Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मंत्रसामर्थ्य

य
यनावाला
Sat, 11/14/2015 - 16:55
🗣 233 प्रतिसाद
परवा एका कार्यक्रमात एक उच्चशिक्षित अध्यात्मवादी म्हणाले, "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.” या विधानात काही तथ्य आहे काय ? ॐ ऊर्जेचा प्रत्यय कधी,कोणाला, कोठे, कसा आला ? या प्रचंड ऊर्जेचे अस्तित्व विज्ञानाने कोणत्या पद्धतीने सिद्ध केले? भर सभेत असली विधाने करायला अध्यात्मवादी कसे धजावतात? अर्थात सभेतील अनेक गलिबलांना (भोळसटांना) ती महान सत्ये वाटतात . ते स्वबुद्धीने विचार न करता माना डोलावतात,"वा! काय विद्वत्ता आहे!" असे म्हणतात , हे खरे. आरोह-अवरोहांसह नाका-तोंडातून शास्त्रशुद्ध सानुनासिक (गेंगाणा) स्वर काढून ॐ-गुंजन करणारे एक्स्पर्टस् आजसुद्धा देशात आहेत.मग आपण अणुभट्टी का उभारतो? ॐ- उच्चारणातील प्रचंड ऊर्जेने टर्बाइने फिरवून विद्युत् निर्मिती का करत नाही? असे करणे शक्य नसेल तर ॐ मध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हणतात ते कोणत्या अर्थाने? "कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा " अशी ऊर्जेची व्याख्या आहे. ऊर्जा आणि शक्ती हे शब्द समानार्थी आहेत. हां! अखंड अकरा तास बद्धमूलासन घालून ॐ-जप करणार्‍या व्यक्तीला वाटू शकेल की, " ..आता माझी कुंडलिनी जागृत होत आहे...तिने अर्धे वेटोळे सोडले...दीड उलगडले...साडे तीन वेटोळी संपली...बघा! आता तिने फणा उभारला...सुषुम्णा मार्गाने कुंडलिनी वर वर चालली आहे...ती पाहा...आता ती चंद्र तळ्यातले सतरावीचे अमृतस्तन्य प्राशन करीत आहे...घट्..घट्..घुट्..संपले....आता ती ब्रह्मरंध्र भेदित आहे....फट्.. फट् ..फाट्... फोडले....माझी कुंडलिनी चिदाकाशात विलीन झाली...मी देहातीत झालो... जीवन्मुक्त झालो.. ब्रह्मरूप झालो...आनंद...आनंद...सच्चिदानंद...ब्रह्मानंद!" हे सगळे व्यक्तिगत भ्रम आहेत. त्यांत वैज्ञानिक सत्याचा लवलेश नाही. ** भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. त्यावेळी या प्रचंड ओम् ऊर्जेच्या योगाने कोणी कधी प्रतिकार केल्याची एक तरी ऐतिहासिक नोंद आहे का? मूर्तिभंजकांनी सोरटीच्या सोमनाथाची शकले पाडली. तेव्हा ते अविवेकी कृत्य या ॐ-शक्तीच्या आधारे कोणीच कसे रोखले नाही? अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले?. **थोरले माधवराव पेशवे कर्तृत्ववान होते. दुर्दैवाने तरुणपणी त्यांना क्षय रोगाने ग्रासले. अनेक आयुर्वेदाचाचार्यांच्या उपचारांनी गुण आला नाही. अंतिम समयीं मृत्युंजयमंत्रपठणासाठी वेदशास्त्रसंपन्न अशा शेकडो ब्रह्मणांना नियुक्त केले. पण हा महामंत्रजागर निष्फळ ठरला. पेशव्यांचा अकाली मृत्यू टळला नाही. **" माझा प्रवास"या पुस्तकात विष्णुभट गोडसे यांनी पुढील वर्णन लिहिले आहे:--(हे गोडसे १८५७ साली उत्तर हिंदुस्थानात प्रवासाला गेले होते.) "शत्रूचा नि:पात होऊन राज्य सुरक्षित राहावे म्हणून झाशीच्या राणीने अनेक अनुष्ठाने केली, मंत्रजप केले. अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने झाली. पेशव्यांकडून त्वरित मदत यावी म्हणून शंभर ब्राह्मण विशेष मंत्रजपास बसविले. पण गोरे लोक शहरात शिरून नरसंहार करू लागले. देवाघरचा न्याय मोठा चमत्कारिक. निरपराध लोकांना केवढी मोठी शिक्षा! झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप मोठे. सर्व मंत्रजप व्यर्थ ठरले. भटांस मात्र सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा मिळाली."--- ब्राह्मणांचे शास्त्रोक्त मंत्रजप व्यर्थ गेले याचे कारण झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप असे गोडसे भटजी म्हणतात.पण हा कार्य-कारण भाव चुकीचा आहे. मंत्रांत काही सामर्थ्य नसते. म्हणून मंत्रजप व्यर्थ गेले. सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा या गोष्टींचा लाभ घेणार्‍यांत विष्णुभट हेही एक होते. अग्निपुराणात मंत्रसामर्थ्याचा अगाध गौरव आहे. त्यातील संग्रामविजय मंत्र:-
:--"ॐ-र्‍हीं चामुण्डे।स्मशानवासिनी किलि किलि हुम् फट्।ॐ-मारय।ॐ-दण्डेन ताडय।ॐ-त्रिशुलेन छेदय।ॐ-चामुण्डे।किलि किलि हुम् फट् स्वाहा।"
लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मंत्र:-
:---"ॐ श्रीं र्‍हीं र्‍हीं क्लीं क्लीं ऐं कमलवासिन्यै नम:।"
असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते. मंत्राने काही साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. वरील ऐतिहासिक सत्य घटनांवरून याला पुष्टी मिळते. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक, खुळचट कल्पना आहे. मंत्रसामर्थ्याने चमत्कार घडतात ते केवळ पुराणे,परीकथा,बालसाहित्य यांतील काल्पनिक गोष्टींत .हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.सर्व सारखेच. निरुपयोगी. असे माझे मत आहे. अध्यात्मप्रेमी व्यक्ती गायत्री मंत्राचे अफाट गुणगान करतात. "हा मंत्र संपूर्ण विश्वाचा मूलाधार आहे. (म्हणजे काय ?) या मंत्राचे गायन केले की त्याचे ध्वनी-प्रतिध्वनी अनंत अवकाशात दुमदुमतात. जगभर गायत्री मंत्राचा जप केल्यास पृथ्वी भोवतीचे सर्व वातावरण प्रदूषणमुक्त, शुद्ध आणि पवित्र होईल." असले काही ऐकले की आध्यात्मिक श्रद्धावंत हुरळतो. मग सी.डी.लावून
"ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।"
हा मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी. डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो."आता राहूं दे. नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो. असा आहे या मंत्राचा प्रभाव! कुठल्याही मंत्रात कसलीही ऊर्जा नसते. असले मंत्र म्हणू नये असे नाही. सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे. .......................................................................................
