Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 22:52
🗣 637 प्रतिसाद
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला. या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी : १. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच. २. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे. ३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच. माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात... काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते. त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते. बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता. केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते. इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल. मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्‍या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला. हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत. आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत. परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्‍यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
वर्गीकरण
अर्थकारण
राजकारण
देशकारण

प्रतिक्रिया द्या
133576 वाचन

💬 प्रतिसाद (637)
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 11/17/2016 - 20:58 नवीन
अनंत अडचणी आहेत, व्यक्ती तितक्या अडचणी असणारच. एवढं जनार्दन रेड्डीने खर्च करून लग्न लावलं, पण त्याला विचारलंत तर तो पण अडचणी सांगेल. तुम्ही बहुतेक सर्व सांगत आहात त्या मानसिकतेशी निगडीत आहेत. ज्याला भ्रष्टाचार करायचाच आहे तो विविध मार्ग शोधत राहणार. पण म्हणून उपाय करू नये का? भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि परत काळा पैसा तयार होऊ नये अशी एक किंवा अनेक योजना असतील तर कृपया सांगा. आपण सर्व मिळून साधक बाधक विचार करू आणि मग PMO ला कळवू. हे उपहासाने म्हणत नाहीये आणि वैयक्तिक तुमच्यावर आरोप करतोय किंवा आव्हान देतोय असे कृपया समजू नये. निर्णय आवणाऱ्याने/ न आवडणार्याने किंवा कोणी पण एक किंवा अनेक लोकांनी मिळून उपायांवर चर्चा करावी अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Fri, 11/18/2016 - 09:38 नवीन
भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि परत काळा पैसा तयार होऊ नये अशी एक किंवा अनेक योजना असतील तर कृपया सांगा. आपण सर्व मिळून साधक बाधक विचार करू आणि मग PMO ला कळवू.
वरती थोडक्यात लिहिलंय. पुन्हा लिहितो भ्रष्टाचार आणि 'कायदा व सुव्यवस्था' या एकमेकांशी निगडीत गोष्टी आहेत खूपशा गोष्टी राज्यांच्या अखत्यारित येतात. सर्वात महत्वाच्या म्हणजे पोलीस आणि लाच लुचपत प्रतिबंधक खाते (ACB) त्यामुळे एकतर भ्रष्टाचारविरोधी लढ्यात राज्यांची साथ खूप महत्वाची ..पण ते खूप कठीण आहे मग दुसरा उपाय हा की राज्यांचा या खात्यांवरील प्रभाव कमी करणे पोलीस किंवा ACB विरोधात केंद्राकडे सहज तक्रार करता आली पाहिजे. 'आपल्याला अशी तक्रात निर्धोकपणे करता येईल' हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण व्हायला हवा. तक्रारींची दखल वेळेत घेतली गेली पाहिजे. दुसर्‍या बाजूने न्याययंत्रणा भ्रष्टाचार मुक्त आणि सक्षम हवी. 'तारीख पे तारीख' पद्धत बदलून वेळेत न्याय मिळायला हवा. त्याकरिता मात्र एकटे सरकार फार काही करु शकत नाही. सरकार आणि न्यायव्यवस्था यांनी एकत्र येवून यावर उपाय योजले पाहिजेत. कोर्ट प्रोसिजर (CPC, CrPC, High Court rules ई ) मध्ये आवश्यक ते बदल केले पाहिजेत. भ्रष्टाचार्‍यांना आधी रोखणे गरजेचे आहे. नोटा रद्द करण्याच्या top down approach इतकंच bottom up approach महत्वाचं आहे. यासाठी एक-दोन उपाय सांगता येणार नाही. तर प्रत्येक यंत्रणेचा स्वतंत्र अभ्यास करुन त्यातील loopholes हळू हळू दूर केले पाहिजेत. Kaizen च्या तत्वा प्रमाणे हे continuous improvement असेल , एक स्ट्राईक नाही. काळा पैसा बाहेर काढण्याचं काम नंतर केल्यास बरं असं माझं मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Fri, 11/18/2016 - 22:29 नवीन
त्यामुळे एकतर भ्रष्टाचारविरोधी लढ्यात राज्यांची साथ खूप महत्वाची ..पण ते खूप कठीण आहे:
जवळजवळ अशक्य आहे. त्यासाठी तेवढा चांगला शासनकर्ता पूर्ण बहुमताने सगळ्या राज्यांमध्ये ५ वर्षांपेक्षा जास्त काळ पाहिजे. आपल्याकडची राजकीय पक्षांची संख्या बघता तर हे नजीकच्या भविष्यात होईल असं वाटत नाही.
आपल्याला अशी तक्रात निर्धोकपणे करता येईल' हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण व्हायला हवा
यासाठी ऑनलाईन पोर्टल केले आहेत/ काम चालू आहे
सरकार आणि न्यायव्यवस्था यांनी एकत्र येवून यावर उपाय योजले पाहिजेत. कोर्ट प्रोसिजर (CPC, CrPC, High Court rules ई ) मध्ये आवश्यक ते बदल केले पाहिजेत.
माझ्या आठवणीप्रमाणे मोदी सरकारने सुरुवातीच्या काळात बरेच जुने कायदे रद्दबातल केले होते. या कायद्यांचा उपयोगापेक्षा त्रासच जास्त होता. त्यामुळे काम चालू आहे पण गेल्या ६०-७० वर्षांची घाण साफ करायला वेळ तर लागणारच.
भ्रष्टाचार्‍यांना आधी रोखणे गरजेचे आहे
हा परत मानसिकतेचा मुद्दा आला. जिथे लहानपणापासून नियमांच्या विरुद्ध करणारा म्हणजे हिरो, हे बिंबवलं जातं तिथे हे कसं साध्य करणार? मुळात भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार. याचा फक्त पैश्यांशी संबंध नसून प्रत्येकाच्या वागण्याशी पण आहे. जिथे लोकांना साधं सिग्नलला १ मिनिट थांबता येत नाही, झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे थांबता येत नाही तिथे तुम्ही भ्रष्टाचार कसा रोखणार? पाणपोईवरच्या पाण्याच्या भांड्यांपासून रस्त्यांवरच्या गटाराच्या झाकणापर्यंत चोरून नेलं जातं. रुपये ५०००० च्या खरेदीवर १०००-१५०० रुपये वाचावे म्हणून बिल नाकारलं जातं तिथे भ्रष्टाचार कसा रोखणार? असो.
Kaizen च्या तत्वा प्रमाणे हे continuous improvement असेल , एक स्ट्राईक नाही
continuous improvement तर असणारच आहे. पण ज्यावेळेला एखादी गुंतागुंतीची प्रणाली (functionality), ज्यात भरपूर परस्परावलंबित्व आहे, ती एकदमच पूर्ण करायला लागते. मग एकदा बेसिक नीट झालं की मग continuous improvement करत राहायला लागतं. आत्ता सुद्धा हा तुम्हाला एकदम स्ट्राईक वाटतोय पण - जनतेला बँकिंग प्रणाली मध्ये आणण्यासाठी जन धन योजना, मॉरिशस व इतर पैसे फिरवण्याचे मार्ग बंद केले किंवा प्रयत्न तरी केले गेले, बेहिशोबी पैसा जाहीर करण्यासाठी २ वेळा मुदत दिली, २००० च्या नोटा छापण्याची तयारी ६ महिने चालू होती, बँकांना १०० व त्याच्या आतील नोटा जास्त प्रमाणात ठेवण्यासाठी सांगितलं होतं. आता यापेक्षा जास्त म्हणजे फक्त या तारखेपासून ५००-१००० च्या नोटा बंद करणार असं सांगणं बाकी होतं. जे आधी सांगणं उपयोगी नव्हतं कारण मग काळाबाजारवाल्यांनी सगळ्या १०० व त्याखालील नोटा आधीच पळवल्या असत्या. म्हणजे परत सामान्य माणसाचे हालच झाले असते. मी एक मस्त प्लॅन मिळेल, ज्यात स्टेप बाय स्टेप काय आणि कसं करावं हे असेल, अशी अपेक्षा केली होती. तुम्ही म्हणताय ती सर्वसाधारण रूपरेखा झाली. यात जो पडून राहिलेला पैसा आहे किंवा जो मालक बदलतोय पण बँक/ आयकर विभाग टाळतोय त्या बाहेर कश्या काढणार आणि खोट्या नोटा आहेत त्या रद्द कश्या करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
स
संदीप डांगे गुरुवार, 11/17/2016 - 21:08 नवीन
पोलीस वाहनांमधून नेल्या जाणाऱ्या जुन्या नोटा पकडत आहेत. जर त्या सिर्फ कागज का तुकडा रह गयी है तर हे कागज के तुकडे पकडण कसं काय योग्य, काही लोक अजूनही बंद नोटा स्वीकारत आहेत, तेही कसे कायदेशीर? पोलीस कंप्लेंट करावी काय?
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 11/17/2016 - 21:52 नवीन
संदीप डांगे, मागे लिहिल्याप्रमाणे जुन्या नोटांची शासनमान्यता रद्द झालेली असली तरी लोकं त्या आपसांत व्यवहारार्थ वापरू शकतात. त्यांना अडवणारं कोणी नाही. मात्र यामुळे काळा पैसा खेळता राहायला मदत होईल. म्हणून पोलीस असा पैसा पकडत आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 11/17/2016 - 22:07 नवीन
म्हणजे जो पैसा पकडीत आला नाही तो 30 डिसेंम्बर पर्यन्त खेळत राहील? त्यानंतर त्याची किंमत शून्य होईल, म्हणजेच 9 तारखेला जे झालं ते काय मग? काय तरी मिसिंग आहे. ज्यांचे कोट्यवधी लक्षावधी रुपये आहेत ते मजूर, नोकर, लेबर कॉन्ट्रॅक्टर तर्फे 300 रुपये रोजंदारीवर पैसा पांढरा करून घेत आहेत. 50 दिवसात 10 बँकांतून 100 मजूर 4000 (आता दोन) 2 कोटी आरामात सफेद करून घेतील. वीस कोटी, 200 कोटीही होऊ शकतात. कारण 200 कोटीवाला मध्यमवर्गीय पापभिरू नाही, त्याच्याकडे त्याच्या लेव्हलचे रिसोर्सेस असतात,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Fri, 11/18/2016 - 08:24 नवीन
संदीप डांगे, १.
म्हणजे जो पैसा पकडीत आला नाही तो 30 डिसेंम्बर पर्यन्त खेळत राहील?
३० डिसेंबरच कशाला, जगाच्या अंतापर्यंत खेळता राहू शकतो. ९ ला जे झालं तो शासकीय निर्णय होता. त्यानुसार जुन्या नोटा हे शासनमान्य वैध चलन ( = लीगल टेंडर) राहणार नाही. मात्र इतर लोकं ते चलन म्हणून वापरू शकतात. त्यावर शासन बंधन घालू शकंत नाही. २.
50 दिवसात 10 बँकांतून 100 मजूर 4000 (आता दोन) 2 कोटी आरामात सफेद करून घेतील. वीस कोटी, 200 कोटीही होऊ शकतात.
आपापसांत अवैध चलन चालवणे म्हणजे पैसा पांढरा करून घेणे नव्हे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 09:38 नवीन
अहो बँकेत रोजंदारीवर मजूर लावलेत काळ्या धनवल्यानी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
म
मृत्युन्जय Fri, 11/18/2016 - 09:45 नवीन
त्याला आता चाप बसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/18/2016 - 09:56 नवीन
असा "मजूर" एका बँकेतल्या एका व्यवहारात वापरणे थांबवणे व्यवहारात शक्य नाही. पण आता प्रत्येक ट्रांझॅक्शनसाठी पुसता न येणार्‍या शाईचा एक ठिपका बोटावर लावला तर असा मजूर एकूण किती वेळा "वापरला" गेला आहे ते समजेल आणि त्याने अनेक वेळा बँकांना भेट दिली असल्यास त्याच्या पैश्याचा स्त्रोत विचारता येईल. किंबहुना, आपल्या हातावर शाई लावतात इतकेच कारण बहुतेक अश्या मजूरांना वापरणे किंवा स्वतःला वापरून देणे थांबवायला पुरेसे होईल. त्यातही, कोणी ते चालू ठेवलेच तर "मजूराच्या" मदतीने वापरलेल्या काळ्या पैशाच्या स्त्रोतापर्यंत पोचणे शक्य आहे. सर्व पैसे बदलाचे व्यवहार लिखित स्वरूपात व ओळखपत्रासह आहेत. तेव्हा सद्याचा गदारोळ संपल्यावरही संशयास्पद प्रकरणांची चौकशी करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/18/2016 - 10:03 नवीन
शाई वापरण्याचा मुद्दा कारवाईच्या मूळ मसुद्यात होता. पण लोकांना त्रास होऊ नये यासाठी (साध्या मराठीत : विरोधी पक्षांना, "बघा, बघा, आम जनतेवर सरकार अविश्वास दाखवतेय" असा कांगावा करायला मिळू नये यासाठी) तो अमलात आणला गेला नाही. आता काळाबाजारवाले जनतेतील भोळ्या माणसांचा गैरवापर करत आहेत यासाठी शाई वापरात आणली आहे. लोकशाहीत अश्या तडजोडी न करणे अशक्य असते. आता यामुळे बँकेसमोरची गर्दी दोनएक दिवसांत कमी झाली तर आश्चर्य वाटायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/19/2016 - 11:49 नवीन
नुसते शाईचा ठिपका हातावर लावणार म्हणून जाहीर करताच बँकेसमोरच्या रांगातले लोक कालच निम्म्याने घटले अशी बातमी आहे... Queues getting shorter at banks; long wait at ATMs continues याचा अर्थ त्या रांगातले निम्मे लोक भाडोत्री होते, "स्वतःचे पैसे बदलायला आलेले तथाकथित गरीबबिचारे, उपाशी-तापाशी, आजारी आणि सरकारच्या छ्ळाने गांजलेले लोक" नव्ह्ते ! म्हणजे "वाहिन्यांवर अतीव सहानभूतीने बोलणारे नेते व वाहिन्यांवरचे वार्ताहर आणि त्यांचे पाठीराखे" हे केवळ चलाख कोल्हेकुईच करत होते असे दिसत आहे :) अवांतर : एका वाहिनिच्या वार्ताहाराच्या रिपोर्टचे मी अन्यत्र केलेले विश्लेषण बरोबर होते असेच दिसत आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/19/2016 - 11:55 नवीन
एटीएमपुढच्या रांगा उद्यापासून कमी होतील असा अंदाज आहे. कारण आजचा दिवस एटीएमच्या रिकॅलिब्रेशनसाठी ठेवलेला आहे. एकदा एटीएममधल्या सर्व खान्यांतून रु १०० (किंवा रु १०० आणि रु५००) च्या नोटा बाहेर येऊ लागतील तेव्हा त्या रांगाही एकदोन दिवसांत नोटाबंदीपुर्वी होत्या तशाच होतील. कारण एटीएमचा उपयोग काळा पैसा पांढरा करायला (मजूर लावून) होऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संदीप डांगे Sat, 11/19/2016 - 12:00 नवीन
आपण दिलेल्या बातमीत खालील तपशील वाचलेत People faced inconvenience in purchasing milk, vegetables, medicines as they did not have adequate small currency notes. At various hospitals across the country, patients and their family members are facing inconvenience in buying medicines, food and availing transportation. A bulk of daily labourers were rendered jobless as construction and other activities came to a standstill in the wake of cement, sand and other supplies not coming in. आता या बातमीतले खरे खोटे देव जाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/19/2016 - 12:09 नवीन
याची अपरिहार्यता आणि कारणे अनेकदा अनेक प्रतिसादांत (त्यातले काही प्रतिसाद तुम्हालाच उद्देशून होते) दिलेली आहेत. यावर ती कुढे आहेत असे विचारू नका. ती तुम्हीच शोधून पहा. जरा आपण व ज्यावर मुद्द्यावर टीप्पणी करत आहे त्याबाबतीतले दुसर्‍यांचे प्रतिसाद वाचून निदान या विषयाची चर्चा संपेपर्यंत तरी लक्षात ठेवलेत तर बरे होईल असे वाटते. त्यामुळे, दुसर्‍याचे काहीच रगिस्टर न होता आपलेच म्हणणे रेटत आहे, असे होणार नाही व किमान सामंजस्यपूर्ण चर्चा शक्य होईल. ७० वर्षांची घाण साफ करण्यासाठी उचललेल्या कोणत्याही कारवाईत जनतेला काहीच तोशीस पोचणार नाही अशी समज असल्यास, शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 11/19/2016 - 12:14 नवीन
मला काहीच म्हणायचे नव्हते, म्हणायचे असते तर मेगाबायटी टाकला असता. असो. 'सत्तर वर्षांची घाण' चांगला शब्द आहे. वापरण्यात येईल! शुभेच्छांसाठी धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/19/2016 - 13:12 नवीन
"सत्तर वर्षांची घाण" या शब्दाचे पूर्ण श्रेय माझ्याकडे नाही. बँकेच्या रांगेत उभ्या असलेल्या घरकामे करणार्‍या गृहिणीला एका वाहिनीच्या वार्ताहराने तिला होणार्‍या त्रासाबद्दल विचारले तेव्हा तिने दिलेले उत्तर मलाही काहीकाळ सानंद चकीत करून गेले... ती गृहिणी म्हणाली ते साधारण असे होते, "घर खूप दिवसांनी साफ करायला काढले की त्रास होणारच. पण तो त्रास सहन केल्याशिवाय घर कसे साफ होणार. घर साफ झाल्यावर मात्र किती छान वाटतं, नै का ?" या प्रसंगाचे वर्णन एक दिवसाने कायप्पावरही फिरु लागले होते. आता, या सर्वसामान्य कामकरी बाईइतकी बुद्धी विरोध करणार्‍या नेत्यांत नाही, असे अजिबात नाही. म्हणजेच त्यां नेत्यांच्या विरोधाची उद्दिष्ये नक्कीच त्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या बाईपेक्षा खूप वेगळी आहेत. ती उद्दिष्ये काय असू शकतात हा काही फार मोठे गुपित नाही :) भारताच्या सर्वसमावेशक उज्ज्वल भविष्याची इच्छा असणारा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून हा फरक समजून घेणे मला फार निकडीचे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/19/2016 - 12:28 नवीन
People faced inconvenience in purchasing milk, vegetables, medicines as they did not have adequate small currency notes. At various hospitals across the country, patients and their family members are facing inconvenience in buying medicines, food and availing transportation. आजच्या या बातमीवरून यातला निम्मा तरी त्रास पैसे बदलायला आलेल्या "मजूरांमुळे" होता असेच दिसत नाही काय ? पहिल्या दिवसापासून हाताला शाई लावायची असे मूळ योजनेत होते. पण तसे काही व्यावहारीक समस्या* आल्या असत्या म्हणून ते केल्याचे ताळले असे वित्तसचिवांनी राष्ट्रीय वाहिनीवर सांगितले आहे. * व्यावहारीक समस्या : असे केल्याने विरोधकांनी पहिल्या दिवसापासून "अरे बघा, बघा, हे सरकार आम आदमीवर किती अविश्वास दाखवत आहे पहा !" अशी कोल्हेकुई सुरू करून त्याचे राजकिय भांडवल केले असते. A bulk of daily labourers were rendered jobless as construction and other activities came to a standstill in the wake of cement, sand and other supplies not coming in. त्यांना त्यांच्या रोजच्या कामाची मजूरी मिळाली नसली तरी त्यापेक्षा जास्त मजूरीची लालूच असल्याशिवाय ते रोजचे काम सोडून रांगात उभे राहतील काय ? ++++++++++++++++ एका बाजूला स्वतःच काळाबाजार्‍यांनी पैसे बदलायला मजूर लावले आहेत असे म्हणायचे आणि त्या रांगेत उभे असलेल्या सर्व (मजूर + सज्जन) लोकांबद्दल गळा काढाताना हा मुद्दा विसरायचा. एकूण काय, भ्र्ष्टाचारविरुद्ध एक चांगले पाऊल उचललेल्या सरकारला ते आपल्या आवडीच्या पक्षाचे नाही म्हणून डोळे मिटून झोडपायचे ! चूकीला चूक आणी बरोबरला बरोबर म्हणण्याव्यतिरिक्त इतर काही मला कधीच जमले नाही. चूकीला चूक आणि बरोबरलाही चूक म्हणायला इतर बरेच काही लागते, त्याची आमच्याकडे वानवा आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 11/19/2016 - 12:34 नवीन
आपल्या प्रतिसादाची नोंद घेतली आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मार्मिक गोडसे Sat, 11/19/2016 - 16:44 नवीन
ह्या लोकांना स्वतःच्या खात्यात पैसे भरताही येत नाही व काढताही येत नाही., त्यामुळे त्यांना रांगेचा त्रासही नाही. आनंदी आनंद गडे..... हेच चित्र आहे सगळीकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/19/2016 - 19:26 नवीन
सर्व जनतेने बँकेत खाते उघडावी यासाठी सरकारने मोठी मोहीम चालवून तिच्यात बरेच यश आले असताना एखाद्या भौगोलिक विभागातले किंवा एखाद्या व्यवसायातले नागरिक ६० ते ७० टक्के व्यवहार बँकेशिवाय करतात, हे त्या भागातील नेत्यांना भूषणावह आहे का ? जिल्हा बॅंका अनेक वर्षे कार्यरत असूनही आरबीआयच्या मूलभूत नियमांचे (उदा: केवायसी) उल्लंघन करतात याला त्या बँका चालवणारे स्थानिक नेते जबाबदार नाहीत काय ? ते असे का करतात ? अश्या उल्लंघनाने शेतकर्‍यांचे (ही कारवाई नव्हती तेव्हाही) भले होत होते का ? आनंदी आनंद गडे अशी परिस्थिती होती का ? असो. या प्रश्नांची उत्तरे तितकिशी गुप्त नाहीत आणि आता त्यांची उत्तरे शोधायची वेळही नाही. आता पिडीत झालेले लोक स्थिरस्थावर झाल्यावर ते काम सावकाश करतील, अशी आशा करूया. ====== नकदेनेच ६० ते ७०% व्यवहार होतात असे बातमीत म्हटले आहे, याचा तेवढे नकद पैसे लोकांचा हातात आहेत. समस्या फक्त त्यातले जे पैसे जुन्या रु ५०० किंवा रु १०००च्या नोटांच्या स्वरूपात आहेत त्यांचा आहे. आताच्या स्थितीत योग्य बॅकेत जरूर ती ओळख कागदपत्रे घेऊन गेल्यास नवीन खाते काही तासांत उघडता येते. त्या खात्यात कितीही प्रमाणात नकद वैध उत्पन्न कोणत्याही प्रकारची चिंता न करता भरता येईल. शेतकी उत्पन्नावर आयकर नसल्याने कितीही वैध शेतकी उत्पन्न बँकेत भरले तर त्यावर आयकराचीही भिती नाही. त्यानंतर, सरकारने शेतकर्‍यांना खास वाढवून दिलेल्या रकमेत (शेवटच्या बातमीप्रमाणे दर आठवड्याला रु२५०००) नकद पैसे काढता येतील आणि बँकेत शिल्लक असेल त्या सीमेपर्यंत हवे तेवढे पैसे चेकने चुकते करता येतील. बँक जवळ नसली तर पोस्ट ऑफिस तरी असेलच. ====== अश्या कठीण काळात स्थानिक नेत्यांनी केवळ सरकारचा निषेध करत न बसता शेतकर्‍यांना (जे त्यांचे मतदारही असतात) योग्य बँकेत नवीन खाते उघडायला मदत केली तर त्याचा जेवढा फायदा शेतकर्‍यांना होईल तेवढाच (किंवा कांकणभर जास्तच) पुढच्या निवडणूकीत नेत्यांना होईल. किंबहुना अश्या वेळेस मतदारांच्या जे कामी येत नाही त्यांना नेते तरी कसे म्हणावे ?! सद्याच्या कठीण परिस्थितीत केवळ तक्रार करत बसण्यापेक्षा शक्य ते वैध उपाय शोधणे गरजेचे आहे, असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Sun, 11/20/2016 - 07:56 नवीन
सर्व जनतेने बँकेत खाते उघडावी यासाठी सरकारने मोठी मोहीम चालवून तिच्यात बरेच यश आले असताना एखाद्या भौगोलिक विभागातले किंवा एखाद्या व्यवसायातले नागरिक ६० ते ७० टक्के व्यवहार बँकेशिवाय करतात
शेतकर्‍यांची जि.म. बॅकांमध्ये खाती असतातच. पिक नुकसान भरपाई, पिककर्ज ह्याच बॅकामार्फत मिळते. त्यामुळे ६० -७० टक्के व्यवहार बँकेशिवाय चालतो ह्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही.
जिल्हा बॅंका अनेक वर्षे कार्यरत असूनही आरबीआयच्या मूलभूत नियमांचे (उदा: केवायसी) उल्लंघन करतात याला त्या बँका चालवणारे स्थानिक नेते जबाबदार नाहीत काय ?
आरबीआय जेव्हा बँकांना परवाना देते तेव्हा संबंधीत बँका आरबीआयच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करते की नाही हे पहाण्याची जबाबदारी आरबीआयची असते, स्थानिक नेत्यांची नाही.
आताच्या स्थितीत योग्य बॅकेत जरूर ती ओळख कागदपत्रे घेऊन गेल्यास नवीन खाते काही तासांत उघडता येते.
दुसर्‍या कशाला? ,ह्याच बॅकेत केवायसी पुर्ण करूनही व्यवहार करता येतील. परंतू सरकारने ह्या बँकाच्या व्यवहारावरच सध्या बंदी घातली आहे. ज्यांची ह्या बँकेत केवायसी पुर्ण आहे अशा खातेदारालाही आपल्याच खात्यातून रोख रक्कम काढता येत नाही. नोटाबंदीचा निर्णय हा सरकारने आरबीआयला बरोबर घेउनच घेतलेला आहे. ह्या चलनबदलीकरता बँक व पोस्ट प्रणाली वापरावी लागणार हे माहीत असताना, ह्या प्रणालीत येणार्‍या संभाव्य अडचणी दूर करूनच हा निर्णय राबवायला हवा होता. सरकारने फार घाईघाईत निर्णय घेताना लोकाच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले व त्याचे खापर स्थानिक नेत्यांवर फोडणे योग्य नव्हे.
सद्याच्या कठीण परिस्थितीत केवळ तक्रार करत बसण्यापेक्षा शक्य ते वैध उपाय शोधणे गरजेचे आहे, असे वाटते.
सरकारच्या निर्णयाला कधीच विरोध केला नाही. परंतू जे लोक म्हणतात जनतेला ह्या निर्णयामुळे काहीच त्रास होत नाहीये, ग्रामीण भागातील जनतेला त्रास होतोय,परंतू काही कारणामूळे तो लोकांसमोर येत नसल्याने सर्वत्र आनदी आनंदाचे वातावरण आहे असे ज्यांना वाटते अशांसाठी वरील संदर्भ दिला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अमितदादा Sun, 11/20/2016 - 08:33 नवीन
प्रतिसादाशी पूर्ण सहमत आहे. लोकांचा निर्णयाला विरोध नाही मात्र निर्णयातील अंमलबजावणीतील ढिसाळपणा ला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा त्रास होतो आहे. आज मी ज्या पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून आलोय तिथे आमच्या गावातील पंचक्रोशीत फक्त एक महाराष्ट्र बँकेची शाखा आहे इतर कोणतीही मोठी पब्लिक सेक्टर किंवा private सेक्टर मधली बँक नाहीये. मात्र भरपूर गावात जिल्हा बँक, सहकारी बँका आणि पटसंस्थेचे जाळे आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात यावर अवलंबून आहे. शेतकऱ्याचं कर्जवाटप, शासकीय मदत, ऊस बिले पूर्ण ह्या बँकांत जमा होतात, याचा कोणताही विचार न करता सहकारी आणि जिल्हा बँकेना नवीन नोटा न पाठवणे तसेच जुना नोटा स्वीकारण्यास बंदी घालणे चुकीचे वाटते. आज आता ऊस तोडीची बिले शेतकऱयांच्या खात्यात जमा होऊ लागलीयेत मात्र शेतकऱयांना त्याचा वापर करता येत नाहीये आज शेतकरी शेतमजुरांना काही 100 रुपये किंवा 200 रुपयाचे रोजच्या कामाचे चेक लिहून देऊ शकत नाही, आणि भरपूर जिल्हा बँकांना atm ची सुविधा लिमिटेड आहे त्यामुळे असे हि पैसे काढू शकत नाही. तसेच आज सहकारी आणि शेतकरी बँकेत 6 ते 8 हजार कोटी जुन्या नोटांच्या बदल्यात शेतकऱ्यांनी जमा केलेत त्याच करायचं काय हा प्रश्न पडलाय कारण मोठ्या बँका ह्या नोटा स्वीकारेनात. सरकार नक्कीच याचा विचार करून मार्ग काढेल हि अशा अन्यथा अत्यंत चांगल्या निर्णयाची मोठी राजकीय किंमत ग्रामीण भागात तरी मोजावी लागेल. अवांतर राजकीय भाष्य: जेटली हे मोदींचे राजकीय मॅनेजर म्हणूनच शोभून दिसतात, अर्थमंत्री म्हणून अप्रभावी, ढिसाळ तसेच inefficient.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मराठी कथालेखक Mon, 11/21/2016 - 06:53 नवीन
मोदी सरकारने घेतलेला निर्णय, त्यातही ज्यात मोदींचा अतिशय स्वत:चा महत्वाचा सहभाग ...मग असा निर्णउ चुकणं अशक्य. अंमलबजावणी मुळे सामान्य जनतेला २-४ वा ५० दिवस त्रास झाला तरी देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होवून त्याने तो सहन करावा. निर्णयावर टीका करणारा देशद्रोही. अंमलबजावणीतल्या त्रूटी दाखवणार्‍याची देशासाठी त्याग करण्याची तयारी नाही..या आणि अशा मानसिकतेतून बाहेर पडून सारासार विचार करणे गरजेचे आहे. मोदीभक्ती वा मोदीविरोध हे दोन्हीही व्यक्तीकेंद्रित आहे. ते बाजूला ठेवणून घेतलेला निर्णय आणि अंमलबजावणी याकडे वस्तुनिष्ठपणे बघायला हवे. आताही जिल्हा बँक, सहकारी बॅंक यांत kyc, PAN card ची माहिती पुर्ण करुन खातेदारांना पैसे स्वीकारण्यास / काढू देण्यास परवानगी द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
म
मराठी कथालेखक Mon, 11/21/2016 - 06:46 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/21/2016 - 08:23 नवीन
एखाद्या भौगोलिक विभागातले किंवा एखाद्या व्यवसायातले नागरिक ६० ते ७० टक्के व्यवहार बँकेशिवाय करतात साहेब, आपण जो दुवा पुरावा म्हणून तुमच्या प्रतिसादात दिला आहे तो वाचला असतात तर या वाक्याला अर्थ नाही असे म्हटले नसतेत. ही माहिती तुम्ही दिलेल्या दुव्यातल्या बातमीतूनच घेतली आहे !!!!!!!!!!!!! आता, (अ) प्रथम तुमचा दुवा वाचून आणि (आ) माझा प्रतिसाद वाचून मग (इ) तुमचा वरचा प्रतिसाद वाचलात तर मला इतरही जास्त काही सांगण्यासारखे उरणार नाही ! :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Mon, 11/21/2016 - 10:24 नवीन
सर्व शेतकर्‍यांचे जि,म. बँकेत खाते असले तरी, शेतकर्‍यांचे व्यवहार हे नेहमीच रोखीनेच असतात ह्याचे कारण शेतीमाल उत्पादनाची विक्री रोखीतच होत असल्यामुळे व शेतमजूरांना रोखीतच पैसे द्यावे लागत असल्यामूळे बहुतांश शेतकर्‍यांचा बँकेशी संबंध पिककर्ज, पिक नुकसानभरपाई ई. बँकेत जमा झालेल्या रक्कमा काढण्यापूरताच असतो. त्या अर्थाने ६०-७० टक्के व्यवहार बँकेशिवाय चालतात असा घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/21/2016 - 08:34 नवीन
ह्याच बॅकेत केवायसी पुर्ण करूनही व्यवहार करता येतील. या बँकांबद्दल तुम्हाला बरीच माहिती असावी असे लिखाणावरून दिसते. तेव्हा, आरबीआय ह्या बँकांच्या मागे लागूनही वर्षानुवर्षे हे केवायसीचे साधे सोपे काम का पूर्ण होत नाही, हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगले माहित असणारच ! :) बँकांनी वर्षानुवर्षे टाळलेले हे काम आता त्यांच्याच हस्ते, घिसाडघाईत काम केल्याने ते जास्त वेळखाऊ, अपूर्ण, चुकीचे आणि गैरव्यहारांसाठी सुलभ होऊ शकेल हे सांगायला नकोच. मग त्यामुळे पैशांचे किंवा इतर गैरव्यवहार झाले की, पूर्वी चालढकल करणारे लोकच, भारतिय सरकार आणि आरबीआयला दोष द्यायला सर्वात पुढे असणार, नाही का ?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Mon, 11/21/2016 - 10:34 नवीन
पूर्वी चालढकल करणारे लोकच, भारतिय सरकार आणि आरबीआयला दोष द्यायला सर्वात पुढे असणार, नाही का ?!
सहा महिन्यांपूर्वीच आरबीआयने आजच्यासारखा कठोर निर्णय घेतला असता तर आज ग्रामीण भागातील चलनबदलाची समस्या टाळता आली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/21/2016 - 11:33 नवीन
सहा महिन्यांपूर्वीच आरबीआयने आजच्यासारखा कठोर निर्णय घेतला असता तर आज ग्रामीण भागातील चलनबदलाची समस्या टाळता आली असती. हे लिहायला सोपे आहे. पण... १. कठोर निर्णय !? शेतकर्‍याच्या फायद्याच्या कारणाने कठोर निर्णय घेतला तरी त्याचा विपर्यास करून शेतकर्‍यांच्या आडून गदारोळ करणार्‍यांना नेत्यांना आयतेच अजून एक कारण मिळाले असते. हे राजकारण भारताला नवीन नाही. आरबीआयने वारंवार नोटीसा पाठवूनही राजकिय दबाव वापरून ज्या कारणासाठी (जे सामान्य शेतकर्‍यांच्या फायद्याचे नाही) केवायसी केली जात नव्हती, ते कारण कायमच होते/आहे ना ? २. याशिवाय अजून जास्त महत्वाचे कारण : "आताच कठोर कारवाई का ?" असा प्रश्न पडून "चलाख" मंडळींनी यामागे काय कारण आहे याचा जोरदार तपास चालू केला असता आणि कारवाईची गुप्तता धोक्यात आली असती. गुप्तता तर या कारवाईचा प्राण होता. म्हणुनच तर सर्व विरोधकांचा रोख असाच आहे की, "कारवाई गुप्त का ठेवली ? पूर्वीच्या कारवायांप्रमाणे तिच्याबाबत अगोदर प्रसिद्धी करून मग सहाएक महिन्यांच्या मुदतीत ती लागू करायला हवी होती (पक्षी : आम्हाला काळ्याचे पांढरे करायला पळवाट ठेवायला हवी होती) ! :) दोन्ही बाजूंनी विचार केला तर बरेच ध्यानात येईल. जिल्हा बँकतून वर्षानुवर्षे मुद्दामहून ठरवून कामचुकारी केली गेली त्यामागे स्वार्थी हितसंबंध नव्हते, केवळ एक सामान्य आळस होता आणि केवळ सरकारचीच चूक आहे असे ठरवले असल्यास, कितीही समजावले तरी पटणार नाही. तेव्हा, या मुद्द्याला इथेच रामराम करूया ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Mon, 11/21/2016 - 13:14 नवीन
शेतकर्‍याच्या फायद्याच्या कारणाने कठोर निर्णय घेतला तरी त्याचा विपर्यास करून शेतकर्‍यांच्या आडून गदारोळ करणार्‍यांना नेत्यांना आयतेच अजून एक कारण मिळाले असते.
आरबीआय कोणत्याही राजकीय दबावाखाली निर्णय घेत नाही (माजी गवर्नरनी रेपो रेटच्या वेळी दाखवले आहे).
आताच कठोर कारवाई का ?" असा प्रश्न पडून "चलाख" मंडळींनी यामागे काय कारण आहे याचा जोरदार तपास चालू केला असता आणि कारवाईची गुप्तता धोक्यात आली असती.
काहीही. २०१६ च्या Income Declaration Scheme च्या दरम्यान सरकारने काळा पैसेवाल्यांना ही शेवटची संधी आहे असे सांगितले होते . नंतर काळा पैसा काढण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट सांगितले होते, तेव्हा नाही का ह्या "चलाख" मंडळींना वास लागला? घाईघाईत निर्णय घेतल्याने आरबीआयवर ही नामुष्की आली आहे. उगाच गुप्ततेचे समर्थन करण्यात अर्थ नाही.
केवळ सरकारचीच चूक आहे असे ठरवले असल्यास, कितीही समजावले तरी पटणार नाही. तेव्हा, या मुद्द्याला इथेच रामराम करूया ! :)
हा आरबीआयच्या अखत्यारीतला विषय आहे उगाच सरकारला मध्ये आणू नका, सरकारची चूक आहे असे म्हटलेले नाही. सहा महिन्यांपूर्वीच आरबीआयने आजच्यासारखा कठोर निर्णय घेतला असता तर आज ग्रामीण भागातील चलनबदलाची समस्या टाळता आली असती. नीट वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/21/2016 - 15:55 नवीन
तो निर्णय कठोरपणे का राबवता आला नसावा याबद्दल वर काही मी लिहिले आहे ते वाचा. वर लिहिल्याप्रमाणे हा मुद्द्यावर अनेकदा लिहिलेली उत्तरे परत परत लिहिण्याचा कंटाळा आला आहे. तेव्हा चर्चेतला हा माझा शेवटचा प्रतिसाद. काळ बाकी सर्व सत्य गोष्टी उलगडून सांगेल असा अंदाज आहेच. त्यामुळे धन्यवाद आणि राम राम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Mon, 11/21/2016 - 16:54 नवीन
ठिक आहे, ६ महिन्यांपूर्वी आरबीआयला जि.म.बँकेचा भोंगळ कारभार माहीत असुनही गुप्तता धोक्यात येइल असे वाटल्याने कारवाई केली नाही. मग नोटाबंदी जाहीर झाल्यावर लगेच दुसर्‍याच दिवशी का नाही ह्या बँकांच्या व्यवहारावर बंदी आणली? का चार दिवस आरबीआयने दुर्लक्ष केले? ह्यावरून सिद्ध होते की, आरबीआयनेही पूर्वतयारी केली नव्हती. उगाच गुप्ततेचे समर्थन करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सचु कुळकर्णी Fri, 11/18/2016 - 22:40 नवीन
त्यानुसार जुन्या नोटा हे शासनमान्य वैध चलन ( = लीगल टेंडर) राहणार नाही. मात्र इतर लोकं ते चलन म्हणून वापरू शकतात. त्यावर शासन बंधन घालू शकंत नाही. आ.न.गा.पै. पुन्हा एकदा वाचा काहि गल्लत तर होत नाहिये ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/19/2016 - 12:00 नवीन
+१ बाद केलेल्या नोटा कायद्याने सरकारजमा करायच्या असतात. त्यांचा कोणत्याही चलनी स्वरूपात केलेला उपयोग कायद्याने गुन्हा ठरेल. फार फार तर काही थोड्या नोटा "कलेक्टर्स आयटेम" म्हणुन संग्रहात ठेवल्या तर त्या बाबतीत सरकार डोळेझाक करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
म
मृत्युन्जय Fri, 11/18/2016 - 09:44 नवीन
ज्यांचे कोट्यवधी लक्षावधी रुपये आहेत ते मजूर, नोकर, लेबर कॉन्ट्रॅक्टर तर्फे 300 रुपये रोजंदारीवर पैसा पांढरा करून घेत आहेत. 50 दिवसात 10 बँकांतून 100 मजूर 4000 (आता दोन) 2 कोटी आरामात सफेद करून घेतील. वीस कोटी, 200 कोटीही होऊ शकतात. त्यासाठीच मोठ्या प्रमाणावर असलेला पैसा पकडला जातो आहे. योग्य ते स्पष्टीकरण दिल्यास तो परत देखील मिळेल. अन्यथा सरकारदरबारी जमा. बाकी मी आधीही लिहिले होते. ५० -६० लाखापर्यंत पैसा आरामात पांढरा होइल. १ कोटीपेक्षा जास्त अस्सेल तर अश्या माणसाला अडचण येइल २ कोटीपेक्षा जास्त असेल तर अश्या माणसाला नक्कीच झळ बसेल. त्याहुन जास्त असेल तर अश्या माणसांचे काही पैसे नक्की डब्यात जातील. ज्या मार्गाने अथवा सहजतेने १ कोटी पांढरे होउ शकतात त्या सहजतेने २०० कोटी नाही होउ शकत. किंबहुना होणारच नाहित. या मार्गाने अजुनही एक गोष्ट साध्य होइल की धनसंचय जो एकाच माणसाकडे आहे तो अनेक माणासांकडे विभागला जाइल आणी बाकीचा चलनबाह्य होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 09:52 नवीन
ओके!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/19/2016 - 12:43 नवीन
आता (अ) हाताला शाई लावणे; (आ) सरकार व रिझर्व बँकेकडून "बँकेअंतर्गत काळ्या व्यवहारातून काळाबाजार्‍यांना मदत केल्यास कारवाई होईल" असा संदेश देणे, (इ) जमा झालेल्या २.५ लाखावरच्या पैशाची चौकशी करणे* आणि (ई) जिल्हा स्तराच्या व त्याखालच्या बँकांना पैसेबदल कारवाईतून पहिल्यापासून वगळणे यामुळे असा पैसा खूपच कमी प्रमाणात (एकूण काळ्या पैशाच्या तुलनेत) बदलला जाईल. * कालच तशी एक नोटीस कायप्पावर पाहिली. अशा प्रत्येक विभागात एकदोन नोटीसेस गेल्या तरी काळाबाजार्‍यांना आपले बँकेचे खाते वापरायला देवून मदत करायला कोणी पुढे येईल असे वाटत नाही :) ... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/21/2016 - 11:37 नवीन
अश्या नोटीसा आतापर्यंत दशहजार किंवा लाखांतही दिल्या गेल्याच्या बातम्या आहेत. म्हणजे काळ्याचे पांढरे करायला "उसने बँक अकाऊंट" वापरणे कठीण झाले आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ग
गामा पैलवान Sat, 11/19/2016 - 11:37 नवीन
सचु कुळकर्णी,
आ.न.गा.पै. पुन्हा एकदा वाचा काहि गल्लत तर होत नाहिये ना.
आसं बगा की गामा पैलवानाला गावातल्या कुळकर्ण्याचा सांगावा आला की हिरीचा ऱ्हाट कोसळला हाये. गाम्या गेला तितं आन पैलवानकी दाखवीत येकट्यानं रहाट खेचडून काडला भाईर. आता कुळकर्ण्याकडं घरची शेती बऱ्यापैकी आसली तरीबी नगद पैका न्हाई. म्हून त्यानं घरचा गळका माठ पार फोडला आन एका खापरावर खडूने पैलवानास पन्नास रुप्ये देणे असा लिवला. हा खापर घेऊन गाम्या वाण्याच्या दुकानी जाऊन मीठमिरची इकत घेऊ शकतो की नाय? गावातल्या गावात खापराच्या तुकड्याच्या जागी रद्द नोटाही चालू शकतील. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 11/19/2016 - 11:53 नवीन
गावातल्या गावात खापराच्या तुकड्याच्या जागी रद्द नोटाही चालू शकतील. == पण फक्त तीस डिसेंबर पर्यंत! (बॅंकेत जुन्या नोटा भरायची मुदतवाढ मिळाली नाहितर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 11/19/2016 - 19:34 नवीन
प्रसाद_१९८२, या नोटा बँकेत भरण्यासाठी नाहीयेत. फक्त आपापसांत व्यवहार करण्यासाठीच आहेत. त्यामुळे जगाच्या किंवा नोटांच्या अंतापर्यंत चालतील. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/19/2016 - 12:51 नवीन
गावातल्या गावात खापराच्या तुकड्याच्या जागी रद्द नोटाही चालू शकतील. रद्द नोटांचा तसा उपयोगही बेकायदेशीर आहे =)) त्या नोटांचे तुकडे करून आरबीआय त्यांच्या विटा बनवते असे एका वाहिनीवर पाहिले आहे. त्या विटांची बांधकामात वापरण्यासाठी विक्री होते काय हे शोधून काढले पाहिजे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सरल मान Sat, 11/19/2016 - 13:27 नवीन
बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. २००० च्या नोटा ८ तारखेच्या आधीच बँकात पोचल्या होत्या. माझ्या कायप्पाच्या एका ग्रुपवर ६ तारखेलाच २००० च्या नोटेचा फोटो आला होता आणि सर्व सदस्याना ती अफवा वाटली होती.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 11/20/2016 - 10:06 नवीन
नेते, वार्ताहर आणि नागरीक यांच्यातील फरक दाखवणारी चित्रफीत...
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/21/2016 - 12:08 नवीन
(अ) हाताला शाई लावणे (आ) नोटा बदलून देण्याची सीमा कमी करणे (रु४५०० ऐवजी रु२०००) (इ) दुसर्‍यांच्या "भाडोत्री खात्यांत" रक्कम जमा करणे बेकायदा आहे व त्यासाठी दोन्ही पार्टींना दंड व शिक्षा होऊ शकते, याला पुरेशी प्रसिद्धी देणे व अश्या संशयित खातेधारकांना करविभागाच्या नोटीसा जाणे (ई) बरीचशी एटीएम्स रु १०० व रु५०० साठी कार्यान्वित होणे या वरच्या उपायांमुळे, आजपासून बँकांसमोरच्या रांगा अर्ध्यावर किंवा त्यापेक्षा कमी झाल्याच्या बातम्या माध्यमांत येत आहेत. आणि हे सर्व बँकेच्या एका दिवसाच्या सुट्टीनंतर घडत आहे ! यावरून, त्या रांगात "तथाकथित, गरीब, गांजलेल्या, पिडलेल्या आणि आजारी" लोकांचे किती प्रमाण असावे व भाडोत्री लोकांचे किती प्रमाण असावे याचा अंदाज, त्यांच्या नावाने दु:खी झालेल्या नेत्यांना, वार्ताहरांना आणि त्या दोघांच्या वचनांनी वाहत गेलेल्या लोकांनाही लावायला कठीण नाही. किंबहुना भाडोत्री लोक रांगात नसते तर सज्जन नागरिकांनी खूप खूप कमी त्रास झाला असता याचीही नोंद घ्यायला हवी ! रांगातल्या भाडोत्री लोकांचे समर्थन न करता त्यांचे बिंग फोडण्यासाठी जर नेतेगिरी, पत्रकारिता व नागरिक शक्ती वापरली गेली असती, तर त्या संबंधितांच्यातर्फे एक देशोपयोगी काम झाले असते. आता सद्याची वेळ गेली असली तरी, यावेळेस आपण प्रत्यक्षात कोणते/कोणाचे काम केले ह्याचे ज्याने त्याने आत्मपरिक्षण केले तर, भविष्यात काय करणे देशाच्या म्हणजेच पर्यायाने आपल्या सर्वांच्या आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या फायद्याचे होईल हे नीट कळून चुकेल, यात मात्र काहीच शंका नाही.
  • Log in or register to post comments
J
jp_pankaj Mon, 11/21/2016 - 14:14 नवीन
आज बँका बाहेर तुरळक गर्दी होती. ( अपवाद SBI/SBH). HDFC,BOM,ICICI,SBH यांचे एटीएम (रिकॅलीब्रेट)चालु झालेले दिसले. उगाच टिपी करत फिरलो, फोटु पण काढले. (प्रत्यक्षदर्शी )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/21/2016 - 15:56 नवीन
प्रत्यक्षदर्शी पुरावा समोर आणल्याबद्दल, धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jp_pankaj
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/21/2016 - 16:23 नवीन
आज नोटा रु ५०० व रु१००० च्या नोटा रद्द होण्याचा १३ वा दिवस. आज शेतकर्‍यांना व इतर जनतेला दिलासा देणार्‍या अजून काही सुटी जाहीर केल्या गेल्या आहेत. मिपाकरांपैकी कोणाच्या मजरेतून निसटल्या असल्यास कळाव्या यासाठी त्या खाली देत आहे. अधिक माहितीकरिता आपापल्या बँकेत किंवा संबंधीत इतर जागी चौकशी करावी... १. कार, घर किंवा इतर काही कारणांसाठी घेतलेल्या कर्जांचे १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या मुदतीतले हप्ते ६० दिवस पुढे ढकलले आहेत. यामुळे मूळ कर्जांच्या अटींत फरक (रिस्ट्रक्चरिंग) होणार नाही. २. शेतकर्‍यांना रु ५०० च्या जुन्या नोटा वापरून केंद्रिय व राज्य सरकारी केंद्रांतून आणि Indian Council of Agricultural Research येथून बियाणे खरेदीची परवानगी. ३. कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधा असणारे दर आठवड्याला रु५०,००० नकद काढू शकतील (काही अटी आहेत). ही सुविधा करंट अकाऊंट्सना अगोदरपासूनच आहे. ४. रु ५०० कोटी खर्चाच्या आरोपामुळे बातमीत असलेल्या जनार्दन रेड्डी याच्या मुलीच्या लग्नाला सेवा पुरवलेल्या कंपन्या / व्यक्तींची आयकर विभागाकडून चौकशी सुरू झाली. ५. नोव्हेंबर १८ पर्यंत बँकांत रु५.४४ लाख कोटी किंमतीच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. ६. विरोधकांनी नोटा रद्द करण्याच्या कृतीवर चर्चा करण्यास नकार देवून राज्यसभेत सरकारवरील विश्वास ठरावाचा आग्रह धरला आहे व तोपर्यंत सर्व कामावर स्थगितीचा ठराव (अ‍ॅडजर्नमेंट मोशन) आग्रह केला आहे. स्त्रोत : http://timesofindia.indiatimes.com/india/Day-13-of-demonetisation-Key-developments/listshow/55545348.cms
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Mon, 11/21/2016 - 17:20 नवीन
राज्यसभेत सरकारवरील विश्वास ठरावाचा आग्रह धरला आहे
राज्यसभेत तसेही बीजेपी किंवा एनडीए बहुमत नाहीये (माझ्या माहितीप्रमाणे, कदाचित चुकीची पण असेल). त्यामुळे नक्की कोणावर विश्वास ठराव करणार? राज्यसभा केंद्र सरकारवर अविश्वास ठराव काढू शकते? जर का केंद्र सरकारवरचा अविश्वास ठराव राज्यसभेत मान्य झाला तर पुढे काय होणार? यात कुठे लोकांच्या मताला काही किंमत दिली जाणार नाही हे तर उघडच आहे पण याचा केंद्र सरकारवर काही परिणाम होऊ शकतो का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा