जनातलं, मनातलं

बाप्पाला स्वेटर

Primary tabs

पुण्यात लाडक्या बाप्पाला स्वेटर घालण्यात आले. कालच ही बातमी टीव्हीवर पाहिली होती. स्वेटर आणि कानटोपी घातलेला गंपती बाप्पा फारच क्युट दिसतोय. :)

अमोल केळकर

गणपती बाप्पा मोरया !
रोज नवीन स्वेटर घातला जातो असे ही ऐकले .

( धन्य ते पुणेकर . काय काय करतील काही सांगता येत नाही )
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

छोटा डॉन

लोकांच्या भक्ती आणि श्रद्धा याविषयी आम्हाला नेहमीच आदर आहे.

पण हे मात्र जरा आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. आता हेच पहाणे बाकी होते.
असो.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील धुसर सीमारेषा हळुहळु मिटत चालली आहे याचे वाईट वाटते.
दररोज नवा स्वेटर हे तर अजुन आश्चर्य.
त्यालाही पर्याय नाही.
अजुन एकदा असो.

जाता जाता :
बाय द वे, त्या शिवाजीनगरात, स्वारगेटच्या जवळ, स्टेशनजवळच्या पुलावर, मंडईत व इतर अनेक ठिकाणी जीवघेण्या थंडीत कुडकुडत झोपणार्‍या "गरिब, दरिद्री , रस्त्यावर झोपणार्‍या जनतेला" स्वेटर सोडा खाली टाकायला फडके तरी मिळते का ?
त्यांना सकाळी कोणी भुतदया म्हणुन कमीत कमी एक कप चहा तरी फुकट पाजते का ?
"माणसात देव पहा " असे म्हणतात , आपण नक्की कधी पाहणार ?
असो.

------
छोटा डॉन

प्रियाली

संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे. बाप्पांना स्वेटर घालण्याऐवजी सारसबागेजवळील भिकार्‍यांना ते दान केले असते तर समजण्यासारखे होते.

त्यालाही एक निगेटीव्ह कोपरा आहे. असे स्वेटर वाटताहेच असे कळले की पुण्यात भिकारी वाढतील. (इतर राज्यातून येतील) जसे मोफत घरांची घोषणा शिवसेनेने केली आणि मुंबईतील झोपडपट्टी झपाट्याने वाढली.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

आजानुकर्ण

अरे मित्रा,

मागे साईबाबांना सोन्याचे सिंहासन झाले. तेव्हाही अनेक लोक वैतागले होते. काय झाले पुढे त्याचे.

लहानपणी बाहुली बाहुली खेळताना, तू तुझ्या बाहुलीला नवे कपडे घातले असतीलच ना. तशीच ही मोठ्या माणसांची भातुकली. ज्यांना खेळायचं ते खेळणारच. वैतागून काय फायदा.

आपला
(खेळाडू) आजानुकर्ण

कोलबेर

लहानपणी बाहुली बाहुली खेळताना, तू तुझ्या बाहुलीला नवे कपडे घातले असतीलच ना.

नाही बॉ! आम्ही नाही कधी बाहुली बाहुली खेळलो. आम्ही बंदुका/गाड्या असले खेळायचो. शेजार पाजारच्या मुली मात्र बाहुली बाहुली खेळायच्या असं आठवत! :)

अवांतर : प्रभु रामचंद्र वनवासात थंडीपासुन संरक्षण करण्यासाठी स्वेटर घालत असावेत का? असा एखादा काथाकुट टाकण्याच्या विचारात आहे. सुवर्णमृगाचे डिझाइन असलेला विंटर कोट तर सितामाईंना नव्हता ना हवा?

आजानुकर्ण

शेजार पाजारच्या मुली मात्र बाहुली बाहुली खेळायच्या असं आठवत

अच्छा. हेही खरंच. कदाचित मुलींबरोबर खेळायची संधी मिळेल असे वाटल्याने आम्हीही बाहुली बाहुली खेळत असू.

पण महत्त्वाचा मुद्दा हा आहे कोलबेरपंत, लहानपणी बाहुल्यांशी खेळायला मिळाले नाही की मोठेपणी ह्या बाहुल्या लागतात.

आपला
(मनोवैज्ञानिक) आजानुकर्ण

झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)

लहानपणी बाहुल्यांशी खेळायला मिळाले नाही की मोठेपणी ह्या बाहुल्या लागतात.

लहानपणी बाहुल्यांशी खेळायला मिळालं नाही म्हणून काय झालं? आम्ही लहानपणी मुलींबरोबर बाहुली-बाहुली खेळताना अनेकदा बाहुला-बाहुलीचं लगीनही लावून दिलं, पण म्हणून काय पुढे आयुष्यभर ब्रह्मचारी नाही राहिलो.

- झुरळ मारणारा क्षत्रिय.

आजानुकर्ण

झुरळशेठ,
तुमचा निष्कर्ष चुकीचा आहे.

इथे गृहितक असे आहे की लहानपणी खेळायला मिळाले नाही म्हणून मोठेपणी बाहुल्या लागतात. पण याचा व्यत्यास योग्य आहे असे कुठे म्हटलेले नाही.
योग्य तर्क असा होईल की लहानपणी मुलींबरोबर बाहुला बाहुलीचं लगीन न लावून दिल्यामुळे आता लग्न केले.
मात्र लहानपणी बाहुलाबाहुलीचं लगीन लावून दिल्याने आता ब्रह्मचारी राहावे लागले हे मानणे चुकीचे आहे.

यामागील कार्यकारणभाव असा की, तर्कविधानांतील पहिला भाग हा होकारार्थी नसून नकारार्थी आहे. त्यामुळे एक नकारात्मक मानसिकता तयार होते आणि त्याचा विस्फोट पुढील आयुष्यात होऊ शकतो.

आपला
(तार्किक) आजानुकर्ण

झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)

झुरळशेठ,

'झुरळशेठ' नव्हे. 'क्षत्रियशेठ'.

बाकी सहमत.

- (De'bug'ger) झुरळ मारणारा क्षत्रिय.

आजानुकर्ण

आमचे बापूस आम्हाला नेहमी हाणायचे त्यामुळे मारणारा हे वडलांचे नाव आणि क्षत्रिय हे आडनाव वाटले. म्हणून पहिल्या नावाने हाक मारली.

येक डाव माफी असावी.

आपला
(वैश्य) आजानुकर्ण

झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)

आमचे बापूस आम्हाला नेहमी हाणायचे त्यामुळे मारणारा हे वडलांचे नाव

तर्क सही आहे! :D

- झुरळ मारणारा क्षत्रिय.

विसोबा खेचर

पण हे मात्र जरा आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे

अहो पण मुळात त्या गणपतीला स्वेटर घालणार्‍याने तुम्हाआम्हाला तो घालू का, अथवा नको, हे विचारलेलेच नाही! तो स्वेटर घालून केव्हाच मोकळा झाला आहे! :)

आणि आपण मंडळी मात्र उगाचंच त्यावर काहिबाही इंटिलिजंट ट्यँव ट्यँव करत अहोत हे पाहून गंमत वाटली! :)

तात्या.

झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)

भावना, भक्ती, श्रद्धा, अंधश्रद्धा, उदात्तीकरण वगैरे गोष्टी मध्ये न आणता केवळ एक थोडीशी गंमत म्हणून, कदाचित एक कल्पक सजावट म्हणून याकडे पाहणे शक्य नाही का?

आणि 'गरीब, दरिद्री, रस्त्यावर झोपलेली जनता' दर वेळी मध्ये आणलीच पाहिजे का? लाखो-करोडोंचा अपव्यय होत असेल तर भावना समजण्यासारखी आहे, नव्हे नक्कीच समर्थनीय आहे. पण थोडे स्वेटर आणले आणि घातले बाप्पाला, तर असा किती खर्च झाला आणि बिघडले कुठे?

सार्वजनिक गणपतीत, दहीहंडीला वगैरे किती सजावट किंवा कल्पक देखावे वगैरे करतात. म्हटले तर पैशाचा अपव्याय आहे पण त्यातून जनतेचे मनोरंजन होते आणि थोडी क्रिएटिव्हिटी कामी येते. का बंद करायची?

तसेच म्हटले तर एवढे मोठे मंदिर चालवणे हासुद्धा पैशाचा अपव्ययच आहे. मंदिराचीच खरे तर गरज काय? स्वेटरचे काय घेऊन बसलात? मी तर म्हणतो मंदिरच पाडून टाकले तर रोजचा केवढा खर्च वाचेल आणि गरीब, दरिद्री आणि रस्त्यावर झोपलेल्या जनतेसाठी उपयोगी होऊ शकेल!

मंदिराबरोबर सारसबागही काढून टाकू. जागेचा केवढा अपव्यय आहे तो! किती गरीब, दरिद्री, रस्त्यावर झोपलेल्या जनतेच्या निवार्‍यासाठी जागा मोकळी होईल. (मात्र तशी सारसबाग अगदीच निरुपयोगी नाही म्हणा. सारसबागेच्या उपयोगांविषयी पुणेकर जाणकारांना तरी अधिक सांगण्याची गरज नाही - समझनेवाले को इशारा काफी! ;-) )

किंवा असे करू. प्रभादेवीचा सिद्धिविनायक तर अगदी प्राइम लोक्यालिटीत आहे. पर स्क्वेअर फूट भाव काय मिळेल! किती मौल्यवान जागा अडकून राहिली आहे अधिक भक्तीच्या नावाखाली रोजचा पैशाचा अपव्यय होतो आहे! पाडून टाकू! आणि मग ती जागा विकून टाकू. त्या पैशात किती गरीब, दरिद्री, रस्त्यावर झोपलेल्या जनतेचा अन्नवस्त्रनिवार्‍याचा प्रश्न कायमचा सुटेल!

देवळेच तोडायला निघालोय तर सर्वधर्मसमभाव म्हणून ताजमहालसुद्धा (आगर्‍याचा!) पाडून टाकू! (या प्रस्तावाला भरपूर अनुमोदक मिळतील याची खात्री आहे. कदाचित बाप्पाला एवढे मोदक नाही मिळणार!) काय उपयोग आहे त्याचा? भरपूर जागा मोकळी होईल गरीब, दरिद्री, रस्त्यावर झोपलेल्या जनतेसाठी. (तसा मुंबईचा ताजमहालसुद्धा प्राइम लोक्यालिटीत बर्‍यापैकी स्क्वेअर फूटेज खातो म्हणा, पण ती खाजगी मालमत्ता आहे, त्यामुळे तो मालकाचा प्रश्न आहे. ही बाकीची स्थळे सार्वजनिक असल्यामुळे त्यांना पाडण्याच्या प्रस्तावाची चर्चा मुळीच अनाठायी नाही.)

