मंत्रसामर्थ्य
परवा एका कार्यक्रमात एक उच्चशिक्षित अध्यात्मवादी म्हणाले, "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.”
या विधानात काही तथ्य आहे काय ? ॐ ऊर्जेचा प्रत्यय कधी,कोणाला, कोठे, कसा आला ? या प्रचंड ऊर्जेचे अस्तित्व विज्ञानाने कोणत्या पद्धतीने सिद्ध केले? भर सभेत असली विधाने करायला अध्यात्मवादी कसे धजावतात? अर्थात सभेतील अनेक गलिबलांना (भोळसटांना) ती महान सत्ये वाटतात . ते स्वबुद्धीने विचार न करता माना डोलावतात,"वा! काय विद्वत्ता आहे!" असे म्हणतात , हे खरे.
आरोह-अवरोहांसह नाका-तोंडातून शास्त्रशुद्ध सानुनासिक (गेंगाणा) स्वर काढून ॐ-गुंजन करणारे एक्स्पर्टस् आजसुद्धा देशात आहेत.मग आपण अणुभट्टी का उभारतो? ॐ- उच्चारणातील प्रचंड ऊर्जेने टर्बाइने फिरवून विद्युत् निर्मिती का करत नाही? असे करणे शक्य नसेल तर ॐ मध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हणतात ते कोणत्या अर्थाने? "कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा " अशी ऊर्जेची व्याख्या आहे. ऊर्जा आणि शक्ती हे शब्द समानार्थी आहेत.
हां! अखंड अकरा तास बद्धमूलासन घालून ॐ-जप करणार्या व्यक्तीला वाटू शकेल की, " ..आता माझी कुंडलिनी जागृत होत आहे...तिने अर्धे वेटोळे सोडले...दीड उलगडले...साडे तीन वेटोळी संपली...बघा! आता तिने फणा उभारला...सुषुम्णा मार्गाने कुंडलिनी वर वर चालली आहे...ती पाहा...आता ती चंद्र तळ्यातले सतरावीचे अमृतस्तन्य प्राशन करीत आहे...घट्..घट्..घुट्..संपले....आता ती ब्रह्मरंध्र भेदित आहे....फट्.. फट् ..फाट्... फोडले....माझी कुंडलिनी चिदाकाशात विलीन झाली...मी देहातीत झालो... जीवन्मुक्त झालो.. ब्रह्मरूप झालो...आनंद...आनंद...सच्चिदानंद...ब्रह्मानंद!" हे सगळे व्यक्तिगत भ्रम आहेत. त्यांत वैज्ञानिक सत्याचा लवलेश नाही.
** भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. त्यावेळी या प्रचंड ओम् ऊर्जेच्या योगाने कोणी कधी प्रतिकार केल्याची एक तरी ऐतिहासिक नोंद आहे का? मूर्तिभंजकांनी सोरटीच्या सोमनाथाची शकले पाडली. तेव्हा ते अविवेकी कृत्य या ॐ-शक्तीच्या आधारे कोणीच कसे रोखले नाही? अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले?.
**थोरले माधवराव पेशवे कर्तृत्ववान होते. दुर्दैवाने तरुणपणी त्यांना क्षय रोगाने ग्रासले. अनेक आयुर्वेदाचाचार्यांच्या उपचारांनी गुण आला नाही. अंतिम समयीं मृत्युंजयमंत्रपठणासाठी वेदशास्त्रसंपन्न अशा शेकडो ब्रह्मणांना नियुक्त केले. पण हा महामंत्रजागर निष्फळ ठरला. पेशव्यांचा अकाली मृत्यू टळला नाही.
**" माझा प्रवास"या पुस्तकात विष्णुभट गोडसे यांनी पुढील वर्णन लिहिले आहे:--(हे गोडसे १८५७ साली उत्तर हिंदुस्थानात प्रवासाला गेले होते.)
"शत्रूचा नि:पात होऊन राज्य सुरक्षित राहावे म्हणून झाशीच्या राणीने अनेक अनुष्ठाने केली, मंत्रजप केले. अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने झाली. पेशव्यांकडून त्वरित मदत यावी म्हणून शंभर ब्राह्मण विशेष मंत्रजपास बसविले. पण गोरे लोक शहरात शिरून नरसंहार करू लागले. देवाघरचा न्याय मोठा चमत्कारिक. निरपराध लोकांना केवढी मोठी शिक्षा! झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप मोठे. सर्व मंत्रजप व्यर्थ ठरले. भटांस मात्र सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा मिळाली."--- ब्राह्मणांचे शास्त्रोक्त मंत्रजप व्यर्थ गेले याचे कारण झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप असे गोडसे भटजी म्हणतात.पण हा कार्य-कारण भाव चुकीचा आहे. मंत्रांत काही सामर्थ्य नसते. म्हणून मंत्रजप व्यर्थ गेले. सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा या गोष्टींचा लाभ घेणार्यांत विष्णुभट हेही एक होते.
अग्निपुराणात मंत्रसामर्थ्याचा अगाध गौरव आहे. त्यातील संग्रामविजय मंत्र:-
:--"ॐ-र्हीं चामुण्डे।स्मशानवासिनी किलि किलि हुम् फट्।ॐ-मारय।ॐ-दण्डेन ताडय।ॐ-त्रिशुलेन छेदय।ॐ-चामुण्डे।किलि किलि हुम् फट् स्वाहा।"लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मंत्र:-
:---"ॐ श्रीं र्हीं र्हीं क्लीं क्लीं ऐं कमलवासिन्यै नम:।"असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते. मंत्राने काही साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. वरील ऐतिहासिक सत्य घटनांवरून याला पुष्टी मिळते. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक, खुळचट कल्पना आहे. मंत्रसामर्थ्याने चमत्कार घडतात ते केवळ पुराणे,परीकथा,बालसाहित्य यांतील काल्पनिक गोष्टींत .हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.सर्व सारखेच. निरुपयोगी. असे माझे मत आहे. अध्यात्मप्रेमी व्यक्ती गायत्री मंत्राचे अफाट गुणगान करतात. "हा मंत्र संपूर्ण विश्वाचा मूलाधार आहे. (म्हणजे काय ?) या मंत्राचे गायन केले की त्याचे ध्वनी-प्रतिध्वनी अनंत अवकाशात दुमदुमतात. जगभर गायत्री मंत्राचा जप केल्यास पृथ्वी भोवतीचे सर्व वातावरण प्रदूषणमुक्त, शुद्ध आणि पवित्र होईल." असले काही ऐकले की आध्यात्मिक श्रद्धावंत हुरळतो. मग सी.डी.लावून
"ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।"हा मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी. डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो."आता राहूं दे. नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो. असा आहे या मंत्राचा प्रभाव! कुठल्याही मंत्रात कसलीही ऊर्जा नसते. असले मंत्र म्हणू नये असे नाही. सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे. .......................................................................................
तुम्ही म्हणता तसे विवेकी आणि कणखर लोक मीही पहिले आहेत किंवा पाहतो परंतु असे लोक १०० पैकी फारतर १ असतात बाकी ९९ नाहीत. आपला मृत्यू समीप आला असतानाही आपला बुद्धी प्रामाण्यवाद स्पष्टपणे व्यक्त करणारा बर्ट्रांड रसेल सारखा माणूस विरळाच.मी एखाद्या तरुणाला त्या १०० मधील १ चे उदाहरण आदर्श गौरवास्पद म्हणुन देईल तुम्ही सांगितलेल्या तिबेटन मंत्र वाल्या व्यक्तीचे उदाहरण देणार नाही. तो एक मानवी कमकुवतता कशी असते, हतबलता असहाय्यता का कशी निर्माण होते त्या हतबलतेच्या परीणामाने माणसे कशी विवेकहीन तर्कहीन वागतात ते वागण्यात कसा निरर्थकता आहे हे सर्व मानवी जीवनातले नकारात्मक पैलु सांगण्यासाठी समजावण्यासाठी देइल. आदर्श गौरवास्पद उदाहरणासाठी शंभरातला वरील १हे बरोबर पण बाकी ९९ % लोकांनी ते धारिष्ट्य कुठून आणायचे? असणं कधी समजावण्याचे प्रसंग आपल्यावर आले आहेत का?असे प्रसंग माझ्यावर काही फार आलेले नाहीत . पण आले तर काय उपाय असावा काय नाही हा वेगळा भाग आहे. समाज जितका जास्त प्रगती करेल जितकं शिक्षण विवेक इ. च प्रमाण वाढेल जितकी स्वयंपुर्णता आर्थिक व वैचारीक निर्माण होइल तस तसे वरील समस्या नक्कीच कमी होत जातील अशी खात्री वाटते. मात्र मोठा प्रश्न हा आहे की तुम्ही कुठल्या मुल्याला महत्व देणार कुठल्या मुल्याचा प्रचार प्रसार करणार. तुम्ही अज्ञानातुन परावलंबनातुन निर्माण होत असलेल्या भय लाचारी इ. चा गौरव आदर्श समोर ठेवणार की निर्भयता स्वावलंबन (वैचारीक) इ. चा आदर्श समोर ठेवणार. हे बघा आदर्शाप्रत पोहोचणं पुर्णपणे हा एक भाग व त्या दिशेने सातत्याने अथक वाटचाल करत राहण हा दुसरा भाग. तर मान्य आहे की १०० पैकी सर्वच ही आदर्श अवस्था प्राप्त करु शकणार नाहीत पण प्रयत्न तर त्या दिशेनेच करणे व तो आदर्श डोळ्यासमोरच ठेऊन करणे अगत्याचे नाही का ? मुळात तुम्ही तुमचा मुल्य निर्णय काय करतात ? आदर्श काय ठेवतात तो आहे ? एकदा ते निश्चित झाल्यावर त्यात आपण कीती कमी पडतोय कीती अधिक प्रयत्न करण आवश्यक आहे किती नव्या साधनांची उपायांची गरज आहे हा सर्व पुढचा भाग झाला. मुळ प्रश्न तुमची निवड कोणत्या बाजुला आहे ? तुम्ही त्या मानवी असहाय्यतेला हतबलतेच्या बाजुने आहात की मानवी विवेक वैचारीक स्वावलंबन संघर्षशीलता या बाजुने आहात हा आहे. कारण यावरच पुढे तुमचे प्रयत्न तुम्ही कोणत्या दिशेने वळवता हे आहेत. मला तुमच्यासारखा प्रसंग (जो कधी येत नाही फारसा ) तर मी अगोदर त्याला विवेकवादाकडे वरील मुल्यांकडे प्रवृत्त होण्यास प्रामाणिक प्रयत्न करेल त्यात मला १००० मधुन २ वेळा समजा जरी यश आलं तरी चालेल. मी त्याकडे एक सुरुवात एक वाटचाल एक छोटी छोटी प्रगतीच्या दिशेने टाकलेली पावल या अर्थाने बघेल. आणि त्यात ९९८ वेळा येत असलेल्या अपयशाला एक धडा एक अभ्यास एक आपण कुठे कमी पडतोय या अर्थाने बघेल. प्रश्न कोणत्या बाजुचं कुठल योग्य की अयोग्य कुठला मुल्य कुठली नैतिक भुमिका तुम्ही घेत आहात तो मुलभुत आहे. प्रयत्न उपाययोजना पुढील भाग एक प्रथा उदा. चुक आहे की नाही हे ठरवण महत्वाच मानवी की अमानवी हे ठरवण महत्वाच मग तीचे उच्चाटन कसे करता येईल काय उपाय कीती हजारो वर्ष लागतील आदी बाबी त्यानंतरच्या अगोदरच्या नव्हेत.चार मंत्र म्हटले असता त्या माणसाला मानसिक शांती मिळत असेल तर त्याला असे उच्च तत्वज्ञान सांगून काय उपयोग?हा तुम्ही तुम्हाला पटत नसलेल्या मात्र समोरच्या व्यक्तीला तात्कालिक फायदा होत असेल तर काय हरकत आहे असे सांगुन असे म्हणताय. यात तुम्ही त्या व्यक्तीचा तात्कालिक फायदा करुन त्याला कायमचा मानसिक अवलंबनात ढकलताय. उदा. एक भिकारी आहे त्याला आज भुक लागलेली आहे त्याला आजच्या जेवणापुरते तुम्ही पैसे दिले व त्याची आजची महत्वाची तात्कालिक भुक मिटवली. तर तुम्ही नक्कीच संवेदनशीलता दाखवली मात्र तुम्ही जर त्याला त्याऐवजी त्याच्या मुळ आर्थिक परावलंबित्वाच्या समस्येवर जर काही उपाय दिला काही त्याच्या लायक नोकरी मिळवुन दिली. काही त्याच्या हाताला काम दिल आणि कायमस्वरुपे त्याच्या मुलभुत समस्येवर (आर्थिक परावलंबन ) पासुन मुक्ती दिली तर तुम्ही खरया अर्थाने त्याला मोठी मदत केली असा होतो. आता तुम्ही वारंवार जर त्याची तात्कालिक समस्या तात्पुरत्या स्वरुपात सोडवुन देत राहीलात नेहमीच तर तो कायम आयुष्यभर आर्थिक परावलंबनातुन बाहेर येऊच शकणार नाही. याचा अर्थ असा आहे का की जी तात्कालिक मदत तुम्ही त्याला केली ती चुक आहे ? तर नाही ती योग्यच आहे मात्र हि मदत तात्कालिकच आहे ही अपुर्ण आहे याने त्याच्या जीवनातील मुलभुत समस्या सुटणार नाहीत तो याच्या वारंवार मदतीने कदाचित अधिकच आळशी होत जाईल याची पुर्ण जाणीव ठेऊन व आज ना उद्या त्याच्या साठी या पुढची पायरी घेऊन मोठा उपाय करणे हाच एकमेव उपाय आहे हे भान ही जाणीव अशी मदत करतांना ठेवणे आवश्यक आहे. या जाणीवे सहीत मात्र सध्या आपला नाईलाज म्हणुन अशी तात्कालिक मदत करत राहण्यात काहीच गैर नाही. पण तात्कालिक मदत हीच योग्य आहे असे समजुन बसुन त्याच्या मुलभुत समस्येचे अस्तित्वच अमान्य करणे त्याकडे डोळेझाक करणे त्याविषयी उदासीन असणे. अनेकदा आपली तात्कालिक मदत व आपल्यापुरते साधलेले मदत केल्याचे तात्कालिक समाधान हेच त्या पीडीतासाठी आयुष्यभरासाठी दिर्घकाळासाठी घातक आहे याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. उदा. नाना पाटेकर सध्याच्या प्रत्येक कार्यक्रमात म्हणतात तस की मी जी मदत करतोय ती तात्कालिक आहे हा यावरचा कायम स्वरुपी उपाय नाही पण अती बिघडलेल्या परीस्थीतीत सध्या ती देखील महत्वाची आहे असे या विधानात नाना पाटेकर या पुर्ण जाणीवेने की आपण जे करतोय ही तात्कालिक मदत आहे हेच समजुन करतात. त्यांना असलेले हे वास्तवाचे भान फार कौतुकास्पद आहे. ते मी करतोय हेच बरोबर याहुन अधिक काही गरज नाही बस झाली समस्या झालो मी मोकळा असे नाही त्यांना स्वतःच्या आवाजाला कसेबसे थांबवण्यात रस नाही. वर यनावाला अवहेलना सहन करुन ही जे अशा धाग्यांमार्फत प्रयत्न करतात ते असेच महत्वाचे आहेत. त्यांच्या कडे असलेल्या इतर अनेक सुंदर ज्ञानाला आवडत्या विषयांना मुरड घालुन ते हा सर्व आघात स्वतःहुन ओढवुन घेतात पॉलिटीकली करेक्ट राहण्याचा नेहमी प्रयत्न करण प्रत्येकवेळी स्तुतीची प्रशंसेची आस बाळगुन असण हे ते करत नाहीत. व दिर्घ मुदतीचा अधिक कष्टाचा त्रासाचा मार्ग कठीण आहे म्हणुन काय उपयोगाचा असा विचार करणे चुक आहे. एक स्टीफन कोव्हे च्या पुस्तकावर "Give a man a fish and you feed him for a day; teach a man to fish and you feed him for a lifetime." हा सुविचार आहे जो अनुकरणीय आहे.आजची स्वाक्षरी :- पाहुनी विज्ञानाच्या बलाला भ्रमीष्ट झाला झाला दारु-अ-वाला दारु-अ-वाला.