Welcome to misalpav.com
लेखक: प्यारे१ | प्रसिद्ध:
दत्त जयंतीनिमित्त भगवान दत्तात्रेयांच्या आरतीचा विचार करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगानं आधी दोन आरत्यांचा ( गणपतीच्या नि देवीच्या ) नि प्रतिसादांचा आढावा घेतला जावा ही विनंती. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवतांच्या अंशावताराची जयंती. खरंतर देव जन्म घेतात का असा प्रश्न येतो पण भाविकांना ईष्ट देवतेचं स्मरण करायची संधी मिळावी, त्याद्वारे भक्ती वाढीस लागावी हा हेतू. दत्त जयंतीची कथा : अत्रि नामक ऋषींच्या पतिव्रता पत्नीची अनसूयेची परिक्षा घेण्यास स्त्रीमत्सरानं सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती उतावीळ होतात, आपापल्या पतिराजांना तयार करतात नि अत्रि नसताना त्यांच्या आश्रमात पाठवतात. भिक्षा मागताना आम्हाला नग्न होऊन भोजन दे अशी अट घालतात. ती आपल्या पातिव्रत्याच्या जोरावर तिघांना लहान बाळ करुन आपलं स्तन्य (दूध) वाढते. अनसूयेवर तिघे प्रसन्न, त्यांच्या बायका गप्प. वर माग म्हटल्यावर तुम्हा ति घांनीही माझं दूध प्यायलेलं आहे त्यामुळे तुम्ही तिघेही आता माझे पुत्र आहात इथेच वास करुन असा म्हटल्यावर त्रिमुखी दत्त बनून अवतार धारण होतो. कथेबाबत अनेक प्रकारे उहापोह होऊ शकतो. मनोरंजनाचं साधन नसलेल्या नि गुलामीनं पिचत पडलेल्या समाजातला कथेकरी बुवा आपल्या कल्पनाविष्कारानं कथा अशा प्रकारे सांगू शकतो ह्यात आश्चर्य नाही. रुपकं म्हणून वापरलेल्या गोष्टींना घट्ट परंपरांचं स्वरुप येऊन त्यात कर्मठपण कधी आलं ते सांगता येत नाही. सध्या फक्त एवढंच लक्षात घेऊ या की पातिव्रत्याचं सामर्थ्य दाखवण्याबरोबर मनाची निर्वासन (वासनारहित) अवस्था असेल, भगवंताकडे जाताना कुठलाही आडपडदाच काय तर यत्किंचित देखील झाकलेपणा नसला तर, विचारांची क्लॅरिटी असेल तर भगवंत स्वतः घरी येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो. पूर्ण आरती : त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा । नेती नेती शब्द न ये अनुमाना॥ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥ जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥ सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त । अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥ पराही परतली तेथे कैचा हेत । जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥ दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥ प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥ दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥ मी तू पणाची झाली बोलवण ।एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥ (पाठ आहे पण हाताशी पटकन khapre.org वर मिळाली. कॉपी करुन घेतली) आरती शब्दाचा एक अर्थ 'उपास्याबद्दल रती असेपर्यंत म्हणजे प्रेम असेपर्यंत करावयाची ती' असा आपण पाहिलेला आहेच. पुन्हा सांगावं असा हा विषय आहे. अध्यात्माबद्दल सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज असते. कारण ऐकलेलं पटकन 'आत' पोचत नाही . कारण इतर गोष्टींनी मन 'व्यापलेलं' असतं. असो. ही संतश्रेष्ठ शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी रचलेली आरती आहे. २१ वेळा अंगावर थुंकणार्‍या यवनास शांतपणे आपल्या वागण्याद्वारे सुधारणारे, पितर भोजनावेळी ब्राह्मणभोजनाऐवजी दीनदलित जोडप्यांना जेवू घालणारे समाज सुधारक, यात्रा करुन परतताना गाढवाच्या मुखी गंगाजल ओतून भूतदया करणारे असे एकनाथ महाराज! स्वत:च्या उदाहरणातून शांतपणे समाजसेवा करता येते हे त्यांनी तेव्हाच दाखवून दिलेलं आहे. पंगतीला पत्नीच्या पाठीवर एका उद्धटाने उडी मारली तेव्हा 'अगं सांभाळ, त्यांना पाडशील' म्हणून मिश्किलपणं त्याची जागा दाखवून देणारे, भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन नि अध्यात्माचे अवघड सिद्धांत सहज समजावून सांगणारे एकनाथ महाराज. कार्यालयीन कामकाजात एक पै चा हिशेब सापडेना म्हणून रात्रभर जागून तो शोधणारे व्यवहार दक्ष नि खाजगी कामासाठी सरकारी दिवा विझवून, स्वखर्चाच्या तेलाचा दिवा जाळणारे एकनाथ महाराज. विस्मृतीत गेलेल्या ज्ञानेश्वरीला शुद्ध प्रत करुन पुन्हा प्रचार करणारे एकनाथ महाराज जणू ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्याभोवतीची ही कर्मठपणाने फासणारी मुळीच जणू सोडवतात. अशा सर्वार्थाने श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी रचलेली ही भगवान दत्तात्रेयांची आरती आहे. मागे एका प्रतिसादात लिहील्याप्रमाणं भगवदतत्त्व सगळीकडं सारखंच. एकाच व्यक्तीला काका, मामा, बाबा, भाऊ, दादा, सर, साहेब, बंड्या म्हटल्याप्रमाणं कार्यानुसार नि कारणानुसार त्याचं नाम बदलतं. विश्व निर्मितीच्या कार्य शक्ती नि तेव्हाच्या अधिष्ठानाला ब्रह्मदेव, विश्वाचा पसारा सुरु राहण्याच्या कार्यशक्ती च्या अधिष्ठान देवतेला विष्णू नि तोचा संहार करण्याच्या शक्तीच्या अधिष्ठानाला महेश असं नाव आहे. हीच त्रैमूर्ती. ज्या 'मोडस' मध्ये (अनुषंगाने) ती काम करते ते त्रिगुण. हालचालीशिवाय कार्य शक्य नाही. कुठलीही गोष्ट सुरु करण्यासाठी आवश्यक हालचाल अथवा जी क्रिया लागते तिला रजोगुण म्हणतात. नि सांभाळण्यासाठी आवश्यक असतं ते स्थैर्य. टिकणं. ह्या टिकण्याच्या मागं असणारा भाव असतो तो सत्त्वगुणाचा म्हणून ओळखला जातो. नि संपवण्यासाठी आवश्यक असतो तो तमोगुण म्हणजे संहार करण्याची क्रिया. हल्लीच्या कोलॅबोरेशन च्या जमान्याच्या भाषेत बोलायचं तर दत्त भगवान हे एक 'टायअप' आहे तिन्ही गुणांच्या अभिव्यक्तीचं, तिन्ही प्रकारच्या शक्तींचं! पण ह्या तीन क्रिया म्हणजे भगवान दत्त नव्हेत किंवा हे तीन गुण म्हणजे दत्त नव्हेत. तर त्रिगुणात्मक म्हणजे तिन्ही गुणांचा आत्मा म्हणून म्हणजे ज्याला आपण मूळ स्त्रोत म्हणू शकू असे हे दत्त भगवान आहेत. मुळात ते काहीच करत नाहीत. ज्याप्रमाणं वीजेच्या बलावर हीटर नि रेफ्रिजरेटर दोन्ही चालून अनुक्रमे गरम नि थंड करण्याची कामं होतात पण वीज गरम किंवा गार नव्हे त्याप्रमाणं दत्त त्रिगुणात्मक आहेत खरे पण त्रिगुण म्हणजे दत्त नव्हेत तर त्रिगुण ज्याच्या अधिष्ठानावर काम करतात ती गोष्ट (इथं थोडं आणखी विश्लेषण म्हणजे असं एक जागी दाखवता येईल नि दुसरीकडं येणार नाही असं ते नसतंच मुळी. सबाह्य अभ्यंतरी पुढं येईलच) दत्त म्हणजे दिलेला. कुणी दिला? कसा दिला? आपण वर पुराणातली कथा पाहिली. दत्तांच्या आईचं नाव अनसूया नि वडलांचं नाव अत्रि. कथा फार काही 'सांगणार्‍या' असतात. बहुतेकदा रुपक कथाच असतात त्या. आओअण नीट पाहिलं तर ह्या कथा पुष्कळ काही देऊ शकतात. अ त्रि म्हणजे जे तीन च्या पलिकडे आहेत असे ते. तीन गोष्टींची भली मोठी यादी आहे. तीन गुण -सत्त्व, रज, तम , तीन काल - भूत, वर्तमान, भविष्य, तीन अवस्था - जागृती, स्वप्न, सुषुप्ति, तीन देह- स्थूल, सूक्ष्म, कारण देह अशा सगळ्याच्या पलिकडं गेलेल्या व्यक्तीमध्ये दत्ताची अभिव्यक्ती शक्य आहे. (अथर्वशीर्षामध्ये त्वं गुण, देह, काल, अवस्था त्रयातीतः असं जे गणनायकाचं वर्णन आहे ते हेच्च्च्च! एकाच व्यक्ती चा हाक मारताना पुतण्याकडून काका नि दुसर्‍या बाजूनं भाच्याकडून मामा म्हणून उल्लेख येतो तसंच) हेच अनसूया ह्या आईबद्दल. अन-असूय= असूया नसलेला/ली हे मनाचं स्वरुप असलेल्या व्यक्तीमध्ये दत्त भगवान येतात. मुळात हे दत्त वगैरे का आणायचे जीवनात? माणसाच्या जीवनात अनेक प्रकारच्या संघर्षामध्ये स्पर्धा, मत्सर, हेवेदावे असतात पण ज्या व्यक्तीला असूया नाही त्याला ह्या कशाचा त्रास होत नाही. आपल्याला वाटेल मग प्रगती कशी होणार? स्पर्धेशिवाय प्रगती कशी शक्य आहे ? उदाहरण घेऊ. शाळेत असताना एकाला ७५ % मिळाले तरी इतर ७०% च्या आसपास असल्यानं पहिला नंबर मिळायचा. एकदा असंच एकानं सांगितलं तुला ७५% मिळतात म्हणजे २५ % येत नाही का? डोळे उघडले. परिक्षा कितीची आहे? १०० % ची आहे ना? मग आपण १०० % साठी काम केलं पाहिजे. दुसरा ७० % वर असो अथवा ९५ % वर! स्पर्धा कुणाची? कुणाशी? ह्या विचारामध्ये आपण इतरांशी तर नाहीच तर स्वतःशीसुद्धा स्पर्धा नाही करत. मला १०० % यावं एवढा भाव निर्माण होतो. भूतकाळाची नि भविष्याची चिंता मुख्यत्वे भीतीपोटी असते. भीतीचा उगम पुन्हा आपण असू का नसू ह्यामध्ये असतो. एकदा आपण शरीर नाही तर चैतन्य आहोत हा भाव आत पक्का झाला की जमतं. थोडं अवघड वाटतं पण आधीच्या लेखात म्ह्टल्याप्रमाणं जर 'जे माझं आहे ते मी नाही' हे पक्कं झालं की माझा मोबाईल, घड्याळ म्हणजे मी नाही हे जसं मान्य तसं माझा हात, माझा पाय, माझं शरीर, माझं नाव, माझी शैक्षणिक पदवी, माझी संपत्ती, माझे नातेवाईक, माझं मन, बुद्धी चित्त म्हणजे मी नाही हे लक्षात येतं, पटतं. हळू हळू हे आत्मसात व्हायला लागतं. ह्यातून भीती जाते, चिंता जातात, काळजी जाते. अनसूयेच्या पोटी येणारे दत्त ह्यासाठी आपल्यामध्ये आणावेत. असूया गेली नि भूत भविष्याच्या चिंता गेल्या की बरंचसं मन मोकळं होतं. मन मोकळं झालं की आनंद असतो, आनंद असला की समाधान असतं. आपण पहिल्या ओळीतला पहिला चरण बघतोय अजून. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा 'जाणा' वर म्हटलेलं सगळं हे जाणण्याचीच तर प्रक्रिया आहे. नेमकं काय आहे हे एकदा समजलं की पुढचं सगळं एकदम स्वच्छ होऊन जातं. माहिती असणं वेगळं, समजणं वेगळं, समजून घेणं वेगळं नि जाणणं वेगळं. हे जाणल्यावर पुन्हा वेगळं काही जाणण्याची गरज तर राहत नाहीच पण वखवख देखील थांबते. हे एकदा समजलं म्हणजे जणू 'मास्टर की' सापडली! त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा.: असा हा (तिन्ही गुणांचे स्वामी एकत्र आलेला) अवतार तिन्ही लोकांचा राणा म्हणजे राजाच जणू. (बाकी आनुषंगिक म्हणून तमोगुणाचे स्वामी म्हणून शंकर तमोगुणी नाहीत तर ते त्याचे स्वामी आहेत. बर्‍याच जणांचा तसा समज पुराणकथांचा पाठिंबा असल्यानं जाणवतो खरा मात्र हे खरं नाही. आमच्या घाटपांडे काकांनी पोलिसात असताना अनेक जणांची पाठ फोडली असेल पण म्हणून ते रागीट ठरत नाहीत तसंच काहीसं! असो. महाशिवरात्रीला शंकराची आरती बघू अशी महादेवाला प्रार्थना!) नेति नेति शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनिजन समाधी न ये ध्याना| जोवर नेमका भाव समजत नाही तोवर गूढ आकलन होत नाही त्यामुळंच हे वेद शास्त्र नेति नेति (हे नाही, ते नाही असं) म्हणत राहतात नि कुठल्या अनुमानाप्रत येऊ शकत नाहीत. वर म्हटल्याप्रमाणं जे माझं ते मी नाही चा विचार अगदी ह्याच प्रकारे करता येऊन नेति नेति नि शंकराचार्यांच्या आत्मषटकाला जाऊन पोचतो. 'न जाणता कोटीवरी| साधने केली परोपरी| तरी मोक्षास अधिकारी| होणार नाही||' असं म्हणतानाचा समर्थ रामदासांचा भाव, 'तीळ जाळिले तांदूळ, काम क्रोध तैसेचि खळ' म्हणणारे तुकाराम महाराज, 'वस्तुर्सिद्धीर्विचारेण न कश्चित कर्मकोटिभि' ह्या सगळ्याचा नि सुरवरमुनिजन योगी 'समाधी न ये ध्याना' चा एकंदर अर्थ हाच की योग्य मार्गानं सारासार विचार नि विवेक करुनच नेमकं काय हे समजून घेऊनच मोक्षपद प्राप्ती करुन घेतली जाऊ शकते (मुळात ते नित्यप्राप्त च आहे, चुकीच्या धारणांमुळं बंधन वाटतं (आरशावर घाण असली तर प्रतिबिंब दिसत नाही पण ते असतं तसं. आरसा स्वच्छ करावा लागतो)) जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता | आरती ओवाळीता हरली भवचिंता भव चिंता: भव म्हणजे संसार. दुसरा अर्थ माझ्यापुरतं असलेलं जग. आपल्या आजूबाजूचंच. सगळ्याचा विचार काही ठराविक लोकांसाठी सोडून देऊ. (असतात तसे. असो द्यावेत) श्रीगुरु कॄपेने दिल्या गेलेल्या ह्या दत्तांच्या कृपेने माझी संसारविषयक म्हणजे एकंदर प्रपंचाची 'काय होईल नि कसं होईल'ची चिंता दूर झाली आहे असं नाथ महाराज म्हणतात तेव्हा ते आपल्यासाठी जास्त असतं. संत स्वतःसाठी बोलताना सुद्धा सगळ्यांचं हीतच पाहतात. सबाह्य अभ्यंतरी म्हणजे सगळीकडे व्यापून असलेलं तत्त्व ते तूच आहेस. विश्वनिर्मिती ते विश्वाचा लय ज्याच्या सत्तेवर (बेसवर) चालतो ते चैतन्यरुप म्हणजे दत्त. ही गोष्ट अभाग्याला मात्र कळू शकत नाही. पराहि परतली तेथ कैचा हा हेत, जन्ममरणाचा पुरलासे अंत| आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलण्याची मूळ सुरुवात होते ती म्हणजे परावाणी. परा, पश्यन्ती, मध्यमा नि वैखरी अशा चार वाणी आहेत. वैखरी म्हणजे आपण जे बोलतो ते. मात्र परावाणी मध्ये मूळ सुरुवात होते असं मानतात. ते तसंच का मानायचं? गणित सोडवायला एक 'क्ष' लागतो म्हणून. बस्स्स. समीकरण सोडवून 'क्ष' चं विसर्जन च अपेक्षित आहे. तर ही जी परावाणी आहे ती सुद्धा परतते असं दत्तात्रेयांचं स्वरुप आहे. थोडासा विचार करुया. आपण कधी कधी शांत बसतो. अगदी शांत. काहीच विचार नाही. तेव्हा काय होतं? आतलं सगळं शांत असतं. मन हे करु का ते करु असं काम नसतं करत, बुद्धीला घ्यायला कुठला निर्णय नसतो, चित्त काही साठवून ठेवायला नसल्यानं गप्प असतं, तसंच विचाराचा उगम असलेली परावाणी सुद्धा आपल्या मूल स्थानावर असते. चक्र सुरुच नाही ना कसलं! त्यामुळं शांतीचा अनुभव येतो. ह्यालाच परावाणीचं मूलस्थानी परतणं म्हणायचं. जास्त डिटेल्स नकोत पण जेव्हा सगळं अत्यंत शांत असतं तेव्हा दत्ताचं दर्शन झालं असं म्हणायचं. हे कधीकधी एका जन्मात शक्य होत नाही म्हणून 'जन्ममरणाचा अंत पुरतो'. जन्मो जन्म सुद्धा घालवावे लागतात. दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला : अशा सातत्याच्या विचारातून कधीतरी जाणून घेतलेल्या अनुभवातून दत्त हा अनुभव येतो त्याला शाश्वततेकडे नेणार्‍या सतभावानं प्रणिपात म्हणजे अहं सोडून नमस्कार केला.(भाव म्हणजे जो स्थिर असतो तो तर भाव-ना म्हणजे अस्थिर भाव, अभाव म्हणजे नाहीच्च! ) अशा रितीने तत्त्व समजल्यानं आशीर्वाद लाभला नि जन्ममरणाचा फेरा म्हणजे हे जे 'मी नि माझं' चं खरं स्वरुप समजलं त्यामुळं त्या बंधनातून माझी मुक्तता झाली. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन, मीतूपणाची जाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान|| तत्त्व समजलेलं आहे, त्यामाग ची प्रेरणा जाणलेली आहे, जनार्दनस्वामी जे श्रीगुरु आहेत त्यांची कॄपा झालेली आहे अशा दुग्धशर्करायोगानं प्रारब्ध योगानं नि स्वप्रयत्नानं नाथ महाराजांना त्रिगुणातीत, अनसूय बुद्धीनं मिळालेल्या दत्ताचं ध्यान लागलंय, हे ध्यान लागल्यानं मनाचं, बुद्धीचं, चित्ताचं, अहंचं काम थांबून मनाची उत-मन म्हणजे जणू मन शिल्लकच नाही अशी अव स्था झालेली आहे. एकच तत्त्व सगळीकडं असल्याचा अनुभव, अनुभूती आल्यानं वेगळेपणा शिल्ल क नाही, मी आणि तू असं काही नाहीच सगळीकडं एकच एक असल्याचा भाव जागृत झालेला आहे. असाच आनंदाचा ठेवा सगळ्यांना प्राप्त व्हावा हीच विनवणी श्री दत्तात्रेय, एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी नि श्रीगुरुंच्या चरणी अर्पण करतो. सगळ्यांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

अश्या काल्पनिक स्टोर्‍यातून जन्मलेल्या देवाच्या आरत्या करुन सांसारिक चिंता दूर होतील हा प्रार्थमिक भ्रम.
संक्षी, देव किंवा दत्त किंवा त्यासम गोष्टी ही एक गुंगी आहे हे मला वैयक्तिकरित्या मान्य आहे. पण दिल के खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा है.. असं मानणं हे बहुतांश लोकांना गरजेचं आहे हेही खरंच आहे. या गुंगीतून मनुष्य जागा होणं अत्यंत अवघड.. आणि बहुतेक वेळा अनावश्यक. कारण जागं झालं तरी शेवटी अंतहीन अज्ञाताचं भिंताड आहेच.. त्यामुळेच या गुंगीला विरोध करु नये असं माझं म्हणणं आहे. जाऊ दे. याचं कारण असं की :
"ह्या दत्तांच्या कृपेने माझी संसारविषयक म्हणजे एकंदर प्रपंचाची 'काय होईल नि कसं होईल'ची चिंता दूर झाली आहे"
असं नसतं हे कोणाला जरी पटवलं समजा, किंवा त्यांच्या कृपेने काही पीडाबिडा दूर होत नाही असा खाडकन थंड पाण्याचा सपकारा तोंडावर मारुन घेतला तरी जागं होऊन काय करायचं ? या पीडांना पर्याय काय ? तर काहीतरी (तुलनेत) "रॅशनल थिंकिंग"मधून या पीडा सोडवणे, त्यांना तोंड देणे, किंवा या पीडा महणजे वास्तविक पीडाच नव्हेत असं काहीतरी मानणे.. म्हणजे आरुनफिरुन त्या पीडांपासून आभासी सुटका असंच ना.. वास्तविक सश्रद्ध असो, अश्रद्ध असो वा अंधश्रद्ध.. तो पीडांना तोंड देतच असतो आणि त्या भोगतच असतो.. कारण त्याला इलाज नसतो.. बायपास नसतो. मग दत्त किंवा तत्सम मार्गाने जर काहीजणांना ऑपॉप मनःशांती मिळत असेल तर मिळेना.. त्यांना त्या मार्गापासून स्ट्रिप ऑफ करुन दुसरा पर्याय काय देऊ शकतो. आणि तो देणारे आपण कोण? आपण सगळेच भ्रमात जगतोय. कोणाचा भ्रम दत्त तर कोणाचा भ्रम तर्क तर कोणाचा भ्रम निसर्ग अन कोणाचा भ्रम विज्ञान किंवा आणखी काही. शेवटी उपयुक्तता महत्वाची. विज्ञानाने तरी आपण उपयुक्ततेशिवाय काय मिळवतो? तसंच उपयुक्तता म्हणून पहा याकडेही. काही जणांना दत्त किंवा तत्सम गोष्टींमुळे आनंद, सुख, समाधान मिळत असेल तर त्यांच्याविषयी तुच्छता, राग किंवा तिटकारा वाटण्याऐवजी मला त्यांचा हेवाच वाटतो.. श्रद्धा किंवा अंधश्रद्धा यांत फरक करणं किंवा त्या समजावून दूर करणं अशक्य आहे.. आणि त्याहूनही जास्त अनावश्यक आहे.. कोणाचा बळी दिला किंवा मारहाण केली तर खून आणि इजा यांच्या सांप्रत कलमांखाली शिक्षा करावी बस्स.. तोसवर ज्याला जे करायचे ते करु दे. काही निर्मूलन वगैरे करायला जाऊ नये असं व्यक्तिगत मत आहे. ता.क. प्यारे.. तू आजपासून मिपाचा बुवा नं. १ (मॅक्डोवेल नं. १ च्या चालीत वाचावे.)

अबाबाबाबा आता गवि परिणामांना तयार राहा तुमच्या टंच हे आपलं टंकनिकेला भरपूर काम आहे :D

दो इट हार्ड्ली मॅटर्स... "आपण सगळेच भ्रमात जगतोय. कोणाचा भ्रम दत्त तर कोणाचा भ्रम तर्क तर कोणाचा भ्रम निसर्ग अन कोणाचा भ्रम विज्ञान किंवा आणखी काही." -- ऑस्सम

___/\___ गवि प्रतिसाद आवडला. सगळं पटलं नाही तरी तुम्हाला आमच्याकडून आमचंच खरं माना म्हणून सक्ती अथवा बंदी नाहीच्च. भ्रम नक्की काय ह्या भ्रमात आपण सगळेच आहोत. ;) सगुणाचेनि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, सारासारविचारे, संतसंगे|| समर्थ रामदास म्हणतात, प्यारे नाही. आता ते कोण विचारलंत तर मग बोलूयाच नको. उपयोग नाही. सगुणाच्या> दत्ताच्या, अवताराच्या आलंबनानं निर्गुण निराकाराचाच अनुभव घ्यायचाय. सार म्हणजे शाश्वत काय नि अशाश्वत काय ह्याचा शोध संतांच्या 'संगानं' घ्यायचाय. ज्याला कशाचंच काही माहिती नाही त्याला हे आलंबन आवश्यक असतं. ड्रायव्हिंग शिकताना ए बी सी शिकतो का? तसंच. पण ड्रायव्हींग शिकल्यावर नाही गरज त्याची. तशीच वाढ होणं अपेक्षित असलं तरी आधी ए बी सी नको का? तसंच माणसाच्या बुद्धीला असलेल्या मर्यादांमुळं तर्क तोकडे पडतात हे मान्य असायला प्रत्यवाय नसावा. बाकी आपण आम्हास बुवा म्हणताय खरं पण आत्मुस बुवांची एन ओ सी आणलीये का? ;)

तुमच्या प्रतिसादातला हा अत्यंत महत्त्वाचा भाग पुनरुधृत करतो :
माणूस आधार घेता-घेता कधी आहारी जातो व मानसिक गुलामगिरी स्वीकारतो हे कळत नाही. म्हणूनच सजगता हवी, चुकीच्या संस्कारावर विचाराने मात करून त्याचे विवेकी आचारात रूपांतर करावयास लावणे हे खरे चळवळीचे काम असते
आणि हा पुढचा भाग देखिल अत्यंत योग्य आहे
...त्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची खरी गरज आहे.
पण इतक्या भोंगळपणाला अजूनही माना डोलावणारे (किमान इथले तरी) असंख्य सदस्य विचार कधी करणार? म्हणजे "मार्ग खूप लांबचा आहे" याचा अर्थ 'आम्ही आरत्या करत राहाणार आणि दाभोलकरांना अपेक्षित बदल इतरांच्यात होईल अशी अपेक्षा करत राहाणार' असा होतो का? आणि तसा बदल कदापी तरी शक्य आहे का? स्वतःत वस्तुनिष्ठ विचार निर्माण झाला नाही तर दाभोलकारांच्या इतक्या अनमोल विचारांचं आपण काय सार्थक केलं?

या सर्वावर टिप्पणी करण्याएवढा माझा अभ्यास नाही. तुमचं लिखाण काय, प्यारेचं काय आणि दाभोलकरांचं काय सगळ्यांच्या लिखाणातून जे मला घेण्यासारखं वाटतं तेवढं मी घेते. या जगात संपूर्ण टाकाऊ अशी कोणतीच गोष्ट नसते. बाकी सर्वांनाच _/\_

टिप्पणी तर तुम्ही सुरुवातीलाच केलीये :
अगदी कीर्तनकारांसारखं रसाळ विवेचन! लेख मस्त जमला आहे. या मालिकेत आणखी जरूर लिहा!
आणि त्या अनुषंगानं दाभोलकरांच्या विचारातला तुम्हाला मुळात अधोरेखित करायचा भाग हा होता :
त्यासाठी लोकांवर संतापून भागणार नाही आणि 'काय हा मूर्खपणा!' म्हणून त्याची टिंगलटवाळी करून चालणार नाही. त्याच्याशी सतत व सहृदयतेने संवाद साधत राहावयास हवे. मार्ग खूप लांबचा आहे पण तोच इष्ट आहे. शेवटी लढा आहे माणूस बदलण्याचा आणि त्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची खरी गरज आहे.
पण इतक्या उघड गोष्टीला :
आम्ही आरत्या करत राहाणार आणि दाभोलकरांना अपेक्षित बदल इतरांच्यात होईल अशी अपेक्षा करत राहाणार' असा होतो का? आणि तसा बदल कदापी तरी शक्य आहे का? स्वतःत वस्तुनिष्ठ विचार निर्माण झाला नाही तर दाभोलकारांच्या इतक्या अनमोल विचारांचं आपण काय सार्थक केलं?
इथली एक जवाबदार व्यक्ती म्हणून स्वतःचं मत व्यक्त करायची वेळ आली तेंव्हा तुम्ही हमालाची भूमिका घेतलीये. कसा होणार बदल?

@ पैजारबुवा, मस्तच. @ श्रुति: प्रयत्न करेन. @ वल्ली, बॅटमॅनः आभारी आहे. @ अनिरुद्ध प : आपल्या पाठपुराव्यामुळे लिहीलं. आभारी आहे. @ संजयजी : प्रतिसादाबद्दल आभार @ आदूबाळ, मनीषा : आभार @ मंदार कात्रे : कथेमध्ये 'नग्न म्हणजे न अग्न'- न शिजवलेलं असं अन्न हवं' अशी मागणी केली असा देखील एक प्रवाद आहे. त्यामुळं अनसूयेनं दूध दिलं वगैरे. कथा मान्य कराव्यात श्रद्धापूर्वक. त्यातून आपल्याला श्रेयस्कर मांडावं. @अर्धवटराव. >>>तपःश्चर्या हाच अघ्यास व प्रचिती हाच निकाल. +१११ मंथुनि नवनीता तैसे घे अनंता| वाया व्यर्थ कथा सांडिमार्गु|| आंब्याच्या बागेत झाडं किती, कलम कुठलं, पान पिवळं का, खत कुठलं वापरता, झाड उंच का हे पहावं का हाताला लागलेल्या आंब्याची गोडी चाखावी हे ज्यानं त्यानं ठरवावं. प्रतिसाद देणार्‍या सगळ्यांचे नि वाचकांचे आभार!

लेख चांगला आहे. मी स्वतः व्यक्तिशः अश्रद्ध व नास्तिक असलो तरी श्रद्धेची मानसिक गरज बहुसंख्यांना आहे हे मला मान्य आहेच. त्यामुळे, एक निरागस आणि निरुपद्रवी श्रद्धा या स्वरुपात हे ठीक आहे. पण नग्न = न + अग्न = म्हणजे न शिजवलेले- या व्युत्पत्तीबद्दल शंका आहे. कोणी संस्कृत तज्ज्ञ खुलासा करतील काय?

लेख आवडला ... हल्लीच्या कोलॅबोरेशन च्या जमान्याच्या भाषेत बोलायचं तर दत्त भगवान हे एक 'टायअप' आहे तिन्ही गुणांच्या अभिव्यक्तीचं, तिन्ही प्रकारच्या शक्तींचं! हे भारीच ...

स्वभावातला माजोरडेपणा कुणा समोर नतमस्तक होऊ देत नाही.. कुणीही तारणहार नाही हा विचार "दत्त दत्त ऐसे लागले ध्यान" पर्यंत जाउ देत नाही.. अध्यात्म समजुन घेण्याइतका संयम आणि प्रगल्भता नाही.. त्यामुळे तुझ्या सारख्या लोकांचे कौतुक वाटते जे देवा वर इतकी श्रद्धा ठेवुन शांत राहु शकतात.. हेवा वाटतो.. आमच्या विचारसरणी मधुन ही शांतता लाभायला मला तरी बराच वेळ आहे.. अजुनही वैचारिक संघर्षच चालु आहे.. पण ही शांतता मनाला लाभावी अशी तु माझ्यासाठी प्रार्थना कर..! तुझे लेखन ओघवते आहे.. मला त्यातल काही कळत नसलं तरी वाचायला छान वाटलं..

>>त्यामुळे तुझ्या सारख्या लोकांचे कौतुक वाटते जे देवा वर इतकी श्रद्धा ठेवुन शांत राहु शकतात. देवावर श्रद्धा असेल प्यारेकाकांची, पण ते शांत आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे बरं !! ;)

:( ( बिकाकाका कमी बोलून किंवा काहीच्च न बोलता बरंच बोलतात ब्वा!) 'दया तिचे नाव, भूतांचे पाळण' पर्यंत पटतं ना! त्यापुढं 'आणिक निर्दालण कंटकांचे' पण आहे हो! मी तरी काय करणार नि तुम्ही तरी. नाही का? ;)

>>'दया तिचे नाव, भूतांचे पाळण' पर्यंत पटतं ना! त्यापुढं 'आणिक निर्दालण कंटकांचे' पण आहे हो! प्यारेकाका, तुमची संतवाणी सोडून आमच्यासारख्या सामान्यांना समजेल अशा भाषेत सांगाल काय?

लेखामधले विवेचन सुरेख आहे. जन्ममरणाचा फेरा वगैरेवर ज्यांचा विश्वास असेल त्यांच्यासाठी चांगले मार्गदर्शक आहे. नसला तरी वाचायला छान आहे. दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥ प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥ या कडव्यामधील भाषाशैली वेगळी वाटते, तसेच त्यातला अर्थ आधीच्या आणि नंतरच्या कडव्यांशी सुसंगत प्रवाहात (फ्लोमध्ये) वाटत नाही. कदाचित हे कडवे संत एकनाथांनी लिहिले नसून अन्य कोणी जोडले असावे असे वाटते.

सर्व जगाचे गुरू असलेल्या दत्तगुरूंनी २४ गुरूंकडून २४ गुण घेतले होते अशी आख्यायिका आहे. या विषयावर एक लहानसा लेख माझ्या ब्लॉगवर दिला आहे.

अभ्या, अक्षया, श्रीवेद, दिव्यश्री, लीमाऊ, पिरा, घारेकाका, सूड, बिका, अनिल तापकीर, मृत्युंजय, मारकुटे, सुहास.. , नि सगळ्या वाचक व प्रतिसादकांचे हार्दिक आभार!

सुंदर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हि पौराणिक गोष्ट लिहिणार्यांनी इथे सुधा स्त्री ला बदनाम करायचा chnace सोडला नाहीये . म्हणे ३ देवींना मत्सर वाटला म्हणून . कितीही मत्सर वाटला तरी कुठलीच स्त्री आपल्या पतीला दुसर्या नग्न स्त्री च्या पुढे उभा राहा म्हणणार नहि. ………… असो .
एकदा आपण शरीर नाही तर चैतन्य आहोत हा भाव आत पक्का झाला की जमतं.
हेच सत्य अनुसयेला तिला माहित नवत अनुसया कितीही मोठी पतिव्रता असली तरी आपल्या आईचा हे अज्ञान बघून दत्तात्रेयांना दुख झालं आणि ते आपल्या आईचे गुरु झालेत . श्रीपाद श्रीवल्लभ , न्रुसिह सरस्वती हे तर अगदी अलीकडच्या काळातले अवतार आहेत. प्रत्येक युगामध्ये भगवान दत्तात्रय अवतार घेवून लोकांना मार्ग दाखवण्याचं काम करतायेत . रामायण मध्ये एक उल्लेख आहे . दत्तात्रेयांनी लग्नं केल नाही . त्यामुळे अनुसायामातेने आपल्या सुने साठी जमवलेले दागिने तसेच राहिले. पुढे राम अवतारामध्ये वनवासात असताना राम जेव्हा अत्री आश्रमात अले. तेव्हा आपल्या सुनेला बघून अनुसयेला खूप आनंद झाला आणि ते दागिने तिले सीतेला दिले. रावण पळवून नेत असताना सीतेने जे दागिने खाली फेकले ते हेच दागिने होते. दत्त उपासना हि हजारो वर्षांपासून चालू अहे.. अवतार उदंड होती , आणिक मागुती जाती तैसी नोहे हि दत्त मूर्ती , कल्पांती अंत असेना !! अगदी शेवटच्या माणसाला मोक्ष मिळेपर्यंत भगवान दत्तात्येयाचं हे कार्य चालूच राहणार आहे

चालू द्या! ते दागिने सध्या गाडगीळ सराफांकडे आहेत!
अगदी शेवटच्या माणसाला मोक्ष मिळेपर्यंत भगवान दत्तात्येयाचं हे कार्य चालूच राहणार आहे
आणि दत्तात्रेयांनी लग्न केलं नाही म्हणून काय झालं? शेवटच्या लग्नापर्यंत पीएनजी ते दागिने पुन्हापुन्हा घडवून नववधूंना सजवत राहाणार आहेत! _________________________________________ मायला, एकदा स्टोर्‍या सुरु झाल्या की त्यांना अंत नाही!

एक प्रश्न
एकदा आपण शरीर नाही तर चैतन्य आहोत हा भाव आत पक्का झाला की जमतं.
असं होतं (आणि ते अनुसयेला समजलं नव्हतं.. आणि म्हणुन दत्त महाराज तिचे गुरु झाले..).. मग तरीही आणखीन हे कशासाठी?
दत्तात्रेयांनी लग्नं केल नाही . त्यामुळे अनुसायामातेने आपल्या सुने साठी जमवलेले दागिने तसेच राहिले
दत्ता सारखा पुत्र (म्हणजे कथे नुसार साक्षात ब्रह्मा, विष्णु आणि महेश) असताना, आधिक तोच गुरु झालेला असताना सुनेसाठी दागिने जमवणे अशा गोष्टींची गरज काय? सामान्य माणसांच जाउ द्या..पण देवादिकांनाही हे मोह का असतिल? आपण शरीर नाहिच आहोत तर ह्या नश्वर शरीराला सजवण्याचे डोहाळे का लागावे?

कथेबाबत अनेक प्रकारे उहापोह होऊ शकतो. मनोरंजनाचं साधन नसलेल्या नि गुलामीनं पिचत पडलेल्या समाजातला >>>>कथेकरी बुवा आपल्या कल्पनाविष्कारानं कथा अशा प्रकारे सांगू शकतो ह्यात आश्चर्य नाही. रुपकं म्हणून वापरलेल्या गोष्टींना घट्ट परंपरांचं स्वरुप येऊन त्यात कर्मठपण कधी आलं ते सांगता येत नाही. सध्या फक्त एवढंच लक्षात घेऊ या की पातिव्रत्याचं सामर्थ्य दाखवण्याबरोबर मनाची निर्वासन (वासनारहित) अवस्था असेल, भगवंताकडे जाताना कुठलाही आडपडदाच काय तर यत्किंचित देखील झाकलेपणा नसला तर, विचारांची क्लॅरिटी असेल तर भगवंत स्वतः घरी येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो. कथेबरोबरच वाचकांनी हा परिच्छेद देखील वाचावा ही नम्र विनंती!

भगवंताकडे कुठलाही आडपडदाच काय तर यत्किंचित देखील झाकलेपणा नसला .....
तसा तो नसतोच ... पर्दा नही है कोई खुदासे बंदोंसे आगे पर्दा क्या?