निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...
निरीश्वरवाद्यांना ईश्वर शिक्षा का करीत नाही ?...... यनावाला
जगनिर्माता, जगन्नियंता, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, पूजा-अर्चा-प्रार्थना यांनी संतुष्ट होऊन भक्तांवर कृपा करणारा, संकटात धाऊन येणारा, ईश्वर अस्तित्वात आहे असे आस्तिक लोक मानतात. किंबहुना अशा ईश्वराचे अस्तित्व सत्य मानणार्यांना आस्तिक म्हणतात. आस्तिक शब्दाचा हाच अर्थ आज प्रचलित आहे. ( काहीजण केवळ जगनिर्मात्या ईश्वराचे अस्तित्व मानतात. --म.फुले यांनी त्याला निर्मिक म्हटले आहे.-- उपासनेचा देव मानत नाहीत. पण त्यांची संख्या नगण्य आहे.) जगातील बहुसंख्य माणसे अजून आस्तिक आहेत.
" ईश्वर अस्तित्वात नाही." हे ठामपणे सांगणारे निरीश्वरवादी भारतात अगदी वेदकाळापासून आहेत. आता या विज्ञानयुगात त्यांची संख्या वेगाने वाढते आहे.
सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान असा देव जर आहे तर तो आपल्या अस्तित्वाची प्रचीती सर्व माणसांना येईल असे कांहीच का करीत नाही ? इतका लपून-छपून का राहतो ? आपले अस्तित्व दाखविण्यात त्याला कोणती अडचण आहे ? तसेच त्याचे जे गुणवर्णन आहे त्यांतील एकाही गुणाचा अनुभव कधीही येत नाही. संकटात देव धावून आला आहे असे कधीही घडत नाही. हे कसे ? दीन-दुबळ्यांवर अन्याय होतो, निष्पाप बालिकेवर अत्याचार होतो या प्रत्यही घडणार्या घटना तो करुणासागर देव निष्क्रियपणे पाहात कसा राहातो?
आस्तिक लोक अशा घटनांविषयीं विचार करीतच नाहीत. त्यांना त्यांची श्रद्धा टिकवून धरायची असते. ती अशा घटनांनी डळमळली तर काय करायचे ? आपल्याला कोणाचा आधार आहे ? अशी त्यांना भीती वाटते. त्यामुळे अन्यायपीडित व्यक्ती पूर्वजन्मीच्या पापाचे फळ भोगतात असले बुद्धीला न पटणारे काहीतरी भोंगळ तत्त्व श्रद्धेने खरे मानून मनाचे समाधान करतात. आपण देवाच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली, देवासाठी जी कर्मकांडे परंपरे अनुसार करीत आहोत ती सोडून दिली तर देव आपल्यावर कोपेल. शिक्षा करील. अशी भीतीही त्यांना वाटत असावी. या संदर्भात डॉ.र.धों.कर्वे यांचे एक विधान आहे. ते म्हणतात, "माणूस देवाला नमस्कार करतो तो "दुर्जनं प्रथमं वन्दे ।" या न्यायाने. म्हणजे देवाने आपल्यावर कोप करू नये, आपले कांही वाईट करू नये म्हणून. हे पटण्यासारखे आहे.
यावर आस्तिकांनी थोडा विचार करावा. जगात निरीश्वरवादी माणसे पूर्वीपासून आहेत; हे आस्तिकांना ठावूक आहेच ते नास्तिक देवा-धर्माचे कोणतेही कर्मकांड करीत नाहीत. देवाला हात जोडून त्याच्यापुढे नतमस्तक होत नाहीत. एवढेच नव्हे तर देवाचे अस्तित्वसुद्धा नाकारतात . आता प्रश्न असा पडतो की त्या नास्तिकांना देव शिक्षा का करीत नाही ? देव सर्वज्ञ आहे. जगात निरीश्वरवादी लोक आहेत. ते कधी माझी पूजा-अर्चा-प्रार्थना करीत नाहीत. मी अस्तित्वात आहे हे सुद्धा ते खरे मानत नाहीत. हे त्या सर्वज्ञ देवाला समजतेच. मग अशा नास्तिकांना देवाने कठोर शिक्षा केली तर नास्तिक वठणीवर येतील. देवाचे अस्तित्व मुकाट्याने मानतील. त्याची पूजा-अर्चा करू लागतील. आस्तिक-नास्तिक वाद मिटून जाईल. हे देवाला नको आहे का? नास्तिकांना कडक शासन करणे देवाला अशक्य आहे का? तो सर्वशक्तिमान आहे ना ? मग त्याच्या दृष्टीने एवढी सोपी असलेली गोष्ट तो स्वत: का करीत नाही ?
देवदर्शनाला जाणार्या तसेच दर्शन घेऊन परत येणार्या भक्तांच्या वाहनांना अपघात का होतात ? त्यात अनेक भक्त का मरतात ?
कोणी म्हणतील -आस्तिकांच्याच वाहनांना अपघात होतात का ? नास्तिकांच्या वाहनांना होत नाहीत ? -- होतातच. गाडीत कोण बसले आहेत ? आस्तिक का नास्तिक ? भूकंपात जखमी झालेल्या माणसांवर उपचार करण्यासाठी जाणारे डॉक्टर का घरफोडीसाठी जाणारे दरोडेखोर ? याचा अपघाताशी कांही संबंध नसतो. अपघाताची कारणे वेगळी असतात.नास्तिकांच्या वाहनांना अपघात होऊ शकतो हे सत्यच आहे. प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष ईश्वराचे अस्तित्व नाकारणार्या नास्तिकांना तो शिक्षा का करत नाही ? आणि या प्रश्नाचे सत्य उत्तर असे आहे की,ईश्वर अस्तित्वातच नाही.
वास्तव काय आहे ? सुख-दु:खाचे प्रसंग सर्वांवर येतात. आस्तिकांवर येतात तसे नास्तिकांवरही येतात. श्रीमंतांवर येतात. गरिबांवर येतात. आस्तिक लोक देवाचे भजन-पूजन करतात, नामस्मरण करतात म्हणून त्यांच्यावर दु:खाचे प्रसंग क्वचितच येतात तर नास्तिक लोक देवाचे काहीच करीत नाहीत म्हणून त्यांच्यावर सतत दु:खाचे डोंगर कोसळतात असे मुळीच दिसत नाही. जगन्नियंता देव अस्तित्वात असेल तर असे घडायला हवे. नास्तिकांवर दु:खाचे डोंगर कोसळायला हवेत, हे तर्कसंगत आहे. पण तसे घडत नाही. यावरून कोणता निष्कर्ष निघतो ?
अनेक नास्तिक चांगले मानसन्मानाचे, प्रसिद्धीचे, समृद्धीचे जीवन जगले. काही नावे सांगायची तर उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, रॅंग्लर र.पु.परांजपे, प्राचार्य दि.धों.कर्वे, डॉ.र.धों.कर्वे, सुप्रसिद्ध साहित्यिक वि.स.खांडेकर, श्री.ना.पेंडसे, पु.ल.देशपांडे, सुनीताबाई देशपांडे, अभिनेते डॉ.श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर आदि अनेकानेक. देवाचे अस्तित्व न मानल्यामुळे त्यांना कोणत्याही विशेष अडचणींना सामोरे जावे लागले नाही. तसेच या सर्व निरीश्वरवादी व्यक्तींना उदंड लोकप्रियता लाभली. मान-सन्मान मिळाले. सर्वार्थाने त्यांचे जीवन समृद्ध होते.
अनेक सद्विचारी, सदाचारी, सज्जन आस्तिकांना आयुष्यात मोठे दु:ख भोगावे लागले. देवाने त्यांच्यावर कांही कृपा केली नाही. दोन उदाहरणे द्यायची तर तुकाराम महाराजांच्या काळात महाराष्ट्रात लागोपाठ चार वर्षे दुष्काळ पडला. तुकारामांच्या कुटुंबाची अन्नान्न दशा झाली. त्यांची पहिली पत्नी भूकबळी ठरली. त्यांनी लिहिले आहे,
"दुष्काळे आटले द्रव्य गेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करिता गेली.
आता काय खावे कोणीकडे जावे । गावात राहावे कोण्या बळे ॥
विठ्ठलाच्या या निष्ठावंत भक्ताची अशी अवस्था झाली.
रामकृष्ण परमहंस कालीमातेचे परम भक्त होते. "स्वत: माता माझ्याशी बोलते " असे ते सांगत. त्यांना घशाचा कॅंन्सर झाला. अन्नाचा घास गिळता येईना. भक्तांनी विनवले की, " तुम्ही कालीमातेला साकडे घाला. ती तुमचा आजार बरा करील." परमहंस म्हणाले ,"मी मातेशीं बोललो. ती म्हणाली -इतके लक्षावधी लोक जेवतात त्यांच्या मुखाने तूच जेवतो आहेस असे समज. " खरे तर हे उत्तर भोंगळ आहे. इतर लोक जेवतात त्याने रामकृष्ण परमहंस यांचे पोट भरते का ? त्यांना भूक लागणार नाही का ? तात्पर्य एवढेच की आस्तिक माणसांना, देवभक्तांना सुद्धा दु:खे भोगावी लागतात. त्यांच्यासाठी देव काहीच करू शकत नाही. तो अस्तित्वाच नाही तर काय करणार ?
पण अशा सुप्रसिद्ध आस्तिकांचाच विचार का करायचा ? शंभर वर्षांपूर्वीच्या हिंदु समाजाचा विचार करावा. त्याकाळी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था होती. चौथा वर्ण शूद्र . ते सगळे आस्तिकच होते. इतर तीन वर्ण त्यांना अस्पृश्य मानत. हे लोक निरक्षर होते. अज्ञानी होते. अत्यंत दीनवाणे अपमानास्पद जीवन जगत होते. जो देव आहे असे ते मनापासून मानत होते त्या देवाने त्यांच्यासाठी काहीच केले नाही. करुणासागर देवाला त्यांची दया आली नाही. देश स्वतंत्र झाला. प्रजासत्ताक स्थापन झाले. संविधान लागू झाले. तेव्हा कागदोपत्रींतरी अस्पृश्यता गेली. या दलितांचा उद्धार देवामुळे झाला नाही. डॉ.आंबेडकरांमुळे झाला. कांहीजण बाबासाहेबांनाच देव मानतात. तसे मानणे हा त्यांचा अपमान आहे हे त्या दलितांच्या ध्यानी कसे येत नाही ? कवि विंदा करंदीकर म्हणतात, "देवातुनी समाजा ज्याने विमुक्त केले । त्यालाच देव करिती याला इलाज नाही. ॥"
तर अशा या देवाचे अस्तित्व खरे कसे मानता येईल ? देव अस्तित्वात नाही हेच बुद्धीला पटणारे सत्य आहे.
देव मानला नाही, तीर्थयात्रा केल्या नाहीत, उपास-तापास, व्रत-वैकल्ये केली नाहीत तरी कुणाचे काहीही वाकडे होत नाही. हे शंभर टक्के सत्य आहे. मात्र परंपरेने आलेले जे सण-सुदिन आहेत ते समाजाचे आनंद सोहळे आहेत. ते अवश्य साजरे करावे. त्यांच्या धार्मिक महत्त्वापेक्षा सांस्कृतिक महत्त्व अधिक आहे. अन्यथा जीवन एकसुरी, नीरस होईल.
.................................................................................
माहीत नाही नि माहीत होणे शक्य नाही हि अज्ञेयवादाची बेसलाईन आहे.माहीत नाही : हे बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल मानवाला सर्व माहिती नाही, याबद्दल प्रामाणिकपणे विचार करणार्या कोणाच्याही मनात संशय नसावा. माहीत होणे शक्य नाही : हे बरोबर नाही. "एखादी गोष्ट माहित होणे शक्य नाही" किंवा "एखाद्या गोष्टीबद्दल अंतिम ज्ञान माहित झाले आहे" असा समज असल्यावर अधिक ज्ञान मिळविण्यासाठी मनाची कवाडे आपोआप बंद होतात. याविरुद्ध, नवनवीन ज्ञानासाठी मनाची कवाडे प्रामाणिकपणे आणि सहिष्णूतेने खुली ठेवणे हे अज्ञेयवाद्याचे मूळ लक्षण आहे.व "मानवाला सर्व गोष्टींचे पुरेसे ज्ञान नाही", "त्याचे सद्य ज्ञान चुकीचे असण्याची शक्यता आहे" आणि "मानव प्रयत्नपूर्वक आपल्या ज्ञानाच्या कक्षा सतत विस्तारत जाणार आहे"; हे मानण्याची तयारी/कुवत असणे, ही खुल्या मनाने नवीन ज्ञान स्विकारण्यासाठीची पहिली पायरी आहे.नासदीय सूक्तात अज्ञेयवाद कुठनं सापडलानासदिय सुक्त : नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् | किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥ १॥ Then even nothingness was not, nor existence, There was no air then, nor the heavens beyond it. What covered it? Where was it? In whose keeping? Was there then cosmic water, in depths unfathomed? न मृत्युरासीदमृतं न तर्हि न रात्र्या अह्न आसीत्प्रकेतः | आनीदवातं स्वधया तदेकं तस्माद्धान्यन्न परः किञ्चनास ॥२॥ Then there was neither death nor immortality nor was there then the torch of night and day. The One breathed windlessly and self-sustaining. There was that One then, and there was no other. तम आसीत्तमसा गूहळमग्रे प्रकेतं सलिलं सर्वाऽइदम् | तुच्छ्येनाभ्वपिहितं यदासीत्तपसस्तन्महिनाजायतैकम् ॥३॥ At first there was only darkness wrapped in darkness. All this was only unillumined cosmic water. That One which came to be, enclosed in nothing, arose at last, born of the power of heat. कामस्तदग्रे समवर्तताधि मनसो रेतः प्रथमं यदासीत् | सतो बन्धुमसति निरविन्दन्हृदि प्रतीष्या कवयो मनीषा ॥४॥ In the beginning desire descended on it - that was the primal seed, born of the mind. The sages who have searched their hearts with wisdom know that which is kin to that which is not. तिरश्चीनो विततो रश्मिरेषामधः स्विदासीदुपरि स्विदासीत् | रेतोधा आसन्महिमान आसन्त्स्वधा अवस्तात्प्रयतिः परस्तात् ॥५॥ And they have stretched their cord across the void, and know what was above, and what below. Seminal powers made fertile mighty forces. Below was strength, and over it was impulse. को अद्धा वेद क इह प्र वोचत्कुत आजाता कुत इयं विसृष्टिः | अर्वाग्देवा अस्य विसर्जनेनाथा को वेद यत आबभूव ॥६॥ But, after all, who knows, and who can say Whence it all came, and how creation happened? the Devas (gods) themselves are later than creation, so who knows truly whence it has arisen? इयं विसृष्टिर्यत आबभूव यदि वा दधे यदि वा न | यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्त्सो अङ्ग वेद यदि वा न वेद ॥७॥ Whence all creation had its origin, he, whether he fashioned it or whether he did not, he, who surveys it all from highest heaven, he knows - or maybe even he does not know. —Translated by A. L. Basham (विकिवरून साभार) नासदियसुक्ताची पहिली पाच कडवी हे विश्व कसे बनले असावे यासंबंधीचा विचार सांगतात. हे "बिग बँग" थिअरीशी साम्य असलेले वर्णन आहे ! सहाव्या आणि सातव्या कडव्यांचा अर्थ, आपले पूर्वसुरी, जगाच्या उत्पत्तीबद्दलही आपल्याला सर्वज्ञान आहे असे समजत नव्हते असाच होतो. आपल्याला पूर्ण ज्ञान नाही हे जाणणे, ही नवनवीन ज्ञानाच्या स्विकारासाठीची व ज्ञानवर्धनासाठीची पहिली पायरी आहे आणि... अर्थातच, तो अज्ञेयवादाचा गाभा आहे. ***************यानिमित्ताने अजून काही... (अ) आपल्याला सर्व काही माहीत आहे, (आ) अनाकलनिय गोष्टींचा अर्थ लावण्यासाठी ओढूनताणून अतर्क्य तर्क करणे, (इ) पूर्वजन्मीची किंवा इतर काही उपकथा सांगून, कथेतील पात्राच्या या जन्मीच्या अतर्क्य/अविचारी/सहज न पटणार्या कृतीचे समर्थन करणे, (ई) धार्मिक शास्त्रांत सर्व गोष्टींची माहिती व उत्तरे आहेत, त्यांच्यापलिकडे बघायला नको, किंबहुना त्यांच्या पलिकडे पाहण्याने धर्माचा घोर अवमान होतो, असे गैरसमज पसरवणे... इत्यादी. वरच्यासारख्या अनेक गोष्टी पुराणांमध्ये, दंतकथांमध्ये आणि 'धर्म आपले खाजगी संस्थान मानून त्याचे नियंत्रण करणार्या धर्ममार्तंडांनी' पसरवलेलया दिसतात. अश्या गोष्टींमुळेच, हिंदू धर्मामध्ये सरळसरळ अतर्क्य दिसणार्या तर्कटांना विरोध करणे थांबले, "बाबा वाक्य प्रमाणम्"चे स्तोम माजले, नवीन स्वतंत्र विचार येण्याचे थांबले व धर्म कूपमंडूक बनून त्याची अवनती सुरू झाली. आपल्या संस्थानाचा ताबा आपल्याकडेच रहावा यासाठी अश्या कथा-ककल्पनांच्या पायावर धर्मामध्ये वेळोवेळी अनेकानेक कर्मकांडे घुसवली गेली... इतकी की, आजचा हिंदू, धर्म कमी आणि कर्मकांडेच अधिक पाळतो आहे ! माझ्या मते, मूळ हिंदू धर्माची रचना अज्ञेयवादावरच झाली आहे. १. नासदिय सूक्तात म्हटले आहे की प्रथम विश्वाचा उगम झाला आणि नंतर त्यात देव (अनेकवचन) निर्माण झाले. हे तर अब्राहमिक धर्मांतील (ज्यूदाईझम, ख्रिश्चयानिटी आणि इस्लाम) विचारांच्या एकदम विरुद्ध आहे. कारण, त्या धर्मांप्रमाणे हे विश्व केवळ देवाने आणि तेही केवळ एकाच देवाने निर्माण केलेले आहे. (प्रत्यक्ष व्यवहारांत त्या धर्मांच्या धर्ममार्तंडांनिही कळत, नकळत या मूलतत्वांना अनेकदा तडे पाडले आहेत तर कधी चक्क सुरूंग लावला आहे. पण तो वेगळा विषय आहे.) २. सगळे हिंदू देव, कोणत्या ना कोणत्या कालात मानवी स्वरूपात आस्तित्वात आलेले आहेत, मानवासारखे पृथ्वीवर वावरले आहेत, सर्व मानवी भावना-विकार त्यांच्यामध्ये होते. त्यांनाही सर्वसामान्य माणसासारखे जन्म-मृत्यु, हार-जीत, सुख-दु:ख, इत्यादींना सामोरे जावे लागले. म्हणजे, नासदियसुत्रात म्हटल्याप्रमाणे ते विश्वाच्या उत्पत्तीनंतरच निर्माण व्हायला हवेत, नाही का ? माझा तर्क असा की, हे सगळे देव पृथ्वीवर होऊन गेलेले महामानव (पण मूळात मानवच) होते. समाजासाठी त्यांनी केलेल्या असामान्य कामामुळे त्यांच्या स्मृती मानवी समाजात कथा-कवितांच्या रुपाने दीर्घकाळ आस्तित्वात राहिल्या, एका पिढीतून दुसरीकडे गेल्या, कथा-कवितांमध्ये वर्णिल्या गेल्या आणि त्या भूर्जपत्रे-कातडे-कागद इत्यादिंच्या मदतीने अजूनही जिवंत राहिल्या आहेत. मानवी समाजाला बांधून ठेवण्यासाठी (उदा : धर्म, राष्ट्र, सामाजिक गट, इ) अश्या वाङ्मयाची अनन्यसाधारण गरज असते. किंबहुना, असे साहित्य निर्माण करण्याची ताकद जेव्हा मानवात आली (ज्याला, मानववंशशास्त्रात "संकल्पना बनवणे" किंवा "स्टोरी टेलिंग" असे म्हणतात), तेव्हाच त्याचे मोठ्या सामाजिक गटात संघटन शक्य झाले. दर कालखंडात या प्रत्येक मूळ कथेत, मानवी कल्पकतेने अधिकाधिक भर पडत गेली आहे आणि प्रथम केवळ इतिहासरुपाने असलेल्या या वाङ्मयात नवीन कथाकल्पनांची घुसखोरी झाली आहे. हे तंत्र, कधी आपल्या आवडीच्या पात्रांचे दैवत्व अधिक उजळायला, कधी त्यांचे उणेपण झाकायला (उदा: पूर्वजन्मिच्या कथांच्या स्वरूपात), तर कधी विरोधी पात्रांचे चारित्रहनन करायला वापरले गेले आहे. (आपल्या समाजाची वाढ व्हावी व त्याचा ताबा आपल्याकडे रहावा यासाठी असे कथाबदल सर्वच धर्मांच्या वाङ्मयात, उघडपणे अथवा सरमिसळीने, केले गेलेले आहेत.) थोडक्यात, हे विश्व, मानवी जीवन व धर्माबाबत फार फार पूर्वी ऋषीमुनींनी स्विकारलेला तर्क-विचारांवर अवलंबून असलेला मार्ग सोडून, सद्याचा हिंदू जगावेगळे काम केलेल्या वेगवेगळ्या महामानवांच्या कृतींत देवाचा शोध घेतो आहे. त्यामुळेच, सर्वसामान्य हिंदूचे आजचे देव "अचिंत्य" न राहता, (खरा-खोटा काहीही म्हणा पण) मानवी इतिहास असलेले देव/अवतार आहेत. कालमानाप्रमाणे देवांच्या लोकप्रियतेतही घट अथवा वाढ होते. प्रत्येक महान व्यक्ती-सम्राट-राजा नेहमीच देवाचा (शिव अथवा विष्णूचा) अंश असलेला असतो. चीनमध्ये असलेली वेगवेगळ्या १०० बुद्धांची मंदीरे (आपला शाक्यमुनी बुद्ध त्यातला केवळ एक बुद्ध आहे, त्या शंभारात एक 'लेडी बुद्ध' पण आहे) आणि १५ ऑक्टोबर १९१८ साली जन्मलेल्या शिर्डीच्या साईबाबांचा एका शतकामध्येच देवत्वाच्या दिशेने होत चाललेला प्रवास हेच दाखवत आहे, नाही का ? प्राचीन ऋषींनी चोखाळलेला "एका सार्वकालिक, सार्वभौम, अचिंत्य ईश्वरावर" श्रद्धा ठेवण्याचा मार्ग सोडून, आजचा सर्वसामान्य हिंदू समाज आपापल्या कुवतीप्रमाणे विविध प्रयोग करत आपल्याला "काय पटेल/सोईचे पडेल/फायद्याचे होईल" याचा शोध घेत आहे. हा शोध जोपर्यंत मानसिक शांती, मानसिक बळ व आत्मविश्वास यांच्या वाढीस उपयोगी आहे, तोपर्यंत तो सहिष्णूतेने व सकारात्मकतेने घ्यायला हरकत नसावी. या शोधामध्ये, जोपर्यंत फसवाफसवी, जुलूम-जबरदस्ती किंवा मानवी हक्कांवर आक्रमण होत नाही, तोपर्यंत प्रत्येकाला आपापल्या मानसिक-वैचारिक-सद्य परिस्थितीवर अवलंबून रुचणारा-पचणारा-सुखकारक असणारा मार्ग चोखाळण्याचे विचारस्वातंत्र्य असायला हवे. मात्र, जेथे कोठे फसवाफसवी, जुलूम-जबरदस्ती किंवा मानवी हक्कांवर आक्रमण होत आहे, तेथे त्याचा कडाडून विरोध केलाच पाहिजे... मग ती आगळीक आस्तिकांनी, नास्तिकांनी किंवा इतर कोणत्याही विचारसरणीच्या लोकांनी केलेली असो.
तुमचा अज्ञेयवादी व्यक्तीचं वर्णन करणारा इथला प्रतिसाद वाचला. त्यानुसार मला अज्ञेयवादी रहायला आवडेल. जरी मी आस्तिक असलो तरी. किंबहुना आस्तिक्य आणि अज्ञेयवाद एकमेकांच्या विरोधात नाही. कारण की ज्ञानाची साधनं म्हणजे मानवी इंद्रिय अतिशय मर्यादित वर्तुळांत वावरतात. त्यामुळे हे विश्व माणसाला नेहमी अज्ञेयच राहणार आहे.तुमच्या या म्हणण्याप्रमाणे तुम्ही, मी वरच्या एका प्रतिसादात सांगितलेल्या, आस्तिक-नास्तिक ही दोन टोके असलेल्या वर्णपटातील अज्ञेयवादाच्या मध्यबिंदूजवळील छोट्या वर्णपटात, आस्तिक टोकाकडे असलेल्या भागात आहात.त्यामुळे अज्ञेयवाद हा नैसर्गिक आहे.मात्र, माणुस आपल्या "लोभ" आणि "भिती" या दोन मूलभूत गुणधर्मांमूळे अनेक अनैसर्गिक, अनैतिक व घातक गोष्टी करून एकमेकात दुफळी माजवतो... हे पण एक सार्वत्रिक व सार्वकालिक सत्य आहे ! :)हे जरी खरं असलं तरी नासदीय सूक्ताच्या दुसऱ्या कडव्यात स्पष्टपणे म्हंटलंय कीसुरुवातीच्या पाच कडव्यांत "विश्व निर्मितीची संकल्पना" मांडली आहे. शेवटच्या दोन कडव्यांत तिच्याबदल संशय व्यक्त करून ते "अंतिम सत्य नाही" हे सांगितले आहे. म्हणजेच भविष्यात येणार्या नव्या ज्ञानासाठी मनाची कवाडे खुली ठेवायला सांगितले आहे.हा दावा करणारा कोण?आजचे जगातले सर्वच ज्ञान मानवनिर्मितच आहे... ते कसे आले त्याबद्दल दावे असू शकतात. परंतू, मानव सोडून ते ज्ञान अजून कोठून आले आहे या दाव्याला "माझ्यावर विश्वास ठेवा" या पलिकडे पुरावा नाही, जे अर्थातच तर्क व शास्त्रिय विचारात बसत नाही, हे नक्की. हिंदू अथवा प्राचिन भारतिय (अधिभौतिक आणि वैचारिक) ज्ञान हे अनेक कालखंडांतल्या अनेक ऋषी-मुनींकडून (त्याकाळचे शास्त्रज्ञ आणि विचारवंत) निर्माण झालेले एकत्रित ज्ञान आहे. ज्या काळात लिखाणाचा शोध लागला नव्हता आणि/किंवा लिखाण दीर्घकाळ टिकवून ठेवता येईल अश्या प्रणालींचा शोध लागला नव्हता, त्यावेळी ते पाठांतराने एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे दिले गेले. त्याचा असा प्रवास होताना त्याच्या मजकुरात बदल होऊ नये म्हणून भारतात पाठांतराच्या गुंतागुंतीच्या अनेक प्रणाली शोधल्या गेल्या. अर्थात, तरिही काही हुशार मंडळींनी त्यांत आपल्या मजकूराची भर टाकलीच, ज्याला आपण प्रक्षिप्त मजकूर म्हणतो. बर्याचदा तर की भेसळ इतकी बेमालूम असते की तिला वेगळे करणे अशक्य होते. तेव्हा, उत्तम मध्यममार्ग असा की, मूळ व प्रक्षिप्त असा फरक करण्यात वेळ, श्रम आणि पैसे खर्च करण्यापेक्षा, जे तार्किक आणि उपयोगी आहे ते स्विकारावे, जे अतार्किक आणि निरुपयोगी आहे ते सोडून द्यावे. कारण, या ज्ञानावर कोणा एकाचा प्रताधिकार नाही आणि सरतेशेवटी हे ज्ञान पुढच्या पिढ्यांना त्याचा फायदा मिळावा यासाठीच संग्रहित करून पिढी दरपिढी पुढे आणले गेले, नाही का ? हे वरचे काहीही असले तरी त्या सर्व प्राचीन लेखनातला मजकूर आणि दावे हे केवळ मानवांनीच निर्माण केलेले आहेत. अपौरुषेय या शब्दाचा खरा अर्थ "पुरुषाने/मानवाने न निर्मिलेले" असा नाही तर "एकाच मानवाने न निर्मिलेले (अनेकांच्या ज्ञानाचा अंतर्भाव असलेले)" असा समजणेच जास्त वास्तववादी होईल. जर ते प्राचीन ज्ञान अमानवी प्रणालीने झाले असले, तर ती प्रणाली सद्या बिघडून बंद पडण्याचे काय कारण आहे ?!तसं एखादं नैसर्गिक तत्त्वज्ञान अज्ञेयवादातनं निर्माण झालेलं आहे का?नैसर्गिक किंवा अनैसर्गिक तत्वज्ञान अशी काही विभागणी करणे मला तरी बरोबर वाटत नाही. कारण तत्वज्ञान ही पूर्णतः मानवनिर्मित गोष्ट आहे. मानवात विचारशक्ती उत्क्रांत झाली आणि ती अधिकाधिक विकसित होऊन त्या विचारशक्तीमध्ये संकल्पना (एखादी कल्पना केंद्रभागी धरून त्याभोवती एखादी गोष्ट विशद करणारी आणि/अथवा मानवोपयोगी आणि/अथवा मानवाला आकर्षक वाटणारी तर्कशुद्ध विचारांची साखळी/कथा) निर्माण करण्याची ताकद निर्माण झाली. ही शक्ती कालाबरोबर अधिकाधिक विकसित होतच आहे. भौतिक विश्वासंबधीच्या प्रयोगांनी सिद्ध करण्याजोग्या संकल्पना म्हणजे शास्त्र/विज्ञान आणि अधिभौतिक विचारांतून निर्माण झालेल्या संकल्पना म्हणजे अध्यात्म, असे ठोकताळ्याने म्हणता येईल... मात्र, दोन्हीही मानवनिर्मित संकल्पनाच आहेत हे विसरू नये. मानवाने निर्माण केलेली अज्ञेयवादाची संकल्पना ही अश्याच अनेक संकल्पनांपैकी एक आहे. मात्र, अज्ञेयवादी संकल्पनेमधील "मी (मानव) सर्वज्ञानी नाही" हे मूलभूत सत्य जाणणे, ही अज्ञेयवादासकट इतर कोणत्याही सबळ संकल्पनेसाठी पायाभूत गरज आहे, हे नक्की.मग अज्ञेयवादाचं स्वत:चं असं खास वैशिष्ट्य काय?कोणत्याही गोष्टीचा विचार करताना, "तार्किकता, प्रामाणिकपणा, सहिष्णुता आणि स्वतःचे ज्ञान अंतिम समजणार्या दांभिकपणाचा अभाव" इतके भांडवल सर्वसामान्य व्यवहारातल्या अज्ञेयवादासाठी खूप आहे ! ते असले की मनाची कवाडे खुली ठेवून, अहंकार बाजूला ठेवून, प्रामाणिकपणे, तर्कशुद्ध ज्ञानाचा स्विकार करता येतो, जुन्या चुका टाकून देता येतात आणि आपल्याशी सहमत नसलेल्या (पण मानवी हक्कांना धोका न पोहोचवणार्या) लोकांशी सहिष्णुतेने आणि सौहार्दाने सहजीवन करता येते. कोणत्याही चांगल्या तत्वज्ञाचा अंतिम उद्येश मानवी जीवन विकसित, सुखी, समृद्ध व आनंददायी करणे हाच असायला हवा... हाच अज्ञेयवादाचा अंतिम उद्येश आहे.मूलभूत सत्याचा अपलाप ही अज्ञेयवादाची ही विपरीत बाजू आहे. ती टाळायची असेल तर अज्ञेयवादाचं एखादं सकारात्मक तत्त्वज्ञान विकसित करावंच लागेल.हे जरूर नाही. कारण, अज्ञेयवाद ही मुळातच (अ) अहंकार टाळणारी, (आ) सुखी सहजीवनाची, (इ) सहिष्णू व (ई) सकारात्मक संकल्पना आहे, हे वरचा मजकूर वाचून स्पष्ट झाले असेलच.कितीही ज्ञान प्राप्त केलं तरीही संपूर्ण ज्ञान कधीच मिळणार नाहीये. मग मनाची कवाडं उघडी ठेवली काय वा बंद केली काय. फरक काहीच नाही.हे विधान, "कितिदा श्वास घेतला तरी शेवटी आपण मरणारच आहोत, तर श्वासच का घ्यायचा ?" याच्या जवळपास जाते ! मग मानव, इतर सजीव आणि निर्जीव यांच्यात फरक तो काय राहिला ? :) गम्मत सोडून जरा गंभीर विचार करूया. आज मानव इतर जीवांपेक्षा खूप वरच्या विकसित अवस्थेत पोचला आहे तो का ? असा विचार केला तर सहज ध्यानात येईल की, मानव हा एकच असा प्राणी आहे की ज्याने इतर जीवांपेक्षा खूप गोष्टी वेगळ्याप्रकारे केल्या आहेत. त्यांच्यात खूप खोलवर न जाता, सद्य चर्चेसाठी खालील गोष्टी महत्वाच्या आहेतः १. आपली विचारशक्ती वापरून आजूबाजूच्या परिस्थितीचे ज्ञान जमा करणे : हे सगळेच सजीव व विशेषतः प्राणी करतात. माणसाचे विशेष असे की त्याने हे ज्ञान सक्रियपणे मिळवणे सुरू केले, त्याची साठवण करणे सुरू केले. इतर प्राणी हे ज्ञान केवळ पुढच्या एकाच पिढीकडे संक्रमित करू शकतात. मानवाने याच्या अनेक पावले पुढे जाऊन ते ज्ञान (अमर्यादीत संखेच्या) असंख्य पिढ्यांना मिळत रहावे आणि तसे पुढे जाताना त्या ज्ञानाचा विकास व्हावा (नवीन उपयोगी भर + निकामी भागाचा निष्कास) यासाठी नवीन शोधांच्या (इन्व्हेन्शन व डिस्कव्हरी) आणि साठवणींच्या (स्टोरेज) प्रणाली विकसित केल्या. फार उच्च विचार सोडा, पण आपण मिपासारख्या जालावरील संस्थळावर ही चर्चा करत आहोत हे त्याच ज्ञानाचे एक छोटेसे फलित आहे ! २. इतर प्राणी आपल्या तुटपुंज्या ज्ञानाचा उपयोग स्वतःला परिस्थितीशी जुळ्वून घेऊन तगून राहण्यास करतात, ते शक्य नसल्यास स्थलांतर करतात (हे वनस्पतींन तर शक्यच नसते) आणि तेही जमले नाही तर नष्ट होतात. मानवही त्याच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या अवस्थेत हेच करत होता. मात्र, मानवाने आपले सतत वर्धिष्णू ज्ञान वापरून निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित गोष्टी वापरून: २.अ) प्रतिकूल निसर्गातही केवळ तगून न राहता विकसित जीवनमान असलेल्या वस्त्या पृथ्वीवर स्थापन केल्या आहेत (उदा: नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, कॅनडा, रशिया, इत्यादींचे उत्तर भाग) आणि परग्रहावर तेच करण्याची तयारी करत आहे. २.आ) सर्वसामान्य लोक ज्या प्रकारच्या (राहणे, खाणे, फिरणे, इ) सुखसोई आज उपभोगत आहेत त्यांची भूतकाळात ५०-१०० वर्षांपूर्वी असलेल्या परिस्थितीशी तुलना केल्यास, मानवी जीवनात ज्ञानाचे महत्व सांगण्याची गरज राहणार नाही. २.इ) मानवी वैचारिक ज्ञान आणि संकल्पना बनवण्याच्या ताकदीमुळेच, माणूस आज इतर जनावरांसारखा छोट्या छोट्या टोळ्यांत न राहता तुलनेने खूप मोठ्या आणि खूप संरक्षित (गाव, शहर, राज्य, राष्ट्र, राष्ट्रकूल, इ) गटांत तुलनेने फार जास्त सुख-आनंदात राहू शकतो. केवळ शंभर वर्षे मागे गेले तरी या पृथ्वीवर "माईट इज राईट" हेच तत्व आस्तित्वात होते आणि माणसेच नाही तर राष्ट्रेही गुलामीत पिचत पडली होती. त्या परिस्थितीशी तुलना केल्यास, मानवी हक्क, सार्वभौमत्वाचा हक्क, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, इत्यादी तत्वज्ञानी संकल्पनांचा विकास झाल्यानेच आजचे मानवी जीवन जास्त विकसित, जास्त सुखी व जास्त स्थिर झालेले आहे, असेच म्हणावे लागेल. इ इ इ हे आणि बरेच काही मानवाच्या भौतिक आणि वैचारिक ज्ञानामुळेच शक्य झाले आहे. ज्ञानाच्या विकासामुळे मानवी जीवन अधिकाधिक विकसित होत आहे हे नि:संशय आहे. तर मग संपूर्ण ज्ञान मिळेल किंवा न मिळेल याचा विचार न करता जेवढे ज्ञान मिळवणे (व पर्यायाने विकास साधणे) शक्य आहे तेवढे मिळवत रहावे, हा तार्किक व शहाणपणाचा विचार होईल, नाही का ? सर्वसामान्य माणसाच्या भाषेत म्हणायचे झाले तर, "मला एकट्याला जगातिल सर्व संपत्ती कधीच मिळणार नाही, म्हणून मला शक्य होईल इतकी संपत्ती मिळवून मी माझ्या कुटुंबाला सुखी करण्याचा प्रयत्न करूच नये", हा विचार कसा वाटतो ? असा विचार भूतकाळातल्या मानवांनी केला असता, तर आज आपण मिपावर चर्चा करण्याऐवजी वेगवेगळ्या छोट्या हंटर-गॅदरर टोळ्यांत भटकत असतो आणि समोरासमोर आल्यास दगड-काठ्यांच्या शस्त्रास्त्रांनी लढलो असतो, नाही का ?!तुम्ही म्हणता तसं अनैसर्गिक तत्त्वज्ञान नावाची काही वस्तू अस्तित्वात नाही.असं मी कधी म्हटलं आहे ? याबाबत तुमचा गैरसमज झाला आहे. मी बरोब्बर त्याविरुद्ध म्हटले आहे. सर्व तत्वज्ञानाची निर्मिती मानवाने केली आहे, निसर्गाने नाही. निसर्गाबद्दलचे मानवनिर्मित तत्वज्ञान असू शकते व आहे, पण नैसर्गिक (निसर्गनिर्मित) तत्वज्ञान असे काही असू शकत नाही. हे परत जरा वेगळ्या शब्दांत सांगतो. केवळ निसर्गनियमांमुळे (भौतिक नियमांमुळे, कोणाच्याही सक्रिय हस्तक्षेपाने नाही) बनलेल्या / घडलेल्या गोष्टींना नैसर्गिक म्हणता येईल. याविरुद्ध, मानवाने सक्रिय हस्तक्षेपाने बनवलेल्या/घडवलेल्या गोष्टींना; अनैसर्गिक किंवा कृत्रिम म्हणता येईल. यात घर, सायकल, विमाने यासारख्या भौतिक गोष्टी येतात. पण तसेच, नैसर्गिकरित्या आस्तित्वात नसलेले व मानवाने आपल्या विचारशक्तीच्या सक्रिय हस्तक्षेपाने निर्मित केलेले सर्व प्रकारचे तत्वज्ञानही यायला पाहिजे, नाही का ? असाही विचार करून बघा की, मानवाच्या सक्रिय वैचारिक हस्तक्षेपाशिवाय, पृथ्वीवर कोणतेही तत्वज्ञानच काय पण एखादी छोटीशी संकल्पनाही आस्तित्वात आली असती का ? नाही. म्हणजेच, केवळ मानवानेच निर्मित केलेली असल्याने कोणत्याही तत्वज्ञानाचा उगम नैसर्गिक नाही... ती मानवनिर्मित (अनैसर्गिक) आहेत.