किंवा दिल्लीचे राष्ट्रपतीभवन. जगातला सगळ्यात मोठा अध्यक्षनिवास आहे म्हणतात. तिथल्या ३४० खोल्यांपैकी किती खोल्या कोणत्याही राष्ट्रपतीच्या आख्ख्या कारकीर्दीत वापरल्या जात असतील, शंकाच आहे. करायच्यात काय? कशासाठी लागतात? शिवाय आजूबाजूचे प्रांगण - किती जागा वाया जाते! पाडून टाकूया, राष्ट्रपतींसाठी एखादी छोटीशी जागा बांधून त्यांना तिथे हलवूया आणि एवढी मोठी जागा गरीब, दरिद्री, रस्त्यावर झोपलेल्या जनतेसाठी मोकळी करू या. बराच फायदा होईल.

(जाता जाता एकच प्रश्न / Endgame: Exactly at which point does this whole argument start becoming ridiculous?)

- झुरळ मारणारा क्षत्रिय.

सुनील

थंडी गेल्यावर त्या स्वेटरांचा लिलाव करून पैसे उभारावेत आणि ते लोकोपयोगी कार्यासाठी वापरावेत. यात गैर ते काय?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अशा श्रद्धेपायी उद्या एखादा, रोज रोज मोदक, पेढे इत्यादी खाणार्‍या गजाननाचा डायबेटीससुद्धा चेक करुया म्हणेल. गजानना तुच बुद्धी दे तुझ्या भक्तांना.

छोटा डॉन

असेच म्हणतो ...

लोकांची अंधश्रद्धेवर फारच श्रद्धा आहे असे खेदाने म्हणावे लागते आहे सध्या.
( च्यामायला, काय टाळ्या घेणारे वाक्य तयार झाले. है शाब्बास ;) )

------
छोटा डॉन

पेठकर काका आणि डॉनशी सहमत.

आता स्वेटर घालत आहेत, उकाड्यात, तापमान गेलं ३५ अंश से.च्यावर की मग काय हो करणार असा एक प्रश्नही डोकावून गेला.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

शेखर

>>तापमान गेलं ३५ अंश से.च्यावर की मग काय हो करणार

त्या साठी मधु सप्रे शी कन्सल्ट करणार आहेत :)

शेखर

माझ्या माहिती नुसार सप्र्यांच्या मधुला थंडीचा त्रास नाही आहे.

कोलबेर

अशा श्रद्धेपायी उद्या एखादा, रोज रोज मोदक, पेढे इत्यादी खाणार्‍या गजाननाचा डायबेटीससुद्धा चेक करुया म्हणेल.

मोदक पेढे फक्त स्वीट डिश (डिझर्ट) म्हणून खातात बाप्पा. त्यांचा मूख्य आहार अतीशय सात्विक असा दुर्वांचा आहे.

रोज जेवणात फक्त गवत खाल्ल्यानंतर कितीही मोदक पेढे खा तुम्हालाही मधुमेहाचा त्रास होणार नाही.

'बाकी हे लोक उद्या बाप्पाचे वजन वाढले म्हणुन ट्रेडमिल आणायला देखिल कमी करणार नाहीत' असे म्हंटले तर मात्र पटेल बॉ.

आजानुकर्ण

बाप्पाचा बॉडी मास इंडेक्सही तसा धोकादायक असावा. विशेषतः लंबोदर वगैरे असल्यामुळे अधिकच.

विनोदाची बाब अशी की गणपती आणि आमीर खान दोघांकडेही आदराने पाहिले जाते. हे वैचारिक गोंधळाचे लक्षण मानावे लागेल.

आपला
(८ प्याक) गझनी आजानुकर्ण

कोलबेर

अरे हो की..

चला ह्यावर्षी गणेश उत्सवात कुठल्यातरी मंडळाने २१ प्याक वाला गझनी रुपातील बाप्पा बसवला नाही म्हणजे मिळवली.

(सुनील गावसकर रुपातील ब्याट हातात घेतलेली बाप्पाची क्यूट मुर्ती बघीतलेला) कोलबेर

एकलव्य

चला ह्यावर्षी गणेश उत्सवात कुठल्यातरी मंडळाने २१ प्याक वाला गझनी रुपातील बाप्पा बसवला नाही म्हणजे मिळवली.

गझनीच्या रूपातील १० गणपती मिळाले नाही तर सांगा...

उघडाबंब गणपती आवडणारा - एकलव्य

सुनील मोहन

आता उद्याचा फोटो "गणरायांना थंडीमुळे सांधे आखडल्याने
महानारायण तेल चोळताना" असा येऊ नये म्हणजे मिळवली.

सोनम

"माणसात देव पहा "
हे फक्त म्हणायचे असते.प्रत्यक्ष कोणीही पुढे येत नाही.एखाद्याला मदत करणे हे त्याच्या मनातही येत नाही.
देवावर श्रद्धा असावी. पण अंधश्रद्धा नसावी

लिखाळ

मूर्तीपुजे मध्ये मूर्तीमध्ये देव आहे असे मानतात. अनेक भक्तांची अशी श्रद्धा असते. लोक देवाला नैवेद्य दाखवतात तो याचसाठी. कोणी देवाशी बोलते तर कुणी त्याने नैवेद्य खावा म्हणून हटून बसते. देवाच्या मूर्तीला रिज चांगले कपडे घातले जातात. उत्सवाच्या काळात भरजरी कपडे कौतूकाने घालतात.
माझ्या ओळखीतल्या एक आजी खूप श्रद्धाळू आहेत. त्या सुद्धा थंडीमध्ये त्यांच्या देवघरातल्या देवासाठी लहान लहान कपडे शिवतात. ही सर्व भक्तीची अभिव्यक्ती आहे. तीच्याशी आपण स्वतःला सहानुभूत करुन घेऊ शकलो नाही तर नाही.
सगुण उपासनेतली ही फार मोठी मौज आहे. आणि सगुण उपासक ती मौज भोगतात.

समाज सेवेची अपेक्षा मोठ्या संस्थांकडून ठेवावीच. आणि त्यांनी समाजसेवा कराविच. पण स्वेटरचा आणि त्या सेवेचा तत्काळ संबंध जोडू नये असे मला वाटले.

समाजातल्या काही रूढी ज्यांचा वास्तविक समाजाला उपयोग होणे आपेक्षित आहे पण तो होत नाही, त्याबद्दल एक कविता.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

छोटा डॉन

उपासनेतले "सगुण उपासनेचे" स्थान नि:संशय महत्वाचे आहे, हा वादाचा विषय नाहीच. पण ह्या सगुण उपासनेच्या नावाखाली कोणकोणते अंधश्रद्धाळु न पटणारे प्रकार ( वास्तवीक पाहता मला इथे "चाळे" हा शब्द वापरायची फार इच्छा होते आहे, पण असो.) चालणार हे तर जरा कळुदेत.
देवाच्या मुर्तीलाही भावना असतात हे मानुन त्याची मनोभावे पुजा करुन त्याच्या पाठिंब्याच्या विश्वासावर आपले कार्य करत राहणे ही "श्रद्धा" पण त्याच देवाच्या मुर्तीला कुठे दुध पाजणे, स्वेटर घालणे, थंडाव्यासाठी चंदनलेप चढवणे, रक्त येत असल्याची बोंबाबोंब करणे, मुर्ती रडत असल्याच्या बाता मारणे ह्याला स्पष्ट "अंधश्रद्धा" म्हणायला हवे. जर हे प्रकार जाणुनबुजुन माहिती असताना उघड्या डोळ्याने घडात असतील तर ह्याला "ढोंगीपणा" म्हटले तर चुक ते काय ???

स्वतःला देवाचे अवतार मानणारे बुवा, बाबा, अम्मा, संत, बापु व इतर जे असतील ते जेवढे आमच्या डोक्यात जातात तेवढेच मुर्तीला असले "भोग" चढवणारे आमच्या डोक्यात जातात, किंबहुना थोडे जास्तच.

सगुण उपासना जर म्हणत असाल तर पंढरपुरला देवाच्या उपरणे, रुक्मीणीच्या साड्या, कोल्हापुरात देवीच्या साड्या ह्या "हजारो रुपयांच्या" किमतीने नंतर विकल्या जाणे हे कशाचे लक्षण आहे ? आम्हाला ह्यात स्पष्त लोकांच्या भावनांशी खेळुन त्यांना लुबाडण्याची शुद्ध "हलकट धंदेवाईक वॄत्ती" दिसते, हा शुद्ध श्रद्धांचा बाजार मांडला आहे. ह्या विषयावर कितीही लिहले तरी कमीच.

असो.

आमचा परमेश्वर काहीही न मागणारा तो जगनियंता, व त्याचे दुत सरळ साधे "संत गाडगेबाबा" , बाकी सगळा ढोंगाचा बाजार हो ...!

------
छोटा डॉन

लिखाळ

'भावनांचा बाजार' हा विरोध करण्यातला मुद्दा योग्य आहे.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

दिपक

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील धुसर सीमारेषा हळुहळु मिटत चालली आहे याचे वाईट वाटते.

सहमत!

पण विजय श्रध्देचाच होतो बहुतेक. मागे शिर्डीच्या साईबाबांना सोन्याचे सिंहासन द्यावे ह्यावरही अनेंकानी प्रश्न उपस्थित केले होते. पण सिहांसन आलेच.

मलातरी देवाला २०-२५ रुपयांचे फुल नारळाचे ताट दाखवण्यापेक्षा देवळाच्या बाहेर बसलेल्या एखाद्या गरिब भिकाऱ्याला ५ रुपये देण्यात धन्यता वाटते.

सगुण उपासनेत निर्गुण ईश्वराला मुर्तीच्या रुपात पाहणं/शोधणं ह्यात काहीच गैर नाही. तसेच, तुम्ही दिलेल्या उदाहरणातील आजींची श्रद्धा/अंधश्रद्धा त्यांच्या पुरतीच सिमित आहे. इथे, सारस बागेतील गणपतीला मानवी पातळीवर आणून, त्याला नसलेल्या ऐहिक गरजा अधोरेखित करून, त्या पुरविण्याचे कोडकौतुक, अशिक्षित आणि अंधश्रद्धाळू भक्तांना आयुष्यातील मूलभूत परिपक्वतेपासून दूर लोटणार्‍या ठरतात आणि मलातरी वाटते हे पाप आहे.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

लिखाळ

त्या पुरविण्याचे कोडकौतुक, अशिक्षित आणि अंधश्रद्धाळू भक्तांना आयुष्यातील मूलभूत परिपक्वतेपासून दूर लोटणार्‍या ठरतात आणि मलातरी वाटते हे पाप आहे.
छान शब्दांत आपण विरोधामागचे कारण दिलेत. मी आपल्याशी सहमत आहे. लोकांना भक्त बनवणारे संत आणि भक्तिभावाचा बाजार करणारे लोक यातला हा फरक आहे. आपले म्हणणे बरोबर.

सारसबागेतल्या या उदाहरणाने विषय निघाला या गणपतीबाबतचे सारसबाग संस्थेचा असा उद्देश नसेल तर चांगले होईल.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

मदनबाण

अरे व्वा..गणपती बाप्पाला स्वेटर ..बाप्पा अगदी मस्त दिसतो.,,,जेव्हा गणेश उत्सवात गणपती आणतात तेव्हा त्याला फेटा,,अंगावर शाल(किंवा एखादे रेशमी वस्त्र) घालुन आणतात..असेही प्रकार मला फार आवडतात..
भक्ताच्या भक्तीला कुठलीच सिमा नसते..ज्या प्रमाणे आपण आपली काळजी घेतो त्या प्रमाणेच आपण आपल्या देवाची काळजी घ्यावी ही भावनाच किती सुंदर आहे...

(गजाननाचा दास)
मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

छोटा डॉन

मलासुद्धा या प्रकारांना शक्य तसा, शक्य तितका, शक्य तिथे "विरोध" करायला फार आवडते.
इनफॅक्ट गणपतीच मला अशी बुद्धी देतो अशी माझी "श्रद्धा ( शब्द फार महत्वाचा आहे )" आहे.
असो.

भक्ताच्या भक्तीला कुठलीच सिमा नसते..ज्या प्रमाणे आपण आपल्या देवाची काळजी घेतो त्या प्रमाणेच आपण आपल्या आसपासच्या खरचं गरजु असलेल्या जनतेची अथवा मुक्या जीवाची काळजी घ्यावी ही भावनाच किती सुंदर आहे...

------
छोटा डॉन

आपण आपल्या आसपासच्या खरचं गरजु असलेल्या जनतेची अथवा मुक्या जीवाची काळजी घ्यावी ही भावनाच किती सुंदर आहे...
११०% सहमत.

माणसातलाच देव बघायला शिकवतात, सांगतात त्यातून काहीतरी बोध घेतला आपण तरी उत्तम.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

आमचे बाप्पा अंमळ गोंडस दिसतायेत हेच खरे! :)

गणपती बाप्पा मोरया!

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

आनंदयात्री

फार सुरेख दिसतोय !!

त्या गणपतीच्या स्वेटरच्या पैश्यावरुन गप्पा हाणण्यापेक्षा आपण दिसात २ सिगारेटी कमी ओढल्या तर लै भिकार्‍यांना आधार मिळेल असा माझा दुर्दम्य विश्वास आहे. आणी मी दिलेल्या टॅक्सच्या पैश्यातुन तो स्वेटर आलेला नाही हेही मला माहित आहे.

गणेशोत्सवात तर याहुन कितीतरी पट खर्च होतो, तो ही बंद करावा काय ?

परंतु, त्या गणपतीच्या स्वेटरच्या पैश्यावरुन गप्पा हाणण्यापेक्षा आपण दिसात २ सिगारेटी कमी ओढल्या तर लै भिकार्‍यांना आधार कसा मिळेल हे मात्र कळले नाही!

असो,

(आयुष्यात प्रथमच आनंदयात्रीशी सहमत असणारा) टिंग्या!

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

आनंदयात्री

लिहण्यात चुक झाली .. भावनावेगात नीट टंकले गेले नाही.
दुसर्‍यांना सल्ले देण्यापेक्षा २ सिगारेटी कमी ओढुन ते पैसे समाजकार्यासाठी वापरावे असे म्हणायचे होते. असो.

छोटा डॉन

माननीय आनंदयात्रींनी इथे उपस्थीत केलेला मुद्दा अप्रस्तुत आहे, काय संबध त्याचा ह्याच्याशी ?

हे पहा गणपतीला स्वेटर घालणे ही क्रीया एका मोठ्ठ्या जनसमुदायाला "प्रेरीत" करते असे आमचे मत आहे आणि त्यात आत्तापर्यंतच्या आमच्या उण्यापुर्‍या पुर्वायुष्यातुन जे काही पाहिले/ वाचले त्याच्या बेसीसवर ही क्रीया पार शहरापासुन ते लहानतल्या लहान गावापर्यंत अनाठायी पसरु शकते असा आमचा अंदाज आहे.
जेव्हा कुठल्या प्रसिद्ध मंदीरात / धर्मस्थळात एखादी गोष्ट "भावना" ह्या नावाखाली केली जाते तेव्हा त्याच्य देवाच्या इतर लहान लहान गावात असणार्‍या मंदिरातसुद्धा ह्याच कॄतीची लगेच कॉपी करुन तसेच वागण्याचा प्रयत्न अनेकदा दिसला आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर जर कुठल्या प्रसिद्ध मंदिरात देवाला एखादे सोन्याचे सिंहासन अथवा रत्नजडीत मुकुट केला गेला व त्याची अशीच प्रसिद्धी केली गेली तर त्याचाच परिणाम म्हणुन गावोगावी तुम्हाला मंदीरात तशीच सिंहासने आपापल्या शक्तीनुसार मग सोन्याचे जमत नसेल तर चंदनाचे का होईना करुन वाहिलेले दिसते. मुकुट / हाराच्या बाबत तेच आहे, अगदी रत्नजडीत नसला तरी कमीत कमी चांदीचा तरी केला जातोच.
मग ह्या अनाठायी हट्टापायी अनेक वेळा "सक्तीची वर्गणी" काढली जाते ....
मी म्हणातो ते खोटे आहे का ?
किती उदाहरणे दाखवु तुम्हाला ?
ह्या सोन्याच्या सिंहासनाने अथवा रत्नजडीत हाराने/मुकुटाने देव खुष होतो अशी तुमची भावना आहे का ?

आमचे म्हणणे एकच, भावनांचे "अवडंबर" नका माजवु, जे आहे ते मनापासुन करा, थाटाची गरज नाही, ते देवापर्यंत जरुर पोहचेल ....

सिगारेटचे म्हणाल तर तुमची किंवा आमची ही कृती कुणाला "प्रेरीत" करण्याची शक्यता तशी कमीच आहे. हा मुद्दाच वेगळा आहे. मग ह्या "सिगारेटी" स्वतःच्या पैशातुन येवो अथवा आपल्या भरलेल्या करातुन येवो. मला फक्त एवढेच सांगा की जर आपल्या २ सिगारेटी कमी / जास्त ओढण्याची अशीच प्रसिद्धी केली तर किती लहान लहान गावातील तरुण "प्रेरीत" होऊन त्याच्यासारखीच कॄती करतील ?
तसेही खरचं ह्या २ सिगारेटींचा पैसा "गरिबांपर्यंत" पोहचणार असेल अशी तुम्हाला खात्री असेल व तसे तुम्ही आम्हाला आश्वासन देत असाल तर आम्ही वचन देतो की "दरमहा तेवढा किंवा त्यापेक्षा थोडा जास्तच पैसा" आम्ही जरुर तुमच्याकडे पोहचवु, त्याची योग्य विल्हेवाट आपण लाऊ शकाल अशी आपल्याला खात्री आहे काय ?

प्रश्न एका "मोठ्ठ्या जनसमुदायाला प्रेरीत करणार्‍या गोष्टी" चाच आहे. फक्त ह्या मुद्द्यासाठीच आम्ही विरोध करत आहोत.

------
छोटा डॉन

माझ्यामते प्रस्तुत चर्चासत्राचा विषय हा सोन्याचे सिंहासन वा रत्नजडीत हारासंबंधी नसुन स्वेटर घालण्याबद्दल आहे असे वाटते!

- टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

छोटा डॉन

आम्ही एक "प्रक्रीया" सांगितली.
जे मागे "सिंहासन / हारासंबंधी" घडले ते आज "स्वेटर" बद्दल घडु शकते अशी आम्हाला भिती वाटते.

बाकी, १-२ ओळीत काहीही विचारुन चर्चेचा रोख बदलु नये ही विनंती. मुद्द्याचे व मुद्देसुद लिहल्यास आनंद होईल.
उगाच २ ओळीत काहीतरी "विसंगत" बोलुन रोख बदलु नका ...
माझा प्रतिसाद नीट वाचला असता तर वरील प्रश्न आपल्याला पडला नसता ही खात्री आहे.
असो.

------
छोटा डॉन

आपल्या प्रतिक्रियेत ५०%पेक्षा जास्त मुद्दे "सिंहासन / हारासंबंधी" असल्याने आमची गल्लत झाली असावी बहुदा! ;)

एनीवे, स्वेटरची फॅशन निघाली तरी चांगलच आहे की......त्या कारणाने भारतातील लोकरी व्यवसायाला अन् पर्यायाने वस्त्रोद्योगाला, मेंढपाळांना, विणकरांना चांगले दिवस येतील्.....
आणि विशेषत: लोकर ही सोन्याएवढी महाग नसल्याने स्वेटर विणण्याचा खर्च कमीत कमी येईल अन् त्यायोगे सामान्य जनतेच्या पाठी लागलेल्या सक्तीच्या वर्गणीचा ससेमिरा कमी/बंद होईल!

आहे की नाही नामी युक्ती?

- (युक्तीबाज) टिंग्या

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

सखाराम_गटणे™

आणि विशेषत: लोकर ही सोन्याएवढी महाग नसल्याने स्वेटर विणण्याचा खर्च कमीत कमी येईल अन् त्यायोगे सामान्य जनतेच्या पाठी लागलेल्या सक्तीच्या वर्गणीचा ससेमिरा कमी/बंद होईल!
कदाचित मंदीने त्रस्त लोकांना स्वेटर विणण्याचे काम मिळेल.

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

सखाराम_गटणे™

सहमत

----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

आनंदयात्री

व्यक्तिगत आरोप झाल्यामुळे प्रतिक्रिया देत आहे. माफ करा संपुर्ण प्रतिक्रिया वाचु शकलो नाही, पण पहिल्या ओळीत माझे नाव वाचल्याने उत्तर देत आहे.

>>त्या गणपतीच्या स्वेटरच्या पैश्यावरुन गप्पा हाणण्यापेक्षा आपण दिसात २ सिगारेटी कमी ओढल्या तर लै भिकार्‍यांना आधार मिळेल असा माझा दुर्दम्य विश्वास आहे.

हे मी माझ्याबद्दल बोलत होतो, आपणाबद्दल नाही, गैरसमज नसावा.

विसोबा खेचर

स्वेटर घालून बाप्पा मोठा गोड दिसतो आहे! :)

लालबागच्या राजाचा विजय असो..!

तात्या.

आनंदयात्री

तात्या तुमच्या मतांशी सहमत आहे. तसेच बरेचसे प्रतिसाद वाचुन आमच्या बाप्पाची खिल्ली उडविली आहे असेही वाटले हे ही नमुद करु इच्छितो.

-
(मिपावरील मर्यादित व्यक्तिस्वातंत्र्याचे मोल जाणणारा)

आनंदयात्री

सदस्य
मिसळपाव डॉट कॉम

धम्मकलाडू

धन्य जाहलो‍. हिवाळ्यात स्वेटर तर उन्हाळ्यात काय घालतात? बर्मुडा का? (कुणालातरी आता अर्धी चड्डीचा उल्लेख होईल असे वाटले ना? खरंय की नाई मंडळी...आं आं आं....)

बाप्पा माफ करायचं बरं का....
() धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)

देवानेसुद्धा काळाबरोबर बदलले तर बिघडले कुठे? उलट बदललेच पाहिजे!

- झुरळ मारणारा क्षत्रिय.

बट्टू

स्वेटर देशी असतो की विदेशी हो. विदेशी म्हणला जावा कारण त्याचे नाव स्वेटर आहे. ;-)

मग बाप्पाच्या बड्डेला केक पण कापायचा का?

सगुण भक्तीचा हॅप्पी बड्डे!

झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)

मग बाप्पाच्या बड्डेला केक पण कापायचा का?

कापूया की! फक्त एकच अडचण आहे - केकवर मेणबत्त्या किती लावायच्या त्याचा नक्की आकडा कोणी देऊ शकेल काय?

(एवढ्या मेणबत्त्या लावल्यावर ग्लोबल वॉर्मिंगमध्ये किती भर पडेल हा स्वतंत्र चर्चेचा / अभ्यासाचा विषय होईल.)

- झुरळ मारणारा क्षत्रिय.

अवलिया

सगुणोपासना मानुन कुणाला जर त्या मुर्तीला चंदन, स्वेटर वगैरे घालावेसे वाटत असेल आणि ते स्वतःच्या पैशाने करत असतील तर त्यांना तो अधिकार आहे आणि असावा. आपल्या पैशांचा उपयोग कुणी कसा करावा हे आपण कसे सांगणार? तो व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होईल आणि त्यातही तशी समाजोपयोगी कामे करुन वर मुर्तीसाठी कुणी काही करत असेल तर त्याला करु द्यावे. पण एखाद्याने समाजकार्यच करावे, असे सांगुन त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडीचे उत्तरदायित्वाचा ठेका घेवु नये.

तेव्हा मला असे वाटते की आपण त्या व्यक्ती अथवा संस्थांच्या निर्णयात जर पटत नसेल तर सहभाग घेवु नये, आपल्याला पटत नसेल तर सगुणोपासना करु नये पण त्यांनी काय करावे हे सुचवण्याचा आपल्याला अधिकार नाही. कारण ते चुक आहेत असे अजुन सिद्ध झालेले नाही. त्याचबरोबर आपणच बरोबर आहोत हे ही सिद्ध झाले नाही. कारण सगुणोपासना मानणारे व त्याकरता त्यांच्या मनाला रुचेल ते करणारे ते जगातील शेवटचे मानव नसतील हे नक्की.

तेव्हा त्यांनी सगुणोपासना करु नये, अगर करायची असेल तर अमुकच करावे, तमुकच करावे असे सुचवणे हे त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच करणारे ठरेल. जे घटनेनुसार चुक आहे. अर्थात आपण सगळे घटनेचा आदर करतो असेच मी समजतो.

आता ज्यांना यात लुबाडणे वगैरे आहे असे वाटते त्यांनी कृपया सत्यम च्या राजुने तसेच इतर कंपन्यांनी लावलेले दिवे पहावे. माझ्यामते तथाकथित भोंदु बाबा आणि कॉरपोरेट लिडर आणि कंपन्या ह्या तत्वतः एकाच पातळीवर आहेत.

हे माझे वैयक्तिक मत आहे तसेच याला वैयक्तिक घेवु नये.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

तो व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होईल आणि त्यातही तशी समाजोपयोगी कामे करुन वर मुर्तीसाठी कुणी काही करत असेल तर त्याला करु द्यावे.

कुणाला काही करायचं असेल तर थांबवत नाही आहे कुणीही, पण एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल तर तिचं उदात्तीकरण होऊ नये असा प्रयत्न होत आहे. आणि असा प्रयत्न करणार्‍यांना चुकीचं म्हणताना अभिव्यक्तीस्वातंत्र्याचं नाव काढणं हा तर चक्क दुतोंडीपणा वाटतो.

सगुणोपासना करणे ही व्यक्तिगत बाब असेल पण ती चारचौघांसमोर करताना ती चारचौघं कसा विचार करतात, त्या चारचौघांची परिस्थिती काय आहे याचाही विचार व्हावा. आणि तो होत नसेल तर धार्मिक बाबी व्यक्तिगत रहात नाहीत. शेतं पाण्याअभावी वाळून जात आहेत, तोंडात टाकायला पाण्यासाठी चारचार मैल रपेटी कराव्या लागत आहेत पण सगुणोपासना करण्यासाठी आम्ही शहरात स्वच्छ, नळाचं, पाणी वापरणार, जे शेवटी समुद्रात, अर्थात वाया जाणार, यात भारतीयाला घटनेने दिलेल्या समानत्त्वाचा लोप होत नाही का?

आता ज्यांना यात लुबाडणे वगैरे आहे असे वाटते त्यांनी कृपया सत्यम च्या राजुने तसेच इतर कंपन्यांनी लावलेले दिवे पहावे. माझ्यामते तथाकथित भोंदु बाबा आणि कॉरपोरेट लिडर आणि कंपन्या ह्या तत्वतः एकाच पातळीवर आहेत.
त्यात किमान धर्माच्या नावाखाली उदात्तीकरणतरी होत नाही. तत्त्वत: विचार करतासुद्धा या दोन गोष्टी एका पातळीवर दिसत नाहीत.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

अवलिया

कुणाला काही करायचं असेल तर थांबवत नाही आहे कुणीही, पण एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल तर तिचं उदात्तीकरण होऊ नये असा प्रयत्न होत आहे. आणि असा प्रयत्न करणार्‍यांना चुकीचं म्हणताना अभिव्यक्तीस्वातंत्र्याचं नाव काढणं हा तर चक्क दुतोंडीपणा वाटतो.

यात कुठलाही दुतोंडीपणा नाही हे प्रथमतः सांगुन माझा प्रश्न हा की आपण जे म्हणता की एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल तर तिचं उदात्तीकरण होऊ नये असा प्रयत्न होत आहे तर ही गोष्ट चुक आहे हे ठरवण्याचा अधिकार कुणी कुणाला कसा दिला? कधी दिला? आपण आपले मत मांडले हे क्षणभर जर गृहित धरले तर त्याचप्रमाणे मी पण माझे मत मांडले यात दुतोंडीपणाचा प्रश्न येतच नाही.

सगुणोपासना करणे ही व्यक्तिगत बाब असेल पण ती चारचौघांसमोर करताना ती चारचौघं कसा विचार करतात, त्या चारचौघांची परिस्थिती काय आहे याचाही विचार व्हावा. आणि तो होत नसेल तर धार्मिक बाबी व्यक्तिगत रहात नाहीत.

धर्माचरण हे जितके व्यक्तिगत आहे तितकेच ते सामाजिक पण आहे. देवळात चार मंडळी एकत्र जमुन काही गोष्टी करत असतील तर ते व्यक्तिगत रहात नाही. सामाजिक अभिसरणाचे एक प्रमुख अंग म्हणुनच देव आणि देवळांचा उपयोग झाला आहे, होत आहे आणि होणार आहे. त्यामुळे इथे व्यक्तिपेक्षा समाजाचाच विचार करणे गरजेचे आहे.

शेतं पाण्याअभावी वाळून जात आहेत, तोंडात टाकायला पाण्यासाठी चारचार मैल रपेटी कराव्या लागत आहेत पण सगुणोपासना करण्यासाठी आम्ही शहरात स्वच्छ, नळाचं, पाणी वापरणार, जे शेवटी समुद्रात, अर्थात वाया जाणार, यात भारतीयाला घटनेने दिलेल्या समानत्त्वाचा लोप होत नाही का?

हे केवळ वड्याची साल वांग्याला लावण्याचा प्रकार आहे. समुद्राला सगुणोपासनेमुळे तीर्थ बनुन (वाया या शब्दाला आक्षेप) जावुन मिळणा-या पाण्याचा एकुण वाटा किती? अगदी क्षुल्लक ! मोजण्याचा खर्चच अधिक येणार!!

त्यात किमान धर्माच्या नावाखाली उदात्तीकरणतरी होत नाही. तत्त्वत: विचार करतासुद्धा या दोन गोष्टी एका पातळीवर दिसत नाहीत.

या दोन गोष्टी एका पातळीवर समजण्याचे स्पष्टीकरण -

वरती डॉन म्हणतात
सगुण उपासना जर म्हणत असाल तर पंढरपुरला देवाच्या उपरणे, रुक्मीणीच्या साड्या, कोल्हापुरात देवीच्या साड्या ह्या "हजारो रुपयांच्या" किमतीने नंतर विकल्या जाणे हे कशाचे लक्षण आहे ? आम्हाला ह्यात स्पष्त लोकांच्या भावनांशी खेळुन त्यांना लुबाडण्याची शुद्ध "हलकट धंदेवाईक वॄत्ती" दिसते, हा शुद्ध श्रद्धांचा बाजार मांडला आहे. ह्या विषयावर कितीही लिहले तरी कमीच.

याच चालीवर

खोटे आकडे दाखवुन जनतेच्या डोळ्यात (गुंतवणूकदारांच्या) धुळ फेकुन शेअर्सच्या किंमती वाढवणे हे कशाचे लक्षण आहे ‍? आम्हाला ह्यात स्पष्ट लोकांच्या विश्वासाशी खेळुन त्यांना लुबाडण्याची शुद्ध "हलकट धंदेवाईक वॄत्ती" दिसते, हा शुद्ध विश्वासाचा बाजार मांडला आहे. ह्या विषयावर कितीही लिहले तरी कमीच.

आता बघा आले तत्वतः एकाच पातळीवर?

बर आपले धर्माच्या उदात्तीकरणाविषयी तर माझे म्हणणे असे की जर कुणाला देवीला नेसलेली साडी आपल्या घरात असावी असे वाटले आणि ती त्याने स्वतःच्या पैशाने खरेदी केली आणि घरी ठेवली तर आपले काय नुकसान आहे ?

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

मुक्तसुनीत

फोटो पाहिला. अम्मळ गंमत वाटली.

छोटा डॉन यांची प्रतिक्रिया वाचली. त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा रोख पटला. "माणसात देवाला शोधा", "सर्व्हीस टू म्यान इज सर्व्हीस टू गॉड" हे सर्व पटण्यासारखेच. पण प्रस्तुत प्रसंगीचा त्यांचा उद्रेक मला अनाठायी वाटला , अस्थानी वाटला. मूर्तीला स्वेटर घालणे अतार्किक आहे का ? हो. त्यामुळे प्रचंड नासाडी झाली का ? नाही. कुणाचे नुकसान ? कोट्यावधींचा चुराडा ? कुणाला कसला त्रास ? करदात्यांच्या पैशाचा अपव्यय ? नाही. मग नक्की काय टोचते आहे ?
गरीबांबद्दलची कणव अगदी योग्य , पैसा-धान्य-ऊर्जा-वेळ यांची नासाडी होत असेल तर त्याचा निषेध योग्य. भावनेखातर कुणी काही छोटेसे केले तर त्याबद्द्लचा तीव्र निषेध अयोग्य.
पुन्हा एकदा लिहितो : मला डॉन यांच्या विचारांचा रोख पटला ; परंतु त्यांनी वापरलेले शस्त्र म्हणजे घरच्या म्हातारीला काळ झाल्यासारखे असे मला वाटले.

विकास

मला डॉन यांच्या विचारांचा रोख पटला ; परंतु त्यांनी वापरलेले शस्त्र म्हणजे घरच्या म्हातारीला काळ झाल्यासारखे असे मला वाटले.

मुक्तसुनीत आणि तत्सम इतर प्रतिसादांशी (लिखाळ, आनंदयात्री, सुनील वगैरेंशी) सहमत.

गणपती हे असे एक दैवत आहे ज्याला अनेक रुपाने आणि अनेक पद्धतीने सजवायला तमाम भाविकांना आवडते. म्हणूनच गणपती अनेक पद्धतींनी आणि अनेक प्रकारात चित्रीत केलेला दिसतो आणि तेच त्याच्या मुर्तीसंबंधात आहे. तसेच कुणाला तरी वाटले की त्याला स्वेटर घालावा. आणि नेहमीप्रमाणे त्यातही गणपती गोंडसच दिसतो असे मला आणि इतर अनेकांना वाटते.

आता त्याला स्वेटर घालण्याऐवजी ते पैसे रस्त्यावरील भिकार्‍याला देणे योग्य झाले असते असे म्हणणे यात एक कुठल्याही बाजूने माहीती नसताना असा कारण नसताना गैरसमज करून तेच बरोबर समजून त्यावर टिका करणे हे न पटण्याजोगे आहे. म्हणजे असे की जर तो स्वेटर एखाद्या व्यक्तीने (भक्ताने) दिला असला तर तो/ती भक्त एरव्ही काही दानधर्म करतच नाहीत असे यात विनाआधार गृहीत आहे. तसेच जर तो स्वेटर सारसबाग गणपती देवस्थान संस्थांनाने घातला असला तर देव्स्थान फक्त इतकेच करते असे त्यात गृहीत आहे. आता, मला व्यक्तीबद्दल माहीत नाही पण ते येथील कोणाबद्दलच माहीत नाही की कोण नक्की भिकार्‍याला अथवा इतर संस्थांना दान करते ते, स्वता:ची ऐहीक जीवनपद्धती काय ठेवते ते आणि कर देण्यापासून सर्व नियम न चुकवता/लपवता पाळते ते... :-) मात्र उत्सुकते पोटी मी (थँक्स टू गुगल!) जालावर शोधले तर, सारसबाग देवस्थान ट्रस्ट चे संकेतस्थळ मिळाले त्यातील काही माहीती देतो. देवस्थान हे सार्वजनीक असल्याने आणि तसेच पुण्याचा कलेक्टर हा पदसिद्ध ट्रस्टी असल्याने (पहा, आता कलेक्टर कोणत्याही धर्माचा असू शकतो. असे इतर धर्मीयांच्या देवस्थानांसंदर्भात होऊ शकेल असे वाटते का?) त्यांचे व्यवहार आधीपण जाहीर होतेच आणि माहीती हक्काने अधिक आणि सविस्तर माहीती मिळू शकेल ती गोष्ट वेगळीचः

The trust has been permitted to run educational institutions, propagate Sanskrit and Hindu knowledge, establish hospitals, community centres, libraries, give educational and medical aid to the needy, make donations, establish Yoga learning centres, run orphanages etc.

थोडक्यात या एका स्वेटरसंदर्भात चालू केलेली टिका अनाठायी वाटते. मग तसे दारीद्र्य काढायचेच असेल तर साम्यावादातील तत्वे "खर्‍या अर्थाने" आमलात आणली तरच होऊ शकेल. म्हणजे अर्थातच प्रत्येकाला समान जीवनपद्धतीच स्विकारावी लागेल मग सर्व साधनसंपत्ती समान वाटता येईल. तो पर्यंत तुम्हाला कशात आनंद वाटतो ते करणे पण अयोग्य. मग तो गणपतीला स्वेटर घालणे असोत अथवा स्वतःला बर्म्युडा घालणे असोत... कोणाची तयारी आहे या साठी? साम्यवाद्यांचीपण नसते तर तुम्ही आम्ही काय...

असो. अवांतर - जाता जाता एक विनोद आठवला तो सांगतो: यात सिगरेट ओढणार्‍यांचे एका अर्थी समर्थन आहे. मी स्वतः सिगरेट ओढत नाही आणि त्याचे समर्थन कधी करावे असे वाटत नाही. तेंव्हा माझ्या लेखी केवळ या वादातील विषयाशी कुठेतरी साम्य वाटले म्हणून लिहीलेला केवळ विनोद म्हणून धरावा (आणि सिगरेटी फुकत बसू नये! ;) ) -

दोन लहानपणचे मित्र अनेक वर्षांनी एका मोठ्या हॉटेलच्या पुढच्या प्रशस्त आवारात भेटतात. खूप वर्षांनी भेटल्यामुळे शाळेतील, लहानपणच्या आठवणींवर बोलणे सुरू होते. मजा आठवायला लागतात. त्यात एकाच्या लक्षात येते की दुसरा अगदी "चेनस्मोकर" झाला आहे. तसे त्याला लहानपणीच व्यसन लागले होते... म्हणून तो मित्रत्वाच्या नात्याने त्याला विचारतो की अरे लहानपणी लागलेले व्यसन अजून सोडवत नाही का? हा मित्र उत्तरतो, "नाही!" मग बिनस्मोकर त्याला उपदेशाचे डोस पाजतो की, " जर तू अमुक वयापासून आत्तापर्यंत, इतक्या सिगरेटी ओढल्यास, त्यात इतके पैसे, कदाचीत थोडेफार आजारपणात पैसे खर्च केले असशील, ते सर्व वाचून, बचतीत घालून त्या व्याज आणी मुद्दलातून तुला एखादे घर बांधता आले असते..." आमचा चेन स्मोकर मित्र आणि त्याचे मग खालील संवाद होतातः

"तू कधी कुठले व्यसन केलेस का?"
"नाही"
"तुझे मग इतके पैसे वाचून, तुझे पण तू म्हणतो तसे घर झाले असेल..."
"अरे नाही रे, तसे थोडेच शक्य आहे... मी आपले एक उदाहरण म्हणून म्हणत होतो."
"मग किमान तिथे उभी असलेली गाडी तरी तू घेतली असशील"
"नाही रे..."
"ज्या हॉटेलच्या आवारात आपण उभे आहोत ते कोणाचे आहे माहीत आहे का?"
"नाही..."
"त्या हॉटेलचा मी मालक आहे, अर्थात ते माझे आहे. आणि हो, ती गाडी पण माझीच आहे"

:-)

धम्मकलाडू

तसेच जर तो स्वेटर सारसबाग गणपती देवस्थान संस्थांनाने घातला असला तर देव्स्थान फक्त इतकेच करते असे त्यात गृहीत आहे.

हे गृहीतक तुम्ही कसे काय गृहीत धरले? हे म्हणजे संघवाले अर्धी चड्डी घालतात म्हणून ते फक्त इतकेच करतात असे गृहीत धरल्यासारखे आहे.

सारसबागेचा गणपती सार्वजनिक आहे. मिसळपाव हे संकेतस्थळदेखील बहुधा सार्वजनिकच आहे. त्यामुळे ज्यांना हा मुद्दा गंभीर वाटतो त्यांच्यासाठी ही सार्वजनिक चर्चा मुळीच अनाठायी नाही. बाकी तुमचे चालू द्या. बाय द वे तुमचा प्रतिसाद ६०५ शब्दांचा आहे. हघ्या बरं का.

() धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

छोटा डॉन

सर्वात प्रथम आमचे "मुद्द्याचे" मुद्दे पटले हे कळावल्याबद्दल आभार.
बाकी आमच्या अनाठायी उद्रेक वाटणार्‍या भाषेबद्दल म्हणाल तर महाराष्ट्रातल्या एका अतिप्रसिद्ध तिर्थक्षेत्री आयुष्यातल्या काळापैकी जवळपास ७० % काळ आम्ही घालवला असल्याने व आमच्या डोळ्याला दिसणार्‍या "भावनेच्या बाजाराचा" परिणाम म्हणुन हा प्रतिसाद एवढा "कडक" झाला असावा असा एक अंदाज आहे.
बाकी आम्ही जी काही "भक्तीच्या नावखाली ढोंगे" पाहिली आहेत ते आठवुन आपला देश व धर्म नक्की कुठे चालला आहे असे वाटुन कधीकधी खिन्न व्हायला होते.
असो. तो इथे "महत्वाचा" मुद्दा नाही.

त्यामुळे प्रचंड नासाडी झाली का ? नाही.

बरोबर, "प्रचंड" नासाडी नाहीच झाली पण होणारच नाही असे नाही.
उद्या हेच फॅड जर महाराष्ट्रातल्या / देशातल्या कानाकोपर्‍यातल्या गावागावात पसरलेल व सर्व जण हीच कॄती करु लागले तर आपण काय म्हणाल ?
आम्हाला नेमकी हीच त्याची "प्रातीनिधीक सुरवात" वाटली.
ह्या देव आणि श्रद्धांशी निगडीत गोष्टी चटकन पसरतात व माणसे डोळे झाकुन त्याचे अंधानुकरण करतात म्हणुन हा कंठशोष.
उदा : गणपतीने दुध पिल्याचे उदाहरण डोळ्यासमोर नाही का ?
इथे खरचं "नासाडी" झाली हे मान्य नाही का ?

कुणाचे नुकसान ? कोट्यावधींचा चुराडा ? कुणाला कसला त्रास ? करदात्यांच्या पैशाचा अपव्यय ? नाही. मग नक्की काय टोचते आहे ?

बर्‍यापैकी ह्या प्रश्नांचे वरील काही प्रतिसादात उत्तर दिले आहे.
नुकसान : गरिब पोटावर हात असणार्‍या सामान्य माणसाचे.
कोट्यावधींचा चुराडा : सध्या नाही पण भविष्यात जरुर शक्य आहे.
त्रास : शक्य आहे ( गावोगावी जेव्हा सिंहासने अथवा मंदिराला कळस लावण्यासाठी सक्तीच्या वर्गण्या काढल्या जातात तेव्हा त्रास जरुर होतो.)

आता नक्की काय टोचते आहे ?
ह्याचे उत्तर ही एका परंपरेची "प्रातिनीधीक सुरवात" तर नाही ही शंका टोचते. आज साधा स्वेटर घातला आहे, उद्या भावना भानवा म्हणुन रत्नजडीत सोन्याच्या स्वेटरची टुम येणार नाही ह्याची आपल्याला खात्री आहे काय ?
आपल्याला मी सोन्याच्या अथवा त्याचा समावेश असलेल्या वस्त्रांची व ती देवाला अर्पण केले असल्याची किती उदाहरणे दाखवु ?
अगदीच ह्यासारखे ऐकले नाही असेही नाही, आपण सोन्याचे पितांबर / उपरणे / सोवळे ऐकले नाही काय ?
बरं, आता हा साधा स्वेटर आहे म्हणुन ठीक आहे, उद्या टुम निघाल्यावर बडेजावासाठी सोन्याचा स्वेटर असावा म्हणुन "सक्तीची वर्गणी" काढली जाणार नाही ह्याची आपल्याला खात्री आहे काय ? वर्गणी न दिल्याचे परिणाम काय होतात हे आपल्याला माहित असावे अशी अपेक्षा आहे.
हेच टोचते आहे.

भावनेखातर कुणी काही छोटेसे केले तर त्याबद्द्लचा तीव्र निषेध अयोग्य.

आम्ही आधीच पहिल्या प्रतिसादात "आम्हाला श्रद्धा व भावना ह्याचा आदर आहे" हे मान्य केले आहे.
पण भावनेच्या नावाखाली अशा गोष्टी कितपत योग्य आहेत ? उद्या कुणी "कोहीनुर हिरा जडावलेला सोन्याचा स्वेटर" वहायचे ठरवले तर ते भावनेच्या नावाखाली "योग्यच" ठरते का ? हे अनाठायी नाही का ?
ही कल्पनाच आहे पण असे होणारच "नाही" ह्याची छातीठोक खात्री आपण देऊ शकता का ?

बाकी "श्रद्धा आणि भावना ह्यांचा आदर आहेच" आम्हाला ...

जाता जाता :
बप्पा फारच सुंदर दिसत आहे, मात्र तो स्वेटर अनाठायी व अनावश्यक वाटला.
असो.

------
छोटा डॉन

मुक्तसुनीत

भविष्यात कोट्यावधींचा चुराडा होईल , "कोहीनुर हिरा जडावलेला सोन्याचा स्वेटर , सोन्याचे पितांबर / उपरणे / सोवळे " वगैरे गोष्टी ऐकून करमणूक झाली. हे सर्व जेव्हा होईल किंवा याची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा त्याचा निषेध योग्य ठरेल. आजसुद्धा तुम्ही अन्य देवस्थानाच्या बाबतीतल्या बाजाराबद्दल , भपका/पैशाचा अपव्यय वगैरे गोष्टींबद्दल लिहिणे अगदी योग्यच ठरले असते. तुमचा सगळा निषेध (आणि आता ज्याला "थोडा अभिनिवेश" असे म्हणावे लागते) हा अस्थानी ठरतो हेच मला पुन्हा म्हणावेसे वाटते.

बाय द वे , देवाला वेगवेगळी वस्त्रे घालणे , त्याच्यावर दुधा-दह्या-तुपाचा अभिषेक करणे वगैरे वगैरे अपव्ययवजा गोष्टी आजही हजारो देवस्थानांमधे होतातच. हे सर्व पैशाच्या अपव्ययाच्या , गरीबांऐवजी दगडाच्या देवाला देण्याच्या खात्यावर जमा होते हे वेगळे सांगायला नकोच. एका छोट्याशा स्वेटरला सुळी चढवणे थोडे अतार्किक झाले.

छोटा डॉन

मुसुशेठ, कोहीनुरचे सोडा कारण मी ते आतिशयोक्ती म्हणुन लिहले आहे व तसे मी तिथेच स्पष्ट केले आहे.
पण तुम्हाला "सोन्याचे पितांबर / उपरणे / सोवळे " ह्याची किती उदाहरणे दाखवु ? अगदीच ही माहिती आपल्यासाठी नवीन आहे का ?
मग आपण कमीत कमी सोन्याचे कळस / सिंहासन / पायर्‍या ह्याबद्दल ऐकले असेलच ना ?

असो. हा "मुद्दा" चर्चा भरकटवणारा आहे अशी मला शंका येते आहे.

बाकी आमचे लिहणे आता ( समोरच्याच्या नजरेत ) "अभिनिवेशपुर्ण" वाटत असल्याने आम्ही आता ( तात्पुरते ) थांबतो.

आजसुद्धा तुम्ही अन्य देवस्थानाच्या बाबतीतल्या बाजाराबद्दल , भपका/पैशाचा अपव्यय वगैरे गोष्टींबद्दल लिहिणे अगदी योग्यच ठरले असते.

+++++१, सहमत आहे. असा किडा काही तासांपुर्वी डोक्यात आला होता.
पण भावीकांच्या श्रद्धास्थानाला बसणारे संभाव्य धक्के, होणारा विरोध व आधीच ठरलेला "निष्कर्ष" ह्याचा विचार करुन मी हे लिहणार नाही ...
बोलण्यासारखे बरेच आहे, आत्ताच एका मिपाकराशी ह्याबद्दल २ तास चर्चा करुन आलो.
सध्यातरी हे "न पेलणारे / भडक / अभिनीवेशपुर्ण" होईल असे वाटते म्हणुन थांबतो, भविष्यात पाहु ...

बाकी आता आमची "मनापासुन विनाउपचार गणपतीची प्रार्थना " करुन झोपायची वेळ झाली आहे.
उद्या अजुन मुद्दे लिहीन.
गणपती बाप्पा मोरया ...!

------
छोटा डॉन

मुक्तसुनीत

छोटा डॉन ,
व्यक्तिगत रोख टाळूनसुद्धा अगदी खडाजंगी चर्चा घडू शकते हे आपण सिद्ध केले. तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.

घाटावरचे भट

मुळात डॉनरावांनी स्वेटर घालण्याची तुलना गणपती दूध पिऊ लागला या घटनेशी केली हे काही पटत नाही. मूर्तीने दूध पिण्याच्या बातम्या पसरवून चमत्काराच्या नावाखाली अंधश्रद्धा जोपासली जाते, ते निश्चितच चूक आहे. पण देवाच्या मूर्तीला एरवी वस्त्रे चढवतातच त्यात वर स्वेटर घातला तर एवढा गहजब करण्यामागचे कारण लक्षात येत नाही.

राघव

दुसर्‍यांनी काय करावे अन् काय नको हे स्वत:हून सांगणारे आपण कोण? आपण त्यांचे गुरुत्व कसे घेऊ शकतो? ज्याचा त्याचा आपापला मार्ग असतो. हां जर कुणी स्वत:हून विचारण्यास आला तर त्याला आपल्याला योग्य वाटते ते सांगण्याचा आपला अधिकार असेल. अर्थात् त्यातही आपण आग्रही असू शकत नाहीच!! :)

माझी स्वत:ची पद्धत अशी की आराध्य दैवताचीही सेवा करावी अन् लोकांचीही सेवा करावी. कुणी मदत मागण्यास आला तर अव्यवहारीपणा न करता जेवढी शक्य तेवढी करावी. त्यातही मी अशी मदत केली हे लोकांस सांगण्याचा भाव नसावा. असे समजावे की जी काही मदत (पैशा अडक्याच्या स्वरूपात) माझ्या हातून होतेय ती मुळात माझी नाहीच. ज्याला ते दिल्या गेले अथवा ज्याला मदत झाली त्याचेच ते होते. मी फक्त पोस्टमनचे काम करतोय. "दाने दाने पर लिखा है खानेवाले का नाम"!! माझे काम फक्त पोचवण्याचे.

बाकी समाजसेवा, ते करणार्‍या संस्था यांच्याकडे जाण्यापेक्षा जे आपल्याकडून होते ते करण्याच्या मताचा मी आहे. मनस्तापाचा प्रकार स्वत:च कमी होतो असा स्वानुभव आहे!

असो. बाप्पा खरंच अतिशय गोड दिसतोय हे मात्र अगदी खरं!
मुमुक्षु

रेवती

फारच गोड दिसतायत बाप्पा!
मजा वाटली बघून.

रेवती

प्राजु

डॉन्याची प्रतिक्रिया बोलकी आहे.
आज स्वेटर घातला आहे.. उद्या आणखी काहीतरी करतील. कदाचीत उन्हाळ्यात देवाला पोहायची इच्छा झालीये असे म्हणत स्विमिंग सूट घालतील.. देवाला ताप आला आहे असे म्हणून डॉक्टर बोलावून क्रोसिनचा नैवेद्य दाखवतील. झोपलेल्याला जागं करता येतं पण ढोंग करणार्‍याला कसं जागं करणार??
आपण नक्की कुठे चाललो आहोत?? हा प्रश्न यावेळी सतावतो आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चित्रा

मूर्तीला स्वेटर घालावा का नाही - कदाचित घालू नये. गरिबांना दान द्यावा. पण मला वाटते बर्‍याचशा देवळांमध्ये रोजच मूर्तीचे कपडे बदलले जातात - पितांबर, साड्या, शेले इत्यादी. त्यामुळे स्वेटरवरून एवढा गहजब का हे कळले नाही. बाहेर लोकांना रस्त्यावर उकिरड्यात बसून खावे लागते म्हणून आपण घरात जेवणाची टेबले/खुर्च्या आणत नाही का? मग देवळातील अधिकार्‍यांनी देवाला त्यांना हवे तसे नटवले तर बिघडले कुठे?

माझ्या भारतीय डोळ्यांना सवय झालेली असते, म्हणून असेल, पण मला देवळात गेले की प्रसन्न, छान वाटते नीट नटवलेल्या मूर्तीकडे पाहून. आमच्याकडच्या लक्ष्मीच्या देवळात तिला खूपच सुंदर साडी नेसवतात, गणपतीला छान पितांबर नेसवतात, बाकीही सजावट करतात आणि ते बघायला आवडते, प्रसन्न वाटते म्हणून कधीतरी देवळात जाते. भारतात असताना जाते तेव्हा देवळाबाहेरची भिकार्‍यांची रांग पाहून तितकेच वाईट वाटते. पण भिकार्‍यांना पैसे द्यावेत की नाहीत, का अन्न धान्याची मदत करावी, ह्याबद्दल चर्चा झडू शकतात. पण आपल्यापैकी कितीजण ते मनापासून देतात? दिले तर भिकार्‍याचे निदान एका वेळेचे जेवण त्यातून व्हावे एवढे पैसे आपण देतो का? आपल्या आजूबाजूच्या गरिबांना (भिकार्‍यांना म्हणत नाही) त्या खाईत पडून राहावे लागू नये म्हणून आपण किती वेळा हस्तक्षेप करतो?

बर्‍याचदा विरोध हा देवळातील निर्जीव मूर्तींच्या उपासनेत तासनतास आणि पैसे घालवणार्‍या पब्लिकला असतो. असा वेळ घालवावा असे मला व्यक्तीशः वाटत नाही. पण जगात देव असल्याचा पुरावा नाही, त्यामुळे त्याची पूजा करण्यात वेळ/पैसा घालवू नका असे सांगणार्‍यांचा हेतू स्तुत्य असला तरी त्यांचा वेळ नक्की कोठे, कसा जातो आणि रोजचा किंवा वर्षभरातला किती वेळ/पैसा हा समाजोपयोगी कामांवर खर्च होतो, हेही सांगावे. नसल्यास त्यांना ह्या वाचलेल्या वेळाचा वापर करून किती नव्या कला येतात, किती अधिक पुस्तकांचे वाचन झाले आहे, किंवा त्यांचे रोजचे काम अधिक सुंदर, सफाईदार किंवा अधिक पैसे मिळवून देणारे झाले आहे, मनाच्या शांतीसाठी ते काय करतात हेही सांगावे. वाचवलेले पैसे कसे वापरतात हे सांगावे. जर मूर्ती/देवाचे काहीही न करण्यात भले असले तर ते का आहे हे तर कळले पाहिजे असे वाटते. तसेच ह्याआधी भिकार्‍यांना आपण (मी धरून) याआधी वर्षभरात किती वेळा कपडे दान केले आहेत तेही लिहावे. (यावर्षी भिकार्‍यांना नाही, पण भारतातून आलेल्या काही गरजू लोकांना आमच्या जवळील एका संस्थेने थंडीसाठी जॅकेटस पुरवण्याचा घाट घातला, व्यक्तीशः त्यात मीही काही थंडीचे कपडे, कोट दिले.)

हे मी कोणालाही व्यक्तिशः उद्देशून लिहीलेले नाही, त्यामुळे कृपा करून तसे घेऊ नये. हेतू एवढाच आहे की केवळ फॅशन आहे म्हणून एका प्रकारच्या जीवनशैलीला किंवा वागण्यास विरोध करू नये एवढे सांगावे. जर फारच वाटले तर देवळात साड्या घेऊन जाणार्‍यांना व्यक्तीशः विनंती करावी की त्या अमूक एका गरीब बाईला द्याव्यात. भाविक लोकांना किंवा देवळातील अधिकार्‍यांना हसून किंवा तुच्छ लेखून काही साध्य होणार नाही. हा प्रतिसाद अवांतर वाटल्यास काढून टाकला तरी चालेल.

रेवती

चित्राताईशी सहमत.
असे आपण किती गोष्टींवर लक्ष ठेवतो? बाजारात गेल्यावर (किंवा मॉलमध्ये) सहज आवडले म्हणून कापडे घेतले, किंवा कुठलीही वस्तू घेतली तर
(आजकाल हे सर्रास होताना आपण सगळेच जण पाहतो.) कितीवेळा स्वतःला प्रश्न विचारला जातो? मी ही वस्तू का घेतलीये? माझ्याकडे आधीचे पाच शर्टस् असताना सहावा आवडला म्हणून घेतलाय तर आता हा बाहेरच्या गरीबाला द्यायला हवा असा विचार आपण का करत नाही? कारण प्रत्येक गोष्टीत असा विचार शक्य नसतो. तसं म्हणायचं झालं तर पाण्याशिवाय पेयांचे अनेक प्रकार पिणार्‍यांनी
पैसे वाचवले तर एका गरीबाचं जेवण होईल की.
त्या स्वेटरमुळे इतका गहजब करण्याचे काहीही कारण नाही. माझ्या बघण्यात दोन आज्ज्या अश्या आहेत (वय ७५ व ८०) त्यांचे सतत विणकाम चाललेले असते. मग देवाला कपडे करतील तर कधी मोलकरणीच्या मुलाला स्वेटर विणतील. ह्या वयात (आणि आयुष्यभर खस्ता खाल्ल्यानंतर) त्यांनी काय करावे अशी अपेक्षा आहे? कित्येक वयस्कर लोकांचा देवाशी संवाद चालू असलेला आपण बघतो, त्यावेळी आपण म्हणतो का की हे असं कुठेतरी बघून बोलण्यापेक्षा बाहेरचे जे एकटे लोक आहेत त्यांच्याशी जाऊन बोला.
नेहमीची भाजी घेऊन झाल्यावरही," अरेच्च्या आज कोथिंबीर ताजी छान दिसतीये, वड्या करूया" म्हणून ज्यादा घेतली जाते. माझ्या मोलकरणीला त्या कोथिंबीरीचा उपयोग ज्यास्त होणार आहे तीला देवूया असा विचार मी तरी करत नाही. कोणी भक्तानी प्रेमानं काही केलं (श्रीमंत देवस्थानांबद्दल माझं काही म्हणणं नाही) तर काही होत नाही. मला तर ह्या नव्या वेषातले बाप्पा खूप आवडले.

रेवती

यशोधरा

चित्राताई, मस्त प्रतिसाद, आवडला.

बट्टू

मला वाटते बर्‍याचशा देवळांमध्ये रोजच मूर्तीचे कपडे बदलले जातात - पितांबर, साड्या, शेले इत्यादी. त्यामुळे स्वेटरवरून एवढा गहजब का हे कळले नाही.

इथे विषय इतर बर्‍याच देवळांमधल्या मुर्तींचा चाललेला नाही. स्वेटर घालणार्‍या बाप्पांचा आहे. चर्चा निघाली म्हणून लोक बोलले असे वाटले. डॉनने चर्चा सुरु केलेली नाही. जर चर्चा रोज बदलल्या जाणार्‍या कपड्यांवर असती तरीही डॉनचा प्रतीसाद तसाच असता ना.

बाहेर लोकांना रस्त्यावर उकिरड्यात बसून खावे लागते म्हणून आपण घरात जेवणाची टेबले/खुर्च्या आणत नाही का? मग देवळातील अधिकार्‍यांनी देवाला त्यांना हवे तसे नटवले तर बिघडले कुठे?

इथे आपण घरात काय करतो त्याचा विचार चाललेला नसून सार्वजनिक ठिकाणी गणपतीला काय घातले हा विषय आहे. देवळातील अधिकारी देवाला नटवून जनतेला चाळे दाखवतात हा मुद्दा असावा.

भिकार्‍याचे निदान एका वेळेचे जेवण त्यातून व्हावे एवढे पैसे आपण देतो का?

इथे भिकार्‍यांना पैसे देण्याचा विषय नसून भर थंडीत निर्जिव मुर्तीला स्वेटर घालण्याचे कळते पण कुडकुडणारा भिकारी दिसत नाही का हा विषय आहे.

पण जगात देव असल्याचा पुरावा नाही, त्यामुळे त्याची पूजा करण्यात वेळ/पैसा घालवू नका असे सांगणार्‍यांचा हेतू स्तुत्य असला तरी त्यांचा वेळ नक्की कोठे, कसा जातो आणि रोजचा किंवा वर्षभरातला किती वेळ/पैसा हा समाजोपयोगी कामांवर खर्च होतो, हेही सांगावे.

कशासाठी सांगायचं. तो विषय आहे का? तुमचा वेळ कुठे खर्च होतो हा विषय असेल तर उत्तर देता येते, नसेल तर जो विषय चालला आहे त्यावर वेळ घालवावा की नाही हे सांगायचे. तसाही स्वेटरचा धागा सूटून प्रतिसाद भलतीकडेच गेलाकी.

हे मी कोणालाही व्यक्तिशः उद्देशून लिहीलेले नाही, त्यामुळे कृपा करून तसे घेऊ नये.

म्हणजे पिच्चरमधे - ही गोष्ट सत्यघटनेवर रचलेली नाही. साम्य दीसल्यास तो योगायोग समजावा असं लिहीलं कि पिच्चर खर्‍या गोष्तीवर असतो तसं ना. ;)

चित्रा

डॉनने चर्चा सुरु केलेली नाही.
चर्चा डॉनरावांनी केली असली नसली, त्यांनी एक मत मांडले. बाप्पा क्यूट दिसतो आहे, या प्रस्तावकाच्या मताला त्यांनी त्यांना वाटते ते मत प्रदर्शित केले. मी त्या मताच्या थोडी विरोधी भूमिका घेतली. यात प्रतिसादाला उपप्रतिसाद असा मुद्दा येतो. उपप्रतिसाद द्यायचा नाही, तर तुमचा हा प्रतिसाद काढून टाकायचा का?

देवळातील अधिकारी देवाला नटवून जनतेला चाळे दाखवतात हा मुद्दा असावा.
शब्द बर्‍यापैकी जहरी वाटले.

इथे भिकार्‍यांना पैसे देण्याचा विषय नसून भर थंडीत निर्जिव मुर्तीला स्वेटर घालण्याचे कळते पण कुडकुडणारा भिकारी दिसत नाही का हा विषय आहे.
पहिले म्हणजे "स्वेटर देशी असतो की विदेशी हो. विदेशी म्हणला जावा कारण त्याचे नाव स्वेटर आहे. " हे, आणि मग बाप्पाच्या बड्डेला केक पण कापायचा का? हे, आणि सगुण भक्तीचा हॅप्पी बड्डे! हेही चर्चेचे विषय नाहीत.

आणि तसेच तुम्ही म्हणता तो विषय कसा आहे, हे माझ्या मंदमतीला कळले नाही. चर्चा काही डॉनसाहेबांनी सुरू केली नाही असे तुमचेच वरचे म्हणणे आहे. त्यामुळे जर डॉनसाहेबांचा विषय नसला तर कुडकुडणार्‍या भिकार्‍याचा विषय रद्दबातल ठरतो.

आणि देवळातील अधिकार्‍यांना भिकारी दिसत नसतीलच हे तुम्हाला कसे ठाऊक?


कशासाठी सांगायचं. तो विषय आहे का? तुमचा वेळ कुठे खर्च होतो हा विषय असेल तर उत्तर देता येते, नसेल तर जो विषय चालला आहे त्यावर वेळ घालवावा की नाही हे सांगायचे. तसाही स्वेटरचा धागा सूटून प्रतिसाद भलतीकडेच गेलाकी.

विषय नक्कीच आहे हे माझे मत. बापा क्यूट दिसतो, या चर्चाप्रस्तावकाच्या स्फुटाला धरून लोकांनी आपापल्या मनात आलेले विचार लिहीले आहेत, त्यामुळे विषय म्हणजे यावरून काय विचार मनात आले ते मांडणे असा बाकीचे लोक घेऊ शकतात. त्याचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. एकदा विचार मांडल्यानंतर त्याला प्रतिसाद देण्याचेही स्वातंत्र्य आहे. तुम्ही ते घेताच आहात नाही का?

म्हणजे पिच्चरमधे - ही गोष्ट सत्यघटनेवर रचलेली नाही. साम्य दीसल्यास तो योगायोग समजावा असं लिहीलं कि पिच्चर खर्‍या गोष्तीवर असतो तसं ना.
तुमचा विश्वास बसत नसला तर माझा नाईलाज आहे. हा प्रतिसाद अवांतर वाटल्यास इतर संपादकांनी उडवून लावावा, माझी हरकत नाही.

धन्यवाद. या विषयावर अधिक वेळ वाया दवडू इच्छित नाही.

देव आणि देवावर श्रद्धा असणारे टींगल-टवाळीचे विषय का होतात हे आत्ता लक्षात येतंय !

विज्ञानाचा कितीही विकास झाला असला तरी ईश्वराचे अस्तित्व निर्विवाद पुराव्यानिशी आज तरी सिद्ध करु शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. दुर्दैवाने, असलेल्या श्रद्धेची विटंबना, विडंबन, यामुळे ईश्वराचे अस्तित्व, त्याचे दर्शन याची पुन्हा शोधा-शोध नव्या अर्थाने करावी लागते !

-दिलीप बिरुटे
(श्रद्धाळू )

अवलिया

सर,

देव आणि देवावर श्रद्धा असणारे टींगल-टवाळीचे विषय का होतात हे आत्ता लक्षात येतंय !

मला नाही वाटत कुणी इथे टिंगल केली आहे. विरुद्ध मत म्हणजे टिंगलटवाळी नव्हे.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

सामान्यपणे देव-धर्माला न मानणारे जे लोक आहेत, त्या लोकांचे एक सामान्य मत मांडले हो !
भारतातील देव दुध पीतो....वगैरेचा विचारांच्या अंगाने !

अवलिया

कारण, हे लोक (टीका करणारे) खुप हुशार असतात. (हा उपहास नाही) त्यांना त्यांच्या बुद्धिच्या सहाय्याने देवाची कृत्रिमता समजलेली असते. पण होते काय की, सर्वसामान्य माणसांना भावलेल्या देवाची कल्पना ते आपल्या तर्कदुष्टतेने खोडुन काढतात. ज्यात सामान्य माणसाला तो आपल्यावरचा वैयक्तिक हल्ला वाटतो, त्यामुळे दोघांचे जमत नाही. त्यामुळे श्रद्धांना हळुहळु उन्नत करायचे असते हा साधा विचार टिकाकारांच्या लक्षात येत नाही, कारण तर्क आणि कारणमिमांसा त्यांना येवढी अंगवळणी पडली असते, की इतर कोणी त्याच्याशिवाय जगत असतील हे त्यांना माहितच नसते.

एक कदम तुम चलो, एक कदम हम चले असे झाले तर खरे अध्यात्म लोकांना कळेल. असो.

(भाविक अद्वैतवादी) अवलिया

अवलियाची अनुदिनी

झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)

दुर्दैवाने, असलेल्या श्रद्धेची विटंबना, विडंबन, यामुळे ईश्वराचे अस्तित्व, त्याचे दर्शन याची पुन्हा शोधा-शोध नव्या अर्थाने करावी लागते !

ईश्वराच्या अस्तित्वनास्तित्वाच्या प्रश्नाचा सोक्षमोक्ष कायमचा लावून टाकावा का?

फारसे अवघड काम नसावे हे. थोडेफार फोटोशॉपचे प्राविण्य पुरेसे आहे.

- झुरळ मारणारा क्षत्रिय.

ईश्वराच्या अस्तित्वनास्तित्वाच्या प्रश्नाचा सोक्षमोक्ष कायमचा लावून टाकावा का?

ईश्वराच्या असण्या-नसण्याचा सोक्षमोक्ष कायमचा लावता येणारा नाही. हजारोवर्षापासून ते प्रयत्न चालू आहेत, पुढे हजारो वर्ष त्यावर प्रयोग चालतील. फार तर देवाला रिटायर करता येऊ शकेल असे वाटते ! ;)

थोडेफार फोटोशॉपचे प्राविण्य पुरेसे आहे.

आमचे प्रयोग आपल्यापर्यंत पोहचलेत, आम्ही धन्य झालो !!! :)

-दिलीप बिरुटे

चतुरंग

बाप्पांना स्वेटर घातल्याने भावनांचा एवढा क्षोभ होत असेल तर तो आपला दोष आहे असे मला वाटते. गणपती दूध पितो, रडतो असल्या भाकडकथा/अंधश्रद्धा आणि स्वेटर घालणे ह्यात फरक आहे.
एक उदाहरण देतो - निरांजनात किंवा समईत एकच वात लावू नये दोन वाती लावाव्यात असे म्हणतात. आता असे का म्हणतात? हे कुणी ठरवले? ही श्रद्धा की अंधश्रद्धा? असा वाद आपण आपल्या आजीबरोबर किंवा घरातल्या कोणा वडिलधार्‍या बरोबर घालून त्यांना पटवून दिले की एकच वात लावण्याने काही बिघडत नाही तर ते चूक का बरोबर? माझ्यामते चूक. कारण ह्या ठिकाणी भावनांचा प्रश्न आहे आणि दुसर्‍या कोणाचे नुकसान नाहीये. एका ऐवजी दोन वाती लावून त्यांना समाधान मिळत असेल आणि श्रद्धेला तडा जात नसेल तर ते गैर नाही.

पण ह्याच आजीने जर खूप रडणार्‍या छोट्या बाळाला फक्त देवाचा अंगारा लाव, रामरक्षा म्हण आणि डॉक्टरकडे नेऊ नकोस असे सांगितले तर मात्र आपल्याला रामरक्षा म्हणून, अंगारा लावून झाल्यावर आजीची समजूत काढावी लागेल की डॉक्टरांकडे नेणे कसे गरजेचे आहे.
हा तोल साधणे हेच अवघड असते.

लोकांना नादाला लावून त्यांच्याकडून पैसे उकळणे, फसवाफसवी, बुवाबाजी असले प्रकार हे गैरच. स्वेटर खेरीज अन्य कपडेही का घालावेत मग बाप्पाला? तेही कापड दान करा की. पण अशा गोष्टीने प्रश्न सुटत नाहीत.

भारतासारख्या गरीब देशाला अवकाशसंशोधन आणि उपग्रह सोडण्याचे खर्च परवडतात का? त्याऐवजी शेतीत, जलसंधारणातच का खर्च करत नाहीत असे म्हणण्यासारखे आहे. दोन्ही गोष्टींचे महत्त्व आहे त्या परस्परपूरक आहेत. एक थांबवून दुसर्‍याचे भले होणार नाही. तारतम्य मात्र गरजेचे आहे.

चतुरंग

टारझन

मुर्तीबद्दल विचाराल तर कै खास वाटलं णाही ..
पण प्रतिक्रीया वाचूणच अंमळ करमणून झाली ... काय काय डेंजर प्रतिक्रिया आहेत .. आणि हल्ली तर लेख चार लायणींचे आणि प्रतिक्रीया चार पाणांच्या पडायला लागल्याचं पाहून अंमळ गम्मत वाटली ..
चालू द्या भो ..

- टारझन उर्फ गणेश

लिखाळ

प्रश्न मूळ प्रस्तावाच्या लांबीचा नसून तत्त्वाचा आहे. :)
-- लिखाळ.

बट्टू

एक एक डेंजर प्रतिक्रिया पाहिल्या आणि टरकलोच. साम्यवाद काय, सगुण भक्ती काय, बाप्पा! लोकांना कामाला लाव रे. एखाद्या बंडल विषयावर पानभर प्रतिसाद देण्याचा वेळ का देतोस यांना. काही नसेल तर स्वेटर तरी विणायला लाव रे.

धम्मकलाडू

आणि हल्ली तर लेख चार लायणींचे आणि प्रतिक्रीया चार पाणांच्या पडायला लागल्याचं पाहून अंमळ गम्मत वाटली ..
अगदी सहमत! कधी ६४० शब्द. कधी ६०५ शब्द :):)

() धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"