श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान
श्रद्धावंतांचे "तत्त्व"ज्ञान
माझ्या परिचयाचे एक गृहस्थ दत्तभक्त आहेत. ते मला रविवारी (दि.9जुलै 2017) रस्त्यात भेटले. "कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न श्रद्धाळूंना विचारू नये याची मला कल्पना आहे. कारण, "जाणार्यासी पुसों नये ’कोठे जातोस? ’ म्हणोनी।" या दासबोध वचनावर त्यांची श्रद्धा असते. असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे इच्छित काम होत नाही, असे त्यांना वाटते. म्हणून त्यांना आडवळणाने विचारले. "काय? कुठपर्यंत फेरी?"
" दत्त मंदिरात जात आहे."
" पण आज तर गुरुवार नाही. रविवार आहे."
" अहो, आज गुरुपौर्णिमा आहे. तुम्हा नास्तिकांना त्याचे काय म्हणा ! "
" गुरुपौर्णिमेला दत्तमंदिरात एवढी गर्दी का असते हो ?"
" अन्य दिवसांच्या तुलनेत गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व दशसहस्रपट असते." त्यांनी आपले ’तत्त्व’ ज्ञान (!) प्रकट केले.
" गणिताच्या दृष्टीने तुमचे हे विधान सत्य आहे." क्षणभर विचार करून मी उत्तरलो.
मी नास्तिक आहे हे त्यांना चांगले ठाऊक आहे. ते कांहीशा आश्चर्यानंदाने उद्गारले,
" असे म्हणता ? हे कसे काय बुवा ?"
" शून्य गुणिले चौदा बरोबर किती ? " विषयाशी असंबद्ध वाटावा असा प्रश्न विचारला.
" शून्य ! शून्याला कोणत्याही संख्येने गुणले तरी उत्तर शून्यच येते." ते शालेय गणित विसरले नव्हते.
" वा ! अगदी अचूक ! अन्य कोणत्याही तिथीला दत्तमूर्तीतील तत्त्व शून्य असते. त्यामुळे-- गुरुपौर्णिमेला इतर दिवसांच्या तुलनेत ते दशसहस्रपट असते-- हे विधान सत्य ठरते. कारण शून्याची दशसहस्रपट शून्यच. !"
ते रागारागाने म्हणाले, " आमच्या श्रद्धेची तुम्ही चेष्टा करता."
" रागावू नका. मी सत्य तेच सांगितले."
" आमच्या भावना दुखावतात." असे म्हणून ते दत्तभक्त तरा-तरा निघून गेले.
सोमवारी पिंडीतील शिवतत्त्व इतर दिवसांच्या तुलनेत शतपट असते, शिवरात्रीला सहस्रपट असते तर महाशिवरात्रीला दशसहस्रपट असते. गणपतीच्या मूर्तीत गणेश तत्त्व असते. ते गणेश चतुर्थीला दशसहस्रपट होते. मारुतीच्या मूर्तीत हनुमान तत्त्व ते शनिवारी वाढते. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते. तुळशीपत्रात विष्णुतत्त्व असते. अशा अनेक तत्त्वांच्या अस्तित्वावर भाविकांची श्रद्धा असते. खरे तर "ईश्वरीतत्त्वां" विषयींची ही सर्व विधाने असत्य आहेत. हास्यास्पद आहेत. हे कोणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने समजते. पण श्रद्धावंत अशी विधाने सत्य मानतात. कारण ती देवा-धर्माशी निगडित असून पॉझिटिव्ह आहेत. म्हणून ती सत्य असणारच असा त्यांचा युक्तिवाद (!) असतो.
हे असले देवतत्त्व म्हणजे नेमके काय असते ? त्याचा शोध कोणी लावला ? कुठल्या अधिकृत वैज्ञानिक नियतकालिकात या संशोधनाविषयी काही छापून आले आहे का? हे देवतत्त्व कोणत्या साधनाने (इंस्ट्रुमेंटने) मोजतात ? याच्या मापनाचे एकक (युनिट ऑफ मेझरमेंट) काय ? असा कोणताही प्रश्न श्रद्धाळूंच्या मेंदूत उद्भवत नाही. कारण श्रद्धेमुळे त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते. विचारशक्ती बधिर झालेली असते. खरे तर मूर्ती ज्या पदार्थाची (मटेरियल: दगड, माती, लाकूड, धातू इ.) बनविलेली असते त्या पदार्थाचे गुणधर्मच त्या मूर्तीत असतात. दगडाचा आकार बदलला तरी तो मूलत: निर्जीव दगडच राहातो. मातीची सुबक गणेशमूर्ती केली, आकर्षक रंग दिला. नंतर घरी अथवा मंदिरात नेऊन बसवली. वेदोक्त मंत्रांनी तिची साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठा केली तरी कोणतेही देवतत्त्व त्या मूर्तीत उद्भवत नाही. उद्भवणे शक्य नाही. हे शत-प्रतिशत (शंभर टक्के) वैज्ञानिक सत्य आहे.
पण श्रद्धाळूंना वाटते की त्यांच्या आध्यात्मिक गुरूंपाशी अतीन्द्रिय शक्ती असते. त्या शक्तीने त्यांना मूर्तीतील तत्त्वे समजतात. त्यांचे मोजमापनही करता येते. गुरूंचा अधिकार फार मोठा. गुरू जे सांगतात ते सत्य असतेच. ते शिरसावंद्य मानलेच पाहिजे. जास्वंदीच्या फुलात गणेशतत्त्व असते हे सुद्धा सिद्ध गुरूंना कळते. अशी त्यांच्या भक्तांची धारणा असते.
समजा एका मोठ्या दालनात शंभर चौरंगासने आहेत. त्यांवर शंभर गणेशमूर्ती आहेत. त्यांतील दोन मूर्तींची वेदोक्त मंत्रांनी यथासांग प्राणप्रतिष्ठा केली आहे. बाह्यत: सर्वमूर्ती एकरूप (म्हणजे अगदी सारख्या) दिसत आहेत. तर कोणी तज्ज्ञ धर्मगुरू, सिद्धयोगी, आध्यात्मिक द्रष्टा त्या शंभर मूर्तींतील दोन प्राणप्रतिष्ठित मूर्ती नेमक्या ओळखू शकेल काय ? हे ओळखणे अशक्य आहे. प्राणप्रतिष्ठा केल्याने मूर्तीत कोणतेही मूलभूत परिवर्तन झालेले नसते. प्राणसंचार झालेला नसतो. पूर्वी होती तशीच ती निर्जीव असते. मंदिरातील मूर्तीसमोरील दानपेटी चोर फोडतात. त्यांतील पैसे पळवतात. मूर्तीच्या अंगावरील दागिने ओरबाडून नेतात. त्यावेळी ती प्राणप्रतिष्ठित मूर्ती कोणताही प्रतिकार करीत नाही. आक्रमक मूर्तिभंजकांनी अनेक देवमूर्ती फोडल्या, विद्ध्वंस केला त्या समयी कुठल्याही प्राणप्रतिष्ठित देवाने किंचित् देखील प्रतिकार केल्याचे एकही विश्वासार्ह ऐतिहासिक उदाहरण नाही. प्राणप्रतिष्ठा केल्यावर मूर्तीत प्राणसंचार होतो असे भाविक भक्त केवळ श्रद्धेने मानतात. वस्तुत: पुरोहितांनी केलेली ही धूळफेक असते. श्रद्धाळूंना फसवणे, बनवणे असते.
मूर्तीत, पिंडीत, फुलांत विशिष्ट देवतत्त्व असते, दिनमाहात्म्यानुसार ते वाढते. असली विधाने भंपक आणि धादान्त असत्य आहेत, हास्यास्पद आहेत. हे कुणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने सहज समजते. असे असता अशी विधाने करण्याचे साहस या पुरोहित मंडळींना होतेच कसे ? आपल्याला कोणी हसतील, आपली टर उडवतील अशी भीती त्या धर्ममार्तंडांना वाटत नाही काय ?
या प्रश्नाचे उत्तर ,"नाही. मुळीच नाही." असे आहे. कारण त्या मार्तंडांनी अनेक खोट्या गोष्टी, निरर्थक चमत्कारी पुराणकथा, भाविकांच्या डोक्यात भरवून भरवून त्यांचे मेंदू पुरते प्रदूषित केलेले असतात. भाविकांची बुद्धी श्रद्धेने बरबटून टाकून संवेदनाहीन केलेली असते. ती बधिर झालेली असते. त्यामुळे ते श्रद्धावंत भाविक स्वबुद्धीने विचार करतील ही शक्यताच उरत नाही.आपण कोणतेही आणि कसलेही विधान केले तरी "तत्त्वनिष्ठ" श्रद्धाळू माना डोलावणार, ते खरे मानणार, या विषयी त्या धर्मगुरूंना ठाम विश्वास असतो. म्हणूनच सर्वथा असत्य असलेली असली विधाने ते नि:शंकपणे करतात. त्यांचा विश्वास श्रद्धाळू भक्त सार्थ ठरवतात.
देवतत्त्वासंबंधी असली हास्यास्पद विधाने ( दूर्वांमध्ये गणेशतत्त्व असते. ते चतुर्थीला सहस्रपट होते इत्यादि.) करण्याचे आणखी एक कारण संभवते. भाविक भक्त कितीही श्रद्धाळू असले तरी ते काही प्रमाणात तर्कनिष्ठ असतात. कारण मानव प्राणी मूलत: तर्कनिष्ठ प्राणी आहे. ( Man is a rational animal). श्रद्धेच्या भडिमारामुळे ही अल्प तर्कनिष्ठता झाकोळते. पण ती कधी कधी डोके वर काढते. अशावेळी त्यांना आपल्या कृतीचे तार्किक समर्थन करता येईल असे कारण हवे असते. "अंगारकी चतुर्थीला सिद्धिविनायक मंदिरापुढील रांगेत आपण तासानुतास का बरे उभे राहतो? " याचे कारण त्यांना हवे असते. "इतर दिवसाच्या तुलनेत अंगारकी दिवशी सिद्धिविनायकाच्या मूर्तीतील गणेशतत्त्व द्वादश सहस्रपट असते." असे कुण्या अधिकारी (!) व्यक्तीने सांगितले की त्या श्रद्धावंतांना आपल्या कृतीच्या समर्थनाचे कारण समजते. आणि त्यांची गणपतीवरील श्रद्धा अधिक दृढ होते.
यावर आमचे कांही श्रद्धावंत बांधव म्हणतील, "हो. आम्ही श्रद्धाळू आहोत. मूर्तीत, पिंडीत, फुलांत, पानांत, देवतत्त्व असते. दिवसाच्या महत्त्वानुसार ते बदलते हे सर्व आम्ही खरे मानतो. आमची तशी श्रद्धा आहे. त्यासाठी आम्हांला पुरावा लागत नाही. पुढे ? तुम्हांला आमच्या या श्रद्धेचा कांही त्रास होतो का ? भारत हा प्रजासत्ताक देश आहे. इथे प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा अधिकार आहे. आमच्या या विचार आणि आचार पद्धतीत तुम्ही नाक का खुपसता ? तुम्हांला तसा अधिकार कोणी दिला आहे ? आमच्या श्रद्धांशी तुमचा काय संबंध ? तुम्ही अशा श्रद्धा पाळा असे आम्ही तुम्हांला कधी सांगतो का ? मग तुम्ही आमच्या श्रद्धांना हास्यास्पद का म्हणता ?
यावर माझे उत्तर असे की "देवतत्त्वा"विषयींच्या या श्रद्धांना मी हास्यास्पद म्हणायला हवे असे नाही. कुणाही सुबुद्ध व्यक्तीला त्या हास्यास्पदच वाटतील. एवढेच कशाला तुम्ही श्रद्धावंतांनी आपल्या डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे गाठोडे खाली उतरवून जर शुद्ध तर्कबुद्धीने विचार केला तर तुम्हांलासुद्धा त्या हास्यास्पदतेची जाणीव होईल. जे सत्य आहे ते मी शब्दांत मांडले इतकेच. आपल्या प्रजासत्ताक देशात प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धा जोपासण्याचा, उपासना करण्याचा संविधानदत्त अधिकार आहे तसा प्रत्येकाला आपली मते, आपले विचार, योग्य आणि सुसंस्कृत शब्दांत मांडण्यचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही आहेच. मी लेखनशुचिता पाळतो. कुठेही असंस्कृत,असभ्य, असंसदीय शब्द वापरत नाही.
पण प्रजासत्ताक देशातील नागरिकांच्या संविधानदत्त अधिकाराच्या गोष्टी राहूं दे. अशा लेखनाविषयीं माझी भूमिका काय ते प्रस्तुत पुस्तकातील "माझी भूमिका " या लेखात स्पष्ट केले आहे. इथे थोडक्यात देतो.
"आपण सर्व मानव (माणसे ) आहोत. मानवता (माणुसकी ) हा आपणा सर्वांचा धर्म आहे. भारत आपला देश आहे म्हणून "भारतीय " ही आपली जात आहे. ( तसेच पाकिस्तानी, चिनी, जपानी, अमेरिकी, रशियन, ब्रिटिश इ.सर्व जाती आहेत. थोडक्यात राष्ट्रियत्व म्हणजे जात असे म्हणता येईल.) म्हणून सारे भारतीय माझे बांधव आहे. हे मी मनापासून मानतो. माझ्या देशबांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे; असे मला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना वैध मार्गांनी परोपरीने सांगण्याचा मला घटनादत्त अधिकार आहे. किंबहुना वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे भारतीय संविधानानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे."
हे थोडे विषयाला सोडून म्हणजे अवांतर झाले असे वाटते. म्हणून आपण पुन्हा मूळ विषयाकडे वळू. मूर्तीची समंत्रक प्राणप्रतिष्ठा केली तर तिच्यात देवतत्त्व संचारते काय ? ते विशिष्ट दिवशी अनेक पटींनी वाढू शकते का ? तसेच कांही फुलांत, पानात देवतत्त्व असते काय ? हे आपले तीन मूळ प्रश्न होते. खरे तर हे प्रश्न हास्यास्पद आहेत. ते चर्चा करण्याच्या योग्यतेचे नाही. "हॅ:" या एकाच एकाक्षरी उदगाराने ते मोडीत निघतात. मग "देवतत्त्वांविषयीं हे पानभर लेखन कशाला केले ? " असा प्रश्न तुम्ही विचाराल. लेखनामागची भूमिका स्पष्ट केलेलीच आहे. देश बांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा. अवास्तव असत्य विधाने खरी मानू नये. तुम्ही बुद्धिमान आहातच. ती बुद्धी वापरून "गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व अन्य दिवसाच्या तुलनेत सहस्रपट असते." या विधानावर विचार करा. तुम्हांला हे खरे वाटते का ? कोणी मोठ्या अधिकारी व्यक्तीने सांगितले आहे, इतर अनेक जण ते खरे मानतात म्हणून तुम्ही हे खरे मानत असाल तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे. स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.
****************************************************************
स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टी मी सोडून दिल्या आहेत. मी स्वबुद्धीचा आधार घेतलेला आहे. परमेश्वराचे अस्तित्व हे माझ्या अनुभवानुसार, माझ्या कॉमनसेन्सचा वापर करून आणि माझ्या बुद्धीने विचार करून मला पूर्णपणे पटले आहे आणि त्यामुळे मी तेच खरे मानतो. ते नाकारणे ही माझ्या अनुभवांशी, कॉमनसेन्सशी व स्वबुद्धीशी प्रतारणा ठरेल. यातच माझ्या माणुसपणाचा सन्मान आहे."कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न श्रद्धाळूंना विचारू नये याची मला कल्पना आहे. कारण, "जाणार्यासी पुसों नये ’कोठे जातोस? ’ म्हणोनी।" या दासबोध वचनावर त्यांची श्रद्धा असते."कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न फक्त श्रद्धाळूंनाच नव्हे, तर इतर कोणासही केव्हाही विचारू नये. अशा चांभारचौकश्या करणाऱ्यांना 'भोचक' असे विशेषण आहे. समर्थांनी अत्यंत व्यावहारिक गोष्टी सांगितल्या आहेत (उदा. सांगे बापाची कीर्ति तो येक मूर्ख किंवा क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे). ही त्यातलीच एक. हा एक साधा व्यावहारिक शिष्टाचार आहे. त्याच्याशी अध्यात्माचा किंवा श्रद्धेचा ओढूनताणून संबंध लावणे हा खोडसाळपणा आहे.माझ्या परिचयाचे एक गृहस्थ दत्तभक्त आहेत. ते मला रविवारी (दि.9जुलै 2017) रस्त्यात भेटले.स्वतःचा मुद्दा मांडण्यासाठी लेखकाने ओढूनताणून एक काल्पनिक प्रसंग व कथा रचलेली दिसते.लेखनामागची भूमिका स्पष्ट केलेलीच आहे. देश बांधवांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा. अवास्तव असत्य विधाने खरी मानू नये. तुम्ही बुद्धिमान आहातच. ती बुद्धी वापरून "गुरुपौर्णिमेला दत्तमूर्तीतील गुरुतत्त्व अन्य दिवसाच्या तुलनेत सहस्रपट असते." या विधानावर विचार करा. तुम्हांला हे खरे वाटते का ? कोणी मोठ्या अधिकारी व्यक्तीने सांगितले आहे, इतर अनेक जण ते खरे मानतात म्हणून तुम्ही हे खरे मानत असाल तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे. स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना तर्कशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे नक्की काय हे लेखकाला समजले आहे का याविषयी शंका आहे. कोणतीही गोष्ट/दावा विज्ञानाच्या सहाय्याने तपासून नंतरच ते सत्य आहे का असत्य हे ठरविणे याला वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणता येईल. थोडक्यात म्हणजे स्वतः प्रयोग करून स्वतः अनुभव घेतल्यानंतर निष्कर्ष काढणे हाच वैज्ञानिक दृष्टीकोन. परमेश्वर नावाचे काहीतरी अस्तित्वात आहे किंवा नाही हे प्रयोग केल्याशिवाय किंवा स्वतः शोध घेऊन स्वानुभव घेतल्याशिवाय कसे ठरविता येईल? परमेश्वर नावाची कल्पना माझ्या मनाला पटत नाही म्हणून तो अस्तित्वातच नाही व या कल्पनेवर विश्वास ठेवणारे निर्बुद्ध असा अंधअविश्वास बाळगणे हा वैज्ञानिक दृष्टीकोन नाही. हा दृष्टीकोन पूर्वग्रहदूषित व अवैज्ञानिक दृष्टीकोन आहे. आपण सर्वचजण रोजच्या जीवनातील ९९% हून अधिक प्रसंगात अंधश्रद्धाळूच असतो. उदाहरणार्थ आपण ज्यांना आपले आईवडील मानतो ते केवळ श्रद्धेपोटीच. किती व्यक्ती प्रयोगशाळेत जाऊन ज्यांना आपण आपले आईवडील मानतो तेच आपले खरे जैविक जन्मदाते आहेत याची चाचणी करून घेतात? तथाकथित वैज्ञानिक दृष्टीकोन असलेले सुद्धा अशी चाचणी करून घेत असल्याचे ऐकिवात नाही. कोणी म्हणेल की गुणसूत्रांची चाचणी करून आपण आपल्या जन्यदात्यांविषयी खात्री करून घेऊ शकतो. हा दावा बरोबर वाटतो. परंतु गुणसूत्रांची चाचणी बरोबर आहे व ती चाचणी अगदी अचूकपणे जन्यदात्यांची खात्री करून देते यावर आपण स्वतः त्या चाचणीचा अभ्यास न करता डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवणे ही अंधश्रद्धा नाही का? आणि समजा ती चाचणी खरी असली तरी आजतगायत किती जणांनी आपण ज्यांना आईवडील मानतो त्यांच्या व आपल्या गुणसूत्रांची चाचणी करून हेच आपले जन्मदाते याची वैज्ञानिकदृष्ट्या खात्री करून घेतली आहे? रोजच्या जीवनातील ९९% हून अधिक प्रसंगात आपण डोळे झाकूनच दुसर्यांवर विश्वास ठेवत असतो व त्या गोष्टी आधी सिद्ध करा असे आव्हान देत नाही. परंतु परमेश्वर असा काही उल्लेख झाला की लगेच देव आहे हे सिद्ध करून दाखवा अशी मागणी सुरू होते. भारतीय समाजात काही ठाम स्वरूपाचे शिक्के ठरलेले आहेत. गणेशोत्सव साजरा करणे, सत्यनारायण पूजा इ. = अंधश्रद्धा मोहर्रम, ईद, ईस्टर इ. = घटनेने दिलेले धर्मस्वातंत्र्य जत्रेत बळी = अंधश्रद्धा बकरी मारणे = कुर्बानी देशद्रोही घोषणा = अभिव्यक्ती स्वातंत्र्य वंदेमातरम् = बळजबरीने लादलेला राष्ट्रवाद देशद्रोही घोषणांना विरोध = अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा आवळणे वंदेमातरमला विरोध = अल्पसंख्याकांना घटनेने दिलेले स्वातंत्र्य हिंदूंच्या बाजूने बोलणे = जातीयवाद हिंदूंच्या विरूद्ध बोलणे = धर्मनिरपेक्षता मांसाहार करणे = पुरोगामी शाकाहारी असणे = प्रतिगामी हुसेनने काढलेली चित्रे = कलंदर कलावंताच्या कलेचा उस्फूर्त आणि अमूर्त आविष्कार चार्ली हेब्दोमध्ये प्रसिद्ध झालेली व्यंगचित्रे = मुस्लिमांना डिवचण्यासाठी केलेला खोडसाळपणा हुसेनच्या चित्रांना विरोध = फॅसिस्टांची सांस्कृतिक दडपशाही चार्ली हेब्दोमधील व्यंगचित्रांना विरोध = डिवचलेल्या समाजाची उस्फूर्त व स्वाभाविक प्रतिक्रिया १९८४ मधील दंगली = इंदिरा गांधींच्या हत्येमुळे आलेली जनतेची स्वाभाविक प्रतिक्रिया २००२ मधील दंगली = पूर्वनियोजित वांशिक हत्याकांड अगदी तसेच "आस्तिक" आणि "नास्तिक" असे दोन शिक्के ठरलेले आहेत. आस्तिक = अज्ञानी, स्वतःच्या बुद्धीने विचार न करणारा, कॉमनसेन्स न वापरणारा, शब्दप्रामाण्य/ग्रंथप्रामाण्य इ. मानणारा, प्रतिगामी इ. दुर्गुणांची खाण नास्तिक = वैज्ञानिक दृष्टीकोन असणारा, बुद्धीप्रामाण्य मानणारा, स्वतःच्या बुद्धीने विचार करणारा, कॉमनसेन्स वापरणारा, ज्ञानवंत, पुरोगामी इ. गुणविशेषणांनी नटलेला समजा परमेश्वर नावाचे काही अस्तित्वातच नसेल तर निदान आस्तिकांना काही काळाने का होईना पण हे लक्षात येऊ शकते आणि त्यामागे त्यांचा स्वानुभव असेल कारण त्यांनी त्या मार्गाने स्वतः जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंत परमेश्वर नावाचे काही अस्तित्वात आहे किंवा नाही हे नास्तिकांना कधीही समजणार नाही कारण तसे काही अस्तित्वातच नाही असा त्यांचा ठाम अंधअविश्वास आहे व हा अंधअविश्वास स्वतः कोणतेही प्रयोग न करता, स्वतः शोध न घेता किंवा स्वतः वैज्ञानिक मार्गाने प्रयत्न करून परमेश्वर या कल्पनेचे अस्तित्व खोडून न काढता सुद्धा मनात ठाम रूजलेला आहे. अशा लोकांनी आपल्याला बुद्धीवादी, वैज्ञानिक दृष्टीकोन इ. असलेले समजणे हीच एक मोठी अंधश्रद्धा आहे.