Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता

उ
उडन खटोला
Fri, 12/04/2015 - 02:17
🗣 384 प्रतिसाद
http://www.heraldgoa.in/Goa/Has-Vasco-da-Gama-been-renamed-Sambhaji/96346.html मी नुकताच Goa Speaks या फेसबुक समुहावर गेलो असता तेथे "वास्को-दा-गामा" शहराचे नामांतर गोवा भाजप सरकारने "छत्रपती संभाजीनगर " असे केल्याचे समजले. त्यावरून काही पोर्तुगीज ख्रिश्चन (?) मंडळी तावातावाने भांडत होती ... अगदी संभाजी महाराजांच्या सात पिढ्यांचा उद्धार करून Who the F*** is Sambhaji ? What is his contribution to Goa? वगैरे वगैरे चिखलफेक सुरू होती ... मी मराठी संस्थळावरील "आमचे गोय " ही लेखमालिका वाचलेली असल्याने गोव्याच्या इतिहासाची थोडीफार ओळख होती . त्यामुळे यथाशक्ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करून पोर्तुगीजांनी केलेले अत्याचार वगैरे दाखले दिले ... पण पूर्णपणे आङ्ग्लाळलेल्या चंगळवादी गोवन नवीन पिढीने चिखलफेक सुरूच ठेवली ... आणि पोर्तुगीजांनीच "इंडियन्स"ना civilized बनवले .... अगोदर तुम्ही गावठी बैलगाडीवाले होतात वगैरे नेहमीचे प्रतिवाद सुरू झाले ... गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट घेवून परदेशी पलायन करणार्‍यांची संख्या बेसुमार वाढत आहे ... अधिकृतरीत्या सुमारे 15000 तर अंनधिकृतरीत्या सुमारे 3 ते 5 लाख लोकांनी पोर्तुगीज पासपोर्ट घेतलेले असून बर्‍याच जणांकडे तर भारत आणि पोर्तुगीज असे दोन्ही पासपोर्ट आहेत , जो गुन्हा आहे.. भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?

प्रतिक्रिया द्या
66568 वाचन

💬 प्रतिसाद (384)
र
राही Sun, 12/06/2015 - 07:22 नवीन
मलाही असे मंदिर, मशीद, चर्चेस, अगदी सिनेगॉग्मध्येही जायला आवडते. मुंबईतील पारश्यांच्या ठराविक तीन अथवा पाच देवळांच्या भेटी आपल्या अष्टविनायक अथवा गणेशोत्सवात किमान पंचगणपतिदर्शन याप्रमाणे पवित्र आणि कार्य (करण्याजोगे) मानल्या जातात. त्या केल्या आहेत. त्यांच्या डुंगरवाडीला जिथपर्यंत जाऊ देतात तिथेही जाऊन तिथला वटवृक्षाचा विशाल पसारा पाहिला आहे. कलकत्त्याच्या बोटानिकल गार्डनमधल्या वडपारंब्यांची मिनि आवृत्ती. अफ्घान चर्चच्या आवारातल्या जुनाट आणि करकचून विळखा घालणार्‍या वेली आणि गूढ वातावरण अनुभवले आहे. जकारिया मशीदीत बाह्यमंडपात जाऊन पाहिले आहे. काही किल्ल्यांमध्ये वापरात नसलेल्या मशिदी असतात, त्या पाहता येतातच पण नळदुर्गात, परांद्यात वापरात असलेल्या मशिदी आहेत. तिथेही आत जाऊन पाहिले आहे. असो. विशेष म्हणजे माहीमचर्चमध्ये नऊ बुधवारी उपस्थित राहाण्याच्या 'नवीनाज़' ही कुतूहल म्हणून केल्या आहेत. एरंगळ, मढ, ईरले, वळणै(ओरलेम्), माढवे, गोराई-धारावें,आगशें(अक्सा), वसई, निर्मळ, भुइंज, मुळगाव(आणि अनेक) इथल्या देवींच्या यात्रा, लोकसमुदाय, भक्ती, भाषा (विशेषकरून जुनी अपरान्ती मराठी, जिचे यादवकालीन मराठीशी थोडेफार साधर्म्य अजूनही आहे))यांचे निरीक्षण केले आहे. अर्थात कट्टर हिंदू असतानाही धर्मबदलाचे किंवा ब्रेन-वॉशिंगचे भय वाटले नाही आणि आता अज्ञेयवादी अवस्थेत तर नाहीच नाही. पण यामुळे अगणित भिन्नमतांचे, धर्माचे लोक भेटले, मित्र झाले.लग्न,सणसमारंभांची आमंत्रणे येऊ लागली. बोहरा लग्नात अप्रतिम आणि उच्चप्रतीच्या अन्नाचा खास शाकाहारी काऊंटर मांडलेला बघितला. त्यांचे नम्र आगतस्वागत, सरबराई, गुजराती सुपर-रिच (मुंबईतले एक मोठे नाव) उद्योगपतीच्या लग्नात कंबरेपर्यंत लवून स्वागत करणार्‍या यजमानस्त्रिया बघितल्या. दाऊदीबोहरा लोकांचे त्यांच्या धर्मगुरूविरुद् छुपे बंड आणि सुधारणाचळवळ सुरू होती तेव्हा काही तरुण कुजबुजत्या स्वरात सगळ्या बातम्या देत, बाहेरच्यांची प्रतिक्रिया विचारत, इथल्या विचारवंतांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवत असत. (ती छुप्या मार्गाने पुरी होत असे.) या सगळ्यामुळे आयुष्य समृद्ध झाले असे वाटते. मीही गोव्यातल्या देवळांबद्दल असे ऐकले आहे की तिथल्या उत्सवात कुठल्यातरी एक दिवसाच्या पूजा आराधनेच्या सामग्रीची, म्हणजे फुले वगैरेची जबाबदारी अथवा मान क्रिस्तिअनांकडे असतो आणि ते लोकही अगदी प्रेमाने आणि पवित्र भावनेने ती पार पाडतात. आपल्या प्रतिसादावर लिहिता लिहिता खूपच अवांतर झाले. पण 'मन की बातां' लिहायला मिळाल्या हेही नसे थोडके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
प
प्रदीप Sun, 12/06/2015 - 08:08 नवीन
असले तरी ते खूपच छान आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
माहितगार Sun, 12/06/2015 - 08:08 नवीन
मन की बात वाचण्यास आवडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
व
विकास Sun, 12/06/2015 - 18:57 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
उ
उगा काहितरीच Sun, 12/06/2015 - 10:50 नवीन
प्रतिक्रिया आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ब
बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 07:01 नवीन
एक नंबर मनोगत. खूप आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
उ
उडन खटोला Mon, 12/07/2015 - 14:17 नवीन
तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहात प्रदीप जी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
अ
अजया Sat, 12/05/2015 - 13:30 नवीन
रोचक चर्चा
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sun, 12/06/2015 - 07:54 नवीन
उद्या मिसळपावचे नाव बदलायचे ठरवले तरी लोकं विरोधाला उभे राहतील शेकड्यानी. उगा आपले कैतरी. त्यापेक्षा गोव्याचे नाव आज ज्यामुळे हवेहवेसे वाटते त्या मद्यांची नावे प्रत्येक शहराला देऊन टाका. विषयच कट भेंडी!! (साला मिसळपावचे नाव पण 'बुधवार रात्र' करून टाका)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 12/06/2015 - 07:55 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मालोजीराव Mon, 12/07/2015 - 09:28 नवीन
गोव्याचे नाव आज ज्यामुळे हवेहवेसे वाटते त्या मद्यांची नावे प्रत्येक शहराला देऊन टाका. विषयच कट भेंडी
खटक्यावर बोट जागेवर पलटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
घ
घाटावरचे भट Mon, 12/07/2015 - 09:11 नवीन
चित्रपटः अंदाज अपना अपना परेश रावल उर्फ तेजा: ('सर ये वास्को द गामा की गन है' असे सांगितल्यावर) किसके मामा की गन है? या जगप्रसिद्ध (आणि आता ऐतिहासिकही) वाक्याच्या आधारे 'वास्को-द-गामा' शहराचे नामकरण 'किसका मामा' असे करावे असा प्रस्ताव या ठिकाणी मांडत आहे.
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 12/07/2015 - 12:07 नवीन
राही-विकास-प्रदीप, बॅटमॅन-गॅरी ट्रुमन यांच्या उपचर्चेतले प्रतिसाद आवडले. बाकी घाटावरच्या भटांच्या प्रस्तावाला अनुमोदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
घ
घाटावरचे भट Mon, 12/07/2015 - 12:23 नवीन
सगळ्या प्रतिसादांना सोडून नंदनरावांना आमच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद द्यावा वाटला, म्हणजे आमचे ग्रह नक्कीच उच्चीचे असावेत आज. बाकी,
राही-विकास-प्रदीप, बॅटमॅन-गॅरी ट्रुमन यांच्या उपचर्चेतले प्रतिसाद आवडले.
याच्याशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
अ
अभ्या.. Mon, 12/07/2015 - 09:11 नवीन
मला जरा एक पॅरलल मुद्दा मांडावासा वाटतोय. गोव्याचा विलिनीकरणाचा आसपासच हैद्राबाद मुक्तीसंग्रामाची अखेर निजामसंस्थानाच्या शेवटाशी झाली. दोन्ही आंदोलनातले साम्य पाहता बळाचा वापर केला गेला, नागरिकांची साथ मिळाली, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही आंदोलनात मराठी नेते अग्रगण्य होते. हैदराबाद मुक्तीसंग्राम हा फक्त मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम नव्हता. निजामाची राजवट बराचसा आंध्र, थोडा कर्नाटक अन मराठवाडाभर पसरलेली असता मराठी नेत्यांचे योगदान या मुक्तीसंग्रामात उल्लेखनीय होते. हैद्राबाद ह्या जुलमी राजवटीतून मुक्त होताना सध्या रामानंदतीर्थासारख्या मराठी नेत्यांची किती आठवण आंध्र प्रदेशाने अथवा सध्याच्या तेलंगणाने ठेवलीय हे पाहणे रोचक ठरेल. रामानंदतीर्थांचे नाव शेवटी महाराश्ट्रातच मराठवाडा विद्यापीठातून बाहेर पडलेल्या नांदेड विद्यापीठाला द्यावे लागले.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 09:39 नवीन
हे नक्कीच पाहिले पाहिजे अभ्या. हा एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
र
राही Mon, 12/07/2015 - 12:19 नवीन
रामानंदतीर्थांची स्मारके आंध्र-तेलंगणात नक्कीच आहेत. नलगोंडा येथे मला वाटते कॉलेज किंवा युनिवर्सिटी आहे. शिवाय मुख्य म्हणजे खुद्द कै.श्री पी.वी.नरसिंह राव हे त्यांचे प्रमुख शिष्य होते असल्याने त्यांच्या पुढाकाराने 'स्वामी रामानंद तीर्थ स्मारक समिती' स्थापन झालेली असून या समितीतर्फे अनेक समाजोपयोगी अशी बहुविध कामे चालतात. याशिवायही त्यांची काही स्मारके आहेत. सध्याच्या महाराष्ट्रातल्या औरंगाबाद येथे हैदराबाद खालोखाल मुक्तिसंग्रामाची तीव्रता होती आणि त्यात तत्कालीन हैदराबाद राज्यात असलेल्या मराठवाड्यातल्या लोकांचा सहभाग होता. म्हणजे त्यावेळी हे लोक बहुतांशी हैदराबादीच होते. नंतर राज्यविभागणीपश्चात हा सर्व प्रदेश महाराष्ट्रात आला. आपल्याला मराठवाड्याचा लढा माहीत आहे पण आंध्र-तेलंगणाने केलेला मुक्तिसंग्राम फारसा माहीत नाही. त्यामुळे असा समज होऊ शकतो. फार काय, गोविंदभाई श्रॉफ, मुकुंदराव पेडगावकर्,श्रीनिवास बोरीकर, प्रभाकर वाईकर, विजयेंद्र काबरा, अनेक नावे आज कोणाला आठवतात? तरी त्यातल्या त्यात मराठी नावे आठवतात पण तेलुगु, कन्नडभाषक मुक्तिसैनिकांची नावे आपल्याला ठाऊक असणे शक्य नाही. गोव्याच्या मुक्तिलढ्यातसुद्धा तेलो मॅस्करेन्हास, लुइ मेनेझिस ब्रगान्झा, विश्वनाथ लवंदे, प्रकाशचंद्र शिरोडकर, भेंब्रो, काकोडकर अश्या अनेक गोमंतकीयांचा सशक्त सहभाग होता. जगन्नाथराव जोशी हेही प्रमुख होते. सत्याग्रही आंदोलन मुख्यतः राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली चालले. त्यात महाराष्ट्राचा भरीव वाटा होता हे खरे पण गुजरात, उत्तरप्रदेश येथील सत्याग्रहीसुद्धा लक्षणीय होते. शिवाय मुंबईतून गोव्याचे परागंदा नेते आंदोलन चालवीत असत. स्थानिकांचा सहभाग असल्याखेरीज कोणतेही बाहेरील आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही. मग ते लादलेले आंदोलन बनते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ब
बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 12:29 नवीन
तुमचे प्रतिसाद वाचणे ही खर्‍या अर्थाने मेजवानी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Mon, 12/07/2015 - 13:11 नवीन
कै.अनंतराव भालेराव-दै.मराठवाड्याचे नामवंत संपादक, लेखक, पत्रकार आणि मुक्तिसंग्रामसैनिक यांनी यावर खूप लिहिले आहे. सेतुमाधवराव पगडी यांच्या लेखनातूनही पुष्कळ माहिती मिळते. शिवाय अगणित संदर्भ अधेमधे सापडत राहातात. अवांतर- (माझे प्रतिसाद अवांतरावाचून मलाच ओकेबोके वाटू लागले आहेत आताशी!) प्रांतिक अस्मिता फार ताणण्यात अर्थ नसतो. 'आपला' प्रांत हा काल आणि उद्या आपलाच होता/असेल असे नाही. उद्या तेलंगणासारखे विदर्भ आणि कोंकण वेगळे झाले तर आपल्या अस्मितेचे काय होईल? देशासाठीसुद्धा हा मुद्दा लागू आहे. पूर्व बंगाली लोकांच्या निष्ठा एका पिढीत तीनदा बदलल्या. यूरपमध्ये तर प्रचंड भूराजकीय उलथापालथ होत आलेली आहे. पाकिस्तानसुद्धा फुटू शकले असते. स्कॉट्लंड, आयर्लंड मध्येही हेच. उद्या मुंबई मेट्रोपॉलिटन रीजनचा दिल्लीसारखा वेगळा प्रदेश झाला, आणि काही काळाने त्याचे राज्य बनले तर? आपल्याकडे सी.पी.अँड बेरार होते तेव्हापासून (किंवा त्याही आधीपासून) वैदर्भीयांना मध्यप्रदेशाविषयी आपुलकी आहे. अमेरिकेत टेक्सासमधल्या मेहीकन लोकांना मेहीकोविषयी ओढ वाटणारच. आणखी पुढे म्हणजे समजा सध्याच्या महाराष्ट्रातल्या काही प्रदेशावर प्राचीन काली राज्य केलेल्या एखाद्या कर्तबगार राजघराण्याची राजभाषा कन्नड होती, तर त्या घराण्याचा सद्यस्थितीत (कर्नाटकाशी आपला वैरभाव असताना) 'आपले' म्हणून अभिमान बाळगायचा की नाही? तात्पर्य : आवेशात्मक अस्मिता सकारात्मक नसू शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 13:26 नवीन
सेतुमाधवराव पगडी यांच्या लेखनातूनही पुष्कळ माहिती मिळते.
सहमत, जीवनसेतू या अप्रतिम आत्मचरित्रात याबद्दल खूप माहिती आलेली आहे.
उद्या तेलंगणासारखे विदर्भ आणि कोंकण वेगळे झाले तर आपल्या अस्मितेचे काय होईल?
काही होणार नाही. महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे मराठ्यांचा इतिहास, मराठी साहित्य आणि वारकरी संस्कृती वगैरे. ते तुकडे झाले तरी तसेच असेल. भाषाही अधिकृतरीत्या मराठीच असेल-कोकणवाल्यांनी काही काडी केली नाही तर. त्यात अस्मितेचा नाश वगैरे मला दिसत नाही.
आणखी पुढे म्हणजे समजा सध्याच्या महाराष्ट्रातल्या काही प्रदेशावर प्राचीन काली राज्य केलेल्या एखाद्या कर्तबगार राजघराण्याची राजभाषा कन्नड होती, तर त्या घराण्याचा सद्यस्थितीत (कर्नाटकाशी आपला वैरभाव असताना) 'आपले' म्हणून अभिमान बाळगायचा की नाही?
=)) अहो, तुम्ही कुणाचाही अभिमान बाळगला तरी फरक पडणार नाही. म्हणजे सामान्य माणूस वगैरे मुद्दा नाही, तर हादेखील इतिहासच होता हेच लोकांना झेपणार नाही. "असं होय? बरं बरं" म्हणतील अन सोडून देतील. महाराष्ट्राच्या इतिहासात तसेही सध्या दोनच कालखंड मानले जातात- एक पांडवकाल आणि दुसरा शिवकाल =)) बाकी कर्नाटकाशी वैरभाव म्हणजे काय? बेळगाव भागाबद्दलचे दुखणे ना? बाकी काय आहे घाऊक द्वेष करण्यासारखे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/07/2015 - 13:37 नवीन
काही होणार नाही. महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे मराठ्यांचा इतिहास, मराठी साहित्य आणि वारकरी संस्कृती वगैरे. ते तुकडे झाले तरी तसेच असेल. भाषाही अधिकृतरीत्या मराठीच असेल-कोकणवाल्यांनी काही काडी केली नाही तर. त्यात अस्मितेचा नाश वगैरे मला दिसत नाही.
सहमत आहे. आपल्यासारख्या बहुसंख्य सामान्यांच्या दृष्टीकोनातून अस्मितेचा नाश वगैरे गोष्टी लिहिल्या आहेत असे वाटत नाही. कदाचित राजकारण्यांच्या (आणि राजकारणी कोंबड्या झुंझवतात त्याप्रमाणे डोलणार्‍या काही सामान्यांच्याही) दृष्टीकोनातून अस्मितेचे काय होणार वगैरे गोष्टी लिहिल्या असाव्यात असे वाटते. विदर्भ वेगळा करायची भाषा जरी केली तरी जणू काही भारत-पाकिस्तानसारखी फाळणी होणार आहे अशा प्रकारचे चित्र ते कलानगरचे आणि दादरचे साहेब उभे करतील आणि गुरगुरत अंगावर येतील!! असे काही राजकारणी लोक आणि त्यांच्या तालावर नाचणारे लोक सोडले तर इतरांना महाराष्ट्रातून विदर्भ किंवा अन्य कोणताही भाग वेगळा केला तरी संस्कृतीच्या/ अस्मितेच्या दृष्टीने शष्प फरक पडू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
र
राही Mon, 12/07/2015 - 14:43 नवीन
कल्याण, चेऊल, सोपारे, कान्हेरी, जंजिरा, सिंधुदुर्ग वगैरेचे जाऊच दे पण उद्या कोंकण वेगळे झाले तर रत्नागिरीचे काय? रत्नागिरीच्या सगळ्या सुपुत्रांवर कोंकणवासीय दावा नाही का सांगणार? भारतीय वंशाच्या, पण आता दोन-तीन पिढ्या अमेरिकेत असलेल्या कर्तबगार लोकांवर आपण सांगतो तसा? (हे विनोदाने घ्यावे.) शिवाय सध्याची महाराष्ट्री अस्मिता म्हणजे फक्त पश्चिम महाराष्ट्री अस्मिता का? मराठवाडा आपला तोंडी लावण्यापुरता,? हो, आणि महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे मराठ्यांचा इतिहास हे देखील विनोदाने मान्यच. आता गंभीरपणे, पण होय, तसे पाहाता बहुसंख्य सामान्यजनांना काहीच फरक पडत नाही हे खरेच. त्यांचे गाव, त्यांची ग्रामदेवता, तिचे उत्सव, तिचा महिमा, तिथले पीकपाणी यातच ते रमलेले असतात आणि तीच त्यांची अस्मिता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
विकास Mon, 12/07/2015 - 16:52 नवीन
या संदर्भात मला वाटते संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि नंतरची प्रादेशिक अस्मिता का झाली हे लक्षात घेतले पाहीजे... त्या वेळेस आंध्रचे भाषावार प्रांतरचनेत सर्वप्रथम राज्य झाले. नंतर एका अर्थाने जे करायची इच्छा नव्हती ते नेहरूंनी मान्य करून भाषावार प्रांतरचनेस हिरवा दिवा दाखवला. पण तो दिवा त्यांना महाराष्ट्रास दाखवण्याची तयारी नव्हती. त्यातून मोरारजी आणि सका पाटील अजूनच तेल ओतत होते... त्याही पुढे असा एक विचारप्रवाह देखील आहे (मला वाटते मिपावर पण या संदर्भात चर्चा झाली आहे) की यात मुंबई आणि महाराष्ट्र समाजवादी-साम्यवादी विचारसरणीच्या अख्त्यारीत आणणार्‍यांतला देखील हा लढा होता. त्यामुळे अस्मिता एकीकडे आणि धोरणात्मकरीत्या स्वतःची अंतस्थ विचारसरणी पुढे करणे दुसरीकडे असा देखील लढा होताच. त्यात भर म्हणून नंतर "मुंबई तुमची, भांडी घासा आमची" हे धोरण अमराठींकडून काही प्रमाणात का होईना नक्की राबवले गेले. त्याचा परीणाम म्हणून आवडो - न आवडो शिवसेना मोठी होत गेली. काही अंशाने सामान्य मराठी माणसास नक्की फायदा झाला. पण आज मराठी माणसास झालेला फायदा हा त्याच्या कुठल्याही प्रकारच्या उद्योग धंद्यातील लाज सोडून कष्टाने मोठे होण्यामुळे झालेला आहे, असे वाटते. तरी देखील अजून सगळे चांगले आहे असे नाही. पण तो (अजूनच) वेगळा विषय आहे. गेल्या पन्नास वर्षात भले अनेक नकारात्मक काय घडले हे सप्रमाण बोलता आले तरी एक गोष्ट विशेष करून राव-सिंग साहेबांच्या काळानंतर झाली ती म्हणजे मुक्त अर्थव्यवस्था... आज त्याचा परीणाम म्हणून बर्‍यापैकी देश हा भाषा-संस्कॄतीतले फरक असूनही एकत्र झाला आहे. त्यामुळेच जनतेला बिहार, उत्तर प्रदेश यांचे विघटन चालले. इतकेच कशाला जो आंध्र पहील्यांदा झाला त्याचे देखील विघटन तिथल्या जनतेने "बर्‍यापैकी" सहज मान्य केले. उद्या विदर्भाचे देखील तसे झाले तरी आश्चर्य वाटणार नाही. पण वैदर्भियांना, त्यामुळे अच्छे दिन येतील का, हा मात्र तुर्तास वादाचाच मुद्दा आहे. मात्र मुंबईचे वेगळे प्रशासन करणे तुर्तास जमणार नाही. त्यासाठी त्यांना तोच न्याय इतर मेट्रो शहरांना लावावा लागेल. हे सरकार यामधे पडेल असे आत्ता तरी वाटत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Mon, 12/07/2015 - 18:31 नवीन
चांगला प्रतिसाद, पण तपशिलाच्या काही चुका आहेत. एक तर भाषावार प्रांतरचना व्हावी असे तत्कालीन नेत्यांना वाटत नव्हते, कारण त्यामुळे प्रांतिक अस्मिता वाढीस लागून थोडाफार कलह निर्माण होईल अशी भीती होती, जी चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी खरी झाल्यासारखे वाटू लागण्याइतपत परिस्थिती होती. दुसरे म्हणजे भाषावार प्रांतरचना ही लोकांची मागणी होती. स्वतंत्र आंध्रासाठी पोट्टी श्रीरामलु यांनी आत्मदहन केल्यावर ही चळवळ मोठ्या प्रमाणावर हिंसक बनली आणि तेलुगुभाषिक आंध्रप्रदेश वेगळा निर्माण करावा लागला. एकदा पायंडा पडल्यावर इतरांना थांबवणे कठिण होते. हैदराबाद विलीनीकरणानंतर तेलुगुभाषकांनी वेगळे राज्य मागितल्यावर हैदराबाद राज्यातल्या उरलेल्या मराठी आणि कन्नडभाषकांची व्यवस्था लावणे ओघानेच आले. मैसुर संस्थान, मुंबई इलाक्यातले चार जिल्हे आणि हैदराबाद संस्थानातला कन्नड प्रदेश एकत्र करून कर्नाटका होऊ शकत होते. प्रश्न फक्त मुंबईचा होता. तेव्हा मुंबई प्रेसिडेन्सीचा उरलेला भाग, कच्छ-सौराष्ट्रातली संस्थाने व त्यातला ब्रिटिश भाग तसेच मराठवादा आणि विदर्भ यांचे मिळून एक महाद्वैभाषिक बनवण्यात आले. पण हा निर्णय लोकांना पसंत नव्हता. समाजवादी आणि डाव्या पक्षांनी स्वतंत्र महाराष्ट्रासाठी आंदोलन केले आणि त्याला लोकांचा उत्स्फूर्त असा जोरदार पाठिंबा मिळाला. पण बोन ऑव्ह कंटेन्शन मुंबई शहर होते, जिथे गुजराती उद्योगपतींचे हितसंबंध किंबहुना देशाचेच आर्थिक हितसंबंध गुंतले होते. तेव्हाच्या काँग्रेसमधल्या कट्टर उजव्या गटाने म्हणजे स.का.पाटील, मोरारजीभाई (स. का. पाटील हे सरदार वल्लभभाईंचे उजवे हात होते आणि वल्लभभाईंपश्चात त्यांना आंतरराष्ट्रीय उजव्या फळीचा-पक्षी अमेरिकेचा जोरदार पाठिंबा होता. याविषयी बरेच लिहिता येईल. पुढे शिवसेनेचा उदय हाही यात येऊ शकेल) वगैरेंनी मुंबई स्वतंत्र राखावी असा प्रस्ताव मांडून बघितला. नेहरूही विरुद्ध गेले पण लोकमताच्या रेट्यापुढे त्यांना नमावेच लागले. मुंबईसह महाराष्ट्र आणि महागुजरात अशी दोन राज्ये स्थापन झाली. नंतरची राज्यविभाजने ही भाषिक तत्त्वावर फारशी न होता कारभाराच्या सोयीसाठी आणि दुर्गम प्रदेशाच्या विकासासाठी छोटी राज्ये असावीत यासाठी झाली. त्यामुळे अर्थात फारशी खळखळ झाली नाही. भाषा-संस्कृतीत फरक असूनही मुक्त व्यवस्थेमुळे देश एकत्र झाला हे विधान थोडे फार-फेच्ड वाटते. विविधतेतून एकता हे तत्कालीन सूत्र होते आणि ते बर्‍यापैकी अस्तित्व राखून होते. मुक्त व्यवस्थेतून माध्यम क्रांती आणि त्यातून एकता असा क्रम लावता येईल पण तो तितकासा बरोबर ठरणार नाही. जलदगती माध्यमे ही दुधारी असतात. ती त्वरित जोडतात तितकीच तोडतातही. बाकी प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
स
सुबोध खरे Tue, 12/08/2015 - 05:35 नवीन
भाषावार राज्य रचना करण्याचे मुख्य कारण प्रशासनास आणि जनतेस सोयीची एक भाषा वापरणे सोपे जाते. एकाच राज्याच्या तीन भाषा असल्यास सामान्य जनता कारभारापासून दुरावते हे सत्य आहे. आज कितीही झाले तरी मराठी माणसाला गुजराती, तेलुगु किंवा कानडी भाषा व्यवहाराला कठीण गेल्या असत्या. सीमा भागात ती भाषा बोलू शकणारे अनेक लोक आहेत पण त्यातील किती लोक त्या भाषा लिहू वाचू शकतात? पोलिस पंचनामा, शासकीय पत्रके,आरोग्य विषयक धोरणे, शेतकीचे ज्ञान, न्यायालयांची कामे हि स्थानिक भाषात झाल्यामुळे सामान्य आणि अर्ध शिक्षित लोकांचा नक्कीच फायदा झाला. विविधतेत एकता हे जरी बरोबर असले तरी स्थानिक पातळीवर खतांचे बियाण्याचे ज्ञान तेलुगूत दिले तर सीमावर्ती भागातील किती शेतकर्यांना ते समजेल. गुजराती तेलुगु( कन्नड) या लिप्या अगदी भिन्न आहेत. साधे तांबीची निरोधची जाहिरात त्या भाषात दिल्यास चौथी पास महिलांना किती समजेल? किंवा तेलंगणात राहणाऱ्या मराठी भाषिकास तेलुगूत आलेले सरकारी पत्रक समजेल काय? तेंव्हा भाषावार प्रांत रचना प्रांतवादास खात पाणी घालते हे अर्ध सत्य आहे. आज तेलंगण हे आंध्र पासून किंवा झारखंड बिहारपासून भाषा एक असतानाही वेगळे झाले याचे कारण स्थानिक जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न भाषा नसून वेगळे होते.भाषेमुळे प्रांतीक अस्मिता वाढीस लागते हे पूर्ण सत्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
अ
असंका Mon, 12/07/2015 - 12:42 नवीन
खरोखरच थक्क करणारा माहितीचा खजिना आहे आपल्याकडे.... अनेक धन्यवाद या सर्वांगीण माहितीबद्दल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राही Mon, 12/07/2015 - 14:45 नवीन
कसचे कसचे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
अभ्या.. Mon, 12/07/2015 - 14:53 नवीन
धन्यवाद राहीताई मला अगदी १०० टक्के ग्यारंटी होती की या विषयाव्रर राहीताईंचा अभ्यासपूर्ण प्रतिसाद येणारच. प्रतिसादातल्या माहीतीबद्दल धन्यवाद. अनंत भालेराव आणि मराठवाडातील लेखाशिवाय हा इतिहास समजणे मुश्कील इतके त्यांचे महत्व आहे. गोविंदभाई श्रॉफ सुध्दा लोकमत मध्ये आठवणींच्या स्वरुपात लिहित असत. स्व. पी. व्ही. नरसिंहरावांच्या शिष्यत्वाबद्दल माहीती होतीच. हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेला सुध्दा त्यांनी भेटी दिल्या होत्या. ती शाळा अद्याप चालू आहे. त्यांचे शिष्यत्व कश्या प्रकारचे (राजकीय, आध्यात्मिक अथवा शैक्षणिक) स्वरुपाचे होते याविषयी मात्र माहिती नाही मला जास्त. थोडेसे अवांतरः स्वामी रामानंदतीर्थांचे संन्यासपूर्व नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर. अन ते माझे नात्यातील. त्यांची थोडी कुलशा़खा सोलापूर येथे पण आहे. दुर्दैवाने त्यांच्याकडून जास्त माहीती मिळत नाहीये पण काही दुर्मिळ पुस्तकातून मिळतेय. काही संदर्भ सुचवल्यास आभारी राहीन. आपल्या बॅटोबाकडेही रामतीर्थांवरील एक पुस्तक पाहण्यात आले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
म
मंदार कात्रे Mon, 12/07/2015 - 14:11 नवीन
२५०+ प्रतिसाद .... उडन खटोलाजीचे विमान हवेत फार उन्च उडत आहे हबिनंदन ! रच्याकने - उडन खटोला म्हणजे विमानच ना ?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 12/07/2015 - 20:21 नवीन
+१०००० आणि त्यातले किमान दोनशे तरी प्रतिसाद वाचनिय आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मंदार कात्रे
प
पिशी अबोली Mon, 12/07/2015 - 16:14 नवीन
मूळ विषयापेक्षा चर्चेतली अवान्तरे फार रोचक झालेली आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अगम्य Mon, 12/07/2015 - 19:59 नवीन
वाल्गुदेय आणि ट्रुमन साहेबांची चर्चा अतिशय परस्पर पूरक आहे. तंत्रज्ञान अस्तित्वात येण्याकरिता अनेक ज्ञानशाखांचे coordination लागते. त्यासाठी ज्ञानाची सुलभ उपलब्धी आणि देवाणघेवाण करता येणे आवश्यक आहे. भारतात लोकांनी उत्तम काम केले होते. परंतु क्लिष्ट पद्य सादरीकरण आणि युरोप प्रमाणे journals किंवा Royal Society सारख्या मंचाचा अभाव (किंवा कमतरता) असल्यामुळे आपल्यायेथे असलेले ज्ञान पुढे नेणे किंवा विविध ज्ञानशाखांची सांगड घालणे ह्यासाठी लागणारे framework चांगले नव्हते. असे framework असते तर वाल्गुदाचार्यांनी उल्लेख केलेल्या केरळी गणितींचे काम कोणीतरी पुढे घेऊन जाणे शक्य झाले असते. चांगला राजाश्रय मिळाला असता तरी थोडा फरक पडला असता. पेशवे रमणा भरवीत. हा एक प्रकारचा conference सारखा platform होता जेथे देशभरातून विद्वान येत. त्याचा उत्तम उपयोग करून घेत आला असता. परन्तु त्यात वैज्ञानिक चर्चा झाल्याचे माहितीत नाही. मला चर्चा भरकटवायची नाही. मी पगारे ह्यांचा डू आयडी सुद्धा नहि. परंतु जातिव्यवस्थेमुळे समाजातील एक मोठा भाग लेखन, वाचन आणि formal शिक्षणा पासून वंचित राहणे हे ही भारतातील वैज्ञानिक संशोधन आणि त्याचा प्रसार ह्याला मारक ठरले असावे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 12/07/2015 - 20:07 नवीन
सहमत आहे. जातिव्यवस्थेचा हा एक महत्त्वाचा तोटा आहे. गणिती लोकांनी गणिताचा अभ्यास केला, लोहारांनी उत्तम तलवारी बनवल्या आणि प्रत्येक जातीने आपापले काम अगदी मोठ्या कौशल्याने केले. पण सांगड घालणे काही जमू शकले नाही. किमान लेट मध्ययुगात तर नाहीच नाही. बाकी केरळी गणितपरंपरेचे वैशिष्ट्य म्ह. त्या परंपरेत दोन ब्राह्मणेतर आचार्यही आहेत-जे आजवर अख्ख्या भारतात अश्रुतपूर्व म्हटले तरी चालेल. गुप्तोत्तर काळात ब्राह्मण-क्षत्रियेतर लोकांचा संस्कृत विद्येशी संपर्क ना के बराबर असतानाही त्या आचार्यांनी बाकी जातींना अंशतः सामावून घेतले हे विशेषच म्हटले पाहिजे. पण केरळ म्हणजे भारत नव्हे. तिथली समाजव्यवस्था कैक अंशी अपवादात्मक होती. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अगम्य
र
राही Tue, 12/08/2015 - 04:39 नवीन
जातिव्यवस्था मजबूत होणे हे कारण आहेच, पण माझ्या मते एक कॉमन अशी संपर्कभाषा न उरणे हे देखील एक कारण असू शकेल. मौर्य आणि अशोककाळात प्राकृत भाषा थोड्याफार फरकाने सर्वांना समजू शकत होत्या, गुप्त-अर्लीगुप्तोत्तरकाळात संस्कृत ही राजभाषा आणि संपर्कभाषा होती. पण यानंतर प्राकृतांचे स्थित्यन्तर होत असताना भाषांचे प्रांतिकीकरण-रीजनलाय्ज़ेशन झाले. म्हणजे तुलनात्मक छोट्या प्रदेशांत वेगवेगळ्या भाषा अस्तित्वात आल्या. भाषांची घडण नव्याने होत असताना सार्थशब्दसंपत्तीच्या, कठिण संकल्पनांच्या शब्दाभिव्यक्तीच्या मर्यादा आलेल्या असू शकतात. इसवी सनाच्या दुसर्‍या सहस्रकाच्या आधीची आणि सुरुवातीची दोनदोन अशी चार शतके हा काळ भारतीय उपखंडासाठी संक्रमणाचा आणि खळबळीचा,जडणघडणीपेक्षा मोडतोडीचा काळ होता असे वाटते. शंकराचार्यांचा उदय, बौद्धमताची संपूर्ण पीछेहाट, ऐहिकतेकडून-भौतिकतेकडून आधिभौतिकतेकडे आणि त्यातून पुन्हा धार्मिकतेकडे व कर्मकांडाकडे प्रवास असा एक मोठा टप्पा डोळ्यांसमोर येतो. भक्तिपंथ, इस्लाम आगमन, नंतर वसाहतींची सुरुवात असा एक घटना क्रम यानंतर दिसतो जो देशी ज्ञानाला कदाचित मारक ठरलेला असू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
उ
उडन खटोला Wed, 12/09/2015 - 14:23 नवीन
उदंड प्रतिसाद आणि समग्र चर्चेबद्दल आभार व धन्यवाद ... पैसा ताई यांच्या सविस्तर प्रतिसादाची अपेक्षा होती ... असो
  • Log in or register to post comments
र
रमेश भिडे Wed, 12/09/2015 - 15:54 नवीन
समयोचित विषय व उत्तम चर्चा !
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Wed, 12/09/2015 - 15:58 नवीन
३००
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 12/09/2015 - 16:51 नवीन
हे घ्या लेखाच्या मूळ विषयाशी संबंधित काही. १) वास्को द गामाबद्दल २)इन्क्विझिशन ३) मराठ्यांचे गोव्याच्या इतिहासात योगदान आणि त्यातील संभाजी राजांचा सहभाग पोर्तुगीज दप्तरात, महाराजांनी पोर्तुगीजांना जरब बसवण्यासाठी लिहिलेली तसेच पोर्तुगीज महाराजांना किती घाबरत असत हे दाखवणारी पत्रे उपलब्ध आहेत.
छत्रपति संभाजी महाराज राज्याभिषेक होताच अवघ्या १५ दिवसात हा २३ वर्षांचा राजा मोहिमेवर निघाला. बरोबर पेशवे मोरोपंत आणि सरनौबत होते. त्यानी बुर्‍हाणपूरवर हल्ला करून २ कोटी रुपयांची लूट मिळवली. यावेळेला एका अरबी व्यापार्‍याकडून राजांनी घोडे विकत घेतले असा उल्लेख आहे. हा व्यापारी एवढा घाबरला होता की तो ते घोडे फुकट द्यायला तयार झाला होता म्हणे! पण सामान्य जनतेला त्रास देऊ नये हे शिवाजी राजांचं तत्त्व संभाजी राजांनीही अंगिकारलं असावं. यापूर्वीच म्हणजे इ.स. १६८० मधे शिवाजी महाराजांचा मृत्यु होताच औरंगजेब ५ लाख सैन्य आणि ४ लाख जनावरे घेऊन स्वतः महाराष्ट्रात दाखल झाला होता, मराठी राज्य सहज चिरडून टाकू अशा हिशेबाने तो आला असेल पण आपली गाठ कोणाशी आहे याची त्याला जराही कल्पना नव्हती! नाशिकजवळच्या रामशेजच्या एका किल्ल्यासाठी मुघल सैन्याला ७ वर्षं लढावं लागलं! तसंच पुढच्या ९ वर्षात नाव घेण्यासारखा एकही विजय मुघल सैन्याला मराठ्यांसमोर मिळवता आला नाही. संभाजी राजांच्या काही सैन्याने औरंगजेबाच्या सैन्याला गनिमी काव्याने सळो की पळो करून सोडले तर स्वतः राजे कोकणात उतरले. त्यानी प्रथम पोर्तुगीजांकडे मैत्रीचा हात पुढे केला पण पोर्तुगीजांनी मुघलांना मदत करणे पसंत केलं. आता राजांनी पोर्तुगीजांना संपविण्याचा निर्धार केला. मर्दनगडाची डागडुजी करून तिथे आणि भतग्राम (डिचोली) इथे सैन्याचे भक्कम तळ उभारले. वयाच्या १६ व्या वर्षापासून संभाजी राजांनी थोरल्या महाराजांबरोबर गोव्याच्या आणि इतर मोहिमांमधे भाग घेतला होता, त्यावेळेला महाराजांचं युद्धतंत्र त्यांच्या पूर्ण अंगवळणी पडलं असावं. तसंच गोव्याच्या भूमीची संभाजी राजांना पूर्ण माहिती झाली होती. यामुळेच गोव्यात राजांचा सर्वत्र सहज संचार होत असे. इ.स. १६८३ मधे राजांनी चौल पोर्तुगीजांकडून घेतले तर ११ डिसेंबर १६८४ ला बार्देशवर हल्ला केला. बार्देशातील थिवी, चोपडे हे किल्ले जिंकले. साळशेत (मडगाव) घेतले. म्हैसूरच्या चिक्कदेवरायाचा पराभव केला आणि शिवाजी महाराजानी स्थापन केलेल्या राज्याचा आणखी विस्तार केला. राजे अवघ्या १ लाख सैन्यानिशी ५ लाखाचे मुघल सैन्य, जंजिर्‍या चा सिद्दी, गोव्यातले पोर्तुगीज आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय एवढ्या आघाड्यांवर एकाच वेळी लढत होते. पैकी गोव्यात त्यानी बराच काळ वास्तव्य केलं. गोव्यातलं त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यानी पोर्तुगीजांना पायबंद घातला आणि धर्मांतरित झालेल्याना परत शुद्धिकृत करून हिंदू करून घेण्याचं शिवाजी महाराजांचं कार्य त्यांच्या या पुत्रानेही पुढे चालू ठेवलं. शिवाजी महाराजांच्या गोवा मोहिमेत इथल्या स्थानिक राणे, देसाई वगैरे मंडळीनी त्याना विरोधच केला होता. पण त्यांची मदत मिळवण्यात संभाजी राजे मात्र यशस्वी ठरले. असोळणा, कुंकोळी इथल्या मराठ्यांनी आणि साखळीच्या राणे घराण्याने राजांना खुल्या दिलाने मदत केली आणि त्यांचं राज्य स्वीकारलं. समाजातून बहिष्कृत झालेल्या राण्यांना संभाजी राजानी पंक्तिपावन करून घेतले आणि राणे राजांचे ऋणी झाले. गोकुळाष्टमीच्या रात्री संभाजी राजांनी मांडवी नदी पार करून पोर्तुगीजांवर हला करण्यासाठी नदीच्या पात्रात घोडे घातले, पण पावसात उधाण आलेल्या प्रवाहात घोड्याचा पाय घसरला आणि राजे वाहून जाऊ लागले. या वेळेला खंडो बल्लाळाने राजांना वाचवले अशी कथा स्थानिक लोकांच्या सांगण्यात येते. काही मराठी सैन्य साळशेतमधे ठाण मांडून बसले तर स्वतः राजांनी वेळ न गमावता कुंभारजुवे बेट पोर्तुगीजांकडून घेतले आणि तीन बाजूंनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर हल्ला चढवला. आता फक्त तिसवाडीच पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिली होती. दुसर्‍या दिवशी राजे स्वतः गोवा वेल्हावर हल्ला करणार हे पोर्तुगीजांनी जाणले. आताच्या ओल्ड गोवा येथून कुंभारजुवे बेट दिसते. तिथल्या सैन्याच्या हालचाली पाहून पोर्तुगीज घाबरले. त्यांनी चर्चमधलं सेंट फ्रान्सिस झेवियरचे शव बाहेर काढलं. व्हाईसरॉय काउंट डी अल्वारिसने आपला राजदंड त्याच्या शवपेटीवर ठेवला आणि "सायबा, तूच आमचं रक्षण कर" अशी करुणा भाकली. पोर्तुगीजाना हा सायब पावला की नाही माहित नाही, पण मुघल मात्र मात्र पावले! सुमारे १ लाखाचे मुघल सैन्य कोकणात उतरल्याची खबर आली आणि जिंकत आलेली गोव्याची मोहीम अर्धवट टाकून संभाजी राजाना परत जावं लागलं. इ.स. १६८४ मधे संभाजी राजांनी पोर्तुगीजांबरोबर तह केला. त्या अनुसार मराठ्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले गोव्याचे ३ तालुके त्याना सोडून दिले. तर पोर्तुगीजानी चौल इथे कर देण्याचं मान्य केलं. पण या तहाची पूर्ण अमलबजावणी झाली नाहीच! बार्देशमधले किल्ले मराठ्यांनी परत केले नाहीत. आता औरंगजेबाची वक्रदृष्टी गोव्याकडे वळली. पण पोर्तुगीजांनी गोव्यातल्या मराठा देसायांबरोबर तह केला आणि मुघल सैन्याच्या हाती काही लागले नाही. मराठा सैन्य आणि पोर्तुगीज यांच्या चकमकी सुरूच राहिल्या. पण संभाजी राजे पोर्तुगीजांना हाकलून लावण्यासाठी परत गोव्यात येऊ शकले नाहीत. ते जर झालं असतं तर आज गोवा महाराष्ट्राचा एक जिल्हा राहिला असता! आणखी सतत ४ वर्षे मुघलाना हुलकावण्या देत जेरीला आणणारा हा शूर छत्रपती १ फेब्रुवारी १६८९ ला कपटाने कैद झाला. त्यांच्या सख्या मेव्हण्याने, गणोजी शिर्क्याने विश्वासघात केला आणि नंतर तब्बल ४० दिवस हालहाल करून शेवट औरंगजेबाने ११ मार्च १६८९ ला राजांचा वध केला. पण एवढे हाल होत असतानाही या छाव्याने औरंगजेबाचा कोणताच प्रस्ताव मानला नाही आणि वीराचे मरण पत्करले. महाराष्ट्राच्याच नाही तर गोव्याच्या इतिहासात या राजाचं स्थान अद्वितीय आहे. त्याच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा झुंजण्याचा निर्धार आणखीच पक्का झाला आणि नंतर एकजुटीने पण निर्नायकी अवस्थेत मराठ्यांनी मुघलांना जी झुंज दिली तिला इतिहासात तोड नाही. पराक्रमात बापसे बेटा सवाई असलेल्या या तरूण राजाने अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात विजेसारखं थोड्या काळासाठी लखलखून आत्मार्पण केलं आणि सामान्य शेतकर्‍यांना औरंगजेबाशी भांडण्याचं पहाडाचं बळ दिलं. गोव्यात पोर्तुगीजांना बसलेला दणका एवढा प्रचंड होता की त्या ३ तालुक्याच्या पलिकडे आणखी प्रदेश आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्नसुद्धा त्यानी नंतर केला नाही.
यानंतरच्या काळात सावंत आणि सौंदेकर यानी पोर्तुगीजांविरुद्ध एक पाऊल पुढे २ पावले मागे करत लढा सुरूच ठेवला. त्यानंतर बाजीरावाच्या काळात पुढीलप्रमाणे घटना घडल्या.
इ.स. १७२० नंतर बाजीराव पेशव्यांच्या सरदारानी उत्तर गोव्यात हल्ले चालू ठेवले. आता फोंड सावंत बाजीरावाच्या बाजूने पोर्तुगीजांवर हल्ले करू लागला. बाजीराव आणि चिमाजी, पोर्तुगीजांविरुद्ध वसई आणि गोव्याच्या दोन्ही आघाड्यांवर लढत होते. पोर्तुगीजांनी वसईला गोव्यातून मदत पाठवू नये म्हणून इ.स. १७३९ साली दादाजी भावे नरगुंदकर, वेंकटेशराव घोरपडे आणि जिवाजी शिंदे यांनी गोव्यावर पुर्‍या ताकदीने हल्ला चढवला. राशोल आणि मार्मुगोव्याचा किल्ला सोडून उरलेला साळशेत तालुका मराठ्यांच्या ताब्यात आला. तर फोंड सावंतानंतर गादीवर आलेला त्याचा नातू रामचंद्र याने बारदेश तालुका घेतला. मराठ्यांनी फोंडा, सुपे आणि सांगे तालुके ताब्यात घेतले. संभाजी राजांनंतर परत एकदा पोर्तुगीजांच्या ताब्यात फक्त तिसवाडी राहिली. आता पोर्तुगीजांनी बाजीरावाकडे तहाची याचना केली. बाजीरावाने इन्क्विझिशन बंद करा, हिंदूंचा छळ बंद करा या आणि आणखी मागण्या पोर्तुगीजांपुढे ठेवल्या. इ.स. १७४० मध्ये चौल आणि कोर्लाईचा किल्ला देऊन पोर्तुगीजानी गोव्यात आपलं अस्तित्त्व कसंबसं राखलं. मराठ्यांनी कुंकोळी आणि असोळणा परत केले, पण रामचंद्र सावंताने बार्देश मात्र परत केला नाही! रामचंद्र सावंत आणि मराठे विरुद्ध पोर्तुगीज अशा चकमकी सुरूच राहिल्या. सोंदेकर आणि राणे यानी या वेळेला पोर्तुगीजाना मदत करायचं मान्य केलं. इ.स. १७५६ साली पोर्तुगीज व्हॉईसरॉय कॉण्डे डी अल्वाने मराठ्यांच्या ताब्यातील मर्दनगडावर हल्ला केला. या लढाईत स्वतः व्हॉईसरॉय मरण पावला! गोंधळाचा फायदा घेत सावंतांनी पेडणे, सांगे आणि मणेरी तालुके घेतले. २४ डिसेंबर १७६१ ला तह झाला आणि पोर्तुगीजांनी सावंतांच्या ताब्यात असलेल्या सर्व प्रदेशावर सावंतांचा हक्क मान्य केला. याच सुमाराला पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि पेशवाई दुबळी झाली. याचा फायदा घेत पोर्तुगीजांनी इ.स. १७६३ मध्ये मर्दनगड जिंकून सोंदेकरांच्या ताब्यात दिला. पण एवढ्यात म्हैसूरच्या हैदर अलीने सोंदेकरांवर हल्ला केला. सोंदेकर पळून गोव्यात पोर्तुगीजांच्या आश्रयाला आले. आता कसलीच जबाबदारी नको म्हणून सोंदेकरानी फोंडा, केंपे आणि काणकोण तालुके पोर्तुगीजांच्या हवाली केले. इ.स. १७७१ साली सोंदेकरानी गोव्यातल्या त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशावरचा हक्क सोडून दिला. इ.स. १७८५ साली कोल्हापूरच्या छत्रपतीनी सावंतांवर हल्ला केला. आता घाबरून सावंतानी पोर्तुगीजांकडे मदत मागितली आणि त्या मदतीची परतफेड म्हणून पेडणे तालुका पोर्तुगीजांच्या हवाली केला. अशा प्रकारे इ.स. १७८८ मध्ये पूर्ण गोवा पोर्तुगीजांच्या सत्तेखाली आला. पोर्तुगीजांनी इ.स. १५६० साली जिंकलेल्या तिसवाडी, बार्देश आणि साळशेत (साष्टी) तालुक्याना 'जुन्या काबिजादी' तर इ.स. १७७१ आणि इ.स. १७८८ मध्ये ताब्यात आलेल्या उरलेल्या प्रदेशाला 'नव्या काबिजादी' हे नाव मिळालं.
संपूर्ण गोव्यात पोर्तुगीजांची सत्ता १७८८ नंतर प्रस्थापित झाली. या नंतरच्या काळात मराठी इतिहास संपूर्ण पुसून टाकायचा पद्धतशीर प्रयत्न झाला. इथपर्यंत की कार्निव्हालच्या मिरवणुकीत शिवाजी आणि संभाजी यांची सोंगे आणून ते कसे हरले हे खोटेच दाखवण्यात यायचे. तसेच स्थानिक लोकांवर धर्मांतराची जबरदस्ती वगैरे प्रकार बंद झाले. गुन्हेगारांना कठोर शिक्षा असल्याने तेव्हाची राजवट सामान्य लोकांना चांगली वाटू लागली.
भारतात विलीन होवून 55 वर्षे झाली तरी गोवेकरांमध्ये " भारतीयत्व " रुजलेच नाही असे म्हणावे का?
हे सरसकट नाहीये. महाराष्ट्रापेक्षा गोव्यात परप्रांतातून येणार्‍या लोकांना जास्त चांगली वागणूक मिळते. आम्हाला कोणीही कधी "भायले" म्हणून हिणवले नाही. कानडी आणि केरळी लोकांच्या बाबत मात्र थोडा भेदभाव, आकस दिसतो. पण आंदोलने वगैरे होतील असा नाही. काही लोक जे तुम्ही म्हणताय तसे बोलतात किंवा पोर्तुगीज पासपोर्ट बाळगतात त्यांना "पोर्तुगालला चालते व्हा" म्हणून सांगितले जातेच!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 12/10/2015 - 09:07 नवीन
महाराष्ट्रापेक्षा गोव्यात परप्रांतातून येणार्‍या लोकांना जास्त चांगली वागणूक मिळते. आम्हाला कोणीही कधी "भायले" म्हणून हिणवले नाही.
बाकी सगळी उत्तम माहिती पण महाराष्ट्राबाबतची टिप्पणी अनावश्यक वाटली. मी आणि माझे कुटुंबिय मूळ गोव्यातीलच आहोत आणि आज अनेक वर्षे महाराष्ट्रात अतिशय आनंदात आहोत. गोव्याबाबत जितकी आपुलकी, माया वाटते तितकेच प्रेम आम्हांला महाराष्ट्राबद्दलही वाटते. महाराष्ट्रातही सहसा बाहेरुन येणार्‍यांना कोणी हिणवत वगैरे नाही. तुला असा काही वैयक्तिक अनुभव आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/10/2015 - 09:11 नवीन
बिहारी वगैरेंबद्दल तर सर्वत्रच तिरस्कार आहे पण गोवेकरांबद्दल महाराष्ट्रात कधी आकस पाहिला नाय बा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
प
पैसा गुरुवार, 12/10/2015 - 09:13 नवीन
वैयक्तिक अनुभव नाही. मी स्वतःच महाराष्ट्रीय असल्याने मला कोण हिणवणार? उलट मलाच दाक्षिणात्य आणि बांगला देशी येऊन मुंबईत दादागिरी करतात ते आवडत नाही. पण मुंबईत आणि इतरत्र गुजराती, मारवाडी, दाक्षिणात्य किंवा उत्तर भारतीय लोकांनी येऊ नये म्हणून आंदोलने होतात. शिवसेनेची स्थापनाच त्या उद्देशाने झाली आहे. आपल्याकडे या परप्रांतीयांना वेगवेगळी नावे दिली जातात, हिणवले जाते. गोव्यात असे आंदोलन कधी झाले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 12/10/2015 - 09:23 नवीन
पैतै, काहीही हां! मुंबईत सरसकट अशी आंदोलने कधी झाली नाहीत. येणारी व्यक्ती केवळ अमराठी आहे ह्यासाठी झालेली ती आंदोलने नव्हती. जर बाहेरुन एखादी व्यक्ती एखाद्या राज्यात येत असेल तर त्या राज्याचे कायदे कानून, वागण्याच्या पद्धती त्या व्यक्तीने आत्मसात करायला हव्यात. तसे न होता, जर बाहेरुन आलेली व्यक्ती स्थानिकांची गळचेपी करु पाहात असेल तर त्यासंबंधित असंतोष बाहेर पडेलच ना कधी ना कधी? राजकीय पक्ष त्यावर आपली पोळी भाजतात ते बाजूला ठेव, ते तर सगळीकडेच चालते, अगदी गोव्यात सुद्धा. पण इतकी frivolous अशी ही आंदोलने नक्कीच नव्हती. मुंबईसारखे cosmopolitan शहर नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 12/10/2015 - 09:56 नवीन
आंदोलने योग्य अयोग्य यात मी पडत नाही. पण फॅक्ट काय आहे? मुंबईत पूर्वी अशी आंदोलने झालेली आहेत. आणि गोव्यात झालेली नाहीत इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 12/10/2015 - 09:57 नवीन
अच्छा, असे आहे होय? बरं बरं. :) पण गोव्यात २००६ मधे जातीय दंगल झालीये, हे माहित असेलच तुला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 12/10/2015 - 10:38 नवीन
जातीय दंगा वेगळा. आपण प्रांतीय दंग्याबद्दल बोलत्त होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 12/10/2015 - 10:53 नवीन
जोक्स अपार्ट, माझा दंग्याबाबत सांगण्यामागे उद्देश्य हा होता की कधी ना कधी उद्रेक बाहेर पडतो. अगदी गोव्यातही तो होतो. जातीय काय आणि प्रांतीय काय. गोव्यात प्रांतीय दंगे काय करणार? मुंबईत ज्या आणि जितक्या संधी आहेत तितक्या गोव्यात आहेत का? गोव्यातील कोणते शहर मुंबईसारखे आहे? मुंबईमध्ये जसे सगळीकडून जितके आणि ज्या प्रमाणात लोक येतात तसे गोव्यात येतात का? मुंबईच्या व्यवस्थेवर जसा आणि जितक्या प्रमाणात ताण पडला आहे तसा गोव्यावर पडला आहे का? नाही म्हणायला रशियन अड्डे झालेत खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 12/10/2015 - 10:56 नवीन
सगळे बारीक विक्रेते, फार काय मासेवाले, बस कंडक्टर, सगळे भय्ये आहेत आणि लहान धंदेवाले केरळी. २०३१ च्या जनगणेत खरे गोंयकर मायनॉरिटीत जातील असा अंदाज आहे. तरी हे शांतच! मला सुरुवातीपासून भयंकर आश्चर्य वाटतं खरं तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 12/10/2015 - 11:02 नवीन
अगं, ते शांत म्हणजे मुळात सुशेगाद रहायचा आणि अ‍ॅडजस्ट करायचा स्वभाव. त्यात अजून त्यांना म्हणावी तशी झळ बसलेली नाही. अजूनही सगळ्यांना हात पाय पसरण्याइतकी स्पेस उपलब्ध आहे, पण लवकरच दुर्दैवाने तशी वेळ येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रदीप गुरुवार, 12/10/2015 - 11:21 नवीन
इथे तो सुशेगाद मूड अगदी छान पकडला आहे कॅमेर्‍यात, राजन पर्रीकरांनी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
व
विकास गुरुवार, 12/10/2015 - 14:52 नवीन
Cool! एकदम मस्त फोटो आहेत. बघा बघा चर्चेकर्‍यांनो! नाहीतर तुम्ही, गोव्याचा विषय आल्यावर सुशेगाद सोडून दंगा करताहात ते! ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा