भिंतीवरील चेहरा
रात्रीची जेवणंखाणं उरकून गावातली तमाम मंडळी त्यांच्या नेहमीच्या पारावर येऊन गप्पा मारत बसली होती. आदल्याच दिवशी झालेल्या अमावास्येमुळे विषय अर्थातच भुताखेतांवर न गेला, तरंच नवल होतं. अज्याने त्याच्या मामाने पाहिलेल्या भुताचा काहीतरी एक किस्सा सांगितला, तर सच्याने त्याच्या आजीची गोष्ट सांगितली. तिला एका अमावास्येच्या रात्री विहिरीत उडी टाकून गेलेली त्यांच्या गावची पाटलीण दिसली होती.
असं प्रत्येकाचं काही ना काही सांगून झालं होतं. त्यामुळे गप्पांचा जोर कमी होत आला होता. तसं राजूचं लक्ष पाराच्या पलीकडे एका दगडावर बसलेल्या माणसाकडे गेलं. गडी गावचा नाही, हे सहज लक्षात येत होतं.