Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मंत्रसामर्थ्य

य
यनावाला
Sat, 11/14/2015 - 16:55
🗣 233 प्रतिसाद
परवा एका कार्यक्रमात एक उच्चशिक्षित अध्यात्मवादी म्हणाले, "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.” या विधानात काही तथ्य आहे काय ? ॐ ऊर्जेचा प्रत्यय कधी,कोणाला, कोठे, कसा आला ? या प्रचंड ऊर्जेचे अस्तित्व विज्ञानाने कोणत्या पद्धतीने सिद्ध केले? भर सभेत असली विधाने करायला अध्यात्मवादी कसे धजावतात? अर्थात सभेतील अनेक गलिबलांना (भोळसटांना) ती महान सत्ये वाटतात . ते स्वबुद्धीने विचार न करता माना डोलावतात,"वा! काय विद्वत्ता आहे!" असे म्हणतात , हे खरे. आरोह-अवरोहांसह नाका-तोंडातून शास्त्रशुद्ध सानुनासिक (गेंगाणा) स्वर काढून ॐ-गुंजन करणारे एक्स्पर्टस् आजसुद्धा देशात आहेत.मग आपण अणुभट्टी का उभारतो? ॐ- उच्चारणातील प्रचंड ऊर्जेने टर्बाइने फिरवून विद्युत् निर्मिती का करत नाही? असे करणे शक्य नसेल तर ॐ मध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हणतात ते कोणत्या अर्थाने? "कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा " अशी ऊर्जेची व्याख्या आहे. ऊर्जा आणि शक्ती हे शब्द समानार्थी आहेत. हां! अखंड अकरा तास बद्धमूलासन घालून ॐ-जप करणार्‍या व्यक्तीला वाटू शकेल की, " ..आता माझी कुंडलिनी जागृत होत आहे...तिने अर्धे वेटोळे सोडले...दीड उलगडले...साडे तीन वेटोळी संपली...बघा! आता तिने फणा उभारला...सुषुम्णा मार्गाने कुंडलिनी वर वर चालली आहे...ती पाहा...आता ती चंद्र तळ्यातले सतरावीचे अमृतस्तन्य प्राशन करीत आहे...घट्..घट्..घुट्..संपले....आता ती ब्रह्मरंध्र भेदित आहे....फट्.. फट् ..फाट्... फोडले....माझी कुंडलिनी चिदाकाशात विलीन झाली...मी देहातीत झालो... जीवन्मुक्त झालो.. ब्रह्मरूप झालो...आनंद...आनंद...सच्चिदानंद...ब्रह्मानंद!" हे सगळे व्यक्तिगत भ्रम आहेत. त्यांत वैज्ञानिक सत्याचा लवलेश नाही. ** भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. त्यावेळी या प्रचंड ओम् ऊर्जेच्या योगाने कोणी कधी प्रतिकार केल्याची एक तरी ऐतिहासिक नोंद आहे का? मूर्तिभंजकांनी सोरटीच्या सोमनाथाची शकले पाडली. तेव्हा ते अविवेकी कृत्य या ॐ-शक्तीच्या आधारे कोणीच कसे रोखले नाही? अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले?. **थोरले माधवराव पेशवे कर्तृत्ववान होते. दुर्दैवाने तरुणपणी त्यांना क्षय रोगाने ग्रासले. अनेक आयुर्वेदाचाचार्यांच्या उपचारांनी गुण आला नाही. अंतिम समयीं मृत्युंजयमंत्रपठणासाठी वेदशास्त्रसंपन्न अशा शेकडो ब्रह्मणांना नियुक्त केले. पण हा महामंत्रजागर निष्फळ ठरला. पेशव्यांचा अकाली मृत्यू टळला नाही. **" माझा प्रवास"या पुस्तकात विष्णुभट गोडसे यांनी पुढील वर्णन लिहिले आहे:--(हे गोडसे १८५७ साली उत्तर हिंदुस्थानात प्रवासाला गेले होते.) "शत्रूचा नि:पात होऊन राज्य सुरक्षित राहावे म्हणून झाशीच्या राणीने अनेक अनुष्ठाने केली, मंत्रजप केले. अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने झाली. पेशव्यांकडून त्वरित मदत यावी म्हणून शंभर ब्राह्मण विशेष मंत्रजपास बसविले. पण गोरे लोक शहरात शिरून नरसंहार करू लागले. देवाघरचा न्याय मोठा चमत्कारिक. निरपराध लोकांना केवढी मोठी शिक्षा! झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप मोठे. सर्व मंत्रजप व्यर्थ ठरले. भटांस मात्र सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा मिळाली."--- ब्राह्मणांचे शास्त्रोक्त मंत्रजप व्यर्थ गेले याचे कारण झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप असे गोडसे भटजी म्हणतात.पण हा कार्य-कारण भाव चुकीचा आहे. मंत्रांत काही सामर्थ्य नसते. म्हणून मंत्रजप व्यर्थ गेले. सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा या गोष्टींचा लाभ घेणार्‍यांत विष्णुभट हेही एक होते. अग्निपुराणात मंत्रसामर्थ्याचा अगाध गौरव आहे. त्यातील संग्रामविजय मंत्र:-
:--"ॐ-र्‍हीं चामुण्डे।स्मशानवासिनी किलि किलि हुम् फट्।ॐ-मारय।ॐ-दण्डेन ताडय।ॐ-त्रिशुलेन छेदय।ॐ-चामुण्डे।किलि किलि हुम् फट् स्वाहा।"
लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मंत्र:-
:---"ॐ श्रीं र्‍हीं र्‍हीं क्लीं क्लीं ऐं कमलवासिन्यै नम:।"
असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते. मंत्राने काही साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. वरील ऐतिहासिक सत्य घटनांवरून याला पुष्टी मिळते. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक, खुळचट कल्पना आहे. मंत्रसामर्थ्याने चमत्कार घडतात ते केवळ पुराणे,परीकथा,बालसाहित्य यांतील काल्पनिक गोष्टींत .हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.सर्व सारखेच. निरुपयोगी. असे माझे मत आहे. अध्यात्मप्रेमी व्यक्ती गायत्री मंत्राचे अफाट गुणगान करतात. "हा मंत्र संपूर्ण विश्वाचा मूलाधार आहे. (म्हणजे काय ?) या मंत्राचे गायन केले की त्याचे ध्वनी-प्रतिध्वनी अनंत अवकाशात दुमदुमतात. जगभर गायत्री मंत्राचा जप केल्यास पृथ्वी भोवतीचे सर्व वातावरण प्रदूषणमुक्त, शुद्ध आणि पवित्र होईल." असले काही ऐकले की आध्यात्मिक श्रद्धावंत हुरळतो. मग सी.डी.लावून
"ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।"
हा मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी. डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो."आता राहूं दे. नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो. असा आहे या मंत्राचा प्रभाव! कुठल्याही मंत्रात कसलीही ऊर्जा नसते. असले मंत्र म्हणू नये असे नाही. सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे. .......................................................................................
वर्गीकरण
चर्चा:-देव-धर्म-कर्मकांडे-मंत्रजप

प्रतिक्रिया द्या
141687 वाचन

💬 प्रतिसाद (233)
क
कवितानागेश Wed, 11/18/2015 - 21:42 नवीन
वज्रासन वेगळे, मूलबंध वेगळा आणि बद्ध पद्मासन वेगळे. तिनहीचे शरीरावर होणारे परिणामही वेगळे. शिवाय या तिनहीचा मंत्रान्शी काही सम्बन्ध नाही. एकन्दरीत आसनांचा आरोग्यशी मात्र निश्चितच सम्बन्ध आहे.
  • Log in or register to post comments
र
रमेश भिडे गुरुवार, 11/19/2015 - 04:24 नवीन
मला वातते धागाकर्ते यनावाला यानी लेख चुकीच्या संस्थळावर टाकला आहे... अशा नास्तिक चर्चान्साठी "प्रगतिशील सुधारक " संस्थळ उपलब्ध आहे हे माहित नाही का तुम्हांस ? ;)
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे गुरुवार, 11/19/2015 - 04:28 नवीन
मंत्र-विज्ञानाचे वैज्ञानिक स्पष्टीकरण असे मिळू शकेल ---= १. मंत्र हा मन,बुद्धी आणि त्यापेक्षा तरल अशा सूक्ष्मदेहांवर कार्य करतो २. ब्रेनवेव्ह साऊंड थेरपी नुसार विशिष्ट ध्वनिलहरी वर मन एकाग्र झाल्यास मेंदूच्या अवस्था बदलतात , म्हणजे १-४ हर्ट्झ डेल्टा,/ ५- ८ हर्ट्झ थिटा / ९-१२ हर्ट्झ अल्फा /१३-१६ हर्ट्झ बीटा .........इ.या मेंदूच्या अवस्थांचा मूड्स आणि स्वभावाशी जवळचा संबंध आहे . ३. मंत्र निर्माण करताना वरील ध्वनिलहरी शास्त्र /स्पंदन शक्ती आणि त्याचा मेंदूवरील परिणाम याचा अभ्यास केला गेलेला असावा. ५. मंत्राजपा बरोबरच संकल्प आणि उद्देश यांचाही विचार होतो. मंत्रजपा नंतर मन अधिक शक्तिशाली/ शांत व सूक्ष्म होते असा अनुभव आहे ,अशा सूक्ष्म मनाने ईश्वरी शक्तीशी लवकर तादात्म्य /तल्लीनता//तद्रूपता होऊ शकते . ६. सूक्ष्म आणि शक्तिमान मनातून निघणारे विचार प्रत्यक्षात येण्याची शक्यता जास्त असते ,संदर्भ -C W LEADBEATER- THOUGHT POWER ७. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मंत्राशाक्तीचे दिव्य अनुभव येत असावेत , अधिक सखोल आणि सर्वंकष शास्त्रीय संशोधन होण्याची आवश्यकता आहे .
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 11/19/2015 - 06:22 नवीन
मंत्र हा मन,बुद्धी आणि त्यापेक्षा तरल अशा सूक्ष्मदेहांवर कार्य करतो सुक्ष्मदेहांवर ? कृपया आपल्याला नेमके काय म्हणावयाचे आहे विस्तार करावा म्हणून मंत्राशाक्तीचे दिव्य अनुभव येत असावेत उदा. कुठले दिव्य अनुभव कसे कोणाला ? कृपया अधिक विस्तार करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे
च
चौकटराजा गुरुवार, 11/19/2015 - 08:35 नवीन
हे दिव्य अनुभव ऐकायला व त्यापेक्शाही अनुभवायला मी उत्सुक आहेच. बाकी नास्तिक याचा रूढ अर्थ देवाच्या अस्तित्वावर विश्वास नसणारा असा आहे ना ? शाळेत असताना अर्ध्या मार्कासाठी असाच अर्थ पाठ केल्याचे आठवतेय. मग मंत्र सामर्थ्य याला आव्हानात्मक विरोध व देव यान्चा काय संबंध ? एकूणच भारतीय लोकानी अस्तिकपणा, अध्यात्म , जप मंत्र कृपा, धर्म यांचा एकमेकाशी विनाकारण संबंध आणून गोंधळच घातलेला दिसतो. जप केल्याने माझ्या कोणत्याही मित्राला वा आप्ताला मनोविकारावर ताबा मिळाल्याचे दिसत नाही. धर्म पाळणारा माणूस नास्तिक असू शकतो. असे जर मी विधान केले तर इथे त्याला कुणाचा विरोध आहे का ? असल्यास कळवा मग पुन्हा कळफलक बडवायला मोकळा मी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
संदीप डांगे गुरुवार, 11/19/2015 - 18:22 नवीन
एकूणच भारतीय लोकानी अस्तिकपणा, अध्यात्म , जप मंत्र कृपा, धर्म यांचा एकमेकाशी विनाकारण संबंध आणून गोंधळच घातलेला दिसतो. यासाठी चौराकाकांशी बाडीस,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
न
नाखु Sat, 11/21/2015 - 04:43 नवीन
उगाच नाही आम्ही पंखे तुम्चे !!!! बाकडा क्रमांक ८
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कपिलमुनी गुरुवार, 11/19/2015 - 10:59 नवीन
नव्या बाटलीमधल्या जुन्या दारूला एव्ढा ट्यारपी मिळाल्याचे पाहून बाकीचे व्हेक-नॉन व्हेज , हे वि ते विषय नव्या वेष्टणात गुंडाळायला सुरुवात केली आहे
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 11/19/2015 - 21:20 नवीन
परवा एका कार्यक्रमात एक उच्चशिक्षित अध्यात्मवादी म्हणाले, "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.” या विधानात काही तथ्य आहे काय ? ॐ ऊर्जेचा प्रत्यय कधी,कोणाला, कोठे, कसा आला ? या प्रचंड ऊर्जेचे अस्तित्व विज्ञानाने कोणत्या पद्धतीने सिद्ध केले? भर सभेत असली विधाने करायला अध्यात्मवादी कसे धजावतात? अर्थात सभेतील अनेक गलिबलांना (भोळसटांना) ती महान सत्ये वाटतात . ते स्वबुद्धीने विचार न करता माना डोलावतात,"वा! काय विद्वत्ता आहे!" असे म्हणतात , हे खरे.
आजकाल असे मनगढंत ठोकून देणारे व त्यांचे ऐकून घेणारे सुशिक्षित फारच बोकाळले आहेत. वैज्ञानिक पद्धतीचे शिक्षण वयाची पहिली वीस वर्षेपर्यंत घेऊनही एवढ्या मोठ्या लोकसंख्येत मागच्या साठ वर्षात वैज्ञानिक दृष्टिकोण रुजलेला नाही. म्हणजे खरंच 'खरंखुरं विज्ञान' शाळांमधे शिकवले गेले आहे काय? नसेल तर असे गावंढळ राहणार्‍या सुशिक्षितांचा नक्की काय प्रॉब्लेम असावा?
आरोह-अवरोहांसह नाका-तोंडातून शास्त्रशुद्ध सानुनासिक (गेंगाणा) स्वर काढून ॐ-गुंजन करणारे एक्स्पर्टस् आजसुद्धा देशात आहेत.मग आपण अणुभट्टी का उभारतो? ॐ- उच्चारणातील प्रचंड ऊर्जेने टर्बाइने फिरवून विद्युत् निर्मिती का करत नाही? असे करणे शक्य नसेल तर ॐ मध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हणतात ते कोणत्या अर्थाने? "कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा " अशी ऊर्जेची व्याख्या आहे. ऊर्जा आणि शक्ती हे शब्द समानार्थी आहेत.
पुन्हा चुकलात. त्या येड्याने ओमशब्दात शक्ती आहे असे म्हटले म्हणजे लगेच अणुभट्टीचे उदाहरण (प्रत्यक्ष वैज्ञानिक-छाप वाटते म्हणून) द्यायचे? शक्ती-उर्जा हे समानार्थी आहेत हे खरे. वर दिलेली व्याख्याही बरोबर आहे. पण मला एक प्रश्न पडलाय. मला क्लायंटने शंभर टक्के अ‍ॅडव्हान्स पैसे दिले की त्याचे काम करायची प्रचंड उर्जा शरिरात येते, तेच एखाद्याने नंतर पैसे देतो असे म्हटले की जेवून-खाऊनसुद्धा अंगात त्राणच नाहीत असे वाटत राहते. असे का होत असावे?
हां! अखंड अकरा तास बद्धमूलासन घालून ॐ-जप करणार्‍या व्यक्तीला वाटू शकेल की, " ..आता माझी कुंडलिनी जागृत होत आहे...तिने अर्धे वेटोळे सोडले...दीड उलगडले...साडे तीन वेटोळी संपली...बघा! आता तिने फणा उभारला...सुषुम्णा मार्गाने कुंडलिनी वर वर चालली आहे...ती पाहा...आता ती चंद्र तळ्यातले सतरावीचे अमृतस्तन्य प्राशन करीत आहे...घट्..घट्..घुट्..संपले....आता ती ब्रह्मरंध्र भेदित आहे....फट्.. फट् ..फाट्... फोडले....माझी कुंडलिनी चिदाकाशात विलीन झाली...मी देहातीत झालो... जीवन्मुक्त झालो.. ब्रह्मरूप झालो...आनंद...आनंद...सच्चिदानंद...ब्रह्मानंद!" हे सगळे व्यक्तिगत भ्रम आहेत. त्यांत वैज्ञानिक सत्याचा लवलेश नाही.
ओम जप घातल्याने कुंडलिनी जागृत होते? यनावाला, तुम्हाला खरंच कोणी सांगितले हे? कुंडलिनी जागृती ही कुठलाही जपाच्या फार फार प्रचंड नंतरची स्टेप आहे. कुणीही असे आसन घालून ओम ओम जपत कुंडलिनि जागृत करू शकत नाही. सिद्धपुरुष कधीही कोणताही जप करत नाहीत. ते अंतर्बाह्य शांत असतात. आपणास भलतेच भ्रम झालेत वा कोण्या सोम्यागोम्या मासिकांमधे 'साधकांचे अनुभव' सदराखाली आलेली कपोलकल्पित मनोरंजनात्मक पत्रे वाचली की काय?
** भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. त्यावेळी या प्रचंड ओम् ऊर्जेच्या योगाने कोणी कधी प्रतिकार केल्याची एक तरी ऐतिहासिक नोंद आहे का? मूर्तिभंजकांनी सोरटीच्या सोमनाथाची शकले पाडली. तेव्हा ते अविवेकी कृत्य या ॐ-शक्तीच्या आधारे कोणीच कसे रोखले नाही? अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले?.
तेव्हा विज्ञान नव्हते ना... म्हणून. विज्ञानाने ओममधे शक्ती आहे असे 'आता' सिद्ध केलंय ना त्या अतिशिक्षित विद्वानांच्या हवाल्यानुसार? चांगदेव वा इतर कोणीही समकालिन सिद्धपुरुष यांना कधीच कोण्याच राजा/बादशाहा/आक्रमक यांनी त्रास दिलेला वाचलेले आठवत नाही. जे गाजलेले योगी आहेत ते सर्व समाधीअवस्थेत सद्गतीस प्राप्त झालेत. कुणी मुस्लिम आक्रमकाने कुठल्या सिद्धयोग्याची कत्तल केली असल्याचे ऐतिहासिक संदर्भ असल्याचे कुणास ठावूक असल्यास येथे देणे. योगी वा अध्यात्मिक व्यक्ति खरंच कुठल्याही धर्माचा नसतो, तो समाजाचा कधीच नसतो. तो केवळ एकटा असतो. धर्मकार्य, धर्मरक्षा, समाजातल्या लोकांची रक्षा असली अनुत्पादक कामे खरे योगी कधीच करत नाहीत. त्यांना त्यांचे कार्य व ध्येय समजलेले असते. बुडते हे जन देखवे न डोळा वैगेरे तुकारामांनी व्यक्त केले ते वेगळ्या संदर्भात, जीव वाचण्याच्या संदर्भात नाही. त्यांच्या लेखी सर्वच जन हे बुडते जन आहे, त्यात हिंदु-मुस्लिम, आक्रमक-शोषित, राजा-रंक असा भेद नाही. तर मग रामदेवरायास मदतीस जाण्यात काय पॉईंट आहे? आणि खिल्जीस विरोध करूनही काय उपयोग आहे? शासनव्यवस्था, समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, राज्यव्यवस्था वैगेरे गोष्टींमधे कुणीही सिद्धयोगी गुंतलेला आढळून येतो काय?
**थोरले माधवराव पेशवे कर्तृत्ववान होते. दुर्दैवाने तरुणपणी त्यांना क्षय रोगाने ग्रासले. अनेक आयुर्वेदाचाचार्यांच्या उपचारांनी गुण आला नाही. अंतिम समयीं मृत्युंजयमंत्रपठणासाठी वेदशास्त्रसंपन्न अशा शेकडो ब्रह्मणांना नियुक्त केले. पण हा महामंत्रजागर निष्फळ ठरला. पेशव्यांचा अकाली मृत्यू टळला नाही.
यावर कुणीतरी (बहुधा डॉक्टर खरेंनीच) अनुभव सांगितला आहे. की आयुष्यभर वैज्ञानिक विचारसरणी ठेवणारेही अंतिम समयी अनाकलनीय कारणाने देव ह्या संकल्पनेस शरण जातात. मंत्र हे मनावरच्या परिणामासाठी आहेत. मन शरिरावर परिणाम करतं हेही वैज्ञानिक सत्य आहे (खरंच आहे का ते तपासून सांगा डॉक्टरसाहेब). त्यामुळे मनावर परिणाम झाला तर त्या वाढलेल्या मनोबलाचा शरिरावरही परिणाम होईल या भावनेतून मंत्रोपचाराचा उपाय करून बघितला जातो. वैद्यकिय विश्वात अश्या अनेक केसेस असतील जिथे रुग्ण शरीर साथ देत नसतांना फक्त मनोबलावर जिवंत राहिलेले दिसतात.
**" माझा प्रवास"या पुस्तकात विष्णुभट गोडसे यांनी पुढील वर्णन लिहिले आहे:--(हे गोडसे १८५७ साली उत्तर हिंदुस्थानात प्रवासाला गेले होते.) "शत्रूचा नि:पात होऊन राज्य सुरक्षित राहावे म्हणून झाशीच्या राणीने अनेक अनुष्ठाने केली, मंत्रजप केले. अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने झाली. पेशव्यांकडून त्वरित मदत यावी म्हणून शंभर ब्राह्मण विशेष मंत्रजपास बसविले. पण गोरे लोक शहरात शिरून नरसंहार करू लागले. देवाघरचा न्याय मोठा चमत्कारिक. निरपराध लोकांना केवढी मोठी शिक्षा! झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप मोठे. सर्व मंत्रजप व्यर्थ ठरले. भटांस मात्र सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा मिळाली."--- ब्राह्मणांचे शास्त्रोक्त मंत्रजप व्यर्थ गेले याचे कारण झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप असे गोडसे भटजी म्हणतात.पण हा कार्य-कारण भाव चुकीचा आहे. मंत्रांत काही सामर्थ्य नसते. म्हणून मंत्रजप व्यर्थ गेले. सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा या गोष्टींचा लाभ घेणार्‍यांत विष्णुभट हेही एक होते.
पेशवे वा तत्कालिन हिंदू राजे राज्य चालवायचे म्हणजे केवळ होम-हवन-जप-जाप्यच करायचे असे तर काही आपण समजत नसाल अशी अपेक्षा करतो. म्हणजे युद्धाला जायचे तर शस्त्र, घोडे, फौजा नको. बस मूठ मारणारे शंभर मांत्रिक घेतले की झाले. त्यांनी शत्रूचे नाव घेऊन थुंकले की झाली लाखाची सेना गारद. युद्धकाळात शंभर उलाढाली सुरू असतात. त्यात शकून-अपशकून आदि मनोबल खचवणार्‍या गोष्टी घडू नये, सैन्याला, भाबड्या जनतेला धैर्यशील ठेवण्यास जमेल तो उपाय करणे राजास आवश्यक असते. त्यासाठी पुजा-होम-हवन हाही एक पार्ट अ‍ॅण्ड पार्सल ऑफ द डील आहे. खरं बळ तलवारीत, मनगटात व मनात आहे हे खरा सेनापती जाणून असतो. मनात बळ नसेल तर तलवारी, मनगट काही कामाचे नाही हेही त्यास ठावूक असते. आता तुम्ही म्हणाल इंग्रज त्यांचे सैनिकांचे मनोबल उंचावण्यास कुठे असे मंत्रजाप येडेचाळे करत? तर बंधो, त्यांचे उपाय त्यांना ठावूक.
अग्निपुराणात मंत्रसामर्थ्याचा अगाध गौरव आहे. त्यातील संग्रामविजय मंत्र:- :--"ॐ-र्‍हीं चामुण्डे।स्मशानवासिनी किलि किलि हुम् फट्।ॐ-मारय।ॐ-दण्डेन ताडय।ॐ-त्रिशुलेन छेदय।ॐ-चामुण्डे।किलि किलि हुम् फट् स्वाहा।" लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मंत्र:- :---"ॐ श्रीं र्‍हीं र्‍हीं क्लीं क्लीं ऐं कमलवासिन्यै नम:।" असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते. मंत्राने काही साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. वरील ऐतिहासिक सत्य घटनांवरून याला पुष्टी मिळते. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक, खुळचट कल्पना आहे. मंत्रसामर्थ्याने चमत्कार घडतात ते केवळ पुराणे,परीकथा,बालसाहित्य यांतील काल्पनिक गोष्टींत .हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.सर्व सारखेच. निरुपयोगी. असे माझे मत आहे.
काही अत्याधुनिक गॅजेट्समधे मालकाच्या आवाजात विशिष्ट कमांड दिल्यासच ते कार्यान्वित होते. आता समजा यनावाला यांनी असे गॅजेट बनवले जे यनावाला यांना कुठेही घेऊन जाऊ शकते, पण ते फक्त त्यांच्याच आवाजाला प्रतिसाद देणार. पण झाले असे की यनावाला निर्वतल्यावर पाचशे वर्षांनी ते गॅजेट संदिप डांगे यांच्या हाती सापडले. त्याच्यासोबत लिहून ठेवलेल्या इंस्ट्रक्शनस ही सापडल्या. संदिप डांगे मोठमोठ्याने ओरडून 'कबुतर जा जा' ही यनावाला यांनी गॅजेटसाठी लिहिलेली कमांड देऊ लागले. पण ते गॅजेट जागचे ढीम्म हलत नव्हते. संदिप डांगे यांनी आपल्या नोंदवहीत नोंद केली. "यनावाला यांचे एक कपोलकल्पित गॅजेट. निरुपयोगी. असे माझे मत आहे." वर उल्लेखित मंत्राचे एक शास्त्र आहे. पद्धत आहे. शास्त्र म्हटल्यावर अंगावर यायचं काम नाही. पाकशास्त्र, अर्थशास्त्र ही वैज्ञानिक नसली तरी शास्त्रे आहेत. कुठल्याही अर्थतज्ञाला पुढे मंदी येणार का तेजी याचे भाकित करता येत नाही. तसे असते तर जगात मंदी-तेजी आलीच नसती. कुठल्याही पाककृतीची स्टेपबायस्टेप कॉपी मारुन सेम टू सेम पदार्थ बनवता येत नाही. म्हणून खलबत्त्यात कुटावे असे लाडू होतात. पाककृतीबरहुकूम आहे म्हणजे पदार्थ उत्तम असे नसते. वर मंत्र लिहिलेला म्हटला अन् प्रभाव जाणवला नाही तर मंत्रात चूक आहे हे कसे? तांत्रिक-मांत्रिक कठोर तपस्या साधना करतात, तशी साधना सर्वसाधारण मनुष्यास शक्यच नाही. ते शब्द योग्य पद्धतीने, योग्य सुरात, योग्य वेळी उच्चारणे आवश्यक असते. र्‍हीं क्लिं हे मनःपटलावर आघात करणारे शब्द आहेत. रोजच्या व्यवहारातले नाहीत. पुर्वसूरींनी ध्वनिंवर संशोधन करून हे शब्द सिद्ध केले आहेत. त्याचे डॉक्युमेंटेशन आणि कुणाही सोम्यागोम्याला ते सहज वापरायला मिळत नाहीत, त्याच्यापासून कारखानदारी व्यावसायिक फायदा नाही हे खरे पाश्चात्त्य लोकांचे दुखणे आहे. काही लोक हे विश्लेषण मान्य करणार नाहीत. त्यांच्याशी मला वाद घालायचा नाहीच. त्यांच्याही मताचा आदर आहे. हे अमान्यकर्ते त्या अनुभवांचे मालक नाहीत. दॅट्स इट. आयुष्यात कधी वाळवंट न पाहिलेला समुद्रावरचा माणूस, आणि कधीही समुद्र न पाहिलेला वाळवंटातला माणूस एकमेकांना आपल्या आयुष्य, राहणीमानाबद्दल सांगतांना कसे सांगतील, दुसर्‍याचे यांना कसे समजेल? जन्मापासून अनाथ, गरिब असलेल्याचे दु:ख गर्भश्रीमंत, सनाथ मुलास कसे इमॅजिन करता येईल? तेव्हा असो. तुम्ही खरंच सुखी आहात. आनंद व्यक्त करा. तुम्ही अध्यात्मिक अनुभूतीच्या जवळपास पोचत आहात. बस अजून काही हजार जन्म जातील.
अध्यात्मप्रेमी व्यक्ती गायत्री मंत्राचे अफाट गुणगान करतात. "हा मंत्र संपूर्ण विश्वाचा मूलाधार आहे. (म्हणजे काय ?) या मंत्राचे गायन केले की त्याचे ध्वनी-प्रतिध्वनी अनंत अवकाशात दुमदुमतात. जगभर गायत्री मंत्राचा जप केल्यास पृथ्वी भोवतीचे सर्व वातावरण प्रदूषणमुक्त, शुद्ध आणि पवित्र होईल."
हा तद्दन येडेपणा आहे. गायत्रीमंत्रच काय आजकाल प्रत्येक धार्मिक गोष्टीचे भयंकर अर्थ लावणारे सनातनी पिसाट जागोजागी उगवलेत. धोतर घालण्यापासून कपाळावर कुंकू लावण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत 'विश्वाच्या तरंगलहरी प्रभावित' होतात असा त्यांचा दावा असतो. जास्त विचार करण्यास वेळ नसलेली जनता 'आपल्या धर्माचं' म्हणून भुलते आणि ह्या धर्मगुरुंवर विश्वास ठेवते. बाकी लोकंही काही कमी नसतात म्हाराजा... मुंहमे राम बगल में छुरी. लोकांस दाखवण्यास उच्च्स्वरात गायत्री वा तत्सम मंत्राने वातावरण शुद्ध व पवित्र करण्याचा संकल्प, अंतर्गत वेगळेच कलह. असो. हे सगळं गुणगान, अभिमान, दिखावा सर्व एक अनामिक भावना रेटण्यासाठी असते. त्यात वैज्ञानिक असे काहीच नाही. बोलणार्‍यास बरे वाटते, ऐकणार्‍यास आपण करतोय ते काही तरी महान आहे असा भ्रम होतो. बाकी, जग सुशेगाद चालतंय..
असले काही ऐकले की आध्यात्मिक श्रद्धावंत हुरळतो. मग सी.डी.लावून "ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।" हा मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी. डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो. "आता राहूं दे. नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो.
हा अध्यात्मिक श्रद्धावंत कुठे भेटला आपणांस? जरा आम्हीपण भेट घेऊ म्हणतो. डास घालवायला गायत्री मंत्र? अचाट कल्पकता आहे श्रद्धाळूंचा अपमान करायची. एवढी निंदानालस्ती करून यनावाला आपल्याला नक्की काय अघोरी समाधान मिळत असावे? काय किक बसत असावी?
असा आहे या मंत्राचा प्रभाव! कुठल्याही मंत्रात कसलीही ऊर्जा नसते. असले मंत्र म्हणू नये असे नाही. सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे.
एकाच पॅरात दोन विरुद्धार्थी वाक्ये? कुठल्याही मंत्रात कसलीही उर्जा नसते. व मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल तर तेही नसे थोडके. व्वा. नक्की एक काय ते ठरवा? उत्साहवर्धन करायला ढीगभर औषधं आहेत ना विज्ञानाने शोधलेली. मग ते का नाही प्रिस्क्राईब करायची? धादांत अशास्त्रिय व अवैज्ञानिक असत्य प्रत्यक्ष यनावाला इथे या धाग्यावर सांगत आहेत. मंत्रपठणाने, जपजाप्याने मनाला उभारी येते हेच वास्तव आहे असे अशास्त्रिय विधान का बरे करावे?
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 11/20/2015 - 04:01 नवीन
१- -कुंडलिनी जागृती ही कुठलाही जपाच्या फार फार प्रचंड नंतरची स्टेप आहे. कुणीही असे आसन घालून ओम ओम जपत कुंडलिनि जागृत करू शकत नाही. २-वर उल्लेखित मंत्राचे एक शास्त्र आहे. पद्धत आहे. ३-पुर्वसूरींनी ध्वनिंवर संशोधन करून हे शब्द सिद्ध केले आहेत. ४-त्याचे डॉक्युमेंटेशन आणि कुणाही सोम्यागोम्याला ते सहज वापरायला मिळत नाहीत, वरील विधान क्र.१ मध्ये जे मांडलेल आहे त्या संदर्भात तसेच जो विधान क्रं २ आणि विधान क्रं ३ मध्ये जो दावा आहे या संदर्भात कोणी व्यक्ती विचारणा करेल की कुंडलिनी म्हणजे मुळात नेमकं काय ? ती जागी करतात म्हणजे नेमकं काय करतात ? ती जागी करण्याची रीत कोणती ? हे सिद्ध करता येऊ शकते का ? त्याचा परीणाम मोजता सिद्ध करता येतो का ? विधान क्रं २ व ३ संदर्भात --- कुठले संशोधन करुन ? त्यात नेमके कुठले प्रयोग करुन ? कुठले निष्कर्ष क्र.१,२,३ इ. त्यातुन काढलेले आहेत. त्या निष्कर्षांचा जसा वैज्ञानिक प्रयोगांच्या निर्ष्कर्षांचा जगात कोणालाही त्या रीतीने गेल्यावर पडताळा घेता येत असतो. तसा त्यातुन काढलेल्या निष्कर्षांचा पडताळा घेता येऊ शकतो का ? या सर्व प्रश्नांची ज्रर एखादा वैज्ञानिक असेल व त्याला त्याच्या एका प्रयोगा निष्कर्षांसंदर्भात असे विचारले तर तो उपस्थित प्रश्नांवर कुठलाही आक्षेप न घेता उलट चिकीत्सेचे स्वागत करुन सहजतेने उत्तर देत असतो. हे वैज्ञानिक जगात नित्य रोज सहज घडत असते. एखादा वैज्ञानिक मूळात नविन शोध लावल्यावर स्वतःहुन ते इतर वैज्ञानिकांसमोर सादर करुन त्यावरील आक्षेपांना उत्सुकतेने सामोरा जात असतो त्यात त्यांना भय लज्जा काहीही नसते कारण त्यांनी ते स्वत" सिद्ध करुन बघितलेले असते व त्यांच्यात तो आत्मविश्वास असतो त्यांच्यात खुलेपणा असतो. प्रश्न विचारणारा हा तुच्छ नसतो उलट तो एक प्रकारे वैज्ञानिक सत्य एस्टॅब्लीश होण्यास पुरक अशी मदतच करत असतो. विज्ञानात क्रीटीसीझम हा कनस्ट्र्क्टीव्ह मानला जातो. मात्र हेच सर्व एक आध्यात्मिक कसे टाळतो त्यावर काय भुमिका घेतो तर या वरील सर्व चिकीत्सेच्या अत्यंत सामान्य प्रश्नांना अध्यात्मिक उत्तर कसे असते. ते असे असते या टाइपचे ४-त्याचे डॉक्युमेंटेशन आणि कुणाही सोम्यागोम्याला ते सहज वापरायला मिळत नाहीत, या अगोदर श्री, संदीप डांगे चे कमोदीनी धाग्यावर एक विधान होते लॉजिक फक्त मेंदूत असतं, (प्रत्यक्षात ते सत्य असेलच असे नसत) त्या लॉजिकला सपोर्ट करतं मन. आणी मनाला सपोर्ट लागतो चार इतर लोकांचा. मग तो आस्तिक असो वा नास्तिक. सगळे फॅनफॉलोईंगच्या भानगडीत अहंकाराचे षड्डू ठोकित असतात. आपण त्याला आस्तिक-नास्तिक वाद म्हणतो या अनुसार तर्क अमान्य आणि वाद चिकीत्सा अहंकार आहेत. यानंतर अजुन एक स्टेप असते आम्ही काय बाबा आम्ही अशेच इ. अभिनिवेष या सर्व चिकीत्सेला सामोरे जाणे टाळण्याचे बहाणे आहेत. कारण आपले दावे त्यासमोर टीकणार नाहीत ही भीती हे खरे कारण. ही जी अध्यात्मिकांची वैज्ञानिक चिकीत्सेला सामोरे जाण्याची भीती हीच फार बोलकी आहे. अंनिस च्या प्रयोगांना सामोरं जायला त्यांच्या पारीतोषीका ला आजपर्यंत कुठलाही चमत्कारी आजपर्यंत मिळवु शकलेला नाही हे एक याचेच उदाहरण आहे. एका अक्षय कुमारच्या चित्रपटात हात बांधलेला अक्षय हा खलनायका समोर उभा असतो त्याला तो म्हणतो जे वेगळ्या संदर्भात आहे मात्र माझ्या वरील म्हणण्याचा आशय अधिक उत्तमपणे व्यक्त करते त्यात तो म्हणतो ये जो डर है ये जो डर है तुम्हारे अंदर ये अच्छा है जरुरी है. ही जी भीती आहे आध्यात्मिकांना चिकीत्सेची तीच त्यांना त्यामधील फोलपणाची टोचणी करुन देत असते. त्यांना माहीत असते की आपली सर्व विधाने दावे चिकीत्सेच्या प्रयोगांच्या उलटतपासणी च्या आघाताने कोलमडुन पडतील. आणि म्हणुन ते चिकीत्सेला सामोरे जात नाहीत त्याऐवजी प्रश्न उपस्थित करणाराच नीच अयोग्य तुच्छा इ. इ. अ‍ॅड होमेनीम. वैज्ञानिक द्रुष्टीकोणाचा एक सुपरीणाम असा की प्रत्येक बाबाला प्रवचनात ये सायन्स ने भी माना है ही पुरवणी सतत जोडावी लागते. त्यांचा श्रोताही या पुरवणी शिवाय त्यांचे म्हणणे ऐकत नाही. हा एक प्रकारचा विज्ञानाचा मोठा विजय आहे. ही भीती नकारात्मक नाही हा एक चांगला विधायक वचक विज्ञानाने अशा प्रकारच्या वल्गनांवर (ज्या कधीही सिद्ध क रता येत नाहीत ) बसवलेला आहे.
यावर कुणीतरी (बहुधा डॉक्टर खरेंनीच) अनुभव सांगितला आहे. की आयुष्यभर वैज्ञानिक विचारसरणी ठेवणारेही अंतिम समयी अनाकलनीय कारणाने देव ह्या संकल्पनेस शरण जातात
डॉ. खरेंनी अशी माणस असतात ( कमी आहे असे त्यांचे म्हणणे आहे इतकेच ) असे ही म्हटलेले आहे. त्यासाठी त्यांनी बर्ट्रांड रसेल आयुष्यभर वैज्ञानिक विचारसरणी ठेवणारा याचे उज्वल उदाहरण ही दिलेले आहे. डॉ. खरेंचा संदीपजींनी कदाचित मिस केलेला प्रतिसादातला भाग असा तुम्ही म्हणता तसे विवेकी आणि कणखर लोक मीही पहिले आहेत किंवा पाहतो परंतु असे लोक १०० पैकी फारतर १ असतात बाकी ९९ नाहीत. आपला मृत्यू समीप आला असतानाही आपला बुद्धी प्रामाण्यवाद स्पष्टपणे व्यक्त करणारा बर्ट्रांड रसेल सारखा माणूस विरळाच. त्याच्याच पुढच्या प्रतिसादात संदीपजींनी कदाचित मिस केलेला गुलाम यांचा प्रतिसाद ज्यात नास्तिक भगतसिंग चे मृत्युला धैर्याने नास्तिकता अबाधिक कायम ठेउन सामोर जाण्याचे उदाहरण व लिंक श्री गुलाम यांनी दिलेली आहे. ती लिंक अशी http://www.shahidbhagatsingh.org/index.asp?link=atheist
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मारवा Fri, 11/20/2015 - 04:01 नवीन
१- -कुंडलिनी जागृती ही कुठलाही जपाच्या फार फार प्रचंड नंतरची स्टेप आहे. कुणीही असे आसन घालून ओम ओम जपत कुंडलिनि जागृत करू शकत नाही. २-वर उल्लेखित मंत्राचे एक शास्त्र आहे. पद्धत आहे. ३-पुर्वसूरींनी ध्वनिंवर संशोधन करून हे शब्द सिद्ध केले आहेत. ४-त्याचे डॉक्युमेंटेशन आणि कुणाही सोम्यागोम्याला ते सहज वापरायला मिळत नाहीत, वरील विधान क्र.१ मध्ये जे मांडलेल आहे त्या संदर्भात तसेच जो विधान क्रं २ आणि विधान क्रं ३ मध्ये जो दावा आहे या संदर्भात कोणी व्यक्ती विचारणा करेल की कुंडलिनी म्हणजे मुळात नेमकं काय ? ती जागी करतात म्हणजे नेमकं काय करतात ? ती जागी करण्याची रीत कोणती ? हे सिद्ध करता येऊ शकते का ? त्याचा परीणाम मोजता सिद्ध करता येतो का ? विधान क्रं २ व ३ संदर्भात --- कुठले संशोधन करुन ? त्यात नेमके कुठले प्रयोग करुन ? कुठले निष्कर्ष क्र.१,२,३ इ. त्यातुन काढलेले आहेत. त्या निष्कर्षांचा जसा वैज्ञानिक प्रयोगांच्या निर्ष्कर्षांचा जगात कोणालाही त्या रीतीने गेल्यावर पडताळा घेता येत असतो. तसा त्यातुन काढलेल्या निष्कर्षांचा पडताळा घेता येऊ शकतो का ? या सर्व प्रश्नांची ज्रर एखादा वैज्ञानिक असेल व त्याला त्याच्या एका प्रयोगा निष्कर्षांसंदर्भात असे विचारले तर तो उपस्थित प्रश्नांवर कुठलाही आक्षेप न घेता उलट चिकीत्सेचे स्वागत करुन सहजतेने उत्तर देत असतो. हे वैज्ञानिक जगात नित्य रोज सहज घडत असते. एखादा वैज्ञानिक मूळात नविन शोध लावल्यावर स्वतःहुन ते इतर वैज्ञानिकांसमोर सादर करुन त्यावरील आक्षेपांना उत्सुकतेने सामोरा जात असतो त्यात त्यांना भय लज्जा काहीही नसते कारण त्यांनी ते स्वत" सिद्ध करुन बघितलेले असते व त्यांच्यात तो आत्मविश्वास असतो त्यांच्यात खुलेपणा असतो. प्रश्न विचारणारा हा तुच्छ नसतो उलट तो एक प्रकारे वैज्ञानिक सत्य एस्टॅब्लीश होण्यास पुरक अशी मदतच करत असतो. विज्ञानात क्रीटीसीझम हा कनस्ट्र्क्टीव्ह मानला जातो. मात्र हेच सर्व एक आध्यात्मिक कसे टाळतो त्यावर काय भुमिका घेतो तर या वरील सर्व चिकीत्सेच्या अत्यंत सामान्य प्रश्नांना अध्यात्मिक उत्तर कसे असते. ते असे असते या टाइपचे ४-त्याचे डॉक्युमेंटेशन आणि कुणाही सोम्यागोम्याला ते सहज वापरायला मिळत नाहीत, या अगोदर श्री, संदीप डांगे चे कमोदीनी धाग्यावर एक विधान होते लॉजिक फक्त मेंदूत असतं, (प्रत्यक्षात ते सत्य असेलच असे नसत) त्या लॉजिकला सपोर्ट करतं मन. आणी मनाला सपोर्ट लागतो चार इतर लोकांचा. मग तो आस्तिक असो वा नास्तिक. सगळे फॅनफॉलोईंगच्या भानगडीत अहंकाराचे षड्डू ठोकित असतात. आपण त्याला आस्तिक-नास्तिक वाद म्हणतो या अनुसार तर्क अमान्य आणि वाद चिकीत्सा अहंकार आहेत. यानंतर अजुन एक स्टेप असते आम्ही काय बाबा आम्ही अशेच इ. अभिनिवेष या सर्व चिकीत्सेला सामोरे जाणे टाळण्याचे बहाणे आहेत. कारण आपले दावे त्यासमोर टीकणार नाहीत ही भीती हे खरे कारण. ही जी अध्यात्मिकांची वैज्ञानिक चिकीत्सेला सामोरे जाण्याची भीती हीच फार बोलकी आहे. अंनिस च्या प्रयोगांना सामोरं जायला त्यांच्या पारीतोषीका ला आजपर्यंत कुठलाही चमत्कारी आजपर्यंत मिळवु शकलेला नाही हे एक याचेच उदाहरण आहे. एका अक्षय कुमारच्या चित्रपटात हात बांधलेला अक्षय हा खलनायका समोर उभा असतो त्याला तो म्हणतो जे वेगळ्या संदर्भात आहे मात्र माझ्या वरील म्हणण्याचा आशय अधिक उत्तमपणे व्यक्त करते त्यात तो म्हणतो ये जो डर है ये जो डर है तुम्हारे अंदर ये अच्छा है जरुरी है. ही जी भीती आहे आध्यात्मिकांना चिकीत्सेची तीच त्यांना त्यामधील फोलपणाची टोचणी करुन देत असते. त्यांना माहीत असते की आपली सर्व विधाने दावे चिकीत्सेच्या प्रयोगांच्या उलटतपासणी च्या आघाताने कोलमडुन पडतील. आणि म्हणुन ते चिकीत्सेला सामोरे जात नाहीत त्याऐवजी प्रश्न उपस्थित करणाराच नीच अयोग्य तुच्छा इ. इ. अ‍ॅड होमेनीम. वैज्ञानिक द्रुष्टीकोणाचा एक सुपरीणाम असा की प्रत्येक बाबाला प्रवचनात ये सायन्स ने भी माना है ही पुरवणी सतत जोडावी लागते. त्यांचा श्रोताही या पुरवणी शिवाय त्यांचे म्हणणे ऐकत नाही. हा एक प्रकारचा विज्ञानाचा मोठा विजय आहे. ही भीती नकारात्मक नाही हा एक चांगला विधायक वचक विज्ञानाने अशा प्रकारच्या वल्गनांवर (ज्या कधीही सिद्ध क रता येत नाहीत ) बसवलेला आहे.
यावर कुणीतरी (बहुधा डॉक्टर खरेंनीच) अनुभव सांगितला आहे. की आयुष्यभर वैज्ञानिक विचारसरणी ठेवणारेही अंतिम समयी अनाकलनीय कारणाने देव ह्या संकल्पनेस शरण जातात
डॉ. खरेंनी अशी माणस असतात ( कमी आहे असे त्यांचे म्हणणे आहे इतकेच ) असे ही म्हटलेले आहे. त्यासाठी त्यांनी बर्ट्रांड रसेल आयुष्यभर वैज्ञानिक विचारसरणी ठेवणारा याचे उज्वल उदाहरण ही दिलेले आहे. डॉ. खरेंचा संदीपजींनी कदाचित मिस केलेला प्रतिसादातला भाग असा तुम्ही म्हणता तसे विवेकी आणि कणखर लोक मीही पहिले आहेत किंवा पाहतो परंतु असे लोक १०० पैकी फारतर १ असतात बाकी ९९ नाहीत. आपला मृत्यू समीप आला असतानाही आपला बुद्धी प्रामाण्यवाद स्पष्टपणे व्यक्त करणारा बर्ट्रांड रसेल सारखा माणूस विरळाच. त्याच्याच पुढच्या प्रतिसादात संदीपजींनी कदाचित मिस केलेला गुलाम यांचा प्रतिसाद ज्यात नास्तिक भगतसिंग चे मृत्युला धैर्याने नास्तिकता अबाधिक कायम ठेउन सामोर जाण्याचे उदाहरण व लिंक श्री गुलाम यांनी दिलेली आहे. ती लिंक अशी http://www.shahidbhagatsingh.org/index.asp?link=atheist
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/20/2015 - 08:59 नवीन
वरील विधान क्र.१ मध्ये जे मांडलेल आहे त्या संदर्भात तसेच जो विधान क्रं २ आणि विधान क्रं ३ मध्ये जो दावा आहे या संदर्भात कोणी व्यक्ती विचारणा करेल की कुंडलिनी म्हणजे मुळात नेमकं काय ? ती जागी करतात म्हणजे नेमकं काय करतात ? ती जागी करण्याची रीत कोणती ? हे सिद्ध करता येऊ शकते का ? त्याचा परीणाम मोजता सिद्ध करता येतो का? १. दहा वेगवेगळ्या वयाच्या, वंशाच्या, देशाच्या दहा लोकांना एकच लवंगी मिर्ची खायला दिली तर कोणास किती तिखट लागली याचे वैज्ञानिक पद्धतीने मोजमाप करता येते का? २. एकाच वर्गात एकच शिक्षक एकाच पद्धतीने ३० मुलांना शिकवतो, पण प्रत्येकाला परिक्षेत मार्क्स वेगवेगळे पडतात ते का? त्या मार्क्सवरून मुलांचे मूल्यमापन योग्य वैज्ञानिक पद्धतीने होते हे सिद्ध करता येते का? या प्रश्नाचे उत्तर देऊ शकलात तर काय सिद्ध करता येते व परिणाम मोजता येते ते सांगेन. विधान क्रं २ व ३ संदर्भात --- कुठले संशोधन करुन ? त्यात नेमके कुठले प्रयोग करुन ? कुठले निष्कर्ष क्र.१,२,३ इ. त्यातुन काढलेले आहेत. त्या निष्कर्षांचा जसा वैज्ञानिक प्रयोगांच्या निर्ष्कर्षांचा जगात कोणालाही त्या रीतीने गेल्यावर पडताळा घेता येत असतो. तसा त्यातुन काढलेल्या निष्कर्षांचा पडताळा घेता येऊ शकतो का ? बहुतेक पाककला-शास्त्रचा उल्लेख आपण गाळलेला दिसतोय. एका छापील पाककृतीबरहुकूम दहा लोकांनी पदार्थ तयार केला तर तो सेम टू सेम येत नाही, असे का? एकच ठिकाणी दहा चित्रकारांनी एकच वस्तूचे पेंटींग केले तर सेम टू सेम येत नाही असे का? संशोधन, प्रयोग वैगेरे मोठे शब्द वापरले की प्रतिवाद करणार्‍याला कोंडीत पकडल्याचे समाधान मिळू शकते पण त्याने सिद्ध काहीच होत नाही. मनुष्यजातीच्या प्रत्येक बाबतीत अनादिकालापासून संशोधन, प्रयोग झालेले आहेत. तुम्ही ज्या वैज्ञानिक पद्धतीचा आग्रह करत आहात ते तसेच असले पाहिजे असा आग्रह का? जगातली प्रत्येक घटना विज्ञानाच्या कसोटीत बसतेच असे काही आहे का? असो. तर तुमचा प्रश्न: कुंडलिनी जागृती वा मंत्रसाधना हे कुठल्या संशोधनाचे वा प्रयोगाचे फलित आहे? असे काही प्रयोग आहेत का ज्या योगे कुणीही ते अनुभव घेऊ शकतो? त्याचे उत्तरः योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने मार्गक्रमण केल्यास याचा अनुभव कोणासही घेता येतो. निव्वळ शाब्दिक चर्चेत हे आम्हाला सिद्ध करून दाखवा म्हटल्याने काही होत नसते. ताप आलेल्या माणसाला पॅरासिटामॉल घ्यावीच लागते. तीचे केमिकल फॉर्मुल्यांचे विस्तृत वर्णन करुन, प्रयोग परिणामांचे पेपर डॉक्टरांच्या परिषदेत सादर केले म्हणून आपोआप ताप उतरत नाही. तुम्ही पॅरासिटामॉल घ्या, ते कशी काम करते, का काम करते ह्याच्याशी पेशंटला काय कर्तव्य? डॉक्टरने एखादे औषध दिले तर ते आपण मुकाट्याने घेता की त्याच्याशी शाब्दिक वाद घालत बसता? औषध घेतल्यावरच तुम्हाला अनुभव येईल की शाब्दिक चर्चेतुन? पुढे असे आहे की हे गुरू तुमच्याकडून एक पैसाही घेत नाहीत, हे अगदी फुकट ज्ञान आहे. मग तुम्हाला नक्की आक्षेप कशावर आहे? असे असते की 'एखादा गुरू दहा लाख रुपये घेऊन कुंडलिनी जागृत करून देतो' वैगेरे तर समजले असते. ही पुर्णपणे वैयक्तिक लाभासाठीची वैयक्तिक साधना असतांना, कुणावरही कसलीही बळजबरी नसतांना इतका आकांडतांडव कशासाठी? या सर्व प्रश्नांची ज्रर एखादा वैज्ञानिक असेल व त्याला त्याच्या एका प्रयोगा निष्कर्षांसंदर्भात असे विचारले तर तो उपस्थित प्रश्नांवर कुठलाही आक्षेप न घेता उलट चिकीत्सेचे स्वागत करुन सहजतेने उत्तर देत असतो. हे वैज्ञानिक जगात नित्य रोज सहज घडत असते. एखादा वैज्ञानिक मूळात नविन शोध लावल्यावर स्वतःहुन ते इतर वैज्ञानिकांसमोर सादर करुन त्यावरील आक्षेपांना उत्सुकतेने सामोरा जात असतो त्यात त्यांना भय लज्जा काहीही नसते कारण त्यांनी ते स्वत" सिद्ध करुन बघितलेले असते व त्यांच्यात तो आत्मविश्वास असतो त्यांच्यात खुलेपणा असतो. प्रश्न विचारणारा हा तुच्छ नसतो उलट तो एक प्रकारे वैज्ञानिक सत्य एस्टॅब्लीश होण्यास पुरक अशी मदतच करत असतो. विज्ञानात क्रीटीसीझम हा कनस्ट्र्क्टीव्ह मानला जातो. माझ्या प्रतिसादाच्या संदर्भात हा उतारा कितपत योग्य आहे हे कळत नाही. एखाद्या वैज्ञानिकाने काही संशोधन केले तर ते तपासण्याचे नियमही असतात की नाही? उदा. झाडांच्या वाढीसाठी एखादे औषध कुणी शोधून काढले तर इतर वैज्ञानिक ते त्यांच्या झाडांनाच घालून बघतील, माणसांना वा गुरांना घालून बघणार नाहीत. यासंदर्भात संशोधकाने केलेल्या दाव्याचे खंडन वा समर्थन झाडांना ते औषध घालून प्रयोग करूनच बघता येईल की फक्त शाब्दिक चर्चेतून ते औषध सिद्ध होते? अध्यात्मात क्रिटीसिझम नाही असे आपणास का वाटले कुणास ठावूक. अहो, क्रिटीसिझम हा मानवी जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे. त्यास अध्यात्म कसे अपवाद असणार? तर्क अमान्य आणि वाद चिकीत्सा अहंकार आहेत. वाद चिकित्सा ह्या अहंकार केव्हा होतात? झाडांच्या वाढीसाठीचे औषध माणसांना उपयोगाचे नाही त्यामुळे ते फोल आहे असे सिद्ध करू पाहणार्‍यांबद्दल आपण काय भूमिका घ्याल? या सर्व चिकीत्सेला सामोरे जाणे टाळण्याचे बहाणे आहेत. कारण आपले दावे त्यासमोर टीकणार नाहीत ही भीती हे खरे कारण. ही जी अध्यात्मिकांची वैज्ञानिक चिकीत्सेला सामोरे जाण्याची भीती हीच फार बोलकी आहे. अंनिस च्या प्रयोगांना सामोरं जायला त्यांच्या पारीतोषीका ला आजपर्यंत कुठलाही चमत्कारी आजपर्यंत मिळवु शकलेला नाही हे एक याचेच उदाहरण आहे. एका अक्षय कुमारच्या चित्रपटात हात बांधलेला अक्षय हा खलनायका समोर उभा असतो त्याला तो म्हणतो जे वेगळ्या संदर्भात आहे मात्र माझ्या वरील म्हणण्याचा आशय अधिक उत्तमपणे व्यक्त करते त्यात तो म्हणतो ये जो डर है ये जो डर है तुम्हारे अंदर ये अच्छा है जरुरी है. वैज्ञानिक म्हणवणार्‍यांनी आध्यात्मिक साधनेच्या प्रयोगाला समोरे जाणे टाळण्याचे काय कारण असावे तुमच्या मते? फार काही बोलणार नाही. जास्त काही हुंहाछु करायची गरज नाही. फक्त दहा दिवस विपश्यना शिबीर करा. तिथले गुरुजी जसे सांगतील तसेच्या तसे फॉलो करा. कारण ती एक शास्त्रीय पद्धत आहे. ती तशीच फॉलो केली तरच तसे परिणाम येतात. दहा दिवसाचे अनुभव मग आम्हाला इथे येऊन सांगा. आहे का तयारी? आता म्हणून नका की आम्हाला लॅब टेस्ट करायच्यात म्हणून. परत ते झाडांचे औषध माणसाला वापरण्याचा अवैज्ञानिक प्रयोग करू नये. पॅरासिटामॉल घ्या, ताप उतरतो की नाही बघा. पण तुम्ही म्हणाल आम्ही तिचे घटकपदार्थ लॅबमधे चेक करून सांगतो ताप उतरतो की नाही तर कसे चालेल? बोला आहे का तयारी वैज्ञानिक चिकित्सेची? डर कोणात आहे खरोखर ते नंतर बघता येईल... ही जी भीती आहे आध्यात्मिकांना चिकीत्सेची तीच त्यांना त्यामधील फोलपणाची टोचणी करुन देत असते. त्यांना माहीत असते की आपली सर्व विधाने दावे चिकीत्सेच्या प्रयोगांच्या उलटतपासणी च्या आघाताने कोलमडुन पडतील. आणि म्हणुन ते चिकीत्सेला सामोरे जात नाहीत त्याऐवजी प्रश्न उपस्थित करणाराच नीच अयोग्य तुच्छा इ. इ. अ‍ॅड होमेनीम. वैज्ञानिक द्रुष्टीकोणाचा एक सुपरीणाम असा की प्रत्येक बाबाला प्रवचनात ये सायन्स ने भी माना है ही पुरवणी सतत जोडावी लागते. त्यांचा श्रोताही या पुरवणी शिवाय त्यांचे म्हणणे ऐकत नाही. हा एक प्रकारचा विज्ञानाचा मोठा विजय आहे. ही भीती नकारात्मक नाही हा एक चांगला विधायक वचक विज्ञानाने अशा प्रकारच्या वल्गनांवर (ज्या कधीही सिद्ध क रता येत नाहीत ) बसवलेला आहे. पैसे खाऊ भोंदुंचे प्रवचन ऐकून अध्यात्माबद्दल काहीच्याकाही मते बनवणार्‍यांना मी कधीच महत्त्व देत नाही. विज्ञानाने सिद्ध केले म्हणजे नक्की काय केले असे त्यास उलट विचारले की बोलती बंद होते. भोंदुं, बोगस, अकार्यक्षम डॉक्टरांच्या नादी लागून अनेकांनी जीव गमावला आहे. म्हणून आधुनिक वैद्यक शास्त्र खोटे ठरले का? तुमच्यावर उपचार करणारा भरमसाठ पैसे घेऊनही तुमच्या बरे होण्याची कधीच काही गॅरंटी घेत नाही तिथे असे प्रश्न, चिकित्सा का विचारल्या जात नाहीत. आणि फुकट साधनेच्या बाबतीतच का विचारले जातात? विधायक वचक का असावा? विज्ञान इतके श्रेष्ठ आहे तर सर्व जगच वैज्ञानिक पद्धतीनेच चालणारे, मानणारे असले पाहिजे की नाही? असे भोंदूबाबा प्रचलित असतात यात विज्ञानाचे अपयश नाही दिसत का? डॉ. खरेंनी अशी माणस असतात ( कमी आहे असे त्यांचे म्हणणे आहे इतकेच ) असे ही म्हटलेले आहे. त्यासाठी त्यांनी बर्ट्रांड रसेल आयुष्यभर वैज्ञानिक विचारसरणी ठेवणारा याचे उज्वल उदाहरण ही दिलेले आहे. डॉ. खरेंचा संदीपजींनी कदाचित मिस केलेला प्रतिसादातला भाग असा तुम्ही म्हणता तसे विवेकी आणि कणखर लोक मीही पहिले आहेत किंवा पाहतो परंतु असे लोक १०० पैकी फारतर १ असतात बाकी ९९ नाहीत. आपला मृत्यू समीप आला असतानाही आपला बुद्धी प्रामाण्यवाद स्पष्टपणे व्यक्त करणारा बर्ट्रांड रसेल सारखा माणूस विरळाच. त्याच्याच पुढच्या प्रतिसादात संदीपजींनी कदाचित मिस केलेला गुलाम यांचा प्रतिसाद ज्यात नास्तिक भगतसिंग चे मृत्युला धैर्याने नास्तिकता अबाधिक कायम ठेउन सामोर जाण्याचे उदाहरण व लिंक श्री गुलाम यांनी दिलेली आहे. अपवादाने नियम सिद्ध करण्याचा बालिश प्रयत्न यापेक्षा ह्यास अजून काय म्हणावे? जगात सर्व प्रकारचे लोक असतात. अंतराळ वैज्ञानिक असलेले इस्रोचे लोक जगातली सर्वात स्वस्त अंतराळ मोहिम बनवतात पण बालाजीचा आशिर्वाद त्या मोहिमेसाठी घ्यायला जातात. असे अनाकलनीय घडामोडी घडतच असतात. त्याचा हवाला देऊन सगळे सायंटीस्ट देवभोळेच असतात बघा असा मूर्ख दावा मी तरी करणार नाही. तुम्ही का केला हे तुमचे तुम्हाला माहित. बर्ट्रांड रसेलचं उदाहरण देऊन नेमकं काय सिद्ध करत आहात हे मला कळले नाही. तुम्हीही तुमच्या मान्यतेला एखादा प्रसिद्ध व्यक्ति फॉलो करतो असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहात. तर्काला लोकमान्यता लाभल्याशिवाय आपणास त्यामधे आत्मविश्वास येत नाही हेच मी कमोदिनी च्या धाग्यावर सांगितले ते आपण सिद्ध केले याबद्दल धन्यवाद! देवाला शरण जाणे हे एखादा करत नाही त्याने नक्की काय सिद्ध होते? मीही देव मानत नाही, की कुठल्याही अज्ञात शक्तीत विश्वास ठेवत नाही. माझे जीवन कुणा दुसर्‍याच्या इच्छेनुसार चालले हे मला मान्यच नाही. जन्मापासून ते आतापर्यंतही अगणित संकटांतून जात असता मी कधी देवा माझ्यासोबतच असे का केले असे कधीच बोललो नाही. जीवनात येणार्‍या सर्व चांगल्या वाईट गोष्टींना साक्षीभावाने बघतो. दु:खाची मजा घेतो, सुखाचीही मजा घेतो. माझे जीवन निसर्गचक्राचा एक भाग आहे इतके मला कळले आहे. अध्यात्म यापेक्षा वेगळे काही नसते. असे जगल्याने खरे अध्यात्मिक मृत्यूला कधी घाबरत नाहीत. अध्यात्माचा विरोध करून पोकळ विज्ञानवादीही मृत्यूला घाबरत नसतील अशी अपेक्षा आहे. भोंदु अध्यात्मिक स्वतःही टरकतात, इतरांनाही भीती दाखवून स्वतःचा गल्ला भरतात. अशांपासून वैज्ञानिक असो वा श्रद्धावंत, सर्वांनीच दूर राहणेच श्रेष्ठ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
घ
घाटावरचे भट Fri, 11/20/2015 - 05:56 नवीन
आठवडा होत आला, अजून २००ही नाहीत म्हणजे मंत्रांमध्ये फार काही सामर्थ्य नसावे, नाही का?
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 11/20/2015 - 06:33 नवीन
एक्च धुणे किती वेळा धुणार आणि घाटही तोच आहे फक्त दरवर्षी काही धोबी बदलतात इतकेच !!!! धोबीघाट टाळणारा पण (टाळकुट्या नसलेला) नाखुस चिंधी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
म
मांत्रिक Fri, 11/20/2015 - 06:37 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
R
Ram ram Fri, 11/20/2015 - 07:32 नवीन
पुर्णपणे सहमत। मंत्रात कोणतीही शक्ति नाही खरी शक्ति मनात असते। मनात दृढ़ संकल्प असला तर चमत्कार घडतो। मंत्र वगैरे वातावरण तयार करुन भोळ्या लोकांना भिती दाखवुन लुबाडणे हाच काहि लोकांचा धंदा होता।
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Fri, 11/20/2015 - 09:02 नवीन
२०० झाले रे! जेपीला बोलावा!
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 11/21/2015 - 04:53 नवीन
यनावाला, मारवा व इतर, माझ्या प्रतिसादावर तुमच्या उत्तराची वाट बघत आहे...
  • Log in or register to post comments
म
मारवा Sat, 11/21/2015 - 08:01 नवीन
मी ही माझ्या प्रतिसादात उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी वाट बघत आहे......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 11/21/2015 - 08:10 नवीन
http://misalpav.com/comment/772831#comment-772831 हा प्रतिसाद बघितला नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Sat, 11/21/2015 - 09:03 नवीन
बघितलाच नाही काळजीपुर्वक वाचला त्यानंतरच तुम्हाला वरील प्रतिसाद दिला. तुमचा साधकांशी अंतरंग संवाद झाल्यावर निवांत बोलु या. बाकी माझ्याशी तुम्ही अजुन चर्चेला सुरुवात केलेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 11/21/2015 - 09:11 नवीन
काळजीपूर्वक वाचूनही, तुमच्या बहुधा लक्षात आले नसेल पण तो प्रतिसाद तुमच्याच प्रतिसादावर उपप्रतिसाद आहे. तुमच्याच विधानांवर प्रतिवाद केला आहे. आणि तुम्ही म्हणताय माझ्याशी अजून चर्चेला सुरुवात केलेली नाही? असं कसं? तुमचा साधकांशी अंतरंग संवाद झाल्यावर निवांत बोलु या. ह्याचा काय अर्थ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मांत्रिक Sat, 11/21/2015 - 09:11 नवीन
जाऊ देत हो संदीप भाऊ, मीच बरोबर, मीच शहाणा असल्या माणसाशी वाद करुन काय होणार आहे? जिथे मुद्द्याचा विषय येईल तिथं कलटी मारायची आणि मग दुसरीकडं जाऊन काहितरी फालतू उकरुन काढायचं असल्या माणसांशी काय वाद घालायचा? काहीच मिळणार नाही उत्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 11/21/2015 - 09:30 नवीन
ह्यॅ, आपण वाद घालतच नाही बॉ. पण मीच शहाणा आहे असे म्हणणाराने आपले शहाणपण वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध करावे... बास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
ट
ट्रेड मार्क Sat, 11/21/2015 - 16:32 नवीन
मूर्त आणि अमूर्त याची सरमिसळ होते आहे. मंत्रपठणाने निर्माण होणाऱ्या अमूर्त शक्तींनी एखाद्या मूर्त गोष्टीवर परिणाम व्हावा हि अपेक्षा करणे पण प्रस्थापित विज्ञानाच्या विरुद्ध आहे. जर का फक्त आपल्याला दिसतं किंवा स्पर्श करता येतं तेच सत्य तर मानसिक शक्ती हि पण अस्तित्वात नसावी का? मंत्र उच्चारांनी तुमची मानसिक शक्ती वाढते असं मानतात आणि बऱ्याच लोकांना त्याचे अनुभव पण आहेत. पण जर का यालाच प्रतिवाद असेल तर मानसिक शक्ती नावाचा प्रकार तरी अस्तित्वात आहे का? आपल्याला मन असते हे विज्ञानाने सिद्ध झाले आहे का? जर नसेल तर मग आपल्याला मन आहे हे कोणी कसे म्हणू शकते? इथे बरेच उच्चशिक्षित डॉक्टर आहेत, पूर्ण शरीरात मन कुठे असतं हे कोणी दाखवू शकेल का? हीच गोष्ट भावना आणि विचारांना पण लागू होते. या ब्रम्हांडात आपल्याला माहीत नाहीत अश्या गोष्टींची संख्या माहीत असलेल्या गोष्टींच्या संख्येपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. त्यातही सर्वांनाच सगळं सारख्या प्रमाणात माहीत असतं किंवा कळतं असं नाही. प्रत्येकाची आकलनशक्ती वेगळी, अनुभव वेगळा आणि प्रचीती वेगळी. शिक्षणाने आणि उच्चशिक्षणाने ज्ञान वाढते, बघण्याचा नवीन दृष्टीकोन मिळतो पण म्हणून तुमच्या पेक्षा वेगळे विचार असणाऱ्यांना मूर्ख का ठरवता? भोंदुगिरी आणि खरोखरच्या अंधश्रद्धेला विरोध आहेच. पण म्हणून आत्ताच्या विज्ञानाच्या पुस्तकात आपल्याचपैकी कोणीतरी लिहून ठेवलेलं १००% सत्य का मानता? या पुढेही असे शोध लागतील ज्यामुळे प्रस्थापित मान्यतांना धक्का बसू शकतो… याची पण उदाहरणे आहेत. प्रत्येकाने आपले विचार खुले ठेवावेत आणि जो पर्यंत समाजाला आणि वैयक्तिक त्रास होत नाही तोपर्यंत सर्वांच्या श्रद्धा, विश्वास या गोष्टी स्वीकाराव्यात. अवांतर: बरेच लोक्स telekinesis वर पण विश्वास ठेवतात… http://www.wikihow.com/Develop-Telekinesis
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sat, 11/21/2015 - 16:36 नवीन
अहो कुणाला सांगताय? स्वमतांध दांभिकांनी स्वतःचे डोळे झाकून घेतलेत. त्यांना फार तर लाल रंग देऊ शकतो आपण. बस्स! यापेक्षा जास्त प्रतिसाद त्यांना द्यावेत हे त्यांना झेपणारच नाही. कारण त्यातून आपलाच नेट पॅक खर्च होतोय!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
स
संदीप डांगे Sat, 11/21/2015 - 17:06 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Sun, 11/22/2015 - 15:22 नवीन
Our ancient texts should not be disregarded, Isro chief Kiran Kumar says http://timesofindia.indiatimes.com/home/science/Our-ancient-texts-should-not-be-disregarded-Isro-chief-Kiran-Kumar-says/articleshow/49873667.cms "The Vedic and ancient Greek writings constitute the core of ancient wisdom ... the Upanishads, the Bhagavad Gita, the Brahman Sutra, the Srimad Bhagavatam and the Mahabharata constitute the primary source of ancient wisdom," Kumar said. ओ चना जोर गरम वाला - जरा आधी या इस्त्रो चीफ चे प्रबोधन करा बघू . मग इकडे या ..
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sun, 11/22/2015 - 15:26 नवीन
चांगला दुवा दिलात. चेक करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
क
कवितानागेश Mon, 11/23/2015 - 13:24 नवीन
वाद घालण्यात अर्थ नाही. मी एक मधला मार्ग शोधलाय... .. वेळ मिळाला की लिहिते.
  • Log in or register to post comments
N
nishapari Mon, 05/09/2016 - 12:07 नवीन
इथे फारच गहन - गंभीर चर्चा सुरु आहे . इथे प्रतिक्रिया देण्याएवढी माझी बौद्धिक योग्यता आहे कि नाही माहीत नाही तरीही धीर करून ही पोस्ट वाचून मनात आलेले विचार जमतील तसे मांडते - या पोस्टचे लेखक शुद्ध विज्ञानवादी आणि कट्टर नास्तिक आहेत हे तर साफ दिसून येत आहे . त्यांचा देव-दैव-नियती यांवर मुळीच विश्वास नसून आपल्या कर्तृत्वावर प्रगाढ विश्वास आहे , संविधानात ज्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पुरस्कार केला आहे तो त्यांना शिरसावंद्य आहे . पण आपल्या विज्ञानवादी दृष्टीकोनाच्या अभिमानात पुढील गोष्ट लेखकाच्या निरीक्षणातून निसटली असावी असं मला वाटतं , ती मी त्यांच्या निर्देशास आणू इच्छिते - ( देवाच्या अस्तित्वाविषयीच्या खरेखोटेपणाचा मुद्दा थोडावेळ जरा बाजूला ठेवा ) देव / मानवाव्यतिरिक्त श्रेष्ठ अशा एखाद्या दैवी शक्तीचं अस्तित्व मानणं ही मानवाची आदिम गरज आहे . ज्यावेळी पाऊस - वादळ - वणवा - वीजा अशा नैसर्गिक घटना आदिमानवाला अपरिचित होत्या , शिकार करा किंवा शिकार व्हा अशा जंगलच्या कायद्यात उद्याचा दिवस पाहायला आपण असू कि नसू याची खात्री नव्हती , काही ओबडधोबड शस्त्रं आणि मनगटातलं बळ याशिवाय कोणतही संरक्षण उपलब्ध नव्हतं त्या काळात माणसाने निसर्गातल्या विविध गोष्टींची ( वृक्ष , ठराविक प्राणी , पर्वत , समुद्र ) दैवत मानून अर्चना करायला सुरुवात केली . काही दगडा-धोंड्यांमध्ये देव कल्पून त्यांच्यावर आपल्या संरक्षणाची जबाबदारी सोपवून मानव निर्धास्त झाला … याचा अर्थ बेफिकीर झाला नाही …. हिंस्त्र पशूची शिकार करताना आपला दगडातला देव रक्षण करेल म्हणून त्याच्या हालचाली निष्काळजी - हलगर्जी झाल्या नाहीत तर आपल्या देवाचा आशीर्वाद पाठीमागे आहे तेव्हा ही शिकार यशस्वी होणारच असा आत्मविश्वास त्याच्यात येऊ लागला . एखाद्वर्षी पाऊस पडला नाही / वणवा लागला / अन्य नैसर्गिक आपत्ती आल्या तर देव आहे , तो आज ना उद्या सगळं नीट करेल या विश्वासाने माणसाला परिस्थिती सुधारत चिकाटीने जगत राहण्याचं बळ दिलं . कालौघात दगड - धोंड्यांना मनुष्याकृती आकार दिले गेले , मनुष्याच्या वस्त्र - अलंकारांमध्ये त्यांचं चित्रण / वर्णन केलं जाऊ लागलं , दैवतांना मानवी भावना जडवल्या गेल्या , पूजेने - यज्ञयागांनी त्यांना प्रसन्न केलं जाऊ लागलं , नवसांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला . तुम्हाला असं वाटतं का की एका ठाम श्रद्धेने हे सगळं करणाऱ्या एकाही मनुष्याला त्याचं वांछित फळ ( मग ते काहीही असो संपत्ती - समृद्धी - एखाद्या अडचणीतून मुक्ती ) मिळालं नसेल ? तसं असतं तर ही विविध दैवतांच्या अर्चनेची रूढी इतकी हजारो वर्षं चालत असती का ? माणसाच्या मनाची शक्ती अपार आहे . आला मंतर कोला मंतर छू या मंत्राने लहान मुलाचा बाऊ काही काळासाठी का होईना पण पळून जातो , उत्कृष्ट संमोहनतज्ञाने भयंकर वेदना होत असलेल्या रुग्णाला संमोहित करून तुम्हाला आता मुळीच वेदना होणार नाहीत अशी सूचना दिली तर त्याच्या वेदना कमी होतात , सतत स्वयंसूचना दिल्याने शरीराअंतर्गत आजार बरे होण्यास मनाच्या शक्तीची खूप मदत होते . या प्रचंड मानसिक शक्तीचा बाह्य परीस्थितीवर काहीच परिणाम होणार नाही असं कसं शक्य आहे ? सध्या जगभर गाजत असलेल्या द सिक्रेट या पुस्तकमालिकेत हाच विचार अतिविस्ताराने मांडला आहे . जर तुम्ही एखादी गोष्ट मनापासून मागीतलीत / एखादी गोष्ट घडावी अशी मनापासून तीव्र इच्छा व्यक्त केलीत आणि ती गोष्ट प्राप्त होणारच असा दृढ विश्वास ठेवलात तर ती गोष्ट तुम्हाला प्राप्त होतेच ! जगातल्या करोडो लोकांना याचा अनुभव आलेला आहे . हेच टेक्निक प्राचीन काळापासून लोक देव या शक्तीला केंद्रस्थानी मानून वापरत आहेत . सदैव एक रक्षणकर्ता पाठीशी असण्याची आदिमानवाची गरज या विज्ञानयुगातल्या मानवालाही आहे , ती संपलेली नाही . विज्ञानाने मनुष्यजीवन कितीतरीपटीने सुलभ , सुखकर , आरामदायी केले आहे यात वादच नाही पण तरीही मानवाने देवाची , अध्यात्माची साथ पूर्णपणे सोडलेली नाही यातून विज्ञानाची अपूर्णता दिसून येते . अडाणी लोकच नाही तरी विज्ञानाने निर्माण केलेल्या सर्व सुखसोयी ज्यांच्या पायाशी लोळण घेत आहेत असे श्रीमंत सुशिक्षित लोकही परमेश्वराच्या पायाशी नतमस्तक आहेत . आयुष्यात एखादं संकट आलं तर सामान्य माणसाला आईन्स्टाईन किंवा एडिसनचा एखादा जटील ग्रंथ किंवा आपल्या संविधानाची कॉपी वाचून धीर येत नाही तर एखादा धर्मग्रंथ , ( तुम्ही ज्या मंत्रांची खिल्ली उडवली आहे त्या मंत्रांसारखाच ) एखादा मंत्र किंवा साधा श्रीराम श्रीराम नावाचा जप त्याला दिलासा देतो , त्याचा डळमळीत झालेला विश्वास बळकट करतो आणि मग देव किंवा त्याची मानसिक शक्ती परस्पर ते संकट दूर करतात किंवा त्याच्यापुढे त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सुलभ होतो … हे तुम्हाला समजेल अशाच पद्धतीने घडेल असं नाही , त्या व्यक्तीला एखादी दुसरी व्यक्ती मदत करू शकते , तिच्यासमोरची परिस्थिती बदलू शकते किंवा त्या व्यक्तीलाच त्या संकटावर मात करण्याचा मार्ग सुचू शकतो . देवाच्या अस्तित्वाच्या खरेखोटेपणा बद्दल एका महान " वैज्ञानिकाचं " मत हे आहे - https://myscientificways.wordpress.com/tag/a-p-j-abdul-kalam/
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Mon, 05/09/2016 - 12:58 नवीन
अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले?.
फितूरी पुढे मंत्राचे काय चालणार.
  • Log in or register to post comments
श
शा वि कु Sun, 11/22/2020 - 08:08 नवीन
जबरदस्त लिहिलंय
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा