जनातलं, मनातलं

सी पी बेरार सर्किट

Primary tabs

आज अचानक माझ्या लहानपणीचा भूगोल आठवला. आमचा रत्नागिरी जिल्हा तेव्हा, .. तेव्हा म्हणजे १९७० आणि १९८० च्या दरम्यान,.. पार गोव्याला जाऊन टेकला होता. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस हे एकाच जिल्ह्यातले होते. भूगोलाच्या "आपला जिल्हा" शिकवणाऱ्या एका शालेय वर्षात आमचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे नकाशातला एक लांबलचक उभट पट्टा होता. सिंधुदुर्ग जिल्हा झाला आणि तळकोंकण अशी वेगळी आयडेंटिटी गडद झाली.

माझ्या रम्य बालपणी आम्ही रोज शाळेत पोचताच प्रार्थना म्हणण्यापूर्वी "प्रतिज्ञा" म्हणायचो. त्या माझ्या भारत देशात, ज्यावर माझं प्रेम आहे, ज्याच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मी पाईक आहे, त्या देशात तेव्हा २२ राज्यं आणि ९ केंद्रशासित प्रदेश होते असं मला आठवतं.

अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि गोवा ही त्यावेळी राज्यं झालेली नव्हती. दिल्ली पण. हे सर्व केंद्रशासित प्रदेश होते.

"गोवा दमण दीव" ऊर्फ "गो.द.दी." हा मिळून एकच केंद्रशासित प्रदेश. नकाशावर गोवा कुठे, दीव कुठे आणि दमण कुठे..!! पण आम्ही बच्चे लोक ते एकच आहेत हे स्वीकारायचो. आमच्या दैनंदिन जीवनात, म्हणजे काजूची बोंडे चोखणे किंवा पर्ह्यातले बारके मासे पिशवीत पकडणे यात, त्याने काय फरक पडत होता?

मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार ही भलीथोरली पसरलेली भव्य राज्यं. जगातल्या अनेक देशांपेक्षा आकाराने मोठी होती. त्यावेळी.

मधल्या काळात बघता बघता वयाची पन्नाशी आली आणि बघता बघता नवीन राज्यंही तयार झाली, जिल्हे फुटले, "केंद्रशासित"ची राज्यं बनली आणि राज्यांचे "केंद्रशासित" बनले.

आता २८ राज्यं आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत असं दिसलं गूगललं तेव्हा.

हे सर्व नॉस्टॅल्जिक पुराण आता का आठवावं? तर पुढच्या मजकुराला प्रस्तावना हवी ना. थेट मुद्द्याला हात घालायचा म्हणजे कायतरीच.

पुन्हा एकदा सुकाणू मूळ विषयाकडे आणतो. तर .. नुकतंच एका ठिकाणी फिल्म डिस्ट्रिब्यूशन ऊर्फ चित्रपट वितरणाच्या प्रदेशांविषयी वाचलं. त्यातली दुर्बोध नावं बघून कळेचना की या कोणत्या टेरिटरीज बुवा ? मला वाटलं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यावर यथावकाश जी भाषावार प्रांतरचना झाली त्यानुसारच या सिनेमा वितरणाच्या टेरिटरीजसुद्धा असतील.

पण यांची नावे पाहतो तर, "निझाम टेरिटरी", "सीपी अँड बेरार" वगैरे.

बेळगाव हे महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांच्या सोबत. बॉम्बे टेरिटरी ही एक मोठी प्रसिद्ध.

शोध घ्यायला लागलो तर दिसलं की अगदी आजही याच टेरिटरीज त्याच जुन्या काळच्या नावांसहित चित्रपट वितरणाच्या धंद्यात टिकून आहेत. तो धंदा अजूनही त्या काळच्या भूगोलात गोठला आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचं काम आहे त्या प्रकारे उत्तम चाललं आहे.

उलट आता त्यात उगाच बदल करणं हे जास्त अडचणीचं आहे. म्हणतात ना की देअर इज नो प्रॉब्लेम टू सॉल्व्ह फॉर देम.

भारतात फिल्म डिस्ट्रिब्यूशन व्यवसायात टेरिटरीसाठी आजही "सर्किट्स" ही संकल्पना वापरली जाते, जी घटनेनुसारच्या, राजकीय राज्यांच्या सीमांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

१९५० मध्ये "सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार" (C.P. Berar) हे "राज्य" (?) संपुष्टात आलं.

१९५६ मध्ये भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती झाली.

पण चित्रपट वितरणात अजूनही सीपी बेरार जिवंत आहे.

त्यात महाराष्ट्राचा विदर्भ भाग, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा काही भाग येतो. चूकभूल देणे घेणे. मराठी सिनेमे या टेरिटरीत चांगले चालतात.

आणखी एक असेच सर्किट, "निजाम सर्किट". यामध्ये तेलंगणा आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्याचा भाग येतो.

इथेही मराठी सिनेमे चांगला धंदा करतात.

देश बदलला, नकाशावर रेषा बदलल्या, पण चित्रपट वितरकांनी आपली जुनी पाळंमुळं उखडली नाहीत. ते बदलले नाहीत. आजही "बॉक्स ऑफिस"चे आकडे मोजताना विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग न धरता सीपी बेरारचा भाग मानला जातो.

रोचक भाग असा की ही सर्किटस फक्त मेजॉरिटी लोकांची भाषा हा एकच क्रायटेरिया न मानता प्रेक्षकांच्या आवडीनिवडीवर ठरलेली आहेत असं मला वाटतं. म्हणजे कदाचित, विदर्भातल्या प्रेक्षकांचा आवडता "सिनेमा टाईप", किंवा अभिरुची म्हणू.. मुंबईपेक्षा वेगळी असू शकते, म्हणूनच ते अजूनही स्वतंत्र सर्किट म्हणून ओळखलं जात असू शकेल. राज्यांच्या रेषा आखून तिथल्या माणसांचे सगळेच चॉईसेस बदलत नसतात.

आजच्या आधुनिक भारतात चित्रपट व्यापार आजही ब्रिटीशकालीन आणि संस्थानकालीन नकाशावर चालतो हे मला तरी रोचक वाटलं.

आणि बॉम्बे टेरिटरी या नावावरून लहानपणी कोणाकडून तरी ऐकलेलं वाक्यही आठवलं, "कापडं काय बॉम्बेवरून आणली का?"

तुमच्या आठवणींत असलेला भूगोल आणि इतिहास इथे मुक्तपणे मांडा. नॉस्टॅल्जियाला आताशा* कोण विचारतो!? आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून बोलत राहू..

* तळटीप: आताशा..!!! छे... च्यायला वय झालं राव..

कंजूस

आमचे बाबा बोलताना म्हणायचे आज 'बीबीला' जावं लागणार आहे. आपली 'जीआइपी'. तिकडे जास्ती {लोकल} गाड्या असतात.

बीबी... म्हणजे Bombay, Baroda and Central India Railway (BB&CI) त्यांचे लघुरूप BB. आताची वेस्टर्न रेल्वे.
जीआइपी...Great Indian Peninsula Railway. आताची सेंट्रल रेल्वे.

विजुभाऊ

सी पी म्हणजे सेन्ट्रल प्रोव्हिन्स ( ज्याला आपण आज मध्य प्रदेश म्हणतो) आणि यु पी म्हणजे युनायटेट प्रोव्हिन्स अशी नावे होती. बेरार म्हणजे वर्‍हाड

गवि

ब्रिटिशांनी भारत सोडल्यावर भारतातल्या लोकांना ब्रिटनचं नागरिकत्व घेण्याचा चॉईस देणं अशक्यच होतं कारण भारतातल्या लहान राज्याइतका त्यांचा देश होता.

पण गोवा हे राज्य (पोर्तुगीज काळात) आकाराने लहान होतं. ते सोडून जाताना आणि त्यानंतर पोर्तुगालने गोवा राज्यात १९६० सालापूर्वी जन्म झाल्याचा पुरावा सादर करणाऱ्या गोव्याच्या नागरिकांना पोर्तुगालचं नागरिकत्व देऊ केलं होतं. अनेकांनी शाळा सोडल्याचे दाखले सादर करून, आणि कदाचित नसलेले तयार करून देखील, ते नागरिकत्व घेतलं आणि युरोपात स्थायिक झाले. मी असे काही लोक बघितले आहेत.

चावटमेला

हो. ह्यांतील बरेचसे लोक hospitality धंद्यांत आहेत. लंडन मध्ये ,विशेषतः हिथ्रो विमानतळाजवळील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स मधे बव्हंशी मॅनेजर, वेटर हे गोवन पाहिले आहेत जे पोर्तुगाल चे नागरिकत्व घेवून आले आहेत. कदाचित इंग्रजी वरील प्रभुत्वामुळे त्यांना ह्या नोकर्‍या सहज मिळत असाव्यात. शिवाय ह्या धंद्यांत पंजाबी विरुद्ध गोवन लॉबीचे राजकारण जोरात चालते असे एका housemate कडून ऐकले. खेदाची बाब म्हणजे भारतात वाढून, शिकून सुद्धा ह्या लोकांना भारताबाबत काडीचेही ममत्व नाही. आम्ही भारतीय नाही तर गोवन आहोत असे अगदी ठासून सांगतात.

खटपट्या

१९६० च्या आधी जन्म, ही अट अजुनही आहे का? कारण माझा एक मित्र, जो १९६० च्या नंतर जन्माला आला आहे त्याने पोर्तूगाल चे नागरीकत्व घेतले आहे. त्याचा जन्म गोव्याचा.

गवि

त्या स्कीमच्या खाली नसेल.

चावटमेला

कंपनीतील एका सहकार्‍याच्या मते जर आई-वडील किंवा आजी-आजोबा ह्यांच्यापैकी कुणीही पोर्तुगीज अमदानीतील गोव्यात जन्मले असेल तर काही कागदपत्रांची पूर्तता करून पोर्तुगीज नागरिकत्व मिळू शकते. त्याच्या बायकोला मिळाले. मी एक यूट्युब विडिओ पाहिला होता त्यानुसार दरवर्षी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करण्यात गोव्याचा नंबर पहिला आहे, अगदी पंजाब आणि गुजरातच्याही आधी. असो, उगाच चांगला धागा भरकटू नये म्हणून आवरते घेतो.

चावटमेला

मी शाळेत असताना २५ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश होते. पुढे उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, आणि काही वर्षांनी तेलंगाणा अशी चार राज्यांची भर पडली. अलीकडेच जम्मू-काश्मीर व लडाख हे दोन नवीन केंद्रशासित प्रदेश झाले, आणि दमण-दीव आणि दादरा-नगर हवेली चे एकत्रीकरण करून एकच केंद्रशासित प्रदेश केला.

गवि

त्या दादरा नगर हवेलीची पण एक गंमत आहे. त्या प्रदेशाच्या मध्येच, सर्व बाजूंनी "दादरा नगर हवेली"ने वेढलेला असा एक भाग आहे जो प्रत्यक्षात गुजरात राज्यात येतो. नकाशा पाहिल्यास स्पष्ट होईल. असे अन्यत्र कुठे भारतात पाहिले नाही.

त्या प्रदेशाच्या मध्येच, सर्व बाजूंनी "दादरा नगर हवेली"ने वेढलेला असा एक भाग आहे जो प्रत्यक्षात गुजरात राज्यात येतो. नकाशा पाहिल्यास स्पष्ट होईल. असे अन्यत्र कुठे भारतात पाहिले नाही.

हे माहित नव्हते. आताच नकाशात बघितले- मेघवाल हे त्या ठिकाणाचे नाव. विकिपीडीया म्हणत आहे की जानेवारी २०२२ मध्ये मेघवालचे दादरा-नगरहवेलीमध्ये विलीनकरण करायचा निर्णय घेतला होता पण त्याचे पुढे काही झाले नाही.

पूर्वी दिव-दमण आणि दादरा-नगरहवेली हे दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश होते. पण या दोन त्यामानाने लहान असलेल्या प्रदेशांसाठी स्वतंत्र प्रशासन चालवायचा खर्च जास्त होता म्हणून त्या दोन्हींचा मिळून एकच केंद्रशासित प्रदेश जानेवारी २०२० मध्ये करण्यात आला. गुजरातमध्ये कागदावर दारूबंदी आहे त्यामुळे हॉटेलांमध्ये वगैरे दारू मिळत नाही. (जुगाड करून घरी दारूची व्यवस्था करता येते पण अधिकृतपणे बाहेर मिळत नाही). त्यामुळे गुजरातचे बरेच लोक या ठिकाणी दारू प्यायला म्हणून जातात :)

चेतन

केरळमध्ये माहे नावाचे एक गाव आहे जे पांडिचेरीचा भाग आहे. याचे कारण हा फ्रेन्च वसाहतिचा भाग होता. तो अजुनही स्वस्त दारुसाठि तसाच ठेवला असावा.

सौंदाळा

हे पहिल्यांदाच ऐकले
रच्याकने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील महाविद्यालये पण मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत यायची वाटतं पुर्वी.

गवि

कॉलेजे अजूनही मुंबई विद्यापीठाखालीच येतात. रत्नागिरीत त्यांचे उपकेंद्र पण आहे.

दहावी बारावी मात्र पापुमं कोल्हापूर डिव्हिजनखाली येत असावी. पुन्हा चुभुदेघे..

पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रागगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या ७ जिल्ह्यातील महाविद्यालये मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.

दहावी, बारावी साठी पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रागगड ह्या जिल्ह्यात मुंबई विभाग आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांसाठी कोल्हापूर विभाग आहे.

अरे वा. मस्त विषय. मला इतिहासाची आवड आहे आणि निदान नकाशा उघडून बघितला नाही तर इतिहास समजणार नाही असे मला तरी वाटते त्यामुळे भूगोलातील इतर संकल्पना (भूखंडमंच/ टुंड्रा प्रदेश वगैरे अजिबात आवडत नसल्या तरी) नकाशा बघायला खूप आवडते. त्यामुळे जमेल तितकी भर टाकेन.

पाँडेचेरी (आताचे पुद्दुचेरी) या केंद्रशासित प्रदेशातील पाँडेचेरी शहर चेन्नईच्या दक्षिणेला आहे. पण त्याबरोबरच त्या केंद्रशासित प्रदेशात इतर काही प्रदेश आहेत ते पाँडेचेरीला संलग्न नाहीत. ते प्रदेश आहेत- यानम (जे आंध्र प्रदेशात पाँडेचेरीचे एन्क्लेव्ह आहे), कराईकल (जे तामिळनाडूत पाँडेचेरीचे एन्क्लेव्ह आहे) आणि माहे (जे केरळमध्ये पाँडेचेरीचे इन्क्लेव्ह आहे). ही तीनही ठिकाणे लहान बंदरांची ठिकाणे आहेत. भारतात युरोपिअनांचे राज्य स्थापित झाले त्यावेळेस बंदरांवर नियंत्रण असणे व्यापाराच्या दृष्टीने महत्वाचे होते. त्या दृष्टीने फ्रेंचांनी ही तीन ठिकाणे ताब्यात घेतली असावीत.

कलकत्त्याजवळ चंद्रनगर म्हणून एक ठिकाण आहे. ते पण फ्रेंचांच्या ताब्यात होते. १९५० मध्ये तिथे सार्वमत घेतले गेले आणि ते ठिकाण भारतात विलीन झाले.

जसे पाँडेचेरीमध्ये यानम, माहे, कराईकल ही ठिकाणे लांब आहेत त्याप्रमाणेच गोव्यापासून दिव आणि दमण ही ठिकाणे पण बरीच लांब- गुजरातजवळ आहेत. पण ती ठिकाणे पोर्तुगीजांच्या ताब्यात होती त्यामुळे १९६१ मध्ये गोवा मुक्ती झाली तेव्हा गोवा-दिव-दमण हा केंद्रशासित प्रदेश झाला.

सीपी-बेरार म्हणजे सेंट्रल प्रॉव्हिन्स आणि बेरार. बेरार म्हणजे विदर्भाचा पश्चिम भाग. विदर्भाचा पूर्वेकडचा भाग मध्य भारत या राज्यात होता तर पश्चिमेकडचा भाग सीपी-बेरारमध्ये. १९५६ मध्ये मध्य प्रदेश राज्य स्थापन झाले तेव्हा सीपी-बेरारमधील बेरार म्हणजे पश्चिम विदर्भ आणि मध्य भारतात असलेला पूर्व विदर्भ (नागपूर वगैरे) मुंबई प्रांतात सामील केले गेले. उरलेले सीपी, मध्य भारत तसेच विंध्य भारत आणि भोपाळ ही राज्ये एकत्र करून मध्य प्रदेश हे राज्य निर्माण करण्यात आले.

आता कर्नाटकात बॉम्बे कर्नाटक आणि हैद्राबाद कर्नाटक हे भाग दिसतात. ते कुठून आले? तर १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना झाली तेव्हा हैद्राबाद राज्यातील तेलंगण आंध्र प्रदेशात विलीन करण्यात आले आणि उरलेला भाग- गुलबर्गा, रायचूर, यादगीर वगैरे कर्नाटकात (तेव्हाच्या म्हैसूर राज्यात) विलीन करण्यात आला- तो हैद्राबाद कर्नाटक. तसेच मुंबई राज्यातून उत्तर कन्नड जिल्हा (कारवार वगैरे) तसेच बेळगाव वगैरे भाग कर्नाटकात विलीन करण्यात आला- तो बॉम्बे कर्नाटक.

लिहिण्यासारखे बरेच काही आहे. नंतर कधीतरी लिहेन.

गवि

याचेच एक एस्क्स्टेंशन म्हणता येईल ते म्हणजे, मी कुठेतरी वाचल्याचं आठवतं, कदाचित इथेच मिपावर, की नेदरलँड (डच) आणि त्याहूनही विशेष म्हणजे डेन्मार्क हा देश देखील भारतातल्या काही भागावर राज्य करत होता. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल किंवा बंगालमधले छोटे भूभाग.

याचेच एक एस्क्स्टेंशन म्हणता येईल ते म्हणजे, मी कुठेतरी वाचल्याचं आठवतं, कदाचित इथेच मिपावर, की नेदरलँड (डच) आणि त्याहूनही विशेष म्हणजे डेन्मार्क हा देश देखील भारतातल्या काही भागावर राज्य करत होता. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल किंवा बंगालमधले छोटे भूभाग.

हो डचांचे कोचीन आणि क्विलॉन (आताचे कनन्नोर) या केरळमधील भागांवर तसेच नागापट्टणम या तामिळनाडूतील बंदराच्या शहरावर नियंत्रण होते. आजही कोचीनमध्ये एक डच पॅलेस आहे. पण नंतर डचांनी भारतापेक्षा मसाल्याच्या पदार्थांसाठी अधिक प्रसिध्द अशा इंडोनेशिया आणि श्रीलंकेतील काही भागांवर लक्ष केंद्रीत केले आणि भारतात ते राहिले नाहीत. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती तेव्हा महाराजांनी मागितलेली खंडणी देऊन डचांनी त्यांची सुरतमधील वखार वाचवली होती.

डॅनिश लोकांचे अंदमानवर नियंत्रण होते. १८६८ मध्ये ते ब्रिटिशांनी अंदमानवर नियंत्रण मिळवले. कौन बनेगा करोडपती मध्ये पहिला ५ कोटी मिळवलेला बिहारचा एक होता त्याला ५ कोटींसाठी अंदमान कोणाच्या ताब्यात होते हा प्रश्न होता. त्याने डॅनिश लोकांच्या हे उत्तर दिले होते. त्यानंतर आंतरजालावर शोधाशोध करून हे समजले.

जर पोर्तुगीजांनी ब्रिटिशांना मुंबई बेट हुंड्यात भेट म्हणून दिले नसते तर कदाचित मुंबई पण पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिले असते. इतिहासात जर-तरला काहीही अर्थ नसतो पण त्या एका निर्णयामुळे सगळे काही किती बदलले. ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यामुळे शहरात व्यापार-शिक्षण यांचा बराच विकास झाला. नाहीतर पोर्तुगीजांच्या ताब्यात असते तर गोव्याप्रमाणे स्वस्त दारू मिळणारे ठिकाण हीच मुंबईची ओळख राहिली असती का?

आणि मुंबईची तुंबई झाली, मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुबईत महाराष्ट्र नाही वगैरे गोष्टींपासून आमचा बचाव झाला असता. सुबोधजी खरे साहेब सुशेगात होऊन 'चील' म्हंटले असते.

सुबोध खरे

क्विलॉन (आताचे कनन्नोर)

तपशिलात त्रुटी

क्विलॉन म्हणजे कोल्लम हे कोची च्या दक्षिणेस आहे तर

कनन्नोर म्हणजे आताचे कण्णूर हे कोची च्या उत्तरेस आहे

जर ब्रिटिशांनी अंदमानवर नियंत्रण मिळवले नसते आणि ते डॅनिश लोकांच्या ताब्यातच राहिले असते तर आज भारताचा भाग असले असते का?

झाले असते. फ्रेंच आणि पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेली ठिकाणे नंतरच्या काळात भारतात सामील झालीच. तसेच कधीना कधी अंदमानचेही झाले असते.

स्वधर्म

आजही भारतातील विमानांच्या बॉडीवर व्ही टी - नंबर लिहिलेला असतो. व्हीटी म्हणजे व्हिक्टोरिया टेरिटरी आहे असे समजले होते. इंग्रजांचे राज्य जाऊन किती वर्षे झाली, पण आपण आपल्या विमानांना अजून व्हीटी असे नोंदवतो हे समजायला कठीण आहे.

स्वधर्म

Ajit Pawar's Aircraft: The registration number of the aeroplane carrying Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar that crashed on 28 January 2026, was VT-SSK.
Times of India
Times of India
+8

गवि

VT बदलले पाहिजे हे तात्विकदृष्ट्या रास्त पण रजिस्ट्रेशन बदलणे आणि इतक्या प्रचंड संख्येने असलेल्या विमानांचे, टप्प्याटप्प्याने, हे प्रचंड किचकट आणि खर्चिक काम आहे. त्यातही ही फक्त नंबर प्लेट किंवा शेपट्या नव्याने रंगवण्यापुरती साधी प्रक्रिया नसून असंख्य ठिकाणी त्याची तांत्रिक एन्ट्री देखील असते. त्यात विमान वाहतुकीची वेळापत्रक दृष्टीने महाप्रचंड उलथापालथ होऊ शकते. ही खूप जुन्या काळापासून जागतिक पातळीवर एस्टॅब्लिश झालेली पद्धत बदलून BH किंवा तत्सम बदल करणे वाटते तितके सोपे नाही.

म्हणून ते तहकूब आहे.

VT याच अक्षरांचा भारतीय इतिहासातील गौरवास्पद असा फुल फॉर्म शोधणे हा अधिक स्मार्ट उपाय ठरेल.

उदा. BMC, बॉम्बे शब्द बदलला तरी बृहन्मुंबई वापरून शॉर्टफॉर्म तसाच ठेवता येतो तत्सम. किंवा VJTI सारखं. व्हिक्टोरिया ज्युबिली ऐवजी वीरमाता जिजाबाई.

स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश भारतात ब्रिटिशांच्या अंमलाखाली प्रदेश होता आणि संस्थानेही होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले ते ब्रिटिश भारताला. त्यानंतर एकेक करून संस्थाने भारतात विलीन झाली. पंजाबमधील अशा संस्थानांचे १९४८ मध्ये पेप्सू म्हणून राज्य स्थापन केले गेले होते. पेप्सू म्हणजे पतियाळा अ‍ॅन्ड ईस्ट पंजाब स्टेट्स युनियन. त्या राज्याची राजधानी पतियाळा होती. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग त्या पतियाळाच्या संस्थानिकांच्या कुटुंबातील.

म्हणजे स्वातंत्र्यानंतर पंजाब, हिमाचल प्रदेश आणि पेप्सू ही राज्ये होती. खालील नकाशात दिसेल की त्यावेळेस पेप्सू आणि हिमाचल प्रदेश हे एकसलग भाग नव्हते तसेच पेप्सूमध्येही पंजाबचा एक भाग 'एन्क्लेव्ह' म्हणून होता.

Punjab

(नकाशाचा संदर्भः विकीपीडीया)

मग नंतरच्या काळात पेप्सू पंजाबमध्ये विलीन करण्यात आले आणि काही भाग हिमाचलमध्ये विलीन करण्यात आला. त्यानंतर इंदिरा गांधींनी १९६६ मध्ये पंजाबमधून हरियाणा हे राज्य वेगळे केले.

रेल्वेचे एकुण १८ झोन आहेत. त्यान्ची नावे खालीलप्रमाणे
१. मध्य रेल्वे (CR): मुंबई
२. पश्चिम रेल्वे (WR): मुंबई
३. उत्तर रेल्वे (NR): दिल्ली
४. दक्षिण रेल्वे (SR): चेन्नई
५. पूर्व रेल्वे (ER): कोलकाता
६. दक्षिण पूर्व रेल्वे (SER): कोलकाता
७. उत्तर पूर्व रेल्वे (NER): गोरखपूर
८. ईशान्य सीमा रेल्वे (NFR): गुवाहाटी
९. दक्षिण मध्य रेल्वे (SCR): सिकंदराबाद
१०. पूर्व मध्य रेल्वे (ECR): हाजीपूर
११. उत्तर पश्चिम रेल्वे (NWR): जयपूर
१२. दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR): हुबळी
१३. उत्तर मध्य रेल्वे (NCR): अलाहाबाद (प्रयागराज)
१४. पश्चिम मध्य रेल्वे (WCR): जबलपूर
१५. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR): बिलासपूर
१६. पूर्व किनारी रेल्वे (ECoR): भुवनेश्वर
१७. कोलकाता मेट्रो (MR): कोलकाता
१८. दक्षिण कोस्ट रेल्वे (SCoR): विशाखापट्टणम (१८ वा झोन)

ह्यातील मध्य रेल्वे हा झोन पाहिला तर मुखालय मुंबई (छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) हा झोन महाराष्ट्राचा बराचसा भाग, कर्नाटकचा उत्तर पूर्व भाग आणि मध्य प्रदेशचा दक्षिण भाग व्यापतो. त्यातही चर्चगेट ते बडोदा/वडोदरा हा मार्ग पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत. मराठवाड्यातला काही भाग दक्षिण मध्य रेल्वेच्या ताब्यात.
कोकण रेल्वेची हद्द सुरु होते रोहा (जिल्हा रायगड) ह्या स्थानकानंतर. ठाणे जिल्ह्यातील उत्तरकोकणाचा भाग पश्चिम रेल्वेत, मुंबई ते रोहा (पनवेल मार्गे) मध्य रेल्वेत आणि रोहा नंतर कोकण रेल्वे.

कागदावरील महसुली जिल्हे, राज्ये आणि रेल्वेची हद्द ह्या एकमेकांशी सुसंगत नसणाऱ्या गोष्टी आहेत.

तुघलकाबाद हे स्थान भौगोलिकदृष्ट्या दिल्लीजवळ, आजूबाजूला सगळीकडे उत्तर रेल्वेचे साम्राज्य, पण तुघलकाबाद मधील विद्युत लोको शेड हि पश्चिम मध्य रेल्वे (मुख्यालय: जबलपूर) ह्यांच्या अख्यतारीत.

गवि

रोचक आणि माहितीपूर्ण..

एकतर रेल्वे हे राज्य आणि केंद्र या दोन्ही सूचींत न ठेवता फक्त केंद्र सूचीत आहे त्यामुळे राज्यांना आपल्या राज्यांतर्गत रेल्वे मार्ग विकसित करता येत नाहीत. असे का मला ठाऊक नाही.

एकूण भारतीय रेल्वे ही प्रचंड अकार्यक्षम, अजागळ आणि जनतेच्या प्रचंड गैरसोयीची गोष्ट आहे. ती मॉडर्नाईज करणे एवढे विलंब लावणारे प्रकरण आहे की बस्स.

डेक्कन भागात रेल्वेचे जाळे अजिबात पसलेले नाही याला केवळ भूगोल कारणीभूत आहे का?

सुबोध खरे

आमच्या लहानपणी कोकणातील जिल्हे म्हणजे मुंबई आणि ठाकुर असे होते म्हणजे ठाणे कुलाबा आणि रत्नागिरी.

१९७८ च्या आसपास रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा करायचे ठरले तेंव्हा हे कोकणचे जिल्हे "ठाकुरसि" होणार होते

म्हणजे ठाणे कुलाबा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग .

पण श्री अंतुले यांनी तेवढ्यात मखलाशी करून कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड केले

त्यामुळे हे ठारारसि झाले ठाणे कुलाबा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग

आणि आता पालघर जिल्हा वेगळा होऊन पाठारारसि झालंय

स्वातंत्र्यानंतरचे मद्रास राज्य म्हणजे एक अजब प्रकार होता. आताच्या कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्हा (मंगलोर वगैरे), सध्याच्या केरळमधील उत्तरेकडील मलबार भाग (कासारगोड, कोझिकोडे, मल्लापुरम वगैरे), कन्याकुमारी वगळता सध्याचे पूर्ण तामिळनाडू राज्य आणि तेलंगण वगळता सध्याचा आंध्र प्रदेश एवढा मोठा भाग त्या राज्यात येत होता. सध्या केरळमध्ये असलेले मध्य भागातील कोचीन आणि दक्षिण भागातील त्रावणकोर (तिरूवनंतपुरम वगैरे) यांचे कोचीन-त्रावणकोर हे वेगळे राज्य होते. सध्या कर्नाटकात असलेले कूर्ग हे सुंदर ठिकाण वेगळे राज्य होते. तर सध्या कर्नाटकात असलेला उत्तर कन्नड जिल्हा (कारवार वगैरे) आणि बेळगाव वगैरे उत्तर पश्चिमेकडील भाग मुंबई राज्यात होते. तर कर्नाटकात उत्तर पूर्वेकडील गुलबर्गा, बीदर, रायचूर आणि बेल्लारी सुध्दा हे भाग हैद्राबाद राज्यात होते. सध्या कर्नाटकात असलेले इतर भाग त्यावेळेस म्हैसूर राज्यात होते.

१२ वर्षांपूर्वी तेलंगणची स्थापना होण्यापूर्वी दक्षिण भारतात चार (आणि आता पाच) राज्ये दिसतात त्यापेक्षा पूर्ण दक्षिण भारताचा भूगोल पूर्ण वेगळा होता हे आणि मद्रास राज्य किती विलक्षण गुंतागुंतीचे होते हे पुढील नकाशावरून समजेलच.
Madras

पोट्टी श्रीरामूलूंचा उपोषणात मृत्यू झाल्यानंतर १९५३ मध्ये मद्रास राज्यातील तेलुगु भाषिक भाग वेगळा करून आंध्र प्रदेश हे राज्य स्थापन करण्यात आले. त्यात कोस्टल आंध्र (विजयवाडा, विशाखापट्टणम वगैरे) आणि रायलसीमा (नेल्लोर, कडप्पा, कुर्नूल वगैरे) भागांचा समावेश केला गेला. तेव्हा आंध्र प्रदेशची राजधानी होती कुर्नूल.

वर म्हटल्याप्रमाणे कन्याकुमारी त्यावेळेस मद्रास राज्यात नव्हते तर ते कोचीन-त्रावणकोर या राज्यात होते. त्या राज्यात मल्याळम भाषा प्रमुख होती तर कन्याकुमारी होते तामिळ भाषिक. म्हणून कन्याकुमारीचे तामिळचे प्रभुत्व असलेल्या मद्रास राज्यात विलीनीकरण करावे म्हणून कन्याकुमारीत निदर्शने झाली. ही गोष्ट १९५५ मधील. १९५२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसविरोधात लढणारे दोन प्रमुख समाजवादी पक्ष होते- जयप्रकाश नारायणांचा समाजवादी पक्ष आणि आचार्य कॄपलानींचा किसान मजदूर प्रजा पक्ष. दोन्ही पक्षांनी बर्‍यापैकी मते घेतली पण काँग्रेसविरोधी मते विभागली गेल्याने त्यांना निवडणुक जिंकणे सोडाच जागाही बर्‍याच कमी मिळाल्या. म्हणून १९५२ मध्ये निवडणुक संपल्यावर या दोन पक्षांचे विलीनीकरण झाले आणि प्रजा समाजवादी पक्ष हा पक्ष निर्माण झाला. त्यावेळेस कोचीन-त्रावणकोरचे मुख्यमंत्री होते या प्रजा समाजवादी पक्षाचे वासुदेवन नायर (बहुदा). तर कन्याकुमारीचे मद्रास राज्यात विलीनीकरण व्हावे म्हणून जी निदर्शने झाली होती त्यावर या वासुदेवन नायर यांच्या सरकारने गोळीबार केला आणि त्यात काही लोक मारले गेले. मग आपल्याच लोकांवर आपले सरकार गोळीबार कसा करू शकते या मुद्द्यावरून राम मनोहर लोहिया या प्रजा समाजवादी पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा संयुक्त समाजवादी पक्ष स्थापन केला. समाजवादी परिवारात पडलेल्या शेकडो फुटींपैकी ही पहिली फूट होती.

त्यानंतर १९५६ मध्ये राज्य पुनर्रचना झाली त्यात बरेच बदल केले गेले. एक तर मद्रास राज्यातून मलबार जिल्हा वेगळा करण्यात आला आणि तो मलबार जिल्हा तसेच कोचीन-त्रावणकोर राज्य यांचे विलीनीकरण झाले आणि नवे केरळ हे राज्य बनले. त्याचवेळेस कन्याकुमारीला मद्रास राज्यात जोडण्यात आले.
तसेच मुंबई राज्यातील उत्तर कन्नड जिल्हा, बेळगाव वगैरे भाग, हैद्राबाद राज्यातील तेलंगण हा तेलुगू भाषिक भाग वगळता गुलबर्गा, रायचूर वगैरे भाग, कूर्ग यांचे म्हैसूर राज्यात विलीनीकरण करण्यात आले. आता आपण ज्याला कर्नाटक म्हणतो त्याला तेव्हा म्हैसूर राज्य म्हणायचे. कर्नाटक हे नाव १९७० च्या दशकात दिले गेले. त्याप्रमाणेच हैद्राबाद राज्यातील तेलंगण आंध्र प्रदेशात विलीन करून राज्याची नवी राजधानी झाली हैद्राबाद. आणि हे सगळे भाग जाऊन उरलेला भाग राहिला मद्रास राज्यात. त्या राज्याचे नाव १९७० च्या दशकात तामिळनाडू असे केले गेले.

मद्रास असे द्राविडी प्राणायमासाखे पसरलेले राज्य होते हे पाहून मौज वाटली.

गवि

काही कायदे देखील पूर्ण राज्य कव्हर न करता एका विशिष्ट भागापुरते लागू होतात. बॉम्बे टेनन्सी ॲक्ट हा पूर्वी मुंबई, महाराष्ट्रातला काही भाग आणि गुजरातचा काही भाग, या एरियात लागू होता. बॉम्बे प्रॉव्हिन्स म्हणत असत, त्या भागात बहुधा. आताही तो गुजरातमध्ये वेगळ्या नावाने लागू आहे. महाराष्ट्रात या कायद्यात मुंबई आणि काही जिल्हे त्यात कव्हर होतात. पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि कोंकण. मराठवाडा आणि विदर्भाला तो लागू होत नाही. वकिलांनी खात्री करून द्यावी.

मनो

गवि, मुळात उत्तर आणि दक्षिण असे कोकणचे दोनच भाग ब्रिटिश राज्यात होते. त्यांचा उगम त्याहूनही मागे म्हणजे इसवी १५५० सुमारास आहे. नगरच्या निजामशाहीच्या ताब्यात असणारे कोकण याला मोगल निजामशाही तळकोकण म्हणत. त्यात मुंबई, चौल, जंजिरा, अलिबाग इत्यादी सर्व भाग येई. दुसरा भाग म्हणजे आदिलशाही तळकोकण. त्यात तुम्ही म्हणता तो सर्व भाग येई, थेट गोव्याच्या पलीकडे कारवार पर्यंत. शहाजहान बादशहाने निजामशाही घेतली आणि औरंगझेबाने आदिलशाही, यात पन्नास वर्षे मध्ये गेली.

हा भाग असा दोन तुकड्यात विभाजित होण्याचाही आधी आणि काही काळ नंतरही यात छोटी छोटी स्वतंत्र राज्ये होती. भौगोलिक दुर्गमतेमुळे ऐन मुसलमानी बहामनी राज्यातही ती कशीबशी टिकून राहिली. सूर्यराव सुर्वे, चंद्रराव मोरे, पालवणीचे दळवी, वेंगुर्ला आणि वाडीचे सावंत भोसले, यांची मुळे याहूनही खोलवर जातात. यांच्यावर आपली सत्ता बसवण्यासाठी बहामनी महमूद गवान इत्यादी लोकांनी कोकणात स्वाऱ्याही केल्या. विशाळगडचा दर्गा मला वाटते असल्याच एक आक्रमकाचा आहे.

मुळात शिवाजी महाराजांचे आणि मोगलांचे वैर होण्याचे आद्य कारण म्हणजे निजामशाही तळकोकण, कारण यातील कल्याण, रायरी हा जुना निजामशाही तळकोकणाचा भाग निजामशाहीचे नवे मालक मोगलांना मिळायला हवा, परंतु आदिलशाही आणि मोगल यांच्या भांडणात शिवाजी महाराज हा भाग आपल्या राज्यात सामील करून बसले होते. कोकणचे भौगोलिक दुर्गमत्व आणि व्यापारी महत्त्व लक्षात घेऊन महाराजांनी आपल्या राज्यात सामील केलेला हा पहिला प्रदेश. तुमच्या भूगोलात इतका मोठा इतिहास दडलेला आहे!

गामा पैलवान

मनो,

भूगोलातल्या इतिहासावरनं आठवलं की शंभूपुत्र शाहूमहाराज आपलं राज्य जेफनापट्टण म्हणजे आजचा जाफना इथवर मानीत असंत. तसं असेल तर ते मोठं रोचक तथ्य ठरावं.

आ.न.,
-गा.पै.

प्रचेतस

रूमशान म्हणजे इस्तंबूल नव्हे तर रोम आणि सिरिया.

रूमशान म्हणजे रोम किंवा सिरिया असे दोन्ही प्रदेश हे होऊ शकतात. पण भारतीयांना इस्तंबूल हेच युरोपातले मोठे शहर वाटत होते का? कुणीतरी मला मागे रूमशान इस्तंबूलच असे सांगितले होते त्यामुळे माझा गोंधळ झाला. विषय होता की शिवशंभू नंतर तेव्हड्या प्रचंड महत्त्वाकांक्षेचे त्या घरात कुणी जन्मले नाही असा. तेव्हा शाहू महाराजांना इस्तंबूल देखील जिंकून घ्यायचे होते असे कुणीतरी मला सांगितले. रेडिट वर की कोरा वर ते आठवत नाही.

प्रचेतस

इस्तंबूलला कुंस्तुंतुनिया (बायझन्टाईन साम्राज्यातले कॉस्न्टेन्टिनोपल) असेही इकडे म्हटले जात असे. मराठेशाही किंबहुना मुघलकाळात देखील तुर्कीचे ऑटोमन साम्राज्य बलाढ्य होते. इतके की मुघल बादशहांना सुद्धा आपल्या बादशहापदासाठी तुर्की खलिफाची मान्यता असणे भाग्याचे आणि जरुरीचे वाटत असे.

अजून एक विषय मला तुम्हाला विचारायचा आहे की जुन्या भारतीयांची भौगोलिक समज काय होती उर्वरीत जगाबद्दल?
म्हणजे त्यांना मंगोलिया चीन बद्दल माहीत होते का? मराठे मादागास्कर वगैरे पर्यंत गेले होते असे अलीकडे समोर येत आहे. मात्र तेव्हा भारतीयांची युरोपबद्दल काय समज होती. सिकंदर तर खूपच पूर्वी येऊन गेला त्यामुळे भारतीयांना ग्रीस वगैरे प्रदेश ऐकून तरी ठाऊक असणार आहेत. पण त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितलेच असेल ना.

अतिशय अद्भुत साइट आहे ही. जगातील जवळजवळ लाखाहून अधिक ऐतिहासिक नकाशे डिजिटल केले आहेत!
https://www.davidrumsey.com/
१५५४ च्या आसपासचा Pirî Reis याचा एक अटलास माझा absolute favorite आहे! त्या वेळेस या माणसाचे एकुण भौगोलिक ज्ञान पाहून मी चाटच पडलो होतो त्याने एवढा प्रचंड अ‍ॅक्युरेट नकाशा बनवला होता तेही अनेक नकाशांचे आणि लोकांचे ज्ञान गोळा करून.

प्रचेतस

अगदी मौर्यकाळापासून ग्रीकांशी व्यापार होत असे. अलेक्झांडरमुळे इंडो बॅक्ट्रियन राज्ये इकडे होतीच. सेल्युकस निकेटरची मुलगी चंद्रगुप्ताला पत्नी म्हणून दिलेली होती. मात्र प्रवासी भारतीयांना लिहिण्याची सवय नसल्यामुळे त्यांचे वृत्तांत फारसे उपलब्ध नाहीत. मात्र पेरीप्लस ऑफ एरिथ्रियन सी मध्ये त्याबद्द्ल विपुल प्रमाणात आलेले आहे. रोमन इतिहासकार प्लिनीने तर भारतीय आयातीच्या बदल्यात रोमनांच्या सुवर्णनाण्यांचा ओघ भारतात वाहात असल्याबद्द्ल चिंता व्यक्त केली होती. बाकी मंगोलिया, चीन्बद्द्ल तर पूर्वीपासून माहिती होतेच. चीनशी बराच व्यापार होता. मंगोल टोळीवाल्यांनी तर जवळपास १/४ भूभागावर राज्य केले. चोळांनी इंडोनेशिया, मलेशिया इत्यादींशी आपल्या सीमा भिडवल्या होत्या. तर छत्रपती शिवाजीमहाराजांच्या आरमाराची दहशत खुद्द मस्कतच्या अरबांनी घेतली होती (यावर आजच मिपाकर बॅटमॅनने एक लेख लिहिला आहे) मात्र आपल्या प्रवाश्यांनी केलेली परदेशातील प्रवासांची वर्णने फारशी नाहीत.

अतिशय अद्भुत साइट आहे ही. जगातील जवळजवळ लाखाहून अधिक ऐतिहासिक नकाशे डिजिटल केले आहेत!

याबद्द्ल धन्यवाद. सवडीने बघावे अशीच साईट आहे.

दोहो बाजुन व्यापार चालू असल्याने आपल्याला आणी युरोपियनांना एकमेकांविषयी भरपुर माहीती होती. भृगकच्छ, शुर्पारक, कलीयान, माहीम, चेउल (सेमुल्ला) ही प्रमुख बंदरे. यातून सर्वदुर व्यापारी संपर्क असल्याने भौगोलीक माहीतिचीही देवाण घेवाण होत असणारच...
(रॉटरडॅम इथल्या नावीक संग्रहात एका कार्टोग्राफरने १६१९ मधे काढलेला कोकणचा नकाशा ठेवलाय तिथे ही बंदरे स्पष्ट दाखवली माझ्याकडे त्याचा फोटो आहे पण मोबाईल मधे आहे. इथे कसा द्यायचा माहीत नाही)

प्रचेतस

धन्स रे मिळाला, तत्कालीन नावे आणि त्यांची स्पेलिंग्स मजेशीर आहेत.

१. पश्चिम महाराष्ट्र पश्चिमेला नाही.
२. मध्य महाराष्ट्र म्हणजे मराठवाडा की नगर?
३. खानदेश नेमका कुठे आहे? आणि नाशिक पश्चिम महाराष्ट्रात घ्यावे का?
४. माणदेश आणि पश्चिम वेगळा करायचा का?
५. मावळ नेमका भाग कुठला?
६. मराठवाडा नेमका कळतो मात्र बेरार म्हणजेच वर्‍हाड कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो?
७. कोकण हा त्याच्या अगदी डिस्टिंक्ट भौगोलिक रचनेमुळे वेगळा दिसतो. परंतु मुंबैला कोकण मानावे का? बाकी तळ कोकण आनि सह्यप्रदेश ही ही एक भानगड आहे.
८. कोल्हापूर, सांगली यांना दक्षिण महाराष्ट्र का म्हणत नाहीत? की बेळगाव आणि त्या भागाला म्हणायचे?
९. कारवार बिदर वगैरे हे अलभ्य मराठी प्रदेश यांना काय म्हणावं?

म्हणजे नेमके काय? माझ्या मते, घाट उतरल्यावर जो तुलनेने समतल प्रदेश लागतो त्याला तळकोकण म्हणतात. का दक्षिण कोकणाला तळकोकण म्हणतात?

गवि

मला वाटते कोंकणातील कोअर भाग. म्हणजे रायगडच्या दक्षिणेचा, याला म्हणत असावेत. किंवा ते कोंकण जे घाटांच्या उताराच्याही खाली समुद्रसपाटीवर प्रॉपर वसलेलं आहे, ते.. असाही अर्थ असू शकेल. उदा. आंबाघाट येथील गावे, साखरपा येईपर्यंत तळकोकणात मोजत नसतील पण रत्नागिरी, दापोली, गुहागर, देवगड, कुणकेश्वर हे त्यात येत असेल.

नेमके माहीत नाही तिकडे लहानपण गेले असले तरी.

मी त्याचा अर्थ कुडाळ देवगड सावंतवाडी असा घेत आलोय.

इथे डोंगर आणि टेकड्या संपून बर्‍यापैकी समुद्रसपाटीचा किंवा थोडा उंच पठारी प्रदेश सुरु होतो म्हणून याला तळकोकण म्हणत असावेत कारण घाट उतरल्यावर आपण तळावरच जाणार.

खटपट्या

पालघर पासुन गोव्याच्या सिमेपर्यंत कोकण आहे,
तळकोकण म्हणजे दक्षिणेकडचे कोकण - चिपळूण पासून खाली तळकोकण म्हणण्यास हरकत नाही, पण तळकोकणाची काही सिमा नाही. जसे साउथ मुंबई.
पश्चिम महाराष्ट्राबाबत नेहमीच गोंधळ आहे. कारण खरे तर महाराष्ट्राच्या पष्चिमेला कोकण येतो पण त्यास पश्चिम महाराष्ट्र म्हणत नाहीत.
असो

विजुभाऊ

जावळीत जावळी नावाचे गावच नाहिय्ये,
दुसरे म्हणजे पुणे शहर हे हवेली तालुक्यात येते. डेक्कन मात्र भांबुर्डेमधे यते

प्रचेतस

जावळी हे नाव गावावरुन नव्हे तर तेथील घनदाट जंगलावरुन आले आहे. झाडांची इतकी दाटी जशी झाडांची जाळीच जणू ते जावळी.

आहे.
महाबळेश्वर पायथ्याच्या दरे खोर्‍यात जावळी गाव आहे. कुंभरोशी वरुन दरे कडे जाताना रस्त्यावर हे गाव आहे. पुर्वी एक असेल पण सध्या दोन वाड्या आहेत. थोरली जावळी आणी वरची जावळी. यातल्या वरच्या जावळीत मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. मी ही दोन्ही गावे आनी वाड्याचे अवशेष बघीतले आहेत.

थोरली जावळी आणी वरची जावळी. यातल्या वरच्या जावळीत मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. मी ही दोन्ही गावे आनी वाड्याचे अवशेष बघीतले आहेत.

मोर्‍यांच्या वाड्याचे अवशेष आहेत का? हे विचारायचे कारण म्हणजे एक गोष्ट आठवली. शाळेत असताना आमची सहल प्रतापगड आणि शिवथरघळ येथे गेली होती. तेव्हा शिवथरघळीहून एक दिवस सकाळी 'आपल्याला चंद्रराव मोर्‍यांचा वाडा बघायला जायचे आहे' म्हणून आम्हाला नेले. डोंगरावरून बराच वेळ चालत गेल्यावरही वाड्याचा पत्ता नव्हता. शेवटी एके ठिकाणी गेल्यावर- इथे चंद्रराव मोर्‍यांचा वाडा होता अशी आमची बोळवण केली गेली. प्रत्यक्षात तिथे काहीही नव्हते- नुसते गवत होते. एक दगडही नव्हता. बहुदा आमच्या बरोबर आलेल्या शिक्षकांनाही तो वाडा नक्की कुठे होता हे माहिती नसावे त्यामुळे आम्हाला नुसतेच चालत नेले आणि आपण रस्ता चुकलो किंवा आपल्याला माहित नाही हे मान्य करायचे नसेल म्हणून कदाचित 'इथे वाडा होता' असे काहीतरी सांगून आम्हाला पिटाळून लावले असावे.

शिवथर इथुन थोडे वरच्या बाजुला सह्याद्रीच्या अगदी पायथ्याला चेरावडी म्हणून गाव आहे (१.५ किमी). त्या गावाच्या पुढे अगदी डोंगर तळात मोर्‍यांचा वाडा आहे... अगदी आत जंगलात असल्याने चटकन सापडत नाही आणी आता फक्त काहीच अवशेष उरलेत. सह्यमाथ्यावरच्या कुंड गावातून खाली खुटे नावाची घाटवाट उतरते तेव्हा ह्या वाड्यावरुन वाट जाते. अम्ही खुटे घाट वाट ट्रेक केलेला तेव्हा हा वाडा बघीतलेला..
तसा अजुन एक मोर्‍यांचा वाडा आहे.. कोयना धरण क्षेत्रात उचाट नावाचे एक गाव आहे त्या गावाच्या पुढे निरपजी म्हणून मोर्‍यांचे कुलदैवत आणी देवराई आहे, तिथेही मोर्‍यांचा वाड्याचे अवशेष आहेत...

प्रचेतस

५. मावळ नेमका भाग कुठला?

मावळाचा प्राचीन उल्लेख कार्ले येथील शिलालेखात मामाड असा आलाय. तर ह्या प्रदेशाला त्याकाळात 'मामलाहार' म्हणत. मावळ म्हणजे रूढार्थाने मावळतीकडचा म्हणजे पश्चिमेकडचा प्रदेश. इकडील नद्यांच्या खोर्‍यांवरुन त्या त्या मावळाला विशिष्ट नावे पडली. पवनेच्या खोर्‍यातील पवन मावळ, आंद्रेच्या खोर्‍यातील आंदर मावळ तर कसबे नाणे गावाभोवतालचे नाणेमावळ.

६. मराठवाडा नेमका कळतो मात्र बेरार म्हणजेच वर्‍हाड कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो?

बेरार म्हणजे सर्वसाधारणपणे अमरावती, वर्धा, नागपूर. बहमनी साम्राज्याची पाच छकले होऊन अहमदनगरची निजामशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळाकोंड्याची कुत्बशाही आणि बेरारची इमादशाही अशा पाच सल्तनती स्थापन झाल्या. इमादशाहाची राजधानी एलिचपूर (आजचे अचलपूर). विस्ताराने जरी मोठं असलं तरी ह्यांचे सैनिकी सामर्थ्य तुलनेने कमी होते पण नरनाळा, गाविलगड असे बलाढ्य किल्ले त्यांच्या आधिपत्याखाली होते.

कोकण हा त्याच्या अगदी डिस्टिंक्ट भौगोलिक रचनेमुळे वेगळा दिसतो. परंतु मुंबैला कोकण मानावे का? बाकी तळ कोकण आनि सह्यप्रदेश ही ही एक भानगड आहे.

कोंकणाचे पूर्वीचे नाव म्हणजे अपरान्त. पहिल्या शतकातला परकीय प्रवासी स्ट्राबो कोंकणाचा उल्लेख 'कोनियकोई' असा करतो. कोंकणाची व्युत्त्पत्ती तशी नीट लागत नाही मात्र कोण म्हणे डोंगरमाथा व रेणुकादेवीचे इकडील नाव कुंकुणा अशा नावावरुन कोंकण नाव आले असे मानले जाते. मध्ययुगात लाट (दक्षिण गुजरात), शूर्पारक (आजचे नालासोपारा), अष्टागर (अक्षी, नागाव, किहिम वगैरे प्रदेश) आणि त्या खालचे कोंकण व तदनंतर गोमंतक असे मानले जात असे. तळकोकण मात्र चिपळूणपासून पुढे हे सहज मानता यावे.

सुबोध खरे

तळकोकण म्हणजे सध्याचा सिंधुदुर्ग जिल्हा. येथे मालवणी भाषा हि जास्त बोलली जाते.

रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण डोंगराळ आहे .

पोलादपूर सोडल्यावर कशेडी घाट चालू होतो तेथे रत्नागिरी जिल्हा चालू होतो तेथपासून हा जिल्हा बराचसा डोंगर आणि माथ्यावरील सडा असाच दिसतो ते खारे पाटण पर्यंत .

तेथून सिंधुदुर्ग जिल्हा चालू होतो त्यातील बराचसा भाग हा सपाटीचा आहे. हा महाराष्ट्रात कोकणच्या नकाशात दक्षिणेकडचा तळाकडचा भाग म्हणून याला तळकोकण म्हणतात.

रत्नागिरी लांजा राजापूर हा भाग सहसा तळकोकणात धरला जात नाही. येथे संगमेश्वरी बोली ( मराठीची एक बोली) बोलली जाते.

ज्ञानसमृद्ध प्रतिसाद.
धन्यवाद. याविषयी खरेतर स्वतंत्र लिहायला हवे की प्राचीन आणि मध्ययुगीन भारताची भागोलिक समज.

आजकाल ऐतिहासिक चित्रपट दाखवतात तेव्हा शिवराय किंवा एखादा खान खलबते करत असताना टेबलवर चक्क त्यांच्यापुढे नकाशा वगैरे मांडलेला असतो आणि ते त्यात लाकडाचे घोडे वगैरे सरकवून स्ट्रॅटेजी हाकतात. तेव्हा मला प्रश्न पडायचा की यांना समुद्र कुठून कुठे आहे हे तरी कसे कळायचे. कारण कार्टोग्राफर ही एक अतिशय महत्त्वची गोष्ट असणार तेव्हा शिवरायांनी तशा माणसाला अतिशय उच्च पद दिले असेल इंदलकर सारखे.

याबरोबरच लहानपणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाकेंद्र ओरोस बुद्रुक आहे. सिंधुदुर्गचे जिल्हाकेंद्र मालवण का नाही? ओरोस का निवडले? जिल्ह्यांना राजधान्या नसतात म्हणून आपल्या पंप्रंची चेष्टा झाली होती तेव्हा जाणवले आपल्या कडे सुद्धा जिल्ह्याच्या केंद्रांना शब्दच नाही आहे. राजधानी म्हणायला काही हरकत नाही.

तरीही ओरोस कडे कुणाचे विषेश लक्ष जात नाही. आता तर तिथे मोठे सरकारी मेडिकल कॉलेज देखील आहे.

नावाच्या गावात कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा रुग्णालय सोडून काहीही नाही. हे गाव अजिबात वाढले नाही. कुडाळ बरेच मोठे झाले आहे असे दिसते. मालवण देखील बरेच मोठे आहे. मग या ओरोस मधे जाते तरी कोण? त्या जिल्हा रुग्णालयाचा काही उपयोग आहे का? कुणाच्या डोक्यात आले होते हे ओरोस चे?

ओरोसजवळून आता हातखंबा गोवा महामार्ग गेला आहे. याच गावाला स्वतःचे रेल्वे स्टेशन आहे. पश्चिमेला रेल्वे स्टेशन आणि पूर्वेला हायवे. त्यांच्या मधे एक गाव. या गावात जिल्हापरिषदेपासून सगळी जिल्ह्याची मुख्य ठिकाणे आहेत. या गावात 2021 ला सरकारी मेडिकल कॉलेज झाले आहे. याच गावाजवळ अजून एक मेडिकल कॉलेज आहे. या गावात एक मोठे तळे असून गावाला पाणी पुरवठा भरपूर आहे. या गावात एक इंजिनियरिंग कॉलेज आहे. हे गाव भविष्यात चांगले वाढू शकते त्यामुळे ओरोस या ठिकाणी गुंतवणूक करण्यास चांगला वाव आहे.
इथे गुंठामंत्री होणे सध्या शक्य वाटते.

गवि

ओरोस का? कुडाळ किंवा मालवण किंवा कणकवली का नाही वगैरे प्रश्न पुरातन काळापासून पडलेले आहेतच.

ओरोस अगदी सेंटरला आहे. आधी वळणे वळणे म्हणून अंतर जास्त त्यात एका टोकाला केंद्र नको म्हणून निवडलेले दिसते. शिवाय लँड घेणे हा प्रोब्लेम इतर शहरात येतोय असे दिसतेय.

सुबोध खरे

माझ्या माहितीप्रमाणे ओरोस बुद्रुक या गावाला राजधानी बनवण्याचे कारण राजधानी बनवण्यावर असलेले वाद.

यात कणकवली, मालवण कुडाळ आणि सावंतवाडी अशा चारही ठिकाणच्या स्थानिक नेत्यांना आपल्याच शहरात राजधानी हवी होती.

यावर तोडगा म्हणून चारही ठिकाणच्या मध्यभागी असलेले आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणि मुंबईत गोवा रेल्वे मार्गावर असलेले ओरोस बुद्रुक हे गाव निवडण्यात आले.

मालवण आणि सावंतवाडी पासून दोन्ही (रस्ता आणि रेल्वे मार्ग) तसे लांबच होते

शिवाय सरकारी कार्यालयांसाठी भरपूर जमीन हवी होती ती सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. यामुळे ओरोस बुद्रुक हे गाव निवडले आणि मालवण जवळ असलेला समुद्रातील किल्ला सिंधुदुर्ग यावरुन गावाचे नाव सिंधुदुर्ग नगरी आणि जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले.

एकदा सरकारी कार्यालये आली कि शहर वसतेच. कारण जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस मुख्यालय, आर टी ओ, जिल्हा रुग्णालय, जिल्हा आणि सत्र न्यायालय अशी कार्यालये आली आणि त्याच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा निर्माण झाल्या कि वस्ती होतेच

भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर बिहार आणि बंगाल यांना उत्तर भारतात का धरतात आणि मेघालय वगैरे यांना पूर्वेकडेची राज्ये न म्हणता इशान्येकडेची का म्हणतात हा गोंधळ मला नेहमी होतो.

गवि

यासदृश एक आणखी निरीक्षण माझंही आहे. अंदमान निकोबार बेटे ही सांस्कृतिक दृष्ट्या काही प्रमाणात ओरिजनल असली (उदा. आदिवासी) आणि तिथली आधुनिक संस्कृती ही भारतातल्या अनेक भागातल्या लोकांची संस्कृती- सरमिसळ असली, तरी अनेकदा व्यवहारात, नियोजनात, कंपन्या किंवा संस्थांच्या विभागीय वाटणीत, शाखांचे मुख्य ऑफिस कुठे, या दृष्टीने अंदमान हे चेन्नईपेक्षा कोलकत्याशी जास्त जोडलेलं दिसतं. अंदमानातून बाहेर पडलेले लोक कोलकात्यात चेन्नईपेक्षा जास्त दिसतात आणि सांस्कृतिकदृष्ट्या देखील पश्चिम बंगालशी अधिक जवळचे असतात.

इतर कोणाचं निरीक्षण अगदी विरुद्ध देखील असू शकतं. माझ्याकडे मोठा विदा नाही.

स्पेनचे एक शहर आफ्रिका खंडात आहे- त्या शहराचे नाव आहे सेयुटा.

सौदी अरेबियामध्ये इस्लामचा उदय झाल्यानंतर अरबांनी हल्ले सुरू केले. जॉर्डन-पॅलेस्टाईन ओलांडून ते आफ्रिका खंडाच्या उत्तर भागात घुसले. त्यातून ते आफ्रिका खंडाच्या पश्चिमेला असलेल्या मोरोक्कोपर्यंत पोचले. तिथून जिब्राल्टरचा समुद्र ओलांडला की स्पेन येते. ते स्पेनमध्येही घुसले. त्यांना स्पॅनिश लोक मूर म्हणायचे. त्या मुस्लिम आक्रमणाविरोधात स्पेनचे लोक जवळपास ५०० वर्षे लढत होते आणि त्यांनी १४९२ मध्ये मूरांना हाकलून दिले. १४१० मध्ये स्पेनमधील एका राजपुत्राने सध्या पोर्तुगाल आहे तो प्रदेश मुक्त केला आणि तिथे पोर्तुगाल या नव्या राज्याची स्थापना केली. त्यापूर्वी पोर्तुगाल असा वेगळा देश नव्हता. तिथे हेनरी म्हणून राजा होता. युरोपातून भारत आणि दक्षिणपूर्व आशियाबरोबर व्यापार चालायचा त्या व्यापार मार्गावर मुस्लिमांचे वर्चस्व होते तसेच कॉन्स्टॅन्टीनोपल (आताचे इस्तंबूल) मार्गे आलेला माल इटलीतील व्हेनिस आणि जिनोआमार्गे युरोपात जायचा तेव्हा त्या व्यापारावर इटालीयनांचेही वर्चस्व होते या गोष्टी स्पॅनिश आणि पोर्तुगीज ख्रिश्चनांना डाचत होत्या. त्यामुळे भारताकडे जायचा समुद्रीमार्ग शोधून काढायचे प्रयत्न त्या हेनरी राजाने सुरू केले. त्यामुळे त्याला हेनरी द नेव्हिगेटर असेही म्हणतात. त्यात धार्मिक अँगल पण होतात- मुस्लिमांचे वर्चस्व खिश्चनांना डाचत होते. त्यामुळे हेनरी द नेव्हिगेटरने युरोपिअन देशांनी केलेली पहिली समुद्र मोहिम काढली आणि सेयुटा या मोरोक्कोतील शहरावर नियंत्रण मिळवले. ही गोष्ट १४१५ ची. त्यानंतर १४८० मध्ये पोर्तुगाल आणि स्पेनचे एकीकरण झाले आणि सेयुटावर स्पॅनिशांचे नियंत्रण प्रस्थापित झाले. १५४० मध्ये परत पोर्तुगाल वेगळा झाला तरीही सेयुटावर स्पेनचे नियंत्रण कायम राहिले- आजही आहे.

खालील नकाशात सेयुटा स्पेनच्या जवळ आहे हे दिसेल.
Ceuta

या नकाशावरून आणखी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भारताकडे जायचा समुद्रीमार्ग शोधायच्या उद्योगात पोर्तुगीज लोक पुढे का होते. त्याचे कारण पश्चिमेकडे अटलांटिकचा अ‍ॅक्सेस त्यांना जवळ होता आणि आफ्रिका खंडही जवळ होता. तीच गोष्ट स्पॅनिश लोकांची. त्यामानाने इंग्लंड बरेच लांब आहे. त्यामुळे भारतात युरोपिअनांनी हातपाय पसरायला सुरवात केली त्या काळात पोर्तुगीज दिसतील- मग फ्रेंच आणि शेवटी ब्रिटिश. त्याचे कारण या भूगोलात दडले आहे. त्यात इटालियन, ग्रीक आणि जर्मनांचे नावही दिसणार नाही. त्याचे कारणही हा नकाशा बघून समजेल. इटली आणि ग्रीसला अटलांटिकचा डायरेक्ट अ‍ॅक्सेसच नाही कारण भूमध्य समुद्र आणि आजूबाजूचे जमिन यातून जहाजे जाणार कुठून? जर्मनीला थोडासाच अटलांटिकचा अ‍ॅक्सेस आहे पण त्या भागात कदाचित चांगले बंदर असायला परिस्थिती अनुकूल नसावी. त्या तुलनेत डच लोक भारतात पोचले आणि इंडोनेशियातही पोचले. कारण नॉर्थ सी मधून त्यांना अटलांटिकचा अ‍ॅक्सेस आहे. तीच गोष्ट डेन्मार्कची. ते मर्यादित प्रमाणात का होईना भारतात पोचले. कारण त्यांना अटलांटिकचा अ‍ॅक्सेस होता.

इतिहास वाचताना असा भूगोलही बघितल्यास अशा बर्‍याच गोष्टींचा उलगडा होतो.

टिनटिन

ह्या वरून आठवले , अब्दालीसारखा नदीचा उतार शोधत आमचा एक मित्र खडवलीच्या काळू नदीत घसरून पडला होता

खटपट्या

ब्रिटीशांच्या काळातील मुंबै प्रोविन्स शोधत असताना तो फार मोठा होता असे ऐकले. नुकतेच कुठे तरी वाचले की ब्रिटीश मुंबई प्रोव्हिन्स हे ओमान पर्यन्त होते.

नौदल पश्चिम विभाग (मुख्यालय :मुंबई) ह्यांच्या अखत्यातातील भागात अजूनही बहुदा एकच पोलीस स्टेशन आहे. नौदलातील नागरी तक्रारांसाठी/गुन्ह्यांसाठी येथे गुन्हा नोंदवला जातो. त्याची हद्द गुजरात खंबात पासून अगदी केरळ, कन्याकुमारीपर्यंत आहे.
नक्की नाव आणि संदर्भ आठवत नाहीये. मिळाले कि बाकी पोस्ट करतो.

गणेशा

छान चर्चा..
भूगोल - इतिहास शाळेत असताना खुप आवडायचा, वाचतो आहे..

कांदा लिंबू

जिल्हाकेंद्र -

जिल्हाकेंद्र / जिल्ह्याचे मुख्यालय / डिस्ट्रिक हेड क्वार्टर याला राजधानी हा शब्द सध्या अनपेक्षित वाटत असला तरी रुळल्यावर तो योग्य वाटेल असे वाटते.

सामान्यतः जिल्ह्याचे नाव व त्या जिल्ह्याच्या राजधानीच्या गावाचे नाव हे एकाच असते. उदाहरण नांदेड या जिल्ह्याची राजधानी नांदेड या नावाच्या गावी (किंवा शहरात) आहे.

तथापि, काही ठिकाणी जिल्ह्याचे नाव व त्या जिल्ह्याच्या राजधानीच्या गावाचे नाव ही दोन्ही वेगवेगळी असलेली दिसतात. महाराष्ट्रात रायगड हा बहुधा असा एकाच जिल्हा असावा ज्या जिल्ह्याच्या राजधानीचे नाव वेगळे, अलिबाग हे आहे.

आंध्र प्रदेशात (सध्याचा तेलंगणा धरून) मात्र असे अनेक जिल्हे पूर्वी होते. मागच्या दहा-बारा वर्षांत जिल्ह्यांची विभाजने झाली व हा भूगोल काहीसा बदलला.

२०१४ पूर्वीची स्थिती -

जिल्हा -- राजधानी
पूर्व गोदावरी -- काकिनाडा
पश्चिम गोदावरी -- एलुरु
कृष्णा -- मछलीपट्टणम
मेदक -- संगारेड्डी
प्रकाशम -- ओंगोल

प्रकाशम -- ओंगोल

या प्रकाशम जिल्ह्याची नेहमी गंमत वाटते. प्रकाशम नावाचे कोणतेही गाव आहे असे वाटत नाही कारण त्या जिल्ह्याचे नाव आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री टी.पी.प्रकाशम यांच्या नावावरून दिले आहे. मुख्यमंत्र्याच्या नावावरून जिल्हा हा जरा गंमतीचाच प्रकार आहे. महाराष्ट्रात चव्हाण, पवार, नाईक किंवा फडणवीस नावाचा जिल्हा असेल तर कसे वाटेल? तसेच तिकडे केले आहे.

उत्तर प्रदेशात मायावतींनी जिल्ह्यांचे नामकरण करून मूर्खपणाची परिसीमा गाठली होती. अमेठी जिल्ह्याचे नामकरण केले छत्रपती शाहूजी महाराज नगर. शाहू महाराजांच्या कामाविषयी आदर असला तरी शतकानुशतके असलेले एखाद्या ठिकाणाचे अमेठी हे नाव बदलून शाहूजी महाराज नगर करायचे? शाहू महाराजांचा कधी अमेठीशी संपर्क आला असेल असे वाटत नाही. मग अचानक अमेठी हे नाव बदलून शाहूजी महाराज नगर हे नाव देणे तसे विचित्रच वाटते. तीच गोष्ट अमरोहाची. अमरोहा जिल्ह्याचे नाव ज्योतिबा फुले नगर असे केले. मग यथावकाश ज्योतिबा फुले नगरचे लोकांनी जेपी नगर केले. अखिलेश मुख्यमंत्री झाल्यावर ही नावे बदलली पण समजा अशी नावे बदलली नसती तर जेपी नगर म्हणजे जयप्रकाश नारायणांच्या नावाने नाव दिले आहे असे कोणाला वाटले असते. असे ऐकले आहे की कोल्हापूरला शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ स्थापन करायची वेळ आली तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी शिवाजी विद्यापीठ असे सुटसुटीत नाव ठेवावे असा आग्रह धरला होता. त्याचे कारण वडोदर्‍याच्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीचे एम.एस.युनिव्हर्सिटी झाले तसे कोल्हापूरमधील विद्यापीठाचे सी.एस.एम युनिव्हर्सिटी व्हायला नको- जसे युपीत जेपी नगर झाले.

जिल्ह्याविषयी आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे सांगली जिल्ह्याची. सांगली जिल्ह्याचे मुख्यालय अर्थातच सांगली शहर आहे. पण सांगली जिल्ह्यात सांगली हा तालुकाच नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्याचे मुख्यालय असलेले सांगली शहर येते मिरज तालुक्यात. असेही फार कुठे बघायला मिळत नसावे.

हे महानगर असले तरी ते हातकणंगले तालुक्यात येते. काही गावांचे नशीब फळफळते तसे आहे. इस्लामपूर आताचे ईश्वरपूर आणि वाळवा तालुका, खानापूर तालुका पण विटा मुख्य शहर असे अनेक.

लहानपणी काका लोकांना मुली पाहायला जेव्हा सगळी फॅमिली जात असे तेव्हा पहिल्यांदा भूगोलाच्या पुस्तकात पाहिलेली गावे पाहता येत. वेगळेच फीलिंग असायचे. मी खूप हट्ट करून नवनीतचा अटलास विकत घेतला होता.

तासनतास नकाशे पाहत घालवणे आणि ती गावे कशी असतील यांचे इमॅजिनेशन करणे खूप उत्तम टाइमपास. पहिल्यांदा कोल्हापूर पहिले तेव्हा तर भंजाळूनच गेलो होतो.

अभ्या..

अजून एक गम्मत म्हणजे कोल्हापूर जिल्हा आणी सांगली जिल्हा ह्यांच्या सीमारेषेवर रेल्वे लाईनजवळ निमशिरगाव आणि तांदळगे हि दोन गावे आहेत. त्या छोट्याश्या स्टेशनला दोन्ही गावाची नावे आहेत पण निमशिरगाव चे इंग्लिश बरोबर आहे तांदळगे चे स्पेलिंगनुसार तमदलगे असे केलेले आहे आणि स्टेशनबोर्डवर तसेच देवनागरीत लिहिलेले आहे. कॉलेजला दररोज मिरज-कोल्हापूर-मिरज ट्रेनने प्रवास करताना ते तमदलगे असे कसे नांव म्हणून मजा वाटायची.
m

गवि

ऑ???

मी तर खरोखरच तमदलगे असंच आजतागायत समजत होतो.

- (शिवाजी विद्यापिठाचा जुना विद्यार्थी) गवि

ता.क.

गूगल सर्च केली असता विकिपीडिया पानावर, लोकसत्ता आणि अन्य अनेक वृत्तपत्रांत तमदलगे असंच दिसतं आहे. आणि तांदळगे असं शोधू गेलं तर एकही निकाल आला नाही. म्हणजे मूळ नाव सर्वत्रच चुकीचं पसरलं असावं. तमदलगे हे नाव बसेसवर बघितल्याचं आठवतं आहे सांगली कोल्हापूरमध्ये असताना तीस वर्षांपूर्वी.

अभ्या..

Locality Name : Tamdalage ( तांदलगे )
Taluka Name : Shirol
District : Kolhapur
State : Maharashtra
Region : Desh or Paschim Maharashtra
Division : Pune
Language : Marathi and Kannada
Current Time 05:55 PM
Date: Sunday , Feb 22,2026 (IST)
Time zone: IST (UTC+5:30)
Elevation / Altitude: 550 meters. Above Seal level
Telephone Code / Std Code: 02322
.
मी खूप जणाना तांदळगे असेच म्हणताना ऐकलेले आहे.

मी ही तमदलगे असेच नाव वाचले पाहिले ऐकले आहे.

गोव्यात निदान कुंकळे माजोर्डे किंवा तशी नावे स्थानिकांच्या बोलण्यात तरी असतात मात्र बहुतेक बाहेरचे लेम करतात असे काहीसे कोल्हापुरात होईल असे वाटले नव्हते.

मी ही तमदलगे असेच नाव वाचले पाहिले ऐकले आहे.

मी पण. माझी पहिली अस्थायी नोकरी कोल्हापुरात होती- २००२ मध्ये. तेव्हा विश्रामबागहून सकाळी सव्वाआठच्या सुमारास येणारी सातारा-कोल्हापूर पॅसेंजरने दररोज कोल्हापूरला जायचो. तेव्हा जयसिंगपूर आणि हातकणंगले या दोन स्टेशनच्या मध्ये निमशिरगाव-तमदलगे हे स्टेशन होते. ते एक बिना प्लॅटफॉर्मचे स्टेशन होते. नुसत्या दोन पाट्या त्यावेळेस त्या स्टेशनला होत्या. पहिली पाटी म्हणजे स्टेशन सुरू झाले आणि दुसरी पाटी म्हणजे स्टेशन संपले :) त्या स्टेशनवर ती पॅसेंजर थांबायची. तमदलगे हेच नाव त्या स्टेशनवर आणि पुढारी वगैरे स्थानिक पेपरांमध्येही वाचल्याचे चांगलेच आठवते. गुगल मॅपवर मराठीत तांदळगे हे नाव वाचल्यावर त्या नावाला तमदलगे हे एडिट सुचवले होते. पण गुगल मॅपने ते मान्य केले नाही.

बाकी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काहीकाही गावांची नावे अगदीच विचित्र आहेत. जाडर बोबलाद, कोंत्याव बोबलाद, माधळमुठी, गैबी कुडुत्री, येडे निपाणी, येडे मच्छिंद्र, यशवंंतराव चव्हाणांचे जन्मगाव देवराष्ट्रे, विठुरायाचीवाडी, दिघंची, बेळंकी, बेळुंडगी वगैरे.

रूढ नसलेली डबल बॅरल नावे ही सांगली जिल्ह्याची खासियत म्हणवी लागेल.

१. येडे *
२. कवठे *
३. ३२ शिराळा
४. म्हैसाळ (एम)
५. करोली (टी)
६. शिंदेवाडी (एच)
७. रामपूरवाडी (द्विरूक्ती)
८. अलकूड (एम)
९. अग्रण धुळगाव

कर्नाटकी नावे :

आमचे रावळगुंडवाडी, अचकनहळ्ळी

हो. करोली(टी) वगैरे नावे विसरलोच. अशा नावांमधील टी, एम, एच वगैरे काय असतात काय माहीत.

अभ्या..

जुन्या बार्शी लाईट रूटवर बार्शी ते कुर्डूवाडी दरम्यान चिंचगाव नावाचे गाव आहे. तेथील स्टेशन हे चिंक हिल नावाने आहे. ब्रिटिश काळापासूनच तसे नाव आहे स्टेशनचे. मध्यरेल्वेच्या अखत्यारीत येते. तेथे नॅरोगेज असताना स्टीम इंजिने पाणी भरायला थांबायची. बहुधा इथे आधी आरक्षी प्रशिक्षण केम्द्र ही होते. सध्याचे माहीत नाही.
चिंक हिल हे अगदी नॉर्थवेस्ट किंवा कुर्ग भागात असल्यासारखे हे नाव चक्क पंढरपूर तालुक्यात कुर्डूवाडी जंक्शनजवळ आहे.

हो असे कुठून जाताना कुठेतरी वाचलेल्या/ऐकलेल्या नावाच्या गावाची पाटी दिसणे हा एक मस्त अनुभव असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाताना असा अनुभव अनेकदा येतो. काही काही टिपीकल कोकणी अडनावे असतात त्या लोकांचे मूळ गाव असलेली गावे दिसली की छान वाटले. पूर्वी झारापकर टेलरींग कॉलेज म्हणून एक मुंबईत होते. ते झाराप नावाचे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तीच गोष्ट वायंगणकर अडनावाच्या लोकांचे मूळ गाव- वायंगणी, वालावलकरांचे वालावली, आचरेकरांचे आचरे, मुणगेकरांचे मुणगे वगैरे. ही गावे नकाशात बघितली होती त्यापैकी काही गावांच्या नावाच्या पाट्या रस्त्यावरून जाताना बघितल्यावर छान वाटले होते. तीच गोष्ट गोव्यात- मयेकरांचे मये(म), बोरकरांचे बोरी(म), पोंभुर्पेकरांचे पोंभुर्पे, लोटलीकरांचे लोटली वगैरे.

दक्षिण गोव्यात कांसावलीमधून दाबोळी विमानतळावर जाताना एक डॉ.लुई प्रोतो बार्बोझा रोड दिसला होता. डॉ.लुईस प्रोतो बार्बोझा हे १९९० मध्ये काही महिने गोव्याचे मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्रीपदावरून दूर झाल्यानंतर त्यांचे नाव ऐकले ते थेट २०११ मध्ये त्यांचे निधन झाले तेव्हा. त्यांच्या नावाचा रोड तिथे पहिल्यांदा बघितल्यावर एकदम छान फिलींग आले. कदाचित ते त्या भागातील असावे. पण दरवेळेस अशी नावे वाचून छान फिलींग येते असे नाही. गुरगावमध्ये अशीच एकदा ध्यानीमनी नसताना शहिद रूपीन कट्याल मार्ग ही पाटी बघितली आणि कंदाहार विमान अपहरण प्रकरण आठवून विलक्षण कालवाकालव झाली. ते कंदाहार हायजॅकिंग प्रकरण, रूपीन कट्यालची गळा चिरून केलेली हत्या आणि त्याची पत्नी रचनाची त्यावेळेस काय अवस्था झाली असेल अशा काही गोष्टी निदान या जन्मात तरी विसरता येणार्‍यातील नाहीत. बहुदा रूपीन कट्यालचे घर त्या भागात कुठेतरी असावे. तसेच एकदा दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडिअम मेट्रो स्टेशनजवळ असाच शहिद अजय आहुजा मार्ग ही पाटी दिसली होती. कारगील युध्दात दुसर्‍या दिवशी आपली दोन विमाने पडली होती. त्यापैकी एका विमानाचा वैमानिक होता दिल्लीचा अजय आहुजा. बहुतेक तो दिल्लीत त्या भागात राहायला असावा.

कंजूस

माझ्याकडे रेल्वेची बरीच पुस्तके आहेत आणि त्यांत भरमसाठ माहिती आहे. माथेरान रेल्वे साठीचा खर्च आजही जीजीभॉय यांनी केला होता. नंतर ती रेल्वे सेंट्रल रेल्वेकडे देण्यात आली. पण आताचे रेल्वे मंडळ ही माहिती त्यांच्या हिल रेल्वेमध्ये देत नाही.

कंजूस

दुरुस्ती:- रेल्वेसाठीचा खर्च आदमजी जिजिभॉय यांनी केला होता.

तुमच्या आठवणींत असलेला भूगोल आणि इतिहास इथे मुक्तपणे मांडा.
१९९८-९९ साली मी तिसरीत होतो. तेव्हा तिसरीच्या भूगोलात जिल्ह्याची माहिती शिकवली जायची आता शिकवतात का माहीत नाही, तर माझ्या पुस्तकातला धुळे जिल्ह्याचा नकाशा नी वर्गातील इतर मुलांच्या पुस्तकातील धुळे जिल्ह्याचा नकाशा ह्यात मोठा फरक होता, माझ्या पुस्तकातल धुळे जिल्हा भला मोठा होता, हे असे का झाले हे मला नंतर बऱ्याच वर्षांनी कळले, १९९८ साली, नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्यातून वेगळा झाला होता भूगोलाची पुस्तके नवी आली होती, माझ्याकडे मात्र जूनच पुस्तक आल होत.
माझे एक चुलत काका जे ९९-९९ व्या वर्षी २ वर्षाआधी गेले ते सांगायचे की जळगाव जिल्ह्यात ते रहायचे तेव्हा काहीही लफडे झाले नि इंग्रज मागे लागले की ते २०-२५ किमीवरील निजामाच्या राज्यात लोक पळून जायचे नि इंग्रज पोलिस काही करू शकायचे नाहीत.