सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक
हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहे. आठवला तसा लिहिला आहे. त्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतो. तिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झाला. त्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होती. एक मिनिबस ठरवली. त्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारले. सहल तीन दिवसांची होती. सगळी माहिती घेऊन मी हो म्हटले. पैसे भरले. नियोजित दिवशी सहल निघाली. सहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरून) असे तेवीस पर्यटक सहभागी होते. सर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होती. पणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झाली. समूह (ग्रुप) चांगला होता.
प्रत्येक सहलीत मंदिरे, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांचा समावेश पर्यटन स्थळांत असतोच. आम्ही एका मंदिरात गेलो. देऊळ भव्य नव्हते तसेच फार पुरातनही नव्हते. सर्वांबरोबर मीही आत गेलो. मूर्ती संगमरवरी दगडाची होती. काळ्या दगडातील कोरीव शिल्प नव्हते. कोरीव शिल्पांची निरीक्षणे करणे मला आवडते. भाविकांनी मूर्तीला हात जोडले. नतमस्तक होऊन नमस्कार केला. पेटीत दान टाकले. प्रसाद घेतला. मी यातले काही केले नाही. सगळे पाहिले. इतरांसोबत प्रदक्षिणा घातली. बहुतेक सहप्रवाशांच्या हे लक्षात आले असावे. बसमध्ये बसल्यावर शेजारच्याने विचारले,
" तुम्ही देवाला नमस्कार केला नाही. प्रसाद घेतला नाही. असे का ?"
" मला तसे करावेसे वाटले नाही. कधीच वाटत नाही. म्हणून. "
"कुठल्याच देवाला नमस्कार करीत नाही का ?"
" हो. कुठल्याच देवाला नाही."
थोडा वेळ शांततेत गेला. पुन्हा त्याने प्रश्न विचारला.
" मग मंदिरात कसे आला ?"
" तुमच्यासारखाच. बस मधून उतरलो. चालत चालत देवळात आलो."
" तसे नव्हे. नास्तिक आहात तर मंदिरात का आला?"
"नास्तिकांना देवळात यायला बंदी आहे का? तशी पाटी कुठे दिसली नाही. असो. गमतीने बोललो. मूर्तीचे शिल्प पाहायचे. दर्शनाला आलेले भाविक काय करतात. पुजारी काय करतात. काय बोलतात ते पाहायचे, ऐकायचे या हेतूने आलो.
"नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?"
मी देवाला नमस्कार केला नाही हे त्याच्या मनाला थोडे लागले असावे. सगळ्यांनी देवाला नमस्कार करायलाच हवा असेही त्याला वाटत असावे.
"नाही. यात अहंकाराचा प्रश्न नाही. निर्जीव मूर्तीला हात जोडणे मला असमंजसपणाचे वाटते म्हणून मी तसे करीत नाही. माणसांना नमस्कार करतो."
" देवाला नाही आणि माणसांना का बरे?"
"कारण नमस्कार केला हे देवाला समजत नाही. माणसांना समजते. त्यांना भावना असतात. त्या दुखावू नये असे मला वाटते. देवापुढे मी नतमस्तक झालो नाही. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे."
"तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही." सहप्रवासी थोडा रागावला.
"जशी तुमची इच्छा" मी म्हणालो.
थोडा वेळ आम्ही दोघे गप्प राहिलो. नंतर काही निमित्ताने मी दुसरा विषय काढला. परत गप्पा सुरू झाल्या. दुसर्या दिवशी आणखी एका मंदिराला भेट दिली. तिथे पहिल्याचीच पुनरावृत्ती झाली. मूर्ती वेगळी. ती अधिक रेखीव आणि सुबक होती. पुरोहित वेगळे. बाकी सगळे तेच.
तिसरे मंदिर कारवारचे. ते मोठे सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान होते. तिथे कांही जणांनी देवाला अभिषेक केला. नंतर सर्वांनी (मी सोडून ) देवस्थानाला देणग्या दिल्या. एकूण तेरा पावत्या फाडल्या. आम्ही हॉटेलवर परतलो. ते जवळच होते. काही वेळाने देवस्थानाचा एक माणूस प्रसादाचे लाडू घेऊन हॉटेलवर आला. देणगी दिली नव्हती तरी मलासुद्धा लाडू आणला होता. मी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करा. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितले. त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. मी नाकारलेला प्रसादाचा लाडू आणि पावती पुस्तक पिशवीत भरले. आणि तो तिथून निघाला. माझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाही. एकाने तसे बोलूनही दाखवले.
दुसर्या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सगळे वेळी आले. बस चालू झाली. हवेत गारवा होता. वातावरण छान उत्साहवर्धक होते. अजून सूर्योदय व्हायचा होता. " ठरल्याप्रमाणे आपली सर्व ठिकाणे पाहून झाली. कुठे काही अडचण आली नाही. तुम्ही सर्वांनी चांगले सहकार्य दिले. सर्वांचे आभार." विजय कर्णिक म्हणाला. त्याने सहलीचे आयोजन केले होते. आपली जबाबदारी चांगल्या तर्हेने पार पाडली होती.
"आपली ट्रिप छान झाली." कोणी तरी मनापासून आनंदाने, उत्स्फूर्तपणे बोलला.
बसमध्ये सर्व तरुण मंडळी होती. सारेजण उत्साहात, आनंदात होते. हास्यविनोद चालले होते. सकाळचे अकरा वाजले असतील. एकदम धक्का बसल्यासारखे होऊन गाडीचे इंजिन बंद पडले. तेवढ्यात चलाखीने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. आणि ती थांबलीच. चालक(ड्रायव्हर ) आणि त्याचा मदतनीस खाली उतरले. काही ठाक-ठूक करू लागले. वीस मिनिटे गेली. बस चालू होईना. प्रवाशांचा उत्साह मावळला. अस्वस्थता, चुळबुळ सुरू झाली. एक बाई मला उद्देशून म्हणाल्या,
"तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होता. प्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय? सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?"
" ती कथा लहानपणी अनेकदा ऐकली आहे. तसेच पोथीसुद्धा स्वत: वाचली आहे. सत्यनारायण पोथीतील सर्व कथा असत्य आहेत हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येते. अंगध्वज राजा, साधुवाणी-लीलावती-कलावती, असल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या आणि मान डोलवायची का ? त्यांवर कधी विचार करायचाच नाही का ? आपल्या पूजेचा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. भक्षण केलाच पाहिजे . असा या देवाचा हट्ट का असावा ? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो ? की देवाने त्या प्रसाद न खाणार्याला मोठी शिक्षा द्यावी ? अंगध्वज राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का ? देव इतका सूडकरी कसा ? एवढ्या क्षुद्र मनाचा कसा ? या व्रताविषयी खूप काही सांगण्यासारखे आहे. पण नको. वेळ जाईल."
" आता गाडी मार्गीं लागेपर्यंत वेळ घालवायलाच हवा." एक प्रवासी बोलला.
"ठीक आहे. ऐकणार असाल तर थोडे सांगतो. सत्यनारायण पोथीच्या प्रत्येक अध्यायाशेवटी -इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे...-असे लिहिले आहे. पण ही पुराणकथा नाही. शिवकालीन कागदपत्रांत या व्रताचा कुठेही उल्लेख नाही. छत्रपतींना असली व्रत-वैकल्ये करण्यास वेळच नव्हता म्हणा! नंतरचे पेशवे तर मोठे देवभक्त होते. पण पेशवेकालीन कागदपत्रांतही या व्रताचे नाव कुठे नाही. बंगालमधील मुसलमानांच्या साचापीर उत्सवावरून हे सत्यनारायण व्रत इ.स. १८८०च्या सुमारास इकडे आले. याविषयी इतिहासकारांचे एकमत आहे. सध्या बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सत्यनारायण पूजा करतात. हे व्रत पौराणिक असते तर उत्तर भारतात रूढ झाले असते. तसेच विष्णुसहस्रनामात सत्यनारायण हे नाव नाही. "
"आम्ही हे कधी कुठे वाचले नाही की ऐकले नाही." कांही पर्यटक म्हणाले.
"खरे तर हा इतिहास ठाऊक नसला तरी ही कथा ऐकताना , एवढे कशाला -जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा-ही आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहे. अर्थ सरळ आहे.) तरी अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते. पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. श्रद्धा ही मनोभावना आहे. भावनेवर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच सत्य कळू शकते."
" ठीक आहे. पण प्रसाद नाकारायचा कशाला ? तुम्ही देणगी दिली नव्हती तरी त्याने तुमच्यासाठी अगत्याने प्रसाद आणला होता." माझ्या शेजारी बसणारा बोलला.
" त्याच्या हातात पावतीपुस्तक होते. मी पावती फाडावी अशी त्याची अपेक्षा असणार. ते असो. मी प्रसाद नाकारला. म्हणजे समजा मी पाप केले. तर देवाने मला एकट्याला काय ती शिक्षा करावी ना! तुम्ही सर्वांनी भक्तिभावाने देवदर्शन घेऊन, प्रसाद ग्रहण करून, देवस्थानाला देणग्या देऊन पुण्यकृत्ये केली ना? मग बस बंद का पडली ? तुमच्या सगळ्यांच्या पुण्याच्या प्रभावापेक्षा माझ्या एकट्याच्या पापाचा प्रभाव मोठा कसा ?"
" सुक्याबरोबर ओलेही जळते." एका बाईने म्हणीचा उल्लेख केला. "
" ही म्हण दैवी कृत्यांसाठी लागू नाही. भक्त प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरी ती उष्णता त्याला भाजू शकली नाही,अशी कथा आहे. देव सर्वसमर्थ आहे. तो मला एकट्याला सहज शिक्षा करू शकला असता. ज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावी. जे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावे. जी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावी. असे काही करणे त्याला शक्य नव्हते काय ? मग माझ्या पापासाठी बस बंद पाडून तुम्हा सर्व पुण्यवंतांचा खोळंबा कशाला केला ?"
" अहो, असं काय बोलता तुम्ही हे ? तुमचे हातपाय खरेच लुळे पडले तर कोण बघणार तुमच्याकडे? असे बोलू नये. शुभ बोलावे." एक बाई भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाल्या.
" चिंता नसावी. बोललो ते खरे आहे. बोलून काही होत नाही. माणसे उगीच देवाला घाबरतात. मला वाटते या दहशतीपोटी ते देवापुढे नतमस्तक होतात.पेटीत दान टाकतात. खरे तर तो कुणाचे काही करीत नाही. अहो, देवाच्या अंगावरचे दागिने, डोक्यावरचा मुकुट पळविणार्या चोराला तो काही करत नाही. देवावर घाव घालायला आलेल्या मूर्तिभंजकाचा तो हात धरत नाही. तो मला कशाला शिक्षा करील ? मी त्याचे काहीच केलेले नाही." मी उत्तरलो.
" आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." मघाच्या म्हणवाल्या बाई पुन्हा म्हणाल्या. बहुदा त्या कुठल्यातरी प्रशालेत मराठीच्या शिक्षिका असाव्या.
" आपणा तेवीस जणांत मी एकटाच नास्तिक म्हणून नासका आंबा हे मान्य. पण नासक्या आंब्यातील जंतूंचा संसर्ग आढीतील इतर आंब्यांना होतो (साथीच्या रोगासारखा) म्हणून ते नासतात. माझ्या नास्तिक विचारांचा परिणाम तुम्हा बावीस आस्तिकांतील एकावर तरी झाला आहे का ? कुणाची देवावरील श्रद्धा किंचित् तरी ढळली आहे का ? नास्तिक विचारांविषयी कुणाशीही बोललो नाही. तसा बोलतो आहे तो हा आत्ता. बस बंद पडल्यावर. त्यामुळे आढीतील नासक्या आंब्याची म्हण इथे अप्रस्तुत आहे."
"पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." कुणीतरी हळू आवाजात बोलले. पण सार्यांना ऐकू आले असावे.
"तसे म्हणा हवे तर. पण सीट रिकामी असल्याने कर्णिकांनी मला बोलावले. मी त्वरित पैसे भरले. त्यांनी सांगितलेल्या सीटवर बसलो. कुठे कसली तक्रार नाही. गैरवर्तन तर नाहीच नाही. सहलीचे वेळापत्रक पाळले. सर्वांबरोबर मंदिरांत आलो. तिथे जे पटले नाही, करावेसे वाटले नाही ते केले नाही हे खरे. पण कुणाला त्रास होईल असे कधीही वागलो नाही. इतरांचा कधी खोळंबा केला नाही."
" पण आता इतका वेळ झाला ना?" कुणीतरी बोलला.
" ठीक आहे. माझ्यामुळे हा खोळंबा झाला म्हणा. तुम्हांला बरे वाटावे म्हणून सगळा दोष माझ्यावर घेतो. पण --स्वत:च्या गाडीतून देवदर्शनाला आलेल्या भाविकांचा मोटर अपघातात दुर्दैवी मृत्यू.--अशा बातम्या अनेकदां छापून येतात. त्या अपघातग्रस्त गाड्यांतील सर्वजण १००% श्रद्धाळू भाविक असतात. तरी असे जीवघेणे अपघात का घडतात ? देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही काय? बस बंद पडली या घटनेशी बसमध्ये कोण प्रवासी आहेत, त्यांची विचारसरणी काय आहे, वागणूक कशी आहे इ.गोष्टींचा काहीही संबंध असूच शकत नाही. गाडीच्या कांही भागांतील दोष, देखभालीतील चाल-ढकल, चूक, दक्षतेचा अभाव, रस्त्यातील खड्डे, इंधनातील भेसळ, असले कसले तरी कारण असू शकते. कार्य-कारणभाव समजून घ्यायला हवा. "
"गप्प बसा. खूप ऐकले तुमचे." कुणीतरी त्राग्याने बोलले.
" ठीक आहे. गप्प बसतो. पण तत्पूर्वी तीन वाक्ये बोलतो. मी बोललो ते प्रत्येक विधान सत्य आहे. सत्याचा स्वीकार करणे माणसाच्या हिताचे असते. प्रत्येकाने स्वबुद्धीने विचार करावा."
गाडीत अस्वस्थ शांतता पसरली. थोड्या वेळाने इंजिनाचा आवाज आल्यासारखे वाटले. सर्वांनी कान टवकारले. कांही क्षणांत बस चालू झाली. बंद पडलेली गाडी दीड तासाच्या खटपटीनंतर मार्गी लागली. वेग घेतला. पुढचा प्रवास चालू झाला. प्रवाशांची मरगळ गेली. बसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. सगळे जण मागचे सारे विसरले. हास्यविनोद झडू लागले. मी डोळे मिटून विचारमग्न झालो. वाटले या प्रसंगाच्या निमित्ताने मी जे कांही बोललो त्यावर कोणीतरी, काही थोडातरी विचार करील का? कुठेतरी ठिणगी पडेल का ? कुणाचे विचारचक्र चालू होईल का? मला वाटले हो. काहीतरी सकारात्मक घडेल. आपण बुद्धिवादी विचारांची बीजपेरणी करीत राहावे. ते बीज कुठेतरी मूळ धरील. माणसाने आशावादी असावे.
.................................................................................
💬 प्रतिसाद
(421)
म
मराठे
Wed, 12/16/2015 - 18:10
नवीन
>> पिरातैंनी एवढा मोठ्ठा प्रतिसाद लिहिला पण यनावालांनी फक्त प्रतिसादातला त्यांना आवडला तेवढा भाग घेतला आणि उत्तर दिलं.
काय उत्तर दिलं बुआ? त्यांनी जिथे उत्तरं द्यायला हवीत तिथं दिली आहेत. उग्गाच लाडू का नाही खाल्ला?? का नाही खाल्ला? याला तेच तेच उत्तर किती वेळा देणार?
काही लोकांना मूर्ख "ठरवायला" लागतच नाही हेच खरं.
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Wed, 12/16/2015 - 22:27
नवीन
तुम्ही मात्र एकदम तुमच्या बुद्धीची चमक दाखवलीत. मी पिरातैन्च्या विचारांवर भाष्य नाही केलं म्हणतोय आणि तुम्ही मात्र त्या अनोळखी बाइला दिलेल्या उत्तरात गुंतून पडलात. तुम्ही उल्लेख करताय ती उत्तरं त्यांनी तिथल्या बाईला दिली. आता खरंच दिली का? नक्की काय झालं हे आपल्याला माहित नाही आणि आणि यनावालांनी पुरावा पण दिलेला नाही.
मी जे म्हणतो आहे ते असे - पिरातैन्च्या प्रतिसादात पहिला परिच्छेद सरळ सरळ यनावाला जे म्हणतात त्याचं समर्थन करणारा आहे. त्याचे लगेच यानावालांनी कौतुकपण केले. पण उर्वरित प्रतिसादात पिरातैंनी बाकी पण बरेच विचार मांडलेत, जे कदाचित यानावालाच्या विचारांशी जुळत नसावेत. म्हणून त्यांनी उल्लेख सुद्धा टाळला, कारण उत्तर दिलं कि अजून प्रश्न आले. कशाला उगीच फंदात पडा? त्यापेक्षा ते कसं करतात, आपण काडी टाकायची आणि गम्मत बघत बसायची त्यांच्या मताला मानणारा एखादा दिसला तर हात द्यायचा नाहीतर बाकीचे नगण्यच आहेत.
फक्त याच नाही तर इतर धाग्यांवर सुद्धा यानावालांना कित्येक तार्किक प्रश्न विचारलेत, अनुभव सांगून त्याचं विश्लेषण करा म्हणून सांगितलय. पण ते असल्या गोष्टींची दाखल सुद्धा घेत नाहीत.
खालील दुव्यांना भेट द्या -
http://www.misalpav.com/comment/778798#comment-778798
http://www.misalpav.com/comment/770627#comment-770627
http://www.misalpav.com/comment/773576#comment-773576
या ठिकाणी यानावालांचे मिपावरील सर्व लेखन मिळेल. त्यातील प्रतिसाद वाचून तुम्हाला कळण्याची शक्यता असावी मी काय म्हणतोय ते.
ता. क. शेवटचं वाक्य तुमच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतंय मात्र.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Tue, 12/15/2015 - 18:06
नवीन
अगदी अचूक मांडणी. प्रतिसाद ऑफ द इयर!
मी नवस केला, आणि मला फायदा झाला हे वैयक्तिक अनुभवावर आधारित असतं. त्यामुळे 'नवस करणं उपयोगी ठरतं' असा विश्वास बसू शकतो. पण ते सिद्ध होण्यासाठी 'नवस केल्याने काही वेगळा फायदा होत नाही' हे नल हायपोथेसिस खोडून काढण्याची गरज असते. आणि त्यासाठी शंभर नवस न केलेले लोक आणि शंभर नवस केलेले लोक यांची तुलना करावी लागते. ही वैज्ञानिक पद्धत अशाच प्रॉबेबिलिस्टिक विचारावर आधारित आहे.
आपल्याला दिसतं त्यावर किंवा खरं तर फक्त आपल्यालाच दिसतं केवळ त्यावरच विश्वास ठेवण्याऐवजी इतरांना वेगळं दिसत असेल का? मला जे दिसतं ते कुठल्यातरी नियमातून आलेलं सत्य आहे की प्रॉबॅलिटीतून, रॅंडमपणे हाती लागलेली गोष्ट आहे? असे प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे. नास्तिक आणि आस्तिक विचारसरणीत व्यक्तिसापेक्ष सत्यावर की वस्तुनिष्ठ सत्यावर विश्वास, हाच फरक आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 12/16/2015 - 07:32
नवीन
गुरुजी
मी नवस केला, आणि मला फायदा झाला हे वैयक्तिक अनुभवावर आधारित असतं.
असंच काही लोक होमियोपथी बद्दल बोलतात.
होमियोपथी च्या औषधांच्या आपण म्हणता तशा लक्षावधी रुग्णांवर चाचण्या झाल्या आहेत आणी त्यातून होमियोपथी हे प्लासिबो पेक्षा जास्त गुणकारी नाही असेही सिद्ध झाले आहे. मग होमियोपाथीची औषधे घेणार्यांना आस्तिक (किंवा अंधश्रद्ध) म्हणणार का?
किंवा देव न मानणाऱ्या लोकांनी होमियोपथी ची औषधे घेतली तर ते अंधश्रद्ध होतात का?
पहा मी सांगतो ना माझा गोंधळ आहे तो ( I AM NEITHER FORWARD NOR BACKWARD BUT JUST AWKWARD)
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 12/15/2015 - 18:19
नवीन
सुंदर सारासारविवेकी प्रतिसाद !
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Tue, 12/15/2015 - 18:23
नवीन
सुरेख प्रतिसाद! विचारांची सुस्पष्टता वाखाणण्याजोगी.
- अनिरुद्ध
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Tue, 12/15/2015 - 21:11
नवीन
असे कोणी एक नाही पण एक वैश्विक शक्ती आहे जी तुम्हाला नियंत्रित करत नसेल पण तुमच्या क्रिया / प्रतिक्रिया, विचार यांमुळे आपल्यावर परिणाम होत असावा. थोडक्यात एक पॉझिटीव आणि निगेटीव शक्तीचं एक भांडार आहे आणि त्यातून तुमच्या कृतीप्रमाणे, विचारांप्रमाणे तुम्ही गोष्टी आकर्षित करता.
बरोबर आहे पण परिस्थिती सुद्धा परिणाम करतच असते, तुमची कृती तर महत्वाची असतेच. म्हणून तो कलेक्टीव परिणाम असतो.
बाकी मुद्द्यांशी बाडीस.
तरी पण मला एक प्रश्न नेहमी पडतो. काही लोकांची आयुष्य कशी अगदी आखीव असतात. सर्व गोष्टी त्यांना वेळच्या वेळी फारशी तोशीश न लागता मिळतात. एखादी चूक झाली यांच्या हातून तरी कोणीतरी ती शकतो वा सुधारून घेतो.
या उलट काही लोक, काही पण करा कुठलीच गोष्ट धड होत नाही. खरं तर आपल्यापैकी काहींना अनुभव आला असेल के एखाद्या कालखंडात अश्याच सगळ्या गोष्टी अलगद घडत जातात. पण काही वेळा तुम्ही कितीही योग्य निर्णय घ्या, शेवटी त्रास होतोच. कधी कधी तर अनुभवांमधून शहाणं हॊउन आपण जर जास्त काळजीपूर्वक पावलं टाकावी आणि अगदी शेवटच्या क्षणी सगळं हातातून निसटावं. यावर काही विचार?
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 12/16/2015 - 06:59
नवीन
वैश्विक शक्ति म्हणा किंवा इतर काही. त्याचे परिणाम हे नक्की किती असतील आपल्या आयुष्यावर? मला वाटतं अगदी ठळक डायरेक्ट इफेक्ट नसावा. मग आपल्या आयुष्यात त्याला किती महत्व असावे? किती वेळ आपण त्याला द्यावा? अर्थात काहींना देवापाशी बसुन शांतता मिळते. त्यांच्यासाठी ते महत्वाचे आहे. पण तरीही अगदीच देव देव करत बसणे, देवाचे अवडंबर करणे, त्यापायी आजुबाजुच्या सर्वांनाच वेठीस धरणे, आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित न करता दैवावर हवाला ठेवुन बसणे इ गोष्टी घातकच. अशी माणसे देवधर्म पाळत असुनही आपल्याभोवती प्रचंड निगेटिव्ह व्हाईब्स तयार करत असतात. अनेकदा कडक सोवळे ओवळे पाळणार्या पुरुषांच्या बायका किंवा बायकांच्या सुना भयंकर करवादलेल्या दिसतात. कारण एकाच्या धार्मिकतेच्गे ओझे दुसर्याच्या खांद्यावर पडलेले दिसते.
थोडक्यात, आस्तिकता आणि नास्तिकता ह्याही पेक्षा जास्त माणसाचा स्वभाव, आचार विचार हे जास्त महत्वाचे पैलु आहेत. त्यावर त्याचे निर्णय, प्रतिक्रिया अवलंबुन असाव्यात. ह्या सर्वात "वैश्विक" शक्ति नक्की कसा प्रभाव टाकते ते माहिती नाही.
असं घडताना दिसतं खरं. पण मला वाटतं ह्यात "नशीब" किंवा "भाग्य" ह्या हातात नसलेल्या गोष्टींसोबतच किंवा नास्तिकाच्या दृष्टीने विचाराल तर नशीबापेक्षा सुद्धा तुमचे निर्णय, स्वभाव, परिस्थिती, वेळ (टायमिंग) हे सुद्धा फार महत्वाचे घटक आहेत. आमची एक बहिण आहे. तिच्या आयुष्यात अगदी असंच घडताना दिसतं. कशालाच यश येत नाही. वरकरणी हा नशिबाचाच भाग वाटतो. पण नीट विचार केला तर भावजींची नोकरी करतानाची धरसोड वॄत्ती, ताईचे शिक्षणात एक ना धड भाराभार चिंध्या..डिग्र्या दहा, पण पैसा आजवर एकातुनही मिळवला नाही. निर्णय घेताना भावनिक विचार, व्यावहारिक नाही. चुकांतुन शिकण्याची समज नाही, तेच तेच परत करत रहातात. भोळसट स्वभाव.
अशी एक ना दोन, हजार कारणं देता येतील. आता मला ताईच्या नशीबात काही दोष दिसत नाही. हे वरचे गुण असतील तर भाग्यवंतसुद्धा आपटी खाईल नाही तर काय?
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Wed, 12/16/2015 - 07:44
नवीन
>>>>तिच्या आयुष्यात अगदी असंच घडताना दिसतं. कशालाच यश येत नाही.
'आपल्याला यश येतच नाही' ह्या विचारांमधून एक नकारात्मक वृत्ती तयार होत जाते. नकारात्मक आत्मविश्वास तयार होऊन १०० टक्के प्रयत्न होत नाही. परिस्थितीचा सर्वांगीण विचार केला जात नाही, आढावा घेतला जात नाही. केलाच तरी त्यातील नकारात्मक गोष्टीच प्रभावाने जाणवतात. आपल्याला यश मिळणारच नाहिये ह्या नकारात्मक विचारातून आणि डळमळीत मनोवस्थेतून पुरेपुर प्रयत्न होत नाही. आणि पुन्हा अपयशच येतं.
ह्या उलट जर सकारात्मक दृष्टीकोन असेल तर परिस्थितीचे, प्रसंगाचे अवलोकन करताना सकारात्मक गोष्टी नजरेस पडून आत्मविश्वास वाढतो. 'येस्स! मी करू शकते किंवा करू शकतो'. हा विचार परिश्रमात थकवा निर्माण करत नाही आणि व्यक्ती १५० टक्के प्रयत्न करते आणि यश येतं.
दोन्ही गोष्टींचा, सकारात्मक आणि नकारात्मक, अतिरेक न करण्यातच बौद्धीक समतोल दिसून येतो. यश मिळणारच नाही ह्या टोकाच्या भुमिकेतही जाऊ नये आणि यश मिळणारच हा फाजिल आत्मविश्वासही असू नये. प्रयत्न मात्र जीवाच्या आकांताने करावेत पण डोळे उघडे ठेवून आणि सतत बदलत्या परिस्थितीचे अवलोकन करीत करावेत.
'अपयश ही यशाची पहिली पायरी असते' ह्या विचाराने पुन्हा जोमाने कार्यास लागावे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Wed, 12/16/2015 - 06:26
नवीन
पिरा : आस्तिक नास्तिक चर्चा जालावर आणि खर्या आयुष्यात पण वर्षानु-वर्ष चालू आहे. मला त्या चर्चे चा प्रचंड कंटाळा आला असल्यामुळे कित्येक वर्षापूर्वीच ती चर्चा करणे मी सोडले. मिपावर पण तश्या प्रकारची चर्चा चालूच असते.
इथे माझ्या कडुन तरी चर्चा फक्त यनावाला आणि त्यांच्या सारखे लोक बाकीच्यांना निर्बुद्ध, समज नसलेले, "इतके साधे कसे कळत नाही" वगैरे आडुन आडुन किंवा कधी कधी स्पष्टपणे म्हणत असतात त्या बद्दल च होती.
माझा प्रश्न एकदम बरोबर होता. . कोणी नमस्कार कर म्हणले किंवा प्रसाद घे म्हणल्यवर आप्ली तर्कबुद्धी वापरुन नाही म्हणण्याची हिम्मत दाखवणारे बॉस च्या मूर्खपणाला नाही म्हणतात क?? आस्तिक कधीच मॉरल हायग्राऊंड घेउन बोलत नाहीत. त्यामुळे नास्तिकांकडे माझा पॉईंटर आहे. तो सुद्धा यनावालांसारख्या
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 12/16/2015 - 07:13
नवीन
मी वर तेच म्हणतेय.. बॉसला न घाबरता बोलणारे बोलतीलही. हा स्वभावाचा भाग झाला. न बोलणारे हे नेहमी घाबरत असतीलच असही नाही, तो त्यांच्या स्ट्रॅटजीचाही भाग होऊ शकतोच. नोकरी हे प्रकरण राजकारणाने भरलेले असते. तिथे नक्की किती लोक आपले खरे विचार उघड करतात हाच एक प्रश्न आहे. माणसाचे अनेक अंतस्थ हेतु असतात इथे. बॉसला नाही म्हणायचं नाही म्हणुन दारु सिगरेटही नाही म्हणत नाही लोक.. प्रसाद का नको म्हणतील..?!
शिवाय बहुदा यनावालांनीच इथे लिहीलय वाटतं, की एरवी प्रसाद खाल्ला असताच. पावती पुस्तक घेऊन आल्याने त्यांनी नाकारला. लक्षात घ्या, इथे फरक आहे. मी तरी आजवर कुण्या नास्तिकाने केवळ प्रसाद म्हणुन अन्न नाकारले हे पाहिलेले नाही. गोडधोड खायला कोण नाही म्हणतय हो!! पण पावतीपुस्तक आले की परत तो सगळा कर्मकांडाचा व्यवहार आला.. पैसाताइ म्हणते की ती ११/- ची पावती फाडुन मो़कळी होते. कोण डोकं लावणार? तिला तो मार्ग सोयीचा वाटतो. पण यनावाला किंवा ह्या प्रसंगात अगदी मी सुद्धा देवस्थानात एक रुपयाही देऊ शकत नाही. मला कळत नाही की ह्यात आम्ही आमच्या पुअरते आमचे विचार फॉलो करत असताना, लोकांनी प्रश्न उपस्थित करावेच कशाला? हा नास्तिकाचा खाजगी प्रश्न नाही का? यनावाला लोकांना बोलले असते की प्रसाद खाऊ नका तर तुम्ही प्रश्न उभे करा. रादर करालच. पण कुणी प्रसादाचे काय करावे हे आस्तिकच ठरवणार का आता?
हो हो.. तुम्ही परत तेच म्हणणार की हे सगळं बॉस समोर कराल का वगैरे वगैरे... परत पहिली ओळ वाचा..
नक्की? खुपच ठाम विधान आहे हे. एकदा फेरविचार करुन सांगा. मग बोलु.
- Log in or register to post comments
ल
लई भारी
Wed, 12/23/2015 - 09:44
नवीन
वाचनीय प्रतिसाद, अगदी मुद्देसूद!
प्रतिसादाची वाचनखूण साठवता येते का? (मिपा वर) :)
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Tue, 12/15/2015 - 14:42
नवीन
सगळी चर्चा वाचली. बनेल होमो सेपियन च्या बनेल वागणूकीबद्दलची चर्चा नेहमीच गमतीदार असते! तशीच वाटली!
देवाचे काय म्हण णे आहे या सगळ्याबद्दल ते मात्र कळले नाही! ;)
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 12/15/2015 - 15:29
नवीन
लोकहो, यनावाला समारोपाच्या वाक्यात म्हणतात की माणसाने आशावादी असावे. पण आशा म्हणजे नक्की काय? च्यामारी, नास्तिकाने दाखवला की आशावाद आणि अस्तिकाने दाखवला की अंधश्रद्धा ! लय भारी !
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
मराठे
Wed, 12/16/2015 - 18:14
नवीन
देवाला नवस केल्याने मुल(गा) होईल असे म्हणणे म्हणजे अंधश्रद्धा, आणि मुल होत नसेल तर डॉक्टरांकडे जाऊन टेस्ट करून घेऊन घेणे आणी कोणताच दोश नसेल तर आज न उद्या (प्रयत्नांती) मुल होईल ही अपेक्षा बाळगणे म्हणजे आशावाद.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Wed, 12/16/2015 - 18:21
नवीन
"उपलब्ध वैद्यकिय विज्ञान शरीरातील सर्व दोषांचा खात्रीशीर शोध लावू शकते व उपलब्ध आधुनिक विज्ञानाने शरीरात कुठलाही दोष नाही म्हटले म्हणजे नसणारच" हे मानणे म्हणजे अंधश्रद्धा.
बाकी चालु द्या..
- Log in or register to post comments
म
मराठे
Fri, 12/18/2015 - 17:55
नवीन
जर आपल्याकडे पैसा आणि वेळ असेल तर सर्व वैज्ञानिक प्रयोग स्वतः करून आपण खात्री करून घेऊ शकतो. त्यामुळे ती अंधश्रद्धा ठरत नाही. मूळ फरक इथे आहे. "आजवरच्या ज्ञानाप्रमाणे आपल्या शरिरात दोष नसेल" असंही म्हणू शकतो पण ते प्रत्येक बाबतीतच लागू होत असल्यामुळे पुन्हा पुन्हा म्हणायची गरज नाही.
याउलट देवाची मर्जी असं एकदा म्हटलं की पुढे बोलणंच खुंटलं! शिवाय देव स्वतः काहीच बोलत नाही, त्यामुळे तिथे अंधपणे विश्वास ठेवण्यापलिकडे काहीच करता येत नाही.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 12/18/2015 - 21:25
नवीन
मराठे,
जर एखाद्या रोगाचं निदान (उदा. कर्करोग) सर्व ज्ञान व पैसा पणाला लावूनही झालं नाही. मग जर देवाची मर्जी म्हंटलं तर चालेल का? इथे मानवी प्रयत्न अगोदरच खुंटलेले आहेत.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
सप्तरंगी
Tue, 12/15/2015 - 16:26
नवीन
भावना नक्कीच सगळ्यांनाच असतात , पण प्रसादाबद्दलच्या भावना आस्तिकांनाच असतात, नास्तिकांना नाही. नास्तिकांना प्रसादाबद्दल , देवाबद्दल त्या नसतात म्हणूनच कदाचित ते त्याचा पदार्थ म्हणून स्वीकार करू शकतात. अर्थात तुमचे स्वच्छता वगैरे बद्दल चे विचार बरोबरच आहेत ते त्या वेळेस लागू पडत असतील तर आणि तेच निकष सगळ्याच (धाब्यावरच्या हि ) पदार्थांना लावत असाल तर ! खुपदा आपण गोष्टींना brain पेक्षा भावनेने तोलत राहतो, भावना बाजूला ठेवुन विचार केला तर दुसर्यांना समजून घेणे जर सोपे होते. आस्तिक माणसाला देव या संकल्पनेबद्दल असा ब्रेन ने विचार करणे जर अवघड असते त्यामुळे त्यांच्या भावना न दुखावता मत मांडले तर ...कदाचित नाही पटले तरी ओपिनिअन दिफ्फेर्स असा विचार करत जगणे सोपे होऊ शकते…
by the way इथे कोणताच आस्तिक नास्तिकाच्या नावाने बोंब मारत नाहीये हो, उगीच मुद्दा सोडून काहीही बोलू नका.
- Log in or register to post comments
स
सप्तरंगी
Tue, 12/15/2015 - 16:35
नवीन
हा कथालेखक ना उत्तर होते, चुकून इथे पोस्ट झाले ,कसे delete करायचे ते माहिती नाही !
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Tue, 12/15/2015 - 18:23
नवीन
आस्तिकांचा बाय डिफॉल्ट चमत्कारावर विश्वास असल्याने काही गोष्टींच्या बाबतीत त्यांनी सारासारविवेक सोडणे सहज शक्य आहे; पण आम्ही फक्त शास्त्रिय विचारच करतो असा दावा करणारे नास्तिक जेव्हा सारासारविचार सोडून बोलतात/करतात व "फक्त मलाच्च अंतिम सत्य माहित आहे आणि ते इतरांवर लादण्याचा हक्कही आहे" असे म्हणतात तेव्हा ते खूपच विनोदी दिसते !
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Wed, 12/16/2015 - 06:51
नवीन
डॉक्टरसाहेब,
"फक्त मलाच्च अंतिम सत्य माहित आहे आणि ते इतरांवर लादण्याचा हक्कही आहे"
असं कुठे दिसलं तुम्हाला? मलातरी लेखात असे विचार मांडलेले दिसले नाही.
नास्तिकांना नेहमीच वाटते की चर्चा करून, उदाहरणे देऊन, स्वानुभव सांगूंन एखद्याचे मतपरिवर्तन करता आले तर करावे. जमलंच तर ठिकच आहे नाहीतर त्यांची मते त्यांच्याजवळ, आपली मते आपल्याजवळ असं म्हणून वादातून माघार घेतली जाते. (नास्तिकाकडून). आस्तिकाला माघार घेणे पसंद नसते. त्याच्या भावना जास्त तीव्र असतात. त्यामुळे तार्किक उत्तरे नाहीच जमली (जी जमत नाहीतच) तर 'आमची/माझी श्रद्धा आहे' असे म्हणून चर्चेला पूर्णविराम दिला जातो.
निर्भया प्रकरणाच्या काळात अनिरुद्ध बापूंनी म्हंटले होते,' निर्भयाने अनिरुद्ध चालीसा वाचलं असतं तर तिच्यावर बलात्कार झाला नसता.' एव्हढच काय पण 'अनिरुद्ध चालीसा वाचूनही कोणी बलात्कार केलाच तर तो पुरुष नपुसंक होईल.' माझ्या एका अनिरुद्ध भक्त मित्राला हे सांगून यूट्यूब वरील त्यांचे भाषण ऐकवून जेंव्हा विचारलं तुला हे पटतं का? त्यावर तो गप्प बसला त्याच्याकडे उत्तर नव्हतं. पण आपलं कांही चुकतंय, आपण चुकीच्या ठिकाणी आपल्या श्रद्धा अर्पण करतो आहोत हे कबूल करायचे धाडस त्याच्यापाशी नव्हते, अजूनही नाही. तो उच्चशिक्षित आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर, एमबीए आहे. पण त्याने 'आमची श्रद्धा आहे' हे पूर्णविरामी वाक्य माझ्या तोंडावर फेकून पुढील चर्चेलाच बूच मारून ठेवलंय. अर्थात ह्या वादातून आमचे संबंध बिघडले वगैरे नाहीत. अजूनही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत पण जेंव्हा जेंव्हा भेटतो तेंव्हा त्याला माझी आणि मला त्याची मते माहित असल्यामुळे हा विषय टाळून बोलतो. अजूनही त्याची अनिरुद्ध भक्ती तितक्याच तीव्रतेने आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Wed, 12/16/2015 - 07:04
नवीन
इथेच लादणे दिसते पेठकर काका. कोणी आस्तिक माणुस जर निमंत्रण देत असेल नास्तिकाला की या आणि माझ्या विचार्/मता ची चिकित्सा करा तर ठीक आहे. पण हे नास्तिक थेट चर्चा झाली च पाहीजे असे म्हणतात.
तुमचेच उदाहरण बघाना, तुमचा मित्र संभ्रमात पडला होता का आणि तुमच्या कडे सल्ला मागायला आला होता का? नाही पण तुम्हीच त्याला प्रश्न विचारुन चर्चेला आव्हान देत आहात.
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 12/16/2015 - 07:35
नवीन
पेठकर काका तुमचा मित्र आस्तीक आहे क ते माहीत नाही पण जरा जगातल्या वेगवेगळ्या छटा पहा आणि ठरवा सगळयांना एकाच श्रेणीत ठेवायचे का ?
संपूर्ण माहीती चौराकाकांच्या माहीती पूर्ण प्रतिसादातून : तुम्ही स्वतः च वरती कुठे तरी सांगीतले की, तत्व निष्ठा+कठोरता तुम्ही घरच्या सदस्यांबाबत तेवढी टोकाची दुराग्रहाची ठेवत नाहीत ( त्या वेळी त्यांचे मन राखणे, भावनांची बूज हा जास्ती महत्वाचा निकष असतो) तीच बाब सर्व जण सांगण्याचा प्रयत्न करतात
तुमचा मित्र अध्यात्मवादी आहे आणि तुमच्या सांगण्याने त्याला काहीही फरक पडणार नाही.
एखाद्याने नुसता देवाला किंवा जेष्ठ व्यक्तीला नमस्कार केल्याने काही ब्रम्हांड कोसळणार नाही.
अर्थात त्याने दे रे हरी खाटल्यावरी असे करू नये (हाच फरक जुण्या खरोखरच्या संतांमध्ये आणि आत्ताच्या "संस्कार्/आस्था फेम निरमल बाबा/आसाराम यांच्यात आहे.
साप समजून भुई धोपटू नये या करिता हा प्रतिसाद प्रपंच.
सहजीवनात भावनांनाही व्यवहाराईतकेच महत्व आहे असे जाणणारा नाखु
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Wed, 12/16/2015 - 08:01
नवीन
>>>> तत्व निष्ठा+कठोरता तुम्ही घरच्या सदस्यांबाबत तेवढी टोकाची दुराग्रहाची ठेवत नाहीत ( त्या वेळी त्यांचे मन राखणे, भावनांची बूज हा जास्ती महत्वाचा निकष असतो) तीच बाब सर्व जण सांगण्याचा प्रयत्न करतात.
इथे मित्राच्या बाबतीतही मी तोच निकष लावला आहे. त्याच्या अंधश्रद्धेमुळे मी त्याच्याशी मैत्री तोडलेली नाही. आम्ही अजूनही चांगले घनिष्ट मित्र आहोत. एव्हढ्या एका विषयात आमच्यात मतभिन्नता आहे हे दोघांनीही स्विकारले आहे. त्यामुळे घरच्या सदस्यांबाबत एक भूमिका आणि इतरांबाबत दूसरी भूमिका असा दुटप्पीपणा माझ्या वागण्यात नाहीये.
दुर्दैवाने मी दिलेली लिंक कोणी उघडून पाहिलेली दिसत नाही.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Wed, 12/16/2015 - 07:53
नवीन
>>>>इथेच लादणे दिसते पेठकर काका.
नाही. हे लादणे होऊ शकत नाही. मैत्रीत, विविध विषयांवर, चर्चा नेहमीच होत असतात, व्हाव्यात. वादे वादे जायते तत्व बोधः मैत्रीत आपण देशाच्या पंतप्रधानांपासून गल्लीतल्या एखाद्या ओळखीच्या व्यक्तींच्या वागण्यावर चर्चा करीत असतो. ह्या चर्चेतूनच आपले ज्ञान वाढत असते. नाहीतर ते तसेच पडून राहून गंजू लागेल. आपल्या धर्मातही चर्चेला, मतप्रदर्शनाला अडकाठी नाही म्हणून आपण विचारांनी लवचिक आहोत. मुसलमान धर्मात अशी परवानगी नसल्यामुळे त्यांची प्रगती खुंटली आहे.
चर्चा करणे, उदाहरणे देणे, स्वानुभव सांगणे हे दोन्ही बाजूंनी होत असते. त्यात कोणी कोणावर आपले विचार लादत नसून ती समोरच्याचे विचार जाणण्याची प्रक्रिया आहे.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sat, 12/19/2015 - 10:26
नवीन
यावरुन मला औषध उतारे आणि आशिर्वाद हे आठवले
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Tue, 12/15/2015 - 18:34
नवीन
निम्मी चर्चा तर प्रसादाच्या लाडू वरच चाललीये!! :D
प्रसादाच लाडू तू का न्हाई खाल्ल,
भक्तांच्या देवाला तू का र डावल्ल!! (चाल सांगायची गरज नसावी!)
- Log in or register to post comments
र
रुपी
Tue, 12/15/2015 - 19:57
नवीन
मी नास्तिक नाही, पण तरीही लेखन आवडले.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Tue, 12/15/2015 - 22:57
नवीन
श्री यनावाला ह्यांनी कुठेही त्यांच्या लेखात आस्तिक निर्बुद्ध आणि नास्तिक बुद्धीवान असे म्हंटल्याचे मला जाणवले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार आस्तिक आणि नास्तिक मध्ये भावनेने विचार करण्याचा आणि भावनेला बाजूला ठेवून मेंदूने विचार करण्याचा फरक आहे.
>>>> आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहे. अर्थ सरळ आहे.) तरी अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते. पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते.
ह्या मध्ये, 'तुम्हा सर्वांना बुद्धी आहेच फक्त त्यावर भावना नियंत्रण ठेवते आहे म्हणून कांही गोष्टी तुम्हाला समजू शकत नाहित' असे ते म्हणताहेत. म्हणजेच आस्तिकांनाही बुद्धी असल्याचेच त्यांचे म्हणणे आहे. आस्तिकांना त्यांनी निर्बुद्ध म्हंटलेले नाही.
बरं, आस्तिकांचे वागणे कसे होते?
" तुम्ही देवाला नमस्कार केला नाही. प्रसाद घेतला नाही. असे का ?"
"नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?"
माझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाही. एकाने तसे बोलूनही दाखवले.
"तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होता. प्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय? सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?"
" आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात."
"पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे."
गप्प बसा. खूप ऐकले तुमचे."
म्हणजे पाहा. संवादाला सुरुवात आस्तिकांनी केली. नास्तिकाने नाही.
त्यांना 'अहंकारी' ही संज्ञा आस्तिकांनीच दिली.
नास्तिकाचे वागणे पटले नसल्याचे, कारण नसताना, एका आस्तिकानेच बोलून दाखविले.
प्रसादाचा लाडू नाकारण्याचा निषेध करून त्याचे दुष्परीणाम भोगायला लागण्याची गर्भित सूचनाही आस्तिकाने दिली.
आस्तिकानेच नासक्या आंब्याची उपमा नास्तिकाला दिली.
जो सहप्रवासी स्वखर्चाने आणि आयोजकाच्या विनंती नुसार आला आहे त्याला 'तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते' असे अवमानकारक बोलणेही आस्तिकाचेच.
गप्प बसा. खूप ऐकले तुमचे. हे कांही अधिकार नसताही एखाद्याला रागे भरणे आस्तिकाचेच.
एव्हढे होऊनही नास्तिक स्वतःला बुद्धीवादी समजतात. आस्तिकांना निर्बुद्ध समजतात. आस्तिकांच्या भावना दुखावतात वगैरे वगैरे आरोप हे निखालस खोटे आणि असहिष्णूतेचे आहेत. चर्चा जरूर करावी. त्यासाठीच हा धागा आहे. पण तारतम्य सोडून लेखन करू नये.
धन्यवाद.
- Log in or register to post comments
र
राही
Wed, 12/16/2015 - 02:49
नवीन
लेख आणि त्यावरचे सगळे प्रतिसाद वाचताना नेमके हेच जाणवत होते. यनावालांची भाषा सौम्य, जे घडले ते काही अतिशयोक्ति न करता वर्णन करणारी, तिरकसपणा टाळलेली अशी होती. त्यांनी कुणावरही असले आरोप केलेले दिसले नाहीत. उलट कित्येक विरोधी प्रतिसाद हे थेट आरोप करणारे, टिंगलटवाळी टोंमणे वापरलेले, आक्रमक असे होते.
नेहमीच दिसते की आस्तिकांच्या श्रद्धा ह्या समूहाने किंवा कधीकधी झुंडीने प्रगट होणार्या, समूहाचे मानसशास्त्र बाळगणार्या असतात. विरोधी विचारांच्या अल्पसंख्यांना त्रास होईल इतपत विज़िबिलिटी असणार्या असतात. शिवाय आपल्या श्रद्धांचा आवाजी प्रसार करणार्या, कसली तरी भीती अथवा कसले तरी आमिष दाखवून कळपात ओढू पाहाणार्या असतात. नास्तिकांचा गट असू शकतो पण त्याची झुंड बनत नाही कारण विवेक हेच त्यांचे अधिष्ठान असते. सध्या ते अल्पसंख्य आहेत म्हणून दबून राहातात असेही नाही. त्यांची बहुसंख्या झाली तरी त्यांच्या सामाजिक वर्तनात फरक पडत नाही. कारण एकच, विवेक, सदसद् विवेक.
जे चैतन्य विश्वात दिसते, ते आहे, इतके म्हणणे पुरेसे आहे. त्याला लोटांगण घालण्याची जरूरी नाही हे पिरांचे वाक्य अगदी मार्मिक आहे.
पिरा, प्रभाकर पेठकर, मराठी कथालेखक यांचे प्रतिसाद विशेष आवडले.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 12/16/2015 - 09:42
नवीन
बाकी चालू द्या. सदसद्विवेक ही व्यक्तिसापेक्ष गोष्ट आहे. त्याचा अस्तिकतेशी किंवा नास्तिकतेशी काहीही संबंध नाही. असो. यावर अधिक न बोलणे उत्तम.
- Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद
Wed, 12/16/2015 - 13:35
नवीन
हि एका नास्तिकाने कथन केलेली घटना आहे. याचा अर्थ हि नास्तिकाने मांडलेली आपली बाजू आहे असं मला वाटतं. हि घटना अशीच्या अशी घडली असं गृहीत धरून नास्तिक कसे आणि आस्तिक कसे (वागले किंवा वागतात) हे मांडणंच मुळी चुकीचं वाटतं. त्या घटनेतला एखादा आस्तिक बाजू मांडायला असता तर जमला असता हा तिय्या!
बाकी निर्बुद्ध नव्हतं म्हणायचं तर "पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते" यातून नेमकं काय म्हणायचं होतं. नास्तिकांना (सगळ्या नसलं तरी यनावाला यांसारखे काही) अभिप्रेत असलेले आस्तिक लोक बुद्धी लावून श्रद्धेने लिप्त होत नाहीत तर बुद्धी न लावता श्रद्धेने लिप्त होतात असं? याबद्दल नास्तिकांना काही अडचण असण्याचं कारण नसावं असे मज पामरास वाटते.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 12/16/2015 - 15:11
नवीन
याचा अर्थ मनात श्रद्धा असेल तर तुम्ही त्या बाबतीत सारासार विचार करत नाही. हे काही फक्त देवाच्या बाबतीतच नव्हे, तर जर तुम्ही एखादी गोष्ट श्रद्धेने मानली की तुम्ही त्या बाबतीत चिकित्सा करणे सोडून देता. अगदी साधे उदा. पहा - तुमचा एक मित्र आहे जो तुम्हाला शेअर बाजाराच्या टिप्स देतो, त्या टिप्स खर्या ठरतात, असे समजा. जर तसे झाले तर तुम्ही प्रत्येक वेळी त्याच्याअ टिप्सची चिकित्सा कराल का? अगदी उद्या त्याच्या टिपच्या विरुद्ध बाजार जाताना दिसला तरी देखील तुम्ही त्याच्यावर श्रद्धा ठेऊन व्यवहार कराल.
पण हेच जर तुमची श्रद्धा नसेल, आणि तुम्ही त्याच्या टिपचा डोळसपणे स्वीकार करत असाल, तर मात्र तुम्ही ती टिप तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर तपासून पहाल, कआचित तुम्हाला पटेल, कदाचित नाही.
म्हणूनच जिथे श्रद्धा आहे, तिथे बुद्धी नाही. हे अगदी मी आस्तिक असलो तरी देखील मान्य करेन. जिथे मला बुद्धी लावता येते, तिथे मी बुद्धी लावेनच. श्रद्धा ठेवण्यापूर्वी सगळी शक्य असलेली चिकित्सा करीन, पण नंतर बुद्धीचा वापर कमी, असलाच तरी तो समोरच्या व्यक्तीचे म्हणणे खरे आहे की खोटे आहे हे शोधायला होणार नाही, तर समोरच्या व्यक्तीला नेमके काय अभिप्रेत आहे हे शोधायला होईल.
- Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क
Wed, 12/16/2015 - 22:55
नवीन
कृपया त्यांचे सर्व लेख वाचा. इथेच त्यांच्या लेखांची यादी दिलेली आहे. त्या लेखांचा सर्वसाधारण अर्थ असा आहे की जे नास्तिक असतात तेच बुद्धिवादी असतात आणि बहुतेक सर्व बुद्धिवादी नास्तिक असतात. देवाला मानणे हि एक मूर्खपणाची गोष्ट आहे, एवढेच नव्हे तर या ठिकाणी ते लिहितात "आजही आई ,"देवबाप्पाला नमो कर . तो तुला बुद्धी देतो. यश देतो. आयुष्य देतो. संकटातून वाचवतो. " असे आपल्या मुलांना सांगते. कारण तिने तसे आपल्या आईकडून ऐकलेले असते." यातच पुढे लिहितात "जगप्रसिद्ध नास्तिक रिचर्ड डॉकिन्स म्हणतात, "आपल्या बाळाला देवा-धर्माच्या संस्कारांचे विष आई स्वमुखातून पाजते. त्याचा परिणाम आयुष्यभर टिकू शकतो."
त्यांचा हा लेख तर वाचाच. मंत्रांचा वापर कसा करून बघताहेत ते वाचून करमणूक होईल. बादरायण संबंध कसा लावलाय ते बघा. आता एखाद्याला एक मंत्र म्हणून बरं वाटत असेल तर केवळ तो मंत्र आहे म्हणून ते चुकीचं आहे? माझी मुलगी अगदी लहान असल्यापासून रात्री झोपताना रडायची. काही केल्या थांबायची नाही. डॉक्टरनी पण सांगितलं होतं की तिला शारीरिक तसा काही त्रास नाहीये. विविध प्रयोगांचा एक भाग म्हणून एकदा रामरक्षा लावली तर अक्षरशः ५ मिनटात झोपली. नंतर तिला काय कळतंय म्हणून दुसरी (विविध चालींची) गाणी लावली तर ते नको होतं तिला. फक्त रामरक्षाच ऐकून झोपायची. आता याचं काही बुद्धिवादी स्पष्टीकरण आहे का? मग आता या ठिकाणी एखादा नास्तिक असता तर म्हनला असता का की मुलगी कितीही रडली तरी चालेल पण असले मंत्र वगैरे लावायचे नाहीत?
आपण कुठले अनुभव सांगितले की तुम्ही विश्लेषण करा, आपलं म्हणणं मांडल तर त्याला ते उत्तर देतच नाहीत कारण ते त्यांच्या समजूतीविरोधात आहे. एवढेच कशाला, प्रतिसादातला आपल्याला अनुकूल भाग घेवून उत्तरं देतात. पाहिजे तर तुम्ही एकदा प्रयोग करून बघा. असो. ज्याचा त्याचा देव ज्याच्या त्याच्या जवळ, तुम्ही मानलं तरी किंवा नाही मानलं तरी.
- Log in or register to post comments
म
मनीषा
Wed, 12/16/2015 - 05:08
नवीन
विचारप्रवर्तक लेख ...
शुभ- अशुभ, पवित्र-अपवित्र .. या प्रकारांच आपल्याकडे अति अवडंबर माजवले जाते असं मलाही वाटतं .
त्यातही पायगुण हा प्रकार अति भयंकर . त्या पायी कित्येक निषपाप मुलींचे आयुष्य इध्वस्तं झाले असेल याला गणतीच नाही.
देवळात गेल्यावर मी देवापुढे हात जोडते, अंगारा लावून घेते . असं म्हणतात ना .. व्हेन इन रोम.. डु अॅज रोमन्स डु .
पण मी असे केले नाही तर आकाश कोसळेल असं मला वाटत नाही.
एक कथा आठवते....
मुसळधार पाऊस पडत असतो. सगळ गाव पाण्याखाली बुडलेले असते. टेकडीवरच्या देवळात काही जीव वाचवून आश्रयाला आलेले असतात. त्यात पुजारी, जमिनदार, गुरूदेव, डॉक्टर असे प्रथितयश असतात. त्यात एक स्त्री असते. समाजात मान्यता नसलेली, वाळीत टाकलेली आणि तिरस्करणीय.
पावसाचा जोर वाढतच असतो. विजा चमकत असतात. देवळाच्या अगदी माथ्यावर. लोक जीव मुठीत धरून बसलेले. ती वीज कधीही पडेल असे वाटत असते, पण पडत नसते.
धर्मगुरूला लोक याचा अर्थ विचारतात. ते सागतात, आपल्यात कुणीतरी पापी आहे. त्याला घेऊन जाण्यासाठी वीज येते, परंतु काही पुण्यात्मांच्यामुळे परत जाते. मग ते सांगतात ,, प्रत्येकाने काही काळासाठी देवळाचा आश्रय सोडून अंगणात जायचे. जो पापी असेल त्याच्यावर वीज पडेल. आणि बाकीचे वाचतील.
प्रथम जायचे कुणी. मग त्यांनी प्रत्येकाचा क्रमांक ठरवला. प्रत्येकजण आपल्या पापपुण्याची मनात उजळणी करत होते. ती बाई मात्रं एका कोपर्यात शांत बसलेली.
एकेकजण बाहेर जाऊन परत येत. येताना त्यांचा चेहरा उजळलेला असे. आता फक्त ती स्त्री राहीली होती जायची. सगळे तीच्यावर तोंडसुख घेत होते. हीच्यामुळे.. हीच्यामुळे....
ती उठली . देव्हार्याकडे पाहून हात जोडले. मग तेथल्या प्रथिष्ठितांना अभिवादन केले, आणि पायर्या उतरू लागली.
आता वीजांचा जोर फारच वाढला. सारा अंधारलेला परिसर वीजांच्या प्रकाशात उजळलेला.
मग जोरात कानठळ्या बसणारा आवाज झाला आणि आकाशातली वीज जमिनीवर झेपावली.
दुसर्यादिवशी पाउस ओसरला , उबदार सूर्यकिरणे पसरली. आणि आपले ओले कपडे सावरत ती स्त्री टेकडी उतरू लागली. उध्वस्त झालेले देऊळ परत बांधायचा मनोमन निश्चय करीत...
- Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे
Wed, 12/16/2015 - 05:47
नवीन
स्वत: पूर्ण आस्तिक असलो तरी अनुभव कथन आवडले.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Wed, 12/16/2015 - 05:48
नवीन
http://www.misalpav.com/user/91/authored इथे मिसळपाव वर यनावालांचे अन्य लेख असले तरी त्यांनी आंतरजालावर प्रचंड लेखन केलेले आहे. उपक्रम या संकेतस्थळावर त्यांचे भरपूर लेखन आहे तिथे त्यांनी तर्कक्रिडा ही मालिका चालवली होती. यनावाला हे कठोर नास्तिक म्हणून बुद्धीवादी वर्तुळात प्रसिद्ध आहेत. त्यांचे लेखनातील काही लिंक खाली देत आहे
वाचून दमाल.पण त्यातून त्यांची शैली व विचार यांचा परिचय होईल. या पार्श्वभूमीवर मग प्रतिक्रिया दिल्यास ते उचित ठरेल.
अंगारकी चतुर्थी http://mr.upakram.org/node/3844
गॅस गणराज http://mr.upakram.org/node/3941
गुरुविण कोण लावितो वाट
http://mr.upakram.org/node/3789
विवेकवाद अध्यात्म आणि आत्मघात
http://mr.upakram.org/node/3719
कपिलाश्रमातील घृतोत्पादन प्रकल्प
http://mr.upakram.org/node/3665
नरसोबाच्या वाडीचा यज्ञ (इ.स १८९०)
http://mr.upakram.org/node/3645
त्या मोरयाची कृपा
http://mr.upakram.org/node/3597
महाकाव्याचा विषय
http://mr.upakram.org/node/3579
ज्ञानेश्वरील अकरा ओव्या
http://mr.upakram.org/node/3526
चालविली भिंती मृत्तिकेची
http://mr.upakram.org/node/3474
बुद्धीदाता
http://mr.upakram.org/node/3379
अध्यात्मिक प्रवचन
http://mr.upakram.org/node/3356
बिनडोकपणाचा कळस
http://mr.upakram.org/node/3362
देव धर्म आणि गाजरचित्रे
http://mr.upakram.org/node/3323
उदकी अभंग रक्षिले
http://mr.upakram.org/node/3313
अशी एक शक्यता केवळ तर्क
http://mr.upakram.org/node/3276
भयसूचक बातमी
http://mr.upakram.org/node/3216
चंद्राचा पुष्य नक्षत्रात प्रवेश
http://mr.upakram.org/node/3161
ईश्वरे तृणे करुन रक्षण केले
http://mr.upakram.org/node/2928
यात आश्चर्य ते काय?
http://mr.upakram.org/node/2883
हा खेळ बाहुल्यांचा
http://mr.upakram.org/node/2820
गूढ आश्चर्यकारक अनुभव
http://mr.upakram.org/node/2525
कार्यकारण भाव
http://mr.upakram.org/node/2503
विवेकवादी लेखनावर आक्षेप
http://mr.upakram.org/node/2580
भ्रमाचा भोपळा
http://mr.upakram.org/node/2388
सामान्य समज (कॉमनसेन्स)
http://mr.upakram.org/node/2450
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Wed, 12/16/2015 - 05:51
नवीन
http://yanawalavalakar.globalmarathi.com/index.htm
गलोबल मराठीवर ही त्यांचे अनेक लेख आहेत.
- Log in or register to post comments
य
यनावाला
Wed, 12/16/2015 - 16:48
नवीन
@ प्रकाश घाटपांडे
............
धन्यवाद प्रकाशजी ! अनेक लेखांचे दुवे (लिंक्स्) असे एकाच प्रतिसादात द्यायचे मला जमले नसते. आधी हे सगळे लेख शोधून काढायचे म्हणजे कठिणच. त्यांतील "बिनडोकपणाचा कळस " हा लेख माझा नाही.तो श्री.प्रभाकर नानावटी यांचा आहे.
तुम्ही उल्लेख केला त्या तर्कक्रीडा कोड्यांचे उपक्रमच्या सदस्यांनी चांगले स्वागत केले. डॉ.धनंजय यांनी बहुतेक कोडी अचूक सोडवली. असो.पुनश्च धन्यवाद !.. यनावाला.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 12/17/2015 - 11:01
नवीन
त्यांतील "बिनडोकपणाचा कळस " हा लेख माझा नाही.तो श्री.प्रभाकर नानावटी यांचा आहे.
होय.नजरचुकीने झाले.
- Log in or register to post comments
त
तिमा
Wed, 12/16/2015 - 07:01
नवीन
इतके रेफरन्सेस दिल्यावर, आता या धाग्याची वाचनखुण साठवलीच पाहिजे.
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Wed, 12/16/2015 - 07:31
नवीन
वेळ आली कि ते हि होईल . काळजी नसावी . माज उतरेल
कर्म करताना लोकांना अडवण हे देवाचं काम नाहीये . आपल्या जबाबदारीवर चांगली वैईत कर्म प्रत्येकाने करावीत . देवाचं काम कर्मांची फळ देण्याचं आहे .
फक्त गाडीतून देवदर्शनाला जाणारी माणस देवभक्त असतात हा भयानक मोठा गैरसमज आहे . तुमची कर्म वाईट . देवाला दाखवण्यासाठी मात्र देवदर्शनाला जायचं. मग तुम्हाला अपघातातून वाचवायला देव काय तुमच्या बापाचा नोकर आहे ? एखादी चांगली गोष्ट झाली कि देवाच्या कृपेने झाली असं आपल्याला म्हणता येत नसेल तर वाईट गोष्ट घडल्यावर सुधा देवाच्या कोपामुळे झाली असं म्हणण्याचा अधिकार कुणाला नाही .
सात्यानारायानाच्या पूजेबद्दल माझ्या पण मनात संभ्रम आहे . पण हि पूजा करताना आधी गणेश , भूमी , विष्णू , नवग्रहांची पूजा सुधा करतात . म्हणून आम्ही सत्यनारायणाची पूजा करतो . देव विनाकारण तुमचा अपमान करत नाही . मग तुम्हालाही देवाचा अपमान करण्याचा हक्क नाही
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 12/16/2015 - 07:40
नवीन
मला इन जनरलच एक प्रश्न पडलाय. ताईंच्या प्रतिसादाने तो उफाळुन आला!
नास्तिकाने देवाबद्दल जे प्रश्न पडतात (आणि ज्यामुळेच त्याला नास्तिकता जास्त सुसंगत पर्याय वाटत असतो) ते विचारले तर तो आस्तिकांना देवाचा अपमान का वाटतो? देवाच्या अस्तित्वावर शंका उपस्थित करायला नक्की काय हरकत आहे? कुणी संयत भाषेत प्रश्न विचारत असेल, अक्कल काढत नसेल आणि प्रामाणिकपणे विचारत असेल तर नक्की आक्षेप कशाला असतो? आणि त्याला माज का म्हणतात?
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 12/16/2015 - 08:47
नवीन
अहो पिरा असं काय करताय...
(मिपावर अस्तित्वात असलेल्या समस्त पाटीलांची माफी मागून)
गावात एखादा नवीन माणूस /अधिकारी आला आणि त्याने पाटलांच्या वाड्यावर रितसर हजेरी लावली नाही आणि उलट "का जायचे आहे ? कशासाठी ?" असे अगदी नम्रपणे जरी विचारले तरी पाटलाच्या चेल्यांना वाटतेच ना की "लईच माज दिसतोय याला, पण पाटील लवकरच माज उतरवतील याचा मग कळेल"
इथे तर आपण ईश्वराचे अस्तित्व नाकारतोय मग भले आपण कितीही सभ्य भाषेत बोलत असलो तरी लोकांची डोकी भडकणारच हो..
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Wed, 12/16/2015 - 08:16
नवीन
याचा अर्थ असा घ्यायचा का कि जो चांगल्या गोष्टीचे क्रेडिट देवाला देतो त्यालाच वाईट गोष्टींचे बदक्रेडिट देवाला देण्याचा अधिकार आहे इतरांना नाही.
खर आहे. देवळात जाणारे सगळेच भक्त वा सश्रद्ध अस्तिक असतात असे नाही. दरोडा घालणारा दरोडेखोर देखील माझा दरोडा यशस्वी होउ देत से देवाला साकडे घालत असतो. तसे तपास करणारा पोलिस देखील माझा तपास यशस्वी होउ दे असे देवाला साकडे घालतो.
खर तर ईश्वर ही संकल्पना म्हणजे सर्वसामान्यांचा स्वस्तातला सायकियाट्रिस्ट/ सायकोथेरपीस्ट/कौन्सिलर आहे. तो निर्गुण निराकार ही आहे सगुण साकार ही आहे भक्तवत्सल करुणाघन ही आहे.जळी स्थळी काष्ठी पाषाणी यत्र तत्र सर्वत्र आहे.
ईश्वर हा आपल्या हृदयात आहे याचा अर्थ त्याचे स्थान आपल्या मेंदूत आहे असा आहे.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 12/17/2015 - 04:57
नवीन
तुमचे सगळे प्रतिसाद आवडलेत!
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
गुरुवार, 12/17/2015 - 06:06
नवीन
>>>>देवळात जाणारे सगळेच भक्त वा सश्रद्ध अस्तिक असतात असे नाही. दरोडा घालणारा दरोडेखोर देखील माझा दरोडा यशस्वी होउ देत से देवाला साकडे घालत असतो. तसे तपास करणारा पोलिस देखील माझा तपास यशस्वी होउ दे असे देवाला साकडे घालतो.
दरोडेखोर आणि पोलीस दोघेही श्रद्धेनेच देवाकडे येत असतात. ते भक्त वा आस्तिक असतातच. भलेही त्यांची कार्ये एकमेकांविरुद्ध असू देत. पण म्हणून त्यांची देवावरील श्रद्धा-भक्ती कमी कशी होते?
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 12/17/2015 - 10:55
नवीन
१) देवळात जाणारे सगळेच भक्त वा सश्रद्ध अस्तिक असतात असे नाही.
२)दरोडा घालणारा दरोडेखोर देखील माझा दरोडा यशस्वी होउ देत से देवाला साकडे घालत असतो. तसे तपास करणारा पोलिस देखील माझा तपास यशस्वी होउ दे असे देवाला साकडे घालतो
दोन वेगळे मुद्दे आहेत.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
गुरुवार, 12/17/2015 - 14:59
नवीन
तुमचा मुद्दा नीट कळला नाही.
देवळात जाणारे सगळेच सश्रद्ध आस्तिक असतात असे नाही. असे विधान केल्यानंतर देवळात जाणार्या अश्रद्ध नास्तिक माणसाचे उदाहरण यायला हवे होते. जसे, तिथला सफाई कामगार किंव माझ्यासारखा (स्वतःच्या) पत्नी बरोबर फक्त तिचे मन राखण्यासाठी जाणारा नवरा.
पण जो देवळात जाऊन देवाकडे कांही मागणे मागतो त्याचा देवावर विश्वास असतो आणि तो सश्रद्ध आस्तिकच असतो. दरोडेखोर आणि पोलीस देवाकडे कांही मागणे मागत आहेत आणि ते पूरे व्हावे अशी मनोकामना व्यक्त करीत आहेत तेंव्हा तेही सश्रद्धच झाले. 'देवळात जाणारे सगळेच सश्रद्ध आस्तिक नसतात' ह्या विधानाला बळकटी देऊ शकत नाहीत.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- ›
- »