जोडल्या गेले. मला दुसरी कोणतीही गोष्ट इतक्या चटकन घराची आठवण करुन देऊ शकली नाही. मी जेव्हा भारतीय संस्कृती हा शब्द वापरतेय तेव्हा तेव्हा तो खरं तर भारतीय लोकांच्या पद्धतींबाबत आहे. माझ्या घरात आजी-आजोबा होते. रहायला - शिकायला भावंड होती. सतत नातेवाईकांची रेलचेल असायची. मला स्वतःला ना आजी आजोबा वृद्धाश्रमात आवडतात ना मुलं पाळणाघरात. प्रत्येक पिढी मागच्या पिढीला सांभाळत जाते. पुढची पिढी हे पहात असते. थोड्या कटकटी झाल्या तरी मला नात्यातला तो आपलेपणा आवडतो. मला अगदी २५ माणसांच्या कुटूंबाची सवय नसली तरी मी न्युक्लिअर फॅमिली करुन फक्त नवरा आणि मुलगा ह्यांच्याच सोबत राहु शकत नाही. पुण्यात शेजार्‍यांचं घरंही आपलंच वाटायचं. अबीर खाली खेळायला गेला एकटा तरी काहीच चिंता नव्हती. पोरं त्याला बरोब्बर वर आणुन सोडायची. आणि कधी कुणी बोलुन दाखवलं नाही पण मी नवरा अमेरिकेत असताना काही महिने एकटीच अबीर सोबत रहात होते तर बाजुच्या वहिनी लक्ष ठेवुन असायच्या की मी व्यवस्थित आहे ना. एकमेकांच्या आयुष्यात लुडबुडत रहाणं हा आपला स्वभाव आहे. कधी कधी तो वैतागवाणा होऊ शकतो पण त्याच स्वभावामुळे आपण अनेक गोष्टींसाठी इतरांवर अवलंबुनही राहु शकतो. जेव्हा मी "भारतीयत्व" जपायचं म्हणते तेव्हा मला हे जपायचं असेल बहुदा. जगाच्या पाठीवर कुठेही रहायला मला अजिबात हरकत नाही जर माझ्या आजुबाजुला अशी माणसं असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समर्पक
म
मिसळ Wed, 02/22/2017 - 20:35 नवीन
ह्या चर्चेच्या निमित्ताने आलेले समर्पक यांचे समर्पक प्रतिसाद फार सुंदर विचार देऊन गेले. बाकी, बेहेती है..बेहेने दो.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे गुरुवार, 02/23/2017 - 07:08 नवीन
काय ठरलं म? जायचं का नाही परदेशात?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/23/2017 - 10:53 नवीन
"लग्न करणे" आणि "देश/परदेशात राहणे" यांची इथे तुलना चालली आहे म्हणून काही थोडेसे... लग्न हा बहुतांशी भावनिक निर्णय असतो आणि नोकरीचे/राहण्याचे ठिकाण हा पूर्णपणे काळ-वेळ-परिस्थिती लक्षात घेऊन करायचा भौतिक निर्णय असतो... त्यामुळे, त्या दोघांच्या निर्णयप्रक्रियेत जमीनअस्मानाचा फरक असतो... हे समजण्यात गफलत केली की मग घोळ सुरु होतो. माणसाने "आपले जीवन आनंदी करणे" हेच पक्के व अंतिम ध्येय ठेवावे (पक्षी : त्या विचाराशीच लग्न करावे) त्याच्याशी प्रतारणा किंवा त्याबाबतीत तडजोड करू नये. नोकरी-व्यवसायाचे ठिकाण, नोकरी व्यवसायाचे स्वरूप, इत्यादी इतर अनेक गोष्टी, ते पक्के अंतिम ध्येय साधण्यासाठी वापरायची साधने आहेत. साधने स्थळ-काळ-परिस्थितीनुसार बदलता येतात... 'तसे न करणे' व 'केवळ मी पूर्वी निर्णय घेतला होता म्हणून त्याच साधनांत भावनिक गुंतवणूक करून, दु:खी होत असतानाही, त्याच साधनांना हट्टाने चिकटून राहणे' योग्य होणार नाही. सर्वसाधारणपणे, या जगात कोणताही एक पर्याय १००% समाधानकारक/असमाधानकारक नसतो, तर आपल्या वैयक्तिक समाधानकारक/असमाधानकारक वर्णपटावर, एका काळसाठी, त्याचे कोठेतरी एक स्थान असते. आपल्या निर्णयाच्या वेळेस, आपल्या समाधानाच्या जास्तीत जास्त जवळ असलेल्या पर्यायाची (साधनाची) निवड करणे आपल्या हातात असते. स्थळ-काळ-परिस्थितीनुसार त्या निवडलेल्या पर्यायाची वर्णपटावरील जागा बदलते, तेव्हा आपल्या समाधानाच्या जास्तीत जवळ जास्त असलेला दुसरा पर्याय निर्माण झाल्यास त्यावेळेस त्याची निवड शहाणपणाची असेल. “The Only Thing That Is Constant Is Change ― Heraclitus" (या जगात, बदल ही एकच गोष्ट स्थायी आहे.) बदलणारा काळ-वेळ-परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला हवा असलेला परिणाम साधण्यासाठी साधने/प्रतिक्रिया बदलण्याची सजग निर्णयप्रक्रिया करण्याची क्षमता फक्त आणि फक्त सजीवांमध्ये असते... तर मग सर्वात जास्त विकसित व सर्वात जास्त विचार करण्याची क्षमता असलेल्या जीवाने (पक्षी : माणसाने) तसे न वागणे कसे योग्य होईल ? किंबहुना तसा बदल करण्याच्या माणसाच्या अतुलनिय क्षमतेमुळेच तो आज जगातला सर्वात प्रगत आणि प्रबळ प्राणी झाला आहे. या सगळ्या बरोबर हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की "आजच्या आनंदावर विरजण पडेल इतकी पण उद्याची काळजी करू नये." हे सहज सोपे नाही ! पण या जगात सहज सोप्या आणि तरीही उत्तम अश्या किती गोष्टी आहेत ?! जाता जाता अजून एक सुविचार... एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा. कारण, सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/23/2017 - 11:20 नवीन
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे... लोकांचा सल्ला घेण्यात काहीच चूक नाही. पण कोणा दोन माणसांचे विचार, आवड-निवड, ध्येये एकसारखे नसतात, त्यामुळे, ज्यांच्यावर आपल्या निर्णयाचा प्रभाव पडणार आहे आणि तो आपल्याला महत्वाचा वाटतो, असे सर्व सोडून इतरांच्या बाबतीत, "ऐकावे जनाचे, करावे मनाचे" हेच तत्व सर्वोत्तम असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
स्रुजा गुरुवार, 02/23/2017 - 14:33 नवीन
एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा. कारण, सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते.
वा वा, या धाग्यामध्ये काही मोजके विचार जपून ठेवावे असे आहेत. हा सर्वात पहिल्या क्रमावर येईल ! धन्यवाद म्हात्रे काका...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
च
चतुरंग गुरुवार, 02/23/2017 - 14:45 नवीन
एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा. कारण, सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते.
डॉ. म्हात्रे, तुमच्या अनुभवाचे सार या एका वाक्यात आमच्यापर्यंत पोचवलेत. थँक्यू!! __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अर्धवटराव गुरुवार, 02/23/2017 - 14:59 नवीन
आमच्यासारख्यांना कळेल असं काहि टंकल्याबद्दल धन्यवाद :) विचार हि एक अद्भूत शक्ती मानवाला मिळाली आहे. सोचनेसे परहेज नहि करना चाहिये. अवीचारी तडकाफडकी निर्णय घेण्यातल्या तत्कालीन सुखापेक्षा सारासार विचार करतान होणारं कन्फ्युजनचं दु:ख कधिही चांगलं... लाँगटर्ममधे ते फायद्याचं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पिलीयन रायडर गुरुवार, 02/23/2017 - 15:34 नवीन
एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा. कारण, सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते.
क्या बात है काका!!!! धागा काढल्याचं सार्थक झालं. हेच्च मला हवं होतं. आज मला काही गोष्टींची व्हिजिबिलिटीच नाहीये. जे लोक माझ्या पुढे गेलेत त्यांनी आम्हाला सांगावं की तुमचा अनुभव काय होता? जियो काका! जियो! (हे मी चेपुवर टाकणारे हो.. आधीच सांगते!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
उ
उपाशी बोका गुरुवार, 02/23/2017 - 15:50 नवीन
एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा. कारण, सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते.
+१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 02/23/2017 - 16:02 नवीन
कायम लक्षात ठेवावे असे विचार - "आजच्या आनंदावर विरजण पडेल इतकी पण उद्याची काळजी करू नये." हे सहज सोपे नाही ! पण या जगात सहज सोप्या आणि तरीही उत्तम अश्या किती गोष्टी आहेत ?! एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा. कारण, सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
र
राजाभाऊ गुरुवार, 02/23/2017 - 17:05 नवीन
>>एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा.<< लोचा तिथेच तर आहे, लेखीकेच्या संदर्भात. भारत/अमेरिका यात वैध कोण आणि अवैध कोण हेच ठरत नाहि आहे त्यांचं, म्हणुनंच ना हा सगळा लेखप्रपंच?.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पिलीयन रायडर गुरुवार, 02/23/2017 - 17:26 नवीन
भारत आणि अमेरिका दोन्ही वैधच आहेत हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाऊ
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/23/2017 - 18:03 नवीन
वैध = कायदेशीर ! :) भारतिय नागरिकाने भारतिय कायदे पाळून भारतात राहणे जितके वैध आहे; तितकेच त्याने भारत व इतर एखाद्या देशाच्या सर्व कायदेशीर तरतूदी पाळून, व्हिसा काढून, तेथे जाणे/राहणे/नोकरी करणे/स्थायीक होणे वैध असते. यामध्ये, एखाद्याने वैयक्तिक निर्णय घेण्यासारखे काही नसते... केवळ सद्य कायदे पाळून कृती करणे अपेक्षित असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाऊ
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 02/23/2017 - 18:03 नवीन
कारण तो तीन ठिकाणी चुकलेला आहे . एखादी आवडणारी वैध गोष्ट करावी की नाही असा संभ्रम मनात असेल... तर ती करा. कारण, सर्वसाधारण अनुभव असे सांगतो की, आयुष्याच्या शेवटी आपल्याला आपल्या अपयशांपेक्षा जास्त आपण गमावलेल्या संधींची खंत वाटते. वैध गोष्टींचीच चर्चा चालू आहे तस्मात पहिल्या वाक्याला अर्थ नाही. संधी गमावली असं वाटणं हे निवडलेला पर्याय आनंद देत नाही याचं लक्षण आहे आणि फायनली, खंत वाटणं हे स्वतःला स्वतःच्याच निर्णयामुळे हतबल झालो असं समजल्यामुळे होतं. "लग्न करणे" आणि "देश/परदेशात राहणे" यांची इथे तुलना चालली आहे म्हणून काही थोडेसे... त्यामुळे, त्या दोघांच्या निर्णयप्रक्रियेत जमीनअस्मानाचा फरक असतो... हे समजण्यात गफलत केली की मग घोळ सुरु होतो. अजिबात नाही. मी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेविषयी बोलतोयं आणि लग्नाचा निर्णय हे निर्णयप्रक्रियेतल एक उत्तम उदाहरण म्हणून दिलंय. माझं म्हणणं असंय की पोस्टवर आलेले सत्राशे पन्नास विचार डोक्यात असल्यावर निर्णय असंभव आहे, मग ते विचार कितीही उच्च असोत. प्रत्येक योग्य निर्णय हा विचार प्रक्रिया संपूर्णपणे थांबल्यावरच होतो. मनाच्या तौलनिक अवस्थेत घेतलेला निर्णय म्हणजे मनाच्याच एका बाजूला दाबून, दुसरी वरचढ झालेली असते. दाबलेली बाजू केव्हाही वरचढ होऊ शकते. आणि मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे संधी गमावल्याची खंत वाटते. The Only Thing That Is Constant Is Change ― Heraclitus यात हेराक्लीटस काही विशेष सांगत नाही. परिस्थिती बदलते म्हणूनच मनाला आधीचा निर्णय अयोग्य होता, संधी गमावली वगैरे सुनवायचा चान्स मिळतो. पण बदललेल्या परिस्थितीत फेरनिर्णय घेण्याची स्थिती आली तरी पुन्हा निर्णय प्रक्रिया सेमच असते ! म्हणजे त्यावेळी चालू असलेल्या सत्राशे पन्नास विचारांचा कोलाहल थांबल्याशिवाय योग्य निर्णय होत नाही. थोडक्यात, तुम्ही निर्णय कशाविषयी घेता हे कायम गौण आहे, तो कसा घेता ते महत्त्वाचंय. मनानं निर्माण केलेले सर्व विकल्प एकदाच निरखून, मनाला संपूर्णपणे बाजूला करुन, जो स्वतःच्या हंचला योग्य वाटतो तो तत्कालीक निर्णय कायम समाधान देतो कारण तो तुम्ही स्वतःच्या जवाबदारीनं घेतलेला असतो. त्या निर्णयाबद्दल मन खंत निर्माण करुच शकत नाही कारण मनाचा (थोडक्यात डेटाचा) उपयोग करुन तुम्ही स्वतःच्या समग्रतेनं तो घेतलेला असतो. परिस्थितीनुरुप फेरनिर्णय करावा लागला तरी तुम्हाला खंत वगैरे वाटत नाही कारण घडून गेलेल्या गोष्टींचा उहापोह केवळ कालापव्यय आहे याची तुम्हाला कल्पना असते. तस्मात, नव्या परिस्थितीत तुम्ही मनानं दिलेला नवा डेटा व्हेट करता आणि मग मनाला बाजूला सारुन पुन्हा स्वतःच्या अंतःप्रेरणेनं निर्णय घेता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/23/2017 - 18:42 नवीन
हेराक्लीटस सुद्धा तुमच्यासाठी काही वेगळे सांगू शकत नाही, तर मग माझी पामराची काय पत्रास ! :) ;) तुमचा प्रत्येक निर्णय नेहमीच अचल, सार्वकालीक आणि बरोबरसुद्धा असतो असे तुम्ही आतापर्यंतच्या अनेक लेख व प्रतिसादांतून पुरेपूर सिद्ध केलेले आहेच ! तेव्हा माझा वरचा प्रतिसाद तुम्हाला लागू होत नाही. मी व इथले अनेक जण मर्त्य मानवच आहेत आणि नेहमीच अचल, सार्वकालीक आणि बरोबर असलेले निर्णय घेऊ शकत नाहीत असा माझा समज आहे. माझा प्रतिसाद केवळ अश्या लोकांसाठीच होता. मी तर माझे जागा/देश/व्यवसाय याबद्दलचे अनेक निर्णय बदलत्या परिस्थितीप्रमाणे अनेकदा बदलेले आहेत. मोठ्या कालांतराने काय परिस्थिती/पर्याय/संधी निर्माण होतील याचे ज्ञान आजच होण्याइतका प्रगल्भ भविष्यवेत्ता मी नाही. तसेच, परिस्थितीत झालेल्या बदलाने पूर्वीचा निर्णय काही कालाने मला समाधानकारक वाटला नाही किंवा अगदी एखादा निर्णय चुकला असे ध्यानात आले तर ते स्विकारायला मला काहीच कमीपणा वाटत नाही. किंबहुना, ते सत्य न स्विकारून हट्टीपणे अचल राहण्यात काहीतरी मोठा घोळ आहे असे माझे मत आहे. त्यामुळे, परिस्थितीतील बदलांवर लक्ष ठेऊन, त्याप्रमाणे विचार करून, मी माझे जागा/देश/व्यवसायाचे पर्याय अनेकदा बदलले आहेत आणि तसे केल्याबद्दल मी समाधानीही आहे. वर म्हटल्याप्रमाणेच... बदलणारी काळ-स्थळ-परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला हवा असलेला परिणाम साधण्यासाठी साधने/प्रतिक्रिया बदलण्याची सजग निर्णयप्रक्रिया करण्याची क्षमता फक्त आणि फक्त सजीवांमध्ये असते... तर मग सर्वात जास्त विकसित व सर्वात जास्त विचार करण्याची क्षमता असलेल्या जीवाने (पक्षी : माणसाने) तसे न वागणे कसे योग्य होईल ? किंबहुना तसा बदल करण्याच्या माणसाच्या अतुलनिय क्षमतेमुळेच तो आज जगातला सर्वात प्रगत आणि प्रबळ प्राणी झाला आहे. ...हे एक सबळ शास्त्रीय सत्य आहे आणि त्यावर माझा अचल विश्वास आहे ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/23/2017 - 19:01 नवीन
उगाचच आपली, एक धोक्याची सूचना... "एखाद्या रुग्णामध्ये सुरू केलेले औषध अपेक्षित परिणाम साधत नाही" किंवा "नवीन तपासणींच्या आधारावर जुने औषध बदलून नवीन औषध सुरू केल्यास अपेक्षित किंवा त्यापेक्षा जास्त चांगला परिणाम साधला जाईल" किंवा "नवीन संशोधनामुळे पूर्वीपेक्षा जास्त परिणामकारक औषध आता उपलब्ध झाले आहे" ...असे नजरेस येऊनही, "पूर्वी चालू केलेलेच औषध कायमस्वरूपी चालू ठेवेन" असा (दुर्)आग्रह धोकादायक असतो, असे (सकारण) म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संजय क्षीरसागर Fri, 02/24/2017 - 06:29 नवीन
मुळात निर्णय कसा घ्यायचा हा प्रश्न आहे. आणि माझं साधं म्हणणं आहे की जोपर्यंत मनाचा उपयोग कंप्युटरसारखा करुन, निर्णय घेण्यापूर्वी तो कंप्लीटली शटडाऊन केल्याशिवाय (वैचारिक प्रक्रिया पूर्णपणे थांबल्याशिवाय), योग्य निर्णय होऊ शकत नाही. हा निर्णय आपण अंतःप्रेरणेनं (हंच) घेतलेला असतो. या निर्णयाला प्रोस आणि कॉन्स नसतात. तो बहुमतानं घेतलेला निर्णय नसून एकमतानं घेतलेला निर्णय असतो. या निर्णयाची कारणमिमांसा होत नाही त्यामुळे मन हुकलेली संधी, खंत असे विषयच काढू शकत नाही. असा निर्णय कायम आनंददायी असतो कारण तो तुम्ही घेतलेला असतो आणि त्याची जवाबदारी पेलायला तुम्ही राजी असता. भविष्यात नव्या परिस्थितीनुसार फेरनिर्णय करावा लागला तरी तुम्ही कोणतीही खंत करत बसत नाही कारण परिस्थितीबदलामुळे तो घ्यावा लागतो आहे याची तुम्हाला जाणीव असते. पहिला निर्णय साफ चुकला तरी अंतःप्रेरणेनं निर्णय घेणारा खंत करत नाही कारण घडलेल्या घटनेची उस्तवार करण्यात फक्त वर्तमानात कालापव्यय होते याची त्याला पूर्ण कल्पना असते. तो नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स पुन्हा वेट करतो, मग मनाकडे दुर्लक्ष करतो आणि पुन्हा नवा निर्णय घेतो ! पूर्वी चालू केलेलेच औषध कायमस्वरूपी चालू ठेवेन" असा (दुर्)आग्रह धोकादायक असतो, असे (सकारण) म्हणतात. हे विधान, वरचा प्रतिसाद वाचल्यावर गैरलागू आहे असं लक्षात येईल. आणि सगळी चर्चा मूळ निर्णयावर चालू आहे, फेरनिर्णयावर नाही हे देखिल कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 02/24/2017 - 18:03 नवीन
मला अध्यात्मात गती नाही. तेव्हा तुमचा प्रतिसाद तुमच्या वैयक्तिक अध्यात्मिक विचारावर आधारीत असल्यास माझा पास समजा. तो आधुनिक शास्त्रांवर आधारीत असला तर मात्र माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ****** आणि माझं साधं म्हणणं आहे की जोपर्यंत मनाचा उपयोग कंप्युटरसारखा करुन, निर्णय घेण्यापूर्वी तो कंप्लीटली शटडाऊन केल्याशिवाय (वैचारिक प्रक्रिया पूर्णपणे थांबल्याशिवाय), योग्य निर्णय होऊ शकत नाही. हे "मनाचा कंप्युटरसारखा उपयोग करणे" पण तो "कंप्लीटली शटडाऊन करून मगच त्याचा वापर करणे" (!!!) आणि "वैचारिक प्रक्रिया पूर्णपणे थांबवून निर्णय घेणे"... हे तुमच्याविना इतर कोणाला कळले असेल तर त्यांनी मलाही जरा समजावून सांगावे अशी कळकळीची विनंती आहे. ****** "हा निर्णय आपण अंतःप्रेरणेनं (हंच) घेतलेला असतो. या निर्णयाला प्रोस आणि कॉन्स नसतात." ???!!! याला साध्या मराठीत "अशास्त्रीय निर्णयप्रक्रिया" म्हणतात. प्रत्येक गोष्टीचे "प्रोस आणि कॉन्स" पडताळून त्यांचा तर्कशास्त्राच्या पायावर विचार करून निर्णय घ्यावा, अशी सर्वमान्य शास्त्रिय पद्धत आहे. अश्या निर्णयप्रक्रियेत अंतप्रेरणा (हंच) ही एक इनपुट असू शकते, पण केवळ एकमेव इनपुट नसते, त्या हंचला आधार देणारे काहीतरी पुरावे असावे, असा शास्त्रिय दंडक आहे. विनापुरावा हंचला फारतर "unknown-unknown factor" असे समजून त्याच्यासाठी धोकप्रबंधक उपायांचा ('रिस्क मॅनेजमेंट' उर्फ तसे घडलेच तर, त्यापासून होणारा धोका टाळणार्‍या आणि/किंवा त्या परिस्थितीचा फायदा घेणार्‍या उपायांचा) विचार करून ठेवावा असे समजतात. ****** तो नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स पुन्हा वेट करतो, मग मनाकडे दुर्लक्ष करतो आणि पुन्हा नवा निर्णय घेतो ! १. एकदा निर्णय घेतल्यावर इतर सगळे विसरून त्या निर्णयाप्रमाणेच पुढे चालावे असे तुम्हीच म्हटले आहे. मग, "नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स पुन्हा वेट करतो" हे आपल्या सतत सजगपणे निरिक्षण न करता कसे साधेल बरे ?! २. नवीन निर्णय घेताना "कंप्लीटली शटडाऊन केलेल्या मनाच्या कंप्युटरमध्ये" हे नवीन फॅक्टर्स कसे इनपुट करणार ? ३. तुम्हीच म्हणता की "निर्णयाला प्रोस आणि कॉन्स नसतात" आणि त्याबरोबरच म्हणताहात की "नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स पुन्हा वेट करतो" ! "नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स" उर्फ "प्रोस आणि कॉन्स" निर्णयावर परिणाम करणार नसतील तर मग जुना निर्णय तसाच जगाच्या अंतापर्यंत किंवा निर्णय घेणार्‍या माणसाच्या अंतापर्यंत, जे पहिले होईल तोपर्यंत, स्थिर रहायला हवा नाही का ?! ****** असो. तुमची आणि माझी वैचारीक पद्धती वेगळी आहे हे पुरेसे सिद्ध झाले आहेच. तुम्हाला तुमची विचारपरंपरा कायम ठेवण्याचा लोकशाही हक्क आहेच ! मात्र, एकमेकाला समांतर जाण्यार्‍या व एकमेकाला कधीच न भेटणार्‍या स्तरांवर चर्चा चालू ठेवण्यात काही हशिल आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 02/24/2017 - 18:08 नवीन
"लग्न आणि देशाची निवड" याबाबतच्या निर्णयांची तुलना योग्य नाही असे मी (माझ्या कारणांसह) म्हटल्याने तुम्हाला बहुतेक राग आला आहे असे दिसते आहे. पण त्याबाबत माझे मत माझ्याकडे आणि तुमचे तुमच्याकडे ठेवून "लेट अस अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री" आणि धाग्याचे काश्मीर करण्याचे टाळूया, काय म्हणता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संजय क्षीरसागर Fri, 02/24/2017 - 19:21 नवीन
मला अध्यात्मात गती नाही. तेव्हा तुमचा प्रतिसाद तुमच्या वैयक्तिक अध्यात्मिक विचारावर आधारीत असल्यास माझा पास समजा. मग हा प्रतिसाद जरी तुमच्या प्रतिसादाला लिंक केला असला तरी तो तुमच्यासाठी नाही असं समजा. (यात कोणताही उपहास नाही, कृपया गैरसमज करुन घेऊ नका.) हे तुमच्याविना इतर कोणाला कळले असेल तर त्यांनी मलाही जरा समजावून सांगावे अशी कळकळीची विनंती आहे. डोक्यात अनंत विचार असतांना घेतलेला निर्णय (प्रोस अँड कॉन्स अ‍ॅनालिसिस) नेहमी द्वंद्वातून निर्माण झालेला असतो. अंतःप्रेरणेनं निर्णय घ्यायला ध्यानप्रक्रिया (मेडिटेशन) समजावून घ्यावी लागेल. तो प्रयत्न मी मनावरच्या लेखमालेतून करत होतो (रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा) पण अशा विषयांसाठी हा फोरम नाही हे लक्षात आल्यावर लिहीणं बंद केलं. तरीही मूळ मुद्दा उरतोच : मानसिकप्रक्रिया थांबल्याशिवाय एकात्म निर्णय होत नाही. त्यामुळे सोडून दिलेल्या विकल्पांच्या बाबतीत संधी हुकली आणि खंत वाटली हे प्रश्न निर्माण होतात. अश्या निर्णयप्रक्रियेत अंतप्रेरणा (हंच) ही एक इनपुट असू शकते हंच हा कधीही इनपुट नसतो. तो मनाच्या स्टँड स्टील पोझिशनमधे अस्तित्वानं दिलेला कौल असतो. नव्या क्षणात बदललेले फॅक्टर्स" उर्फ "प्रोस आणि कॉन्स" निर्णयावर परिणाम करणार नसतील तर मग जुना निर्णय तसाच जगाच्या अंतापर्यंत किंवा निर्णय घेणार्‍या माणसाच्या अंतापर्यंत, जे पहिले होईल तोपर्यंत, स्थिर रहायला हवा नाही का ?! जीवन कॅलिडोस्कोपिक आहे त्यामुळे फॅक्टर्स बदलत राहाणारच. ते पूर्वी घेतलेल्या निर्णयावर सुद्धा परिणाम करु शकतात. जगाच्या अंतापर्यंत टिकणारा निर्णय हा विपर्यास आहे. फेरनिर्णयाच्या वेळी सुद्धा त्या समयी असलेले फॅक्टर्स व्हेट करुन पुन्हा अंतःप्रेरणेनं निर्णय घ्यायला काहीच अडचण नसते. लग्न आणि देशाची निवड" याबाबतच्या निर्णयांची तुलना योग्य नाही असे मी (माझ्या कारणांसह) म्हटल्याने तुम्हाला बहुतेक राग आला आहे असे दिसते आहे. लग्न काय, देशाची निवड काय, की दोन बॉल आणि आठ रन्स या सिचुएशनमधे बोलरला पडलेला पेच काय, मूळ प्रश्न `संभ्रमात निर्णय कसा घ्यावा' हा आहे. आणि त्याला हंच हे एकमेव उत्तर आहे ! लेट अस अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री" आणि धाग्याचे काश्मीर करण्याचे टाळूया, काय म्हणता ? पहिला भाग कायम मान्य आहे कारण हंच काय असतो याची तुम्हाला कल्पना दिसत नाही आणि मानसिक उहापोहातून निर्णय घेण्याची प्रक्रिया मी केव्हाच सोडून दिली आहे. बाकी धाग्याचं काश्मिर वगैरे करण्याचा माझा उद्देश कधीही नसतो, फक्त माझा प्रतिसाद दुनियेपेक्षा वेगळा असतो हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संदीप डांगे Fri, 02/24/2017 - 19:45 नवीन
तुमचे म्हणणे पटते, कारण जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा तो आपण इम्पल्सिव घेतलेला असतो. कितीही वाटले की आपण सगळा विचार, प्रोसेस, प्रोज-कॉन बघून घेतला आहे तरी तो इम्पल्सिव असतो.. मूळात मन एकिकडे झुकलेलं असतं त्यासंदर्भातले प्रोज आणि जिकडे विरोधी आहे तिकडचे कॉन्स जास्त गोळा करतं... त्यामुळे अगदी दहा वर्षं विचार केला तरी ज्या क्षणी निर्णय होतो तो इम्पल्सिव डिसिजन असतो... वरील विधाना ला अनेक मर्यादा आहेत. जसे की वाईट की चांगली, अयोग्य की योग्य, वैध की अवैध, लाभकारक की नुकसानकारक असे दोन पर्याय असतात तेव्हा हा निर्णय इम्पल्सिव नसतो, तो ऑब्वियस असतो. पण जिथे तुल्यबळ पर्याय असतात किंवा पर्यायच नसतात तिथे इम्पल्सिव डिसिजन घेतला जातो.. अनेकांना हे पटणार नाही पण विचार करुन बघा... आयुष्यात आपण आजवर घेतलेले निर्णय तसेच्या तसे यशस्वी झालेले आहेत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Fri, 02/24/2017 - 20:10 नवीन
जिथे तुल्यबळ पर्याय असतात किंवा पर्यायच नसतात तिथे इम्पल्सिव डिसिजन घेतला जातो.. सांप्रत चर्चा ही पहिल्या सिच्युएशन मधे मोडते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सतिश गावडे Fri, 02/24/2017 - 18:46 नवीन
जो भविष्याचा विचार करतो तोच संभाव्य धोके विचारात घेतो. त्यालाच धोका नियोजनाची गरज भासते. जो या क्षणी, वर्तमानात जगत असतो तो धोक्यांचा विचार करत नाही. तो आताचा क्षण बे० आणि स्व० पणे जगत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संजय क्षीरसागर Fri, 02/24/2017 - 19:30 नवीन
प्रतिसाद योग्य आहे ! वर्तमान कायम बिनधोक आहे कारण तो काल किंवा घटनेनं विस्कळीत होत नाही. अर्थात, हा `वर्तमान' काय आहे ते कळल्याशिवाय प्राप्त परिस्थितीची बेशर्त स्वीकृती करत स्वच्छंद जगणं शक्य नाही हे सुद्धा तितकंच खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अर्धवटराव Fri, 02/24/2017 - 20:29 नवीन
हे सगळं चर्वीतचर्वण "शांत चित्ताने निर्णय घेणे/थंड डोक्याने विचार करुन निर्णय घेणे" याबद्दल सुरु आहे काय? तसं असेल तर हा कॉमनसेन्सचा भाग झाला. तुमच्यासारखच यात आध्यात्म वगैरे कुठुन आलं हे मलाही कळत नाहि ;). शांत चित्ताने / थंड डोक्याने निर्णय हे संपूर्ण मनाचं कार्य आहे. त्यामुळे मनाला शटडाऊन करणे / मनाला इग्नोर करणे /अस्तीत्वाने इंपल्स देणे वगैरे भानगडी कुठुन आल्या हा परत एक प्रश्न उरतोच. सहज सोप्या मानकीक थेअरींना आध्यात्माचा बुरखा का पांघरला जातो कोण जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संजय क्षीरसागर Sat, 02/25/2017 - 04:31 नवीन
शांत चित्ताने / थंड डोक्याने निर्णय हे संपूर्ण मनाचं कार्य आहे. मन शट डाऊन होणं म्हणजे शांतचित्त ! ते मनाचं कार्य नाही. मनाला शटडाऊन करणे / मनाला इग्नोर करणे /अस्तीत्वाने इंपल्स देणे वगैरे भानगडी कुठुन आल्या हा परत एक प्रश्न उरतोच. मन शट डाऊन झाल्याशिवाय अंतःप्रेरणा जागृत होत नाही. सहज सोप्या मानकीक थेअरींना आध्यात्माचा बुरखा का पांघरला जातो कोण जाणे. अध्यात्म हा बुरखा आहे ? ती मनाच्या पार जाण्याची प्रक्रिया आहे. फंडातच गोंधळ आहे त्यामुळे प्रतिसाद पार हुकला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Sat, 02/25/2017 - 08:33 नवीन
मन शट डाऊन होणं म्हणजे शांतचित्त ! ते मनाचं कार्य नाही.
विचारांचं काहुर थांबणं म्हणजे शांतचित्त. ते मनाचच कार्य आहे.
मन शट डाऊन झाल्याशिवाय अंतःप्रेरणा जागृत होत नाही.
विचारांच्या आवर्तनांखाली मनाची धीर-गंभीर अवस्था आपलं कार्य करत असते. विचार थांबले कि त्या अवस्थेतुन आपला निर्णय बाहेर पडतो. त्यालाच अंतःप्रेरणा म्हणतात. अंतःप्रेरणेचं उगमस्थान मनच आहे, तिचं प्रगटीकरण मनातच होत असतं. ति कुठुन आकाशातुन मनात उतरत नाहि. जागृत विचारांच्यामार्फत तिच्यापर्यंत पोचता येत नाहि म्हणुन त्यात गुढ वाटतं. पण तो एक साधा सरळ फिनॉमीनॉन आहे.
अध्यात्म हा बुरखा आहे
"मानसीक थेअरींना आध्यात्माचा बुरखा पांघरणे" असं म्हणणे आणि "आध्यात्म हा बुरखा आहे" असं म्हणणं यात मुलभूत फरक आहे. तो तुम्हाला खरच कळला नाहि का? साधं मराठीत लिहीलं आहे.
ती मनाच्या पार जाण्याची प्रक्रिया आहे.
सदर चर्चेत याबद्दल नो कमेण्ट्स.
फंडातच गोंधळ आहे त्यामुळे प्रतिसाद पार हुकला आहे.
तुम्हाला तसं वाटणं सहाजीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sat, 02/25/2017 - 09:05 नवीन
विचारांचं काहुर थांबणं म्हणजे शांतचित्त. ते मनाचच कार्य आहे. विचार मनाव्यतिरिक्त कुठे असतात ? जर विचार थांबले तर मन कुठे असतं? अंतःप्रेरणेचं उगमस्थान मनच आहे, तिचं प्रगटीकरण मनातच होत असतं. ति कुठुन आकाशातुन मनात उतरत नाहि. जागृत विचारांच्यामार्फत तिच्यापर्यंत पोचता येत नाहि म्हणुन त्यात गुढ वाटतं. अंतःप्रेरणा मेंदूत प्रकट होत असली तरी ती मनाच्या शून्य अवस्थेशिवाय प्रकट होत नाही. ही अंतःप्रेरणा एक गूढ आहे. तीचा उगम शोधता येत नाही. मेंदूत ती फक्त प्रकट होते. जागृत विचारांच्यामार्फत तिच्यापर्यंत पोचता येत नाहि म्हणुन त्यात गुढ वाटतं. पण तो एक साधा सरळ फिनॉमीनॉन आहे. मागच्या प्रतिसादात तुम्ही असा ज्योक मारला होता शांत चित्ताने / थंड डोक्याने निर्णय हे संपूर्ण मनाचं कार्य आहे ! आता म्हणतायं जागृत विचारांच्यामार्फत तिच्यापर्यंत पोचता येत नाहि म्हणुन त्यात गुढ वाटतं. म्हणजे तुम्ही मनाच्या सुप्त अवस्थेत (झोपेत) स्वेच्छेनं विचार करु शकता का ? झोपेत जागृत होत असलेल्या मनाच्या प्रेरणेला स्वप्न म्हणतात. जागृत अवस्थेत आणि मनाच्या स्टँड स्टील पोझिशनमधे आपल्याला जी उमगते ती अंतःप्रेरणा असते. मानसीक थेअरींना आध्यात्माचा बुरखा पांघरणे...ती मनाच्या पार जाण्याची प्रक्रिया आहे.... सदर चर्चेत याबद्दल नो कमेण्ट्स. अंतःप्रेरणा ही `मानसिक थिअरी' आहे असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे कारण ती नक्की काय आहे याची तुम्हाला कल्पना दिसत नाही. शिवाय ध्यान ही अध्यात्मिक क्रिया मनाचा आवेग थांबवू शकते याचीही तुम्हाला माहिती दिसत नाही. फंडातच गोंधळ आहे त्यामुळे प्रतिसाद पार हुकला आहे. अर्थात ! या प्रतिसादाला दिलेल्या उत्तरावरुन सुद्धा जर ते तुमच्या लक्षात येत नसेल तर माझा नाईलाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Sat, 02/25/2017 - 18:08 नवीन
विचार मनाव्यतिरिक्त कुठे असतात ? जर विचार थांबले तर मन कुठे असतं?
विचार मनाव्यतिरीक्त कुठेच नसतात. विचार थांबल्यानंतर मन पुर्वी जिथे होतं तिथेच असतं. ते कुठे जात-येत नाहि. तुम्हाला विचार आणि मन यातला फरक कळत नाहि किंव विचार म्हणाजेच मन अशी तुमची धारणा आहे. अर्थात, ति चुकीची आहे.
अंतःप्रेरणा मेंदूत प्रकट होत असली तरी ती मनाच्या शून्य अवस्थेशिवाय प्रकट होत नाही. ही अंतःप्रेरणा एक गूढ आहे. तीचा उगम शोधता येत नाही. मेंदूत ती फक्त प्रकट होते.
शरीरशास्त्र दृष्टीने अंतःप्रेरणा, विचार, भावना.. सर्व काहि मेंदुतच तयार होतात. सदर चर्चा मानसशास्त्राच्या दृष्टीने चालली आहे. पण "विचार" मनात तयार होतात आणि "अंतःप्रेरणा" मेंदुत तयार होते असा काहि तुमचा गोंधळ झालेला दिसतोय. असो.
अंतःप्रेरणा ही `मानसिक थिअरी' आहे असं तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे कारण ती नक्की काय आहे याची तुम्हाला कल्पना दिसत नाही.
बघा ना. तुमच्या व्यतिरीक्त कोणाला अंतःप्रेरणेचा अनुभव येणं शक्यच नाहि. आणि अंतःप्रेरणेसंबंधी कुणी काहि अभ्यास केला असण्याचाही संभव नाहि.
शिवाय ध्यान ही अध्यात्मिक क्रिया मनाचा आवेग थांबवू शकते याचीही तुम्हाला माहिती दिसत नाही.
तुमच्याशिवाय कोणाला अध्यात्मीक माहिती असणं शक्य तरी आहे काय ?
अर्थात ! या प्रतिसादाला दिलेल्या उत्तरावरुन सुद्धा जर ते तुमच्या लक्षात येत नसेल तर माझा नाईलाज आहे.
मानसशास्त्राला तुम्ही आध्यात्म म्हणुन कवटाळुन बसला आहात. त्याला तुमचा आणि इतर सर्वांचाच नाइलाज आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sat, 02/25/2017 - 19:04 नवीन
तुम्हाला विचार आणि मन यातला फरक कळत नाहि किंव विचार म्हणाजेच मन अशी तुमची धारणा आहे. अर्थात, ति चुकीची आहे. शरीरशास्त्र दृष्टीने अंतःप्रेरणा, विचार, भावना.. सर्व काहि मेंदुतच तयार होतात तुम्हाला मन आणि जाणीव यातला फरक माहिती नाही. जाणीवेनं मनातले विचार जाणले जातात. तद्वत अंतःप्रेरणेची जाणीव होते. बघा ना. तुमच्या व्यतिरीक्त कोणाला अंतःप्रेरणेचा अनुभव येणं शक्यच नाहि. आणि अंतःप्रेरणेसंबंधी कुणी काहि अभ्यास केला असण्याचाही संभव नाहि. अंतःप्रेरणा हा मनाचाच भाग आहे म्हणणारा अंतःप्रेरणे विषयी अनभिज्ञ आहे. तुमच्याशिवाय कोणाला अध्यात्मीक माहिती असणं शक्य तरी आहे काय ? ज्याला ध्यानाविषयी शून्य माहिती आहे त्याला अध्यात्माबद्दल काहीही माहिती नाही. मानसशास्त्राला तुम्ही आध्यात्म म्हणुन कवटाळुन बसला आहात. त्याला तुमचा आणि इतर सर्वांचाच नाइलाज आहे. असो. अध्यात्म हा प्रथम चरणात मनाला शट डाऊन करण्याचे मार्गांचा (ध्यानप्रणाली) अभ्यास आहे. तुम्ही मनातच अडकला आहात त्यामुळे तुमचे फार बेसिक गैरसमज आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
स
संजय क्षीरसागर Sat, 02/25/2017 - 19:15 नवीन
तुम्हाला इतकी माहिती आहे (असा तुमचा गैरसमज असला तरी) अंतःप्रेरणेवर एक धागा काढा. तिथे मस्त चर्चा होईल. आणि आता मला धागा काढायला सांगून माघार घेऊ नका. कारण तुमच्या दृष्टीनं अंतःप्रेरणा हा `साधा आणि सरळ फिनॉमिना' आहे .. अंतःप्रेरणेचं उगमस्थान मनच आहे, तिचं प्रगटीकरण मनातच होत असतं. ति कुठुन आकाशातुन मनात उतरत नाहि. जागृत विचारांच्यामार्फत तिच्यापर्यंत पोचता येत नाहि म्हणुन त्यात गुढ वाटतं. पण तो एक साधा सरळ फिनॉमीनॉन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अर्धवटराव Sat, 02/25/2017 - 21:06 नवीन
तुम्हाला इतकी माहिती आहे (असा तुमचा गैरसमज असला तरी) अंतःप्रेरणेवर एक धागा काढा.
आपल्या माहितीचं प्रदर्शन म्हणुन नाहि, पण आपल्याला काय पटलं/समजलं यावर प्रकटन म्हणुन धागा नक्की काढता येईल.
तिथे मस्त चर्चा होईल.
मुद्द्यांवर चर्चा झाली तर खरच छान होईल. त्याऐवजी विरोधी मत असणार्‍याला "गोंधळ, फंडा चुकणे, ज्योक मारणे, कळणं अशक्य आहे, अभ्यास नाहि, भ्रमात आहे" वगैरे उपाधींनी नावाजणार असलात... तरी मस्त चर्चा होईल पण हाति काहि लागणार नाहि.
आणि आता मला धागा काढायला सांगून माघार घेऊ नका.
मी तुम्हाला धागा काढायला सांगायचा काय संबंध ? आणि जर कुणी असं म्हटलच तर ते माघार घेणं आहे असं तुम्हाला का वाटतं ? असो.
कारण तुमच्या दृष्टीनं अंतःप्रेरणा हा `साधा आणि सरळ फिनॉमिना' आहे ..
विचारांच्या आवर्तनांखाली मनाची धीर-गंभीर अवस्था आपलं कार्य करत असते. विचार थांबले कि त्या अवस्थेतुन आपला निर्णय बाहेर पडतो. त्यालाच अंतःप्रेरणा म्हणतात. मानसशास्त्र दृष्टीने हा सरळ साधा फिनॉमिनॉन मी आधीच टंकला आहे कि. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
अ
अर्धवटराव Sat, 02/25/2017 - 20:47 नवीन
तुम्हाला मन आणि जाणीव यातला फरक माहिती नाही. जाणीवेनं मनातले विचार जाणले जातात. तद्वत अंतःप्रेरणेची जाणीव होते.
मेंदु आणि मन यातला जो फरक तोच जाणिव आणि मन यातला फरक. शरीरशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर जाणिव, सायकोलॉजी अंगाने विचार केला तर मन. तो केवळ बघायचा दृष्टीकोन आहे. जाणिव आणि मन अशा परस्पर भिन्न्/इंडीपेण्डट्/पॅरलल यंत्रणा नाहित.
अंतःप्रेरणा हा मनाचाच भाग आहे म्हणणारा अंतःप्रेरणे विषयी अनभिज्ञ आहे.
मनाला शटडाऊन वगैरे करण्याचा गप्पा मारणारा मनाच्याखोलीविषयी, मनाच्या स्कोपविषयी अनभिज्ञ आहे. मनाचा फार संकुचीत अर्थ घेतोय तो.
ज्याला ध्यानाविषयी शून्य माहिती आहे त्याला अध्यात्माबद्दल काहीही माहिती नाही.
मानसशास्त्राला अभ्यात्माच्या नावाने खपवणार्‍याकडुन आणखी काय अपेक्षा असणार.
अध्यात्म हा प्रथम चरणात मनाला शट डाऊन करण्याचे मार्गांचा (ध्यानप्रणाली) अभ्यास आहे. तुम्ही मनातच अडकला आहात त्यामुळे तुमचे फार बेसिक गैरसमज आहेत.
विचार संपले कि मन संपलं इतपतच तुमचा मनाचा अभ्यास आहे. त्यापलिकडच्या मानसशास्त्रालाच तुम्ही अध्यात्म मानता. हा तुमचा फार मोठा गैरसमज आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर Sun, 02/26/2017 - 05:12 नवीन
म्हणजे तुम्हाला उत्तर देता येईल पण इथे अंतःप्रेरणेवरची चर्चा इतर प्रतिसादात हरवून जाईल. आता तुम्ही याविषयावर धागा काढाच. तिथे मग कुणाला कितपत माहिती आहे ते स्पष्ट होईल. आणि हंचसारख्या तुमच्या दृष्टीनं `सरळ आणि साध्या' परिमाणाची सदस्यांना ओळख होईल. शिवाय तुमची ही काय ग्रेट थिओरी आहे विचारांच्या आवर्तनांखाली मनाची धीर-गंभीर अवस्था आपलं कार्य करत असते. विचार थांबले कि त्या अवस्थेतुन आपला निर्णय बाहेर पडतो. त्यालाच अंतःप्रेरणा म्हणतात. तेही कळेल. अर्थात, तुम्ही पोस्ट लिहीण्यापूर्वीच, उपरोल्लेखित फंडा संपूर्ण चुकीचा आहे हे नमूद करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा