केजरूके गुलाम
जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही.
सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला.
या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी.
पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये?
मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच.
असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो.
केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे.
नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा.
प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली.
हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे.
अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा.
या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर).
या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.
केजरीवालला अन्ना आंदोलनाच्याही पूर्वीपासून डायबिटिज आहे हो. कुणाच्याही तब्येतीवर भाष्य करणे योग्य नाही या पहिल्या वाक्यानंतर पुढे सगळ्या पॅराग्राफमध्ये तब्येतीवरूनच नेत्याचे नेतृत्व ठरवले तुम्ही.
केजरीवाल बॅंगलोरमध्ये पोहोचण्याअगोदरच आप कर्नाटकाने केजरीवाल यांचा दौरा कसा असेल (itinerary) याची सगळी माहिती पोलिसांना दिली होती. आणि केजरीवाल यांना कसल्याही प्रकारची सिक्युरिटी किंवा VIP ट्रिटमेंट देण्यात येऊ नये असे स्पष्ट सांगितले होते. तरीही प्रोटोकॉल म्हणा किंवा ‘न्युज’ बनवण्यासाठी म्हणा, बॅंगलोर पोलिसांनी त्यांचा ताफा केजरीवाल यांच्या खाजगी गाडीसोबत ठेवलाच. Refusing security protocol at the airport, Mr. Kejriwal got into Aam Aadmi Party (AAP) leader Prithvi Reddy’s car to go to Jindal. However, the security vehicles followed Mr. Reddy’s car till the institute. - The Hindu बाय द वे, पंचतारांकित निसर्गोपचार केंद्र म्हणजे काय हो ? तिथल्या इतर रूग्नांसोबत उपचार घेत होता तो, वेगळी VIP ट्रिटमेंट मिळत नव्हती. हे त्या निसर्गोपचार केंद्राचे Tarrif Card. http://www.jindalnaturecure.org/accommodation-tarrif-card.htm आम आदमी म्हणजे भीक मागणारा आदमी ही एकच व्याख्या आहे का आपल्याकडे ?
तुम्ही त्यांना धुतल्या तांदळाप्रमाणे समजता हे पाहून छान वाटले. पण मी आणि माझ्यासारखे अनेक आप समर्थक त्यांना धुतल्या तांदळासारखे समजत नाही. ते सुद्धा तुमच्या-आमच्यासारखे मनुष्य कुळातलेच आहेत, त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात हे आम्हाला माहित आहे. पण आम्हाला हे सुद्धा माहित आहे की सध्या भारतीय राजकारणात सगळ्यात चांगला कोणता पक्ष असेल, तर तो म्हणजे आम आदमी पार्टी ! उद्या चालून भाजप किंवा कॉंग्रेसनेसुद्धा जनतेची कामं करायला सुरूवात केली, तर त्यांनासुद्धा सपोर्ट करण्याची सद्बुद्धी दिलीये देवाने. हां, ज्यांना असे वाटते की आपमध्ये सगळे देव-देवता आहेत आणि त्यांच्याकडून काहीच चुका होऊ शकत नाहीत, अशा लोकांना मात्र माझा साष्टांग दंडवत.
केजरीवालने सत्ता सोडली तरी प्रॉब्लम आणि टिका झाल्यावर परत सरकार स्थापन करायचे ठरवले तरी प्रॉब्लेम. एक तर केजरीवालने कॉंग्रेस-बीजेपीसारखे पैसे देऊन आमदार फोडायचा प्रयत्न केला नाही, आणि समर्थन बाहेरून घ्यायचे ठरवले होते. आणि मुस्लिम आमदारांबद्दल केलेल्या स्टेटमेंटमध्ये काय चूक बोलला केजरीवाल ? गल्लीतल्या शेंबड्या पोराला पकडून विचारले तर तोसुद्धा सांगेल की मुस्लिम लोकांचे आणि भाजपचे काय नाते आहे. भाजप करत होता तो घोडेबाजारच होता ! व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहे त्याच्या युट्युबवर. सापडला नाही तर सांगा, शोधून देतो.
परत तेच. कॉंग्रेसने फक्त आणि फक्त वापर करून घेतलाय मुस्लिम मतदारांचा आणि भाजपाचे मुस्लिम प्रेम जगजाहिर आहे. अशा वेळी मुस्लिमांपुढे फक्त आप हा एकमेव पर्याय आहे हे सांगायला खरंच ज्योतिषाची गरज आहे का ?
ऍडमिरल रामदास यांचा कार्यकाळ संपला होता. आणि असंही पार्टीच्या संविधानानुसार लोकपाल हे नॅशनल काऊंसिलच्या मिटिंगमध्ये येऊ शकत नाहीत. जो गदारोळ त्या दिवशी सुरू होता, त्यात खालील काही बातम्यासुद्धा खपून गेल्या असत्या. - योगेंद्र यादव यांना केजरीवालने झाडू फेकून मारला. - गोपाल राय यांनी प्रशांत भूषण यांच्या आई-बहिनीचा उद्धार केला. - प्रत्येक सदस्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून साईन करायला लावले म्हणून बहुमत केजरीवालच्या बाजूने झाले. बाय द वे, रामदास यांचा कार्यकाळ संपल्यामुळे आपने नवीन लोकपाल नियुक्त केले आहेत. यावेळी फक्त एक लोकपाल न निवडता तीन लोकपाल निवडले आहेत. १. एन. दिलीप कुमार (भ्रष्टाचार्यांचा कर्दनकाळ ठरलेले माजी आयपीएस ऑफिसर) २. राकेश सिन्हा (सीआयएसएफ चे माजी उपमहानिरीक्षक) ३. एस. पी. वर्मा (शिक्षणतज्ञ)
योगेंद्र यादव अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळ धरण्यावर बसले होते. असो. ज्यांच्याकडे वैध ओळखपत्रं होती, निमंत्रणाचे SMS होते, त्यांनाच प्रवेश दिल्या जात होता. आणि यावेळी दोन्हीकडच्या मंडळींकडून पक्षाशी किंवा कार्यकारणीशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना प्रवेश दिल्या जाऊ नये यासाठी प्रोसेस थोडी स्ट्रिक्ट केली होती आणि त्यामुळेच आत जायला जास्त वेळ लागत होता. हे स्वतः आनंद कुमार यांनी आज तकसोबत बोलतांना सांगितले आहे. योगेंद्र यादव स्वतः एका चॅनलला म्हणाले की बैठकीमध्ये कॅमेरे होते. मिटिंगचे दोन व्हिडिओ युट्युबर टाकले आहेत पक्षाने. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी मागणी केली तर कदाचित पूर्ण व्हिडिओसुद्धा देण्यात येईल त्यांना. कुमार विश्वास यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की ज्यांना योगेंद्र यादव बाऊन्सर्स म्हणत आहेत, ते चळवळीतूनच वर आलेले कार्यकर्ते आहेत. हेच लोक नेहमी त्यांच्या पाया पडायचे म्हणे. मिटिंगमध्ये त्यांनी योगेंद्र यादव यांना फक्त मंचावर येण्यापासून अडवले होते म्हणे. कार्यकर्त्यांमध्ये मिसळता येत नसेल, त्यांना ओळखता येत नसेल तर ते चुकीचे आहे असे कुमार विश्वास म्हणत होते.
रमजान चौधरी असे त्यांचे नाव आहे. (माझ्या माहितीप्रमाणे यांना आत प्रवेश मिळावा म्हणूनच योगेंद्र यादव धरण्यावर बसले होते.) हे रमजान चौधरी हरियाना विधानसभेत अपक्ष म्हणून उभे टाकल्यावर पक्षाने त्यांची सदस्यता रद्द केली होती. यांना नॅशनल काऊंसिलमध्ये परत कुणी टाकले हे कोडेच आहे. ’मला मारहाण करण्यात आली, त्यात माझ्या पायाचे हाड मोडले.’ असा आरोप करत दोन दिवसांपासून मिडियापुढे फिरत आहेत हे महाशय. कदाचित फेविकॉलने चिटकवले असेल हाड.
या राजेश गर्ग यांनी बिन्नीचे सगळे रेकॉर्ड मोडायचे असे ठरवले आहे बहुतेक. यांना म्हणावं पुरावे देऊन टाका आणि केजरीवालची विश्वासार्हता कमी करून टाका.
काडीमात्र इंटरेस्ट नसूनसुद्धा लिहिलेच की त्याबद्दल. http://www.firstpost.com/politics/exposingkumarvishwas-yet-again-twitter-khap-gets-it-horribly-wrong-2181243.html हा एक चांगला लेख आहे. जरूर वाचा. मोदींच्या स्नुपगेट प्रकरणाबद्दल बोलू नका, कारण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मोदींच्या पत्नींबद्दल काही बोलू नका, कारण तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. कुमार विश्वास यांच्या बाबतीत मात्र कसलाही पुरावा नसतांना नुसती चिखलफेक करा, त्यांच्या पत्नीलासुद्धा यात ओढून आणा. काय आनंद मिळतो माहित नाही ब्वा !
दिल्लीच्या कारभाराचे काय तीनतेरा वाजले काही कळू शकेल का ? दिल्लीच्या जनतेची कामं त्याच वेगाने होत आहेत. आणि जोपर्यंत आम आदमी पार्टी जनतेची कामे करत राहिल, तोपर्यंत मी त्यांच्या कामाचे समर्थन करत राहिल. मी या पक्षाचे समर्थन योगेंद्र यादव किंवा केजरीवालसाठी करत नाही तर हा पक्ष जनतेसाठी जो करतो, त्यासाठी मी त्याचे समर्थन करतो.
नकार त्यासाठी दिलेला नाहीये. भ्रष्टाचारासाठी पैसे द्यायला नकार दिलाय आप सरकारने. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर... - जवळपास २५,००० कामगारांना (जे अस्तित्वातच नाहीयेत) दरवर्षी पगार देणे. यातून दरवर्षी १०० करोडचा चुना. - दिल्ली महानगरपालिकेची वेबसाईट बनवण्यासाठी ७० करोडचे बजेट बनवून ठेवले आहे. आत्तापर्यंत १२ करोड रूपये खर्च केले आहेत भाजपने त्याच वेबसाईटवर. - डेंग्यु, मलेरियाच्या औषध फवारणीवर ३५ करोडचा खर्च. ह्या अशा ‘प्रामाणिकपणासाठी’ पैसे मिळणार नाहीत असे ठणकावून सांगितले आहे. तरी यातून काही मार्ग काढायचा असेल तर परत एकदा तीनही महापौरांसोबत चर्चेची तयारी असल्याचे आप सरकारने सांगितले आहे. राहिला प्रश्न कचर्याचा, तर आपचे सगळे आमदार आपापल्या भागात कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्वतः कचरा साफ करत आहेत. अशा बातम्या नाही दिसणार तुम्हाला कुठेही.
या इथले बोलायचे असेल, तर मिपावरच मी हे बोललो होतो की पक्षात सध्या जे चालले आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. फेसबुकवर, व्हाट्सऍपवर, मित्रांसोबत प्रत्यक्ष चर्चा करतांना सगळीकडे मी हेच बोललो आहे. आपच्या ऑफिशिअल फेसबुक ग्रूपवर जाऊन बघा. अक्षरशः दोन गट पडले आहेत. एक केजरीवाल समर्थकांचा आणि एक YY, PB समर्थकांचा. मी अजूनही दोघांपैकी एकाची बाजू घेऊ शकलो नाही, म्हणून कोण बरोबर आणि कोण खोटारडा हे सांगू शकत नाही. योगेंद्र यादव मितभाषी असल्यामुळे साहजिकच लोकांना त्यांचे म्हणणे खरे वाटू शकते, पण जे पुरावे केजरीवालांचा ग्रूप देतोय, त्यावरून त्यांची बाजूसुद्धा पटत आहे. अन्यथा बहुमत केजरीवालांच्या बाजूने नसते. बाय द वे, मिपावर भाजप समर्थकांनी NCP, PDP, मसरत आलम विषयांवर कुठे कुठे विरोध केला होता कळू शकेल काय ? फेसबुकवरसुद्धा मी ज्या समूहांमध्ये आहे, तिथेसुद्धा भाजपचा या गोष्टींवर विरोध करणारे दिसले नाहीत. तुम्ही ज्या ग्रूपमध्ये आहात त्यांची लिंक मिळेल का ? फेसबुकवर मराठी माणसांचा हा एक ग्रूप आहे. https://www.facebook.com/groups/kaustubhsgroup/ मिपावरचे अनेक सभासद तिकडे असतील. कुणी हा प्रतिसाद वाचत असेल तर कृपया मला सांगा तुम्ही तरी कधी या ग्रूपमध्ये भक्तांना भाजपच्या चुकीच्या गोष्टींचा विरोध करतांना पाहिले आहे का ?
ओह ! तुम्हाला (परत) काडीमात्रही इंटरेस्ट नाही ? काय राव, तुमचाही वेळ घालवलात अन् माझाही वेळ घालवलात. :( केजरीवालांच्या कोणत्या रथाबद्दल बोलताय माहित नाही, पण जर दिल्लीच्या जनतेशी संबंधित असेल, तर परत सांगतो की त्यांची कामं त्याच वेगाने पार पडत आहेत. परत परत स्पूनफिडिंग करायची माझी मुळीच इच्छा नाही. ज्यांना आप करत असलेल्या कामाबद्दल माहिती हवी आहे, त्यांनी खालील लिंकवर जावे. - https://www.facebook.com/AamAadmiParty - https://www.facebook.com/AAPDelhiNCR - आपच्या आमदारांचे ट्विटर हॅंडल्स. ही त्यांच्या नावांची यादी. http://www.elections.in/delhi/assembly-constituencies/2015-election-results.html या तीन लिंक दिल्या कारण आप करत असलेल्या कामाबद्दल न्युज चॅनलवर तुम्हाला काही पाहायला मिळण्याची या जन्मात तरी शक्यता नाही. ज्यांना काहीही जाणून घ्यायचे नसेल किंवा ऎकिव माहितीवर विश्वास ठेवायचा असेल त्यांनी त्यांची दिनचर्या सुरू ठेवावी. मनःपूर्वक शुभेच्छा !
मला एक कळत नाही. आप समर्थक सोडून इतर सगळ्यांना आप पक्ष म्हणजे देवांचा पक्ष आहे, ते जे करतील ते सगळे १०१% योग्य असेल असे का वाटत असते ?खी...खी...खी...खी...खी...खी... असा विनोदी संशय आलाच कसा !!!??? "फक्त आम्ही धुतल्या तांदळासारखे आणि बाकी सर्वजण भ्रष्ट आहेत" असा ढींढोरा वाजवत आप सतत प्रसिद्धीत राहिला आहे. अश्या पक्षाला निवडणूकीनंतर ९० दिवसात निवडणूकीचे हिशेब देता येऊ नयेत आणि इलेक्शन कमिशनला त्यांना नोटीस पाठवावी लागते यात काही गैर दिसले नसले अथवा ते दुर्लक्ष करण्याजोगे वाटले असेल तर आपभक्त अंधश्रद्ध आहेत हे सिद्ध होते नाही का ? ("आपले बाबाजी करतात ती सगळी त्यांची लिला आहे" या धर्तीवर ! :) ) कोणत्याही विचारी माणसाने कोणत्याही माणसाला किंवा पक्षाला देवपदावर पोहोचवण्याचा अंधश्रद्ध व्यवहार करू नये... आणि त्यांच्या चुकीचे परिमार्जन दुसर्याच्या चुकीकडे बोट दाखवून करण्याचा भोळसट/कांगावेखोर व्यवहारही करू नये. चूकीला चूक म्हणावे... मग ती आपण पाठिंबा/मत दिलेल्या नेत्याची/पक्षाची का असेना. तरच ती चूक भविष्यात सुधारली जाण्याची शक्यता असते... जे भारताच्या, आपल्या सर्वांच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या फायद्याचे आहे.- योगेंद्र यादव यांना केजरीवालने झाडू फेकून मारला. - गोपाल राय यांनी प्रशांत भूषण यांच्या आई-बहिनीचा उद्धार केला. - प्रत्येक सदस्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून साईन करायला लावले म्हणून बहुमत केजरीवालच्या बाजूने झाले.बचाओ इस भारतवर्ष को केजरी के गुलामो से