Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सहप्रवासी: बावीस आस्तिक -एक नास्तिक

य
यनावाला
Sat, 12/12/2015 - 16:38
🗣 421 प्रतिसाद
हा अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहे. आठवला तसा लिहिला आहे. त्याकाळीं नोकरीनिमित्त कोकणात वेंगुर्ले गावी होतो. तिथे विजय कर्णिक नावाच्या तरुणाशी परिचय झाला. त्याने एकदा गोवा-कारवार-जोग धबधबा अशा पर्यटनस्थळांची सहल आयोजित केली होती. एक मिनिबस ठरवली. त्यांतील काही जागा रिकाम्या राहिल्या म्हणून त्याने मला विचारले. सहल तीन दिवसांची होती. सगळी माहिती घेऊन मी हो म्हटले. पैसे भरले. नियोजित दिवशी सहल निघाली. सहलीला नऊ जोडपी आणि पाच एकटे (मी धरून) असे तेवीस पर्यटक सहभागी होते. सर्व तिशी-पंचविशीतील उत्साही तरुण मंडळी होती. पणजीला पोहोचेपर्यंत सर्वांची परस्परांशी ओळख झाली. समूह (ग्रुप) चांगला होता. प्रत्येक सहलीत मंदिरे, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांचा समावेश पर्यटन स्थळांत असतोच. आम्ही एका मंदिरात गेलो. देऊळ भव्य नव्हते तसेच फार पुरातनही नव्हते. सर्वांबरोबर मीही आत गेलो. मूर्ती संगमरवरी दगडाची होती. काळ्या दगडातील कोरीव शिल्प नव्हते. कोरीव शिल्पांची निरीक्षणे करणे मला आवडते. भाविकांनी मूर्तीला हात जोडले. नतमस्तक होऊन नमस्कार केला. पेटीत दान टाकले. प्रसाद घेतला. मी यातले काही केले नाही. सगळे पाहिले. इतरांसोबत प्रदक्षिणा घातली. बहुतेक सहप्रवाशांच्या हे लक्षात आले असावे. बसमध्ये बसल्यावर शेजारच्याने विचारले, " तुम्ही देवाला नमस्कार केला नाही. प्रसाद घेतला नाही. असे का ?" " मला तसे करावेसे वाटले नाही. कधीच वाटत नाही. म्हणून. " "कुठल्याच देवाला नमस्कार करीत नाही का ?" " हो. कुठल्याच देवाला नाही." थोडा वेळ शांततेत गेला. पुन्हा त्याने प्रश्न विचारला. " मग मंदिरात कसे आला ?" " तुमच्यासारखाच. बस मधून उतरलो. चालत चालत देवळात आलो." " तसे नव्हे. नास्तिक आहात तर मंदिरात का आला?" "नास्तिकांना देवळात यायला बंदी आहे का? तशी पाटी कुठे दिसली नाही. असो. गमतीने बोललो. मूर्तीचे शिल्प पाहायचे. दर्शनाला आलेले भाविक काय करतात. पुजारी काय करतात. काय बोलतात ते पाहायचे, ऐकायचे या हेतूने आलो. "नमस्कार न करणे हा अहंकार आहे असे वाटत नाही का ?" मी देवाला नमस्कार केला नाही हे त्याच्या मनाला थोडे लागले असावे. सगळ्यांनी देवाला नमस्कार करायलाच हवा असेही त्याला वाटत असावे. "नाही. यात अहंकाराचा प्रश्न नाही. निर्जीव मूर्तीला हात जोडणे मला असमंजसपणाचे वाटते म्हणून मी तसे करीत नाही. माणसांना नमस्कार करतो." " देवाला नाही आणि माणसांना का बरे?" "कारण नमस्कार केला हे देवाला समजत नाही. माणसांना समजते. त्यांना भावना असतात. त्या दुखावू नये असे मला वाटते. देवापुढे मी नतमस्तक झालो नाही. त्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर त्याला माझा निरुपाय आहे." "तुमच्याशी बोलण्यात कांही अर्थ नाही." सहप्रवासी थोडा रागावला. "जशी तुमची इच्छा" मी म्हणालो. थोडा वेळ आम्ही दोघे गप्प राहिलो. नंतर काही निमित्ताने मी दुसरा विषय काढला. परत गप्पा सुरू झाल्या. दुसर्‍या दिवशी आणखी एका मंदिराला भेट दिली. तिथे पहिल्याचीच पुनरावृत्ती झाली. मूर्ती वेगळी. ती अधिक रेखीव आणि सुबक होती. पुरोहित वेगळे. बाकी सगळे तेच. तिसरे मंदिर कारवारचे. ते मोठे सुप्रसिद्ध प्राचीन देवस्थान होते. तिथे कांही जणांनी देवाला अभिषेक केला. नंतर सर्वांनी (मी सोडून ) देवस्थानाला देणग्या दिल्या. एकूण तेरा पावत्या फाडल्या. आम्ही हॉटेलवर परतलो. ते जवळच होते. काही वेळाने देवस्थानाचा एक माणूस प्रसादाचे लाडू घेऊन हॉटेलवर आला. देणगी दिली नव्हती तरी मलासुद्धा लाडू आणला होता. मी नम्रपणे प्रसाद नाकारला. " क्षमा करा. मी कुठल्याच देवाचा प्रसाद घेत नाही." असे सांगितले. त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. मी नाकारलेला प्रसादाचा लाडू आणि पावती पुस्तक पिशवीत भरले. आणि तो तिथून निघाला. माझे वागणे सहपर्यटकांना आवडले नाही. एकाने तसे बोलूनही दाखवले. दुसर्‍या दिवशी सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. सगळे वेळी आले. बस चालू झाली. हवेत गारवा होता. वातावरण छान उत्साहवर्धक होते. अजून सूर्योदय व्हायचा होता. " ठरल्याप्रमाणे आपली सर्व ठिकाणे पाहून झाली. कुठे काही अडचण आली नाही. तुम्ही सर्वांनी चांगले सहकार्य दिले. सर्वांचे आभार." विजय कर्णिक म्हणाला. त्याने सहलीचे आयोजन केले होते. आपली जबाबदारी चांगल्या तर्‍हेने पार पाडली होती. "आपली ट्रिप छान झाली." कोणी तरी मनापासून आनंदाने, उत्स्फूर्तपणे बोलला. बसमध्ये सर्व तरुण मंडळी होती. सारेजण उत्साहात, आनंदात होते. हास्यविनोद चालले होते. सकाळचे अकरा वाजले असतील. एकदम धक्का बसल्यासारखे होऊन गाडीचे इंजिन बंद पडले. तेवढ्यात चलाखीने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. आणि ती थांबलीच. चालक(ड्रायव्हर ) आणि त्याचा मदतनीस खाली उतरले. काही ठाक-ठूक करू लागले. वीस मिनिटे गेली. बस चालू होईना. प्रवाशांचा उत्साह मावळला. अस्वस्थता, चुळबुळ सुरू झाली. एक बाई मला उद्देशून म्हणाल्या, "तुम्ही तो प्रसादाचा लाडू नाकारायला नको होता. प्रसाद ग्रहण न करण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला ठाऊक नाही काय? सत्यनारायणाची कथा तुम्ही कधी ऐकली नाही काय ?" " ती कथा लहानपणी अनेकदा ऐकली आहे. तसेच पोथीसुद्धा स्वत: वाचली आहे. सत्यनारायण पोथीतील सर्व कथा असत्य आहेत हे कॉमनसेन्स वापरला तर सहज लक्षात येते. अंगध्वज राजा, साधुवाणी-लीलावती-कलावती, असल्या कथा केवळ श्रद्धेनेच ऐकायच्या आणि मान डोलवायची का ? त्यांवर कधी विचार करायचाच नाही का ? आपल्या पूजेचा प्रसाद प्रत्येकाने ग्रहण केलाच पाहिजे. भक्षण केलाच पाहिजे . असा या देवाचा हट्ट का असावा ? कोणी प्रसाद घेतला नाही, खाल्ला नाही तर या देवाचा एवढा अपमान होतो ? की देवाने त्या प्रसाद न खाणार्‍याला मोठी शिक्षा द्यावी ? अंगध्वज राजाने प्रसाद घेतला नाही म्हणून त्याच्या पुत्रांना मारायचे ? हा देवाघरचा न्याय का ? देव इतका सूडकरी कसा ? एवढ्या क्षुद्र मनाचा कसा ? या व्रताविषयी खूप काही सांगण्यासारखे आहे. पण नको. वेळ जाईल." " आता गाडी मार्गीं लागेपर्यंत वेळ घालवायलाच हवा." एक प्रवासी बोलला. "ठीक आहे. ऐकणार असाल तर थोडे सांगतो. सत्यनारायण पोथीच्या प्रत्येक अध्यायाशेवटी -इति श्री स्कंद पुराणे रेवा खंडे...-असे लिहिले आहे. पण ही पुराणकथा नाही. शिवकालीन कागदपत्रांत या व्रताचा कुठेही उल्लेख नाही. छत्रपतींना असली व्रत-वैकल्ये करण्यास वेळच नव्हता म्हणा! नंतरचे पेशवे तर मोठे देवभक्त होते. पण पेशवेकालीन कागदपत्रांतही या व्रताचे नाव कुठे नाही. बंगालमधील मुसलमानांच्या साचापीर उत्सवावरून हे सत्यनारायण व्रत इ.स. १८८०च्या सुमारास इकडे आले. याविषयी इतिहासकारांचे एकमत आहे. सध्या बंगाल आणि महाराष्ट्र या दोनच राज्यात सत्यनारायण पूजा करतात. हे व्रत पौराणिक असते तर उत्तर भारतात रूढ झाले असते. तसेच विष्णुसहस्रनामात सत्यनारायण हे नाव नाही. " "आम्ही हे कधी कुठे वाचले नाही की ऐकले नाही." कांही पर्यटक म्हणाले. "खरे तर हा इतिहास ठाऊक नसला तरी ही कथा ऐकताना , एवढे कशाला -जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा-ही आरती ऐकताना अर्थ समजून घेतला (भाषा सोपी आहे. अर्थ सरळ आहे.) तरी अथ ते इति सगळे असत्य आहे हे आपल्यासारख्यांना सहज कळू शकते. पण मन श्रद्धेने लिप्त झाले की बुद्धी चालेनाशी होते. श्रद्धा ही मनोभावना आहे. भावनेवर बुद्धीचे नियंत्रण असेल तरच सत्य कळू शकते." " ठीक आहे. पण प्रसाद नाकारायचा कशाला ? तुम्ही देणगी दिली नव्हती तरी त्याने तुमच्यासाठी अगत्याने प्रसाद आणला होता." माझ्या शेजारी बसणारा बोलला. " त्याच्या हातात पावतीपुस्तक होते. मी पावती फाडावी अशी त्याची अपेक्षा असणार. ते असो. मी प्रसाद नाकारला. म्हणजे समजा मी पाप केले. तर देवाने मला एकट्याला काय ती शिक्षा करावी ना! तुम्ही सर्वांनी भक्तिभावाने देवदर्शन घेऊन, प्रसाद ग्रहण करून, देवस्थानाला देणग्या देऊन पुण्यकृत्ये केली ना? मग बस बंद का पडली ? तुमच्या सगळ्यांच्या पुण्याच्या प्रभावापेक्षा माझ्या एकट्याच्या पापाचा प्रभाव मोठा कसा ?" " सुक्याबरोबर ओलेही जळते." एका बाईने म्हणीचा उल्लेख केला. " " ही म्हण दैवी कृत्यांसाठी लागू नाही. भक्त प्रह्लादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले. तरी ती उष्णता त्याला भाजू शकली नाही,अशी कथा आहे. देव सर्वसमर्थ आहे. तो मला एकट्याला सहज शिक्षा करू शकला असता. ज्या तोंडाने मी प्रसाद नाकारला ती वाचा बंद पडावी. जे हात मी देवापुढे जोडले नाहीत ते लुळे पडावे. जी वाकवून मी नतमस्तक झालो नाही ती मान लट-लट कंप पावावी. असे काही करणे त्याला शक्य नव्हते काय ? मग माझ्या पापासाठी बस बंद पाडून तुम्हा सर्व पुण्यवंतांचा खोळंबा कशाला केला ?" " अहो, असं काय बोलता तुम्ही हे ? तुमचे हातपाय खरेच लुळे पडले तर कोण बघणार तुमच्याकडे? असे बोलू नये. शुभ बोलावे." एक बाई भीतीयुक्त आश्चर्याने म्हणाल्या. " चिंता नसावी. बोललो ते खरे आहे. बोलून काही होत नाही. माणसे उगीच देवाला घाबरतात. मला वाटते या दहशतीपोटी ते देवापुढे नतमस्तक होतात.पेटीत दान टाकतात. खरे तर तो कुणाचे काही करीत नाही. अहो, देवाच्या अंगावरचे दागिने, डोक्यावरचा मुकुट पळविणार्‍या चोराला तो काही करत नाही. देवावर घाव घालायला आलेल्या मूर्तिभंजकाचा तो हात धरत नाही. तो मला कशाला शिक्षा करील ? मी त्याचे काहीच केलेले नाही." मी उत्तरलो. " आढीतील एक आंबा नासला की बाकी सगळे आंबे नासतात." मघाच्या म्हणवाल्या बाई पुन्हा म्हणाल्या. बहुदा त्या कुठल्यातरी प्रशालेत मराठीच्या शिक्षिका असाव्या. " आपणा तेवीस जणांत मी एकटाच नास्तिक म्हणून नासका आंबा हे मान्य. पण नासक्या आंब्यातील जंतूंचा संसर्ग आढीतील इतर आंब्यांना होतो (साथीच्या रोगासारखा) म्हणून ते नासतात. माझ्या नास्तिक विचारांचा परिणाम तुम्हा बावीस आस्तिकांतील एकावर तरी झाला आहे का ? कुणाची देवावरील श्रद्धा किंचित् तरी ढळली आहे का ? नास्तिक विचारांविषयी कुणाशीही बोललो नाही. तसा बोलतो आहे तो हा आत्ता. बस बंद पडल्यावर. त्यामुळे आढीतील नासक्या आंब्याची म्हण इथे अप्रस्तुत आहे." "पण तुम्हाला बरोबर घ्यायला नको होते हे खरे." कुणीतरी हळू आवाजात बोलले. पण सार्‍यांना ऐकू आले असावे. "तसे म्हणा हवे तर. पण सीट रिकामी असल्याने कर्णिकांनी मला बोलावले. मी त्वरित पैसे भरले. त्यांनी सांगितलेल्या सीटवर बसलो. कुठे कसली तक्रार नाही. गैरवर्तन तर नाहीच नाही. सहलीचे वेळापत्रक पाळले. सर्वांबरोबर मंदिरांत आलो. तिथे जे पटले नाही, करावेसे वाटले नाही ते केले नाही हे खरे. पण कुणाला त्रास होईल असे कधीही वागलो नाही. इतरांचा कधी खोळंबा केला नाही." " पण आता इतका वेळ झाला ना?" कुणीतरी बोलला. " ठीक आहे. माझ्यामुळे हा खोळंबा झाला म्हणा. तुम्हांला बरे वाटावे म्हणून सगळा दोष माझ्यावर घेतो. पण --स्वत:च्या गाडीतून देवदर्शनाला आलेल्या भाविकांचा मोटर अपघातात दुर्दैवी मृत्यू.--अशा बातम्या अनेकदां छापून येतात. त्या अपघातग्रस्त गाड्यांतील सर्वजण १००% श्रद्धाळू भाविक असतात. तरी असे जीवघेणे अपघात का घडतात ? देव आपल्या भक्तांना अपघातातून वाचवू शकत नाही काय? बस बंद पडली या घटनेशी बसमध्ये कोण प्रवासी आहेत, त्यांची विचारसरणी काय आहे, वागणूक कशी आहे इ.गोष्टींचा काहीही संबंध असूच शकत नाही. गाडीच्या कांही भागांतील दोष, देखभालीतील चाल-ढकल, चूक, दक्षतेचा अभाव, रस्त्यातील खड्डे, इंधनातील भेसळ, असले कसले तरी कारण असू शकते. कार्य-कारणभाव समजून घ्यायला हवा. " "गप्प बसा. खूप ऐकले तुमचे." कुणीतरी त्राग्याने बोलले. " ठीक आहे. गप्प बसतो. पण तत्पूर्वी तीन वाक्ये बोलतो. मी बोललो ते प्रत्येक विधान सत्य आहे. सत्याचा स्वीकार करणे माणसाच्या हिताचे असते. प्रत्येकाने स्वबुद्धीने विचार करावा." गाडीत अस्वस्थ शांतता पसरली. थोड्या वेळाने इंजिनाचा आवाज आल्यासारखे वाटले. सर्वांनी कान टवकारले. कांही क्षणांत बस चालू झाली. बंद पडलेली गाडी दीड तासाच्या खटपटीनंतर मार्गी लागली. वेग घेतला. पुढचा प्रवास चालू झाला. प्रवाशांची मरगळ गेली. बसमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. सगळे जण मागचे सारे विसरले. हास्यविनोद झडू लागले. मी डोळे मिटून विचारमग्न झालो. वाटले या प्रसंगाच्या निमित्ताने मी जे कांही बोललो त्यावर कोणीतरी, काही थोडातरी विचार करील का? कुठेतरी ठिणगी पडेल का ? कुणाचे विचारचक्र चालू होईल का? मला वाटले हो. काहीतरी सकारात्मक घडेल. आपण बुद्धिवादी विचारांची बीजपेरणी करीत राहावे. ते बीज कुठेतरी मूळ धरील. माणसाने आशावादी असावे. .................................................................................
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
107591 वाचन

💬 प्रतिसाद (421)
प
प्रकाश घाटपांडे Sat, 12/19/2015 - 04:07 नवीन
जत्रेत जसे हौशे गवशे नवशे असतात तसेच देवळात जाणारेही असू शकतात एवढाच मुद्दा आहे तो. ते तुम्हाला पटेल असे सिद्ध करण्याची बौद्धीक क्षमता माझ्यात नाही. त्या माझ्या मर्यादा समजाव्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Sat, 12/19/2015 - 06:37 नवीन
>>>>> ते तुम्हाला पटेल असे सिद्ध करण्याची बौद्धीक क्षमता माझ्यात नाही. अहो घाटपांडे साहेब, भलतेच काय? तुम्हाला काय मी आज ओळखतो का? तुमचे अनेक लेख/प्रतिसाद वाचले आहेत मला पटले आहेत. ज्योतिष, अंधश्रद्धा ह्यावरील तुमच्या अभ्यासपूर्ण लेखनाचा मी चाहता आहे. मला लाज वाटेल अशी वाक्ये पेरू नका. मनाला क्लेष होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Sat, 12/19/2015 - 07:54 नवीन
:) अहो हल्ली टंकलेखनाचा त्रास होतो व या विषयाच्या मंत्रचळाची भीती वाटते म्हणून मी असे विषय टाळण्याचा प्रयत्न करत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 12/16/2015 - 08:40 नवीन
प्रतिसादात वापरलेली भाषा अत्यंत चुकीची आहे. त्याकरता, मनःपुर्वक निषेध व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
म
मराठी कथालेखक Wed, 12/16/2015 - 08:48 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
अ
अजया Wed, 12/16/2015 - 14:15 नवीन
+१ संयत प्रतिसाद दिला तरी आपले म्हणणे मांडता येईलच.प्रत्येक वेळी कोणाच्या तरी अंगावर धावुन गेल्यासारखे प्रतिसाद दिले की आपले म्हणणे खरे ठरते असे वाटते का तुडतुडी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
त
तुडतुडी Wed, 12/16/2015 - 07:41 नवीन
नावाला हे कठोर नास्तिक म्हणून बुद्धीवादी वर्तुळात प्रसिद्ध आहेत.
म्हणजे आस्तिक निर्बुद्ध असतात ? खिक . ह्यालाच माज म्हणतात . जितकी बुद्धी जास्त तितका माज, अहंकार , दुसर्याला तुछ लेखण्याची वृत्ती जास्त असा ह्याचा अर्थ असेल तर अश्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडी
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Wed, 12/16/2015 - 15:44 नवीन
नास्तिकाने आपण नास्तिक असल्याची जाहिरात का करावी? आस्तिक करतो म्हणुन? जगाचे लक्ष वेधावे म्हणुन? ताई, सयंमी प्रतिसाद हवा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
म
मराठे Wed, 12/16/2015 - 18:23 नवीन
कशाला स्वतःला निर्बुद्ध म्हणताय? बाकिचे आहेत ना म्हणायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
प
प्रसाद१९७१ Wed, 12/16/2015 - 07:48 नवीन
नास्तिकाने देवाबद्दल जे प्रश्न पडतात (आणि ज्यामुळेच त्याला नास्तिकता जास्त सुसंगत पर्याय वाटत असतो) ते विचारले तर तो आस्तिकांना देवाचा अपमान का वाटतो? देवाच्या अस्तित्वावर शंका उपस्थित करायला नक्की काय हरकत आहे?
नास्तिकाने दुसर्‍या नास्तिकाशी हे प्रश्न विचारुन चर्चा करावी. आस्तिकालाच हा प्रश्न विचारायला का जावे? आस्तिक आमंत्रण करतोय का ही माझ्या विचारांची चिकित्सा करा म्हणुन? एक उदाहरण गे लोकांनी त्यांना गे संबंध ठेवायचे असतील तर ठेवावेत, पण स्ट्रेट लोकांना तुमचे संबंध कसे चुकीचे आहेत हे का सांगावे. हेच उदाहरण तुम्ही उलटे करुन पण वापरु शकता. प्रश्न इतकाच आहे की नास्तिकांना दुसर्‍यांची मतांची चिकीत्सा त्यांच्या बरोबर च ( हे महत्वाचे आहे ) करण्याची परवानगी कोणी दिली. काय हवे ते नास्तिक क्लब काढावेत आणि यथेच्छ चिकीत्सा करावी आपापसात.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 12/16/2015 - 08:26 नवीन
नास्तिकाने दुसर्‍या नास्तिकाशी हे प्रश्न विचारुन चर्चा करावी. आस्तिकालाच हा प्रश्न विचारायला का जावे? आस्तिक आमंत्रण करतोय का ही माझ्या विचारांची चिकित्सा करा म्हणुन?
मला वाटतंय पहिली खोड अनेकदा असिकच काढतात , सहसा हा संवाद (की वाद ?) "तुम्ही मंदिराच्या आत का येत नाहीत ?" असा सुरु होतो. "मी नास्तिक आहे" इतक्या छोट्या आणि स्पष्ट उत्तराने त्यांचे समाधान होत नाही. मग "कधीच जात नाही का ? कुठेच श्रध्दा ठेवत नाही का ? कुठेतरी ठेवायला हवी" ई ई पुराण चालू होते. मग इतके आमंत्रण दिल्यावर नास्तिक कशाला माघार घेतोय ... वरील लेखातही "तुम्ही प्रसाद का घेत नाही" म्हणत अस्तिकानेच सुरुवात केली. भक्तिभावाने दर्शन घेतानाही त्यांचे लक्ष बाजूचा काय करतोय याकडे होतेच..आणि तो चुकीचा वागत असेल तरी देव काय ते पाहून घेईल असा विश्वास पण नाही म्हणून स्वतःच मैदानात उतरला ...असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 12/16/2015 - 08:36 नवीन
आता इतका वादविवाद झाला, आणि आपापला प्रतिसाद तर्कावर आधारलेला आहे असा बहुतेक सर्व प्रतिसादकांचा प्रामाणिक दावा असणारच... आणि म्हणुनच एक शास्त्रिय व सारासारवादी प्रश्न उपस्थित करणे आवश्यक वाटते. तो असा... ( ;) ) लेखक स्वघोषित आणि इतरांनाही पूर्वीपासून माहीत असलेले नास्तिक आहेत. त्यांनी आपले (पक्षी नास्तिकाचे) म्हणणे या लेखात लिहीलेले आहे. पण, आस्तिक काय म्हणाले हे पण त्यांनीच लिहीले आहे. म्हणजे दोन्ही बाजू एकाच बाजूच्या व्यक्तीने लिहील्या आहेत. म्हणजे केवळ हा लेख इतके मटेरियल शास्त्रिय व सारासारवादी वादविवादासाठी पुरेसे नाही. कारण, संभाषणातील एखादा शब्द लेख लिहिताना इकडे-तिकडे झाला (?केला) असला तर संपूर्ण वाक्याचा अर्थ बदलू शकतो. अर्थात, यनावालांना त्यांचा मुद्दा खरोखरच सिद्ध करायचा असेल तर त्यांनी त्या प्रसंगातल्या इतर लोकांपैकी कोणा एक/अनेकांना तोच प्रसंग त्यांच्या शब्दात लिहायला सांगितला पाहिजे. अन्यथा हे त्या प्रसंगाचे एकांगी आणि म्हणून शास्त्रिय वादाला योग्य नसलेले वर्णन होईल... किंवा साध्या मराठीत, "बाजारात तुरी...." सारखे ! बोला, यनावाला सर, काय म्हणता ?
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 12/16/2015 - 09:15 नवीन
मुददा अगदी बरोबर आहे. त्याअर्थी लेख एकतर्फी आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
ट्रेड मार्क Wed, 12/16/2015 - 22:59 नवीन
यनावालांसारख्या बुद्धिवादी माणसाला असं कसं वाटलं की मिपा वरची मंडळी पुरावा दिल्याशिवाय आपलं म्हणणं मान्य करतील? पण आश्चर्याची गोष्ट अशी की बाकीच्या नास्तिक बुद्धिवादी लोकांनी पुरावा मागितलाच नाही. गम्मत आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 12/17/2015 - 05:31 नवीन
आस्तिक काय म्हणाले हे पण त्यांनीच लिहीले आहे. म्हणजे दोन्ही बाजू एकाच बाजूच्या व्यक्तीने लिहील्या आहेत
+११११११११. अगदी सहमत. मी पण हेच मत वर माडले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 12/17/2015 - 15:12 नवीन
डॉक्टर साहेब, मिपावर जेव्हढे म्हणून स्वानुभव कथन आहे (मिपाचे कट्टे वगळता) ते सर्व त्या त्या सदस्याच्या शब्दातच आले आहे. (जिथे जिथे आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ कांही लिंक देणं शक्य असतं ते वगळता) म्हणजे एकतर्फीच आहे. तिथे तिथे आपण मुद्देसुद वाद घातले आहेतच. आत्ताच इथे वेगळा न्याय का? हाच मुद्दा पुढे न्यायचा म्हंटल्यास त्या घटनेत कोणी मिपाकर (आस्तिक मिपाकर) नव्हते मग अशा वेळी अनुभव शेअर करायचा असेल तर मिपाकराने काय करावे? एक मार्ग म्हणजे, मिपाकराने सर्व संभाषण रेकॉर्ड करून यूट्यूबवर टाकून इथे लिंक दिली पाहिजे. अशी अट सध्यातरी अस्तित्वात नाही. हे कोर्ट नाही. मित्रमंडळींचे चर्चास्थान आहे. त्यामुळे धागाकर्त्याने कथन केलेला प्रसंग तसाच असणार ह्या गृहितकावरच आजपर्यंतच्या सर्व चर्चा, काथ्याकुट आधारीत आहेत. यनावाला ह्यांच्यासाठी वेगळा न्याय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/18/2015 - 09:11 नवीन
पेठकर साहेब, आपल्याबरोबर चर्चा करण्या मजा येते, आपल्या विचारांचा आदर आहे आणि ते आवडतात हे काही पहिल्यांदा सांगत आहे असे नाही. म्हणूनच केवळ गैरसमज टाळण्यासाठी हा प्रतिसाद लिहिला आहे... आणि तो या लेखाशी संबंधित असल्याने, सगळ्यांसाठीही आहे, त्यामुळे इथेच लिहिला आहे. प्रथम म्हणजे मी आस्तिक किंवा नास्तिक यांची कोणाचीच बाजू घेत नाही. कारण मी दोन्ही नाही तर "अज्ञेयवादी" आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंचे विचार ऐकण्यात मला रस असतो... कारण "देव आहे की नाही ?" हा अनादी प्रश्न अजून अनुत्तरीत आहे आणि कोणाकडूनही काही ज्ञानवर्धन झाले तर ते मला हवेच आहे. मात्र एक गोष्ट नक्की की, देव म्हणजे कोणी "हिशेब ठेवून त्याप्रमाणे शासन अथवा प्रमोशन देणारी यंत्रणा किंवा लालूच दाखवून (नवस, इ) आपले काम करवून घेऊ शकतो अशी यंत्रणा" नाही. देवाच्या नावाखाली जे रुढी-प्रथांचे अवडंबर बनवले गेले आहे त्यात माझा अजिबात विश्वास नाही, ती मानवी स्वभावाचा फायदा घेऊन स्वतःचे हितसंबंध साधण्यासाठी केलेली मानवी व्यवस्था आहे असे मी मानतो. परंतू त्यामुळे इतरांना त्रास न देता कोणाला मानसिक समाधान मिळत असेल तर त्याला माझी ना नाही, किंबहुना अश्या प्रकारात नमस्कार करून प्रसाद खाण्यास व त्या माणसाचे समाधान वाढवण्यात माझी ना नसते. असो. इतक्या जरूर असलेल्या प्रस्तावनेनंतर मुख्य मुद्द्यावर वळूया... लेखकने धागा मुद्दा समंजसपणे आणि शास्त्रिय पद्धतिने विचार करून लिहिला आहे असा आभास निर्माण केला आहे असे म्हणायला वाव आहे. ते का ? तर त्याची कारणे अशी आहेतः १. बाविस नास्तिक व एक आस्तिक (लेखक) यांचे हे संभाषण आहे. यात एक नास्तिक (लेखक) सगळे अगदी समंजसपणे, एकही चुकीचा शब्द न वापरता बोलतो आहे. हे सगळे एकतर लिहून काढलेल्या वाक्यांचे पाठांतर करून (उदा: नाटकातले उतारे) अथवा अगदी उत्तम प्रतीच्या वादविवादपटूच्या तोंडून नैसर्गिकपणे वेचक वाक्ये यावी तसे वाटते. इथल्या वादासाठी व लेखकावर अन्याय नको म्हणून आपण त्याच्यामध्ये दुसर्‍या प्रकारचे कसब आहे असा संशयाचा फायदा त्याला देऊया. २. मात्र, एकूण २२ आस्तिकांपैकी बोलणारे सगळेच असमंजस आणि असहिष्णू बोलत आहेत, एकाही आस्तिकाला "प्रत्येकाला आचार-विचाराचे व त्याप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य आहे" असे किंवा तत्सम बोलल्याचे लेखात लिहिलेले नाही. बावीस आस्तिकांत एकही समंजस, समतोल आणि सहिष्णू व्यक्ती नसावी आणि असल्यास तिने एकही समंजस शब्द उच्चारू नये, हे काही पचनी पडत नाही, बुवा ! आणि मग लेखनाला एकांगी म्हटले तर फारसे वावगे होणार नाही... आणि म्हणूनच मी "लेख विश्वासू होण्यासाठी" आस्तिकांची बाजू त्यांच्यापैकी कोणीतरी मांडायला पाहिजे असे म्हटले होते. ३. इतर २२ जणांत एखादा नास्तिक असू शकतो. तशी स्पष्ट विचारणा केल्याचे लेखकाने लिहिले नाही. तर मग तो नव्हताच हे गृहितक समंजस व शास्त्रिय विचार करणार्‍या लेखकाने लेखाच्या शीर्षकात लिहिण्याइतके महत्वाचे का मानले? हा प्रश्नही उरतोच ! थोडक्यात, लेख एकांगी आणि काही विशिष्ट हेतूने लिहिलेला आहे असे म्हणण्याला वाव आहे... त्याची खालील इतर काही कारणे यनावालांच्या या व इतर धाग्यांवरील (माझ्या नव्हे, इतरांच्या) प्रतिसादांत नोंदलेली आढळतील : १. यनावाला धागा/काडी टाकून गायब होतात. २. फारतर कोणाच्यातरी फक्त त्यांच्या बाजूच्या एखाद्या मुद्द्याची वाहवा करतात व विरोधी मुद्द्यांकडे सरळ सरळ दुर्लक्ष करतात. ३. स्वतःच्या विधानांचे स्पष्टीकरण करण्याकडे त्यांचे तितकेसे लक्ष दिसत नाही. उलट इतरांमध्ये होणार्‍या उलटसुलट वादविवादाची मजा बघण्यात त्यांना जास्त मजा येते असे वरील मुद्दा २ मधील कृतीतून दिसते असे म्हणायला वाव आहे. यनावालांचे धागे व प्रतिसांद डोळ्याखालून घातले तर वरच्या निरिक्षणांमध्ये अर्थ आहे असे दिसते. आता माझा प्रतिसाद वरच्या पार्श्वभूमीवर बघितलात तर तुमच्या ध्यानात येईल की माझा प्रतिसाद तुमच्यासाठी किंवा तुमच्यासारख्या इतर समंजस व समतोल प्रतिसादकांसाठी नव्हता, तर परखड शास्त्रिय भूमिका मांडण्याचा आभास निर्माण करण्यार्‍या लेखनासंबंधी, परखड शास्त्रिय भूमिका कशी असावी याबाबतचे सामान्य नियम सांगणारा प्रतिसाद होता. लेखाच्या लेखकाला जर हे निरिक्षण मान्य नसेल तर त्याची बाजू वाचायला नक्कीच आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/18/2015 - 09:47 नवीन
"पीडीत मानसिकतेचा (व्हिक्टीम मेंटॅलिटीचा) तडका मारलेला, समतोलपणा-समंजसतेचा आभास निर्माण करता येणे", हे राजकारणात अत्यंत उपयोगी हत्यार समजले जाते... आणि ते बर्‍याचदा दोन गटांना एकमेकांशी खेळवून स्वतःचा फायदा साधणे आणि / अथवा गंमत बघणे यासाठी यशस्वीपणे वापरले जाते :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रभाकर पेठकर Sat, 12/19/2015 - 06:29 नवीन
डॉक्टर साहेब, श्री. यनावाला ह्यांचे ह्या आधीचे लेखन मी वाचलेले नाही. मी सद्य लेखातील शब्द नाही, तर मुद्दा लक्षात घेऊन त्यावर मी माझे भाष्य केले आहे. जसे हिंदीत वाक्प्रचार आहे, 'बाल की खाल निकालना' तसा प्रकार खुपशा प्रतिसादांंमध्ये दिसून येतो. मूळ मुद्दा बाजूला ठेवून लाडू का खाल्ला नाही, देणगी न देता लाडूचे मुल्य देऊन तो प्रसाद न समजता लाडू (पक्षी: मिठाई) म्हणून का नाही खाल्ला वगैरे वगैरे मुद्द्यांवर भर दिला जाऊन चर्चा भरकटविण्याचे यशस्वी प्रयत्न दिसून येतात तेंव्हा एक मिपाप्रेमी म्हणून वाईट वाटतं. तुम्ही म्हणता की आजवरचा श्री यनावाला ह्यांच्या बाबतचा अनुभव असा आहे की, 'त्याना हवे असतील ते मुद्दे मिपावर मांडून एकतर गायब होतात आणि फक्त निवडक मुद्द्यांना (जे त्यांच्या बाजूचे आणि सोयिस्कर असतात) उत्तरे देतात.' असे असेल तर नक्कीच अत्यंत चुकीचे आहे. श्री यनावाला ह्यांनी चर्चेला तोंड फोडले आहे त्यांनी त्यांच्या मुद्द्याच्या विरोधातील प्रतिसादांना देखिल उत्तरे देऊन आपली भूमिका विस्तृत आणि तपशिलवार मांडावी अशी मी त्यांना ह्या प्रतिसादाद्वारे विनंती करेन. तुमचा एक मुद्दा आहे, त्यामुळे इतरांना त्रास न देता कोणाला मानसिक समाधान मिळत असेल तर त्याला माझी ना नाही ह्यात कोणा एका वक्तीला त्रास होतो अशातला भाग नाही तर ह्यातून अव्यवहार्य कर्मकांडाचे महत्व वाढील लागून आख्या समाजाच्या वर्तनावर परिणाम होतो असे मला वाटते. आजूबाजूची माणसे नवस बोलतात, नैवेद्य ठेवतात, देणग्या देतात, तिर्थस्थानांना भेटी देतात, जुलूस काढतात वगैरे वगैरे पाहून हे आज पर्यंत न केलेला माणुसही करायला सुरुवात करतो. आणि आपल्या कर्मावर, कृतीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी देवाच्या कृपेवर अवलंबून राहायला शिकतो, हातावर हात ठेवून अनुकुल घटना घडतील अशी निष्क्रिय विचारसरणी अवलंबितो. सती प्रथा का बंद केली गेली? हुंडा विरोधी चळवळ चालविण्यामागे काय हेतू आहे, हे लक्षात घ्यावे. जीला सती जायचे आहे तिला जाऊ द्यावे, किंवा ज्यांना ज्यांना हुंडा देणे परवडते त्यांना देऊ द्यावा. इतरांनी त्यावर आपली मते लादू नयेत असे म्हणणे सयुक्तिक होईल का? हे भोळ्या देवधर्मालाही लागू होते. आस्तिकता, नैवेद्य, देणग्या ह्याचा तुम्हा-आम्हाला थेट त्रास होत नसला तरी गरीब, भोळ्या जनतेवर ह्याचा खोलवर पारिणाम होतच असतो. कुठल्याही संकटाला तोंड देण्याचे मानसिक बळच ते हरवून बसतात. देवाला संकट निवारण्यासाठी कामाला लावले (नवस, नैवेद्या मार्फत) की आपण कांही करण्याची गरजच नाही विचारसरणी रुजत जाते. कांही जणांच्या कांही ठोस मागण्या असत नसतीलही पण ' हे देवा माझ्यावर कृपादृष्टी असू दे रे बाबा!' ही सर्वसामान्य मागणी असतेच. कोणी म्हणेल सती आणि हुंडा ह्या सारख्या अनिष्ट चालींशी देवधर्माशी तुलना चुकीची आहे. पण मला वाटते ही आस्तिकता, नवस, नैवेद्य, तिर्थक्षेत्रे आदींमुळे समाजाला 'स्लो पॉईझनींग' होत रहाते. समाजाची कृतीशिलता नष्ट पावत राहते. प्रयत्नवाद मागे पडतो. पर्यायाने समाज, प्रदेश आणि देश मागे पडतो. पुन्हा सांगतो, श्रद्धा जरूर असावी. ती तुमच्या घरापुरती सिमित असावी. सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर देवापुढे दिवा लावणे, एखादे स्तोत्र म्हणावे, एखादी आरती करावी किंवा शांत बसून नामस्मरण करावे आणि देवाने मला आवश्यक ती शक्ती बहाल केली आहे ह्या विचाराने, आत्मविश्वासाने दिवसाला सुरुवात करून, आपल्या समस्या आपणच सोडविण्यासाठी १००% प्रयत्नशील असावे. बस, ह्याहून जास्त देवधर्म करण्याची, व्यक्तीशः मला तरी आवश्यकता भासत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/19/2015 - 09:13 नवीन
तुमचा एक मुद्दा आहे, त्यामुळे इतरांना त्रास न देता कोणाला मानसिक समाधान मिळत असेल तर त्याला माझी ना नाही ह्यात कोणा एका वक्तीला त्रास होतो अशातला भाग नाही तर ह्यातून अव्यवहार्य कर्मकांडाचे महत्व वाढील लागून आख्या समाजाच्या वर्तनावर परिणाम होतो असे मला वाटते. मानवी मनाची जडणघडणच अशी आहे की बहुसंख्य माणसांना स्वबळावर स्वतंत्रपणे परखड आचारविचार जमत नाही. त्यांना कोणा ना कोणाचा कमीजास्त प्रमाणात मानसिक आधार लागतो. यामुळेच धर्मापासून राजकारणापर्यंत नेते तयार होतात व लोक त्यांच्या मागे कधी डोळसपणे, तर बहुदा अंधपणे जाते. ही जीवशास्त्रीय वस्तूस्थिती आहे. आता माझ्या मताने सामान्य जीवनातली वस्तूस्थिती : या जगात पूर्ण पांढरे किंवा पूर्ण काळे असे काहीच नाही... सगळ्या करड्या रंगाच्या छटा आहेत. तेव्हा एका टोका-वर/-जवळ असलेल्या माणसाने दुसर्‍या टोका-वर/-जवळ असलेल्या माणसाचे काही एका ठराविक सीमेपर्यंत मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न जरूर करावा. पण त्या सीमेपलिकडे अश्या प्रयत्नांचा परिणाम हवा त्यापेक्षा उलटा होऊन टाळू शकणारी त्रासदायक / दुखःद परिस्थिती अथवा संघर्ष निर्माण होतो. अश्या वेळेस माझ्या वर म्हटल्याप्रमाणे, "इतरांना त्रास न देता कोणाला मानसिक समाधान मिळत असेल तर त्याला माझी ना नाही, किंबहुना अश्या प्रकारात नमस्कार करून प्रसाद खाण्यास व त्या माणसाचे समाधान वाढवण्यात माझी ना नसते." अश्या सगळ्या माणसांपासून माझी वरच्या प्रतिसादात लिहिलेली मते लपलेली नसतात... किंबहुना मी ती स्पष्टपणे सांगितलेली असतात. हे जग विविधतेने भरलेले आहे आणि काही थोडे अतिरेकी अपवाद सोडल्यास ही विविधताच जग जास्त सुंदर, मनोरंजक व आनंददायक बनवते. सर्वच बाबतीत सगळे जग माझ्यासारखेच वागले पाहिजे नाहीतर ते माझ्या जीवनाचा भाग होऊ शकत नाही (याला इंग्लिश्मध्ये सुंदर चपखल वचन आहे : माय वे ऑर हाय वे.) हे म्हणणे मला ठीक वाटत नाही. असे करणे अतिरेकी / ऑटोक्रॅटीक / कम्युनिस्ट व्यवस्थेचे लक्षण आहे. नव्या पिढीचा कर्मकांडांसंबंधी विचार/कृती पाहिली तर त्यांचे महत्व काळाबरोबर कमी होईल असेच दिसते... जसे मागच्या पिढीच्या तुलनेत आपल्या पिढीत झाले आहे. शिवाय आधुनिक काळातल्या वाढत जाण्यार्‍या धकाधकीत निरुपयोगी प्रथा-कर्मकांडे कमी कमी होत जातील असेच दिसते. काही गोष्टींना थोडा वेळ देणे जास्त श्रेयस्कर होईल असे वाटते. प्रत्येक कृती करण्यात वा न करण्यात फायदा आणि तोटा असतोच... त्यांचे तौलनिक प्रमाण पाहून ते फायदेशीर असल्यासच ती कृती करावी अथवा न करावी असे मला वाटते. मानवी इतिहास पाहिला असती हेच दिसते की सतत जुन्या प्रथा-कर्मकांडे जाऊन त्यांची जागा नवीन प्रथा-कर्मकांडे घेत असतात... ज्या काळात सामाजिक-मानसशास्त्रियदृष्ट्या लोकांना जरूर वाटते व परवडते ते टिकते, नाहीतर ते नष्ट होते व त्याची जागा नवीन काहीतरी घेते. कारण, मानसशास्त्रिय/वैचारीक/तात्वीक निर्वात अवस्थेत (आयडियालॉजिकल व्हॅक्क्युम) माणूस आनंदी/खुशाल राहू शकत नाही. जसे सर्व १००% मानवांची शरीरे (उंची, वजन, आरोग्य, इ बाबतीत), १००% वेळेस, १००% एकसारखी नसतात, तसेच मनाचे आहे. अर्थातच, वास्तव जीवनात छोटे-मोठे विसंवाद अपेक्षितच आहेत... जोपर्यंत हे विसंवाद धोकादायक किंवा असह्य नसतात, तोपर्यंत त्यांना शल्यचिकित्सेची गरज नसते, सुसंवादाने त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करावा, तेही न जमल्यास "असहमतीवर सहमती (अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री)" या तत्वावर आनंदी सहजीवन शक्य असते; असे माझे मत आहे. वरच्या कृतीने ; (अ) आजचे आनंदी सहजीवन (जगा आणि जगू द्या) शक्य होईल, (आ) मी माझी मते स्पष्टपणे सांगत असल्याने, आत्ता कर्मकांडांवर विश्वास ठेवणार्‍यांचे भविष्यात मतपरिवर्तन होण्याची शक्यता असते... याउलट संघर्षाचा परिणाम अहं (इगो) दुखावून माणूस मूळ मतांशी (चूकीची असली तरी) जास्त घट्ट चिकटण्याची शक्यता वाढते. हा प्रतिसाद जरा मोठा झाला. पण माझा निर्णय केवळ "सोपी तडजोड" म्हणून केलेला नसून त्यामागे मला पटलेला काही विचार आहे हे सांगण्यासाठीच हा खटाटोप केलेला आहे. मुख्य म्हणजे : लेखकाने इतर काही सोईस्कर प्रतिसादावर मतप्रदर्शन केले आहे. पण, माझ्या प्रतिसादात मांडलेल्या मुद्यांकडे दुर्लक्ष केले आहे (जे इतरांच्या अगोदरच्या प्रतिसादांप्रमाणे अपेक्षित होते). याचा अर्थ माझे मुद्दे लेखकाला मान्य आहेत असे वाटते आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Sat, 12/19/2015 - 21:44 नवीन
>>>>तेव्हा एका टोका-वर/-जवळ असलेल्या माणसाने दुसर्‍या टोका-वर/-जवळ असलेल्या माणसाचे काही एका ठराविक सीमेपर्यंत मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न जरूर करावा. पण त्या सीमेपलिकडे अश्या प्रयत्नांचा परिणाम हवा त्यापेक्षा उलटा होऊन टाळू शकणारी त्रासदायक / दुखःद परिस्थिती अथवा संघर्ष निर्माण होतो. आपले विचार परखड पणे मांडणारी तथाकथित नास्तिक मंडळी ही एका टोकावर असतात हे गृहीतकच चुकीचे आहे. अन्यायकारी आहे. >>>>सर्वच बाबतीत सगळे जग माझ्यासारखेच वागले पाहिजे नाहीतर ते माझ्या जीवनाचा भाग होऊ शकत नाही (याला इंग्लिश्मध्ये सुंदर चपखल वचन आहे : माय वे ऑर हाय वे.) हे म्हणणे मला ठीक वाटत नाही. असाही आग्रह नास्तिकांचा कुठे दिसून आला नाही. नास्तिकांचे 'मी असा आहे' हे प्रतिपादन असते. त्याशिवाय त्यांची भूमिका इतरांना कशी समजावी. प्रसाद म्हणुन नाही तर मिठाई म्ह्णून लाडू खायला पाहिजे होता ही आस्तिकांची सततची मागणी ते दुसर्‍या 'टोकाला' आहेत असे दर्शवित नाहीत का? ते कुठे ग्रे एरियात दिसत नाहीत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप न करता प्रत्येकाने चर्चेवर विचार करून आपली मते बनवावित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 12/20/2015 - 09:54 नवीन
पेठकर साहेब, वर तुम्ही उधृत केलेली वाक्ये तुमच्याबद्दल किंवा इतर कोणाबद्दलही व्यक्तीगत वचने नव्हती. माणसाने सर्वसाधारणपणे कसे असावे / नसावे याबद्दलचे माझी मते होती. शिवाय, ती मते आस्तिकाच्या अथवा नास्तिकाच्या भूमीकेतून नव्हती तर एका अज्ञेयवादीच्या भूमीकेतून होती... अज्ञेयवादी त्या दोघांपैकी कोणाचीच बाजू घेत नाही, पण (देव आहे की नाही याबाबतचे) आपले अज्ञान लपवायची त्याला गरज वाटत नाही आणि स्वतःचे ज्ञान वाढविण्यासाठी, पूर्वग्रह न ठेवता, आस्तिक-नास्तिक-(इतर)अज्ञेयवादी या तिघांचेही मत जाणून घ्यायला मात्र तो उत्सुक असतो. सर्वच आस्तिक, नास्तिक आणि अज्ञेयवादी शेवटी माणसेच आहेत. वरच्या एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे, सर्वच विचारप्रणाली गटांतले मानव, पूर्ण पांढरे अथवा पूर्ण काळे (पूर्णतः एकसारखे) नाही तर वर्णपटातील विविध करड्या छटांत येतात, काही जण वर्णपटांच्या या किंवा त्या टोकांजवळ तर इतर जण मधे कोठेतरी असतात. त्यामुळे, सर्वच गटांत संयमाने आपले मत सांगणारे असतात, तसेच अत्यंत टोकाची भूमिका घेऊन दुसर्‍यावर जहरी टीका करणारे असतात आणि या दोन्ही टोकांच्या मधल्या वर्णपटातील अनेकविध छटांचे लोकही असतात... पिडित मानसिकतेचा बुरखा घेउन आपले म्हणणे गळी उतरवणारेही सुद्धा यात असतातच असतात. त्यामुळे मला स्वतःला कोण काय दावा करतोय याबरोबरच किंवा कणभर जास्तच (अ) तो दावा कोणत्या अंगाने प्रस्तुत होतोय व (आ) त्या प्रस्तुतीमागे दडलेले नक्की खरे ध्येय काय आहे (रिडिंङ बिटविन द लाईन्स) हे जाणून घेण्यातही रस असतो... हे करताना त्या व्यक्तीला कोण्या एका गटाचा सदस्य असे न बघता, केवळ एक व्यक्ती असेच बघण्याचा माझा प्रयत्न असतो... कारण, म्हणतातच ना की, "व्यक्ती तितक्या प्रकृती" !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Sun, 12/20/2015 - 10:11 नवीन
ठिक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
त
तिमा Wed, 12/16/2015 - 10:06 नवीन
ज्यांना आपापल्या आस्तिक वा नास्तिकपणाचा माज आला असेल, त्यांना "स्व'स्तिक म्हणावे.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sat, 12/19/2015 - 04:16 नवीन
हॅहॅ माजावर असणे याला कालमर्यादा असते. सदासर्वदा एखादी व्यक्ती 'माजावर' असू शकत नाही. तो कधी ना कधी उतरतोच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
इ
इरसाल Wed, 12/16/2015 - 12:13 नवीन
मग काय ठरलं ? लाडु खायाचा की नाय खायाचा ?
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 12/16/2015 - 12:29 नवीन
खायचा ना!! आस्तिक पावत्या फाडुन खाणार... नास्तिक फुकट मिळाला तर!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
प
पैसा गुरुवार, 12/17/2015 - 04:53 नवीन
वाद घालण्यात फुकट जाणारी १० मिनिटे आणि डोक्याचा ताप वाचवण्यासाठीची ११ २१ ५१ रुपये जी काय असेल ती किंमत मोजायला मी तयार आहे. गळ्यात रुमाल, कपाळी शेंदूर टिळा आणि हातात कडीवाले गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते देणग्या मागायला येतात तेव्हा आपण वाद घालणे कितपत शहाणपणाचे ठरेल हे आपले आपण ठरवायचे. ते लाडू पण देत नाहीत. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 12/17/2015 - 06:44 नवीन
>>>>>ते लाडू पण देत नाहीत. तुमचं दु:ख मोठं आहे. ......ह.घ्या. देवालयांमधून दिल्या जाणार्‍या देणग्या, मिठाई, नारळ, लांब लांब रांगांमधून होणारा वेळेचा व्यय आणि देवावर भरवसा ठेवून येणारी निष्क्रियता विचार करण्याजोगी आहे. मिठाई, नारळ जरी भक्तांनाच परत मिळत असले तरी त्या निमित्ताने ग्रहण होणार्‍या अनावश्यक कॅलरीज भक्तांच्या आरोग्यास घातकच असतात. दुष्काळग्रस्त आणि कुपोषित प्रदेशांमध्ये सकस अन्नाचे वाटप होण्याऐवजी, न खाणार्‍या देवाच्या मुर्तिंसमोर कोट्यावधीची मिठाई प्रसाद रुपाने देण्यात काय शहाणपण आहे? निदान....निदान सुशिक्षितांनी तरी ह्यावर सखोल विचार करावा. दोन हात, मस्तक आणि मनातील सद्विचार एव्हढेच पुरते देवाला. देवालयाकडे वाहणारा पैशांचा ओघच देवालयांची दुकाने होण्यास कारणीभूत आहेत. ह्या गुळासाठीच मुंग्या-मुंगळे गोळा होतात. मुळात गुळच ठेवला नाही तर मुंग्या-मुंगळे येणार नाहीत. कडीवाले गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते येतीलच कशाला? समाजाला सुधारण्याच्या प्रयत्ना पेक्षा प्रत्येकाने स्वतःला सुधरावं. समाज आपोआप सुधारेल. चराचरात देव भरलेला आहे. प्रत्येक माणसात देव आहे अशी शिकवण आहे आपल्या धर्मात. त्या शिकवणीचा स्विकार न करता आपण देवालयाकडे धाव घेतो. घरातला देव वेगळा, सार्वजनिक उत्सातला देव वेगळा, देवालयातील वेगळा आणि तिर्थस्थानातील देव वेगळा असा देवांच्या बाबतीत भेदभाव करणे किती सयुक्तिक आहे? कशाकरीता जावे लागते मंदिरात आणि तिर्थक्षेत्री? सार्वजनिक उत्सवांना जाऊन तिथल्या देवाच्या पायी प्रसाद, वर्गणी आणि आपली भक्ती वाहण्यात काय हशील आहे? तुमच्या घरचा देव तुमच्या इच्छा आकांक्षा पुर्‍या करण्यास असमर्थ आहे? सद्वर्तन, सद्विचार, परोपकार आणि सहिष्णूता हिच इश्वरभक्ती ह्या विचारांची आस धरा तसा प्रसार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पिलीयन रायडर गुरुवार, 12/17/2015 - 06:52 नवीन
तायडे.. मी सगळीकडेच वाद घालत फिरत नाय गो!! तसं वाटायचा फुल स्कोप आहे खरा ;) गणपतीलापण आपण पावती फाडत नाय! दारावर येणार्‍या कोणत्याच देवाधर्माच्या गोष्टीला आपण एन्टरटेन करत नाय.. सॉरी आम्ही पैसे देत नाही असं म्हणुन दार लावतो. रस्त्यावरच्या लोकांशी हुज्जत कोण घालणार बाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 12/17/2015 - 09:18 नवीन
लॉल! वाद वाईट असं कोण म्हणतंय! =)) पण खरंच देत नाय ज्जा! असं म्हणायला शिकलं पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
इ
इरसाल गुरुवार, 12/17/2015 - 05:30 नवीन
नाय नाय अस्सा नाय करायचं. नास्तिकाला फुकट देताना पावतीबुक घेवुन आला तर कृपया प्रतिसाद पहिल्यापासुन परत सुरु करायचे . ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मार्मिक गोडसे Wed, 12/16/2015 - 15:42 नवीन
ज्या तेरा लोकांनी देणगीच्या पावत्या फाडल्या त्यापैकी एकालाही आपल्याकडील लाडूचा थोडा तुकडा लेखकास देण्याचे सुचले नाही का?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 12/16/2015 - 15:52 नवीन
दिला असेल हो, यांनीच नाकारला असेल... त्या लाडवाचीच जास्त चर्चा होतेय नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
संदीप डांगे Wed, 12/16/2015 - 15:56 नवीन
"एक लाडू की आत्मकथा" लिवा कुन्तरी.. दमामिस्नी बोलावणं धाडा नायतर आत्मुबुवांस्नी मनधरणी करा...
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Wed, 12/16/2015 - 16:30 नवीन
यनावाला सर तुम्हाला ईश्वर ही कन्सेप्टच मुळी कळलेली नाही. तो कशात आहे? तुमच्यात आहे माझ्यात आहे. निष्पाप बालकात आहे पापी माणसात आहे. पतिव्रतेत आहे तर रस्त्यावर उभे राहून गिर्हाईक शोधणार्या वारांगनेत आहे. रस्त्यावर तडफडणार्या रोग्यात आहे तर गाद्यागिरद्यांवर लोळणारा माणसात आहे. बेफिक्र गर्दुल्ल्यात आहे तर संशयी काटेकोर माणसातही आहे. सरळमार्गी मास्तरात आहे तर कुमार्गी चोरट्यातही आहे. भोळसट माणसात आहे तर लबाड कपटी ठकातही आहे. हे सर्व विवेकानंद ग्रंथावलीत लिहिलेलं आहे. वाचा पाहीजे तर एक ते दहा खंड. अजून खूप बोलायचंय पण ते तुम्ही समजू शकत नाही... दुःख त्याचंच आहे.
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Wed, 12/16/2015 - 16:42 नवीन
जे ज्ञानोबा तुकोबा, नामदास, संत कबीर, संत रोहीदास यांनी अनुभवलं, समजून घेतलं तेच मी मांडतोय. प्रभु येशूनंही तेच सांगितलं. भगवान गौतम बुद्धानं, महावीर जैनानंही तेच सांगितलं. त्याच विभूतींची आण घेऊन सांगतो, हेच सत्य आहे. किती किती प्रेमळ होते हे लोक! जरा वाचा! कुठेही तुमच्यासारखी निगेटीव्हिटी, कटुता, नैराश्य दिसणार नाही. अगदी क्षुद्रातील क्षुद्र व्यक्तीसाठी पण हे महात्मे जीव देऊ शकत होते. तुमच्यासारखे निगेटीव्हिटीने भरलेले नव्हते. तुम्ही पण ते अनुभव करा. किमान प्रभू येशूची ४ गाॅस्पेल तरी वाचा. मग कळेल की खरे आस्तिक कसे असतात. बंद करा आता ही निरर्थक चिखलफेक. तुम्ही उद्याच्या उद्या जरी मृत्यू पावलात(देव करो असे न होवो) तरी लोक तुमचे मुळीच स्मरण करणार नाहीत. ते या महान विभूतींनाच आठवणार. कारण जे बीज त्यांनी पेरलंय ते ईतकं मजबूत सशक्त पेरलंय की कोटी कोटी यनावाला आले तरी ते बीज मरणार नाही तर फुलणारच!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक Wed, 12/16/2015 - 16:49 नवीन
बंद करा हे सर्व. लोकांच्या दुःखात तुमचे विचार कुचकामी निरर्थकच आहेत. ते त्यांना काहीही मदत करु शकत नाहीत. विज्ञानाच्या विरोधात इथे कुणीच नाहीये. विज्ञान हा तर प्रत्येकाचा पहिला आश्रय आहे. पण जिथे विज्ञान काहीच करु शकत नाही तिथे दमल्या भागल्या जीवाला ईश्वर हाच आधार आहे. तो आधार तुमच्या भ्रमित विचारांनी दूर केलात तर शिल्लक काहीच नाही राहणार. उरेल ती फक्त निष्फळ वांझोटी हताशा, जी तुमच्या स्वभावात डोकावते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक Wed, 12/16/2015 - 16:59 नवीन
प्रभू येशू: अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्वजण मजकडे या. मी तुम्हाला विसावा देईन. द्वारकाधीश कृष्ण: अनन्याश्चिंतयंतो माम् ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् भगवान बुद्ध: अरे देव आहे की नाही याच्याशी तुला काय करायचंय? तू माणसाशी माणसासारखं वागतोस की नाही हे महत्वाचं! बोला यनावाला सर! यातलं काय आश्वासन तुम्ही देता? कोण तुम्हाला जवळ करेल? जेव्हा काळाची निर्मम हाक ऐकू येईल, जेव्हा परिस्थितीचा निर्मम घाला पडेल तेव्हा लोक तुम्हाला नाही तर या महात्म्यांनाच आठवणार आहेत. फुकाचा भ्रम आणि चारदोन दीडशहाण्यांच्या टाळ्या सोडून द्या. कुणीच तुमची आठवण नाहीये ठेवणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
र
राही गुरुवार, 12/17/2015 - 02:38 नवीन
खेदाने लिहावं लागतंय की हे आपले काही प्रतिसाद वाचून क्लेश होताहेत. 'बंद करा हे लिहिणं' असं आपण कसं काय लिहू शकता? एक तर हे संस्थळ खासगी मालकीचं आहे. आणि संयत भाषेत, व्यक्तिगत न होता इथे व्यक्त होण्याची मुभा सर्वांना आहे. 'मृत्यूनंतर तुमचे नावही लक्षात राहाणार नाही, तुमची कुणी आठवणही काढणार नाही' ही शापवाणी अत्यंत अनुचित आहे. ह्याला तळतळाट म्हणतात. (यामुळे काही होणार आहे असे अजिबात नाही) आणि आस्तिकांच्या साध्या सोप्या भाषेत, तो स्वतःवरच उलटतो. शिवाय अशी आठवण तर कधीच कुणाची राहात नसते. आस्तिक काय किंवा नास्तिक, सगळे मातीतच जाणार असतात. 'चारदोन दीडशहाणे' अशी बोळवण तुम्ही कशाच्या आधारावर करू शकता? मलाही लेख आवडलेला आहे. आम्ही सर्व 'टाळ्या देणारे' तुमच्या भाषेत दीडशहाणे ठरतो काय? दीडशहाणेपणाचे तुमचे मोजमाप काय आहे? आणि यनावालासाहेब अतिशय संयमी शब्दांत आपला आशय मांडत असताना त्यावर अशा आक्रमक तळतळाटी प्रतिक्रिया याव्यात म्हणजे विरोधकांकडे शांतपणे प्रतिवाद करण्याचे सौजन्य नाही असे म्हणावे का? आणि, जे लोक स्वच्छ, निरलस, निरपेक्ष वृत्तीने समाजात, कुटुंबात वावरत असतात, त्यांच्या बुद्धीला एक वेगळे परिमाण, एक वेगळी मिती(डाय्मेन्शन) लाभत असते. बुद्धीचा वापर समतोलपणाने केल्यामुळे एक वेगळी क्षमता अंगी येते. धोका किंवा संकटे आधीच कळतात, मनुष्यव्यवहार कळतो. हे सगळे 'दैवी' नसते. आणि शेवटी, वैयक्तिक पातळीवर उतरायचे तर यनावालासाहेबांचे सामाजिक वर्तुळ मोठे आहे, त्यांचे अनेक हितचिंतक आहेत. ते आणि त्यांच्यासारखे अनेक आज जे काही करताहेत ते समाजाच्या भल्यासाठी आहे अशी हजारोंची धारणा आहे, आणि त्यांना मूक पाठिंबाही आहे. तुम्ही या सर्वांना दीडशहाणे म्हणून झटकून टाकू शकत नाही, सिम्प्ली बिकॉज़, ते तुमच्या ज्यूरिस्डिक्शनमध्ये नाही. आणि मृत्यूनंतर कुणाचा न्यायनिवाडा करणे तर मुळीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/17/2015 - 03:23 नवीन
राहीच्या प्रतिसादाशी सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
प
प्रचेतस गुरुवार, 12/17/2015 - 04:22 नवीन
मी ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मांत्रिक गुरुवार, 12/17/2015 - 04:29 नवीन
@ राहीजिः मला तो अर्थ नक्कीच अपेक्षित नव्हता किंवा मी कुणाला शापवाणी पण देत नाहीये. बोलण्याच्या भरात काही चुकीचा अर्थ निघणारे बोलून गेलो असेन तर त्याबद्दल यनावालांना क्षमस्व. बाकी मी कुठेही त्यांना अरेतुरे केलेलं नाहीये. फक्त बोलण्याच्या भरात असं एखादं चुकीचं वाक्य जाऊ शकतं. मीच नव्हे कुणाकडूनही असं होऊ शकतं. असो, दिलगिरी व्यक्त करून संपादक मंडळास विनंती की खालील प्रतिसाद डिलीट करावाः http://www.misalpav.com/comment/784436#comment-784436
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
मांत्रिक गुरुवार, 12/17/2015 - 04:31 नवीन
@ राहीजिः मला तो अर्थ नक्कीच अपेक्षित नव्हता किंवा मी कुणाला शापवाणी पण देत नाहीये. बोलण्याच्या भरात काही चुकीचा अर्थ निघणारे बोलून गेलो असेन तर त्याबद्दल यनावालांना क्षमस्व. बाकी मी कुठेही त्यांना अरेतुरे केलेलं नाहीये. फक्त बोलण्याच्या भरात असं एखादं चुकीचं वाक्य जाऊ शकतं. मीच नव्हे कुणाकडूनही असं होऊ शकतं. असो, दिलगिरी व्यक्त करून संपादक मंडळास विनंती की खालील प्रतिसाद डिलीट करावाः http://www.misalpav.com/comment/784436#comment-784436
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
मांत्रिक गुरुवार, 12/17/2015 - 04:35 नवीन
आणि हो माझ्या सर्व प्रतिसादांचा टोन नक्कीच यनावालांना अपमानित करणारा नाही. पुन्हा एकदा वाचा सर्व नीट. कदाचित एखादा नको असलेला अर्थ डोकावत असेल तर संपादक मंडळास परत विनंती की तो उडवून टाकावा. माझे काही ऑब्जेक्शन नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
य
यनावाला Fri, 12/18/2015 - 17:48 नवीन
श्री.मांत्रिक यांच्या प्रतिसादांविषयी माझी कोणतीही तक्रार नाही. कोणाविरुद्ध, कोणत्याही कारणासाठी मी कोणाहीकडे कोणतीही तक्रार कधीही केलेली नाही. तेव्हा श्री. मांत्रिक यांनी मला "क्षमस्व" म्हणण्याचे कांहीच कारण नाही.[अवांतर;-- "क्षमस्व" हे क्रियापदरूप आज्ञार्थ द्वि.पु.ए.व. आहे. त्याचा अर्थ "तू (मला) क्षमा कर असा होतो." अनेक व्यक्ती असतील (वाचक,श्रोते इ. ) तर "क्षमध्‍वम्" (आपण सर्वांनी -मला- क्षमा करावी) असे रूप वापरायला हवे. असो. संस्कृत भाषेची आवड म्हणून लिहिले. सर्वठिकाणी "क्षमस्व" असे म्हणण्याची पद्धत आहे. तेव्हा ते ठीकच. शास्त्राद्रूढीर्बलीयसी।] २/ माझ्या मरणाविषयी कोणी काही लिहिले तरी मला त्याचे काहीच वाटत नाही. प्रत्येक सजीवाला मरण अटळ आहे. ती एक नैसर्गिक घटना आहे. मरणाची, मरणासंबंधीच्या शब्दांची( प्रेत, तिरडी, मसण, गोवर्‍या इ.) माणसाला भीती वाटू नये. समाजात अशी भीती रूढ आहे ती अनावश्यक आहे. मला मरणाची यत्किंचितही भीती वाटत नाही. मात्र वेदना, यातना, पराधीनता नको. मरणभयाविषयी एक लेख लिहिला आहे. तो कधीतरी मि.पा.वर टाकीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक Sat, 12/19/2015 - 09:28 नवीन
धन्यवाद सर... तुम्ही जिंकलात, मी सपशेल हरलो. शांतता आणि स्थिरता हे सद्गुण मी तुमच्यापासून आता शिकण्याचा प्रयत्न करतो. आपले विचार कधीच जुळणार नाहीत. मी एक भाविक आस्तिकच राहणार. कारण माझ्या आयुष्यातील अतिशय वाईट काळखंडात या ईश्वरी शक्तीवरील विश्वासानेच, श्रद्धेनेच मला साथ केली. जेव्हां मित्रांनी, नातेवाईकांनी माझी साथ सोडली तेव्हां केवळ जगदंबेच्या विश्वासावरच, श्रद्धेवरच कुणाही माणसाचा आधार नसताना अतिशय मोठी लढाई लढत लढत हळू हळू सर्व त्रासांतून बाहेर आलो. पण असो, एक शांतता व स्थिरता अंगी बाणवलेला मनुष्य म्ह्णून तुमच्याविषयी कायमच आदर राहील. कधीतरी आयुष्यातील काही प्रसंगी मला राग, क्रोध अनावर होईल, तेव्हां तुमचं नाव नक्कीच आठवेल मला. असो सर, आप जियो हजारो साल!!! आपली मैत्री आजपासून! रागाच्या भरात काही बोललो असेन, त्रास दिला असेन तर क्षमा करा. एक खंत नक्कीच व्यक्त करेन, की मी माझी चूक कबूल केली, चुकीचे दिले गेलेले प्रतिसाद डिलीट करण्याची विनंती केली तरी त्याकडे अजिबात लक्ष दिले गेले नाहीये. माझा आयडी बंद करण्याची अनेकवेळा मागणी करुन देखील तेही कॅरी आउट झालेले नाही. या दोन गोष्टींकडे कृपया लक्ष द्यावे ही पुन्हा पुन्हा विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
म
मांत्रिक Wed, 12/16/2015 - 16:59 नवीन
प्रभू येशू: अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्वजण मजकडे या. मी तुम्हाला विसावा देईन. द्वारकाधीश कृष्ण: अनन्याश्चिंतयंतो माम् ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् भगवान बुद्ध: अरे देव आहे की नाही याच्याशी तुला काय करायचंय? तू माणसाशी माणसासारखं वागतोस की नाही हे महत्वाचं! बोला यनावाला सर! यातलं काय आश्वासन तुम्ही देता? कोण तुम्हाला जवळ करेल? जेव्हा काळाची निर्मम हाक ऐकू येईल, जेव्हा परिस्थितीचा निर्मम घाला पडेल तेव्हा लोक तुम्हाला नाही तर या महात्म्यांनाच आठवणार आहेत. फुकाचा भ्रम आणि चारदोन दीडशहाण्यांच्या टाळ्या सोडून द्या. कुणीच तुमची आठवण नाहीये ठेवणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक Wed, 12/16/2015 - 17:15 नवीन
प्रभू येशूनं एका वेश्येला दगडमार करणार्या जमावाला रोखलं. भगवान बुद्धाने एका उपाशी वाघाला स्वतःचं मांस खाऊ घातलं. नामया भाकरी चोरुन पळणार्या कुत्र्याला ऊद्देशून म्हणाला "अरे देवा, थोडं तूप पण लाव त्या भाकरीला नाहीतर पोट दुखेल." संत कबीराचा मुलगा गवत कापायला गेला तर गवतावरचे दव पाहून म्हणाला की गवत रडतंय, मी त्याला नाही तोडणार. मला सांगा यनावाला सर! तुमचं विज्ञान हे शिकवेल का? नाही विज्ञान म्हणते मीच सर्वोच्च. मीच दुसर्यावर राज्य करणार. अहो सर, आम्ही विज्ञानाची पण मदत घेतो आणि अध्यात्माची पण. ज्या योगे मानवी जीवन सुखी होईल तो प्रत्येक रस्ता शोधायला हवा हे आम्हाला नक्कीच कळते. पण ते तुम्हाला कळत नाही. कारण तुम्ही तुमचे पर्सनल अजेंडे घेऊन ईश्वरावर थुंकायचा प्रयत्न करताय, की जी थूंक तुमच्याच तोंडावर पडतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
स
स्वप्नांची राणी Wed, 12/16/2015 - 17:50 नवीन
शनी..शनी....विसरलात की हो...!! सगळी पृथ्वीवरचीच उदाहरणं दिलीत ना म्हणून नम्रपणे आठवण करुन द्यायला आले... मी एक अम्बज्ञ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा