ईशान्य भारतः निसर्गप्रेमींसाठी पर्वणी -१
पहिल्या भागात आपण तवांगजवळच्या वॉर मेमोरियल पर्यंत आलो होतो.
तिथून पुढे गेल्यावर न्युरानांग फॉल्स लागले. थोडी फोटोग्राफी करुन पुन्हा निघालो.
आमचा अरुणाचलमधून परतीचा प्रवास सुरु झाला.
खरं सांगायचं तर ट्रीपला जायला, फिरायला जायला मला विशेष आवडत नाही. सहलीला जाणे म्हणजे 'सुखातला जीव दुखःत घालणे', असं मला वाटतं. प्रवास, बाहेरचं जेवण, हॉटेलात राहणे हे मला तितकंसं मानवत नाही.
पण आमच्या घरातल्या बाकी मंडळीना मात्र सहलीला जाणे, वेगवेगळी ठिकाणं पाहणे, adventure tour करणे हे सर्व अतिशय आवडतं. मग सगळ्यांनी नेट लावला, कि मीही तयार होते, आणि आम्ही जातो फिरायला कधी कधी.
भारतात जेव्हा जेव्हा आम्ही सहली करता बाहेर गेलो, तेव्हा तेव्हा आनंदापेक्षा वैताग जास्त झाला, असं माझं अगदी प्रामाणिक मत आहे.