Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक वर्षानंतर . . .

श
श्रीगुरुजी
Mon, 05/25/2015 - 09:01
🗣 1265 प्रतिसाद
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते. परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला. मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली. एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्‍या शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे. मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे. जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे. महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे. आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
संरक्षण व परराष्ट्र धोरण
आपल्या शपथविधीला मोदींनी सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना बोलावून एक नवीन पायंडा पाडला. सार्क समूहातील भारत हा सर्वात मोठा देश. सार्क हे एक कुटुंब मानले तर भारताचे स्थान सर्वात मोठ्या भावाचे. एखाद्या देशमुखाच्या घरातील लग्नाला पंचक्रोशीतील सर्व गावाच्या पाटलांनी उपस्थित रहावे व देशमुखांचे स्थान मान्य करावे अशा स्वरूपाचा हा पायंडा होता. त्यानंतर लगेचच मोदींनी भूतानला व श्रीलंकेला भेट देऊन शेजारी राष्ट्रांशी संबंध वाढविण्यावर भर दिला. मोदींच्या प्रयत्नामुळे श्रीलंकेत फाशीची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील ५ कोळ्यांना श्रीलंकेने मुक्त करून भारतात परत पाठवून दिले. काही वर्षांपूर्वी मोदींनी चीनला भेट देऊन तस्करीच्या आरोपावरून तेथील तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या २१ पैकी ११ गुजराती व्यापार्‍यांना सोडवून आणण्याची यशस्वी शिष्टाई केली होती. मागील महिन्यात नेपाळमध्ये जबरदस्त भूकंप झाला. भारत सरकारने अत्यंत तातडीने नेपाळला मदत पाठवून दिलासा दिला. काही महिन्यांपूर्वी मालदीवमध्ये अचानक पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना भारत सरकारने तातडीने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. येमेन व इराकमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीय अडकून पडले होते. भारताने ही परिस्थिती युद्धजन्य पातळीवर हाताळून बहुसंख्य भारतीयांना सुखरूप परत आणले. एवढेच नव्हे तर येमेन मध्ये अडकलेल्या ४१ देशांच्या ९०० हून अधिक नागरिकांना भारताने सुखरूप बाहेर काढले. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या फादर प्रेम यांना सरकारने सुखरूप भारतात परत येण्यास मदत केली. गतवर्षी सप्टेंबरमध्ये काश्मिरमध्ये भयानक पूर आलेला असताना केंद्र सरकारने तातडीने लष्कराच्या मदतीने नागरिकांना मदत केली होती. मोदी सरकारचे वैशिष्ट्य हे आहे की हे सरकार सर्वत्र व्हिजिबल आहे. पूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारचे कोठेही अस्तित्व जाणवत नव्हते. मात्र या सरकारचे सर्व क्षेत्रात ठळक व सकारात्मक अस्तित्व दिसत आहे. गेल्या वर्षात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगला इ. देशातील ४ हजारहून अधिक हिंदू नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. यापूर्वीच्या वर्षात हाच आकडा १ हजारहून कमी होता. या देशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. भारत हा त्यांचा एकमेव आधार आहे. पूर्वीच्या सरकारने त्यांच्या बाबतीत आस्ते कदम धोरण ठेवले होते. या सरकारने मात्र त्यांना दिलासा दिला आहे. मोदी फ्रान्स दौर्‍यावर गेले असताना त्यांनी फ्रान्सबरोबर राफेल या आधुनिक लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार केला. गेली अनेक वर्षे हा करार प्रलंबित होता. जुलै-ऑगस्ट २०१४ मध्ये सीमेवरील पाकिस्तानी सैन्याने नेहमीप्रमाणे अचानक गोळीबार सुरू केला. त्यात सीमाभागातील काही नागरिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान काही महिन्यांच्या अंतराने नियमितपणे असा गोळीबार करून नागरिकांचे प्राण घेत असते. या गोळीबाराविरूद्ध भारताची प्रतिक्रिया म्हणजे निषेधाचा खलिता पाठविणे. यावेळी प्रथमच भारतीय लष्कराला प्रतिगोळीबार करण्याची मुभा मिळाली. पाकिस्तानने गोळीबार सुरू केल्यावर प्रथमच भारतीय सैन्याने उलट गोळीबार करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले ज्यात काही पाकिस्तानी सैनिक व नागरिक मरण पावले. भारताच्या जोरदार प्रतिकारामुळे आश्चर्यचकीत झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गोळीबार थांबविला. त्यानंतर आजतगायत पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार होण्याचे प्रकार घडलेले नाहीत. ऑगस्टमध्ये भारत-पाकिस्तानची सचिव पातळीवर चर्चा होणार होती. परंतु चर्चेच्या काही दिवस आधी पाकिस्तानी राजदूताने हुरियतच्या फुटिरतावादी नेत्यांची भेट घेतल्याने भारताने तातडीने चर्चा रद्द करून एकाच वेळी भारताशी व फुटीरतावाद्यांशी चर्चा होऊ शकत नाही असा पाकिस्तानला जोरदार इशारा दिला. मोदींनी नुकतीच चीनला भेट दिली. ही भेट चीनच्या भूमीवरून चीनला स्पष्ट शब्दात इशारा दिल्यामुळे गाजली. इंडिया-टुडे या साप्ताहिकाने या इशार्‍याबद्दल असे म्हटले आहे. "In Modi, India has a PM who can look China in the eye". याच लेखात पुढील वाक्ये आहेत. Prime Minister Narendra Modi's recent visit to China will be remembered for will be his plain-speaking. And it is by no means a small achievement. For years, Indian political leaders have gone to China and said what the Chinese wanted to hear. Modi changed all that when he openly "stressed the need for China to reconsider its approach on some of the issues that hold us back from realising full potential of our partnership" and suggested that "China should take a strategic and long-term view of our relations". In his speech at the Tsinghua University too, Modi went beyond the rhetorical flourishes of Sino-Indian cooperation and pointed out the need to resolve the border dispute and in the interim, clarify the Line of Actual Control to "ensure that our relationships with other countries do not become a source of concern for each other". This is a significant shift in India's traditional defensiveness vis-a-vis China and should put the relationship on a firmer footing. चिनार यांचा ह्या सविस्तर प्रतिसादात भारताच्या परराष्ट्र धोरणांचे ठळक मुद्दे आलेले आहेत. २ वर्षांपूर्वी केदारनाथ येथील प्रलयात शेकडो भाविक मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन राज्य सरकार ती परिस्थिती नीट हाताळू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षात भारताने भारतात व विदेशात अशी परिस्थिती अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. २००८ मध्ये अमेरिकेबरोबर अणुकरार झाल्यानंतर पुढे फारसे काही झाले नव्हते. मोदींनी आपल्या पहिल्या वर्षात ऑस्ट्रेलिया व कॅनडाला भेट देऊन युरेनियम पुरवठ्याबद्दल यशस्वी बोलणी केली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेवर अजित डोवाल या अत्यंत कार्यक्षम अधिकार्‍याला आणण्यात आले आहे. "संरक्षण व परराष्ट्र धोरण" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ८ गुण.
भ्रष्टाचार निर्मूलन
गेल्या १ वर्षात एकही मोठा घोटाळा झालेला नाही हे या सरकारचे मोठे यश आहे. युपीएची १० वर्षांची कारकीर्द म्हणजे उच्चपदस्थांचा प्रचंड भ्रष्टाचार होता. युपीएतील अनेक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले होते व त्यातून देशाचे प्रचंड नुकसान झाले. मनमोहन सिंग मूक राहून अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहनच देत होते. मोदींच्या कारकीर्दीत याला लगाम बसलेला दिसत आहे. 'मी भ्रष्टाचार करणार नाही व कोणाला करून देणार नाही' हे त्यांचे वचन पहिल्या वर्षात तरी सत्य झालेले दिसत आहे. मात्र भ्रष्टाचार्‍यांवरील कायदेशीर कारवाई मात्र पुरेशा वेगाने सुरू नाही. वड्राला खिरापतीसारख्या वाटलेल्या हरयाना व राजस्थानमधील जमिनी काढून घेण्यात आल्या. हरयानाने नुकतीच या जमीन व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. परंतु हे आधीच व्हायला हवे होते. महाराष्ट्रात छगन व समीर भुजबळांची चौकशी सुरू झाली आहे. आता तटकरे व अजित पवारांना समन्स गेले आहे. परंतु ही कारवाई अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे. कोळसा घोटाळ्यातील जिंदाल व इतर काही नेत्यांवर व अधिकार्‍यांवर खटला दाखल झालेला आहे. मनमोहन सिंगांना देखील समन्स पाठविण्यात आले. "आपण न्यायालयात जाऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करू" असे माध्यमांसमोर सांगणार्‍या सिंगांनी प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयात जाऊन समन्सला स्थगिती मिळवून चौकशी दूर पळण्याचाच प्रयत्न केला आहे. देशाबाहेरील काळा पैसा भारतात आणण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. काळ्या पैशाला प्रतिबंध करण्यासाठी एक नवीन कायदा करण्यात आला आहे. "भ्रष्टाचार निर्मूलन" या विषयात मोदी सरकारला १० पैकी ७ गुण.
राजकीय
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची घोडदौड सुरूच राहिली. हरयाना व झारखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात शिवसेनेचे ओढणे उतरवून स्वबळावर बहुमताच्या जवळ पक्ष पोहोचला. जम्मू-काश्मिरमध्ये प्रथमच भाजपने तब्बल २५ जागा मिळवून दुसरा क्रमांक मिळविला. दिल्लीत मात्र पक्षाचा दारूण पराभव झाला. आता लवकरच बिहार विधानसभेची निवडणुक आहे. त्यापाठोपाठ मे २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडीचेरी, प. बंगाल व आसामची निवडणुक आहे. या राज्यात भाजपची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत नक्कीच सुधारली असेल. महाराष्ट्रात भाजपने अत्यंत चातुर्याने शिवसेनेला आपली जागा दाखवून देऊन युतीतला मोठा भाऊ कोण हे दाखवून दिले. महाराष्ट्रात ब्राह्मण, हरयानात जाट नसलेला व झारखंड मध्ये आदिवासी नसलेला मुख्यमंत्री देऊन जातीवर राजकारण होणार्‍या या राज्यात एक वेगळा पायंडा पाडला. जम्मू-काश्मिरमध्ये पीडीपी या पूर्ण वेगळी विचारसरणी असलेल्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करून भाजपने एक वेगळाच प्रयोग केलेला आहे. यात भाजपकडे उपमुख्यमंत्रीपद, काही मंत्रीपदे व सभापतीपद आले आहे. पूर्वीच्या नॅकॉ-काँग्रेस सरकारने फुटिरतवादी मसर्रत आलमची स्थानबद्धता न वाढवता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. त्यामुळे तो सुटला. सुटल्यावर लगेचच त्याने भारतविरोधी कारवाया सुरू केल्यावर त्याच्यावर लगेचच कारवाई करण्यास पीडीपीची तयारी नव्हती. परंतु केंद्राच्या दबावानंतर त्याला पुन्हा स्थानबद्द करण्यात आले. हा एक नवीन प्रयोग आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी/अयशस्वी होईल ते काही काळानंतर कळेलच. परंतु पीडीपी सारख्या फुटिरतावादी पक्षावर केंद्राच्या व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून दबाव ठेवण्यास या प्रयोगाचा उपयोग होऊ शकेल असं आतातरी वाटतंय. दिल्लीत मात्र भाजपचा सुपडा साफ झाला. अत्यंत अवास्तव व अव्यावहारीक आश्वासने देऊन 'आआप'ने सत्ता मिळविली. प्रचंड बहुमत पाठीशी असूनसुद्धा केजरीवालांचा नाटकीपणा, पोरकटपणा, हेकेखोरपणा, हुकूमशाही वृत्ती अजिबात कमी झालेला नाही. त्यांचे विदूषकी चाळे अजूनही सुरुच आहेत. त्यांच्या नाटकापायी एका शेतकर्‍याचा फास लागून जीव गेला. केंद्राबरोबर ते कायम संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. एकंदरीत त्यांच्या मर्कटलीलांमुळे दिल्लीची जनता भरडली जाईल हे निश्चित. सप्टेंबर-ऑक्टोबर २०१५ मध्ये बिहार विधानसभेची निवडणुक होणार आहे. सध्या जनता दलाच्या अनेक तुकड्यांच्या विलिनीकरणाची चर्चा आहे. मागील वर्षी बिहारमध्ये झालेल्या १० विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजद, संजद व काँग्रेस ने युती करून १० पैकी ६ जागा जिंकल्या होत्या. परंतु प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीसाठी अशी युती प्रत्यक्षात येणे अवघड आहे. राजद व संजद या दोन्ही पक्षांना मुख्यमंत्रीपद हवे असल्याने दोन्ही पक्ष २४३ पैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करेल व त्या भांडणातून अशी युती प्रत्यक्षात येणार नाही. राजद व संजद वेगवेगळेच स्वतंत्र लढतील. या दोघांपै़की कोणाबरोबर शय्यासोबत करायची हा काँग्रेसपुढे यक्षप्रश्न असेल. लालू हा सोनिया गांधींचा नीलाक्षतनय असल्याने शेवटी काँग्रेस राजदचाच मळ्वट भांगात भरेल असा अंदाज आहे. भाजप चातुर्याने जीतनराम मांझीला आपल्या आघाडीत सामील करून घेईल. शेवटी राजद्+काँग्रेस, संजद, भाजप+लोकजनशक्ती+मांझी+उपेंद्र कुशवाह असे तीन गट वेगवेगळे लढतील. डावे पक्ष बहुतेक राजदबरोबर जातील. अशा स्वतंत्र लढतील भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन च्या सर्वेक्षणानुसार राजद्+काँग्रेस्+संजद युती झाल्यास या युतीला १२६ व भाजप आघाडीला ११२ जागा मिळतील. परंतु राजद, काँग्रेस, संजद व भाजप आघाडी स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आघाडीला १२६, संजद ६४, राजद ४२ व काँग्रेस २ अशी स्थिती असेल. दिल्ली असो, उ.प्र. असो वा बिहार, काँग्रेसचे अस्तित्व संपलेले आहे. दिल्लीत भाजपला पराभूत करण्यासाठी गुपचुप आआपला मदत करणे, बिहार मध्ये राजद किंवा संजदची सेज सजविणे, उ.प्र. मध्ये मुलायम किंवा मायावतीच्या पदराखाली लपणे एवढेच काँग्रेस करू शकते. नुकत्याच झालेल्या एबीपी-नेल्सन सर्वेक्षणानुसार एक वर्षानंतर मोदींची जादू बरीचशी कायम आहे. आता निवडणुक झाल्यास एनडीए ३१७ (पूर्वी ३३६), युपीए ७३ (पूर्वी ६०) अशी परिस्थिती आहे. इतर काही वाहिन्यांनी (आयबीएन, आजतक इ.) देखील सर्वेक्षण केले. त्यांनी जागांचा अंदाज दिलेला नाही. परंतु मोदींच्या कामावर व सरकारवर बहुसंख्य जनता समाधानी असल्याचे दिसते. मे २०१६ मध्ये प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पाँडिचेरीच्या विधानसभा निवडणुका आहेत. बंगालमध्ये पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने ममता बॅनर्जी निवडून येण्याची शक्यता आहे. शारदा चिट फंड घोटाळ्याचा बंगाली जनतेवर काहीही परीणाम झालेला दिसत नाही. दुसर्‍या क्रमांकावर काँग्रेस असेल. तामिळनाडूत आता द्रमुकची पाळी आहे. केरळमध्ये डावे पक्ष निवडून येतील. आसाममध्ये अधांतरी विधानसभा असण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यात पूर्वीच्या तुलनेत भाजपची कामगिरी सुधारलेली असेल. परंतु बहुमत मिळविण्यासाठी किंवा प्रमुख विरोधी पक्ष होण्यासाठी भाजपला अजून बराच काळ लागेल. एकंदरीत गेल्या वर्षभरात भाजपने राजकीय क्षेत्रात खूपच प्रगती केली आहे. राजकीय आघाडीवर भाजप सरकारला १० पैकी ८ गुण.
सामाजिक
गेल्या वर्षभरात एकही मोठी जातीय दंगल झाली नाही. यापूर्वी २०१३ मध्ये मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या जातीय दंगलीत ६० हून अधिक नागरिक मरण पावले होते. काही ठिकाणी चर्चवर ह्ल्ले झाले. काही हल्ल्यांमागे जातीय नसून पूर्ण वेगळी कारणे होती. मोदी मंत्रीमंडळातील गिरीराज सिंह, साक्षी महाराज इ. गणंगांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. वाहिन्यांनी टीआरपी वाढविण्यासाठी त्या वक्तव्यांना प्रचंड प्रसिद्धी देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. परंतु नुकत्याच झालेल्या वेगवेगळ्या वाहिन्यांच्या सर्वेक्षणानुसार अशा वक्तव्यांकडे बहुसंख्य नागरिकांनी दुर्लक्ष केलेले आहे. मोदींनी मात्र या वाचाळ मंत्र्यांच्या वक्तव्यावर सार्वजनिकरित्या मौन पाळले आहे. त्यांनी तातडीने पावले उचलून अशा मंत्र्यांना घरी बसविले पाहिजे. एकंदरीत सामाजिक जीवनात शांतता आहे. "सामाजिक" क्षेत्रासाठी या सरकारला १० पैकी ६ गुण.
विरोधी पक्षांची कामगिरी
संपूर्ण वर्षात विरोधी पक्षांची कामगिरी निराशाजनक राहिली. वर्षाच्या शेवटी भूमी अधिग्रहण कायद्याच्या निमित्ताने काही विरोधी पक्ष एकत्र येताना दिसले. परंतु काही विरोधी पक्ष अजूनही काँग्रेसपासून अंतर ठेवून आहेत. काँग्रेस अजूनही गांधी घराण्याच्या पदराखालून बाहेर येण्यास तयार नाही. राहुल गांधी अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या काळात तब्बल २ महिने परदेशात वास्तव्य करून आले. आपल्या परदेश दौर्‍यासाठी जाब विचारला जाईल हे ओळखून परदेशातील सूटबूट सोडून झब्बापायजमा परीधान करून आल्याआल्या दुसर्‍या दिवसापासून घसा ताणून मोदींवर टीका करणे सुरू केले आहे. त्याच्याबरोबरीने शेतकर्‍यांच्या घरी जाऊन भेटण्याचे पूर्वीचे नाटकही सुरू केले आहे. ते परदेशात विपश्यना करत होते म्हणे. परदेशात जाऊन २ महिन्यात ते ३ नवीन शब्द शिकले - किसान, मजदूर, गरीब. आता त्यांच्या प्रत्येक दुसर्‍या वाक्यात हे ३ शब्द असतात. पूर्वी कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात ते महिला सबलीकरण, नरेगा असे शब्द उच्चारायचे. आता विषय कोणताही असला तरी किसान, मजदूर आणि गरीब हे ३ शब्द असल्याशिवाय त्यांचे वाक्य पूर्ण होत नाही. लोकसभेत संपूर्ण निष्प्रभ ठरल्यावर राज्यसभेतल्या बहुमताच्या जोरावर काँग्रेसने महत्त्वाची विधेयके अडवून धरली आहेत. परंतु काही महिन्यातच भाजप काँग्रेसला मॅनेज करून ही विधेयके पास करून घेईल हे निश्चित. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना पार पाडत आहे. मनसेचा अवतार समाप्त झाला आहे. काही वर्षांतच राष्ट्रवादी आणि शिवसेनाही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. डाव्या पक्षांची सद्दी जवळपास संपुष्टात आली आहे. प्रकाश करातांच्या जागी येचुरी येऊनसुद्धा काहीही फरक पडणार नाही. जनता दलाचे छोटे छोटे तुकडे अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असल्याने विलिनीकरण करून धुगधुगी टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आआपची नाटके व तमाशे सुरूच आहेत. एकंदरीत विरोधी पक्षांची अवस्था दयनीय आहे. विरोधी पक्षांच्या कामगिरीला १० पैकी २ गुण. _________________________________________________________________________________ मोदी सरकारची पावलें योग्य दिशेने पडतांना दिसत आहेत. पुरेसा वेग आलेला नाही कारण लोकांना शिस्तबद्ध रीत्या कामे भराभर उरकीत जाणे हेच ठाऊक नाही. तें अंगवळणी पडण्यास बराच वेळ लागेल. कृतीपेक्षा बडबड अधिक हे ही काही मंत्र्यांच्या/ खासदारांच्या बाबतीत आढळत आहे.त्याला वेसण घालणे आवश्यक आहे. मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक, विकासाभिमुख आणि प्रामाणिक अशा शब्दात वर्णन करता येईल. गत सरकारच्या नाठाळ कामगिरीच्या पार्श्वभूमीवर या सरकारची कार्यक्षमता अधिकच खुलून दिसते. _________________________________________________________________________________ एक वर्षाच्या कामगिरीसाठी मोदी सरकारला ७/१० गुण. _________________________________________________________________________________
अच्छे दिन
माझी "अच्छे दिन" ची व्याख्या अशी आहे. भ्रष्टाचारमुक्त सरकार, कणखर सरकार, नवीन कल्पना घेऊन आलेले सरकार, इतरधर्मियांचे मतांसाठी लांगूलचालन न करणारे सरकार, पाकिस्तान व चीनसमोर नांगी न टाकता ताठ मानेने उभे राहिलेले सरकार, देशाला आर्थिक उन्नतीच्या मार्गावर न्यायला सुरूवात करणारे सरकार, नागरिकांच्या हिताची काळजी घेणारे सरकार ... असे सरकार सत्तेवर असेल तर अच्छे दिन येण्याची सुरूवात आहे असे मानता येईल. यापूर्वीचे सरकार हे कणाहीन व अकार्यक्षम सरकार होते. ते भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले होते. माझ्या मते मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अच्छे दिन येण्याची सुरूवात झाली आहे हे नक्की! _________________________________________________________________________________
तळटीप
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर जवळपास ८ आठवडे मी मिपापासून दूर होतो (राहुल गांधीही एवढाच काळ भारतापासून दूर होते!!!). परत आल्यानंतर हा लेख लिहिला आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, परंतु विस्तारभयास्तव लेख आटोपता घेतो. वाचकांनी प्रतिसाद दिले तर त्यातील योग्य त्या मुद्द्यांवर प्रतिसाद देईन. जर प्रतिसाद विषयाला धरून असेल, जर प्रतिसाद सभ्य असेल, जर प्रतिसाद योग्य त्या आकडेवारी व वस्तुस्थितीवर आधारीत असेल, तरच उत्तर देईन. जर प्रतिसाद व्यक्तिगत स्वरूपाचा असेल, जर प्रतिसाद उपहासात्मक व कुत्सित टोमणे अशा प्रकारचा असेल, जर प्रतिसाद द्वेषमूलक व पक्षपाती स्वरूपाचा असेल अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष केले जाईल. Now shoot _________________________________________________________________________________

प्रतिक्रिया द्या
309978 वाचन

💬 प्रतिसाद (1265)
न
नाव आडनाव Tue, 11/24/2015 - 12:07 नवीन
सोने : बघावे, घ्यावे की ----- ह्या धाग्यासारखा तूरडाळ : बघावी, घावी की ----- असा धागा नाही आला अजून :) परवाच आज पर्यंतची सगळ्यात महाग तूरडाळ विकत घेतली - १९२ रूपये ५० पैसे / किलो.
स
संदीप डांगे Tue, 11/24/2015 - 12:18 नवीन
बापूसाहेब, होता होत असेल तर तांदूळाचा साठा करून ठेवा. लिस्टपर अभी नेक्स्ट भात आहे. बाकी, एकाच मालकाच्या चिकटून असलेल्या दोन (होलसेल व रीटेल) दुकानामधे एकाच वेळी तूरडाळीचा भाव असा होता: दिनांकः ४ नोव्हेंबर २०१५. होलसेल: १७० रुपये, रीटेलः २०० रुपये. होलसेलमधून पाच किलो डाळ घेतल्यावर दुसरे सामान घ्यायला रीटेलमधे गेलो असता हे समजले. ;-)
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 11/24/2015 - 12:43 नवीन
डांगे साहेब, कायले राष्ट्रनिर्मिती ले नाट लावता बावा!! आम्ही भाकर खाऊ हाओ! भात फ़क्त मरन नाहीतर तोरन रायते घरी! जवारी जदलोग महंगी करत नात तदलोग आमचे भागते भाऊ!
स
संदीप डांगे Tue, 11/24/2015 - 12:50 नवीन
असं काई बोल्ता का राजेहो, तुमाले उपाशी मारल्याबिगर रास्ठ्रनिर्मिती कशी व्हइन, सांगा ना बाप्पा... जवारी खाता का धांडे खाऊन भागोता थे कायबी सरकारले समजू नका देऊ. चीमायभिन, तेभी गायप व्हइन बजारातून..
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 11/24/2015 - 13:20 नवीन
घाबरवजा नोका हो! मायभईन धांडे !! :D :D
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
च
चिनार Fri, 12/11/2015 - 05:45 नवीन
कायले भेव वाटून घेता बे दोघेजन..काल राताच्याले राष्ट्रपुर्शाचा सत्कार झालता ना दिल्लीत...तिथ बी तूर दाळ नव्हती म्हने जेवनात..निस्ता भाकरी नं ठेचा हानला म्हने साऱ्याइने..साऱ्याइची असहिष्णुता वाढली असंनं आता सकाळी.. आता कराच लागते त्यैले तुरडाळ स्वस्त..
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
मोगा Tue, 11/24/2015 - 12:59 नवीन
http://m.maharashtratimes.com/nation/communal-clashes-killed-fewer-people-this-year-than-in-2014-claims-mha-report/articleshow/49904532.cms गुर्जी आलेख काढा
म
मोगा गुरुवार, 11/26/2015 - 18:09 नवीन
http://m.indiatimes.com/news/india/prime-minister-narendra-modi-caught-sleeping-during-parliament-session-pmjetlag-becomes-a-national-issue-247767.html
म
मोगा गुरुवार, 12/10/2015 - 11:30 नवीन
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे नभांत भरला, दिशांत फिरला, जगात उरला मोद विहरतो चोहीकडे
स
सुबोध खरे Fri, 12/11/2015 - 05:00 नवीन
हितेसभाई श्री मोदींबद्दल इतका द्वेष कि तुम्ही तो धागा परत परत वर आणता आहात?
↩ प्रतिसाद: मोगा
म
मोगा Fri, 12/11/2015 - 06:40 नवीन
आम्ही द्वेषात लिहितो तर तुम्हीही जोशात लिहा.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ट
ट्रेड मार्क Fri, 12/11/2015 - 14:11 नवीन
तर उगाच काहीतरी लिहून… जरा लॉजिकल काहीतरी लिहिलं असतं तर चर्चा तरी झाली असती. खरच राउल गंदी पंतप्रधान व्ह्यायला पाहिजे होता! द्विपक्षीय भेटींमध्ये आणि इतर समिट्स मध्ये कसली मजा आली असती. संसदेतील भाषणे ऐतिहासिक झाली असती. कॉमेडी शोजचा धंदा बसला असता :)
↩ प्रतिसाद: मोगा
म
मोगा Sat, 12/12/2015 - 05:49 नवीन
मग आम्ही मोदींचा द्वेष का करायचा ? सलमाननेमोदीबरोबर पतंग उडवला होता. आज सलमान निर्दोष आहे. भगवी सोशल मेडिया भुतावळही गप्प आहे. ...... जर सलमान काँग्रेसच्या काळात सुटला असता तर त्याच्याव काँग्रेसच्या व त्याच्या धर्माच्या उद्धारावर शेकडो धागे इथेच निघाले असते. ....
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Sat, 12/12/2015 - 06:47 नवीन
काहीही हा मो
↩ प्रतिसाद: मोगा
इ
इरसाल Mon, 12/14/2015 - 10:15 नवीन
जामोप्याच्या हातात कोलीत, सुटला तर मोदींबरोबर पतंग उडवला शिक्षातर तो म्हणे मुसल्मान म्हणुन, नाही का ? (होबासराव या जरा इथे तुमची गरज आहे.....पेटंट वाक्यासाठी ;) )
↩ प्रतिसाद: मोगा
अ
अभिजित - १ Sun, 12/13/2015 - 11:25 नवीन
केंद्र सरकारने गॅस सिलिंडर अनुदान योजना बंद करण्याची तयारी सुरू केली आहे. आगामी अर्थसंकल्पात आयकर भरणाऱ्यांना हा सवलतीचा लाभ मिळणार नाही. याकरिता सिलिंडरसाठी आधारऐवजी पॅनकार्ड आवश्‍यक करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सिलिंडरच्या सबसिडीचा "आधार' काढणार? - सकाळ
S
sagarpdy Mon, 12/28/2015 - 15:08 नवीन
अनुदान केवळ अशाच कुटुंबाना मिळणार नाही ज्यांचे उत्पन्न १० लाखापेक्षा अधिक आहे. आणि माझ्या मते या अनुदानाची त्यांना गरजही नाही. http://timesofindia.indiatimes.com/india/No-LPG-subsidy-for-consumers-with-taxable-income-of-more-than-Rs-10-lakh/articleshow/50354795.cms
↩ प्रतिसाद: अभिजित - १
स
संदीप डांगे Sat, 12/26/2015 - 17:33 नवीन
आज गुरुजींची खूप आठवण येते आहे. मोदी पाकिस्तानात आहेत तर इकडे थोडे मनोरंजन झाले असते. गुरुजी जल्दी वापीस आवो..
म
मोगा Sun, 12/27/2015 - 06:20 नवीन
काँग्रेसनंही नमो-नवाझ याची ही भेट भेट पूर्वनियोजित असल्याचा दावा केला होता. पंतप्रधान मोदी हे राष्ट्रीय हीत जपण्यासाठी वा दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या उद्देशाने पाकिस्तानला गेले नाहीत, तर आपल्या व्यक्तिगत उद्योगातील व्यक्तीगत हितसंबंधांना वाढवण्यासाठीच त्यांनी ही भेट घेतल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे नेता आनंद शर्मा यांनी केली होती. एका उद्योगपतीने या भेटीची आधीच व्यवस्था केली होती असा दावाही काँग्रेसने केला आहे. हा पाक दौरा अनपेक्षित होता हा परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांचा दावा फोल असून हा दौरा निश्चितच पूर्वनियोजित होता याबाबत आमच्याकडे ठोस माहिती आहे असेही शर्मा म्हणाले
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ट
ट्रेड मार्क Mon, 12/28/2015 - 22:30 नवीन
जर का शर्मांकडे ठोस माहिती आहे तर जाहीर करावी, "क्यो शर्मा रहे है?". कुठल्या उद्योगपतीने भेट ठरवली होती आणि ती एवढी गुप्त कशी काय राहिली? त्यात त्या उद्योगपतीचा काय फायदा झाला हे सगळे जाहीर करावं. म्हणजे कोणाकोणाचे राजीनामे मागायचे ते पण ठरवता येईल. पण एकूणच चांगलाच पोटशूळ उठलाय सगळ्या कोन्ग्रेसिंना आणि अतिरेक्यांना. काय तोंडाला येईल ते बरळत आहेत. अजून केजरुद्दिन काही बोलले नाहीत का या वर?
↩ प्रतिसाद: मोगा
न
नगरीनिरंजन Tue, 12/29/2015 - 00:46 नवीन
मुळात "पाकिस्तान को लव-लेटर भेजना बंद करो" असे निवडणुकीपूर्वी म्हणणारे मोदी अचानक गळाभेट घ्यायला गेलेच का? भाजपाचा असा रंगबदलूपणा अनेकवेळा उघड झाला आहे. राम माधवांनीही "ख्रिश्चन लोक ब्लडसकर्स आहेत" असे गोडवळकरांनी म्हटल्याचे साफ नाकारले. अरे, जर म्हटलंय तर छातीठोकपणे म्हणा ना म्हटलंय म्हणून. डरपोक आणि संधीसाधू आहेत हे लोक.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
म
मोगा Mon, 12/28/2015 - 13:15 नवीन
उत्तर प्रदेश सरकारने अखलाकच्या घरातील रेफ्रिजेरेटरमध्ये सापडलेलं मटण गौतम बुद्ध नगर येथील पशुवैद्यकीय विभागाकडे चाचणीसाठी पाठवलं होतं. या विभागाने चौकशीचा अहवाल सादर केला असून त्यात हे मटण गायीचं नव्हतं, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. या अहवालात कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून या मटणाचे नमुने फोरेन्सिक लॅबलाही पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणी गेल्याच आठवड्यात ग्रेटर नोएडा पोलिसांनी भाजपचे स्थानिक आमदार संजय राणा यांचा मुलगा विशाल याच्यासह १५ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे
न
नितिन थत्ते Tue, 12/29/2015 - 02:07 नवीन
>>हे मटण गायीचं नव्हतं, >>भाजपचे स्थानिक आमदार संजय राणा यांचा मुलगा विशाल याच्यासह १५ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे या दोन गोष्टींचा काही संबंध असायला नको. ते मांस गायीचे असते तरी गुन्हा दाखल व्हायलाच हवा.
↩ प्रतिसाद: मोगा
म
मोगा Tue, 12/29/2015 - 02:57 नवीन
ते कालच्या मटामधुन कॉपी पेस्ट केले होते.
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ट
ट्रेड मार्क Tue, 12/29/2015 - 16:35 नवीन
भाजपचे स्थानिक आमदार संजय राणा यांचा मुलगा विशाल याच्यासह १५ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे.
हे वाक्य मोगा यांना ठळकपणे सांगायचं आहे. आणि त्यामागचा उद्देश असा असावा की, आमदाराच्या मुलाला पकडलं तरी त्या आमदाराने किंवा इतर कुठल्या भाजप नेत्याने दंगा केला नाही. ;)
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
न
नाव आडनाव Mon, 01/04/2016 - 07:54 नवीन
श्रीगुरूजी, नव्या वर्षाच्या शुभेच्छा आणि भेलकम बॅक :) मला एक विचारायचंय - "२०२२ तक सबके लिए घर" साठी केंद्र सरकार काय करणार आहे? "सबके लिए" म्हणजे अर्थातच ज्यांच्याकडे एकही घर नाही त्यांच्यासाठीच असेल. पण जसं म्हाडा काम करतं, तसं काही शे/हजार घरं बांधून उरलेल्या ६ वर्षात (२०२२ म्हणजे २०२२ चा ३१ डिसेंबर गॄहित धरू) "सबके लिए घर" हे थोडं अवघड दिसतंय. "सबके लिए घर" साठी सरकारने काही काम चालू केलंय का? जसं गंगा शुद्धीकरण एक मोठा प्रोजेक्ट आहे आणि त्यासाठी ऊमा भारतींकडे एक खास खातं देण्यात आलंय, तसं काही ह्या केस मधे होणार आहे का? गंगा शुद्धीकरणापेक्षा हे काम बर्‍याच पटीने मोठं असणार आहे, म्हणजे गेल्या दीड वर्षांत सरकारचा काहीतरी आराखडा तयार असणार.
न
नाव आडनाव Mon, 01/04/2016 - 08:49 नवीन
एक दुरूस्ती- "उरलेल्या ६ वर्षात" ऐवजी "उरलेल्या ७ वर्षात" असं पाहिजे होतं.
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
म
मोगा Wed, 01/20/2016 - 09:02 नवीन
तूर डाळ परवडत नसेल तर केसरी डाळ ( लाखी डाळ ) खा, या डाळीमुळे पॅरॅलिसिस होत असल्याने त्यावर बंदी होती. मोदी सरकार ती बंदी उठवणार आहे. The government is lifting a five-decade-old ban on a type of lentil that has been linked to nerve damage and paralysis, in a desperate attempt by Prime Minister Narendra Modi to cut legume imports and make the nation self-sufficient in the edible seeds. http://wap.business-standard.com/article/economy-policy/govt-lifts-ban-on-lentil-linked-to-paralysis-as-modi-seeks-self-sufficiency-116011900784_1.html
म
मोगा Wed, 01/20/2016 - 09:03 नवीन
तूर डाळ परवडत नसेल तर केसरी डाळ ( लाखी डाळ ) खा, या डाळीमुळे पॅरॅलिसिस होत असल्याने त्यावर बंदी होती. मोदी सरकार ती बंदी उठवणार आहे. The government is lifting a five-decade-old ban on a type of lentil that has been linked to nerve damage and paralysis, in a desperate attempt by Prime Minister Narendra Modi to cut legume imports and make the nation self-sufficient in the edible seeds. http://wap.business-standard.com/article/economy-policy/govt-lifts-ban-on-lentil-linked-to-paralysis-as-modi-seeks-self-sufficiency-116011900784_1.html
म
मोगा Mon, 01/25/2016 - 07:25 नवीन
सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतच्या १०० गोपनीय फायली केंद्राकडून उघड नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंदर्भातील फायली गोपनीय ठेवल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यावर जरी वारंवार निशाणा साधण्यात येत असला, तरी नव्याने खुल्या करण्यात आलेल्या फायलींमधून नेहरूंचे मानवतावादी रुपच समोर आले आहे. बोस यांच्या मृत्यूनंतर व्हिएन्नात राहणाऱ्या त्यांच्या पत्नीला आर्थिक मदत करण्यासंदर्भातील सूचना त्यांनी परराष्ट्र व वित्त विभागाला केल्या होत्या. १२ जानेवारी १९५२ रोजी नेहरू यांनी यासंदर्भात संबंधित विभागाला लिहिले होते. त्यावर कार्यवाही करत वित्त विभागाने नेताजींच्या पत्नी एमिली शेंकेल यांना आर्थिक मदत देण्याची तजवीज केली. तसेच, यासंदर्भात त्यांच्या पुतण्यालाही कळविण्यात आले. त्यानुसार व्हिएन्नातील भारतीय उप कॉन्सुलच्या मार्फत एमिली यांना १०० पौेंड्स देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दुसऱ्या एका पत्रानुसार, नेताजींच्या अस्थी ठेवण्यात आलेल्या जपानमधील रेंकोजी मंदिराच्या देखभालीसाठी भारत सरकारने १९६७ ते २००५ या काळात सुमारे ५२ लाख खर्च केल्याचे निष्पन्न झाले
म
मोगा Mon, 01/25/2016 - 07:25 नवीन
सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतच्या १०० गोपनीय फायली केंद्राकडून उघड नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंदर्भातील फायली गोपनीय ठेवल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यावर जरी वारंवार निशाणा साधण्यात येत असला, तरी नव्याने खुल्या करण्यात आलेल्या फायलींमधून नेहरूंचे मानवतावादी रुपच समोर आले आहे. बोस यांच्या मृत्यूनंतर व्हिएन्नात राहणाऱ्या त्यांच्या पत्नीला आर्थिक मदत करण्यासंदर्भातील सूचना त्यांनी परराष्ट्र व वित्त विभागाला केल्या होत्या. १२ जानेवारी १९५२ रोजी नेहरू यांनी यासंदर्भात संबंधित विभागाला लिहिले होते. त्यावर कार्यवाही करत वित्त विभागाने नेताजींच्या पत्नी एमिली शेंकेल यांना आर्थिक मदत देण्याची तजवीज केली. तसेच, यासंदर्भात त्यांच्या पुतण्यालाही कळविण्यात आले. त्यानुसार व्हिएन्नातील भारतीय उप कॉन्सुलच्या मार्फत एमिली यांना १०० पौेंड्स देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दुसऱ्या एका पत्रानुसार, नेताजींच्या अस्थी ठेवण्यात आलेल्या जपानमधील रेंकोजी मंदिराच्या देखभालीसाठी भारत सरकारने १९६७ ते २००५ या काळात सुमारे ५२ लाख खर्च केल्याचे निष्पन्न झाले
ह
होबासराव Mon, 01/25/2016 - 09:51 नवीन
मागच्या आठवड्यात एक लेख वाचला कुठेतरि आठवले कि डकवतो, तर त्याच्यात छान विवेचन होत कि आंतराष्ट्रिय बाजारात तेलाच्या किमति निच्चांकि ला असताना सुद्धा भारतात त्यामानाने किमति कमि नाहि झाल्यात आणि २०१५ H2 मध्ये ह्या पॉलिसि मुळेच अंबानि आणि कंपनिने कसा दुपटिने नफा कमवलाय. @गुर्जि आता दोन वर्षानंतर हा लेख येउ द्या हि नम्र विनंति.
स
संदीप डांगे Mon, 01/25/2016 - 11:59 नवीन
गुर्जी आता इकडे येणार नाहीत. आता दोन वर्षे पुर्ण होत आलीत. पहिल्या वर्षी नवलाईचा उत्साह होता म्हणून निभावले. आता हिशोब मांडायला लागतीलच, दिलेली आश्वासने आणि पाळलेली वचने ह्यावर भक्तांना बोलायला काही विशेष मिळत नाही. अजूनही घोषणांच्या तुतार्‍याच फुंकल्या जात आहेत. जुन्याच टॉफीज नव्या रॅपरमधे येत आहेत. साठेबाजी आणि इंधनदर हा ज्वलंत विषय आहे. शेतकर्‍यांच्या कळीच्या प्रश्नांवर सरकार मूग गिळून बसले आहे. अजून बरेच आहे. काहीच झाले नाही असे अजिबात नाही. कुठल्याही सरकारमधे जे सामान्यपणे होते तेवढे तर झालेच आहे. काही बाबतीत चांगलीही कामे झाली आहेत. पण कोहळ्याच्या आश्वासनांनंतर आवळेच पदरी पडत असतील तर नाक वर करुन चालणार्‍या भाजपने काँग्रेसवर केलेली आगपाखड आठवावी. तुमभी यार वैसेही निकले... घोटाळ्यांबद्दल असे की इतक्यात काही बोलू नये. टर्म संपत आली की घोटाळे बाहेर येतील...
↩ प्रतिसाद: होबासराव
ह
होबासराव Mon, 01/25/2016 - 12:08 नवीन
आपल्या पुर्ण प्रतिसादाशि सहमत, ऐकायला मिळतय (भक्तांकडुन नाहि) कि कुटनितिक लेव्ह्ल वर, सुरक्षा विषयक, किंवा तंत्रज्ञानात बरेच पाउले उचलले गेलेयत्..चला हे मान्य आहे. अहो पण आंतराष्ट्रिय बाजारात क्रुड ऑइल चे भाव प्रचंड पडलेले असताना त्याचा फायदा सामान्य माणसाला काहिच नाहि व्हावा ? सगळा फायदा फक्त जो विकत घेउन रिफाइन करतो त्यालाच ? " शेतकर्‍यांच्या कळीच्या प्रश्नांवर " हा प्रकार लय भयंअकर होत चालला आहे बर, विदर्भाच्या जोडिला आता मराठवाडा हि आहे.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Mon, 01/25/2016 - 16:46 नवीन
अहो पण आंतराष्ट्रिय बाजारात क्रुड ऑइल चे भाव प्रचंड पडलेले असताना त्याचा फायदा सामान्य माणसाला काहिच नाहि व्हावा ? सगळा फायदा फक्त जो विकत घेउन रिफाइन करतो त्यालाच ?
याचे उत्तर पूर्वीच सविस्तर दिलेले आहे. पुन्हा एकदा जरा वेगळ्या पद्धतीने देतो. जागतिक बाजारपेठेत गडगडलेले कच्च्या तेलाचे भाव ही परिस्थिती कायम टिकणारी नाही. भाव कालांतराने पुन्हा एकदा वर जाणार. सध्याच्या काळात भारतासारख्या आयातदार देशांना लॉटरी लागली आहे. एखाद्याला लॉटरीचे १ लाखाचे बक्षिस लागले तर सूज्ञ माणूस त्यातले काही मौजमजेकरता वापरेल, काही पैसे वापरून जुनी देणी फेडेल, काही पैशांनी गरजेच्या वस्तू आणेल व काही भविष्याकरता राखून ठेवेल. तो बक्षिसाचे सर्व पैसे चैनीत उधळणार नाही. तसे करणे मूर्खपणाचे ठरेल. भारत तेच करतो आहे. भारतीय अंदाजपत्रकात दरवर्षी अंदाचे ४% हून अधिक तूट असते. तेलाचे भाव कमी झाल्याचा काही फायदा ग्राहकांना दिलेला आहे (२५ मे २०१४ या दिवशी पुण्यात पेट्रोल प्रतिलिटर ८२.५० इतके महाग होते, आज ते ६५.०७ इतके आहे. भावात जवळपास २१% घट झालेली आहे), काही फायदा पेट्रोलियम उत्पादक कंपन्यांना संशोधनासाठी व उत्खननासाठी दिला जाईल, काही फायदा अंदाजपत्रकातील तूट कमी करण्यासाठी वापरला जाईल.
↩ प्रतिसाद: होबासराव
र
राजेश घासकडवी Wed, 01/27/2016 - 02:39 नवीन
ही मस्त आयडिया आहे. म्हणजे आता प्रत्येक रस्त्यावर अदृश्य टोलबूथ आहेत - कुठूनही कुठेही एक किलोमीटर गेलात की सुमारे दोन रुपये टोल! आणि रस्ता द्रुतगती नसेल, ट्राफिक जॅमवाला असेल तर जास्त पेट्रोल जळतं, म्हणजे जास्तच टोल... जबरदस्त कल्पना आहे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोगा Wed, 01/27/2016 - 04:05 नवीन
इतकी वर्षे काँग्रेसही तेलदर व महागाई वाढवताना तो पैसा देशकार्याला वापरावा या पवित्र उद्देशानेच करत होते गुर्जी ! मग तेंव्हा तुमचे भाजपा का ओरडत होते ? जे लोक गांधीहत्या व जातीवाद यांचे समर्थन करु शकतात , ते लोक जगातील कोणत्याही बाजूकडुन वकिली करु शकतात. त्यामुळे गुर्जी , तोच तोच युक्तीवाद करु नका.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नाव आडनाव Sat, 01/30/2016 - 13:46 नवीन
भारतासारख्या आयातदार देशांना लॉटरी लागली आहे लॉटरी लागली म्हणजे नक्की काय -
  1. "लॉटरीत" मिळालेला पैसा ज्या देशातून आपण आयात करतो त्या देशाने दिला ?
  2. सरकारने आपल्याच लोकांना पेट्रोल / डिझेल च्या किंमतीत लुटतंय ?
दुसर्‍या प्रकारची "लॉटरी" असेल तर ती आधीच्या सरकारात चालली असती का? आणि मी तर म्हणतो लॉटरी काय, लॉटर्‍या लागल्यात. स्वच्छ भारत कर, वाढलेला व्हॅट, एलपीजीची सबसीडी आणि अश्या कितीतरी लॉटर्‍या आहेत. भारी आहे लॉटरी. मस्तंच :)
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोगा Sat, 01/30/2016 - 14:22 नवीन
अजुन एक नवा कर वाढणार आहे. स्मार्ट सिटी ट्याक्स !
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
स
संदीप डांगे Mon, 01/25/2016 - 14:36 नवीन
चापलूस आणि भाटांना काँग्रेस पुरस्कार वाटते असे हे म्हणत असत. यंदाच्या पद्मपुरस्कारांच्या यादीकडे पाहिल्यास सरकार बदललेच नाही असे वाटते.
च
चैतन्य ईन्या Mon, 01/25/2016 - 14:55 नवीन
बाडीस!!! चला हा शब्द वापरला एकदाचा. मोदिनी भलताच भ्रमनिरास केलाय. युपीए३ वाटते आहे. इतक्या कोलांट्या मारल्या आहेत कि ज्याचे नाव ते. सगळी आश्वासने पाळणे कठीणच होते पण नेमके ह्यांना थोडे पण सुधारावेसे वाटत नाहीये. आधी त्या आधार कार्डला इतका विरोध आणि सत्तेत आल्या आल्या त्याचीच भलामण. हाच प्रकार काश्मीरबाबतीत. उगाचच आधी ढोल पिटले आणि आता आपलेच शब्द गिळावे लागत आहेत. भ्रष्टाचारावर ठोस उपाय तर काहीच नाहीत. तोच प्रकार राफेल चे डील करताना हे स्वतःच जावून ते डील फायनल करून आले. कशाला हे? ह्यांची कार्यपद्धती आणि युपीएची ह्यात काय तो उन्नीस बीसचा फरक आहे.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मार्मिक गोडसे Mon, 01/25/2016 - 15:18 नवीन
कुटनितिक लेव्ह्ल वर, सुरक्षा विषयक, किंवा तंत्रज्ञानात बरेच पाउले उचलले गेलेयत्.
सहमत.
आंतराष्ट्रिय बाजारात क्रुड ऑइल चे भाव प्रचंड पडलेले असताना त्याचा फायदा सामान्य माणसाला काहिच नाहि व्हावा ?
सरकारी महसुलात वाढ होउन तो पैसा विकासकामांसाठी वापरला जाईल, त्यामुळे थोडी झळ सोसायला हरकत नाही. परंतू जिवनावश्यक वस्तुंची साठेबाजी, भेसळ व प्रचंड नफेखोरीकडे सरकार जाणुनबुजून दुर्लक्ष करत आहे. व्यापार्‍यांच्या गोदामांवर धाडी टाकून हजारो मेट्रिक टन तूरडाळ शासनाने जप्त केल्यावर ही डाळ खुल्या बाजारात विक्रीस उपलब्ध केली जाईल ज्यामुळे किरकोळ बाजारात तुरडाळीचे दर १००-१२० प्र.कि. पर्यंत खाली येतील असे सरकारने आश्वासन दिले होते. पुढे ह्या जप्त केलेल्या तूरडाळीचे काय झाले ते माहीत नाही, परंतू आजही बाजारात चांगल्या प्रतीच्या तूरडाळीचे दर १६०-२०० प्र.कि. इतके आहेत. निकृष्ट दर्जाची व भेसळयुक्त (ला़खीची) तुरडाळही १००-१३० प्र.कि.च्या आसपास मिळते. गेल्यावर्षी देशात साखरेचे विक्रमी उत्पादन होउनही आज किरकोळ बाजारात साखरेचे दर ३१-३४ प्र.कि. च्या आसपास आहेत्, गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये साखरेचे दर २३-२४ प्र.कि.होते. केवळ ५ महिन्यात ४०% इतकी भाववाढ! सध्या बाजारात मिळणारी साखर ही व्यापार्‍यांकडील (साठेबाजीची) आहे, कारखान्यातील नव्हे.त्यामुळे सरकार कोणाचे हित बघतेय ते स्पष्ट होते.
स
संदीप डांगे Mon, 01/25/2016 - 15:29 नवीन
जप्त केलेली तूरदाळ परत साठेबाजांच्या हवाली केली गेली आहे. साखरेचे उत्पादन यावर्षी सुमारे २८% टक्क्यांनी घटणार आहे असे काहीसे वाचल्याचे स्मरते. त्यावर डोळा ठेवून आतापासून भाववाढ सुरु झाली असेल. साठेबाजांचे एक चक्र असते. एका वस्तूनंतर दुसरी वस्तू पद्दतशीरपणे भाववाढ करून नफा खाल्ल्या जातो. कधी तेल, कधी डाळ, कधी साखर, कधी कांदा. एखाद्याच वस्तूचे भाव २०-३० टक्क्यांनी वाढत असल्याने सामान्य घराच्या बजेटमधे फारतर १००-२००चे फरक पडतो पण दरमहा असे १००-३०० रुपये साठेबाज पळवतात हे मात्र खरे.
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
संदीप डांगे Mon, 01/25/2016 - 15:34 नवीन
साखरेचे उत्पादन मागच्या वर्षीपेक्षा २ दशलक्ष टनांनी कमी होणार आहे. मागच्या वर्षी ते २८.३ होते. उसाच्या शेतीला बसलेल्या फटक्यामुळे व कारखान्यांना झालेल्या नुकसानामुळे यावर्षी आवक कमी राहणार आहे. त्यामुळे भाव वाढते राहतील. साधारण ऑगस्ट नंतर भाव अजून वाढतील असे वाटते. यावर्षी पाऊस कसा राहिल यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत. संदर्भः
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
सुबोध खरे Sat, 01/30/2016 - 14:50 नवीन
http://www.newsgram.com/ebbing-sugar-rush-the-fall-of-the-indian-sugar-industry/ हे पण पाहून घ्या
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Mon, 01/25/2016 - 16:35 नवीन
हा धागा अजून जिवंत दिसतो. मी मध्यंतरी सुमारे पावणेदोन महिने मिपावर नव्हतो. ताआधी ७००+ प्रतिसाद होऊन गेले होते. त्यामुळे माझ्या अज्ञातवासात धागा निजधामाला जाईल असे वाटले होते. पण अजून धुगधुगी दिसते आहे. वर्षपूर्तीनिमित्त काढलेला धागा जवळपास ८ महिने जिवंत आहे. आता दुसरे वर्ष संपत आले. असो.
श
श्रीगुरुजी Fri, 01/29/2016 - 16:17 नवीन
http://www.abplive.in/india-news/abp-news-nielsen-poll-modi-above-average-pm-nda-to-get-301-seats-if-elections-were-held-today-281371
श
श्रीगुरुजी Tue, 02/02/2016 - 13:45 नवीन
http://www.loksatta.com/mumbai-news/ed-arrest-chhagan-bhujbal-nephew-sameer-bhujbal-in-money-laundering-case-1196698/ Beginning of the end (of corrupt leaders)? Who would be next? Senior Bhujbal? Ajit Pawar? Tatakare?
म
मोगा Tue, 02/02/2016 - 16:23 नवीन
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे एकेकाळचे खंदे शिलेदार छगन भुजबळ स्वगृही परतणार, अशा चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या एका पत्राने या चर्चेला तोंड फुटलं असून खुद्द भुजबळ आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून मात्र हे दावे फेटाळण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्याने राजकीय कोंडी झाली असताना संजय राऊत त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. राऊत यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे आणि त्यात ओढून-ताणून केल्या जात असलेल्या तपासावर शंका उपस्थित केली आहे. भुजबळ आणि अधिकाऱ्यांवर लावलेले आरोप सिद्ध करता आले नाहीत तर सरकारची नाचक्की होईल, असेही राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे. राऊत यांनी अशाप्रकारे भुजबळ यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यातूनच शिवसेना आणि भुजबळ यांच्यातील दुरावा संपण्याचेच हे संकेत असल्याचेही काही जाणकारांचे म्हणणे आहे. यावर भुजबळ यांनी थेट कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी त्यांचे निकटवर्तीय मात्र शिवसेनेशी पूर्वीचं शुत्रत्व आता उरलेलं नाही, असं सांगून नव्या समीकरणांचे संकेत देऊ लागले आहेत.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 02/03/2016 - 10:35 नवीन
खूप शिळी आणि अजिबात महत्त्व नसलेली बातमी.
↩ प्रतिसाद: मोगा
  • «
  • ‹
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • 17
  • 18
  • 19
  • 20
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा