Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुंबई महानगर पालिका निवडणूक २०१७

ध
धर्मराजमुटके
Fri, 01/27/2017 - 13:10
🗣 405 प्रतिसाद
नमस्कार ! महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचे राज्यसरकार बनल्यापासुन अनेक कुरबुरी चालू होत्या. रोज रोज एकमेकांवर आरोप तर करायचे पण एकत्र सत्तेतही राहायचे हे पाहून माझ्यासारख्या सामान्य आणि निष्पक्ष व्यक्तींना नक्कीच उबग आला असेल. काल २६ जानेवारी २०१७ च्या मुहुर्तावर शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा केली आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांना जितका आनंद झाला नसेल तितका एक सामान्य माणूस म्हणून मला झाला. प्रत्येक पक्ष आतापर्यंत बेडीकीने बैलाचे सोंग घेतल्याप्रमाणे आपली ताकद फुगवून दाखवत होता त्यांची खरी ताकद आता कळणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरात होणार्‍या पालिका / जि.प. आता भाजपा, सेना स्वतंत्रपणे लढतील तर काही ठिकाणी राष्ट्रवादी-कॉग्रेस युती करतील. शिवाय या खेचाखेचीत निवडणूकांसाठी १ महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला असल्यामुळे या वेळची निवडणूक वेगळी ठरणार आहे. प्रत्येक पक्ष वेगवेगळे लढत असल्यामुळे पक्षातील तिकिट इच्छूकांना बर्‍याच प्रमाणात वाव मिळेल त्याचप्रमाणे इंपोर्टेड इच्छूकांना देखील बर्‍याच प्रमाणात वाव मिळेल. एकंदरीत निवडणूकीच्या तोंडावर पक्ष सोडून जाणार्‍यांची संख्या घटेल असा अंदाज आहे. शिवाय एकाच वॉर्डात चार ते पाच मोठे पक्ष, स्थानिक वजनदार नेतेमंडळी निवडणूक लढविणार असल्यामुळे ऐनवेळी 'बशी घेणार्‍या' उमेदवारांना घसघशीत फायदा होण्याचा संभव आहे. पण नोटबंदी नंतरच्या या काळात हा प्रश्न वेगवेगळे पक्ष कसा सोडविणार हे पाहणे रोचक ठरणार आहे. मुंबईत मागील वेळी मराठी मतांमधे जो सेना-मनसेच्या मागे एकवटण्याविषयी संभ्रम होता तो आता बर्‍याच प्रमाणात निवळला असून मराठी मतदाराला या दोघांपैकी नेमके कोणाला मत द्यायचे हे नक्की कळाले असावे असाही एक अंदाज आहे. मात्र काही नेते, सेना-मनसे समर्थक अजुनही सेना-मनसे युती होईल असे मनातल्या मनात मांडे खात आहे. मात्र ठाकरेंचा सध्याचा पवित्रा पाहता ते कोणाशीही युती करतील असे वाटत नाही. मात्र मतदानाचे निकाल आल्यानंतर मात्र सगळ्यांनाच सगळे ऑप्शन ओपन असतील असे वाटत आहे. गुजराती, मारवाडी मतदार प्रामुख्याने भाजपचा मतदार मानला जातो. मात्र मुंबईतील बहुसंख्य गुजराती / मारवाडी समाज व्यापारक्षेत्रात गुंतला आहे. त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायावर नोटबंदीनंतर काय आणि किती प्रमाणात परिणाम झाला यावर त्यांचे यंदाचे मतदान अवलंबून असेल की ते काहीही झाले तरी भाजपालाच मते देतील काय हे बघणे देखील रोचक ठरेल. त्यातच कालच शरद पवार साहेबांना पद्मविभुषण जाहिर झाला असल्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर भाजपा राष्ट्रवादी अशी नवी युती होणार काय असादेखील संभ्रम उत्पन्न होण्याचा संभव आहे. मात्र अशी शक्यता निकालांअगोदर तरी दिसत नाही. कदाचित शिवसेनेने मुंबई / पुणे राखले तर ते भविष्यात राज्यसरकारमधून बाहेर पडू शकतात व त्यावेळी राष्ट्रवादी मदतीला येऊ शकेल अशीही एक शक्यता दिसते. (साहेबांना पदक अगोदरच्या कामगिरीबद्द्ल मिळाले आहे पण तो वेगळा मुद्दा आहे.) युपी बिहारी मंडळी आपापल्या राज्यात सपा, बसपा, जनता दलाला आणि काही प्रमाणात भाजपाचे पाठीराखे असले तरी एकेकाळी ही मंडळी मुंबईमधे बर्‍याच अंशी काँग्रेस समर्थक होती. मात्र सध्याची काँग्रेसची अवस्था पाहता ही मंडळी कोणामागे उभी राहतात हे पाहणे रोचक ठरेल. कदाचित बर्‍याच ठिकाणी हीच मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मुस्लीमबहूल भागात सपा ची कसोटी लागणार आहे तर ओवेसींची पार्टी काय करते यावर देखील लक्ष ठेवावे लागेल. ओवेसींनी कालच "मोदींना परदेशी दाढीवाले का आवडतात" असा वरवर योग्य वाटणारा सवाल विचारुन टीआरपी खेचून घेतला आहे. सगळ्यात कठीण अवस्था विविध आंबेडकरवादी पक्षांची आहे. आठवलेंचा पक्ष भाजपाबरोबरच राहतो की कसे हे देखील २८ जानेवारीपर्यंत माहित पडेल. मात्र सध्यातरी त्यांच्यासमोर दुसरा पर्याय दिसत नाहिये. अगदी ५०-१०० मतांनी पराभव / विजय होण्याची शक्यता असणारी यावर्षीची निवडणूक अगदी रोचक होणार आहे हे नक्की. कोण कोठे जिंकेल हे आजच सांगणे अवघड असले तरी आपण आपापले अंदाज मांडू शकता. मात्र स्थानिक उमेदवाराचे कर्तुत्व, त्याचा इतिहास पाहूनच त्याला निवडून द्यावे ही माझीतरी अपेक्षा आहे. पक्ष कोणताही असो, काही फरक पडू नये असे मला वाटते. आमच्या ठाण्यात विविध पक्षांनी आपापल्या विभागातील सोसायट्यांना भेटणे सुरु केले आहे. आम्हीही आमच्या समस्या / मागण्या त्यांच्यापुढे मांडून काही अपेक्षा ठेवल्या मात्र सध्या कोणताही उमेदवार कोणतेही वचन देण्यास राजी नाही यावरुन त्यांच्या मनाची अस्थिरता देखील दिसून येते. एकंदरीत उमेदवारांसाठीही ही निवडणूक वेगळी ठरणार आहे हे निश्चित. तुम्हाला काय वाटते ते जाणून घेण्यास इच्छुक आहे. अवांतर : मी लेखाच्या शिर्षकात मुंबईचा उल्लेख केला असला तरी धागा मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतल्या निवडणूकींच्या चर्चांसाठी वापरला जाऊ शकतो. राज्यांच्या निवडणूकांवर इथे अगोदरच एक धागा असल्यामुळे त्याची चर्चा त्याच धाग्यावर केली तर ते संदर्भांसाठी उपयुक्त राहिल.
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
61088 वाचन

💬 प्रतिसाद (405)
म
मोदक Tue, 02/14/2017 - 13:54 नवीन
अवांतर आहे.. पण सातार्‍याचा आणि 'चांगल्या खादाडीचा' नक्की काय प्रॉब्लेम आहे ते वाचायला नक्की आवडेल. हवे तर वेगळा धागा काढा कोणीतरी. एक तर तेथे नेहमी जाणे होते आणि (दिवसा) चांगली खादाडीची ठिकाणे कित्येक वर्षात मिळालेली नाहीत. कणसे धाब्याची क्वालिटी गेली आहे आणि प्रांजली फारसे आवडले नाही. सकाळी सकाळी नाष्टा करायचा म्हटला तरी झक मारत राजपुरोहितचा सामोसा/ढोकळा खावा लागतो. बाकी ठिकाणे एक तर मला माहिती नसावीत किंवा अस्तित्वात नसावीत. सातार्‍यातील खादाडीबद्दल कोणीतरी प्लीज लिहा. त्यातील चांगल्या ठिकाणी पार्टी देण्यात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
त
तिरकीट Tue, 02/14/2017 - 17:15 नवीन
चंद्रविलास भुवन चांगला पर्याय आहे की...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
व
विशुमित Wed, 02/15/2017 - 06:17 नवीन
सातारा मेढा रोडवर २-३ चांगले ढाबे झाले आहेत (नाव आठवत नाहीत ). कण्हेर धरणाजवळ जलसागर ढाबा तो सुद्धा छान आहे. ढाबे लहान आहेत पण खाण्याची गुणवत्ता आणि चव अप्रतिम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
त
तेजस आठवले Tue, 02/14/2017 - 15:13 नवीन
हे उदाहरण अतिशय चुकीचे आहे. "फक्त माज" हे एवढेच सार उदयनराजे बद्दलच्या प्रतिसादाचे आहे. साताऱ्यात जर गुंडगिरी आहे तर त्यांना सांभाळायला अजून एक गुंड ठेवायचा ? आणि वर त्याचे कौतुक ? आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून बोलणे ह्या गोष्टीचे समर्थन होऊच शकत नाही.(तुम्ही करत आहेत असे म्हणणे नाही.) सामान्य जनतेबद्दल चे मत बरोबर आहे. अनोळखी देवदूतापेक्षा ओळखीचा राक्षस बरा अशी एक म्हण आहे. त्यामुळेच कदाचित जनता इतर पर्यायांचा विचार करत नसेल. त्यामागे नाईलाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
संदीप डांगे Tue, 02/14/2017 - 15:26 नवीन
सामान्य जनतेबद्दल चे मत बरोबर आहे. अनोळखी देवदूतापेक्षा ओळखीचा राक्षस बरा अशी एक म्हण आहे. त्यामुळेच कदाचित जनता इतर पर्यायांचा विचार करत नसेल. त्यामागे नाईलाज आहे. >> आमचे हातोळकर साहेबांना तुमचे हे मत कितपत पटेल काय माहित. :) जनता गुंड भ्रष्टाचार्‍यांना स्वेच्छेने निवडून देते असे ते आकडेवारीच्या जोरावर म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 02/14/2017 - 16:09 नवीन
तुम्हाला पाहिजे तसा अर्थ काढण्यात मी तुमचा हात धरू शकत नाही:):) (ह. घ्या). तुम्ही तुमच्याच मताला काँट्रॅडीक्ट करत आहात :):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 02/14/2017 - 16:34 नवीन
तुम्ही तुमच्याच मताला काँट्रॅडीक्ट करत आहात >> जरा विस्तार करा... कोणते मत कुठे कॉन्ट्रॅडिक्ट आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 02/14/2017 - 16:46 नवीन
असं बघा तुम्ही म्हणता कि निवडणुकीला सगळे बदमाष लोक उभे असतात आणि जनतेला नाईलाजाने एक निवडावा लागतो. पण माझं म्हणणं आहे की नाईलाजाने सगळ्यात जास्त बदमाष कसा निवडला जातो? वरच्या उदाहरणात जर तुम्ही गुंडच निवडून आला आहे असे मानत असाल तर एका अर्थी तुम्ही माझंच मत मान्य करत आहात की! मला तर असे वाटू लागले आहे कि कमी अधिक गुंडपणा हा जनतेसाठी सर्वात महत्वाचा निकषच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
विशुमित Wed, 02/15/2017 - 05:41 नवीन
मला काय वाटतं हे मी लिहलं नाहीये तेथील जनतेला काय वाटतं आणि त्या प्रमाणे ते तिथे मतदान करतात. 'होताळकरांच्या' म्हणण्याला मी पुष्टी देत होतो. सातारामध्ये राजे ऐवजी तसा पर्याय सुचवा. (माझ्या माहिती नुसार राजेंद्र चोरगे हे एक सुसंस्कृत नेते आहेत. हा एक चांगला पर्याय होऊ शकतो पण तेथील जनता त्यांना निवडून देतील का हा प्रश्न आहे.) अवांतर: <<<<सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून बोलणे ह्या गोष्टीचे समर्थन होऊच शकत नाही.>>> -- समर्थन नाहीच होणार पण बरेच नेते, अभिनेते, कलाकार मंडळी मद्यपान करूनच सार्वजनिक ठिकाणी भाषण ठोकत असतात. माझ्या कडे खूप उदाहरणे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले
अ
अभ्या.. Tue, 02/14/2017 - 16:39 नवीन
स्पार्टन्स ....................... शेतात काय हाये????????? गहू गहू गहू (येनीवे ३०० बद्दल धरमराजचे अभिनंदन)
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 02/14/2017 - 16:51 नवीन
हाहाहाहा! भारीच होता तो विडिओ! आता कुठे प्रचार रंगात येतोय, राज ठाकरे नुकतेच प्रचारात उतरले आहेत. शिवाय या धाग्यावर म्हणावे तेवढे विषयांतर पण नाही झाले. त्यामुळे धाग्यात ५०० चं पोटेन्शिअल आहे.:):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
संदीप डांगे Tue, 02/14/2017 - 17:42 नवीन
राज ठाकरेंचा व्यक्तिशः विरोधक असलो तर आजचे भाषण जबरदस्त. नाशिकबद्दल जे बोलले आहे ते सर्व बाबतीत खरे आहे. मी काही मनसे चा छुपा उघड समर्थक नाही, किंवा नाशिकमधे माझे मतदानही नाही. तरी एक बायस्टॅन्डर म्हणून माझा अनुभव मांडतो. गेले चार वर्ष नाशिकमधे राहतोय, रस्त्यावर खड्डे हा प्रकार संपूर्ण नाशिकमधे रेअरेस्ट ऑफ द रेअर केस आहे. कुठेही खड्डा पडला तर जास्तीत जास्त तीन दिवसाच्या आत रस्ता दुरुस्त होतो हे स्वतःच्या डोळ्याने पाहिले आहे. स्वतःची चारचाकी, दुचाकी चालवण्याचे सुख पुण्या-मुंबईपेक्षा नाशिकमधे कैक पटीने अनुभवले. रस्त्यांचे शहरातले जाळे अतिशय उत्तम व वेगवान आहे. नाशिकच्या रहदारीचा वेग माझ्या स्वानुभवानुसार ताशी ५० च्या वर आहे. एका टोकापासून दुसर्‍या टोकाला जायचे असेल तर गर्दीचे मार्ग टाळूनही सुखरुप जाता येतं. पाणीपुरवठा व्यवस्था उत्तम आहेच. नागरी सुविधांसाठी बर्‍याच सोयी आहे. नाशिकमधला सॉलिड वेस्ट मॅनेजमेन्ट प्रोजेक्ट जबरदस्त आहे. घनकचर्‍याचे विघटन करुन त्याचे शेतीउपयोगी खत तयार करुन शेतकर्‍यांना अल्पदरात उपलब्ध करुन दिलं जातं. घंटागाडीमुळे रस्त्यावर कचरा प्रकार नाही. ठिकठिकाणी बागा, खेळायची मैदाने उत्तम आहेत. टाऊनप्लानिंग छान आहे. सांडपाणी व्यवस्थाही चांगली आहे. बहुतेक सगळ्याच पक्षाचे नगरसेवक चांगली कामे करतात. मागे सांगितले होते बहुतेक की आमच्या अंगणातली झाडे-झुडपे तोडली होती, तेव्हा तो कचरा घंटागाडीवाले नेत नसल्याने नेत नव्हते, तेव्हा त्यांनी कुलकर्णीमॅडमना फोन करा असे सांगितले, आम्हाला वाटले ह्या कुलकर्णी म्हणजे मनपात कोणी अधिकारी-समन्वयक वगैरे असतील, तर त्या आमच्या नगरसेविका निघाल्या. नगरसेवकाला थेट फोन करुन आमच्या घरासमोरचा कचरा घेऊन जायला सांगणे मुंबईत बरीच वर्षे घालवलेल्या आम्हाला पचवणे जडच गेले. ह्याच नगरसेविकेने धरणे आंदोलन करुन प्रशासन-पोलिस ऐकत नाहीत म्हणून आमच्या परिसरातल्या बेकायदा फेरिवाल्यांचा बाजार उठवला. हे सगळं माझ्यासाठी तर स्वप्नवत होते. किमान अर्धा एकर, पाव एकर अशी गार्डन्स जी काही छोटी छोटी नगरं आहेत त्यांमधे आहेतच. तिथे ग्रीन जीम, जॉगिंग ट्रॅक इत्यादी प्रकार पहिल्यांदा नाशिकमधेच बघितले. तेही चार वर्षाआधीच्या गोष्टी आहेत, निवडणुकांच्या मुळे झटपट झालेल्या नव्हे. निवडणुकांसाठी खास बॉटनिकल गार्डन, शिवकालिन वस्तूसंग्रहालय वगैरे राज ने केलंय. गोदापार्कचा फज्जा उडालाय मात्र. अर्थात तिथे प्रत्यक्ष अजून जाऊन पाहिले नाही. पण निसर्गरम्य ठिकाणांची नाशकात कमतरता नाही. गोदावरी स्वच्छ्ता अभियानात सर्व नागरिकांनी, नोकरदारांनी, प्रशासकिय अधिकार्‍यांनी उस्फूर्त भाग घेतला होता. खरोखर कामही केले होते, फक्त फोटोबाजी नव्हती. तरी असे प्रत्यक्ष न्युट्रल नागरिक म्हणून अनुभवत असतांना नाशिकमधे खड्ड्यांचे साम्राज्य, पाण्याचे दुर्भिक्ष्य, गुन्हेगारीचा सुळसुळाट वगैरे बातम्या वाचून चाट पडायचो की हे नक्की कोनत्या नाशिकबद्दल सांगत आहेत. पाच वर्षापूर्वीची गुन्हेगारी बरीच आटोक्यात आहे, तेव्हा धडाधड खून पडायचे, आताही पडतात, पण प्रमाण खूपच कमी झाले आहे. विकास तर झालाय, इतका की शिवसेनेकडे जी आता कंबर कसून मनपा मिळवायचीच ह्याच्या मागे लागली आहे तिच्याकडेही मनसेच्या कारभाराच्या विरोधासाठी दमदार मुद्देच नाहीत. मी शिवसेनेचे डिजिटल कॅम्पेन सुरुवातीला थोडे दिवस सांभाळले होते त्यावेळेस कळले, (कामाच्या मानाने पैसे फार कमी होते म्हणून काम सोडलं) काही लोक नाशिकच्या विकासाचं श्रेय केंद्राच्या कुंभमेळा मदतीला देतात. किंवा हवा तसा विकास झालाच नाही म्हणतात. मौज वाटते. ह्या श्रेय देण्याघेण्याची गंमत वाटते. जबाबदारी एकमेकांवर ढकलायची श्रेय मात्र घ्यायला सगळे पुढे!!! मुंबैत तर ह्याचा सॉलिड तमाशा आहे. ममरडिये, केंद्रसरकार, राज्यसरकार, मनपा सगळे एकमेकांवर जबाबदारी ढकलत असतात. पोलिसस्टेशनांच्या हद्दीसारखी. नाशिकमधे शिवसेनेचे जोर लावणे सुरु आहे, भाजपने मनसेचे अनेक कामकरी नगरसेवक पळवले आहेत... निकाल काय लागेल ह्याची उत्सुकता आहे त्यामुळे. काहीही निकाल लागला तरी जे वातावरण आज नाशिकमधे आहे त्याचा निकाल लागू नये म्हणजे मिळवली. :-)
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 02/14/2017 - 18:05 नवीन
माझा प्रतिसाद कापला तुम्ही :(...:):). हेच म्हणणार होतो. आणि त्यांचं भाषण संपल्यावर मनात आलं होतं की बहुतेक डांगेजी नाशिक मध्ये राहतात. त्यांना त्यांचा डायरेक्ट अनुभव विचारावा. मधल्या काही काळात तराज ठाकरेंचं समर्थन करावं का असा विचार येत होता. पण गेल्या काही दिवसात नाशिकमधील प्रोजेक्टसचे विडीओज बघितले आणि छान वाटलं. आणि आजच्या भाषणाने परत खूप छान वाटलं. मुद्देसूद. माझी विनंती आहे शिवसेना भाजपला, मुंबई महानगरपालिकेच्या विकासाबद्दल बोला हो! जवळजवळ वर्षभर आयुक्त नसताना, पालिकेवर कर्जाचा डोंगर असताना आणि भाजप आणि राष्ट्रवादीसारखे छुपे विरोधक सोबत घेऊन सत्तेत असताना केलेली कामे पाहता राज ठाकरेंना परत संधी मिळायलाच हवी असे माझे स्पष्ट मत बनले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अप्पा जोगळेकर Wed, 02/15/2017 - 07:11 नवीन
मला आश्चर्य वाटते आहे. राज ठाकरे खरच हे करु शकतात ? तस असेल तर त्यांचे जोरदार अभिनंदन. हे म्हणजे नापास होण्याची खात्री असलेल्या मुलाने डिस्टिंक्शन मिळवल्या प्रमाणे आहे. बिनडोक उद्धवने काही शिकावे ह्यातून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
वरुण मोहिते Tue, 02/14/2017 - 20:44 नवीन
राज ठाकरे माणूस हुशार आहे .पोटेन्शिअल आहे . अजून एक संधी मिळायला हवी .काही चुका झाल्या आणि धोरणं चुकली ती त्यांनाच आता बहुधा उपरती झाली असावी. लेट्स सी. ह्यावेळी यश नाही मिळालं तरी चालेल पण लंबी रेस का घोडा आहे हे निश्चित .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 02/15/2017 - 03:55 नवीन
मनसे संपलेला पक्ष आहे. या पक्षाला काहीही भवितव्य नाही. हे ओळखूनच यावेळी मनसेचा प्रचार थंड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
ग
गॅरी ट्रुमन Wed, 02/15/2017 - 05:53 नवीन
मनसेविषयी माझे मत नक्कीच चांगले नाही. पण तरीही मनसेने नाशिकमध्ये बर्‍यापैकी काम केले आहे असे तिथले लोक म्हणत आहेत. यात माझ्या ओळखीच्याही (आणी मनसेला विरोध करणार्‍या) काही जणांचा समावेश आहे. कालचे राज ठाकरेंचे भाषण नंतर बातम्यांमध्ये बघितले. त्यात राज ठाकरे उद्धवपेक्षा बरेच जास्त चांगले वाटले. इतर पक्षांवर टिका निवडणुकीच्या रणधुमाळीत व्हायचीच ती तशी राज ठाकरेंनीही केली. पण त्याचबरोबर नाशिकमध्ये नक्की काय केले याविषयीही राज बोलले आणि त्या आधारावर आम्हाला मते द्या असे त्यांनी म्हटले. राज ठाकरे आणि मनसेविषयी मते कशीही असली तरी या बाबतीत तरी त्यांना श्रेय दिलेच पाहिजे. उद्धव मात्र इतकी वर्षे सत्तेत असूनही इतर कसे वाईट एवढेच पालूपद लावत आहेत आणि त्यांच्या कामाविषयी काही बोलायला तयार नाहीत. त्यांचेही बरोबरच आहे म्हणा. कामाविषयी बोलायचे असेल तर आधी काहीतरी केलेले असले पाहिजे. तिथेच जर ठणठणगोपाळ असेल, मुळातच आडात नसेल तर पोहार्‍यात येणार कुठून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 02/15/2017 - 06:31 नवीन
मनसेविषयी आपले मत का चांगले नाही हे वाचायला आवडेल. मनसेला मृतप्राय म्हणणे हे राजकीय आततायीपणाचे लक्षण वाटते. त्यांच्या आजच्या अवस्थेला खालील काही गोष्टी कारणीभूत असू शकतात - १. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना (खरतर कार्यकर्त्याना म्हणण्यापेक्षा बऱ्याच अंशी राज ठाकरेंच्या करिष्म्यावर निवडून आलेल्या नेत्यांना) फालतू गोष्टींना बळी पडून चुचकारण्याचं धोरण न घेतल्याने अशी अवस्था झाली आहे असे मला वाटते. पण एका अंशी ते उत्तम आहे. निवडून आल्यानंतर काम करणार नसाल तर चुचकारून काय करायचे? "ज्यांना जायचेय त्यांनी जा" ही भूमिका त्यांनी कायमी ठेवली आहे. २. शिवाय त्यांचे विरोधक आणि माध्यमे यांनी बनवलेली त्यांची "यू टर्न" इमेजपण त्यांना खाली खेचण्यास कारणीभूत आहे. प्रत्येक वेळी झालेल्या अशा अपप्रचाराला राज ठाकरे यांनी वेळीच आवर घालायला पाहिजे होता. ३. दुसऱ्या फळीतील निष्क्रिय नेत्यांचा कल ओळखून त्यावर लवकर कृती करणे गरजेचे होते. त्यांना स्वतःला, महाराष्ट्रभर नाही म्हणाले तरी त्यांची ताकत असलेल्या ठिकाणी वारंवार फिरणे गरजेचे होते. शिवाय नुसते फिरणे नाही तर गाजावाजा करत फिरणे, कारण आजकाल तेच खपते. ४. फक्त पत्रकारांनी विचारले तरच एखाद्या मुद्द्यावर मत व्यक्त करणे मारक ठरू शकते हे यांच्याबाबतीत दिसून आले. उठ कि सुठ समविचारी पक्षांवर कारण नसतानाही टिका करणारे आज जास्त चर्चेत आहेत. असे असले तरीही मनसेला नवे ठेवण्याआधी, ज्या गोष्टींसाठी त्यांना नवे ठेवायची आहेत त्या गोष्टींसाठी इतर पक्षांशी तथ्यांवर आधारित तुलना व्हायला हवी असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Wed, 02/15/2017 - 07:29 नवीन
मनसेविषयी आपले मत का चांगले नाही हे वाचायला आवडेल.
याचे कारण मनसेची गुंडगिरी, खळखट्याक धोरण वगैरे वगैरे. तसेच दोन लाख 'भय्ये' मुंबईत आले तर चार लाख हात आणि चार लाख पाय 'युपी-बिहारमध्ये' पाठवू अशा प्रकारचे विचार आणि भाषाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
स
संदीप डांगे Wed, 02/15/2017 - 07:40 नवीन
सहमत आहे. खरंतर मनसेची स्थापना झाली तेव्हाची मनसे व त्यानंतर दोन-तीन वर्षातली मनसे यात खूप धोरणात्मक फरक झाला. मनसे स्थापनेचे पहिले भाषण हे विकास - व्हिजन वर आधारित होतं, कामही तसंच चालू झालं होते. पण जनतेकडून तेवढा प्रतिसाद मिळाला नाही किंवा रिझन्स बेस्ट नोन टू हिम.. मनसेच्या धोरणांनी ट्रॅकच बदलला. मराठीपाटी-भय्या आंदोलन करणे अगदी मूळ शिवसेना छाप होतं.. बहुतेक राज ला खूप घाई झाली होती. आस्तेकदम मूळ धोरणांवर चालला असता तर इतक्या वर्षात सक्षम पर्याय म्हणून उभा राहिला असता. नाऊ इट्स टू लेट टू कम बॅक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 02/15/2017 - 08:40 नवीन
खरंतर मनसेची स्थापना झाली तेव्हाची मनसे व त्यानंतर दोन-तीन वर्षातली मनसे यात खूप धोरणात्मक फरक झाला.
मला असे अजिबात वाटत नाही. रादर झाला असेल तर उलट बदल झाला आहे. मनसे पॉप्युलर झाली तीच मुळी त्यांच्या या खळ्ळ फट्याक धोरणामुळे . सोबत विकासाचा अजेंडा होताच. हल्ली हल्ली मनसे याउलट असे चर्चेत राहणारे मुद्दे व आंदोलन यांपासून दूर गेलेली दिसते. रादर उगाचच फारसे महत्व नसणारी आंदोलने होताना दिसत आहेत. बाकी राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात हा मुद्दा मांडलाच ना! नाशिकात सत्ता मिळाल्याच्या पहिल्या वर्ष दोन वर्षात नाशिकात काय केले असे सतत उपहासात्मक विचारणारी मंडळी हल्ली त्याबाबतीत विचारात नाहीत. कुठेय तुमची ब्लू प्रिंट विचारणारी मंडळी ब्लू प्रिंट दाखवल्यावर परत कधी त्याबद्दल बोलताना दिसली नाहीत. वास्तविक मला वैयक्तिकरित्या ब्लू प्रिंट हा प्रकार खूप आवडला होता, काही सुधारणांची गरज होती पण अप्रोच सुंदर होता. जनतेनी त्यांना निवडणुकीत आपटून दाखवून दिले कि फक्त त्या अजेंड्यावर चालून तुम्हाला जिंकता येत नाही. परंतु त्यानंतरही बहुतेक सगळ्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे त्यांनी काय केले किंवा काय करू इच्छितात हे मांडलेच आहे. गेल्या दहा दिवसातील शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादीची भाषणे बघितली तर त्यात ते काय केले/काय करणार आहेत याबद्दल जास्ती बोलताना दिसतच नाहीत. राहता राहिला प्रश्न खळ्ळ फट्याक गुंडगिरीचा तर तो सापेक्ष आहे. मला वैयक्तिकरित्या अशा आंदोलनांमध्ये खूप काही जगावेगळं आणि अराजक प्रकारचं वाटत नाही. म्हणजे उगाच काहीच नसताना चित्रपटात दाखवतात तसली गुंडगिरी वगैरे प्रकार आहे का तो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 02/15/2017 - 08:58 नवीन
मनसेची वाटचाल हा एक मोठा विषय आहे, नंतर कधीतरी. तूर्तास संघटन कौशल्य, योग्य माणसांची निवड, माणसे सांभाळणे, अचूक वेळ साधणे, लॉन्गटर्म ध्येय ठेवणे, प्रतिमा तयार करणे याबाबतीत अनेक ठिकाणी राज कमी पडले. राजकारणात उतरुन चांगलं करायची इच्छा असलेली अनेक तरुण मंडळी राज ठाकरेंकडे खेचली गेली होती, त्यात मीही होतो. पण अंतर्गत धोरणं बाह्य दिखाव्यापेक्षा वेगळी अनुभवास आली... म्हणून म्हटले की रिझन्स बेस्ट नोन टू हिम ओन्ली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
व
विशुमित Wed, 02/15/2017 - 05:25 नवीन
बऱ्याच अंशी सहमत आहे. नक्कीच राज ठाकरेंकडे विकासाबाबत व्हिजन आहे फक्त त्यांनी जण सामन्यांमध्ये जास्तीत जास्त येऊन प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असता तर सुरवातीच्या काळात मिळालेला प्रतिसाद अजून ही अबाधित ठेवला असता. तरी ही अजून खूप संधी आहेत या पक्ष कडे, असे माझे मत आहे. गुरुजींना त्यांच्या आजू बाजूला सगळीकडे स्मशानच दिसत आहे, सगळे मृत अवस्थेतच दिसतायेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
श
श्रीगुरुजी Wed, 02/15/2017 - 10:35 नवीन
सगळे मृतावस्थेत दिसत नाहीत. काही ठराविक पक्षच (शेकाप, मनसे, रिपब्लिकन पक्षांचे असंख्य गट इ.) हे संपलेले आहेत. अजित सिंह यांचा रालोद, देवेगौडांचा निजद इ. पक्षात अखेरची धुगधुगी शिल्लक आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना इ. पक्ष याच मार्गावर आहेत. शेकाप, मनसे इ. आता जात्यात असतील तर हे पक्ष सुपात आहेत इतकाच फरक आहे. राज ठाकरेंच्या अत्यंत धरसोड धोरणांमुळे व कोलांट्या उड्यांमुळे मनसेची दुरावस्था झाली आहे. त्याचबरोबरीने त्यांचा बेभरवशीपणा व उर्मटपणा सुद्धा पक्षाच्या अधोगतीला कारणीभूत आहे. मुळात मनसे स्थापन झाला तो शिवसेना-भाजप युतीची विशेषतः शिवसेनेची मते फोडण्यासाठी. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ६-८ लोकसभा जागांवर मनसेने भाजप-सेना युतीच्या उमेदवारांचा पराभव घडवून आणला. त्याचा फायदा फक्त काँग्रेस-राष्ट्रवादीलाच झाला. नंतर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने स्वतःचे १३ आमदार निवडून आणले व २५ जागांवर भाजप-सेना युतीच्या पराभवाला हातभार लावून त्या जागा काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळवून दिल्या. त्या निवडणुकीत सेना-भाजप युतीला ९० तर काँग्रेस-राष्ट्रवादी युतीला १४४ जागा मिळाल्या होत्या. जर मनसे नसती तर सेना-भाजप युतीला १२८ व काँग्रेस-राष्ट्रवादी युतीला ११९ जागा मिळून भाजप-सेना युतीला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली असती. खरं तर या निवडणुकीनंतर मनसेचे अवतारकार्य संपले होते. सुरवातीला २००७ महापालिका निवडणुकीनंतर महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेचे नगरसेवक काँग्रेसला पाठिंबा देत होते. नंतर २०११ मधील कल्याण-डोंबिवली व २०१२ मधील ठाणे महापालिका निवडणुकीनंतर मनसेने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. २०१२ मध्ये मनसेने नाशिकमध्ये भाजपचा पाठिंबा घेतला. नंतर २०१४ मध्ये नाशिकमध्येच मनसेने महापौरपदासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला व परतफेड म्हणून पुणे व नगरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. म्हणजे मनसेने आजवर चारही पक्षांशी वेगवेगळ्या ठिकाणी चुंबाचुंबी केलेली आहे. हे अत्यंत बेभरवशाचे राजकारण होते. २०१४ मध्ये गुजरात दौरा करून आल्यावर राज ठाकरे मोदींवर स्तुतीसुमने उधळत होते. काही महिन्यांनंतर तेच राज ठाकरे मोदींच्या नावाने बोटे मोडायला लागले. ते कधीही एका भूमिकेवर ठाम राहिले नाहीत. कधी टोलविरोधी आंदोलन सुरू करून काही दिवसांनी सोडून द्यायचे, तर कधी मराठी बाणा पुढे आणून परप्रांतियांना मारहाण करायची. माझ्याकडे महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे असे ते अनेक वर्षे सांगत होते. शेवटी त्यांची ब्ल्यू प्रिंट आली ती तब्बल ६-७ वर्षांनंतर. तोपर्यंत लोकांच्या त्या प्रकारातील रस पूर्णपणे संपला होता. मनसेला कोणत्याही पक्षाचे वावडे नाही (बसपप्रमाणे), मनसेने कधीही एक ठाम भूमिका फार काळ घेतलेली नाही, राज ठाकरे हे अत्यंत बेभरवशाचे व उर्मट आहेत अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. २००५ मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडून बाळासाहेबांना धक्का दिल्यावर ते धक्क्यातून सावरायच्या आतच राज ठाकर्‍यांनी शिवसेना सोडून त्यांच्यावर जिव्हारी वार केला हे अनेक शिवसैनिकांना व शिवसेनेचे समर्थक नसलेल्यांना सुद्धा आवडले नव्हते. या सर्व प्रकारामुळे मनसे आता जवळपास अस्तित्वहीन झाली आहे. नुकत्याच संपलेल्या नगरपरीषदांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या ४७०० हून अधिक नगरसेवकांमध्ये मनसेचे ४७ नगरसेवक सुद्धा नाहीत. पूर्णपणे अस्तित्वहीन झाल्याचीच ही लक्षणे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
वरुण मोहिते Wed, 02/15/2017 - 10:00 नवीन
सगळी धोरणं चांगली होतील ,माणसं चांगली मिळतील पुढे पक्षाला यश मिळेलही पण आतापर्यंत त्यांचं सर्वाधिक जास्त काय चुकलं ते असेल तर <कार्यकर्त्यांवर उपकार करतोय>हि भावना .ह्यामुळे पक्षाची दुसरी फळी उभी राहू शकली नाही ना कार्यक्षम कार्यकर्ते .आज जागे झाले तरी होणारी हानी भरून निघणार नाही . बाळासाहेबांचा कित्ता गिरवताना हि महत्वाची गोष्ट ते विसरले .
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Wed, 02/15/2017 - 10:02 नवीन
हि भावना . ह्यामुळे सर्वात जास्त नुकसान झालं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 02/16/2017 - 16:29 नवीन
परत एकदा राज ठाकरेंची पुण्यात जबरदस्त कडक सभा! एखाद्या राजकीय पक्षाची निवडणूक प्रचाराची सभा काय आणि कशी असावी याचं नितांत सुंदर उदाहरण! राज ठाकरेंना परत संधी का दिली जाऊ नये हा प्रश्न आजची सभा पाहून प्रत्येकानी स्वतःला विचारावा असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Fri, 02/17/2017 - 19:39 नवीन
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत..राज ठाकरे ना एक संधी द्यायला हवी. नाशिक ची हि सभा सुंदर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 02/18/2017 - 06:53 नवीन
आजच्या वर्तमानप्रत्रात तीन पक्षाच्या जाहिराती आहेत. टॅगलाईनवरून तुम्ही सहज ओळखू शकाल कुणाची कोणती जाहिरात :):):). १. माता, भगिनी, आबालवृद्धांच्या रक्षणासाठी धावून येतो तो.... २. विकासकामात येईल सुसूत्रता आणि धार...जेंव्हा पार्लमेंट ते पालिका असेल एकाच सरकार! ३. वाद हवा असेल तर 'ती' लोकं आहेतच...पण काम हवं असेल तर फक्त आम्हीच आहोत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
श
श्रीगुरुजी Sat, 02/18/2017 - 09:47 नवीन
राज ठाकरे अत्यंत बिनभरवशाचे आहेत. त्यांनी आजपर्यंत शिवसेना, भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या चारही पक्षांशी सोयीनुसार वेळोवेळी साटंलोटं केलेलं आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर ते कोणाशीही हातमिळवणी करू शकतात. त्याचबरोबरीने त्यांचा अहंकार, त्यांचा उर्मटपणा, इतरांना तुच्छ लेखण्याची वृत्ती, सतत बदलत राहिलेली भूमिका, धरसोड वृत्ती यामुळे त्यांच्या पक्षाला मते मिळणे अत्यंत अवघड आहे. त्यांच्या पक्षाने नाशिकमध्ये खरोखरच चांगले काम केले असेल तर लोकं नक्कीच मते देतील. काळजी नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 02/18/2017 - 11:23 नवीन
जे भाजप शिवसेना बोलते त्यात आणि तुमच्या मतात फार विशेष फरक दिसत नाही. जर साटंलोटं हा प्रॉब्लेम आहे तर मग तुम्ही म्हणता ते साटंलोटं काय मनसे ह्या एकाच बाजूनं ठरतं का? त्या त्या प्रत्येक वेळेस त्या समोरच्या पक्षानं मनसेशी साटंलोटं केलं असाही त्याचा अर्थ होत नाही का? धरसोड ह्या विषयावर तुमचं मत प्रकारणांसह मांडाल का म्हणजे मग मुद्देसूद बोलता येईल त्यावर! उगाच माध्यमे करतात तसा बिनबुडाचा आरोप करून काय उपयोग? शिवसेनेला मुंबईत लोकांनी मतं दिली तर मान्य करायला हवं कि त्यांनी कामं केली आहेत. बाकी अहंकार, उर्मटपणा, तुच्छ लेखण्याची वृत्ती वगैरे वैयक्तीक मतं आहेत बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गॅरी ट्रुमन Sat, 02/18/2017 - 15:58 नवीन
शिवसेनेला मुंबईत लोकांनी मतं दिली तर मान्य करायला हवं कि त्यांनी कामं केली आहेत.
म्हणजे शिवसेनेने कामे केली आहेत याचे पोस्ट फॅक्टो जस्टिफिकेशन शोधायचे तर. मागच्या शनीवारी मी याच चर्चेत प्रश्न विचारला होता की उद्धव ठाकरे आम्ही गेल्या काही वर्षात सत्तेत असताना अमुकअमुक काम केले आणि यापुढे तमुकतमुक करणार आहोत याविषयी चकार शब्द उच्चारत नाहीयेत. उद्या तर प्रचार संपून जाईल त्यामुळे यापुढे तसे काही व्हायची शक्यता बरीच कमी--- अगदी शून्यच. मग शिवसेनेचे हिरीरीने समर्थन करणारे नक्की कोणत्या कारणाने शिवसेनेचे समर्थन करत आहेत? गेल्या आठवड्याभरात शिवसेनेचे समर्थन करणार्‍या कोणीही याविषयी काहीही लिहिलेले नाही. यावरूनच मला असे म्हणायचे आहे की शिवसेना इतकी वर्षे ज्या पध्दतीने राजकारण करत आहे ते यशस्वी झाले आहे. दाखविण्यासारखे काम केले नसले तरीही मराठी माणसाचा एकमेव तारणहार म्हणून स्वतःला प्रोजेक्ट करायचे आणि काल्पनिक शत्रू उभे करून त्याच मराठी माणसाच्या भावना भडकावायच्या. मग मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार व्हावे लागेल इत्यादी इत्यादी भितीचे बागुलबोवे उभे करायचे. अशा परिस्थितीत महापालिकेचे जे काम असते--- पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन इत्यादी इत्यादी व्यवस्थित केले आहे की नाही हा प्रश्न महत्वाचा नाही असे लोकांना वाटायला लागते आणि त्याच काल्पनिक शत्रूविरोधात मते दिली जातात. शिवसेना जर ५-१० वर्षे सत्तेत असती तरी समजता येते. पण तब्बल २८ वर्षे सत्तेत राहूनही आपण काय केले याविषयी काहीही बोलायचे नाही आणि नुसती इतरांना नावे ठेवायची आणि त्या २८ वर्षात सत्ताधारी पक्षाने ज्या कारणासाठी लोकांनी निवडून दिले आहे ते काम व्यवस्थित केले आहे की नाही हा प्रश्नही न विचारता इतके समर्थन शिवसेनेला कसे मिळते हा खरा तर Electoral Psychology मध्ये चांगले संशोधन करता येण्याजोगा विषय आहे. इथे मिपावरही त्याचेच प्रतिबिंब दिसत आहे असे म्हणायला जागा आहे. खरे तर शिवसेना समर्थकांनी स्वतःहून त्यांनी नक्की काय केले हे सांगायला हवे होते. पण ते सोडाच. मागच्या आठवड्यात स्पेसिफिकली तो प्रश्न विचारूनही शिवसेनेच्या गोटात चिडीचूप शांतता आहे. शिवसेनेला मिळणार्‍या समर्थनात भावनिक सोडून दुसरे कुठचे कारण खरोखरच आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
श
श्रीगुरुजी Sat, 02/18/2017 - 16:05 नवीन
शिवसेनेला मिळणार्‍या समर्थनात भावनिक सोडून दुसरे कुठचे कारण खरोखरच आहे का?
अगदी अचूक विश्लेषण!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
वरुण मोहिते Sat, 02/18/2017 - 16:40 नवीन
वैतरणा धरणाचा असेल किंवा पाईपलाईन चा . किंवा केलेल्या कामाचा पण प्रचाराची दिशाच अशी झाली कि सेने कडून काय आणि भाजप कडून काय नीट मुद्दे पुढेच आले नाहीत . आपण सत्तेत सहभागी होतो तरीही युती तुटल्यावर भाजप ने सारा प्रचाराचा रोख बदलला . जर युती असती तर भाजप ने असा प्रचार केला असता का?? पाणीपुरवठ्याबाबत महानगरपालिका बरीच सक्षम आहे . रस्ते ३-३ संस्थांच्या अखत्यारीत आहेत .अनेक गोष्टी अश्या आहेत कि ज्याचे कारण शहरावर वाढत असलेला अतिरिक्त ताण हाच आहे . ज्या काही गोष्टी केल्या आहेत त्या जमेल तितक्या सेनेने पोचवायचा प्रयत्न केला आहे . तरी ह्या वेळी प्रचार चिखलफेकीवरच जास्त झाला . मुंबईबाबतीत म्हणाल तर भाजप ची कामाची पाटी पूर्ण कोरी आहे . काय म्हणून त्या पक्षाला मत द्यावे . नुसत्या बाता ऐकून का ? उद्याने ,महानगरपालिकेच्या शाळा ह्यांची स्थिती निश्चित बदललेली आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sat, 02/18/2017 - 16:59 नवीन
छे हो कुठचे काय. मुळात काम केलेले असले पाहिजे. मुळात आड्यात नसेल तर पोहार्‍यात आणता येणे शक्य नाही. अन्यथा अगदी या चर्चेतही ४०-५० वर्षांपूवी स्थानिय लोकाधिकार समितीने काय केले त्याचे चर्वितचर्वण व्हायची काहीच गरज नव्हती. आणि भाजपने प्रचाराचा रोख बदलला म्हणून उधोजीरावांनाही तो बदलायची काहीच गरज नव्हती. उलट भाजपवाले नुसती राळ उठवत आहेत पण आम्ही लोकांचे प्रश्न कसे सोडवले हे मुद्दे मांडत आहोत असे म्हणायची संधी उधोजींना मिळाली असती. जसे इंदिरांनी १९७१ मध्ये केले--- बाकी सब केहते है इंदिरा हटाओ और मै केहती हू गरीबी हटाओ!!
मुंबईबाबतीत म्हणाल तर भाजप ची कामाची पाटी पूर्ण कोरी आहे
कमाल आहे. मागे एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे इतक्या वर्षाचा वेटेड अ‍ॅव्हरेज म्हणून जे काही झाले त्याचे श्रेय/दोष ८०% शिवसेनेला आणि २०% भाजपला द्यायला हवा. जर शिवसेनेनी इतका विकास केला असेल तर त्याच्या १/४ श्रेय भाजपचेही झालेच. कामाची पाटी कोरी कशी काय? आणि ती पाटी कोरी असेल तर मग शिवसेनेचीही पाटी कोरीच झाली. शून्याला कशानेही गुणा शेवटी शून्यच उत्तर येते. आणि भ्रष्टाचाराचे म्हणाल तर जसा महापालिकेतील भ्रष्टाचारात भाजपचा वाटा २०% तसाच झालेल्या कामातही. या शिवसेनावाल्यांनी आपल्या डोळ्याला झापडे लाऊन घेतली आहेत त्यामुळे त्यांना एकच बाजू दिसत आहे-- आणि ती बाजू पण खरोखरच अस्तित्वात आहे की नाही याविषयीही शंकाच आहे. कारण त्याविषयी त्यांचे नेते सुध्दा काही बोलत नाहीत आणि मिपावरील समर्थकही. प्रत्येक पावसाळ्यात मुंबई एकदातरी बंद पडतेच ते का?
काय म्हणून त्या पक्षाला मत द्यावे . नुसत्या बाता ऐकून का ?
जर का दुसरे सगळे पर्याय खुजे असतील तर ज्या पक्षाकडे बॅगेज नाही त्या पक्षाला फायदा होतो-- हे अगदी दिल्लीतील केजरीवाल किंवा गेलाबाजार ट्रम्प यांच्या उदाहरणावरून समजते. शिवसेनेने गेल्या कित्येक वर्षात खरोखरच काहीही केलेले नाही म्हणून उगीच भावना भडकावायच्या--- इतक्या की आपण शिवसेनेचे समर्थन करत आहोत ते नक्की कोणत्या कारणामुळे याचे पण उत्तर कट्टरातल्या कट्टर समर्थकांनाही देता येत नाही या खेळात शिवसेनेचा हात कोणीही धरू शकणार नाही हेच खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
व
वरुण मोहिते Sat, 02/18/2017 - 17:30 नवीन
प्रचाराची दिशा वेगळी झाली हे पण बोलो . २०% वाटा भाजप चा होता म्हणजे विकास झाला असं म्हणत असाल तर ओके जी काही कामं झाली त्यातला ८०% वाटा सेनेचा होता . आता भ्रष्टचार बघायचा कि काम हे तुम्ही बघा . कारण भ्रष्टाचार असेल तर २०% भाजप ने केला असे आपण म्हणत आहात. त्यामुळे सत्तेत आल्यावर उरलेले टक्के पूर्ण होतील भाजप चे . भाजप ने रोख प्रचाराचा बदल ला म्हणून तर बोलो भाजप ला कुठल्या बेसिस वर मत द्यावं ? बाकीचे खुजे म्हणून तर विचारलं भाजप ला का मत द्यावं ? पावसाळ्यात मुंबई तुंबते कारण अतिरिक्त ताण ,१०० वर्षांपूर्वीच्या पाईपलाईन , झोपडपट्या ,अनधिकृत बांधकामे (ह्यात सर्वपक्षीय आले) अशी बरीच काही कारणं आहेत . ह्या उलट कित्येक प्रभाग आहेत जिथे पाणी तुंबत नाही . आमच्या प्रभागात आजतागायत पाणी तुंबलेले नाही. हे विचारणा म्हणजे दार पावसाळ्यात लोकल का बंद पडते असं आहे . ह्या पावसाळ्यात बघू बंद पडते का .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
N
NiluMP Sun, 02/19/2017 - 14:55 नवीन
+१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sat, 02/18/2017 - 17:26 नवीन
आपण सत्तेत सहभागी होतो तरीही युती तुटल्यावर भाजप ने सारा प्रचाराचा रोख बदलला . जर युती असती तर भाजप ने असा प्रचार केला असता का??
या एका कारणामुळे भाजपवर इतका राग असेल तर त्याच न्यायाने शिवसेना मात्र २०१४ पासून मंत्रीमंडळात सामील असूनही सतत विरोधकांप्रमाणे वागत होती ( मधूनमधून सामनामधून टोले द्यायचे, गोव्यात भाजपमधून फुटलेल्या गटाशी हातमिळवणी करायची इत्यादी इत्यादी) म्हणून भाजपसमर्थकांमध्ये शिवसेनेवर किती प्रमाणात राग असेल याची कल्पना येऊ शकेल. ज्या दिवशी शिवसेनेचा पराभव होईल तो दिवस मी स्वतः साजरा करणार आहे. तो दिवस २०१७ मध्ये येईल किंवा २०१९ मध्ये येईल किंवा त्यानंतर कधी येईल हे माहित नाही पण एकनाएक दिवस शिवसेना कशी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत आली आहे हे लोकांना समजेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
व
वरुण मोहिते Sat, 02/18/2017 - 17:43 नवीन
माझं सेम मत भाजप बद्दल आहे . धूळफेक लोकांना कळत कशी नाहीये .आता मी तर काँग्रेस समर्थक पण नाही पण तरी भाजप च्या अनेक बाता पाहून असच वाटत . उद्या भाजप जिंकली तरी काही वाटणार नाही कारण मुळात मुंबईतपण त्यांची कामच नाही आहेत .काय डोळ्यासमोर ठेऊन मत द्यावं असा प्रश्न आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 02/18/2017 - 17:27 नवीन
गॅरीजी,
पक्षाने नाशिकमध्ये खरोखरच चांगले काम केले असेल तर लोकं नक्कीच मते देतील. काळजी नसावी.
या श्रीगुर्जींच्या वाक्याच्या संदर्भाने माझे वरील वाक्य होते. निकाल शिवसेनेच्या बाजुने लागले (पुण्यात राष्ट्रवादीच्या बाजूने म्हणा) तर हाच नियम लावावा असे मला सुचवायचे होते. माझे मत तसेच आहे असे नाही.
शिवसेनेला कसे मिळते हा खरा तर Electoral Psychology मध्ये चांगले संशोधन करता येण्याजोगा विषय आहे.
याच्याशी सहमत. फक्त शिवसेनेच्या जागी वेगवेगळ्या ठिकाणी इतर पक्ष ठेवले तरी हे वाक्य खरे ठरावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sat, 02/18/2017 - 17:30 नवीन
या श्रीगुर्जींच्या वाक्याच्या संदर्भाने माझे वरील वाक्य होते. निकाल शिवसेनेच्या बाजुने लागले (पुण्यात राष्ट्रवादीच्या बाजूने म्हणा) तर हाच नियम लावावा असे मला सुचवायचे होते. माझे मत तसेच आहे असे नाही.
यात मोठा फरक हा की राज ठाकरे स्वत: नाशिकमध्ये आम्ही काय काम केले हे परतपरत सांगत आहेत. तसे उधोजीरावांनी या प्रचारादरम्यान एकदाही केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे शिवसेनेला जी मते मिळतील ती त्यांनी केलेल्या कामामुळे नाही तर भावनिक कारणांमुळे मिळतील हे म्हणायला नक्कीच जागा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 02/18/2017 - 17:48 नवीन
तेच तर म्हणतोय मी! लोकांनी मत कशावरून दिल हे ठरवणार कशावरून? सगळेच लोक भाषणांवरून मत देतात का हा प्रश्नच आहे! कदाचित भाषणांवरून देतील, कदाचित पक्षाला बघून देतील, कदाचित उमेदवाराकडे बघून देतील किंवा कदाचित त्या उमेदवाराच्या आधीच्या कामाकडे बघून देतील. डांगेंजी नाही का म्हणाले कि मनसेच्या नगरसेवकाने काम चांगले केले पण तो आता भाजपमध्ये आहे. मतदार काय करील हे सांगता येत नाही. मला नाशिकचीही शंकाच वाटते मनसेच्याबाबतीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sat, 02/18/2017 - 18:08 नवीन
एकदा लाट आली की त्या पक्षाच्या नावावर उभा राहणारा दगडही निवडून येत असतो. २०१४ मध्ये असे कित्येक दगड मोदींच्या नावावर लोकांनी मते दिल्यामुळे लोकसभेत जाऊन बसले आहेत. २०१५ मध्येही दिल्लीत असे कित्येक दगड केजरीवालांच्या नावावर निवडून गेले आहेत. जर एखादा चांगला नगरसेवक असेल, त्याने आपल्या भागात काम केले असेल म्हणून लोकांनी त्याला मते दिली तर ते नक्कीच समजू शकतो. मणीशंकर कवठे म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार मनपावर १९५७ ते १९९७ या काळातील प्रत्येक निवडणुकीत आपल्या कामांच्या आणि लोकसंग्रहाच्या नावावर निवडून गेले होते. १९५०-६० च्या दशकात मुंबईत कम्युनिस्टांची ताकद असली तरी ती १९८०-९० च्या दशकात शून्य होती तरीही ते आपल्या कामाच्या आधारावर निवडले जात. अशा नगरसेवकांची कॅटेगिरी वेगळीच. आणि असे नगरसेवक कोणत्याही पक्षाचे असेनात निवडून गेले तर ते चांगलेच आहे. प्रश्न हा की समजा शिवसेनेने स्वबळावर बहुमत मिळवले तर त्यातले अनेक नगरसेवक परत निवडून जाणारे असतील आणि सगळ्यांविषयी "त्यांचे काम चांगले होते" असे नक्कीच म्हणता येणार नाही. तेव्हा असे दगड निवडून जातात तेव्हा ते स्वतःचे काम या आधारावर नाही तर अन्य कोणत्या तरी आधारावर निवडून जात असतात. शिवसेनेच्या या निवडणुकीतील प्रचारात आणि इतर ठिकाणी पक्षांनी केलेल्या प्रचारात सगळ्यात महत्वाचा फरक म्हणजे इतर सत्ताधारी पक्ष खरोखरच काही केले असो वा नसो आपल्या कामाचा मोठा डंका पिटत असतात.मोदी प्रत्येक सभेत 'आम्ही अमुक केले, आम्ही तमुक केले' हे म्हणत असतातच. केजरीवाल तर दिल्लीत खुट्ट काही केले तरी त्याची जाहिरात केरळपासून नागालँडपर्यंतच्या पेपरांमध्ये करतात. लालूही बिहारमध्ये आपण कसा सामाजिक न्याय आणला याचे पाढे वाचत असतात. या नेत्यांनी प्रत्यक्ष खरोखरच तसे काही केले आहे की नाही हा प्रश्न पूर्ण वेगळा आहे. पण सांगायचा मुद्दा म्हणजे इतर सगळे नेते आपण काय केले याचे डंके पिटत असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत उधोजी आणि इतर शिवसेना नेते याविषयी काहीही बोलायला तयार नाहीत. यातून अनेक प्रश्न उभे राहतातः १. यांनी बोलावे असे काही काम खरोखरच केले आहे का? २. दुसरे म्हणजे आपण काहीही केले नाही तरी भावना भडकावल्या, खोटे काल्पनिक शत्रू उभे करून त्यांच्याविरूध्दचे तारणहार म्हणून स्वतःला पुढे आणले तर लोक सगळे विसरून आपल्याला मते देतात ही त्यांची पक्की खात्री असावी. यातील दुसरा मुद्दा सगळ्यात भयावह आहे. काहीही न करता भावना भडकावल्या आणि कोंबड्या झुंझवल्या की आपले काम झाले अशी प्रवृत्ती सर्वत्र बळावू नये म्हणून तरी या शिवसेनेचा पराभव होणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 02/18/2017 - 18:52 नवीन
मुंबईत काहीच केले नाही म्हणणे टोकाचे होईल. मला मुंबईतील सर्व भागांची माहिती नाही पण बऱ्याच ठिकाणी बकालपणा जाणवला. जितका विकास करता आला असता तसा केला गेला नाही. जाणूनबुजून वाढवल्या जाणाऱ्या झोपडपट्ट्यांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न पण झाला नाही. पण तरीही शिवसेनासोडून दुसरं कोणी (मनसे सत्तेत येतील असं वाटंत नाही म्हणून ते सोडून) आलं तर हे सगळं बदलेल असा फारसा आशावाद नाही. भाजपवर चेक म्हणून शिवसेना हवी असं मत वर मी मांडलंच आहे. बाकी काही लोकांना सर्वकाळ मूर्ख बनवता येते, सर्व लोकांना काहीकाळ मूर्ख बनवता येते पण सर्व लोकांना सर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही. त्यामुळे मुंबईतील जनता करते त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असेल असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sun, 02/19/2017 - 15:25 नवीन
मुंबईत काहीच केले नाही म्हणणे टोकाचे होईल.
एकीकडे इतर पक्ष स्वतः फार काही केले नसले तरी आपण खूप काही केले अशाप्रकारचे चित्र उभे करतात. तेच त्रैराशिक मांडले तर शिवसेनावाले त्यांचे काम सोडून इतर सगळ्या गोष्टींविषयी बोलत आहेत मग त्यांनी खरोखर केलेले काम किती? एका कोंबडीस तीन तास मग इथे तर अखंड म्हैस आहे. करा हिशेब :) आणि अगदी कट्टर शिवसेना समर्थकही इतकी वर्षे सत्तेत असूनही आज मतदान करायची वेळ आल्यावर 'आपल्या बाजूकडे अमुकअमुक आहे' पेक्षा 'दुसर्‍या बाजूकडे काही नाही' या मुद्द्यावर समर्थन करताना दिसत आहेत यातच सगळे काही आले. शिवसेनेने नक्की काय केले हे सांगायची जबाबदारी त्या पक्षाच्या नेत्यांची. त्यांनी केले नाही तर निदान त्या पक्षाचे समर्थन करणार्‍यांची. शिवसेनेने नक्की काय केले हे तपासून बघायला जायचे ही अपेक्षा विरोधकांकडून कोणी करत असेल तर ते कसे काय चालेल?
बाकी काही लोकांना सर्वकाळ मूर्ख बनवता येते, सर्व लोकांना काहीकाळ मूर्ख बनवता येते पण सर्व लोकांना सर्वकाळ मूर्ख बनवता येत नाही. त्यामुळे मुंबईतील जनता करते त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असेल असे मला वाटते.
हो ना. मी पण कधी मुंबईतले लोक शिवसेनेला घरी बसविणार याचीच वाट बघत आहे.
भाजपवर चेक म्हणून शिवसेना हवी असं मत वर मी मांडलंच आहे.
चेक ठेवायला मतदान करणारा जनता जनार्दन असताना चेक ठेवायला असे मध्यस्थ कशाकरता हेच मला समजत नाही. भारतीय मतदारांनी एकाहून एकेक उन्मत्त सत्ताधीश खाली खेचले आहेत. दुसरे म्हणजे भाजपवर चेक ठेवायला असे कोणी हवेच असेल तर मग काँग्रेस का नको? काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे भाजपवर देशव्यापी चेक राहू शकेल, काय म्हणता? तिसरे म्हणजे चेक ठेवायला कोणीतरी क्षयज्ञ हवा असे कोणी म्हटले तर तो मनुष्य (तुम्ही व्यक्तिशः नव्हे हे एक जनरल वाक्य लिहित आहे) असा चेक ठेवायला कोणाकोणाला पाठिंबा द्यायला जाईल या कल्पनेनेच अंगावर शहारा येतो. याच कारणामुळे दिल्लीमध्ये केजरीवालला पाठिंबा देणारे लोक होते. बरं ते थोडेच झाले की काय त्याच कारणामुळे बिहारमध्ये लालूलाही पाठिंबा देणारे लोक होते. आणि असा पाठिंबा देणारे कोणी अंगठाछाप लोक नव्हते तर मोठे अभ्यासू लोकही होते. कधीकधी वाटते की २०१९ मध्ये सगळ्या विरोधी पक्षांनी दाऊद इब्राहिमला पंतप्रधानपदाचे उमेदवार केले तर त्यालाही असे लोक भाजप नको म्हणून पाठिंबा द्यायला मागेपुढे बघायचे नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sun, 02/19/2017 - 16:39 नवीन
१. मुंबईत काय केले हे मुंबईकर नक्की सांगू शकतील. मी मुंबईत राहत असतो तर नक्की सांगितले असते. प्रमुख नेत्यांनी वाजवून सांगितले तरच विकास झाला असे म्हणणे मला पटत नाही. तिथल्या शिवसेनेच्या आजी नगरसेवक उमेदवारांनी काय प्रचार केला हे कोणी मुंबईकर सांगू शकेल का? २. मुंबईतील रस्त्यांची वाईट अवस्था आणि झोपडपट्ट्यांमुळे आलेला बकालपणा हे शिवसेनेचे सगळ्यात मोठे अपयश आहे असे मला वाटते(या दोन गोष्टी मी स्वतः डोळ्यांनी पहिल्या आहेत म्हणून याबाबतीत मत व्यक्त करू शकतोय.) ३. कोणत्या (कट्टर)समर्थकांनी काय समर्थन केले आहे हे मला माहित नसल्यामुळे त्यावर पास. ४.जर शिवसेना यावेळेला सत्तेत आली तर ती जनतेला मूर्ख बनवतेय असंच म्हणणार का? 25 वर्षाचा कालावधी मूर्ख बनवण्यासाठी जास्त नाही वाटंत का? ५. जर चेक जनता जनार्दन आहे तर मग त्यांच्या २५ वर्षांच्या निर्णयावर अविश्वास का? चेक या अर्थाने कि भाजप नाही म्हणलं तरी बऱ्यापैकी फुकट आश्वासने फेकत आहे असे दिसते. काँग्रेस राष्ट्रवादी यावर विरोधी पक्ष म्हणून फारसे परिणामकारक ठरत नाहीत हे अडीच वर्षात दिसून आले आहे. काँग्रेस का नको हे वेगळ्याने कशाला सांगावे लागेल? शिवसेना विरोधी पक्षात बसली असती तर जास्त परिणामकारक ठरली असती पण सत्तेची भूक कुणाला चुकलीय? मुंबई शिवसेनेच्या ताब्यात राहिली तर शिवसेनेचे अस्तित्व राहील आणि पर्यायाने भाजपला त्यांच्याच मुद्द्यांवर चालणारा एक "चेक"! ६. केजरीवाल चेक म्हणून चांगला पर्याय आहे असे नक्कीच वाटले होते की सुरुवातीला. पण त्यांच्या नंतरच्या चाळ्यांनी तसे वाटणे खोटे पाडले. शिवसेना आणि केजरीवाल यांची तुलना मला अजिबात पटण्यासारखी वाटत नाही. ७. शिवसेनेने आणि भाजपनेही त्यांच्या कामांचा आढावा त्यांच्या सभेतून द्यायलाच हवा होता असे मी वर म्हटलेच आहे. हा निकष लावायचा असेल तर एकमेव चांगला पक्ष मनसे उरतो. शिवसेनेच्या तशा प्रचारानंतरही ते निवडून येतात याचा अर्थ बहुतांशी लोकांना ते पटतं आणि त्याचं पर्यवसन मतांत होतं. भारतीय राजकारण हे काही अंशी का होईना इथल्या लोकांच्या राजकारणाकडे बघण्याच्या दृष्टीचे प्रतिबिंब आहे असे म्हणणे वावगे ठरेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Mon, 02/20/2017 - 05:54 नवीन
जर चेक जनता जनार्दन आहे तर मग त्यांच्या २५ वर्षांच्या निर्णयावर अविश्वास का?
प्रश्न २५ वर्षांमधील निर्णयावर नाही तर यापुढील ५ वर्षांमधील परिस्थितीवर आहे. एकूणच असे दिसते की निवडणुक महापालिकेची असली तरी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या गोष्टींमध्ये संबंधित उमेदवार/पक्ष कसे आहेत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सोडून इतर सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मतदान करायचा लोकांचा विचार चालू दिसत आहे-- कोणी म्हणत आहे मराठी बाणा, कोणी म्हणत आहे 'ते' सत्तेत आले तर मराठी माणसाला हद्दपार व्हावे लागेल, कोणी म्हणत आहे 'त्यांना' मतदान केल्यास मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार वगैरे वगैरे. पण गेली अनेक वर्षे सत्तेत असूनही शिवसेनेने महापालिकेच्या कार्यकक्षेत जी कामे येतात ती कशी हाताळली आहेत हा विचार तरी कोणाला शिवतो आहे की नाही कोणाला माहित? शिवसेनेच्या धूळफेकीच्या राजकारणाचे यापेक्षा मोठे यश कोणते असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 02/20/2017 - 12:49 नवीन
मला वाटते हे फक्त शिवसेनेचे राजकारण नाही, बाकी तरी कुठे काय दिवे लावत आहेत? मनसेने वेगळा मार्ग पकडून दाखवला, नाशिकमध्ये ते जर हरले तर मग काय म्हणायचे? जनतेला जे राजकारण हवंय तेच राजकीय पक्ष करत आहेत ना? शिवसेनेने धूळफेक केली हे त्यांच्या जिंकून येण्याचं कारण कसे काय असू शकते? त्यांची शब्दांची उधळण हि धूळफेक आहे हे सांगणारे विरोधी पक्ष असतानाही ते जिंकून येतात. आणि प्रत्येक पक्षाची वेगवेगळ्या ठिकाणी हीच कथा आहे. मला अजूनही वाटते की शिवसेनेच्या नेत्यांच्या भाषणावर थोडेफार सीट्स फिरू शकतील पण लोक उमेदवार निवडून देताना पक्ष सोडून इतरही निकष नक्कीच लावत असतील मुंबईत असे वाटते. अजूनही मुंबईतील लोकांच्या माहितीच्या प्रतीक्षेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
श
श्रीगुरुजी Sat, 02/18/2017 - 16:03 नवीन
धरसोड - - २०१४ मध्ये गुजरातला भेट देऊन मोदींची तोंड फाटेस्तोवर स्तुती. काही महिन्यातच मोदींना नावे ठेवणे सुरू. - २००६ मध्ये मनसेची स्थापना करताना आपला पक्ष सर्व महाराष्ट्रासाठी असल्याचा दावा. कालांतराने २००७ मध्ये मराठी मुद्दा उचलून परप्रांतियांविरूद्ध आंदोलन, अमिताभवर टीका, परीक्षेसाठी आलेल्या परप्रांतियांना मारहाण, मुंबईत हातगाडीवर फळे विकणार्‍या प्ररप्रांतीय हातगाडीवाल्यांना मारहाण करून त्यांची हातगाडी उलथून टाकून फळे फेकण्याचे प्रकार - नंतर टोलचा मुद्दा उचलून काही काळातच सोडून दिला. - प्रत्येक सभेत भाजप, काँग्रेस, राष्टवादी व शिवसेनेवर टीका. प्रत्यक्षात २००७ मध्ये मुंबई, ठाणे इ. महापालिकात कहापौरपदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान, २०११ मध्ये स्वतःहून कल्याण-डोंबिवली व ठाण्यात शिवसेनेला मतदान, २०१२ मध्ये नाशिकमध्ये भाजपची मदत घेतली, २०१४ पासून नाशिकमध्ये महापौरपदासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला व त्या बदल्यात नगर व पुणे महापालिकेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा. १५ दिवसांपूर्वी मातोश्रीवर युतीसाठी ७ वेळा फोन केला व नंतर बाळा नांदगावकरांना युतीसाठी बोलणी करण्यासाठी पाठविले. प्रत्येक सभेत या चारही पक्षांवर टीका, पण प्रत्येक पक्षाची वेळोवेळी मदत घेऊन त्यांना मदत केली. राज ठाकरे हे या पक्षांचे विरोधक आहेत का समर्थक याविषयी पूर्ण संभ्रम. त्यामुळे आताच्या निवडणुकीनंतर सुद्धा ते नक्की कोणाबरोबर जातील हे सांगता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 02/18/2017 - 18:34 नवीन
२०१४ मध्ये गुजरातला भेट देऊन मोदींची तोंड फाटेस्तोवर स्तुती. काही महिन्यातच मोदींना नावे ठेवणे सुरू.
हे छान आहे की! चांगलं वाटलं चांगलं म्हणाले, नाही वाटलं टीका केली, याला धरसोड म्हणायचं? म्हणजे मोदींच्या अडीच वर्षांच्या सरकारवर टीका करणारे लोकही धरसोड करतात? मोदींची एकदा स्तुती केली की कायमच स्तुती करायला हवी असा काही नियम आहे का?
- २००६ मध्ये मनसेची स्थापना करताना आपला पक्ष सर्व महाराष्ट्रासाठी असल्याचा दावा......
काहींच्या काही! यात धरसोड काय?
- नंतर टोलचा मुद्दा उचलून काही काळातच सोडून दिला.
हो का? म्हणजे, हा टोलचा झोल आणणारे, याविरुद्ध आंदोलन न करणारे चांगले आणि त्यांच्या परीने आंदोलन करून काही प्रमाणात का होईना टोलविरोधी वातावरण करणारे वाईट (ज्याची फलश्रुती काही टोलनाके बंद होण्यात झाली)! काहीतरी चुकतंय असं नाही वाटंत?
प्रत्येक सभेत भाजप, काँग्रेस, राष्टवादी व शिवसेनेवर टीका. प्रत्यक्षात २००७ मध्ये मुंबई, ठाणे इ....
हा विरोधाला विरोध आहे. एकूण एक पक्ष असलं राजकारण करतात. याला धरसोड म्हणतात? राज्यात सत्तेत एकत्र बसून एकमेकांचे कपडे फाडणारेपण धारसोडच करत आहेत की मग? निवडणुकीनंतर मनसे कोणाबरोबरही जाऊ देत तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. याला धरसोड कसं काय म्हणणार? भाजप सांगतंय का कि एवढे कपडेफाड केल्यानंतर काहीही झालं तरी शिवसेनेला पाठिंबा देणार नाही? शिवाय सत्तेतून त्यांनी बाहेर पडायची गरज काय, तुम्हीही घरोबा तोडूच शकता की! तर म्हणणे एवढेच आहे की माध्यमांनी आणि इतर पक्षांनी केलेल्या अप्रचाराचा मनसे हा बळी आहे. अर्थात यामध्ये मनसेचीही चूक आहेच की त्यांनी त्या त्या वेळी त्या गोष्टींना सडेतोड उत्तर देण्यापेक्षा दुर्लक्ष करण्याचा मार्ग करण्याचा मार्ग पत्करला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा