Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...

य
यनावाला
Mon, 02/19/2018 - 16:03
🗣 247 प्रतिसाद
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावाला जगनिर्माता, जगन्नियंता, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, ईश्वर अस्तित्वात आहे असे आस्तिक लोक मानतात. किंबहुना अशा ईश्वराचे अस्तित्व सत्य मानणार्‍यांना आस्तिक म्हणतात. आस्तिक शब्दाचा हाच अर्थ आज प्रचलित आहे. ( काहीजण केवळ जगनिर्मात्या ईश्वराचे अस्तित्व मानतात. --म.फुले यांनी त्याला निर्मिक म्हटले आहे.-- उपासनेचा देव मानत नाहीत. पण त्यांची संख्या नगण्य आहे.) जगातील बहुसंख्य माणसे अजून आस्तिक आहेत. " ईश्वर अस्तित्वात नाही." हे ठामपणे सांगणारे निरीश्वरवादी भारतात अगदी वेदकाळापासून आहेत. आता या विज्ञानयुगात त्यांची संख्या वेगाने वाढते आहे. सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान असा देव जर आहे तर तो आपल्या अस्तित्वाची प्रचीती सर्व माणसांना येईल असे कांहीच का करीत नाही ? इतका लपून-छपून का राहतो ? आपले अस्तित्व दाखविण्यात त्याला कोणती अडचण आहे ? तसेच त्याचे जे गुणवर्णन आहे त्यांतील एकाही गुणाचा अनुभव कधीही येत नाही. संकटात देव धावून आला आहे असे कधीही घडत नाही. हे कसे ? दीन-दुबळ्यांवर अन्याय होतो, निष्पाप बालिकेवर अत्याचार होतो या प्रत्यही घडणार्‍या घटना तो करुणासागर देव निष्क्रियपणे पाहात कसा राहातो? आस्तिक लोक अशा घटनांविषयीं विचार करीतच नाहीत. त्यांना त्यांची श्रद्धा टिकवून धरायची असते. ती अशा घटनांनी डळमळली तर काय करायचे ? आपल्याला कोणाचा आधार आहे ? अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे अन्यायपीडित व्यक्ती पूर्वजन्मीच्या पापाचे फळ भोगतात असले बुद्धीला न पटणारे काहीतरी भोंगळ तत्त्व श्रद्धेने खरे मानून मनाचे समाधान करतात. आपण देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली, देवासाठी जी कर्मकांडे परंपरे अनुसार करीत आहोत ती सोडून दिली तर देव आपल्यावर कोपेल. शिक्षा करील. अशी भीतीही त्यांना वाटत असावी. या संदर्भात डॉ.र.धों.कर्वे यांचे एक विधान आहे. ते म्हणतात, "माणूस देवाला नमस्कार करतो तो "दुर्जनं प्रथमं वन्दे ।" या न्यायाने. म्हणजे देवाने आपल्यावर कोप करू नये, आपले कांही वाईट करू नये म्हणून. हे पटण्यासारखे आहे. यावर आस्तिकांनी थोडा विचार करावा. जगात निरीश्वरवादी माणसे पूर्वीपासून आहेत; हे आस्तिकांना ठावूक आहेच ते नास्तिक देवा-धर्माचे कोणतेही कर्मकांड करीत नाहीत. देवाला हात जोडून त्याच्यापुढे नतमस्तक होत नाहीत. एवढेच नव्हे तर देवाचे अस्तित्वसुद्धा नाकारतात . आता प्रश्न असा पडतो की त्या नास्तिकांना देव शिक्षा का करीत नाही ? देव सर्वज्ञ आहे. जगात निरीश्वरवादी लोक आहेत. ते कधी माझी पूजा-अर्चा-प्रार्थना करीत नाहीत. मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील. देवाचे अस्तित्व मुकाट्याने मानतील. त्याची पूजा-अर्चा करू लागतील. आस्तिक-नास्तिक वाद मिटून जाईल. हे देवाला नको आहे का? नास्तिकांना कडक शासन करणे देवाला अशक्य आहे का? तो सर्वशक्तिमान आहे ना ? मग त्याच्या दृष्टीने एवढी सोपी असलेली गोष्ट तो स्वत: का करीत नाही ? देवदर्शनाला जाणार्‍या तसेच दर्शन घेऊन परत येणार्‍या भक्तांच्या वाहनांना अपघात का होतात ? त्यात अनेक भक्त का मरतात ? कोणी म्हणतील -आस्तिकांच्याच वाहनांना अपघात होतात का ? नास्तिकांच्या वाहनांना होत नाहीत ? -- होतातच. गाडीत कोण बसले आहेत ? आस्तिक का नास्तिक ? भूकंपात जखमी झालेल्या माणसांवर उपचार करण्यासाठी जाणारे डॉक्टर का घरफोडीसाठी जाणारे दरोडेखोर ? याचा अपघाताशी कांही संबंध नसतो. अपघाताची कारणे वेगळी असतात.नास्तिकांच्या वाहनांना अपघात होऊ शकतो हे सत्यच आहे. प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष ईश्वराचे अस्तित्व नाकारणार्‍या नास्तिकांना तो शिक्षा का करत नाही ? आणि या प्रश्नाचे सत्य उत्तर असे आहे की,ईश्वर अस्तित्वातच नाही. वास्तव काय आहे ? सुख-दु:खाचे प्रसंग सर्वांवर येतात. आस्तिकांवर येतात तसे नास्तिकांवरही येतात. श्रीमंतांवर येतात. गरिबांवर येतात. आस्तिक लोक देवाचे भजन-पूजन करतात, नामस्मरण करतात म्हणून त्यांच्यावर दु:खाचे प्रसंग क्वचितच येतात तर नास्तिक लोक देवाचे काहीच करीत नाहीत म्हणून त्यांच्यावर सतत दु:खाचे डोंगर कोसळतात असे मुळीच दिसत नाही. जगन्नियंता देव अस्तित्वात असेल तर असे घडायला हवे. नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही. यावरून कोणता निष्कर्ष निघतो ? अनेक नास्तिक चांगले मानसन्मानाचे, प्रसिद्धीचे, समृद्धीचे जीवन जगले. काही नावे सांगायची तर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, रॅंग्लर र.पु.परांजपे, प्राचार्य दि.धों.कर्वे, डॉ.र.धों.कर्वे, सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर, श्री.ना.पेंडसे, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अभिनेते डॉ.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर आदि अनेकानेक. देवाचे अस्तित्व न मानल्यामुळे त्यांना कोणत्याही विशेष अडचणींना सामोरे जावे लागले नाही. तसेच या सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना उदंड लोकप्रियता लाभली. मान-सन्मान मिळाले. सर्वार्थाने त्यांचे जीवन समृद्ध होते. अनेक सद्विचारी, सदाचारी, सज्जन आस्तिकांना आयुष्यात मोठे दु:ख भोगावे लागले. देवाने त्यांच्यावर कांही कृपा केली नाही. दोन उदाहरणे द्यायची तर तुकाराम महाराजांच्या काळात महाराष्ट्रात लागोपाठ चार वर्षे दुष्काळ पडला. तुकारामांच्या कुटुंबाची अन्नान्न दशा झाली. त्यांची पहिली पत्‍नी भूकबळी ठरली. त्यांनी लिहिले आहे, "दुष्काळे आटले द्रव्य गेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता गेली. आता काय खावे कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥ विठ्ठलाच्या या निष्ठावंत भक्ताची अशी अवस्था झाली. रामकृष्ण परमहंस कालीमातेचे परम भक्त होते. "स्वत: माता माझ्याशी बोलते " असे ते सांगत. त्यांना घशाचा कॅंन्सर झाला. अन्नाचा घास गिळता येईना. भक्तांनी विनवले की, " तुम्ही कालीमातेला साकडे घाला. ती तुमचा आजार बरा करील." परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली -इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज. " खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. इतर लोक जेवतात त्याने रामकृष्ण परमहंस यांचे पोट भरते का ? त्यांना भूक लागणार नाही का ? तात्पर्य एवढेच की आस्तिक माणसांना, देवभक्तांना सुद्धा दु:खे भोगावी लागतात. त्यांच्यासाठी देव काहीच करू शकत नाही. तो अस्तित्वाच नाही तर काय करणार ? पण अशा सुप्रसिद्ध आस्तिकांचाच विचार का करायचा ? शंभर वर्षांपूर्वीच्या हिंदु समाजाचा विचार करावा. त्याकाळी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था होती. चौथा वर्ण शूद्र . ते सगळे आस्तिकच होते. इतर तीन वर्ण त्यांना अस्पृश्य मानत. हे लोक निरक्षर होते. अज्ञानी होते. अत्यंत दीनवाणे अपमानास्पद जीवन जगत होते. जो देव आहे असे ते मनापासून मानत होते त्या देवाने त्यांच्यासाठी काहीच केले नाही. करुणासागर देवाला त्यांची दया आली नाही. देश स्वतंत्र झाला. प्रजासत्ताक स्थापन झाले. संविधान लागू झाले. तेव्हा कागदोपत्रींतरी अस्पृश्यता गेली. या दलितांचा उद्धार देवामुळे झाला नाही. डॉ.आंबेडकरांमुळे झाला. कांहीजण बाबासाहेबांनाच देव मानतात. तसे मानणे हा त्यांचा अपमान आहे हे त्या दलितांच्या ध्यानी कसे येत नाही ? कवि विंदा करंदीकर म्हणतात, "देवातुनी समाजा ज्याने विमुक्त केले । त्यालाच देव करिती याला इलाज नाही. ॥" तर अशा या देवाचे अस्तित्व खरे कसे मानता येईल ? देव अस्तित्वात नाही हेच बुद्धीला पटणारे सत्य आहे. देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे. मात्र परंपरेने आलेले जे सण-सुदिन आहेत ते समाजाचे आनंद सोहळे आहेत. ते अवश्य साजरे करावे. त्यांच्या धार्मिक महत्त्वापेक्षा सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे. अन्यथा जीवन एकसुरी, नीरस होईल. .................................................................................
वर्गीकरण
चर्चा (काथ्याकूट)

प्रतिक्रिया द्या
82228 वाचन

💬 प्रतिसाद (247)
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 17:19 नवीन
तसेच सर्व माणसे देवाची लेकरे आहेत असेही ते म्हणतात. आपले मूल जर चुकीचे वागत असेल तर सन्मार्गावर आणण्यासाठी पालक त्याला शिक्षा करतात.
यना, यना जरा धीरानं घेत जा. अहो, सर्व माणसे देवाची जैविक लेकरे आहेत असं कोणी मानत नाही हो. हे एक बोलायची पद्द्धत झाली. ब्रह्मांडातील सर्व अस्तित्वांमधे (वा जगातल्या सर्व चेतनाचेतन गोष्टींमधे वा असेच काही) एक आंतरसंबंध आहे असा नि असाच त्याचा व्यवहार्य अर्थ निघू शकतो. या आंतरसंबंधाचे स्वरुप म्हणजे जैविक बंधु वा भगिनी नव्हे. जरी एक आत्मियतेचा भाव असला तरी डायरेक्ट कुटुंबाचं उदाहरण देत सुटावं असा अभिप्रेत अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
A
arunjoshi123 Fri, 02/23/2018 - 17:31 नवीन
तद्वतच नास्तिकांनी देवा-धर्मावर श्रद्धा ठेवावी म्हणून मायबाप देवाने त्यांना शिक्षा करायला हवी, अशी अपेक्षा योग्यच आहे.
डोळ्यासमोर दिसणार्‍या आईबापांना लेकरे अस्तित्वातच नाहीत असे का म्हणतील? आणि म्हणू लागले तर मानसोपचारासाठी नेतील, शिक्षा का देतील? ================== ज्या लेकरांची मायबापांवर श्रद्धा नाही त्यांना ते मायबाप १००% केसेस मधे शिक्षा देतातच असं कुठं पाहिलंत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
ज
जानु Fri, 02/23/2018 - 18:38 नवीन
यापेक्षा प्रतिसाद नसता दिला तर बर झाले असते. कमीत कमी झाकली मुठ .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
स
सुबोध खरे Sat, 02/24/2018 - 11:28 नवीन
देव सर्वसमर्थ असल्याने तो कोणतीही शिक्षा सहज देऊ शकतो. पण असे होताना दिसत नाही सकाळ झाल्यावर आपल्याला "अंधार समजून" सूर्य खाऊन टाकेल या भीतीने कावळे ओरडत असतात वयं काक: काक:. याचा वरील लेखाशी संबंध आहे असे वाटल्यास तो योगायोग समजावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
अ
अर्धवटराव Fri, 02/23/2018 - 22:27 नवीन
सृष्टीच्या इतिहासात अगदी अलिकडे अवतरलेला माणुस नावाचा यःकश्चीत प्राणी आपल्या सुख-दु:खांच्या आणि नैतीक-अनैतिकतेच्या कल्पना केंद्रस्थानी ठेऊन सॄष्टीचं नियमन त्यानुसार का होत नाहि वगैरे चॅलेंज करतो. आपण नेमके काय आहोत, कसे आहोत याची कणभर देखील जाणीव झाली नसताना पार न्याय-अन्यायाच्या बाता मारणे.... किती कॉमेडी सुरु आहे.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 02/24/2018 - 05:10 नवीन
यनावाला सृष्टीच्या नियमांना आव्हान देत नसून माणसाच्या मनातील देव कल्पनेला आव्हान देत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
प
प्रकाश घाटपांडे Sat, 02/24/2018 - 05:35 नवीन
हे खरच आहे.पण मन या गोष्टीचे आकलन पुर्णपणे झाले आहे का? देव ही संकल्पना मनात का रुजली? मेंदु आणि मन याचा परस्पर सबंध कसा आहे की ते एकच आहे? असे अनेक प्रश्न या आव्हाना सोबत पण येतातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 02/24/2018 - 07:22 नवीन
मला या मनविषयक प्रश्नांची उत्तरे माहिती नाहीत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
अ
अर्धवटराव Sat, 02/24/2018 - 05:49 नवीन
"निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करत नाहि" या वाक्यात एखाद्या मानवी मान्यतेवर दुसर्‍या एखाद्या व्यवस्थेकडुन जजमेण्ट का दिलं जात नाहि, असा काहिसा अर्थ मला उमगतोय. तेंव्हा मानवी मनाच्या उगमापासुनच्या घडामोडी आणि त्यावर मिळणारी कलेक्टीव्ह रिअ‍ॅक्शन याबाबत काहि बेसीक चिंतन झालेलं असावं अशी किमान अपेक्षा आहे. असो. बाकी सदर धागाकर्ता कुठल्याच कल्पनेला आव्हान वगैरे देत नाहि आहे. रिकामटेकड्यांचे देव-देव करण्याचे उद्योग आणि त्याला 'प्रबोधनाचे' डोज पाजण्याचे उद्योग यातील कृती जरी नेमक्या उलट असल्या तरी त्याची पत एकच असते. इट्स लाइक अ पिरॅमीड. त्याच्या टोकावर बसलेत नारायणराव. एक ब्लॉक खाली "ईश्वरी रिअलायझेशन" असणारे असे काहि तुरळक जीव. आणखी खालच्या पातळीवर "ईश्वरी संकल्पना" उमगलेले जीव. मग येतो "ईश्वरी कल्पनेचा" मोठा ब्लॉक. त्याच्या खाली "ईश्वरी बिझनेस"चा प्रचंड मोठा ब्लॉक. सर्वात खाली "ईश्वरी मनोरंजनाचा" सगळ्यात मोठा ब्लॉक. या बॉटम ब्लॉकवर आस्तीक-नास्तीक, सो कॉल्ड श्रद्धा-डबल सो कॉल्ड विवेक अशी कुस्ती सुरु असते. ते तसंही सिरीयसली घेऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 02/24/2018 - 06:18 नवीन
वरकरणी अगदी छोट्या वाटणार्‍या या प्रतिसादात तुम्ही बरेच मुद्दे मांडले आहेत. आणि त्या मुद्द्यांमध्ये दमही आहे. तुमची पिरामिडची उपमा आवडली. मात्र तुम्ही तुमच्या ईश्वरविषयक धारणेनुसार नारायणरावांना तुम्ही पिरामिडच्या टोकावर बसवलेत. माझ्या ईश्वरविषयक धारणांनूसार ते टोक अज्ञानाचे आहे (म्हणजे ही सृष्टी कशी निर्माण झाली, कशी चालते याबद्दल ठामपणाने काहीच बोलता येत नाही. भविष्यात एखादे नविन आकलन होऊन महास्फोट आणि उत्क्रांतीसुद्धा कविकल्पना ठरु शकतील या मताचा मी आहे.) सविस्तर दुसर्‍या एखाद्या प्रतिसादात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Sat, 02/24/2018 - 14:48 नवीन
तुम्ही नारायणराव म्हणा, शंभूसाहेब म्हणा, ओंकारगुरुजी म्हणा, मायबाई म्हणा किंवा काहिच म्हणु नका... हे सगळे पिरॅमीड टोकाच्या जवळ गेल्यावरचे धंदे आहेत. 'नर ऐसी करनी करे कि नर का नारायण होए' असं जेंव्हा कबीर म्हणतो तेंव्हा त्याला एखाद्या मिपाकरांस एकदम दोनाच्या ऐवजी चार हात फुटावे , आणि तो मस्तपैकी अजगरावर बसुन स्मीमींगपूलमधे चकरा मारु लागावा असं काहि अभिप्रेत नसतं. आणि त्याने आपल्या भाटांव्यतीरीक्त इतरांना शिक्षा देत सुटावं असं तर अजीबात नसतं. जाऊ देत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
A
arunjoshi123 Sat, 02/24/2018 - 06:24 नवीन
मनात आणलं तर यनावाला सृष्टीच्या नियमांना देखील आव्हान देऊ शकतात असं वाटतं. त्यांना ढोलकीवाल्यांची नीट साथ मिळाली तर सृष्टीच्या नियमांनाच काय सृष्टिलाच आव्हान करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 02/24/2018 - 05:09 नवीन
अजो, एकदा तुमचा देव कसा आहे ते तरी सांगा. :)
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Sat, 02/24/2018 - 06:49 नवीन
माझा देव असं काही असतं का? माझ्यासाठी सवता देव असावा असं असण्याचं काही कारण नाही. इंग्रजी: I suppose God is a common commodity. सर्व लोकांची जी सर्वसामान्य धारणा आहे त्यापुढे जाऊन मी काही अभ्यास केलेला नाही. धारणांतील विरोधाभासांचा अभ्यास चर्चांमधून मात्र खूप झाला आहे. ---------------------- ज्या लोकांना त्या क्षेत्रातलं कळतं, अभ्यासता येतं, माझ्यासारख्या कमी समजूत नि वेळ असलेल्या सामान्य बुद्धिमत्तेच्या माणसासमोर मांडता येतं, त्यांच्या मतांवरील आव्हानांना तोंड देता येतं आणि जे लोकप्रसिद्ध आहे ते म्हणणं मी माझा विवेक न लावता स्वीकारतो. -------------------------- माझ्या ईश्वरविषयक धारणा काय आहेत व त्या कसकश्या विकसित होत आल्यात ते एका सवत्या लेखात सवडीप्रमाणे. --------------------------- बाकी, नास्तिकीय मूर्खतांमधे मला डॉक्टरेट आहे असं आरामात म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 02/24/2018 - 07:18 नवीन
माझा देव असं काही असतं का?
हो असतो ना. म्हणून तर विचारले. उदाहरणार्थ काहींचा देव संकटात धावून येतो. त्यांच्या भल्या बुर्‍या कृत्यांवर त्या देवाचे लक्ष असते आणि वाईट कृत्याची तो शिक्षा देतो. तर चांगल्या वागणुकीचे, देवाच्या भक्तीचे देव चांगले फळ देतो. काहींचा देव यातले काही करत नाही. त्याने एकदाच सृष्टी निर्माण केली, ती कशी चालेल याचे नियम बनवले आणि आता निवांत हा सृष्टीचा खेळ पाहत बसला आहे. तो त्या खेळात काही ढवळाढवळ करत नाही. वगैरे. या अंगाने मी तुमचा देव कसा आहे हा प्रश्न मी विचारला आहे.
बाकी, नास्तिकीय मूर्खतांमधे मला डॉक्टरेट आहे असं आरामात म्हणता येईल.
एव्हढी खात्री बरी नव्हे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
य
यनावाला Sat, 02/24/2018 - 07:32 नवीन
बुद्धिदाता ? देव बुद्धिदाता आहे. सर्व प्राणिमात्रांना देवच बुद्धी देतो. गणेश हा देव बुद्धिदाता आहे. असे बहुसंख्य आस्तिक मानतात. म्हणजे त्यांच्यामते निरीश्वरवाद्यांनासुद्धा देवच बुद्धी देतो. आता प्रश्न असा पडतो की जो बुद्धी देतो त्याचेच अस्तित्व नाकारण्याची बुद्धी निरीश्वरवाद्यांना होते तरी कशी ? बुद्धिदात्याचे अस्तित्वच नाकारण्याची बुद्धी कोण कशी देतो ?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 02/24/2018 - 09:40 नवीन
देव बुद्धी देतो की नाही हा प्रश्न वेगळा. पण, देवाने दिलेली असो किंवा उत्क्रांतीने नैसर्गिकरित्या मिळालेली असो... मानवाची बुद्धी हे एक दुधारी (किंवा अनेकधारी) शस्त्र आहे ! प्रत्येक जण ते आपापल्या कुवती/औकातीप्रमाणे वापरतो. एखादा मानव आपल्या बुद्धीचा उपयोग... "या जगात कोणताच मानव सर्वज्ञ असू शकत नाही आणि मानवाच्या संवेदना व समजेपलिकडे असंख्य गोष्टी आहेत, हे सत्य जाणून, विनयशीलतेने इतरांचे म्हणणे, मन, भावना, इ समजून घेऊन मग"... आपले म्हणणे समंजसपणे सांगण्यासाठी करतो. अशी माणसे स्वतः सुखी असतात आणि दुसर्‍यांच्या उत्कर्षात व सुखात भर घालू शकतात. तर इतर कोण मानव आपण सर्वज्ञानी असल्याच्या कल्पनेत अंध होऊन अहंमन्य बनतो आणि आपल्याशी सहमत न होणार्‍या इतरांचा उपमर्द करण्यात धन्यता मानतो. हे अंधत्व इतक्या टोकाचे असू शकते की, "भौतीक व वैचारीक विविधता हा या सृष्टीचा मूलभूत गुणधर्म आहे आणि ते मानल्याशिवाय कोणत्याच गोष्टीचा सर्वांगिण, समतोल व शास्त्रिय विचार होऊ शकत नाही", हे त्याला दिसत नाही ! असा माणूस, स्वतः कधीच सुखी होऊ शकत नाही आणि दुसर्‍यांच्या सुखाची तर त्यांला पर्वाच नसते... आपल्याशी सहमत नसलेल्यांच्या सुखात विरजण टाकण्याचा त्याचा स्वाभाविक स्वभाव बनतो. आजूबाजूला पाहिले तर जगात वरच्या दोन्ही प्रकारांची, विशेषतः दुसर्‍या प्रकाराची, अनेक उदाहरणे दिसतील. मात्र, बुद्धी वापरून सरळ विचार केला तर तिचा पहिला उपयोग जास्त योग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
ह
हरवलेला Sun, 02/25/2018 - 00:09 नवीन
पहिल्या प्रकाराचं आंतरजालावर वर हे उदाहरण सापडलं P. L. Deshpande पु. लं. चा नम्रपणा, त्यांची वैचारिक झेप, त्यांचा बुद्धीप्रामाण्यवाद विशेष लक्षात घेण्यासारखा आहे. प्रत्येक धर्मातल्या अंधश्रद्धांवर केलेली टीका (फक्त हिंदू नव्हे) फार महत्वाची आहे. यनावाला, या गोष्टी तुमच्या लेखांमध्ये दिसत नाहीत, हे खेदाने नमूद करू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रकाश घाटपांडे Sun, 02/25/2018 - 06:09 नवीन
सहमत आहे http://www.misalpav.com/comment/983433#comment-983433
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ग
गामा पैलवान Sat, 02/24/2018 - 10:13 नवीन
यनावाला,
बुद्धिदात्याचे अस्तित्वच नाकारण्याची बुद्धी कोण कशी देतो ?
बुद्धी ही काय सांगून सावरून द्यायची वस्तू आहे का? नीरव मोदीला पंजाब न्याशनल ब्यांकेने अनधिकृतपणे पैसे दिले तरी त्याची नोंद ठेवावीच लागली ना? तशी बुद्धी दिल्याची नोंद दाखवायची म्हंटली तरीही दाखवता येत नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/24/2018 - 11:37 नवीन
एक पेशीय जीव उदा. जिवाणू किंवा अमीबा. हा पुढे का जातो? आपल्यासारखाच दुसरा जीव का निर्माण करतो? या मागे कोणती प्रेरणा / चैतन्य आहे. सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर असलेला विषाणू आपल्या सारखे असंख्य जोव कोणत्या शक्तीने आणि का निर्माण करतो? या चैतन्य किंवा शक्ती किंवा प्रेरणेला मी जर देव मानले आणि तिच्याप्रति कृतज्ञ राहिलो तर त्यात वावगे काय आहे? या एक पेशीय किंवा पेशी नसलेल्या आणि स्फटिकरूपात शतकानुशतके निर्जीव राहू शकणाऱ्या विषाणूंना मेंदूचं नसतो तर मन कुठून असणार? पण तरीही कोणत्यातरी गूढ चैतन्याने ते पुनरुत्पादन करतातच. केवळ या चैतन्याला देव मानायचे की नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 02/24/2018 - 12:45 नवीन
याच उत्तर अस दिल जात की या सर्वामागे कोणतीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही. हे सर्व आपोआप वा यदृच्छेने घडत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 02/24/2018 - 14:28 नवीन
आपो आप दगड का हलत नाही? घोडा म्हशीला का जन्म देत नाही? सजीव आपल्यासारख्याच सजीवाला का जन्म देतो. विषाणू काही तर्हेच्या सजीवांवरच का हल्ला करतात? १० मिनिटांपूर्वी जिवंत असलेला माणूस मृत होतो तेंव्हा त्याचे शरीर तसेच असते मग जीव जातो म्हणजे नक्की काय जाते? काही तरी प्रेरणा चैतन्य ऊर्जा आहे जे अजून आपल्याला समजलेले नाही. त्याला जर एखादा देव मानत असेल तर? तो केवळ आस्तिक आहे म्हणून त्याला मूर्ख म्हणायचे? बढिया है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Mon, 02/26/2018 - 09:15 नवीन
हे विश्व म्हणा वा निसर्ग म्हणा हे स्वयंभू व स्वयंचलित आहे असे गृहितक मांडले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
A
arunjoshi123 गुरुवार, 03/01/2018 - 10:08 नवीन
यावर तर अस्तिकांनी दावा सांगायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
A
arunjoshi123 Sat, 02/24/2018 - 16:42 नवीन
जर खालच्या जीवांस जाणिव नसेल (तसं वनस्पतींसही भावना असतात, हे असो.) तर वरच्या जीवांना देखील जाणिव असावयाचे कारण नाही. कारण दोहोंची पेशीय रचना समानच आहे. म्हणून खालच्या जीवाचे जगणे हे भौतिक रासायनिक आण्विक प्रक्रियांचा परिपाक असेल तर तेच आपल्यालाही लागू आहे. याचा थेट अर्थ यनावालांचं नास्तिक असणं त्यांच्या स्वेच्छेने नसून त्यांच्या डोक्यातील रसायनांमुळे आहे. तसेच असे असल्यामुळे त्यांनी कोणावर अस्तिक म्हणून टिका करायचा अतार्किक्पणा न करावा कारण असा अस्तिकी मूर्खपणा घडवून आणणारी रासायनिक क्रिया आहे नि त्यात त्या व्यक्तिचा दोष नाही. मात्र अशा निर्दोष व्यक्तिवर टिका करण्यात यनावालांचाही काही दोष नाही कारण असे विरोधाभासी वर्तन करावे अशीच त्यांची भौतिक रचना आहे! नास्तिकांचं विश्व खरोखरच सुंदर आहे! बर्‍याच लोकांना माझं लेखन अर्थहीन नि बेबंद वाटतं. त्याकरिता मी इंग्रजीत देखील लिहित आहे. त्यानं मला जो अभिप्रेत अर्थ आहे तो दोन प्रकारे मांडून झाल्याने कळेल. मी लिहिलं आहे ते चूक असू शकतं पण अर्थहीन नाही हे कळेल. If we choose to say that the micro-organisms don't have consciousness, there is no reason to believe that even the higher order organisms have it. It is because the cellular structure for both the entities is the same. Or we if say that the consciousness is on account of genetic complexity in the higher organisms, then one must concede that organisms including us don't need any consciousness to eat, to grow, to reproduce or to move, i.e. the basic things that micro-organisms do. This further leads to a conclusion that an atheist's own disbelief in god is not based on his intellect or free will but his physio-chemical setup. Same way, it is pointless to criticize a believer for being one as he is just following the outcome of his biological set-up. In turn it is pointless to criticize an atheist for criticizing a believer because that's how he is made. Thus everything is meaningless. Such is the beauty of atheist world.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 03/03/2018 - 08:28 नवीन
बर्‍याच लोकांना माझं लेखन अर्थहीन नि बेबंद वाटतं. आपल्या लेखन प्रतिसादाचं हे सार अगदी मनापासून पटलं. आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
य
यनावाला Mon, 02/26/2018 - 08:54 नवीन
देव आणि धर्म यांविषयी सुप्रसिद्ध लेखक पु.ल.देशपांडे यांचे विचार. ("एक शून्य मी" हे पु.लंच्या काही वैचारिक लेखांचे पुस्तक आहे. त्या लेखसंग्रहातून हे सुविचार टिपले आहेत.) १) धर्म, ईश्वर, पूजा-अर्चा, यांत मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पाहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून कोणत्याही मूर्तीला मी नमस्कार केलेला नाही. २) पूर्वजन्म, पुनर्जन्म, या थोतांडांवर माझा विश्वास नाही. ३) देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधार्‍यांनी दहशतीसाठी वापरल्या याविषयीं मला यत्किंचितही शंका नाही. ४) आपल्या देशात इतके संत जन्माला आले त्याऐवजी निसर्गाचे रहस्य ओळखून ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता. ५) अनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनारहित करणारा संशोधक मला कुठल्याही संतापेक्षा अधिक मोठा वाटतो. ६) (पूर्वी) पंढरपूरच्या यात्रेत हजारो माणसे कॉलर्‍याने मरत होती. ते मरण लाखो लोकांनी केलेल्या विठुनामाच्या गजराने थांबले नाही. ते थांबवले कॉलर्‍याची लस शोधून काढणार्‍या वैज्ञानिकाने. ७) सकाळी रेडियो लावला की देव दीनांचा वाली असल्याचे कुणीना कुणी ताला सुरांत सांगत असते. आणि इकडे गॅलरीत आल्यावर समोरच्या कचराकुंडीत बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसतात. रेडियोत देवावर विशेषणांची खैरात चालूच असते. ८) देवदीनांचा वाली आहे आणि संकटकाळी तो भक्तांच्या मदतीला धावून येतो याचे पुरावे पौराणिक कथांखेरीज अन्यत्र कुठेही सापडत नाहीत. ९) देऊळ बांधणे हा सत्ताधारी राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे. १०) धर्म धर्म करणार्‍या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे दुसरे शत्रू नसतील. *****************************************************************************
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/26/2018 - 09:07 नवीन
+१,००,००० ! प्रत्येक वाक्य लाखाची गोष्ट आहे !! हा प्रतिसाद लिहिल्याबद्दल आपले अभिनंदन ! प्रबोधन कसे करावे याचा वस्तूपाठ असलेला, आणि म्हणूनच, प्रत्येक दिवस सुरू करण्यापूर्वी तुम्ही स्वतः कमीत कमी दहादा वाचावा, असा हा प्रतिसाद आहे. तुमचा प्रतिसाद असूनही, फक्त पुलंच्या लेखनाची पुनरुक्ती असल्यामुळेच केवळ, त्यात आस्तिकांसह इतर कोणालाही उद्धटपणे निर्बुद्ध, मूर्ख, अविचारी, इत्यादी तुमची सिग्नेचर विशेषणे लावलेली नाहीत याकडे (अगोदरच ध्यानात आले नसल्यास) आपले लक्ष वेधत आहे ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/26/2018 - 09:21 नवीन
इतक्या दिवसांच्या वादविवादानंतरही, किमान मिपावरच्या बहुतेक जणांचा विरोध, तुमच्या विचारांना नाही तर... (अ) तुमची अहंमन्य, अशिष्ट व उद्धट भाषा, (आ) आपले म्हणणे मांडताना बहुतेक वेळेस तुम्ही वापरलेली चुकीची उदाहरणे व त्यांचे अतार्किक विश्लेषण/कार्यकारणभाव, आणि (इ) या दोन्ही गोष्टी, (तुमच्या व इतरांच्या) समाजप्रबोधनाला विरोधाभासी (काऊंटर-प्रोडक्टिव्ह) ठरतात ...यासाठी आहे, हे तुमच्या ध्यानात आलेले नाही (की ध्यानात घेण्याचे हेतुपुरस्सर टाळले जात आहे ?!) याचे महदाश्चर्य वाटत आहे !?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
य
यश राज Mon, 02/26/2018 - 10:47 नवीन
उत्तम प्रतिसाद डॉ साहेब... ज्यांना स्वता: ला प्रबोधनाची गरज आहे.. ते दुसर्यांचे प्रबोधन करण्यात धन्यता मानतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
स्वधर्म Tue, 02/27/2018 - 11:20 नवीन
पुलंची खालील वाक्ये ३) देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधार्‍यांनी दहशतीसाठी वापरल्या याविषयीं मला यत्किंचितही शंका नाही. ९) देऊळ बांधणे हा सत्ताधारी राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे. १०) धर्म धर्म करणार्‍या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे दुसरे शत्रू नसतील. अास्तिकांना निर्बुध्द वगैरे म्हणणारी नसली, तरी अास्तिकांच्या नावांवर जे काही समाजात चालू अाहे, त्यावर अाणि अास्तिक मनोवृत्तीवर निश्चितपणे टीका करणारी अाहेत. देव धर्म या कल्पना अाहेत व त्या वापरणारे सत्याचे शत्रू अाहेत एवढी प्रखर टीका असूनही तुंम्ही यनावालांना वेगळा न्याय लावताय का, असे वाटले. तुंम्हाला पुलंचे म्हणणे पटते, का फक्त त्यांचा सांगण्याचा मार्ग यनावालांपेक्षा पटतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
A
arunjoshi123 Tue, 02/27/2018 - 12:59 नवीन
बहुतेक पुलंचा असा लेख नाही. =================== ही वाक्ये सुटी सुटी नि वेगवेगळ्या संदर्भात आहेत. ================ त्या त्या संदर्भात ती लागू असावीत. ========================= हे एकत्र असंच तुटक लिखाण असेल तर पुल आणि यनावाला सारख्याच पात्रतेचे आहेत. ============== कोणी पुलंची रामावरची नि त्याला मानणारांवरची काही विधानं देऊ शकतं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
स
स्वधर्म Tue, 02/27/2018 - 16:20 नवीन
यांचा अादर अाहे. फॅशनेबल पुरोगाम्यांविषयी तुमचे मत प्रतिकूल दिसते, ते बरोबरच अाहे. उगीच फॅशन म्हणून काहीही करणे तसे भोंगळच! माझ्या प्रतिसादात म्हात्रे सरांना विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराची प्रतिक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
स्वधर्म Tue, 02/27/2018 - 16:23 नवीन
हे पुस्तक वाचले नाही, पण त्यात वरील विधाने अाहेत असे यनावाला म्हणालेच अाहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
ब
बिटाकाका Tue, 02/27/2018 - 16:55 नवीन
"देवाने आमची लहानशी जीवने समृद्ध करण्यासाठी दिलेल्या ह्या देणग्या, न मागता दिल्या होत्या, न सांगता नेल्या" "आयुष्यात पक्षी पाळावासा वाटला तर हंस पाळेन, असा पक्षी बनवणं विधात्यालाही पुन्हा जमले नाही" "जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीने आपणा सर्वांचे चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली की, यातून सुटका करायला आपली आणि आपुलकीने भोवती जमणाऱ्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं?" ========================== पुलंची वाक्ये चुकीच्या संदर्भात वापरून काय सिद्ध करायचे आहे? तुम्ही पुलंना मानता ना मग बघा पु. ल. पण नास्तिक होते, हे? किती आस्तिक वैज्ञानिकांची नावे लिहावीत बरे? ========================== खरेतर मी म्हणेन, पुलंसारखा आस्तिकच मलातरी अभिप्रेत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/27/2018 - 17:07 नवीन
साधनशुचिता, समतोलपणा आणि सभ्यपणा या तीन शब्दांचे शास्त्रिय, सामाजिक आणि वैयक्तिक जीवनातले महत्व लक्षात ठेवून माझे वरचे प्रतिसाद परत वाचलेत तर पुलंच्या वचनांत आणि यनावालांच्या भाषेत आणि साधशुचितेतले दोष स्पष्ट होतील असे वाटते ! (वरचा प्रश्न तुमच्याकडून यावा याचे आश्चर्य वाटले ! पण ते असो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/27/2018 - 17:10 नवीन
साधनशुचिता, समतोलपणा आणि सभ्यपणा या तीन शब्दांचे शास्त्रिय, सामाजिक आणि वैयक्तिक जीवनातले महत्व लक्षात ठेवून माझे वरचे प्रतिसाद परत वाचलेत तर पुलंच्या वचनांत आणि यनावालांच्या भाषेत आणि साधशुचितेतले दोष स्पष्ट होतील असे वाटते ! (वरचा प्रश्न तुमच्याकडून यावा याचे जरासे आश्चर्य वाटले ! पण ते असो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
स
स्वधर्म Wed, 02/28/2018 - 07:09 नवीन
सर, धन्यवाद. साधनशुचिता, सभ्यपणा व समतोलपणाबाबत अापले म्हणणे पटलेच. पण माझा प्रश्न यनावालांबाबत कमी अाणि अापल्या मतांबाबत जास्त अाहे. “तुंम्हाला पुलंचे म्हणणे पटते, का फक्त त्यांचा सांगण्याचा मार्ग यनावालांपेक्षा पटतो?”
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/28/2018 - 08:23 नवीन
“तुंम्हाला पुलंचे म्हणणे पटते, का फक्त त्यांचा सांगण्याचा मार्ग यनावालांपेक्षा पटतो?” पुलंचे म्हणणे आणि सांगण्याचा मार्ग, दोन्हीही पटतात. स्वतःचा देवावर, धर्मावर किंवा एखाद्या विचारसरणीवर विश्वास असणे-नसणे हा वैयक्तिक हक्कांचा भाग आहे. स्वतःचे मत स्पष्ट, समतोल, संयत व शास्त्रिय पद्धतीने दुसर्‍यांना सांगून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करणे हे योग्य आहे. पण अश्या स्वतःच्या अथवा दुसर्‍याच्या विश्वासाचा उपयोग इतरांची दिशाभूल/फसवणूक/अपमान/जबरदस्ती करण्यासाठी करणे हे सर्वथा निषिद्धच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
स
स्वधर्म Wed, 02/28/2018 - 10:19 नवीन
तुंम्ही वर जे म्हटलं अाहे, तेच जाणून घ्यायचं होत. हिरीरीने तुंम्ही यनावालांच्या मतांचा प्रतिवाद करता पण जाता जाता त्यांचाही कडक समाचार घ्यायचात, म्हणून तुंम्ही साधारणपणे असतात, तसेच अास्तिक असाल असे वाटू लागले होते. वरती तुंम्ही पुलंची मते पटतात, म्हटल्यावर प्रश्नच मिटला. तुमचा सर्व विरोध हा केवळ अास्तिकांचे ज्या पध्दतीने प्रबोधन केले जात अाहे, तिला अाहे, हे स्पष्ट झाले. पुन्हा धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/28/2018 - 14:13 नवीन
तुमचा सर्व विरोध हा केवळ अास्तिकांचे ज्या पध्दतीने प्रबोधन केले जात अाहे, तिला अाहे, हे स्पष्ट झाले. हे आणि इतर काही. यनावालांच्या या व इतर अनेक लेखांच्यावरचे माझे प्रतिसाद पाहिले असतेत तर, हेच मी पुन्हा पुन्हा स्पष्टपणे लिहित आहे, हे तुमच्या ध्यानात आले असते. :) आजतागायत मानव या जगातल्या बर्‍याच गोष्टींबाबत अज्ञानी आहे याचे ज्ञान झाले की, मनाचे अंधत्व, हट्टीपणा व अडेलतट्टूपणा खुल्या मनाने टाळून, इतरांच्या मानवी अधिकारांवर गदा न आणणार्‍या कोणत्याही विचार व कृतीचे खुल्या मनाने विश्लेषण करणे शक्य होते. या विचारसरणीला अज्ञेयवाद असे म्हणतात... अज्ञानाचे ज्ञान... "अज्ञानाचे ज्ञान" झाले की; इतरांचे विचार व कृती... (अ) पटले तर, अहंकार बाजूला ठेवून, खजिल न होता, स्विकारता येतात आणि (आ) नाही पटले तर, "असहमतीवर सहमती" असा मध्यममार्ग काढून सरळ सुखाने राहता येते. "अज्ञानाचे ज्ञान" झालेले नसले की; आस्तिकांत, नास्तिकांत किंवा इतर कोणत्याही विचारधारेत, "मी म्हणतो तेच ज्ञान हेच अंतीम सत्य" अशी अंधश्रद्धा व त्या पायावर निर्माण झालेला अहंकार दोन्हीही, इतके बळावतात की आपले म्हणणे खरे करायला माणूस कोणत्याही थराला जायला तयार असतो. आणि ते करताना, तो स्वतः जप करत असलेल्या त्याच्या विचारधारेच्या मूलतत्वांची पायमल्ली होते आहे, याची त्याला पर्वा अथवा खंत वाटत नाही. असे करताना त्याचे बोलणे-लेखन-कृती स्वतःच्या विचारधारेपासून दूर जावून वैयक्तिक स्वार्थ व हितसंबंधाच्या दिशेने केव्हा जाते हे त्यालाही कळत नाही. ही एक प्रकारची अंधश्रद्धाच झाली, नाही का? जर कोणी असा दिशाबदल जाणीवपूर्वक करत असला, तर "तो त्याच्या कथित विचारधारेच्या पडद्यामागून चलाखीने वैयक्तिक स्वार्थ व हितसंबंध साधतो आहे", असेच म्हणावे लागेल ! ही तर सरळ सरळ बदमाषी झाली, नाही का ? (अज्ञानाचे ज्ञान... या विषयावर एक लेख लिहावा असे बरेच दिवस मनात आहे. पण ते "थोडक्यात पण समर्पकपणे" लिहायचे म्हणजे फुरसतीने लिहायला लागेल, म्हणुन ते काम मागे पडले आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
स
स्वधर्म Wed, 02/28/2018 - 14:46 नवीन
मला स्वत:पुरती खात्री पटली अाहे, की देव अाहे का नाही हा प्रश्न अापण सोडवू शकणार नाही. शास्त्राच्या भाषेत बोलायचं तर, समजा एक फूटपट्टी अाहे. तुंम्हाला तिची लांबी अगदी तंतोतंत मोजायची अाहे. तर त्यापेक्षा अाधिक काटेकोर अशा लांबी मोजण्याच्या साधनाची गरज अाहे. त्यामुळे कुठलेही उपकरण कॅलिब्रेट करायला त्याहून किमान १० पट (दशमान पध्दतीमुळे) अॅक्युरेसीचे उपकरण लागते. म्हणून माणसानेही माणूस जोखणेही शास्त्रीयदृष्ट्या शक्य नाही. एका मर्यादित पातळीवर व्यवहारापुरते अापण ते करत असतो, पण ते संपूर्णपणे करणे शक्य नाहीच. दुसर्या माणसाची इनअॅक्युरेसी मध्ये येते. देव ही कल्पना अतिमानवी असल्याने तो संपूर्ण पडताळा मानवाकडून करता येणे शक्य नाही. तथापि, देव या कल्पनेचा कुणाला उपयोग असेल, तर असे ना का! जोपर्यंत त्यांचा इतरांना उपद्रव नाही, तोपर्यंत त्यांना विरोध करण्यात वेळ घालवण्याचे काहीच कारण नाही. या प्रश्नाचे बुध्दाने दिलेले उत्तर खूप अावडते. तुंम्हाला माहिती असेलच. वेळ काढून लिहा स्वतंत्र धागा. कदाचित यनावाला येतीलही तिथे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/28/2018 - 16:44 नवीन
कदाचित यनावाला येतीलही तिथे :-) किती अतीआशावादी आहात तुम्ही ! दुसर्‍यांच्या धाग्यावर त्यानी लिहिलेले माझ्यातरी नजरेस आलेले नाही. स्वतःच्या धाग्यावरही ते अपवादाने प्रतिसाद देतात. :) ;) (वस्तूस्थिती आहे, पण हघ्यावेसांन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
A
arunjoshi123 गुरुवार, 03/01/2018 - 09:35 नवीन
कदाचित यनावाला येतीलही तिथे :-)
नि असंबद्ध प्रतिसाद देतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
A
arunjoshi123 Tue, 02/27/2018 - 13:06 नवीन
यातल्या कोणत्या विधानात पुलं यनीय आत्मविश्वासाने "देव नाही म्हणजे नाहीच्च" असं म्हणताहेत? --------------- देवात रस नाही मंजे? देव आहे का नाही? ========================================== कोणालाही कसंही वेडंवाकडं कोट करायचं, विचित्र अर्थहिन संदर्भ द्यायचे हे पुरोगाम्यांचं व्यवच्छेदक लक्षण आहे. ================ पुलं देखील एक विचारहीन, फॅशनेबल पुरोगामी आहेत पण निरुपद्रवी नि सधेतूप्रेरित आहेत. सो आपला पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
ख
खिलजि Mon, 02/26/2018 - 10:56 नवीन
कॉलरा, पटकी आणि इतर काही पूर्वापार चालत आलेले आजार सोडले तर बाकीच्या आजारांशी देवाचा काहीही संबंध नाही .. आता मागे मी पेपरमध्ये वाचले होते .. अमेरिका लोकांच्या आयुष्याशी खेळते आहे .. स्वाईन फ्लू काय आणि बर्ड फ्लू काय .. अजून इतर काही .. इथे देव नाही तर पैसा बोलतो ... जो विषाणू बनवतो तो त्यावरचा उपाय खिशात घेऊन फिरतो .. त्याचं वारं पसरलं , लोक तडफडून मरायला लागली कि पोतडीतून काहीतरी गावसाळ्यासारखं काढायचं आणि मिरवायचं शास्त्रज्ञांचं बिरुद लावून ... याला काय म्हणायचं ... यनावाला साहेब .. हे असं कमावण्यापेक्षा .. देव देव करत बसलेलं बरं.... सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/26/2018 - 18:10 नवीन
कॉलरा, पटकी आणि इतर काही पूर्वापार चालत आलेले आजार सोडले तर बाकीच्या आजारांशी देवाचा काहीही संबंध नाही हे कोणत्या निकषांवर ठरवले ???!!! कॉलरा, पटकी या रोगांचा प्रादुर्भाव करणार्‍या मायक्रोब्जचा शोध लागून आणि त्यांच्यावरचे खात्रीचे औषोधोपचार सापडून अनेक दशके लोटली आहेत. "इतर काही पूर्वापार चालत आलेले आजार" हे काय असतात ? असे देवांशी संबंध असलेले कोणतेच आजार आस्तित्वात नव्हते/नाहीत/नसतील... अश्या आजारांची कल्पना भूतकालात, सद्यकालात आणि भविष्यकालातही १००% अंधश्रद्धा होती/आहे/असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि
ख
खिलजि Mon, 02/26/2018 - 10:58 नवीन
" पोतडीतून काहीतरी गावसाळ्यासारखं काढायचं " हे चुकीचे टंकले आहे .. ते असं वाचा "पोतडीतून काहीतरी गवसल्यासारखं काढायचं
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 02/26/2018 - 17:56 नवीन
यनावाला, पु.ल.देशपांड्यांची मतं उद्धृत केल्याबद्दल आभार. यावर माझं मतप्रदर्शन करतो. १.
१) धर्म, ईश्वर, पूजा-अर्चा, यांत मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पाहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून कोणत्याही मूर्तीला मी नमस्कार केलेला नाही.
पु.ल. यांच्या वैयक्तिक प्रधान्यांचा आदर आहे. मी १००% आस्तिक असूनही मला देवळांत जायचा प्रचंड कंटाळा आहे. मूर्तीस नमस्कार करावासा वाटणे वा न वाटणे याचा ईश्वराशी व/वा आस्तिक्याशी कसलाही संबंध नाही. २.
२) पूर्वजन्म, पुनर्जन्म, या थोतांडांवर माझा विश्वास नाही.
पुनर्जन्मावर विश्वास ठेवणे वा न ठेवणे हा देखील वैयक्तिक आवडीनिवडींचा भाग आहे. बाकी, डॉ. इयन स्टेव्हनसन यांनी अनेक पुरावे जमवून पुनर्जन्म हे थोतांड नसल्याचं सिद्ध केलेलं आहे. ३.
३) देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधार्‍यांनी दहशतीसाठी वापरल्या याविषयीं मला यत्किंचितही शंका नाही.
तशा वापरल्या असतीलही. धूर्त सत्ताधाऱ्यांनी याहून इतर अनेक गोष्टी (उदा. : शस्त्रास्त्रे, संपत्ती) आपल्या स्वार्थासाठी वापरल्या आहेत. यावरून देव, धर्म इत्यादी कल्पनांना दोष नेणे योग्य नव्हे. ४.
४) आपल्या देशात इतके संत जन्माला आले त्याऐवजी निसर्गाचे रहस्य ओळखून ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता.
सुखी म्हणजे नक्की काय? देश सुखी होणे म्हणजे नक्की काय? निसर्गाची रहस्ये ओळखून ऐहिक जीवनात विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ पाश्चात्य देशांत जन्मास आले. मात्र तरीही दोन महायुद्धांत त्यांची अपरिमित हानी व अपमृत्यू झाले. शास्त्रज्ञांनी प्रगत केलेल्या विज्ञानामुलेच महासंहारक अस्त्रे निर्माण झाली. या वाईटाचा दोष देखील त्यांच्याच माथी मारणार का? ५.
५) अनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनारहित करणारा संशोधक मला कुठल्याही संतापेक्षा अधिक मोठा वाटतो.
वेदनाविरहित शल्यकर्म करणे हे संतांचं काम नाही. शिवाय, उकीरड्यावरचा कचरा साफ करणारा सफाई कर्मचारी सरन्यायाधीशाहून महान म्हणता येईल का? माझा आजपावेतो कोर्टाचा काहीच लफडा झाला नाही. पुढे करायची इच्छाही नाही. न्यायव्यवस्थेचा मला काडीइतकाही फायदा नाही. पण कचरा साफ न केल्यास माझं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. मग सफाईवाला सरन्यायाधीशांहून श्रेष्ठ नव्हे काय? उगीच बिचाऱ्याला कमी पैसे मिळतात. आजची न्यायव्यवस्था ही धूर्त सत्ताधार्‍यांनी दहशतीसाठी वापरली याविषयीं मला यत्किंचितही शंका नाही. ६.
६) (पूर्वी) पंढरपूरच्या यात्रेत हजारो माणसे कॉलर्‍याने मरत होती. ते मरण लाखो लोकांनी केलेल्या विठुनामाच्या गजराने थांबले नाही. ते थांबवले कॉलर्‍याची लस शोधून काढणार्‍या वैज्ञानिकाने.
वारीचं नियोजन नसल्याने वारकरी कुठेही मलमूत्र विसर्जित करायचे. त्यामुळे कॉलरा सारखे संसर्गजन्य रोग फैलावत. याचा विठ्ठलाच्या नामाशी काहीही संबंध नाही. नामगजर म्हणजे नियोजन नव्हे. बरेच वारकरी अडाणी असंत. त्यांची सेवा म्हणून शिकलेल्यांनी नियोजन करवून दिलं तर बरं होईल. ७.
७) सकाळी रेडियो लावला की देव दीनांचा वाली असल्याचे कुणीना कुणी ताला सुरांत सांगत असते. आणि इकडे गॅलरीत आल्यावर समोरच्या कचराकुंडीत बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसतात. रेडियोत देवावर विशेषणांची खैरात चालूच असते.
रेडियोवरील गाण्याचा उकीरड्याशी संबंध नाही. ८.
८) देवदीनांचा वाली आहे आणि संकटकाळी तो भक्तांच्या मदतीला धावून येतो याचे पुरावे पौराणिक
कथांखेरीज अन्यत्र कुठेही सापडत नाहीत. ते पु.लं.ना इतरत्र सापडंत नाहीत. अनेकांना आजही प्रत्यय आलेत. ९.
९) देऊळ बांधणे हा सत्ताधारी राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे.
असू शकतो. पण त्यामुळे देव खोटा हे सिद्ध होत नाही. १०.
१०) धर्म धर्म करणार्‍या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे दुसरे शत्रू नसतील.
धर्म धर्म करणारे काही लोक कर्मयोगी होते. त्यांचा पु.लं.ना विसर पडलेला दिसतो. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा