Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...

य
यनावाला
Mon, 02/19/2018 - 16:03
🗣 247 प्रतिसाद
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावाला जगनिर्माता, जगन्नियंता, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, ईश्वर अस्तित्वात आहे असे आस्तिक लोक मानतात. किंबहुना अशा ईश्वराचे अस्तित्व सत्य मानणार्‍यांना आस्तिक म्हणतात. आस्तिक शब्दाचा हाच अर्थ आज प्रचलित आहे. ( काहीजण केवळ जगनिर्मात्या ईश्वराचे अस्तित्व मानतात. --म.फुले यांनी त्याला निर्मिक म्हटले आहे.-- उपासनेचा देव मानत नाहीत. पण त्यांची संख्या नगण्य आहे.) जगातील बहुसंख्य माणसे अजून आस्तिक आहेत. " ईश्वर अस्तित्वात नाही." हे ठामपणे सांगणारे निरीश्वरवादी भारतात अगदी वेदकाळापासून आहेत. आता या विज्ञानयुगात त्यांची संख्या वेगाने वाढते आहे. सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान असा देव जर आहे तर तो आपल्या अस्तित्वाची प्रचीती सर्व माणसांना येईल असे कांहीच का करीत नाही ? इतका लपून-छपून का राहतो ? आपले अस्तित्व दाखविण्यात त्याला कोणती अडचण आहे ? तसेच त्याचे जे गुणवर्णन आहे त्यांतील एकाही गुणाचा अनुभव कधीही येत नाही. संकटात देव धावून आला आहे असे कधीही घडत नाही. हे कसे ? दीन-दुबळ्यांवर अन्याय होतो, निष्पाप बालिकेवर अत्याचार होतो या प्रत्यही घडणार्‍या घटना तो करुणासागर देव निष्क्रियपणे पाहात कसा राहातो? आस्तिक लोक अशा घटनांविषयीं विचार करीतच नाहीत. त्यांना त्यांची श्रद्धा टिकवून धरायची असते. ती अशा घटनांनी डळमळली तर काय करायचे ? आपल्याला कोणाचा आधार आहे ? अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे अन्यायपीडित व्यक्ती पूर्वजन्मीच्या पापाचे फळ भोगतात असले बुद्धीला न पटणारे काहीतरी भोंगळ तत्त्व श्रद्धेने खरे मानून मनाचे समाधान करतात. आपण देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली, देवासाठी जी कर्मकांडे परंपरे अनुसार करीत आहोत ती सोडून दिली तर देव आपल्यावर कोपेल. शिक्षा करील. अशी भीतीही त्यांना वाटत असावी. या संदर्भात डॉ.र.धों.कर्वे यांचे एक विधान आहे. ते म्हणतात, "माणूस देवाला नमस्कार करतो तो "दुर्जनं प्रथमं वन्दे ।" या न्यायाने. म्हणजे देवाने आपल्यावर कोप करू नये, आपले कांही वाईट करू नये म्हणून. हे पटण्यासारखे आहे. यावर आस्तिकांनी थोडा विचार करावा. जगात निरीश्वरवादी माणसे पूर्वीपासून आहेत; हे आस्तिकांना ठावूक आहेच ते नास्तिक देवा-धर्माचे कोणतेही कर्मकांड करीत नाहीत. देवाला हात जोडून त्याच्यापुढे नतमस्तक होत नाहीत. एवढेच नव्हे तर देवाचे अस्तित्वसुद्धा नाकारतात . आता प्रश्न असा पडतो की त्या नास्तिकांना देव शिक्षा का करीत नाही ? देव सर्वज्ञ आहे. जगात निरीश्वरवादी लोक आहेत. ते कधी माझी पूजा-अर्चा-प्रार्थना करीत नाहीत. मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील. देवाचे अस्तित्व मुकाट्याने मानतील. त्याची पूजा-अर्चा करू लागतील. आस्तिक-नास्तिक वाद मिटून जाईल. हे देवाला नको आहे का? नास्तिकांना कडक शासन करणे देवाला अशक्य आहे का? तो सर्वशक्तिमान आहे ना ? मग त्याच्या दृष्टीने एवढी सोपी असलेली गोष्ट तो स्वत: का करीत नाही ? देवदर्शनाला जाणार्‍या तसेच दर्शन घेऊन परत येणार्‍या भक्तांच्या वाहनांना अपघात का होतात ? त्यात अनेक भक्त का मरतात ? कोणी म्हणतील -आस्तिकांच्याच वाहनांना अपघात होतात का ? नास्तिकांच्या वाहनांना होत नाहीत ? -- होतातच. गाडीत कोण बसले आहेत ? आस्तिक का नास्तिक ? भूकंपात जखमी झालेल्या माणसांवर उपचार करण्यासाठी जाणारे डॉक्टर का घरफोडीसाठी जाणारे दरोडेखोर ? याचा अपघाताशी कांही संबंध नसतो. अपघाताची कारणे वेगळी असतात.नास्तिकांच्या वाहनांना अपघात होऊ शकतो हे सत्यच आहे. प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष ईश्वराचे अस्तित्व नाकारणार्‍या नास्तिकांना तो शिक्षा का करत नाही ? आणि या प्रश्नाचे सत्य उत्तर असे आहे की,ईश्वर अस्तित्वातच नाही. वास्तव काय आहे ? सुख-दु:खाचे प्रसंग सर्वांवर येतात. आस्तिकांवर येतात तसे नास्तिकांवरही येतात. श्रीमंतांवर येतात. गरिबांवर येतात. आस्तिक लोक देवाचे भजन-पूजन करतात, नामस्मरण करतात म्हणून त्यांच्यावर दु:खाचे प्रसंग क्वचितच येतात तर नास्तिक लोक देवाचे काहीच करीत नाहीत म्हणून त्यांच्यावर सतत दु:खाचे डोंगर कोसळतात असे मुळीच दिसत नाही. जगन्नियंता देव अस्तित्वात असेल तर असे घडायला हवे. नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही. यावरून कोणता निष्कर्ष निघतो ? अनेक नास्तिक चांगले मानसन्मानाचे, प्रसिद्धीचे, समृद्धीचे जीवन जगले. काही नावे सांगायची तर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, रॅंग्लर र.पु.परांजपे, प्राचार्य दि.धों.कर्वे, डॉ.र.धों.कर्वे, सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर, श्री.ना.पेंडसे, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अभिनेते डॉ.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर आदि अनेकानेक. देवाचे अस्तित्व न मानल्यामुळे त्यांना कोणत्याही विशेष अडचणींना सामोरे जावे लागले नाही. तसेच या सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना उदंड लोकप्रियता लाभली. मान-सन्मान मिळाले. सर्वार्थाने त्यांचे जीवन समृद्ध होते. अनेक सद्विचारी, सदाचारी, सज्जन आस्तिकांना आयुष्यात मोठे दु:ख भोगावे लागले. देवाने त्यांच्यावर कांही कृपा केली नाही. दोन उदाहरणे द्यायची तर तुकाराम महाराजांच्या काळात महाराष्ट्रात लागोपाठ चार वर्षे दुष्काळ पडला. तुकारामांच्या कुटुंबाची अन्नान्न दशा झाली. त्यांची पहिली पत्‍नी भूकबळी ठरली. त्यांनी लिहिले आहे, "दुष्काळे आटले द्रव्य गेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता गेली. आता काय खावे कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥ विठ्ठलाच्या या निष्ठावंत भक्ताची अशी अवस्था झाली. रामकृष्ण परमहंस कालीमातेचे परम भक्त होते. "स्वत: माता माझ्याशी बोलते " असे ते सांगत. त्यांना घशाचा कॅंन्सर झाला. अन्नाचा घास गिळता येईना. भक्तांनी विनवले की, " तुम्ही कालीमातेला साकडे घाला. ती तुमचा आजार बरा करील." परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली -इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज. " खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. इतर लोक जेवतात त्याने रामकृष्ण परमहंस यांचे पोट भरते का ? त्यांना भूक लागणार नाही का ? तात्पर्य एवढेच की आस्तिक माणसांना, देवभक्तांना सुद्धा दु:खे भोगावी लागतात. त्यांच्यासाठी देव काहीच करू शकत नाही. तो अस्तित्वाच नाही तर काय करणार ? पण अशा सुप्रसिद्ध आस्तिकांचाच विचार का करायचा ? शंभर वर्षांपूर्वीच्या हिंदु समाजाचा विचार करावा. त्याकाळी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था होती. चौथा वर्ण शूद्र . ते सगळे आस्तिकच होते. इतर तीन वर्ण त्यांना अस्पृश्य मानत. हे लोक निरक्षर होते. अज्ञानी होते. अत्यंत दीनवाणे अपमानास्पद जीवन जगत होते. जो देव आहे असे ते मनापासून मानत होते त्या देवाने त्यांच्यासाठी काहीच केले नाही. करुणासागर देवाला त्यांची दया आली नाही. देश स्वतंत्र झाला. प्रजासत्ताक स्थापन झाले. संविधान लागू झाले. तेव्हा कागदोपत्रींतरी अस्पृश्यता गेली. या दलितांचा उद्धार देवामुळे झाला नाही. डॉ.आंबेडकरांमुळे झाला. कांहीजण बाबासाहेबांनाच देव मानतात. तसे मानणे हा त्यांचा अपमान आहे हे त्या दलितांच्या ध्यानी कसे येत नाही ? कवि विंदा करंदीकर म्हणतात, "देवातुनी समाजा ज्याने विमुक्त केले । त्यालाच देव करिती याला इलाज नाही. ॥" तर अशा या देवाचे अस्तित्व खरे कसे मानता येईल ? देव अस्तित्वात नाही हेच बुद्धीला पटणारे सत्य आहे. देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे. मात्र परंपरेने आलेले जे सण-सुदिन आहेत ते समाजाचे आनंद सोहळे आहेत. ते अवश्य साजरे करावे. त्यांच्या धार्मिक महत्त्वापेक्षा सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे. अन्यथा जीवन एकसुरी, नीरस होईल. .................................................................................
वर्गीकरण
चर्चा (काथ्याकूट)

प्रतिक्रिया द्या
82228 वाचन

💬 प्रतिसाद (247)
य
यनावाला Tue, 02/27/2018 - 16:48 नवीन
निराधार आक्षेप गेल्या २६ महिन्यांत (३-जाने.२०१६ ते २०-फेब्रु.२०१८) इथे बारा लेख लिहिले. त्यांत कुठेही आस्तिकांना ,अथवा अन्य कोणालाही उद्देशून निर्बुद्ध , मूर्ख, अविचारी किंवा तत्सम शब्द वापरलेला नाही. उद्धट, अशिष्ट भाषा तर नाहीच नाही. लेखातील विचार ज्या वाचकांच्या मतांविरुद्ध असतात, त्यांना ते लेखन अशिष्ट वाटते. [यासंदर्भात , "विवेकवादी लेखनावरील आक्षेप " हा लेख आहे--लिंक:http://mr.upakram.org/node/2580]. लेखन शुचिता कटाक्षाने पाळतो. इथे एखाद्या सदस्याला --"... दिवस सुरू करण्यापूर्वी तुम्ही (हे लेखन ) कमीत कमी दहादा वाचावे ." असा उपदेश करणे, शिष्टसंमत आहे काय ? (हा उपदेश इथल्या एका मान्यवर सदस्यांनी केला आहे. त्यांच्या प्रतिसादातील विधाने धादान्त असत्य आहेत. उपरोक्त बारा लेख न वाचता विधाने केली आहेत असे म्हणणे क्रमप्राप्त आहे.) लेखन उद्धट आणि अशिष्ट वाटत असेल तर त्याविरुद्ध मि.पा.च्या प्रवर्तकांकडे तक्रार करावी. म्हणजे ते बंद पडेल.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 08:05 नवीन
सोमवारी पिंडीतील शिवतत्त्व इतर दिवसांच्या तुलनेत शतपट असते, शिवरात्रीला सहस्रपट असते तर महाशिवरात्रीला दशसहस्रपट असते. गणपतीच्या मूर्तीत गणेश तत्त्व असते. ते गणेश चतुर्थीला दशसहस्रपट होते. मारुतीच्या मूर्तीत हनुमान तत्त्व ते शनिवारी वाढते. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते. तुळशीपत्रात विष्णुतत्त्व असते. अशा अनेक तत्त्वांच्या अस्तित्वावर भाविकांची श्रद्धा असते. खरे तर "ईश्वरीतत्त्वां" विषयींची ही सर्व विधाने असत्य आहेत. हास्यास्पद आहेत. हे कोणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने समजते. पण श्रद्धावंत अशी विधाने सत्य मानतात. कारण ती देवा-धर्माशी निगडित असून पॉझिटिव्ह आहेत. म्हणून ती सत्य असणारच असा त्यांचा युक्तिवाद (!) असतो. हे असले देवतत्त्व म्हणजे नेमके काय असते ? त्याचा शोध कोणी लावला ? कुठल्या अधिकृत वैज्ञानिक नियतकालिकात या संशोधनाविषयी काही छापून आले आहे का? हे देवतत्त्व कोणत्या साधनाने (इंस्ट्रुमेंटने) मोजतात ? याच्या मापनाचे एकक (युनिट ऑफ मेझरमेंट) काय ? असा कोणताही प्रश्न श्रद्धाळूंच्या मेंदूत उद्भवत नाही. कारण श्रद्धेमुळे त्यांची
बुद्धी कुंठित
झालेली असते.
विचारशक्ती बधिर
झालेली असते. खरे तर मूर्ती ज्या पदार्थाची (मटेरियल: दगड, माती, लाकूड, धातू इ.) बनविलेली असते त्या पदार्थाचे गुणधर्मच त्या मूर्तीत असतात. दगडाचा आकार बदलला तरी तो मूलत: निर्जीव दगडच राहातो. मातीची सुबक गणेशमूर्ती केली, आकर्षक रंग दिला. नंतर घरी अथवा मंदिरात नेऊन बसवली. वेदोक्त मंत्रांनी तिची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा केली तरी कोणतेही देवतत्त्व त्या मूर्तीत उद्भवत नाही. उद्भवणे शक्य नाही. हे शत-प्रतिशत (शंभर टक्के) वैज्ञानिक सत्य आहे. पण श्रद्धाळूंना वाटते की त्यांच्या आध्यात्मिक गुरूंपाशी अतीन्द्रिय शक्ती असते. त्या शक्तीने त्यांना मूर्तीतील तत्त्वे समजतात. त्यांचे मोजमापनही करता येते. गुरूंचा अधिकार फार मोठा. गुरू जे सांगतात ते सत्य असतेच. ते शिरसावंद्य मानलेच पाहिजे. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते हे सुद्धा सिद्ध गुरूंना कळते. अशी त्यांच्या भक्तांची धारणा असते. समजा एका मोठ्या दालनात शंभर चौरंगासने आहेत. त्यांवर शंभर गणेशमूर्ती आहेत. त्यांतील दोन मूर्तींची वेदोक्त मंत्रांनी यथासांग प्राणप्रतिष्ठा केली आहे. बाह्यत: सर्वमूर्ती एकरूप (म्हणजे अगदी सारख्या) दिसत आहेत. तर कोणी तज्ज्ञ धर्मगुरू, सिद्धयोगी, आध्यात्मिक द्रष्टा त्या शंभर मूर्तींतील दोन प्राणप्रतिष्ठित मूर्ती नेमक्या ओळखू शकेल काय ? हे ओळखणे अशक्य आहे. प्राणप्रतिष्ठा केल्याने मूर्तीत कोणतेही मूलभूत परिवर्तन झालेले नसते. प्राणसंचार झालेला नसतो. पूर्वी होती तशीच ती निर्जीव असते. मंदिरातील मूर्तीसमोरील दानपेटी चोर फोडतात. त्यांतील पैसे पळवतात. मूर्तीच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेतात. त्यावेळी ती प्राणप्रतिष्ठित मूर्ती कोणताही प्रतिकार करीत नाही. आक्रमक मूर्तिभंजकांनी अनेक देवमूर्ती फोडल्या, विद्ध्वंस केला त्या समयी कुठल्याही प्राणप्रतिष्ठित देवाने किंचित् देखील प्रतिकार केल्याचे एकही विश्वासार्ह ऐतिहासिक उदाहरण नाही. प्राणप्रतिष्ठा केल्यावर मूर्तीत प्राणसंचार होतो असे भाविक भक्त केवळ श्रद्धेने मानतात. वस्तुत: पुरोहितांनी केलेली ही धूळफेक असते. श्रद्धाळूंना फसवणे, बनवणे असते. मूर्तीत, पिंडीत, फुलांत विशिष्ट देवतत्त्व असते, दिनमाहात्म्यानुसार ते वाढते. असली विधाने भंपक आणि धादान्त असत्य आहेत, हास्यास्पद आहेत. हे कुणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने सहज समजते. असे असता अशी विधाने करण्याचे साहस या पुरोहित मंडळींना होतेच कसे ? आपल्याला कोणी हसतील, आपली टर उडवतील अशी भीती त्या धर्ममार्तंडांना वाटत नाही काय ? या प्रश्नाचे उत्तर ,"नाही. मुळीच नाही." असे आहे. कारण त्या मार्तंडांनी अनेक खोट्या गोष्टी, निरर्थक चमत्कारी पुराणकथा, भाविकांच्या डोक्यात भरवून भरवून त्यांचे मेंदू पुरते प्रदूषित केलेले असतात. भाविकांची बुद्धी श्रद्धेने बरबटून टाकून संवेदनाहीन केलेली असते. ती बधिर झालेली असते. त्यामुळे ते श्रद्धावंत भाविक स्वबुद्धीने विचार करतील ही शक्यताच उरत नाही.आपण कोणतेही आणि कसलेही विधान केले तरी "तत्त्वनिष्ठ" श्रद्धाळू माना डोलावणार, ते खरे मानणार, या विषयी त्या धर्मगुरूंना ठाम विश्वास असतो. म्हणूनच सर्वथा असत्य असलेली असली विधाने ते नि:शंकपणे करतात. त्यांचा विश्वास श्रद्धाळू भक्त सार्थ ठरवतात. देवतत्त्वासंबंधी असली हास्यास्पद विधाने ( दूर्वांमध्ये गणेशतत्त्व असते. ते चतुर्थीला सहस्रपट होते इत्यादि.) करण्याचे आणखी एक कारण संभवते. भाविक भक्त कितीही श्रद्धाळू असले तरी ते काही प्रमाणात तर्कनिष्ठ असतात. कारण मानव प्राणी मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. ( Man is a rational animal). श्रद्धेच्या भडिमारामुळे ही अल्प तर्कनिष्ठता झाकोळते. पण ती कधी कधी डोके वर काढते. अशावेळी त्यांना आपल्या कृतीचे तार्किक समर्थन करता येईल असे कारण हवे असते. "अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिरापुढील रांगेत आपण तासानुतास का बरे उभे राहतो? " याचे कारण त्यांना हवे असते. "इतर दिवसाच्या तुलनेत अंगारकी दिवशी सिद्धिविनायकाच्या मूर्तीतील गणेशतत्त्व द्वादश सहस्रपट असते." असे कुण्या अधिकारी (!) व्यक्तीने सांगितले की त्या श्रद्धावंतांना आपल्या कृतीच्या समर्थनाचे कारण समजते. आणि त्यांची गणपतीवरील श्रद्धा अधिक दृढ होते. यावर आमचे कांही श्रद्धावंत बांधव म्हणतील, "हो. आम्ही श्रद्धाळू आहोत. मूर्तीत, पिंडीत, फुलांत, पानांत, देवतत्त्व असते. दिवसाच्या महत्त्वानुसार ते बदलते हे सर्व आम्ही खरे मानतो. आमची तशी श्रद्धा आहे. त्यासाठी आम्हांला पुरावा लागत नाही. पुढे ? तुम्हांला आमच्या या श्रद्धेचा कांही त्रास होतो का ? भारत हा प्रजासत्ताक देश आहे. इथे प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा अधिकार आहे. आमच्या या विचार आणि आचार पद्धतीत तुम्ही नाक का खुपसता ? तुम्हांला तसा अधिकार कोणी दिला आहे ? आमच्या श्रद्धांशी तुमचा काय संबंध ? तुम्ही अशा श्रद्धा पाळा असे आम्ही तुम्हांला कधी सांगतो का ? मग तुम्ही आमच्या श्रद्धांना हास्यास्पद का म्हणता ? यावर माझे उत्तर असे की "देवतत्त्वा"विषयींच्या या श्रद्धांना मी हास्यास्पद म्हणायला हवे असे नाही. कुणाही सुबुद्ध व्यक्तीला त्या हास्यास्पदच वाटतील. एवढेच कशाला तुम्ही श्रद्धावंतांनी आपल्या डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे गाठोडे खाली उतरवून जर शुद्ध तर्कबुद्धीने विचार केला तर तुम्हांलासुद्धा त्या हास्यास्पदतेची जाणीव होईल. जे सत्य आहे ते मी शब्दांत मांडले इतकेच. आपल्या प्रजासत्ताक देशात प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा संविधानदत्त अधिकार आहे तसा प्रत्येकाला आपली मते, आपले विचार, योग्य आणि सुसंस्कृत शब्दांत मांडण्यचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही आहेच. मी लेखनशुचिता पाळतो. कुठेही असंस्कृत,असभ्य, असंसदीय शब्द वापरत नाही. पण प्रजासत्ताक देशातील नागरिकांच्या संविधानदत्त अधिकाराच्या गोष्टी राहूं दे. अशा लेखनाविषयीं माझी भूमिका काय ते प्रस्तुत पुस्तकातील "माझी भूमिका " या लेखात स्पष्ट केले आहे. इथे थोडक्यात देतो. "आपण सर्व मानव (माणसे ) आहोत. मानवता (माणुसकी ) हा आपणा सर्वांचा धर्म आहे. भारत आपला देश आहे म्हणून "भारतीय " ही आपली जात आहे. ( तसेच पाकिस्तानी, चिनी, जपानी, अमेरिकी, रशियन, ब्रिटिश इ.सर्व जाती आहेत. थोडक्यात राष्ट्रियत्व म्हणजे जात असे म्हणता येईल.) म्हणून सारे भारतीय माझे बांधव आहे. हे मी मनापासून मानतो. माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे; असे मला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना वैध मार्गांनी परोपरीने सांगण्याचा मला घटनादत्त अधिकार आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे." हे थोडे विषयाला सोडून म्हणजे अवांतर झाले असे वाटते. म्हणून आपण पुन्हा मूळ विषयाकडे वळू. मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली तर तिच्यात देवतत्त्व संचारते काय ? ते विशिष्ट दिवशी अनेक पटींनी वाढू शकते का ? तसेच कांही फुलांत, पानात देवतत्त्व असते काय ? हे आपले तीन मूळ प्रश्न होते. खरे तर हे प्रश्न हास्यास्पद आहेत. ते
चर्चा करण्याच्या योग्यतेचे नाही.
"हॅ:" या एकाच एकाक्षरी उदगाराने
ते मोडीत निघतात. मग "देवतत्त्वांविषयीं हे पानभर लेखन कशाला केले ? " असा प्रश्न तुम्ही विचाराल. लेखनामागची भूमिका स्पष्ट केलेलीच आहे. देश बांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा. अवास्तव असत्य विधाने खरी मानू नये. तुम्ही बुद्धिमान आहातच. ती बुद्धी वापरून "गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व अन्य दिवसाच्या तुलनेत सहस्रपट असते." या विधानावर विचार करा. तुम्हांला हे खरे वाटते का ? कोणी मोठ्या अधिकारी व्यक्तीने सांगितले आहे, इतर अनेक जण ते खरे मानतात म्हणून तुम्ही हे खरे मानत असाल तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे. स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या
अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर
करावा.
शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता
अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.
======================== हा यनावालांचा लेख आहे. यातला वाक्यांचं मेरिट असो, सुर पाहा. शिवाय त्यांनी स्वतःला लावलेली विशेषणं पाहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
प
पुंबा Wed, 02/28/2018 - 10:22 नवीन
विज्ञान दिनाच्या निमित्ताने 'द हिंदू'त आलेला हा लेख वाचला.
http://www.thehindu.com/opinion/op-ed/the-power-of-persuasion/article22860100.ece
यातला खालील परिच्छेद वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा, अंधश्रद्धा दूर व्हाव्यात, समाज विवेकवादी व्हावा यासाठी झटणार्‍या कार्यकर्त्यांसाठी चिंतनीय ठरावा.
How then does one eradicate superstition? Not, as the evidence suggests, by preaching or legislating against it. Awareness campaigns against dangerous superstitions along with better education and scientific outreach may have some impact but will be a slow process. Today, the topic of “persuasion” is popular in the psychology, social science and marketing communities. Perhaps scientists have something to learn here too. Pascal, whom Nehru cited on reason, wrote on persuasion too. He observed that the first step is to see the matter from the other person’s point of view and acknowledge the validity of their perception, and then bring in its limitations. “People are generally better persuaded by the reasons which they have themselves discovered than by those which have come into the mind of others.”
  • Log in or register to post comments
य
यनावाला Wed, 02/28/2018 - 10:51 नवीन
पु.ल.देशपांडे यांचा संबंधित लेख इथे वाचता येईल : .... पु.ल.देशपांडे यांचा संबंधित लेख इथे वाचता येईल : .... link: http://kirandeshpande.blogspot.in/2007/08/blog-post.html ......
  • Log in or register to post comments
ब
बिटाकाका Wed, 02/28/2018 - 12:20 नवीन
हि पुलंचीच वाक्ये आहेत ना? "देवाने आमची लहानशी जीवने समृद्ध करण्यासाठी दिलेल्या ह्या देणग्या, न मागता दिल्या होत्या, न सांगता नेल्या" "आयुष्यात पक्षी पाळावासा वाटला तर हंस पाळेन, असा पक्षी बनवणं विधात्यालाही पुन्हा जमले नाही" "जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीने आपणा सर्वांचे चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली की, यातून सुटका करायला आपली आणि आपुलकीने भोवती जमणाऱ्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं?" ----------------------------------------- पू.ल. निरीश्वरवादाबद्दल काही बोलले का? कि अंधश्रद्धांबद्दल बोलले? पु.लंची वाक्ये देण्यामागचा उद्देश काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 12:31 नवीन
पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाहीत.
इथे पुलंना नि आंबेडकरांना अभिमान करायला पाहिजे असं अभिप्रेत आहे. यनांना आहे का? ---------------------------
कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर दैवावर. न्यायमूर्ती रानड्यांसारखी माणसेदेखील इंग्रजी राज्य हे Divine dispensation मानताना पाहिली की आश्चर्य वाटते.
ओके. इथे देखील संपूर्ण स्पष्टीकरण दैवात पाहू नये असाच सूर असावा. ----------------- यात देव आहे का नाही यावर एकही विधान नाही. त्यांची व्यक्तिगत आवडनावड सांगीतली आहे. शिल्पे बनवण्यापेक्षा अजूनही बरी कामे असावीतच. अगदी साहित्य, संगीत इ इ पेक्षाही बरी कामे असावीतच, नै का पुलं? मग ह्यांनी हे केलं, त्यांनी ते, ह्यांनी हे केलं नाही, त्यांनी ते नाही असलं उगाळण्यात अर्थ नाही. -------------------------- http://www.shareblast.com/view/text/y7LDdwjVNMb1YKX इथे पुलं स्वतःपुढे "माझी क्ष क्ष क्ष श्रद्धा आहे" असं म्हणतात. शेवटी श्रद्धावंतांसाठीची यनांची विशेषणं पुलंच्या नशीबी पण आहेतच. ======================================================================= बाकी लेखात धार्मिक सुधार, सामाजिक सुधार, इत्यादि बद्दल लिहिलं आहे. ते सर्व योग्य आहे. पण पुलंची आधुनिक व्यवस्थांबद्दलची जाण अत्यंत अपरिपक्व होती हे आधुनिकतेवर ०% टिका आहे यावरून दिसते. तरीही त्यांच्या भाषेला नि उद्विगनतेला मर्यादा आहे. -------------------------
ज्या चीनमध्ये माओचे रेड बुक म्हणजे रोज सकाळी उठून भक्तिभावाने वाचायचा ग्रंथ होता आणि 'माओच्छिष्ठम् जगत् सर्वम्' अशी परिस्थिती होती, तिथे इतिहासातून माओचे नाव पुसून टाकायचा चंग बांधलेला दिसतो आहे.
https://www.quora.com/Did-Mao-kill-60-million-Chinese-people-If-so-what-do-Chinese-people-think-about-this माओ ने सहा कोटी लोक मारलेत. आणि पुलं त्याची कशी पूजा करताहेत पहा. यावरनं पुलंची नव्या व्यवस्थांबद्दलची जाण किती बायस्ड आणि अपरिपक्व होती हे दिसून येईल. आणि लक्षात घ्या या हत्या हा लेख लिहिण्यापूर्वी कितीतरी वर्षे लिहिलेला आहे. --------------------------------------
विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही.
हा एक अज्ञानाचा दुसरा नमुना. वंश ही करोडो लोकांची हत्या घडवून आणणारी संकल्पना वैज्ञानिकच होती. त्या वंशाच्या लोकांची हत्या करायची आवश्यकता नाही अशी चर्चची भूमिका होती. आणि सेक्यूलर साम्राज्यवादी विज्ञानवादी देशांना काही वंशांचा पृथ्वीवर कमी अधिकार आहे असं वाटे. ==========================================================================
मनाच्या निराश मूडमध्ये हे लिहिले आहे असे तुम्हाला वाटेल. व्यक्तिगत जीवनात दुःख बाळगत राहावे असे माझ्या बाबतीत काहीही नाही. उद्या मला जेवायला मिळणार आहे किंवा नाही आणि आज रात्री झोपायला जागा सापडणार की नाही, ह्या चिंता घेऊन ज्या देशात लाखो लोक जगताहेत, तिथे माझ्यासारख्याने वैयक्तिक दुःख हा शब्दही उच्चारू नये, ह्या जाणिवेने मी कसलेही वैयक्तिक दुःख माझ्याभोवती रेंगाळू देत नाही. साहित्य, संगीत, नाट्य असल्या कलांत रमण्यात आणि थोडेफार इतरांना रमवण्यात आयुष्य गेले. उर्दू शायराच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त लाभली. 'उपरा', 'बलुतं', 'आठवणीचे पक्षी' ह्या पुस्तकांसारखे काही वाचले, की आपले जगणे सामाजिक दृष्ट्या असंबद्ध वाटायला लागते. कुणी मोठेपणा द्यायला लागले की ओशाळल्यासारखे वाटते.
सुखी बामनावर दलित साहित्य वाचल्याचा काय परिणाम होतो हे पुलंच्या शेवटच्या उतार्‍यातून कळतं. धर्म एकत्र कसे राहतात इ इ काहीही अ‍ॅकनॉलेज केलेलं नाही. एक मुस्लिम अतिरेकी दिसला कि म्हणा पृथ्वीवर २०० कोटी अतिरेकी आहेत!! याला काही अर्थ? धार्मिक व्यवस्थेतेतून उत्पन्न झालेले संगीत, साहित्य, भाषा इ इ ते आयुष्यभार एंजॉय करणार, आणि एक दलित साहित्य वाचले कि सगळी व्यवस्थाच त्यांना घाण दिसणार. पुलं, मॅच्यूअर व्हा, सर्वांगीण विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 12:34 नवीन
आणि लक्षात घ्या या हत्या हा लेख लिहिण्यापूर्वी कितीतरी वर्षे लिहिलेला आहे.
आणि लक्षात घ्या या हत्या हा लेख लिहिण्यापूर्वी कितीतरी वर्षे झालेल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
ग
गामा पैलवान Wed, 02/28/2018 - 17:58 नवीन
डॉक्टर सुहास म्हात्रे,
आजतागायत मानव या जगातल्या बर्‍याच गोष्टींबाबत अज्ञानी आहे याचे ज्ञान झाले की, मनाचे अंधत्व, हट्टीपणा व अडेलतट्टूपणा खुल्या मनाने टाळून, इतरांच्या मानवी अधिकारांवर गदा न आणणार्‍या कोणत्याही विचार व कृतीचे खुल्या मनाने विश्लेषण करणे शक्य होते. या विचारसरणीला अज्ञेयवाद असे म्हणतात...
मला वाटतं की खुल्या मनाने विश्लेषण करणे हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. त्याचा अज्ञेयवादाशी थेट संबंध नाही. एखादा अज्ञेयवादीदेखील हट्टी, दुराग्रही असू शकतो. अर्थात, माझ्या विधानाच्या 'असहमतीस असहमती' हा मध्यममार्ग उपलब्ध आहेच. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 02/28/2018 - 19:15 नवीन
अज्ञेयवाद म्हणजे "इट कान्ट बी नोन" , संबंधित वास्तव जाणता येणे शक्य नाही हे विधान सत्य मानणारा. ======================= अज्ञेयवादी हा नास्तिकांचाच एक प्रकार आहे. "जाणता येणे शक्य नाही" म्हणजे "आहे हे अमान्य आहे. नि त्यासंबंधीचे वागण्याचे धर्माचे फ्रेमवर्क अमान्य आहे." असे अभिप्रेत होते. "ईश्वराबद्दलचे सत्य जाणता येणे शक्य नाही" म्हणजे "देव नाही हे अमान्य आहे" असे देखील होते. पण देव नसल्याचे कोणते फ्रेमवर्क नसते म्हणून नास्तिकात आणि अज्ञेयवाद्यात वर्तनात्मक फरक नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/28/2018 - 23:34 नवीन
@गामा पैलवान व arunjoshi123 अज्ञेयवादाचा अर्थ तसा नाही... आणि तो आस्तिकतेचा किंवा नास्तिकतेचा प्रकार तर अजिबात नाही. अज्ञेयवादी माणूस मानवाच्या जाणिवा व समजूतीच्या मर्यादा जाणतो आणि मानतो; तसेच, मानवाचे विश्वाबद्दलचे भौतिक व अधिभौतिक ज्ञान तोकडे आहे हे पण जाणतो आणि मानतो. सर्व प्रकारांच्या भौतिक व अधिभौतिक माहितीस आपल्या मनाची कवाडे खुली ठेवतो. जी माहिती तर्क व सद्य शास्त्रिय ज्ञानावर पटते ती मानतो. कोणत्याही एकेरी विचारसरणीला चिकटून दुसरे सगळे थोतांड असे म्हणत नाही. स्वतःला अथवा दुसर्‍या कोणाला घातक अथवा क्लेशकारक नाही असे विचार एखाद्याने वैयक्तिक जीवनात बाळगले अथवा कृती केली तर, अज्ञेयवादी त्याचे सामंजस्याने तर्काच्या व शास्त्रिय पायावर मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करेल. त्याने मानले नाही तर, त्याच्या वैयक्तिक विचार/कृतीच्या मानवी हक्काचा आदर करून, त्याच्यावर मानसिक अथवा शारिरीक जुलूम होईल इतपत त्याच्यामागे हात धुवून लागणार नाही. अज्ञेयवाद्यांबद्दल खालील काही ठोकताळे ग्राह्य धरता येतील... (१) हे जग नैसर्गिकरित्या भैतिक व वैचारिक वैविध्याने भरलेले आहे आणि त्याला कोणत्याही आस्तिक, नास्तिक किंवा इतर प्रकारच्या एकेरी विचारसरणीत बसवणे अनैसर्गिक होईल, किंबहुना या वैविध्यामुळेच हे जग जास्त रोचक झालेले आहे याची पुरेपूर खात्री अज्ञेयवाद्याला असते. हे जग एकसूरी बनवण्याचा प्रयत्न अनैसर्गिक, अन्यायकारक व जुलूमी असेल असे तो मानतो. (२) मानवाच्या ज्ञानेन्द्रियांच्या व बुद्धीच्या सीमा पाहता, अजूनही मानवाला या जगातल्या सगळ्याच गोष्टींचा उलगडा झालेला नाही. काल मानदंड असलेल्या गोष्टी आज मोडीत निघालेल्या आहेत आणि काल अशक्य-अनाकलनिय समजल्या जाणार्‍या गोष्टी आज वास्तवात आलेल्या आहेत किंवा समजलेल्या आहेत. त्यामुळे, कोणत्याही एका गोष्टीला "अंतीम सत्य" समजण्याऐवजी तिची मर्यादा "सद्य पुराव्यांवर पटलेली विश्वासू माहिती" इतकीच असते. अश्या गोष्टींसंबंधांत उद्या नवीन शास्त्रिय/तार्किक पुरावे सापडल्यास, आपले मत बदलणे नामुष्कीचे नाही तर ते शास्त्रिय विचारसरणीचे आणि जिवंतपणाचे लक्षण आहे (जिवंत व्यक्तीच, आपल्या मनाने बदलू शकतात, नाही का ?) असे अज्ञेयवादी मानतो. (इ) वरच्या गोष्टी मान्य असल्या की मग सर्व प्रकारच्या विचारसरणींचा समतोल व सामंजस्याने विचार होऊ शकतो. त्यामुळे, अज्ञेयवाद्याला आस्तिक, नास्तिक व मानवी हक्कांवर गदा न आणणार्‍या इतर कोणत्याही विचारसरणीचे वावडे नसते... म्हणूनच, प्रत्येक विचारसरणीतील तार्किक अथवा शास्त्रसंमत नसलेल्या पण वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनासाठी उपयोगी व सुखकारक अश्या गोष्टी तो सहजपणे स्विकारू शकतो. स्वतः अंगिकारल्या नाहीत किंवा स्वतःला पटल्या नाहीत अश्या गोष्टींचा तो फारतर विरोध करेल, पण हट्टी तिरस्कार (पॅथॉलोजिकल हेट) करणार नाही. (उ) फार हट्टी अथवा आग्रही नसल्यमुळे; अज्ञेयवादी, आस्तिक आणि नास्तिक या दोन टोकांच्या बरोब्बर मध्यबिंदूवर न राहता; व्यक्तीगत मते व अनुभव यांच्या वैविध्याप्रमाणे, त्या मध्यबिंदूच्या दोन्ही बाजूला असलेल्या एका वर्णपटावर (इन अ रेंज अराऊंड द सेंटर) असतात... म्हणूनच त्यांच्या समजूतदारपणामुळे काहीं वेळेस त्यांना आस्तिक समजले जाते, तर त्यांच्या परखड शास्त्रिय विचारसरणीमुळे काही वेळेस त्यांना नास्तिक समजले जाते. या वैविध्याचे मुख्य कारण म्हणजे कोणत्याही चांगल्या विचारसरणीचा मुख्य उद्येश मानवी जीवन अधिक समंजस, समजूतदार, विकसित, आनंदी आणि सुखकारक करणे हाच असला पाहिजे, हे अज्ञेवाद्यांना पटलेले असते. असा उद्येश नसलेल्या विचारसरणीपासून मानवाला फायद्यापेक्षा धोकाच जास्त होईल, नाही का ? अज्ञेयवादी व्यक्ती, मानवी "अज्ञानाचे ज्ञान" झालेली, आणि म्हणूनच कोणत्याही एका विचारसरणीच्या आहारी न गेलेली, सर्व नवे-जुने ज्ञान तपासून त्यातील पटेल त्याचा स्विकार करण्यासाठी मनाची कवाडे सतत खुली असलेली व्यक्ती असते... ना कट्टर आस्तिक, ना कट्टर नास्तिक, ना इतर कोणत्या एकेरी विचारसरणीची (इझमची) पाईक... हटवादी तर नाहीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
अ
अर्धवटराव गुरुवार, 03/01/2018 - 00:03 नवीन
मला आवडलं असतं अज्ञेयवादी व्हायला. पण यात मेंदुला फार शिणवायला लागेल असं दिसतय. त्याबाबदीत आम्हि जरा (जास्तच) आळशी आहोत. तेंव्हा हे ही ऑप्शन बाद. आस्तीक-नास्तीक प्रकरण तसंही आम्हाला कळत नाहि. च्यायला... जावं कुठे माणासाने. पण अज्ञेयवादावर कोणि प्रश्न केला तर त्याला कुणाकडे रेफर करायचं हे तर नक्की झालं. या धाग्याचं हे एकच चांगलं फलीत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 03/02/2018 - 17:36 नवीन
अज्ञेयवादी असायला फार काही लागत नाही. कोणत्याही गोष्टीचा विचार करताना, "प्रामाणिकपणा, सहिष्णुता आणि स्वतःचे ज्ञान अंतिम समजणार्‍या दांभिकपणाचा अभाव" इतके भांडवल खूप आहे ! :) सुरुवातीला काही वेळेस हे लक्षपूर्वक करावे लागते. नंतर ती सवय बनते. काही हितसंबंध मध्ये येऊ शकतात, पण, तो मोह टाळल्यास, मानसिक स्वास्थ्य व समाधानाच्या दृष्टीने पाहता उत्तम दूरगामी परिणाम मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Fri, 03/02/2018 - 19:52 नवीन
"प्रामाणिकपणा, सहिष्णुता आणि स्वतःचे ज्ञान अंतिम समजणार्‍या दांभिकपणाचा अभाव" इतके भांडवल खूप आहे ! :)
माझ्या स्वार्थाचा संबंध असतो, एस्पेशिअली प्रोफेशनल लाईफ आणि नातेसंबंध, तेंव्हा हि स्ट्रॅटजी वापरायचा थोडाफार प्रयत्न करतो. ते सुद्धा 'इट वर्क्स फॉर लाँग टर्म बेनिफिट्स' हे शहाणपण चार लाथा बसल्यानंतर उमगलं म्हणुन. इतर बाबतीत मेंदु शिणवण्यात काहि अर्थ नाहि हेच आमचं ऑब्सर्व्हेशन :) पण आता प्रयत्न करतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 03/01/2018 - 03:29 नवीन
@ डॉ. म्हात्रे. छान प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
A
arunjoshi123 गुरुवार, 03/01/2018 - 07:18 नवीन
सुहासजी, नविन माहीती वा ज्ञान यांचा स्वीकार करून आपल्या विचारधारेत आवश्यक असल्यास बदल करावा असा प्राजंळपणा हा व्यक्तिगत असतो (जो तुमच्यात खूप्प आहे.) नि तो अस्तिकांत, नास्तिकांत, अज्ञेयांत, इ इ लोकांत असू नसू शकतो. पण आत्ता असलेल्या परिस्थितीत नक्की काय विचार आहेत यावरून अस्तिक, नास्तिक, अज्ञेय, इ ठरेल. ================== https://en.wikipedia.org/wiki/Agnosticism जे स्वतः अज्ञेय नाहीत/नसू शकतात त्यांचे मते अज्ञेयवादाची प्रातिनिधिक प्रतिमा काय आहे?
Agnosticism is the view that the existence of God, of the divine or the supernatural is unknown or unknowable.[1][2][3] According to the philosopher William L. Rowe, "agnosticism is the view that human reason is incapable of providing sufficient rational grounds to justify either the belief that God exists or the belief that God does not exist".[2] Agnosticism is the doctrine or tenet of agnostics with regard to the existence of anything beyond and behind material phenomena or to knowledge of a First Cause or God.[4] and is not a religion. English biologist Thomas Henry Huxley coined the word "agnostic" in 1869. Earlier thinkers, however, had written works that promoted agnostic points of view, such as Sanjaya Belatthaputta, a 5th-century BCE Indian philosopher who expressed agnosticism about any afterlife;[5][6][7] and Protagoras, a 5th-century BCE Greek philosopher who expressed agnosticism about the existence of "the gods".[8] The Nasadiya Sukta in the Rigveda is agnostic about the origin of the universe.[9][10][11]
दिव्य वा निसर्गोत्तर इत्यादि मानल्या जाणार्‍या ईश्वराचे अस्तित्त्व आहे वा नाही हे माहीत नाही वा माहीत केले जाऊ शकत नाही. यासाठी मानवी मनाची तर्कक्षमता अपुरी आहे. =============================== अवांतर हिंदू अज्ञेयवाद
Hindu philosophy Throughout the history of Hinduism there has been a strong tradition of philosophic speculation and skepticism.[41][42] The Rig Veda takes an agnostic view on the fundamental question of how the universe and the gods were created. Nasadiya Sukta (Creation Hymn) in the tenth chapter of the Rig Veda says:[43][44][45] Who really knows? Who will here proclaim it? Whence was it produced? Whence is this creation? The gods came afterwards, with the creation of this universe. Who then knows whence it has arisen?
ऋग्वेदातील नासदीय सूक्त ईश्वराच्या नि विश्वाच्या उत्पत्तीबाबत अज्ञेयवादी विचार मांडते. अवांतर समाप्त. =================================================
अज्ञेयवादी माणूस मानवाच्या जाणिवा व समजूतीच्या मर्यादा जाणतो आणि मानतो; तसेच, मानवाचे विश्वाबद्दलचे भौतिक व अधिभौतिक ज्ञान तोकडे आहे हे पण जाणतो आणि मानतो.
जाणतो नि मानतो हा अज्ञेयवांद्याचा आतून दृष्टीकोन झाला, बाहेरु न पाहिलं तर ते फक्त मानतो इतकंच असावं. =================================== ईश्वर आहे कि नाही हे माहीतही नाही आणि जाणणेही शक्य नाही म्हणजे काय? तीन विधाने पाहू: १ अरुण चोर आहे. २. अरुण चोर नाही. ३. अरुण चोर आहे का नाही हे माहीत नाही आणि माहित होणे शक्यही नाही. केस २ आणि केस ३ चा निकाल सारखाच असेल. म्हणून मी म्हणालो कि थेरॉटिकली नास्तिक नि अज्ञेयवादी सारखेच. =========================== अज्ञेयवादी वास्तविक अस्तिक नि नास्तिक या दोघांच्या मधले नसून तिसरेच आहेत. ============================== आतापर्यंततरी अज्ञेयवादी परंपरा उच्च दर्जाची राहीली आहे. त्याची कारणं असोत, पण राहीली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
S
sagarpdy Fri, 03/02/2018 - 12:08 नवीन
सहमत.
म्हणून मी म्हणालो कि थेरॉटिकली नास्तिक नि अज्ञेयवादी सारखेच.
काही बाबतीत हो. पण या बाबतीत अरुण नक्की चोर नसला, तरी संशय राहतो. बड्या कंपन्यांच्या BGC मध्ये १ आणि ३ चा निकाल समान लागू शकेल :) अज्ञेयवादी पास्कलस वेजर मानत असेल तर त्याचे बहुतांश वर्तन अस्तिकासारखे असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
स्वधर्म गुरुवार, 03/01/2018 - 08:47 नवीन
म्हात्रे सर, या प्रतिसादाने या धाग्याचे सार्थक झाले. अज्ञेयवादाबद्दल चांगले विवेचन. खरं तर धार्मिक लोक अज्ञेयवाद्यांना ‘आळशी नास्तिक’ म्हणत अाले अाहेत. पण धार्मिक हे ‘स्वत: विचार करण्याच्या अाळसाने, जगातल्या / जीवनातल्या अनिश्चिततेचा स्विकार न केल्यामुळे व अापले सदैव चांगलेच व्हावे या तीव्र इच्छेपोटी’ यासाठी अास्तिक असतात व म्हणून तेच अाळशी असण्याची शक्यता वाटते. अज्ञेयवाद्यांबाबत अास्तिक-नास्तिकांच्या मधले व भूमिकाच न घेणारे लोक असा अारोप असतो. त्यसाठी तुम्ही दिलेल्या अाधिकच्या मुद्द्यांचा उपयोग अाहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
A
arunjoshi123 गुरुवार, 03/01/2018 - 09:13 नवीन
अज्ञेयवादाबद्दल चांगले विवेचन.
म्हात्रे स्वतः अत्यंत चांगले अज्ञेयवादी आहे. प्रत्येक अज्ञेयवादी तसा नसतो. माहीत नाही नि माहीत होणे शक्य नाही हि अज्ञेयवादाची बेसलाईन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/03/2018 - 09:11 नवीन
माहीत नाही नि माहीत होणे शक्य नाही हि अज्ञेयवादाची बेसलाईन आहे. माहीत नाही : हे बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल मानवाला सर्व माहिती नाही, याबद्दल प्रामाणिकपणे विचार करणार्‍या कोणाच्याही मनात संशय नसावा. माहीत होणे शक्य नाही : हे बरोबर नाही. "एखादी गोष्ट माहित होणे शक्य नाही" किंवा "एखाद्या गोष्टीबद्दल अंतिम ज्ञान माहित झाले आहे" असा समज असल्यावर अधिक ज्ञान मिळविण्यासाठी मनाची कवाडे आपोआप बंद होतात. याविरुद्ध, नवनवीन ज्ञानासाठी मनाची कवाडे प्रामाणिकपणे आणि सहिष्णूतेने खुली ठेवणे हे अज्ञेयवाद्याचे मूळ लक्षण आहे.व "मानवाला सर्व गोष्टींचे पुरेसे ज्ञान नाही", "त्याचे सद्य ज्ञान चुकीचे असण्याची शक्यता आहे" आणि "मानव प्रयत्नपूर्वक आपल्या ज्ञानाच्या कक्षा सतत विस्तारत जाणार आहे"; हे मानण्याची तयारी/कुवत असणे, ही खुल्या मनाने नवीन ज्ञान स्विकारण्यासाठीची पहिली पायरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 03/01/2018 - 09:30 नवीन
ज्ञेय म्हणजे ज्याचे ज्ञान करून घेणे शक्य आहे असा तो. अज्ञेय म्हणजे ज्याचे स्वरुप जाणता येत नाही. अज्ञेयवादी म्हणजे अशी भूमिका असणारा. नि अशी भूमिका ठाम असते. =================================== https://www.reddit.com/r/agnostic/comments/7vzsnm/agnosticism_is_nothing_but_indecisiveness/ इथे झालेली चर्चा वाचा. भारतात अज्ञेयवादी अत्यल्प आहे. (तसे अस्तिक व नास्तिक देखील अत्यल्प आहेत, फक्त दांभिक हा चौथा प्रकार बहुसंख्य आहे.). पण काही देशांत असं नाही. लिंकमधे अज्ञेयवाद्यांचा सुर, त्यांनी वापरलेले शब्द, त्यांची इतरांबद्दल मत मांडायची रीत पाहा. ते अजिबात धुतल्या तांदळासारखे नाहीत. अन्य सर्व त्यांचे धागे पहा नि तिथली दादागीरी पहा. बरेचदा अर्वाच्य भाषा पहा. =========================== कोणतंही तत्त्वज्ञान हस्तिदंती मनोर्‍याच्या वरच्या मजल्यावरून सर्वांसाठी खाली आणलं जातं तोपर्यंत त्याचं पावित्र्य नष्ट झालेलं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
स
स्वधर्म गुरुवार, 03/01/2018 - 10:22 नवीन
हे तिन्ही गटात अाहेत. फक्त अज्ञेयवाद्यांतच नाही. तुंम्हाला म्हणायचंय काय? तत्वज्ञानाबाबत तुंम्ही म्हणता ते रोचक अाहे, माझा (तत्वज्ञानाचा) तेवढा अभ्यास नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
प्रकाश घाटपांडे Sat, 03/03/2018 - 12:10 नवीन
व्वा! क्या बात है| अगदी समर्पक विवेचन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ग
गामा पैलवान गुरुवार, 03/01/2018 - 14:44 नवीन
डॉक्टर सुहास म्हात्रे, तुमचा अज्ञेयवादी व्यक्तीचं वर्णन करणारा इथला प्रतिसाद वाचला. त्यानुसार मला अज्ञेयवादी रहायला आवडेल. जरी मी आस्तिक असलो तरी. किंबहुना आस्तिक्य आणि अज्ञेयवाद एकमेकांच्या विरोधात नाही. कारण की ज्ञानाची साधनं म्हणजे मानवी इंद्रिय अतिशय मर्यादित वर्तुळांत वावरतात. त्यामुळे हे विश्व माणसाला नेहमी अज्ञेयच राहणार आहे. हायझेनबर्ग या भौतिकशास्त्रज्ञाने अनिश्चिततेचा सिद्धांत मांडला आहे. त्यानुसार कोणत्याही मूळकणासंबंधी (उदा.: इलेक्ट्रॉन) सर्व माहिती एकाच वेळेस जाणून घेता येत नाही. साध्या इलेक्ट्रॉनला पूर्णपणे जाणून घेणं शक्य नाही तर ईश्वराची बातंच सोडा. त्यामुळे अज्ञेयवाद हा नैसर्गिक आहे. मात्र असं असलं तरी विकीवरील व्याख्येत हे नैसर्गिक परिमाण दिसून येत नाही. असं का बरं? तसंच नासदीय सूक्तात अज्ञेयवाद कुठनं सापडला हे देखील कळलं नाही. जमल्यास स्पष्ट करावं ही विनंती. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/03/2018 - 11:37 नवीन
नासदीय सूक्तात अज्ञेयवाद कुठनं सापडला नासदिय सुक्त : नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् | किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥ १॥ Then even nothingness was not, nor existence, There was no air then, nor the heavens beyond it. What covered it? Where was it? In whose keeping? Was there then cosmic water, in depths unfathomed? न मृत्युरासीदमृतं न तर्हि न रात्र्या अह्न आसीत्प्रकेतः | आनीदवातं स्वधया तदेकं तस्माद्धान्यन्न परः किञ्चनास ॥२॥ Then there was neither death nor immortality nor was there then the torch of night and day. The One breathed windlessly and self-sustaining. There was that One then, and there was no other. तम आसीत्तमसा गूहळमग्रे प्रकेतं सलिलं सर्वाऽइदम् | तुच्छ्येनाभ्वपिहितं यदासीत्तपसस्तन्महिनाजायतैकम् ॥३॥ At first there was only darkness wrapped in darkness. All this was only unillumined cosmic water. That One which came to be, enclosed in nothing, arose at last, born of the power of heat. कामस्तदग्रे समवर्तताधि मनसो रेतः प्रथमं यदासीत् | सतो बन्धुमसति निरविन्दन्हृदि प्रतीष्या कवयो मनीषा ॥४॥ In the beginning desire descended on it - that was the primal seed, born of the mind. The sages who have searched their hearts with wisdom know that which is kin to that which is not. तिरश्चीनो विततो रश्मिरेषामधः स्विदासीदुपरि स्विदासीत् | रेतोधा आसन्महिमान आसन्त्स्वधा अवस्तात्प्रयतिः परस्तात् ॥५॥ And they have stretched their cord across the void, and know what was above, and what below. Seminal powers made fertile mighty forces. Below was strength, and over it was impulse. को अद्धा वेद क इह प्र वोचत्कुत आजाता कुत इयं विसृष्टिः | अर्वाग्देवा अस्य विसर्जनेनाथा को वेद यत आबभूव ॥६॥ But, after all, who knows, and who can say Whence it all came, and how creation happened? the Devas (gods) themselves are later than creation, so who knows truly whence it has arisen? इयं विसृष्टिर्यत आबभूव यदि वा दधे यदि वा न | यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सो अङ्ग वेद यदि वा न वेद ॥७॥ Whence all creation had its origin, he, whether he fashioned it or whether he did not, he, who surveys it all from highest heaven, he knows - or maybe even he does not know. —Translated by A. L. Basham (विकिवरून साभार) नासदियसुक्ताची पहिली पाच कडवी हे विश्व कसे बनले असावे यासंबंधीचा विचार सांगतात. हे "बिग बँग" थिअरीशी साम्य असलेले वर्णन आहे ! सहाव्या आणि सातव्या कडव्यांचा अर्थ, आपले पूर्वसुरी, जगाच्या उत्पत्तीबद्दलही आपल्याला सर्वज्ञान आहे असे समजत नव्हते असाच होतो. आपल्याला पूर्ण ज्ञान नाही हे जाणणे, ही नवनवीन ज्ञानाच्या स्विकारासाठीची व ज्ञानवर्धनासाठीची पहिली पायरी आहे आणि... अर्थातच, तो अज्ञेयवादाचा गाभा आहे. ***************



यानिमित्ताने अजून काही... (अ) आपल्याला सर्व काही माहीत आहे, (आ) अनाकलनिय गोष्टींचा अर्थ लावण्यासाठी ओढूनताणून अतर्क्य तर्क करणे, (इ) पूर्वजन्मीची किंवा इतर काही उपकथा सांगून, कथेतील पात्राच्या या जन्मीच्या अतर्क्य/अविचारी/सहज न पटणार्‍या कृतीचे समर्थन करणे, (ई) धार्मिक शास्त्रांत सर्व गोष्टींची माहिती व उत्तरे आहेत, त्यांच्यापलिकडे बघायला नको, किंबहुना त्यांच्या पलिकडे पाहण्याने धर्माचा घोर अवमान होतो, असे गैरसमज पसरवणे... इत्यादी. वरच्यासारख्या अनेक गोष्टी पुराणांमध्ये, दंतकथांमध्ये आणि 'धर्म आपले खाजगी संस्थान मानून त्याचे नियंत्रण करणार्‍या धर्ममार्तंडांनी' पसरवलेलया दिसतात. अश्या गोष्टींमुळेच, हिंदू धर्मामध्ये सरळसरळ अतर्क्य दिसणार्‍या तर्कटांना विरोध करणे थांबले, "बाबा वाक्य प्रमाणम्"चे स्तोम माजले, नवीन स्वतंत्र विचार येण्याचे थांबले व धर्म कूपमंडूक बनून त्याची अवनती सुरू झाली. आपल्या संस्थानाचा ताबा आपल्याकडेच रहावा यासाठी अश्या कथा-ककल्पनांच्या पायावर धर्मामध्ये वेळोवेळी अनेकानेक कर्मकांडे घुसवली गेली... इतकी की, आजचा हिंदू, धर्म कमी आणि कर्मकांडेच अधिक पाळतो आहे ! माझ्या मते, मूळ हिंदू धर्माची रचना अज्ञेयवादावरच झाली आहे. १. नासदिय सूक्तात म्हटले आहे की प्रथम विश्वाचा उगम झाला आणि नंतर त्यात देव (अनेकवचन) निर्माण झाले. हे तर अब्राहमिक धर्मांतील (ज्यूदाईझम, ख्रिश्चयानिटी आणि इस्लाम) विचारांच्या एकदम विरुद्ध आहे. कारण, त्या धर्मांप्रमाणे हे विश्व केवळ देवाने आणि तेही केवळ एकाच देवाने निर्माण केलेले आहे. (प्रत्यक्ष व्यवहारांत त्या धर्मांच्या धर्ममार्तंडांनिही कळत, नकळत या मूलतत्वांना अनेकदा तडे पाडले आहेत तर कधी चक्क सुरूंग लावला आहे. पण तो वेगळा विषय आहे.) २. सगळे हिंदू देव, कोणत्या ना कोणत्या कालात मानवी स्वरूपात आस्तित्वात आलेले आहेत, मानवासारखे पृथ्वीवर वावरले आहेत, सर्व मानवी भावना-विकार त्यांच्यामध्ये होते. त्यांनाही सर्वसामान्य माणसासारखे जन्म-मृत्यु, हार-जीत, सुख-दु:ख, इत्यादींना सामोरे जावे लागले. म्हणजे, नासदियसुत्रात म्हटल्याप्रमाणे ते विश्वाच्या उत्पत्तीनंतरच निर्माण व्हायला हवेत, नाही का ? माझा तर्क असा की, हे सगळे देव पृथ्वीवर होऊन गेलेले महामानव (पण मूळात मानवच) होते. समाजासाठी त्यांनी केलेल्या असामान्य कामामुळे त्यांच्या स्मृती मानवी समाजात कथा-कवितांच्या रुपाने दीर्घकाळ आस्तित्वात राहिल्या, एका पिढीतून दुसरीकडे गेल्या, कथा-कवितांमध्ये वर्णिल्या गेल्या आणि त्या भूर्जपत्रे-कातडे-कागद इत्यादिंच्या मदतीने अजूनही जिवंत राहिल्या आहेत. मानवी समाजाला बांधून ठेवण्यासाठी (उदा : धर्म, राष्ट्र, सामाजिक गट, इ) अश्या वाङ्मयाची अनन्यसाधारण गरज असते. किंबहुना, असे साहित्य निर्माण करण्याची ताकद जेव्हा मानवात आली (ज्याला, मानववंशशास्त्रात "संकल्पना बनवणे" किंवा "स्टोरी टेलिंग" असे म्हणतात), तेव्हाच त्याचे मोठ्या सामाजिक गटात संघटन शक्य झाले. दर कालखंडात या प्रत्येक मूळ कथेत, मानवी कल्पकतेने अधिकाधिक भर पडत गेली आहे आणि प्रथम केवळ इतिहासरुपाने असलेल्या या वाङ्मयात नवीन कथाकल्पनांची घुसखोरी झाली आहे. हे तंत्र, कधी आपल्या आवडीच्या पात्रांचे दैवत्व अधिक उजळायला, कधी त्यांचे उणेपण झाकायला (उदा: पूर्वजन्मिच्या कथांच्या स्वरूपात), तर कधी विरोधी पात्रांचे चारित्रहनन करायला वापरले गेले आहे. (आपल्या समाजाची वाढ व्हावी व त्याचा ताबा आपल्याकडे रहावा यासाठी असे कथाबदल सर्वच धर्मांच्या वाङ्मयात, उघडपणे अथवा सरमिसळीने, केले गेलेले आहेत.) थोडक्यात, हे विश्व, मानवी जीवन व धर्माबाबत फार फार पूर्वी ऋषीमुनींनी स्विकारलेला तर्क-विचारांवर अवलंबून असलेला मार्ग सोडून, सद्याचा हिंदू जगावेगळे काम केलेल्या वेगवेगळ्या महामानवांच्या कृतींत देवाचा शोध घेतो आहे. त्यामुळेच, सर्वसामान्य हिंदूचे आजचे देव "अचिंत्य" न राहता, (खरा-खोटा काहीही म्हणा पण) मानवी इतिहास असलेले देव/अवतार आहेत. कालमानाप्रमाणे देवांच्या लोकप्रियतेतही घट अथवा वाढ होते. प्रत्येक महान व्यक्ती-सम्राट-राजा नेहमीच देवाचा (शिव अथवा विष्णूचा) अंश असलेला असतो. चीनमध्ये असलेली वेगवेगळ्या १०० बुद्धांची मंदीरे (आपला शाक्यमुनी बुद्ध त्यातला केवळ एक बुद्ध आहे, त्या शंभारात एक 'लेडी बुद्ध' पण आहे) आणि १५ ऑक्टोबर १९१८ साली जन्मलेल्या शिर्डीच्या साईबाबांचा एका शतकामध्येच देवत्वाच्या दिशेने होत चाललेला प्रवास हेच दाखवत आहे, नाही का ? प्राचीन ऋषींनी चोखाळलेला "एका सार्वकालिक, सार्वभौम, अचिंत्य ईश्वरावर" श्रद्धा ठेवण्याचा मार्ग सोडून, आजचा सर्वसामान्य हिंदू समाज आपापल्या कुवतीप्रमाणे विविध प्रयोग करत आपल्याला "काय पटेल/सोईचे पडेल/फायद्याचे होईल" याचा शोध घेत आहे. हा शोध जोपर्यंत मानसिक शांती, मानसिक बळ व आत्मविश्वास यांच्या वाढीस उपयोगी आहे, तोपर्यंत तो सहिष्णूतेने व सकारात्मकतेने घ्यायला हरकत नसावी. या शोधामध्ये, जोपर्यंत फसवाफसवी, जुलूम-जबरदस्ती किंवा मानवी हक्कांवर आक्रमण होत नाही, तोपर्यंत प्रत्येकाला आपापल्या मानसिक-वैचारिक-सद्य परिस्थितीवर अवलंबून रुचणारा-पचणारा-सुखकारक असणारा मार्ग चोखाळण्याचे विचारस्वातंत्र्य असायला हवे. मात्र, जेथे कोठे फसवाफसवी, जुलूम-जबरदस्ती किंवा मानवी हक्कांवर आक्रमण होत आहे, तेथे त्याचा कडाडून विरोध केलाच पाहिजे... मग ती आगळीक आस्तिकांनी, नास्तिकांनी किंवा इतर कोणत्याही विचारसरणीच्या लोकांनी केलेली असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/03/2018 - 11:52 नवीन
हिंदू धर्मात तर "देव म्हणजे केवळ एक थोतांड आहे" हे प्रतिपादन करणार्‍या चार्वाकालाही प्राचीनकालापासून ऋषीचा दर्जा दिला गेला आहे आणि आजही त्याच्या नास्तिकी तत्वज्ञानाला धार्मिक-वैचारिक हिंदू वाङ्मयात मानाचे स्थान आहे ! तेव्हा, आस्तिकांच्या या शेकडो वर्षांच्या सकारात्मक सहिष्णू कृतीवरून बोध घेऊन, चार्वाकाच्या खंद्या अनुयायी नास्तिकांनी, मानवी अधिकारांच्या संरक्षणासाठी का होईना पण, थोडेस सहिष्णू बनायला हरकत नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/03/2018 - 12:05 नवीन
तुमचा अज्ञेयवादी व्यक्तीचं वर्णन करणारा इथला प्रतिसाद वाचला. त्यानुसार मला अज्ञेयवादी रहायला आवडेल. जरी मी आस्तिक असलो तरी. किंबहुना आस्तिक्य आणि अज्ञेयवाद एकमेकांच्या विरोधात नाही. कारण की ज्ञानाची साधनं म्हणजे मानवी इंद्रिय अतिशय मर्यादित वर्तुळांत वावरतात. त्यामुळे हे विश्व माणसाला नेहमी अज्ञेयच राहणार आहे. तुमच्या या म्हणण्याप्रमाणे तुम्ही, मी वरच्या एका प्रतिसादात सांगितलेल्या, आस्तिक-नास्तिक ही दोन टोके असलेल्या वर्णपटातील अज्ञेयवादाच्या मध्यबिंदूजवळील छोट्या वर्णपटात, आस्तिक टोकाकडे असलेल्या भागात आहात. त्यामुळे अज्ञेयवाद हा नैसर्गिक आहे. मात्र, माणुस आपल्या "लोभ" आणि "भिती" या दोन मूलभूत गुणधर्मांमूळे अनेक अनैसर्गिक, अनैतिक व घातक गोष्टी करून एकमेकात दुफळी माजवतो... हे पण एक सार्वत्रिक व सार्वकालिक सत्य आहे ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/03/2018 - 17:57 नवीन
माणसाची निर्मिती निसर्गाच्या प्रक्रियेने झाली आहे म्हणून माणसाने निर्माण केलेली अज्ञेयवादाची संकल्पना नैसर्गिक आहे, हे म्हणणे ओढून-ताणून बनवलेला तर्क होईल. तसेही, निसर्गात आस्तित्वात नसलेल्या मानवनिर्मित गोष्टींना आपण अनैसर्गिक म्हणतो, नाही का. माणुस नसता तर संकल्पनाही आस्तित्वात आल्या नसत्या... म्हणजे तार्किक दृष्ट्या कोणतीच संकल्पना नैसर्गिक असूच शकत नाही... ती फक्त चांगली-वाईट, उपयोगी-निरुपयोगी, तार्किक-अतार्किक, इत्यादी असू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ग
गामा पैलवान Sat, 03/03/2018 - 15:38 नवीन
डॉक्टर सुहास म्हात्रे, दोन शंका आहेत. १.
आपल्याला पूर्ण ज्ञान नाही हे जाणणे, ही नवनवीन ज्ञानाच्या स्विकारासाठीची व ज्ञानवर्धनासाठीची पहिली पायरी आहे आणि... अर्थातच, तो अज्ञेयवादाचा गाभा आहे.
हे जरी खरं असलं तरी नासदीय सूक्ताच्या दुसऱ्या कडव्यात स्पष्टपणे म्हंटलंय की :
There was that One then, and there was no other.
हा दावा करणारा कोण? मुळात हा दावा आहे का? की दुसरंच काहीतरी आहे? हा दावा आहे असं गृहीत धरूया. तर मग हा दावा करणारा जो कोणी आहे तो अज्ञेयवादी नाही. तुम्हीआम्ही कदाचित असू. पण तो निश्चितपणे नाही. अस्तित्वाबद्दल शंका नाही. मात्र ते अस्तित्वाच्या समग्र ज्ञानाबद्दल शंका आहे. अज्ञेयवाद यालाच म्हणावं का? २. अज्ञेयवाद व नैसर्गिक तत्त्वज्ञान : एक उदाहरण देतो. कुतूहल ही एक नैसर्गिक मानवी भावना आहे. त्यातून पुढे चौकस वृत्तीचा जन्म झाला. निसर्गातल्या घटनांचा अन्वयार्थ लावावासा वाटू लागला. यालाच विज्ञान म्हणतात. म्हणूनंच विज्ञान हे नैसर्गिक भावनेतनं उत्पन्न झालेलं एक नैसर्गिक तत्त्वज्ञान आहे. तसं एखादं नैसर्गिक तत्त्वज्ञान अज्ञेयवादातनं निर्माण झालेलं आहे का? असल्यास त्याविषयी वाचायला आवडेल. नसल्यास ती एक गंभीर त्रुटी आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 03/03/2018 - 17:37 नवीन
हे जरी खरं असलं तरी नासदीय सूक्ताच्या दुसऱ्या कडव्यात स्पष्टपणे म्हंटलंय की सुरुवातीच्या पाच कडव्यांत "विश्व निर्मितीची संकल्पना" मांडली आहे. शेवटच्या दोन कडव्यांत तिच्याबदल संशय व्यक्त करून ते "अंतिम सत्य नाही" हे सांगितले आहे. म्हणजेच भविष्यात येणार्‍या नव्या ज्ञानासाठी मनाची कवाडे खुली ठेवायला सांगितले आहे. हा दावा करणारा कोण? आजचे जगातले सर्वच ज्ञान मानवनिर्मितच आहे... ते कसे आले त्याबद्दल दावे असू शकतात. परंतू, मानव सोडून ते ज्ञान अजून कोठून आले आहे या दाव्याला "माझ्यावर विश्वास ठेवा" या पलिकडे पुरावा नाही, जे अर्थातच तर्क व शास्त्रिय विचारात बसत नाही, हे नक्की. हिंदू अथवा प्राचिन भारतिय (अधिभौतिक आणि वैचारिक) ज्ञान हे अनेक कालखंडांतल्या अनेक ऋषी-मुनींकडून (त्याकाळचे शास्त्रज्ञ आणि विचारवंत) निर्माण झालेले एकत्रित ज्ञान आहे. ज्या काळात लिखाणाचा शोध लागला नव्हता आणि/किंवा लिखाण दीर्घकाळ टिकवून ठेवता येईल अश्या प्रणालींचा शोध लागला नव्हता, त्यावेळी ते पाठांतराने एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे दिले गेले. त्याचा असा प्रवास होताना त्याच्या मजकुरात बदल होऊ नये म्हणून भारतात पाठांतराच्या गुंतागुंतीच्या अनेक प्रणाली शोधल्या गेल्या. अर्थात, तरिही काही हुशार मंडळींनी त्यांत आपल्या मजकूराची भर टाकलीच, ज्याला आपण प्रक्षिप्त मजकूर म्हणतो. बर्‍याचदा तर की भेसळ इतकी बेमालूम असते की तिला वेगळे करणे अशक्य होते. तेव्हा, उत्तम मध्यममार्ग असा की, मूळ व प्रक्षिप्त असा फरक करण्यात वेळ, श्रम आणि पैसे खर्च करण्यापेक्षा, जे तार्किक आणि उपयोगी आहे ते स्विकारावे, जे अतार्किक आणि निरुपयोगी आहे ते सोडून द्यावे. कारण, या ज्ञानावर कोणा एकाचा प्रताधिकार नाही आणि सरतेशेवटी हे ज्ञान पुढच्या पिढ्यांना त्याचा फायदा मिळावा यासाठीच संग्रहित करून पिढी दरपिढी पुढे आणले गेले, नाही का ? हे वरचे काहीही असले तरी त्या सर्व प्राचीन लेखनातला मजकूर आणि दावे हे केवळ मानवांनीच निर्माण केलेले आहेत. अपौरुषेय या शब्दाचा खरा अर्थ "पुरुषाने/मानवाने न निर्मिलेले" असा नाही तर "एकाच मानवाने न निर्मिलेले (अनेकांच्या ज्ञानाचा अंतर्भाव असलेले)" असा समजणेच जास्त वास्तववादी होईल. जर ते प्राचीन ज्ञान अमानवी प्रणालीने झाले असले, तर ती प्रणाली सद्या बिघडून बंद पडण्याचे काय कारण आहे ?! तसं एखादं नैसर्गिक तत्त्वज्ञान अज्ञेयवादातनं निर्माण झालेलं आहे का? नैसर्गिक किंवा अनैसर्गिक तत्वज्ञान अशी काही विभागणी करणे मला तरी बरोबर वाटत नाही. कारण तत्वज्ञान ही पूर्णतः मानवनिर्मित गोष्ट आहे. मानवात विचारशक्ती उत्क्रांत झाली आणि ती अधिकाधिक विकसित होऊन त्या विचारशक्तीमध्ये संकल्पना (एखादी कल्पना केंद्रभागी धरून त्याभोवती एखादी गोष्ट विशद करणारी आणि/अथवा मानवोपयोगी आणि/अथवा मानवाला आकर्षक वाटणारी तर्कशुद्ध विचारांची साखळी/कथा) निर्माण करण्याची ताकद निर्माण झाली. ही शक्ती कालाबरोबर अधिकाधिक विकसित होतच आहे. भौतिक विश्वासंबधीच्या प्रयोगांनी सिद्ध करण्याजोग्या संकल्पना म्हणजे शास्त्र/विज्ञान आणि अधिभौतिक विचारांतून निर्माण झालेल्या संकल्पना म्हणजे अध्यात्म, असे ठोकताळ्याने म्हणता येईल... मात्र, दोन्हीही मानवनिर्मित संकल्पनाच आहेत हे विसरू नये. मानवाने निर्माण केलेली अज्ञेयवादाची संकल्पना ही अश्याच अनेक संकल्पनांपैकी एक आहे. मात्र, अज्ञेयवादी संकल्पनेमधील "मी (मानव) सर्वज्ञानी नाही" हे मूलभूत सत्य जाणणे, ही अज्ञेयवादासकट इतर कोणत्याही सबळ संकल्पनेसाठी पायाभूत गरज आहे, हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 03/03/2018 - 22:37 नवीन
डॉक्टर सुहास म्हात्रे,
अज्ञेयवादी संकल्पनेमधील "मी (मानव) सर्वज्ञानी नाही" हे मूलभूत सत्य जाणणे, ही अज्ञेयवादासकट इतर कोणत्याही सबळ संकल्पनेसाठी पायाभूत गरज आहे, हे नक्की.
हे मान्य करायला कोणाचीच कसलीही हरकत नसणार आहे. मग अज्ञेयवादाचं स्वत:चं असं खास वैशिष्ट्य काय? की असंकाही व्यवच्छेदक वैशिष्ट्य नसणं हेच अज्ञेयवादाचं वैशिष्ट्य आहे? आजून एक शंका नैसर्गिक तत्त्वज्ञानाविषयी आहे. तुम्ही म्हणता तसं अनैसर्गिक तत्त्वज्ञान नावाची काही वस्तू अस्तित्वात नाही. त्यामुळे अज्ञेयवादास नैसर्गिक तत्त्वज्ञानाची चौकट प्राप्त करवून दिलीच पाहिजे. एक उदाहरण देतो. तुम्ही म्हणता की अज्ञेयवाद्याने भविष्यात येणार्‍या नव्या ज्ञानासाठी मनाची कवाडे खुली ठेवायला हवीत. मात्र नेमक्या याच कारणासाठी कवाडं बंदही करता येऊ शकतात ना? कितीही ज्ञान प्राप्त केलं तरीही संपूर्ण ज्ञान कधीच मिळणार नाहीये. मग मनाची कवाडं उघडी ठेवली काय वा बंद केली काय. फरक काहीच नाही. मूलभूत सत्याचा अपलाप ही अज्ञेयवादाची ही विपरीत बाजू आहे. ती टाळायची असेल तर अज्ञेयवादाचं एखादं सकारात्मक तत्त्वज्ञान विकसित करावंच लागेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 03/04/2018 - 11:23 नवीन
मग अज्ञेयवादाचं स्वत:चं असं खास वैशिष्ट्य काय? कोणत्याही गोष्टीचा विचार करताना, "तार्किकता, प्रामाणिकपणा, सहिष्णुता आणि स्वतःचे ज्ञान अंतिम समजणार्‍या दांभिकपणाचा अभाव" इतके भांडवल सर्वसामान्य व्यवहारातल्या अज्ञेयवादासाठी खूप आहे ! ते असले की मनाची कवाडे खुली ठेवून, अहंकार बाजूला ठेवून, प्रामाणिकपणे, तर्कशुद्ध ज्ञानाचा स्विकार करता येतो, जुन्या चुका टाकून देता येतात आणि आपल्याशी सहमत नसलेल्या (पण मानवी हक्कांना धोका न पोहोचवणार्‍या) लोकांशी सहिष्णुतेने आणि सौहार्दाने सहजीवन करता येते. कोणत्याही चांगल्या तत्वज्ञाचा अंतिम उद्येश मानवी जीवन विकसित, सुखी, समृद्ध व आनंददायी करणे हाच असायला हवा... हाच अज्ञेयवादाचा अंतिम उद्येश आहे. मूलभूत सत्याचा अपलाप ही अज्ञेयवादाची ही विपरीत बाजू आहे. ती टाळायची असेल तर अज्ञेयवादाचं एखादं सकारात्मक तत्त्वज्ञान विकसित करावंच लागेल. हे जरूर नाही. कारण, अज्ञेयवाद ही मुळातच (अ) अहंकार टाळणारी, (आ) सुखी सहजीवनाची, (इ) सहिष्णू व (ई) सकारात्मक संकल्पना आहे, हे वरचा मजकूर वाचून स्पष्ट झाले असेलच. कितीही ज्ञान प्राप्त केलं तरीही संपूर्ण ज्ञान कधीच मिळणार नाहीये. मग मनाची कवाडं उघडी ठेवली काय वा बंद केली काय. फरक काहीच नाही. हे विधान, "कितिदा श्वास घेतला तरी शेवटी आपण मरणारच आहोत, तर श्वासच का घ्यायचा ?" याच्या जवळपास जाते ! मग मानव, इतर सजीव आणि निर्जीव यांच्यात फरक तो काय राहिला ? :) गम्मत सोडून जरा गंभीर विचार करूया. आज मानव इतर जीवांपेक्षा खूप वरच्या विकसित अवस्थेत पोचला आहे तो का ? असा विचार केला तर सहज ध्यानात येईल की, मानव हा एकच असा प्राणी आहे की ज्याने इतर जीवांपेक्षा खूप गोष्टी वेगळ्याप्रकारे केल्या आहेत. त्यांच्यात खूप खोलवर न जाता, सद्य चर्चेसाठी खालील गोष्टी महत्वाच्या आहेतः १. आपली विचारशक्ती वापरून आजूबाजूच्या परिस्थितीचे ज्ञान जमा करणे : हे सगळेच सजीव व विशेषतः प्राणी करतात. माणसाचे विशेष असे की त्याने हे ज्ञान सक्रियपणे मिळवणे सुरू केले, त्याची साठवण करणे सुरू केले. इतर प्राणी हे ज्ञान केवळ पुढच्या एकाच पिढीकडे संक्रमित करू शकतात. मानवाने याच्या अनेक पावले पुढे जाऊन ते ज्ञान (अमर्यादीत संखेच्या) असंख्य पिढ्यांना मिळत रहावे आणि तसे पुढे जाताना त्या ज्ञानाचा विकास व्हावा (नवीन उपयोगी भर + निकामी भागाचा निष्कास) यासाठी नवीन शोधांच्या (इन्व्हेन्शन व डिस्कव्हरी) आणि साठवणींच्या (स्टोरेज) प्रणाली विकसित केल्या. फार उच्च विचार सोडा, पण आपण मिपासारख्या जालावरील संस्थळावर ही चर्चा करत आहोत हे त्याच ज्ञानाचे एक छोटेसे फलित आहे ! २. इतर प्राणी आपल्या तुटपुंज्या ज्ञानाचा उपयोग स्वतःला परिस्थितीशी जुळ्वून घेऊन तगून राहण्यास करतात, ते शक्य नसल्यास स्थलांतर करतात (हे वनस्पतींन तर शक्यच नसते) आणि तेही जमले नाही तर नष्ट होतात. मानवही त्याच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या अवस्थेत हेच करत होता. मात्र, मानवाने आपले सतत वर्धिष्णू ज्ञान वापरून निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित गोष्टी वापरून: २.अ) प्रतिकूल निसर्गातही केवळ तगून न राहता विकसित जीवनमान असलेल्या वस्त्या पृथ्वीवर स्थापन केल्या आहेत (उदा: नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, कॅनडा, रशिया, इत्यादींचे उत्तर भाग) आणि परग्रहावर तेच करण्याची तयारी करत आहे. २.आ) सर्वसामान्य लोक ज्या प्रकारच्या (राहणे, खाणे, फिरणे, इ) सुखसोई आज उपभोगत आहेत त्यांची भूतकाळात ५०-१०० वर्षांपूर्वी असलेल्या परिस्थितीशी तुलना केल्यास, मानवी जीवनात ज्ञानाचे महत्व सांगण्याची गरज राहणार नाही. २.इ) मानवी वैचारिक ज्ञान आणि संकल्पना बनवण्याच्या ताकदीमुळेच, माणूस आज इतर जनावरांसारखा छोट्या छोट्या टोळ्यांत न राहता तुलनेने खूप मोठ्या आणि खूप संरक्षित (गाव, शहर, राज्य, राष्ट्र, राष्ट्रकूल, इ) गटांत तुलनेने फार जास्त सुख-आनंदात राहू शकतो. केवळ शंभर वर्षे मागे गेले तरी या पृथ्वीवर "माईट इज राईट" हेच तत्व आस्तित्वात होते आणि माणसेच नाही तर राष्ट्रेही गुलामीत पिचत पडली होती. त्या परिस्थितीशी तुलना केल्यास, मानवी हक्क, सार्वभौमत्वाचा हक्क, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, इत्यादी तत्वज्ञानी संकल्पनांचा विकास झाल्यानेच आजचे मानवी जीवन जास्त विकसित, जास्त सुखी व जास्त स्थिर झालेले आहे, असेच म्हणावे लागेल. इ इ इ हे आणि बरेच काही मानवाच्या भौतिक आणि वैचारिक ज्ञानामुळेच शक्य झाले आहे. ज्ञानाच्या विकासामुळे मानवी जीवन अधिकाधिक विकसित होत आहे हे नि:संशय आहे. तर मग संपूर्ण ज्ञान मिळेल किंवा न मिळेल याचा विचार न करता जेवढे ज्ञान मिळवणे (व पर्यायाने विकास साधणे) शक्य आहे तेवढे मिळवत रहावे, हा तार्किक व शहाणपणाचा विचार होईल, नाही का ? सर्वसामान्य माणसाच्या भाषेत म्हणायचे झाले तर, "मला एकट्याला जगातिल सर्व संपत्ती कधीच मिळणार नाही, म्हणून मला शक्य होईल इतकी संपत्ती मिळवून मी माझ्या कुटुंबाला सुखी करण्याचा प्रयत्न करूच नये", हा विचार कसा वाटतो ? असा विचार भूतकाळातल्या मानवांनी केला असता, तर आज आपण मिपावर चर्चा करण्याऐवजी वेगवेगळ्या छोट्या हंटर-गॅदरर टोळ्यांत भटकत असतो आणि समोरासमोर आल्यास दगड-काठ्यांच्या शस्त्रास्त्रांनी लढलो असतो, नाही का ?! तुम्ही म्हणता तसं अनैसर्गिक तत्त्वज्ञान नावाची काही वस्तू अस्तित्वात नाही. असं मी कधी म्हटलं आहे ? याबाबत तुमचा गैरसमज झाला आहे. मी बरोब्बर त्याविरुद्ध म्हटले आहे. सर्व तत्वज्ञानाची निर्मिती मानवाने केली आहे, निसर्गाने नाही. निसर्गाबद्दलचे मानवनिर्मित तत्वज्ञान असू शकते व आहे, पण नैसर्गिक (निसर्गनिर्मित) तत्वज्ञान असे काही असू शकत नाही. हे परत जरा वेगळ्या शब्दांत सांगतो. केवळ निसर्गनियमांमुळे (भौतिक नियमांमुळे, कोणाच्याही सक्रिय हस्तक्षेपाने नाही) बनलेल्या / घडलेल्या गोष्टींना नैसर्गिक म्हणता येईल. याविरुद्ध, मानवाने सक्रिय हस्तक्षेपाने बनवलेल्या/घडवलेल्या गोष्टींना; अनैसर्गिक किंवा कृत्रिम म्हणता येईल. यात घर, सायकल, विमाने यासारख्या भौतिक गोष्टी येतात. पण तसेच, नैसर्गिकरित्या आस्तित्वात नसलेले व मानवाने आपल्या विचारशक्तीच्या सक्रिय हस्तक्षेपाने निर्मित केलेले सर्व प्रकारचे तत्वज्ञानही यायला पाहिजे, नाही का ? असाही विचार करून बघा की, मानवाच्या सक्रिय वैचारिक हस्तक्षेपाशिवाय, पृथ्वीवर कोणतेही तत्वज्ञानच काय पण एखादी छोटीशी संकल्पनाही आस्तित्वात आली असती का ? नाही. म्हणजेच, केवळ मानवानेच निर्मित केलेली असल्याने कोणत्याही तत्वज्ञानाचा उगम नैसर्गिक नाही... ती मानवनिर्मित (अनैसर्गिक) आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 03/04/2018 - 14:29 नवीन
डॉ सुहास म्हात्रे, पहिली गोष्ट अशी की नैसर्गिक तत्त्वज्ञान म्हणजे निसर्गनिर्मित तत्त्वज्ञान नव्हे. तत्त्वज्ञान विकसित करणे हा मानवी स्वभाव आहे. ते निसर्गात: होत नसतं. नैसर्गिक तत्त्वज्ञान म्हणजे माणसाच्या नैसर्गिक उर्मीतनं निर्माण झालेलं तत्त्वज्ञान. भूक ही अशीच एक उर्मी आहे त्यातनं आजचा डावं वैचारिक तत्त्वज्ञान उगम पावलं आहे. निदान तशी समजूत तरी आहे. श्वास घेणे ही एक उर्मी आहे त्यातनं प्राणायामाचं विज्ञान उत्पन्न झालं आहे. अज्ञेयवाद ही एक नैसर्गिक उर्मीसारखी सकारात्मक कल्पना आहे. त्यातनं कुठल्या प्रकारचं नैसर्गिक तत्त्वज्ञान उत्पन्न होणं अभिप्रेत आहे? ज्याप्रमाणे कुतूहल ही एक नैसर्गिक उर्मी आहे, तिच्यातनं पुढे हे विश्व जाणून घ्यायची जिज्ञासा उत्पन्न झाली. तिचाच विकास होऊन त्यातनं विज्ञान निर्माण झालं. मग अशी काही एखादी प्रक्रिया अज्ञेयवादाच्या बाबतीत घडलेली आहे का असा माझा प्रश्न आहे. घडली असेल तर वाचायला आवडेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 03/04/2018 - 17:49 नवीन
केवळ नैसर्गिक उर्मीवर आधारीत संकल्पना/तत्वज्ञान निर्मिले तर ते आचरणात आणणार्‍या मानवात आणि मानवेतर प्राण्यांत फरक राहणार नाही. ते केवळ नैसर्गिक मानवी उर्मीतून निर्माण होते आहे असे म्हणणे मला तितकेसे बरोबर वाटत नाही. किंबहुना, त्या उर्मींना ताब्यात ठेवून त्यांच्या अभ्यासाचा सकारात्मक (कधी कधी नकारात्मकही) उपयोग कसा करता येईल या मानसिकतेने बहुतेक संकल्पना/तत्वज्ञान निर्माण केले गेले आहे. चांगल्या संकल्पना/तत्वज्ञान मुख्य दोन उद्येशाने निर्माण झालेले आहे: १. विश्वात घडणार्‍या मूर्त व मानवी जाणिवांना समजणार्‍या किंवा मानवाने तयार केलेल्या उपकरणांनी नोंद घेणे शक्य असलेल्या भौतीक घटनांचे निरिक्षण करणे आणि त्यांचा तर्कशुद्ध अर्थ लावण्याचा प्रयत्न करणे. जिज्ञासा/कुतुहल या उर्मीचा हा परिणाम आहे असे म्हणायला हरकत नाही. यातून मिळणार्‍या ज्ञानाचा उपयोग मानवी जीवन अधिक विकसित व सुखकारक करणे ही पुढची पायरी आहे. त्याचप्रमाणे, हाच प्रवास उलट दिशेनेही होऊ शकतो. म्हणजे, "जीवन अधिक विकसित व सुखकारक करणे" हा उद्येश मध्यवर्ती ठेऊन विश्वातील घटनांचा शोध घेऊन नवीन संकल्पना बनवली जाते व अंमलात आणली जाते २. मानवाच्या अमूर्त नैसर्गिक उर्मी म्हणजेच जिज्ञासा/कुतुहल, भूक, राग, लोभ, मद, भय, निद्रा, मैथून आणि अबलावर सबलाने सत्ता गाजवण्याची खुमखुमी, इत्यादींचा अभ्यास करणे. या अभ्यासाच्या पायावर पुढे जे सकारात्मक संकल्पना/तत्वज्ञान मांडले जाते, त्यातून पुढे मुख्यतः "माणसाने आपल्या उर्मी ताब्यात ठेवून फक्त व्यक्तिगत फायद्यासाठी नव्हे तर एकंदर समाजाच्या भल्याकडे (कॉमन गुड) पाहून व्यवहार करावा" यासाठी विचार व प्रणाली पुढे मांडल्या जातात. एकंदरीत, भौतिक असो की अधिभौतिक चांगल्या संकल्पना/तत्वज्ञान मानवाचे वैयक्तिक आणि सामाजीक विकसित व सुखकारक करण्यासाठी निर्माण केलेले आहे. परंतू, ज्ञान हे दुधारी तलवार असते. या सगळ्या ज्ञानाचा उपयोग, आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या पण प्रत्यक्षात हितसंबंध साधणार्‍या संकल्पना/तत्वज्ञान पुढे करून, स्थार्थ साधण्यासाठीही मानव करतो. धर्मकारणांच्या, अर्थकारणांच्या आणि राजकारणांच्या संकल्पना/तत्वज्ञान/विचारधारांत व व्यवहारांत हे पदोपदी दिसते. शेवटी, सगळ्या संकल्पना/तत्वज्ञान ह्या मानवाने आपल्या विचारशक्तीच्या सक्रिय सहभागाने निर्माण केलेल्या गोष्टी आहेत. मानवी कुतुहल या एका उर्मीने त्यांच्या निर्मितीची सुरुवात झाली असली तरी, एक किंवा अनेक मानवी उर्मींना एका ठरवलेल्या विशिष्ट दिशेने वळविण्यासाठी त्यांची निर्मिती झाली आहे. संकल्पना/तत्वज्ञान मानवाला इतर प्राण्यांपासून वेगळे करतात. त्या भल्या-बुर्‍या कशाही असो, त्यांच्या अभावात मानव आणि इतर प्राण्यांत फारसा फरक राहिला नसता, हे नक्की. अज्ञेयवादाची आतापर्यंत अनेकदा सांगितलेली "तार्किकता, प्रामाणिकपणा, सहिष्णुता आणि स्वतःचे ज्ञान अंतिम समजणार्‍या दांभिकपणाचा अभाव" ही पायाभूत तत्वे समजून घेतली तर आज "मानवी हक्क" या नावाने ओळखली जाणारी संकल्पना याच वादाच्या तत्वज्ञानातून पुढे आली आहेत हे स्पष्ट होईल. असो. या विषयावर खूप आणि खूपच सकारात्मक चर्चा झाली आहे. आता या विषयाच्या बहुतेक पैलूंची द्विरुक्ती होऊ लागली आहे. शिवाय, नकळत का होईना, यनावालांना जरा जास्तच फुकटचा टीआर पी मिळत आहे. =)) =)) =)) तेव्हा ही चर्चा येथेच थांबवू या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 03/04/2018 - 18:39 नवीन
डॉक्टर सुहास म्हात्रे, यनाप्रसिद्धी हे काही थांबण्याचं कारण होऊ शकंत नाही. मात्र तरीही तुमच्या द्विरुक्तीच्या मुद्द्यास अनुमोदन आहे. मानवाधिकार हे अज्ञेयवादाचं तात्त्विक फळ मानण्यांत प्रथमदर्शी तरी काही अडचण येऊ नये. उलटसुलट विचार करावे लागतील. सवडीनं करेन. तोवर चर्चेसाठी धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/05/2018 - 11:16 नवीन
धन्यवाद ! तुमच्याशी संवाद साधताना मजा आली. परत कधी संवाद करायला नक्कीच आवडेल. यनावालांच्या TRP बद्दल विनोदाने बोललो होतो हे त्यापुढच्या "=)) =)) =))" मुळे ध्यानात आले असेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
स्वधर्म Mon, 03/05/2018 - 11:04 नवीन
>> “अज्ञेयवादाची आतापर्यंत अनेकदा सांगितलेली "तार्किकता, प्रामाणिकपणा, सहिष्णुता आणि स्वतःचे ज्ञान अंतिम समजणार्‍या दांभिकपणाचा अभाव" ही पायाभूत तत्वे समजून घेतली तर आज "मानवी हक्क" या नावाने ओळखली जाणारी संकल्पना याच वादाच्या तत्वज्ञानातून पुढे आली आहेत हे स्पष्ट होईल.” -- अाठवले म्हणून: युवाल हरारीचं होमो ड्युअाॅस: ब्रीफ हिस्ट्री अॉफ टुमारो हे पुस्तक ‘मानवाधिकार’ ही केवळ एक संकल्पनाच असल्याचे स्पष्ट करते. खरं तर पृथ्वीवर सर्वच प्राणिमात्रांचा अाधिकार अाहे, त्यात मानव म्हणजे विशेष कोणीतरी अाहे, अन् त्याचे अाधिकार जपले(च) पाहिजेत असा सध्याचा पुरोगामी मतप्रवाह अाहे. मानव हाही इतर प्राण्यांसारखा एक प्राणीच अाहे. धार्मिक असोत, की पुरोगामित्व, मानवाधिकार सारख्या संकल्पना असोत, त्या केवळ कल्पना अाहेत, मानव त्यांच्या अाधारे वाटचाल करत अाहे. अज्ञेयवादाचे अाणखी एक व्यवचछेदक लक्षण म्हणजे ‘हे सर्व सतत बदलत अाले अाहे, बदलत रहाणार अाहे’ हे मान्य करणे. अास्तिक ‘अंतिम सत्य’ कुणालातरी नक्कीच सापडले अाहे, यावर विश्वास ठेऊन असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/05/2018 - 11:56 नवीन
याच मानवाधिकार तत्वाचा विकास होत होत त्याची कक्षा सतत रुंदावत आहे... १. जीवाधिकार : सर्व प्राणी आणि वनस्पती यांना सामवून घेणारी कक्षा. २. पर्यावरणाधिकार : पृथ्वीभोवतीचे वातावरण व पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक निर्जीव गोष्टींना (जमीन, डोंगर, नद्या, समुद्र, इ) सामावून घेणरी कक्षा. ३. विश्वाधिकार किंवा अंतराळाधिकार : पृथ्वीभोवती फिरण्यासाठी सोडलेल्या मानवनिर्मित उपग्रहांमुळे आणि विशेषतः ते निकामी झाल्यावर पृथ्वीभोवती फिरत राहणारा त्यांचा कचरा व त्यांचा कार्यरत असलेल्या उपग्रहांना होऊ शकणारा धोका, यांना सामावून घेणारी कक्षा. हा धोका मुख्यतः पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात बाहेरच्या (७०० ते १०,००० किमी) एक्झोस्फिअर या आवरणात आस्तित्वात असल्याने, कधितरी एखाद्या अवकाशयानाचे, उपग्रहाचे किंवा अंतराळ स्थानकाचे अवशेष जमिनीवर पडण्याच्या बातम्या माध्यमात आल्यावरच सर्वसामान्य माणसाला समजतो. मात्र, अंतराळातल्या उपग्रहांच्या वाढत्या गर्दीमुळे शास्त्रिय वर्तुळात या मुद्द्याला अधिकाधिक महत्व येत आहे. तरीही, ज्या भागात (एक्झोस्फिअर) उपग्रह फिरत असतात, त्यावर कोणत्याही एका देशाचा हक्क नसल्याने, त्याबाबत कोणते व कसे नियम असावे हा प्रश्न सद्यातरी, अंतराळातील कचर्‍याप्रमाणेच, अधांतरी फिरत आहे ! अर्थात, या सगळ्या तत्वज्ञानामागे, "मानवाचे जीवन जास्त विकसित, जास्त सुखकारक आणि कमी धोकादायक व्हावे" हाच मानवाधिकार संकल्पनेमागे किंवा कोणत्याही चांगल्या तत्वज्ञानामागे असलेला मूलभूत उद्येश आहे. या प्रवासात "वसुधैव कुटुंबकम्" हे प्राचीन भारतिय तत्वज्ञान जगभर स्विकारले जात आहे आणि रुजत चालले आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
र
राही गुरुवार, 03/15/2018 - 16:02 नवीन
प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
च
चामुंडराय Sun, 03/04/2018 - 21:13 नवीन
असा मी, तसा मी कि कसा मी? हे आस्तिक, नास्तिक, अज्ञेयवादी काही आकळेना. जेव्हा संकटे, अडीअडचणी येतात तेव्हा मी मनापासून देवाचा धावा करतो, सोडावं रे बाबा मला या संकटातून. म्हणजे मी आस्तिक आहे का? जेव्हा मी आनंदात असतो तेव्हा तर त्याची आठवण देखील येत नाही ... म्हणजे मी नास्तिक का? जेव्हा मी सामान्य स्थितीत असतो म्हणजे ... आनंदातही नाही आणि संकटातही नाही ... तेव्हा तो असेलही ब्बा किंवा नसेलही ... म्हणजे मी अज्ञेयवादी का?
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 03/14/2018 - 08:33 नवीन
अत्यंत सुयोग्य मुद्दा उपस्थित केला आहे. व्यक्तिची विचारधारा आणि एकेक सवते विचार देखील काळाप्रमाणे आणि वेळेप्रमाणे बदलत असतात. सामान्य व्यक्ती या तीन प्रमुख विचारधाराच काय त्यांच्या हजारो उपविचारधारांत इकडून तिकडे वाहत असावा. अगदी स्वतःला कडवट अस्तिक म्हणवणारा देखील जेव्हा एखादी जघन्य घटना पाहतो तेव्हा "अरे देवानं असं का केलं असावं?" वा "देव असं कसं होऊ देतो?" असं म्हणतो. हा विचार त्या अस्तिकाच्या त्या क्षणी नास्तिक झाल्याचे लक्षण आहे. सवयीने तशी भाषा तोंडातून अगदी अ‍ॅक्यूरेट येत नाही. ====================== हेच्च नास्तिकांनाही लागू आहे. विश्वात ईश्वरप्रणित शक्ती, स्वेच्छा, बुद्धिमत्ता, सम्यकता, अर्थपूर्णता आहे असं मानत ते व्यवहारात जगतात तेव्हा ते मूळचे अस्तिकच असतात. पण ते देवाबद्दल ज्या ज्या गोष्टी मानत नाहीत तेवढ्याचेच नाव देव म्हणून ठेवले असल्याने स्वतःला नास्तिक मानत जगतात. =================== व्यक्तिव्यक्तिगणिक ईश्वराची संकल्पना शून्य ते अनंत या रेंजमधे कितीही बदलत जाते, एका व्यक्तितही काळावेळेप्रमाणे ते मूल्य याच रेंज मधे बदलत जाते. पण तरीही प्रश्न विचारला कि एक स्टँडर्ड उत्तर दिले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय
A
arunjoshi123 Tue, 03/13/2018 - 12:15 नवीन
https://www.news18.com/news/tech/out-of-control-chinese-space-station-tiangong-1-to-crash-to-earth-within-weeks-1687563.html हा कृत्रिम चीनी उपग्रह यनांच्या डोक्यावर कोसळणार नाही, कोसळणारच नाही, कोसळणार नाहीच, इ इ यनांची श्रद्धा आहे कि विश्वास? अर्थातच यनांचे डोके, मेंदू इ आम्हा सश्रद्ध लोकांच्या मानाने व्यवस्थित काम करणारे आणि निर्जंतुक असल्याने, ही श्रद्धा नसणारच. ======= मग विश्वास आहे तर का? नाही तर का? आणि म्हणून पुढे जीवनविषयक काय काय निर्णय घेणार? आणि श्रद्धाही नाही, विश्वासही नाही, तर काय आहे?
  • Log in or register to post comments
स
सालदार Tue, 03/13/2018 - 15:44 नवीन
आस्तिक लोक देवावर श्रद्धा ठेवतात म्हणजे काय काय करतातः- १. मंदिरे बांधतात. २. घरात देव्हारा बसवतात. ३. मंदिरात/देव्हार्‍यासमोर जाऊन पुजा करतात. ४. पुजा करताना देवाला नैवद्य-फुले-पैसे वहातात ईत्यादी ईत्यादी... हे सगळे कर्मकांडात मोडते का? आणि हे जर कर्मकांड असेल तर कर्मकांडाविना केलेली श्रद्धा कशी असते?
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Wed, 03/14/2018 - 05:58 नवीन
ह्याला चिकाटी म्हणावी कि ओसीडी ते कळेना !!!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Wed, 03/14/2018 - 06:22 नवीन
चिकाटी हे ओसीडीचे एक बायप्रॊडक्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३
श
शाली Wed, 03/14/2018 - 06:56 नवीन
यनावालांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. त्यांचे लेख वाचायच्या भानगडीत मी आजकाल पडत नाही पण लेखाची वाट मात्र आतुरतेने पाहतो. प्रतिसाद फारच सुंदर आणि वाचणीय असतात. असो. यनावालांनी जितकं ‘देव,देव’ केलय तितकं क्वचितच कुणी केलं असेल.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Wed, 03/14/2018 - 08:19 नवीन
सहमत. इतकं मनोरंजन मूल्य असलेला जालीय संवाद अन्य कुठे पाहिलेला आठवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाली
श
शाली गुरुवार, 03/15/2018 - 12:50 नवीन
यनावाला, छोटीशी विनंती आहे. मी तुमच्या विचांरांनी प्रेरीत होऊन मित्राबरोबर वाद घातला. त्याचं म्हणणे आहे की तुझ्या सोशल मिडीयावरच्या मित्राने काही गोष्टी सांगीतल्या सोशल मिडीयावर तर मी तुझी मते (म्हणजे माझी) मानायला तयार आहे. तुमचे देव बिव राहूदे बाजूला. तर त्यांचं. म्हणणं आहे अल्लाह अस्तित्वात नाही हे सिद्ध करायचं राहूद्या नुसतं असं विधान करा. नमाज पढणारे सारे मुर्ख असं फक्त म्हणा जाहीर रमजान मध्ये रोजे ठेवणारे बावळट असं म्हणा कुराण वगैरे झुट असा कुणाला ऐकू जाईल अश्या आवाजात बोलून दाखवा. बास.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा