भटकंती कर्नाटकातली
Primary tabs
((अपडेट २०२१ जुलै
Photobucket या साईटवरून या लेखात दिलेले फोटो ती साईट बंद ( फ्री साईटचे शेअरिंग बंद झाले) झाल्याने बदलावे लागले आहेत. त्यामुळे प्रतिसादात व लेखातल्या क्रमांकात फरक पडला आहे.))
जानेवारी महिन्यात कर्नाटकात थोडी भटकंती केली होती त्याची थोडक्यात माहिती देत आहे .
फोटो
इथे कलादालनातआहेत.
सर्व फोटो नोकिआ X2-00चे
काही नकाशे खाली दिले आहेत .
प्रिंटेड नकाशांचे फोटो प्रसिध्दीपत्रकांतील घेतले आहेत .रखाचित्रे माझी आहेत
बिजापूर नकाशा
भटकंतीची ठिकाणे ऐतिहासिक आणि पुरातन (हेरिटिज) स्वरूपाची आहेत .धार्मिकपण नाहीत .सर्वाँना आवडतील अशी थंड हवेची ठिकाणे अथवा समुद्रकिनारे नाहीत . बदामि ,हम्पि आहे .बिजापूर (विजापूर)ही पाहिले गोलघुमटसाठी .
केव्हा जावे:
मार्च ते ऑगस्ट सोडून कधीही चालेल कारण ऊन फार असते .पाऊस इकडे फार पडत नाही .
मार्ग:
रेल्वे सोयीची आहे .बिजापूर मोठे स्टेशन आहे .सोलापूरपासून दोन तास लागतात .याच मार्गावर पुढे आणखी दोन तासावर बदामि आहे .मुख्य गाव पाच किमी दूर आहे .आणखी दोन तासावर गदग स्टेशन आहे ,येथे अकरा किमीवर लखुंडी आहे .गोव्यातून एक रेल्वे मडगाव -हूबळी -गदग-होस्पेट-बेल्लारी अशी जाते .होस्पेट मोठे स्टेशन असून अकरा किमीवर हम्पि आहे .
काही उपयुक्त रेल्वे :
(१)मुंबई/विजापूर फास्ट पसेंजर ५१०२९/५१०३० आठवडयातून चार दिवस .
(२)सोलापूर हुबळी एक्सप्रेस ११४२३ रोज
(३)हुबळी ते मुंबईसाठी
चालुक्य ए ११००६ /११०२२ ,
शरावती एक्स ११०३६ ,
शिवाय १७३१७ /०६५११ आहेत .
रस्त्याने: सोलापूरहून इकडे होटगि सोडून सीमा ओलांडली की स्वच्छ आणि सुंदर रस्ते आहेत .कुठेही जाता येते .फक्त एकदा टोलनाका लागतो .कोरडी आणि आल्हाददायक हवा ,सूर्यफूल ,मका ,ज्वारी ,बाजरी ,गहू ,मिरची ,चणे यांची हिरवी शेते आपली सोबत करतात .स्वत:चे वाहन नसले आणि राज्य परिवहनाच्या बसने जात असाल तरीही तुमचा प्रवास आनंददायकच होणार .स्वच्छ आणि मॉलसारख्या इमारती असलेल्या डेपोतून चकाचक बसेस नियमित सुटतात .
हॉटेल्स : (अपेक्षित दिवस)
विजापूर (१),बदामि(२) आणि होस्पेट (२)तीनही ठिकाणी सर्व थरातली भरपूर हॉटेल्स आहेत .लखुंडीला काही नाही .जाता जाता करता येते .
खाणे :काही प्रश्न नाही .
काय पाहाल :
बिजापूर -गोलघुमट ,ईब्राहिम रोजा ,उपली बुरूज आणि मोठी 'मलीक ए मेदान' तोफ .
बदामि :चार गुंफा ,अगस्ति तलाव ,पंधरा देवळे ,बनशंकरी स्थान आणि तलाव .एक दिवस .
ऐहोळे आणि पट्टडकल: (बदामिहूनच जाऊन येणे) पंचवीस देवळे .
हम्पि :तुंगभद्रा डैम ,नदी काठची देवळे खासकरून विरुपाक्ष आणि विठ्ठलमंदिर ,दगडी रथ .विजयनगर साम्राज्याचे अवशेष .
लखुंडी :अकरा खास देवळे .
हुबळी :रेल्वे स्टेशन आणि इमारत .
बिजापूर -१(विजापूर):
मी इथे दोन वर्षाँत दोनवेळा आलो .सुरुवात बिजापूर पासून करणे सोयीचे पडले कारण मुंबईहून थेट गाडी ५१०२९आहे जी दुपारी एक वाजता पोहोचते .स्टेशनहून बस स्टैंडकडे जातानाच गोलघुमट आहे परंतु प्रथम हॉटेलच्या रुमवर सामान टाकून मोकळे फिरायला बाहेर पडायचे .ललितामहाल बजेट हॉटेल आहे .स्टेडीअमजवळ मयुरा आदिलशाही आणि इतर थोडी चांगली हॉटेल्स आहेत .
तीनही मुख्य ठिकाणे दोन एक किमीटरात शहरातच आहेत त्यामुळे रिक्षाने जाता येते ,स्पेशल करू नये .प्रथम गोलघुमट पाहिला .अरुंद दोन फुटी जिन्याने ७ मजले चढल्यावरच प्रतिध्वनीच्या सज्जापर्यँत जाता येते .गुडघ्यांची वाट लागते (पुढील सहा दिवसांत पायांचीही वाट लागणार आहे )पण प्रतिध्वनी ऐकल्यावर आणि वरून शहर पाहिल्यावर फार आनंद होतो .शहरांत असे बरेच घुमट दिसतात .फक्त चुना आणि विटांनी बांधलेला ३८ मिटर्सचा मोठा घुमट जगातला दुसऱ्या स्थानावर आहे .जगातील पर्यटकांना भारतात आणण्यात मुस्लिम इमारतींचा मोठा वाटा आहे .या ठिकाणी दीड तास मोडतो .आता लगेच इब्राहिम रोजा गाठणे .
बिजापूर-२ या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रशस्त आवारात बाग बनवून स्वच्छता राखली आहे .इथे भव्यतेपेक्षा कलाकुसरीला अधीक प्राधान्य दिले आहे .आपण जर दोन दिवस विजापूराला राहणार असाल तर जरा सावकाश पाहता येते अथवा सकाळच्या वेळी तरी हॉटेलात यायला हवे .म्हणजे घाई होणार नाही .रोजाची भेट उरकून थोडे अलीकडे शिवाजी सर्कलला तोफ आहे .मलिक ए मैदान तोफ पाहून जवळच्याच उंच उपली बुरुजावर आणखी तोफ आहे .साडे पाचला बंद करतात .तसं बिजापूर रेंगाळण्याच्या आणि जास्ती राहण्याच्या दृष्टिने बरोबर नाही वाटले .हि ठिकाणे पाहण्यासाठी राहायचे .स्टेशनच्या जवळ काही नाही .बस डेपो प्रशस्त आणि स्वच्छ आहे .इथल्या 'नंदिनी'च्या दुकानात धारवाड पेढे चांगले मिळतात .
समजा तुम्हाला बिजापूरला काही कारणाने चार पाच तास मिळत असतील तर बस डेपोत बैगा ठेवण्याची क्लोकरूम आहे .साध्या चेनवाल्याही बैगा ठेवून घेतात .(रेल्वेवाले बिनकुलुपाच्या ठेवत नाहीत) .बैग ठेवून मोकळे फिरू शकतो .शिवाय चांगले टॉइलेटस आहेतच .स्टेट बैंक एटिएम आहेत .
असे अर्ध्या दिवसात बिजापूर आटपले.दुसरे दिवशी बदामिला जाणयासाठी सोलापुर हुबळी गाडीकरता ११४२३ साडेआठला स्टे गाठले .
बिजापूर-३
सहाव्या शतकानंतर चालुक्यासह वेगवेगळ्या हिंदू राजांची येथे सत्ता होती .हम्पिच्या विजयनगर सामराज्याचा पराभव केल्यावर इथे आदिलशाही आली .
विजापुरात आणखी बरीच पाहण्यासारखी ठिकाणे आहेत म्हटतात .परंतु ती मशिदी स्वरुपाची आहेत अथवा मोडकळीस आलेली आहेत असे कळले होते .बिजापुरात आणि एक दिवस वाढवावा लागला असता .गगन महाल ,असर महाल ,जामा आणि मेका मशिद ,आणि बारा कमान .
मलिक -ए -मैदान तोफेजवळ तीन मलबार हॉनबिल तिथल्या झाडावर आले आणि ही ट्रीप छान होणार असे मनाने घेतले .(सकाळी भारद्वाज पक्षी दिसण्याचाही आतापर्यँतचा अनुभव चांगला आहे ).रस्त्याच्या कडेने डिडीटी पाउडर नगरपालिकेने टाकली होती .गांधी चौकचा उल्लेख/उच्चार गाँध चोक असा ऐकला .सिटि बस मात्र नवीन आणि आवाज न करणाऱ्या होत्या .कंडक्टर सौजन्यशील होते .
सविस्तर माहिती प्रतिसादांत दिली आहे .
वरचे सगळे प्रतिसाद वाचले .बस ,हॉटेल विषयी होस्पेटला भाषेची अडचण नाही .विजापूरला तर नाहीच .हॉटेल कर्मचाऱ्यांना हिंदी येतं .आणि शहरात मारवाडी ,पंजाबींची दुकाने आहेत .एका सक्सेनाचे स्टेशनरोडच्या भपकेबाज हॉटेलमध्ये जंगी लग्न होते .
ऐहोळे आणि लखुंडित ते लोक फक्त कानडी बोलतात .मला गाववाल्यांशी शेतीच्या गप्पा मारायला आवडतात .भाषा येत असली तर फार चांगली माहिती त्यांच्या जीवनाविषयी मिळते .लहान मुलांच्या हातावर ठेवायला काही खाऊ जवळ ठेवतो .आणि हो दहा रुपयांची नाणी जवळ ठेवा ,फार कौतुक याचे इकडे.
इथे कुठेही पर्यटकांना कोणीच त्रास देत नाहीत .दोन वर्षांपूर्वी ऐहोळेच्या रिक्षात एक कॉलेजची मुलगी भेटलेली .तिची पुस्तके पाहून कॉलेज ?सुरुवात केली .ऐहोळे सुंदरवादा .मगळ ?मगन ?(मुली ,मुलगे ?)यावर मी मोबाईलमधले माझ्या बिकॉमला असणाऱ्या मुलीचा फोटो दाखवला .तिला बरेच बोलायचे होते .पण माझ्या स्वल्पा कन्नडा मातनाडुत्तीनी मुळे गाडी अडली .
औब्बळे ?(एकुलती ?) असे संभाषण झाले .असो .भाषा फार उपयोगी पडते मला तरी .(रैपिडेक्सची कृपा)
अजून दोन एक भागात लेख संपेल नंतर योग्य वाटेल तसे वेगळे केलेत तर उत्तम .
हम्पि -१७ ,इतर माहिती .
होस्पेटच्या मुकामात शनिवारी हम्पि पाहण्यात बरीच तंगडतोड झाली .सकाळी सात ते चार फिरलो .परंतू समाधान झाले .तशी कर्नाटक पर्यटनची टुअरही निघते .कॉलेजरोड हॉस्पेट पर्यटन केंद्राहून .९.३० ते ५.३० ,रुपये दोनशे .पण ते तुंगभद्रा गार्डन आणि एका इम्पोरिअमला वेळ काढतात असे कळले .शिवाय उरकणे पध्दतीने पाहायचे तर कशाला जायचे .मला धरणाची बाग बघायची नव्हती .
बंगळुरूहून १४ क्रमांकाची सहल आहे "North Karnataka Tour -5 day tour ,(२०१३चे पत्रक) :Every Thursday during season (October - January ) Dep : 9.00p.m. Arr: 6.00 a.m. (Monday) Fare Rs.2510/- (including accommodation) Places of visit - Tungabhadra Dam , Hampi , Badami , Aihole , Pattaadakal , Bijapur , Kudala Sangama ."
कमलापूरपासून पंधरा किमी वर एक अस्वलांचे अभयारण्य बनवले आहे .
काम्पिलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मलयरघुवन्ते मंदिर आहे .
चित्रदुर्ग किल्ला .होस्पेटपासून १४०किमी बंगळुरू हायवेवर आहे .विजयनगर साम्राज्यातलाच एक पण नंतर स्वतंत्र झाला .इकडे चौदा मंदिरे आहेत .
लखुंडि - १
आज रविवार .होस्पेटचे हॉटेल सोडून हुबळीला जायचे होते .दीडशे किमी आहे .वाटेत नव्वद किमीवर लखुंडी येथे उतरून मंदिरे पाहायची आणि तसेच पुढे हूबळीला दुपारी तीनची शरावती इक्सप्रेस मिळणार होती . दुपारी दोनला एक गरीबरथ पण आहे परंतु घाई नको म्हणून त्याचे तिकीट नाही काढले .जाताजाताच लखुंडि होणार होते फक्त बैगा घेऊन फिरावे लागणार होते .इथून गदग (स्टेशन) अकरा किमी आहे .होस्पेट ते हुबळी बस खूप असतात त्यामुळे निश्चिंत होतो .
सकाळी सातला रूम सोडून चहा नाश्ता करून बस डेपोत आलो .पावणे आठला बस सुटली आणि दहा वाजता लखुंडिला उतरलो .अगदी छोटासा डेपो आहे आणि गाववाल्यांशिवाय कोणी उतरत नाही .इकडे पर्यटक अजिबात फिरकत नाहीत .सगळे गाव बैठ्या घरांचे आहे आणि रस्त्याच्या दक्षिणेला आहे .सगळीकडे दृष्टी टाकली तर एकपण देवळाचे शिखर दिसत नाही .समोरच्या रस्त्यावर आणि बाजूला एक दोन चहा भजीची हॉटेल्स आणि केळीवालाशिवाय काही नाही .
लखुंडी देवळांचा नकाशा पाहा .
आपल्याकडे दहा ते साडेबारा अडीच तासांचा वेळ आहे आणि अकरापैकी सहा सात देवळे पाहणार आहोत ती दीड दोन किमी च्या एका फेऱ्यात आहेत .एवढा वेळ पुरेसा आहे .
लखुंडि - २
माणकेश्वरा ,मुस्वीनाभावी आणि पायऱ्यांची विहीर : यासाठी बस डेपोच्या मागेच दहा मिनिटे चालावे लागते .एका मोठ्या आवारात एक जैन मंदिर आणि ही विहीर आहे .माणकेश्वराचे मुखमंडपाचे खांब सुबक आणि घोटीव आहेत .बाकीचा राखाडी रंगाचा वालुकाश्म आहे .आवारात बाग करून स्वच्छ ठेवले आहे .
कल्याण चालूक्य नावाचा एक वेगळा राजवंश ९ते ११ व्या शतकात राज्य करत होता .त्यांनी ही मंदिरे बांधली आहेत .सर्व शंकराची आहेत .विष्णू नाही .विशेष म्हणजे जैनदेवालये बाजूलाच आहेत .राजवंशात त्यांचाही दबदबा असणार हे उघड आहे .इथे बऱ्याच ठिकाणी अत्यंत कठीण अशा काळ्या दगडाचा उपयोग केला आहे .बारीक कोरीव काम करता येते आणि ताशिवही होतो .खांबांवर एकाच वेळी समोरच्या वस्तुच्या उलटसुलट प्रतिमा दिसतात .आठ फुटी खांब अखंड नाहीत दोन तीन तुकडे जोडून उभे केले आहेत आणि लांबलचक दगड मिळवण्याचा प्रश्न सोडवला आहे .जी गोष्ट भव्यपणात नाही ती इकडे कलाकुसरीने सोडवली आहे .आणखी एक वैशिष्ट्य गाभाऱ्याची दारांची चौकट आहे ती पाहा .खांब जोडूनही एकसंध वाटतात तर चौकट एकाच दगडात पाच सहा वेगळ्या नक्षीदार पट्टया लावल्याचा भास देतात .
लखुंडि -३
माणकेश्वरा पाहून रस्ता ओलांडून थोडे मागे होस्पेटच्या दिशेने आलो की एक पाटी दिसेल विरुपाक्षाकडे .गावातून रस्ता सापडायला हवाय ? एखाद्या मुलाला विचारा .पटकन नेईल . या क्रमाने जायचे विरुपाक्ष -कुंभारेश्वरा -मल्लिकार्जुना -काशिविश्वेश्वरा .आता हे इथले खास जोड मंदिर आहे .शंकराचे आणि सूर्यनारायणाचे समोरासमोर तोंड करून आहेत . मध्ये जोडणारे छप्पर आता नाही .एकाच आवारात आहेत .अरे ,पण दाराला कुलूप आहे .काळजी नको .आपल्याला पाहून एक राखणदार लगेच आपल्या मागे येतो .दार उघडून माहिती सांगू लागतो कानडितून .थोडे संस्कृत शब्द असल्यामुळे कळते .जेवढी उत्सुकता दाखवाल तेवढे सांगत जातो .सूर्यनारायणाची मूर्ती काढून म्युझिअममध्ये ठेवली आहे .हळे (=जुना)कन्नडा शिलालेख आहे .शिल्पाने मंदिरे खच्चून भरली आहेत .बाहेरचा दगड पावसाच्या पाण्याने झिजला आहे .दोन तीन माकडे काही खाऊ आणलाय का बघायला येतात .
आता रस्त्या समोरचे नानेश्वरा मंदिर हाच माणूस उघडून दाखवतो .खांबांची शोभा पाहात आपण चटकन त्यामधून दिसणाऱ्या काशि०चा फोटो घेतो .राजांचे चिन्ह हा एक त्यांचा आवडीचा विषय असतो .
लखुंडि -४
कल्याण चालुक्य राजांनी एक वेगळाच काल्पनिक प्राणी शुभचिन्ह म्हणून निवडला .त्याचे शिल्प इथे आहे .मोराची शेपटी (पिसारा ) ,घोड्याचे शरीर ,सिंहाचे पंजे ,मगरीचा जबडा आणि हत्तीची सोंड या प्राण्याला आहे .
नानेश्वराच्या रस्त्यानेच पाच मिनिटांवर आहे म्युझिअम .आत ती सूर्यनारायणाची मूर्ती दिसते .एक मोठा नकाशाही आहे .आवाराच्या मागे मंदिर आहे .ब्रह्मजिनालय .सुंदर खांब आहेत .तिर्थँकराच्या या देवळातच ब्रह्मा आणि पद्मावति (=सरस्वती ?)च्या मूर्ती आहेत .एखाद्या खांबाशी माकडाचे कुटुंब बसलेले असते आपले नेहमीचे उद्योग करत .बाजूच्याच मंदिराबाहेर एक शिर नसलेली जैन तिर्थँकराची मोठी मूर्ती ठेवली आहे .
आता बारा वाजत आले होते आणि आम्ही पाच मिनिटांत मुख्य रस्त्याला आलो .डेपोकडे जाण्याअगोदरच एक बस येतांना दिसली .हुबळी ?असे विचारत ड्रायवरास हात केला आणि त्याने बस थांबवली .तासाभरात हुबळी(साठ किमी) आले .वाटेत गदगला बाहेरच्या डेपोत थांबते .हुबळी स्टेशनचा स्टॉप अगोदरच येतो (दीड वाजला होता) .छान स्टेशन .रेल्वेनेही आम्हाला ३एसी त अपग्रेड करून खुश करून टाकले होते .परतीचा प्रवास छानच झाला .
सहल आयोजन ./समारोप
१)मुंबईकडून :इथे लिहिलेला मार्ग .
२)पुण्याहून:
वर दिलेल्या जाण्यायेण्याच्या रेल्वे रात्री भलत्याच वेळी पुण्यास येतात .त्याऐवजी असे करता येईल -
पुणे ते हुबळी ट्रेन नंबर १२७८० (+१७३०६)ने मंगळवारी दुपारी ४.२०ला निघून सकाळी ६.२५बुधवार हुबळी .बसने साडेआठपर्यँत लखुंडि .हे पाहून चारपर्यँत होस्पेट .गुरु ०हंम्पि दर्शन .शुक्रवारी सकाळी बदामिकडे .शनि०ऐहोळे ,पटटडकल .रवि०सकाळी बिजापूर .क्लोकरूममध्ये बैगा ठेवून बिजापूरदर्शन .रात्री ९.००ची गरीब रथ (नं ०६५११ ) पकडून सोमवारी पहाटे पाच पुणे .
३)गोव्याकडून
अमरावती इक्स०(१८०४८) चार दिवस .मडगाव (०७.५०) हुबळी गदगमार्गे होस्पेटला तीन वाजता जाते .परत सकाळी ६.३० ला आहे .
कंजूसकाका, जगात भारी दिसतंय हे लक्कुंडी (लक्कुंडीचा अल्बम मात्र दिसला नाही)
कल्याण चालुक्यांचे काही महाल जैन घराण्यातील होते म्हणून त्यांनी जैन देवळे पण मोठ्या प्रमाणावर उभारली. हे असेच राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष आणि सिन्नर / देवगिरी यादवांच्या काळातही होत होतेच.
सर्व ठिकाणांचे वर्णन खूप छान आणि सहज समजेल असं लिहिलंत.
तुम्ही वर फिरायचा जो आराखडा दिलाय तो फार घाईघाईचा वाटतो म्हणजे दोन तीन तासात लक्कुंडी, एकेक दिवसातच हंपी आणि बदामी आणि एकाच दिवसात ऐहोळे आणि पट्टदकल. ह्यात ठिकाणे सर्व बघून होतील पण केवळ भोज्याला शिवून आल्यासारखे वाटणार नाही का?
आयकोनॉग्राफी, मंदिरशैली बघायची तर भरपूर वेळ हवा.
बाकी असेच लिखाण बेलूर, हळेबीडूवर पण येऊ द्यात.
लखुंडीचे फोटो त्या दुसऱ्या लिंकमध्ये आहेत .मोठ्या मूर्तीँचे घेतले पण आतली शिल्पे अंधारामुळे फ्लैश टाकल्यावर चमकली आणि नीट नाही आली .शिवाय फार लहान आहेत .तरी जी आहेत ती अपलोड करतो .
लखुंडीला एक दिवस द्यायचा तर कुठे राहणार ?होस्पेटलाच राहून करून परत जायला लागेल .शिवाय आपल्या बरोबरचे दुसरे इतका वेळ देणारे हवेत .मी पहिल्यांदा एकटा होतो तेव्हा काय कुठे पाहून घेतले .या वर्षी बायको मुलगी होती .त्यांना एवढेच ठीक वाटले .म्हणूनच पर्यटक लखुंडि वाटेवर असून टाळतात .
तुमचा पुण्याचा प्लान दिला आहे त्यात तुम्हाला साडे आठ ते चार वेळ मिळेल .कुणा एकाला बैगा संभाळत स्टैंडला बसवले तर रिकामे फिरता येईल .आठ तास खूप होतील .काय वाटते ?
बेळूर हळेबिडू नाही पाहिले अजून पण केरळ (मंदिरे) पाहिले .
धन्यवाद.
फोटो बघून घेतो आता.
लक्कुंडीला सुरसुंदरी आहेत का? का फक्त देवादिकांची शिल्पे आहेत?
बाकी आठ तास पुरतील का नाही ते तिकडे गेल्याशिवाय कळायचे नाही.
बाकी वेरूळला कधी येताय? मला परत जायचे आहे. २ दिवस भटकून येऊ.
सुरसुंदरी नाहीत लखुंडिला .एक दिवस राहायचे म्हटले की खर्च वाढतो आणि बरोबरचा कधीकधी नाराज होतो .तुम्ही जाल तेव्हा आणखी गोष्टी समोर येतील आणि लोकांची उत्सुकता वाढेल .तसं पाहिलं तर हंम्पिलाही वेळ कमी पडतो .परंतू इतर दोन तासांत उरकतात .
वेरूळ झाले आहे माझेही दोनदा पण तेव्हा कैमरा नव्हता .
डिटेल माहितीसाठी प्रचंड धन्यवाद! आता कधी जमते बघू! मला वाटते, ट्रेनने जाण्यापेक्षा आम्ही आमची गाडी घेऊन जाऊ, (गोव्यातून). ते जास्त बरे पडेल. हापिसात २५ वर्षे कन्नड लोकांचा यशस्वीपणे मुकाबला केला आहे आणि सतत तोंड चालू असतेच. त्यामुळे भाषेचा काही प्रॉब्ळम येईल असे वाटत नाही.
स्व्ता: ची गाडी घेउन्न गेल्यास जास्त वेळ ही सारी ठिकाणे पहाता येतीलच . होस्पेट ऐवजी कमलापूर येथे रहाणे स्वस्त की
महाग पडते हे मात्र तपासून पहावे. हंपीमधे रहाणे म्हणजे एखाद्याच्या घरी रहाणे. स्वस्त, थोडेसे गैरसोयीचे (खोल्या लहान) पण आपल्याला हवे तसे जेवण मिळण्यास सोयीचे.
कारने गेल्यास जास्ती वेळ ठिकाणे पाहता येतील नक्कीच.खासकरून लखुंडि सहज होईल .शिवाय कारचा प्लान इतरांना उपयोगी पडेल .
माझ्या मते कारने गोव्याकडून लखुंडि -होस्पेट -चित्रदुर्ग करावे .नंतर कधी तरी बदामि-ऐहोळे-कुडलसंगमा-बिजापूर करावे .
बिजापूर ते धारवाड/बिजापूर -होस्पेट चित्रदुर्ग-बंगळुरू हायवे आहेत .हुबळी -लखुडि-होस्पेट हायवे नाही परंतू रस्ता चांगला आहे .फक्त हायवेला टोल आहे .
होस्पेटात राहण्याचे प्रचंड पर्याय आहेत .रात्री जेवणानंतर पाय मोकळे करायला शहर बरे वाटते .कमलापूर ओसाडवाणे वाटेल नंतर .कार नसल्यासही चिंता नसते कारण सकाळी ६ ते संध्या ६ दर दहा मिनिटांस बस सुटते .
आम्हाला हुबळी जवळ. त्यामुळे हुबळीला पहिला मुक्काम टाकून जवळचा कित्तूरचा किल्ला, कमलानारायण देऊळ आणि हाळशीची देवळे हेही सहज होईल. तिथून मग पुढे जाता येईल.
ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास जमतंय का बघा ना? आम्ही पुण्याहून येऊ.
एवढा वेळ असल्यावर सहज ठरवता येईल.
एक वर्षांपूर्वी कर्नाटकात फिरलो. त्यासंबंधी ब्लॉगवर लिहिले आहे. दुवे खालीलप्रमाणे -
कूर्ग
मुरुडेश्वर
दोन्ही ब्लॉग वाचले ,चलतमुसाफिर .फोटो छान दिलेत .कर्नाटक किनारा अधिक घाटावरील जागांना भेट देण्यासाठी स्वत:चे वाहन असल्याने फार सोय होते हे निश्चित .
इतिहासासाठी मी एक लेखमाला लिहिली होती त्याची लिंक खाली देत आहे........
http://www.misalpav.com/node/22689
फारच छान आहे लेखमाला जयंतराव .पुन्हा एकदा वाचून काढेन .आपली मराठी अथवा संस्कृत जुनी हस्तलिखीते तंजावरात आहेत का ?
काका धन्यवाद इतकी सविस्तर माहिती लिहिली आहे.
जानेवारीत जाणार आहे तेव्हा तुमचा, चौ रा काकांचा आणि इतर लेख खुप उपयोगी पडतील.
आम्ही रोड ट्रिप करणार आहोत कोल्हापूर मार्गे.
रोड ट्रिप करणार तर आणि धार्मिक आवडत असेल तर "कुडलं संगम" मार्गे एक हॅाल्ट घेऊन पाहा. शिवाय काही नवीन ठिकाणं तुम्हाला मिळतील ती मला करता आली नव्हती.
नेटवरती १)बनशंकरी जत्रे , बदामि आणि २)हंपि उत्सव तारखा शोधुन पाहा. त्यावेळी काही मजा असते पण गर्दीही असते.
हंपी उत्सव झाला या वर्षीचा आत्ताच या महिन्यात सुरुवातीला. गर्दी नकोय मला. तीन दिवस हंपी आणि दोन दिवस बदामी ठरवलय. येतांना मी कोल्हापूर थांबूया म्हणतेय पण नवरा डायरेक्ट पुणे येऊ म्हणतोय.पण दोघच असल्याने मी रात्री उशिराचा प्रवास टाळते.