भटकंती कर्नाटकातली
Primary tabs
((अपडेट २०२१ जुलै
Photobucket या साईटवरून या लेखात दिलेले फोटो ती साईट बंद ( फ्री साईटचे शेअरिंग बंद झाले) झाल्याने बदलावे लागले आहेत. त्यामुळे प्रतिसादात व लेखातल्या क्रमांकात फरक पडला आहे.))
जानेवारी महिन्यात कर्नाटकात थोडी भटकंती केली होती त्याची थोडक्यात माहिती देत आहे .
फोटो
इथे कलादालनातआहेत.
सर्व फोटो नोकिआ X2-00चे
काही नकाशे खाली दिले आहेत .
प्रिंटेड नकाशांचे फोटो प्रसिध्दीपत्रकांतील घेतले आहेत .रखाचित्रे माझी आहेत
बिजापूर नकाशा
भटकंतीची ठिकाणे ऐतिहासिक आणि पुरातन (हेरिटिज) स्वरूपाची आहेत .धार्मिकपण नाहीत .सर्वाँना आवडतील अशी थंड हवेची ठिकाणे अथवा समुद्रकिनारे नाहीत . बदामि ,हम्पि आहे .बिजापूर (विजापूर)ही पाहिले गोलघुमटसाठी .
केव्हा जावे:
मार्च ते ऑगस्ट सोडून कधीही चालेल कारण ऊन फार असते .पाऊस इकडे फार पडत नाही .
मार्ग:
रेल्वे सोयीची आहे .बिजापूर मोठे स्टेशन आहे .सोलापूरपासून दोन तास लागतात .याच मार्गावर पुढे आणखी दोन तासावर बदामि आहे .मुख्य गाव पाच किमी दूर आहे .आणखी दोन तासावर गदग स्टेशन आहे ,येथे अकरा किमीवर लखुंडी आहे .गोव्यातून एक रेल्वे मडगाव -हूबळी -गदग-होस्पेट-बेल्लारी अशी जाते .होस्पेट मोठे स्टेशन असून अकरा किमीवर हम्पि आहे .
काही उपयुक्त रेल्वे :
(१)मुंबई/विजापूर फास्ट पसेंजर ५१०२९/५१०३० आठवडयातून चार दिवस .
(२)सोलापूर हुबळी एक्सप्रेस ११४२३ रोज
(३)हुबळी ते मुंबईसाठी
चालुक्य ए ११००६ /११०२२ ,
शरावती एक्स ११०३६ ,
शिवाय १७३१७ /०६५११ आहेत .
रस्त्याने: सोलापूरहून इकडे होटगि सोडून सीमा ओलांडली की स्वच्छ आणि सुंदर रस्ते आहेत .कुठेही जाता येते .फक्त एकदा टोलनाका लागतो .कोरडी आणि आल्हाददायक हवा ,सूर्यफूल ,मका ,ज्वारी ,बाजरी ,गहू ,मिरची ,चणे यांची हिरवी शेते आपली सोबत करतात .स्वत:चे वाहन नसले आणि राज्य परिवहनाच्या बसने जात असाल तरीही तुमचा प्रवास आनंददायकच होणार .स्वच्छ आणि मॉलसारख्या इमारती असलेल्या डेपोतून चकाचक बसेस नियमित सुटतात .
हॉटेल्स : (अपेक्षित दिवस)
विजापूर (१),बदामि(२) आणि होस्पेट (२)तीनही ठिकाणी सर्व थरातली भरपूर हॉटेल्स आहेत .लखुंडीला काही नाही .जाता जाता करता येते .
खाणे :काही प्रश्न नाही .
काय पाहाल :
बिजापूर -गोलघुमट ,ईब्राहिम रोजा ,उपली बुरूज आणि मोठी 'मलीक ए मेदान' तोफ .
बदामि :चार गुंफा ,अगस्ति तलाव ,पंधरा देवळे ,बनशंकरी स्थान आणि तलाव .एक दिवस .
ऐहोळे आणि पट्टडकल: (बदामिहूनच जाऊन येणे) पंचवीस देवळे .
हम्पि :तुंगभद्रा डैम ,नदी काठची देवळे खासकरून विरुपाक्ष आणि विठ्ठलमंदिर ,दगडी रथ .विजयनगर साम्राज्याचे अवशेष .
लखुंडी :अकरा खास देवळे .
हुबळी :रेल्वे स्टेशन आणि इमारत .
बिजापूर -१(विजापूर):
मी इथे दोन वर्षाँत दोनवेळा आलो .सुरुवात बिजापूर पासून करणे सोयीचे पडले कारण मुंबईहून थेट गाडी ५१०२९आहे जी दुपारी एक वाजता पोहोचते .स्टेशनहून बस स्टैंडकडे जातानाच गोलघुमट आहे परंतु प्रथम हॉटेलच्या रुमवर सामान टाकून मोकळे फिरायला बाहेर पडायचे .ललितामहाल बजेट हॉटेल आहे .स्टेडीअमजवळ मयुरा आदिलशाही आणि इतर थोडी चांगली हॉटेल्स आहेत .
तीनही मुख्य ठिकाणे दोन एक किमीटरात शहरातच आहेत त्यामुळे रिक्षाने जाता येते ,स्पेशल करू नये .प्रथम गोलघुमट पाहिला .अरुंद दोन फुटी जिन्याने ७ मजले चढल्यावरच प्रतिध्वनीच्या सज्जापर्यँत जाता येते .गुडघ्यांची वाट लागते (पुढील सहा दिवसांत पायांचीही वाट लागणार आहे )पण प्रतिध्वनी ऐकल्यावर आणि वरून शहर पाहिल्यावर फार आनंद होतो .शहरांत असे बरेच घुमट दिसतात .फक्त चुना आणि विटांनी बांधलेला ३८ मिटर्सचा मोठा घुमट जगातला दुसऱ्या स्थानावर आहे .जगातील पर्यटकांना भारतात आणण्यात मुस्लिम इमारतींचा मोठा वाटा आहे .या ठिकाणी दीड तास मोडतो .आता लगेच इब्राहिम रोजा गाठणे .
बिजापूर-२ या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रशस्त आवारात बाग बनवून स्वच्छता राखली आहे .इथे भव्यतेपेक्षा कलाकुसरीला अधीक प्राधान्य दिले आहे .आपण जर दोन दिवस विजापूराला राहणार असाल तर जरा सावकाश पाहता येते अथवा सकाळच्या वेळी तरी हॉटेलात यायला हवे .म्हणजे घाई होणार नाही .रोजाची भेट उरकून थोडे अलीकडे शिवाजी सर्कलला तोफ आहे .मलिक ए मैदान तोफ पाहून जवळच्याच उंच उपली बुरुजावर आणखी तोफ आहे .साडे पाचला बंद करतात .तसं बिजापूर रेंगाळण्याच्या आणि जास्ती राहण्याच्या दृष्टिने बरोबर नाही वाटले .हि ठिकाणे पाहण्यासाठी राहायचे .स्टेशनच्या जवळ काही नाही .बस डेपो प्रशस्त आणि स्वच्छ आहे .इथल्या 'नंदिनी'च्या दुकानात धारवाड पेढे चांगले मिळतात .
समजा तुम्हाला बिजापूरला काही कारणाने चार पाच तास मिळत असतील तर बस डेपोत बैगा ठेवण्याची क्लोकरूम आहे .साध्या चेनवाल्याही बैगा ठेवून घेतात .(रेल्वेवाले बिनकुलुपाच्या ठेवत नाहीत) .बैग ठेवून मोकळे फिरू शकतो .शिवाय चांगले टॉइलेटस आहेतच .स्टेट बैंक एटिएम आहेत .
असे अर्ध्या दिवसात बिजापूर आटपले.दुसरे दिवशी बदामिला जाणयासाठी सोलापुर हुबळी गाडीकरता ११४२३ साडेआठला स्टे गाठले .
बिजापूर-३
सहाव्या शतकानंतर चालुक्यासह वेगवेगळ्या हिंदू राजांची येथे सत्ता होती .हम्पिच्या विजयनगर सामराज्याचा पराभव केल्यावर इथे आदिलशाही आली .
विजापुरात आणखी बरीच पाहण्यासारखी ठिकाणे आहेत म्हटतात .परंतु ती मशिदी स्वरुपाची आहेत अथवा मोडकळीस आलेली आहेत असे कळले होते .बिजापुरात आणि एक दिवस वाढवावा लागला असता .गगन महाल ,असर महाल ,जामा आणि मेका मशिद ,आणि बारा कमान .
मलिक -ए -मैदान तोफेजवळ तीन मलबार हॉनबिल तिथल्या झाडावर आले आणि ही ट्रीप छान होणार असे मनाने घेतले .(सकाळी भारद्वाज पक्षी दिसण्याचाही आतापर्यँतचा अनुभव चांगला आहे ).रस्त्याच्या कडेने डिडीटी पाउडर नगरपालिकेने टाकली होती .गांधी चौकचा उल्लेख/उच्चार गाँध चोक असा ऐकला .सिटि बस मात्र नवीन आणि आवाज न करणाऱ्या होत्या .कंडक्टर सौजन्यशील होते .
सविस्तर माहिती प्रतिसादांत दिली आहे .
फोटो छान आहेत.
वर्णन मात्र सविस्तर हवे आहे.
विजापूर फोटो /अ

१)इब्राहिम रौजा, बिजापूर.
२)इब्राहिम रौजा, बिजापूर

३)आतला भाग, गोल गुंबज.

४)मलिक ए मेदान तोफ.

५)लेखनकला, नक्षीदार जाळी रूपात. इ०रौजा.

६)इ०रौजा.

बदामि फोटो/अ

१)बनशंकरी तलाव.
२)बनशंकरी रथाची चाके.

३)रथ बनशंकरी.

४)अगस्ति तलाव.

५)अगस्ति तलाव.

६)शाळेची मुले, मधल्या सुटीत.

७)बदामिची शाळेची सहल.

ऐहोळे फोटो /अ

१)रावणाफडी गुहा.
२)

३)

४)

५)दुर्गमंदिरातील शिल्प.

६)दुर्गमंदिरातील शिल्प.

७)दुर्गमंदिरातील शिल्प.

पट्टडकल फोटो /अ

१)पौराणिक चित्रपट, विरूपाक्ष मंदिर.
२)जड संपन्नता हार रुद्रगण उचलत आहेत.

३)लेख.

४)उपदेवता मंदिर.

५)द्वारपट्टीका.

६)जैनमंदिरातील हत्ती.

७)विरूपाक्षाचा वेगळा नंदी.

हम्पि फोटो /अ

१)विठ्ठल मंदिर परिसर.
२)रावणाचे शिल्प.

३)तुंगभद्रा नदी.

४)विठ्ठल मंदिर प्रवेशद्वार.

५)ओवऱ्या अच्युतराय मंदिराच्या, आणि मातंगी टेकडी.

६)एक हॉटेल,स्टे०रोड, होस्पेट.

७)कारंजा, होस्पेट.

लखुंडी फोटो /अ

१)जैन मंदिर.
२)जैन मंदिर.

३)ब्रह्मा, ब्रह्मजीनालया.

४)पद्मावती.

५)लखुंडी दर्शनफेरी.

६)काशिविश्वेश्वरा.

७)कोरीव काम.

नकाशे

१)
२)

३)

४)

५)

६)

वल्ली म्हणतो त्या प्रमाणे वर्णन अधिक हवे. पाहिजे असल्यास नविन धागा काढावा.
फोटु लय भारी
या ठिकाणांबद्दल उत्सुकता किती आहे त्याप्रमाणे वर्णन वाढवणार आहे ।कसे कुठे जावे ,ट्रीप कशी प्लान करावी ते पण लिहीन .ऐतिहासीक संदर्भ आणि रेखानकाशे पण आहेत .फोटोखाली एकेक ओळ माहिती टाकत आहे .फोटो बघितल्यावर आपण ठरवतो की अमुक एक ठिकाणी जावे का नाही .इकडे परदेशी पर्यटक फार येतात .गोव्याहून सतत बसेस चालू असतात .
प्रतिसादसंख्येकडे दुर्लक्ष करून वर्णन अवश्य येऊ द्यात.
काही वाचक आवर्जून अशा मालिका वाचत असतात.
+१
ठीक आहे .भटकंती सदराच्या प्रतिक्रियांनाही "संपादन"ची सोय असती तर बरं झालं असतं .छोटे छोटे लिहिलेले भाग नंतर एकत्र जोडता येतात .
इकडे येणारे बरेचसे भारतीय पर्यटक(=भाविक) बनशंकरी ,आणि विरुपाक्ष देवळासाठी येतात आणि बाकीचा भाग उरकतात .इतर देवळांत मूर्ती नाहीत अथवा असल्या तरी पूजेत नाहीत ,सकाळी सहा ते संधयाकाळी सहापर्यंत उघडी असतात .
डिटेल वर्णन हवेच आहे. हा नुसत ट्रेलर झाला!! फोटो पण इथेच डकवा !!
काय हो कंजूस मामा लिखाणात सुंद्धा कंजूसपणा ? ;)
जरा डिटेलमंदी लिवा की... फोटु पण हवेच हवे. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अपर्णा तप करिते काननी :- {चित्रपट :-तांबडी माती}
अर्र लखुंडी यकदम खास आहे का ? आमचे बघायचे राहिले. बाकी हा भाग मस्त आहे. नारळाची झाडे व लोहयुक्त ताबडी माती , काळी देवळे, कातळ,धोंडे, तुंगभद्रा, घरगुती खानावळी सारेच संस्मरणीय. नव्हेंबर मधे गेल्यास उन कमी असेल.
आमचा बेल्लारीचा किल्ला ही राहिला. पण आयहोळ , पत्तडकल व बदामी लाजवाबच ! कर्नाटक आपले लाडके राज्य हाय !
लखुंडी एकदमच खास आहे .सर्वात कठीण अशा काळ्या दगडात सुरेख मुर्ती आहेत .जी गोष्ट भव्यतेत नाही ती इकडे कलाकुसर आणि कलात्मकता आणि धार्मिक सामंजस्यात सामावली आहे .दोन जैन देवळांत हिंदू मूर्ती आहेत .सूर्यनारायणाची चार फुटी मूर्ती इतकी अखंड आणि आकर्षक आहे की चोरी होईल की काय या धास्तीने देवळातून काढून म्युझिअममध्ये ठेवली आहे .आता १९५० नंतर भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने लक्ष घातले परंतु एक हजार वर्षे या गाववाल्यांनीच संभाळले .अजून बरेच आहे .
मस्त आलेत. आता वर्णन सवडिने वाचतो.
हैदराबाद मधल्या भटकनती बद्दल कोणी सांगेल का ? कोणती ठिकाणं आवर्जून आणि फार कष्ट न घेता बघणेबल आहेत? कोणी माहिती देवू शकेल का
मी हैद्राबाद च्या काचीगुडा स्टेशनवरून रात्री सुटणार्या काचीगुडा- गोवा एक्सप्रेसने होस्पेटला उतरलो होतो.त्याअगोदर हैद्राबाद मनसोक्त पाहिले. हुसेनसागर तलावाकाठचे लुंबिनी पार्क, तेथील लेझर शो, पडका पण भव्य- किल्ला, सालारजंग म्युसीयम,
बायॉलॉजेकल पार्क , टेकडीवरचे बिर्ला मंदीर असे एकसो एक ठिकाणे हैद्राबादेत आहेत.खेरीज एका दिवसात करता येणारे रामोजी फिल्म सिटी व नागार्जुन सागर धरण लय भारी.
हैद्राबाद लय भारी ठिकाण आहे. सालारजंग मध्ये इतर काहीच पाहिले नाही तरी चालेल पण व्हेल्ड रिबेका मात्र पाहावी. पॅराडाइझ पण आहेच पण बावर्चीची मजा काही औरच.
सदस्यनाम आणि लिखाणात इतकं साम्य असेल असं वाटलं नव्हतं !! असो.
ललितलेखन वगैरे जमणे कठीण आहे .काही फोटो आणि त्रोटक लिखाणातून लोकांची या ठिकाणाबद्दल उत्सुकता चाळवली गेली तरी खूप झाले .आता वल्ली ,चौकटराजा लिहितील तेव्हा चित्र आणखी स्पष्ट होईल .
सूड >> आपल्या सदस्य'नामात आणि प्रतिसाद'लेखनातभरपूरच साम्य आहे! ;)
फोटो आवडले.
विस्तृत वर्णन वाचायला आवडेल.
आणखी वर्णन लिहित आहे .बिजापूरचे पाहा .विकिपिडिआतून जी विजयनगरची ऐतिहासिक माहिती आहे ती पुन्हा इकडे देत नाही .
सर्वांना धन्यवाद .
आता सविस्तर प्रवासवर्णनाच्या अपेक्षेत आहे...
लखुंदीबद्दल विस्ताराने माहिती हवी आहे. अजून डिटेल लिहा. प्रतिक्रिया म्हणून लिहा किंवा नवा धागा काढा. पण ट्रिप कशी प्लॅन करावी याबद्दल सविस्तर माहिती लिहाच! फोटो अजून पाहिले नाहीत. आता सावकाश बघेन.
ट्रीप प्लान करून जसे पाहात गेलो तसे लिहिणार आहे .कोणत्या ठिकाणी स्थळदर्शनास किती वेळ लागतो आणि प्रवासाला लागणारा वेळ तसेच कोणती सोयिस्कर रेल्वे मिळते हे कळले की इतरांना त्याचा पूर्ण उपयोग करता येईल .लखुंडी दर्शनाबद्दल फोटो नकाशासह येईलच .६ ते १२जानेवारी २०१४ आम्हाला तिघांसाठी संपूर्ण सहलीचा रे तिकीट ,बस प्रवास .राहणे ,खाणे धरून रुपये दहा हजार खर्च आला .सर्व सावकाश पाहिले .
बदामि-१
बिजापूरहून बागलकोटला बस जातात व तिथून बदामिची बस मिळते .परंतु मी रेलवेचे तिकीट रेज० काढलेले होते .रिजवच्या दोन डब्यात दहाजणच होते परंतू टिटिई कोणाला येऊ देत नाही .वाटेत लागणारे अलमट्टी धरण पाहणे हे खास आकर्षण असते .गाडी हळू जाते आणि वळसे घेते .साडेअकराला अर्धा तास उशिरा बदामि स्टे आले .
बाहेर पडून शेर रिक्षा मिळतात .दहा रु/प्र .बदामि गाव पाच किमी आहे .कधी बसपण मिळते .हॉटेलचे नाव आनंद वगैरे सांगून डेपो गाठणे .डेपोजवळच बरीच बजेट हॉटेल्स आहेत आणि रिक्षावाला उगाचच फिरवेल.वाटेत बदाम कोर्ट दिसते .कर्नाटक टुअरिजमचे गावात लेण्यांपुढे आहे .
एक वाजेपर्यँत आपले सामान रुमवर पडून आणि जवळच्याच रेस्टरॉमध्ये जेवण करून फिरायला तयार झालेलो असतो .हातात पर्स अथवा झोळणा घेऊ नका .पाठीवरच्या सैकमध्ये पाण्याच्या बॉटल्स ,खाण्याचे तयार पदार्थ आणि छत्री ठेवा .इकडे माकडे बदमाश आहेत .सैक ओढत नाहीत आणि छत्रीला फार घाबरतात .म्युझिअमच्या वरती शिवालय पाहतांना छत्री उपयोगी येते .इकडच्या गाईडसनाही माकडे ओचकारतात .छत्रीपासून माकडे चार हात दूर राहतात हा माझा सह्याद्री ट्रेकिंगचा अनुभव आहे .
बदामि-२
लेणी आणि अगस्ति तलाव बस डेपोपासून एक किमीवर आहे त्यामुळे स्पेशल रिक्षा करायची गरज नाही .शिवाय ते लेण्यांकडे नेतात आणि वेटिंग चार्ज घेतात .म्युझीअमकडे नेत नाहीत .म्यु०च्या वर आणि पुढे बरेच पाहणयासारखे आहे .
पंधरा मिनिटे चालल्यावर म्यु०ला आलो .बाजूलाच अगस्ति तलाव आहे .रम्य जागा .समोरच्या डोंगरात लेणी आहेत . म्यु०च्या वरच्या डोंगरावर जाण्यास डावीकडून छान वाट आहे .पूर्वी इथे किल्ला होता .वर दोन शिवालये पाहून मशिदीच्या मागून मारूती मंदिराच्या दुसऱ्या वाटेने खाली आलो .येथे माकडे अंगावर येतात .खाली आल्यावर तलावाच्या मागच्या काठावर भूतनाथ मंदिरे आणि एक वेगळीच जैन गुंफा आहे त्याचे दार दोन फुटी आहे .बदामिला येऊन शंभरातले दोनच जण इकडे येतात .हा भाग अवश्य पाहा .
गुंफा पाहाण्यासाठी मागे येऊन रस्त्याने अथवा पायऱ्यांवरून यल्लमाच्या देवळाजवळून जावे लागते .जवळच्या शाळेची मधली सुट्टी झाली त्या मुलांचाही फोटो घेतला .तिकीट काढून वर गेलो .बस रिक्षा पार्क केलेल्या असतात .
बदामि-३ .
इथे खूप गर्दी असते .गाईड लोक या गुंफा दाखवून कटवतात .शाळेच्या खूप सहली आलेल्या पण दोन दोनच्या जोड्या करून रांगेने चारही गुंफा पंधरा मिनिटांत उरकतात .
मास्तर शिटी वाजवतात नी शिक्षिका छडी हलवून लवकर चला करतात .ते तरी काय करणार सहाव्या शतकातील चालुक्यांची शिल्पकला कळणे विद्यार्थ्याँच्या कुवतीबाहेर आहे .असो .
याच त्या चार गुंफा ज्यासाठी परदेशांतून हजारो पर्यटक येथे येतात .बऱ्याच जणांच्या हातात 'लोनलि प्लानेट'चे पुस्तक असते .याची जी '९६ अथवा '९८ ची जुनी आवृत्ती आहे त्यात खूप विस्तृत माहिती आहे .चारांपैकी तीन गुंफा हिंदू आहेत .शंकर आणि विष्णूअवतारांची सुरेख व अखंड साडेसहाफुटी मोठी शिल्पे आहेत .त्रिविक्रम ,वराह आणि नरसिंह अवताराचा प्रभाव त्याकाळी होता असे दिसते.शंकर सोळा हातांचा आहे .चौथी गुंफा आदिनाथाची आहे .
या चालुक्यांचे शत्रु दुसरे हिंदू राजे(पल्लव) होते आणि नंतर सोळाव्या शतकांतही मुसलमान सुलतानांनी देवळांची नासधूस नाही केली .शिल्पांचे सविस्तर वर्णन आणि चालुक्यांचा इतिहास न सांगता पुढे चलुया .
बदामि-४
येथून दहा मिनिटांत मुख्य रस्त्यावर आलो तेव्हा साडेचार वाजले होते .नाक्यावर बनशंकरी'कडे जाणाऱ्या शेअर रिक्षा उभ्या असतात .त्याने पाच किमीवरच्या बनशंकरीला आलो .इथल्या आठव्या शतकातल्या शाकंबरी देवीच्या देवळाचा उत्सव आज सुरू होणार होता .पौष शुक्ल अष्टमी (आज)ते पौर्णिमा .एकादशीनंतर जत्रा सुरू होते .थोड्या वेळाने चौघडा ,वाजंत्री वाजली आणि पालखीतून देवीची पितळी उत्सवमूर्ति आली .नऊवारी पातळांतल्या स्त्रियांनी आरती केली आणि पालखी देवळात गेली .आतमध्ये गाभाऱ्यात अडीचफुटी आठ हातांची मूर्ती आहे .देवळासमोर जो प्रचंड तलाव आहे तो बांधीव दगडी आहे .सभोवालती प्रदक्षिणा मार्ग आहे .नारळी आहेत .एकंदर या देवस्थानाचे फार पूर्वीपासूनचे महत्त्व कायम आहे .इकडे टोपलीतून भाकऱ्या आणि दही घेऊन "ऊटा ?"(=जेवण) विकणाऱ्या बायका भाविकांना विचारत होत्या .एका दुकानात एका काळा चिक्की सारखा पदार्थ होता .याला करदान म्हटतात .गूळ आणि सुक्यामेव्याची मऊ चिक्की (फज ?)होती .जवळच्या पटांगणात जत्रेसाठी राहुट्या उभारण्याचे काम जोरात चालू होते .हल्ली जत्रा आठ दिवस चालत नाही पूर्वी फार मोठी असायची .
बदामि-५
अचानक एका मोठ्या गोष्टीकडे लक्ष गेले .उत्सवाचा लाकडी रथ !२०१२ मध्ये नोव्हेँबरात आलो त्यावेळी मला दिसला नव्हता .सातफुटी दगडी चाके पाहा याची .कानडी येत असती तर विचारता आले असते .जत्रेनंतर हा रथ झाकून ठेवतात .
रीक्षाने हॉटेलवर परतलो तेव्हा सहा वाजले होते .चहा नाश्ता केला .परदेशी पर्यटकांना डोसा आणि हॉट करी (=सांबार) आवडीने खातांना पाहिले .चहा ऐवजी कॉफी अथवा थंड पसंत करतात .बरेचसे बदाम कोर्ट अथवा केटीडीसीत उतरतात .आमच्या रुमशेजारी जपानी /कोरिअन असावेत .
आज तसे बरेच फिरलो आणि दमलो .म्युझिअममध्ये मोठा एअरिअल नकाशा आहे .त्यातले फक्त मलगट्टी शिवालया नाही पाहिले .पोलीस स्टेशनकडून बाजारातून रस्ता आहे .आपण अगस्ति तलावाकडून गावात येतो तेव्हा सहाव्या शतकातून दहा मिनिटांत एकविसाव्या शतकात येतो .मजा अशी की बदामिऐवजी चौदाव्या शतकातले हम्पि जागतिक वारसा (वल्ड हेरटिज साइट)यादीत आहे !
आता उद्या या बदामितच मुकाम आहे पण ऐहोळे(ऐवळी) ,पट्टडकल (पट्टडकलु) ची पंचवीसेक मंदिरे पाहून यायची आहेत .सकाळी पावणे आठला एकच बस ऐहोळेला (२५)जाते .याच वाटेवरच्या पट्टडकल येथे (१३किमी) दर अर्ध्या तासाने आहे .
बदामि-६(ऐहोळे -१)
सकाळी लवकर उठून नाश्ता करून बस डेपोत साडेसातला हजर झालो .इकडे थोडा आतला भाग असल्यामुळे बसच्यावर पाट्या कानडीत असतात .मी त्या वाचण्यासाठी मोठ्या शहरांची नावे कानडीत लिहुन आणली होती .(पाणिनि किपैड डॉट कॉम च्या वेबसाईटवर हे करता येते) .बस वेळेवर निघाली आणि पावणे नऊ वाजता ऐहोळे गावात थांबली .वाटेत पट्टडकल लागले पण ते येताना करायचे आहे .[इथून पंधराएक किमीवर विजापूर-हॉस्पेट हायवेवरचे "इल्कल" हे शहर आहे .स्वत:चे वाहन असल्यास बदामि नंतर पटट० आणि ऐ०पाहून तसेच पुढे पाचपर्यँत हॉस्पेट गाठता येईल .]
बस नाक्यापाशीच दुर्गदेवी मंदिर आणि म्युझीअमचे आवार आहे .तिकीट काढून आत गेले की आवारातली मंदिरे पाहता येतात .पाऊणेक तास लागतो .बाकीच्यांना तिकीट नाही एका फलकावर ऐहोळे गावातील मंदिरांची नावे लिहिली आहेत .बरेच जण दुर्गदेवी पाहून परत जातात .इतर मंदिरे न पाहणे अन्याय केलयासारखे होईल .पुढची परतीची बस दीड वाजता आहे तोपर्यँत आम्ही सर्व महत्त्वाची मंदिरे सावकाश पायी फिरून पाहिली .नाक्यावर इडली वडा चहाचे एकच हॉटेल आहे .तसेच पेरू ,शेंगा आणि रस मिळतो .
बदामि-७(ऐहोळे २)
इथे येताना मला एक गोष्ट माहित होती ती म्हणजे हे एक साधे गाव आहे परंतू असंख्य परदेशी पर्यटक येतात .शाळेत जाणारी पहिली दुसरीतली मुले 'स्कूल पेन ?'मागतात .त्यामुळे पंचवीसेक पेनस बरोबर आणली होती .खूप आनँद होतो त्यांना .पण भिकारी कर्नाटकात सापडत नाहीत .काल बनशंकरीला काही तृतियपंथी देवळाबाहेर दूर बसलेले होते पालखी आली त्यावेळी पण त्रास नाही .मान असावा त्यांचा त्यादिवशी .
आता देवळाकडे वळू .सहाव्या शतकापर्यँत कोरीव गुंफा-मंदिरे होती .गुप्त काळाच्या शेवटच्या टप्प्यात बांधीव मंदिरांचे प्रयोग उत्त र भारतात सुरू झाले .इकडे दक्षिणेत हेच काम पल्लव आणि चालूक्यांनी हाती घेतले .
हे चालूक्य राजे अगोदरच्या कदंब राजांकडे सरदार होते .नंतर ते स्वत:च राज्य करू लागले .यांची राजधानी याच तीन ठिकाणी होती .इथेच त्यांनी देवळे बांधण्या चे निरनिराळे नमुने करून पाहिले .देवळाचे जोते ,मंडप ,खांब आणि छत ,प्रदक्षिणा मार्ग ,गर्भगृह ,शिखर आणि कळस याबाबतीत प्रत्येक देऊळ निराळे आहे .दक्षिणेतल्या कोणत्याही देवळाचा आराखडा येथूनच उचलला आहे .
बदामि-८(ऐहोळे ३)
तांबड्या रंगाचा वालुकाष्म दगड वापरला आहे .कोरायला मऊ असतो पण तकतकीत करता येत नाही .शिवाय बाहेरची शिल्पे पावसाने झिजली आहेत .
शंकर आणि विष्णू मुख्य हिंदू देवता आहेत .तरीही जैनधर्मियांची पूर्ण देवळे हेच दाखवते की तेही राजघराण्यांत महत्त्व राखून होते .
दुर्गदेवी आवारातून बाहेर पडून आणखी दीड तासाची फेरी मारली तर सर्व मुख्य मंदिरे पाहून झाली .याच वाटेवर असलेली रावणफडी गुंफा खासच आहे .शेवटी नाक्यावर येऊन बसची वाट पाहत थांबलो .
पटटडकल:
दोन वाजता पोहोचलो .इथे नदीकाठी एकाच आवारात सर्व मंदिरे पटावर सोंगट्या मांडल्यासारखी आहेत .पाट्या फलकांवर माहिती लिहिली आहे .खास उल्लेख
करण्यासारखे विरुपाक्ष आणि त्याच्या भल्यामोठ्या काळ्या नंदीचे अशी दोन आहेत .मूर्ती ठसठशित आणि आकर्षक आहेत .आत रामायणातील चित्रे आहेत .
आवाराबाहेर येऊन चहा भजी ,नारळपाणी घेतले .इथून एक किमीवरच्या जैन मांदिरातले दोन मोठे हत्ती खास आहेत .
आता या भागातले फक्त महाकुटा बघायचे राहिले परंतू त्या रस्त्याने बस जात नाहीत .एका ठिकाणी वाटेत उतरून दोन किमी जाऊन यायला हवे .नाही गेलो .रूमवर परत आणि आराम केला
मस्त माहीती....
धन्यवाद...
कंजूस काका, काढलेले सर्व फोटो मस्त आलेत, अगदी मोबाईल कॅमेर्याने काढलेले असूनसुद्धा.
या X2 -00 प्रिँटसही 4X6 अथवा 5X7सुरेख येतात .ऑटो फोकस नसल्यामुळे शटर लैग नाही आणि रेल्वेतूनही फोटो काढता येतात .
रस्त्याने: सोलापूरहून इकडे होटगि सोडून सीमा ओलांडली की स्वच्छ आणि सुंदर रस्ते आहेत .कुठेही जाता येते .फक्त एकदा टोलनाका लागतो
सगळे प्रतिसाद वाचत आहे. तपशीलवार माहितीसाठी धन्यवाद!
फोटो वाढवले आहेत .अजून हम्पि आणि लखुंडी बाकी आहे ।शिल्पे इतकी अगणित आहेत की तपशिलवार लिहिणे आणि पाहणे अशक्य आहे .या राज्याला पर्यटकांची सवय आहे आणि त्यांचा पैसा सोयी वाढवण्यासाठीच खर्च करतात .
काही नकाशे इथे आहेत .
प्रिंटेड नकाशांचे फोटो प्रसिध्दीपत्रकांतील घेतले आहेत .रखाचित्रे माझी आहेत .
http://s1366.photobucket.com/user/Wdapav/library/map1
कर्नाटक भटकंती अन बेल्लूर हळेबिड विसरलात की काय ?
विसरलो नाही .ही दोन ठिकाणे बंगळुरु -महैसूर -हसन असे तीन ठिकाणी राहून सहज होतात .आणि कारवार ते मंगलोर अशी तिसरी सहल करणे योग्य ठरते .
यात सोमनाथपूर ही घ्या ! भारी देऊळ आहे तिथे. म्हैसूर पासून ४० किमी.
बरोबर .म्हैसूरला असतांना सोमनाथपूर करता येईल .बारा वर्षाँपूर्वी बं०-म्है०-उटी ला गेलो होतो पण माहिती अभावी ही तीन मंदिरे पाहिली नव्हती.
हम्पि -१
बदामिला दोन दिवस राहून फिरलो तेव्हाच कळले की उद्यापासून तीन दिवसांचा हम्पि उत्सव सुरू होत आहे .थोडी धाकधूक वाढली ,होस्पेटला हॉटेल मिळेल का ? गर्दी असेल का ?बदामिला येतांनाही हीच शंका होती कारण बनशंकरीची जत्रा .परंतू एक फायदा झाला .तो रथ पाहता आला .बस डेपोत चौकशी केली होस्पेट बस कधी आहे .सात वाजता होती .नंतर इल्कल'च्या असतात त्याही उपयोगी असतात असे कळले .
काल ऐहोळेला दुर्ग मंदिराजवळ एक कोल्हापूरची शाळेची सहल(बस) आलेली दिसली .गुरुजींना विचारले "मुलांची राहण्याची व्यवस्था कुठे केलीत ?" .
"कोल्हापुरहून विजापूरमार्गे कुडलसंगमा'ला आलो आणि राहिलो . सकाळी हुनगुंड मार्गे इथे ऐहोळेला आलो ."
परतीचा मार्ग कळला नाही .पन्नासेक पाचवी सहावीच्या मुलांना घेऊन जायचे एक मोठी जबाबदारीच असेल .
१० जानेवारी ,शुक्रवार (२०१४) .
आज बदामिहून होस्पेटला जाण्यास सवासहालाच हॉटेल सोडले .साडेसहाला चहा घेतला पण भूक नव्हती त्यामुळे इडली वड्यांचे पार्सलच घेतले .बस स्टैंडला बदामि ते बंगळुरू होस्पेटमार्गे बस आमचीच वाट पाहत होती .उदबत्ती लावल्यावर सहा जणांना घेऊन सवासातला बस सुटली .आम्ही तिकीटाची भोणी केली .
हम्पि -२
सकाळी प्रवास छान वेटत होता .जानेवारी महिना असूनही फारशी थंडी नव्हती .इकडे रस्त्याला वाहने कमी दिसली .मोठ्या हायवेला हुनगुंड येण्याच्या अगोदर शेतात पाच मोर पाहिले .चला सुरुवात चांगली झाली .पुढे तीनपदरी हायवेवरून प्रवास सुरू झाला .इल्कल या ठिकाणी थांबून सवाअकराला होस्पेट आले .सहा किमी अगोदर तुंगभद्रा धरण आणि वसाहत येते .एकशेसत्तर किमीचा प्रवास अजिबात जाणवला नाही .
होस्पेटचा डेपो नवीन केला आहे .अप्रतिम .इकडे वेळ न घालवता स्टेशनरोडकडे बैगा घेऊन निघालो .आजुबाजूला खूप हॉटेल्स आहेत .मागच्या वेळेस रोटरी हॉल आणि गार्डनच्या समोरच्या SLV यात्री निवास येथे उतरलो होतो .मालक सुरेश प्रभू यांच्याशी ओळखही झाली होती .इकडे मंगलोरी लोकांची बरीच हॉटेल्स आहेत .रूम मिळाली समोरच्या झाडावर बरेच कोकिळ होते .
हंम्पि उत्सवाबद्दल कळले .दोन वर्षे झाला नव्हता .आपल्याकडे एलिफंटा अथवा वेरुळ चा असतो तसाच आहे .जत्रा लागते .नाचगाण्यांचे कार्यक्रम होणार .त्यात मोठे कलाकार कला सादर करणार .संध्याकाळी गर्दी होणार .आम्हाला काही फरक पडणार नव्हता .
हम्पि -३
तयार होऊन ,उदरभरणं करून दोन वाजता बस डेपोत हजर झालो .इथून हम्पि ११/१६ किमी आहे आणि चकाचक बसेस दर दहा मिनिटांनी सुटत होत्या .आजचा अर्धा दिवस आणि उद्याचा पूर्ण दिवस हाताशी होता .
हम्पितील ठिकाणं पाहण्यासाठी फार तंगडतोड करावी लागते .जेवढे तुम्ही पायी फिराल तेवढं चांगलं .काही परदेशी नागरिक हेच करतात .विठ्ठल मंदिर ,कमल महाल आणि म्युझिअम या तीन ठिकाणचे एकच तिकीट आहे आणि ते त्याच दिवशी वापरावे लागते .इतर ठिकाणांना तिकीट नाही .आज शुक्रवार म्युझिअम बंद असते .असे पण हे पाहणारच नव्हतो .
बसमध्ये बसलो .आज जेवढे जमेल तेवढे पाहण्याचे ठरले .(नकाशा पाहा ) .कमलापूरचे तिकीट मागितले .पण तीन दिवस एकदिशा केला होता .कृष्ण मंदिराला आलो .या ठिकाणी समोरच्या पटांगणात जत्रा लाखत होती .मागच्या बाजूस स्टेज आणि खुर्च्या लावत होते .पोलीस खुप होते परंतू मदतीला होते ,खिसे चाचपडायला नव्हते .बसमधून हौशी लोकं सारखे येत होते .एकंदर आनंदाचे वातावरण दिसले .भाषेची अडचण त्यामुळे माहितीफलक वाचता आले नाहीत आणि विचारता आले नाही .हेलीकॉप्टर राईड होती एवढं मात्र कळलं .
हम्पि -४
थोडं गोंधळल्यासारखं झालं पण नंतर लगेच सासिदुकालू आणि कलेदूकालू या दोन महागणपतीँपासून हम्पिदर्शनाचा श्रीगणेशा केला .इथून पुढे पाच मिनिटांवरच्या विरुपाक्षाकडे न जाता मागे येत कृष्ण मंदिर पाहून ,प्रवेशद्वारातून लक्ष्मीनरसिंहापुढे उभे ठाकलो .येथून बसने सरळ कमलापूर गाठले .
चार वाजले होते .चहा कोलड्रीँक घेऊन ताजेतवाने झालो .इथे मोठा पोलीस ताफा होता आणि पुढे जवळच हेलिपैड होते .परंतू तिकडे गेलो नाही .पट्टाभिरामा मंदिराची वाट धरली .चालत म्युझिअमच्या पुढे वीस मिनिटांवर कनाल ओलांडल्यावर हे एक प्रशस्त आवारात देऊळ आहे .शांत भाग आणि एखाददुसऱ्या परदेशी पर्यटकाशिवाय कोणी फिरकत नाही .एक नृत्यमंडप आहे .भरपूर खांब आणि त्यांवरची शिल्पे हे हम्पिच्या देवळांचे वैशिषट्य आहे .इकडे अर्धा तास थांबून कमलापूरला स्टॉपला आलो .बस पकडून सहाला हॉटेलवर परतलो .
एकेका ठिकाणासाठी ऑटोवाले यायला तयार नसतात .एक पैकेज गळ्यात मारायला बघतात .हॉस्पेटच्या चांगल्या आणि स्वस्त बसेसची सोय नसती तर ऑटोवाल्यांनी पर्यटकांची किती धुलाई केली असती ते सांगता येत नाही .
हम्पि -५
संध्याकाळी रेल्वे स्टेशनकडे फेरफटका मारला .इकडे काही तीनस्टार मोठी हॉटेल्स दिसली .एक कनाल ओलांडावा लागतो .एक हायवे बनलेला दिसला तो थेट विजापूर -हंम्पि-बंगळुरू जातो . पर्यटनामुळे राज्याचे चित्र पारच पालटले आहे .परत आलो तर समोरच्या बागेत कारंजे सुरू झाले होते . आजचा अर्धा दिवस प्रवास आणि भटकणे झाल्यामुळे रात्री छान झोप लागली .
दुसरे दिवशी शनिवारी उरलेली ठिकाणं पाहायची होती .आणि ही सगळी महत्त्वाची होती .सकाळी टिव्ही लावून कालच्या कार्यक्रमाच्या बातम्या पाहिल्या .बऱ्याच जागा रिकाम्या होत्या फारसे प्रेक्षक थंडीत कुडकुडत उघण्यावर गाणे ऐकायला आले नव्हते .
सकाळी साडेसातलाच हम्पिबाजार गाठला . विरुपाक्ष देवळापासून समोरच्या मातंगमदिरातल्या नंदीपर्यँत रुंद रस्त्याने दोन्ही बाजूला दगडी खांबांची दुकाने आहेत .ती नँतर सुलतानांनी लढाईत बरीच पाडून टाकली . त्यांनी देवळे मात्र पाडली नाहीत .विरुपाक्षाचे ५०मी उंच गोपूर लक्षवेधक आहे .
या ठिकाणी ऑटोवाले विचारायला येतात .पण फार मागे लागत नाहीत .कोणत्या ठीकाणी काय पाहण्यासारखे आहे ते माहिती असेल तरच ऑटो ठरवून फायदा आहे .
मस्त.
हंपीचे मूर्तीशास्त्र जरा सविस्तर आले तर अधिक छान होईल.
एकंदरीत तिथे शैव मतापेक्षा वैष्णवांचा प्रादुर्भाव बराच जास्त दिसतोय. उदा: लक्ष्मी नरसिंह मंदिर, विरूपाक्ष, विजय विठ्ठल मंदिर, खुद्द राज्याचे राजचिह्न असलेले वराह.
हंपी मधली मंदिरे ,तेथिल शिल्प यावरही वाचायला आवडेल. या डिसेंबरमध्ये जाण्याचा विचार आहे. तिथुन जवळचा विमानतळ कोणता?
वल्ली ,बरोबर आहे .
विजयनगराचे स्थापक हरिहर यांचे स्वामि मध्वाचार्य .यांनी प्रथम इथे तुंगभद्रेच्या उत्तर किनाऱ्यावर अनेगुंडी डोंगरावर किल्ला बांधायला सांगितला असे म्हटतात .तो सुलतानानी उध्वस्त केल्यावर दक्षिण तिरावर दुसरे विजयनगर बांधण्यात आले .विरुपाक्ष आणि गणपती तसेच हेमकुटा हे सर्व शैव स्थापत्य यांच्या अगोदरच्या हिंदू राजांचे आहे .
मध्वाचार्य राम कृष्ण भक्ती मार्गातले असावेत .त्यामुळे राजांची नावेही कृष्णदेवराय ,रामदेवराय आहेत .देवळेही विष्णू अवताराचीच त्यांनी बांधली .राम कृष्ण अवताराचा इतिहास माहिती असणाऱ्याला येथील शिल्पांचे कथानक लगेच समजते .गाईड लोक एक दोन गोष्टी परदेशी पर्यटकांना समजावतांना दिसतात .फ्रेंच ,रशिअन ,जर्मन मध्ये चालू असते .दशरथाच्या राण्यांना पुत्र होण्यासाठी खिरीचा प्रसाद ,सीता आपली अंगठी मारुतीला देत आहे ,बाळकृष्ण पळू नये म्हणून पायाला दोरी बांधून उखळाला बांधली आहे .असे अनेक प्रसंग कोरलेले आहेत .अवर्णनीय आहेत .घोंगडीवाला इथेच आहे .पट्टाभिराम ,हजाररामा आणि कृष्णमंदिर खासच .
(घाई करणाऱ्यांबरोबर जाऊ नका ) .
नकाशे कसे वाटले ?
धन्यवाद माहितीसाठी.
नकाशे पण आवडले.
तुमच्याबरोबर हंपी, बदामीची भ्रमंती करायला आवडेल.
नीटपणे फिरण्यासाठी नकाशे उपयुक्त आहेत. हंपीत त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता कमी राहील. हंपीला शिल्प कलेबरोबरच
नुसते धोडे देखील देखणे आहेत. त्याचे ही सौंदर्य काही वेगळेच. या दगड धोंड्यातून काही शिल्पे आपल्या कल्पनेनुसार दृगोचर होतात.मला डिसेंबर मधे वल्ली ईई सोबत जायला जमेल की नाही माहीत नाही पण येथे पुन्हा जाणार हे नक्की !
अजया ,हम्पिपासून ६० साठ किमी पूर्वेला बेल्लारी(येडीयुरप्पांचे) एरपॉट आहे .बंगळुरूरून हम्पि एक्सप्रेस सकाळी येते /जाते .होस्पेटहून सकाळची एक्सप्रेस दुपारी दोनला मडगावला (दूधसागर धबधबा मार्गे) पोहोचते .
यावर्षी बहुधा २-३-४ जानेवारी २०१५ हम्पि उत्सव असेल .यावेळी गर्दी फार असते .मंदिरांचे वर्णन देईनच .लहान मुलांना बोरिंग आहे .न चालणाऱ्यांनी जाऊ नये .
(मुलांसाठी हैदराबाद उत्तम)
२९ डिसेंबर २०१४ पौष शु अष्टमी बनशंकरी जत्रा सुरुवात (रथ पाहा )आणि पौर्णिमा ५ जाने २०१५ शेवटचा दिवस .
आता हिलस्टेशनांच्या हिरवळीपेक्षा रस्त्याकडचे धोंडे मलाही खुणवू लागले आहेत चौकटराजा. तुंगभद्रेच्या रक्षक धोंड्यांचे सौंदर्य साठवायला निकॉर /कैनन २८ एम एम पाहीजे HDR नको .
कंजूससाहेब, वर्णन आवडले. एक शंका म्ह. हरिहर आणि बुक्कराय यांचे गुरु मध्वाचार्य नसून विद्यारण्यस्वामी असावेत असे वाटते.
मध्वाचार्य /माधवाचार्य हे विद्यारण्याचे अगोदरचे नाव आहे .
माधवाचार्य असेल मग ते नाव. कारण मध्वाचार्य म्ह. द्वैतमतवादी वैष्णव संप्रदायवाले तर हे विद्यारण्य म्ह. शृंगेरी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य होते. एकवेळ काश्मीर प्रश्न सुटेल पण या दोहोंत अद्वैत होणे इंपॉसिबल ;)
विकिची ही कडी तिकडेच नेते
http://en.wikipedia.org/wiki/Vidyaranya
धन्यवाद वल्ली .या GPS च्या काळात रेखानकाशे उपयुक्त वाटतात हे ऐकून बरे वाटले .दुरुस्ती /सूचना येऊ द्या .
तुमच्या बरोबर जायला मलाही आवडेल .दोनवेळा गेलो .नोव्हेंबर २०१२ ला गेलो(एकटा) होतो त्यावेळी विनाचिंता हम्पि नऊ तास फिरलो होतो तरी वीस टक्के राहिलेच .अनेगुंडी परीसर .माहितीसाठी लोनली प्लानेट पुस्तकाला (जुनी आवृत्ती) पर्याय नाही .
हम्पि -६
दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विरुपाक्ष ते मातंग मंदिर नदी ते नदीकाठाने विठ्ठल मंदिरापर्यँतचा भाग पायी फिरण्याचा आहे तिकडे वाहन जात नाही .(पाणी आणि वरचे खाणे जवळ ठेवा ).मग हे ऑटोवाले कसे विठ्ठल मंदिरला जातात ?तर ते कमलापूरकडून तिकडे येतात .(नकाशा पाहा ).मधल्या ठीकाणांना दांडी .
कोणत्याही पर्यटन स्थळी हीच तऱ्हा असते .पर्यटक गाडी वेटिंग ठेवून एक तास काढतील अशी ठिकाणे "तिकडे काही नाही "सांगून जात नाहीत .तास दोन तासात पाचशे रुपये मिळवायचे हा धंदा असतो .शिवाय एखाद्या दुकानातले कमिशन पदरात पडले तर उत्तमच .इथे भाडे आणि ठिकाणावरून ऑटोवाल्याशी 'बार्गेन 'करत बसू नका .असो .
एरवी हम्पि बजार बस स्टैंड आणि पार्किँगपाशी बरीच चहा वड्याची दुकाने असतात .आज सर्वांना हटवले होते .वेळ न घालवता विरूपाक्ष मंदिराचे भव्य उंच गोपूर पाहत तिकडे निघालो .वाटेत एक भलेमोठे पत्र्याचे धूड दिसेल त्याच्या आत देवळाचा रथ आहे .दिसू नये याची पूर्ण काळजी घेतली आहे .महाशिवरात्रीला या रथासाठी यावे लागेल .पुजा होत असलेले हे एकमेव देऊळ आहे .हजार वर्षाँचे आहे .कृष्णदेवरायाने याची डागडुजी केली म्हटतात .
दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विरुपाक्ष ते मातंग मंदिर नदी ते नदीकाठाने विठ्ठल मंदिरापर्यँतचा भाग पायी फिरण्याचा आहे तिकडे वाहन जात नाही
काही समस्या नाही. हे अंतर मी सहकुटंब पायी गेलो आहे. जाणे अगदी रंजक .जाताना राजाचे वजन तागडे ही लागते. खेरीज
तुंगभद्रेत गोल होडीतून भटकता येते. विष्णु मंदिरात संगीत खांब मात्र लोकानी हाताळून निमुळते केले आहेत.
ते विट्ठल मंदिर . चुकून विष्णु मंदिर टंकले आहे.
हम्पि -७
गोपूरातून आत गेल्यावर उजवीकडे हत्ती असतो .पण नदीवर गेला असेल .नदी मागे उजवीकडेच आहे आणि घाटही आहे .देव दर्शना नंतर नदीवर जाऊन आलो .
साडेसात झालेले .यावेळी नदीकाठाने दोन किमी चालायला त्रास होत नाही .
हम्पि बाजारातून रुंद रस्त्याने जाताना गतवैभवाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही .लहान विक्रेत्यांसह हत्तीच्या अंबारीत बसून थेट खरेदी करणाऱ्यांसाठी दगडी गाळे आहेत .पुढे नंदी पाहून मागे आलो .(तशी या मातंग टेकडीवरून पलीकडे अच्युतरायाकडे वाट आहे ) .
डावीकडून नदीकाठाने जाताना नदीतल्या कारकल नावाच्या गोल होड्या दिसतात .एक अलीकडे बांधलेले मंदिर दिसते .
मातंग मंदिराच्या भोवती वळसा घालून गेल्यावर पाटी दिसेल .पुढे विठ्ठल मंदिराकडे ,तर पुष्करणी ,अच्युतराय उजवीकडे .या दोन ठिकाणी जाऊन पाहून परत यायला अर्धा तास लागेल . पुष्करणी बांधता बांधता अर्धवट सोडल्यासारखी वाटते .अलीकडे खांबांवर महाल योजला असावा .तलाव छान आहे मागे मातंग डोंगर .डावीकडचे मोठे पटांगण आहे तिथे बजार होता .हल्लीचे नाव सुळे बाजार आहे .
हम्पि -८
अच्युतराय मंदिराची जागा फार छान आहे .आवाराला तटबंदी आहे आणि आत ओवऱ्या (=भाविकांना थांबण्यासाठी खोल्या ) आहेत .आवारातूनच उजवीकडे पायऱ्यांची वाट मातंग डोंगरावरून (२५ मी) नंदीपाशी उतरता येते .सरळ वर (५० मी) शिखरावरही जाता येते .वरून नदी आणि अनेगुंडी छान दिसते .अतिउत्साही लोकांसाठी आहे .
पायगाडीला जोर मारा कारण आजचे दहा टक्केच झाले आहे .पुढच्या वाटेवर एक वराहमंदिरात प्रवेशद्वारावर वर एक वराह कोरलेला आहे .नंतर दोन एक मांदिरे उजवीकडे आहेत .आता नदीकडे खाली एक मंदिर आहे ती जागा फारच रम्य आहे .इथे एक चहाची टपरीही आहे .परत वर मोठ्या वाटेवर मागे एक दगडी नक्षीदार कमान राजाची तुला आहे .येथे तराजू टांगून राजाच्या वजनाइतके धन धान्य वाटले जायचे . येथे डावीकडे 'उत्किर्णविषणूमंदिर' आहे .बंद केले आहे परंतू बाहेरच्या सपाट दगडी भिंतीवरची पाल पाहा .(कांचीपुरम ,चैनईच्या विष्णूमंदिरातली पाल प्रसिध्द आहेच) .पालीचा पौराणिक उल्लेख काही आहे का ?इथून समोरचा अनगुंडी डोंगर छान दिसतो .आता दहा मिनिटांत विठ्ठल मंदिराच्या दक्षिण दाराशी येतो .प्रवेश पूर्वेकडून आहे .
हम्पि -९
विठ्ठल मंदिर
हम्पितली फार चर्चित आणि प्रसिध्दी मिळालेली वास्तु .उत्तरेला तुंगभद्रा नदी आणि पलीकडे अनेगुंडी ही पूर्वीची राजधानी .पूर्वेकडे एक रुंद मातीचा रस्ता एक किलोमीटर वरच्या पार्किँगकडे नेतो .कमलापुरातून एक रस्ता इथे येतो .याच रस्त्याने पुढे गेल्यास होडीने नदी ओलांडता येते .पार्किँग ते देवळापर्यँत येण्यासाठी इलेक्ट्रीक आठ सिटर गाड्या आहेत,ज्या मुली चालवतात .छान व्यवस्था आहे;शिस्तबध्द आयोजन असते.दहा रुपये तिकीट आहे .चालत गेल्यास अर्धा तास लागतो आणि वाटेत एक छान पुष्करणी पाहता येते .
देवळाच्या पूर्व दारासमोर तिकीट (१०रु) काढल्यावर ते जपून ठेवायचे जे पुन्हा कमलमहाल आणि म्युझीयमसाठी चालते .
तटबंदीला चार दिशेला चार चाळीसफुटी गोपुरे आहेत .
गरुड रथ :
मोठ्या आवारात प्रथम तो प्रसिध्द दगडी रथ आहे .त्याचे तोंड मंदिराकडे आहे .रथात बसायचा मान मात्र विष्णूचे वाहन गरुडाला मिळाला आहे .चार फुटी दगडी चाके खऱ्या दगडी आसांवर आहेत आणि ती फिरु शकतात .हा तांबूस दगडाचा रथ या देवळात नव्हताच .नंतर इथे आणून ठेवला .बहुतेक पट्टाभिरामा मंदिरात असावा .तिकडे शोभतो आणि दगडही जुळतो .
छान वर्णन.
हंपीला लगेच जावेसे वाटत आहे.
हम्पि -१०
विठ्ठलाचे देऊळ बसके आणि दोन भागात आहे .अगोदरचा किर्तनमंडप पूर्ण ढासळायच्या बेतात आहे .सर्व खांब तिरके झाले आहेत .वरचे छताचे दगड पडले आहेत .जागोजागी लोखंडी नळे लावून आधार दिलेला आहे .आत जाऊ देत नाहीत .मंडपात जे मुख्य खांबाभोवती मुसळासारखे बारीक खांब आहेत ते आघात केले की वाजतात .आतले रक्षक /मार्गदर्शक काही जणांच्या विनंतीवरून वाजवून दाखवत होते (५०रु टिप मिळत होती ) .परंतू इथले आणि पट्टाभिरामाचे (मी वाजवले) काही खास वाटले नाहीत .हा दगड वालुकाश्म आहे .याला नाद नसतो .खरे नादस्तंभम/संगीतस्तंभम केरळात पद्मनाभ मंदिरात आणि कन्याकुमारीजवळच्या सुचिंद्रम (खांब स्वत: वाजवू शकता) मंदिरात आहेत .तिकडचा दगड काळा आहे .
मुखमंडप आणि गर्भगृहात जाऊ शकतो .अंधार फार आहे फोटो नाही काढता आले .परदेशी पर्यटक आणि त्यांचे गाईड फार .ते गर्भगृहात जात नाहीत .देवळाच्या मानाने गाभारा लहान आहे .आत उंच चौथरा रिकामा आहे .विठ्ठलाची मूर्ती पाहण्यासाठी पंढरपुरला चला .गाभाऱ्यातच एक अंधारी प्रदक्षिणामार्ग आहे आणि तळाला पाणी असावे ( पाय ओले ठेवणयासाठी ?) असं वाटतं .
हम्पि -११
विठ्ठलमूर्तीचा वाद आणि काही पुरावे .
यावर बरीच चर्चा होते .विजयनगरची सुरूवात १३४० च्या सुमारास अनेगुंडीला झाल्यावर बहामनी सुलतान आणि या राजांत लढाया होतच राहिल्या .एका जुन्या विठ्ठल मंदिरातली मूर्ती लढाईच्या वेळी पंढरपूरच्या एका (आताचे) शंकराच्या देवळात हलवली ."ज्ञानदेवाचा कानडा विठठलु करनाटकु ." मुर्तीला कानडी पध्दतीची कापडी टोपी आहे ,मुकुट नाही .
मूर्तीकाराने गुराखी (=कृष्ण) रुपाचे देवाचे हात काठी खांद्यावर
धरतात तसे न करता कटीवर ठेवले असतील .पण त्या विटेचे कोडे उलगडत नाही .काहींच्या मते ती मूर्ती जुन्या पंढरपुरात नदीपलीकडे लपवली आहे .कारण रुसलेली रुक्मिणीची मूर्ती तिकडे आहे .
पुढे कृष्णदेवरायाच्या काळात हे मंदिर बांधून एक नवी मूर्ती बसवली .त्यासमोर भक्त पुरंदरदास बसायचा .पंढरपुरातली मूर्ती बडवे लोक देईनात .
१५५६च्या तालिकोटच्या मोठ्या लढाईत ही पण काढली आणि पुरंदरदास पंढरपुरात बसू लागला .
सुलतानाने या मंदिराचा किर्तनमंडप मोडला असावा .इतर मंदिरे तोडली नाहीत पण राजा राणींचे महाल मात्र ध्वस्त केले .
ते आपण नंतर पाहणारच आहोत .
हम्पि -१२
विठ्ठल मंदिर पाहून झाले .आता दोन पर्याय होते आल्या मार्गानेच दोन किमी चालणे अथवा इले० गाडीने पार्किँगला जाऊन रिक्षा मिळते का पाहणे .सवा अकरा झाले होते आणि दुसरा मार्ग निवडला .
गाडीला नंबर लावून लगेच पार्किँगला आलो .ही गाडी फारच छान आहे .इकडे बसण्यासाठी गवताने शाकारलेला मोठा तंबू बनवला आहे .या रस्त्यावर फक्त खासगी बस ,रिक्षा येतात ,हम्पिच्या सिटि बस अथवा गंगावतीकडे जाणाऱ्या परिवहनच्याही या मार्गाने येत नाहीत .दोन रिक्षा उभ्या होत्या .कमलापूर (५ किमी)चे १२० रु सांगितले .नको सांगून परत इले०गाडीच्या रांगेत उभे राहिलो .पाचच मिनिटांनी तो रिक्षावाला बोलवायला आला .दोन आणि सिटस त्याला मिळाल्या होत्या .साठ रुपये देऊन कमलापूरला आलो .वाटेत हेलिपैड दिसले .
नाक्यावरच्या हॉटेलात थंडपेय घेतले .इथून काल पट्टाभिरामाकडे गेलो होतो त्या रस्त्यावरचे म्युझिअम जवळच आहे आणि आज उघडे होते तिकिटपण हाताशी होते .पण गेलो नाही .अजून तीन तासांचा कमलमहाल परीसर बाकी होता .
अजून एक पर्याय आहे .सकाळी प्रथम ऑटोरिक्षाने विठ्ठलमंदिर पार्किँगला जायचे .तिथून मंदिर-नदीकाठाने चालत विरुपाक्ष -कमलमहाल -कमलापूर .
हम्पि -१३
कमलापूरवरून राणी स्नानागारकडे चालत निघालो .एक किमी आहे आणि झाडांची सावली आहे .
साडेबारा झाले होते आणि उत्सवामुळे गर्दी होती .राणी स्नानागारच्या बागेत थोडा आराम केला .ही इमारत चुन्यात बांधलेली आहे .मुसलमान कारागिर हाताशी धरून राण्यांसाठी बंदिस्त महाल आणि हौद बांधून घेतलेला आहे .इथून पुढे दोन मंदिरे पाहून पंधरा मिनिटांत डावीकडच्या महानवमि डिब्बा पाशी येतो .या सर्व परीसराला रॉइल सेंटर म्हटतात तर अगोदरच्या मंदिर परीसरांस सेक्रिड सेंटर असे नामकरण केले आहे .देवालय आणि राजवाडा परीसर .
महानवमि डिब्बा
याच्या मागेच रस्ता आहे परंतु प्रवेश राणी स्नानागार स्टॉप अथवा कमलमहाल स्टॉपकडूनच आहे .विजयनगर साम्राज्य राजांशी बहामनी सुलतानांच्या लढाया होत होत्याच शिवाय चीड आणि द्वेषही फार होता .तालिकोटच्या लढाईत जिंकल्यावर सुलतानांनी मिळालेले महाल वापरायला ठेवले नाहीत तर ध्वस्त केले .त्यामुळे इथे जे काही राहिले आहे त्यावर समाधान मानायचे . देवळे मात्र फार तोडली नाहीत .त्यानंतर नवीन शहर अथवा राजधानी इकडे न करता अडीचशे किमी दूरवर उत्तरेला विजापूर वसवले .
हम्पि -१४
एका छोट्याशा राज्याचे दोनशे वर्षात विजयनगर साम्राज्य झाले .एक मोठे व्यापाराचे केंद्र झाले .महाल बांधले गेले .देवळे आली .काही उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होऊ लागले .असाच एक उत्सव महानवमि अर्थात नवरात्र .हे बहुधा अश्विन महिन्यातले नसून पौष शु० अष्टमी ते पोर्णिमा .या वेळी रासक्रीडा होत असावी .हे राजे कृष्णावतार भक्त ना .यासाठी मोठा जो चौथरा बांधला गेला तोच हा महानवमि डिब्बा .सुलतानांनी जिंकल्यावर हा विलासाचे द्योतक डिब्बा आणि सर्व महाल तोडले .तरी खालचे जोते पाहून कल्पना करू शकतो की किती सुंदर असावे त्याकाळी .
सत्तर फूट चौरस आणि पंचवीस फूट उंच चौथरा शिल्लक आहे .त्याचे कोरीव दगड हे दगड नसून इतिहासाची पाने आहेत .इतर देवळातली शिल्पे ही राम ,कृष्ण यांच्या पौराणिक कथांवर आधारलेली आहेत परंतू इथे जे लोक प्रत्यक्ष येत होते त्यांची चित्रे आहेत .गोव्यातून पोतृगीझ घोडे विकायला यायचे .ते त्यांच्या नेहमीच्या पोशाखात ,दाढी आणि टोपी घातलेले कोरले आहेत .राजस्थानातून उंट आलेले आहेत .उंटाना दोरीने चालवणाऱ्या घागरा घातलेल्या बायका आहेत .हत्तींनाही स्त्रिया चालवत आहेत .दांडियाचा खेळ चालला आहे .
हम्पि -१५
परंतू चित्रे कोणीच बघत नाही .सर्वजण वरती दंगा करण्यात मग्न .
याच्या मागच्या बाजूस आहे पायऱ्यांचा तलाव .राण्यांना जलक्रीडेसाठी .आत पाणी नाही त्यामुळे सर्व पायऱ्या पाहता येतात .यासाठी पाणी येथवर आणण्यासाठी दगडी पन्हाळ सहा फूट उंचीवर बसवली आहे .ती पार आवाराच्या बाहेर पूर्वेला निघते .तिथे पखालीतून पाणी ओतले जात असेल .या चा फोटो नाही जमला .
अगदी टोकाला राजवाड्याचे तळघर फक्त राहिले आहे .
यासर्वाला तटबंदी होती तीचे तीनफुटी अवशेष उरले आहेत .याचे प्रवेशद्वारही दगडी होते ती दोन्ही अजस्त्र कोरीव दारे त्यांच्या अडण्यासह तिथेच पडलेली आहेत .तळघर पाहून बाहेर पडलो की लगेच डावीकडे आहे एक छान मंदिर .हजाररामा .
हे चुकवण्यासारखे नाही .एका तटबंदीच्या आत छोटेसे मंदिर आहे .ताशिव काळे चार खांब छान आहेत .बाहेरच्या भिंतीवर रामायण आणि कृष्णचरित्रातले प्रसंग ठसठशीत आणि उठावदार आहेत .अर्धा तास लागु शकतो .उजविकडे एक कमलमहालात वाट जाते .तिकीट हातात असल्याने इथूनही आत जाता येईल .नाहीतर थोडे पुढे जाऊन मुख्य दारातून आत जायचे .
हम्पि -१६
कमलमहाल
हे आपले शेवटचे ठिकाण .याची वीसफुटी दगडी तटबंदी तळाला रुंद आणि वर अरुंद बाहेर झुकल्यासारखी आहे .त्यामुळे फुललेल्या कमळासारखी वाटते .आतमध्ये मुख्यवास्तु मुस्लीम पध्दतीचा बांधकाम असलेला हत्तीखाना आणि राणी महाल .राजाकडे मुस्लीम स्थपति होते बहुतेक .अकरा लहानमोठे हत्ती उभे राहतील अशी घुमटांची इमारत आणि बाग छानच आहे .पुढे रंगामंदिरात मोठा मारूती आहे .मंदिर पडायला आलेय .अगदी शेवटी एक दुर्लक्षित जैन मंदिर पाहून तिकडूनच राणीस्नानागार मार्गे हम्पि दर्शन संपवून होस्पेटात परत आलो .हेलिकॉप्टर राईड करायचे ठरवले होते परंतू रांगेत उभे राहण्याचा त्राण राहिला नव्हता .डेपोजवळ शानभाग स्नैक कॉर्नरमध्ये पदार्थ गरमागरम छान आणि झटपट मिळायचे .बिसि बेळी अन्ना हा खास भाताचा प्रकार खायचा राहूनच गेला .ती सकाळ/दुपारची डिश आहे असे कळले .
संध्याकाळी यात्री निवासचे मालक प्रभुंशी गप्पा मारल्या .तिरुपतीच्या लावलेल्या मोठ्या फोटोकडे बघून म्हणाले हे हॉटेल यांची कृपा . वडिलांनी बांधले .पूर्वीचे राजे कसे प्रजेची काळजी घ्यायचे आता काय आहे ?हा परीसर मला फार आवडला .होस्पेट राहण्यासारखे आहे .उद्या लखुंडि .
खूप छान आणि तपशीलवार लिहित आहात.
हंपी बघायची उत्सुकता दिवसेंगणिक वाढत आहे.
धन्यवाद वल्ली .कानडी बोलणारा कोणी बरोबर असल्यास माहितीमध्ये अधीक भर पडू शकते .
बहळा सुंदरवादा ,उटा ?तिंडि ? एष्टु दूरा ,कन्नडा गोत्तिल्ला ,स्वल्पा ,बेकू ,ब्याडा ,मुंदिना ,आकडे ,इत्यादीवर काम भागवले .
भाषेवाचून तिथे काही अडू शकते का? म्हणजे एकवेळ माहीती कमी मिळाली तरी चालेल पण निदान तिथे साध्या साध्या गोष्टींवाचून अडू नये. उदा. ही बस कुठे जाते, ठिकाण कुठे, रिक्षावाल्याला कुठे सोडायचे ते समजणे, खाणे चांगले कुठे मिळेल असे साधे प्रश्न.
सह्सा अडेल. बसवरची माहिती कानडीमधून असते - नव्या बसेस वर इंग्लिशमधूनही लिहिलेले असते. रिक्षावाल्यांना होंदी समजेलच असे नाही, कधीकधी समजूनही न समजल्यासारखेही करतात, असा अनुभव आहे.तगदीच अडेल असे नाही, पण बर्यापैकी अडू शकते कधीकधी. हिंदीपे़क्षा इंग्लिश अधिक चालून जाते. :)
ह्म्म.
ओके.
आता कामापुरती कन्नड शिकणे आले.
फायदा तर होतोच. :)
वल्ली, जमल्यास मी येऊ शकेन. कन्नडचं टेण्षण नको. तारखांचं बघा फक्त. मला अन्यत्रही जाणे आहे, सबब जास्त दिवस हंपीला देणे शक्य नाही- द्याटिज़ रजा मिळणे औघड.
बेष्ट रे.
मी सहसा ऑफ सीजन मध्ये प्लान करेन म्हणजे ऑक्टोबर्/नोव्हेंबर दिवाळीच्या मागचे पुढचे १५/२० दिवस सोडून.
मी ७/८ दिवस सुट्टी काढून बदामी, ऐहोळे, पट्टदकल आणि लकुंडी पण करेन तुला इतकी नसेल तर मध्ये २/३ दिवस हंपीला जॉइन हो.
ठीक.
नोव्हेंबरात जमणे अवघड आहे, ऑक्टोबरात जमू शकेल. हंपीपुरते जॉइन होऊ शकतो नक्कीच. ऐहोळे इ. अगोदर पाहिलंय-यद्यपि आत्तासारखं डीटेलवारी नाही. त्यामुळे मेन स्ट्रेस हंपीच.
इतके दिवस वाचत अहे, आज प्रतिसाद द्यायला वेळ मिळाला आहे :)
खूप सुरेख लिहित आहात तुम्ही, मी वाचन खूण साठवत आहे. एकदा फक्त हंपीला भेट द्यायची आहेच. तेह्वा ही माहिती उपयुक्त ठरेल.
अजून एक सूचना.
लकुंडीसाठी नवा धागा चालू करा.