वर्गीकरण
चर्चा:-देव-धर्म-कर्मकांडे-मंत्रजप

प्रतिक्रिया द्या
141687 वाचन

💬 प्रतिसाद (233)
अ
अनुप ढेरे Sat, 11/14/2015 - 17:03 नवीन
हॅहॅहॅ! छान आहे लेख. आवडला.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 11/14/2015 - 17:39 नवीन
टाळ्यांचा कडकडाट! लेख आवडला! काहीतरी सुचतय.... पण तूर्तास रासूदे बाकी लोकांच्या प्रतिक्रिया पाहून परत चक्कर मारतो. :) (इथे गर्दी होईल हा माझा मिपावरचा अल्प अनुभव सांगतो, त्यामुळे एक कोपरा गाठून बसलेले बरे! कसे?) ;-) Sandy
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 11/14/2015 - 17:45 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sat, 11/14/2015 - 18:14 नवीन
५०० झाल्यावर येतो. मागे मंत्रसामर्थ्यावरच्याच, पण उलट्या बाजूने लिहिलेल्या धाग्याने जबरदस्त रनरेट ठेवत तीनशे पार केले होते. तोही धागा दिवाळीच्याच आसपास आला होता.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sat, 11/14/2015 - 18:18 नवीन
मंत्र, त्यांचं सामर्थ्य, वगैरे म्हणजे अॅट वर्स्ट आत्मवंचना आणि अॅट बेस्ट "दिल के बहेलाने के लिए ऐ गालिब..."
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Sat, 11/14/2015 - 18:38 नवीन
जालावर इकडे तिकडे शोधून विविध माहिती हडकून लेख लिहलेला दिसतोय. . . . कारण हे सगळं मी कोठेतरी याआधी जालावर वाचलयं . . . असो (धर्ममार्तंडांच्या प्रतिक्षेत असणारा 'याॅर्कर') आजची स्वाक्षरी-ॐ/卐
  • Log in or register to post comments
द
दिवाकर कुलकर्णी Sat, 11/14/2015 - 21:35 नवीन
ज्योतीषहि ,वास्तुशास्त्रहि असेच थोथांड आहे, पण भले भले लोक त्याच्या कच्छपी लागतात, कर्तुत्वावर विश्वास न ठेवता प्रारब्धावर विश्वास ठेवतात. कधी तरी कुणीतरी लिहीलेली चार पुस्तके वाचून, अशा शास्त्रीना म्हणे भविष्य उलगडतं,ज्याला कांहीहि आधार नाही अशा अचरट गोष्टी,तुमच्या वरील अडचणीवर उतारा म्हणून ते सुचवतात.वास्तुशास्त्रिहि इकडचं दार तिकडं करा, स्वयंपाक घर बदला ,माती आणि मसण काय काय सुचवतात, हातात होकायंत्र घेवून घरभर फिरतात,आणि एरवी अत्यंत चिकित्सक असणार्या व्यक्तिहि अशांच्या आहारी जातात. प्लासीबो इफ़ेक्ट कुठतरी काम करतहि असेल,पण म्हणून त्याच्या कच्छपी लागणं म्हणजे स्वताची हानी दुसर्याचं हासू असा प्रकार होतो.
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Sun, 11/15/2015 - 03:42 नवीन
वास्तुशास्त्रहि असेच थोथांड आहे,
सकाळची कोवळी किरणे घरामध्ये आली पाहिजेत एवढंच त्यामागे शास्त्र आहे,आणि त्यादृष्टिने घराची रचना असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी
म
मारवा Sun, 11/15/2015 - 07:41 नवीन
सकाळची कोवळी किरणे घरामध्ये आली पाहिजेत एवढंच त्यामागे शास्त्र आहे,आणि त्यादृष्टिने घराची रचना असावी. बस्स इतकचं मग इतकी पुस्तके इतके तज्ञ इतके उपाय इतकी तोडफोड इतके परीसंवाद इतका सगळा तुमुल कोलाहल कशासाठी होता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
य
याॅर्कर Sun, 11/15/2015 - 08:17 नवीन
मग इतकी पुस्तके इतके तज्ञ इतके उपाय इतकी तोडफोड इतके परीसंवाद इतका सगळा तुमुल कोलाहल कशासाठी होता ?
वास्तूविशारदांची दुकानदारी आहे ही सगळी! म्हणजे बघा ज्याचा जो व्यवसाय आहे त्याचेच तो मार्केटिंग करतो.आणि ते करत असताना त्यामध्ये इतकी भर टाकतो कि, बापरे बाप! आणि देवादिकांची भिती घालून बुद्धीभेद केला कि बरेचजण त्याला बळी पडतात.(सगळा माईंडगेम हाय ओ) . . . मुळ मुद्दा इतकाच कि घर हवेशीर हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ज
जयन्त बा शिम्पि Sun, 11/15/2015 - 01:06 नवीन
खर आहे , पूर्वी मंत्रोच्चार मुखाने व्हायचा , आता यंत्रे निघालीत , त्या यंत्रांचा उद्धार व्हावयास हवा , पण तसे काही होतांना दिसत नाही. त्यामुळ मनाला मूळ समस्येपासून घटकाभर अन्यत्र घेवून जाण्यापुरताच या मंत्रांचा उपयोग होतो , अन्यथा त्यांचा दूसरा काही उपयोग नाही भाबड्या मनासाठी मंत्रोच्चार ही एक मोठी शक्ती आहे हे वरदान वाटते , पण वैद्न्यानिक दृष्टीकोनातुन ती शक्ती फोल आहे , बकवास आहे .
  • Log in or register to post comments
M
mystic man Sun, 11/15/2015 - 18:50 नवीन
खर आहे , पूर्वी मंत्रोच्चार मुखाने व्हायचा , आता यंत्रे निघालीत , त्या यंत्रांचा उद्धार व्हावयास हवा , पण तसे काही होतांना दिसत नाही तुमचे हे मत म्हणजे टेलरींग मशीन कपडे शिवते म्हणून त्याने माणसासारखे बोलायला हवे असा आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि
ब
बांवरे Sun, 11/15/2015 - 02:19 नवीन
डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो
लेखाचे सार सम्दे ह्याच्यात आले !
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 11/15/2015 - 02:40 नवीन
लेख नेहमीप्रमणेच उत्तम. पण लोकांचे मतपरिवर्तन इतक्या थेट मार्गाने होत नाही, होणार नाही. समाजसुधारणा ही हळूहळू घडवून आणावी लागते.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Mon, 11/16/2015 - 03:59 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 11/16/2015 - 09:25 नवीन
सहमत....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
न
नितीनचंद्र Sun, 11/15/2015 - 05:26 नवीन
त्याच बरोबर, आपल्या स्वतः मध्ये काही परिवर्तन घडल्याशिवाय कोणी समाज सुधारु शकणार नाही. माझा आत्मविश्वास या मंत्राच्या जपामुळे वाढतो याची मेजरमेंट आजच्या युगात नाही. पण याला पर्याय द्याना. अनेक माणसे पोटाच्या भुकेपेक्षा मानसीक व्याधींनी जास्त ग्रस्त आहेत. आजच्या भारतीय समाजात अमेरीकन समाजात प्रचलीत असलेले सायकेट्रीस्ट च्या उठ सुट सल्याच्या पध्दतीचे अनुकरण करण्याइतका पैसा, वेळ आणि सायकेट्रीस्ट ची उपलब्धता आहे का ? मग मंत्रसामर्थ्यावर एखादे पुस्तक वाचुन कोणी अनुभव घेत असेल तर त्याला ते करु द्यावे. कोणा बुवाच्या भजनी लागु नये. किमान भोंदु कोण इतके समजले तर बास आहे. बाकी योगशास्त्र आदीचा स्वतः अनुभव घ्यावा. मग आपण काय म्हणता ते हळु हळु समाजाला पटेल. ध्यानाला पर्यायी मनशांती साठी एखादी साईड इफेक्ट नसलेली गोळी मला ही हवीच आहे. जेष्ठ विचारवंत कै ना ग गोरे यांनी मन शांती साठी मी ध्यान करतो असे म्हणले होते. महात्मा गांधींनी सुध्दा योगानंद परमहंस यांजकडुन क्रियायोगाची दिक्षा घेतली होती. याचे फक्त स्मरण मला या निमीत्ताने होत आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 04/05/2016 - 09:21 नवीन
ध्यानाला पर्यायी मनशांती साठी एखादी साईड इफेक्ट नसलेली गोळी मला ही हवीच आहे.
मन हे स्वप्रयत्नांनी प्रसन्न करावे. एखादे मंत्र, एखादे गाणे ऐकून थोडा वेळ बरे वाटू शकते. स्वतः गुणगुणत राहिल्यास दीर्घ काळ प्रसन्नता राहील. पण अडीअडचणीच्या वेळी न डगमगणे, (फार जास्त) न घाबरता आल्या प्रसंगाला सामोरे जाणे, अपमानाचे , दु:खाचे क्षण प्रयत्नपुर्वक विसरणे, अहंकाराला वेळीच बाजूला सावरणे हे ठरवून करावे लागते. यासाठी योग, ध्यान किंवा इतर गोष्टी (ते तुम्हाला मनापासून आवडेल काहीही असू शकते अगदी रॉक संगीत सुद्धा) केवळ सहाय्य करु शकतात, पण निश्चय तुमचाच असला पाहिजे. म्हणजे सर्वात उत्तम कोचिंग क्लासला गेल्याने केवळ कोणी उत्तम गुणांनी उत्तीर्ण होईल वा त्याला विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होईल असे नाही. आचरेकर सरांचे सगळेच शिष्य अतिशय चांगले क्रिकेटपटू होणार नाहित. तो निश्चय मनातून आधी व्हायला हवा नाहीतर कोणताच मंत्र, कोणताही गुरु निष्फळ ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीनचंद्र
ज
जेपी Sun, 11/15/2015 - 05:45 नवीन
वर्गणी जमा करावी
  • Log in or register to post comments
न
नितीनचंद्र Sun, 11/15/2015 - 05:59 नवीन
"ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.” कसे ? कुठे हा प्रश्न लगेच विचारावा. अशी विधाने करणारे लगेच सावध होतात. आपले शब्द जपुन वापरतात. "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.” मानसीक शक्ती की शारिरीक हा ही प्रश्न विचारायला हरकत नाही. आपल्या माहितीसाठी ओंकाराबाबत सर्वात जुनी माहिती योगसुत्रे ग्रंथात आहे. तस्य वाचक प्रणव: अस महामुनी पतंजली म्हणतात. ओंकाराचा ध्वनी ईश्वराचा वाचक आहे. ओंकार जप म्हणजे ईश्वर उपासना असे महामुनी पतंजली म्ह्णतात. ओंकार जपाने योगमार्गात येणारे अडथळे दुर होतात असे पतंजली मुनींनी म्हणलेले आहे. आपण योगाभ्यास करणार असाल तर किंवा करत असाल तर त्याचा अनुभव घ्यावा.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 11/15/2015 - 06:01 नवीन
लहान मुलांना घोळात घेउन जर तुम्ही आला मंतर कोला मंतर छू! हा मंत्र म्हणलात तर त्याचा बाउ काही काळासाठी का होईना पण पळून जातो. हे माईंड डायर्वटिंग टेक्निक असते. लग्नात भटजींनी म्हटलेल्या मंत्रांमुळे जोडप्यांना मूल होतात असा समज अनेक श्रद्धाळू कुटुंबात वाढलेल्या लहान मुलात असतो. मी त्यापैकी एक होतोच. श्रीराम जयराम जयजय राम हा मंत्र शौचाच्या वेळी म्हटला तरी चालतो असे आमचे तपस्वी गुरुजी सांगायचे. सामर्थ्य मंत्रामधे नसून त्यावरील दृढ ( अंध) श्रद्धेमधे असते. जे शॉक अ‍ॅबसार्बर सारखे जीवनाच्या खाचखळग्यात वापरले जाते. औषध उतारे आणि आशीर्वाद हे सुधीर कक्कर यांचे डॉ श्रीकांत जोशी यांनी अनुवादित केलेले पुस्तक जरुर वाचावे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 11/15/2015 - 06:09 नवीन
झकास लेख. हल्ली काही दुकानात अहोरात्र गायत्री मंत्राचे मशीन लावून ठेवतात. मी त्यांना सांगतो की याने तुम्ही आधी बहिरे व्हाल आणि नंतर हळूहळू वेड लागेल. या मंत्राचा फायदा पहाटे तीन वाजता उठून शुचिर्भूत होऊन एकाग्र चित्ताने एकशे आठ वेळा दररोज कराल, तरच मिळतो.... वगैरे. एकदा एका दुकानदाराला मी विचारले, आप गाय का दूध पीते है या भैस का ? तो म्हणाला भैस का. मग मी म्हणालो फिर आप को गायत्री मंत्र का नही, भैसत्री मंत्र का जाप करना है, गायत्री का तो उल्टा असर होगा. तो आ वासून बघतच राहीला आणि मी गंभीर पणे बाहेर पडलो .
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 11/15/2015 - 06:36 नवीन
@भैसत्री मंत्र का जाप करना है, गायत्री का तो उल्टा असर होगा. तो आ वासून बघतच राहीला आणि मी गंभीर पणे बाहेर पडलो .>> Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
ब
बाबा योगिराज Sun, 11/15/2015 - 09:15 नवीन
ठ्ठो..... ख्या ख्या ख्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
स
सुबोध खरे Sun, 11/15/2015 - 06:14 नवीन
हाहाहा
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sun, 11/15/2015 - 06:15 नवीन
भैसत्री भारीच
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sun, 11/15/2015 - 06:16 नवीन
यनावाला लेख पाडणार... नास्तिक खीः खीः करणार... आस्तिक तलवारी काढणार... राडा होणार निश्चित... काॅलिंग संजय डांगे, तुडतुडी, बाहुबली, साथीयों जोरदार हमला हुआ है... आओ... :) प्यारेची तिखट तिरकस लेखणी मिस करतोय.. :( (ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 11/15/2015 - 06:36 नवीन
आपली तलवार म्यान. बाटगा जास्ती कडवा असतो म्हणतात. तस्मात खेचरी लावून बसतो, कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
M
mystic man Sun, 11/15/2015 - 16:07 नवीन
याला म्हणतात खरा मार भी पड जाये और आवाज भी आये. सणसणीत चपराक.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
म
मारवा Sun, 11/15/2015 - 06:26 नवीन
हळुहळु काही दहा पंधरा हजार वर्षात नक्कीच बदल होणार म्हणजे होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अजुन झालीच कीतीकशी दोनतीन हजार वर्षे. रेलगाडी धीरे धीरे यनावाला फारच घाई बुवा तुम्हाला थोड आहीस्ता आहीस्ता दमादमाने घ्या म्हणतो मी. ते नाही का हयॉ यकलख्त आयी शबाब आहिस्तॉ आहीस्तॉ उधर है जल्दी जल्दी इधर है आहीस्तॉ आहीस्तॉ तुम्ही कीनई एकदम आलापी वरुन द्रुतगतीने ताना घेऊ लागतात मग आमची त्रेधातिरपीट उडते बघा
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sun, 11/15/2015 - 09:53 नवीन
बदल हळूहळू होतो. हुकूमशाही असती तर बदल वेगाने होऊ शकतात. पण मग समाजात पुराणमतवादी आणि नवमतवादी यांच्यात संघर्ष उभा राहातो. तुर्कस्तान हे अगदी मोठं उदाहरण आहे. जोपर्यंत धार्मिक स्वातंत्र्य आहे तोपर्यंत सामाजिक सुधारणांचा वेग हा कमीच राहणार. एखादा हुकूमशहा सगळ्या धर्ममार्तंडांचं शिरकाण करून धार्मिक प्रश्न कायमचे सोडवण्याचा प्रयत्न करु शकतो पण ते पूर्णपणे सुटणं कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Sun, 11/15/2015 - 10:00 नवीन
हुकुमशाही संदर्भातील विवेचन मार्मिक आणि तुर्कस्तान चे उदाहरण रोचक प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
प्रकाश घाटपांडे Sun, 11/15/2015 - 11:18 नवीन
थोडे घाई करणारे लोक बी लागतातच की! एक पिअर प्रेशर तयार करायला कोणीतरी पाहिजेच. तुमचही दमाने घ्यायचा मुद्दा योग्यच आहे. समाजसुधारकांनी समाजाच्या किती पुढे असावे? चार पावले. नाहीतर सुधारक समाजापासून तुटून फक्त पुढेच जायचे व मागे समाज आहे याच काही भानच रहाणार नाही.प्रबोधनाचा वेग समाजाच्या सरासरी गती पेक्शा फारच झाला तर असे होते.त्याच बरोबर सुस्त समाजाला डिवचणार ही कुणी पाहिजे.सुधारकांमधे जहाल व मवाळ पंथ हे नेहमीच असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ब
बोका-ए-आझम Sun, 11/15/2015 - 12:53 नवीन
Peer Pressure हे बहुतांशी नकारात्मकरीत्या काम करतं असं पाहण्यात येतं. याच लेखाच्या संदर्भात म्हणायचं तर ॐ मध्ये आध्यात्मिक ताकद आहे असे संदेश whatsapp वरुन पुढे पाठवणा-यांची संख्या ही अशा संदेशांचा शास्त्रीय दृष्ट्या प्रतिवाद करणारे संदेश पुढे पाठवणा-यांपेक्षा जास्त असते. Peer Pressure मुळे व्यसनाधीन झालेले peer pressure मुळे व्यायाम करणाऱ्यांपेक्षा नक्कीच जास्त असतील. तुम्ही जर peer pressure ही संकल्पना व्यापक स्वरूपात घेत असाल तर आपल्या देशात जात, धर्म, कर्मकांडं, धार्मिक उन्माद यांचं peer pressure हे नेहमीच कुठल्याही रचनात्मक, सृजनशील कार्यासाठी लागणाऱ्या peer pressure पेक्षा जास्तच असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मारवा Sun, 11/15/2015 - 06:55 नवीन
the Maharashtra Prevention and Eradication of Human Sacrifices, Evil and Aghori Practices and Black Magic Ordinance, 2013, याच्या शेड्युल मध्ये मंत्रासंबंधित तरतुद दिलेली आहे ती खालीलप्रमाणे आहे. खालील सर्व कृत्ये ही बेकायदेशीर ठरवण्यात आलेली आहेत व त्यासाठी शिक्षेची तरतुद केलेली आहे. ही एक समाधानकारक बाब आहे. 8- To create a panic in the mind of public in general by way of invoking ghost or mantras, or threaten to invoke ghost, creating an impression that there is a ghostly or wrath of power inapprehensible by senses causing physical injuries and preventing a person from taking a medical treatment and instead diverting him to practice inhuman, evil and aghori acts or treatment, threatening a person with death or causing physical pains or causing financial harm by practicing or tend to practice black magic or inhuman act.
  • Log in or register to post comments
य
यनावाला Sun, 11/15/2015 - 09:09 नवीन
या लेखाविषयीं मि.पा.च्या अनेक वाचकांनी अनुकूल मत व्यक्त केले. त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार. श्री. यॉर्कर म्हणतात
,"जालावर इकडे तिकडे शोधून विविध माहिती हडकून लेख लिहलेला दिसतोय. कारण हे सगळं मी कोठेतरी याआधी जालावर वाचलयं."
...यांतील दुसरे विधान (हे सगळं मी कोठेतरी या आधी जालावर वाचलयं.") हे खरे आहे. पण त्यांनी काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे. "ग्लोबल मराठी " या संस्थळावर मी हा लेख लिहिला आहे (डिसेंबर २०१४). तो त्यांनी वाचला. निरीक्षणांवरून निष्कर्ष काढताना सर्व संभाव्य पर्यायांचा विचार करणे आवश्यक ठरते.
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Sun, 11/15/2015 - 11:54 नवीन
अलेच्चा तुम्ही तेच आहात होय? आपल्या आयडीवरून थोडा गोंधळ झाला.
निरीक्षणांवरून निष्कर्ष काढताना सर्व संभाव्य पर्यायांचा विचार करणे आवश्यक ठरते.
हल्ली अशा धाग्यांवर फार घाई करतो मी. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
ब
बाबा पाटील Sun, 11/15/2015 - 09:42 नवीन
मार भी पड जाये और आवाज भी न आये. जिओ मेरे शेर,लेख आवडला.
  • Log in or register to post comments
म
मारवा Sun, 11/15/2015 - 09:45 नवीन
निरीक्षणांवरून निष्कर्ष काढताना सर्व संभाव्य पर्यायांचा विचार करणे आवश्यक ठरते.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 11/15/2015 - 10:13 नवीन
यनावाला, हे चार मंत्र तुम्ही ऐकलेत का? ग्रॅड डॉट ई = ऱ्हो बाय एप्सिलन झीरो ग्रॅड डॉट बी = झीरो ग्रॅड क्रॉस ई = मायनस डेल बी बाय डेल टी ग्रॅड क्रॉस बी = म्यू झीरो जे प्लस म्यू झीरो एप्सिलन झीरो डेल ई बाय डेल टी नाही म्हणता? काय सांगताय काय? माझ विश्वास नाही बसंत. अहो या चार मंत्रांत मानवी अनुभवातली बरीचशी शक्ती एकवटली आहे. अहो या मंत्रामुळेच आपण जगात वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले असतांनाही मिपावर एकत्र येऊन चर्चा करू शकतो. अहो, या मंत्रसमुच्चयास मॅक्सवेलची समीकरणे म्हणतात. ती दृश्य रंगांपासून मायक्रोवेव्ह, रेडियो वेव्ह, एक्स रे, गामा रे इत्यादि प्रारणांचे वर्णन करतात. तेच सूर्यप्रकाशाचंही वर्णन करतात. सूर्यामुळेच या पृथ्वीवरील जीवन सुरळीत चालू आहे. म्हणजे हेच मंत्र तुमच्या जगण्याचा मूलाधारही आहेत. आणि तुम्हाला त्यांची गंधवार्ताही नाही? हे तुमच्यासारख्या विज्ञानवाद्याला शोभतं का? आ.न., -गा.पै. टीप : तुम्हाला या मंत्रांतली ऊर्जा बघायची असेल तर ई क्रॉस एच काढून बघा. त्याला पॉयन्टिग व्हेक्टर म्हणतात. हा एक उपमंत्र आहे. निदान तेव्हढा तरी माहीत करून घ्या.
  • Log in or register to post comments
स
साती Sun, 11/15/2015 - 11:56 नवीन
मग असं करा , जगाच्या चार कोपर्‍यांत चौघांना बसवा. हे तुमचे चार मंत्र एका तालासूरात चौघांना एकत्र म्हणायला सांगा आणि मग बघा चमत्कार - ते कनेक्ट होतात का ते! अर्थातच जोपर्यंत कंप्युटर किंवा तत्सम साधन नाही , इंटरनेट किंवा तत्सम जुळणी नाही तोपर्यंत हे मंत्र पाठ असून फायदा नाही. हे म्हणजे पॅरासिटॅमॉलच्या गोळीने ताप कमी होतो म्हणून त्याचा केमिकल फॉर्मूला पाठ करून त्याचा जप ताप आल्यावर करत बसण्यासारखं आहे. म्हणजे पॅरासिटॅमॉलचा केमिकल फॉर्मूला पाठ असणं काही वाईट नाही , पाठांतर करणे हे ही काही वाईट नाही. पण त्या पाठांतराने ताप कमी होईल असा विश्वास ठेवणे आणि मग मुलाबाळांसकट सगळ्यांनी तापापासून बचाव म्हणून एका ठराविक वेळी, शुचिर्भूत वगैरे होऊन म्हणणे आणि आजारी पडल्यावर हा उपाय सोडून दुसरे काहिच न करणे हे चूक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 11/15/2015 - 15:56 नवीन
साती, >> अर्थातच जोपर्यंत कंप्युटर किंवा तत्सम साधन नाही , इंटरनेट किंवा तत्सम जुळणी नाही तोपर्यंत हे मंत्र पाठ >> असून फायदा नाही. अगदी बरोबर. जुळणी (setup) खेरीज प्रत्यय नाही. मग यनावाला यांनी जुळणीचा काहीही विचार न करता मंत्रांना थेट टाकाऊ ठरवलं ते बरोबर नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
म
मांत्रिक Sun, 11/15/2015 - 16:02 नवीन
+१११ यनावालांनी कशाचाच अभ्यास केलेला नसावा. नाहीतर अध्यात्मावर चिखलफेक करत बसण्यिपेक्षा विज्ञानातील नव्या कन्सेप्ट, प्रवाह, शोध यावर चांगले लेख लिहिले असते. पण ते न करता ते नित्यनेमाने अध्यात्मावर फालतू टीका करत बसतात. कारण सोपं आहे. त्याला फारसा अभ्यास लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
प्रसाद गोडबोले Mon, 11/16/2015 - 05:29 नवीन
मंत्र ह्या शब्दाची व्युत्पत्ती मननात त्रायते इति अशी आहे । आणि मनन म्हणजे काय हेच यनांना माहीत नाही। आणि तुम्ही कितीही समजावून सांगितले आणि जरी त्यांना पटले तरीही ह्या वयात ते स्वीकारणे हे त्यांच्या अहंकाराला दुखावून जाईल । जाऊन दे किती वाद घालणार असल्या स्वमतांध दांभिकांशी ? असो । वाचून सोडून देऊ आपण :) संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती । नामस्मरणाची स्थिती । सांडूच नये । श्रीराम ।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
क
कवितानागेश Wed, 11/18/2015 - 06:41 नवीन
अहो मन आणि बुद्धीच् जर अमूर्त आहे, तर मनन म्हणजे काय हे सराना विचारता तरी कसे तुम्ही? वेडे कुठले!! रेफरेन्स: http://www.misalpav.com/comment/763784#comment-763784
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 11/19/2015 - 06:34 नवीन
स्वमत दांभिकांशी वाद घाला फक्त व्यक्तीगत हल्ले करु नका. वय आणि अभ्यास कोणाचा काढणे हे बरं वाटत नाही. आपण मंत्र सामर्थ्याचे फायदे सांगा..... आम्ही तोटे सांगु. नै का ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 11/19/2015 - 10:36 नवीन
धर्म अध्यात्मिकता ह्या गोष्टी वैयक्तिक नसतात का ? मग धर्म अध्यात्मिक श्रध्दांवर केलेली टिप्पण्णी वैयक्तिक ठरत नाही का ? आता यनावाला कोणत्याही समुहाचे प्रतिनिधित्व करत नाहीत , करत असते तरीही मी त्यांच्या समुहावर टीका केली नसती कारण मी आधीच्स आंगितल्या प्रमाणे i dont hate in plural . केवळ एकटाच व्यक्ती अनेक लोकांच्या भावना दुखावणारे लेखन करत असेल तर त्याला प्रतिवाद कसा करायचा ह्यावर एक स्वतंत्र धागा काढु का ?
आपण मंत्र सामर्थ्याचे फायदे सांगा..... आम्ही तोटे सांगु. नै का ?
असं का ? कोणताही अध्यात्मिक माणुस यनावालांच्या मानगुटीवर बसुन ॐ मंत्राचा जप करा , किंवा गायत्री मंत्राचे अनुष्ठान करा असे मागे लागला होता का ? भोळ्याभाबड्या लोकांनी डिफेन्स का करायचा ? ते कोणाच्या मागे लागले नव्हते की नामस्मरण करा म्हणुन . मंत्रसामर्थ्याचे जे काही फायदे तोटे असतील ते जप करणार्‍या पाशीना ! जर यनावालांवर कोणी सक्ती केली तर त्यांचा त्रागा समजु शकतो पण मागील २ धागे पहाता ते केवळ खुस्पट काढण्यासाठीच लिहितात हे निदर्शनास आले आहे . अभ्यास आणि वय ह्याच साठी काढले की गोंदवलेकर महाराजांचे प्रवचनाचे अत्यंत सोप्प्या भाषेतील पुस्तक आहे , त्यात कोणतीही गुढता नाही अगदी असिक्षित माणसालाही कळेल अशा भाषेत सोदाहरण महाराजांनी बर्‍याच शंकांचे विवचन केले आहे , ते यनावालांनी वाचलेले दिसत नाही . वाचा असे सुचवले तर तुम्ही म्हणाल ते वाचायला आम्ही बांधील नाही हे उत्तर ठरलेले आहेच . आता सर तुम्हीच सांगा की कोणताही अभ्यास नकरता , केवळ काही तर एकांगी मत बनवुन दुसर्‍यांच्या भाव्ना दुखावणारे लेखन जर कोणी सातत्याने करत असेल तर काय करायचे ? परत एकदा स्पष्ट करतो की कोणीही सश्रध्द माणुस यनावालांच्या मागे हात धुवुन लागला असेल की मंत्रोच्चारण करा तर यना वालांनी त्या व्यक्तीशी जे काही वाद विवाद असतील ते तिथे सोडवावेत , उगाच सगळ्याच सश्रध्द लोकांच्या भावना दुखावायला काय कारण ? त्यांच्या मागील धाग्यावरही त्यांची मते कशी एकांगी आहेत ह्यावर सविस्तर प्रतिसाद दिला होता मी http://www.misalpav.com/comment/763528#comment-763528 पण यनावाला लेफ्ट बिहाईन्फ करुन पुढे जातात . आता ह्या इथे पहा http://www.misalpav.com/comment/771778#comment-771778 हा आयाडी शंकराचार्यांवर काहीच्या काही विधाने करत आहे , त्याला दुवा दे संदर्भ दे म्हणुन सांगितले तर नुसतेच मेगाबायटी प्रतिसाद , संदर्भ नाहीच . बाकी अन्यत्र मी विचारले होते की ज्या मनुस्मृतीच्या नावाने वैदिक सनातन धर्मावर चिखलफेक करत आहात ती मनुस्मृती कोणत्या वेदाचा , उपनिषदाचा भाग आहे ? तर त्यालाही उत्तर आले नाही !! असो. एकुणच सध्या ही मिपावर टुम निघाली आहे , इथे धर्माचा कोणी अभ्यासक नसल्याने धर्मावर , सश्रध्द लोकांवर वात्टेल ती चिखलफेक करायची अन कोणी प्रतिवाद केलाच तर "वैयक्तिक टिप्पण्णी " असे म्हणत धोरणांच्या मागे लपायचे ! असो कंटाळा आलाय ह्या सगळ्याचा . सकारात्मक चर्चा तर काही नाहीच उगाचच लोकांच्या भावना दुखावत बसवायला काय अर्थ आहे . नकोच हे सगळे . आम्ही सनातन धर्म, उपनिषदे गीता ,अध्यात्,, संत साहित्य , हे सारे मानतो जे की तुमच्या लेखी भोंदुपणा आहे तर असो बापडे . आम्ही आमच्या अज्ञानात खुष रहातो . माझा आयडी संपादित केला जावा अशी विनंती आधीच केली आहे . आता पुढील चर्चा भेटी अंती :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मांत्रिक गुरुवार, 11/19/2015 - 10:48 नवीन
प्रतिसाद उत्तम प्रगोसाहेब. +१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बाळ सप्रे गुरुवार, 11/19/2015 - 11:12 नवीन
संपूर्ण प्रतिसादात मंत्रात सामर्थ्य कसे असते याविषयी काहिही भाष्य करता केवळ यनावालांवर भाष्य आहे. त्यांना गोंदवलेकर महाराजांचे प्रव चनाचे पुस्तक वाचण्याचे आवाहन कशासाठी.. त्यात मंत्रात सामर्थ्य कसे असते हे एखाद्या प्रकरणात दिले असल्यास त्याचे विवेचन इथे देउ शकता. धर्म आणि अध्यात्मिकता वैयक्तिक असते म्हणून धर्मावरील अथवा अध्यात्मातील एखाद्या गोष्टीवरील टीका वैयक्ति क ठरत नाही. उदा. जर मला ओंकाराने असा फायदा झाला असे विधान असेल तर टीका करण्याचे कारण नाही. पण ओंकाराने असे असे होते असे विधान केल्यास त्यावर ते कसे काय ही टीका योग्य आहे व विधान करणार्‍याने (समर्थन करणार्‍यानी) ते कसे हे दाखवणे / विवेचन करणे अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
न
नाखु गुरुवार, 11/19/2015 - 12:04 नवीन
पण तुमचा प्रतीदावा अगदी बिनबुडाचा+अप्रस्तुत आहे. प्रगो ने साधे आणि सोपे प्रश्न विचारले की. धागा मजकूरांना कोणी जबरदस्ती/शिफारस्/सल्ला/सुचवणी/आग्रह्/गळ घालणे/दडपशाही केली होती का "मंत्र म्हणण्याची/मंत्राचे सामर्थ्य्/व्य्क्तीमहात्म्य्/साधकाला आलेले अनुभव ऐकलेच पाहिजेत असे ???" याचे उत्तर काय आहे? ते जर नि:संशय हो असेल तर, ज्याने असे म्हटले तर आणि तरच त्यांनी सदर इसमाने केलेले दावे कशे फोल आहेत याची "धुणी-लक्तरे" येथे धुवावीत. उगा त्या आडून साधा घरातील थोरा-मोठ्यांना नमस्कार करणार्या आणि नित्य देवपूजा करणार्या (बाजार+प्रदर्शन नव्हे )किंवा जप करणार्या लोकांची अवहेलना करू नये. गमतीचा भाग म्हणजे कंपनीतही/कॉलेजातही/आणि आंतरजालावर असे हिरिरीने देव-धार्मीकता-आस्तीकता नको इतकी ताणणारे वयक्तीक आयुष्यात नेमाने "धार्मीक विधी" करतातच करतात. राहिली बाब त्या मंत्र सामर्थ्याची क्षणभर मानो मानू ते जप-बिप अगदी भुस्काट/बिनडोक्/अडाणी/मागासलेपणाचे आहे, तरी जोपर्यंत त्याचा इतरांना (काडीमात्र) त्रास होत नाही आणि ती व्यक्ती पूर्णतः फक्त त्यावर विसंबून रहात नाही तो पर्यंत कुणालाही त्याचेवर चिखल्फेक करण्याचा आणि येता जाता टिंगल-टवाळी करण्याचा अधिकार पोहोचत नाही. आणि हो संदर्भातील कुठल्याही संतानी, तुम्ही "निष्क्रीय" रहा फक्त जप करा असे सांगीतले नाही माझे खुले आव्हान आहे ज्यांना कुणीही सश्रद्ध असण्याची अगदी अ‍ॅलर्जी आहे, त्यांनी फक्त त्यांचे घरातील वरीष्ठांसमोर, (त्यांच्याही हयात नसलेल्या) जेष्ठांचे छायाचित्र घरात खाली जमीनीवर ठेऊन त्यावर फक्त पाच मिनिटे नाचून दाखवावे ( अर्थात जोड्यांसकट) हे करण्याची तयारी नसेल तर :
  • त्या हयात वरीष्ठांना वाईट वाटेल म्हणून केले नाही.
  • ती आमची संस्क्रूती नाही (या धाग्यावरचा अगदी समर्पक प्रतीसाद घाटपांडे सरांनी दिला आहे, धन्य्वाद सर)
  • आम्हाला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही.
असली तथ्यहीन आणि पळवाटीची कारणे देऊ नयेत. तुमच्या घरातील जेष्ठांच्या जितक्या भावना छायाचित्रांमध्ये आहेत नि तितक्याच ईथल्या पापभीरू लोकांच्या आहेत आणि माझ्यासकट कुणीही प्रतीसादक आंधळा नाही(तापात डॉक्टरकडे जायचे सोडून अंगारे धुपारे करीत बसत नाही. झुंडशाही असह्य झाली म्हणून टंकले अन्यथा मी अश्या धाग्यांपासून दूर राहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा