Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मंत्रसामर्थ्य

य
यनावाला
Sat, 11/14/2015 - 16:55
🗣 233 प्रतिसाद
परवा एका कार्यक्रमात एक उच्चशिक्षित अध्यात्मवादी म्हणाले, "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.” या विधानात काही तथ्य आहे काय ? ॐ ऊर्जेचा प्रत्यय कधी,कोणाला, कोठे, कसा आला ? या प्रचंड ऊर्जेचे अस्तित्व विज्ञानाने कोणत्या पद्धतीने सिद्ध केले? भर सभेत असली विधाने करायला अध्यात्मवादी कसे धजावतात? अर्थात सभेतील अनेक गलिबलांना (भोळसटांना) ती महान सत्ये वाटतात . ते स्वबुद्धीने विचार न करता माना डोलावतात,"वा! काय विद्वत्ता आहे!" असे म्हणतात , हे खरे. आरोह-अवरोहांसह नाका-तोंडातून शास्त्रशुद्ध सानुनासिक (गेंगाणा) स्वर काढून ॐ-गुंजन करणारे एक्स्पर्टस् आजसुद्धा देशात आहेत.मग आपण अणुभट्टी का उभारतो? ॐ- उच्चारणातील प्रचंड ऊर्जेने टर्बाइने फिरवून विद्युत् निर्मिती का करत नाही? असे करणे शक्य नसेल तर ॐ मध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हणतात ते कोणत्या अर्थाने? "कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा " अशी ऊर्जेची व्याख्या आहे. ऊर्जा आणि शक्ती हे शब्द समानार्थी आहेत. हां! अखंड अकरा तास बद्धमूलासन घालून ॐ-जप करणार्‍या व्यक्तीला वाटू शकेल की, " ..आता माझी कुंडलिनी जागृत होत आहे...तिने अर्धे वेटोळे सोडले...दीड उलगडले...साडे तीन वेटोळी संपली...बघा! आता तिने फणा उभारला...सुषुम्णा मार्गाने कुंडलिनी वर वर चालली आहे...ती पाहा...आता ती चंद्र तळ्यातले सतरावीचे अमृतस्तन्य प्राशन करीत आहे...घट्..घट्..घुट्..संपले....आता ती ब्रह्मरंध्र भेदित आहे....फट्.. फट् ..फाट्... फोडले....माझी कुंडलिनी चिदाकाशात विलीन झाली...मी देहातीत झालो... जीवन्मुक्त झालो.. ब्रह्मरूप झालो...आनंद...आनंद...सच्चिदानंद...ब्रह्मानंद!" हे सगळे व्यक्तिगत भ्रम आहेत. त्यांत वैज्ञानिक सत्याचा लवलेश नाही. ** भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. त्यावेळी या प्रचंड ओम् ऊर्जेच्या योगाने कोणी कधी प्रतिकार केल्याची एक तरी ऐतिहासिक नोंद आहे का? मूर्तिभंजकांनी सोरटीच्या सोमनाथाची शकले पाडली. तेव्हा ते अविवेकी कृत्य या ॐ-शक्तीच्या आधारे कोणीच कसे रोखले नाही? अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले?. **थोरले माधवराव पेशवे कर्तृत्ववान होते. दुर्दैवाने तरुणपणी त्यांना क्षय रोगाने ग्रासले. अनेक आयुर्वेदाचाचार्यांच्या उपचारांनी गुण आला नाही. अंतिम समयीं मृत्युंजयमंत्रपठणासाठी वेदशास्त्रसंपन्न अशा शेकडो ब्रह्मणांना नियुक्त केले. पण हा महामंत्रजागर निष्फळ ठरला. पेशव्यांचा अकाली मृत्यू टळला नाही. **" माझा प्रवास"या पुस्तकात विष्णुभट गोडसे यांनी पुढील वर्णन लिहिले आहे:--(हे गोडसे १८५७ साली उत्तर हिंदुस्थानात प्रवासाला गेले होते.) "शत्रूचा नि:पात होऊन राज्य सुरक्षित राहावे म्हणून झाशीच्या राणीने अनेक अनुष्ठाने केली, मंत्रजप केले. अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने झाली. पेशव्यांकडून त्वरित मदत यावी म्हणून शंभर ब्राह्मण विशेष मंत्रजपास बसविले. पण गोरे लोक शहरात शिरून नरसंहार करू लागले. देवाघरचा न्याय मोठा चमत्कारिक. निरपराध लोकांना केवढी मोठी शिक्षा! झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप मोठे. सर्व मंत्रजप व्यर्थ ठरले. भटांस मात्र सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा मिळाली."--- ब्राह्मणांचे शास्त्रोक्त मंत्रजप व्यर्थ गेले याचे कारण झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप असे गोडसे भटजी म्हणतात.पण हा कार्य-कारण भाव चुकीचा आहे. मंत्रांत काही सामर्थ्य नसते. म्हणून मंत्रजप व्यर्थ गेले. सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा या गोष्टींचा लाभ घेणार्‍यांत विष्णुभट हेही एक होते. अग्निपुराणात मंत्रसामर्थ्याचा अगाध गौरव आहे. त्यातील संग्रामविजय मंत्र:-
:--"ॐ-र्‍हीं चामुण्डे।स्मशानवासिनी किलि किलि हुम् फट्।ॐ-मारय।ॐ-दण्डेन ताडय।ॐ-त्रिशुलेन छेदय।ॐ-चामुण्डे।किलि किलि हुम् फट् स्वाहा।"
लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मंत्र:-
:---"ॐ श्रीं र्‍हीं र्‍हीं क्लीं क्लीं ऐं कमलवासिन्यै नम:।"
असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते. मंत्राने काही साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. वरील ऐतिहासिक सत्य घटनांवरून याला पुष्टी मिळते. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक, खुळचट कल्पना आहे. मंत्रसामर्थ्याने चमत्कार घडतात ते केवळ पुराणे,परीकथा,बालसाहित्य यांतील काल्पनिक गोष्टींत .हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.सर्व सारखेच. निरुपयोगी. असे माझे मत आहे. अध्यात्मप्रेमी व्यक्ती गायत्री मंत्राचे अफाट गुणगान करतात. "हा मंत्र संपूर्ण विश्वाचा मूलाधार आहे. (म्हणजे काय ?) या मंत्राचे गायन केले की त्याचे ध्वनी-प्रतिध्वनी अनंत अवकाशात दुमदुमतात. जगभर गायत्री मंत्राचा जप केल्यास पृथ्वी भोवतीचे सर्व वातावरण प्रदूषणमुक्त, शुद्ध आणि पवित्र होईल." असले काही ऐकले की आध्यात्मिक श्रद्धावंत हुरळतो. मग सी.डी.लावून
"ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।"
हा मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी. डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो."आता राहूं दे. नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो. असा आहे या मंत्राचा प्रभाव! कुठल्याही मंत्रात कसलीही ऊर्जा नसते. असले मंत्र म्हणू नये असे नाही. सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे. .......................................................................................
वर्गीकरण
चर्चा:-देव-धर्म-कर्मकांडे-मंत्रजप

प्रतिक्रिया द्या
141687 वाचन

💬 प्रतिसाद (233)
भ
भाऊंचे भाऊ गुरुवार, 11/19/2015 - 16:38 नवीन
हा आयाडी शंकराचार्यांवर काहीच्या काही विधाने करत आहे
अद्वैत सिध्द्दांत कर्म सिध्दांताला उघड उघड क्रॉस जातो इतके साधे सोपे म्हणने आहे. या पलिकडे मी काहीही अभिप्रेत करत नाही. तसेच मायावाद ( मायेचे जे स्पश्टीकरण) आहे त्यातील काही भाग बुध्द तत्वज्ञानातील जगाच्या स्पश्टीकरणाशी काही साम्य दाखवतो यापलीकडे माझे कोणतेही म्हणने नाही. उलट तुम्ही(अथवा कोणीही) माझ्या समजुतींना छेद द्याल असे कोणतेही अधिकृत रेफरंस समोर आणले तर मी ते आवश्य आत्मसात करेन हीच माझी आपणा साधुभावस्थिर लोकांना नम्र विनंती आहे. कृपया मला सश्रध्द आणी अश्रद्ध यापैकी कोनत्याही कॅटेगरीमधे बसवु नये ते अद्वैत सिध्दांता विरोधी ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/20/2015 - 03:02 नवीन
संपूर्ण प्रतिसादात अजूनही व्यक्तीगत टीकाच दिसते. यनावाला यांनी जे लिहिलं त्या विरोधात प्रतिसाद लिहायला हवा होता. गेली आठ वर्ष यनावाला यांना मी व्यक्तीगत ओळखत नाही पण केवळ त्यांच्या लेखनाला ओळखतो त्यांचं लेखन नेहमीच नव विचार आणि विवेकाशी बांधील असते आणि त्यांच्या लेखनीचं ते वैशिष्ट्यच आहे. कोणत्याही परंपरावादी माणसाला ते पटणारं नसतं. आपल्याला लेखकाचं म्हणनं पटत नाही, त्या विषयाचा उत्तम प्रतिवाद व्हावा. लेखकाला कोणी मंत्र म्हणा म्हणु कोणी सश्रद्ध माणुस लेखकाच्या मागे लागले नाहीत, म्हणुन त्यांना वाटत असलेल्या फोलपणाबद्दल काही लिहुच नये, किंवा लिहायचं असल्यास त्यांनी अभ्यास करुन लिहावं हे न पटणारं आहे. यनावालांचा अभ्यास काही उगं आंकाड तांडव करणार्‍या प्रतिसादापेक्षा खुप चांगला आहे यावर माझा विश्वास आहे. प्रगो एक गम्मत आठवली. मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे, त्या शाळेत गेल्या पाहिजेत असा जेव्हा विचार आला तेव्हा परंपरावाद्यांनी अशीच काहीसा आरडाओरडा केल्याचे आठवण झाली. केसरीमधी लेखाचे शीर्षक होतं हिंदुस्थान देश बुडाला, हो, ठार बुडाला. हे रानडे आणि भांडारकर हे पंडित आणि हे मोडक हे आमच्या समाजाचे पुढारी यांच्या अकला गेल्या तरे कोठे. ज्या वयात बुद्धी आणी विचारशक्तीचा पूर्ण विकास व्हावयाचा व चांगली गोष्ट कोणती वाईट कोणती हे चांगले कळावयाचे त्या त्या वयातच यांना चळ तर लागला नाही ना ? यांना इतके दिवस आम्ही मोठे शहाणे समजत होतो पण आज आता समजली यांची अक्कल सुदैवाने बरे झाले की यांचे बुद्धीमांद्य लवकर बाहेर पडले नाही तर महारष्ट्रात देशातील चटसारी माणसे यांच्या जाळ्यात सापडती काय यांचा हा अविचार..... बायकांना गाड्यात घालून शाळेत धाडण्याचे हे भिकार चाळे या समाजग्रणींना, परमेश्वरा कोठुन रे सुचले आमची वाट काय होनार शिव शिव शिव यांच्या लहररुपी भोवर्‍यात आमचे सुधारणारुप तारु गर्र गर्र फेर्‍या खाऊन अखेरीस तळ पाहणार किंवा यांच्या तब्यतरुप झंझाच्या झपाट्याने सापडून फजित्यांचे खडकावर त्यांची छकले होणार यांच्या अंधत्वामुळे मुर्खत्वामुळे अविचारित्वामुळे सगळ्या हिंदुस्थानास नाचण्याची अंबील आणि कळण्याच्या भाकरी यावर राहण्याचा प्रसंग येणार. हिंदुस्थानची संपत्ती स्त्री शिक्षणाकडे लावण्यापेक्षा ती समुद्रात तरी का नाही लोक ओतीत.....[केसरीतील निवडक निबंध. पृ. २११] स्त्री शिक्षणाबद्दल तेव्हाचा आरडा ओरडा पाहुनही स्त्री आज शिकली म्हणुन अनेक गोष्टी सोप्या झाल्या. आधुनिक विचार मांडणार्‍या लेखकाचा नव विचार असाच न पटणारा असतो, तेव्हा लिहिण्यार्‍यांना लिहु द्यावं. कोणी लेखन म्यान करावी म्हणुन वाईट वाटेल इतकं व्यक्तिगत लिहु नये इतकेच माझं म्हणनं आहे. बाकी आयडी संपादित करण्याची गरज नाही लिहित राहावे वाद व्हावेत आणि वाचकाला कोणत्या तरी एका विचाराच्या बाजुने जाता यावं इतकं जरी झालं तरी मिपाचा आपण योग्य उपयोग केला असे म्हणु नै का. भेटल्यावर बोलूच. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अर्धवटराव Fri, 11/20/2015 - 08:28 नवीन
पण केवळ त्यांच्या लेखनाला ओळखतो त्यांचं लेखन नेहमीच नव विचार आणि विवेकाशी बांधील असते आणि त्यांच्या लेखनीचं ते वैशिष्ट्यच आहे.
यातलं काहिच दिसत नाहि लेखनात (चला.. फार तर क्वचीत दिसतं म्हणुया :) ).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आ
आरोह Sun, 11/15/2015 - 17:12 नवीन
पॅरासिटॅमॉल चे चपखल उदाहरण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 11/16/2015 - 09:35 नवीन
पॅरासिटॅमॉल गोळीचं उदाहारण १००% परफेक्ट. धन्यु ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
ह
हेमंत लाटकर Mon, 05/09/2016 - 12:45 नवीन
जगाच्या चार कोपर्यांत चौघांना बसवा.
पृथ्वी गोल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
म
मनीषा Sun, 11/15/2015 - 10:14 नवीन
हा लेख वाचताना ' घनदाट काळोखात आशेचा किरण ' की काय ते बघितल्याप्रमाणे वाटले. हल्ली मला मी मिपा वर आले आहे की नैमिष्यारण्यात ? हेच कळेनासे झाले होते. गेल्या काही काळात इथे मंत्र, तंत्र, जपजाप्यं, गंडे, दोरे, नाड्या इ. ची अक्षरशः गुंतवळ झाली होती. अर्थात तो गुंता या एका लेखाने सुटेल असे नाही. जप अथवा श्लोक पठणाचा उपयोग मन, विचार स्थिर करण्यासाठी होतो हे मात्रं खरे आहे. तसेच 'ओम' च्या उच्चारणाबद्दल... विविक्षित पद्धतीने म्हणल्यास त्याचा फायदा होतो. योगासनांच्या वर्गात, आम्हाला सर्वात शेवटी 'ओम' म्हणण्यास सांगत असत. काही गायक/गायीका स्वर शुद्ध आणि साफ लागण्यासाठी, रियाजाला सुरुवात करण्या आधी ओम चे उच्चारण करतात असे ऐकले आहे. अर्थात त्याचा उपयोग श्वसन प्रक्रिया सुयोग्यं पद्धतीने आणि नियमित करण्यासाठी होत असणार.
  • Log in or register to post comments
स
साती Sun, 11/15/2015 - 10:18 नवीन
चांगला लेख! मागे व्हॉटसॅपवर एका ग्रूपात एकाने ॐ कसा अमुक डेसिबलचा नी कसा तसा प्रभावी आहे याचे प्स्यूडोसायंटीफीक विवेचन केले होते. कुणा एका प्रसिद्ध जर्मन विद्यालयातील अस्तित्वात नसणार्‍या भौतिकशास्त्रज्ञाचा हवाला दिला होता. पाठवणारा डॉक्टर होता. मात्र त्यात ॐ ची म्हणून जी काही फ्रिक्वेन्सी दिली होती ती मानवी कानांनी ऐकता येण्यापलीकडची होती. आणि ॐकार तर आपण स्पष्ट ऐकू शकतो. हे त्याच्या निदर्शनास आणून दिल्यावर तो चिडला आणि धर्माला उगाच इतक्या विज्ञानाच्या कसोट्या लावू नकोस, तुला आपल्या धर्माचे काही प्रेम नाही का, हे डेसिबलका काय ते प्रत्येकाने कुठे तपासायचे असे काय काय विचारू लागला. मी म्हटलं आपण एम बी बी एस च्या पहिल्या वर्षालाच कुठली फ्रिक्वेन्सी ऐकू येते नी कुठली नाही, आवाज कसा काम करतो हे सगळे शिकलोय. हे सारे कुणा अज्ञान्याने दुसर्‍या अज्ञान्याला पाठवले असते तर ठिक. पण तू स्वतः डॉक्टर असून , डॉक्टरांच्या ग्रूपवर फॉर्वर्ड काय करतोयस. तर अर्थातच माझी धार्मिक अक्कल निघाली. :) मला काय म्हणायचेय, तुम्ही धर्मात आहे म्हणून अगदी प्रेमाने ॐकार म्हणा, पण मग प्स्यूडोविज्ञानाचा आधार देत 'हे कसे सायंटीफिक' सांगत फिरू नका. आणि तुम्ही विज्ञानाचा आधार देत ते प्रूव्ह करायला पहाताय आणि आम्ही विज्ञानाचा आधार घेत तेच डिसप्रूव केलं तर आमच्या धार्मिकतेची लगेच ऐशीतैशी करू नका.
  • Log in or register to post comments
म
मारवा Sun, 11/15/2015 - 11:20 नवीन
+१ हे असे आकडी प्रतिसाद मला अजिबात कधीच आवडत नाही मात्र आज पहील्यांदा मला दुसर काहीच न लिहीता आल्याने सातीजी खरच आवडला तुमचा प्रतिसाद
  • Log in or register to post comments
स
साती Sun, 11/15/2015 - 13:54 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
प
प्रकाश घाटपांडे Sun, 11/15/2015 - 12:12 नवीन
गण गण गणात बोते या मंत्रात मानवाचे हित जपले आहे. विश्वकल्याणासाठी तो मंत्र आहे असे म्हाराजांच्या एक भक्ताने लिहिले होते.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी शोमन Sun, 11/15/2015 - 13:04 नवीन
मारवा यांनी कायद्याचा अभ्यास केलाच आहे. तुम्ही तर पोलीस होतात. बिनविषारी असलात तरी काय झाल ? साप चावल्याच्या भितीने माणस मरतात. मनात आणल तर the Maharashtra Prevention and Eradication of Human Sacrifices, Evil and Aghori Practices and Black Magic Ordinance, 2013, खाली केस ठोकु शकाल. करायची सुरवात की मुहुर्त बघायचा आहे ? अरेरे, दिवाळी पाडवा पण गेला. हिंदु संस्कृतीत साडेतीन मुहुर्तापैकी एक होता. आता गुढी पाडव्यापर्यंत वाट पहा.
  • Log in or register to post comments
म
मोगा Sun, 11/15/2015 - 13:28 नवीन
..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी शोमन
य
याॅर्कर Sun, 11/15/2015 - 13:51 नवीन
नवीन वर्षाची सुरूवात चांगली झाली कि तुमची!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
श
श्रीगुरुजी Sun, 11/15/2015 - 13:57 नवीन
ॐ चे नक्की माहित नाही. परंतु अल्ला हो अकबर या मंत्रात अनेकांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य आहे हे जगात सर्वत्र दिसून आले आहे.
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sun, 11/15/2015 - 14:08 नवीन
'मंत्र' आणि 'घोषणा/ नारा', यांत आपल्यासारख्या विद्वानाने घोळ करावा, या सारखे दुर्देव काय एका महान धर्माचे. हन्त हन्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
आ
आनंदी गोपाळ Sun, 11/15/2015 - 14:45 नवीन
श्रीगुरुजी व त्यांचे समविचारी तर हा मंत्र ऐकताच चवताळून उठतात, हे एकदा नव्हे तर अनेकदा दिसून आले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ब
बाप्पू Sun, 11/15/2015 - 14:24 नवीन
+१ श्रीगुरुजी दादा दरेकर , तर्रात जोकर यांच्या प्रतीक्षेत. .
  • Log in or register to post comments
म
मोगा Sun, 11/15/2015 - 15:11 नवीन
...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू
च
चौकटराजा Sun, 11/15/2015 - 14:31 नवीन
लहानपणी विचित्र विश्व नावाचे मासिक वाचनात यायचे त्यात सगळे दाखले परदेशातले असायचे तसेच हे अध्यात्म संशोधक कुठले न तपासता येणारे दाखले देत असतात त्याने करमणूक या पलिकडे काहीही होत नसते.स्वत: तुम्ही घेउ शकाल असा सोपा अनुभव सांगतो .काळ्या कसदार मातीत पोट्याशियम परम्गग्नेट मिसळा त्यावर समिधा पसरा .साजूक तुपात ग्लिसरीन मिसळा ते समिधावर चमच्याने ओतत रहा व बोम्ब मारा .समिधा पेटू लागतात .अहो अग्निशिवाय समिधा पेटतात .असे आहे बोम्ब मारण्यातील मन्त्र सामर्थ्य !
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sun, 11/15/2015 - 14:52 नवीन
मूळ प्रतीत ते "बॉम्ब मारा" असं असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
म
मारवा Sun, 11/15/2015 - 15:15 नवीन
समिधाच सख्या या त्यात कसा ओलावा कोठुनी फुलापरी मकरंद वा मिळावा जात्याच रुक्ष या एकच त्या आकांक्षा तव आंतर अग्नि क्षणभर फुलवावा कुसुमाग्रज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
म
माहितगार Sun, 11/15/2015 - 15:35 नवीन
साधारणतः अशा स्वरुपाचे अतीरंजनावर टिका करणारा, काही प्रश्न उपस्थीत करणारा वि.का. राजवाडेंचा लेख आठवणीत आहे, पुन्हा मिळाल्यास हवा आहे. या लेखातील मुद्दे आवडले. प्रकाश घाटपांडे यांचे 'आल्या मतंर' सातींचे पॅरासिटामॉल हि उदाहरणेही आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sun, 11/15/2015 - 15:55 नवीन
हे मंत्र, वास्तुशास्त्र थोतांड आहे. तसेच जवळपास प्रत्येक गावात असणारे महाराज देखील खोटेच असतात असे माझे स्पष्ट मत आहे. ह्या बहुतेक महारांजाचे चमत्कार देखील सारखेच असतात. जसे की गाडीत पाणी टाकून गाडी चालू केली, कुणाचा बरेच दिवस बरा न होणारा आजार हात फिरवून बरा केला. मी आणी माझा भाऊ पूर्णपणे नास्तिक असल्याने असले मंत्र म्हणणे, घराची वास्तुशांती करणे, महारान्जाची भक्ती करणे असले प्रकार पूर्णपणे फाट्यावर मारतो. अर्थात त्याबद्दल घरच्यांची बोलणी देखील खावी लागतात.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 11/15/2015 - 17:28 नवीन
मला, शंभर झाले की बोलवा... पण यनावाला उत्तरे देतील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
म
मारवा Sun, 11/15/2015 - 18:07 नवीन
संदीप जी मी यथाशक्ती माझ्या कुवतीप्रमाणे उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो फक्त एकच नम्र विनंती आहे लिंका देउन वाचायला नका लाऊ. सरळ तुमचे मत काय ते मांडुन द्या. इथल्या चौकटीतच चर्चा करु. कारण लिंक लिंक ला काही अर्थ नाही तुम्ही ४ देणार मी ४ देणार परत ते उधार सर्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 11/15/2015 - 18:12 नवीन
लिंका..? कधी दिल्या मी? आणि दिल्यातरी लिंका वाचणे आवश्यकच आहे हो, तेवढं सगळं परत टायपत बसायला वेळ नसतो लोकांकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Sun, 11/15/2015 - 18:21 नवीन
संदीप जी तुम्ही मला दिल्या अस नाही म्हणत मी मला म्हणायचय लिंका कस असत ना १ तुम्ही देता १ मी देतो त्या साखळी ला अंत नसतो आपण इथे समोरासमोर आहोत ना तर समजा एक लिंक मध्ये तुमचा आवश्यक मुद्दा आहे तर तुम्हाला ज्या अर्थी तो महत्वाचा वाटतो तुम्ही वाचला असेलच तर त्यावीषयी किमान सारभुत सुत्ररुपात तुम्ही इथे लिहुच शकता की नाही ? व मी ही तेच जर केल तर मग तो लिंक वाचण लिंक पाहण यात चर्चा अडकत नाही. मग मी तुम्हाला ४ पुस्तक वाचा म्हणेन तुम्ही मला ४ पुस्तक वाचा म्हणणार आपण आता वाचु शकतो का नाही ना ? मग आतापर्यंत तुमच जे सार आहे ते तुमच्या स्वतःच्या च शब्दात मांडळ व मी ही माझ सार मांडल तर चर्चा अधिक प्रामाणिक अर्थपुर्ण होइल असे मला वाटते. मुळात स्वयंपुर्ण होईल. हे म्हणजे आपण परीक्षेला बसलो की मग वाचण सगळ बंद करतो ना आता समोर प्रश्न आहेत व सोडवायचे आहेत जे आठवेल जितक शिकलोय जो अनुभव आहे ते सर्व पणाला लावुन गेट बंद झालेल आहे अशा अर्थाने समजा आपल्या लिंका पेपर पुस्तके जप्त झालेली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/15/2015 - 17:47 नवीन
मंत्र सामर्थ्य, अध्यात्म, विज्ञान, यनावाला, त्यांचे आयुष्य, त्यांचा असलेला / नसलेला अधिकार वगैरे गोष्टी बाजूला ठेवू क्षणभर... पण अध्यात्माची बाजू घेणारे, स्वत:अध्यात्मिक असल्याचे मानणारे, साधना वगैरे करणारे टीका झाली की कसे चवताळून उठतात आणि बेताल व वैयक्तिक टीका करतात / टिप्पण्या करतात ते पाहिले की मौज वाटते. चालू द्या... साधना चालू द्या. जमेल कधी तरी.
  • Log in or register to post comments
M
mystic man Sun, 11/15/2015 - 17:59 नवीन
आणि नास्तिकवादाचे अनुयायी मुळात कोणताही अधिकार नसणारे, कोणताही आध्यात्मिक अनुभव नसणारे जेव्हा ओंकार व गायत्री मंत्राविषयी वाटेल ते बरळतात, तेव्हा आस्तिकांनी गप्पच बसावे का? इतर सश्रद्ध माणसांचे यात नुकसान होत नाही का? आणि हो, गायत्री मंत्र व ओंकार यांचा अपमान होत असताना तुम्ही गप बसता व नंतर फक्त आस्तिकांना सल्ले देता, यात काही पार्शलिटी होत नाही का? खरंच सांगा, त्यांचे उद्गार मानवतेला एकत्र आणणार्या वेदांत तत्वज्ञानाचा अपमान करत नाहीत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/15/2015 - 18:20 नवीन
अपेक्षित प्रातिसाद. असो. आता तोंड उघडलेच आहे तर अजून थोडे बोलतो. माझा रोख / माझी टिप्पणी बेताल आणि संतापाच्या भरात केलेल्या वैयक्तिक टीकेकडे होता. वादाचा प्रतिवाद करू नये असे कुठेच / कधीच म्हणत नाही मी. अर्थातच, तुम्हाला ते कळलेले दिसत नाही. जाऊ द्या झालं. ***
आणि नास्तिकवादाचे अनुयायी मुळात कोणताही अधिकार नसणारे, कोणताही आध्यात्मिक अनुभव नसणारे जेव्हा ओंकार व गायत्री मंत्राविषयी वाटेल ते बरळतात, तेव्हा आस्तिकांनी गप्पच बसावे का?
नका बसू. नकाच बसू. बोला. बाजू मांडा. पण तुम्ही अध्यात्मिक आहात ना? साधना करता ना? मग ते दया, क्षमा, शांती, करुणा वगैरेंचं काही भान ठेवा की. का ते ही जाऊच द्यायचं? जाऊ द्या तर जाऊ द्या.
इतर सश्रद्ध माणसांचे यात नुकसान होत नाही का?
तुम्ही अध्यात्मिक आहात. प्रारब्ध वगैरे मानतच असाल ना? आणि हो... ते सश्रद्ध आणि त्यांचे सद्गुरू काय ते बघून घेतील ना नुकसानीचं.
आणि हो, गायत्री मंत्र व ओंकार यांचा अपमान होत असताना तुम्ही गप बसता व नंतर फक्त आस्तिकांना सल्ले देता, यात काही पार्शलिटी होत नाही का?
चुकीचे गृहितक. त्यामुळे पुढचे गैरलागू.
खरंच सांगा, त्यांचे उद्गार मानवतेला एकत्र आणणार्या वेदांत तत्वज्ञानाचा अपमान करत नाहीत काय?
होतही असेल किंवा नसेल. पण त्यांचा प्रतिवाद करा. तुकाराम महाराजांच्या अंगावर धावून जाणार्‍या मंबाजीने खरा वेदांचा अपमान केला असे मला वाटते. ’मानवतेला एकत्र आणणार्‍या’ वेदांना प्रमाण मानणार्‍यांनी शतकानुशतके मानवांना जनावर बनवून वागविले त्यामुळे वेदांचा अपमान झाला असे मला वाटते. पण ते एक असोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mystic man
M
mystic man Sun, 11/15/2015 - 18:30 नवीन
पण तुम्ही अध्यात्मिक आहात ना? साधना करता ना? मग ते दया, क्षमा, शांती, करुणा वगैरेंचं काही भान ठेवा की. का ते ही जाऊच द्यायचं? जाऊ द्या तर जाऊ द्या. हा फुकट सल्ला आध्यात्मिक माणसाला देणं सोपं आहे. पण जो व्यक्ती अध्यात्माचा ओ की ठो न कळता उगाच बाष्कळ बडबड करत सुटलाय त्याला तुम्ही काहीच सूचना न देता केवळ मलाच सल्ले देत सुटलाय याला म्हणतात पार्शलिटी.... असो. तुमचा पूर्ण प्रतिसाद पार्शलिटीने भरलाय म्हणून काहीच बोलत नाही. चालू द्या स्वमतांध दांभिकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 11/15/2015 - 18:32 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mystic man
M
mystic man Sun, 11/15/2015 - 18:35 नवीन
तुम्हालाही नमस्कार....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मृत्युन्जय Mon, 11/16/2015 - 09:49 नवीन
कसे चवताळून उठतात आणि बेताल व वैयक्तिक टीका करतात / टिप्पण्या करतात ते पाहिले की मौज वाटते. बिका त्यासाठी अध्यात्माला कशाला मध्ये आणता? टीका झाल्यावर चवताळुन उठणारे अस्स्तिकच असतात असे काही नाही. नास्तिकही तसेच चवताळुन उठतातच की. किंबहुना असा अनुभव आहे की नास्तिक जास्त चेकाळतात. बेताल आणि वैयक्तिक टीका करण्यामागेही अध्यात्माचा काहिच दोष नाही. मनुष्यस्वभाव आहे तो. योग्य आहे असे म्हणत नाही पण चेकाळुन बेताल वक्तव्य करणार्‍यात नास्तिक अजिबात कमी नसतात किंबहुन स्वत:च्या तर्क्बुद्धीचा त्यांना इतका दर्प असतो की कधीकधी ते जास्त बेताल वक्तव्ये करतात. अध्यात्माचा उपयोग मनःशांती साठी होतो. ऑंकार पठनाने मन हलके झाल्यासारखे वाटते. पवित्र वाटते. याहुन जास्त ऑंकारात ताकत असेल तर मला माहिती नाही प्रत्ययही नाही. होम हवन केल्याने देखील असेच पवित्र वातावरण तयार होते असे वाटते. आणि जर एखाद्याला तसे वाटत असेल तर जपजाप्य अथवा होमहवन करणे यात काहिच चुकीचे आहे असे मला वाटत नाही. त्याउप्पर आपली मते दुसर्‍यावर लादण्याच्या इर्ष्येने जेव्हा नास्तिक लोक फुकाची बडबड करतात तेव्हा मलाही मौजच वाटते. परंतु याचा संबंध त्यांच्या देवावर विश्वास नसल्याशी आहे असे काही मला वाटत नाही. तो ही अट्टाहासापायी आलेला एक मनोविकारच आहे असे मानुन मी सोडुन देतो. थोडक्यात सांगायचे तर अध्यात्म किंवा कर्मकांडे यामुळे चमत्कार घडतील अशी काही माझी अपेक्षा नाही पण त्यामुळे एका ठराविक मर्यादेपर्यंत मनःशांती नक्की मिळते. त्याहुन जास्त सामर्थ्य त्याच्यामध्ये किंवा कर्त्यामध्ये असते किंवा असु शकते याबद्दल काही माहिती नाही पण इतके नक्की कळते की एखाद्या माणसाची मनस्थिती खराब असेल तर त्याच्यावर या सगळ्या गोष्टींचा प्रभावही कमी पडेल किंवा पडणारच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
संदीप डांगे Mon, 11/16/2015 - 09:59 नवीन
शंभर टक्के सहमत... प्रस्तुत लेख ज्या हिनपणाने सश्रद्ध माणसांच्या भावनांची खिल्ली उडवतो त्यावरून नास्तिक कसे वागतात याबद्दल आपल्या प्रतिसादातून सांगितलेले सोदाहरण पटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 11/16/2015 - 10:06 नवीन
>>>>>>किंबहुना असा अनुभव आहे की नास्तिक जास्त चेकाळतात असं काही नाही दोघेही सारखेच असतात. संख्या आणि आवाज कोणाचा जास्त आहे, त्यावरही चेकाळणे अवलंबून असते. बाकी काही मंत्राने मन:शांती बिंती लाभत नसते असं माझंही व्यक्तिगत मत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रसाद गोडबोले Mon, 11/16/2015 - 10:37 नवीन
कसे चवताळून उठतात आणि बेताल व वैयक्तिक टीका करतात / टिप्पण्या करतात ते पाहिले की मौज वाटते.
ती त्यांची स्टाईल असेल हो . चालायचेच . मिपा वर हा एक ट्रेंड आहे , एकट्या दुकट्याने मोठ्या समुहाच्या भावनांवर चिखलफेक करायची अन त्या समुहातल्या कोणी तरी प्रत्युत्तर दिले की वैयक्तिक टिपण्णी , व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला असले गळे काढायचे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
स्पा Tue, 11/17/2015 - 09:39 नवीन
सुंदर प्रतिसाद रे मृत्युंजया एकदम परफेक्ट शब्दात मांडलेस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सस्नेह Tue, 11/17/2015 - 10:36 नवीन
बिका त्यासाठी अध्यात्माला कशाला मध्ये आणता?
मला वाटतं, बिकांनी अध्यात्माला मध्ये आणलेलं नसून, वैयक्तिक टीका टाळून अभ्यासूंनी योग्य प्रकारे अध्यात्माची बाजू इथे मांडावी असं म्हटलंय.
अध्यात्माचा उपयोग मनःशांती साठी होतो. ऑंकार पठनाने मन हलके झाल्यासारखे वाटते. पवित्र वाटते.
१०० टक्के सहमत. पण हे जे काही तुम्हाला-आम्हाला हलके, पवित्र 'वाटते', ते सापेक्ष आहे. एखाद्या अधार्मिक व्यक्तीचे मन:शांतीचे परिमाण वेगळे असू शकते. तस्मात, कुणी कुणाला नावे ठेवण्यपेक्षा किंवा असे लिहिलेच कसे म्हणण्यापेक्षा सुयोग्य प्रकारे प्रतिवाद करावा, ही अपेक्षा बिकांची दिसते, असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
प्रसाद गोडबोले Tue, 11/17/2015 - 11:16 नवीन
सुयोग्य प्रकारे प्रतिवाद
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ . सुयोग्य प्रतिवाद आला की लगेच खालील पैकी प्रतिसाद द्यायचा १. तो तुमचा समज आहे. २. चालूद्या तुमचे निरर्थक अत्मरंजन / अत्मकुंथन . ३. तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी आहात. ४. आपणास मुद्दा कळलेला नाही. || श्री तांब्याराम प्रसन्न || ( श्रेयाव्हेर : माणणीय सरांच्या एका जुन्या प्रतिसादातुन कॉपीपेस्टीत )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 11/17/2015 - 13:30 नवीन
टनाटनी काय आ.............णे ती मळ मळ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मृत्युन्जय Tue, 11/17/2015 - 13:20 नवीन
पण अध्यात्माची बाजू घेणारे, स्वत:अध्यात्मिक असल्याचे मानणारे, साधना वगैरे करणारे टीका झाली की कसे चवताळून उठतात आणि बेताल व वैयक्तिक टीका करतात / टिप्पण्या करतात ते पाहिले की मौज वाटते. मी फक्त वरील वाक्याला उद्देशुन तो प्रतिसाद लिहिला आहे. इथे बिकांचा रोख अध्यात्मिक माणसांकडे आहे म्हणजे "अध्यात्म" मध्ये आलेच. इथे एका ठराविक प्रकारच्या लोकांबद्दल लिहिले आहे म्हणुन त्याच्या विरुद्ध मताचे लोकही याच चुका करतात त्यामुळे माणूस अध्यात्मिक आहे की नाही हे इथे पुर्णतः गैरलागू आहे. तस्मात अध्यात्माला मध्ये आणू नये असे लिहिले होते. १०० टक्के सहमत. पण हे जे काही तुम्हाला-आम्हाला हलके, पवित्र 'वाटते', ते सापेक्ष आहे. एखाद्या अधार्मिक व्यक्तीचे मन:शांतीचे परिमाण वेगळे असू शकते. तस्मात, कुणी कुणाला नावे ठेवण्यपेक्षा किंवा असे लिहिलेच कसे म्हणण्यापेक्षा सुयोग्य प्रकारे प्रतिवाद करावा, ही अपेक्षा बिकांची दिसते, असे मला वाटते. अगदी बरोब्बर. आणि मलाही असेच वाटते. त्यामुळेच नास्तिक लोक जेव्हा आपली मते (त्यांची ती मते. आस्तिकांच्या त्या अंधश्रद्धा) इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतात तेव्हा गंमत वाटते. तुम्ही जे म्हणत आहात अगदी तेच मी म्हटले आहे माझ्या मागच्या प्रतिसादात. खाली उद्धृत करतो:
आणि जर एखाद्याला तसे वाटत असेल तर जपजाप्य अथवा होमहवन करणे यात काहिच चुकीचे आहे असे मला वाटत नाही. त्याउप्पर आपली मते दुसर्‍यावर लादण्याच्या इर्ष्येने जेव्हा नास्तिक लोक फुकाची बडबड करतात तेव्हा मलाही मौजच
वाटते. मी मिपावर जितके प्रतिसाद पाहिलेत त्यात कुठेही (काही माझ्याकडुन नजरचुकीने राहुन गेले असतील म्हणुन ९५% प्रतिसादात म्हणुयात वाटल्यास) कुणी आस्तिकाने कुठल्या नास्तिकाला "हॅहॅहॅ रे येड्या. नास्तिक तु. तुला काय कळते. देवावर विश्वास ठेवायला शिक जरा नाहितर गाळात जाशील" टाइपचे प्रतिसाद दिलेले दिसत नाहित. या उलट आस्तिकांचे रेवडी उडवणारे, आपणचे काय ते हुषार अश्या थाटाचे, आपली मते आस्तिकांवर लादायचा प्रयत्न करणारे, आस्तिक - नास्तिक वाद उकरुन काढणारे नास्तिकांचे अनेको प्रतिसाद, आणि धागे पाहिलेत (मजे मजेत लिहिलेले आणि डु आयडींनी मुद्दाम उकीर्डे फुंकण्यासाठी टाकलेले प्रतिसाद सोडुन देउ आपण. ते खोडसाळपणेच लिहिलेले असतात) बाकी सुयोग्य प्रकारे प्रतिवाद करावा अशी बिकांची अपेक्षा असावी याबद्दल माझे काहिही दुमत नाही. गंभीरपणे चर्चा करणार्‍या कुठल्याही माणसाची असेल. माझीही आहे. बिकांबद्दल तर खात्री आहे. पण त्यांचा वरचा प्रतिसाद हा सुस्प्ष्टपणे आस्तिक लोकांच्या प्रतिसादांबद्दल होता. मी त्यात थोडासा बदल केला. आस्तिक लोक चुकीचे प्रतिसाद देतच नाहित असा काही माझा दावा नाही पण नास्तिक या बाबतीत कांकणभर सरसच आहेत असे मी माझ्या प्रतिवादात म्हटले आहे. बिकांनी केवळ
"टीका झाली की लोक कसे चवताळून उठतात आणि बेताल व वैयक्तिक टीका करतात / टिप्पण्या करतात ते पाहिले की मौज वाटते."
असे लिहिले असते. तर हा आणी त्याच्या आधीचा प्रतिसाद लिहिलाही नसता. पण त्यांच्या प्रतिसादात "पण अध्यात्माची बाजू घेणारे, स्वत: अध्यात्मिक असल्याचे मानणारे, साधना वगैरे करणारे टीका झाली की ......" असे आस्तिकंना उद्देशुन असलेले स्टेटमेंट आल्यामुळे तो प्रतिसाद लिहिला. आस्तिक काय किंवा नास्तिक काय शेवटी माणसेच. आणि माणासांचे सगळे विकार दोन्ही विचारधारेच्या व्यक्तींमध्ये असणारच. एवढे सांगण्यासाठी तो प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ब
बॅटमॅन Tue, 11/17/2015 - 13:26 नवीन
कसंय ना मृत्युंजयसाहेब, आस्तिक = मूर्ख, अडाणी, विचार करण्यास अक्षम हे समीकरण सध्याच्या पर्सन ग्रेडिंग अल्गोरिदममध्ये इनबिल्ट बसलेले आहे. किती कुणी विवेकवादी वगैरे झाला तरी त्या कोडची लागण कमीजास्त प्रमाणात झालेलीच असते, त्याला काय करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सुबोध खरे Sun, 11/15/2015 - 17:54 नवीन
मी आस्तिक आहे कि नास्तिक मला नक्की माहित नाही. लौकिकार्थाने मी रोज पूजा करत नाही. किंवा मी आजतागायत सिद्धिविनायक, तिरुपती, शिर्डी किंवा शेगावला गेलो नाही. समोर देऊळ आले तर नमस्कार करतो. कोणताही देव असेल तरीही कारण आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारः केशवं प्रती गच्छति यावर श्रद्धा आहे. मुद्दाम हून कुणालाही त्रास होईल असे कृत्य करीत नाही. लहान पणची एक आठवण अशी आहे -- चौथी पाचवीत असेन. आगीशी/ ज्योतिशी खेळणे हा आवडता छंद होता. संकष्टीचा दिवस होता आई निरांजन लावून बाहेर गेली होती. निरांजनातील वात वर खाली करण्याच्या नादात ती विझली. तेवढ्यात आई देवघरात आली आणि मी निरांजनाशी खेळतो आहे आणि मी ज्योत विझवली हे तिने पाहिले. तो ओरडली आणि म्हणाली नास्तिक असलास तरी चालेल नालायक होऊ नकोस, राहिली गोष्ट मंत्रसामर्थ्याबद्दल - मंत्र खरोखरच इतके सामर्थ्यवान असतात का? शारीरिक सामर्थ्य मंत्र देऊ शकतील का? बहुधा नाही मानसिक सामर्थ्य मंत्र देतात का? कदाचित होय. माणूस काम करीत असतो पण त्याचा स्वतःवर संपूर्ण विश्वास नसतो कारण बर्याच गोष्टी मानवाच्या हातात नसतात. मग एखाद्या मोठ्या वयोवृद्ध माणसाने सांगितले कि सर्व ठीक होणार आहे तर त्यावर त्याचा विश्वास बसतो. माणसाला टोकाची परिस्थिती असेल तर कुणाचा तरी हात पाठीवर हवासा वाटतो. भारत सरकार विरुद्ध सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचे वेळेस माझे वडील माझ्या पाठीशी उभे होते. इतका प्रचंड मानसिक आधार असल्याने मी ती लढाई शेवटी विजयापर्यंत नेऊ शकलो. सर्वच माणसे अशी नशीबवान नसतात म्हणून त्यांना कोणतातरी आधार लागतो. आपली लढाई स्वतःच लढायची असते. म्हणूनच " भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे" म्हणणारे स्वामी समर्थ लोकांना मानसिक आधार देत असतात "गण गणी गणात बोते" मंत्र म्हणणारे लोक सुद्धा असाच आधार गजानन महाराजांकडून शोधत असतात . मग हि शक्ती मंत्रात असते का? बहुधा नाही ती तुमच्या मनात असते पण "तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी" या न्यायाने ती त्या त्या माणसाला कुणीतरी दाखवावी लागते. गंभीर आजारात एखादा डॉक्टर असा आधार ठरू शकतो. कठीण आर्थिक परिस्थितीत एखादा मित्र असा आधार दाखवू शकतो. या मानसिक सामर्थ्याची प्रचीती मला स्वतःला आली होती जी मी येथे माझ्या धाग्यावर लिहिली होती. मन सामर्थ्य http://www.misalpav.com/node/28078. हे सामर्थ्य जागृत कसे होते हे अजून तरी शास्त्राला कळलेले नाही. ज्यांनी मनोरुग्ण पहिले आहेत त्यांना काबूत ठेवणे किती कठीण आहे ते त्यांना माहित आहे. पंधरा वर्षाच्या मुलावर शारीरिक ताबा ठेवण्यासाठी लष्कराचे चार सैनिक पुरे पडत नाहीत. म्हणजे मंत्रात शक्ती असते कि नाही. ज्याला त्याचा मानसीक आधार मिळतो त्याच्या दृष्टीने असते आणि ज्याला त्याची गरज पडत नाही त्याच्या दृष्टीने नसते असेच मला वाटते. यावर काही मित्र म्हणतील डॉक्टर कुंपणावर बसले आहेत आणि कुणालाच नाराज करू इच्छित नाहीत(POLITICALLY CORRECT) कदाचित असेनही I AM NEITHER FORWARD NOR BACK WARD. I AM JUST AWKWARD
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Sun, 11/15/2015 - 18:01 नवीन
सुंदर/अप्रतिम/मार्मिक/ विश्लेषण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
M
mystic man Sun, 11/15/2015 - 18:02 नवीन
धन्यवाद डाॅक्टर! अगदी सोन्यासारखं बोललात. असा युक्तीवाद केला तर कशाला होतील आस्तिक नास्तिक वाद?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मारवा Sun, 11/15/2015 - 18:13 नवीन
जिथे आधार घेण्याची गरज निर्माण होते तिथे कमकुवतपणा कमजोरी असमर्थतता आहे हे अगोदर सिद्ध झालेल च आहे ना ? मग त्याचा गौरव कशासाठी ? त्याच उद्द्दात्तीकरण कशासाठी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
M
mystic man Sun, 11/15/2015 - 18:20 नवीन
आणि यनावाला रिचर्ड डाँकी चा आधार घेतात तो कशाला मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
सुबोध खरे Sun, 11/15/2015 - 18:30 नवीन
मारवा साहेब यात उदात्तीकरण कुठे दिसले? एखाद्या डॉक्टरने असे सांगितले कि तुमच्या नातेवाईकाचा आजार( उदा कर्करोग) असाध्य आहे अशा परिस्थितीत त्या माणसाने काय करावे अशी अपेक्षा आहे? असे रुग्ण मी रोज पाहतो. यकृताच्या कर्करोगाच्या रुग्णाच्या बायकोला आणी भावाला तुमच्या भावाकडे फार दिवस नाहीत आणी सध्या उपलब्ध असणारी उपचार पद्धती त्यांना लागू पडणार नाही. यकृताच्या प्रत्यारोपानाला २५-ते ३० लाख रुपये खर्च करूनही सर्वत्र पसरलेला कर्करोग आटोक्यात येणार नाही (हे मीच नव्हे तर नंतर टाटा आणी कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात सांगितले गेले) हे मी २० -२२ दिवसांपूर्वी सांगितले. त्यानंतर ते तिबेटन औषधे घेत होते आणी रोज महा मृत्युंजयाचा मंत्र म्हणत होते. त्याचा काहीही उपयोग होणार नाही हे मला कळत होते परंतु आपण करीत असलेल्या गोष्टीचा रुग्णाला फायदा होणार आहे या विचाराच्या आधाराने त्या दोघांना उभारी मिळत होती. या मानसिक आधाराची किंमत काय? (आता तो रुग्ण मृत्यू शय्येवर आहे.) नाही देखिले पंचानना तोवरी जंबुक करी गर्जना या न्यायाने नास्तिक लोक स्वतःवर मृत्यूची छाया पडल्यावर गलितगात्र होताना इतकी वर्षे पाहत आलो आहे म्हणूनच मी म्हटले आहे कि मी नास्तीक आहे कि आस्तिक तेच मला माहित नाही. निदान आईचा सल्ला ऐकून नालायक न होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा