Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...

य
यनावाला
Mon, 02/19/2018 - 16:03
🗣 247 प्रतिसाद
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावाला जगनिर्माता, जगन्नियंता, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, ईश्वर अस्तित्वात आहे असे आस्तिक लोक मानतात. किंबहुना अशा ईश्वराचे अस्तित्व सत्य मानणार्‍यांना आस्तिक म्हणतात. आस्तिक शब्दाचा हाच अर्थ आज प्रचलित आहे. ( काहीजण केवळ जगनिर्मात्या ईश्वराचे अस्तित्व मानतात. --म.फुले यांनी त्याला निर्मिक म्हटले आहे.-- उपासनेचा देव मानत नाहीत. पण त्यांची संख्या नगण्य आहे.) जगातील बहुसंख्य माणसे अजून आस्तिक आहेत. " ईश्वर अस्तित्वात नाही." हे ठामपणे सांगणारे निरीश्वरवादी भारतात अगदी वेदकाळापासून आहेत. आता या विज्ञानयुगात त्यांची संख्या वेगाने वाढते आहे. सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान असा देव जर आहे तर तो आपल्या अस्तित्वाची प्रचीती सर्व माणसांना येईल असे कांहीच का करीत नाही ? इतका लपून-छपून का राहतो ? आपले अस्तित्व दाखविण्यात त्याला कोणती अडचण आहे ? तसेच त्याचे जे गुणवर्णन आहे त्यांतील एकाही गुणाचा अनुभव कधीही येत नाही. संकटात देव धावून आला आहे असे कधीही घडत नाही. हे कसे ? दीन-दुबळ्यांवर अन्याय होतो, निष्पाप बालिकेवर अत्याचार होतो या प्रत्यही घडणार्‍या घटना तो करुणासागर देव निष्क्रियपणे पाहात कसा राहातो? आस्तिक लोक अशा घटनांविषयीं विचार करीतच नाहीत. त्यांना त्यांची श्रद्धा टिकवून धरायची असते. ती अशा घटनांनी डळमळली तर काय करायचे ? आपल्याला कोणाचा आधार आहे ? अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे अन्यायपीडित व्यक्ती पूर्वजन्मीच्या पापाचे फळ भोगतात असले बुद्धीला न पटणारे काहीतरी भोंगळ तत्त्व श्रद्धेने खरे मानून मनाचे समाधान करतात. आपण देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली, देवासाठी जी कर्मकांडे परंपरे अनुसार करीत आहोत ती सोडून दिली तर देव आपल्यावर कोपेल. शिक्षा करील. अशी भीतीही त्यांना वाटत असावी. या संदर्भात डॉ.र.धों.कर्वे यांचे एक विधान आहे. ते म्हणतात, "माणूस देवाला नमस्कार करतो तो "दुर्जनं प्रथमं वन्दे ।" या न्यायाने. म्हणजे देवाने आपल्यावर कोप करू नये, आपले कांही वाईट करू नये म्हणून. हे पटण्यासारखे आहे. यावर आस्तिकांनी थोडा विचार करावा. जगात निरीश्वरवादी माणसे पूर्वीपासून आहेत; हे आस्तिकांना ठावूक आहेच ते नास्तिक देवा-धर्माचे कोणतेही कर्मकांड करीत नाहीत. देवाला हात जोडून त्याच्यापुढे नतमस्तक होत नाहीत. एवढेच नव्हे तर देवाचे अस्तित्वसुद्धा नाकारतात . आता प्रश्न असा पडतो की त्या नास्तिकांना देव शिक्षा का करीत नाही ? देव सर्वज्ञ आहे. जगात निरीश्वरवादी लोक आहेत. ते कधी माझी पूजा-अर्चा-प्रार्थना करीत नाहीत. मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील. देवाचे अस्तित्व मुकाट्याने मानतील. त्याची पूजा-अर्चा करू लागतील. आस्तिक-नास्तिक वाद मिटून जाईल. हे देवाला नको आहे का? नास्तिकांना कडक शासन करणे देवाला अशक्य आहे का? तो सर्वशक्तिमान आहे ना ? मग त्याच्या दृष्टीने एवढी सोपी असलेली गोष्ट तो स्वत: का करीत नाही ? देवदर्शनाला जाणार्‍या तसेच दर्शन घेऊन परत येणार्‍या भक्तांच्या वाहनांना अपघात का होतात ? त्यात अनेक भक्त का मरतात ? कोणी म्हणतील -आस्तिकांच्याच वाहनांना अपघात होतात का ? नास्तिकांच्या वाहनांना होत नाहीत ? -- होतातच. गाडीत कोण बसले आहेत ? आस्तिक का नास्तिक ? भूकंपात जखमी झालेल्या माणसांवर उपचार करण्यासाठी जाणारे डॉक्टर का घरफोडीसाठी जाणारे दरोडेखोर ? याचा अपघाताशी कांही संबंध नसतो. अपघाताची कारणे वेगळी असतात.नास्तिकांच्या वाहनांना अपघात होऊ शकतो हे सत्यच आहे. प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष ईश्वराचे अस्तित्व नाकारणार्‍या नास्तिकांना तो शिक्षा का करत नाही ? आणि या प्रश्नाचे सत्य उत्तर असे आहे की,ईश्वर अस्तित्वातच नाही. वास्तव काय आहे ? सुख-दु:खाचे प्रसंग सर्वांवर येतात. आस्तिकांवर येतात तसे नास्तिकांवरही येतात. श्रीमंतांवर येतात. गरिबांवर येतात. आस्तिक लोक देवाचे भजन-पूजन करतात, नामस्मरण करतात म्हणून त्यांच्यावर दु:खाचे प्रसंग क्वचितच येतात तर नास्तिक लोक देवाचे काहीच करीत नाहीत म्हणून त्यांच्यावर सतत दु:खाचे डोंगर कोसळतात असे मुळीच दिसत नाही. जगन्नियंता देव अस्तित्वात असेल तर असे घडायला हवे. नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही. यावरून कोणता निष्कर्ष निघतो ? अनेक नास्तिक चांगले मानसन्मानाचे, प्रसिद्धीचे, समृद्धीचे जीवन जगले. काही नावे सांगायची तर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, रॅंग्लर र.पु.परांजपे, प्राचार्य दि.धों.कर्वे, डॉ.र.धों.कर्वे, सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर, श्री.ना.पेंडसे, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अभिनेते डॉ.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर आदि अनेकानेक. देवाचे अस्तित्व न मानल्यामुळे त्यांना कोणत्याही विशेष अडचणींना सामोरे जावे लागले नाही. तसेच या सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना उदंड लोकप्रियता लाभली. मान-सन्मान मिळाले. सर्वार्थाने त्यांचे जीवन समृद्ध होते. अनेक सद्विचारी, सदाचारी, सज्जन आस्तिकांना आयुष्यात मोठे दु:ख भोगावे लागले. देवाने त्यांच्यावर कांही कृपा केली नाही. दोन उदाहरणे द्यायची तर तुकाराम महाराजांच्या काळात महाराष्ट्रात लागोपाठ चार वर्षे दुष्काळ पडला. तुकारामांच्या कुटुंबाची अन्नान्न दशा झाली. त्यांची पहिली पत्‍नी भूकबळी ठरली. त्यांनी लिहिले आहे, "दुष्काळे आटले द्रव्य गेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता गेली. आता काय खावे कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥ विठ्ठलाच्या या निष्ठावंत भक्ताची अशी अवस्था झाली. रामकृष्ण परमहंस कालीमातेचे परम भक्त होते. "स्वत: माता माझ्याशी बोलते " असे ते सांगत. त्यांना घशाचा कॅंन्सर झाला. अन्नाचा घास गिळता येईना. भक्तांनी विनवले की, " तुम्ही कालीमातेला साकडे घाला. ती तुमचा आजार बरा करील." परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली -इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज. " खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. इतर लोक जेवतात त्याने रामकृष्ण परमहंस यांचे पोट भरते का ? त्यांना भूक लागणार नाही का ? तात्पर्य एवढेच की आस्तिक माणसांना, देवभक्तांना सुद्धा दु:खे भोगावी लागतात. त्यांच्यासाठी देव काहीच करू शकत नाही. तो अस्तित्वाच नाही तर काय करणार ? पण अशा सुप्रसिद्ध आस्तिकांचाच विचार का करायचा ? शंभर वर्षांपूर्वीच्या हिंदु समाजाचा विचार करावा. त्याकाळी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था होती. चौथा वर्ण शूद्र . ते सगळे आस्तिकच होते. इतर तीन वर्ण त्यांना अस्पृश्य मानत. हे लोक निरक्षर होते. अज्ञानी होते. अत्यंत दीनवाणे अपमानास्पद जीवन जगत होते. जो देव आहे असे ते मनापासून मानत होते त्या देवाने त्यांच्यासाठी काहीच केले नाही. करुणासागर देवाला त्यांची दया आली नाही. देश स्वतंत्र झाला. प्रजासत्ताक स्थापन झाले. संविधान लागू झाले. तेव्हा कागदोपत्रींतरी अस्पृश्यता गेली. या दलितांचा उद्धार देवामुळे झाला नाही. डॉ.आंबेडकरांमुळे झाला. कांहीजण बाबासाहेबांनाच देव मानतात. तसे मानणे हा त्यांचा अपमान आहे हे त्या दलितांच्या ध्यानी कसे येत नाही ? कवि विंदा करंदीकर म्हणतात, "देवातुनी समाजा ज्याने विमुक्त केले । त्यालाच देव करिती याला इलाज नाही. ॥" तर अशा या देवाचे अस्तित्व खरे कसे मानता येईल ? देव अस्तित्वात नाही हेच बुद्धीला पटणारे सत्य आहे. देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे. मात्र परंपरेने आलेले जे सण-सुदिन आहेत ते समाजाचे आनंद सोहळे आहेत. ते अवश्य साजरे करावे. त्यांच्या धार्मिक महत्त्वापेक्षा सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे. अन्यथा जीवन एकसुरी, नीरस होईल. .................................................................................
वर्गीकरण
चर्चा (काथ्याकूट)

प्रतिक्रिया द्या
82228 वाचन

💬 प्रतिसाद (247)
A
arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 11:04 नवीन
हे स्वत:ला नास्तिक म्हणवून घेणारे लोक,
संवाद्यतेने बाटण्याची रिस्क वाढते. ================= अर्थातच अनेक नास्तिक संवाद करतात. अशा नास्तिकांचे दोन मूलभूत प्रकार आहेत. एक ईश्वर ही एक सामाजिक अनिष्टता आहे असं म्हणणारे. दुसरे ईश्वर ही एक अशास्त्रीय संकल्पना आहे असं मानणारे. The words I implied are undesirable social construct and scientific impossibility. भाषांतरात जो लॉस होतो एक मिनिट असू द्या. पण या दोन्ही गोष्टी भयंकर उथळ आहेत. सर्व सामाजिक अनिष्टतांची मूळ सारखीच आर्बिट्ररी आहेत मग ती ईश्वरप्रणित असोत वा अन्य काही प्रणित असोत. आणि मूलभूत सत्यं मांडायची कोणती शास्त्रीय पद्धतच नाही!!! मूलभूत फक्त गृहितकं आहेत, सत्य सगळी या गृहीतकांवर आधारलेली आहेत. त्यामुळं तुम्ही संवाद्य झालात तर तुमची अस्तिक नि नास्तिक हे दोन्ही बनायची शक्यता समसमान असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
A
arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 10:51 नवीन
१. गोरा नसला तरी किमान गोरापान २. सहा फूट आठ इंच. पण १००% तन्य आणि मूर्धन्य. ३. पिवळ्या फॉस्फरसाप्रमाणे उजेड मारणारा. ४. कोणत्याही रेप्यूटेड ब्रँडचे नसलेले पण तितक्याच क्वालिटीचे कपडे घातलेला. ५. मूर्ख अस्तिक भक्तापासून १० फूटावर उभा असलेला ६. तिच बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, अनाटॉमी, सायकॉलॉजी असली तरी माणसांपेक्षा स्वतःला लै झंड समजणारा. ७. डोळ्यात "बघून घेतो बेट्ट्या" असे भाव असणारा आणि ते दर्शवायकरता नेहमी तशी बुबुळे फिरवत ठेवणारा ८. असा सहजभावाने थांबलेला नसून काहीतरी फोटोबिटो देण्यासाठी पोज करतात तसा थांबलेला ९. अंगावर जगातली सगळी शक्ती साचवायचा अवयव बराच वेळ धुंडाळले तरी न दिसत असलेला १०. जगातल्या एकूण ज्ञानाच्या नि माहितीच्या मानाने भयंकरच छोट्या आकाराचे डोके असलेला ११. स्वतःच्या असण्याचा असा उद्देश नसलेला, नोकरी वैगेरे न लागलेला १२. मायबाप माहित नसण्याला मायबापच नाहीत म्हणणारा १३. आर्जवांच्या गोंगाटाशिवाय चैन न पडणारा १४. पाताळयंत्री, खुनशी, स्वामित्ववादी, गुलामगीरिवादी, प्रबोधनाच्या पलिकडचा १५. चुंबकीय क्षेत्रे इ वापरून जमीनीपासून फूटावर वर १६. अन्नाकडे नुसते पाहत बसणारा, अपचन झालेला १७. स्तुती ऐकून मती नष्ट होणारा १८. बोलघेवडा, स्वस्तुतीमग्न.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Wed, 02/21/2018 - 12:52 नवीन
तुमच्यामते "ईश्वर कोण" हे वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
स्वधर्म Wed, 02/21/2018 - 13:39 नवीन
तुमच्या ईश्वरविषयक मतांचे सार: - जगात सत्य कुणालाच समजत नाही - असलीच तर अास्तिकच काही किमान नैतिकता पाळू शकतात - म्हणून अास्तिक चांगले, ते परवडले. - नास्तिक कसे कोणत्याही नितीनियमांना न मानणारे, अहंकारी, सर्व जगाला ताप देण्यासाठी निर्माण झालेत ई. ई. मला जराही पटले नाही, तरी तुमची स्टाईल खूप अावडली. समोरच्याचे मुद्दे अतिप्रमाणाबाहेर ताणून त्यांना निकाली काढणे हे मोठे कौशल्य अाहे. शिवाय ते वापरले जात अाहे हे फार कमी जणांना समजते. टीप: अाता वरचे सार कसे मुळातूनच गंडलेले अाहे, असा एका एका मुद्द्याचा सविस्तर समाचार तुंम्ही नक्की घेऊ शकता याची, अाणि मी त्याचा प्रतिवाद करु शकणार नाही याची, मला पूर्ण खात्री अाहे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 14:00 नवीन
- नास्तिक कसे कोणत्याही नितीनियमांना न मानणारे, अहंकारी, सर्व जगाला ताप देण्यासाठी निर्माण झालेत ई. ई.
सहिष्णू नास्तिकांबद्दल मला प्रेम आहे. अस्तिक जितक्या मूर्खपणे निराधार असा ईश्वर मानतात त्याच तोडीच्या मूर्खपणानं हे लोक चांगली मूल्यं अकारण मानतात असं मी मानतो. =================== असहिष्णू नास्तिक मात्र मला असहिष्णू अस्तिकांपेक्षा खतरनाक वाटतात. ===============================================================
- जगात सत्य कुणालाच समजत नाही
असं पण नाही. सत्य कसं स्थापावं वा मानावं याबद्दल एक सर्वसंमत चौकट निर्माण करावी असा आग्रह आहे. =========================== बाकी आपला प्रतिसाद अजिबातच गंडलेला नाही नि मतं अत्यंत व्यवस्थित रित्या व्यक्त केली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
स
स्वधर्म Wed, 02/21/2018 - 18:51 नवीन
<अस्तिक जितक्या मूर्खपणे निराधार असा ईश्वर मानतात त्याच तोडीच्या मूर्खपणानं हे लोक चांगली मूल्यं अकारण मानतात असं मी मानतो.> — अॉं? हे वाक्य कंप्लीट गंडलेलं अाहे. कसं ते पहा: — <निराधार असा ईश्वर> अहो, अास्तिकांच्या मते ईश्वरच सगळ्याचा अाधार अाहे! तुंम्हाला अास्तिक्य कळलेलेच नाही. मुद्दलातच खोट. <पहिला भाग: अस्तिक जितक्या मूर्खपणे निराधार असा ईश्वर मानतात > — अास्तिक हे अापला काहीतरी फायदा होईल म्हणून, नुकसान टळेल म्हणून, भीतीमुळे (उगीच असलाच ईश्वर तर, नंतर प्रॉब्लेम नको) ईश्वर मानतात. एखादाच तुकाराम महाराजांसारखा निस्सिम अास्तिक. जास्त विचार करायची सवय नसल्यानेही (अाळस, बाबा वाक्यं प्रमाणम्) काही जण अास्तिक असू शकतात. फक्त हा क्लास कदाचित मूर्ख असू शकतो, बाकीचे नाही, कारण ते व्यवस्थित विचार करून, अापला फायदा कशात अाहे हे बघून अास्तिक अाहेत. मूर्ख असे करू शकतच नाहीत. सबब वाक्याचा पहिला भाग गंडलेला. <दुसरा भाग: याच तोडीच्या मूर्खपणानं हे लोक चांगली मूल्यं अकारण मानतात.> — नास्तिक व्हायला तुंम्ही बहुसंख्याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेत असता. अापल्या समाजात हे सहज, नैसर्गिक नाही. त्यासाठी विचार करावाच लागतो, तर्काचा अाधार शोधावा लागतो. असा माणूस मूर्ख असू शकत नाही, सुरुवातीला असलाच तरी नंतर मूर्ख राहू शकणार नाही, कारण तो विचार करतो. ========================== तुंम्ही शेवटी तुमचे मतही अावर्जून लिहीता. तसेच माझे मत: एखादा माणूस अास्तिक अाहे, की नास्तिक हे महत्वाचे नाहीच मुळी! तो तसा का अाहे, त्या मनोभूमिकेतून तो कोणते निर्णय घेतो? कुणाचा लाभालाभ/ हित-अहीत पाहतो, हे महत्वाचे. ========================== प्रयत्न बरा जमलाय का? टीप: दुसर्या वाक्यही असेच ताणून भोके पाडता येतील व चुकीचे ठरवता येईल, पण जोशी स्टाईल करायची तर त्यासाठी वेगळा प्रतिसाद लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
स्वधर्म Wed, 02/21/2018 - 19:01 नवीन
== वरचा प्रतिसाद नीट दिसत नसल्याने दुरूस्ती करून परत टाकला अाहे. संपादकांनी वरचा प्रतिसाद काढून टाकावा, ही विनंती. “अस्तिक जितक्या मूर्खपणे निराधार असा ईश्वर मानतात त्याच तोडीच्या मूर्खपणानं हे लोक चांगली मूल्यं अकारण मानतात असं मी मानतो.” — अॉं? हे वाक्य कंप्लीट गंडलेलं अाहे. कसं ते पहा: — “निराधार असा ईश्वर” अहो, अास्तिकांच्या मते ईश्वरच सगळ्याचा अाधार अाहे! तुंम्हाला अास्तिक्य कळलेलेच नाही. मुद्दलातच खोट. “पहिला भाग: अस्तिक जितक्या मूर्खपणे निराधार असा ईश्वर मानतात “ — अास्तिक हे अापला काहीतरी फायदा होईल म्हणून, नुकसान टळेल म्हणून, भीतीमुळे (उगीच असलाच ईश्वर तर, नंतर प्रॉब्लेम नको) ईश्वर मानतात. एखादाच तुकाराम महाराजांसारखा निस्सिम अास्तिक. जास्त विचार करायची सवय नसल्यानेही (अाळस, बाबा वाक्यं प्रमाणम्) काही जण अास्तिक असू शकतात. फक्त हा क्लास कदाचित मूर्ख असू शकतो, बाकीचे नाही, कारण ते व्यवस्थित विचार करून, अापला फायदा कशात अाहे हे बघून अास्तिक अाहेत. मूर्ख असे करू शकतच नाहीत. सबब वाक्याचा पहिला भाग गंडलेला. “दुसरा भाग: याच तोडीच्या मूर्खपणानं हे लोक चांगली मूल्यं अकारण मानतात.” — नास्तिक व्हायला तुंम्ही बहुसंख्याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेत असता. अापल्या समाजात हे सहज, नैसर्गिक नाही. त्यासाठी विचार करावाच लागतो, तर्काचा अाधार शोधावा लागतो. असा माणूस मूर्ख असू शकत नाही, सुरुवातीला असलाच तरी नंतर मूर्ख राहू शकणार नाही, कारण तो विचार करतो. ========================== तुंम्ही शेवटी तुमचे मतही अावर्जून लिहीता. तसेच माझे मत: एखादा माणूस अास्तिक अाहे, की नास्तिक हे महत्वाचे नाहीच मुळी! तो तसा का अाहे, त्या मनोभूमिकेतून तो कोणते निर्णय घेतो? कुणाचा लाभालाभ/ हित-अहीत पाहतो, हे महत्वाचे. ========================== प्रयत्न बरा जमलाय का? टीप: दुसर्या वाक्यही असेच ताणून भोके पाडता येतील व चुकीचे ठरवता येईल, पण जोशी स्टाईल करायची तर त्यासाठी वेगळा प्रतिसाद लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
सतरंगी_रे गुरुवार, 02/22/2018 - 00:08 नवीन
म्या पामराचे वाक्चातुर्य फारच वाईट असल्याने मला काय म्हणायचे ते मांडू शकलो नाही ते तुम्ही लीलया केल्याबद्दल धन्यवाद ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 18:40 नवीन
मूळात आपण मूर्खता ही संकल्पना बायनरी मानली आहे. माझ्या विधानात मी तिच्या प्रमाणाबद्दल बोललो आहे, असण्या-नसण्याबद्दल नव्हे. ईश्वरावर नसल्याचा वा निराधारतेचा आरोप आहे. हा आरोप काही प्रमाणात सत्य असेल तर काही प्रमाणातल्या मूर्खपणाने ईश्वर मानला असं म्हटलं जाईल. दुसरीकडे ईश्वरप्रणित धर्म अधिकृतरित्या केवळ चांगल्या तितक्याच मूल्यांनी वागा असे म्हणतो. मनुष्याची नैसर्गिक प्रेरणा त्याला चांगल्या वा वाईट मूल्यांमध्ये फरक करू देत नाही. तेव्हा ईश्वर न मानणार्‍या नास्तिकांनी फक्त चांगलीच मूल्ये पाळायचा प्रश्न येत नाही. त्यांनी दोन्ही मूल्यं समसमान पाळली पाहीजेत. पण असं होत नाही. ते देखील फक्त चांगली मूल्येच पाळतात. अकारण! अर्थातच हा एका प्रमाणात मूर्खपणा आहे. चांगली मूल्ये पाळणार्‍या अस्तिकांसोबत वाईटमूल्ये पाळून नास्तिक खूप मस्त जीवन जगू शकतात. पण तसं ते अकारण वा एकप्रकारे मूर्खपणानेच करत नाही. ================================
तुंम्हाला अास्तिक्य कळलेलेच नाही.
अर्थातच. मी अस्तिक असेन तर त्या प्रमाणात मी देखील मूर्ख असेनच! पण त्या प्रमाणात हे महत्त्वाचं आहे. ==================================
अास्तिक हे अापला काहीतरी फायदा होईल म्हणून, नुकसान टळेल म्हणून, भीतीमुळे (उगीच असलाच ईश्वर तर, नंतर प्रॉब्लेम नको) ईश्वर मानतात.
हे एक तद्दन भंकस विधान आहे. त्यांचे कोणतेही विशिष्ट अधिकतेचे नैतिक प्रतिष्ठान नसताना संपूर्ण न्यायव्यवस्था प्रोफेशनल मानायला तुम्ही तयार असता. अस्तिक म्हटलं कि विशेषणं सुचणं हे फालतू फॅड आहे. आपल्या मनाचा आरसा सर्वत्र लावू नये. तुकारामाला चित करतील असे अस्तिक नि नास्तिकही मी स्वतःच पाहिलेले आहेत (त्यात त्यांना कुणालाच रस असेल, पण आपल्या दोघांच्या डेमोसाठी कल्पना केली तर...) ===========================
नास्तिक व्हायला तुंम्ही बहुसंख्याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेत असता. अापल्या समाजात हे सहज, नैसर्गिक नाही. त्यासाठी विचार करावाच लागतो, तर्काचा अाधार शोधावा लागतो.
असं काही असतं तर नास्तिकांची संख्या जगात सर्वत्र समान डेन्सिटीची असली असती. जगात फक्त काही भूभागांतच विचार करू शकणारे डोके उत्क्रांत झाले आहे काय? नास्तिक असायला अजिबात विचार करावा लागत नाही. ती फक्त एक फॅशन आहे. ईश्वराच्या असण्याचं गृहितक नेहमी चालू ठेवणं कर्मकठीण असतं. =============================
एखादा माणूस अास्तिक अाहे, की नास्तिक हे महत्वाचे नाहीच मुळी! तो तसा का अाहे, त्या मनोभूमिकेतून तो कोणते निर्णय घेतो? कुणाचा लाभालाभ/ हित-अहीत पाहतो, हे महत्वाचे.
पर्फेक्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
प
पुंबा गुरुवार, 02/22/2018 - 08:51 नवीन
++११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
र
राही Wed, 02/21/2018 - 14:17 नवीन
क्रमांक दोनच्या शिवजयंतीची धामधूम सुरू झाली आहे. काल आमच्या येथे रस्त्यावर भर रहदारीत एक भव्य स्वागतकमान उभारण्याचे काम सुरू झाले. फुटपाथमध्ये खड्डा खणून एक खांब रोवला. आज दिसले की दुसर्‍या बाजूचा फुटपाथ उकरणे चालू आहे आणि आधीच्या खांबाची पूजा केली गेली आहे. हळद, कुंकू, हार फुले वगैरे. पायथ्याशी फुले. रांगोळी. आता आली का पंचाईत? आधीच अरुंद फुटपाथवर डोळ्यांत तेल घालून चालणे आले. बरेच आहे म्हणा ते. अपघात कमी होतील. मात्र आपल्याला काही झाले तरी चालेल पण त्या खांबाचा अवमान अथवा विटंबना नको. उगीच फट म्हणता दंगा उसळायचा, ही धास्ती मागे लागली. पाय लागता कामा नये, फुले- रांगोळी पायाखाली येता नये वगैरे काळज्या शिरावर घेऊन चालणे प्राप्त आहे. इतरत्रही असेच घडते आहे का? दरवर्षी घडते का? निदान आमच्या येथे तरी हे नवीन आहे.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 02/21/2018 - 18:28 नवीन
आता यनावाला उद्या आमच्यासाठी कोणती उपमर्दकारक विशेषणं घेऊन लेख पाडतील या काळज्या शिरावर घेऊनच आम्ही मिपावर लॉगिन करत नाही का? आता आमच्याही उपमर्दास काही महत्त्व असावे ही अपेक्षा करतो आहोत ती मूलस्थानीच चूकीची असू शकते हे मान्य आहेच, पण तरीही. ============== समाजाच्या आस्थांचा आदर करणं असो, पण ज्या लोकांनी सामाजिक उत्सव स्वतःच्या पुढाकाराने केले त्यांच्यात बुद्धीवाद्यांचं, इ इ प्रमाण कमी वा नष्ट झालं तरी त्यांनी ते उत्सव जणू काही अनेक बुद्धिवादी तिथे आहेत असे करावेत हि अपेक्षा चूक नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/21/2018 - 19:02 नवीन
>>>>आधीच्या खांबाची पूजा केली गेली आहे. हळद, कुंकू, हार फुले वगैरे. अवघड झालंय सर्व. अशा जागोजागी पूजाअर्चा मांडून रस्ता अडवून ठेवलेल्या लोकांबद्दल कुठे काही बोलायची सोय नाही. हेच म्हणून नव्हे, पण मती कुंठित झालेल्या लोकांना काही सांगायला जाणे म्हणजे भ्रमिष्ट लोकांच्या झुंडी अंगावर घेणे आहे. अशा वेळी अशा वेळी आपणास कितीही पटले नाही तरी रस्ता बदलून गेले पाहिजे. विचार करणा-या माणसांना एक वेळ समजावून सांगता येते पण देवाळू वगैरेंच्या एकदा मिठ्या पडल्या की त्या सूटत नाही, त्या स्वत:हुनच सुटल्या तर सूटल्या... नै तर अवघड होऊन जातं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 02/22/2018 - 02:41 नवीन
यनावाला त्यांना अडचणीच्या असलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाहीत. पण त्यांचे किंवा त्यांच्या विचारांचे खंदे समर्थक दिसता आणि या लेखावर बरेच प्रतिसाद दिले आहेत त्यामुळे तुम्ही मला पण उत्तर द्याल अशी आशा करतो. तर खांबाला हळदीकुंकू लावणं वगैरे मूर्खपणा आहे याबद्दल दुमत नाही किंवा दुसरा उद्देश म्हणजे आपली ओळख किंवा दहशत निर्माण करायची. पण मग श्रद्धा आणि कर्मकांडं यात गल्लत होते आहे का? रोज किंवा एखाद्या ठराविक दिवशी महत्वाची कामं बाजूला सारून देवळात जाणं, एखाद्या कुडमुड्या जोतिष्याने, भटजीने सांगितलं म्हणून नसत्या पूजा करणारे, कर्मकांड करणारे किंवा असेल हरी तर.. म्हणीप्रमाणे वागणारे यांना विरोध करणे आणि त्यांचे प्रबोधन करणे समजू शकतो. पण म्हणून सगळे सश्रद्ध त्याच पारड्यात का तोलायचे? कुठलेही कर्मकांड वा दिखावा न करता देवावर श्रद्धा ठेवणारे आणि तरीही आपापल्या परीने जीवन सुखावह होईल यासाठी प्रयत्न करणारे पण मूर्खच म्हणायचे का? दुसरी गोष्ट म्हणजे खांबाला हळदीकुंकू लावणारे, रस्त्यावर उतरून गणपती किंवा इतर सण साजरे करणारे हे निव्वळ कामधंदा नसणारे किंवा स्वतःचा फायदा बघणारे असतात असं माझं मत आहे. मग या लोकांच्या पंक्तीत सर्व साधुसंताना, अध्यात्मिक गुरूंना बसवायचं का? देवावर श्रद्धा असणं नसणं हा अत्यंत वैयक्तिक मुद्दा आहे. फक्त त्या श्रद्धेमुळे आपण कोणाचं जाणते अजाणतेपणी नुकसान तर करत नाही ना हे बघणं महत्वाचं! एखादा माणूस रोज ऑफिसला जाण्याआधी देवाची पूजा करत असेल, ऑफिसला वेळेत जात असेल, काम व्यवस्थित करत असेल, श्रद्धाळू असल्याने लाच घेत नसेल, आपण बरं आणि आपलं काम बरं असा असेल तर तो मूर्ख आणि बिनडोक ठरतो का? श्रद्धाळू एकवेळ देवाच्या भीतीने कोणाला हानी करणार नाही. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक धोकादायक असतो, यात सश्रद्धही आले आणि अश्रद्धही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
र
राही गुरुवार, 02/22/2018 - 05:46 नवीन
कुणाच्या पंगतीत कुणाला बसवायचे हाच तर विवेक आणि सत् असत् बुद्धी आहे. काही फार थोडे लोक आध्यात्मिक वृत्तीचे असतात. मी 'धार्मिक 'वृत्ती' असे म्हणत नाहीय. रिलिजन आणि स्पिरिचुअलिटी या भिन्न गोष्टी आहेत. त्या तशा वेगळ्या ओळखणे हेच तारतम्य आणि विवेक. हवे तर नीरक्षीरविवेक म्हणा. आणि, 'आपली विवेकबुद्धी वापरा' असेच तर सारे (खरे) संतजन, विभूती सांगत आले आहेत. सुधारणावाद्यांचे आणि प्रबोधनवाद्यांचेही त्यांच्या त्यांच्या परीने आणि क्षमतेनुसार हेच सांगणे असते. ऑफिसला वेळेत जाण्याचे,लाच न घेण्याचे आणि व्यवस्थित काम करणार्‍यांचे उदाहरण आपण दिले आहे. पण त्यात विशेष ते काय? हे त्यांचे कर्तव्यच असते. ते त्यांनी केलेच पाहिजे. त्यासाठी त्यांची इतर सांसारिक/सामाजिक कर्तव्ये त्यांना माफ होऊ शकत नाहीत. श्रद्धाळू असणे हा एखाद्यायाचा व्यक्तिगत स्वभाव झाला पण स्वतःच्या नकळत त्याचा अतिरेक होऊ लागला तर ते त्याला आणि समाजाला हानिकारक आहे. उदा. देवपूजेत जो वेळ जातो तो जर त्याने मुलाला शाळेत सोडण्यात किंवा इतर काही छोटी नित्यकर्मे करण्यासाठी वापरला तर घरातले काही ताण काही प्रमाणात कमी होतील, जे फक्त साग्रसंगीत देवपूजेने कदाचित कमी होणार नाहीत. खरे आध्यात्मिक लोक असतात ते प्रपंचही व्यवस्थित 'नेटका' करीत असतात. ते पहाटे तीन वाजता उठतील, ध्यानकर्म सर्व आवरतील आणि हसतमुखाने, स्थिरचित्ताने प्रापंचिक गोष्टींना त्या त्या वेळी सामोरे जातील. सामान्य माणसाला हे जमू शकत नाही. त्यामुळे त्याने आपली ऐहिक कर्तव्ये विवेकबुद्धीने पार पाडावी, विकारांवर विजय मिळवून स्थिरचित्त राहावे, मोहवश अथवा भ्रमित होऊ नये अशीच शिकवण भले लोक देत असतात. दासबोधाच्या दुसर्‍या अध्यायात समर्थांनी 'हे ज्ञान नव्हे' असे म्हणत अनेक उदाहरणे दिली आहेत ती सर्व सामान्य माणसासाठीच आहेत. यंत्र, तंत्र, जपतप, घटपट, यात्रा, समाराधना, पारायणे इ. हे ज्ञान नव्हे असे ते आग्रहपूर्वक सांगतात. सुधारणावादी आणि प्रबोधनवादी लोकही या भोळ्याभाबड्या जनतेसाठीच विचार मांडत असतात. स्वतःची विवेकबुद्धी जागवावी, गहाण टाकू नये हे त्याचे सार असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 02/22/2018 - 18:37 नवीन
काही मुद्दे मांडलेत तेच तुम्ही दुसऱ्या शब्दात मांडलेत. तर काही मुद्दे माझ्या प्रतिसादात आलेच नव्हते. रिलिजन आणि स्पिरिचुअलिटी या भिन्न गोष्टी आहेत. मुद्दा फक्त देव मानणे वा न मानणे याचा आहे. मी ना धर्माविषयी बोलतोय ना अध्यात्माविषयी आणि त्याची तुलना पण चर्चेत नाहीये. सर्वसामान्य लोक जे सतत कुठल्या ना कुठल्या अडचणींचा सामना करत असतात, ते थोडा मानसिक आधार, शांतता मिळण्यासाठी देवाचे स्मरण/ पूजा करत असतील किंवा देवळात जात असतील किंवा सकाळसंध्याकाळ घरातल्या देवापुढे हात जोडत असतील किंवा स्तोत्र मंत्र म्हणत असतील तर त्यांना मूर्ख बिनडोक का म्हणायचं? ऑफिसला वेळेत जाण्याचे,लाच न घेण्याचे आणि व्यवस्थित काम करणार्यांचे उदाहरण आपण दिले आहे. पण त्यात विशेष ते काय? हे त्यांचे कर्तव्यच असते. ते त्यांनी केलेच पाहिजे. तुम्ही उदाहरण अर्धवट वापरलेत. मुद्दा असा आहे की देवभोळे पापभिरू लोक निदान देवाच्या कोपाच्या वा नरकात जायला लागेल या भीतीने तरी चुकीचे काम करणार नाहीत. पण देव न मानणाऱ्यांना ही भीती नसेल. मग फक्त या "विवेकबुद्धी"वर अवलंबून राहायचं म्हणलं तर किती जणांकडे ती असते? असं म्हणतात की प्रत्येकजण आपापल्या दृष्टीने बरोबरच असतो. माझ्या विवेकबुद्धीला जे पटते ते तुमच्या विवेकबुद्धीला पटेल असं नाही. मग याचे प्रमाण कोणते मानायचे? श्रद्धाळू असणे हा एखाद्यायाचा व्यक्तिगत स्वभाव झाला पण स्वतःच्या नकळत त्याचा अतिरेक होऊ लागला तर ते त्याला आणि समाजाला हानिकारक आहे मी तेच तर म्हणलंय. यात सश्रद्ध आणि अश्रद्ध दोघेही आले. मी माझ्या प्रतिसादात लिहिलंय की आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या नीट सांभाळून जर कोणी देवदेव करत असेल तर काय प्रॉब्लेम आहे? कोणी जर प्रवासातल्या वेळेत मनातल्या मनात जप किंवा स्तोत्र म्हणत असेल तर इतर कोणाला काय प्रॉब्लेम असावा? बाकी देवपूजा करण्यात वेळ घालवल्यामुळे घरात निर्माण ताणाबद्दल म्हणाल तर अश्रद्धांमुळे किंवा त्यांच्या विरोधामुळे घरात ताण निर्माण होत नसेल? नाहीतर मग अश्रद्धाचे आईवडील, जोडीदार, मुले हे सर्वच तितकेच अश्रद्ध असले पाहिजेत. सर्वसाधारणपणे नवरा आणि बायको वेगवेगळ्या स्वभावाचे असतात आणि आवडीनिवडीसुद्धा अगदी सारख्या नसतात. अगदी टोकाच्या नास्तिक नास्तिक व्यक्तीचा जोडीदार थोडा जरी आस्तिक असेल तर किती तणाव किंवा कुचंबणा असेल याचा विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/22/2018 - 14:11 नवीन
राहींनी अतिशय उत्तम प्रतिसाद लिहिला आहे, अधिक लिहिण्याची गरज पडू नये. पण, आपल्या प्रतिसादातील एका मुद्द्यावर बोललं पाहिजे. देवावर श्रद्धा असणं नसणं हा अत्यंत वैयक्तिक मुद्दा आहे. फक्त त्या श्रद्धेमुळे आपण कोणाचं जाणते अजाणतेपणी नुकसान तर करत नाही ना हे बघणं महत्वाचं! देवावर श्रद्धा असणं ही व्यक्तीगत बाब आहे, हे कोणालाही मान्य व्हावं. पण त्या श्रद्धेमुळे आपण स्वतःच नुकसान करुन घेत असतो पण देवाळू मोडमुळे माणूस कितीही नुकसान झालं तरी ते नुकसान होतंय, हे कळतंय तरी ते कबूल न करणे आणि त्यातच डुंबत जाणे हे घातक होत जाते. ”पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति’.... सुद्धा नको. आपली श्रद्धा घरातही असली तरी त्यामागे कर्मकांडं येतातच आणि बाहेरच्या चार लोकांना भलेही त्याचा त्रास होत नसेल , तो घरातल्या लोकांना होतच असतो. पण, मुकेपणाने सहन करावे लागते. म्हणून मी देवाळूंच्या बाबतीत कुठे तरी म्हणालो की तुमची एका अज्ञात शक्तीवर श्रद्धा आहे, ती तशीच ठेवा. त्याला कोणतीही कर्मकांडे चिकटली की त्याचा त्रास तुम्हाला नको आणि समाजालाही नको. बाकी, अश्रद्धांळूचा मात्र असा कोणताही गजर नसतो. असं माझं मत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 02/22/2018 - 22:26 नवीन
म्हणजे तुमचा कर्मकांडांना विरोध आहे तर. तो तर बहुतेक सर्व सुज्ञ लोकांचा असतोच, मग ते सश्रद्ध असो व अश्रद्ध. पण त्या श्रद्धेमुळे आपण स्वतःच नुकसान करुन घेत असतो पण देवाळू मोडमुळे माणूस कितीही नुकसान झालं तरी ते नुकसान होतंय, हे कळतंय तरी ते कबूल न करणे आणि त्यातच डुंबत जाणे हे घातक होत जाते. हे वाक्य हे गृहीतक जास्त वाटतंय. श्रद्धेमुळे का आणि कसं स्वतःचं नुकसान होतं? कशावरून सर्व श्रद्धाळू कर्मकांडांच्या मागे लागतातच? घरातल्या लोकांच्या सहन करण्याबद्दल बोलायचं तर घरातले सर्व जण सारख्याच लेव्हलचे नास्तिक असायला पाहिजेत तरच वाद होणार नाहीत. कारण एक टोकाचा अश्रद्ध असेल आणि दुसरा थोडा जरी सश्रद्ध किंवा अज्ञेयवादी असेल तरी कोणा एकाची कुचंबणा होणार. या सगळ्यात आपण कुठे थांबायचं हे कळणं महत्वाचं. एखादा नास्तिक मुलगा आस्तिक मुलीच्या प्रेमात पडला तर केवळ आपलं नास्तिक्य टिकवण्यासाठी प्रेमाचा अव्हेर करेल का? आपण प्रेम करतो त्या व्यक्तीसाठी (आई, वडील, जोडीदार, मुलं, मित्र) जर कधी देवासमोर हात जोडावे लागले किंवा प्रसाद घ्यावा लागला तर काय फरक पडतो? बाकी, अश्रद्धांळूचा मात्र असा कोणताही गजर नसतो. असं माझं मत आहे. यनावाला सारखा हा गजर करतात ना, इतरांना मूर्ख बिनडोक पण म्हणतात. वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पण देण्याचं सौजन्य दाखवत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/23/2018 - 04:52 नवीन
यनावाला सारखा हा गजर करतात ना, इतरांना मूर्ख बिनडोक पण म्हणतात. वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पण देण्याचं सौजन्य दाखवत नाहीत. यनावाला सरांचा गजर प्रबोधनाचा आहे, त्याचा झाला तर फायदाच होतो नुकसान होणार नाही. यनासर, व्यक्तीगत कोणाला मूर्ख बिनडोक म्हणाले असतील असे मला वाटत नाही. मिपावर टाकलेल्या लेखनाला प्रतिसादाला उत्तर दिलंच पाहिजे असा काही नियम नाही, ज्याच्या त्याच्या सौजन्याचा भाग आहे. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 17:06 नवीन
यनासर, व्यक्तीगत कोणाला मूर्ख बिनडोक म्हणाले असतील असे मला वाटत नाही
पुन्हा असत्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ट
ट्रेड मार्क Fri, 02/23/2018 - 18:25 नवीन
यनासर, व्यक्तीगत कोणाला मूर्ख बिनडोक म्हणाले असतील असे मला वाटत नाही. तुम्ही त्यांचे बाकीचे लेख वाचले असतील असं मला वाटलं होतं. त्यांनी सरसकट सगळ्या श्रद्धा ठेवणाऱ्यांना तत्सम विशेषणांनी गौरविलेले आहे. यनावाला सरांचा गजर प्रबोधनाचा आहे, त्याचा झाला तर फायदाच होतो नुकसान होणार नाही. हे तुमचं वैयक्तिक मत झालं. मला जर रोज गायत्री मंत्र किंवा हनुमान चालीसा म्हणल्याने छान वाटत असेल तर कोणाला काय प्रॉब्लेम असावा? हे मंत्र म्हणणे मूर्खपणाचे आहे असं मला सांगून माझा काय फायदा होणार आहे? मिपावर टाकलेल्या लेखनाला प्रतिसादाला उत्तर दिलंच पाहिजे असा काही नियम नाही, ज्याच्या त्याच्या सौजन्याचा भाग आहे. हे तुम्ही कोणासाठी म्हणताय ते कळलं नाही. जर यनावाला उत्तर देत नाहीत या म्हणण्यावर असेल तर त्यांनी काढलेल्या धाग्यांवर विचारलेल्या प्रश्नांना तरी उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. एक गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे की त्यांना सोयीस्कर असेल त्या ठिकाणी मात्र ते प्रतिसाद देतात. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे - हा ज्याच्या त्याच्या सौजन्याचा भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विकास Fri, 02/23/2018 - 19:02 नवीन
इतकी वर्षे तेच तेच लिहूनही फायदा होताना दिसत नाही. म्हणून वेळेचा अपव्यय/नुकसान होते आहे असेच म्हणावे लागेल. याचा अर्थ देव शिक्षा करतोय असाच आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विकास Fri, 02/23/2018 - 02:07 नवीन
सर, तुम्ही स्वतःला कुठल्या बाजूचे मानता? संक्रांतीपासून, होळी, पाडवा, राखी पौर्णिमा, गणेशोत्सव ते दिवाळी पर्यंत कुठले सण साजरे करता का सगळे कर्मकांड म्हणून बाद?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/23/2018 - 04:56 नवीन
सर, तुम्ही स्वतःला कुठल्या बाजूचे मानता? आधुनिक विचारांचा. संक्रांतीपासून, होळी, पाडवा, राखी पौर्णिमा, गणेशोत्सव ते दिवाळी पर्यंत कुठले सण साजरे करता का नाही. सगळे कर्मकांड म्हणून बाद? बाद....!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ट
ट्रेड मार्क Sat, 02/24/2018 - 00:56 नवीन
म्हणजे बहिणीला जरी राखी बांधायची असेल, बायकोची इच्छा पाडवा म्हणून ओवाळायची असेल तरी तो मूर्खपणा म्हणून नाकारणं म्हणजे आधुनिक विचार का? आजूबाजूला उत्सव (फटाके, लाऊडस्पीकर नव्हे) चालू असताना कोणी एवढं कोरडं राहणं याला काय म्हणावं? या हट्टापायी या नास्तिक लोकांनी किती जवळच्या माणसांची मनं दुखावली असतील काय माहित! अजूनही मला असं वाटतंय की कर्मकांड आणि श्रद्धा यात गल्लत होते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मराठी_माणूस गुरुवार, 02/22/2018 - 08:12 नवीन
धागाकर्ते: तुम्ही एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवा . शासकीय पुजा नावाचा प्रकार बंद करण्या संदर्भात.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 02/22/2018 - 09:00 नवीन
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?... देव म्हणतो, तुम्ही (निरीश्वरवादी) माझ्या फंदात पडत नाहीत मग मी कशाला तुमच्या (निरीश्वरवाद्यांच्या) फंदात पडु, तुम्ही तुमचे कर्म भोगाल !!!!!
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 02/22/2018 - 11:43 नवीन
अधिक महत्त्वाचा प्रश्न हा आहे कि यनावाला गनिमी काव्याने एक वार करून मिपाकरांना नियमित शिक्षा का करत असतात?
  • Log in or register to post comments
ड
डॉ.नितीन अण्णा गुरुवार, 02/22/2018 - 12:51 नवीन
गनिमी कावा वगैरे तर मला इथे दिसत नाही. सरळ सरळ मत प्रदर्शन आहे ... दोन्ही बाजूंनी चर्चा होतेय विचारांची घुसळण होतेय ... चांगले आहे. बाकी मला तर सोप्या सोप्या गोष्टीमध्ये वैचारिक खोली दिसते उदा. सुस्मिता सेन जेव्हा म्हणते की कूच दर्द हे मेरे सिने में मुझे मस्त माहोल में जिने दे तेव्हा मला ती मेहबूब बद्दल न बोलता काहीतरी अध्यात्मिक बोलत असल्याचा भास होतो... असे वाटते की तिला तिचे दुखणे विसरायला अध्यामाची धुंदी उपयोगी पडत असेल तर पडू द्या बाबा ... आपल्याला काय करायचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 02/25/2018 - 17:29 नवीन
कूच दर्द हे मेरे सिने में कुछ म्हणायचं आहे का तुम्हाला ? "कूच/कुच"चा अर्थ जरा वेगळा होतो :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.नितीन अण्णा
भ
भीडस्त Wed, 03/07/2018 - 13:45 नवीन
या धाग्यवर ठसका लागण्याइतपत हसावे लागेल असं वाटलं नव्हतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रकाश घाटपांडे Fri, 02/23/2018 - 06:16 नवीन
दाभोलकर नेहमी म्हणायचे की देवावर श्रद्धा ठेउन जर कुणी विवेकी राह्त असेल तर आमच भांडण नाही. फक्त देवाच्या नावाने कुणी शोषण करत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. खोट बोललेल देवाला आवडणार नाही म्हणून कुणी खोट बोलत नसेल तर माझ्या सदसद विवेक बुद्धीला पटत नाही म्हणून मी खोट बोलणार नाही असे कुणी असतील. आता माझे मत. देव बहुसंख्यांसाठी स्वस्तातला सायकियाट्रिस्ट आहे. अनेकांना आपले मानसिक आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. शेवटी ती अ‍ॅबस्ट्रॅक्ट संकल्पना आहे. सायकॉलॉजी हा ही तसाच अ‍ॅबस्टॅक्ट आहे
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Fri, 02/23/2018 - 06:23 नवीन
दाभोलकर नेहमी म्हणायचे की देवावर श्रद्धा ठेउन जर कुणी विवेकी राह्त असेल तर आमच भांडण नाही.
परफेक्ट आणि प्रिसाईझ...कारण त्यात भांडण करण्यासारखं काहीच नाही. देवावर विश्वास ठेवा पण विवेकी रहा हा प्रबोधनाचा मार्ग सोडून (जो अनेक संतांनी/समाजसुधारकांनी अवलंबला होता) सोडून देवच नाही हे सिद्ध करण्याचा मार्ग (म्हणजे ना राहेगा बांस ना बजेगी बासुरी स्टाईल) या आजकालच्या अ-देवाळुनी का अवलंबला असेल हे कोडेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Fri, 02/23/2018 - 06:24 नवीन
गरज विवेकी धर्मजागराची हा दाभोलकरांचा लेख वाचल्यास हे नक्कीच लक्शात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 06:49 नवीन
दाभोलकर नेहमी म्हणायचे की देवावर श्रद्धा ठेउन जर कुणी विवेकी राह्त असेल तर आमच भांडण नाही.
नास्तिकांना दाभोळकर कळत नाही, देव काय कळणारे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
ग
गामा पैलवान Fri, 02/23/2018 - 14:50 नवीन
प्राडॉ,
देव नावाची कल्पना कोणाला मदत करीत नाही आणि ती कोणालाही शिक्षा देत नाही, हेच सत्य आहे.
हे विधान 'सत्य' हा भाव न वापरता लिहिता येईल काय? तसं लिहिलंत तर मी ते मान्य करेन. आत्मभाव देखील सत्याचाच भाग आहे. त्यामुळे 'मी सांगतो म्हणून ....' अशा तऱ्हेचा युक्तिवाद देखील नको. शिवाय आजून एक खटकलेली बाब म्हणजे 'यदाकदाचित ईश्वर अस्तित्वात असलाच तर त्याने निरीश्वरवाद्यांना शिक्षा केलीच पाहिजे' हे गृहीतक. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
य
यनावाला Fri, 02/23/2018 - 16:28 नवीन
तर्कसुसंगत निष्कर्ष " देव नास्तिकांना शिक्षा का करीत नाही ?" हे वाचून सहज लक्षात येते की नास्तिकाने आस्तिकांना विचारलेल्या या प्रश्नाचा प्रारंभीचा अध्याहृत भाग "जर देव अस्तित्वात आहे तर तो...."असा आहे. आस्तिक लोक देवाचे अस्तित्व सत्य मानतातच. तसेच सर्व माणसे देवाची लेकरे आहेत असेही ते म्हणतात. आपले मूल जर चुकीचे वागत असेल तर सन्मार्गावर आणण्यासाठी पालक त्याला शिक्षा करतात. तद्वतच नास्तिकांनी देवा-धर्मावर श्रद्धा ठेवावी म्हणून मायबाप देवाने त्यांना शिक्षा करायला हवी, अशी अपेक्षा योग्यच आहे. देव सर्वज्ञ आहे. नास्तिकतेच्या कुमार्गाला कोण लागले आहेत ते त्याला समजतेच. तसेच देव सर्वसमर्थ असल्याने तो कोणतीही शिक्षा सहज देऊ शकतो. पण असे होताना दिसत नाही. आपले जे परिचित आणि नातेवाईक आस्तिक आहेत त्यांचे जीवन सुखमय आणि आनंदी आहे. तर आपल्या आयुष्यात दु:खे, त्रास इ.गोष्टी लक्षणीय प्रमाणात अधिक आहेत असे नास्तिकांना दिसले असते तर आपल्या नास्तिकतेचा हा दुष्परिणाम आहे असे त्यांच्या लक्षात आलेच असते आणि त्यांनी आस्तिकतेचा स्वीकार केला असता. पण सुख-दु:खाचे प्रसंग सर्वांवर येतात . तिथे आस्तिक-नास्तिक असा भेद दिसतच नाही. म्हणजे प्रतिदिनी फुलपुडी आणून नित्यपूजा, तसेच परंपरे अनुसार नैमित्तिक पूजा करणारा भाविक आणि देवाचे अस्तित्व नाकारून कधीही देवपूजा न करणारा नास्तिक हे दोघे देवाच्या लेखी सारखेच! यावरून देव अस्तित्वात नाही असाच निष्कर्ष निघतो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 02/23/2018 - 16:42 नवीन
निष्कर्ष अगदी पटण्यासारखा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 17:02 नवीन
विनोद अगदी हसण्यासारखा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग
गामा पैलवान Fri, 02/23/2018 - 16:58 नवीन
यनावाला,
म्हणजे प्रतिदिनी फुलपुडी आणून नित्यपूजा, तसेच परंपरे अनुसार नैमित्तिक पूजा करणारा भाविक आणि देवाचे अस्तित्व नाकारून कधीही देवपूजा न करणारा नास्तिक हे दोघे देवाच्या लेखी सारखेच! यावरून देव अस्तित्वात नाही असाच निष्कर्ष निघतो.
साफ चूक. यावरून देव समदर्शी आहे असं दिसून येतं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 17:01 नवीन
नास्तिकाने आस्तिकांना विचारलेल्या या प्रश्नाचा प्रारंभीचा अध्याहृत भाग "जर देव अस्तित्वात आहे तर तो...."असा आहे.
हे सांगायची गरज नाही. लोकांनी बरेच प्रतिसाद असं मानूनच लिहिलेत. चर्चा याच्या फार पुढे गेलेली आहे. तुम्ही माझा तुमच्या पहिल्याच पॅराग्राफवरचा प्रतिसाद वाचलेला असेलच नि नेहमीप्रमाणे तुम्हाला कळला नसेल. ------------------------------------------
आपले मूल जर चुकीचे वागत असेल तर सन्मार्गावर आणण्यासाठी पालक त्याला शिक्षा करतात.
शिक्षा करत नाही. केली तरी लूटूपूटूची करतात, आंतरिक प्रेम असतंच. लहान मुलांना पालकांच्या शिक्षांनी आपले जीवन दु:खी इ वाटते का??तुमचा नियम इतका सरळधोट असता तर जगात असंस्कारित मुले मोठी होउच शकली नसती. --------------- देव म्हणजे हिरण्यकश्यपू हे कुणी शिकवलं तुम्हाला? लोकशाहीत सार्वभौम सत्ता असून विरोधकांना वा विरोधी मतदारांना मर्त्य अतिशय स्वार्थी लोकांनी बनलेलं सरकार काही करत नाही इतकं ते सज्जन असतं. मग देव काय इतका फालतू असतो का त्याला नाही मानलं तर शिक्षा करत सुटेल?
यावरून देव अस्तित्वात नाही असाच निष्कर्ष निघतो.
नास्तिकांना काय असतं नि काय नसतं हे फार व्यवस्थित कळतं असं दिसतंय. तेव्हा गुरुत्वाकर्षण तरंग आहेत कि नाहीत हे कळण्यासाठी प्रयोग करूच नये. थेट नास्तिकाला विचारावं, 'सांग रे बाबा, हे तरंग असतात कि कसे?' ------------------------- यना, देव असतो का नसतो ते जाऊ द्या, पण जे काय महातार्किक लिहिलंय त्यावरनं हे सिद्ध होतंय कि जो जो कोणी अस्तित्वात असतो तो तो त्याला न मानणारांचे जगणे हराम करत असतो. बस्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
ब
बिटाकाका Fri, 02/23/2018 - 17:01 नवीन
कोणातरी, टिपिकल अंधश्रद्धाळू, देवभिरु क्ष आस्तिकाला आणि त्याच्या देवाच्या, देवाच्या न्याय करण्याच्या पद्धतीच्या कल्पनेला बेसलाईन पकडून मुद्दे मांडले की असं होतं. ************************* देव कोणालाही अशीच शिक्षा करत नाही, देव शिक्षाच करत नाही न्याय करतो, नास्तिक देवावर विश्वास ठेवत नाही हा अस्तिकतेच्या पुस्तकातील गुन्हा नाहीये असे समजणारे आस्तिक असतात हेच मुळात (आधीच, पूर्वग्रहाने) नाकारलेले असल्याने बाकीची चर्चा वांझोटी ठरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 17:03 नवीन
देव असतो का नसतो ते जाऊ द्या, पण जे काय महातार्किक लिहिलंय त्यावरनं हे सिद्ध होतंय कि जो जो कोणी अस्तित्वात असतो तो तो त्याला न मानणारांचे जगणे हराम करत असतो. बस्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
ग
गवि Fri, 02/23/2018 - 17:06 नवीन
यावरून देव अस्तित्वात नाही असाच निष्कर्ष निघतो.
देव ही संकल्पना नेमकी काय आहे याची विशिष्टताच अशा मांडणीने पुसली जाते. देव , as we think of अशा प्रकारचा देव अस्तित्वात नाही इतकंच सिद्ध करायचंय का? देव अशी व्यक्ती किंवा एक युनाइटेड शक्ती अस्तित्वात नाहीच आहे. पण देव हे "चांगुलपणा", "व्यक्तिगत तात्कालिक हितापेक्षा दीर्घकालीन सार्वत्रिक हित पाहणारा सद्विचार" इत्यादि अनेक गोष्टींचं "प्रतीक" आहे. ज्यांना समूर्त झेपतं त्यांना समूर्त, ज्यांना अमूर्त झेपतं त्यांना अमूर्त. हे सद्विचार, चांगुलपणा वगैरे कितपत उपयुक्त किंवा योग्य आहेत यावर मतभेद संभवतो. पण त्या चांगुलपणाचं देव ही कल्पना हे एक आदर्श प्रतीक आहे. त्याचं भौतिक अस्तित्व फिजिक्सच्या नियमांनी शोधायला जाल तर तातडीने "त्याचं अस्तित्व नाही" असं सिद्ध करता येईल. पण प्रतीकाशिवाय स्मरण राहात नाही हो लोकांना. वडील वारुन वीसतीस वर्षं झाली की लोकांना माहीत असतं हो की आपले वडील अस्तित्वात नाहीत. कोणी फोटो लावतो, कोणी लावत नाही. पण आयुष्यातल्या एका मोठ्या भागाचं, अनेक गुणांचं प्रतीक म्हणून ते वडील असतातच. मलाही माहीत नाही की देव आहे का किंवा कसा आहे. पण त्याला एक भौतिक अस्तित्व म्हणून सिद्ध किंवा असिद्ध करण्यातला तर्क समजत नाही. आपल्या अस्तित्वातला चांगुलपणा याचंच देव ही "संकल्पना" हे एक प्रतीक आहे. त्याचं स्मरण भजन पूजन हे चांगुलपणा या गुणाला दिलेला सन्मान आहे असा विचार करुन पाहता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 17:10 नवीन
त्याचं भौतिक अस्तित्व फिजिक्सच्या नियमांनी शोधायला जाल तर तातडीने "त्याचं अस्तित्व नाही" असं सिद्ध करता येईल.
गवि, असं अजिबात नाही. ईश्वराचं भौतिक अस्तित्व विज्ञान नाकारत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
सतिश गावडे Fri, 02/23/2018 - 17:18 नवीन
ईश्वराचं भौतिक अस्तित्व विज्ञान नाकारत नाही.
भौतिक शास्त्रज्ञानी देव कणांचा शोध लावला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 17:26 नवीन
अस्तित्व ही संकल्पना विज्ञानाच्या दायर्‍या बाहेर आहे. जे अस्तित्वात आहे नि समोर आहे ते आतापर्यंत कितपत समजलं आहे इतकंच विज्ञान सांगतं. काय असू शकतं नि काय असू शकत नाही हे विज्ञानाच्या स्कोपमधेच येत नाही. https://science.howstuffworks.com/innovation/scientific-experiments/scientific-method10.htm
Clearly, the scientific method is a powerful tool, but it does have its limitations. These limitations are based on the fact that a hypothesis must be testable and falsifiable and that experiments and observations be repeatable. This places certain topics beyond the reach of the scientific method. Science cannot prove or refute the existence of God or any other supernatural entity. Sometimes, scientific principles are used to try to lend credibility to certain nonscientific ideas, such as intelligent design. Intelligent design is the assertion that certain aspects of the origin of the universe and life can be explained only in the context of an intelligent, divine power. Proponents of intelligent design try to pass this concept off as a scientific theory to make it more palatable to developers of public school curriculums. But intelligent design is not science because the existence of a divine being cannot be tested with an experiment.
विज्ञानाच्या नावाने आपले ईश्वरविषयक अज्ञान खपवण्यात उत्साही पुरोगामी नास्तिक तरबेज असतात. हा. हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 02/24/2018 - 05:04 नवीन
विज्ञानाच्या नावाने आपले ईश्वरविषयक अज्ञान खपवण्यात उत्साही पुरोगामी नास्तिक तरबेज असतात. हा. हा. बरोबर ओळखलंत तुम्ही. आणि अशा लोकांना उघडे पाडण्याचे तुम्ही जे धर्मकार्य अंगिकारले आहे त्यासाठी तुमच्याबद्दल माझ्या मनात अतीव आदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ग
गवि Fri, 02/23/2018 - 18:02 नवीन
ईश्वराचं भौतिक अस्तित्व विज्ञान नाकारत नाही.
विज्ञान कशाचंच अस्तित्व नाकारत नाही. शब्द बदलून असं म्हणावं की एखादी थियरी सिद्ध करताना "देव जसा आज लोकांच्या समजुतीत आहे तशा रूपात तो अस्तित्वात आहे" असं गृहीतक सध्यातरी "इनव्होक" करण्याची गरज विज्ञान (आजरोजी) मानत नाही. मुद्दा तो नाही. देवकण किंवा अन्य त्यापुढचंही काही सध्याच्या ज्ञाताच्या जरा जरा पलीकडचं दिसायला लागलं तरी लगेच देवाचं भौतिक अस्तित्व सिद्ध, मान्य वगैरे होऊ शकत नाही. यांचं मुख्य कारण म्हणजे ईश्वराचं अस्तित्व मानणं हे कशाचंच उत्तर असू शकत नाही. ते फक्त "प्रश्न ट्रान्सफर करणं" आहे. विज्ञान "उत्तरं" शोधत असतं. तेव्हा सध्या तरी देव ही संकल्पना भल्याचं प्रतीक आहे आणि म्हणून ज्याच्या मनात ते आहे त्याच्या मनात ते असू दे. आवर्जून त्याचं भंजन करु नये असं मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 17:18 नवीन
तसेच सर्व माणसे देवाची लेकरे आहेत असेही ते म्हणतात. आपले मूल जर चुकीचे वागत असेल तर सन्मार्गावर आणण्यासाठी पालक त्याला शिक्षा करतात.
यना, यना जरा धीरानं घेत जा. अहो, सर्व माणसे देवाची जैविक लेकरे आहेत असं कोणी मानत नाही हो. हे एक बोलायची पद्द्धत झाली. ब्रह्मांडातील सर्व अस्तित्वांमधे (वा जगातल्या सर्व चेतनाचेतन गोष्टींमधे वा असेच काही) एक आंतरसंबंध आहे असा नि असाच त्याचा व्यवहार्य अर्थ निघू शकतो. या आंतरसंबंधाचे स्वरुप म्हणजे जैविक बंधु वा भगिनी नव्हे. जरी एक आत्मियतेचा भाव असला तरी डायरेक्ट कुटुंबाचं उदाहरण देत सुटावं असा अभिप्रेत अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा