Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

केजरूके गुलाम

क
क्लिंटन
Tue, 03/31/2015 - 18:20
🗣 893 प्रतिसाद
जे कधीतरी नक्की होणार असे वाटत होते ती गोष्ट त्यामानाने फारच लवकर घडली. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणीत दिल्लीत ७० पैकी तब्बल ६७ जागा जिंकून अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने भाजपचा पुरता धुव्वा उडवला. कॉंग्रेसचा तर व्हाईटवॉशच झाला. २०१३ मध्ये बऱ्यापैकी यश मिळविल्यानंतर केजरीवाल कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले होते त्यावेळीच पक्षातील भांडणे कित्येकवेळा चव्हाट्यावर आली होती.तरीही झाले-गेले विसरून दिल्लीच्या मतदारांनी भरभरून मते दिली.तेव्हा मागच्या अनुभवातून शहाणे होऊन यावेळी तरी आम आदमी पक्ष अशी भांडणे चव्हाट्यावर आणणार नाही आणि जबाबदार राज्यकारभार करेल अशी जनतेची अपेक्षा नक्कीच होती. पण येरे माझ्या मागल्या. मागच्या वेळची भांडणे अगदी सौजन्याचे मेळावे वाटावेत अशी कडाक्याची भांडणे यावेळी झाली.शेवटी काय चळवळ्या लोकांना चळवळी केल्याशिवाय समाधान वाटत नाही. सुरवात झाली पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांनी पाठविलेले पत्र फुटले तेव्हापासून.पक्ष आपल्या तत्वांपासून भरकटत आहे आणि सामूहिक नेतृत्वाला तडा जात आहे अशी तक्रार त्यांनी केली.त्यानंतर पक्षाला एकामागोमाग दुसऱ्या अंतर्गत भांडणाच्या वादळांनी घेरले.रामदासांचे पत्र फुटल्यापासून एका महिन्यात या सगळ्या घडामोडींची परिणीती बंडखोर योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या केंद्रिय समितीमधून हकालपट्टीमध्ये झाली.एकमेकांवर मोठया प्रमाणावर आरोप प्रत्यारोप झाले.केजरीवाल हुकूमशहा आहेत आणि पक्ष तत्वांपासून भरकटत आहे हा आरोप यादव-प्रशांत भूषण यांनी केला तर दिल्ली निवडणुकांमध्ये यादव-प्रशांत भूषण यांनी पक्षाविरूध्द काम केल्याचा आरोप केजरीवालांनी केला. या भांडणाची सुरवात केजरीवालांच्या दुसऱ्या इनिंगच्या अगदी पहिल्या काही दिवसांपासूनच झाली.दिल्लीतील व्ही.आय.पी कल्चरविरूध्द आकाशपाताळ एक करणारे केजरीवाल मात्र स्वत:साठी मोठा बंगला मागू लागले.त्याचे स्पष्टीकरण काय तर म्हणे मला भेटायला भरपूर लोक येतात, कार्यकर्ते येतात. तेव्हा त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोठा बंगला गरजेचा आहे. म्हणजे इतर पक्षांच्या नेत्यांनी मोठा बंगला मागितला तर ते व्ही.आय.पी कल्चर आणि यांनी तेच केले तर ते मात्र लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून. वा रे आम आदमी. पक्षांतर्गत मतभेदांच्या बातम्या यायल्या लागल्या त्याप्रमाणे केजरीवालांची शुगर वाढली अशा बातम्या निदान मटामध्ये तरी आल्या होत्या.कुणाच्याही तब्येतीविषयी भाष्य करणे योग्य नाही हे नक्कीच.पण जेव्हा मुख्यमंत्रीपदासारखे मोठे जबाबदारीचे पद भूषवायला मिळते तेव्हा त्याबरोबरच ताणतणाव येणारच, इतर अनेक आतले-बाहेरचे विरोधक वाईटावर टपून बसणारच हे मान्य केलेच पाहिजे. घी देखा पर बडगा नही देखा याला काही अर्थ नाही.आणि हे ताणतणाव जर नेत्याला सांभाळता येत नसतील आणि त्यामुळे त्याची शुगर वाढत असेल तर याचा अर्थ तो नेता नेतृत्व करायला योग्य नाही यापेक्षा दुसरे अनुमान काढणे मला तरी शक्य नाही. २००२ ते २०१२ या काळात मोदींना किती आव्हानांना सामोरे जायला लागले होते. कित्येकवेळा "अ ब्लो टू मोदी" अशा बातम्या आल्या होत्या.तरीही सगळ्या आव्हानांना मोदींनी हिंमतीने टक्कर दिली आणि त्यातूनच त्यांचे नेतृत्व बहरले.लोकसभा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ घ्यायच्या आधी मोदींनी एन.डी.ए च्या नवनिर्वाचित खासदारांपुढे भाषण करताना म्हटले: "मै कभी निराश वगैरा होता नही. निराश होना मेरे डी.एन.ए मे लिखाही नही है". आणि इथे आपले युगपुरूषजी.जरा खुट्ट वाजले की तो ताण यांना सहन होईनासा झाला.आणि त्या तणावामुळे यांच्या तब्येतीवर परिणाम होत असेल तर हे तणाव सहन करायला म्हणजेच नेतृत्वासाठी नालायक आहेत असे का म्हणू नये? मग काय करा? दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणे लागली असताना केजरीवाल जाऊन बसले निसर्गोपचार आश्रमात बंगलोरला.दिल्लीत असताना आपण किती साधे म्हणून सगळ्या दुनियेत मिरविणारे केजरीवाल बंगलोर विमानतळावर उतरल्यानंतर मात्र कर्नाटक सरकारच्या व्ही.आय.पी सुरक्षेत आश्रमात रवाना झाले.बरोबर १५-२० गाड्यांचा ताफा आणि विमानतळावरून बाहेर पडतानाही व्ही.आय.पी लेन आणि टोल न भरता महाशय पुढे गेले. हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात तसे यांचे दिल्लीतील वर्तन वेगळे आणि बंगलोरमधील वर्तन पूर्ण वेगळे.एक तर आम्ही किती साधे याचा सतत जप करत स्वत:चा साधेपणा मिरविणाऱ्या लोकांना बघून प्रचंड शिसारी येते. आणि हा आम आदमी बंगलोरमधल्या पंचतारांकित निसर्गोपचार आश्रमात कसा काय जाऊ शकला हा प्रश्न विचारायला बंदीच. असो.मधल्या काळात पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवरून योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हकालपट्टी करण्यात आली.त्या बैठकीत नक्की काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असा अजब आदेश केजरीवालांनी समितीच्या सदस्यांना दिला.म्हणजे हे सगळ्या जगाकडून पारदर्शक असायची अपेक्षा करणार पण यांच्या पारदर्शकतेचे काय? एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजाऱ्यांचे लोकपालासाठीचे पहिले उपोषण झाल्यानंतर लोकपाल कायद्यासाठी युपीए सरकारने समिती नेमली त्यावर अण्णा हजारे आणि केजरीवाल हे दोघेही होते.त्यावेळी समितीच्या बैठकांमध्ये काय झाले याची वाच्यता बाहेर करू नका असे कपिल सिब्बल यांनी म्हटले तरीही आमची अकाऊंटेबिलिटी जनतेप्रती आहे त्यामुळे त्या बैठकांमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम स्वत: केजरीवाल इमानेइतबारे करत होते.मग तीच वेळ आपल्यावर आल्यानंतर तोच न्याय का लावला नाही? केजरीवालांनी त्या लोकपालाच्या समितीच्या बैठकीमध्ये नक्की काय झाले याची माहिती द्यायचे काम केले तेच काम यावेळी मायांक गांधींनी ब्लॉगवर पोस्ट लिहून केले आणि "माझी अकाऊंटेबिलिटी आआपच्या कार्यकर्त्यांविषयी आहे" असा घरचा अहेर केजरीवालांना दिला. म्हणजे इतरांना एक न्याय आणि स्वत:ला दुसरा न्याय हे प्रकार सगळे पक्षच करत असले तरी तोच प्रकार स्वत: करूनही भारतीय राजकारणातले सर्वात धुतल्या तांदळाप्रमाणे हेच हा अहंमन्यपणा हे करताना दिसले की तो प्रकार अगदी प्रचंड म्हणजे प्रचंड डोक्यात जातो. केजरीवाल बंगलोरमध्ये निसर्गोपचार घेत असताना दिल्लीमध्ये तर अगदी कहरच झाला.आम आदमी पक्षाचे माजी आमदार राजेश गर्ग यांनी त्यांचे केजरीवालांबरोबर फोनवर बोलणे झाले होते त्याचे रेकॉर्डिंगच जाहिर केले.त्यात केजरीवाल कॉंग्रेसचे आमदार फोडून त्यांचा वेगळा पक्ष बनवून त्यांचे बाहेरून समर्थन घेण्याविषयी बोलत होते.कॉंग्रेसच्या ८ आमदारांपैकी ३ आमदार मुसलमान आहेत त्यामुळे ते मोदींच्या भाजपबरोबर जाणे शक्य नाही असेही विधान केजरीवालांनी केले असे त्या रेकॉर्डिंगमध्ये आले. १६ जुलै २०१४ रोजी केलेल्या एका ट्विट मध्ये केजरीवालांनी म्हटले होते की भाजप कॉंग्रेसच्या आमदारांना प्रत्येकी २० कोटी रूपये, २ मंत्रीपदे आणि ४ महामंडळ अध्यक्षपदे देऊन फोडायचा प्रयत्न करत आहे.कॉंग्रेसचे ३ आमदार मुसलमान असल्यामुळे त्यांना मोदींची भिती दाखवून द्यायला लागणारी किंमत कमी करायचा प्रयत्न करत होते असे का म्हणू नये? बरं भाजप जो प्रयत्न करत होता तो घोडेबाजार होता पण आआप जे काही करत होते ते मात्र Political realignment करायचा प्रयत्न होता त्यात चुकीचे काय असे निर्लज्ज समर्थन आआपकडून झाले.तसेच त्या रेकॉर्डिंगमधला आवाज केजरीवालांचा नव्हता असे आआपने एकदाही म्हटलेले नव्हते.याचाच अर्थ केजरीवालांनी असे काही म्हटले होते हे नाकारले नाही.म्हणजे इतर करतात तो घोडेबाजार आणि हे करतात ती Political realignment. बरं हे कमीच झाले म्हणून केजरीवालांचे आणखी एक रेकॉर्डिंग आले त्यात मुसलमानांपुढे आआपशिवाय दुसरा पर्याय काय आहे अशा स्वरूपाचेही विधान केल्याचे स्पष्ट झाले.म्हणजे इतर पक्षांनी धर्माधिष्ठीत राजकारण केले तर तो जातीयवाद आणि यांनी केले तर त्यात काही गैर नाही आणि परत आम्ही इतरांपेक्षा कसे चांगले, देशातील भ्रष्टाचार नाहिसा व्हावा ही चिंता केवळ आम्हालाच हे वर तोंड करून बोलायचे. नंतर दोन बाजूंमध्ये समेट होणार अशी चिन्हे दिसू लागली.पण ती शांतता वादळापूर्वीचीच शांतता राहिली.शनीवारी २८ मार्चला पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक बोलावली गेली.योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची राजकीय व्यवहार समितीमधून हकालपट्टी आधीच झाली होती. सर्वात निर्लज्जपणा म्हणजे पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास यांना तुम्ही या बैठकीस उपस्थित राहू नका असे पक्षाच्या वतीने सांगितले गेले.म्हणजे यांना देशात लोकपाल हवा आणि लोकपाल नावाचा एक मनुष्य त्या जागेवर आणला की चुटकीसरशी भ्रष्टाचार मिटेल अशी वेडगळ स्वप्ने बघायची, उपोषणे करून लोकनियुक्त सरकारला ब्लॅकमेल करायचे आणि वर तोंडाने अंतर्गत लोकपालाला तुम्ही बैठकीला येऊ नका असे सांगायचे? म्हणजे हे स्वत: लोकपालाची चाड राखणार नाही पण सगळ्या जगाने मात्र हे म्हणतील तसाच लोकपाल आणावा ही अपेक्षा!! चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना या अशा. प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी अगदी कहर झाला. केंदिय समितीच्या बैठकीस खरोखरच्या सदस्यांना प्रवेश नाकारला जात आहे असा आरोप करून योगेन्द्र यादव अर्धा तास धरण्यावरच बसले.कुणाही सदस्याने आत मोबाईल फोन घेऊन जाऊ नयेत ही सक्ती केली गेली.म्हणजे आत जे काही होणार होते त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग कुणी करू नये. ट्रान्सपरन्सी, अकाऊंटेबिलिटी या गोष्टी परत एकदा आम आदमी पक्षात धारातिर्थी पडल्या.आणि त्यावर कहर म्हणजे बैठकीत बाऊन्सरना पाचारण केले गेले.अरे ही राजकीय पक्षाची बैठक होती की दारूच्या बारमधली किंवा पबमधील बाचाबाची होणार होती? बाऊन्सर कशाला हवे होते त्याचे कारण लगेच कळलेच.पक्षाच्या केंद्रीय समितीचे हरियाणातील सदस्य रहमान यांनी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंना आपले म्हणणे मांडायची संधी मिळाली पाहिजे अशी रास्त मागणी केली तर त्यांना बाऊन्सरकरवी मारहाण करण्यापर्यंत आम आदमी पक्षाची मजल गेली. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकाही यापेक्षा सुसंस्कृत वातावरणात होत असतील!! मग बैठकीत जे होणार हे माहितीच होते ते झाले. योगेन्द्र यादव आणि प्रशांत भूषण यांची केंदिय समितीमधून हकालपट्टी करण्यात आली. हे झाले ते थोडे म्हणून आता राजेश गर्ग यांचा नवीन आरोप आजच आला.म्हणे अरूण जेटली आणि इतर भाजप नेत्यांच्या नावाने केजरीवालांच्या वतीने कोणीतरी वेगळेच फोन करून आमदारांना प्रलोभने दाखवत होते!! इतकेच काय तर रामदासांचीही लोकपाल पदावरून हकालपट्टी करण्यात आली.म्हणे त्यांचा कार्यकाळ २०१३ मध्येच संपला होता.मग २०१४ च्या लोकसभा आणि २०१५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार त्यांनी क्लिअरन्स दिल्याशिवाय उभे केले गेले होते का?आता तुम्ही काहीही हवे ते बोला.तुमची विश्वासार्हता धुळीस मिळाली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे मोठा नैतिकतेचा आव आणत असाल तरी तो बुरखा सेकंदभरही टिकायचा नाही. नंतर काय तर म्हणे कुमार विश्वासांना पक्षाच्या एका कार्यकर्तीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत त्यांच्याच पत्नीने रंगेहात पकडले असा आरोप कुणी केला आणि त्या आरोपाला केजरीवालांनी महत्व दिले म्हणून कुमार विश्वास रूसून बसले होते.तो आरोप खरा आहे की नाही याच्यात मला काडीमात्र इंटरेस्ट नाही.पण तुम्ही ही जी फुकटचे मनोरंजन करून देत आहात त्याची मात्र किंमत करता येणे केवळ अशक्यच आहे. अरे काय चालू काय आहे?कसला पोरखेळ चालवला आहे हा केजरीवालांनी?मधल्या काळात कारभाराचे तीनतेरा वाजले ते वेगळेच.म्हणे भाजपच्या ताब्यातील महापालिका भ्रष्टाचारामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे तोट्यात आहेत म्हणून त्यांना पैसे द्यायला सरकारने नकार दिला.म्हणे केंद्र सरकारकडून पैसे या महापालिकांनी आणावेत असे सरकारने म्हटले.भाजपच्या ताब्यातील या महापालिकांचा कारभार उत्तम आहे असे कोणीच म्हणणार नाही.पण त्यांच्याकडे २०१२ ते २०१७ या काळासाठी लोकांचे मॅन्डेट आहे हे कसे नाकारता येईल?महाराष्ट्रातील १५ वर्षाच्या आघाडी सरकारच्या कालावधीत मुंबई महापालिका सेना-भाजपकडे होती. सुरवातीला विलासराव १९९५ ते १९९९ या काळातील युती सरकारने राज्य सरकारला कर्जाच्या खाईत लोटले असा आरोप नेहमी करत असत.तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे द्यायचे राज्य सरकारचे कर्तव्य त्यांनी आणि इतर मुख्यमंत्र्यांनीही पार पाडले.समजा बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सत्तेत आला.त्या पक्षाने बिहारची काय वाट लावली होती हे सर्वमान्यच आहे.तेव्हा मोदी सरकारने आम्ही बिहार सरकारला पैसे देणार नाही---तुम्ही कार्यक्षम कारभार करू शकत नाही आमच्या हातात सत्ता द्या आणि मग बघा आम्ही कसा कारभार करून दाखवतो असे म्हटले तर ते कसे समर्थनीय ठरेल? लोकांनी २०१७ पर्यंत भाजपला महापालिकेत मॅन्डेट दिले असेल तर ते सर्वांनी मान्य केलेच पाहिजे--जरी कोणाला ते आवडले नाही तरी. मग काय तर पूर्व दिल्लीच्या महापालिकेकडे सफाई कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे राहिले नाहीत आणि सफाई कर्मचार्यांनी संपच सुरू केला. दिल्लीच्या रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य माजले आहे अशा बातम्या आहेत.दिल्लीवाल्यांच्या दु:खात मी सहभागी आहे पण सगळे काही फुकट पाहिजे म्हणून अडाण्यांना निवडून दिले तर त्याचे परिणाम भोगायचीही तयारी असली पाहिजे.तेव्हा दिल्लीकरांनो २०२० पर्यंत (आणि तुम्हाला हवे असेल तर त्यानंतरही) असाच सावळागोंधळ दिल्लीमध्ये सुरू राहणार आणि त्याची तयारी ठेवा. या सगळ्या भानगडीत केजरीवाल समर्थकांची भूमिका मात्र आश्चर्यकारक आहे.ज्यांना तुम्ही मोदीभक्त म्हणता त्याच मोदीभक्तांपैकी बहुतेकांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची मदत घेणे, मसरत आलमला सोडणे अशा निर्णयांना अगदी जाहिरपणे विरोध केला होता.पण तुम्ही का मूग गिळून गप्प आहात?की हा जो सगळा तमाशा चालू आहे तो तुम्हाला मान्य आहे असा त्याचा अर्थ घ्यावा का?तुम्ही आम्हाला भक्त म्हणत असाल तर तुम्ही कोण? मी तर म्हणेन या सगळ्या सर्कशीनंतरही केजरीवाल किंवा आआपविरूध काही न बोलणारे लोक भक्त नव्हे तर गुलाम आहेत गुलाम. आणि साधेसुधे गुलाम नव्हे तर केजरूके गुलाम (जोरूका गुलामच्या धर्तीवर). या भानगडीमध्ये नक्की कोणाची बाजू बरोबर आहे हे मला माहित नाही आणि मला त्यात काडीमात्र इंटरेस्टही नाही.तरीही या सगळ्या कोलाहलामध्ये केजरीवालांचा धर्मराजाचा रथ जमिनीवरून चार बोटे वर जात होता तो मात्र जमिनीत कायमचा गाडला गेला हे नक्कीच. माझ्यासारख्या आआपच्या विरोधकासाठी मात्र ही सर्कस म्हणजे अगदी मोठे मनोरंजन करणारी ठरत आहे. आणि या सगळ्यात केजरूच्या गुलामांची अवस्था बघून बाकी काही नाही तरी असुरी आनंद तरी नक्कीच होत आहे.

प्रतिक्रिया द्या
206836 वाचन

💬 प्रतिसाद (893)
च
चिनार Wed, 05/20/2015 - 08:17 नवीन
दिल्लीतला भ्रष्टाचार कमी झालाय असं ऐकतोय..केजरीवालांनी अशी काय उपाययोजना केली कळू शकेल का ? बाकी राज्यांना सुद्धा फायदा होईल.
व
विकास Fri, 05/22/2015 - 17:34 नवीन
थयथयाट आणि कांगावखोरपणा - किंवा सोप्या भाषेत नौटंकी! :)
↩ प्रतिसाद: चिनार
ई
ईश्वरसर्वसाक्षी Fri, 05/22/2015 - 17:36 नवीन
मागच्यास ठेच पुढचा शहाणा, तसाहि दिल्लि च्या अनुभवाचा फायदा सगळ्या राष्ट्राला होणार आहे.
व
विकास Fri, 05/22/2015 - 17:40 नवीन
मागच्यास ठेच म्हणता येणार नाही... "आ बैल ... " म्हणणे जास्त योग्य ठरेल. ;)
↩ प्रतिसाद: ईश्वरसर्वसाक्षी
क
काळा पहाड Fri, 05/22/2015 - 18:11 नवीन
याला कुर्‍हाडीवर पाय मारणे असं म्हणतात. दि
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 05/22/2015 - 20:53 नवीन
Image removed.
↩ प्रतिसाद: काळा पहाड
श
श्रीगुरुजी Wed, 05/27/2015 - 20:28 नवीन
दिल्लीचे मुख्य सचिव फक्त १० दिवसांच्या रजेवर गेल्यावर त्यांच्या जागी हंगामी सचिव पदासाठी मनीष शिसोदीयांनी जंग यांना लिहिलेल्या पत्रात परिमल रॉय व शकुंगला गम्लीन ही दोन नावे सुचविली होती. त्यात रॉय यांचे नाव प्रोपोझ केले होते. ते का केले असावे हे समजले. कारण परीमल रॉय हे राष्ट्रकुल घोटाळ्यातील एक आरोपी आहेत. http://www.saharasamay.com/regional-news/national-capital-region-news/676507820/cbi-files-fir-against-the-then-ndmc-chairman-parimal-rai.html केजरीवालांची मोड्यूस ऑपरंडी अशी आहे. In front of camera : - Arvind Kejriwal : We are against corruption. Behind the camera :- Kejriwal : Reward posts to corrupt people. And what when caught? Kejriwal :- Ye sab modi ki chaal hai. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व ज्या व्यक्तीवर राष्ट्रकुल स्पर्धेतील भ्रष्टाचार प्रकरणी एफआयआर दाखल झालेला आहे अशा व्यक्तीला पाठीशी घालणे हे केजरीवालांसाठी नवे नाही. यापूर्वी पदवीचे खोटे प्रमाणपत्र देणार्‍या जितेंद्र तोमर यांच्या पाठीमागेही केजरीवाल रॉक ऑफ जिब्राल्टर प्रमाणे उभे राहिले होते. आणि आता याच परिमल राय यांना केजरीवालांनी दिल्लीतील समाजकल्याण खात्याचे मुख्य सचिव म्हणून नेमणूक केली आहे. असो.
न
नांदेडीअन गुरुवार, 05/28/2015 - 03:27 नवीन
याच परिमल रॉय यांना मनोहर पर्रीकरांनी भ्रष्टाचार करण्यासाठीच नियुक्त केले होते ना गोव्यात ? बाय द वे, तोमर यांच्याबद्दल एक लेट्टेष्ट न्युज आली आहे आज काही पेपरात. भेटली नाही तर सांगा, लिंक देतो.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नांदेडीअन गुरुवार, 05/28/2015 - 06:44 नवीन
आज हायकोर्टामध्ये कॉलेजतर्फे सांगण्यात आले की जितेंद्र तोमर हे आमच्याच कॉलेजमध्ये शिकत होते आणि त्यांनी त्यांची डिग्री इथूनच मिळवली आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काहिच माहित नसेल, तर थोडक्यात माहिती देतो. सर्वप्रथम कुणीतरी माहिती अधिकारांतर्गत खालील प्रकारे माहिती मागवली : १) मागवलेली माहिती : श्री. जितेंद्र तोमर हे तुमच्या कॉलेजमध्ये शिकत होते का ? मिळालेले उत्तर : हो. २) मागवलेली माहिती : XYZ123 या हजेरी क्रमांकावर श्री. जितेंद तोमर हे तुमच्या कॉलेजमधून पास झाले आहेत का ? मिळालेले उत्तर : नाही. बस्स, इथून पुढे मोर्चा सांभाळायची जबाबदारी आमच्या पाळीव न्युज चॅनल्स आणि भक्तांची होती. आणि त्यांनी ती जबाबदारी इमानेइतबारे पार पाडली. केजरी के मिनिस्टर की डिग्री फर्जी है । कानून मंत्री का कानून से खिलवाड । कानून मंत्री जितेंद्र तोमर पर कानूनी शिकंजा । कानून मंत्री फर्जी डिग्री मामले में कब हिरासत में लिए जाऐंगे ? तिकडे तोमर ओरडत राहिले की मुळात हा माझा हजेरी क्रमांकच नाहीये, पण तोपर्यंत भाजपाचे डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंट कार्यरत झालेले होते. समजा तुमचा डिग्रीच्या शेवटच्या वर्षाचा क्रमांक १२३४ होता आणि तुम्ही विद्यापीठातून गोल्ड मेडल मिळवले होते. पण काही वर्षांनंतर मी विद्यापीठाला विचारले की माझा हा मित्र, ज्याचा परिक्षा क्रमांक ४३२१ होता, याने तुमच्या विद्यापीठातून गोल्ड मेडल मिळवले आहे का ? काय येईल हो कॉलेज किंवा विद्यापीठाचे उत्तर ? ‘नाही’ असेच येईल ना ? काही नाही हो, त्या बिचार्‍या स्मृती इराणींना एकटे वाटू नये म्हणून सगळा खटाटोप सुरू आहे भाजपाचा. केस अजूनही संपलेली नाहीये, पण यावरून तुमच्या लक्षात आले असेल की एकंदरीत काय प्रकार सुरू आहे. मी जितेंद्र तोमर यांचे कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाहीये, कारण अजून अंतिम निकाल यायचा बाकी आहे. पण हे जे काही सुरू आहे, त्यावरून स्पष्ट दिसतंय की जितेंद्र तोमर यांच्यावर विनाकारण चिखलफेक होत आहे. शेवटी कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत आपल्याला वाट पाहावीच लागणार आहे.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/28/2015 - 09:59 नवीन
>>> केस अजूनही संपलेली नाहीये, केजरीवालांनी पूर्वीच सांगितले होते की ज्याच्यावर गुन्हा सिद्द झालेला आहे अशी व्यक्ती माझ्याबरोबर कधीही असणार नाही. एवढेच नव्हे तर ज्याच्यावर फक्त आरोप आहेत तोसुद्धा आपमध्ये व माझ्या मंत्रीमंडळात असणार नाही. सीझरची पत्नीसुद्धा संशयातीत असली पाहिजे असे त्यांचे तत्व होते. मग या तत्वाचं काय झालं?
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/28/2015 - 09:58 नवीन
केजरीवालांनी पूर्वीच सांगितले होते की ज्याच्यावर गुन्हा सिद्द झालेला आहे अशी व्यक्ती माझ्याबरोबर कधीही असणार नाही. एवढेच नव्हे तर ज्याच्यावर फक्त आरोप आहेत तोसुद्धा आपमध्ये व माझ्या मंत्रीमंडळात असणार नाही. सीझरची पत्नीसुद्धा संशयातीत असली पाहिजे असे त्यांचे तत्व होते. परीमल रॉय यांच्यावर २०११ मध्ये एफआयआर दाखल झालेला आहे. तरीसुद्धा १० दिवसांच्या कालावधीसाठी मुख्य सचिव पदासाठी शकुंगला गम्लीनच्या बरोबरीने आप सरकारने परीमल रॉय हे नावसुद्धा पाठविले आणि त्यांचेच नाव प्रपोझ केले. राज्यपालांनी त्या १० दिवसांसाठी (फक्त १० दिवसांसाठी) गम्लीन यांची नेमणूक केल्यावर केजरीवालांनी थयथयाट केला. सर्वप्रथम गम्लीन या वरीष्ठ सनदी अधिकार्‍यावर जाहीर भ्रष्टाचाराचे आरोप केले. जर त्या भ्रष्टाचारी होत्या तर त्यांचे नाव पाठवलेच कशाला? आणि परीमल रॉय यांच्यावर राष्ट्रकुल स्पर्धेतल्या महाघोटाळ्यात सामील असल्याचा आरोप असताना सुद्धा त्यांचेच नाव का प्रपोझ केले? राष्ट्रकुल घोटाळ्यातील काही आरोपी आणि केजरीवाल यांचे पूर्वीपासूनच साटेलोटे आहे. २०१३ मध्ये शीला दिक्षितांच्या भ्रष्टाचाराविरूद्ध कंठशोष करणार्‍या केजरीवालांनी मुख्यमंत्री झाल्यावर लगेचच शीला दिक्षितांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मागायला सुरूवात करून त्यांच्यावर कारवाई केली नाही. आता ते परीमल रॉय यांची पाठराखण करीत आहेत. जो आपल्या बाजूने असतो तो स्वच्छ आणि जो आपल्याविरूद्ध जातो तो भ्रष्टाचारी अशी केजरीवालांची सोपी व्याख्या आहे. उठून कोणावरही जाहीररित्या भ्रष्टाचाराचे आरोप करताना त्यांना पुरावे वगैरे इ. फालतू गोष्टींची गरज लागत नाही. त्यांना कोणी विरोध केला की लगेच 'ये सब मिले हुए है' ची टेप सुरू. येथील भ्रष्टव्यवस्था बदलण्यासाठी आपण अवतार धारण केला आहे हे त्यांनी अनेकवेळा सांगितले आहे. परंतु 'आप'ल्या पक्षातील भ्रष्टाचार्‍यांच्या पाठीशी ते भक्कम उभे असतात. मोदींवर तानाशाहीचा आरोप करताना आपण योगेंद्र यादव, भूषण इ. ना त्यांचे म्हणणे मांडून न देता मार्शलकरवी झडती घेऊन मारहाण करून पक्षातून हाकलून लावले हे ते सोयिस्कररित्या विसरतातच. अर्थात आपल्या पक्षात किती तमाशे आणि नाटके करायची याने लोकांना फार फरक पडत नाही. परंतु नुकताच यांच्या नाटकामुळे एक शेतकरी मृत्युमुखी पडला. यांच्या नाटकांमुळे अजून किती लोकांचा जीव जाणार आहे कोणास ठाऊक? सध्या दिल्लीत उच्च व सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या अधिसूचनेविरूद्ध सुनावणी सुरू आहे. दुर्दैवाने यात केजरीवालांच्या विरूद्ध निकाल लागला तर ते किती थयथयाट करतील याची कल्पनाच करवत नाही. 'केंद्र, वकील, न्यायाधीश, राज्यपाल ये सब मिले हुए है' असा थयथयाट ते करतीलच. कदाचित याचे निमित्त करून ते राजीनामाही देतील अशी अंधुकशी शक्यता आहे.
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
च
चिंतामणी Wed, 12/23/2015 - 14:08 नवीन
In front of camera : - Arvind Kejriwal : We are against corruption. Behind the camera :- Kejriwal : Reward posts to corrupt people. And what when caught? Kejriwal :- Ye sab modi ki chaal hai. राजेंद्र कुमार प्रकरण आत्ताचे आहे ना. गुरुजींनी सहामहीन्यापुर्वी लिहून ठेवले आहे ते पुन्हा लागु होत आहे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पिंपातला उंदीर गुरुवार, 05/28/2015 - 05:09 नवीन
ते काय करायचं ते आप बघून घेईल . एकंदरीत आप विरोधकांनाच आप ची जास्त काळजी दिसतेय . आमच्या वरील प्रतिसादाची प्रेरणा इथ http://www.misalpav.com/comment/699589#comment-699589
न
नांदेडीअन गुरुवार, 05/28/2015 - 05:22 नवीन
तुम्ही फार अवघड करताय त्यांच्यासाठी. थोडी तरी दया-माया दाखवा. :P
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
आ
आनन्दा Fri, 06/12/2015 - 10:05 नवीन
बाकी आपची काळजी आम्हाला लुमच्यापेक्षा जास्त आहे. कारण एक वेगळा नवीन प्रयोग म्हणून आम्ही २-३ वर्षांपासून आपकडे डोळे लावून बसलो आहोत. फक्त आम्ही भक्त नाही एव्हढेच.
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
प
पिंपातला उंदीर गुरुवार, 05/28/2015 - 05:31 नवीन
त्यांनीच स्वतःची तुलना त्या एका वर्षाच्या धाग्यात राहुल गांधी यांच्यांशी करून स्वतः साठीच पाचर मारून ठेवली आहे ; )
श
श्रीगुरुजी Fri, 05/29/2015 - 17:21 नवीन
In a massive setback for Arvind Kejriwal in his turf war with the Centre , the Delhi High Court on Friday ruled that the city government's proposal on the appointment of senior bureaucrats must be studied by Lieutenant Governor Najeeb Jung. "If the LG wants any clarification regarding the interim proposal, then he may ask for it," the court said, refusing to stay the controversial Home Ministry notification limiting the powers of the Aam Aadmi Party government in the national capital. The court has also declined the request of the petitioners to revise the primacy of the LG in matters concerning the Delhi administration. Earlier in the day, the Supreme Court on Friday sought the Delhi government's response in three weeks on the Centre's plea seeking stay on the High Court judgement which termed as "suspect" the notification clipping powers of the Aam Aadmi Party dispensation. In its May 21 notification, the Centre had restrained the Delhi government's Anti-Corruption Branch (ACB) from acting against its officers in criminal offences and holding that the Lieutenant Governor cannot act in his discretion. The Supreme Court on Friday refused to stay the observations of the Delhi High Court, which had termed as “suspect” the recent Centre’s notification clipping powers of the AAP government, saying they were “only tentative in nature” without expressing any opinion on its validity. उच्च न्यायालयाचा हा अंतरिम आदेश आहे. अंतिम आदेश यायला अजून काही महिने लागतील. २५ मे ला उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या २१ मे च्या अधिसूचनेला "संशयास्पद" असे म्हटले होते. त्या निकालानंतर लगेचच "हा आमचा विजय" झाला अशा फुशारक्या आप च्या नेत्यांनी मारल्या होत्या. त्यानंतर लगेचच विधानसभेचे २ दिवसांचे विशेष अधिवेशन घेऊन त्यात मोदींवर सडकून टीका केली होती. उपराज्यपालांवर महाभियोग चालविण्याचीही चर्चा झाली. केंद सरकारचा निषेध केला गेला. २१ मे ची केंद्र सरकारची अधिसूचनाही विधानसभेत फाडली गेली. या पार्श्वभूमीवर या दोन्ही न्यायालयांच्या आजच्या निर्णयामुळे केजरीवालांना तात्पुरता का होईना पण झटका बसला आहे हे निश्चित. निदान आतातरी केजरीवाल नौटंकी सोडून कामाला लागतील अशी फक्त अपेक्षाच ठेवता येईल.
व
विकास Fri, 05/29/2015 - 17:32 नवीन
निदान आतातरी केजरीवाल नौटंकी सोडून कामाला लागतील अशी फक्त अपेक्षाच ठेवता येईल. आप कडून अपेक्षा ठेवायला तुम्ही देखील आप्टार्ड झालात का ? ;)
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नाखु Sat, 05/30/2015 - 12:23 नवीन
गुरूजी "आप" तो ऐसे ना थे, आपकी बदमाषीयोंके ये नये अंदाज है, दिवाभीत नाखु
↩ प्रतिसाद: विकास
ह
होबासराव Fri, 05/29/2015 - 17:36 नवीन
अपेक्षा ठेवुया त्यात काही गैर नाहि, वैसेभी उम्मिद पे दुनिया कायम है.
न
नांदेडीअन Fri, 05/29/2015 - 19:34 नवीन
Why did TV headlines ‘Kejriwal ko Supreme Court Se Bada Jahtka’ disappear? http://www.jantakareporter.com/india/why-did-tv-headlines-say-kejriwal-ko-supreme-court-se-bada-jahtka/1776
ड
डँबिस००७ Sat, 05/30/2015 - 09:49 नवीन
Why did TV headlines ‘Kejriwal ko Supreme Court Se Bada Jahtka’ disappear? केजरीवाल मिडीयाला कस मॅनेज करतो त्याच उदाहरण आहे हे ! आआपच्या विरुद्ध असलेल्या बातम्याच कश्या नाहीश्या होतात.
श
श्रीगुरुजी Tue, 06/09/2015 - 17:45 नवीन
केजरीवाल सरकारच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा . . . दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्र तोमर यांना बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरणामध्ये अटक होऊन न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलिस कस्टडी दिली आहे. पूर्वी त्यांच्यावर एल एल बी चे खोटे पदवीपत्र दिल्याचा आरोप होता. त्या आरोपा पाठोपाठ आता बी एस्सी चे खोटे पदवीपत्र दिल्याचा आरोप झाला आहे. आपल्या पक्षातील भ्रष्टाचारी लोकांच्या पाठीशी उभे राहण्याच्या आआपच्या उच्च परंपरेला जागून आआप नेत्यांनी तोमरांचे समर्थन केले आहे. राखी बिडलावरही सीसीटीव्ही खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचे आरोप होत आहेत. आजच्या मटामधील माजी आआप नेते मारूती भापकर यांची मुलाखत वाचनीय आहे. त्यातून केजरीवाल व आआपच्या उच्च लोकशाही मूल्यांवर प्रकाश पडतो. दिल्लीत सफाई, पाणी, वीज इ. समस्या कायम असून अजून दिल्लीचे अंदाजपत्रक मांडलेले नाही. परंतु, अवतारी महापुरूष केजरीवाल मात्र सचिवांच्या बदल्या करण्यात मग्न आहेत व उपराज्यपाल जंग त्यांचे निर्णय रद्द करण्यात व्यस्त आहेत.
व
विकास Tue, 06/09/2015 - 18:59 नवीन
आता तोमर, माजी मंत्री झाले. :( त्यांना आणि त्यांच्या पाठीराख्या केजरीवाल आणि आप परीवाराला जर हे राजकारण वाटत होते तर त्यांनी राजीनामा कसा दिला आणि दिलेला मान्य केला? अजून पुढे...

@Onuragg @vaidehisachin @SanjayAzadSln @TimesNow @sureshnakhua lo..now one more #AAP fake master degree holder..ROFL pic.twitter.com/uUusxaGb8B

— Nayan (@nayanchandra) June 9, 2015
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नांदेडीअन Wed, 06/10/2015 - 11:07 नवीन
पूर्ण चौकशी होऊन, कोर्टाचा निकाल लागेपर्यंत जितेंद्र सिंह तोमर यांनी राजीनामा दिला आहे. हे एक चांगले झाले. आता जर का ते दोषी आहेत असे आढळले, तर कोर्टाने त्यांना जमेल तेव्हढी कठोर शिक्षा द्यायला पाहिजे. याने दोन गोष्टी साध्य होतील. एक तर स्मृती इराणी, निहालचंद, गडकरी, कठेरिया अशा मंत्र्यांमध्ये एक चांगला संदेश जाईल. आणि दुसरे म्हणजे भविष्यात कुणी राजकारणी असा फ्रॉड करायचा विचारसुद्धा करणार नाही.
क
काळा पहाड Wed, 06/10/2015 - 11:15 नवीन
अच्छा म्हणजे युगपुरुषांना संदेश जाणारच नाही तर. अगदी काल पर्यंत मनीष शिसोदिया म्हणत होते की हे कारस्थान आहे. आशुतोष म्हणत होते की तोमर निर्दोष आहेत आणि युगपुरुषांनी तर गुळणी सोडलीच नाही. बाय द वे, त्या १६ लाखांपैकी किती कॅमेरे बसवून झाले?
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
श
श्रीगुरुजी Wed, 06/10/2015 - 11:40 नवीन
कॅमेरे? कसले कॅमेरे? त्याआधी १०० सचिवांच्या बदल्या करायच्या आहेत, तोमरला सोडविण्यासाठी आंदोलन करायचे आहे, मोदींना शिव्या द्यायला रॅली घ्यायची आहे, विधानसभेचे खास अधिवेशन बोलावून उपराज्यपाल, राजनाथसिंग, मोदी इ. चा निषेध करायचा आहे, रस्त्यांवर तमाशा करायचा आहे . . . अशी बरीच महत्त्वाची कामे सोडून कॅमेरे बसवायचेत का?
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
कपिलमुनी Wed, 06/10/2015 - 11:51 नवीन
तुम्ही पण १०० स्मार्ट सिटी ची यादी जाहीर करा
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
च
चिनार Wed, 06/10/2015 - 11:56 नवीन
माझ्या माहितीप्रमाणे स्मार्ट सिटीची यादी जाहीर झालेली आहे गुगलून बघा
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
काळा पहाड Wed, 06/10/2015 - 12:03 नवीन
स्मार्ट सिटीज वर एक वेबसाईटच सरकार तर्फे बनवण्यात आलेली आहे: http://indiansmartcities.in/site/index.aspx
↩ प्रतिसाद: चिनार
क
काळा पहाड Wed, 06/10/2015 - 12:00 नवीन
तुमची निराशा होण्याची शक्यता आहे, पण मी बीजेपीचा कार्यकर्ता नाही. माझी मतं त्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे ठरतात. मी आत्ता पर्यंत शिवसेना, मनसे, बीजेपी आणि राष्ट्रवादी यांना वेगवेगळ्या निवडणुकांत वेगवेगळ्या वेळी मतं दिली आहेत. अण्णा हजारेंच्या आंदोलनात माझी सहानुभूती अण्णा, केजरीवाल, बेदी, प्रशांत भूषण आणि हेगडेंना पण होती. आप कडून बर्‍याच आशा होत्या पण दुसर्‍या कुठल्याच पक्षाकडून इतक्या वेगाने अपेक्षाभंग झालेला नाही. तेव्हा हा प्रश्न तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्त्याला विचारलेला बरा. कसं?
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Wed, 06/10/2015 - 12:06 नवीन
बीजेपीच्या कार्यकर्त्यालाच विचारला आहे :)
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Wed, 06/10/2015 - 12:18 नवीन
ओके. मला वाटलं मला रिप्लाय आहे.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Wed, 06/10/2015 - 19:35 नवीन
तुमचा अपेक्षाभंग होणार आहे. मी भाजपचा कार्यकर्ता अथवा सभासद नाही. मी कोणत्याही बाजूने भाजप या पक्षाशी संबंधित नाही. मी भाजप समर्थक आहे (खरं तर मी काँग्रेस व काँग्रेसी विचारांच्या पक्षांचा कट्टर विरोधक आहे हे जास्त योग्य विधान आहे), परंतु मी प्रत्येकवेळा भाजपलाच मत देतो असे नाही. पूर्वी मी मतदारसंघात भाजप उमेदवार असूनसुद्धा अपक्ष, मनसे अशा पक्षाला/उमेदवाराला मत दिले होते. सध्या मी भाजप समर्थक आहे त्याचे मुख्य कारण भाजप हा सर्व ६४ कलागुणांनी युक्त असलेला पक्ष, सद्गुणांचे माहेरघर असलेला पक्ष इ. इ. नसून भाजप हा उपलब्ध पर्यायातला त्यातल्या त्यात चांगला पर्याय असल्यामुळे मी भाजपचा समर्थक आहे.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी गुरुवार, 06/11/2015 - 08:49 नवीन
मी भाजपचा कार्यकर्ता अथवा सभासद नाही. मी कोणत्याही बाजूने भाजप या पक्षाशी संबंधित नाही.
परंतु मी प्रत्येकवेळा भाजपलाच मत देतो असे नाही. पूर्वी मी मतदारसंघात भाजप उमेदवार असूनसुद्धा अपक्ष, मनसे अशा पक्षाला/उमेदवाराला मत दिले होते.
भाजप हा सर्व ६४ कलागुणांनी युक्त असलेला पक्ष, सद्गुणांचे माहेरघर असलेला पक्ष इ. इ. नसून
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
प
पिंपातला उंदीर Sat, 06/13/2015 - 17:11 नवीन
लोळ : ) : )
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 06/13/2015 - 21:03 नवीन
पिंपात उंदीर लोळतोय असे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले ! :) ;) (हघ्या)
↩ प्रतिसाद: पिंपातला उंदीर
श
श्रीगुरुजी Wed, 06/10/2015 - 11:35 नवीन
>>> पूर्ण चौकशी होऊन, कोर्टाचा निकाल लागेपर्यंत जितेंद्र सिंह तोमर यांनी राजीनामा दिला आहे. हे एक चांगले झाले. बनावट पदवी प्रमाणपत्रांचे प्रकरण ३० जानेवारीलाच बाहेर आले होते. त्यांना तिकीट न देण्याची व नंतर मंत्रीपदाची खिरापत न देण्याची आणि नंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावायची बुद्धी अवतारी महापुरूषांना तेव्हाच सुचली असती तर इतका तमाशा करावा लागलाच नसता. चौकशी पूर्ण होईपर्यंत आपण राजीनामा द्यावा ही अक्कल तोमरला सुचली असती तर आआपला इतकी नौटंकी करावीच लागली नसती. तोमरला मारहाण करून जबरदस्तीने त्याच्याकडून खोटा कबुलीजबाब पोलिसांनी लिहून घेतला असे तारस्वरात आशुतोष किंचाळत होता. काल सिसोदिया बरळत होते, "सर्व भ्रष्टाचारी आमच्याविरूद्ध एक झाले आहेत.". म्हणजे आता न्यायालयचाही याच्यात समावेश होतो. गजेंद्रसिंहला मारणारे हे सर्वजण तोमरच्या पाठीशी एक झाले होते. >>> आता जर का ते दोषी आहेत असे आढळले, तर कोर्टाने त्यांना जमेल तेव्हढी कठोर शिक्षा द्यायला पाहिजे. ४ महिने तोमरचे समर्थन करून काल दिवसभर तमाशा करणार्‍या आआपच्या लबाड नेत्यांना हीच अक्कल आधी का आली नाही?
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
क
कपिलमुनी Wed, 06/10/2015 - 11:47 नवीन
स्मृती इराणीचे नक्की क्वालीफिकेशन काय हो ? डीग्री ? युनिव्हर्सिटी ?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 06/10/2015 - 11:59 नवीन
स्मृती इराणींबाबत माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवा. जर प्रत्यक्ष माहितीत आणि जाहीर माहितीत फरक असेल तर न्यायालयात खटला दाखल करा. तोमरच्या बाबतीत नुसते आरोप न करता एकाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत त्याच्या पदव्यांची माहिती मागवून, विद्यापीठांमध्ये त्याचा पाठपुरावा करून, त्याची प्रमाणपत्रे खोटी असल्याची खात्री करून व शेवटी त्याच्याविरूद्ध तक्रार दाखल करून त्याला पायउतार होण्यास भाग पाडले. अवतारी महापुरूष केजरीवाल यांचे भक्कम पाठबळ असूनसुद्धा तोमरला जावे लागले. तुम्हीही नुसते आरोप करण्यापेक्षा हा मार्ग अवलंबिला तर योग्य होईल.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Wed, 06/10/2015 - 12:06 नवीन
दुवा १ दुवा २ स्मृती इराणीं यांना अटक झाली नाही आणि त्यांनी राजीनामा सुद्धा दिला नाही. यालाच बायस्ड राजकारण असे म्हणतात. ( जमल्यास दुवे पूर्ण वाचा)
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 06/10/2015 - 19:52 नवीन
तोमर व इराणी यांच्या केसमध्ये थोडा फरक आहे. दोघांनीही पदवी प्रमाणपत्राबद्दल खोटे प्रतिज्ञापत्र दिले असा आरोप आहे. परंतु मुख्य फरक असा की इराणी यांनी निवडणुक आयोगाकडे निवडणुक उमेदवारीचा अर्ज भरताना पदवीबद्दलचे प्रतिज्ञापत्र दिले तर तोमर यांनी निवडणुक आयोगाप्रमाणे बार कौन्सिलकडे देखील एल एल बी बद्दलचे प्रमाणपत्र देऊन त्यावर सनद मिळविली व ४ वर्षे वकीली केली. पदवीचे खोटे प्रमाणपत्र व्यावसायिक उपयोगाकरीता वापरले यासाठी प्रत्यक्ष बार कौन्सिलनेच त्यांच्याविरूद्ध तक्रार केली होती व आठवड्यांपूर्वीच न्यायालयाने त्यांच्याविरूद्ध पोलिस कारवाईचे आदेश दिले होते. काल त्यांना अटक झाल्यावर न्यायालयाने त्यांना जामीन न देता पोलिस कोठडीत ठेवले यावरून त्यांची अटक कायदेशीर होती असे दिसत आहे. इराणींनी निवडणुक आयोगाला पदवीबद्दल खोटे प्रमाणपत्र दिल्याविरूद्ध अहमर खान नावाच्या व्यक्तीने न्यायालयात दावा दाखल केला आहे व त्याचा निकाल २ आठवड्यांनी २४ जूनला आहे. इराणींनी आपल्या नसलेल्या पदवीचा व्यावसायिक उपयोग केलेला दिसत नाही. म्हणूनच त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करावी व त्यांना अटक करावी असे आदेश न्यायालयाने दिले नसावेत. इराणी यांच्याविरूद्ध निवडणुक आयोगाला चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे तर तोमर यांच्याविरूद्ध पदव्यांची बनावट प्रमाणपत्रे व गुणपत्रिका तयार करणे व त्यांचा व्यावसायिक उपयोग करणे हे जास्त गंभीर आरोप आहेत. एनीवे, इराणी केसचा निकाल २४ जूनला लागेलच. बहुतेक त्यांनाही पायउतार व्हावे लागणार असं वाटतंय.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
काळा पहाड Wed, 06/10/2015 - 11:55 नवीन
४ महिने तोमरचे समर्थन करून काल दिवसभर तमाशा करणार्‍या आआपच्या लबाड नेत्यांना हीच अक्कल आधी का आली नाही?
कारण तोमर कडे त्याच्या प्रभागातील एक मोठी व्होट बँक आहे. दुसरं म्हणजे तो आप चा मोठ्ठा देणगीदार आहे. बाकी मनीष शिसोदियांनी ज्या पद्धतीनं धमकी दिली ती पहाता आप मध्ये सगळे असेच आहेत का हा प्रश्न निर्माण होतो: https://www.youtube.com/watch?v=ltRM28_E6bY
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सतीश कुडतरकर Wed, 06/10/2015 - 11:14 नवीन
बबन लोणीकर (भाजप) - मंत्री महाराष्ट्र आधीच्या अ‍ॅफिडेवीट मध्ये पदवीधर असल्याचे सांगितले होते आणि नंतरच्या अ‍ॅफिडेवीट मध्ये पाचवी पास म्हणून दिलंय. मंत्र्याला आपण किती शिकलेलो आहोत याबद्दलच शंका! कधी कारवाई होतेय ते पाहायचं!
क
कपिलमुनी Wed, 06/10/2015 - 11:48 नवीन
इथे पण तुमच्या पक्षाची बाजू मांडा
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर
स
सतीश कुडतरकर Wed, 06/10/2015 - 13:13 नवीन
आमचा पक्ष होता, अगदी सक्रिय कार्यकर्ते होतो, 'आदेश' आला कि थेट action. पण दिघेसाहेबांचा 'अपघाती' मृत्यू झाला आणि आमचा राजकीय. अपेक्षाभंग झाल्याने आता सोडचिठ्ठी दिलेली आहे. अस म्हणतात वय वाढत गेल्यावर माणूस थोडा प्रगल्भ होतो आणि खऱ्याखोट्याची समजही यायला लागते. तसच आमचही समजा. कॉंग्रेसला तर कधीच पाठींबा नव्हता. भाजपला थोडा होता, पण 'गंगाधरहि शक्तिमान है' हे पुरेपूर कळून चुकल्यामुळे त्यांच्या डबल ढोलकी राजकारणाला विरोधच करणार.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Wed, 06/10/2015 - 13:38 नवीन
तो प्रतिसाद श्रीगुरुजी यांना होता
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर
स
सतीश कुडतरकर गुरुवार, 06/11/2015 - 07:28 नवीन
जाउदे मळमळ कुठेतरी बाहेर काढायची होती, तुम्ही निमित्तमात्र झालात. :-)
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Wed, 06/10/2015 - 21:30 नवीन
हा प्रश्न हुशारीने स्कीप केला गेला आहे
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर
ह
होबासराव Wed, 06/10/2015 - 11:17 नवीन
ह्यांच्या प्रतिसादाशी सहमत.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा